राजमाची उन्हाळी भटकंती: १
Primary tabs
१)सुधागड तेलबैलाची भटकंती करून एक सवावर्ष होऊन गेलं .त्यानंतर सह्याद्रित कुठेच भटकलो नव्हतो .अगदी २०१३चा पावसाळाही कोरडाच घालवला .नाही म्हणायला कर्नाटक ,राजस्थानात सहकुटुंब पर्यटन झालं .परंतु चार धोंडे ठेचकाळून ,पायात काटे मोडून घेत सह्याद्रिच्या दऱ्या धुंडाळायला मिळाल्या नाही तर काही तरी चुकल्यासारखं होत राहतं .शेवटी नवीन सरकारला सोळा मेला दिल्लीला पाठवून राजमाचीचा बेत आखला .
भिमाशंकर आणि राजमाची या ठिकाणी वर्षभरात तीनही ऋतुंमध्ये जाता येते .प्रत्येकवेळचा निसर्ग वेगळा असतो .पावसाळ्यात आणि हिवाळ्यात भटक्यांची फारच गर्दी असते .उन्हाळ्यात इकडे दोन विशेष गोष्टी पर्यटकांची वाट पाहात असतात .एक रानमेवा आणि दुसरे रानपाखरांना आगोट्याला कंठ फुटतो .पाखरांचे गायन सतत उजाडल्यापासून चालू असते .
बुधवार एकवीस मे २०१४ला सवानऊची कर्जत गाडी पकडून डोंबिवलीहून निघालो .आजुबाजूला एंजिनिअरिंगचे विद्यार्थी पुस्तकात डोकी खुपसून परीक्षेचा अभ्यास करत होते .साडेदहाला कर्जत आले .बाजारातून आमराई रिक्षा नाक्याकडे निघालो .फळांनी बाजार भरलेला होता .काकडी टोमाटो घेतले .चार लिटर पाणी घेतलेच होते .आता आंबेडकर चौकात एक नवीन छान पाणपोई बांधली आहे .वडापावच्या खूप गाड्या दिसल्या आणि गर्दीपण होती परंतू आता खायचे नव्हते .इकडे नुकताच कॉंक्रिटचा चकाचक रस्ता केला आहे .दहा मिनिटांत नाक्यावर आलो आणि कोंदिवडे कडे जाणारी सहा सिटर रिक्षा लगेच मिळाली .पंचवीस मिनिटांत कोंदिवडे (पंधरा रुपये/प्र)ला उतरलो .इथे नवीन हॉटेल उघडले आहे .एक गुटगुटीत , टिशटवाला नेपाळी आचारी कांदाभजी(सध्या तरी )तळत होता .पाऊस आला की शनिवार रविवार गर्दी होईल .
सवाअकरा झालेले उन चांगलेच लागत होते .इतका वेळ पायाशी असणारी सहा किलोची सैक तिच्या जागेवर पाठीवर बसली आणि पायपिट सुरू झाली .तसा रस्ता आणखी दोन किमी कोंडाणे गावापर्यँत आहे पण रिक्षा कोंदिवडेपर्यँत नियमित पंधरा वीस मिनिटांनी असतात .
गाव सोडून पुढे कोंडाणेफाटयापर्यँत सात आठ जांभळाची झाडे रस्त्याकडेच आहेत .उन्हाने थकलेल्या वाटसरूंना थकवा घालवण्यासाठी सावली धरून गोड काळ्या जांभळांचा सडा घालून स्वागताला उभी असतात .पुढे कोंडाणेला उजवीकडे अथवा सालपेला डावीकडे न जाता खरवंडी गावाचा मधला रस्ता पकडला .मला ही खरवंडीची वाट आवडते .कोंडाणेकडून सरळ वर चढ आहे वाटेत कोंडाणे लेणी लागते . या कोंडाणे गावाजवळून आणि वाटेत कर्जत कडून येतांना आपल्याला उजवीकडे उल्हास नदीचे पात्र वाहतांना दिसते .मागच्या डोंगरात खंडाळा घाटातल्या रेल्वे गाड्या जातांना दिसतात .
बारा वाजता खरवंडी गावाच्या विहिरीपाशी पोहोचलो .पाणी बाराही महिने असते .बाजूला एक ग्रामदैवत आहे .येथूनच खरी चढण सुरू होते .राजमाचीच्या दोन किल्यांपैकी मनोरंजनची तटबंदी येथून दिसते . सुरवातीलाच एक आमराई आहे .वारा सुटला की आंबे खाली पाचोळयात पडत होते .थोडे सावलीत थांबून आंबे खाल्ले आणि पुढे निघालो .आता करवंदींच्या जाळ्या काळया गोड फळांनी लगडलेल्या होत्या .त्यासाठी थांबायला नको .तोडत पुढे जायचं .
पन्नासेक मिटर्स चढल्यावर एक सपाट कातळ टप्पा लागतो .इथले मोठे चिंचेचे झाड ही खूण आहे .तीन पायवाटा दिसतात .डावीकडची सपाटीवर जाणारी गुरांची आहे .उजवीकडची सपाटीने जाणारी सरळ लेण्यांकडे नेते .लेणी पाहूनही तिथूनच वर गडाकडे जाऊ शकतो .मधली वाट डोंगरात वर चढते ती पकडायची .
अर्धा तासाने आपण एका ओढ्यापाशी येतो .येथे वाट हरवली की काय असे वाटते .
कारण येथे ओढयात डावीकडे वरती पन्नासेक फूट गेलो की पलीकडे उजव्या हाताला वाट दिसेल .येथे मातीच्या वाटेने वर जातांना छान गार झाडी आहे .येथे सदाहरित वृक्ष आहेत .याच ठिकाणी शामा ,पट्टेरी कोकिळ ,टकाचोर यांचे गाणे ऐकायला मिळते .कुठे वरती वानरे असतात तर जमिनीवर पाचोळ्यातून एखादे भेकर सुसाट पळत जाते .
दहा मिनीटांत एक सपाटीवर येतो .डावीकडे गडाचा भाग आणि उजवीकडे खाली दरीत उल्हासचे पात्र दिसते .कोंडाणे गाव थोडे मागे पडलेले दिसेल .याच ठिकाणी कोंडाणे धरण होणार आहे .खंडाळ्याच्या हॉटेल फरियासच्या खालच्या दरीतले सर्व पाणी अडवणार आहेत .
अर्धा तास आडवे जातांना पानगळीची विरळ झाडी आहे .ऊन लागते .आकाशात सर्प गरूडाची जोडी घिरट्या घालतांना चिइव -विव- विव असा आवाज करते .कालशीर्ष कांचन अधून मधून टॉँक टॉंक असा झाडातून ओरडतो .एखादा सोनपाठी सुतार खेँखेंखेँ असा कर्कश पण मोठा आवाज करत डोक्यावरून उडत जातो .अगदी सकाळी गेल्यास रानकोंबडे लगबगीने वाटेवरून चटकन झाडीत पळतांना दिसतात .एखादा चिमुकल्या पोपटांचा (वर्नल हैंगिग पेरट) थवा उलटे टांगून गोंगाट करत असतो तो आपल्याला पाहून उडून जातो .इथले पक्षी फार सावध आहेत .वाटेत गलोल घेतलेली कातकरी मुले आणि दोरीचं जाळं घेतलेली (भेकरासाठी) माणसं भेटतात .
या वाटेने जातांना तीन मोठे आणि सहा लहान ओढे (सोपे) ओलांडावे लागतात .परंतु पावसाळ्यात धबधब्याची मजा घ्यायची असेल तर खालची लेण्यांची वाट पकडायची .नवव्या ओढयापाशी उजवीकडे पांढरीची झाडे दिसतात आणि एक खालून येणारी पायवाट मिळेल .या ठिकाणी सपाटीला पुढे न जाता ओढयाच्या पलीकडे वर चढणारी धोंडयाची वाट धरायची .
वीस एक मिनीटे वर गेल्यावर दाट झाडीतून एका मोठे धोंडे असलेल्या डावीकडच्या डोंगरातून खाली येणाऱ्या ओढ्यापाशी येतो .या ओढयातूनच वीसेक मिनीटे वर जायचे .ओढ्यात प्रचंड मोठे वृक्ष आणि वेली आहेत .प्रथम उजव्या कडेने आणि नंतर डाव्याकडेने वर गेल्यावर वनदेवता आहे .इथे ओढा संपतो .
वनदेवतेच्या वरच्या अंगास लेण्याकडची वाट दरीकडून येऊन मिळते आणि वर जाणाऱ्या वाटेच्या डावीकडे पाण्याची दोन टाकी आहेत .पाणी आहे पण घाण झाले आहे . आता आणखी अर्धा तास झाडीतून चढल्यावर माथ्यावर येतो .
चार वाजले होते आणि गार वाऱ्याने बरे वाटले .
भाग दुसरा
http://misalpav.com/node/27961
चुकून अर्धवट आलाय का धागा?
१)वाटेतली झाडी

२)राजमाचीच्या जोडकिल्यापैकी पूर्वेकडचे श्रीवर्धन शिखर.

३)तोफ.

४)पानावरचा किडा

५)एक आनंदी गावकरी.

६)राजमाची /उधेवाडीतली घरे

७)पोहे

१)कोंदिवडे गावाकडे रिक्षातून जाताना दिसणारा राजमाची डोंगर.

२)कोंदिवडे गावातले नवीन हॉटेल.
![2]()
३)जांभळांचा सडा.

४)रानमेवा करवंदे.

५)चिंचेचे झाड.

६)ओढ्यातले उंच झाड.

७)ओढ्यातली वनदेवता

अरे भाई आगे क्या हुआ!????
लिहितो आहे .
कंजूसकाका, मस्त लिहिलंत एकदम.
आतापर्यंत राजमाची खूप वेळा झाला. आम्ही पुण्यावरून येत असल्याने कायम लोनावळा-तुंगार्ली-पांगळोळी, धनगरवाडा-राजमाची हाच मार्ग कायम निवडायचो. फक्त एकदाच कोंडाणा लेणीच्या मार्गाने खाली उतरलो होतो. नितांत सुंदर ट्रेक आहे हा. जूनच्या पहिल्या ह्या मार्गाने जा. काजव्यांनी लगडलेली झाडेच्या झाडे प्रकाशमान झालेली दिसतील.
मिपावरच्या माझ्या अगदी सुरुवातीच्या दिवसांत राजमाचीवर थोडे खरडले होते.
जूनचा पहिला आठवडा आला जवळ ........... मग ......?
:(
सध्या हापिसमुळे काहीच शक्य नाही. २/३ र्या आठवड्यांत शक्य होईल.
पुभाप्र.
भटकंती आवडली. फोटो हि छान आलेत. जांभळं पाहुन हेवा वाटला.
धन्यवाद.
- पुभाप्र
माफ करा फोटो निर्रथक वाटतातयेत.काहीच अर्थबोध होत नाहीये, राजमाची कुठेय?