भटकंती

टोका प्रवरासंगमचे अद्भूत शिवमंदिर

Primary tabs

देवगिरी बघून आणि नगर फाट्यावर बिरूटे सर आणि श्रुतीताईंना भेटून आम्ही औरंगाबादेहून आता परतीच्या मार्गाला लागलो. पण एक ठिकाण अजूनही बघायचे राहिले होते ते म्हणजे गंगापूर फाट्याच्या थोडेसे पुढे असलेले टोका गावातील शिल्पसमृद्ध सिद्धेश्वर मंदिर. वास्तविक औरंगाबादला येतानाच हे मंदिर बघायचे होते पण वेळेअभावी ते परतीच्या वेळी पाहायचे ठरले. हे मंदिर गोदावरी आणि प्रवरेच्या संगमानजीकच आहे. अगदी महामार्गाला लागूनच, प्रवरेवरच्या पुलानजीकच.

सिद्धेश्वर मंदिराच्या प्रांगणात आलो. हे मंदिर सर्व बाजूंनी तटांनी बंदिस्त केले आहे. मुख्य प्रवेशद्वार बंद करून मंदिराच्या मागच्या दरवाजाने प्रवेश आहे. प्रवेशद्वारावर नगारखाना उभारलेला आहे. सिद्धेश्वर मंदिराची रचना पेशवेकालीन आणि हेमाडपंती शैलीची. ह्या मंदिराच्या आवारात मुख्य मंदिराच्या एका बाजूला विष्णूचे आणि दुसर्‍या बाजूला देवीचे अशी अजून दोन मंदिरे आहेत आणि ह्या तिन्ही मंदिरांवर विविध शिल्पे कोरलेली आहेत.

१. संगमावरील सिद्धेश्वर मंदिर
a

२. सिद्धेश्वर मंदिर संकुल
a

आम्ही पहिल्यांदा आता मुख्य मंदिर पाहायचे ठरवले. मंदिराचे शिखर लहान लहान शिखरांनी बनलेले आहे. सभामंडप, गर्भगृह अशी याची रचना. मंदिरातले स्तंभ अगदी पेशवेकालीन शैलीचे. स्तंभांवर भारवाहक यक्ष छत तोलून धरताना कोरलेले आहेत. २२०० वर्षांपूर्वीच्या बौद्ध लेण्यांपासून चालत आलेली आलेली ही भारवाहक यक्षांची परंपरा अगदी अलीकडच्या काळापर्यंत झिरपलेली आहे. ब्राह्मणी लेण्यांत आणि हिंदू मंदिरांत काही वेळा यक्षांची जागा यक्षिणी अथवा योगिनी घेताना दिसतात.
सभामंडपातील नक्षीदार छतावर कृष्णाच्या विविध मूर्ती कोरलेल्या दिसतात अर्थात सभामंडपातले कोरीव काम इतके आकर्षक नाही. मंदिराचे गर्भगृह मात्र प्रशस्त असून आतमध्ये शिवलिंग स्थापित केले आहे.

३. मंदिर सभामंडप
a

४. शिवमंदिरासमोरील देखणा नंदी
a

५. मंदिराच्या प्रवेशद्वारातील जय विजय द्वारपाल
a

६. सभामंडप व गर्भगृह
a

७. भारवाहक यक्ष
a--a

८. मंदिराच्या बाजूस असलेलया ओसर्‍या

a

या मंदिराचे जे काही देखणेपण आहे ते त्याच्या बाहेरच्या भिंतीवर असलेल्या शिल्पांमध्ये. मंदिरांच्या सर्व बाजूंच्या भिंतींवर रामायण, महाभारत आणि इतर पुराणांमधील प्रसंग कोरलेले आहेत. तर मंदिराच्या समोरील बाजूस दशावतार पट्टिका कोरलेली आहे.

दशावतार पट्टिकेवरची शिल्पे अतिशय देखणी आहेत. विष्णूचे मत्स्यावतारापासून कल्की अवतारांपर्यंतचे दहा अवतार येथे पाहावयास मिळतात.

९. मत्स्यावतार
वास्तविक विष्णूने मत्स्याचे रूप धराण करून मनु राजाला प्रलयातून वाचवले अशी ही कथा आहे पण शिल्पातला वार करणारा दैत्य कोण आहे ते कळत नाही.

a

१०. कूर्मावतार
येथे कूर्माच्या पाठीवर मंदार पर्वताची रवी आणि वासुकीची दोरी करून समुद्र घुसळत असलेले एका बाजूला देव तर दुसर्‍या बाजूला दानव कोरलेले आहेत.
.
a

११. वराह अवतार
हे शिल्प लै भारी आहे. वराहाने आपल्या दातांवर अर्धचंद्राकृती पृथ्वी उचललेली आहे त्या पृथ्वीवर हत्ती, घोडे, मनुष्य, वनस्पती आदी सजीव सृष्टी नांदत आहे. याच पृथ्वी तोलून धरलेल्या अवस्थेत वराह हिरण्याक्षाशी गदायुद्ध खेळत आहे.

a

१२. नृसिंहावतार
येथे स्तंभातून प्रकट झालेला नृसिंह हिरण्यकश्यपूला मांडीवर घेऊन त्याचे आपल्या नखांनीच पोट फाडताना दाखवला आहे. एका बाजूला लहानगा प्रल्हाद हात जोडून उभा आहे.
a

१३. वामन अवतार
हे शिल्प उद्धस्त अवस्थेत असल्याने नीट कळू शकत नाही पण वेदीवर बसलेल्या बळी राजाच्या मस्तकावर वामनाने पाय ठेवल्याचे या शिल्पाचे अंधुकसे अवशेष दिसतात.

a

१४. परशुराम अवतार
इथे सहस्त्र हात असलेल्या कार्तवीयाचा परशुराम परशुच्या साहाय्याने वध करताना दाखवलेला आहे. तर बाजूलाच सहस्त्रार्जुनाने परशुराम पिता जमदग्नीची बळजबरीने हरण केलेली धेनु दाखवलेली आहे.

a

१५. रामावतार
दशानन रावणाशी युद्ध करताना राम लक्ष्मण कोरलेले आहेत तर हनुमान एक वृक्ष उपटून रावणावर फेकत आहे. रावणाला नऊ मानवी तोंडे तर एक पशूचे तोंड कोरलेले आहे जणू ते त्याच्यातले क्रौर्याचे निदर्शक आहे. रावणाच्या हातात त्रिशुळ, खड्ग, गदा, धनुष्यबाण, भाला, चक्र, मुद्गल अशी विविध शस्त्रे दाखवली आहेत.

a

१६. कृष्णावतार
यात बालकृष्ण यशोदेबरोबर दाखवला आहे तर शेजारच्या शिल्पात त्याने कंसाचा राजमुकुट खेचून त्याच्या केशसंभाराला पकडून खेचताना कोरलेले आहे तर खालचे बाजूस कंसाचे मस्तक खंडित केलेले दाखवलेले आहे.

a

१७. बुद्धावतार
मध्यभागी बुद्ध व बाजूला त्याचे दोन अनुयायी एक स्त्री व एक पुरुष ध्यान करताना दाखवलेले आहेत. गंमत म्हणजे बुद्धाचा समावेश जेव्हा विष्णूच्या अवतारांमध्ये केला गेला तेव्हा विष्णूचे चार हात पण बुद्धाला चिकटले ते चारही हात येथे कोरलेले आहेत.

a

१८. कल्कीअवतार
हा विष्णूचा दहावा अवतार. पुरांणाप्रमाणे हा भविष्यातला अवतार आहे. हा नेहमी पांढर्‍या छत्रधारी सालंकृत घोड्यासह दाखवला जातो. शस्त्रधारी कल्की काहीवेळा घोड्यावर बसलेला तर काही वेळा लगाम हातात धरलेल्या अशा दोन्ही स्वरूपात दाखवला जातो.

a

१९. मंदिरातील दशावतार पट्टिका
a

२०. मंदिरातील दशावतार पट्टिका
a

मंदिराच्या दोन्ही बाजूंच्या भिंतींवर पुराणांमधील प्रसंग कोरलेले आहेत.

डाव्या बाजूच्या भिंतीवर एक शिल्पपट कोरलेला आहे. त्यामागची कथा नेमकी कोणती हे ध्यान्यात येत नाही परंतु माझ्या अंदाजाप्रमाणे ती ह्याच मंदिराची प्रतिकृती असावी. कारण शिल्पामधले कोरलेले मंदिर प्रत्यक्षातही याच रचनेचे आहे. मंदिरात दर्शनाला राजा (बहुधा पेशवे) हत्तीवरून दर्शनाला येताना दाखवला आहे. बरोबर त्याचे भालदार चोपदार आणि सेवक आहेत तर मंदिराच्या मागच्या बाजूला गरूडाने दोन्ही हातांवर विष्णू आणि लक्ष्मीला तोलून धरलेले आहे तर मस्तकी शेषनाग धारण केलेला आहे.

२१. संपूर्ण शिल्पपट
a

२२. मंदिराचे दर्शन घेताना दाखवलेला राजा आणि पाठीमागे गरूडाचे शिल्प
a

याच भिंतीवर अजूनही काही शिल्पे कोरलेली आहेत.

२३. गणपतीची पाद्यपूजा करताना दाखवलेली स्त्री. टिपीकल पेशवेकालीन वेशभूषा
a

२४. बालकृष्णाचे गोकुळातले प्रसंग
a

२५. कृष्णाच्या गोपिकांसोबतच्या लीला
a

२६. अर्जुनाचे गर्वहरण
पुराणातली मूळ कथा अशी की अर्जुनाला आपल्या धनुर्विद्येचा गर्व होऊन तो हनुमानाला म्हणाला की रामाने इतके सामर्थ्य असतानाही बाणांनी सेतू उभारण्याऐवजी दगडांचा सेतू का उभारला. आता माझ्या बाणांचे सामर्थ बघ, मी तुला कधीही न तुटणारा बाणांचा सेतू उभारून दाखवतो. अर्जुनाचे हे गर्विष्ठ बोलणे पाहून हनुमानाने त्याला आव्हान दिले. जसजसा अर्जुन बाणांचा सेतू उभा करी तसातसा हनुमान त्याखाली बसून तो सेतू उद्धस्त करून टाकी.
हीच कथा येथे मूर्तस्वरूपात कोरलेली आहे.

a

२७. भीम गर्वहरण
ही महाभारतातली कथा आहे. आरण्यकपर्वात द्रौपदीच्या हट्टापायी कुबेराच्या संरक्षित सरोवरातली सौगंधिक कमळे आणायला जाताना भीम जातो. तेथे भीमाला कुबेराच्या यक्षांशी लढावे लागू नये म्हणून काळजीपोटी हनुमान वृद्ध वानराचे रूप धारण भीमाचा मार्ग अडवतो तसेच आपली शेपटी उचलता येत नाही हे सांगून त्यालाच शेपटी उचलून बाजूला ठेवायला सांगतो. पण हनुमानाची शेपटी उचलू न शकल्याने शेवटी भीमाचे गर्वहरण व हनुमान मूळ रूपात प्रकट होऊन आपले दैदिप्यमान रूप त्याला दाखवतो व यक्षांच्या संकटाविषयी सावध करतो.

a

मंदिराच्या उजव्या बाजूच्या भिंतींवर पण काही रोचक शिल्पे आहेत. इथल्या पट्टिकेवर स्त्रियांच्या विविध भावमुद्रा, नृत्यमुद्रा कोरलेल्या आहेत.

२८. नृत्यमुद्रा
a

२९. टाळ, मृदंग आदी वाद्ये वाजवतांना
a

३०. केशसंभार करताना आणि वीणा वाजवताना दाखवलेल्या स्त्रीया
a

३१. कृष्णाचे गोपिकांबरोबरचे गोकुळातील प्रसंग
a

३२. हाच तो शिल्पपट
a

द्रौपदीस्वयंवर
इथल्याच भिंतीवर कोरलेले द्रौपदी स्वयंवराचे शिल्प अतिशय सुरेख आहे. द्रौपदी दासीसह गजरथात बसलेली दाखवली आहे. अर्जुन छतावरील मत्स्याचा डोळ्यावर नेम धरून खालच्या दिशेने पाहात उभा आहे. त्याच्या बाजूला युधिष्ठिर, भीम, नकुल, सहदेव बसलेले आहेत. बाजूला द्रुपद राजा आणि त्याचे सैन्य तसेच स्वयंवराला आलेले इतर राजे दाखवले आहेत तर वरच्या बाजूला कृष्ण आणि संकर्षण कोरलेले आहेत.

३३. संपूर्ण शिल्प
a

३४. लक्ष्यभेद
a

याच भिंतीच्या एका कोपर्‍यात रामायणातील अशोकवनाचा प्रसंग कोरलेला आहे.
सीता अशोकवाटीकेतल्या एका वृक्षाखाली बसलेली असून हनुमान त्या वृक्षाच्या फांदीवर बसून आपली ओळख तिला करवून देत आहे.

३५.
a

विष्णूमंदिर
आता मंदिराच्याच उजव्या बाजूला असलेले विष्णूमंदिर पाहायला आम्ही सुरुवात केली. हे मंदिर सुद्धा लहान लहान शिखरांच्या रचनेने बनलेले आहे. मंदिर तसे लहानसेच असून विष्णूमूर्तीच्या समोर हात जोडलेल्या अवस्थेत गरूडाची मूर्ती स्थापन केलेली आहे.

३६. विष्णूमंदिर
a

३७. विष्णूमूर्ती
a

ह्या मंदिराचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे मंदिराच्या बाहेरच्या भिंतींवर कोरलेल्या दिक्पालांच्या मूर्ती.

३८. पश्चिम दिशेचा स्वामी वरूण, त्याचे वाहन हत्ती. वरूणाचा पाश आणि त्याची गदा सुद्धा यात कोरलेली आहे.
a

३९. आग्नेय दिशेचा स्वामी अग्नी त्याचे वाहन एडका यांसह
a

४०. दक्षिण दिशेचा स्वामी यम त्याचे वाहन रेडा यांसह
a

४१. हा नैऋत्य दिशेचा स्वामी निऋती. हा नेहमीच क्रूर दाखवलेला असतो (हा बहुधा असूर होता) याचे प्रमुख शस्त्र खड्ग असून याने हातात शत्रूचे कापलेले मुंडके पकडलेले आहे.
a

४२. वायव्य दिशेचा स्वामी वायु हातात ध्वज घेऊन उभा आहे. त्याचे वाहन बहुधा बैल आहे.
a

४३. पूर्व दिशेचा स्वामी देवराज इंद्र त्याच्या ऐरावत हत्तीसह उभा आहे.
a

४४. ईशान्य दिशेचा स्वामी ईशण अथवा रूद्र हाती त्रिशुळ, डमरू, कमंडलू आणि नाग धारण करून वाहन नंदीसह उभा आहे.
a

४५. उत्तर दिशेचा स्वामी कुबेर त्याचे नक्रासह (मगर) यांसह उभा आहे.
a

वरील दिक्पालांपैकी अग्नी, कुबेर आणि वरूणाच्या वाहनांमध्ये विविध पुराणांमध्ये वेगवेगळी वाहने दिली आहेत. अग्नीचे वाहन काही ठिकाणी बैल तर वरूणाचे नक्र अथवा मगर (वरूण जलदेवता असल्याने) असे दाखवलेले आहे.

याच विष्णू मंदिराच्या मागील भिंतीवर हत्ती आणि मर्कटांचे अनोखे शिल्प कोरलेले आहे. मर्कट तर इतके खुबीने कोरलेले आहेत की त्यांच्या जबड्यातील दातही अगदी स्पष्टपणे दिसावेत.

४६.
a

देवीमंदिर

या विष्णूमंदिरातील विलोभनीय मूर्ती बघतच आम्ही मुख्य शिवमंदिराच्या पलीकडच्या बाजूस असलेले देवीचे उपमंदिर पाहण्यास निघालो. ह्या मंदिराची रचना पण साधारण विष्णूमंदिरासारखीच असून याच्या भिंतीवर देवी तसेच अष्टमातृकांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत.

४७. देवीचे मंदिर
a

४८. ही चामुंडेची मूर्ती हाती शस्त्र धारण करून असुराचा नाश करत आहे. (प्रेतवाहन)
a

४९. वाराही
a

५०. मातृकांमधली एक माहेश्वरी शस्त्रे त्रिशूळ, डमरू, खङग वाहन नंदी
a

५१. हाती कमंडलू धारण केलेली ही कौमारी. हिने एका हातावर बीजपूरक (म्हाळूंगाच्या फळांचा घोस ) धारण केले आहे जे नवनिर्माणाचे /पुन:निमिर्तीचे, मांगल्याचे प्रतिक आहे.
a

५२. कमळावर बसलेली महालक्ष्मी
a

५३. सिंह हे वाहन असलेली ही नारसिंही
a

५४. हत्ती हे वाहन असलेली ऐन्द्री अथवा इन्द्राणी
a

५५. गरूड वाहन असलेली ही वैष्णवी
a

५६. याच मंदिराच्या सभामंडपातील चारही भिंतींवर वरील बाजूस विविध शिल्पपट कोरलेले आहेत. त्यातला हा एक
a

ही सर्व मंदिर संकुल बघून मंदिराभोवतीच्या तटावर गेलो. तिथून दिसणारी मंदिराची ही दृश्ये.

५७. विष्णूमंदिर
a

५८. देवीचे मंदिर (डावीकडचे) आणि मुख्य मंदिर
a

हे सर्व अद्भूत शिल्पसौंदर्य डोळ्यांत साठवत आम्ही सिद्धेश्वर मंदिरातून निघालो. थोड्या जवळच अजून दोन मंदिरे आहेत पण त्यांचे बांधकाम पेशवेकालीनच तरी साधे आहे.

५९. हे तिथे असलेले घंटेश्वर शिवमंदिर
a

इतके सुबक कोरीव काम असलेली अलीकडच्या काळातली मंदिरे तशी फारशी पाहण्यात नाहीत. त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर यासारख्या मोठ्या मंदिरांचा जीर्णोद्धार याच काळात झाला आहे तरीही तिथे असे कोरीव काम बघायला मिळत नाही. नाही म्हणायला नाशिकमधली नारोशंकर, सुंदरनारायण अशी मंदिरे बरीच देखणी आहेत पण तिथेही मूर्तीकाम कमीच.
एकंदरीतच हे मंदिर बघणे हा एक अनुभव आहे. पुणे -औरंगाबाद मार्गे प्रवास करत असताना तर तो चुकवू नये असाच.

**या मंदिरात इतरही असंख्य शिल्पे असून विस्तारभयास्तव ती येथे देणे शक्य नसल्याने महत्वाच्या सर्व शिल्पांचा येथे थोडक्यात आढावा घेतला आहे.

मृत्युन्जय

खुपच सुंदर रे. साला तुझ्याकडे माहितीचा खजिना आहे आणि सौंदर्य्दृष्टी देखील

+१११ टू प्रशांत....

आणी माहिती सहित फोटूंसाठी...फेटा उडवण्यात येत आहे... :-)

nishant

शिल्प आणि त्यांची थोड्क्यात दिलेली माहिती आवडली.

लीलाधर

तुमच्या शोधक आणि अभ्यासु व्रुत्तीला सलाम !

मनराव

आधी मंदीरात देवाचे दर्शन घेण्याव्यतीरिक्त काही करत नव्हतो....पण तुमच्या बरोबर राहुन देवदर्शना सकट मंदिर डोळसरुपाने पहायला शिकलो .

स्पंदना

अगदी योग्य शब्दात पकडलय भावनांना!

वल्लीशेठ आगे बढो!

मन१

वल्ली ह्या नावाकडून असे लेख येणं हे नेहमीचच झालय.you have set the bar.
गावाचं नाव बहुतेक कायगाव्-टोक असं आहे.
दंडकारण्यात मारिच राक्षसाचा पिच्छा करीत असताना रामने बाण सोडला. तो बाण लागून मारिचाचे शीर/टोक धडावेगळे झाले ती हीच जागा . म्हणून ह्याचे नाव "टोक" अशी काहीजणांची श्रद्धा आहे.
पण अशा जागाही खूप खूप आहेत. काहीच समजत नाही.
पंचवटी-नाशिक वगैरे तर माहित असेलच. शिवाय आंध्रात भद्राचलम इथे जागा दाखवतात, जिथून रावणानं सीतेचं अपहरण केलेलं. दक्षिणेत महत्वाचं तीर्थस्थान बनू पाहतय ते.

बॅटमॅन

वल्ली, तो ४४ नंबरचा फोटो चुकलाय का बे? ४३ नं. च्या इंद्राचाच फोटो रिपीट झालाय असे वाटते.

बाकी लेखाबद्दल काय लिहिणे, डोळे निवले अक्षरश:.!!!!!! मस्त मस्त मस्त एकदम. :)

प्रचेतस

धन्स रे. चुकून त्याच फोटोची युआरएल टाकली गेली होती. बदल केलाय आता.

@मन१: बरोबर- कायगाव टोका त्या गावाचे नाव. पण सगळे जण 'टोका' म्हणतात, गावातले बोर्डसुद्धा फक्त टोका ह्या नावाचेच आहेत.

मालोजीराव

मंदिराची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद,मंदिर सभामंडप विशेष आवडला !

एक प्रश्न आहे वल्लोबा वरच्या मंदिरात आणि हळेबिडू येथील मंदिराची काही शिल्पे समान आहेत पण शिल्पाच्या कोरीवकामात म्हणजे क्वालिटी मध्ये एवढा फरक का ? उदाहरणा दाखल हि २ चित्रे पहा

n

नृसिंहअवतार

v

वराहअवतार

प्रचेतस

लै सोप्पय.

हळेबीडूची मंदिरे होयसाळ राजांनी बांधलेली होती. हे राजे अत्यंत वैभवशाली असून शिल्पकलेचे ते सुवर्णयुगच होते. तर ही टोकाची मंदिरे पेशवेकाळातली आहेत. बहुधा पेशव्यांनी किंवा त्यांच्या सरदारांनी बांधलेली असावीत. खुद्द पेशव्यांना तर पैशाची कायमच चणचण भासे तसेच मधल्या काळातल्या इस्लामी आक्रमकांमुळे इथल्या शिल्पकलेचा तसा र्‍हासच झाला होता.

इनिगोय

आणि मग होम्स म्हणाला, "एलिमेण्टरी, माय डिअर वॅटसन!"

होम्सने स्पष्ट केल्यावर सगळं कसं सोपं वाटतं, अगदी तसेच तुझ्या लेखणीतून आले की हे तपशील नीट समजत जातात!

कितीतरी नव्या गोष्टी कळल्या याही लेखातून :)

चौकटराजा

कोणत्याही प्रदेशातील शिल्पाकृती यावर सर्वात जास्त प्रभाव स्थानिक दगडाचा असतो. पहा मायकेल एंजेलो याने केलेली इटालियन मार्बल मधील शिल्पे व आपल्याकडील राजस्थानी मार्बल मधील जैन शिल्पे. तोच फरक महाराष्ट्र व कर्नाटकातील
शिल्पकृती मधे दिसून येतो. महाराष्ट्रातील बेसाल्ट व कर्नाटकातील ग्रानाईट यांच्या गुणवत्तेत मुळात फरक आहे. बेसाल्ट पेक्षा ग्रानाईट हा अधिक शिल्पयोग्य टणकपणाने बनलेला आहे. कर्नाटक हे ग्रानाईट व फरशी या दगडांचे माहेरघर आहे असे म्हटले तर गैर होणार नाही. (त्यासाठी हिरापन्ना हा चित्रपट पहावा.) मी बेल्लारीचा किल्ल्ला पाहिलेला नाही पण आपलेकडील किल्ला व बेल्लारीचा किल्ल्ला यांच्यातील गुणात्मक फरक दिसून येईल याची खात्री आहे.ग्रानाईट इज ग्रानाईट!

चौकटराजा

कोणत्याही प्रदेशातील शिल्पाकृती यावर सर्वात जास्त प्रभाव स्थानिक दगडाचा असतो. पहा मायकेल एंजेलो याने केलेली इटालियन मार्बल मधील शिल्पे व आपल्याकडील राजस्थानी मार्बल मधील जैन शिल्पे. तोच फरक महाराष्ट्र व कर्नाटकातील
शिल्पकृती मधे दिसून येतो. महाराष्ट्रातील बेसाल्ट व कर्नाटकातील ग्रानाईट यांच्या गुणवत्तेत मुळात फरक आहे. बेसाल्ट पेक्षा ग्रानाईट हा अधिक शिल्पयोग्य टणकपणाने बनलेला आहे. कर्नाटक हे ग्रानाईट व फरशी या दगडांचे माहेरघर आहे असे म्हटले तर गैर होणार नाही. (त्यासाठी हिरापन्ना हा चित्रपट पहावा.) मी बेल्लारीचा किल्ल्ला पाहिलेला नाही पण आपलेकडील किल्ला व बेल्लारीचा किल्ल्ला यांच्यातील गुणात्मक फरक दिसून येईल याची खात्री आहे.ग्रानाईट इज ग्रानाईट!

नानबा

माहिती आणि फोटु लय म्हंजे लयच भारी. चवथ्या फोटुतल्या नंदीवरचं कोरीव नक्षीकाम कसलं भारी आहे राव. हे शिल्प कठीण दगडात न कोरता मऊ विट किंवा त्याहूनही मऊ लोण्याच्या गोळ्यावर कोरावं इतकं सुबक कोरलंय.. वल्ली साहेब, खूपच मस्त.. या ठिकाणी न जातासुद्धा अगदी जाऊन आल्याचा अनुभव आला.. :)

पाषाणभेद

आपण एखादा कार्यक्रम पहायला जावे अन तेथे भली गर्दी असावी. आपली बसण्याची जागा थेट पाठीमागे असावी. तेथून कार्यक्रमात नाचणार्‍या नर्तीकांचे चेहेरे (किंवा खेळाडूंचे (क्रिकेटचा मला तिटकारा असल्याने तो शब्द टाळलाय.)), हावभाव, खेळ अजिबात दिसू नये. केवळ आवाज येतो त्यावर समाधान मानावे. मग थोडी चांगली जागा पाहून तेथील मैदानात लावलेल्या मोठ्या टिव्ही पडद्याकडे पहावे. तेथेच जास्त स्पष्ट दिसते पण ते केवळ कॅमेरामनच्या अँगलने. मग या पेक्षा घरी टिव्हीवर तो कार्यक्रम पाहणे काय वाईट?

असलीच स्थिती आता वल्लींचे लेख, फोटो अन वर्णन पाहून होते. आम्ही त्या त्या ठिकाणी काही जावू शकत नाही पण घरबसल्या अचूक वर्णने असलेली लेखमालिका वाचून मन प्रसन्न होते. मोठा व्यासंगी प्रयत्न आहे हा.

आपण एखादे पुस्तक जरूर लिहा जेणेकरून पुढेमागे तो ऐतिहासीक खजीना होईल. (नाहीतरी पुराणकालीन वास्तूंची देखभाल कशी करावी हे आपणा भारतीयांना चांगलेच समजते. :-) )

हासिनी

सुंदर छायाचित्रांसह सुंदर माहिती!

अग्निकोल्हा

अशी सचित्र माहिती सहज सोपी आणि मनोरंजक बनवण्यात इथे फक्त तुम्हीच!

तुमच्या व्यासंगाला सलाम .

च्यायला, हा वल्ली बोलतो कमी आणि लिहितो लै भारी.

कमलेश्वरची एक हिंदी 'बयान' नावाची खूप सूंदर कथा आहे, त्या कथेचा नायक आत्ता आठवला. त्या कथेचा नायक फोटोग्राफर आहे, एकदम भलत्या रोम्यांटीक मूड मधे आला की तो आपल्या बायकोकडे एक डोळा बंद करुन नुसता टक लावून बघत असायचा. हा वल्ली असाच आहे. :)

शिल्प पाहतांना या माणसाला सोबत असलेल्या माणसांचा विसर पडतो आणि एक डोळा बंद करुन क्याम्यार्‍याबरोबर हा एका अद्भूत जगात प्रवेश करतो आणि चित्र, शिल्प, यांच्याशी वल्लीशेठचा संवाद सुरु होतो. आणि आपल्यासमोर येतो असा जब्रा माहितीचा खजाना.

माझ्या गावापासून सात कि.मि. अंतरावर हे गाव आहे. टोका हे गावाचं पूर्वीचं नाव. नदीच्या पात्रात असलेलं गाव सततच्या पुरामुळे उठलं आणि त्याचं एक नवं कायगाव आणि जुन कायगाव अशा नव्या गावात रुपांतर झालं. आणि हे जे मंदिर आता आहे, ते प्रवरासंगम या गावाच्या हद्दीत येतं. [आमचा गाववाला मन याने जी पौराणिक कथा सांगितली त्याचाही संदर्भ इथे आहेच.

सतराशे साठ वेळा हे मंदिर पाहिलं आहे, कधी तरी याच्यावर धागा टाकावं असं मनातही आलं आहे. आज धागा वाचल्यावर मी इतकं बेष्ट आणि माहितीपूर्ण लिहू शकलोच नसतो असे वाटते.

वल्लीशेठ, मनःपूर्वक आभार.

-दिलीप बिरुटे

मोदक

च्यायला, हा वल्ली बोलतो कमी आणि लिहितो लै भारी.

लै लै लोकं सहमत होतील या वाक्याला. :-D

प्यारे१

वल्ल्यानं दोन तीन वेळा असंच केलेलं आहे.

वृत्तांतामध्येच तो अधिक फुलतो असे स्पष्ट मत आहे.
वल्लीची मयतरिण देखील प्रत्यक्ष भेटीपेक्षा वृत्तांताचीच जास्त वाट पाहते असं ऐकिवात आलं आहे. :)

अ‍ॅज युज्वल ढासू माहिती..!
आमच्या वाईला या की वो एकदा. काशी विश्वेश्वराच्या देवळातला देखणा नंदी पहा.

ऋषिकेश

त्या शंकराच्या मंदीराच्या प्रवेश द्वारावर गणपती आहे का? (फटु ६)
असे कसे? जनरली सिंहमुख/व्याल असतो ना?

बाकी धाग्याबद्दल सुरेख याशिवाय शब्द नाही

प्रचेतस

त्या शंकराच्या मंदीराच्या प्रवेश द्वारावर गणपती आहे का? (फटु ६)

हो. गणपतीच आहे तो. मंदिर अर्वाचीन (पेशवे) काळातील असल्याने दरवाजावर गणेशपट्टीका कोरलेली आहे. गणेशपट्टीका शिवकाळापासून (कदाचित यादवकाळाच्या शेवटापासून) कोरली जाऊ लागली.
राष्ट्रकूट, चालुक्य, शिलाहार, यादव इत्यादी राजवटींमध्ये बांधल्या गेलेल्या मंदिरांत मात्र व्याल अथवा किर्तीमुखे कोरलेली दिसतात.

चिगो

ग्रेट, वल्ली.. अत्यंत सुंदर, माहितीपुर्ण चित्रलेख..

अभ्या..

वल्लीदादा खूपच छान ओळख करुन दिलीयस. फोटो पण अप्रतिम आले आहेत. खूप खूप धन्यवाद.
अवांतरः श्री सिध्देश्वर हा शिवाचा अवतार मानला जातो की कसे? आमचे सोलापूरचे श्री. सिध्दरामेश्वराचे मंदीर आहे पण श्री सिध्देश्वराचे मंदीर लातूर वगैरे बरेच ठिकाणाचे ऐकून आहे.

प्रचेतस

सिध्देश्वर हा शिवाचा अवतार मानला जातो की कसे

शिवाचे अवतार प्रचलित नाहीत तर शिवाची विविध रूपे प्रचलित आहेत. उदा. रूद्र, इशण, भैरव इत्यादी.
ईश्वर हा शब्द ईशान्येचा स्वामी ईशण (इशान्य दिशेचा संभाळ करणारा- थोडक्यात इशान्य दिशेचा पती/वर) याअर्थी आला असावा (असा माझा अंदाज).
कुठल्याही देवळाच्या नावात ईश्वर हा शब्द दिसला की ते मंदिर हमखास शंकराचेच आहे असे समजावे. उदा: कोपेश्वर, भुलेश्वर, रामेश्वर, अमृतेश्वर इ.

यशोधरा

सुरेख शिल्पे आणि माहिती. फोटो आवडले.

शुचि

आपले सर्व लेख खोदकाम करुन परत एकदा वाचून काढणार आहे. हा लेख अतिशय आवडला हेवेसांनल.

विसुनाना

औरंगाबादच्या ट्रीपच्यावेळी हे ठिकाण हुकलंच म्हणायचं... :(

लेख संग्राह्य आहे.

धन्या

आपले लेख वाचून वाचकांना इतका आनंद मिळतो. आम्ही तर प्रत्यक्ष तुमच्यासोबतच हे सारं पाहीलं आहे. त्याचा आनंद काय वर्णावा...

स्पा

आपले लेख वाचून वाचकांना इतका आनंद मिळतो. आम्ही तर प्रत्यक्ष तुमच्यासोबतच हे सारं पाहीलं आहे. त्याचा आनंद काय वर्णावा...

=)) =))

अगदी अगदी
लवकरच आम्ही "मौनाची भाषांतरे" लिहायला घेणार आहोत =))

सस्नेह

ही अशी शिल्पे निवांतपणे अन रुचीने पाहणे म्हणजे दृष्टीला एक सोहळाच आहे..

मिसळ

सुन्दर एक गुरुस्ती शिल्प क्र २५ हे कालिया मर्दन न वाटता कॄष्ण गोपिकांच्या साड्या/नेसू पळवून झाडावर बसला आहे त्या प्रसंगाचे आहे असे वाटते.

५० फक्त

मस्त रे, एक प्रश्न विचारावा असा विचार आला होता, पण मग विचार केला एक तरी संपाद्क असावा खोडी न काढलेला.

किसन शिंदे

एक प्रश्न विचारावा असा विचार आला होता

कुठलाही आडपडदा न ठेवता ह्या वल्ल्याला काहीही विचारावं, तो नक्कीच उत्तरं देतो. अर्थात हे मी फक्त शिल्पांच्या बाबतीत सांगतोय. बाकी आपल्याला काय ठावं नाय हा. ;)

दीपा माने

वल्लीराव, फोटो आणि बारीकसारीक शिल्पांपासुन मुख्य शिल्पांविषयीची माहीती वाचुन तुमचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच वाटते. मिपाकरांचे नशिबच थोर म्हणायचे.

स्पा

सुरेख रे वल्या
जबराट च लिहिलं आहेस.. फोटो तुफान
एकदा नक्की जायला हवं हे मंदिर पाहायला

तू इकडे आलास कि एकदा आपण अंबरनाथ शिव मंदिराला पण भेट देऊन येऊया :)

झकासराव

ऑस्सम्म्म्म... :)

मंदिरं कशी बघावीत ह्याची कार्यशाळा आहेत आपले लेख म्हणजे. :)

दंडवत.... :)

रुमानी

आपला अभ्यास ,निरीक्षण,आणि फोटु एकदम जबरदस्त ...!
बिरुटे सरांनी सागीतल्यानुसार घरापासून अतिशय जवळ व अनेक वेळेस पाहूनही आपल्या अभ्यासपुर्ण नजरेतुन बघताना खरच मस्त वाटले.

वल्लीरावांच्या लेखावर वरील प्रतिसाद वाचल्यानंतर म्या पामराने अधिक काही लिहिणे म्हणजे आचार्य अत्रे म्हणाल्याप्रमाणे ताजमहालला वीट लावण्यासारखे होईल. तरीपण धाडस करून एवढेच लिहितो कि www.yahoo.com वर archaeology म्हणून एक समुदाय आहे त्याचा सदस्य होऊन आपण हि लेखमाला तेथे टाकावी म्हणजे अमराठी बांधवांना सुद्धा अधिक कल्पना येईल. दुसरं असं कि टोका हा शब्दप्रयोग खटकतो. मूळ नाव बहुधा टोक असावे आणि ब्रिटीशांच्या कारकिर्दीत त्याचे टोका झाले असावे. जसं रायगड जिल्ह्यातील आमच्या खेडयाचे मूळ नाव पळस्पे आहे पण कागदोपत्री त्याचं पळस्पा झालं.

राही

ह्या गावाचे नाव कधीकाळी 'टोके' होते का? टोकेकर आडनाव प्रसिद्ध आहे. पुण्यात मला वाटते पुष्कर्णीचा हौद (की बाहुलीचा?की दोन्ही एकच?) असलेला वाडा टोकेकरांचा होता.आपल्याकडे गेल्या पन्नास-साठ वर्षांत नपुंसकलिंगी 'ए'कारान्त ग्रामनामे 'आ'कारान्त झाली आहेत.जसे पळसपे-पळसपा,पारले-पारला,दिवे-दिवा,कळवे-कळवा,आपटे-आपटा,कारले-कारला,रोहे-रोहा,येरवडे-येरवडा इ. लोणावळा हे नाव लोणावळे असे लिहिलेले एकोणिसाव्या शतकात छापलेल्या पुस्तकात वाचलेले आहे. अंबाजोगाईचे नाव आताआतापर्यंत आंबेजोगाई होते.मला वाटते राजवाड्यांच्या एका लेखात 'जोगाईचें आंबें' असा उल्लेखही वाचला आहे.

किसन शिंदे

संपुर्ण मंदिरासोबत त्यातली प्रत्येक शिल्पं न शिल्पं अद्भुत होती. इतकं जबरदस्त कोरीव काम मी ह्या आधी कुठेही पाहिलं नव्हतं. आणि वर वल्लीने सांगितल्याप्रमाणे विष्णू मंदिरावर मागच्या बाजूस असलेल्या माकडांची शिल्पं खरचंच अप्रतिम होती. खट्याळपणाची पुरेपूर झाक त्यांच्या हसण्यातून दिसत होती.

सुहास..

झक्कास !!

आवडेश !!!

वल्लीसेठ, आज काही मित्र मैत्रीणींबरोबर या मंदिरात गेलो होतो, आपली आणि धाग्याची आठवण नाय आली तर नवलच.
बाकी, या मंदिराबाबत अजून तुम्ही माहिती सांगणार होता ना ?

-दिलीप बिरुटे

प्रचेतस

काय सर, गंमत करताय गरिबाची, तुम्हालाही माहिती आहेच की ह्या मंदिराची.

येऊ द्यात वर्णन आणि छायाचित्रे.

आमच्या तालूक्यात अहिल्याबाईंच्या बारवा खूप प्रसिद्ध आहेत. आणि ही मंदिरं अहिल्याबाईंनीच बांधली अशी समजूत आहे. पण, आपलीच चर्चा झाल्याचे स्मरते की हे मंदिर सावकार विष्णू महादेव गद्रे यांनी १७६७ साली बांधले तेव्हाचा खर्च म्हणे ९३००० हजार होता. आज त्याची किती किंमत असेल काय माहिती. नंतर याच मंदिराची डागडुजी करुन नाना फडवणिसांनी नदीपासून मंदिराकडे येणार्‍या पायर्‍यांचे काम केले असे म्हणतात. (संदर्भ नाही). बाकी माहितीसाठी गॅझेट पाहिले पाहिजेत.

बाकी, मंदिराच्या ठिकाणी खूप उशिरा पोहोचलो. अंधार पडायला आलेला होता त्यामुळे फोटो काढता आले नाहीत. मोबाईल क्यामेर्‍याने काय फोटो येणार. आता अनेक मित्रांबरोबर इकडे येतच असतो. अजिंठा, वेरुळ दूर पडतं. मित्रांना इथे ताजे मासे खाऊन रवाना करता येतं. बाकी, धाग्यातीलच माहिती मित्रांना सांगितली.

IMG_20150919_180859IMG_20150919_181030

-दिलीप बिरुटे

पाटीलभाऊ

अतिशय सुरेख वर्णन आणि फोटो.
मंदिराच एवढ सविस्तर वर्णन पहिल्यांदाच वाचतोय.
मस्त...!

महासंग्राम

वल्लीशेठ तुफान अगदी.... या आधी भटकतांना मंदिर पहायचो शिल्प दिसायची पण नेमकं काय ते समजत नसे. तुमचे लेख वाचायला लागल्यापासून.. अशा गोष्टींकडे बारकाईने पहायला लागलो आहे. रच्याकने इस बात पे एक मंगता है.

मुक्त

+1
असेच बोलतो.

राक्षस/दानवांच्या शिल्प हे ख्रिश्चनांच्या पुराणकथांमधल्या डेमन/सैतान स्टाईल वाटत आहे. का सरसकट प्राचीन हिंदु शिल्पांमध्ये दानव हा प्रकार अश्याच पध्दतीने दाखवला जातो.? बाकी वल्लींचा लेख म्हणजे घरबसल्या फुकटची पण श्रीमंत भटकंती हेवेसांनल.

तुमचे देऊळ वाचणे प्रचंड जास्त आवडते नेहमीच, त्यात तुम्ही अनवट ठिकाणी भटकंती करता ते ही आवडते/आवडले प्रचंड :)
. सुंदर शिल्पे अन दरवाज्यांवर शेंदूर, ऑईलपेंट, फुले-पेढे वगैरे चिकटवून कलेला आणलेली (भोळ्या भावाने का होईना) हिडीस कळा, अस्वस्थ करून जाते प्रचंड :/ .

पामर

१.काही ठिकाणी मत्स्यावतारात विष्णूने शंखासुराला मारले असे मानतात तर भागवतपुराणात त्यानी हयग्रीव नावाच्या असुराला मारले अशी कथा आहे
३८.पश्चिम दिशेचा स्वामी वरुण असेल तरी वरुणाचा पाश कुठेच दिसून नाही,जपमाळ जपमाळ ,अंकुश, गदा/दंड कमंडलु आहेत, वाहन हत्ती असल्यानी हा वरुण नाही तर बृहस्पती वाटतोय.
४१. मधे निऋतीच दाखवला गेला आहे, अथर्ववेदात हा निऋती स्त्री देवता आहे त्यामुळे तिचे नावही. ही मृत्यू आणि दुर्भाग्याची देवता आहे पुढे सगळेच दिक्पाल पुरुष असल्यानी तिलाही पुरुष केले गेले. निऋतीचे वाहन बघितले तर ती नरवाहना म्हणजे प्रेतावर बसलेली आहे ह्या शिल्पात देखील पायाशी एक माणूस दाखवला आहे.
४२. मधे वायू आहे पण त्याचे वाहन बैल नसून हरीण आहे.वायू वेगाने वाहणारा असल्याने आणि शीतलता देणारा असल्याने त्याला सोम-चंद्राशी जोडले गेले आणि त्यामुळे दोघांची वाहने देखील गॅझेल-हरणं आहेत.
४४. मधला ईशान हा मुळात कधीच रुद्र नव्हता,पौराणिक काळात त्याला शिवाचेच रूप मानले गेले.ईशान हा पाच महाभुतांपैकी-आकाश तत्वाचे प्रतीक असल्यानी घरात देवघर ईशान्य कोपऱ्यात करावं असा वास्तू शास्त्राचा निर्देश आहेत.
४५. मधे कुबेराचे वाहन मकर नसून मुंगूस आहे. यक्षराज कुबेर लक्ष्मीचा सोबती असल्याने, आपल्याकडे मुंगसाला देखील गुप्तधनाच्या राखणदार मानले गेले आहे.अनेकदा मात्र कुबेराला देखील नरवाहन म्हणजे माणसांनी खांद्यावर उचललेला असतो. माणूस पैशाचा गुलाम हे किती पूर्वीपासून लोकं सांगत होते.
४८. हे शिल्प भवानीचे आहे, चामुंडा हे संपूर्ण हाडाचा सापळा असतो,सापळ्यावर फक्त कातडं, खोबणीत गेलेले डोळे, विवस्त्र, हाती नरमुंड असा साधारण तिचा अवतार असतो. हे शिल्प शुंभ-निशुंभाला मारणाऱ्या भवानीचे आहे. हि कथा खूप फेमस होती.
५३. नारसिंही ही सिंहमुखी दाखवली नाहीये हे अजून एक विशेष!

बाकी फोटो अप्रतिम!लहान तोंडी मोठा घास घेतला असेल तर कान धरा.

प्रचेतस

धन्यवाद तुमच्या सविस्तर प्रतिसादाबद्दल.

१.काही ठिकाणी मत्स्यावतारात विष्णूने शंखासुराला मारले असे मानतात तर भागवतपुराणात त्यानी हयग्रीव नावाच्या असुराला मारले अशी कथा आहे

शंखासुराची ही कथा मला नवीन आहे. बाकी हयग्रीव हा असुर नसून खुद्द विष्णूचाच एक अवतार मानला जातो. हयग्रीव अवतारात विष्णूचे मुख हे घोड्याचे असते. हय-घोडा, ग्रीवा-मान

३८.पश्चिम दिशेचा स्वामी वरुण असेल तरी वरुणाचा पाश कुठेच दिसून नाही,जपमाळ जपमाळ ,अंकुश, गदा/दंड कमंडलु आहेत, वाहन हत्ती असल्यानी हा वरुण नाही तर बृहस्पती वाटतोय.

इथे वरुणामध्ये माझी गल्लत झाली खरी. ३८ क्रमांकाचे शिल्प वरुणाचे नसून इंद्राचे आहे कारण हाती अंकुश आहे आणि वाहन हत्ती, ४३ व्या क्रमांकाचे शिल्प कुबेराचे आहे कारण हाती धनाची पिशवी किंवा मुंगूस आहे. कुबेराची नंतरची बरीचशी शिल्पे वाहन हत्तीसह दाखवतात. आणि ४५ क्रमांकाचे शिल्प हे वरुणाचे आहे मारणं वरुणाचे वाहन हे मगर.
क्र. ४२चे शिल्पाचे, वायूचे वाहन हरीणच. वाहन आधी नीटसे ओळखू ते नव्हते.

४८ क्र. चे शिल्प देखील भवानीचेच. त्या मंदिरावर ह्या शिल्पसमूहात असलेली उतार सर्व शिल्पे ही मातृकांची असल्याने हिला चुकून चामुंडा समजले गेले.

तुम्ही ह्या विषयांवर अवश्य काही लिहा. वाचायला आवडेल.

पामर

शंखासुराची ही कथा मला नवीन आहे. बाकी हयग्रीव हा असुर नसून खुद्द विष्णूचाच एक अवतार मानला जातो. हयग्रीव अवतारात विष्णूचे मुख हे घोड्याचे असते. हय-घोडा, ग्रीवा-मान

मत्स्य पुराण व विष्णू पुराणातली अशी गोष्ट आहे- पंचजन शंखासूर हा दैत्य खोल समुद्रात एका प्रचंड शंखात राहायचा. त्याने ब्रह्मदेवावर हल्लाकरून वेद पळवले आणि तो समुद्रात जाऊन लपला. वेद निघून गेले म्हणजे जगात बोंबाबोंब झाली. त्यावेळी विष्णू ने मत्स्य अवतार घेतला आणि त्या दैत्याचा वध केला व ब्रह्म्याला वेद परत आणून दिले. त्याचे घर जो शन्ख त्याने विश्वकर्म्याकडून दुरुस्त करून वापरायला घेतला. पंचजन पासून मिळवलेला म्हणून विष्णूच्या शंखाला पांचजन्य म्हणतात. ही कथा गोवा-कोकणात दशावतारी नाटकात फेमस आहे. कधी दशावताराची'आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्मा' ही आरती ऐकली असेल तर त्याच्या पहिल्याच कडव्यात ह्या कथेचा उल्लेख आहे. फक्त गंमत अशी कि बऱ्याचवेळा ही कथा कृष्णाची म्हणून पण सांगितली जाते.
आता हि कथा शतपथ ब्राह्मणात थोडी वेगळी सांगितली आहे. त्यात मत्स्याला प्रजापती ब्रह्मदेवाचा अवतार मानले आहे. आता अजून एक गडबड म्हणजे भागवत पुराणात अशीच एक हायग्रीवाची कथा आलेली आहे. विष्णूने मत्स्य अवतारात हयग्रीव-नावाच्या घोड्याच्या तोंडाच्या दानवाला मारले आणि त्याने चोरलेले वेद परत आणले अशी काहीशी ती कथा आहे. पण पुढे हाच हयग्रीव साधारण इसवीसनपूर्व २००० च्या आसपास विष्णूचा एक अवतार मानला गेला आणि त्यामुळे मग 'रसातळाला' गेले वेद त्याने ब्रह्म्याला परत आणून दिले आणि मग म्हणून तो ज्ञानाचे प्रतीक झालेला दिसतो. इतकेच नाही तर शाक्त परंपरेत त्याला विष्णूच्या मुख्य दशावतारात स्थान दिले गेलेले आहे आणि त्याने शंखासुर नाही तर मधू-कैटभ या दैत्यांना मारून वेद परत आणले अशी गोष्ट आहे. त्यावरून त्याला-विष्णूला मधुसूदन -मधू दैत्याचे सुदन/त्याला बदडून काढणारा असे नाव आहे. खूप गडबड आहे आपल्याकडे. अश्या काही विषयावर जरूर लिहायला आवडेल मला. धन्यवाद!

अफलातुन माहिती. खूप अभ्यासपूर्ण. दगडी मुर्त्या बोलक्या केल्यात.

अजून काही माहिती जोडतो. मंदिराची नाही पण त्या संदर्भातली माहितीत बदल असल्यास नक्की सांगणे.
१.हे ठिकाण पेशव्यांच्या पुजार्यांचे (दीक्षित) यांचे महाराष्ट्रातील मूळ स्थान व नंतर ते नाशिक ला स्थाईक झाले.
२.मंदिरामागे गोदावरी व प्रवरा संगमावर बांधलेला घाट अत्यंत सुंदर आणि भव्य आहे. तो नाना फडणवीस यांनी बांधून घेतला व मेणवलीच्या कृष्णेच्या घाटापेक्षा अंदाजे तीनपट मोठा आहे. धरणातील गाळाने फक्त अर्धवट पाहता येतो.
३. बाजीरावांने इथून जवळच ऐतिहासिक पालखेडच्या लढाईत निजामांना धूळ चारली व मुंगी शेवगाव येथे तहात छत्रपती शाहू हे एकमेव मराठा राजे आहेत हे मानण्यास, तसेच आर्थिक देवाण घेवाणीचे काही अटी मान्य करून घेतल्या. (नुकत्याच बाजीराव मस्तानी या चित्रपटात याचा अतिशयोक्तीपूर्ण प्रसंग आहे )
४. याच तहात निझामांनी कायगाव टोका याला संरक्षण देण्याची हमी दिली असे म्हणतात. याच बरोबर वेरूळ येथील कैलासलेणे जपण्याची व सांभाळण्याची तजवीज पेशव्यांनी करून घेतली. त्यामुळेच ऐन निझामीत हि स्थळे सुरक्षित टिकली.
५.निझामाने कैलासलेणे संवर्धनासाठी वेगळे अधिकारी नेमले होते व हेच भारतातील पहिले राज्य होते जेथे पुरातत्व खाते निर्माण झाले व आजच्या पुरातत्व खात्याची ती पायाभरणी असावी.
वरील मुद्दा क्र ४ व ५ याचा लिखित पुरावा मला तरी मिळालेला नाही परंतु अनेक जेष्ठ मंडळींनी हि माहिती सांगितली आहे म्हणून आपल्यापर्यंत पोहोचवत आहे. माहितीत सुधारणा असल्यास जरुर सांगणे.
https://en.wikipedia.org/wiki/Battle_of_Palkhed

मनो

4 व 5 बरोबर वाटत नाही. पुरावे शोधून देतो.

माझ्या स्मरणाप्रमाणे 1765 मध्ये निजामाच्या स्वारीत (ज्यात पुणे लुटले) या मंदिरांना उपद्रव झाला.

1767 मध्ये गद्रे सावकार यांनी हे मंदिर बांधले / जीर्णोद्धार केला असा शिलालेख मंदिरात होता.

हे मंदिर निजामाच्या राज्यात नसून पेशव्यांच्या मुलुखात होते त्यामुळे पाचवा मुद्दा बरोबर वाटत नाही

यावर खरच संशोधन करावे.
मला इतिहासील फारसी माहिती नाही.त्यामुळे मी यावर काही न बोलणेच बरे.
दखल घेतल्याबद्दल धन्यवाद !

टर्मीनेटर

"लेख वाचनातून सुटला होता."

असेच म्हणतो 'सुंदरच. एकदा जायला(च) हवे.'

नसून खजिना असतो.

प्रवरा संगमावरून अनेकदा गेलो आहे पण मंदिर बघीतले नाही.

अपश्चिम

५-६ वर्षांपूर्वी जाण्याचायोग आला होता , पण त्यात एव्हढे बारकावे असतील हे नाही लक्ष दिले . आता पुन्हा जाऊन अवे असे मनी आहे