विसापूर किल्ला - नाईट trek - एक अविस्मरणीय अनुभव...
Primary tabs
खुप दिवस नाईट trek ला जायच मनात होत. पण कदाचित वेळ येत नव्हती. पण शेवटी २७-एप्रिल-२०१४ म्हणजेच शनिवारी जायच ठरल विसापूरला. शनिवारी दुपारी ३.०० च्या लोकलने निघायच, तिथे साधारण ४.३० पर्यंत पोहोचायचं आणि ५.०० वाजता गड चढायला सुरुवात करायची,म्हणजे अंधार पडायच्या आत गडावर पोहचून तिथेच रहायच ,अणि सकाळी उठून गड पाहून लोकलने परत पुण्याला, असे साधारण नियोजन होते.
विसापूर किल्ल्याची बेसिक माहिती सगळ्यांकडेच होती,पण गड चढायचा रोड कोणालाच माहित नव्हता. पण "आज कुछ तुफानी करते है" अस म्हणत रस्ता शोधायचा ठरवलं....(उगाच मस्ती..बाकी काय!!!) दुपारी ३.०० च्या पुणे-लोणावला लोकलने आम्ही मजल-दलमजल करत "मळवली" स्थानकाला पोहचलो. तिथे ऊतरल्या-ऊतरल्या लगेच समोर विसापुर किल्ला दिसतोच!! (खर तर एक टेकडी दिसते, खरा किल्ला त्या टेकडीच्या मागे लपला गेलाय,हे आम्हाला वर गेल्यावर समजलं :P )
खालून दिसणारा विसापूर किल्ला
साधारण ५.१५ वाजता आम्ही किल्ला चढायला सुरुवात केली. मळवली गाव ओलांडून आम्ही पाटण नावाच्या गावात पोहचलो. तिथून जी पायवाट दिसली तिकडून चालायला सुरुवात केली. जाताना गावतली लोक दिसत होती.एकदम खेडेगावी वातवरण!!!लोक पाणी भरत आहेत.खुप दिवसांनी कोंबड्या आणि त्यांची पिल्लं पहायला मिळाली. :P रस्त्यात एक अजोबा भेटले. त्यांनी थोडफार guide केल्या प्रमाणे चालत राहिलो. हळू-हळू घरं तुरळक व्ह्यायला लागली. आता जरा चढ लागायला लागला होता. समोर ३-४ पायवाटा दिसत होत्या.त्यातल्या एकाला आम्ही लागलो. आमच्यातला एक जण उगाचच मज्जा म्हणून दुसरी कडुन जयला लगला. तेवढ्यात खालच्या एका घरातुन एक छोटा मुलगा बाहेर आला आणि ओरडू लागला "दादा,एकडुन नका, इकडून सरळ जावा,नहितर चुकाल रस्ता." झाल...त्याने दाखवलेल्या पायवाटे वरुन आम्ही चालू लागलो.
समोर रस्ता तर दिसत होता, जिकडे पायवाट जात होती तिकडे आम्ही चालत होतो. अजून १/४ किल्ला पण चढून झाला नव्हता.आणि संध्याकाळचे ६.३० वाजले होते. खूप चालल्यावर समजल कि पुढे वाट बंद आहे. आम्ही २-२ जणांचे group करुन २ दिशांना गेलो. पण वाट सापडत नव्हती. तेवढ्यात कोठून तरी आरोळी देण्याचा आवाज आला. एक मुलगा पलिकडच्या टेकडी वरून आम्हाला हाका मारत होता आणि हातवारे करून सांगत होता कि तुमचा रस्ता चूकला आहे. :( इकडे आमची वाट लागली होती. heart-beats इतक्या वाढल्या होत्या ,अस वाटत होत की कोणत्याहि क्षणी heart फुटून बाहेर येईल. :(
मग आम्ही त्याच्या दिशेने चालू लागलो.(पर्यायच नव्हता.रस्ता कोणालाच माहित नव्हता.) शेवटी १५-२० मिनिटे चालल्यावर त्या मुलापाशी पोहचलो. तो पर्यंत ७ वाजून गेले होते. बराच अंधार पड्ला होता.तो मुलगा भेट्ला नसता तर आम्ही किती वेळ शोधत बसलो असतो रस्ता देव जाणे!!! मग त्याने सांगितलं,सरळ जा,दरीची वाट सोडू नका.जास्तित जास्त १ तासात पोह्चाल.
विसापूर तसा कठीण आहे चढायला!! खूप फसव्या पायवटा आहेत. त्या मूलाने सांगितलं तसा आम्ही दरीच्या वाटेने चालत होतो. वाटेत खूप मोठे मोठे दगड आहेत. आणि पूर्ण वाटेवर करवंद ,बोर आणि निवडूंगाचेकाटे. समजत नव्हत की नक्की आम्ही बरोबर चाललो आहोत कि नाही. पण चालत राहायचं हेच सगळ्यांच त्या वेळच ध्येय होतं :P वाटेत खूप काटे असल्याने सगळ्यांचे हात-पाय काट्यांनी खरडून निघत होते. पण तिकडे दूर्लक्ष करून चालत राहण्या शिवाय पर्याय नव्हता. खूप अंधार झाला होता. क़हिहि करून गडावर पोहचण गरजेचं झाल होतं. कारण वाटा खूप फसव्या होत्या. जरी खाली उतरायचं ठरल असतं तरी ते possible नव्हत.सगळे जाम tension मध्ये आले होते.पण कोणी तसं दाखवत नव्हतं. (जे, मला वाटत, खूप गरजेचं होतं. कारण एक जरी नकारात्मक विचार निर्माण झाला असता तरी त्या रात्रीच्या अंधारात,वाट माहित नसलेल्या गडावर सगळ्यांचीच अवस्था बिकट झाली असती.सुदैवाने आमच्या group मधल कोणी तसं रडकं नव्हत.) सगळे challenges accept केल्यासारखे चालत होते. :)
हीच ती वाट जी आम्ही चढून आलो (दुसऱ्या दिवशी काढलेला फोटो)
थोड थांबत,बसत आम्ही चालत राहिलो. मध्ये मध्ये फसव्या पायवाटा लागत होत्या.परत १-२ वेळा रस्ता चुकलो. पण चढत राहिलो. आम्ही ७ जण आणि ३ विजेऱ्या. शेवटी आम्हाला चांगल्या स्थितीतल्या मधल्या दगडी पायऱ्या लागल्या.तिथे एक हनुमानाचे मंदिर देखील होते. गड आता नीट दिसू लागला होता. सगळ्यांच्या जीवात जीव आला. शेवटी रात्री ९ वाजता आम्ही गडावर पोचलो होतो. मोहीम फत्ते झाली होती. (त्या काळी असले अवघड किल्ले कसे काय चढत असतील देव जाणे :O ) वरती पोचल्यावर "शिवाजी महाराज कि जय" अश्या आरोळ्या ठोकत आम्ही आमचा आनंद व्यक्त केला :)
गडावरून समोरच जे दृश दिसत होतं .आहह !!! पुणे -मुंबई हायवे अतिशय मोहक दिसत होता. त्या वरून धावणाऱ्या गाड्या अगदी खेळण्यातल्या असल्या सारख्या छोट्या-छोट्या दिसत होत्या. डावीकडे संपूर्ण लोणावळा दिसतं होता आणि डोक्यावर आकाश!! अगदि काळकुट्ट… आणि त्यात चमचमणारे तारे…अगदी स्वर्गात आल्या सारख वाटत होतं :) सुख-सुख म्हणतात ते हेच होतं बहुतेक. गार वारा वाहत होता . इतका वेळ केलेल्या श्रमाचं सार्थक झाल्यासारख वाटत होतं.
थोडा वेळ शांत बसून या amazing वातावरणाचा आनंद लुटल्यावर लक्षात आलं कि आपल्या कडच पाणी संपल आहे. :( खाली भेटलेल्या मुलाने सांगितला होतं कि वर पाण्याच्या टाक्या आहेत. मग आमच्यातले २ जण गेले पाण्याच्या शोधात . ज़वळ -जवळ अर्धा तास फिरून देखील त्यांना पाणी मिळालं नाही म्हणून हताश मानाने ते दोघे परत येत असताना आम्ही जिथे बसलो होतो तिथून फक्त २५-३० फुटावर पाणी असल्याच त्यांना दिसलं. सगळ्यांनाच आनंद झाला. पाण्यात आधी battery मारून चेक केलं ,पाणी कितपत स्वछ्य आहे ते. आश्चर्य वाटेल पण पाणी तळ दिसत होता इतकं स्वछ्य होत. सगळ्यांनी आपलाल्या पाण्याच्या बाटल्या भरून घेतल्या आणि मग आम्ही मस्त चांदण्यात जेवायला बसलो. खूप भूक लागली होती. येताना आणलेल्या सगळ्या पदार्थांवर तव मारत आम्ही जेवलो. गडावर पाण्याचा शोध घेताना सापडलेल्या चार भिंती असलेल्या एका मोठ्या "resort" (:P ) मध्ये आम्ही झोपायचं ठरवलं. तिथे इतकं वार होता कि मोकळ्या पटांगणावर झोपणं अशक्य होत. (कदाचित ती आम्हाला मिळालेली खोली त्या वेळची धान्याची गोदाम असावीत.)
जेवण झाल्यावर रात्री १२.३० पर्यंत full-on गप्पा सुरु होत्या. नंतर २-२ जणांनी जागून गस्त घालायचं असं decide झालं. कारण गड किती मोठा आहे,जंगल वगैरे किती आहे,कोणते प्राणी आहेत काहीच idea नव्हती. (मी तर रात्रभर जागीच होते. कितीही नाकबूल करायचं ठरवलं तरी भीती वाटत होती. कदाचित रात्रीच्या अंधाराची :P )
सकाळी लवकर जाग आली. (झोपलेच नव्हते म्हणून :P ) उजाडलं होतं. मग लगेच camera काढला आणि सूर्योदयाचे फोटो काढायचं कित्येक दिवसाचं स्वप्न पूर्ण करायला आमच्या त्या "resort " च्या बाहेर पडले. सगळीकडे उजाडलं होत. आत्ता समजत होत कि नक्की आम्ही कुठे अहोत. थोडं पुढे जाऊन दरीत पाहिलं. सगळी कडे धुकं होतं. समोर सुर्यानारायानाने आपली हजेरी लावली होती. डोंगरा आडून येणारं ते सूर्याचं तांबड रूप,वातावरणाच्या मोहकतेत अजून भर घालत होतं. थोडं आणखी पुढे जाऊन पाहिलं क़ल आम्ही चढून आलेली वाट दिसत होती. बापरे रात्रीच्या अंधारात समजलच नाही आम्ही किती उंच चढून आलो आहोत ते !!! सकाळी अगदी स्पष्ट दिसत होतं. ज्या वाटेने आलो,तिथून खाली उतरण काही शक्य वाटत नव्हत.
सूर्योदय
सूर्योदय हातात :P
बराच वेळ फोटो काढून झाल्यावर मग बाकीच्या ग्यांगला जाऊन उठवलं. (चढायला इतका वेळ लागला तसाच उतरताना देखील लागेल आणि उन्हं वर यायच्या आत खाली उतरण गरजेच होतं म्हणून) आधी गड पूर्ण फिरून पाहायचा असा ठरलं. तिथे धान्य साठवायची काही गोदाम आहेत. त्याचं बांधकाम अजून देखील शाबूत आहे. एक शिवकालीन तोफ अहे. एका बाजूची तटबंदी अजून देखील अतिशय भक्कम आहे.समोर दिसतो तो लोहगड. लोहगडा पेक्षा विसापूर चढायला कठीण आणि विस्ताराने बराच मोठा आहे. हा किल्ला अतिशय stiff आहे जवळ -जवळ सगळ्या बाजूंनी दरी असल्याने किल्ल्यावर आक्रमण करण तेवढ सोप नाहीये. तिथे त्या काळातलं चुना दळायंच भल मोठ्ठं जात आहे. हा किल्ला बाळाजी विश्वनाथ यांच्या काळात बांधला गेला आहे. पण त्या मानाने दुर्लक्षिला गेलेला असा हा किल्ला वाटतो.
आमचं "resort " :)
बुरुज
सगळा किल्ला फिरून झाल्यावर असा ठरलं कि किल्ल्याच्या मागून एक वाट आहे त्या वाटेने जायचं.(आम्हाला गुगल च्या सहकार्यामुळे एक नकाशा मिळाला ,त्यात हे समजलं) मग किल्ल्याची मागची बाजू गाठली.बरिच खाली एक मोठी पायवाट आहे आणि ती लोहगडा कडून येणाऱ्या डांबरी रस्त्याला जाऊन मिळत आहे हे सरळ दिसत होत. पण त्या पायावाटे पर्यंत जायचा रस्ता काही सापडत नव्हता.बरच वेळ निरीक्षण केल्यावर खूप दगड असलेली एक वाट खाली जात होती असा दिसलं.(बाकी कुठून त्या पायवाटे पर्यंत जायचा मार्गच नव्हता) शेवटी त्याच दगडांच्या रस्त्या वरून खाली उतरायचं ठरवलं आणि उतरू लागलो. हि वाट पण काही फार सोपी नव्हती उतरायला. काही काही दगड खूप छोटे होते.चुकुन त्यावर पाय पडला आणि ते मातीतून सटकले तर सरळ दरीत जाण्याचा संभाव होता. त्यामुळं फार जपून पावलं टाकावी लागत होती. पण कालच्या वाटेपेक्षा हि वाट छोटी होती. असा वाटत होतं कि या पूर्वी पायऱ्या होत्या आणि गडावरच्या आक्रमणांच्या काळात या फोडल्या आहेत.साधारण अर्ध्या तासाने आम्हाला वरून दिसणारी पायवाट लागली आणि हायसं वाटलं :)
खाली आल्यावर दोन्ही बाजूनी असलेल्या करवंदाच्या जाळ्यान मधली कच्ची करवंद काढली (लोणच्यासाठी). एका झाडाच्या सावलीत न्याहारी केली आणि लोहगड कडून येणाऱ्या डांबरी रस्त्याला लागलो. तिथून मळवली ६ कि.मि. होत. उन्ह बरीच वर आली होती . तेवढ्यात वाटेत एक मुलगा कलिंगड विकत असलेला दिसला. कलिंगड खाऊन तृप्त झाल्यावर जवळ जवळ १ तास चालत आम्ही मळवली स्थानका वर पोचलो. अश्या प्रकारे आमची विसापूर गड trekking सहल सुफळ संपूर्ण पार पडली.
P.S. - पहिल्यांदाच मिपा वर लेखन केलं आहे.चुक-भूल देणे घेणे :)
तेव्हढा 'हातातल्या सूर्याचा' फोटो काढताना फ्लॅश ऑफ ठेवला असतात तर बरं झालं असतं. अचानक असा बेत ठरवायची मजा असते खरी पण जरा जपून - वाट चुकला असतात, पाणी मिळालं नसतं तर कठीण प्रसंग आला असता. पुढील ट्रिपांसाठी, आणि अशा अजून लेखनासाठी, शुभेच्छा.
पाटण गावातून वर चढणारी फसवी आहे. त्या वाटेला हमखास चकवा लागतोच.
बाकी विसापूर बाळाजी विश्वनाथ भट ह्यांचे काळात बांधलेला नाही तर तो सुमारे २००० वर्षांपूर्वी सातवाहन कालखंडात बांधला गेलाय. लोहगडाच्या बाजूने उतरणार्या वाटेवर कड्याच्या बाजूला एका पाण्याच्या टाकीवर ब्राह्मी लिपीतला एक शिलालेख आहे.
आमचा विसापूर भटकंतीचा अनुभव येथे पहा.
आमचाही अण्भव आठवला. पाटण गावातून नै तर भाजे लेण्यांकडून आम्ही चढलो, २ वेळा रस्ता चुकून तिसर्यांदा बरोबर वाटेला लागलो. उतरतानाही चकवा लागायचा तो लागलाच.
तदुपरि ब्राह्मी शिलालेख कै दिसला नै. जमल्यास फटू टाक की.
पाऊस मजबूत असल्याने फोटू घेता आला नाही तेव्हा. :(
आता जाईन तेव्हा काढेन परत.
अवश्य!
तो फोटो फ्लॅश ऑफ ठेउनच कढला आहे.कदाचित over exposed झालाय...
वल्ली,तुमचा लेख वाचला, खूप छान आहे. आधी वाचायला हवा होता :P
पण फोटो एवढे कमी का टाकलेत?
अजून शिकते आहे photography :)
__/\__
अतिशय थरारक वर्णन!! लेख आवडला.
नितांत सुंदर किल्ला... विसापूर आणि लोहगड एकदम करायचो, पण आता लोहगडावर नाही जात. मुसलमानांनी अतिशय मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केलंय गडावर. लोहगड वाडीतल्या तरुणांनी एकदा बांधकाम तोडले होते, तर त्या बदल्यात दोन नवीन बांधकामे बांधली आहेत. %$%^%^%^$^%$#%#$#
विसापूर किल्ला चढायला सोप्पा, पण वाट नाही मिळाली, तर वाट लागते.. तेव्हा रात्रीच्या वेळी जपून. फोटो अजून हवे होते... असो :)
विसापूर चे लेखन लोहगडाच्या ट्रेकची आठवण झाली. विसापुरला कधी जाणे झाले नाही परंतु लोहगड खूप वेळा केलाय.
मुसलमानांचे आक्रमण तेव्हा म्हणजे २००० च्या आसपास सुद्धा खूप झाले होते. प्रथम कळले नाही कि मशिदी वगैरे गडावर कशा आल्यात. पण नंतर पत्ता लागला. मग तिकडे फारसे जाणे झालेच नाही.
रात्रीची चढाई अतिशय जोखमीची आणि थरारक असते. विशेषतः रस्ता माहिती नसेल तर अजूनच मजा. अपघात न होता आणि फार वेळा रस्ते न चुकता जर वर पोहोचलात तर छानच! मेहनतीचे सार्थक होते.
ट्रेक मध्ये मला हमखास येणारा अनुभव म्हणजे वर पोहोचल्यावर खूप भूक लागलेली असते. इतकी कि सगळ्यांचे डबे आपण एकटाच खाऊन टाकू शकू एवढा आत्मविश्वास! परंतु खायला लागल्यावर आपल्या एकट्याचा डबा सुद्धा संपत नाही.
ट्रेकची माहिती आणि फोटो आवडले.
फारच थरारक अनुभव होता ....
धन्यवाद भाते :)
मिपावर स्वागत! पहिल्याच प्रयत्नात छान लिहिलय. फोटो आहेत ते चांगलेच आहेत.
लोहगडावर अतिक्रमण झालं असेल तर ते उलथवायचा प्रयत्न केला पाहिजे ना, का तिकडे जाणे सोडून द्यावे!
लेख...
आवडला....
पहील्या प्रयत्नात लेख छान झाला आहे. पण अजून फोटो असायला हवे होते..
विसापूर कालखंडाबाबत वल्लीशी सहमत..
असाच काहीसा अनुभव आम्हाला 'राजगड' चढताना आला होता.
फोटू चांगले आलेत.
धन्यवाद :)