पाककृती

माहिती हवी …कृपया मदत करावी.

Primary tabs

नमस्कार मंडळी ….

विषय असा आहे की एका मित्राच्या वडिलांचे निधन झाले आहे आणि पुढील आठवड्यात बाराव्याचे विधी आहेत. त्या दिवशी उपस्थित मंडळींकरता श्राद्धाचे भोजन तयार करायचे आहे. मित्राची आर्थिक परिस्थिती यथा तथा असल्याने बाहेरच्या केटररला बोलावणे परवडणार नाही.

मिपाकर, विशेषत: भगिनी या विषयी काही मार्गदर्शन करतील का? जर मेनू कळला तर घरातील स्त्रिया त्याप्रमाणे स्वयंपाक करतिल.

मिपाच्या माध्यमातून कोणाला मदत मिळत असेल तर पहावे म्हणून हा पत्रप्रपंच.

धन्यवाद.

प्यारे१

बाराव्याच्या/तेराव्याच्या विधीला श्राध्द म्हणत नाहीत बहुधा.
तेव्हा साधा भात आमटी नि सुतक संपण्याच्या दृष्टीनं एक गोड पदार्थ शिरा /बुंदी लाडू तो देखील थोडा थोडा, आग्रह न करता वाढण्याची पद्धत आहे.
जास्त काही सोपस्कार नसतात , नसावेत.

अधिक माहिती जाणकार देतीलच.

जेपी

साधा भात , साधे (अळणी)वरण,कढी ,बेसन लाडु ,पोळी (चपाती) एक भाजी आणी चटणी असे जेवण असते
अवांतर: बाराव्याला बाहेरचे लोक नसतात चौदाव्याला गोडजेवण करतात . समाजानुसार प्रथा वेगळी असु शकते

श्राद्ध कोणतही असो,
चारच पदार्थ "मुख्य" आहेत. भात/तांदुळाची खीर/अमसुलाची चटणी/डाळ-भरड्याचा वडा!
बाकि अळू/गवार-लाल भोपळ्याची भाजी/कढि हे अनुषंगिक आहेत.

आमसूलाची चटणी
गवार भोपळा भाजी
लिंबू
खोबर्‍याची चटणी
कार्ल्याची भाजी
अळूची भाजी (फदफदे नाही)
भेंडीची भाजी
कढी
भात
वरण
तांदुळाचा रवा काढून खीर

भाजणीचे वडे (आणि त्यासोबत दही किंवा ताक)
साध्या पोळ्या
रव्याचे लाडू

(मी कुणालाच जात विचारत नाही...म्हणून तुम्हाला पण विचारली नाही...ही यादी माझ्या सासू-बाईंनी दिली आहे...प्रत्येक जाती प्रमाणे खाण्याचे पदार्थ बदलतात.)

vikramaditya

खुप धन्यवाद.

ह्या यादीतील काही पदार्थांची रेसिपी इंटरनेट वर मिळेल का? या विषयी काही माहिती मिळेल का?

आमसूल चटणी,

गवार भोपळा भाजी, कारल्याची भाजी, अळू भाजी, भेंडी भाजी (specific recipe for shraddha??)

कढी म्हणजे सोल कढी का?

भाजणीचे वडे?

Thanks Again..

उदय के'सागर

अहो कढी म्हणजे ताकाची कढी (ज्याच्या फोडणीत भरपूर कढीपत्ता, आलं आणि जिरे असतात. शिवाय ह्याला तुपाची फोडणी असते आणि डाळीचं पीठ/बेसन लावून करतात. मीठ-साखर चवी नुसार आणि हो, तिखटपणासाठी हिरव्या मिरच्या किंवा फोडणीत लाल मिरच्या असतात... तर ही कढी --- अहो खिचडी बरोबर असते तीच).

माझं मत आहे की मित्राची परिस्थिती खरच बेताची असेल तर साधा रोजचाच स्वयंपाक करुन एक ताट त्याने कुणा गरीब- असहाय्य व्यक्तीला द्यावं...त्यांचा वडिलांना खरंच बरं वाटेल, असा ओढूनताणून खर्च करण्यापेक्षा. मित्राच्या वडिलांना श्रद्धांजली!!

चित्रगुप्त

वडे (चण्याच्या डाळीचे) आणि तांदुळाची खीर मुख्य, बाकी अगदी साधा स्वयंपाक, जिथल्या तिथल्या पद्धतीप्रमाणे.
नैवेद्यासाठी (वाटल्यास सर्वांसाठी) मृत व्यक्तीच्या आवडीचा पदार्थही करावा.

हे जे विधी वगैरे केले जातात, ते मृतात्म्याचे काही अस्तित्व अद्याप (बारा-तेराव्या दिवसापर्यंत) असते, असे समजून केले जातात, त्यामुळे मृताच्या आवडीचा पदार्थ करणे यथोचित वाटते.

जेवण वगैरे काही न करता येणार्‍याचे हातावर फक्त थोडी साखर ठेऊन तोंड गोड करण्याचीही पद्धत आहे, असे ऐकले आहे. अश्या वेळेला कुणीही नावे ठेवत नाही, वा ठेवायला नको.

रेवती

पोळ्या, लाल भोपळ्याची भाजी, साधा भात, वरण, आमसुलाची चटणी, हरभरा डाळीचे वडे, तांदळाची खीर, काहीजणांकडे रव्याचे लाडू.

संजय क्षीरसागर

घरच्यांना आनंदाचा आणि सोईचा होईल असा कोणताही स्वयंपाक करा. ज्यांनी वडीलांची सुश्रुषा केली त्यांच्या सर्व कुटुंबियांना जेवायला बोलवा. वडीलांचे सदगुण आणि त्यांनी जे जे काही चांगलं केलं त्या आठवणींना उजाळा द्या. दुसर्‍या दिवसापासून प्रसन्नचित्तानं कामाला लागा.

गेलेल्याच्या स्मृतीप्रती कृतज्ञता उचित आहे पण जे आहेत आणि ज्यांनी सहकार्य केलंय त्यांच्यासाठी काही करणं योग्य ठरेल.

निर्भयपणे नवीन पायंडा पाडा.

प्यारे१

+६.

४ नंबर मुवि, ५ नं चौ राकाका

अग्निकोल्हा

संजयशी मनःपुर्वक सहमत. रुपेरी किनारीचे एक उत्तम उदाहरण म्हणून हा विचार मनात ठसतोय.

च्यायला, संक्षींशी इतक्या लवकर सहमतीची वेळ येईल असं वाटलं नव्हतं.

अवांतर : कोणी गेलं आहे आणि त्या विधिनिमित्त तिथं पोटात दोन घास (लोक चांगलं दाबून जेवतात) ढकलायचं मला लै जड जातं.

-दिलीप बिरुटे

आनंदी गोपाळ

अवांतराशी सहमत. मी सहसा अशा ठिकाणी जात नाही. पण लोकांनाही ते आवडत नाही.
स्वतःच्या घरी कोणतेही विधी केले नाहीत. फार चौकश्या करणार्‍या कर्मठ नातेवाईकांना कन्याकुमारीस जाऊन त्रिसमुद्रसंगमावर विधी केलेत असे सांगितले. ;)

विटेकर

सहमत !
अवांतर : महालयामध्ये घरी दोन ब्राह्मण आणि एक सवाष्ण जेवायला होते. फार म्हणजे फारच गरिब होते. ते जेवल्यावर खूप खूप समाधान वाटले. पूर्वजानांही वाटले असावे.अनेक दिवस बहुधा त्यांनी सुग्रास आणि पोटभर खाल्ले नसावे.
वास्तविक श्राद्ध-पक्षाविषयी मा़झी मते अगदी टोकाची आहेत ( मेले माणूस भोजना येते हा एक भ्रम - समर्थ )पण त्यामधे असा एखादा सामाजिक अभिसरणाचा पैलूही असावा. सूक्श्म विचार करु जाता , आपल्या कोणत्याच रुढी निरर्थक नाहीत त्या नव्या प्रकाशात स्वीकारायला हव्यात.

बॅटमॅन

कधी नव्हे ते सहमत. (विटेकरजी तुम्हाला उद्देशून म्हणत नाहीये)

संजय क्षीरसागर

माझ्या पुढे हवे!

अग्निकोल्हा

च्यायला, संक्षींशी इतक्या लवकर सहमतीची वेळ येईल असं वाटलं नव्हतं.

त्यात काय ? संक्षीं बहुतांश नॉन-जिनेरिक स्टेटमेट्स ही सहमती करण्यासारखिच बोलतात.

संजय क्षीरसागर

मृत्यूवर मात करण्याचा एकमेव उपाय त्याचा स्विकार करणं हा आहे.

जीवनाचा एक नियम आहे, त्याला रिवर्स गियर नाही.

ज्या ज्या वेळी आपण रिवर्स गियर टाकायचा प्रयत्न करतो तेंव्हा फक्त स्मृती सक्रिय होऊन क्लेश होण्यापलिकडे काहीही होत नाही. कारण काहीही केलं तरी घटना बदलत नाही.

लेखक इंटरनेटवर रेसिपी शोधतोयं हा त्याचा निर्णय आहे पण भावनाविवशतेनं प्रसंग लांबतो. टू बी वेरी फ्रँक गेलेल्याला काहीएक फरक पडत नाही. जे आहेत त्यांच्या जीवनात प्रसंगातनं बाहेर पडण्याऐवजी त्यात आणखी गुंतून पडायला होतं. जर मित्राची आर्थिक परिस्थिती खरंच बिकट असेल तर त्याचा खर्च तर वाढेलच पण रोजच्या कामात खोळंबा होईल.

चित्रगुप्त

आम्ही वैयक्तिक रीत्या संक्षींशी सहमत आहोत, तरी जे काही करायचे, त्यात गं.भा. मातोश्रींचे मताचा आदर करावा, त्यांना दु:ख होईल असे करू नये, असे सांगावेसे वाटते.
(अलिकडील मंडळींना कदाचित ठाऊक नसेल, गं.भा. म्हणजे गंगा भागिरथी हे विधवा स्त्रियांच्या मागे लावण्याचे उपपद आहे)
धागाकर्त्याचा मूळ प्रश्न मेनू विषयी आहे. मशारनिल्हे मित्राच्या (स्वगतः हुश्श...वापरायला मिळाला बुवा हा शब्द एकदाचा) घरचे वातावरण कितपत कर्मठ आहे? त्यांच्या मातुश्रींची इच्छा काय आहे? हे धागाकर्त्याने सांगितलेले नाही.
विधी करायचेच असतील तर त्याबद्दल आगाऊ माहिती, खर्चाचा अंदाज घ्यावा, पुरोहित मंडळी सुद्धा घासाघीस केल्यावर आपल्या बजेट मधे सर्व विधी करून देतील.

पैसा

ते थोडक्यात आणि पसारा न घालता विधी करतात ना?

तत्त्व म्हणून सगळं चांगलं आहे आणि संक्षींचं कौतुक करायला पाहिजे. पण मेनुविषयी प्रश्न आहे, आणि तोही धागाकर्त्याचा स्वतःचा नव्हे. त्याच्या मित्रासाठी. तेव्हा इथे चर्चा करून धागाकर्त्याला हे विधी करू नयेत वगैरे पटलं तरी त्याच्या मित्राच्या घरी काय परिस्थिती आहे ते आपल्याला माहित नाही. तेव्हा ते त्यांच्यावर सोडून द्यावे.

कधी कधी गेलेल्या माणसाने काही काही आपल्यासाठी करा म्हणून सांगितलेले असते. माझ्या एका नातेवाईकांनी आपण गेल्यावर आपल्याला घरात कुठे शेवटचं ठेवा हेही सांगितलं होतं! तेव्हा गेलेल्याला आता काही कळणार नसले तरी मृताचा आदर म्हणून अशा काही गोष्टी करतात.

संजय क्षीरसागर

आणि नवा पायंडा पडतो.

प्रत्येक प्रसंगात अनेक नातेवाईकांचे भावनिक संबंध असतात पण शेवटी निर्णय आपण घ्यायचा असतो. जर प्रत्येकाचा विचार केला तर पुन्हा रुळलेल्या वाटेवरच प्रवास होतो. शिवाय बदल हा आपण असतांना झाला तरच अर्थ. गेलेल्यानं काहीही करु नका म्हणून सांगितलं तरी नक्की काय झालं हे बघायला तो नसतो.

यात आणखी एक पैलू आहे : मृताचा आदर. पण आदर किंवा अनादर नक्की कशानं होतो हे ठरवणारे शेवटी आपणच असतो. आणि मृताची मानसिकता जर त्याच्या हयातीत बदलली नसेल तर ती शेवटच्या क्षणी कशी बदलेल?

पुन्हा वर म्हटल्याप्रमाणे बदल घडवू शकणारा गेल्यावर, उरलेल्यांनी काय केलं हे पाहायला तो नसेल. आणि त्यांनी जनरितीचा आदर करुन पुन्हा तेरावा घातला तर त्यांना कोण आडवणार हा मुद्दा आहेच. थोडक्यात पुन्हा जैसे थे!

लेखकाचा मित्र निर्णयासाठी त्याच्यावर अवलंबून आहे. आता मेन्यू शोधायचा का साधा स्वयंपाक करुन उपयोगी पडलेल्यांना जेवू घालायचं हे त्यानी मित्राला सांगितलं तर किमान विचार तरी होऊ शकेल. फक्त तेराव्याचा मेन्यू हवा असेल तर सदस्यांनी तो दिला आहेच.

कंजूस

करणाऱ्याने आपल्या मतावर ठाम राहिले तर तो काहीपण करू (अथवा न करू) शकतो .शहरातला माणूस वाचतो पण गावांत मात्र समाजाला विरोध करू शकत नाही .त्याला कर्ज काढून जेवणावळ करावीच लागते .

कंजूस

चार चार पुऱ्या आणि पातळ तिखट रस्सा भाजी अथवा वाटाण्याची उसळ बऱ्याच लोकांना देऊन मोकळे व्हा .

मदनबाण

आमसूलाची चटणी ची नक्की भानगड काय आहे ?
मनुष्य मेल्यावरच ही चटणी का केली जाते ?

संजय क्षीरसागर

राहिलेल्या लोकांचं पित्त खवळलेलं असेल तर शांत करते!

सूड

जे काही कराल ते मनापासून करा म्हणावं, मग नुसता वरणभात केला तरी पोचतो !! पुढे ज्याची त्याची इच्छा.

संजय क्षीरसागर

काय केलं शेवटी?

संजय क्षीरसागर

लोक हक्कानं मदत मागतात, आपण प्रेमानं मदत करतो आणि पुढे विचारणार्‍यानं काय केलं याचा फिडबॅक येत नाही... अशा प्रकारे सदस्यांना उपयोग होऊ शकेल असं काहीही निष्पन्न होत नाही.

vikramaditya

सर्वांना माहितीबद्दल धन्यवाद. माहिती मित्रापर्यंत पोहोचवली.

त्याप्रमाणे मित्राच्या घरच्यांनी यथाशक्ती विधी पार पाडले.

धन्यवाद.

आपण प्रेमानं मदत करतो आणि पुढे विचारणार्‍यानं काय केलं याचा फिडबॅक येत नाही... अशा प्रकारे सदस्यांना उपयोग होऊ शकेल असं काहीही निष्पन्न होत नाही."

थोडा वेगळा विचार...

त्यांनी ह्या धाग्याचे काय केले? किंवा त्यांनी नंतर काय ठरवले, हा मुद्दा निदान माझ्या द्रुष्टीने तरी गौण आहे.
मी तरी ह्या धाग्यातून इतके तरी शिकलो

....की विधी गौण आहेत.आपापले अंथरूण बघा आणि पाय पसरा...

संजय क्षीरसागर

मी तरी ह्या धाग्यातून इतके तरी शिकलो
...की विधी गौण आहेत.आपापले अंथरूण बघा आणि पाय पसरा...

थोडी दुरुस्ती -

विधी निरर्थक आहेत हे माझं म्हणणंय. आणि..... अंथरुण पाहून पाय लेखकाच्या मित्रानी पसरलेत!