भटकंती

माझा पहिला ट्रेक : चकदेव

Primary tabs

रत्नागिरी जिल्यातील खेड हे माझे गाव. लहानपण याच गावात गेले. खेड च्या आसपास काही ट्रेकिंग locations आहेत. रसाळगड,सुमारगड,महीपतगड,चकदेव,पर्बत,नागेश्वर,चिपळूण जवळचा भैरवगड. राजांचा रायगड.कोयना back water. इत्यादी.
कारखान्यातील काही सहकार्यांबरोबर एकदा कोयनेच्या back water च्या परिसरात भटकंती आणि वस्ती केली होती. साधारण १९८८ मध्ये. तेव्हा असा काही छंद असतो हे प्रथम माहित झाले. त्या नंतर गो.नि दां च्या पुस्तकांमधून या विषयाची माहिती झाली. १९९० च्या दरम्यान गावतील काही मित्रांकडे स्वयंचलीत दुचाक्या आल्या होत्या. असेच एक दिवस कट्यावर गप्पा मारता मारता कुणीतरी चकदेव बद्दल माहिती दिली.
तेव्हा चकदेव ला जायला फक्त आंबवली गावातून वाट होती. रघुवीर घाट चा रस्ता अस्तीत्वात नव्हता. चकदेव चे गावकरी आंबवलीत यादवांच्या दुकानात येत. तेथे आमच्या एका मित्राचा मामा प्राथमिक आरोग्य केंद्रात कामाला होता. त्याच्या कडे चौकशी करायचे ठरले.त्याने दिलेल्या माहिती नुसार दुपार पर्यंत आंबवलीत पोहोचलो तर रात्री वस्तीला चकदेव गाठता येईल असे समजले.
दिवाळी नंतरच्या एका रविवारी ७/८ जण लक्ष्मी नारायणच्या देवळापाशी जमलो. आवश्यक आणि (बरेचसे अनावश्यक ) सामान घेऊन एका गाडीवर दोघे असे आंबवलीला जायला निघालो. दुपारी ३ वाजता भरत मामाकडे गाड्या लावल्या. भरत मामा ने गावातील एक शाळकरी मुलगा वाट दाखवण्यासाठी दिला. त्याने नाव सांगितले "संतोस " (संतोष ) पाठ पिशव्या,बूट सुद्धा काहीजनांकडे नव्हते. एकाने तर चौकोनी bag आणली होती. मग त्याच्या bag मधील लुंगीत त्याचे समान बांधले. सन्तोस च्या मार्गदर्शनाखाली आमची टीम निघाली. दमत भागत सूर्यास्ताच्या सुमारास शिड्यांच्या आधी जो माळ आहे तिथपर्यंत पोहोचलो. त्यावेळी आजच्या सारख्या लोखंडी शिड्या नव्हत्या. गावकरी वेल ,बांबू ,झाडांचे दोर यांच्या सहाय्याने शिड्या तयार करत. शिडी चढताना ती हलत असे. हलणारी शिडी आणि आणि दरी पाहून बाळा,शिरीष यांनी आम्ही वर येणार नाही असे सांगितले. त्यांना पटवून, भीती घालवून कसेबसे तयार केले आणि एकदाचे वर पोहोचलो.
देवळा पर्यंत जाताना पूर्ण काळोख झाला होता. सन्तोस ने पाणी आणण्या साठी मदत केली. हातपाय धुऊन चूल मांडली ,लाकडे जमा करून कांदे बटाटे रस्सा बनवला,दुसऱ्या चुलीवर खिचडी बनवली. भरपेट जेवलो .रात्री झान्जेच्या तालावर भजन/ हिंदी गाणी/कव्वाली असे सर्व झाले. देवळातच झोपलो. सकाळी चहा केला . पुजारी (पाटील) घरी घेऊन गेले. रात्रभरभजन केल्यामुळे ते खुश झाले होते. (त्यांना फक्त झांजांचा आवाज ऐकू आला असावा)
निघायची वेळ झाली तो शिरीष/बाळा ने सांगितले आम्ही शिड्या उतरणार नाही, आता आली का पंचायत?
सन्तोस पुन्हा मदतीला धावला ,त्याने दुसरी वाट आहे पण त्यामुळे खूप वळसा पडेल असे सांगितले. (आमच्या गाड्या आंबवलीत होत्या आणि त्याकाळी शिंदी रघुवीर घाटाने खोपी गावात येण्याचा मार्ग नव्हता )
शेवटी नाईलाज म्हणून आज शिंदित ज्या वाटेने उतरतो त्या वाटेने उतरून पूर्ण डोंगराला वळसा घालून एकदाचे भरत मामाच्या खोलीवर पोहोचलो.
शिरीष चे काही फोटो काही दिवसापूर्वी पाहिले आणि सर्व आठवले.
या ट्रेक पासून एखादा गावकरी बरोबर घेतला कि त्याचे नाव काहीही असले तरी आमच्या साठी तो "सन्तोस " असतो.
या ट्रेक नंतर आमच्यातील काही जणांनी हे वेड जोपासले आहे,काही जण हे वेड जोपासता येत नाही म्हणून हळहळतात, काही आम्हाला वेडे म्हणतात.
"हा छंद जीवाला लावी पीसे" हेच खरे.
त्यानंतर कितीतरी वेळा वेगवेगळ्या ऋतूत वेगवेगळ्या वाटेने वेगवेगळ्या ग्रुप बरोबर चकदेवला गेलो.
गावकऱ्यांशी मैत्री झाली. शिडी बांधणारे आजोबा आता थकलेत, बहुतेकांनी खाली घरे बांधली आहेत. शिक्षणासाठी मुले बाहेर पडली गावात म्हातारे कोतारे उरलेत, व्याघ्रप्रकल्प पण होऊ घातलाय. गाव उठेल कि काय अशी भीती वाटते.
जसा वारकर्यांसाठी पंढरी आणि पांडुरंग तसा माझ्यासाठी मात्र चकदेव कायम राहील.

सध्या चकदेवला जाण्यासाठी दोन मार्ग उपलब्ध आहेत.
१) खेड (रत्नागिरी जिल्ह्यातील ) बस स्थानकावरून आंबवली या गावी जावे तेथे यादव यांच्या दुकानात चौकशी करून शिडीच्या वाटेने चकदेव ला जाता येते.
२) खेड बस स्थानकावरून दुपारी ०४:१५ ला फक्त १ बस शिंदी या गावाला रघुवीर घाट मार्गे जाते तिने शिंदी येथे उतरून सोप्या वाटेने चकदेव ला जातायेते
खेड बस स्थानक दूरभाष ०२३५६२६३०२६.

आंबवली गावातून शिडी कडे जाणारी वाट


शिडी (अशा ३ शिड्या आहेत पूर्वी वेल,दोर ,लाकूड यापासून बनव्लेलेया शिड्या होत्या )

रघुवीर घाट हा रस्ता खेड तालुका आणि सातारा जिल्हा यांना जोडतो


मंदिरातील नंदी


शिडीचे टोक


मंदिरातील मूर्ती आणि पिंडी


पुजारी पाटील यांचे घर

चकदेव वस्तीला युथ होस्टेल अंबरनाथ कडून घर घंटी

पैसा

भटकंतीची सुरुवात. तेव्हा डिजिटल फोटोही नव्हते. कदाचित तुमच्याकडे फिल्मवाले कॅमेरे असतील! एखाद दुसरा स्कॅन करण्यासारखा फोटो असेल तर बघा! असो. आंतरजालावर कुठे या ठिकाणाचे फोटो मिळतात का पाहते.

दत्ता काळे

मोटारसायकलने प्रवास. कोयनेच्या बॅक वॉटरकाठी, आकल्प्याला (आकल्पे गांव) देवळात मुक्काम, नंतर दुसर्‍यादिवशी कोयनेच्या जड पाण्यात ओंबाळून घेऊन रघुवीर घाटातून दापोलीत उतरलो. जाताना घाटातून खाली दिसणारं कांदाटीचं खोरं..डावीकडे दुरवर दिसणारा वासोटा, उजव्या हाताला पर्वतराजीमधले दडलेला चकदेव.. लई भारी.

अग्निकोल्हा

अनेकदा गेलो आहे, अन पुढच्या सोमवारीच पुन्हा एकदा चकदेव ठरलेही आहे, पण यावर इथे लेख वाचायला मिळेल हा एक अतिशय सुखद धक्का.

शिंदी आहेच अतिशय टुमदार अन रोमांचक गाव, बाजुने पर्बतगढ, चकदेव, अन महिमंडनगड असे तिन किल्ल्यांनी वेढले गेलेले. हे तिनही किल्ले सराइत ट्रेकर्स दोन दिवसात सहज करुन जातात. पण शिंदीमधे नुसतं मुक्काम ठोकुन बसणे हाच एक मस्त विरंगुळा आहे. शिंदीमधे नदिकाठी पाय पाण्यात सोडून जंगलात सुर्यास्त व्यतित करणे म्हणजे निव्वळ सुख होय.

नुकताच पावसाळा होउन गेला असेल तर चकदेव पठारावर फार सुंदर माउशार कोवळे पण कोरडे पडलेले गवत साधारण अर्धाफुट उंच वाढलेले असते. त्यावरती आडवे पडले तर अक्षरशः स्वर्गिय शैय्या विश्रांतिस मिळाल्याची अनुभुति येते, १ तास तर जणू ५-१० मिनीटांप्रमाणे उडुन जातो. अगदी आवर्जुन घ्यावाच असा अनुभव.

शिंदी गावी पोचायचा अजुन एक पारंपारिक मार्ग होता, तो म्हणजे बामणोली व तेथुन लाँच ने कोयना बॅकवॉटर मार्गे शिंदी गाठणे (ते शेवटचे स्टेशन), पण व्याघ्रप्रकल्प होऊ घातलाय त्यामुळे आता तिकडून आत जायला परवानगी मिळत नाही :(

सुहास..

च्यायला ! हा स्पॉट माहीतच नव्हता ..मस्त आहे ..

नुकताच पावसाळा होउन गेला असेल तर चकदेव पठारावर फार सुंदर माउशार कोवळे पण कोरडे पडलेले गवत साधारण अर्धाफुट उंच वाढलेले असते. त्यावरती आडवे पडले तर अक्षरशः स्वर्गिय शैय्या विश्रांतिस मिळाल्याची अनुभुति येते, १ तास तर जणू ५-१० मिनीटांप्रमाणे उडुन जातो. अगदी आवर्जुन घ्यावाच असा अनुभव. >>>

हे तर लय भारी

चकदेव ला मी सुद्धा अनेकदा गेलो आहे , आपल्या बरोबर पुन्हा जायला आवडेल . हल्ली शिंदी गावातून जातो ,पूर्वी आम्बावली ,शिडी मार्गे जायचो . आता शिंदी मार्गे जाऊन शिडीच्या top ला बसून सूर्यास्त पाहणे हा विरंगुळा असतो ,बरेच दिवसात गेलो नाही ,पर्बत मंदिरातून सूर्योदय पाहणे हा सुद्धा असाच एक विरंगुळा आहे
१दा जमवाच .
9960096435

अग्निकोल्हा

अन्यथा इतर एखाद्या रिकाम्यावेळी तयार आहेच.