चैत्यगृहे
Primary tabs
चैत्यगृहे- महाराष्ट्रातील गिरीकुहरांत खोदली गेलेली ही सुंदर गिरिशिल्पे.
चैत्यगृह म्हणजे प्रार्थनामंदिर किंवा अचूकपणे सांगायचे झाले तर स्तूपयुक्त प्रार्थनामंदिर. स्तूप हे बुद्धाच्या स्मरणार्थ उभारले गेले. अशोकाच्या अहिंसक आक्रमक धर्मप्रसारानंतर तर प्रचंड संख्येने स्तूप उभारले गेले. सर्वसाधारणपणे बुद्ध किंवा बुद्धाच्या श्रेष्ठ अनुयायांच्या अवषेशांवर स्तूप उभारले जात. पार्थिव देहाच्या किंवा वापरत्या वस्तूच्या अवशेषांना धातु व त्यांवर उभारल्या गेलेल्या स्तूपांना धातुगर्भ अशी संज्ञा आहे. दागोबा हे त्याचे सिंहली स्वरूप. महाराष्ट्रातील गिरिलेण्यांतील स्तूपांना पण दागोबा अशीच संज्ञा दिली जाते.
अशोकाने अनेक मैदानी भव्य स्तूप उभारले. परंतु प्रस्तुत लेखात आपण फक्त सह्याद्रीतील चैत्यगृहांचा विचार करणार आहोत.
महाराष्ट्रातील लेणी ही प्राचीन सार्थवाहपथांनजीक आढळतात. शहरांपासून तशा जवळ, पण तरीही सह्याद्रीच्या काळाकभिन्न कातळांत खोदल्या गेलेल्या ह्या लेण्या हे बौद्ध भिक्षूंचे वर्षावासाचे आणि एकांतवासाचे ठिकाण असे. ह्या लेण्या कोकणातून वरघाटी येणार्या प्राचीन घाटवाटांनजीकच असत. उदा. लेण्यांचा जुन्नर गट हा ठाणे, वसई, भडोच ह्या बंदरातून पैठणकडे जाणार्या सर्वात महत्वाच्या व्यापारी मार्गावर आहे तर लोणावळे गट हा कल्याण, चौल इ. बंदरांतून पैठण, तेर, धाराशिव इ. प्राचीन पेठांच्या दिशेने जाणार्या मार्गावर आहे. ह्या मार्गाने व्यापार करणार्या सार्थवाहांबरोबर बौद्ध भि़क्षूंचे धर्मप्रसारक येत असत. त्यांच्या विश्रांतीसाठी सह्याद्रीच्या ह्या डोंगररांगामध्ये प्रथम विहार खोदले गेले आणि जशीजशी प्रार्थनेची गरज निर्माण होत गेली तशी तशी चैत्यगृहेसुद्धा निर्माण होत गेली.
सह्याद्रीतल्या शिल्पकारांनी एकदा चैत्यगृहांचा आकार ठरवला तो एखादा अपवाद वगळता फारसा बदललेला दिसत नाही. कमानदार अश्वनालाकृती गवाक्ष, लंबवर्तुळाकारात खोदलेली गुहा, गजपृष्ठाकार छत, छताला आधार देणारे खांब आणि त्यावर लाकडी फासळ्यांची ओळ, आतील बाजूस भिंतीचा जवळ खोदलेला स्तूप अशी याची सर्वसाधारण रचना. जुन्नरजवळच्या तुळजा लेणीमध्ये मात्र गोलाकार चैत्यगृह आढळून येते.
चैत्य हे सार्वजनिक प्रार्थनामंदिर असल्याने ते अधिकाअधिक देखणे करण्याचा तसेच प्रत्येक चैत्यगृहाच्या बांधकामातील केलेल्या चुका टाळून पुढची चैत्यगृहे अधिकाधिक सुधारण्याचा प्रयत्न केलेला दिसतो.
चैत्याचा दर्शनी भाग अश्वनालाकृती वातायनाने सुशोभित करण्याची प्रथा रूढ आहे. नीट निरखून बघितल्यास याचा आकार पिंपळपानाकृती दिसतो. गौतम बुद्धाला गयेतील पिंपळवृक्षाखाली ज्ञान प्राप्त झाले याचे स्मरण म्हणून याची अशी रचना. हे गवाक्ष चैत्यगृहाच्या शिरोभागी असून यातून जाणारा उजेड थेट स्तूपावर पडावा अशी याची रचना. कर्जतजवळच्या कोंडाणे लेण्यांत अशी कमान प्रथम उभारली गेली. सह्यादीतील हे आद्य चैत्यगृह असल्याने याच्या बांधणीत बर्याच चुका आढळतात. सर्वात मोठी चूक म्हणजे कड्यावरून कोसळणार्या पावसाचा पुरेसा अंदाज न घेणं. यामुळे यातील कमानीची बरीच पडझड झाली आहे. यातूनच पुढच्या चैत्यगृहांमध्ये मध्ये खडकात ओसरी कोरण्याची पद्धत निर्माण झाली.
काही बेडसे, कार्ले अशा ठिकाणी एकावर एक असा दोन पिंपळाकार वातायने कोरलेली दिसतात. कदाचित अधिक प्रकाशाची गरज किंवा अधिक देखणेपणा. ह्या कमानीवरी चक्र, त्रिरत्न अशी बुद्धप्रतिके कोरलेली दिसतात तसे फूलाफुलांचे अतिशय देखणी ऩक्षीकामही दिसते.
चैत्याच्या प्रवेशद्वारानजीक काहीवेळा द्वाररक्षक यक्ष कोरलेले आढळतात.
सह्याद्रीतील बरीचशी चैत्यगृहे ही सुरुवातीच्या हीनयानकाळातच खोदण्यात आली आहेत. आतील ओसरीवर उंच उंच जाणारे कमानदार प्रासाद खोदण्यात येऊ लागले व त्यावर आकाशगामी गंधर्व सुद्धा कोरण्यात येऊ लागले. ओसरीवरील खडकाला आधार देण्यासाठी भव्य स्तंभांची निर्मीती करण्यात येऊ लागली. बेडसे लेणीतील ओसरीतील छताला आधार देणारे स्तंभ सह्याद्रीतील सर्व शैलगृहांमध्ये देखणे ठरावेत. बेडशातील हे विशेष स्तंभ मौर्य शैलीतील. त्यांना पर्सिपोलिटन धर्तीचे स्तंभ असेही म्हणतात. ‘पर्सिपोलिस’ हे इराणमधील एक प्राचीन शहर आणि तिथले हे पर्सिपोलिटन स्तंभ. तिथल्या संस्कृतीचा प्रभाव मौर्याच्या कलेवर आणि पुढे याच शैलीची छाया बेडशाच्या या खांबांवर पडली.
पांडवलेणीतील चैत्यकमानीवरील देखणे नक्षीकाम
बेडसे चैत्यातील भव्य स्तंभ

ओसरीतून आत प्रवेश करताच वर छताला लाकडी फासळ्यांचा आधार दिलेला दिसतो. छताचा अर्धवर्तुळाकार आकार आणि लंबरूपात खोदली गेलेली गुहा यामुळे छत अगदी गजपृष्ठासमान दिसते. छतावर लाकडी फासळ्या लावण्याची पद्धत का सुरु झाली ते सांगता येत नाही पण ह्या लाकडी फासळ्यांमुळे आणि बाहेरच्या पिंपळाकार वातायनामुळे चैत्यगृहाला एक प्रकारचे संतुलन प्राप्त होते आणि चैत्यगृह अधिकच खुलून दिसते. मात्र स्तूपाभोवती असणारा गाभारा मोकळा व अनलंकृत असल्याने भक्त पवित्र स्तूपाकडे सहजच आकर्षिला जाई. एकंदरीत आतल्या स्तूपाची रचना साधी, भव्य परंतु ठोस असे. स्तूपाच्या समोर दोन्ही ओळीत सरळ असलेले स्तंभ स्तूपाभोवतीही वर्तुळाकारात फेर धरत.
स्तूप म्हणजे ढीग किंवा स्तू म्हणजे स्तवन करणे आणि स्तूप म्हणजेच जोडणे किंवा एक करणे.
वर्तुळाकार जोते, त्यावर नक्षीदार वेदिकापट्टी, घुमटकार अण्ड, त्यावर चौकोनी हर्मिका आणि त्याजवर लाकडी छत्र अशी स्तूपाची रचना.
जोते म्हणजे मृत्युलोक, घुमटाकार अण्ड म्हणजे आकाश, आणि हर्मिका म्हणजे स्वर्ग, ही हर्मिका सात उतरत्या चौकोनी पायर्यांनी बनलेली आढळते ह्या सात पायर्या म्हणजे सप्तस्वर्गांचे प्रतिक अशी तत्कालीन धारणा.
पांडवलेणीतील जोते, वेदिकापट्टी, अण्ड आणि हर्मिका यांनी युक्त असलेला स्तूप
हीनयानकाळातील हे स्तूप अगदी साधे, अनलंकृत असल्यामुळेच आकर्षक दिसत. साधे असल्यामुळेच अतिशय डौलदार दिसत आणि पूजनीय वाटत. बुद्धपूजा स्तूपप्रतिकात करण्याची प्रथा होती पण नंतरच्या महायानकाळात बुद्धमूर्ती कोरण्यास अनुमती मिळाल्यानंतर लेण्यांबरोबरच स्तूपांवरही बुद्धमूर्ती खोदण्यात येऊ लागल्या. आपलेच लेणे आकर्षक करत जाण्याच्या स्पर्धेमुळे स्तूपांचे अलंकरण होवून चैत्यगृहे अधिकाधिक ऐश्वर्यसंपन्न होत गेली व स्तूप बांधण्याचा मूळ उद्देशच लयाला गेला आणि स्तूपांचा तोल बिघडला. बुद्धमूर्ती कोरण्यामुळे स्तूपांची उंची साहजिकच वाढत गेली व मूळच्या डौलदार स्तूपाचा आकार बदलला जाऊन स्तूप बेढब दिसायला लागले. हर्मिकेवरील छत्रांची संख्या वाढायला लागली. एकाच छत्राची जागा एकावर एक असे तीन छत्र घेऊ लागले. आजमितीस ही तीन छत्रे कुठेही अस्तित्वात नाहीत पण कान्हेरीतील चैत्यगृहातील एका कोनाड्यात अशा प्रकारच्या स्तूपाचे प्रारूप त्यावरील तीन छत्रांसह कोरलेले आढळते.
अजिंठा येथील महायानकाळातील तोल बिघडलेला स्तूप. (चित्र आंतरजालावरून)

कान्हेरीतील तिहेरी छत्र असलेले कोरीव स्तूपाचे प्रारूप

कार्ले, भाजे, बेड्से या चैत्यांचा तुलनात्मक संक्षिप्त आढावा:-
भाजे येथील चैत्यगृहात ओसरी नाही, तसेच एकच पिंपळपानाकृती कमान आहे. तसेच लेण्यांतील भिंती व आतले स्तंभ कललेले ठेवलेले आहेत. छताचा दाब बाहेरच्या बाजूला असावा आणि खांब कलते ठेवले तरच ते असा दाब तोलू शकतील या कल्पनेने ही योजना केलेली दिसते. पुरेशा अनुभवांती याची काही गरज नाही असे कारागिरांच्या लक्षात आले असावे व त्यामुळे यापुढील इतर चैत्यगृहांमध्ये अशी कलत्या खांबांची रचना दिसत नाही. भाजे लेण्यांतील अष्टकोनी खांब साधे आहेत मात्र कार्ल्यातील सालंकृत आहेत आणि त्याजवर स्त्रीपुरुषांच्या जोड्या हत्ती, बैल, सिंह आदी प्राण्यांवर बसलेल्या दिसून येतात.
भाजे लेणीतल्या स्तूपावर मौर्यकालीन झिलई आढळते. स्तूपावर एका विशिष्ट प्रकारच्या रसायनाचा लेप देऊन स्तूप चमकदार आणि गुळगुळीत केलेला दिसून येतो.
कार्ले आणि बेडसे या दोन्ही चैत्यांच्या प्रवेशभागी खोदीव जवनिका आहे आणि तिच्या दोन्ही बाजूंस एकावर एक चढत गेलेल्या कमानदार गवाक्षाप्रासादांची रेलचेल आहे. बेडसे लेणीमध्ये मात्र बुद्धमूर्ती नाहीत तर कार्ल्याच्या प्रवेशभागातील मूर्ती नंतरच्या काळात खोदलेल्या दिसून येतात.
कार्ल्याच्या प्रवेशद्वारावर अशोकस्तंभ कोरलेला आहे, कान्हेरीतील चैत्यगृहात केलेली त्याची नक्कल वगळता सह्याद्रीत इतरत्र कुठेही अशोकस्तंभ दिसत नाहीत.
कार्ले येथील चैत्य केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर एकंदरीत भारतातील सर्व चैत्यांत विस्तीर्ण आहे. याचे क्षेत्रफळ भाजे चैत्याच्या साडेतीन पट व बेडसे चैत्याच्या सहापट आहे. भाजे चैत्यात २७ व बेडसे चैत्यांत २६ आणि कार्ले चैत्यात ३७ खांब आहेत. सर्वाधिक उंचीचाही हाच चैत्य असून सर्वाधिक सालंकृतही आहे. कार्ल्याच्या समोरील ओळीतील स्तंभ नक्षीदार असून साधे स्तंभ स्तूपाच्या पिछाडीस आहेत तर भाजे आणि बेडसे यांचे स्तंभ साधे आहेत.
भाजे चैत्यासमोर जवनिका नसल्याने तो चैत्य काहीसा भकास दिसतो तर बेडसे चैत्यगृहात जवनिका असूनही प्रवेशद्वारानजीकचा खडक अर्धाच फोडलेला असल्याने तो चैत्य किंचीत अंधारी आहे तरी प्रवेशद्वारातील भव्य सालंकृत स्तंभामुळे हा चैत्य अतिशय देखणा झालेला आहे. तरी कार्ल्याच्या चैत्यगृहाची सर कशालाच नाही. स्तंभांवरील स्त्रीपुरुषांची ऐहिक ऐश्वर्याची ही प्रतिके स्तंभांच्या अग्रभागी कोरलेली आहेत. स्तूपासमोरील ओळीत असलेल्या ह्या प्रतिकांच्या उपस्थितीमुळे स्तूपाबद्दल भाविकाला अधिकच आदर वाटेल अशी मांडणी येथील शिल्पकारांनी केलेली आहे.
कार्ले चैत्याची मांडणी अत्यंत प्रमाणबद्ध आहे. लांबी, रूंदी व उंची यांचा अनोखा समतोल येथे साधला गेला आहे.
भाजे स्तूपावर आज छत्र अस्तित्वात नाही, बेडसे चैत्यात ते कमळाचा आकार घेऊन आलेले आहे तर कार्ले चैत्यावर ते पसरट नक्षीदार फळीच्या स्वरूपात दिसते.
भाजे आणि कार्ले चैत्यातील लाकडी फासळ्या आजही शाबूत आहेत पण बेडसेच्या नष्ट झालेल्या दिसतात.
भाजे चैत्यगृहातील कललेले खांब, झिलईचा गुळगुळीत स्तूप व पिंपळपानाकृती कमान

भाजेची साधीशीच रचना

बेडसे चैत्यगृह

बेडसेतील स्तूपाचे नक्षीदार कमळाकृती छत्र

कार्ले चैत्याच्या ओसरीमधील नक्षीदार प्रासाद

कार्लेचा जगप्रसिद्ध चैत्य आतील देखण्या स्तंभांसह

तीनही चैत्यांवर दातृत्वाचे अनेक शिलालेख कोरलेले आढळतात. तर बेडसे आणि कार्ले चैत्यगृहावर त्यांच्या निर्मात्याचा उल्लेखही आढळतो.
बेड्से चैत्याजवळच्या एका विश्रांतीकक्षावर असलेला शिलालेख
...नासिकतो अनदस सेठीस पुतस पुसणकस दानं
नासिकचा श्रेष्ठी आनंद याच्या पुत्राचे हे दान.
तर कार्ले चैत्यावर त्याचा निर्मात्याचा- वैजयंती नगरीचा श्रेष्ठी भूतपाल याचा शिलालेख आढळतो.
वेजयंतिता सेठिणा भूतपालेना सेलघरं परिनिठपितं जम्बुदिपाम्हि उतमम
वैजयंतीचा श्रेष्ठी भूतपाल याने निर्मिलेले हे शैलगृह जंबुद्विपात सर्वोत्तम आहे.
भूतपालाचे शब्द अगदी यथार्थ आहेत.
कार्ले येथील चैत्य सर्व चैत्यांत विस्तीर्ण, उत्तुंग आणि उत्कृष्ट आहे, प्रसन्न, गंभीर आणि उदात्त आहे. हीनयान शिल्पशैलीचा हा सर्वोत्तम प्रतिक. येथे ऐश्वर्य आहे पण डामडोल नाही, येथे अभिजात कला आहे पण ओसंडती कृत्रिमता नाही, कौशल्याचे प्रदर्शन नाही, मूर्तींची गर्दी नाही. वस्तुत: स्तूप हे मृत्युचे प्रतिक पण येथे जीवनाचे प्रेरणा देते. यापूर्वी आणि यानंतरही शिल्पकारांनी अनेक लेणी खोदली, अनेक चैत्य खोदले पण यासम हेच.
संदर्भः
सह्याद्री - स. आ. जोगळेकर
सातवाहनकालीन महाराष्ट्र - रा. श्री. मोरवंचीकर
The Cave Temples of India -J. Burgess & Bhagwanlal Indraji
सुरेख फोटो आणि माहिती, धन्यवाद!
>जोते म्हणजे मृत्युलोक, घुमटाकार अण्ड म्हणजे आकाश, आणि हर्मिका म्हणजे स्वर्ग, ही हर्मिका सात उतरत्या चौकोनी पायर्यांनी बनलेली आढळते ह्या सात पायर्या म्हणजे सप्तस्वर्गांचे प्रतिक अशी तत्कालीन धारणा.
हा अँगल नव्यानं कळला त्यामुळे अजिंठ्याचा स्तूप अत्यंत गूढ आणि कमालीचा सुंदर वाटायला लागला आहे. खांब आणि छत यांना जोडणारा जरतारी वाटावा अश्या कोरीव दगडी पट्ट्याचा जीवघेणा वक्राकार, हर्मिकेच्याही वर असलेले अनाकलनीय आकार, मधोमध मृत्यूलोकात शांत बसलेला बुद्ध आणि यावर कळस म्हणजे अर्धप्रकाशित चैत्यगृह आणि त्यामुळे अत्यंत मिस्टीकल झालेलं तिथलं वातावरण , आयचा घो, क्या बात है!
अत्यंत सुरेख आणि रोचक माहिती. मागे सदाशिव टेटवीलकर यांचे एक पुस्तक वाचले होते (आता नाव आठवत नाही), त्यातही फार सुंदर माहिती होती.
कार्ले लेण्याच्या कार्त्याची वैजयंती नगरी म्हणजे आजच्या काळातील कोणते शहर?
अवांतर - बौद्ध लेणी ही सम्राट अशोकाच्या धर्मप्रसारानंतर बांधली गेली हे योग्य. परंतु, त्या किंवा त्यानंतर्ही महाराष्ट्रात कधीही बौद्ध हे राज्यकर्ते नव्हते. तरीही, ह्या लेण्यांचे संरक्षण (किमान हानी न करणे) आणि क्वचित द्रव्यदान ह्या गोष्टी त्यांनी केल्या, ही त्या काळातील त्यांची सेक्युलर विचारसरणी मानावी काय?
+१. ग्रेट संकलन वल्लीशेठ!
वल्ली अधिक विवेचन करू शकेल, पण माझ्या मते तरी नक्कीच हो.
वैजयंती नगरी म्हणजे कर्नाटकातील बनवासी गावाचे पुरातन नाव. श्री. चंद्रशेखर यांच्या ह्या लेखात याविषयी सविस्तर माहिती आहे.
सेक्युलर म्हणता यावी. या प्रदेशात सातवाहन आणि क्षत्रप या दोन राजवटी आलटून पालटून नांदून गेल्या. दोन्ही राजवटींनी बौद्ध धर्माला उदार राजाश्रय दिला होता. क्षत्रप तर संस्कृतीविहीन रानटी टोळ्या तर सातवाहन वैदिक धर्माभिमानी. पण ह्या दोघांनीही काही बौद्ध लेण्या खोदवलेल्या आहेत तसेच बौद्ध श्रमणांना उदरनिर्वाहासाठी शेती इत्यादी दाने पण दिली आहेत.
कदाचित बौद्ध धर्माच्या वाढत्या धर्मप्रसारामुळे ती त्यांची सामाजिक आणि राजकीय गरजही बनली असावी किंवा बौद्ध धर्माविषयी आकर्षणही असावे.
@खेडूतः हीनयान काळ इ. स १५० ते २०० च्या आधीचा समजला जातो. मुळात हीनयान ही संकल्पना तेव्हा नव्हतीच. नंतरच्या काळात बुद्धपूजेला मूर्तीरूपात मान्यता मिळाली आणि महायान (श्रेष्ठ वाहन)हा पंथ सुरु झाला. त्यांनी बोधिसत्वाच्या स्वरूपात मूर्तीपूजा चालू केली तसेच पूर्वीच्या पंथाला काहीसे हीन /कमी प्रतीचे समजण्यात येऊन हीनयान नाव मिळाले.
पण हीनयानकाळातील कला महायानांच्या मूर्तीकलेपेक्षा आजही उजवी वाटते.
हीनयान काळ इ. स १५० ते २०० च्या आधीचा समजला जातो. मुळात हीनयान ही संकल्पना तेव्हा नव्हतीच. नंतरच्या काळात बुद्धपूजेला मूर्तीरूपात मान्यता मिळाली आणि महायान (श्रेष्ठ वाहन)हा पंथ सुरु झाला. त्यांनी बोधिसत्वाच्या स्वरूपात मूर्तीपूजा चालू केली तसेच पूर्वीच्या पंथाला काहीसे हीन /कमी प्रतीचे समजण्यात येऊन हीनयान नाव मिळाले.
मुळात मूर्तिपूजा भगवान बुद्धांना अपेक्षित नव्हतीच. पण देवापेक्षा त्याला भजणार्या भक्तांची ताकदच मोठी असते या उक्तीप्रमाणे असे बदल अपेक्षितच धरायला हवेत. पण वल्लीने जी महत्त्वाची गोष्ट येथे अधोरेखित केली आहे ती म्हणजे अशा बदलांमुळे त्या त्या धर्मांचे मूळ उद्दीष्टच हरवले जाते.
वल्ली मित्रा,
तुझे पुरातत्त्व क्षेत्रातील ज्ञान वाखाणण्याजोगे आहे. चैत्यगृहांचे महत्त्व विशद करणारा हा विशेष लेख खूप आवडला. तुझ्या निरिक्षण शक्तीचे कौतुक करावे तितके कमीच आहे. प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार करुन विश्लेषक बुद्धीने लिहिलेला तुझा हा लेख खूप आवडला. :)
ही लेख वरवर चाळल्याची पोच आहे. फोटो सुंदरच. इतर गोष्टींबद्दल वल्लीने अभ्यास करूनच लिहिलं असणार आहे. सविस्तर प्रतिसाद सावकाशीने लिहिते.
आवडल्या गेले आहे.
हीनयान काळ आणि महायान काळ हे कधी होते? इतिहास कच्चा असल्यानं लक्षात नाही येत.
अनेकदा पाहून ही नसलेली माहिती इथे मिळाली. धन्यवाद!
फोटोवरुनच डोळे हटत नाहि.. प्रत्यक्ष काय गजब असेल.
धन्स हो वल्ली शेठ !!
अर्धवटराव
व्वा... फारच सुंदर.
अगदी कान पकडुन सांगते वल्ली, कान्हेरी तर कितिदा पाहिली पण तुमची नजर? काय वर्णावी त्याची महती. अन एव्हढा अभ्यास. फक्त एक सुचवु का? थोडा छोटा भाग टाकाल का? झेपत नाही एका वाचनात एव्हढ ज्ञान! शप्पथ दोनदा वाचला तरी काहीतरी सुटल्यासारख वाटत्य.
फोटो घ्यायचा अँगल फारच छान.
_/\_
ही केवळ पोच.. :) निवांत होऊन वाचावा लागेल असा लेख.
अशक्य संयम आहे तुमच्याकडं, खुप खुप धन्यवाद,
हा धागा चांगला माहितीपूर्ण आहेच .आता वल्ली यानी वारंगळ भूवनेश्वर मार्गे अंकोरवट असा प्रवास करावा.
अप्रतिम संकलन आणि लेख......
खासच रे वल्लि....
तु अजुन अजिंठा वेरुळ ला गेला नाहिस याचे दु : ख वाटतेय. एकदा जाउन येच
एकदम नेहमी परमाने वल्लीटच असाच लेख आहे.... सो धन्स टू वल्लीबुवा गडकरी ----^----
असताना पाहिलेली "भाजे " लोह्गडाजवळची तुमच्यामुळे बघता/समजता आली ...देवा मि.पा. पिं.चि. शाखेचा पुढचा कट्टा "गड/लेण्यावर " ठेवावा काय? (अ.आ.ची खोडकर स्मायलि ईथे उधारी वर)
अ नु मो द न ;-)
फोटो आणि माहिती
__/\__
अॅज युज्वल ग्रेट.
बाकी 'एकटाच' गेलेलास काय?
बाकी 'एकटाच' गेलेलास काय?
प्यारेकाका तुम्ही "त " वरून ताकभात ओळखण्यात हुशार हात ब्वा
उत्तम माहिती, नेमकी चित्रे! अर्थात वल्ली यांचे लेखन! :)
आवडेश :)
वल्लीशेट ही माहिती आणि फोटो शेयर केल्या बद्दल धन्यवाद.
अपेक्षेप्रमाणे लेख आवडला.
पण इतकी माहिती एका दमात पचवली गेली नाही, दोन्-चार वेळेस अजून वाचाव लागेल बहुतेक.
@सुनील :- लेणी खोदायला राज्वटींनी स्वतः जेवढं फंडिंग केलां त्याहून थोडं जास्तच त्याकाळ्च्या व्यापारी, धनिक वर्गानं केलेलं असावं. हां, मात्र राजसत्तेनं त्याला खोडा घातला नाही, हे खरेच.
मनोबा,अगदी बरोबर त्याकाळ्च्या व्यापारी, धनिक वर्गानं या लेणी खोदायला मोठा आर्थिक हातभार लावला आहे,नाशिक च्या लेणी क्रं. ३ मधे (याला देवी लेणं असही म्हणतात )तत्कालीन व्यापारी वर्गाने आर्थिक मदत दिल्याचा उल्लेख आहे.(संदर्भ ;सातवाहन व क्षत्रपांचा इतिहास-लेखक -मिराशी).
या शिवाय रोमिला थापर यांनी आपल्या 'अर्ली इंडिया' या ग्रंथात महाराष्ट्रातील ही सर्व लेणी व्यापारी मार्गावर होती .व त्याकाळी या लेण्यांचा व्यापार्यांना निवार्याचे साधन म्हणुन वापरली जात असत.असे नोंदवले आहे.
बाकी वल्ली,अप्रतीम माहीती बद्दल धन्यवाद्,जमल्यास महाराष्ट्रातल्या सर्व लेण्यावर एक लेखमालाच काढा,कारण संपुर्ण भारतात एकुण १२०० लेण्या आहेत,व त्यातील ९१२ लेण्या केवळ आपल्या महाराष्ट्रात आहेत.
उपयुक्त आणि दर्जेदार
जबराट रे वल्ली!!
पण एक मात्र नक्की कि, हि सगळी माहिती फक्त मिपावरच तुझ्याकडून वाचायला मिळते प्रत्य क्शात मात्र तुझ्या तोंडाला कुलूप लागलेलं असतं. ;)
रायगडावर देखील हे प्रकर्षानं जाणवलं होतं.
त्यामुळंच 'काही गोष्टींना' फार वेळ लागतोय काय? ;)
त्यामुळंच 'काही गोष्टींना' फार वेळ लागतोय काय?
माझ्या लक्षात आला मुद्दा ;) हॅ हॅ हॅ
बोलायला शिक रे मित्रा :)
लपलेलं सोनं चमकलं पण पाहिजे तरच किंमत जगाला कळते :D
लपलेलं सोनं चमकलं पण पाहिजे तरच किंमत जगाला कळते
=))
=))
:-D
म्हणजे इतक्या काळानंतर अजूनही ते चमकणं पेंडिंगच आहे का याचं?
किती बाजार उठवाल अजून लेको. ;)
किती बाजार उठवाल अजून लेको.
मित्रा तू चमकणं मनावर घेई पर्यंत ;) हा हा हा
@किती बाजार उठवाल अजून लेको. Wink>>>
अभ्यासपूर्ण आणि रंजक लेख ...
फार मस्त. ही ठिकाणं एकदमच गूढ असतात..
लई भारी. तपशील समजावून सांगण्याची पद्धतही आवडली.
सलाम!
जे पी
जबरा !!
वल्लीसाहेब लेख आवडला. माहितीपुर्ण लेख. _/\_
लई भारी.
मस्त माहिती!
सखोल अभ्यास, झकास लेखन आणि सुरेख चित्रे.
वल्ली दंडवत :)
जबराट!!!!!
नेहमी प्रमाणे अभ्यासपुर्ण
वल्लि सिंहासन बत्तिशि आणि गाथा सप्तशति कुठे मिळेल?
सिंहासन बत्तिशी नै माहिती पण एशियाटिक सोसायटी कोलकाता तर्फे गाथासप्तशतीचे इंग्रजी भाषांतर प्रसिद्ध करण्यात आलेले आहे.
http://10.0.0.103:15871/cgi-bin/blockpage.cgi?ws-session=840167740
फोटो व माहिती उत्तम...
हायला.. हा धागा कसा काय सुटला नजरेतून...
मस्तच रे वल्ली...लिखाण, फोटो आणी माहीती अभ्यासपूर्ण आणी अप्रतीमच..
माझाही गेली ३ वर्षे घाटवाटा आणी लेण्यांचा अभ्यास चालू आहे आणी माझीही निरीक्षणे तुझ्या सारखीच आहेत..
कार्ले येथील चैत्य केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर एकंदरीत भारतातील सर्व चैत्यांत विस्तीर्ण आहे.>>> हे कदाचीत महायान काळातील असु शकते पण माझ्या मते खडसांबळे लेण्यातील चैत्य हा हीनयान काळातील किंवा कदाचीत सर्वकालीन लेण्यांतील सर्वात मोठा चैत्य आहे.. आम्ही खडसांबळे लेण्या बघीतल्या तेव्हा चैत्याचा प्राकार बघून अचंबित झालो होतो कारण एकूण २९ लेण्यांकरता हा चैत्य बराच मोठा वाटला होता..
लेख जरी फक्त चैत्यांवर असला तरी माझा जिव्हाळ्याचा विषय असल्याने थोडे अवांतर अधीक लिहीतो..
भारतातील पहील्या, बिहारच्या बाराबर लेण्यांनंतर भारतात लेणीकला उदयाला आली पण ती अगदीच प्राथमीक अवस्थेत होती जसा काल लोटला आणी ह्या कलेले जसा राजाश्रय आणी लोकाश्रय मिळाला तसा ही कला बहरत गेली. भारतातील एकंदर ज्ञात लेण्यांपैकी ७५% लेण्या महाराष्ट्रात असल्या तरी पहीली कुठली ह्यात मतप्रवाह आहे. बरेचसे संशोधक भाजे लेण्यांवर एकमत करत असले तरी काही संशोधक सुधागड परीसरातील ठाणाळे आणी खडसांबळे लेण्यांना प्रथम क्रमांक देतात. ह्या तिन्ही लेण्या बघीतल्यानंतर मलातरी ठाणाळे किंवा खडसांबळे ह्यांचा महाराष्ट्रातील लेण्यात पहीला क्रमांक लागावा असे वाटते.
एक मात्र नक्की ह्या लेण्या प्रायः जिथे घाटवाटा अधीक वापरात होत्या तिथे खोदण्यास सुरुवात झाली कारण म्युच्युअल डिपेंडंसी (मराठी शब्द ???). माल वाहणारे श्रेणी आणी लेण्यांतील भिक्खुंचे संघ यांना एकमेकांची गरज. त्या काळात लेण्यांतील संघ हे मालवाहकांचे घाऊक गिर्हाईक असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच नाणेघाट, वाघजाई घाट, बोरघाट ई. अधीक वापराच्या व्यापारी मार्गाच्या आजूबाजूला लेणी खोदकाम आढळते. नाणेघाट ह्या त्या काळातील राजमार्गच असल्याने ह्या मार्गावर अधीक लेणी आढळतात. शिवनेरीचा डोंगर तर ह्या लेणी खोदण्यार्यांनी लोणी कापावे तसा कोरला आहे. ह्याच्या तिन्हीबाजूला लेणीकला आहे. पुर्वदीशेच्या लेणी समूहातर अजींठ्याप्रमाणे छतावरील रंगकाम केले आहे जे आजही शाबूत आहे..
लेणी समूहात असलेल्या ब्राम्हणी, जैन आणी बौद्ध प्रवाहापैकी तिसर्या प्रवाहातील लेणी अधीक आढळतात. असे असले तरी घारापुरी, म्हसरुळ ह्या लेण्यातीलही कातळकला नक्कीच वाखाणण्यासारखी आहे..पन्हाळेकाजी सारख्या अपवादात्मक लेण्यात तांत्रीक माहायन पंथातील महाचंडरोषणाची स्थापना आहे.
अजून एक मुळ बौद्धकाली असलेल्या लेण्यात कालांतराने पुज्य देवातांची स्थापना झालेली दिसते जशी की, लोणाड लेण्यात खांडजाई, लेण्याद्री लेण्यात गणपती, गोमाशी लेण्यात भृगु ऋषी..
असो लिहीण्यासारखे अजून बरेच आहे.... पण मुळ लेखाला भरकटवल्यासारखे होईल म्हणून ईथेच थांबतो.. कधीतरी ह्या सर्व लेण्यांवर फोटोंसकट एखादा लेख लिहीन...
तुझ्या पुढील ट्रेकला शुभेच्छा...
सविस्तर प्रतिसादासाठी धन्यवाद मनोज.
कार्ल्याचा चैत्यसुद्धा हिनयानकाळातच स्थापित झालेला आहे. आणि महायानकाळात त्याच्या ओसरीत मूर्ती कोरण्यात आल्या.
खडसांबळे लेणी मी अजून पाहिली नाहीत, त्या लेण्यांचे फोटो असतील मला जरूर दे किंवा आपणच खंडसांबळ्याला जायचा प्लान करूयात.
भाजे जुने आहेच पण सर्वाधिक जुनी लेणी राजमाचीच्या पोटातले कोंडाणे लेणी ही समजली जाते. ठाणाळे/खडसांबळेपण तितके प्राचीन असावे.
बाकी जुन्नरला तर नुसता शिवनेरीच नाही तर आजूबाजूचे कित्येक डोंगर कोरून काढलेले आहेत. मानमोडी लेण्यांचे तीन समूह, तुळजा लेणी, गणेश लेणी, बल्लाळ लेणी. २२० पेक्षा जास्त लेण्या त्या परिसरात आहेत.
बौद्ध लेण्यांपासूनच प्रेरणा घेत ब्राह्मणी आणि जैन शैलीतल्या लेण्या प्रचलित झाल्या. वेरूळच्या कैलास लेण्यात ब्राह्मणी शैलीचा तसेच एकूणच लेणीस्थापत्यातील परमोच्च अविष्कार दिसतो.
बाकी लेण्यांवर आधारीत एखादा सविस्तर लेख लवकर येऊ देत.
खडसांबळे लेणी मी अजून पाहिली नाहीत, त्या लेण्यांचे फोटो असतील मला जरूर दे किंवा आपणच खंडसांबळ्याला जायचा प्लान करूयात. >>>>
नक्कीच वल्ली. फोटो अजून जालावर टाकले नाहीयेत घरच्या पीसीमध्येच आहेत... खडसांबळे लेणी दोन भागात आहेत, पांडवलेणी आणी चांभार लेणी, आणी सगळी लेणी मुरुमी दगडातील असल्याने अतीशय भग्न अवस्थेत आहेत. दोन्ही लेण्यांवर कडा कोसळला आहे. त्यातल्या त्यात पांडवलेण्याला जाता येते जिथे चैत्य आहे. चांभारलेण्यात तर जाणे अतिशय जिकरीचे आहे.. सगळ्या लेण्या कोसळलेल्या कड्या खाली दबून गेल्या आहेत. त्या एरीयातील माझी एक घाटवाट - घुटक्याची, शिल्लक आहेच.. पावसाळ्या नंतर तिकडे ट्रेकचा प्लॅन आहे तेव्हा खडसांबळे लेणी करता येतील. तुला कळवीनच.
गेली काही महीने अलिबागच्या रामधरणे लेण्यांच्या ठिकाण निश्चीतीच्या मागावर होतो (लेण्या कुठे आहेत याची कुठेच माहीती नव्हती). गेल्या मार्च्मध्ये ह्या लेण्यांच्या निश्चीत जागेचा तपास लागला आहे.. पाऊस कमी झाल्यावर रामधरणे आणी सिद्धेश्वर लेणी करायचा विचार आहे..
बाकी लेण्यांवर आधारीत एखादा सविस्तर लेख लवकर येऊ देत.>>>> माहीती बरीच आहे. पणे लेख लिहीणे जमेल असे वाटत नाही. तो प्रांत माझा नाही..:)