तीर्थजननी नर्मदा परिभ्रमण परिक्रमा भाग-१४ (१२)
Primary tabs
स्नान,पुजारती करुन देवदर्शन केले,चहा घेउन आणि सर्वान्चा निरोप घेउन नर्मदे हर म्हणून विनोबा एक्स्प्रेस निघाली .पिशव्यान्मधल्या सामानाचे रीसटीन्ग केल्यामुळे ओझे थोडे हलके वाटत होते.२कि.मि.वरील बसस्टॉपवर आलो,लगेचच रिक्षा मिळाली राजपिपलाला सन्तोष चौकडीला उतरलो.परिक्रमेच्या रस्त्याची चौकशी केली आणि चालु लागलो. हरसिद्धीमाता मन्दिरात दर्शन घेउन काळाघोडा मार्गे ओरीच्या दिशेने वाटचाल सुरु केली.
करसन नदीवरील पुल ओलान्डून वरपाडा गावात आलो.आठ वाजुन गेले होते चहा घ्यावा असे वाटत होते कुठे मिळेल असे बघत होतो तर तिथे कामावर जाण्यासाठी उभे असलेले एका ग्रुहस्थानी नर्मदे हर म्हटले,स्वतःची ओळख सान्गितली मी नगीनभाई तुम्हाला आमच्याकडचा चहा चालेल का? मी मुस्लीम आहे म्हणून विचारतो.मी म्हटले,न चालायला काय झाले अहो चालेलच नाही तर धावेल. हिन्दू-मुसलमान दोघेही बाबा बर्फानीअमरनाथचे सन्तान.द्यावा आम्हाला चहा.तिथे मागच्या बाजुलाच त्यान्चे घर होते,नगीनभाईनी पत्नीला चहा देण्यास सान्गितले आणि कामावर जायचे म्हणून आम्हाला पुन्हा एकदा नर्मदे हर म्हणून ते गेले.सबिनाभाभीनि नर्मदेहर म्हणून आम्हाला चहा आणि बिस्किटे दिली.त्यान्चामुलगा ;समीर त्याचे नाव,नर्मदे हर म्हणून आमच्या पाया पडला. नर्मदामैय्या सर्वान्चीच माता आहे. चहा घेउन आम्हीही नर्मदे हर म्हणून त्यान्चा निरोप घेतला.
साधारणपणे २/३कि.मि. चाललो असू,दोन रस्ते लागले हायवे अन्कलेश्वरला जात होता ह्याच रस्त्याने ओरी असेल कारण नन्तर आम्हालाही अन्कलेश्वरला जायचेच होते असा विचार करुन चालु लागणार तोच काही परिक्रमावासी त्या दुसर्या रस्त्यावरुन जाताना दिसले,मग एकजणाला विचारुन त्या दुसर्या रस्त्याने चालायला सुरवात केली.
या रस्त्याला फारशी झाडे नव्हती उन लागायला लागले होते दहा वाजले साधारणपणे बाराएक कि.मि. चाललो असु.वरखड गाव आले.रसिकभाई भेटले सरपन्च आहेत या गावाचे.रस्त्याच्या कडेलाच त्यान्चे घर होते त्यानी घरी चला म्हटले आम्हालाही तहान लागली होती,जवळचे पाणी सम्पले होते गेलो. रसिकभाई देवभक्त होते बराच मोठा देव्हारा होता बर्याच तसबिरी होत्या.घरात म्हातारी आई,पत्नी मुले होती. नर्मदेहर म्हणून सर्वजणानी नमस्कार केला.चहा-पाणी झाले.रसिकभाई म्हणाले जेवण येथेच करा पटकन भाजी-भाकरी तयार होईल.पण जास्त उशीर झालेला नव्हता म्हणून नको म्हटले आणि ओरीही आता फक्त ३/४कि.मि.च राहिले होते म्हणून पुढे निघालो.
रस्ता कच्चा होता पण मधुन मधुन झाडाची सावलीही मिळत होती त्यामुळे जीवाची अगदी काहिली होत नव्हती पण उनतर लागतच होते.ओरी बर्यापैकी मोठे गाव होते.कोटेश्वर मन्दिराची चौकशी केली,मन्दिर गावाबाहेर होते.थोडे चालुन उजव्या हाताला मन्दिराकडे जायला वळलो,दुतर्फा केळीच्या बागा होत्या जीवाला गार वाटले.केळी काढायचे काम चालले होते.
कोटेश्वर मन्दिर सुबक सन्गमरवरी आहे. तिथे एक माताजी व्यवस्थापक आहेत.गोड हसुन स्वागत केले आणि म्हणाल्या,आसन लावा हात पाय धुवुन घ्या भोजन वाढते. थन्डगार पाण्याने नळावर हातपाय धुतले बरे वाटले.भोजनाला आमटी,भात तिक्कड आणि मिरचिचे लोणचे होते.मी लोणचे तिखट असेल म्हटले तर वाढणारा मुलगा म्हणाला या मिरच्या तिखट नसतात,खरोखरच मिरच्या तिखट नव्हत्या लोणचे मोठे चविष्ट होते.स्वयम्पाक रुचकर होता,आत्माराम त्रुप्त झाला. भोजन झाल्यावर माताजीनी एक वही दिली आणि त्यात आमचे नाव पत्ता लिहायला आणि आमच्या वहीवर त्यान्चा शिक्का मारुन घ्यायला सान्गितले .
कोटेश्वरहुन निघालो तेव्हा दुपारचा दीड वाजला होता.आतापर्यन्त १४कि.मि. चाललो होतो सिसोदरा ४कि.मि. आणि तिथुन पुढे ८कि.मि. पुढे कार्तिकेश्वर{स्कन्देश्वर} मौनीबाबा आश्रम कान्दरोज. पाय उचलायला हवेत.उन खुप होते भोजनही झालेले त्यामुळे चालण्याचा वेग कमी झाला होता. सिसोदरा आले तेव्हा साडेतीन वाजले होते.गावाला छान प्रवेशद्वार होते,समोरच मोठा पिम्पळाचा पार होता,गार सावलीला बसलो.गावात कुणा मालदार आसामीकडे एखादा समारम्भ असावा,पाराखाली बर्याच गाड्या पार्क केलेल्या दिसत होत्या. नर्मदेहर झाले,आम्हाला राहण्याचा आग्रहही झाला पण आम्ही आजचा मुक्काम कान्दरोजला ठरवला होता म्हणून नाही म्हटले.चहा घेउन विनोबाएक्स्प्रेस पुढे निघाली. रस्ता प्रवेशद्वारा बाहेरुन डाव्या बाजुला होता.
कच्चा रस्ता दुतर्फा शेते पण सावलीसाठी मोठी झाडे नसल्याने उन्हाचा त्रास खुप होत होता.साधारणपणे तीन चार कि.मि. चाललो असुनसु माझे डोके खुप दुखायला लागले कसेतरी होत होते सिसोदर्याला राहिलो असतो तर बरे झाले असते असे वाटायला लागले,पण आता सिसोदरा चार कि.मि. आणि कान्दरोजही चारच कि.मि. राहिले होते पुढे जाणेच इष्ट.मैय्या दमले ग बाई ! नर्मदे हर.
पाय ढकलत होतो आणि... एक जीप आली,नर्मदे हर माताजी नर्मदेहर बाबाजी जीपमधील माणसाने हाक मारली.कुठे जाणार? कार्तिकेश्वर मौनीबाबा आश्रमात आमचे उत्तर.बसा;मी सोडतो. ते होते अरुणभाई विठ्ठलभाई पटेल.बसलो.
आम्ही गाडीत बसलो तिथुन पुढचा रस्ता अतिशय खराब होता.थोड्याच वेळात एक नदी लागली तिला खुप पाणी होते,अरुणभाई म्हणाले समुद्राला भरती आली की हिला पाणी चढते.म्हणजे आता थोड्याच दिवसात आमचा दक्षिण किनार्यावरचा परिक्रमेचा भाग पुर्ण होणार याचा आनन्द झाला. अरुणभाईनी अगदी लीलया जीप त्या पाण्यातुन बाहेर काढली,आणि एक चढ चढुन थाम्बवली.म्हणाले या उजव्या बाजुच्या रस्त्याने जा तो बघा तो दिसतो आहे तोच मौनीबाबा आश्रम. नर्मदे हर.अशातर्हेने पुन्हा मैय्या आपल्या बालकान्ची किती काळजी घेते याचा प्रत्यय आला ऊर भरुन आलेंअर्मदे हर.
सन्ध्याकाळ झाली होती.आश्रमात पोहोचलो,महाराज बाहेर गेले होते सेवेकर्याने पडवीत आसन लावायला सान्गितले त्या पडवीत आधीच बरेच परिक्रमावासी बसले होते,विड्यान्च्या धुराने पडवी भरली होती तम्बाखुचा वास प्रचन्ड होता मला तिथे रहाणे शक्यच नव्हते,सेवेकर्याला मी तिथे राहण्यास नकार दिला आणि खोली द्यावी अशी विनन्ती केली ते म्हणाले महाराज आल्यावर तेच काय ते सान्गतील. आम्ही झाडाच्या पारावर बसलो,समजा खोली नाही मिळाली तरी पारावर रहाणे त्या पडवीपेक्षा कितितरी चान्गले असा विचार केला.हातपाय धुवुन चहा घेतो तोच महाराज आले,त्यानी आम्हाला खोली द्यायला सान्गितली.
महाराज खुप शिकलेले आहेत.आमच्याशी खुप वेळ बोलत होते. मौनीबाबानी या ठिकाणी तप केले होते.त्याकाळी या जागी दाट जन्गल होते,स्वयम्भू स्कन्देश्वरा बद्दल लोकाना काहिही माहित नव्हते,मौनीबाबानी या क्षेत्राचा विकास केला.आता मौनीबाबा नाहीत त्यान्ची समाधी बडोदा येथे आहे. रात्री भोजनानन्तर भजनाचा कार्यक्रम झाला.आता विश्रान्ती.क्रमशः
छान!
नगीनभाई आणि परीवाराचे छोटेसेच पण एकंदरीत अदारातिथ्य वाचुन खुप छान वाटलं (खरंतर डोळे जरा पाणावलेच)...
कदाचीत हा हि मयैचाच ईशारा/संदेश असावा..."जाती-धर्मा विरुध्द उगिच वाद-विवाद का करता, का दंगली करता... बघा बरं हिंदूंनी केलेल्या आणि ह्या मुस्लीम परीवाराने केलेल्या अदरातिथ्याच्या भावनेत काहि फरक आहे का? नाहि ना :) "
नर्मदे हर!!!
नमस्कार उदयजी.
खरेच आहे,आपण सारी एकाच धरतीमातेची लेकरे,कुणी कोणत्या धर्मात,कोणत्या आईवडिलान्च्या पोटी जन्म घ्यायचा हे आपल्या हातात नाही,निसर्ग भेदभाव करत नाही मग आपण का करायचा?काश्मिरमध्ये अमरनाथ यात्रेत आपल्याला आपल्या मुस्लिम भाईबन्दान्मध्ये असलेल्या माणूस्कीचे पदोपदी दर्शन घडते.त्या खडतर प्रवासात ते आपल्या अगदी जवळच्या नातलगाप्रमाणे आपली काळजी घेतात.एक वर्ष मी तिकडे पावसात अडकले होते,बरोबरची मन्डळी मागेपुढे झाली होती,माझा पिट्ठू {आपले सामान घेणारा} माझ्या बरोबर होता त्याने त्या तुफान पावसात स्वतःचा रेनकोट मला पान्घरुन आपण पावसात भिजत माझे रक्षण केले होते थोडेथोडके नाही तब्बल दोन तास.मग सान्गा त्या अहमदभाईला मी कशी विसरु शकेन?
रोजच वाट पाहत असतो तुम्च्या परिक्रमेच्या दुव्यचि. लिहित रहा.
नमस्कार सुजितजी.
आपणाला माझे लेखन आवडते हे वाचुन खुप समाधान वाटले. धन्यवाद.
मी दर ४-५ तासांनी वाट पाहत असतो नविन परिक्रमेच्या दुव्याची.
खुशिताई, तुमच्या वहीवर दर वेळी शिक्का मारुन का घेता ?
नमस्कार.
आपणास माझे लेखन आवडते हे वाचुन समाधान वाटले. हो बहुतेक आश्रमात आपल्या जवळील प्रमाणपत्र पाहून त्यान्चा शिक्का देतात.परिक्रमा सुरु करायच्या वेळी आपण राहात असलेल्या गावातील आपणाला ओळखणार्या प्रतिष्ठीत व्यक्तिकडुन ओळखपत्र घ्यावे.ते ओळखपत्र,आपल्या जवळिल लायसन,निवडणूक ओळखपत्र असे काही यान्चीझेरॉक्सप्रत वहीला चिकटवावी.ओम्कारेश्वरला परिक्रमा सुरु करताना नगरपालिकेतुन प्रमाणपत्र घ्यावे लागते,ते सहज मिळते अडवणूक करत नाहीत.
नर्मदे हर !
हा ही भाग छान. खुशीताई डायरी लिहायच्या का तुम्ही? अगदी प्रत्येक व्यक्तीच नाव गाव इतक व्यवस्थित आलय ना की बस. बर्याच पर्टीक्युलर दिसता. त्यामुळच जमत अस लिहायला.
नमस्कार,अपर्णा अक्षय.
आपणास माझे लिखाण आवडते हे वाचुन खुप समाधान वाटले. हो मला डायरी लिहिण्याची लहानपणापासुन सवय आहे. आम्हाला शाळेतच दैनन्दिनी लिहावयास सान्गत असत,त्यात एका वहीत तारीख वार केलेले सत्कृत्य दुष्कृत्य असे काहिसे कॉलम असत.तेव्हापासुनची सवय आहे. त्यामुळे दिवसभरातील सर्व घडामोडीन्ची नोन्द राहाते,महत्वाच्या गोष्टीन्चे विस्मरण होण्याची शक्यता बरीच कमी होते.आणि कधितरी भुतकाळात फेरफटकाही मारता येतो.
परिक्रमाकाळात आम्हाला मदत केलेल्या लोकान्ची नावेच नाही तर फोननम्बर्,वाहनान्चे नम्बरही आम्ही लिहुन ठेवले आहेत. मदतगार माणसे कधिही उपयोगी पडू शकतात खरे ना?
पुन्हा एकदा धन्यवाद.
नर्मदे हर !
सावकाश सगळे वाचल्यावर प्रतिक्रिया द्यावी असा विचार होता .. पण राहवले नाही.
तुमची साध्या लेखनाची हातोटी फार फार आवडली.त्यातून प्रामाणिक पणा डोकावतो..
अशी साधी सरळ परिक्रमा असावी.. मी करेन तेव्हा अशीच करीन ..
उगाच कितीवेळा सिगारेट ओढली आणि ध्यान कसे लावले याची आत्मस्तुती वाली वर्णने वाचून कंटाललो होतो.
तेवढ फोटो टाकायचे जमवाच् !
पण तुम्ही कधी कधी वाहनाने का प्रवास करता? चालण्याचा त्रास वाटतो का?
नर्मदे हर !
नमस्कार विटेकरजी.
आपणास लेख आवडले म्हणून खुप छान वाटले.अहो आमचे वय जास्त आहे.त्यातुन चालुन चालुन पायाना फोड येत असत.१५/२० कि.मि. चालल्यावर थकवाही येत असे.तब्येत बिघडत असे त्यामुळे वाहनाचा आधार घ्यावा लागत होता.