काथ्याकूट

महाराष्ट्राची जिवनरेखा........

Primary tabs

महाराष्ट्राची जिवनरेखा........ नाही पणती नाही चिरा !!

कालच्या लोकसत्ता मधील या बातमीने लक्ष वेधुन घेतले. याचा घोषवारा असा होता की ३१ मे ला आपल्या एस्.टी ला ६० वर्षे पुर्ण होणार आहेत. मात्र म.रा.प.म. आणी राज्य शासन यांना याचे अजिबात सोयर सुतक नाही. वाईट वाटले ही बातमी वाचुन.

१ जुन १९४८ ला पुणे - अहमदनगर मार्गावर एस्.टी ची पहिली बस धावली. तेव्हापासुन आजपर्यंत आपल्या असंख्य बसेसद्वारे महाराष्ट्राच्या काना़कोपर्‍यात पोहचलेले एस्.टी चे जाळे अचंबीत करणारे आहे.

लहाणपणी एस्.टी शी माझे जिव्हाळ्याचे नाते होते. सांगली मध्यवर्ती बसस्थानक ही अतीशय आवडीची जागा. घरी येणार्‍या नातेवाईकांना आणायला आणी परत सोडायला बाबां बरोबर नियमीत जायचो. त्यावेळी पुणे, मुंबई येथुन येणार्‍या बसेसचे विशेष आकर्षण असायचे.

लहाणपणापासुन केलेले एस्.टी चे वेगवेगळे प्रवास खुप एन्जॉय केले. त्यात शाळेच्या ट्रिप्स, लग्नाला जाण्यासाठी केलेली वेगळी बस, कोकणातील अशोक लेलँडच्या बसेस नंतर आलेल्या एशियाड, डिलक्स बसेस ते आजच्या शिवनेरी , महाबस यातुन केलेला प्रवास इ.

आज व्यवसायाने मार्केटींग मधे आहे. हे क्षेत्र निवडण्याचे महत्त्वाचे कारण प्रवासाची आवड. आज जरी खाजगी बसेस, रेल्वे अगदी विमान प्रवास करत असलो तरी मला वाटते ही आवड निर्माण होण्यास लहानपणी केलेल्या एस्.टी प्रवासाचा नक्कीच मोठा वाटा आहे. आणी या बद्दल एस्.टी चा कायम ॠणी राहीन.

अशी ही आपल्या सर्वांची लाडकी एस्.टी चिरायु होवो हीच सदिच्छा !!

मनस्वी


६० वर्षांच्या एस्. टी. ला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
एस्. टी. चिरायु होवो तसेच अधिक कार्यक्षम बनो, स्वच्छ-टापटीप राहो आणि खेडोपाडी पोहोचो.
ज्या खेडी-वस्त्यांनी अजून एस्. टी. चे तोंडही पाहिले नाही तिथे एस्. टी. पोहोचो.
जिथे गावातून शहरांना दिवसातून फक्त एकदाच एस्. टी. जाते तिथे तिची फ्रीक्वेन्सी वाढो.
एस्. टी. कामगारांची वेतनश्रेणी वाढो आणि कामातील हेक्टीकपणा कमी होवो.
जय एस्. टी. महामंडळ.

मनस्वी
"मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

मनस्वी

ताम्हीणी घाटातील एस्. टी... गुगलवर मिळाला!

मनस्वी
"मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

विदुषक

ह्या वर्शी एस्. टी ला चक्क नफा झाला आहे
मजेदार विदुषक

कुंदन

असेच म्हणतो ...

>> ह्या वर्शी एस्. टी ला चक्क नफा झाला आहे
राजकारणी लोक जर महामंडळापासून दूर राहिले तर नफा होत राहिल.
तोट्याला कारणीभूत आहे ती राजकारणी लोकांची ढवळा ढवळ....

( येष्टी प्रेमी...) ...कुंदन

छोटा डॉन

आहे असेच म्हणतो ...

अवांतर : ह्या वर्षी एस्. टी ला चक्क नफा झाला आहे
ह्याबद्दल आमच्या भागाचे "आमदार व एस टी महमंडळाचे अध्यक्ष श्री. सुधाकरपंत परिचारक " यांचे अभिनंदन

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

मदनबाण

जियो एस.टी जियो......
या एस.टी तुन प्रवास करण्याची मजा काही औरच.....

(एस.टी प्रवासी)
मदनबाण.....

आर्य

मी पायी, सायकल, बस, रेल्वे अगदी विमान प्रवासही केलेत. पण हे सगळे दुरवर नेतात च्यायला.
पण एस.टी नेच माणसे खर्‍या अर्थाने जवळ येतात.

हात दखवा बस थांबवा =;

एसटी चा प्रवासी (आर्य)

विकास

प्रवाशांच्या सेवेसाठी एस टी हे ब्रिदवाक्य बर्‍यापैकी पाळलेली ही एक संस्था आहे. लहानपणापासून अनेकदा अनुभव घेतला आहे.

प्रत्येक ठिकाणचे एसटी स्टँड हा एक बघणीय प्रकार असतो. प्रत्येक ठिकाणचे विविध अनुभव. रात्रीच्या एस्ट्यांना रातराणि हा शब्द पाहून खूप गंमत वाटायची! ड्रायव्हर-कंडक्टरचे पण बर्‍याचदा चांगले अनुभव आले आहेत.

बाकी एसटीतील प्रवास वर्णन म्हणल्यावर हमखास आठवते ती पुलंची म्हैस आणि महाराष्ट्रातील एसटी नसेल, पण -बाँबे टू गोवा मधील एस टी आणि त्यातील अमिताभ, केस्टो, ललीता पवार इत्यादी...

मराठी_माणूस

हे बव्हंशी खरे आहे. महाराष्ट्रात कानाकोपर्‍यात एसटि जाते. खाजगी वहतुक हि फक्त जिथे पैसा आहे तिथेच चालवलि जाते .
चालकसाठी मात्र काहितरी शीस्ती चे बंधन असावे. कारण आपल्या खाजगी गाडी ने एका गावाहुन दुसर्‍या गावि जाताना एसटी पासुन सावध रहावे लागते. ओव्हरटेक करताना ते काहि बघत नाहित , तुंबलेल्या रहदारीत बस तशिच दामटुन पुढे नेउन अधिक अडथळा निर्माण करतात.

भोचक

एरवी महाराष्ट्रातल्या एसटी ला लोक नावं ठेवतात. तिच्या खाजगीकरणाची आरोळी ठोकतात. पण आपली 'यष्टी' किती चांगली आहे हे इतर राज्यांत गेल्याशिवाय कळत नाही. मध्य प्रदेशात रहाताना येणारा इथल्या 'ट्रेवल्स'चा अनुभव नक्की वाचा. मग तुम्हाला 'गड्या आपली यष्टीच बरी असे वाटल्याशिवाय रहाणार नाही.

http://www.misalpav.com/node/1542

गणा मास्तर

आम्हा दुर्ग प्रेमींना महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात नेणारी एस टी चिरायु होवो!!!

अवन

आज एस टी साठाव्या वर्षात गेली , हे कळले तेव्हा वाट्ले, आपल्याच कुटुंबातल्या कोणीतरी साठी गाठली आहे. लहानपणापासून केलेल्या एस टी प्रवासामुळे, मला तर महाराष्ट्राची ओळख झाली.
कोणत्याही एस टी स्टँडवर गेल्यावर येणार्‍या-जाणार्‍या गाड्यांच्या पाट्या वाचणे हे शिक्षण फार मोठे. पुणे-भोर, मुंबई-आटपाडी (पुणे, सातारा, कराड, विटा, भिवघाट मार्गे), परळ-भूम. त्यातून सर्वात इंटरेस्टींग गोष्ट म्हणजे पाटीवरचे व्हायामार्गे. किंवा एकाच नावाची दोन-दोन गावे कळणे. कर्जत एक रायगडात, एक अहमदनगरात. हे शिक्षण पुस्तकातलं नाही, एस टी स्टँडवरचं.

कोणत्याही गावात आज एस टी पोचलीये. आजही खेडोपाडी मुलांना मोठ्या गावातल्या शाळांच्या वेळा सांभाळता येतील अशा एस टी च्या फेर्‍या आखल्या आहेत. (पूर्वी आठवडाबाजाराची जादा गाडी असायची.)

"गाव तिथे एसटी", "हात दाखवा गाडी थांबवा", "जनता गाडी" यातूनच एस टी ची सामान्य लोकांशी जवळीक जपतं, एस टी SMS वर वेळापत्रक देण्याची उडी मारतेय.
आज व्यावसायिक गणितात, एस टी नफा दाखवतेयं, याचे श्रेय एस टी च्या कर्मचार्‍यांचेसुध्दा आहे.

एकीकडे शहरांमधून स्पर्धात्मक व्यावसायिक सेवा देणे आणि दुसरीकडे सामाजिक बांधिलकीतून सेवा देणे, या तारेवरच्या कसरतीत एस टी ची आगेकूच चालू राहो.

अधिक
http://msrtc.maharashtra.gov.in/
http://www.loksatta.com/daily/20080531/rajay.htm

विसोबा खेचर

आज एस टी साठाव्या वर्षात गेली , हे कळले तेव्हा वाट्ले, आपल्याच कुटुंबातल्या कोणीतरी साठी गाठली आहे.

अगदी खरं!

आम्हा को़कणवासीयांचं आणि यष्टीचं फार जिव्हाळ्याचं नातं आहे. गेली अनेक वर्ष यष्टीबाई आमची सेवा करते आहे! :)

माझ्याही यष्टी महामंडळास लाख लाख शुभेच्छा!

आपला,
(परळहून सुटणार्‍या 'मुंबई-देवगड' लाल डब्याचा प्रेमी) तात्या.

अमोल केळकर

आजही खेडोपाडी मुलांना मोठ्या गावातल्या शाळांच्या वेळा सांभाळता येतील अशा एस टी च्या फेर्‍या आखल्या आहेत.

काही ठिकाणी ( मुख्यतः कोकणात) गावात येणार्‍या एस टी वरुन वेळेचा अंदाज बांधला जातो.

चतुरंग

पूर्वी भरपूर प्रवास केलाय.
माणसे - माणसे आणि गावे-गावे जोडणार्‍या यश्टीला आमचा सलाम आणि शंभरीच्या वाटचालीला शुभेच्छा!

एक आठवण - माझा एक शाळूसोबती झक्कपैकी कंडक्टर (वाहक - काय छान शब्द आहे ना!) झाला तेव्हा आम्ही अचंबित झालो होतो (कारण वर्गमित्रांपैकी कोणी कंडक्टर वगैरे होऊ शकतो असे वाटलेच नव्हते. आपली नोकरीबाबत विचार करण्याची परिमिती किती सीमित असते हे कळून नंतर हसू आले!). नंतर तो वाहक असलेल्या गाडीतून ३-४ वेळा प्रवासाचा योग आला. गप्पा मारताना विचारले की ह्या नोकरीकडे कसा वळलास तेव्हा म्हणाला "मला माणसांची आवड. सतत लोकसंपर्कात रहायला इतकं चांगलं दुसरं ठिकाण कुठलं? शिवाय बोलायला फार कोणी नसलं तर तिकिटे वाटून झाली पुस्तकं वाचत बसतो." त्यानं त्याच्या पेटीतून चांगली चांगली मराठी पुस्तके काढून दाखवली.

चतुरंग