केजरीवालांचे वाराणशीतील भाषण
केजरीवालांचे आजचे काशीतले भाषण १५-२० मिनिटे पाहत होतो. केजरीवालांनी अत्यंत नकारात्मक भाषण केले. संपूर्ण वेळ फक्त मोदींवर टीका करत होते. निवडून आलो तर आपण स्वतः किंवा आपला पक्ष नक्की काय करणार आहे याविषयी भाषणात चकार शब्द नव्हता. मोदी निवडून आले तर तुमचे कसे वाटोळे होईल हाच भाषणातला मुख्य मुद्दा होता. बाकी काहीच नव्हते. मोदी कसे वाईट आहेत, मोदी आणि राहुल अंबानी-अदानींच्या हेलिकॉप्टरमधून प्रवास करतात, नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाल्यास देशातील लघूउद्योग संपुष्टात येतील आणि शेतकरी आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतील, मोदी निवडून आल्यास वाराणशीतले सर्व लघुउद्योग बंद पडतील व आजूबाजूच्या शेतकर्यांना आत्महत्या कराव्या लागतील, नरेंद्र मोदींनी केवळ बड्या उद्योगपतींचा विकास केला आहे. मोदींच्या गुजरातमध्ये आतापर्यंत तब्बल ६०,००० लघुउद्योग बंद झाले, मोदींनी शेतक-यांच्या जमिनी हिसकावून अदानी आणि अंबानी यांना दिल्या, मोदी प्रत्येकवेळी मतदारांना धमक्या देऊन निवडून येतात ... मोदीनिंदा, मोदीनिंदा आणि मोदीनिंदा ... या व्यतिरिक्त त्यांच्या भाषणात काहीच नव्हते.
आपला पक्ष महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी इ. कशी कमी करणार आहे, देशाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आपल्याकडे काय योजना आहेत, देशाची अंतर्गत व बाह्य सुरक्षा आपण कशी करणार आहोत, आपल्या पक्षाचे परराष्ट्र धोरण काय आहे, शेतकर्यांसाठी आपण काय करणार आहोत, आपल्याकडे विकासाच्या कोणत्या कल्पना आहेत या व अशा अनेक प्रश्नांवर त्यांनी चकार शब्दही काढला नाही.
नेहमीच्या पद्धतीनुसार नाटकीपणा केलाच. सकाळी माध्यमांना सोबत घेऊन गंगेत डुबक्या मारल्या. नंतर भाषण सुरू असताना मध्येच ३-४ मिनिटे थांबले. कारण हे होते की कुठूनतरी मशिदीतली बांग ऐकू येत होती. बांग संपेपर्यंत थांबून आणि सकाळी गंगेत डुबक्या मारून आपली दिखाऊ धर्मनिरपेक्षता व लांगूलचालन दाखवून दिले. आजूबाजूला बरीच मुस्लिम वस्ती असलेले मैदान निवडण्यातही काँग्रेससारखीच चतुराई दिसली.
१९८७-८९ या काळात वि.प्र.सिंग जशी नाटके करत असत तसेच केजरीवालांनीही आज केले. त्यांनी अंबानी बंधूंचे स्विस बँकेत खाते असून यामध्ये कोटीच्या-कोटी काळा पैसा असल्याचा आरोप केला व अंबानी बंधूंच्या स्विस बँकेतील खाते क्रमांकही जाहीर केले- खाते क्रमांक- ५०९०१६०९८३ आणि ५०९०१६०९८४. वि.प्र.सिंग यांनीही बोफोर्स प्रकरण जोरात असताना राजीव गांधींच्या स्विस बॅंक खात्याचे क्रमांक असेच जाहीर केले होते. त्याच धर्तीवर केजरीवालांनी तोच नाटकीपणा केला. परंतु २०१४ मधील मतदार १९८८ च्या तुलनेत जास्त शिक्षित आहे याची त्यांना कल्पना नसावी.
एकंदरीत एक अत्यंत नकारात्मक भाषण व कमालीचा नाटकीपणा केजरीवालांनी आज वाराणशीत केला.
---------------------------------------------------------------------------
केजरीवाल व इतरांवर आज वाराणशीत शाई फेकल्याचे दाखवत होते. यापूर्वी योगेंद्र यादवांना शाई फासणारा 'आप'चाच कार्यकर्ता होता. 'आप'ने त्याच्याविरूद्ध काहीच कारवाई केली नाही. काही दिवसांपूर्वी हरयानामध्ये केजरीवालांना काळे झेंडे दाखविणारे 'आप'चेच कार्यकर्ते होते. मनीष सिसोदियांना पाटण्यामध्ये काळे झेंडे दाखविणारे देखील 'आप'चेच कार्यकर्ते होते. स्वतःच्याच कार्यकर्त्यांकडून शाई फेकण्यासारखी खोडसाळ कृत्ये करून सहानूभूती मिळविणे आणि इतर पक्षांवर दोष ढकलणे ही 'आप'ची नवीन स्ट्रॅटेजी दिसतेय.
प्रतिक्रिया