आदि कैलास,ओम पर्वत दर्शन पार्वती सरोवर परिक्रमा.भाग-२
Primary tabs
प्रथम आदि कैलास येथेच भगवान शिवशंकर यांचे निवासस्थान होते.कौरव-पांडवांचे युद्ध संपल्यावर विजयी पांडव भगवंताचे दर्शन घेउन पाप क्षालन करावे या हेतुने कैलासावर येण्यास निघाले,पांडवांच्या हातुन बांधव,गुरू हत्येचे पातक घडले होते त्यामुळे भगवान त्याना दर्शन न देता आणखी वर म्हणजे आत्ताच्या मोठ्या कैलास इथे निघुन गेले.अशी आख्यायिका आहे.आदि कैलास जवळ एक सहा शिखरे असलेला डोंगर आहे,ही शिखरे म्हणजे पाच पांडव आणि द्रौपदी असे मानतात.
आदि कैलास भारताच्या हद्दीत असुन त्या मानाने कमी उंचीवर म्हणजे १५७००फूट आहे.मोठ्या कैलासची उंची जवळजवळ १७०००फूट आहे.पार्वती सरोवर साधारण ५कि.मि.घेराचे आहे,तर मानस खुपच मोठे आहे.म्हणून ही यात्रा त्या मानाने सोपी आहे.
आमच्या ग्रुपमध्ये नाशिकहुन आम्ही सौ.वंदना परांजपे,श्री.रत्नाकर परांजपे.सांगली येथुन श्री. फडके,श्री. सुनील शिंदे,नागपुर येथुन श्रीमती मीना पुरोहित,सौ.रोहिणी सन्गवई,डोंबिवली येथुन श्री.पटवर्धन.मुंबई येथुन श्री.तुळापुरकर असे होतो आणि मार्गदर्शक होते श्री.सुनील पित्रे. याशिवाय जयपुर-राजस्थान येथील पाच जणांचे कुटुंब,दिल्ली येथील श्री.कपिल,नागपुर येथील पटेल असे सोळाजण होतो.कुमाऊ मंडल विकास निगम तर्फे बिपीनचंद्र पांडॅ हे मार्गदर्शक होते.
पहिल्या दिवशी पहाटे चार वाजता,ओम नमःशिवाय! बम बम भोले!आणि आपली मराठी गणपती बाप्पा मोरया!अशा गजरात बसने दिल्लीहुन प्रस्थान ठेवले.दिल्लीचा उन्हाळा भयन्कर तो रुद्रपुर पर्यन्त आपला पिच्छा पुरवतो.रुद्रपुरला पांडेजी बसमध्ये चढले,आणि आपली ओळख करुन दिली.ते निगम मध्ये पर्यटन संचालक म्हणुन कार्यरत आहेत. त्यांचे ऑफिस नैनिताल येथे आहे.मार्गदर्शकाचे काम त्यानी मुद्दाम मागुन घेतले होते केवळ शिवओम दर्शनासाठी.जेव्हा पुन्हा ही यात्रा सुरु झाली तेव्हा ते एक साधे पोर्टर म्हणुन नुकतेच नोकरीला लागले होते. नबिढांग येथील मुक्कामात प्रथम त्यानाच पर्वतावरील ओम दर्शन झाले.
रुद्रपुर नंतर घाट सुरु होतो,हवा थंड होऊ लागते,निसर्गबहार दिसू लागतो.आणि येते उत्तराखंडातील हिल स्टेशन अल्मोडा.अल्मोडा म्हणजे असंख्य मोड किंवा अनेक वळणा वळणांचे गाव.जिल्हा मुख्यालय आहे.येथे रामक्रुष्ण मिशनची शाखा आहे.स्वामी विवेकानंद भारत भ्रमण करीत असताना येथे आले असता तीन दिवस उपाशी व तहानेने व्याकुळ होउन एका ठिकाणी चक्कर येउन कोसळले.तेव्हा एका मुस्लीम बन्धूने त्याना पाणी पाजुन शुद्धीवर आणले,भाकरी खाऊ घालुन,त्यांची सेवा करुन त्यांचा प्राण वाचवला.त्या ठिकाणी विवेकानंद विश्रांतीस्थळ उभारले आहे.
हिरवेगार डोंगर,दाट जंगल,डोंगर उतारावर रंगीबेरंगी फुलांचे गालिचे अशा सुंदर निसर्गाच्या संगतीत ४५०कि.मि. वरील कौसानी येथे निगमच्या रिसॉर्ट मध्ये आपण मुक्कामाला पोहोचतो तेव्हा संध्याकाळचे ५ वाजले होते.
कौसानी हे नाव कौशिकऋषींच्या नावावरुन पडले आहे.कौशिक गोत्र असणारे सारे मुळचे येथील रहिवासी.कौसानीच्या पर्वत रांगेत कोसी नदीचा उगम आहे.कौसानीला उत्तराखंडाचे दार्जिलिंग म्हणतात.येथील डोंगर उतारावर चहाचे मळे मोठे मोहक दिसतात.येथुन हिमालयातील नंदादेवी,कांचनगंगा वगैरे शिखरे दिसतात.सुर्यास्ताचे वर्णन करायला योग्य शब्द सापडत नाहीत,जणू धरतीमातेच्या हिरव्या शालुचा लाल-पिवळा सोनेरी जरतारीचा पदरच तिने डोक्यावरुन पुढे ओढुन घेतला आहे.प्रुथ्वीवर स्वर्गच अवतरला आहे कौसानीत.
महात्मा गांधी काही दिवस येथे राहिले होते.हवा पालटासाठी.ते घर स्म्रुति म्हणून जपले आहे.आता विश्रान्ती.
क्रमशः
वाचतोय .
कौसानी मधून कांचेनजंगा दिसत नाही ( उत्तराखंड चे दार्जिलिंग असले तरीही)
नंदादेवी , त्रिशूल, पंचाचुली आणि अजून काही शिखरे दिसतात. (कांचनगंगा हे शिखर मलाही माहित नाही :))
मी कौसानी मधून काढलेला फोटो इथे डकवत आहे.
तरीही माझी माहिती चुकली असल्यास सांगावे …. ….
कौसानीला जायचे ते खास त्रिशुल पर्वतरांगेचे दर्शन घडवणारा अलौकिक सुर्योदय पाहायला !
तुम्ही तर परीक्रमेवर परीक्रमा करत आहात, मस्तं, प्रत्येक ठीकाण पाहायला मिळ्तं, प्रवास अनुभवायला मिळतोय.
सुन्दर, आवडलं