छत्रपती शिवरायांची माणसे - यावरील पहिल्या पुस्तकाचे प्रकाशन आणि वितरण
Primary tabs
मिपा चे समस्त सुजाण वाचक,
सप्रेम नमस्कार.
मी गेले बरेच दिवस "छत्रपती शिवरायांची माणसे" यावर क्रमशः लिहितोय्.यापैकी प्रथम भाग : बाजी पासलकर लिहून तयार आहे.या संबंधात मी अनेक प्रकाशकांशी बोललो आणि काल या सगळ्याचा गोषवारा काढला तो पुढीलप्रमाणे :
१. हे ३२ पानी पुस्तक आहे ज्याची किंमत ३५/- रुपये आहे.
२. १००० प्रती खपवायच्या झाल्यास किमान ३ वितरक नेमावे लागतील , आणि वितरकांची अपेक्षा विक्रीच्या किंमतीच्या किमान ४० % एव्हढी आहे.यासाठी इतर लोक / प्रकाशक करतात (असे मला एका प्रकाशकानेच सांगितले आहे) तसे मूळ पुस्तकाचे किंमत अव्वा च्या सव्वा मला करायची नाहिये (आणि तसे केल्यास ते विकलेही जाणार नाही !) कारण माझा मूळ उद्देश पैसे कमावणे हा नसून लोकांच्या-सुजाण वाचकांच्या मनात घर करण्यासाठी त्यांच्या घरात प्रवेश मिळविणे (पुस्तकाच्या रूपाने) असा आहे.आणि त्यांना ४० % दिले तर माझा छपाईखर्चच निघून येणार नाही.जरी पैसा कमावणे हा उद्देश नसला तरी पुढील पुस्तकाचा पाया तरी उभा रहायला हवा ना? पुढील पुस्तक : कान्होजी जेधे - ९०-९५ % लिहून झाले आहे.
३. दुसर्या एका प्रकाशकाची पध्दत अशी : प्रत्येक पानाला ते २५/- रुपये देतात मानधन म्हणून म्हणजे मला ८००/- देणार आणि आयुष्यभर माझ्या पुस्तकाच्या हव्या तेव्हढ्या प्रती काढून विकणार्.पण ते पुस्तक मात्र छान काढतात आणि म्हणून मी तयार होतो यासाठी पण ते काल म्हणाले की त्यांच्याकडे सध्ध्या एव्हढे लिखाण पडून आहे की मला अजून २-३ वर्षे थांबावे लागेल !
म्हणून माझी मिपा च्या तमाम वाचकांना अशी विनंती आहे की समजा मीच जर का १००० प्रती काढून खपवायच्या म्हटल्या (नुस्ती संख्या नव्हे - मिपा सारख्या वाचकांना विकल्या म्हणजे- ते पुस्तक वाचले जाईल याची खात्री राहील !) तर मिपा मला याबाबत किती सहकार्य करू शकेल? - म्हणजे मिपा चे वरिष्ठ लोक याबाबत काय सहकार्य करू शकतील?(प्रत्येकाने काही प्रती वितरीत केल्या तरी ही खूप मोठ्ठी मदत होईल मला.मागे मी याबाबत मिपा वर विचारले असता बर्याच लोकांनी प्रायोजक म्हणून पैसे देण्याची पण तयारी दाखवली होती !)
आपण मला माझ्या ई-मेल वर पण लिहून तसे कळवू शकता : sudayan2003@yahoo.com
कळावे , आपल्या प्रतिक्रियांची आतुरतेने वाट पहात आहे.
उदय सप्रेम
भ्रमण ध्वनी : ९९६७५ ४२७०३
३२ पानांचे पुस्तक???
अहो त्यापेक्षा जरा थांबुन चांगली १००-१५० पाने तरी लिहुन झाल्यावरच प्रकाशीत करा ना. इतकी काय घाई आहे?
मूळ उद्देश पैसे कमावणे हा नसून लोकांच्या-सुजाण वाचकांच्या मनात घर करण्यासाठी त्यांच्या घरात प्रवेश मिळविणे (पुस्तकाच्या रूपाने) असा आहे
असे असेल तर इथेच एक लेखमाला लिहुन टाकाना! कशाला पाहिजे प्रकाशक आणि वितरक? सगळे चकटफू होऊन जाईल.
आपला,
बैलोबा.
चकटफू होणे हा पण उद्देश नाही हो ! जास्तीत जास्त लोकांच्या घरात पोचायला हवे आहे हे पुस्तक.....
३२ पानी असले तरी त्यातील कथानक फार वरच्या दर्जाचे आहे - स्वराज्याचे पहिले शहीद होते बाजी पासलकर ! त्यांची हकीकत आहे ही, यापुढील पुस्तक कान्होजी जेधे - ते असेल २५० पानी तरी ! लेखन चालू आहे.
पानेच भरायची तर माझी इतर पण काही लेखमाला आहेच की हो , पण विषय एकत्र नाही करायचे मला.....
म्हणून पुस्तकाची घाई आहे , मी गेली २ वर्षे वाट पाहतोय्.....आता अधीर झालोय.....
सप्रेसाहेब,
शिवचरित्र घराघरांत पोहोचावे असे मनापासुन वाटते.
तुमच्या 'बाजी पासलकरां'च्या जीवनावरील पुस्तकाबाबत एक करता येईल. मिपाच्या पुस्तक विकत घेऊ इच्छिणाय्रा सदस्यांनी प्रकाशनापुर्वी नोंदणी करावी. मात्र मदत करू इच्छिणाय्रांनी फक्त एकाच पुस्तकासाठी नोंदणी करु नये. त्यांनी पाच किंवा पाचाच्या पटीत मागणी नोंदवावी. शाळकरी मुलांना बक्षिस, वाढदिवसाची भेट यासाठी या पुस्तकाचा उपयोग करावा. त्यामुळे त्यामुळे तुमचा प्रसाराचा हेतूही साध्य होईल.
तसेच प्रकाशनपुर्व नोंदणीचा लाभ म्हणुन तुम्ही मिपाकरांना किंमतीत माफक सुटही ऑफर करू शकता.
माझी १० पुस्तकांची मागणी नोंदवावी ही विनंती.
काळा पहाड
काळा पहाड साहेब,
तुमच्या पत्राबध्द्ल आणि सूचनेबध्द्ल आभार !
तुमची नोंदणी नोंदवली आहे.पुस्तके छापून झाली की नक्की किंमत (सूट वजा जाता.....)कळवीनच.
बाकी तुमची सूचना मिपा वाले नक्केच मनावर घेतील असा आजपर्यंतचा अनुभव आहे म्हणून म्हणतो.
मंडळ आभारी आहे !
उदय सप्रेम
सप्रे काका,
'छत्रपती शिवरायांची माणसे' हा विषय हटके आहे आणि इतिहासप्रेमींना सुद्धा असे पुस्तक वाचायला नक्की आवडेल.
पण सगळ्या माणसांबद्दल माहिती एकाच पुस्तकात आली, साधारण ६००-७०० पानात तर पुस्तक अधिक प्रभावी राहिल.
वाचकही अशा पुस्तकास पसंती देतील असे वाटते.
मनस्वी
"मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."
तुमचे म्हणणे अगदी रास्त आहे.पण प्रश्न असा आहे की सगळ्याच माणसांबध्दल इतकी माहिती इतिहासात नाही.त्यामुळे प्रत्येकाची माहितीची पाने वेगळी ! उदाहरणार्थ : माझे पुढील पुस्तक - कान्होजी जेधे : तमाम जनतेला माहित असलेले प्रतापगडाचे युध्द महाराज जिंकले याचे एकमेव आणि प्रमुख कारण म्हणजे कान्होजीं सारख्या देशमुखानी आपल्या वतनावर पाणी सोडले.त्यामुळे त्यांच्यासोबत १२ मावळचे देशमुख महाराजांच्या बाजूने आले ! नाहितर्.....आणि अश्या या कान्होजींना इतिहासाने आजवर योग्य ती वागणूक दिली नाहिये - त्यांच्यावर २५०+ पाने होतील ! हीच कथा बाजीप्रभू देशपांडे यांची आहे .....यादी मोठी आहे.
खेरीज मूळ उद्देश असा आहे की लोकांना माझ्या वाचनाची सवय व्हावी, पुढील पुस्तकाची आतुरता लागावी.
म्हणून तुमची सूचना चांगली आहे पण अंमलात नाही आणता येत , माफी असावी.
उदय सप्रेम
उदय साहेब,
मला छत्रपती शिवरायांशी संबंधित सर्व वाचायला आवडेल.
मी तुमच्याशी इ-पत्राद्वारे संपर्क करेनच बाकी सर्व गोष्टींसाठी !!
स्वप्निल..
स्वप्निल साहेब,
स्वागत आहे ! तुम्ही मला कधीही ई पत्र पाठवू शकता.खेरीज माझ्याशी थेट संपर्क पण करू शकता माझ्या भ्रमण्ध्वनीवर (संध्याकाळी ७ नंतर !)
उदय सप्रेम
उदयराव,
बाजी पासलकरांच्या १० प्रतींची माझीही नोंदणी करुन घ्या. :)
(अवांतरः ह्यात बाजींच्या नंतर, यशवंताने काय केलं ह्याची माहिती आहे का हो? मला फार प्रश्न पडतो. कारण बाजींनंतर यशवंताचं नावही कुठे ऐकिवात नाही.)
कान्होजी जेधेंच्या पुस्तकाची आतुरतेने वाट पाहतो आहे.
आपला,
- (थोरल्या आबासाहेबांचा मावळा) ध मा ल.
नमस्कार.
आपल्या उपक्रमास अनेक शुभेच्छा !
प्रकाशकांचे अनेक अनुभव घेतलेल्या आणि त्यामुळे नारज झालेल्या कुणा एकाने 'फुटपाथ वरील प्रकाशन' असा उपक्रम चालू केल्याचे मध्ये वाचले. या अभिनव प्रयोगाची जाहिरात झालीच, शिवाय ती पुस्तके पटापट विकली गेली असेही त्या बातमीत वाचले होते. याच धर्तीवर पुण्यात एका रद्दीच्य दुकानापशी असा प्रकाशन सोहळा झाल्याचे नुकतेच वाचले. त्या पुस्तकाला सुद्धा लोकांनी चांगला प्रतिसाद दिला असे बातमीमध्ये होते. मोठ्या प्रकाशकांच्या नादी न लागता स्वतःच असे प्रकाशन करण्याचा या मंडळींचा प्रकार दिसतो. आपण उत्सूक असाल याचा शोध घ्यावा. यातील खर्च आणि इतर बाबींच्या तपशिलाची मला जाण नाही. वर्तमानपत्रात वाचले ते लक्षात होते म्हणून सुचवले.
त्या बातमीचा दुवा मला मिळाला तर लगेच येथे देईन. बातमी बहुधा मटाच्या जालावरील आवृतीमध्ये होती.
शुभेच्छा !
--लिखाळ.
उदयराव,
आपण आपला भ्रमणध्वनी दिलाच आहे त्यावर मी सवडीने आपल्याशी संपर्क साधीन व यथाशक्ति मदतही करण्याचा प्रयत्न करीन. अर्थात, ती माझी व्यक्तिगत मदत असेल, मिसळपाव डॉट कॉम या संकेतस्थळाचा त्यात काहीच संबंध नसेल याची कृपया नोंद घ्यावी...
तसेच आपला हा प्रस्ताव वाचून मिसळपाव डॉट कॉमच्या कुणाही सभासदाला अथवा वाचकाला आपल्या कार्यात हातभार लावायचा असेल तर तो/ती असा हातभार अवश्य लावू शकतात परंतु तो सर्व हातभार हा त्यांचा व्यक्तिगत असेल. मिसळपाव डॉट कॉम या संकेतस्थळाचा त्यात काहीही संबंध नसेल.
कोणत्याही प्रकारच्या आर्थिक विषयात मिसळपाव डॉट कॉम हे संकेतस्थळ सहभागी होऊ इच्छित नाही याचीही कृपया सर्वांनी नोंद घ्यावी.
असो, आपल्या उपक्रमास मनापासून शुभेच्छा! मी आपल्याशी संपर्क साधून व्यक्तिगतरित्या सर्व ती मदत यथाशक्ति करण्याचा प्रयत्न करीन...
आपला,
विसोबा खेचर, ऊर्फ जनरल डायर, ऊर्फ सरपंच, ऊर्फ तात्या अभ्यंकर,
मालक, मिसळपाव डॉट कॉम.
तात्या,
अर्थातच हे अगदी साहजिक आहे की मिसळपाव डॉट कॉम या संकेतस्थळाचा त्यात काहीही संबंध नसेल.
आणि माझी विनंती ही ह्या संकेतस्थळावर खूप सुजाण वाचक असतात या दृष्टीने सगळ्यांना व्यक्तीगत पातळीवरच होती.
मिपा मुळे खूपच चांगल्या लोकांशी परिचय आणि मैत्री झाली आहे.आणि ह्या सगळ्याचे श्रेय अर्थातच तात्या आपल्याला आहे.आपला आशिर्वाद असाच म्यां पामरावर असू द्यावा ही विनंती !
आपल्या संपर्काची वाट पाहतो.
आपला विनम्र,
उदय सप्रेम
तुम्ही इतिहास प्रेमी मंडळाला का नाही भेट्त?
नाही तर कोणत्य्या तरि राजकिय पक्षाला भेटा