जे न देखे रवी...

नभी चांदणे...(गझल)

Primary tabs

वृत- भुजंगप्रयात
मात्रा- लगागा लगागा लगागा लगागा

नभी चांदण्याची जुनी साथ होती
उशाला कधीची उभी रात होती
जळे जीव कोणी उदासीत येथे
पुकारीत कोणा निशा गात होती
कुणाला कसा सांग आता विसावा
उसासून दु:खे हळू गात होती
मला भासले अंत ना या क्षणाला
पहाटेस ही रोजची रीत होती
कुठे अंत आता अशी रात ओली
पिवोनी उजेडास जागीत होती
क्षणामागुती धावती जीव सारे
इथे शेवटाची सुरुवात होती

II राजे II (verified= न पडताळणी केलेला)

कुठे अंत आता अशी रात ओली
पिवोनी उजेडास जागीत होती
क्षणामागुती धावती जीव सारे
इथे शेवटाची सुरुवात होती

छान !

आम्हाला जरा कवितेतले काही कळत नाही... पण जो अर्थ आम्ही घेत आहोत त्यानूसार आम्हाला ही कविता छान वाटली... तरी ही... कोणी बुध्दीमान मिपाकर कविते सोबत कवितेचा अर्थ देखील लिहावा ही विनंती...
कवियत्रीला देखील हीच विनंती आहे !!!

राज जैन
बुध्दीबळाच्या खेळात राजा किती ही मोठा असला तरी तो व प्यादा खेळानंतर एकाच बॉक्स मध्ये बंद होतात...!

कधी कधी निराशेचे क्षण संपत च नाहीत.. एका मागुन एक..
तरी ही आपण आशेपोटी धावतच रहातो..
कधी तरी याचा शेवट होईल असे मनाशी म्हणत...

असे मला म्हणायचे आहे..

पुष्कराज

खूपच सहज आहे तुमची कविता, छान ताकद आहे तुमच्यात कविता लिहण्याची

पुष्कराज

विसोबा खेचर

कविता खास वाटली नाही.

प्रामाणिक अन् वैयक्तिक मत. राग नसावा...

पुलेशु...

कौस्तुभ

जळे जीव कोणी उदासीत येथे
पुकारीत कोणा निशा गात होती

वाह हे तर छानच आहे!

धन्य्वाद सर्वांचे.

>>तात्या,
कविता खास वाटली नाही.

राग नसावा...

राग कसला? खरे मत दिलेत, धन्यवाद..
पुलेशु...
म्हण्जे काय? बरेच दिवस विचारीन म्हणत होते...

इनोबा म्हणे

कुठे अंत आता अशी रात ओली
पिवोनी उजेडास जागीत होती
क्षणामागुती धावती जीव सारे
इथे शेवटाची सुरुवात होती

छान!

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

यशोधरा

पुलेशु...
म्हण्जे काय? बरेच दिवस विचारीन म्हणत होते...

पुढील लेखनास शुभेच्छा :)

साती

कविता चांगली आहे.
कुठे अंत आता अशी रात ओली
पिवोनी उजेडास जागीत होती
चांगली कल्पना.
साती

धोंडोपंत

रचना वृत्तबद्ध आहे. पण याला गझल म्हणावे का? आमच्या मते नाही.

काफिया, रदीफ आणि बहर(वृत्त) यांचे बंधन पाळून गझलेच्या फॉर्ममध्ये लिहिले म्हणजे गझल होत नाही असे वाटते. शेर धारदार पाहिजे. काळजात घुसला पाहिजे.

आपण लिहिलेले शेर नुसते निवेदनात्मक आहेत. त्यात गझलेचा "धक्का" जाणवत नाही. शेर अंगावर आला पाहिजे. शेर लिहितांना त्यातील सानी मिसरा म्हणजे दुसरी ओळ लिहिणे फार जबाबदारीचे असते. तिथे कस लागतो. असो.

पण गझलेचे तंत्र तुम्हाला व्यवस्थित जमले आहे. मंत्र शिका म्हणजे उत्तम गझल लिहाल.

तुमच्या उत्तमोत्तम गझला आम्हाला वाचायच्या आहेत.

पुढील लेखनासाठी हार्दिक शुभेच्छा.

धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

राघव

खोदकाम करतांना अचानक सापडली ही रचना..!

नभी चांदण्याची जुनी साथ होती
उशाला कधीची उभी रात होती

जळे जीव कोणी उदासीत येथे
पुकारीत कोणा निशा गात होती

कुणाला कसा सांग आता विसावा
उसासून दु:खे हळू गात होती

हे तीन शेर अतिशय आवडलेत! क्या बात है!! :)

अवांतरः
खूप दिवस झालेत.. फुलवातैनं लिहिलेलं इथं आलं नाही.. काय कारण असावे बरे??