काथ्याकूट

तरुण अभियंत्याची पुण्यात ७ मजल्यावरुन उडी घेउन आत्महत्या...........

Primary tabs

आजकाल च्या धकाधकीच्या व स्पर्धात्मक जगात जगताना मनाचा ताण सहन होत नाही,त्यामुळे ह्या अशा घटना घडतात. पैसा हेच खर सर्वस्व आहे का हे नीट उमगत नाही. तो मिळवायच्या मागे धावताना जी दमछाक होते त्यामुळे मनाचा तोल जातो. आजकाल तिशीतच रक्तदाब, ह्रदयरोग होत आहेत. हे नेमके कशामुळे.....विचार करण्याची हिच वेळ आहे. तिसरी आर्थिक महासत्ता होण्याच्या नादात आपण आपली तरुण पिढी कमकुवत करत आहोत का?


पैसा हेच खर सर्वस्व आहे का हे नीट उमगत नाही. तो मिळवायच्या मागे धावताना जी दमछाक होते त्यामुळे मनाचा तोल जातो.


खरं आहे. पण नैराश्याची अनेक कारणे असतात. नैराश्य पन्नास हजार पगार मिळवणार्‍या आय टी इंजिनअर ला हि येते व आठ हजार पगार मिळणार्‍या पोलिस शिपायाला ही येते.
मनाचं संतुलन हे खरच अवधड गोष्ट आहे. त्यासाठि आपली काही तात्त्विक बैठक असणे गरजेचे आहे.
प्रकाश घाटपांडे

विकास

मनाचं संतुलन हे खरच अवधड गोष्ट आहे. त्यासाठि आपली काही तात्त्विक बैठक असणे गरजेचे आहे.

कमी शब्दांत पण अचूक.

टारझन

आयला काय कळत नाय बॉ... मी तर क्लायंट साईटवर असतो.. सर्वर रूमच्या ५डीग्री तापमानात सॉफ्ट्वेयर चालते. काही ईश्शू आला आणि ते बंद पडले तर बँकेचा ताशी शेकडो डॉलर लॉस होतो.. आणि अशा वेळेस २+२=? हे पण सुचत नाही... .. पण ह्या प्रेशर ची सवय होऊन जाते. मला नाही वाटत त्याने कामाच्या व्यापाने काही केलं असेल. हायली पर्सनल, किंवा आनिक काही असेल. कामाचा व्याप आणि आत्महत्या .. कुच पट्या नही....

-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात

कालच मला एकानी एक मस्त वाक्य सांगितलं:

तुम्ही रॅट रेस जिंकलात तरी शेवटी तुम्ही एक उंदीर/रॅटच असता!

आपण कोण व्हायचं हे प्रत्येकानी ठरवायचं असतं.

एक

मी माझ्या ऑर्कूटवर टाकतो..

विजुभाऊ

अपेक्षा आणि आवड यात गल्लत झाली की नैराश्य येते

पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

विदुषक

आयआयटी पदवीधर तरूण अभियन्त्यावर अशी वेळ येत असेल तर समस्या नक्कीच आहे !!
ह्याच क्षेत्रामधे गेले १० वर्ष काम केल्यावर काही गोष्टी लक्षात आल्या आहेत
१. सन्गणक क्षेत्रात काम करण्या आधि लोकान्चे प्रबोधन करणे गरजेचे आहे
२. इथे पगार नक्किच जास्त मिळतो पण ...... पण त्या पैशाची कीमन्त चुकवावि लागते तुमच वेळ देउन
३. कामाचा ताण ही फार सापेक्ष कल्पना आहे
४. ताण कमी करण्याचे अनेक उपाय आहेत ... ताण न घेणे हा सगळ्यात सोपा मार्ग आहे ..
मीपा वर पडीक रहाणे हा सगळ्यात खात्रीचा .... ;)!!!
५. आपले छन्द ताण कमी करण्यात फार महत्वाची भूमीका बजावतात ...

मजेदार विदुषक

विसोबा खेचर

तरुण अभियंत्याची पुण्यात ७ मजल्यावरुन उडी घेउन आत्महत्या...........

ईश्वर त्याच्या आत्म्यास सद्गती देवो!

मला ही बातमी कालच दुपारी समजली. झी २४ तास या वाहिनीची एक पत्रकार माझी मुलाखत घेण्यासाठी आली होती. मुलाखत घेऊन झाल्यावर हा फोन आला. कॅमेरामन काही शॉट्स घेत होता माझ्या ऑफिसात, कंप्यूटरचे. आणि या पत्रकार फोनवर शांतपणे कोणालातरी विचारत होत्या, "तुझं कुठल्या सॉफ्टवेअर कंपनीत टाय-अप आहे का? एका सॉफ्टवेअर इंजिनीयरनी आत्महत्या केली आहे, मला ३-४ मुला-मुलींच्या मुलाखती घ्यायच्या आहेत".
मला कसंतरीच वाटलं. नोकरी म्हणून तिला मुलाखती घेणं भाग होतं. पण आपल्याला टी.व्ही.वर हे किती संवेदनाशून्य वाटतं! कोणाचातरी जीव गेलाय आणि शांतपणे हे ऐकत कॅमेरामन मला सांगत होता, "जरा इकडे वळून तो प्लॉट दाखवा.... "

पावसाची परी

>>पैसा हेच खर सर्वस्व आहे का हे नीट उमगत नाही. तो मिळवायच्या मागे धावताना जी दमछाक होते त्यामुळे मनाचा तोल जातो.

पैसा हे कारण नसावे.स्वकष्टातुन त्याने कर्वे नगर सारख्या भागात घर विकत घेतलेले जिथे रेन्ट वरही घर सापडत नाही/परवडत नाही....
सन्दिप टीम लीडर होता....तो खुप पैशामागे असावा पटत नाही... आय आय टी तेहि मुम्बै आणि कॉम्पुटर मधे एम टेक्...अतिशयच हुशार असणार हे नक्कि....अभ्यासाचे इतके ताण यशस्वी पणे पार केल्यावर कामाचा ताण सहन झाला नाही?(जेव्हा तो ताण त्याच्या बरोबरिच्या सगळ्यानाच आहे हे त्यालाही नक्कि माहित होत....तरिही.........?)

>> आपले छन्द ताण कमी करण्यात फार महत्वाची भूमीका बजावतात ...
मुद्दा बरोबर आहे तरि त्यासाठीसुध्धा वेळ मिळत नाही पुरेसा....जेव्हा वेळ असतो तेव्हा छन्द करण्यास जमतेच असे नाही....परवडतेच असेही नाही...सगळा वेळ बस मागे धावा लोम्बकळा थका घरी जाउन मदत करा वाढा जेवा आवरा झोपा.....असा जातो

केशवराव

प्रतीक्रिया काय देणार ? मन सुन्न झाले. एका सॉफ्टवेअर इंजिनीअरचा बाप असल्याने मनातून पार हबकलो.

सूर्य

पैसा हेच सर्वस्व मानल्यामुळे असे झाले असेल असे वाटत नाही. एम.टेक. झाल्यानंतर परदेशी सुद्धा जाउ शकला असता तरी त्याच कंपनीत तो जॉइन झाला. अशी उदाहरणे कमी असतात. परंतु आजकाल कामाचा ताण सगळीकडेच वाढला आहे. जिथे पैसा मिळतो तिथे सुद्धा आणि नाही मिळत तिथे सुद्धा. पिळवणुक सगळीकडेच चालते. आय.टी.मधे सुद्धा ती आहेच. आत्महत्या हे एक टोक झाले. हाय ब्लडप्रेशरचा त्रास असणे, वारंवार आजारी पडणे, कौटुंबिक समस्या, असे अनेक प्रश्न आय.टी. इंजिनीयर समोर आहेत.

- सूर्य.

भाग्यश्री

परदेशीही जाऊन आला.. सहज शोधताना मला त्याचं ऑर्कुट प्रोफाईल सापडले.. :( त्यात त्याचे फोटोज आहेत.. सर्व काही आहे. पॅरीस्,अमेरीका सगळी झालीय.. उच्च शिक्षण झालं, चांगल्या कंपनीत चांगल्या पोस्ट्वर ,त्या आदल्या दिवशी म्हणे ट्रॅडीशनल डे ला त्याने खूप मजा केली वगैरे.. इतका साधा सरळ, हुशार मुलगा आत्महत्या का करतो? मला खरंच हा प्रश्न सतावत आहे.. इतकी दुनिया हिंडून एव्हढाही मनाचा कणखरपणा नाही आला? एकही चांगली गोष्ट घडली नाही का त्याच्या आयुष्यात, की ती आठवून त्याला आयुष्य सुंदर वाटावं.. आईबाबांनी इतक्या अपेक्षेने, आशेने, मायेने त्याला जगात आणलं, त्याला काय अधिकार आहे ते असंच संपवायचा? कामाचा ताण ही चिज इतकी मोठी असते की एखाद्याचा जीव जावा? अरे नोकरी सोड.. घरी बस.. छंद जोपास.. फिरून ये.. जिवाभावाच्या मित्रमंडळींना भेट.. जीव कसला देतोस?
हे संदीप शेळकेला उद्देशून नाही आहे.. पण आजकाल आत्महत्या म्हणजे फारच बोकाळलेलं प्रकरण आहे.. मला कमाल वाटते.. जिद्द, चिकाटी फक्त अभ्यास करण्यापुरतीच असते का? येणार्‍या अडचणींना तोंड देऊन सामोरं जाण्यात जास्त कौतुक आहे.. ताण आलाय म्हणून जीव काय देताय.. मला वाईट वाटलंच पण फार चिड्चिड झाली ही न्युज वाचून !!

II राजे II (verified= न पडताळणी केलेला)

सहमत.

एकही चांगली गोष्ट घडली नाही का त्याच्या आयुष्यात, की ती आठवून त्याला आयुष्य सुंदर वाटावं..

हेच म्हणतो.

काही स्वप्न काही नाती जगण्यासाठी हजार हत्तीचे सामर्थ देतात ते अनुभवाने मी जाणले... !

राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!

ऋषिकेश

वा भाग्यश्री,

एकही चांगली गोष्ट घडली नाही का त्याच्या आयुष्यात, की ती आठवून त्याला आयुष्य सुंदर वाटावं

काय लाखमोलाचं बोललीस!

माणसाला "स्वत्व" मिळालं नसेल तर तो जिवंत होता का हाच प्रश्न आहे. बाकी वाचून खूप खिन्न वाटलं

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

http://www.manogat.com/diwali/2007/node/96.html या ठिकाणि असलेले आमचे कै. माधव रिसबुड यांच्या तरुण मुलाने अमेरिकेत आत्महत्या केली. पवई वरुन एम टेक झालेल्या मुलाला अमेरिकेत आपल्या बुद्धिला आव्हान देणारा जॉब मिळत नव्हता. फलज्योतिष चिकित्सेसाठी आम्ही त्याचा वापर केला.
अवांतर- पवई वरुन एम टेक व आत्महत्या या साम्यामुळे आम्ही हा संदर्भ देत आहे. अन्यथा संभ्रमित होउन याचा काय संबध ? असा प्रश्न वजा संभ्रम काहींच्या मनात उपस्थित होउ शकतो.
अतिअवांतर- वाजवलीच का टिमकी असं कोणीतरी कुजबजत असल्याचा वास मला येतो आहे. जाउ दे भासच तो....
प्रकाश घाटपांडे

पवई वरुन एम टेक व आत्महत्या ....
काका (चालेल ना?),

कदाचित असा संबंध असेलही! म्हणजे पुस्तकी ज्ञान, यंत्रांची माहिती मिळवली पण प्रत्यक्ष आयुष्य कल्पनेपेक्षा खूपच कठोर असतं हे शिकायचं राहूनच गेलं. तुम्हीही कितीतरी शास्त्रज्ञ, हुशार लोक पाहिले असतील जे 'अभ्यासात' हुशार आहेत पण पाच रुपयाची कोथिंबीर कुठून आणायची ते समजत नाही.

आपल्या शिक्षणपद्धतीमधे 'उपयुक्त' गोष्टी (उदा: स्वतःला आवडतं ते खायला बनवणे, भाजीवाल्याशी घासाघीस करणे पासून ते थेट प्रत्यक्षात वापरली जाणारी यंत्र आणि त्यांची रचना इत्यादी) शिकवल्याच जात नाहीत!

यमी ताई (चालेल ना !)
आपल्या शिक्षण पद्धतीबद्दल एकदम योग्य लिहिलयत. माझी एक अमेरिकन सहकारी आहे जिला भारतीय लोक आणि भारतीय पदार्थ ह्याबद्दल खरच जिव्हाळा आहे. तिला महाभारत, रामायण इ.तली पात्रे / काही प्रसंग माहिती आहेत. तर .. ती म्हणते की खूपसे भारतीय लोक गणित, विज्ञान इ. विषयांत जितकी चमक दाखवतात तितकी चमक सोशल स्किल्स, प्रोफेशनल नेटवर्किंग वगैरे मधे नाही दाखवत !

प्रशांत

प्रशांत

प्रिय संदीप,

काल सकाळपासूनच तुझी बातमी सगळीकडे "टॉप'वर होती. सगळीकडे तुझीच चर्चा सुरू होती. सारेच जण हळहळत होते. तुझा असा अकाली मृत्यू, तुला न ओळखणाऱ्यांनाही हलवून गेला. तुझ्यासारख्या उत्तम करिअर असणाऱ्या, उत्तम शैक्षणिक ग्राफ असणाऱ्या, हॅंडसम तरुणानं आत्महत्त्या का केली असावी? कितीही विचार केला, तरी याचं उत्तर सापडत नाही. आता पोलिस तपास सुरू आहे. कालपासूनच वेगवेगळ्या चॅनेलवर "वर्क प्रेशर' या विषयावर चर्चा सुरू होती. खरंच एवढा ताण होता का रे तुझ्यावर? अगदी सातव्या मजल्यावरून उडी मारून आयुष्य संपवण्याएवढा? मुळात खरंच कोणावर एवढा ताण असतो का रे? एका कणखर आईचा मुलगा इतका हळवा असू शकतो?

काल सकाळी सकाळी बातमी ऐकल्यानंतर तुझ्या विषयीची माहिती वेगवेगळ्या लोकांकडून, चॅनेलवरून कानी यायला लागली. तुझा ऑर्कुटचा प्रोफाईलही पाहिला. तुझे टेस्टिमोनिअल, तुझे स्क्रॅप खरंच दृष्ट लागावे एवढे होते. सीबीएससी बोर्डात तू झळकलास, त्यानंतर एका कॉलेजनं तुला बोलावून घेतलं, तुला ऍडमिशन दिली, पुढे एका सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी करू लागलास, नंतर त्याच कंपनीनं तुला एम.टेक. करण्यासाठी आय.आय.टी.मध्ये पाठवलं. तिथंही झळकलास. परत आल्यावर त्याच कंपनीत पुन्हा नोकरी करू लागलास. तुला ओळखणारे आताही सांगतात, की संदीप हा खूप चांगला मुलगा होता. खूप पोलाईट, खूप व्यवस्थित...

मित्रा, तुझ्यावर कंपनीचा विश्‍वास होता. तुझाही कंपनीवर होता. मग नक्की प्रॉब्लेम आला कुठे? अरे सातव्या मजल्यावरून उडी मारताना तुला तुझ्या आईचे कष्ट आठवले नाहीत का? धाकट्या भावाचा चेहरा डोळ्यासमोर नाही आला? अरे काबाडकष्ट करून ज्या माऊलीनं तुला एवढं शिकवलं, मोठं केलं, तिची काय अवस्था होईल तुझ्या मागे, याचा विचार का नाही केलास? तुझं कर्तृत्व आता कुठे बहराला येत होतं. ती आई कौतुकानं तुझ्याकडे पाहात होती. तिला केवढा मोठा धक्का बसलाय रे...

अख्खं आयुष्य होतं तुझ्यापुढे. ताण-ताण तो कसला रे? ताण कोणाला नसतात? कदाचित तुला हसू येईल; पण सगळ्यात जास्त ताण कोणावर असतो ठाऊक आहे तुला? आपल्या बस ड्रायव्हर्सना. आपलं पुण्यातलं ट्रॅफिक तर ठाऊक आहेच तुला. कधी कोण कुठून घुसेल याचा नेम असतो का? त्यात ती अवजड बस. त्यामध्ये असलेले 50-60 पॅसेंजर्स. अरे त्याचा थोडादेखील मानसिक तोल ढासळला, तर काय होईल माहिती आहे? रोज सकाळी गाडी सुरू केल्यापासून ते ड्यूटी संपेपर्यंत तो माणूस किती प्रचंड ताणाखाली असेल... त्यात पगार आणि सुट्ट्यांच्याबाबत तो तुझ्या-माझ्यापेक्षा कमनशिबीच ना रे...

तुझ्यावर असा कोणता मोठा ताण होता. वर्कप्रेशर होतं, असं तू शेवटच्या एसएमएसमध्ये लिहिलंस. ते तू कमी करू शकत नव्हतास का? बॉसला सांगू शकत नव्हतास? बरं एकंदर ऐकलेल्या बातम्यांवरून तुझं कंपनीत वजन असावं, असंच वाटतं. कदाचित बॉसनं ऐकलं नसतं, तर तू अजून कोणाला तरी सांगू शकत होतासच ना? कितीतरी मार्ग असतात रे. त्यातला एकतरी ट्राय करावा असं तुला का वाटलं नाही? अरे एवढं मस्त करिअर असणारा, शिक्षण असणारा, आयआयटीयन असणारा तू, ही नोकरी सोडली असतीस, तरी तुला आणखी चार मिळाल्या असत्या. कोणाशी बोलला असतास तरी सांगितलं असतं, तुला कोणीही... तू कोणाशीच का बोलला नाहीस? आत्महत्त्या केलीस त्या दिवसभरातही तू मस्त होतास. सगळ्यांशी हसून खेळून बोलत होतास. पण तुझ्या मनात असं काही खदखदत होतं, हे कोणाला ठाऊक.

बोलायचंस रे मित्रा बोलायचंस... कोणाशीतरी बोलायचंस... फक्त पुण्यामधल्या सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये हजारो मुलं काम करतात. त्यांच्यावरही ताण असेलच ना रे... मित्रा, ताण कमी करण्यासाठी, चिलआऊट होण्यासाठी विकएंड असतात ना... कधीतरी शांत बसायचंस. कधीतरी निवांत फिरायला जायचंस. कधीतरी एखादा पिक्‍चर एंजॉय करायचास. एखाद्या जिगरी दोस्ताकडे मन मोकळं करायचंस. अगदीच नाही, तर तुझ्या कणखर आईकडे बघायचंस...आम्ही असंच काहीतरी करत असतो ना. कामाचा ताण आहे किंवा टेन्शन आलं म्हणून कोणी आत्महत्त्या करतात का? तुझ्यासारख्यानं प्रश्‍नांना भिडायचं का आत्महत्त्या करून पळ काढायचा? हे जग खूप सुंदर आहे. एवढा देश-परदेश फिरलास, तुला ते सौंदर्य दिसलं नाही का रे? मी फक्त लौकिक अर्थाचं सौंदर्य म्हणत नाहीये. माणसंही खूप चांगली असतात रे. किमान माझातरी यावर विश्‍वास आहे.

आपली काही ओळख नाही. पण तुझी बातमी ऐकल्यानंतर तुझ्याशी बोलावंसं वाटलं, म्हणून हे पत्र. तुला आता विचारलेत ना त्यापेक्षाही खूप प्रश्‍न आहेत मनात; पण तूच नाहीस उत्तरं द्यायला. दूर कुठेतरी अनंतात निघून गेलाहेस. त्यामुळे माझ्यापुढे पर्याय एकच आहे, आपली उत्तरं आपण शोधण्याचा. तुझ्या वैयक्तिक प्रश्‍नांबाबतचं सांगता येणार नाही; पण स्ट्रेस बाबत मी माझं उत्तर शोधलंय. मी ठरवलंय आता, सुटीच्या दिवशी फक्त सुटी... नो ऑफिस. घर आणि ऑफिस या दोन गोष्टी वेगळ्या ठेवल्या ना की निम्मा शीण जातो. मित्र, कट्टा, हॉटेलिंग सगळं काही मस्त ठेवणारे मी. मुळात मी किती धावायचं याची सीमाच ठरवून घेणार आहे. माझ्या लक्षात आलंय. आपण ना नुसतं धावत सुटतो. अगदी छाती फुटेपर्यंत धावतो. मग दमतो. आपला वेग कमी होतो. तो कमी झाला, की मागचा कोणीतरी पुढे जातो. ते आपल्याला सहन होत नाही. मग आपण पुन्हा जोरानं धावायला जातो. पण तोपर्यंत आपली छाती फुटलेली असते. वेग अगदी सुरवातीला होता, तेवढाही राहात नाही. मग येते प्रचंड चिडचिड, निराशा आणि स्ट्रेस... हे होण्याआधीच आपण थांबू शकतो ना? मग आता तिथंच थांबायचं. किमान मी माझ्यापुरतं तरी असंच ठरवलंय. मस्त काम आणि जबरदस्त मजा. अरे घरच्यांबरोबर राहायला वेळ नसेल, एवढं सुंदर आयुष्य एंजॉय करता येत नसेल, तर एवढा पैसा कमवायचा तरी कशासाठी?तुझ्या त्या बातमीतून मी एवढं तरी शिकलो. फक्त माझ्या या शिक्षणाची किंमत खूप मोठी होती... तुझा जीव... सॉरी संदीप... रिअली सॉरी...

तुझा

अभिजित

II राजे II (verified= न पडताळणी केलेला)

ह्या लेखाच्या खालील प्रतिक्रीया वाचल्या...

तरुण मराठी युवक खुप चांगला विचार करु लागला आहे ह्या प्रकरणानंतर ....

डोळे पाणावले पत्र वाचून... अभिनंदन अभिजीत !

राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!