नास्तिक!
Primary tabs
प्रथमच सांगतो की मी एक नास्तिक माणूस आहे.
"प्रारंभी विनंती करू गणपती, विद्यादयासागरा...."
माझा मुलगा गजाननाच्या तसबिरीपुढे हात जोडून उभा असतो...
मी ही त्याच्या मागे उभा रहातो.
माझं मन आक्रंदून उठतं, " अरे तुझा विश्वास नाही या सगळ्यावर, सर्व थोतांड आहे ते!!"
मनाला न जुमानता नकळत डोळे मिटतात, मस्तक लवतं.....
काय जादू आहे ही?
पुन्हा सांगतो की मी पूर्ण नास्तिक आहे....
एका ब्राम्हणाच्या घरांत जन्माला आल्यामुळे सर्व ब्राम्हणी संस्कार झाले. पण माझा त्याला काहीच इलाज नव्हता. माराला भिऊन लहान मुलं काहीही शिकू शकतात......
नंतर मोठं होतांना असं लक्षांत आलं की ही आपल्या आजूबाजूची लोकं कुणाच्याही अन् कशाच्याही पाया पडतात.....
गावाच्या वेशीवरचा एक धोंडा, तो म्हसोबा, देव कसा होऊ शकेल?
आणि जर तेच लॉजिक वापरलं तर मग कोणतीही मूर्ती, मग ती दगडाची असो वा धातूची, देव कशी होऊ शकेल?
याऊप्परही जर त्या मूर्तीत देवत्व आहे असं मानलं, तर ती काढून नवी मूर्त बसवतांना,
"यांतु देवगणासर्वे, पूजामादाय पार्थिवे,
इष्टकामना प्रसिद्ध्यर्थं, पुनरागमनायचं!"
असं म्हणून तिचं विसर्जन कसं करता येईल?
मनांत विचारांचा नुसता कल्लोळ!!!
सगळं शालेय जीवन याच आंदोलनात गेलं.....
लहान असतांना मी बर्याच वेळा टिटवाळ्याच्या गणपतीला जात असे. आधी आई-वडिलांबरोबर आणि नंतर कॉलेजात असतांना कधी कधी एकटाही....
तेंव्हा ते देवस्थान आजच्याइतकं लोकप्रिय नव्हतं. चतुर्थी सोडुन गेलं तर मंदिरात एक पुरोहित आणि चार-पाचच भक्तगण असायचे. मंदिरही आजच्याइतकं मोठं नव्हतं. किंबहुना एका सरोवराकाठचं ते एक निर्जन मंदिर होतं.
गाभार्यात अथर्वशीर्ष म्हणत तासभर जरी बसलं तरी पुजारी बाहेर काढायची घाई करीत नसत. उलट अखंड अथर्वशीर्षाचं पारायण करणार्या भक्ताकडे कौतुकानेच बघत असत.....
आता टिटवाळ्याच्या गणपतीचे ते कमर्शियल रूप पाहिल्यानंतर तर तिथे देव नांदणे शक्यच नाही याची माझी खात्रीच पटलीय......
त्यानंतर माझ्या नशिबाने (चांगलं वा वाईट म्हणा!) मी सायन्सचा विद्यार्थी झालो......
स्वतःला पडताळा आल्याशिवाय, सर्वांनी पडताळून डॉक्युमेंट केल्याशिवाय कशावरही विश्वास न ठेवण्याची सवय अंगी लागली......
त्याचबरोबर आपल्याला जे दिसत नाही (एक्स रे, गॅमा रे, वगैरे) ते प्रत्यक्षात अस्तित्वात असू शकतं याची विनयपूर्वक जाणीवही झाली.....
आईवडिलांचं घर सोडून स्वत:चं घर स्थापन केल्यावर त्या नव्या घरात देवाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झालीच नाही....
आज जर मला विचाराल तर,
"जगात परमेश्वर आहे का?" याचं उत्तर मी असं देऊ शकेन की,.....
'असावा! कारण अजूनही जगात अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांचा सायन्सला उलगडा करता येत नाही....
या रॅन्डम विश्वातही अनेक पॅटर्नस दिसून येतात ते कशामुळे? त्या पॉवरलाच ईश्वर म्हणतात का?
पण जर ईश्वर असेलच तर तो एखाद्या मूर्तीच्या स्वरूपात तर नक्कीच असणार नाही. ती एक अमूर्त ऍबस्ट्रॅक्ट पॉवर असेल.......
माझ्यासारख्या एका क्षुद्र जीवाकडे लक्ष द्यायला त्याला मुळीच अवसर असणार नाही. मी त्याची प्रार्थना करीत आयुष्य घालवतोय की माझी कर्मं करीत जीवनकाल कंठतोय याला त्याच्या दृष्टीने काहीच महत्त्व नाही......
मुंग्यांच्या वारूळावर कुणी फ्लीट फवारल्यावर मरणार्या मुंग्या, आणि या अनंत विश्वाच्या पसार्यात मरणारा मी याच्यात त्याच्या दृष्टीने काहीच फरक नाही.....
मग कशाला ती मूर्तिपूजा आणि कशाला तो देव?
या जगात आपण एकटेच असतो! इथे आल्यानंतर आपल्या मानसिक सुरक्षिततेसाठी नातेसंबंध बांधतो, आई, बाप, भाऊ बहीण, बायको, पोरं, मित्र वगैरे.....
काही रक्ताच्या नात्याचे, काही मानलेले.......
पण आपण प्रत्यक्षात एकाकीच असतो! एकटेच जगतो आणि निघायची वेळ झाली की एकटेच निघून जातो!! इष्ट्मित्रांसाठी आपल्या तेराव्याच्या मिष्टान्नाची सोय करून....
जमेल तितक्या संतांची, महात्म्यांची शिकवण आणि त्यांची प्रत्यक्ष आयुष्यं अभ्यासून पाहिली....
आणि लक्षांत आलं ते हेच, त्यांनी आयुष्यभर काय वाटेल ते सांगितलं असेल, वाटेल तो उपदेश लोकांना केला असेल,
पण ते मर्त्य माणसांसारखेच जगले आणि मर्त्य माणसांसारखेच मेले......
जगाला मुक्ततेचा पाठ शिकवणारा गौतम बुद्धसुद्धा अपचन होउन गेला........
एकवचनी रामालाही शरयूच्या पाण्यात आत्महत्या करावी लागली.......
"अर्थशून्य भासे मज हा, कलह जीवनाचा,
धर्म, न्याय, नीती सारा, खेळ कल्पनेचा"
या सर्व विचारांतुन माझी नास्तिकता जन्माला आली.....
ईश्वराचं अस्तित्व मी नाकारीत नाही, पण मला स्वतःला अनुभव आल्याखेरीज मी त्यावर विश्वास ठेवणार नाही......
आणि जो मला त्याच्या अनुभव देऊ शकत नाही त्याला मी संत वा महात्मा मानू शकत नाही, मग तो वाटेल ती बडबड करीत असो.......
या भूमिकेत अनेक वर्षे गेली असतांनाच एक दिवशी बॉस्टनमधे माझ्या एका गुजराथी मित्राच्या घरी गेलो होतो. त्याच्याकडे भिंतीवर गजाननाची एक सुरेख प्रतिमा लावलेली होती. उत्तरेकडचा वा दाक्षिणात्य गणपती नाही तर एकदम अस्सल महाराष्ट्रीय गणपती!
"रत्नखचितवरा तुजगौरीकुमरा" पासून "रुणुझुणुती नुपूरे चरणी घागरीया" पर्यंत सर्व लक्षणे असलेला! मी आरती मनातल्या मनात म्हणून सर्व लक्षणे मोजुन पाहिली.....
मला अनिमिषपणे त्या चित्राकडे पहातांना पाहून तो मित्र म्हणाला,
"क्या पसंद आया? तुम्हारे महाराष्ट्रकाही गणेश है"
"बहुत बढिया पिक्चर है, लेकिन तुम्हें कहांसे मिला?" मी.
"तुझें क्या करना है, कहांसे मिला? लेकिन मेरे पास इसकी और एक कॉपी है, मंगता है तो लेके जाव..."
मी भारावल्यासारखी मान डोलावली......
ते चित्र घेउन घरी आलो आणि विचारात पडलो,
"काय केलं मी हे?"
माझा मूर्तिपूजेवर अजिबात विश्वास नाही. त्यातही ईश्वर जर असलाच तर तो हत्तीचं मुख आणि मानवी धड या स्वरूपात असेल यावर तर काडीचाही विश्वास नाही. मग मी ही प्रतिमा का स्वीकारली?
असो. दिसतेय तर खास मूर्त, आपल्या भारतीय संस्कृतीची निशाणी असू देत म्हणून ती मी फ्रेम करून घेतली आणि शो-पीस म्हणून लिव्हिंगरूममध्ये एका भिंतीवर टांगली.....
माझ्या मुलाच्या आईचा देवावर विश्वास असल्याने तिने मुलाला संस्कार शिकवतांना तीच प्रतिमा वापरली. नाहीतरी घरात इतर देव नव्हतेच!!
आता मोठा झाला तरी अजूनही तो आणि त्याची आई त्याच मुर्तीपुढे हात जोडून उभे रहातात........
मुलखाचे अंधश्रद्ध नाहीतर!
मी मुळीच तसा उभा रहात नाही. मी माझी बुद्धीवर विसंबून रहाणं जास्त पसंत करतो!!
पण मग....
पण मग रोज सकाळी आंघोळ करुन झाल्यावर टॉवेलाने अंग पुसतांना नकळत माझ्या तोंडून,
"प्रणम्य शिरसां देवं, गौरिपुत्रं विनायकं, भक्तावाचं स्मरे नित्यं आयु:कामात सिद्धये..."
हे निघतं ते कशामुळे?.......
खूप विचार केला हे कोडं सोडवायचा! आणि सरते शेवटी या निर्णयाला आलोय!!
नसेल माझा कोणत्याही दैवतावर विश्वास! नसेन मी कुणाचाही भक्त!!
पण ही गणेशाची मूर्ती तर भावते ना मला? या गणेशमूर्तीचा चाहता तर आहे ना मी?
मग त्याचा मित्र बनायला तर काय हरकत आहे?
मी अजूनही एक पूर्ण नास्तिक मनुष्य आहे....
पण मित्रहो, या गजाननाचा मी एक स्नेही म्हणून स्वीकार केला आहे.......
(डिक्लेमरः वरील स्फुटात मांडलेले विचार हे सर्वस्वी माझे आहेत. वाचणारी व्यक्ती कायद्याने सज्ञान व स्वतःचा असा सारासार विचार करणारी असेल हे गृहीत धरून ती मांडले आहे. दुसर्या कोणालाही त्यातून काहीही संदेश, उपदेश द्यायची, काही पटवायची, वा कोणताही प्रचार करण्याची अजिबात इच्छा नाही!!!)
गजाननाला स्नेही म्हणून त्याचा अपमान केल्याबद्दल आपल्याला शिवी देतो: "गण गण गणात बोते".
- सर्किटगणू
"गण गण गणात बोते".
वा, तुम्हीही या शब्दसमूहाशी फॅमिलीयर आहात तर....
वाचून आनंद झाला...
वा डांबिसा,
अतिशय सुंदर व मनमोकळं प्रकटन रे! वाचून मस्त वाटलं! जियो...!
मुंग्यांच्या वारूळावर कुणी फ्लीट फवारल्यावर मरणार्या मुंग्या, आणि या अनंत विश्वाच्या पसार्यात मरणारा मी याच्यात त्याच्या दृष्टीने काहीच फरक नाही.....
अगदी खरं!
पण आपण प्रत्यक्षात एकाकीच असतो! एकटेच जगतो आणि निघायची वेळ झाली की एकटेच निघून जातो!!
अगदी खरं! अरे म्हणून तर मी आजपर्यंत लग्न केलेलं नाहीये! साला, आपण कुणाच्यात अन् आपल्यात कुणी गुंतून राहायला नको!
बस! कोण नाय पायजेल! ;)
इष्ट्मित्रांसाठी आपल्या तेराव्याच्या मिष्टान्नाची सोय करून....
हा हा हा! हे बाकी सही बोल्लास रे डांबिसा... :)
नसेल माझा कोणत्याही दैवतावर विश्वास! नसेन मी कुणाचाही भक्त!!
पण ही गणेशाची मूर्ती तर भावते ना मला? या गणेशमूर्तीचा चाहता तर आहे ना मी?
मग त्याचा मित्र बनायला तर काय हरकत आहे?
वा! अतिशय सुरेख विचार..! शेवटी, 'रूप पाहता लोचनी...' हेच खरं! तो पंढरीचा काळ्या असा रुपाने भुलवण्यातच माहीर आहे. काय असेल ते असो, आम्ही त्याच्या त्या कर कटावरी ठेवून विटेवरी उभ्या असलेल्या रुपाचेच चाहते आहोत! :)
वा! डांबिसा, खूप छान आणि मनमोकळं वाचायला मिळालं रे!
आषाढीच्या पूर्वसंध्येला वास्तव आणि भक्ति यांच्यात उत्तम समन्वय साधणारं काही चांगलं वाचायला मिळालं!
मनापासून आभार... :)
आपला,
(भक्तवत्सल) तात्या.
माझे विचार बरेचसे आपल्यासारखेच आहेत. पण मला असे वाटते की कोणाला जर या (काल्पनिक)आधाराची जरुर असेल तर तो त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. शेवटी मनःशांती मिळवणे हे महत्वाचे, ती कशी मिळवावी ते प्रत्येकजण मिळवायचा प्रयत्न करतो. एक मात्र नक्की, ह्याचा सार्वजनिक आविष्कार हा शांतिप्रिय नागरिकांना त्रासदायक ठरु शकतो.
कधी कधी असे वाटते की ,बरीचशी माणसे यांत गुंतलेली आहेत तेच बरे आहे. ते सर्वजण जर नास्तिक होऊन प्रत्येक गोष्ट , शास्त्रीय कसोटीवर तपासून पाहू लागले तर अनेक लोकांच्या पोटावर पाय येईल . तसेच देवाच्या भीतीने का होईना, जे आज चांगले वागायचा प्रयत्न करत आहेत त्यांचे प्रमाण कमी होईल आणि गुंडगिरी, हिंसा ही अधिकच वाढेल.
डांबिस खान , लेख नेहमीप्रमाणे आवडला. त्यातला थेटपणा तर भिडलाच , पण सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे , याबाबतीत स्वतःच्या भूमिकेपलिकडे उत्तरे अस्तित्वात असणे शक्य आहे, किंबहुना हे सर्व लिखाणच एक मुक्त चिंतन आहे , ही जाणीव विशेष वाटली. नाहीतर अशा विषयांमधे आपल्या विरुद्ध भूमिकेबद्दल लोक अतिशय कडवटपणे बोलतात , दुसर्या बाजूचे अस्तित्वच नाकारतात. हे तुम्ही टाळले आहे ; तेव्हढा विवेक नि प्रामाणिकपणा तुम्ही दाखवला आहे.
जे प्रश्न उभे केलेत ते सनातन आहेत, जन्मलेल्या प्रत्येकाला कधी ना कधी , कुठल्या ना कुठल्या पातळीवर जाणवलेले आहेत. कुणी त्या प्रश्नांना डावी घालून पुढे जातात, कुणी त्यातल्या एका उत्तराचा शांतपणे स्वीकार करतात, कुणी विचार करकरून दमून थांबतात, आणि अनेक लोक ज्या बाजूचा स्वीकार करतात ती बाजू त्वेषाने मांडत रहातात. कुणी ऐलथडी किंवा पैलथडी पोचू शकतच नाहीत.
मी या बाबीचा मला झेपेल इतपत कणभर विचार करतो तेव्हा मला वाटते की , देव धर्मादि संकल्पनांना आपण आपल्या तर्काच्या, विवेकाच्या आधारे नाकारूसुद्धा , पण या नकाराच्या आधी आपण जे होतो, जो लेप आपल्यावर चढला , त्याचे थरांवर थर गोळा झाले ते सगळे असे तर्काच्या एका फटकार्याने पुसून टाकले जाऊ शकत नाही. कुणाला एखाद्या स्तोत्रातले सौंदर्य आवडत असेल , कुणाला स्तोत्रा-मंत्रांच्या पलिकडे जी एक काही हजार वर्षांची संस्कृती खुणावत असेल. कुणाला या कर्मकांडांच्या मधे आपल्या एकेकाळच्या आप्तस्वकीयांच्या स्मृतींचा सहवास असेल.
गणेशाबद्दलच्या प्रेमाचे रहस्य उलगडणे फार कठीण वाटू नये. गणेशोत्सव म्हणजे प्रिय जनांचा सहवास , कर्मकांडांच्यापलिकडे असणारा जल्लोष. खुद्द गणेशाची संकल्पना सुद्धा प्रेमात पडावी अशीच. भारतीय मन आणि हत्तीच्या प्रतिकाचे काय घट्ट नाते आहे हा मानसशास्त्रीय संशोधनाचा विषय असावा.
नास्तिक्य/आस्तिक्य हे विषय गहनच. त्यातून नास्तिकाला आस्तिक्यातल्या काही गोष्टींबद्दल वाटणारी अनामिक ओढ हे तर अजूनही खोलातले पाणी.
तुमचा लेख सच्चा वाटला. माझ्या दृष्टीने हा त्याच्या यशस्वितेचा मोठा भाग.
असेच म्हणतो..
ह्या छान लेखाबद्दल अनेक आभार!
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
पिडा काकांच्या लेखनाइतकाच मुक्तसुनीत यांचा प्रतिसादही आवडला.
पिडा काकांच्या लेखनाइतकाच मुक्तसुनीत यांचा प्रतिसादही आवडला.
असेच म्हणतो.
होपफुली मला ह्याच विषयावर भविष्यात मुक्तक लिहायला जमावे.
२ सेकंद वाटले की हा विषय मी तर नाही ना लिहीला.. आपलं मत १०१% जुळलंय पिडांकाका. मी आमच्या खानदानातला एकमेव नास्तिक.
वडील रोज ३-४ आरत्या आणि गायत्री मंत्र म्हणून आजही सर्व देवांची पूजा करत असतात. त्यांनी लहानपणी बळेच ते मंत्रपठन आणि पुजापाठ करण्याचा आग्रह केला. मी त्यांना संत गाडगे बाबांचे बोल ऐकवायचो.. "देव माणसात असतो, देव्हार्यात नाही ! दगडाला शेंदूर फासून देवपन येत नाही. हे सत्यानारायन अन् बाकी सब झूट" मी माझ्या आई-बाबांना देव मानतो. मी परिक्षेला जाताना (आई मला देवाच्या पाया पड म्हणून आग्रह करायची) आईच्या पाया पडून जात असे. मी पक्का नास्तिक, पण कधीही कोणत्याही देवाचा अपमान करून कोणाच्या भावना दुखावण्याचा अधिकार कोणालाही नाही. वर कोणी तरी म्हटल्यामुळे, जगात नितीमत्ता कायम रहावी, देव, पापपुण्य , स्वर्ग-नर्क आणि अबोव्ह ऑल आत्मशांती यासाठी हा कंसेप्ट असावा असे वाट्टे. माणूस जेव्हा निराश होतो,त्याला काहीही सूचत नाही तेंव्हा तो देवाचा धावा करतो (अन् मी माझ्या आईचा ).
डांबिस काकांनी कोणाच्याही भावना दुखणार नाहीत अशा शब्दात लिहीलंय त्यामुळेच मी त्यांचा फॅन आहे
स्वगत : खविसा शिकलास का काही? कसं लिहावं ते ?
नास्तिक) कुबड्या खवीस
(आमच्या येथे अस्थी व दंत विमा आणि सायकल पंक्चर काढून मिळेल तसेच सर्व प्रकारचे मोबाईल-संगणक रिपेर* करून मिळेल. )
नोट : लग्न पार्ट्यांच्या ऑर्डरी स्विकारतो.
मला वाटतय की नास्तिक ह्याचा अर्थ 'ऍथेइस्ट' असा घेतला तर वरील विचारातुन लेखक ऍथेइस्ट वाटत नाही. हे लेखन म्हणजे 'ऍग्नॉस्टीक' (मराठी शब्द माहीत नाही!) व्यक्तिच्या मनातील घालमेल आहे.
-कोलबेर
ऍग्नॉस्टिक म्हणजे गब्बरच्या भाषेत "अब कहां गोली है , कहां नही , हमें नही पता ! हमें कुछ नही पता ! " किंवा गालिबच्या भाषेत " हम जहां हैं वहांसे हमकोभी कुछ हमारी खबर नही आती !" :-)
= अज्ञेयवादी (बहुतेक, चू. भू. द्या. घ्या.)
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर असे सांगणारी आणि इतरांच्या मते आस्तिकतेपेक्षा नास्तिकतेकडे झुकणारी मंडळी. परंतु माझ्यामते, जो पर्यंत पुरावा दिसत नाही तोपर्यंत गोष्ट आहे का नाही याबाबत ठाम न राहणारा माणूस... (माझ्यासारखा) ;)
वरील स्फुट तसे नाही. ही माणसाच्या संस्काराची, शिक्षणाची, अनुभवांची एकमेकांसोबत होणारी रस्सीखेच आहे. किंबहुना, लेखकाच्या जागृत मनाची धारणा आपण नास्तिक आहोत अशी असली तरी सुप्त मनात आपण नास्तिक नाही हे जाणवल्याने झालेली घालमेल वर व्यक्त झाल्यासारखी वाटली. अशा घालमेलींची, विशेषतः गणपतीच्या बाबत होणारी कारणे माझ्यामते अशी असावीत -
१. महाराष्ट्रातील गणपतीचे स्थान. घराघरांतून व्यक्त होणारी श्रद्धा आणि गणेशोत्सवाचे मोहक स्वरूप.
२. आई-वडिलांचा किंवा ज्येष्ठांचा गणेशावरील विश्वास आणि लेखकाचा आई-वडिलांवरील विश्वास.
३. गणपतीचे विद्यापतीचे रूप. "विद्यार्थी लभते विद्याम्|" - कोणाही सुसंस्कृत माणसाला भावणारं स्वरूप.
४. शिक्षण, प्रवास, अनुभव आणि इतर संस्कृतींमध्ये वावरल्याने स्वतःच्या मनाची होत जाणारी ठाम धारणा वगैरे.
याहूनही अधिक असावीत परंतु पिडांच्या मनोविश्लेषणाचा पुढला टप्पा पुन्हा कधीतरी. :)
आता माझे ठाम मत - या जगात कोणीही नास्तिक नाही. फक्त, प्रत्येकाच्या श्रद्धा वेगवेगळ्या ठीकाणी रूजू असतात.
असो, स्फुट आवडले. अतिशय प्रामाणिक वाटले.
प्रत्येकाची कशावरतरी श्रद्धा असतेच. तरी माझे स्वतःविषयी धोरण आहे की श्रद्धास्थाने कमीतकमी असावीत, आणि ज्या कल्पनांविषयी अनुभवाने बदल करता येतात अशा बाकी सर्व कल्पना असाव्यात.
श्रद्धास्थाने कमी करता करता जी काही इनमिनतीन श्रद्धास्थाने बुलंद राहिली आहेत त्यांच्याविषयी मी मागे एक लेख लिहिला होता (दुवा).
वर चतुरंग काही लोकांची विज्ञानावर श्रद्धा असते असे म्हणतात. माझ्या मते अशी कुठलीच श्रद्धा असू नये. विज्ञानातली प्रत्येक गोष्ट तपासून बघावी. ज्या गोष्टी तपासून घेणे सोयीचे नसते, किंवा कार्यबाहुल्यामुळे वेळ नसतो, त्यांच्यावर कुठल्याही "ऐकीव माहिती" इतपतच विश्वास ठेवावा. श्रद्धा मुळीच ठेवू नये. अशी कुठली श्रद्धा ठेवली तर मनुष्याच्या बुद्धिस्वातंत्र्याची हानी तर होतेच, पण विज्ञानाच्या मुळावरच घाव होतो. "बल", "अवकाश", "काळ" यांच्यासारख्या कल्पनांवरही फाजिल श्रद्धा ठेवू नये याविषयी मी अन्यत्र चर्चा केलेली आहे. (बल - दुवा१, दुवा२; काळ-अवकाश)
तरी माझे स्वतःविषयी धोरण आहे की श्रद्धास्थाने कमीतकमी असावीत,
असहमत आहे...!
आणि ज्या कल्पनांविषयी अनुभवाने बदल करता येतात अशा बाकी सर्व कल्पना असाव्यात.
श्रद्धास्थाने असल्याशिवाय कल्पनाविश्वदेखील समृद्ध होत नाही/होणार नाही!
आणि आपण अनुभवाने बदल करता येण्याबद्दल म्हणताय परंतु श्रद्धास्थानांशिवाय अधिकाधिक अनुभव कसा येणार? अनुभूती कशी येणार?
मी संगीतक्षेत्राबद्दल, विशेष करून ख्यालगायकीबद्दल बोलतो आहे!
तात्या.
> मी संगीतक्षेत्राबद्दल, विशेष करून ख्यालगायकीबद्दल बोलतो आहे!
इथे गुरूकडून ख्यालगायकी आदराने शिकावी असे म्हणत आहात ना? अर्थातच तुमच्याशी सहमत आहे.
कदाचित "अढळ श्रद्धास्थाने कमी असावी" असे मला म्हणायचे आहे. "अढळ" म्हणजे अनुभवानेही जी कल्पना बदलणार नाही.
जसे तुम्ही मागे मला उदाहरण दिले होते - भीमसेनांनी (म्हणजे त्याआधी खांसाहेबांनी) शंकर्यात कधी तीव्र मध्यम लावलेला आहे. पण तुम्ही तुमच्या प्रथम गुरूंकडून असे शिकला होता की शंकर्यात मध्यम वर्ज्य म्हणजे वर्ज्य! पण खांसाहेबांनी अधिकाराने लावलेला तो मध्यम अनुभवला की त्याला "चूक" म्हणायची कोणाची टाप आहे? आता या उदाहरणाला तुम्ही श्रद्धा म्हणता की अनुभव हे मला माहीत नाही.
पण त्या अनुभवानंतर "शंकर्यात मध्यम वर्ज्य म्हणजे वर्ज्य!" ही तुमच्या प्रथम गुरूकडून मिळवलेली श्रद्धा अढळ राहात नाही. अनुभवाने त्या श्रद्धेत बारीकसारीक दुरुस्ती होते : "खानसाहेबांच्या परंपरेत शिकलेला अधिकारी माणूस मध्यम लावू शकतो, त्यास चूक म्हणू नये." अशा प्रकारे तुमचे प्रथम संगीत-गुरू हे अढळ श्रद्धास्थान न राहाता एक आदरणीय मार्गदर्शक श्रद्धास्थान राहाते.
"आता तानपुर्याला षड्ज तरी लावावाच" हे तत्त्व अढळ आहे. आणि लावला तर पंचम नेमका "असा म्हणजे असाच" ऐकू येतो, हे तत्त्व अढळ आहे. पण माझ्यासारख्या "संगीत-ढ" माणसाच्या कानाला जर घसरलेला पंचम खटकत असेल, तर हे अनुभवाने तपासल्यामुळे अढळ (श्रद्धेमुळे नव्हे) तत्त्व मानण्यास हरकत नाही.
स्वगत : धनंजयने या विषयावर बोलू नये. त्या कुठल्याशा रेकॉर्डिंगमध्ये "अरे, हे तर काहीतरी मस्त आणि वेगळे" इतकेच अंधूक जाणवले होते. कोणीतरी "वेगळे काय - मध्यम लावला आहे" असे सांगेपर्यंत काय अचाट घडले त्याचा धनंजयला गंध नव्हता. पण तात्यांनीच ही मध्यमाची माहिती दिली आहे, त्यांच्यावर तेवढीतरी "श्रद्धा" ठेव, आणि दे उदाहरण ठोकून! केवळ षड्ज-पंचम लावता येणार्या बाळबोध अशिक्षित कानाबद्दल सांगून धनंजयने आपले संगीत-अज्ञान जगजाहीर केलेलेच आहे.
मी विज्ञानावर श्रद्धा असते असे म्हटले ह्याचा अर्थ विज्ञान जी नजर देते, अनुभवाचा उहापोह करण्याची, शक्याशक्यतांचे निराकरण करण्याची, विश्लेषक आणि तर्काची नजर देते त्यावर श्रद्धा असावी. पण त्याचा अर्थ गोष्टी तपासू नयेत असा होत नाही. नाहीतर ती अंधश्रद्धा ठरते. संगीत शिकताना गुरुवर श्रद्धा ठेवणे/असणे हे शिष्याचे काम असते त्याशिवाय शिक्षण शक्य नाही पण ह्याचा अर्थ गुरुचे ज्ञान तपासून बघूच नये असा अजिबात नाही कारण त्याशिवाय फक्त शिक्षण होईल प्रगती नाही. ते ज्ञान तपासून बघण्याची पात्रता येण्यासाठी मूळ ज्ञान हे श्रद्धेनेच घ्यावे लागते.
न्यूटनचे नियम तोकडे आहेत हे ठरवण्यापूर्वी आइनस्टाईनला ते श्रद्धापूर्वक समजावून घ्यावेच लागले असणार त्याशिवाय ते कुठे तोकडे आहेत हे कसे कळणार.
'श्रद्धेने बुद्धिस्वातंत्र्याची हानी होते' आणि 'श्रद्धेने विज्ञानाच्या मुळावर घाव बसतो' ही आपले विधाने धाडसी आहे असे मी म्हणेन.
आपण दिलेल्या दुव्यांवरील लेख मी वाचलेत. सर्व लेख अभ्यासपूर्ण आहेत. श्रद्धा आणि फाजील श्रद्धा (अंधश्रद्धा) ह्यात फरक आहे. बहुतेक कल्पनांवर आपण श्रद्धा ठेवूनच पुढे जातो, प्रत्येक गोष्टीला 'ऐकीव माहिती' असे समजून पुढे जाता येत नाही. आपल्या आयुष्यात आपण अशा किती कल्पना तपासून पाहू शकतो हा स्वत:लाच विचारण्याचा प्रश्न ठरु शकेल. जसजसे ज्ञानाचे, विचारांचे क्षितिज विस्तारत जाते तसतशा आधी बाळगलेल्या श्रद्धा मागे पडत जातात नव्या पुढे येतात हे आयुष्यभर चालू असते. श्रद्धास्थानांचे बुलंद असणे/नसणे हे ही व्यक्तिसापेक्ष असू शकते.
चतुरंग
कदाचित त्याच कल्पनेसाठी आपण दोन वेगवेगळे शब्द वापरत आहोत.
ज्याला तुम्ही "श्रद्धा" म्हणत आहात (म्हणजे न्यूटनचे म्हणणे गुरूकडून समजावून घेण्यापूर्वीची मनःस्थिती) त्यालाच मी "माहिती ऐकून घेणे" असे म्हणतो आहे. "ऐकीव माहिती" या माझ्या शब्दप्रयोगात कुठलाही अपमान किंवा कमीपणा दडलेला नाही. ऐकीव माहिती आणि पटलेली माहिती या दोहोंमध्ये हा फरक - नंतर दुसरे काही ऐकले तर आधीची ऐकीव माहिती बदलण्यास आपण तयार असतो. पटलेली माहिती बदलण्यास आपला तर्क चुकला हे कळावे लागते. (तिसरा प्रकार म्हणजे माझ्या ज्या थोड्या श्रद्धा आहेत, त्या बदलण्यास मी तयारच नाही. त्याही कोण्या गुरूंकडूनच मिळाल्या आहेत.)
"श्रद्धा असू नये" म्हणजे गुरूबद्दल अपमानास्पद भावना असावी असे माझे मुळीच मत नाही. गुरूबद्दल आदरच असावा. बालवाडीपासून अगदी कालपर्यंत वेगवेगळ्या गुरूंनी शिकवलेले असंख्य तपशील मी आजतागायत तपासून स्वतःला पटवून घेतलेले नाहीत. पण या वेगवेगळ्या गुरूंची काहीकाही वचने परस्परविरोधी आहे. तरी त्या सर्वांचे म्हणणे मी आदराने ऐकून घेतो (यालाच तुम्ही "श्रद्धेने शिकतो" असे म्हणत आहात का?) आणि कुठेतरी स्मरणात ठेवतो. इतकेच काय, सोयीचे असल्यास आचरणात आणतो. पण जोवर तपासून पटत नाही तोवर ही ऐकीव माहिती आहे, वाटल्यास पुढे कल्पनेत बदल होईल, असेच मानतो.
अनोळखी गावात गेलो, की कधी पानठेल्यावर विचारतो - अमुक गल्ली कुठे आहे, आणि ठेलेवाला सांगतो "अमुक खूण बघा, तमुक दिशेने वळा..." तसा अमुक खूण शोधतो तमुक दिशेने वळतो, - यालाच तुम्ही श्रद्धा म्हणत आहात का? मी याला ऐकीव माहिती म्हणतो - कारण पुन्हा पुढच्या नाक्यावर पत्ता विचारून मत बदलायला मी तयार असतो.
शालेय शिक्षण हे याच प्रकारचे असते. एक गुरू जे सांगतो ते ऐकायचे, लक्षात ठेवायचे (अमुक खूण बघ, तमुक दिशेने वळ) - पण पटेपर्यंत पुढचा कुठला गुरू दुसरे काही सांगेल तर तेही आत्मसात करायची तयारी असते. यालाच तुम्ही श्रद्धा म्हणत असाल तर मग आपण एकाच वस्तूबद्दल दोन वेगवेगळे शब्द वापरत आहोत.
माझ्या दृष्टीने अशा काही कल्पना आहेत, ज्या मी तपासण्याआधीच "बदलणार नाही" असे ठाम सांगतो - उदाहरणार्थ "माझ्यावेगळे अन्य विचारी लोक आहेत". (म्हणजे जर कोणी मला सांगितले की चतुरंगच काय सर्व-सर्व लोक माझ्या स्वप्नातल्या बाहुल्या आहेत, तर ते मी मुळीच मानणार नाही, ऐकूनच घेणार नाही. हां - अमुक एक आयडी स्वप्नातली बाहुली आहे, असे ऐकून घेण्यास तयार आहे.) त्या कल्पना "बदलणार नाही" असे मी ठाम म्हणत असल्यामुळे त्यांना ऐकीव माहितीपेक्षा वेगळे नाव देणे मला सोयीचे आहे. मी त्याला गृहीतक, ठाम पूर्वग्रह, किंवा श्रद्धा असे म्हणतो.
पण तुम्हाला जर "गुरुबद्दल आदर" या कल्पनेला "श्रद्धा" असे नाव द्यायचे असेल तर माझी काही ना नाही. तसे असल्यास मला माझ्या प्रत्येक गुरूबद्दल आदर/श्रद्धा आहे, आणि पत्ता सांगणार्या पानवाल्याबद्दलही आदर/श्रद्धा आहे. हा त्या "श्रद्धा" शब्दाचा सुळसुळाट आहे, आणि तो शब्द फारच गुळगुळीत/संदिग्ध होतो आहे, असे राहूनराहून वाटते.
श्रद्धा ह्या संकल्पनेचा थोडा विपर्यास होतो आहे. पानवाल्याला पत्ता विचारणे ह्यातून मिळणारी माहिती आणि एखाद्या गुरुकडून मिळणारे एखाद्या विषयातले ज्ञान ह्यांच्या पातळीतच फरक आहे असे तुम्हाला वाटत नाही का? २५ यार्डांच्या तलावात पोहोणे आणि इंग्लिश खाडी पोहून जाणे - दोन्हीही पोहोणेच आहे पण दोन्हीच्या पातळीत फरक आहे तसेच काहीसे. पानवाल्याच्या ठिकाणी माहीती ही फक्त माहिती (इन्फर्मेशन) असते. गुरुकडून मिळवायचे ते ज्ञान असते (नॉलेज) आणि त्याठिकाणी श्रद्धेचा संबंध येतो. गुरुने सांगितलेल्या कल्पना तुम्ही ऐकता. शंका उत्पन्न होतात. काहींचे निरसन होते काहींचे नाही. पण सुरुवातीपासूनच मी फक्त माहिती म्हणूनच ऐकत आहे मी श्रद्धा ठेवून ऐकत नाही हा ज्ञानमार्गातला अडथळा आहे असे मला वाटते.
श्रद्धेचा संबंध मनाशी जास्त आहे. मनावर बुद्धीचा अंकुश असेल तर श्रद्धा ही अंधश्रद्धा होण्यापासून वाचते. कारण श्रद्धा असूनही बुद्धी ही शंका विचारायला/प्रश्न उपस्थित करायला कचरत नाही. त्यामुळे पहिल्यांदा श्रद्धेने ऐकलेल्या कल्पना नंतर नवीन ज्ञानामुळे बदलायला बुद्धी मनाला तयार करते आणि नवीन श्रद्धा तयार होते.
एवढा फरक सोडला तर सर्वसाधारणपणे आपण दोघेही एकाच संकल्पनेसाठी ही चर्चा करीत आहोत.
चतुरंग
माझ्या मते श्रद्धेशिवाय या दुनीयेत काहीही करणे अशक्य आहे!
आणि जर ठाम श्रद्धा मनी असेल तर मानवाला काहीही करणे शक्य आहे! अशी अक्षरश: अनेक व्यक्तिंची उदाहरणे देता येतील. श्रद्धेविना सर्व काही व्यर्थ आहे असं माझं मत आहे!
मी अर्थातच डोळस श्रद्धेविषयी बोलतो आहे!
आपला,
(श्रद्धाळू) तात्या.
चतुरंग,
आपले विचार आवडलेत.
पण सुरुवातीपासूनच मी फक्त माहिती म्हणूनच ऐकत आहे मी श्रद्धा ठेवून ऐकत नाही हा ज्ञानमार्गातला अडथळा आहे असे मला वाटते. योग्य निष्कर्ष.
श्रीमहाराजांनी म्हटलेले आठवले - नामस्मरण करतांना अनेक शंका येतात. विश्वासाने मनापासून नाम घेत चलावे. हळुहळू शंकांची उत्तरे मिळून त्या दूर होत जातील.
आता श्रद्धा नसेल तर वरीलप्रमाणे वागणे अशक्य आहे.
पिडांकाका,
स्फुट खूप छान. आवडले.
मुमुक्षू
देव आहे की नाही ह्याचे ठोस उत्तर/सबळ पुरावा अजुन कुणालाच माहित नाही. ज्याला देव नसण्यापेक्षा देव असण्याची शक्यता अधिक वाटते तो आस्तिक/सश्रद्ध/भाविक बनतो. ज्याला दोन्हीपैकी कोणतीही बाजू सत्य असण्याची ५०-५० शक्यता वाटते ती व्यक्ती ऍग्नॉस्टिक असते (ह्यात देखिल देव नसण्याची/ असण्याची शक्यता किंचीत अधिक वाटते असे ऍग्नॉस्टिक देखिल आले.) नास्तिक माणूस म्हणजे जो देव ही संकल्पना अस्तित्वात असण्याची शक्यता इतकी कमी मानतो की आपले आयुष्य 'देव अस्तित्वात नाही' ह्या ऍझम्प्शन वरतीच घालवू इच्छीतो.
देव ही शक्यता नसून देव आहे मला माहित झाले आहे/किंवा देव अजिबात नाही मला माहित आहे ही दोन्ही अतिरेकी टोके देखिल दिसुन येतात पण बहुसंख्येने सुजाण लोक हे ह्या दोन्ही टोकांच्या मध्ये असतात.
नास्तिक म्हणजे ज्याची देव ह्या संकल्पनेवर श्रद्धा/विश्वास नाही तो.
'मी कधी ना कधी तरी लॉटरी जिंकेनच' ह्यावर श्रद्धा ठेवुन रोज लॉटरीची तिकिटे काढणारा माणूस त्याच्या ह्या श्रद्धेपायी आस्तिक ठरत नाही.
"सुखकर्ता दुखहर्ता" एक सांस्कृतिक वारसा आहे - त्यामुळे आरती म्हणताना लोकांत सामिल व्हायला मला आवडते.
बाकी ज्या वागणुकीने भावना, वेळ, पैसा, खर्च होणार असतो; किंवा अन्य लोकांचा वेळ आणि पैसा खर्च होणार असतो, त्या वागणुकीच्या बाबतीत मी शक्यतोवर अनुभवजन्य ठोकताळे वापरतो.
तसा मी ठार नास्तिक आहे. पण "'सुखकर्ता दुखहर्ता' एक सांस्कृतिक वारसा आहे - त्यामुळे आरती म्हणताना लोकांत सामिल व्हायला" मलाही आवडते. रिचर्ड डॉकिन्जच्या धर्तीवर मला सांस्कृतिक हिंदू (कल्चरल हिंदू) म्हणता येईल आहे.
अतिशय आवडला लेख डांबिसकाका.
आणि संतुलित प्रकटन. अतिशय आवडले.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
(सहमत)बेसनलाडू
वा ड्यांबिस काय भारी मुक्तक आहे (धनंजयाची शब्दरचना अगदी चपखल असते)
मी आणि माझा देव
आठवला . हे मुक्तक अतिशय प्रातिनिधिक आहे. अंधश्रद्धा निर्मुलन समिती कडे येणार्या कार्यकर्ता च्या मनात असेच प्रश्न असतात. 'मी खोटे बोलणार नाही कारण ते माझ्या देवाला आवडणार नाही' असे म्हणणारा ईश्वरनिष्ठ सश्रद्ध आणि 'मी खोटे बोलणार नाही कारण माझ्या सद्सदविवेक विवेक बुद्धीला ते पटत नाही' असे म्हणणारा अश्रद्ध हे मला एकाच पातळीचे वाटतात.
प्रकाश घाटपांडे
पिडां, लेख आवडला. तुमची घालमेल तुम्ही समर्थ पणे व्यक्त केली आहे. मला वाटते तुमची अवस्था पुलं सारखी आहे. ते सुद्धा नास्तिक (की ऍग्नोस्टीक म्हणू?) होते पण अतिशय भाविक / श्रद्धाळू होते. मला वाटतं श्रद्धा हा मनाचा मूळ पिंड असावा लागतो. आणि आपल्या भारतिय समूह मनाला तो वारसा जबरदस्त आहे.
बिपिन.
पिडा..उत्तम लेख...
आवडला...
घालमेल / चिंतन अप्रतिम...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
आधुनिक विज्ञानाच्या अंगाने जाणारी तर्काची दिशा (विज्ञानावरील श्रद्धा असेही म्हणता येईल) आणि पूर्वापार चालत आलेल्या आस्तिकतेतला हा संघर्ष आहे.
आपण देव मानत नाही कारण त्याच्या अस्तित्त्वाचा अजून कोणताही सबळ पुरावा नाही आणि त्याचवेळी देवाचा पुरावा मिळाला तर आपण ती गोष्ट कशी स्वीकारु ह्याबाबत मनाची घालमेल आहे.
कोणत्याही मोठ्या परीक्षेचा निकाल लागायच्या आधी मनाची जशी अवस्था असेल तशीच ही आहे असे मला वाटते. अमूक गुण मिळाले तर तमूक करियर निवडूया, असे झाले तर तसे करुया, तसे नाहीच झाले तर दुसरा पर्याय स्वीकारावा लागेल अशी जी अनिश्चितता असते तसे. त्या अनिश्चिततेचा अंत रिझल्ट लागल्यावर होतो इथे थेवटपर्यंत कोणताही 'रिझल्ट' लागत नाही म्हणून आपण ही अनिश्चितता घेऊनच पुढे जात असतो, व्होकेशनल कोर्स घेऊन पुढे जावे तसे! दुसर्या कोणाचे लागलेले 'रिझल्ट' कितीही खात्री देणारे असले तरी ते आपले नसतात त्यामुळे त्यावर सर्वस्वी अवलंबून रहाणे पटत नाही म्हणजे पुन्हा अनिश्चितताच. मनाचे समाधान मग आपण वेगवेगळ्या गोष्टीत शोधत रहातो.
पिडाकाका तुमची घालमेल तुम्ही योग्य शब्दात पकडलीत, ती मोकळेपणाने मांडलीत त्यातही विचार लादण्याचा अभिनिवेष न ठेवता, त्यामुळे हे विचार वाचनीय झालेत. तुमच्या मतांचा थेटपणा ह्या मुक्तकातून पोचला.
सुंदर लेखाबद्दल तुमचे अभिनंदन आणि तुमच्या 'रिझल्ट' साठी आमच्या शुभेच्छा!!
चतुरंग
पण जर ईश्वर असेलच तर तो एखाद्या मूर्तीच्या स्वरूपात तर नक्कीच असणार नाही. ती एक अमूर्त ऍबस्ट्रॅक्ट पॉवर असेल.......
हेच माझेही मत आहे. तुमच्या प्रामाणिक लेखनाइतकाच चतुरंग यांचं विश्लेषणही आवडलं.
देव.. हि खरी तर एक संकल्पना आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो श्रद्धेचा भाग आहे. माणसाला मानसिक शांतता जिथे लाभते तिथे त्याची श्रद्धा जडते. म्हणजे आता खविस म्हणतो त्याप्रमाणे गाडगेबाबांना समाजसेवेमध्ये मनःशांती मिळत होती म्हणून त्यावर त्यांची श्रद्धा होती.. तर संत तुकाराम महराजांना विठ्ठलाच्या नामःस्मरणात मानसिक समाधान लाभत होतं त्यामुळे त्यांची विठ्ठलावर श्रद्धा होती. जे दिसतं ते शाश्वत आणि जे दिसत नाही त्याचं अस्तित्व न पटणारं.. एखाद्या शास्त्रज्ञ असा विचार करू शकेल कारण त्याची शास्त्रावरची श्रद्धा!
पण निसर्गात खरंतर निसर्गच... हि एक अशी अद्भुत शक्ती आहे..की, काही गोष्टींना 'का?' चं उत्तर नाही. आणि माझ्यामते "निसर्गच देव आहे." आणि आपण जिथे वावरतो तोच निसर्ग असल्यामुळे सगळीकडेच देव आहे. आणि या अद्भुत शक्तीला एक रूप देण्याचा किंवा... या शक्तीवर विश्वास ठेवावा म्हणूनही असेल कदाचित याला एक रूप दिलं गेलं .. त्याला एका गोंडस स्वरूपात लोकांना आवडणार्या, भावणार्या रूपांत पुराण कर्त्यांनी सादर केलं.. आणि ते रूप म्हणजे मूर्ती.. मग ती गणरायची असो.. विठ्ठलाची असो वा आणखी कुणाची.
संत ज्ञानेश्वरांनी विश्वात्मक देवाची प्रार्थना करण्याचा, त्याची उपासना करण्याचा उपदेश केला तो यामुळेच असेल कदाचित. त्यांनीही विश्वालाच देव मानलं.. या विश्वात्मक देवाकडे त्यांनी सर्व लोकांसाठी प्रार्थना केली.. सर्व लोकांच्या साठी पसायदान म्हणजे प्रसादाचं दान मागितलं...स्वतःसाठी काहिही न मागता...! आणि म्हणून संत ज्ञानेश्वर हे परमेश्वर रूप मानले जातात असं मला वाटतं.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
वा प्राजूताई!,
याच आधारावरतर इतिहासात अनेक संस्कृत्या उदयाला आल्या आणि हल्लीच्या निसर्ग-अधःपतनाच्या काळात/युगात हा विचार सगळ्यांमधे रुजला तर कीती प्रश्न सुटतील.
असा विचार तुम्ही बाळगता याचा मनोमन आनंद झाला :)
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
मुक्तक आवड्ले. वय पन्नाशीच्या पुढे सरकायला लागल्यावर असे साक्षात्कार व्हायला लागतात. आपल्या लेखनावर टिका करतोय असे कृपया समजू नका.
आयुष्याच्या आणि वयाच्या काही अनुभवानंतर विचारांशी मतभेद होतात आणि आपण कशाला तरी सत्य मानून बसतो. . तेव्हा असे काही सूचणे अपरिहार्य आहे. या विषयावर अनादि काळापासून चिंतन चालले आहे.
आपल्या मुक्तकाचे जराही आश्चर्य वाटले नाही. उलट ते वाचायला आवडलेच. आपण आपली सुख दु:खे हीच सत्य मानतो. कारण तो आपला जागृतीतला अनुभव असतो. ज्याचा अनुभव घेता येत नाही. ज्याचा आपला जीवनात कोणताच सहभाग नाही. अशा कोणत्याही गोष्टीला आपण मानन्यास तयार नसतो. इतिहासातील काही सोयीच्या गोष्टींना आपण आपल्या जगण्याशी जोडून पाहतो. आणि काही एका निकषाला येतो. दु:खातिरेकाने व अनेक संकटाच्या दडपणाखाली चेंगरुन गेलेला अत्यंत विचारी मनुष्य देखील अधिक नास्तिकडे झुकतो . त्याला एक अचेतन शक्ती, वगैरे कल्पना थोतांड वाटतात.
झाडावरुन फळ खाली पडणं ही काही मोठी अपरुप गोष्ट नाही. आपल्यापैकी कितीतरी जणांनी ती घटना बघितलेली असते. परंतु त्या पडत्या फळाचा संदेश, त्या पडण्याचा अर्थ समजून घेण्यासाठी कोणता तरी साक्षात्कार होण्याची गरज असते किंवा सर एझॅक न्युटनची असामान्य अशी शास्त्रीय प्रतिभा असावी लागते. या पैकी ज्याने त्याने ठरवावे फळ पडण्याचा अर्थ कसा घ्यायचा ते !!!!
छान आहेत विचार.
या जगात आपण एकटेच असतो! इथे आल्यानंतर आपल्या मानसिक सुरक्षिततेसाठी नातेसंबंध बांधतो, आई, बाप, भाऊ बहीण, बायको, पोरं, मित्र वगैरे.....
मी पूर्णत: सहमत.
ईश्वराचं अस्तित्व मी नाकारीत नाही, पण मला स्वतःला अनुभव आल्याखेरीज मी त्यावर विश्वास ठेवणार नाही......
आणि जो मला त्याच्या अनुभव देऊ शकत नाही त्याला मी संत वा महात्मा मानू शकत नाही, मग तो वाटेल ती बडबड करीत असो.......
माझेही हेच म्हणणे आहे :)
>>पण निसर्गात खरंतर निसर्गच... हि एक अशी अद्भुत शक्ती आहे..की, काही गोष्टींना 'का?' चं उत्तर नाही. आणि माझ्यामते "निसर्गच देव आहे.<<
खर आहे.
यालाच म.फुल्यांनी "निर्मिक" असा सुंदर शब्द वापरलाय.
(नास्तिक)राजेश
लेख आणि त्यातील विचार आवडले...त्यांच्याशी सहमत आहे आणि तरी देखील देवाला आणि त्याच्या मूर्त स्वरूपाला मी मनापासून मानतो - त्यात कुठेही अंधश्रद्धा आहे असे मला वाटत नाही...
वेळे अभावी पटकन दोन गोष्टी लिहीतो:
ऐकीव माहीती प्रमाणे विवेकानंदांना एकदा अमेरिकेत कोणीतरी खवचटपणे एक पुस्तक (का लेख) दाखवला त्याचे शिर्षक होते: "God is Nowhere" . ते शिर्षक दाखवत त्याने त्यांना विचारले की या बाबत आपले काय मत? विवेकानंदांनी मधे एक रेषा ओढत ते वाक्य बदलले : "God is Now Here" - आणि म्हणाले की तुम्ही तुमचेच वाक्य आता वाचा.
अर्थात असे म्हणणार्या विवेकानंदांना भारत हा तमसातून जात असल्याने त्याने गीतेचा शोध "फूटबॉल मैदानावर" घ्यावा असे म्हणले होते!
दुसरे श्रद्धास्थाना संबंधी नसले तरी पूजास्थानासंबंधी आहे. ग. दि. माडगूळकरांची खालील कविता त्या संदर्भात वाचनीय आहे....
आणि याच गदीमांच्या धाकट्या भावाची व्यंकटेश माडगूळकरांची, "एका नव्या जागृत देवस्थानाचा जन्म" ही कथा तर वाचनीयच आहे!
कविता. येथे दिल्याबद्दल अनेक आभार.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
विकासराव, कविता. येथे दिल्याबद्दल अनेक आभार.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आभार
फारच सुंदर कविता आहे ही गदिमांची.
http://sucheltas.blogspot.com
छान लेख, आवडला. मुख्यत्वे आपले विचार दुसर्यावर न लादणे ही गोष्ट आवडली.
अनेकदा मला स्पर्श करून जाणारे विचार आहेत. माझे लहानपण अगदी भाविक नाही, पण देव आणि कुळाचार यांनी भारलेल्या वातावरणात गेले आहे, आणि ते बालपण सुदैवाने फार छान, निसर्गाच्या जवळ असे गेले आहे. त्यामुळे सुखद आठवणी या अशा वातावरणाशी निगडित आहेत. त्यामुळे असेल, पण कोणाची श्रद्धा आणि भाविकपण यांना चटकन नावे ठेवणे मला जमत नाही.
जेव्हा कसलाही अतिरेक होतो, माझेच काय ते बरोबर , तुमचे नाही असा भाव दिसतो तेव्हा तो मार्ग योग्य वाटत नाही. जर देव नाही असे समजले तर आपली रोजची अनेक आन्हिके जी आता काळाच्या ओघात आपल्याबरोबर आली आहेत त्यांना फाटा द्यावा लागेल. आणि ज्यांना ते पटते त्यांनी ते करावेही. र. धों. कर्वे यांच्याप्रमाणे एकच एक ध्यास धरून (जसे कुटुंबनियोजन) नास्तिकतेचा दुसर्यांच्या भावना समजून न घेता पुरस्कार करावा किंवा नाही, याबद्दल मला प्रश्न पडलेले आहेत.
प्रत्येकाच्या श्रद्धा वेगळ्या असतात पण विचार म्हणून वाचायला लेख खूप आवडला.
विशेषतः मला एखादी गोष्ट दिसत नसली तरी ती असू शकते हा प्रांजळपणा आवडला.
-------
अवांतर - संदीप खरेची 'नास्तिक' ही सुरेख कविता जरूर वाचा. जमल्यास मी त्या कवितेचा एखादा दुवा शोधतो.
--------------------------
www.atakmatak.blogspot.com
एक अप्रतिम कविता
एक खराखुरा नास्तिक जेंव्हा देवळाबाहेर थांबतो
तेंव्हा खरंतर गाभार्यातच भर पडत असते
की कोणीतरी आपल्यापुरत्या सत्याशी का होईना
पण प्रामाणिकपणे चिकटून राहिल्याच्या पुण्याची
एक खराखुरा नास्तिक जेंव्हा देवळाबाहेर थांबतो
तेंव्हा शक्यता होते निर्माण की
देवाने आपला आळस झटकून देवळाबाहेर येण्याची
एक खराखुरा नास्तिक जेंव्हा देवळाबाहेर थांबतो
तेंव्हा कोर्या नजरेने पाहत राहतो
सभोवतालच्या हालचाली, भाविकांच्या नजरा
कोणीतरी स्वतःचेच ओझे स्वतःच्याच पायावर
सांभाळत असल्याचे समाधान लाभते देवालाच
म्हणून तर एक खराखुरा नास्तिक जेंव्हा देवळाबाहेर थांबतो
तेंव्हा देवाला एक भक्त कमी मिळत असेल कदाचित,
पण मिळते अखंड समाधान, एक सहकारी लाभल्याचे!!
देऊळ बंद झाल्यावर एक मस्त आळस देउन
बाहेर ताटकळलेल्या नास्तिकाशी गप्पा मारता मारता
देव म्हणतो, दर्शन देत जा अधून मधून....
तुमचा विश्वास नसेल आमच्यावर;
पण आमचा आहे ना!!!!!
एक खराखुरा नास्तिक जेंव्हा देवळाबाहेर थांबतो
कंटाळलेल्या देवाला मोठ्या मिन्नतवारीने परत पाठवतो देवळात
तेंव्हा कुठे अनंत वर्षे घेउ शकतो आपण दर्शन
अस्तिकत्वाच्या भरजरी शालीत गुदमरलेल्या देवाचे......
एक खराखुरा नास्तिक जेंव्हा देवळाबाहेर थांबतो........
- संदीप खरे
मस्त कविता आहे!
त्यावरून खोट्या अस्तिकाच्या देवळाबाहेरून जाताना नमस्कार करण्यासंदर्भातील ऐकलेल्या दोन मजेशीर ओळी आठवल्या (काव्य आठवत नाही पण आशय)...
(देवाला पटकन नमस्कार केल्यासारखे करत)देवळाबाहेरून जाताना (दरवाजासमोर) थांबलो घटका दोन
कारण उद्या खरच देव (असला आणि) समोर आला तर त्याने विचारू नये की "आपण कोण?"
मी सध्या ही कविता शोधतच होतो.... धन्स :)
कविता फारच आवडली...संदीप खरेच्या कविता प्रगल्भ होतात आहे तर! :)
मुक्तक/प्रकटन आवडले.
सुनीतराव आणि चतुरंग यांचे प्रतिसादही..
स्वाती
तो ( http:\\lahanpan.blogspot.com )
दिवाणखान्यात बसून
चारचौघांच्या संगतीत
मी जेव्हा तुझे अस्तित्व नाकारतो
तेव्हा आकाशाचे एक दार
किलकिले करून
तू पाहतोस माझ्याकडे कौतुकाने
कुतुहलानेही,
आणि सगळे निघून गेल्यावर
तार्याच्या अंधुक प्रकाशात
तू उतरतोस माझ्या एकांतात
आणि समोरच्य़ा खुर्चीत बसून
म्हणतोस - अभिनन्दन
तुझे विवेचन छानच होते
इतके की मलाही शंका आली
माझ्या अस्तित्वाची -
पण तरिही मला माहीत आहे
मला मानणार्यांमधे
तू अग्रेसर आहेस
फक्त तुझा दिवाणखाना
तुझ्या काळजापासून
फार दूर आहे, ईतकेच.
-कुसुमाग्रज (मुक्तायन, पान ४५)
http:\\lahanpan.blogspot.com
कुसुमाग्रजांच्या कवितेतून बुद्धी आणि भावना यांच्यातली आस्तिकतेबद्दलची तगमग उत्तम व्यक्त होते. पिवळा डांबिस यांच्या लेखाचे प्रतिबिंबच जणू.
कुसुमाग्रजांची आणखी एक याच अर्थाची कविता आठवते. सृष्टीच्या निर्माणाबद्दल शास्त्रज्ञांचे विचार बुद्धीला पटतात पण शास्त्रज्ञही कवीच्या डोळ्यानी रात्री चांदण्यानी खच्चून भरलेले आभाळ पाहू शकत नाहीत अशा अर्थाची ती एक मुक्त रचना आहे ...
ती कविता मी वाचली आहे.
शास्त्रज्ञांच्या कल्पनाशक्तीला आणि सौंदर्यानुभवाला कमी लेखण्यात त्यांचाही हातभार आहे. (मला जाणवतो नेमका तोच खरा सौंदर्यानुभव - तू ज्याला सुंदर म्हणतो तो रुक्षपणा, असे काही.)
असो. काय करणार. त्यांच्या प्रतिभेला मी मानतो.
शास्त्रज्ञांच्या कल्पनाशक्तीला आणि सौंदर्यानुभवाला कमी लेखण्यात त्यांचाही हातभार आहे.
आज ती कविता माझ्याकडे नाही. पण आठवणीत अजूनही ताजी आहे. त्यात शास्त्रज्ञांच्या कल्पनाशक्तीला कमी लेखले आहे असे मला तेव्हा जाणवले नव्हते. आताही तसे वाटत नाही. चांदण्यांचे सौंदर्य, त्यातून या प्रचंड व्यवस्थेच्या निर्मिकाची संकल्पना आणि त्या कल्पनेतले सौंदर्य हा माझा सार्वभौम अनुभव आहे , असा काहीसा भाव मला त्या कवितेमधे वाटला.
जसे बॉलीवूड मधला फेवरीट ड्वायलॉग असतो ना , तेरे बडे होनेसे मैं तो छोटा नही हो जाता :-) )
मन भिरभिरायला आणि लेखणी सरसरायला लावणारे असे काही येथे मोकळेपणाने लिहिलेले वाचायला मिळाले. आनंद झाला. धन्यवाद!
- अंगठाबहाद्दर
मस्त..आवडले.
देव आहे का नाही माहित नाही...पण अशी एक शक्ती आहे जी हा सगळा पसारा चालवतेय हे तर मान्य आहेच.
>>स्वतःला पडताळा आल्याशिवाय, सर्वांनी पडताळून डॉक्युमेंट केल्याशिवाय कशावरही विश्वास न ठेवण्याची सवय अंगी लागली......
त्याचबरोबर आपल्याला जे दिसत नाही (एक्स रे, गॅमा रे, वगैरे) ते प्रत्यक्षात अस्तित्वात असू शकतं याची विनयपूर्वक जाणीवही झाली...>>
आजचा दिवस सत्कारणी लागला इतकं सुंदर स्फुट वाचून. केवढा संतुलीत विचार. केवढी सुसंस्कृत भाषा, श्लोक.
प्रियाली यांचा प्रतिसाददेखील आवडला - की नास्तिक कोणीही नसतो फक्त श्रद्धा वेगवेगळ्या ठिकाणी रुजलेल्या असतात.
मनमोकळं लेखन आहे. छान.
नवीन काहीतरी असंच कणखर यावं ही विनंती. (हा जुना लेख आहे हे नंतर लक्षात आलं. पण आधी वाचला नव्हता त्यामुळे काय फरक पडतो?)
तुम्ही लिंक दिलीत, म्हणून परत वर काढून वाचला.
लेख वाचताना माझा स्वत:चा सश्रद्ध ते नास्तिक ते अज्ञेयवादी असा प्रवास नजरेसमोर उभा राहिला.
खर आहे. मनाची अशी आंदोलने होत असतात. पण उत्तरोत्तर माणुस प्रगल्भ होत असतो. श्रद्धा,अंधश्रद्दा, अश्रद्धा यांच स्थान तुमच्या मेंदुतच आहे ना शेवटी?
तुम्ही देव माना , नका मानू . मूर्तिपूजा करा , नका करू तो तुमचा प्रश्न आहे . देवाला तुमच्याकडे लक्ष द्यायला अवसर नाही हा गैरसमज आधी काढून टाका . तुमच्या प्रत्येक छोट्या - मोठ्या , चांगल्या - वाईट कर्मांची नोंद त्याच्याकडे आहे आणि असणार आहे .
अवश्य .पण तुम्हाला अनुभव येण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करताय हे महत्वाचं आहे . असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी असं होणार नाही . देव तुमचा नोकर नाही . अनुभवासाठी तुम्हाला प्रयत्न करावेच लागणार .
exactly . मूर्तीपूजेचा हाच उद्देश आहे .तुम्हाला मूर्ती दिसतेय म्हणून तुम्ही भारावू गेलात . जर काहीच दिसल नसतं तर हा भारावलेपणा आला असता का ? नाही ना . निर्गुण स्वरुपाची उपासना सोपी नाही . म्हणून तर मूर्तीपूजा सांगितली आहे .
ह्याच्या मागचं अध्यात्मिक रहस्य खूप मोठं आहे . ते शोधून काढलं कि लॉजिक पटेल .
गाडगे बाबांचं उदाहरण देणार्यांना गाडगेबाबा सतत 'गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला' म्हणत असत ह्याचा विसर पडला का ? एखाद्या पदार्थाला मस्त फोडणी दिली तर माणूस आवडीने ४ घास जास्त खातो आणि जेवल्याचा आनंद मिळतो . तसंच कर्म करताना नामस्मरणाची , ईश्वरभक्तीची फोडणी दिली कि त्याला एक भारदस्त अर्थ प्राप्त होतो .
अगदी खरं . देव सोडून दुसरं कोणीही आपल्या बरोबर नसतं . म्हणून मी हि लग्न केल नाही आणि करणार हि नाही . ती संसाराची कटकट करण्यापेक्षा ईश्वरप्राप्तीसाठी प्रयत्न केले तर इथून जाताना नक्कीच काहीतरी घेवून जाता येईल . आणि तसंहि इथं परत कुणाला यायचय म्हणा . मृत्यूलोकाला कायमचा टाटा बायबाय करायचा आता.:-)
शाळेत शिकवणारे कधीही गुरु नसतात . ते फक्त शिक्षक असतात . 'गुरु' हि पूर्णपणे अध्यात्मिक संज्ञा आहे . उठसुठ कोणालाही गुरु म्हणू नये .
लेख आवडला. आणि आधी वाचला असता तर नसता पटला पण नुकतंच माझंही असंच काहीसं झाल्याने पटला.
जर्सी सिटीमध्येही गणपती असतो हे मी नुसतं ऐकलं होतं. असुन असुन काय असणार असंही वाटलं. पण ज्या दिवशी कळालं की आज विसर्जन आहे तेव्हा का कोण जाणे आटापिटा करुन गेलोही.
पोहचलो तेव्हा गणपतीचीच गाणी लावलेली होती. त्यात तेव्हा जे चालु होतं ते नेमकी ढोल ताशांचा रिदम असलेलं. ढोल ताशे आणि समोर गणपतीची अत्यंत सुंदर १५ फुटी मुर्ती. मी कधी मनापासुन नमस्कार करत नाही. म्हणजे घडतच नाही. बाकी लोक करतात, आपण नुसतेच टक लावुन मुर्ती बघत बसलो तर विचित्र दिसतं म्हणुन लोकलज्जेस्तव मी नमस्काराचं नाटक करते. पण आयुष्यात पहिल्यांदाच माझ्याकडुन ह्या मुर्तीला नमस्कार केला गेला. आणि फार फार रडायला आलं... देवासमोर कधी नमस्कार करुन मी रडेन असं मलाही वाटलं नव्हतं..
आपल्याला वाटत असतं पण कितीही नास्तिक असलो तरी आजुबाजुच्या लोकांचा प्रचंड आस्तिकपणा आपल्यावर कुठे तरी आदळलेला असतोच. आणि आयुष्यातल्या खुप सार्या आठवणींच्या खुणा म्हणुन तो आपल्या आतच रहातो.
मी कितीही गणपती नाकारायचा म्हणलं तरी ढोल-ताशा-भगवा झेंडा-गणपती म्हणलं की मला पुणंच आठवतं. आणि मग गणपती पाहुन आपोआप भरुन येतं.
चालला गजर, जाहलो अधीर, लागली नजर कळसाला
पंचप्राण हे तल्लीन, आता पाहिन, पांडुरंगाला
म्हणलं की मला भारतच आठवतो.. आणि विठ्ठल मला विलक्षण आवडायला लागतो. घडवणार्यांनी मुर्तीच तशा आर्त बनवल्यात की पर्याय उरत नाही.
मला महालक्ष्म्यासुद्धा अशाच निरर्थक वाटायच्या. पण यंदाचे महालक्ष्म्यांचे नुसते फोटो पाहिले अन आठ्वलं की लहानपणापासुन दरवर्षी आमची मराठवाड्यातली सगळी मंडळी आमच्याकडे पुण्याला यायची. तोच सगळा १५ लोकांचा गोंधळ, तीच ठरलेली कामं आणि तरीही जेवायला दुपारचे चार वाजणार.. दरवर्षी!
पुजा झाली की बाबा नैवेद्य दाखवायचे. आम्ही पोरांनी खपुन समजवलेल्या लक्ष्म्या.. आजीने लावलेल्या समया-काडवातींनी उजळलेल्या लक्ष्म्या.. वस्त्रमाळा आणि निर्गुडीच्या हारांमधुन शांतपणे आपल्याकडे बघणार्या लक्ष्म्या..
आणि त्यांच्या समोर कद घालुन मनापासुन काही तरी मंत्र म्हणणारे बाबा..
त्याक्षणी सगळे शांतपणे मागे उभे.. कुणी काही बोलायचं नाही.. आणि एक क्षणात अचानक "सुखकर्ता दुखहर्ता.." सुरु, सगळ्यांची पहिली टाळी सुद्धा एकत्र वाजायची.. सगळी मंडळी कितीही वेगवेगळी असली तरी त्या धाग्याने एकत्र बांधलेली होती. आमच्या मायबापांनी महालक्ष्म्याच नाकारल्या असत्या तर मला माझी चुलत भावंड नुसती नावानीच माहिती असती. पण आज महालक्ष्म्या म्हणलं की मला मराठवाडा आठवतो..
मला वास्तविक गणपती, महालक्ष्म्या किंवा पांडुरंगाशी काही घेणं देणं नाही. पण त्यांच्याशी ज्या माझ्या घराच्या आठवणी बांधल्या गेल्या आहेत, त्यांच्याशी माझं सख्य आहे.
उत्तम लेख वर काढल्याबद्दल धन्यवाद.
मी स्वतः नास्तिक आहे पण आस्तिकांचा राग येत नाही. प्रत्येकाने आस्तिकपणा किंवा नास्तिकपणा त्याच्या त्याच्या अनुभवावरून किंवा मनाप्रमाणे ठरवलेला असतो. समस्यां तेव्हा निर्माण होते जेव्हा आस्तिक लोक नास्तिकांना आस्तिक बनवायचा किंवा नास्तिक लोक आस्तिकांना नास्तिक बनवायचा प्रयत्न करतात तेव्हा. माणूस आस्तिक किंवा नास्तिक असण्यापेक्षा प्रामाणिक, गरजेच्या वेळी हाकेला धावून येणार असणे जास्त मह्त्वाचे असे मी मानतो.
सर्वोत्तम प्रतिसाद... या धाग्याचं सार या दोन ओळीतच आलंय...
दि.य. देशपांडे यांचे " विवेकवाद " पुस्तक मिळवा आणि वाचून काढा. बर्याच प्रश्नांची उत्तरे मिळतील.
हे एक मुक्तचिंतन दिसते आहे, छान , प्रामाणिकपणे लिहिल्यासारखे वाटते पण तुमचा गोंधळ होतो आहे. आजकाल नास्तिकतेला असलेले वलय कदाचित स्वतःला मी नास्तिकच असे म्हणायची पटवायची घाई करत असेल . घाई करू नका स्वतःला नास्तिक म्हणून घायची बहुदा तुम्ही फेन्स वर बसलेले अज्ञेयवादी आहात (Agnostic)...कदाचित आस्तिकतेकडे झुकलेले नास्तिकतेकडे झुकू पाहणारे अज्ञेयवादी. खरे तर निष्कर्षाला यायची घाई न करता विचार चालू ठेवा, तरच रस्ता सापडेल नाहीतर तळ्यात-मळ्यात करत राहाल.
माणसाचे विचार इव्हॉल्व होत असतात. पण आठवणी या आत्ताच्या विचारांशी जुळणार्या असतीलच असे नाही. पूर्वायुष्यात आयुष्यावर कुटुंब, समाज यांच्या प्रभावाने जे घडत गेले त्यानुसार आठवणी रहातातच .. आणि आठवणी नेहेमीच प्रिय असतात.. तेव्हाचा तसा मी होतो.. आत्ताचा असा मी आहे.. तेव्हा गणपती देव वाटत होता.. आता जे मानवाच्या बुद्धी पलिकडे आहे त्याला मी देव मानतो. त्याला मानवरूप देण्याची व भक्ती/पूजा करण्याची गरज वाटत नाही.. त्यामुळे आठवणींशी निगडीत असल्याने व आत्ताच्या विचारांनी गजानन देव वाटत नसल्याने गजाननाचा स्नेही म्हणून स्वीकार वगैरे अट्टाहास करायची गरज नाही.
ते चित्र अथवा शिल्प म्हणून आवडते किंवा स्त्रोत्र आरत्या यांचा अर्थ नसला तरी सूर भावतो किंवा मोदक फार आवडतो हे सत्य म्हणून स्वीकारता येउ शकते..
+१
+२
मस्त प्रतिसाद.
एक तर नास्तिक आहात किंवा नाहीत असं असतं. जर कुणी अज्ञेयवादी असेल तर तो नास्तिक असू शकत नाही.
मी पूजा करतो,गणपती बसवतो, घरात जिवत्या, गौरी हरतालिका सर्व चालू असते. दिवाळीला लक्ष्मी पूजन असते. सात ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले आहे. असे असूनही मी हार्ड कोटेट नास्तिक आहे. कारण या कशातही देव नाही याच्यावर माझा ठाम विश्वास आहे. देव जर जगात असेलच समजा तर तो निगोशिअबल नाही. सबब देव भक्ती, नामस्मरण यांचा उपयोग झालाच तर प्लासिबो म्हणून होईल कृपा वगैरे सब झूट. मग आमच्या नास्तिकांच्या आयुष्यात देव वारंवार का येतो. कारण एकच .जेंव्हा कशाचेच उत्तर कार्यकारण भावासह सापडत नाही त्यावेळी योगायोग हेच उत्तर असते व योगायोग हा तर विज्ञानात बसत नाही म्हणून नास्तिक ही म्हणतो देवाची कृपा ....दुसरं काय ? "
+१००
+२२२२२२२२२
तुमच्या म्हणण्याप्रमाणे योगायोगाने देव तुमच्या आयुष्यात येतो. ते पटत नाही. तुम्ही हार्ड्कोर नास्तिक समजता तरीही गणपती बसवता, पूजा करता. कारण आपल्या विचाराला आचारात आणण्याची इच्छा अथवा धैर्य नाही म्हणून.
तुम्ही दुसर्यांना थांबवू शकत नाही किंबहुना थांबवू नकाच.. त्यांना त्यांचा विचार करू दे. पण स्वतःला न पटणारं स्वतःच वागण्यापासून कोण अडवतय ?? ते जमवणं इतकं कठीण नक्कीच नाही. थोडासा निर्धार लागतो पण इथे योगायोग वगैरे कारणं अजिबात पटत नाहीत.
आणि योगायोगाने देव आयुष्यात येणे आणि ही देवाची कृपा वगैरे मनापासून वाटत असेल तर तुम्ही नास्तिक असल्याचे म्हणणे हे स्वतःला फसवण्यासारखे आहे.
एक ,हे सर्व मी एकटा समाजात नाही . माझे कुटुंब ही आहे म्हणून करतो. माझ्यात धैर्य वगरे नाही हा तर्क चुकीचा. अगदी थेरॉट्कली पाहिलेत तर योगायोग असाही काही नसतो पण प्रॅक्टीकल आयुष्य जगताना आपल्या मनाचे समाधान तूर्तास तरी का होईना हे करून घेण्यासाठी नाईलाजाने देवाची इच्छा असे आपण म्हणतो. उदा आपल्या परिचयात जेंव्हा अकाली मृत्यू होतो त्यावेळी नास्तिकही इश्वरेछ्हा बलीयसी म्हणतो कारण तुझ्या बापाने दारू पिली बेसुमार ,म्हणून तो मेला हे सत्य त्या नातेवाईकाला सांगण्याचे धैर्य आपल्यात नसते. नास्तिकातही नसते व अस्तिकातही. धैर्याचा प्रश्न तेथे येतो. आपण म्हणता तेथे नाही.काही वेळा सत्य सांगण्याचे धैर्य आपल्यात नसते किंवा काही वेळा ते ऐकण्याचे धैर्य॑ दुसर्यात नसते.
कुटुंबातही आपापल्या श्रद्धे/अश्रद्धेप्रमाणे वागण्याची मुभा असावीच.
पण तुमच्याकडे धैर्य नाही हे म्हणणे जर चूक असेल तर कुटुंबात तुमच्या नास्तिक असण्यावर खुलेपणाने चर्चा झाली नसावी.
असे असते तर तुमच्या नास्तिकतेला न पटणार्या बर्याच गोष्टी करण्याची इच्छा / आग्रह/ सक्ती झाली नसती.
माणसं जपण्यासाठी जसे नास्तिक आस्तिकांच्या सर्व गोष्टींना घरात विरोध करत नाहीत तसे आस्तिकही घरातल्या नास्तिकांकडून हे सगळं करण्याची अपेक्षा ठेवत नाहीत.
माझी श्रद्धा आहे तर मी पूजा करेन, मुलाकडून ती इच्छा अपेक्षा ठेवणार नाही. आणि तो नास्तिक आहे याची पूर्ण कल्पना असेल तर माझ्यासाठी म्हणून पूजा वगैरे करण्यापासून नक्कीच परावृत्त करेन.
धैर्य शब्दाऐवजी विचाराप्रमाणे आचार करण्याचा स्वतःचा निग्रह नसणे असे म्हणणे जास्त योग्य ठरले असते.
प्रतिसाद कर्त्यांना अंधश्रद्धा आणि मेंदुविज्ञान हा सुबोध जावडेकरांच्या मेंदुच्या मनात या पुस्तकातील लेख वाचावा अशी आग्रहवजा सूचना आहे. श्रद्धा अश्रद्धा अंधश्रद्धा चे ठिकाण मेंदु आहे. मी माझ्या सोयी वा गरजेनुसार अस्तिक नास्तिक वा अज्ञेयवादी आहे. मानसिक आरोग्य जपण्यासाठी आपला मेंदु केवळ अमुर्तच नव्हे तर अनेक वेडगळ वाटणार्या सुद्धा कल्पनांचा आधार घेतो. प्रत्येक वेळी आपले त्यावर नियंत्रण असतेच असे नाही. ते त्या त्या वेळच्या परिस्थितीवर अवलंबून असते. ईश्वराचे निर्गुण निराकार, सगुण साकार, भक्तवत्सल करुणाघन अशी रुपे हे त्याच्या मेंदुचे अविष्कार असतात.
असाच सेम असाच विचार व्यक्त करणारा मेघश्याम पुंडलिक रेगेंचा एक लेख आठवला.
एक कुतुहल नरहर कुरुंदकरांना मुलाची "मुंज" करावीशी वाटण्या संदर्भात व एक तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी
लुप्त जुन्या प्राचीन विधीने जी त्यांना माहीत होती असे काहीतरी "त्र्यंबकेश्वर" मंदीरातील प्राण प्रतिष्ठे ची जबाबदारी स्वीकारली होती त्याचेही कुतुहल वाटते
एकुण पण बहुधा तेव्हा त्यांनी इथे सर्वांना काही तरी प्रवेश द्यावा अशी काहीतरी अट टाकलेली होती असे
अंधुक अंधुक वाचलेले स्मरते.
माणुस एक इंटरेस्टींग क्रीएचर आहे व तो विसंगतच आहे मुळात त्याला सुसंगती अपेक्षीत केल्यावर वांधे होतात.
सॅम हॅरीस सारखे लोकही आहेत नीरक्षीर विवेक करतात शेणातुन शेंगदाणा बाहेर काढतात
असो.