जनातलं, मनातलं

क्या पांचवी पास `इतने' तेज है?

Primary tabs

क्या पांचवी पास `इतने' तेज है?
हा काथ्याकूट नाही... एक अचानकपणे ठुसठुसणारं, जनातलं, आणि मनातलं, काहीतरी सांगण्याचा एक घाईघाईचा प्रयत्न...
काही लिहावं असं आज खरं तर अजिबात मनात नव्हतं. टीव्हीवर बराच वेळ सर्फिंग केल्यावर झी वर निरागस सुरांचं सारेगमप पाहिल. देवानं गळ्यात मध ओतून जन्माला घातलेल्या त्या मुलांचं सुरांवरचं प्रेम मनात पाझरत असतानाच कार्यक्रम संपला. सुरेशच्या `सुरमयी श्याम'चे सूर मंचावर घुमत असतानाच चुकून रिमोट दाबला गेला, आणि डोकं भणभणून गेलं... सुन्न झालं... बालपण हे निरगसतेचं दुसरं नाव असल्याची साक्ष देणारे हे गोड, मधाळ सूर कानात घुमत असतानाच, अवधूतचं एक वाक्यही मनावर कोरलं जात होतं... त्या वाक्यात काव्य नव्हतं, पण कवितेचा गोडवा होता. हे गोड सूर कानात घुमतच राहाणार, असा विचार करत असतानाच अवधूत त्या `लिटल चाम्प’ला म्हणाला, `आता घरी गेल्यावर झोपण्याआधी जर कान धुतले नाहीत, तर कानांना मुंग्या येतील'...या एका वाक्याला दाद देत मी चॅनेल बदललं, आणि सगळा मूड किर्किरा झाला...
त्या दुसर्‍या चॅनेलनं माझ्या मनातल्या बालपणाच्या निरगसतेचं वास्तवात विसर्जन केलंय. बालपणाची जगभरातली असंख्य रूपं टेलिव्हिजनमुळे आजकाल आपल्याला अवतीभवती दिसतात. परवा एका रिऍलिटी शोच्या निमित्तानं एक रूप आपल्याला अस्वस्थ करून गेलं. शाहरूखच्या `क्या आप पांचवी पास से तेज है?' शो मधून निरगस बालपणाचं दुसरं रूप डोकावत असावं... झी वरच्या `सारेगमप'मधले कोवळे, निष्पाप सूर कानात घुमत असतानाच इंडिया टीव्हीवर एक सनसनीखेज रिपोर्ट पेश होत होता, आणि या रिपोर्टनं निरागसतेचं बालपणाशी जोडलेलं नातं ताडकन तोडलं. `पाचवी पास प्रेग्नंट' असा काहीतरी मथळा असलेला हा `स्पेशल रिपोर्ट' इंडिया टीव्हीच्या ख्यातीला साजेसाच असेल असं आधी वाटलं, पण जोडीला काही मुलाखतीही दिसत होत्या... तेरा ते अठरा वरषाच्या मुलींमध्ये `प्रेग्नन्सी'चं प्रमाण वाढतंय, आणि, या `टीनएजर्स्'मध्ये गर्भपाताचं प्रमाण्ही वाधतंय, असा निष्कर्ष काढणारा हा रिपोर्ट काही वेळापूर्वी इंडिया टीव्हीवर अनेकांनी पाहिला असेल... या वयोगटातल्या मुली, आपल्या बॊयफ्रेंड्च्या बरोबर बिन्दिक्कत डोक्टरकडे जाऊन आपली `समस्या' सहजपणे माडतात, आणि त्यातून सोडवणूक करून घेतात, असं हा रिपोर्ट सांगतो. मुम्बई, लखनऊ आणि काही मोठ्या शहरांत केल्या गेलेल्या एका सर्वेक्षणाचा हवाला या रिपोर्टमध्ये दिला जात होता... लक्ष्मिपुत्रांच्या घरांत हे प्रमाण मोठं असल्याचा या सर्वेक्षणाचा दुसर निष्कर्श आहे, असं या रेपोर्टवरून वाटलं, आणि सुन्नसुन्न व्हायला झालं.
आपल्या देशातल्या `बालपणा'च्या अल्लड, लडिवाळ छटा आता `टीनएजर' पिढीमुळे अस्ताला चालल्यात... गर्भपातांचं प्रमाण अशा पिढीत वाढत असेल, तर त्याची नुसती चिंता करत बसणे पुरेसे आहे का, हे ठरवलं पाहिजे...स्त्री भ्रूणहत्या हा देशातला एक चिंतेचा विषय आहे. विवाहाचं कायदेशीर वय कमी करायला न्यायालयं अनुकूल असल्याच्या बातम्यांमुळे एक देशात मध्यंतरी एक वैचारिक मंथन झालं. आजही, मुलगी `वयात'- म्हणजे कायद्याच्या द्रुर्ष्टीनं विवाहयोग्य व्हायच्या आधीच,- आली, की लग्नं करून एका मोठ्ठ्या जबाबदारीतून मोकळं होण्याची मानसिकता अनेक आईबापांमध्ये दिसते. मात्र, समाजातल्या `कायद्याच्या बबतीत जागरूक असलेल्या' शहरी संस्क्रुतीतल्या धुमाकुळाचा नक्शा या सर्वेक्षणानं पार उतरवून टाकलाय...
समाजात काही चांगुलपणाची चिन्हं दिसताहेत, तोवर अशा समस्यांवर तोडगा निघू शकेल, असं मला वाटतं... या लेखनावर त्याच्या साहित्यिक गुणावगुणांची चर्चा होऊ नये. उलट, कदाचित, घाईघाईनं, एक `सणकी'मुळे लिहायला घेतल्यानं या समस्येचं भीषण रूप मांडण्यात मी कमीच पडलो असेन, असं मला वाटतय... महाजालाच्या रूपानं आपल्यासमोर आज वैश्विक व्यासपीठ तयार झालंय... थोडा वेळ अशा समस्या जगासमोर आणण्यासाठीही द्यावा, या भावनेतून हा प्रपंच!

अरुण मनोहर

>>>तेरा ते अठरा वरषाच्या मुलींमध्ये `प्रेग्नन्सी'चं प्रमाण वाढतंय,

टीनएजर्स तेज आहेतच. जोडीला काही आईवडील आपल्या मुलांकडे लक्ष पुरवण्यात सुस्त किंवा उदासीन असतात. काही आपापले करीयर यशस्वी करण्यात मग्न. काहींना वाटते आम्हाला जे मिळाले नाही ते स्वातंत्र्य आमच्या मुलांना मिळू दे. हीच प्रगती आहे अशी समजूत!

शितल

हे वाचुन मन सुन्न झाले खरे, पण आपणच आपल्या मुला॑ना ह्या गोष्टी पासुन परावृत्त करू शकतो काही प्रमाणात.
पण लहान वयातच जे रेकॉर्ड करायची रेस सुरू आहे त्यात ही गोष्ट तरी कशी मागे राहिल.

नीलकांत

खरं तर गेले कित्येक दिवस हा विषय मनात घर करून आहे. आजकाल सर्वांना मोठं व्हायची फार घाई झालेली आहे. आजची मुले आणि त्यांच्यासाठी असलेली अखंड ज्ञानाची उघडी दारे यामुळे त्यांना खुपश्या गोष्टींची फार लवकर जाण येते.

चेहर्‍यावरची एकमेवाद्वितीय अबोधपणाची झाक जेव्हा मेकअप खाली दडपण्याची धडपडसुरू झालेली दिसली की आत खोलवर वाईट वाटतं.

आता आताश्या चालायला लागलेल्या मुली जेव्हा ऊंच टाचांचा सराव करतांना दिसतात तेव्हा असं म्हणावसं वाटतं की अरे निदान शरीराचा विकास तरी होऊ द्या त्या आधीच का असले प्रकार करताय?

खरं तर बालपण म्हटलं की कसं सगळंच अमर्याद असतं. कल्पनाशक्ती ते आपला संचार सुध्दा. कुठेही जावं भटकावं. सारं जग आपलं. पायी भटकावं, सायकलींवर भटकावं. कुणी आपला नाही कुणी परका नाही. कुणी आपलं म्हणलं की तो दयाळू साधू आणि कुणी रागवलं की तो किल्ल्यातला राक्षस. अशी साधी वाटणी असते.

मात्र पुण्यात फिरतांना मात्र आता जाणवतं की प्रत्येकाला मोठं होण्याची घाई झालेली आहे.
अर्थात पुण्यात म्हणजे काही विशिष्ट ठिकाणीच जसे कॅम्प आदी भाग.
काही वेळा तर लहाण मुलींचा अवतार पाहून याला नक्कीच त्यांच्या घरच्यांची अनुमती असेल का? असा प्रश्न पडतो. असो....
मला काय वाटतेय याने या कुणाला कसला फरक पडतोय?

एक मात्र वाटतंय की बालपण ही आपल्याला देवाणे दिलेली अनमोल भेट आहे. ती जाणते - अजाणते पण हिराऊन घेणे चुकच. मग ते उच्चभ्रु समाजात वावरण्यासाठी असेल किंवा घरच्या जवाबदारीसाठी मजूरी करण्यासाठी.

आपला. ( लहानपणी भरपूर मस्ती केलेला, चिंचा -बोरं चोरल्यामुळे शाळेत मार खाणारा, सायकलवर मनसोकत हुंदडलेला, मारामारी... लहाणशी खुन्नस... खुपशी मैत्री यात मनसोक्त डुंबलेला... जरा उशीराच मोठा(?) झालेला...)

नीलकांत

ऋषिकेश

खरं तर बालपण म्हटलं की कसं सगळंच अमर्याद असतं. कल्पनाशक्ती ते आपला संचार सुध्दा. कुठेही जावं भटकावं. सारं जग आपलं. पायी भटकावं, सायकलींवर भटकावं. कुणी आपला नाही कुणी परका नाही. कुणी आपलं म्हणलं की तो दयाळू साधू आणि कुणी रागवलं की तो किल्ल्यातला राक्षस. अशी साधी वाटणी असते

वा काय बोललात नीलकांत!! झक्कास! जपुन ठेवावा असा प्रतिसाद!

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

उत्तम विषय आहे त्याचबरोबर नीलकांताचा प्रतिसाद पण उत्तमच आहे.

पुण्याचे पेशवे

नीलकांत

येथे एक बाजू लक्षात घ्यावी लागेल की इंडीया टिव्ही आणि इतर २४*७ वाले कुठल्याही गोष्टीची हॉट न्युज करण्यासाठी टपलेले असतात. विशेषतः ती बातमी जर खून, बलात्कार किंवा सेक्स संदर्भात असेल तर हे लागलीच आपल्या तज्ज्ञांचे(?) मत घेत "वहां क्या हो रहा है?" चा घोष चालवत असतात.

त्यामुळे हे सांगतात तशीच परिस्थिती सगळीकडे आहे असं नाही. मी वर नोंदवलेलं मत एका विशिष्ट भागतलं आहे. तो भाग पुण्यात आहे एवढं मात्र खरं. बाकी एवढ्यावरून मी जर का पुण्यातील बालपण नासले अशी बातमी दिल्यास ती जेवढी खरी असेल तेवढीच वरची बातमी खरी असेल असं वाटतं.

सोबत एक दूवा देत आहे त्यात याच इंडीया टिव्हीची एक ब्रेकींग न्युज देत आहे. येथे न देण्याचे कारण म्हणजे विषयांतर टाळने हे आहे.

दूवा

नीलकांत

नमस्कार,
तुम्ही जे लिहीले आहे ते अतिशय भयानक सत्य आहे पण खरं सांगू...
आता आपण हे बदलू शकत नाही हे सुद्धा तेव्हढंच विदारक सत्य आहे.
परिस्थिती आपल्या हाताबाहेर गेली आहे .
पाच वर्षापूर्वी ' लोकप्रभा ' मधे आलेला सर्व्हे : लक्षात घ्या पाच वर्षापूर्वी

मुंबई च्या नरिमन पॉइंट ; मरिन लाईन्स ; वाळकेश्वर आणि दादर च्या उच्चभ्रू वस्त्यांमधे गणेशोत्सव आणि नवरात्र या सणांनंतर
गर्भपाताचं प्रमाण नेहेमीपेक्षा ४५ % नी वाढतं.

आज काय परिस्थिती असेल याचा विचार करण्याची सुद्धा हिम्मत होत नाही.

हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

मुंबई च्या नरिमन पॉइंट ; मरिन लाईन्स ; वाळकेश्वर आणि दादर च्या उच्चभ्रू वस्त्यांमधे गणेशोत्सव आणि नवरात्र या सणांनंतर
गर्भपाताचं प्रमाण नेहेमीपेक्षा ४५ % नी वाढतं.

अगदी हेच आठवलं...

______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/