भटकंती

शांतिनिकेतन

Primary tabs

एवीतेवी बंगालमध्ये आलोच आहोत तर इथली काही ठिकाणे चुकवायची नाहीतच असे ठरवले होते (वर्ग सोडून ;) ) त्यापैकीच एक ठिकाण म्हणजे गुरुदेवांचे शांतिनिकेतन (गुरुदेव म्हणजे फक्त रबिन्द्रनाथ ठाकूर). जरा माहिती काढली तर असे कळले की २३ डिसेंबरपासून पौष मेला चालू होतोय. हा चान्स सोडायचा नाहीच असे ठरवलेच होते. कसे जायचे वगैरेची माहिती मित्राकडून व जालावरुन घेतली. खडगपूर-बोलपुर (शांतिनिकेतन) हा निदान ५ तासाचा रेल्वे प्रवास आहे. हावडावरुन काही ट्रेन्स आहेत. पण खडगपूरहुन फक्त बेंगलोर-गुवाहाटी एक्सप्रेस जाते. लवकर पोहचावे म्हणून मी हावडा-बोलपुर असे एका ट्रेनचे तत्काल आरक्षण केले होते. हावड्यास पोचण्यासाठी मला सकाळी ५.३० ची लोकल पकडणे किंवा ६ ची एक्सप्रेस गाडी पकडणे असे दोन पर्याय होते. सकाळी ३.३० चा गजर लावून मस्त झोपलो, गजर झाला आणि नेहमीप्रमाणे ५ मिनिटं असं म्हणून परत झोपलो. उठतो तर ५.१५ वाजलेले. सगळ्या प्लॅनचा बोर्‍या झालेला. कारण थोडेफार तरी आवरुन जवळपास सायकल रिक्शा मिळून स्टेशनला पोहचायला निदान ६.१० तरी झालेच असते. म्हणजे काहीही करुन मी हावड्यावरुन माझी ट्रेन पकडू शकणार नव्हतो. :( एकमेव पर्याय म्हणजे सकाळी ८.३० (आयआरसीटीसी टाईम)ची गुवाहाटी एक्सप्रेस पकडणे. ८ वाजता स्टेशनला पोचून तिकीट वगैरे काढले आणि प्रतिक्षा करत थांबलो. फलकावर गुवाहाटी एक्सप्रेसची ८.४५ आगमन वेळ व ८.५० गंतव्य वेळ दिसू लागली. तोपर्यंत पुरी-भाजी असा नाश्ता करुन घेतला. ८.४५ ची गाडी आली ८.५० ला आणि सुटली चक्क ९.३० ला. आधीच काय कमी उशीर झाला होता म्हणून अजुन उशीर! जनरलचा डबा हुडकून बसायला गेलो तर कळले की तो डबा व त्याला लागून असलेला आणखी एक डबा फक्त सेनेच्या जवानांसाठी आहेत. शेवटी एकदाचा सिव्हिलियन्ससाठीचा असलेला जनरल डबा हुडकून त्यात उभा राहिलो. ५ तास उभे राहून प्रवास करायची मानसिक तयारी केलीच होती. पण कपड्यांवरुन जरा जंटलमंटल दिसणार्‍या या जीवाची काळजी वाटून बसण्यापुरती एक जागा मिळवून दिली. त्याबदल्यात त्याला ऐकणार्‍याचा कान मिळाला ;) निदान २ तास त्या माणसाने केरळमध्ये आपण काय काम करतो, कसे राहतो इ.इ. रंजक माहिती दिली. रबराच्या झाडाचे बी कसे असते हेदेखील दाखवले. हावडा स्टेशनवर गाडी अर्धा तास थांबते. तेवढ्या कालावधीत अपेक्षेप्रमाणे भरपूर गर्दी डब्यात शिरली. आणि गाडी गुवाहाटीकडे कूच करु लागली. काही वेळाने एका माणसाला बोलपुर कधी येते असे विचारले असता त्याने जोरदार धक्का दिला, की म्हणे गाडी बोलपुरला थांबतच नाही!!! कितीही अभ्यास केला तरी शेवटच्या क्षणी कुणीतरी अशी काही हवा करतो आणि आपला आत्मविश्वास डळमळीत होऊन जातो. इथे अगदी तसंच घडलं. मग माझे मित्रांना फोन चालू झाले. पण शनिवार असल्याने एकतर बिझी होते किंवा उचलतही नव्हते. शेवटचा उपाय म्हणून मिपाकर वल्ली यांना फोनवून योग्य ती माहिती मिळवण्यात आली. बोलपुर आले तेंव्हा दुपारचे २ वाजले होते. हवेत मस्त गारवा होता. सायकल रिक्षाने परिसराचा फेरफटका मारुन ५.३७ च्या परतीच्या ट्रेनने हावड्याला येणे किंवा तिथे राहणे असे दोन पर्याय ठेवून जरा मापे काढली. रिक्षावाल्यालाच गाईड बनवून शांतिनिकेतनचा परिसर पालथा घालायला सुरुवात केली. बोलपुर स्टेशनपासून अंदाजे २ किमी अंतरावर विश्वभारती विश्वविद्यालयाचा परिसर सुरु होतो. अत्यंत रमणीय अशी ही जागा आहे. १. गुरुदेवांच्या बंधूंचे घर Image removed. २. हिंदी भवनः Image removed. ३. चिनी भाषा भवन Image removed. ४. पाठभवन (इथे विश्वभारतीमधील सर्व विषयांची पाठ्यपुस्तके लिहिली जातात) Image removed. ५. प्रशासकीय भवन: Image removed. ६. आम्रकुंज (या जागी अजुनही इयत्ता पहिली ते दहावीचे वर्ग भरतात. सर्व मुले जमिनीवर बसुनच शिकतात) Image removed. ७. गुरुदेवांनी इथे भराव टाकून जे रोपटे लावले, त्याचा आज महावृक्ष झाला आहे. Image removed. ८. या जागी बसून गुरुदेवांनी अनेक कविता लिहिल्या. (मॄणालिनी कुटी) Image removed. ९. काचमहाल (हा बंद असल्याकारणाने फारशी माहिती मिळू शकली नाही आणि गाईडचे हिंदी अतिशय महान असल्याने त्याने जे सांगितले ते कळले नाही) Image removed. १०. गुरुदेवांचे निवासस्थान. इथे गुरुदेव व इतर ५ कुटुंबांनी निवास केला Image removed. ११. छातिमतला: शिक्षण पूर्ण करणार्‍या विद्यार्थ्याला इथे पुस्तकात झाडाचे पान घालून देऊन निरोप दिला जातो (दीक्षांत समारंभ) Image removed. अश्या रितीने परिसर पाहणे झाले. एक दुर्दैवाची गोष्ट म्हणजे तिथले संग्रहालय बंद असल्याने ते पाहता आले नाही. त्या संग्रहालयात गुरुदेवांच्या अनेक वस्तू प्रदर्शनास ठेवल्या आहेत. ते जर खुले असते तर मी नक्कीच राहिलो असतो. ४ वाजत आले होते. हावड्याला जाऊन खडगपूरची ट्रेन पकडायची झाल्यास ५.३७ ची रेल्वे चुकवणे बरोबर नव्हते. त्यामुळे लगेचच जाऊन तिकीट काढले. सकाळच्या नाश्त्याशिवाय पोटात काहीच नसल्याने मस्तपैकी ब्रेड-आम्लेटवर ताव मारला, चहा पिला व परतीच्या प्रवासाला लागलो. (टीपः अजुनही बरेच फोटो आहेत, पण वेगळा धागा काढून कलादालनात टाकणार आहे. तिथला कलाविभाग हा वेगळ्या धाग्याचा विषय आहे. त्याला या धाग्यात टाकणे मला अन्यायकारक वाटत आहे.)

फोटो क्र.३ आनी ४ यकच हाय की हो! बाकी टुर यकदम प्र्याक्टिकल ब्वॉ! यकाला दुसरा पर्याय तयार.

चिंतामणी

अन्याभाउ- बाकी फटू येउ द्या. टूर लै झकास झाली दिसत हाय.

अन्या दातार

योग्य तो बदल केला आहे.

बाकी टुर यकदम प्र्याक्टिकल ब्वॉ! यकाला दुसरा पर्याय तयार.

काय करणार साहेब, गरज ही शोधाची जननी असते असं म्हणतात ;)

पियुशा

मस्त रे अन्या , फोटु अन वर्णन दोन्हीही :)

पैसा

आणि वर्णन सुद्धा. आता पुढच्या धाग्याची प्रतीक्षा करत आहे!

प्रास

अन्या,

शान्तिनिकेतनची धावती सफर छान वाटली. फोटो मस्तंच!

आता कलादालनातील धाग्याच्या प्रतिक्षेत.

:-)

पक पक पक

तुमचे प्रवास वर्णन आणी फोटो खुप छान आहे, सुंदर ठिकाण पाहुन झाल्यासारखे वाट्ले. धन्यवाद...

फारशी आखणी न करता केलेली ट्रिप आवडली. असेच मी एकदा (साताठ वर्षांपूर्वी) कोणार्क-पुरीला जाऊन आलो होतो. त्याची आठवण आली. मिळेल ती बस, मिळेल ती ट्रेन, मिळेल ते वाहन, मिळेल तिथे खाणे, आणि बघत बघत हिंडणे. मजा आहे.

(फक्त थोडेफार उकरले, तर तिथल्या मंडळींचा एखादा रेफरन्स मिळू शकतो, आणि त्याने ट्रिपला एकदम अर्थ मिळतो. दुवे निसटत नाहीत. हे मला माझ्या नंतरच्या त्याच ठिकाणच्या भेटींमध्ये कळून चुकले. अर्थात असे अचानक गेल्याचे थ्रिल वेगळेच असते म्हणा.)

यकु

५ तास उभे राहून प्रवास करायची मानसिक तयारी केलीच होती. पण कपड्यांवरुन जरा जंटलमंटल दिसणार्‍या या जीवाची काळजी वाटून बसण्यापुरती एक जागा मिळवून दिली. त्याबदल्यात त्याला ऐकणार्‍याचा कान मिळाला Wink निदान २ तास त्या माणसाने केरळमध्ये आपण काय काम करतो, कसे राहतो इ.इ. रंजक माहिती दिली.

:D :D :D :D
लिहिलेलं आणि फोटो दोन्ही मस्त रे अन्या भाऊ !

त्या कलाविभागाच्या फोटूची वाट पहातोय.

सगळेच फोटो आणी माहिती छान..पण ते प्रशासकिय भवन अगदी बीआर चोप्रांच्या महाभारत मधल्या सेट सारख उठावदार वाटतय...काच महाल पण औस्तुक्य चाळवणारा वाट्टोय...त्याचे आतनं फोटो मिळायला पाहिजेवते राव :-( पण असो, जे आहेत ते उत्तमच आहेत.. :-)

गणपा

फोटोंतूनच तिथल्या शांत-प्रसन्न वातावरणची अनुभुती आली.
पुभाप्र.

५० फक्त

सध्या जबरदस्त फोटो आहेत एवढंच लिहितो, बाकी निवांत सगळे फोटो आल्यावर, कुणी सांगावं एखादा क्लु मिळेल त्या फोटोतुन, (याच साठी केला होता अट्टहास....)

स्पा

झकास फोटो रे अन्या
खूप मस्त वाटलं

अन्या दातार

@विलासरावः रिक्षावाला कम गाईडने दाखवले नाही. त्यामुळे राहिले. आणि नकाशावरही त्याचा उल्लेख दिसला नाही.

@ आळश्यांचा राजा:

मिळेल ती बस, मिळेल ती ट्रेन, मिळेल ते वाहन, मिळेल तिथे खाणे, आणि बघत बघत हिंडणे. मजा आहे.

अगदी अगदी. पण यासाठी थोडा त्रास सहन करण्याची सवय असेल अश्याच लोकांनी जावे. नाहीतर फक्त मनस्ताप हाती येईल :)

@ यशवंतः मी जे काही लिहिले आहे यात एक पैचीही अतिशयोक्ति नाही.

@ अत्रुप्त आत्मा: काच महाल व इतर काही वास्तु वैशाखात उघडतात. तेंव्हा गेलात तर आतूनही बघायला मिळेल. पण आत फोटोग्राफी करु देत नाहीत. (हेरिटेज साईट असल्याकारणाने)

@गणपा: सहमत. एकंदर मला असे वाटते की जिथे खरोखरीच ज्ञानसाधना होते, तिथले वातावरण भारावून टाकणारे असते.

@ ५० फक्तः कशाचा क्लु शोधताय?? ते कळले की सविस्तर उत्तर दिले जाईल :)

प्रचेतस

५० फक्तः कशाचा क्लु शोधताय?? ते कळले की सविस्तर उत्तर दिले जाईल

कदाचित ५० राव तिथं असलेल्या इतक्या झाडांमागे खैराचं झाड कुठं लपलय का ह्याचा क्ल्यु शोधत असावेत.

प्रचेतस

सुरेख फोटो आणि वर्णन.
मृणालिनी कुटीचा फोटो फारच आवडला.
कलादालनातल्या फोटूंची वाट पाहत आहे आता. लवकर येउ दे.

किसन शिंदे

मृणालिनी कुटीचा फोटो पाहून तो परिसर अतिशय शांत आणी प्रसन्न असल्याची खात्रीच पटली.

गवि

फार छान रे अन्या.

एरवी कधी कदाचित जाणं झालं नसतं.. तुझ्यामुळे फोटोंमधे तरी पहायला मिळालं हे ठिकाण..

शांत निवांत आहे जागा..

मराठी_माणूस

फोटोवरुन , वाळवंटी प्रदेशात असतो तसा रखरखाट वाटतोय . शांतीनिकेतन ची मनात एक निसर्गरम्य प्रतिमा होती , तसे ते नसावे असे वाटते .

अन्या दातार

तुम्ही एकदा स्वतः येऊन बघा साहेब.
वाळवंटी प्रदेश वाटायचे कारण तिथली माती असावी. साधारण ओडीशापासून पुढे अशीच पिवळट माती दिसते. महाराष्ट्रात आपल्याला कधी अश्या रंगाची माती बघून सवय नसते. मलाही आधी थोडंसं ऑड वाटायचे, पण आता डोळ्यांना सवय झालीये. :)

शांतिनिकेतन ही निसर्गरम्यच जागा आहे.

मराठी_माणूस

स्पष्टीकरणासाठी धन्यवाद. प्रत्यक्षात कधी बघु शकेन माहीत नाही , सध्या तरी तुमच्या फोटो वरुन अनुभवतोय.

मन१

गुरुदेवांची अजून माहितीही द्यायचीत की सोबतीला.

प्यारे१

छान फटु रे अन्या.

अवांतरः पुलंचं एक पुस्तक आहे शांतिनिकेतनवर. (वंगचित्रे का?)
५० व्या वर्षी बंगाली शिकायला गेलेले पुल.
गुरुदेवांनीही पन्नाशीनंतर चित्रकला सुरु केली म्हणे.
शिकणं सोडतच नाहीत ही मोट्ठी माणसं.

मी-सौरभ

ही जागा बघायची इच्छा वाढवणारे फोटो आहेत...

गणेशा

अप्रतिम रे मित्रा ...
पुढील धाग्याच्या प्रतिक्षेत

प्रचेतस

गणेशा, आम्हीही तुझ्या केरळच्या धाग्याच्या आणि तिथे रचलेल्या एका कवितेच्याही प्रतिक्षेत आहोत.

अन्या दातार

आणि तिथे रचलेल्या एका कवितेच्याही प्रतिक्षेत आहोत.

कविता रचतात?? यक्कुशेठनी म्हणल्याप्रमाणे कविता "होतात". गणेशाच्या बाबतीत ही शक्यता तर आता वाढलेलीच आहे. ;)

प्रचेतस

कविता रचतात??

कविवर्य गणेशा हे जातिवंत कवी असल्याने रचणे आणि होणे या दोन्ही शक्यता त्यांच्या बाबतीत पुरेशा शक्य आहेत.

गवि

गणेशाचे लग्न झाले आहे.

लग्न = कविता समाप्त, हद्दपार, नष्ट

हे साधे समीकरण लक्षात न घेता त्याच्या कवितेची अजूनही वाट पाहणारे या प्रतिक्रियाफांदीतले सर्वजण अविवाहित असल्याचे सिद्ध होते आहे.

अन्या दातार

लग्न = कविता समाप्त, हद्दपार, नष्ट

हे साधे समीकरण लक्षात न घेता त्याच्या कवितेची अजूनही वाट पाहणारे या प्रतिक्रियाफांदीतले सर्वजण अविवाहित असल्याचे सिद्ध होते आहे.

या प्रतिसादफांदीत कुणी आपण विवाहित असल्याचा दावा केला नव्हता, नाहीये.

लग्न = कविता समाप्त, हद्दपार, नष्ट
असे काही समीकरण असते हेच मुदलात माहिती नव्हते. आणि ते असले तरी तुमच्या कविता वाचून बरोबर असेल असे तर बिल्कुल वाटत नाही.

सोत्रि

अन्या,
मस्त सफर घडवलीस!

- (भटक्या) सोकाजी

अतीअवांतर: टागोरांनी इंदिरा गांधींना शांतीनिकेतन मधून हाकलून दिले असे म्हणतात ती जागा कुठे दिसली का?

पाषाणभेद

फोटो फारच सुंदर आले आहेत. वर्णनही छान आहे. परिसर स्वच्छ अन गजबजाटरहीत पाहून आनंद वाटला. शांतीनिकेतनला आजकालच्या फाईव्ह स्टार 'देवळाचे' स्वरूप न यावे या सदभावना.

विकास

फोटो आणि तितकेच वर्णन एकदम आवडले... अजून येउंदेत.

रविन्द्रनाथांची समाधी वगैरे काही आहे का?

अन्या दातार

@ सोका: इंदिराजी हिंदी भवनात शिकायला होत्या (हकालपट्टी केल्याचे डीटेल्स मिळाले नाहीत)

@ पाभे: जरी पंचतारांकित देवळाचे स्वरुप आलेले नसले तरी लोक इथे आदरभावाने/भक्तिभावाने येण्यापेक्षा वीकेंड ट्रिपला आल्यासारखे येतात.

@ विकासः गुरुदेवांची समाधी अशी नाहीये. त्यांनी जिथे बसुन कविता लिहिल्या त्या जागा मात्र नक्कीच जपून ठेवल्या आहेत (उदा. मृणालिनी कुटी वगैरे..)

(पुन्हा एकदा शांतिनिकेतनला भेट देण्यास उत्सुक) अन्या.

मदनबाण

फोटो आणि वर्णन दोन्ही सुंदर !
या महान व्यक्तीला दिले गेलेले नोबेल पदक चोरीला गेले ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे,हे पुन्हा एकदा नमुद करावेसे वाटते. :(