जनातलं, मनातलं

अवघे पाऊणशे वयमान.

Primary tabs

समस्त मिसळपावकरानो,वाचक/लेखक मायबापानो,आज अस्मादिकाना पंचाहत्तर वर्ष पूर्ण झाली.
१४ ऑगस्ट १९३३ हा माझा जन्म दिवस.नंतरचे सगळे वाढदिवस झाले.पण ह्यापुढे कसले वाढदिवस आता राहिले ते फक्त काढदिवस.

जन्मापासून दोन वर्षाचा होईपर्यंत,
कुकलं बाळ होतो.
त्यानंतर सहा वर्षाचा होईपर्यंत
अल्लड मुलगा होतो.
त्यानंतर अठरा वर्षाचा होईपर्यंत
शाळकरी होतो.
त्यानंतर बावीस/पंचवीस वर्षाचा होईपर्यंत
कॉलेज वीर होतो.
त्यानंतर थोडी वर्ष
चाकरमानी होतो.
त्यानंतर लग्न झाल्यावर
हाच मुलाचा/मुलीचा बाप होतो.
त्यानंतर मुलं मोठी होऊन शिकायला लागल्यावर
गृहस्थ झालो.
त्यानंतर पन्नासी उलटल्यावर
वयस्कर झालो
त्यानंतर साठी उलटल्यावर
म्हातारा झालो
त्यानंतर आता पंचाहत्तरी झाल्यावर
कदाचित थेरडा होईन
पण काय हरकत आहे असं म्हणून घ्यायला.हे कुणालाही चुकलेलं नाही.जो तो आपआपल्या अक्कले प्रमाणे बोलतो चालतो आणि वागतो.

"दंताजीचे ठाणे सुटले
नन्ना म्हणते मान
फुटले दोनही कान
अवघे पाऊणशे वयमान"

असं काही नाही मंडळी.
जवळचं वाचायला "ढापणं" लागली तरी दूरचं चांगलं दिसतं.
कान शाबूत आहेत.पाल चूकचूकली तरी स्पष्ट ऐकायला येतं
दात अजूनही शाबूत आहेत,कवळी लावावी लागली नाही.
मान ताठ करून अजून चालतो.
जीना चढताना,उतरताना आधार घ्यावा लागत नाही.
हे कसं शक्य झालं असं विचाराल मंडळी तर त्याच उत्तर-
सुपारीच्या खांडाचही व्यसन नाही.सुपारी आडकित्यात कशी कातरतात माहित नाही.
सुपारीचा बेडा कसा सोलतात माहित नाही.
"घुटूं" कधीच घेतलं नाही.वासाने उमळ येते.
"फुंकणीच्या" धुराने घुसमटायला होतं.
"बाळं" लागण्याचे दिवस आता गेले.
पन्नासी नंतर मेदुतले रोज ८० हजार न्युरान्स नाश पावतात असं म्हणतात.पण लेखन वाचनामुळे,लाखभर न्युरान्स नवे फायर होत असावेत.
पु.ल. म्हणतात,
"उतार वयात सकाळी उठल्यावर जर दोनही गुढगे दुखले नाहीत तर समजावं की आपण मेलो."
तसं काही होत नाही.खडखडीत आहे.
हे काही माझं कौतुक म्हणून सांगत नाही मंडळी.
उद्दांच काही माहित नाही.आज आहे हे असं आहे.
एव्हडं मात्र खरं,

ते दिवस निघून गेले

मातेच्या मांडीवर माथे टेकून
थोपटण्याचा हट्ट करून
झोपी जाण्याचे
ते दिवस निघून गेले.

भावंडामधे हंसून खेळून
कधी मधी नाहक भांडून
क्षमा याचनाचे
ते दिवस निघून गेले

ग्रुहपाठ करून सुद्धा
शाळेत जाऊन
गुरुजीचा ओरडा खाण्याचे
ते दिवस निघून गेले

सुगंधी तेले चोपडून
केसाचा कोंबडा काढून
नेत्र पल्लवी करण्याचे
ते दिवस निघून गेले

घारीच्या पंखाचे बळ घेऊन
निळ्या नभाकडे न्याहाळून
ऊंच ऊंच भरारींच्या स्वपनांचे
ते दिवस निघून गेले

राजा राणीचा संसार करून
मनोरथाचे बंगले बांधून
विश्वाचे रहस्य उलगडण्याचे
ते दिवस निघून गेले

गृहपाठाचे धडे घेऊन
संस्काराचे धडे देऊन
पिल्लांना जोपासण्याचे
ते दिवस निघून गेले

काऊ चिऊच्या गोष्टी सांगून
चिमण्या नातवंडाना अंगाई करून
झोपी जाण्याचे
ते दिवस निघून गेले

या यादीतील स्मृतीना
निश्चीत आहे अंत
त्यानंतर
दिवस निघून जाण्याचे
नसे कसला खंत

तेव्हा मंडळी आहे ते असं आहे.
माझ्या ह्या जन्मदिवशी तुमच्या शुभेच्छा मला लाख मोलाच्या आहेत.त्यामुळे ह्याच लेखातून आपणा सर्वांचे धन्यवाद.

श्रीकृष्ण सामंत

सुचेल तसं

सामंत साहेब,

आपली निरोगी प्रकृती अशीच राहो आणि परमेश्वर आपणांस दीर्घायुष्य देवो ही प्रार्थना...

वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा!!!

http://sucheltas.blogspot.com

चतुरंग

दिवस निघून जातंच असतात
स्मृतींची अत्तरं देतंच असतात
अत्तर लावून घ्यायचं असतं
अत्तर बनून रहायचं असतं!

तुम्हाला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!
तुमची निरोगी, उत्साही आणि तरुण प्रवृत्ती अशीच शतायु होवो ही ईश्वरचरणी प्रार्थना! :) :)

चतुरंग

श्रीकृष्ण सामंत

चतुरंगजी,
"अत्तर बनून रहायचं असतं!"
किती मोहून घेणारं वाक्य आहे
आभार

www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

हर्षद आनंदी

तुमची निरोगी, उत्साही आणि तरुण प्रवृत्ती अशीच शतायु होवो ही ईश्वरचरणी प्रार्थना!

|| निर्लज्जम् सदा सुखी ||

सामंत साहेब,

आपल्या कवितेत कृतार्थ जीवनाचे सारच वर्णन केलेले आहे.

आपल्या लिखाणांचा आणि आपल्या अनुवादांचा मी चाहता आहे.

माझ्या आपल्याला ७५व्या वाढदिवशी अनेकानेक शुभेच्छा!

निरोगी सदा, कार्यरत असा
अनुभव सारे, लिहून कळवा
अनुवादांचे, रहस्य सांगा
प्रफुल्लित जगा, सुखे तृप्त व्हा

१३ ऑगस्टः आचार्य अत्र्यांचा वाढदिवस
१४ ऑगस्टः श्रीकृष्ण सामंतांचा वाढदिवस
१५ ऑगस्टः भारताचा स्वातंत्र्यदिन

असे सगळे शुभदिवस जोडून आलेले आहेत तेव्हा,
याच निमित्ताने सर्व मिसळपाव खवय्यांना,
संपूर्ण खाद्यस्वातंत्र्याच्या हार्दिक शुभेच्छा!

श्रीकृष्ण सामंत

नरेंद्र गोळेजी,
आपल्या शुभेच्छा बद्दल आभार.माझं लेखन आपल्याला आवडतं हे वाचून बरं वाटलं
किती सुंदर उस्फुर्त कविता आपण केलीत.
अत्र्यांच्या आणि स्वातंत्र्यदिनाच्या मधे माझ्या जन्मदिवसाचे नांव घालून आपण मला आदर देता देता आपल्या कल्पक वृत्तिचीच झलक दिली आहेत.
आचार्य अत्रे म्हणजे गाढे साहित्यीक
स्वातंत्र्यदीन म्हणजेच लिहायचं व्यक्ति स्वातंत्र्य.
असा मी अर्थ काढला तर माझं चुकणार तर नाही ना?
मिसळपावावर लेखन स्वातंत्र्य आहे म्हणूनच लोक लिहित असावेत.
पुन्हा आभार

www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

कुंदन

सामंत काका ,
७५व्या वाढदिवशी अनेकानेक शुभेच्छा!!!

सहज

तुमची निरोगी, उत्साही आणि तरुण प्रवृत्ती अशीच शतायु होवो ही ईश्वरचरणी प्रार्थना!

तुमची निरोगी, उत्साही आणि तरुण प्रवृत्ती अशीच शतायु होवो ही ईश्वरचरणी प्रार्थना!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अरुण मनोहर

सामंतजी. असेच लीहीत रहा आणि आनंद लुटत रहा. असेच आरोग्य तुम्हाला पुढेही लाभो. लेखनाचा कीडा चावला की आरोग्याची चिंताच करायला नको.

पन्नासी नंतर मेदुतले रोज ८० हजार न्युरान्स नाश पावतात असं म्हणतात.पण लेखन वाचनामुळे,लाखभर न्युरान्स नवे फायर होत असावेत.
---- हे एकदम पटले.

श्रीकृष्ण सामंत

अरुण मनोहरजी,
"लेखनाचा कीडा चावला की आरोग्याची चिंताच करायला नको."
अगदी खरं

www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

सर्किट डांबिस (verified= न पडताळणी केलेला)

सामंत काका,

पंच्याहत्तरीच्या शुभेच्छा !

सेलिब्रेशन वीकेंडला का ?

- सर्किट

श्रीकृष्ण सामंत

सर्किटजी,
अहो कसलं सेलिब्रेशन घेऊन बसलात?.तुमच्या सर्वांच्या शुभेच्छाने एव्हडं पोट भरलं आहे की विचारू नका.
आणि इकडच्या पार्ट्या तुम्हाल माहित असतीलच-इकडच्या का आता सगळीकडेच म्हणा-तसं काही ते मी वाईट वगैरे म्हणत नाही.पण आमच्या सेलिब्रेशनला कोण "घटूं" घ्यायला मागत नाहीत !
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

सर्किट डांबिस (verified= न पडताळणी केलेला)

सामंतकाका,

अहो प्रत्येक सेलेब्रेशनला घंटूच हवे, असे कुणी सांगितले. आम्हाला कोकम सरबतही चालेल !

- सर्किट

वाढदिवसाच्या मनापासुन शुभेच्छा!
निरोगी, उत्साही आयुष्यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना!

राघव

चालेल ना तुम्हाला आबा म्हटलेले?
प्रथम वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
तुमचा लेख वाचला, आवडला. कविताही आवडली. पण उदास वाटले [कदाचित तसा माझा भास असेल!].
आजच मी येथे एक कविता टाकलेली आहे. आवाहन म्हणून. जरूर वाचा आणि काय वाटते ते नक्की कळवा.

मुमुक्षू

श्रीकृष्ण सामंत

मुमुक्षूजी,
मला आबा ही म्हणतात हे आपल्याला कसं बरं कळलं?
तुम्हाला आनंद होईल ते मला काहीही म्हणा.माझा आनंद द्विगुणीतच होईल.
तुम्हाला चूकूनही उदास करायचा माझा इरादा नाही.पण कधी कधी सत्य उदास असतं.आणि ते टाळता येत नाही.चिंच आंबट गोड असते तरी आपण ती खातोच ना? तसं बघा.
आपली कविता मी अवश्य वाचून मला काय वाटते ते नक्की लिहिन.
आपल्या शुभेच्छा बद्दल आभार.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

लिखाळ

सामंतकाका,
जन्मदिवसासाठी अनेक शुभेच्छा !

वरचा लेख आणि कविता आवडली.
-- लिखाळ.

काका... प्रथम वाढदिवसाच्या शुभेच्छा... तुम जियो हजारो साल, साल के दिन हो पचास हजार.

तुम्ही इतके सुंदर सुंदर लिहिता की नुसते वयाने ७५ झालात पण मनाने सदाबहार आहात. तुमची शेवटची कविता तर 'नोस्टॅल्जिक' करून गेली.

तुमचा वाढदिवस आपले (सो कॉल्ड) बंधुराष्ट्र ही साजरा करते, लकी आहात. :)

बिपिन.

श्रीकृष्ण सामंत

बिपिनजी,
आपल्या शुभेच्छा बद्दल आभार.
खरं सांगुका मला तरी असं आता वाटायला लागलंय की लेखन ही एक नक्कीच निर्मिती आहे.
सुधीर फडके-बाबुजी- म्हणाल्याचं मला आठवतं की,
"गीतरामायणायला मला पुन्हा चाल द्दायला सांगीतली तर मला ते शक्य होईलसं वाटत नाही"
ही पण त्यांची निर्मितीच होती.
कुणी तरी आपल्याकडून "करवून" घेत असावं असं त्याना म्हणायचं होतं.
म्हणून म्हणतो कुणी काही लिहिलं तर त्याला लिहूद्दात.जसं त्याला सुचतं तसंच तो लिहितो.
मिसळपावावर ही मुभा आहे ही तात्यारावांसारख्यांचीच प्रेरणा असावी.

"तुमची शेवटची कविता तर 'नोस्टॅल्जिक' करून गेली."
मला खात्री आहे की तुम्हाला माझी latest-अलिकडची कविता- म्हणायचं आहे ते.जरा गम्मत केली रागावूं नका.
आपल्या सर्वांचा दुवा आहे.
पुन्हा आभार

www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

II राजे II (verified= न पडताळणी केलेला)

तुमची निरोगी, उत्साही आणि तरुण प्रवृत्ती अशीच शतायु होवो ही ईश्वरचरणी प्रार्थना!

राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!

मदनबाण

वाढदिवसाच्या मनापासुन शुभेच्छा!!!!!

"First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda

खादाड_बोका

वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा!!! तुम्ही शंभरी आरामात पहाल. तो पर्‍यतं असेच बढीया लेख येवु द्या.

मला तर स्वप्नातही भुक लागते....

धनंजय

जन्मदिवसाबद्दल अनेकानेक शुभेच्छा!

प्राजु

काहीही झालं तरी गुलाबाचं फुल ते गुलाबाचं फुलच राहतं. ते टवटवीत असतं तेव्हा मनही टवटवीत करतं... आणि सुकल्यावर गुलकंद होतं..
पंचाहत्तरी ही गुलकंद आहे... तिचा पुरेपूर उपभोग घ्या.
तुम्हाला असेच निरोगी आणि भरपूर आयुष्य लाभूदे हीच त्या जगन्नियंत्याला प्रार्थना.
डायमंड जुबली च्या हार्दिक शुभेच्छा!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

श्रीकृष्ण सामंत

प्राजुजी,
आपल्या शुभेच्छा बद्दल आभार
"पंचाहत्तरी ही गुलकंद आहे... तिचा पुरेपूर उपभोग घ्या."
खरंच,आपल्या ह्या वाक्याने गुलाब आणि गुलकंदाला नविनच स्वाद आणलात

www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

रेवती

सामंत काका आपल्याला शुभेच्छा! आज काय गोड केलयं?

रेवती

यशोधरा

सामंतकाका,
जन्मदिवसासाठी अनेक शुभेच्छा !