काथ्याकूट

वैराग्यभावनेचा अभाव.. भारताच्या लोकसंख्या प्रश्नाचे मूळ?

Primary tabs

(मागे मुमुक्षू यांनी राष्ट्रभावनेचा अभाव.. भारतासमोरच्या अडचणींचे मूळ? हा विचार चर्चेत आणला. त्यांच्या कळकळीला दाद देत मी वेगळी विचारसरणी सांगितली की राष्ट्रभावनेच्या भाव-अभावाबद्दल कोणाला दोष न देताही अडचणींबद्दल कारवाई केली जाऊ शकते. माझा व्यक्तिगत अपवाद मानून [सर्व प्रतिसादकारांस त्याबद्दल धन्यवाद] अनेक प्रतिसादकारांनी या विचारसरणीला भ्रष्टाचाराची भलावणी मानली, आणि रसातळाकडे जाणार्‍या समाजाची नांदी मानली. म्हणून त्या लेखात आणि प्रतिसादातल्या युक्तिवादासारखा दुसरा एक युक्तिवाद मी येथे देत आहे. हे कोणीही व्यक्तिगत घेऊ नये. )

युक्तिवादाचा सारांश : लोक वैराग्यपूर्ण नाहीत त्यामुळे मुले उदंड असतानाही लैंगिक संबंध ठेवतच राहातात. वैराग्यभाव नसणे हे अपेक्षेपेक्षा अधिक मुले असण्याचे मूळ आहे. मुळातून वैराग्यभाव वाढवला तर ही अडचण उद्भवणारच नाही. "लोक लैंगिक संबंध ठेवतच राहातील" असे हात टेकून संततिनियमनाचे उपाय उपलब्ध देणे म्हणजे वैराग्यभावाच्या बाबतीत रसातळाकडे जाणार्‍या समाजाची विचारसरणी आहे. त्यापेक्षा आपण सर्वच प्रयत्न करून वैराग्यभाव वाढवूया. अशा प्रकारे विचार बदलत गेलेत तर पुढे लोकसंख्यावाढीच्या मुद्द्यासकट लैंगिक अत्याचारासारख्या अनेक अडचणींचा नायनाट होईल. समाजाची उन्नती होईल.

कोणत्याही समाजातील लोकांची लैंगिकता, त्या देशाची संतती आणि लोकसंख्या ठरवत असते. ही संतती जेथे उगम पावते त्याबद्दल विचार केल्यास लोकसंख्येच्या अडचणींवर मात करण्याची शक्ती उत्पन्न होत असते. वैराग्यभावनेच्या अभावामुळेच आज लोकसंख्येबाबत एकापेक्षा एक अडचणी उद्भवल्या आहेत. त्या संपवायचे प्रयत्न अपुरे पडतात त्यामागचे कारणही हेच आहे.

वैराग्यभावना म्हणजे काय हे अगोदर बघावे लागेल -
लैंगिकतेवर दमन असण्याबद्दल अभिमान, वैराग्याबद्दल प्रेम, लैंगिकतेतून उत्पन्न होणार्‍या संततीची जबाबदारी घेण्याची तयारी, आत्मनिग्रहाच्या ताकदीवरील विश्वास या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे वैराग्यभावना.

याचा अर्थ सारखे मुंडन करत संन्यासी होत फिरावे असे नाही. फक्त साधे जीवन जगताना सुद्धा हा विचार मुळाशी असला तरी कितीतरी गोष्टी आपोआप घडून येतील.

महात्मा गांधी या माणसाने आपल्या देशाला एका बाबतीत नैतिक अधिष्ठान द्यायचे स्वप्न पाहिले. आज जवळपास ६० वर्षानंतर आपण त्याची फळे बघतो आहोत. त्यांची या स्वप्नामागची प्रेरणा वैराग्यभावना नसेल तर आणखी काय असेल?

आपल्यामुळे किंवा आपणास दिसणार्‍या इतर लोकांमुळे आपल्या वैराग्याच्या भूमिकेस धक्का लागेल, त्याचे नुकसान होईल असे वर्तन घडू न देण्याची जबाबदारी याचमुळे प्रत्येक नागरिकावर पडते. जर ती जबाबदारी पार पडली तर लोकसंख्येचे भविष्य बदलण्यास जास्त काळ लागणार नाही.

उदाहरणार्थ, एक साधी सूचना -
२६ जानेवारी, १५ ऑगस्ट या सारखे महत्त्वाचे दिन लैंगिक आचार मुक्त दिन म्हणून पाळले जावेत. "मी स्वतः लैंगिक व्यवहार करणार नाही अन् लैंगिक व्यवहारास प्रोत्साहन देणार नाही"असा विचार केल्याने काय एकदम वैराग्यभावना जागृत होऊ शकेल? नाही. तसे नाही. पण मानसिकता बदलण्यास ही सुरुवात ठरू शकते. १०० कोटी लोकसंख्येत एक जण जरी असा निघाला जो विचार करतोय, "मी लैंगिक व्यवहार नाही करणार, हे माझ्या समाजासाठी हानिकारक आहे. मी असे करता कामा नये!" तर काय कमी झाले? किती मोठा विचार आहे हा!

[
अशी सूचना देण्यामागचा एक हेतू हा की, एक दिवसभर असा विचार करून तो अमलांत आणला तर आपण किती क्षुल्लक कामवासनेसाठी लैंगिक व्यवहार छेडतो, वागतो ते स्वतःचे स्वतःलाच दिसून येईल.
कारण कितीही केले तरी कुणी स्वमनाला कधीही फसवू शकत नाही.
आपण केलेल्या चुकीबद्दल आपल्याला जाणीव होवून पश्चात्ताप होणे ही चूक सुधारण्याची पहिली पायरी असते.
दुसऱ्याने ती चूक लक्षात आणून दिली तर ती मान्य केल्याच जाईल असे नाही, पण स्वतःला लक्षात आलेली चूक मान्य होण्याचे प्रमाण निश्चितच जास्त असणार.
या साध्या सूचनेच्या पालनामुळे आपण स्वतःच्या वागणुकीकडे बघू शकू असे वाटते.
आणि हेच दिन निवडण्याचे कारण हे की लैंगिक व्यवहाराचा प्रश्न सरळ देशाच्या लोकसंख्येशी आणि प्रगतीशी निगडित असल्याचा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्याचे दुसरे उत्तम साधन कोणते?

दुसरा हेतू असा की, जेव्हा लोकांना स्वतःच्या कामवासनेबद्दल जाणीव अन् पश्चात्ताप होईल, तेव्हा वैराग्यभावनेबद्दल विचार करण्याची वृत्तीही उगम पावू शकेल. काही नाही तर निदान थोडे लोक तरी यादृष्टीने विचार करू लागतील. त्यामुळे आज नाही तर उद्या खचितच आशादायक चित्र बनू शकेल.
(याचा अर्थ असा नाही की आज असा विचार कुणी करतच नाहीत. पण जास्त्तीत जास्त लोक असा विचार करण्यास लागावेत हे नक्कीच चांगले.)
]

आज इतर देशांमधली मर्यादित लोकसंख्या आणि समृद्धी आपण बघतो तर आपल्याला आपल्या देशाची लाज वाटते. पण त्यांची प्रगती अशाच वैराग्यभावनेतून झालेली आहे हे आपण कसे विसरतो? लैंगिक बाबतीत आपली दंडसंहिता इंग्लंडच्या प्यूरिटन/प्रोटेस्टंट दंडसंहितेवर आधारलेली आहे. लैंगिक प्रकरण (सेक्सकांड) बाहेर पडले तर निवडून आले असले तरीही तिथल्या राजकरणी खासदारांनाना खुर्च्या सोडाव्या लागल्या. आपणास बहुमत आहे म्हणजे आपली लैंगिक वर्तणूक संपूर्ण राष्ट्राला मान्य होईलच असे नाही अन् लैंगिक वागणुकीच्या प्रश्नावर जनतेचे मत विचारात घेतलेच पाहिजे असे मानणारे लोक तिथे होते (आजची परिस्थिती माहीत नाही!). आज दुर्दैवाने आपल्या देशात तरी अशी परिस्थिती दिसत नाही (उदाहरण - जळगाव सेक्स कांड).

कोणी म्हणेल की लैंगिक आकर्षण सर्वांना होते आणि त्यायोगे लैंगिक वागणूक सर्वच करतात. बहुतेक लोक म्हणतील की नको असलेली मुले उत्पन्न करायचीच नसतात. वैराग्यभावनेचा मुद्दा नाही. तर ते ठीक नाही. सर्वांना माहीत असते की लैंगिक व्यवहारातून मुले उत्पन्न होतात. त्यांना पूर्ण माहीत असते की आपल्या कृतीतून मुले उत्पन्न होत आहेत. आता हे लक्षात ठेवले पाहिजे उदंड मुले उत्पन्न करणे ही कुठली व्यक्तिगत बाब नाही. अमर्याद लैंगिक व्यवहाराचे समर्थन असे केले जाऊ शकते, तसे समर्थन करू नये. मग याच प्रकारे कोणी बलात्काराचे समर्थन करेल. वैराग्यापासून दूर जातात त्यांना आपली चूक समजलीच पाहिजे, मगच लोकसंख्येबाबत प्रगती होईल.

काही लोक म्हणतात, की वैराग्याचे सोडा. लोक लैंगिक व्यवहार करतीलच असे जाणून त्यांना संततिनियमनाची साधने द्या. जर लैंगिक व्यवहार करणार्‍याचे स्वत:चे विचारच असे असले की, "उदंड मुले असताना लईंगिक व्यवहार करणे अयोग्य आहे अन् तसे करून व्यक्तिगत कामवासनेसाठी कुठेतरी मी माझ्या त्या समाजाशी प्रतारणा करेन, ज्यांनी समाजासाठी स्वत:च्या सर्व कामवासनेवर पाणी सोडले"तर संततिनियमन यंत्रणेची गरज कितीतरी कमी होईल. होय ना?

वैचारीक पातळीवर योग्य बदल घडवून आणण्यासाठी वैराग्यभावना असणे गरजेचे आहेच.

कशिद

वैराग्यभावना मह्न्जे नैमक काय ?

धनंजय

लेखातली व्याख्या अशी आहे :

वैराग्यभावना म्हणजे काय हे अगोदर बघावे लागेल -
लैंगिकतेवर दमन असण्याबद्दल अभिमान, वैराग्याबद्दल प्रेम, लैंगिकतेतून उत्पन्न होणार्‍या संततीची जबाबदारी घेण्याची तयारी, आत्मनिग्रहाच्या ताकदीवरील विश्वास या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे वैराग्यभावना.

प्रियाली

वैराग्यभावना मह्न्जे नैमक काय ?

पहिल्या प्रतिसादातच विकेट =))

पण मलाही प्रश्न आहे - लैंगिक व्यवहार म्हणजे काय? (हे वाचून गंमत वाटल्यास मी जबाबदार नाही)

ओडायपस कॉम्प्लेक्स वगैरे खरे मानले आणि त्यात तथ्यांश आहेच तर मग लैंगिक व्यवहार कोणा-कोणात नाही ठेवायचे या दिवशी?

=)) महान लेख आहे.

धमाल सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

व्यवहार म्हणजे "काही विशिष्ट सेवा पुरवाणार्‍या स्त्रियांच्या पाठीला साबण चोळणे" असे असावे बहुधा.

- (अव्यवहारी) सर्किट

धनंजय

एडिपस (कथा) याचा बाप लाइउस आणि त्याची आई जोकास्ता यांच्यात वैराग्यपूर्ण संबंध असते, तर किती मोठी शोकांतिका टळली असती, नाही का?

(लैंगिक व्यवहार सर्वांनीच टाळायचे - लाइउस, जोकास्ता, एडिपस, सर्वांनीच टाळायचे. लैंगिक व्यवहार म्हणजे त्यांनी जे काय टाळले नाही ते.)

धमाल सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

ह ह पु वा....

वैराग्यभावना सक्तीची करण्यासाठी कायदा करावा का ?

की सर्व स्त्रियांना लॉरेना बॉबिटची शिकवणी लावावी ??

(संदर्भ : http://en.wikipedia.org/wiki/Lorena_Bobbit)

- (वैरागी) सर्किट

मुशाफिर

"आपल्यामुळे किंवा आपणास दिसणार्‍या इतर लोकांमुळे आपल्या वैराग्याच्या भूमिकेस धक्का लागेल, त्याचे नुकसान होईल असे वर्तन घडू न देण्याची जबाबदारी याचमुळे प्रत्येक नागरिकावर पडते. जर ती जबाबदारी पार पडली तर लोकसंख्येचे भविष्य बदलण्यास जास्त काळ लागणार नाही." असे आपण म्हटले आहे.

कुणाच्याहि मनातल्या भावना (अजून तरी ) दुसरे कोणी काबूत ठेवू शकत नाहि. मग, ईतर लोक काय करतात यावर नियन्त्रण कसे आणणार?

तसेच ,ज्या प्रगत देशांविषयी तुम्ही लिहिले आहे ते वैरग्यपूर्ण जीवन जगतात, असे जर तुम्हाला म्हणायचे असेल तर ते पूर्णतः चूक आहे.

उलट, त्या देशात लैंगिक स्वातन्त्र्य मोठ्या प्रमाणात दिसून येते. तेव्हा संततिनियमनाचे वैज्ञानिक उपाय हेच ह्या समस्येच उत्तर आहे.

धनंजय

सहमत.

(नमनाला घडाभर तेलसुद्धा कमी पडले म्हणायचे? पहिला परिच्छेद वाचला नाहीत वाटते.)

मुशाफिर

जेव्हा तुम्ही एखादा विचार लेखाद्वारे प्रस्तुत करता तेव्हा ते तुमचेहि म्हणणे असते असे जर वाचकाना वाटत असेल तर पूर्णतः गैर आहे असे तुम्ही कसे म्हणू शकता? मी जर एखादे विधान केले, तर त्याची सम्पूर्ण जबाबदारी माझीच असायला हवी. तुम्ही इतर कोणाचे विचार मान्डत असाल (उदा. म. गान्धी) आणि त्याचा प्रतिवाद करत नसाल तर तुमचे त्या विचाराना अनुमोदन आहे, असे का समजु नये?

अभिज्ञ

प्रियालीताई अन सर्किटशेठ,
इथे या असल्या भयंकर लिंका टाकून आम्हा बॅचलर मंडळिंना का घाबरवताय?

आधिच धनंजय रावांचा हा खतरा लेख वाचून डोक गरगरायला लागलेल.
अन बाकिचि कसर तुम्ही दोघांनी टाकलेल्या लिंक्स ने भरून काढली.

तिघेहि धन्य आहात.

अभिज्ञ.

प्रियाली

धन्य - नाही नाही... गेंड्याची कातडी.

मी नाही - लोलक बोलायला लावतो.

विकास

अरे काय चाललय काय?

एक जण म्हणतय इच्छामरणाचा कायदा करा, दुसर्‍याचे म्हणणे आहे वैराग्य सक्तीचे करा... ~X(

आता दयामरणासारखे दयावैराग्य असा नवीन प्रकार तयार करता येईल का ते पहा :)

धनंजय, आपल्या तर्कापुढे आम्ही पामर काय बोलणार पण सक्काळी- सक्काळी ह. ह. पु. वा झाली. आपण गंभीरपणे लिहिले असेल आणि आम्ही हसतोय. भारताच्या लोकसंखेचे मुळ म्हणुन आम्ही संततीप्रतिबंधक उपायांचा अभाव, विवाहाचे वय,शिक्षणाचा अभाव, कुटुंब नियोजन, कायद्याने मुलबंदी, गर्भपात इत्यादी-इत्यादी गोष्टींचा विचार करतो, पण वैराग्य.. हाहाहा

२६ जानेवारी, १५ ऑगस्ट या सारखे महत्त्वाचे दिन लैंगिक आचार मुक्त दिन म्हणून पाळले जावेत. "मी स्वतः लैंगिक व्यवहार करणार नाही अन् लैंगिक व्यवहारास प्रोत्साहन देणार नाही"

हाहाहा हे लै भारी. त्याचबरोबर महिन्याच्या 'विश्रांतीच्या दिवसात' उभयंतांनी घरोघरी जाऊन लैंगिक व्यवहाराचे दुष्परिणाम आणि वैराग्य या विषयावर किमान दहा मिनिटाच्या स्क्रिप्ट वर तयारी करुन संबधिताचे प्रबोधन करायचे. :)

अर्थात विषयाकडे ( विषय म्हणजे तो नव्हे हो, तिकडे वैराग्यानेच पाहावे. )
पाहण्याचा सकारात्मक गोष्टीचे आपले कौतुक करावे तितके थोडेच आहे. ;)

विसोबा खेचर

हम्म!

बाबारे धनंजया, लैंगिकतेच्या सुनामीमध्ये वैराग्य केव्हाच वाहून जाते रे! :)

असो,

आपला,
ओशो अभ्यंकर.

सुचेल तसं

लेख नक्कीच विचारपूर्वक लिहीला आहे. पण तुम्ही सुचवत असलेले उपाय व्यावहारिक दृष्ट्या उपयोगी नाहीत.
वर अनेकांनी विचारला तोच प्रश्न्न माझाही आहे : लैंगिक व्यवहार म्हणजे नेमके काय? एका व्यक्तिचे अनेक जणांशी/जणींशी असलेले लैंगिक (फार तर अनैतिक म्हणू आपण त्याला) संबंध? जर एखादं couple एकमेकांशी प्रामाणिक राहून लैंगिक जीवनाचा आनंद घेत असेल तर त्यांनी सुद्धा वैराग्य पाळायला हवं असं तुम्हाला सुचवायच आहे का?

लोकसंख्येचा भस्मासुर आटोक्यात आणायला वैराग्यभावना कशी काय मदत करणार? सुशिक्षित समाज आज १ किंवा २ मुलांवरच थांबतो. त्यांना त्यापेक्षा अधिक मुलं होणं कुठल्याच दृष्टिने परवडणार नसतं. त्यामुळे आवश्यक ती काळजी ते घेतातच. खरा प्रश्न आहे तो अशिक्षित समाजाचा. त्यांना संततिनियमनाचं महत्त्व पटवून देणं गरजेचं आहे. त्यासाठी कडक कायदे करणं गरजेचं आहे. (मुलगाच पाहिजे हा अट्टाहास देखील काही प्रमाणात कारणीभूत आहे - अशिक्षित आणि सुशिक्षित ह्या दोन्ही समाजामधे)

वैराग्यभावना म्हणजे तुमच्या नैसर्गिक कामेच्छेला अनैसर्गिकपणे प्रतिबंध करणे. त्यामुळे ही उपाययोजना फक्त अव्यावहारिकच नाही तर घातकदेखील आहे. ज्या इतर देशांमधे कमी लोकसंख्या आहे ती वैराग्यभावनेमुळे खचितच नाही तर त्याचं कारण म्हणजे तिथे संततिनियमनविषयक ज्ञानाचा उत्तम प्रसार झाला आहे.

http://sucheltas.blogspot.com

सहज

लई भारी डोक्यालिटी!

:-)

स्वगतः वैराग्याचा कायदा होण्या अगोदर परमेश्वरा इच्छामरणाचा कायदा येउ देत!

लिखाळ

नमस्कार,
लेख आणि विचार वाचले. पटले नाहित.
लैंगिक व्यवहार हा समागमापुरता मर्यादित नसतो. आपण फक्त समागमापुरते लिहिले आहे असे वाटले. ते सुद्धा ज्या समागमातून मुल होण्याची शक्यता आहे अश्या !

वैराग्य ही भावना अनेक गोष्टी आत सामावते. वैराग्यामध्ये आपोआप विकसित झालेली उदासिनता असते. त्यात नियमन नसते असे मला वाटते. आपणाला फक्त 'लैंगिक वासना निरोध' या एकाच पैलू बद्दल बोलायचे आहे असे दिसते. मग वैराग्य शब्द न वापरता 'लैंगिक वासना निरोध' अथवा 'समागम निरोध' असेच वापरणे बरे असे मला वाटते. इंग्रजीमध्ये सेलेबिटी की काय म्हणतात तसे.

संतती नियमनाची साधने आणि कौंटुंबिक अर्थकारणाशी कुटुंबसदस्यांच्या संख्येचा मेळ यांबाबत लोकशिक्षण याला पर्याय नाही.

महात्मा गांधी या माणसाने आपल्या देशाला एका बाबतीत नैतिक अधिष्ठान द्यायचे स्वप्न पाहिले. आज जवळपास ६० वर्षानंतर आपण त्याची फळे बघतो आहोत.
हे कसे ते समजले नाही. समाजाच्या नैतिक अधिष्ठानाबद्दल वेदकाळापासून विचार चालू आहे असे ऐकून आहे.

पण त्यांची प्रगती अशाच वैराग्यभावनेतून झालेली आहे हे आपण कसे विसरतो?
या बद्दल काही माहिती नाही. आपण ती द्यावी अशी विनंती. अथवा माहितीचा दुवा तरी.

--(बहिर्मुख) लिखाळ.

प्रियाली

धनंजयांना प्रतिसाद वाचून नक्की वैराग्य येणार.

मी नाही - लोलक बोलायला लावतो.

लिखाळ

कोण कुणाचा सोफा कसा फाडत आहे आणि कुणी कुणाच्या गंडस्थळावर कशी उडी घेतली आहे (गंडस्थळ हा शब्द अश्लील नाही !) हे सर्व समजून घेत रहाणे हाच एक महत्त्वाचा उद्योग आहे. आणि सोफे कुणाचे खरवडले जातात ते कळले नाही तरी आमच्या सोफ्याचे कापड उगीच कधी मधी फाटल्यासारखे होते. :)

सर्व हत्ती, सोफ्यांचे मालक, नवे सोफे बनवणारे, त्याची कापडे बनवणारे, बोके, सिंहाचे छावे आणि सिंह यांचा विजय असो !

--लिखाळ.

धनंजय

तुम्ही हा योग्यच प्रश्न विचारला.

>> पण त्यांची प्रगती अशाच वैराग्यभावनेतून झालेली आहे हे आपण कसे विसरतो?
> या बद्दल काही माहिती नाही. आपण ती द्यावी अशी विनंती. अथवा माहितीचा दुवा तरी.

याच (माझ्या मते योग्य) विचारणेला त्या लेखाच्या प्रतिसादात "शो मी द डेटा" म्हटले आहे. त्या लेखात "राष्ट्रभावनेमुळे अडचणी दूर होतात, प्रगती होते" असे म्हटले असेल तर शो मी द डेटा.

सोफा केवळ फाडण्यासाठी फाडला नाही. ओरखड्यातून खोगीरभरतीबरोबर काही हरवलेले रोख पैसेही मिळालेत, हे तुमच्या रोखठोक प्रश्नावरून वाटते. म्हणजे या कवायतीतून काही सकारात्मकही घडले :-) केवळ फाडाफाडीच नव्हे, असे मानून बरे वाटत आहे.

वैराग्य अजून आलेले नाही ;-)

म्हणजे तमाम मानव जमाती चा एकमेव , आणि खरा खुरा स्ट्रेसबस्टर बंद. कमाल आहे.आसारामांचे चेले झाला आहात काय? ते पण असे सांगतात.
विनायक प्रभु

हा पण एक लोकसंख्या समस्येवरचा उपाय म्हणुन वापरला जातो. पण ज्याना साधने वापरायची नसतात वा वापरण्यात प्रोब्लेम असतात त्यांच्यासाठि. उदा. गोळ्या प्रक्रुतीला न झेपणे, निरोधाला पुरुशाचा विरोध्(आनंद मिळत नाही ) ,कॉपर टी ने होणारा त्रास वगैरे वगैरे. पण ह्या सर्व लोकासाठि सेफ पिरियड+ टेंपररी वैराग्य भावना सांगतात. विनायक प्रभु
लोकांना हा सल्ला फार आवड्त नाही. कारण वर सांगितले आहे.

चतुरंग

धन्याशेठ, अतिशय जालिम वक्रोक्ती! टेडी उंगलीसे घी निकालना - म्हणतात ना ते असे!! :O @) :))

(खुद के साथ बातां: सरकारी हापिसातले काही लोक जसे उघड 'घेत' नाहीत पण टेबलाखालून 'घेतात' त्याप्रमाणे काही जणांनी उघडपणे 'वैराग्य' आणि टेबलाखालून 'अनैतिकता' असे केले तर जिकडेतिकडे ब्लिंटन-सोनिका जोड्या तयार व्हायच्या की रे रंग्या! ;) B) )

चतुरंग

साती

धनंजय आपण केलेले विनोद (विडंबन) आवडले.

साती

अरेच्चा. इथे धनंजय शेठ kauls reverse effect law तर वापरत नाही ना?
गोंधळ्लेल्ला वि.प्र.

धनंजय

हे एक गंभीर विडंबन आहे. केवळ विरंगुळ्यासाठी विडंबन नव्हे.

वर दुव्यात सांगितलेल्या लेखातली वाक्ये जशीच्या तशी उतरवली आहेत. त्या लेखातल्या "राष्ट्रभावना" शब्दाच्या ठिकाणी "वैराग्यभावना" शब्द घातला आहे, त्या लेखातल्या "भारतासमोरील अडचणी" ऐवजी "लोकसंख्येचा प्रश्न" असे घातले आहे. आणखी थोडे (कमीतकमी) शब्द बदलले आहेत.

वैराग्यभावाने संततीनियमन करावे ही कल्पना इतकी आचरट आहे, की हे माझे गंभीर मत आहे असे कोणाला वाटेल अशी मी कल्पना केली नव्हती. इतकेच काय पहिल्या परिच्छेदात हा आचरटपणा कोणी व्यक्तिगत मानू नये, म्हणून माफीही मागितली आहे.

हे विडंबन साधे नसून "गंभीर" का आहे? हा वाद जवळजवळ शब्दशः दुव्यातल्या "राष्ट्रभावनेचा अभाव... अडचणींचे मूळ" लेखातला आहे. वरील माझ्या लेखातला युक्तिवाद अव्यवहार्य आहे, हे स्पष्ट दिसून यावे (पण आचरटपणामुळे खेळीमेळीचे वातावरण राहावे). त्याच प्रकारे शब्दश: तोच युक्तिवाद "राष्ट्रभावनेचा अभाव... अडचणींचे मूळ" लेखात आहे - तोही त्याच प्रकारे अव्यवहार्य आहे. (पण तो लेख सोज्ज्वळ असल्यामुळे, त्याच्या युक्तिवादाविरुद्ध मी प्रतिसाद लिहिता "धनंजय भ्रष्टाचाराच्या समर्थनासाठी अघोरी युक्तिवाद करतो आहे" असे सौम्य शब्दांत उपप्रतिसाद आले. वातावरण खेळीमेळीचे राहिले नव्हते.)

हे विडंबन मी केवळ विरंगुळ्यासाठी लिहिलेले नाही. माझ्याविरुद्ध "भ्रष्टाचाराचे सम्रर्थन करतो" अशी भावना दिसत होती. "तसे नाही, केवळ त्या लेखातील सोज्ज्वळ युक्तिवाद अव्यवहार्य आहे - शब्दशः तो या आचरट युक्तिवादासारखा आहे" हा गंभीर मुद्दा या विडंबनातून मांडायचा प्रयत्न केला आहे.

वरील बहुतेक प्रतिसाद देणार्‍यांनी समजल्याप्रमाणेच ही फिरकी घेतलेली आहे.

वक्रोक्तीचे असे स्पष्टीकरण केल्यास त्यात गंमत राहात नाही. पण काही लोकांना (पहिल्या परिच्छेदातला संदर्भ वाचला नसेल म्हणून) वक्रोक्ती आहे हे तितके स्पष्ट दिसत नसावे. म्हणून नाइलाजाने रसभंग करणारे हे स्पष्टीकरण देत आहे.

ऋषिकेश

हसून हसून दमवलंत की राव! लई बुंगाट!!! भन्नाट.. :)) :)) :))

पण हे काय!?!! वक्रोक्तीचे स्पष्टीकरण देणे गरजेचे होते काय?..
तुमचे लेखन इतके चपखल होते की तुम्ही स्वतःच स्पष्टीकरण देऊन त्या मस्त लेखनाचा मान कमी केल्याबद्दल व आमचा रसभंग केल्याबद्दल मात्र आपला निषेध! आणि इतक्या तिरक्या लेखाबद्दल धन्यु!!! ;)

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

पण हे वैराग्य म्हणजे फक्त लैंगिक वैराग्य नाही तर कदाचित शिस्त पाळण्यासाठी रस्त्यावरून एखाद्याला प्रेफरन्स देणे हे सुधा होय. देशाच्या विकासात शिस्तीचे महत्व आपण सगळे जाणतोच. शिस्त पाळली जावी म्हणून थोडा सोशिकपणा दाखवणे हे देखिल वैराग्यच असे मी मानतो.
केवळ मीच पुढे जाणार कोणत्याही परीस्थितीत ही प्रवृत्ती देखील वैराग्याचा अभाव असण्याचे द्योतक नाही काय?
(स्वदेशी परतलेला)
पुण्याचे पेशवे

विजुभाऊ

ब्रम्हचर्य हेच जीवन आणि वीर्यनाश हा मृत्यू ? यावर बहुधा आपला विष्वास असावा.
पण मग एक दोन दिवसच का हे दिन पाळायचे?
जर सर्वानीच ब्रम्हचारी रहायचे ठरवले तर दुसर्‍या पिढीला शिकवयला शिष्य तरी मिळतील का?
बाकी
हे एक गंभीर विडंबन आहे

हे अती विनोदी वाक्य वाचुन हसण्याचा प्रयत्न केला.
अवांतरः विडम्बन आणि विटम्बन यातील सीमारेषा कोणती ?

पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

धनंजय

मूळ लेखाला पूरक असा मुद्दा चर्चेत आणलात.

जर सर्वानीच ब्रम्हचारी रहायचे ठरवले तर दुसर्‍या पिढीला शिकवयला शिष्य तरी मिळतील का?

वैराग्यभावनेमुळे पुढची पिढीच नसेल आणि लैंगिक व्यवहाराचा नायनाट होईल. जन्ममृत्यूच्या फेर्‍यात आडकलेली कुठली पुढची पिढीच नसेल आणि अनायासे सर्व मनुष्यांचे आत्मे मोक्ष प्राप्त करतील. वैराग्यभावनेच्या दूरगामी फायद्यांचे हे एक विवेचन लेखात द्यायचे राहिले होते.

पण मग एक दोन दिवसच का हे दिन पाळायचे?

नवीन तडफदार विचारवंतांनी यावर तोडगा काढला आहे (दुवा). क्लोरोफॉर्मच्या वापराने आता वैराग्यभावना दोनच दिवस नाही, तर सदासर्वकाळ पाळता येईल अशी आशा निर्माण झाली आहे.

विकास

नवीन तडफदार विचारवंतांनी यावर तोडगा काढला आहे (दुवा). क्लोरोफॉर्मच्या वापराने आता वैराग्यभावना दोनच दिवस नाही, तर सदासर्वकाळ पाळता येईल अशी आशा निर्माण झाली आहे.

हे वाचताना एकदम मला स्फोट या कादंबरीची आठवण झाली (अनील बर्वे? का अरूण साधू?)

यात एक संशोधक अशा ध्वनी लहरींचा शोध लावतो ज्या प्रसारीत करून ते विशष्ठ वयाच्या वरील वृद्धांनी एकल्यावर त्यांना मृत्यू गाठणार असतो...

विसुनाना

दुसर्‍या कुठल्या मोठ्या लोकसंख्येच्या देशाच्या तुलनेने बघता "भारतात वैराग्यभावनेचा तुलनात्मक अभाव नाही" असे माझे मत आहे. (तुम्ही इंग्लंडच्या प्यूरिटन/प्रोटेस्टंट दंडसंहितेचे उदाहरण दिलेत, म्हणून तुलनात्मक विचार केला.)

आता जर प्रश्न असा असेल की "लैंगिक व्यवहारातून गर्भधारणा- वाढत्या लोकसंख्येचे मूळ?" तर वेगळा विचार करावा लागेल.

२६ जानेवारी, १५ ऑगस्ट या सारखे राष्ट्रीय दिन गर्भधारणा मुक्त दिन म्हणून पाळल्या जावेत.

सर्वच लोक म्हणतात की जो काही लैगिक व्यवहार करतात ते अगतिकतेमुळे करतात. आपण मुद्दामून देशाच्या वाइटासाठी लैगिक समागम करत आहोत, असे म्हणणारा कोण सापडेल? स्वतःला "ही मॅन" जाणणारे ही मॅन केवळ सिनेमातच असतात. एखाद्या कुटुंबात तीन मुली झाल्या, तर काय नवरा-बायको असा विचार करतात का - "चला, कुटुंबाचे नुकसान करू"? तर, नव्हे. ते असा विचार करतात - "आता नाहीतरी तीन मुली झाल्याच आहेत. एखादा मुलगा झाला तर बरे होईल. आताच नसबंदी करून घेण्यापेक्षा आणखी एखादा प्रयत्न करू. वंशाला दिवा होईल. यातच कुटुंबाचे भले आहे." तोच प्रकार नवीन लग्न झालेल्यांचा- "आता एवीतेवी लग्न केलेच आहे. मग एखादे मूल होऊन जाऊदे कसे? तेवढेच लोकांचे टोमणे मारणे थांबेल. मग पुढे कधीतरी नसबंदी करून घेता येईल."

राष्ट्राचे नुकसान करण्याच्या हेतूने लैगिक व्यवहार करणारा कोणी मला दिसला तर मला कमालीचे आश्चर्य वाटेल. "अगतिक नसेन तर समागम करणार नाही," असे झाडून ९०-९९% टक्के लोक म्हणतील, आणि २६ जानेवारीलाच नव्हे, कुठल्याही दिवशी.

लैंगिक व्यवहारातून गर्भधारणा हा "फिजिकल प्रॉब्लेम" आहे. १९-२०-२१व्या शतकात अमेरिकेत लैगिक व्यवहार टप्प्या-टप्प्यावरती बोकाळला होता/आहे. फक्त आजकाल तो चव्हाट्यावर होतो. (लैगिक व्यवहारासाठी गुप्तता पाळावी लागत नाही. केवळ इच्छा व्यक्त केली तरी पुरे... वगैरे.) बहुतेक वेळ लोकसंख्या न वाढवता जर लैगिक व्यवहार करता आला, अशी सिस्टिम असली तर "परदेशातल्या"सारखे भारतातही वागतील, असे मला वाटते.

बाकी कुठल्याही अन्य देशाशी तुलना न करता :
"वैचारीक पातळीवर योग्य बदल घडवून आणण्यासाठी वैराग्यभावना असणे गरजेचे आहेच!"
हे तुमचे आवडते तत्त्व पूर्णपणे पटण्यासारखे आहे.

(आपल्याच प्रतिसादाचे विडंबन... ह.घ्या. हे.वे.सां. न. ल.)

धनंजय

मस्त!

पण या विडंबनातले कुठलेही मुद्दे अव्यवहार्य नाहीत. इतकेच काय युक्तिवाद योग्य आहे, आणि विदा योग्य आहे - म्हणजे "राष्ट्राचे नुकसान करण्याच्या हेतूने लैंगिक व्यवहार करणारा कोणी मला दिसला तर मला कमालीचे आश्चर्य वाटेल" हे वाक्य तथ्यात्मक असावे.

अशा प्रकारे ह. घेता-घेता थोडेथोडे गंभीर घेतले तरी दिसते की त्या लेखाच्या प्रतिसादात माझा युक्तिवाद ठीक होता (कारण शब्दशः विडंबन केले तरीही युक्तिवाद योग्य राहातो).

या लेखाच्या अनुषंगाने तुमचा प्रतिसाद सुयोग्य आहे, हासरा आहे, प्रतिभायुक्त आहे, हे पुन्हा सां न ल! या लेखाला तुमचा प्रतिसाद खुलवतो, आणि तार्किकदृष्ट्या पूर्ण करतो.