Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

देशातील शिक्षणाचं माध्यम कोणते असावे, मातृभाषा की इंग्रजी ?

ग
ग्रेटगणेश
गुरुवार, 04/30/2015 - 08:44
🗣 240 प्रतिसाद
देशातील शिक्षणाचं माध्यम कोणते असावे, मातृभाषा की इंग्रजी ? (सदर लेख 'साप्ताहिक लोकप्रभा'त २७.१२.२०१४ रोजी प्रसिद्ध झालेला आहे.) आज आपल्या देशात शिक्षणाचं मध्यम कोणते असाव यावर चर्चा (आणि केवळ चर्चाच) सुरु आहे. महाराष्ट्रात नुकतेच श्री भालचंद्र नेमाडेंनी या चर्चेला तोंड फोडले. मातृभाषा ही खऱ्या अर्थाने ज्ञान भाषा असते. ती भाषा त्या मुलाला आईच्या पोटात असल्यापासून ऐकायला मिळालेली असते (उदा. अभिमन्यू). ज्ञानभाषा ही फक्त आणि फक्त मातृभाषाच होऊ शकते. मातृभाषेतील शिक्षण मुलांची मानसीक वाढ करतं कारण ते मुलं ज्या वातावरणाचा भाग असतं, त्या वातावरणाचे प्रतिबींब त्याला मातृभाषेत, तीच्या शब्दांत दिसत असतं. ते मुल त्याचा अनुभव घेऊ शकतं, त्यातील साम्य किंवा विरोधाभास त्याला जाणवत राहातो व त्यातूनच पुढे ते मुल 'असं का?' हा विचार करायला लागतं. हे इंग्रजी भाषेतील शिक्षणात अभावानेच होताना आढळतं. ‘A’ म्हणजे Apple हे ते मुल शिकते ते घोकंपट्टीने पण ते ‘अॅपल’ त्याला आपल्या वातावरणात पुस्तक आणि ते विकणारा भय्या यांच्या व्यतिरीक्त कुठेच आढळत नाही. या उलट आंबा ते झाडावर पाहू शकतं. मातृभाषेतील शिक्षण मुलाची मानसीक वाढ होण्यास पायाभूत ठरते. या पार्श्नभूमीवर नुकत्याच प्रदर्शीत झालेल्या 'डॉ. प्रकाश बाबा आमटे' या मराठी चित्रपटातील एक प्रसंग विचार करण्यास लावणारा आहे. चित्रपटात डॉ. आमटेंचे सहकारी आदीवासी मुलांना शिकवायचा प्रयत्न करतात असे दृष्य आहे. मुल त्यांच्या बालसुलभ स्वभावानुसार एकमेकांत मजा करण्यात गुंतली आहेत. शिक्षक काय शिकवतायत आणि ते काय बोलतायत याकडे मुलांच अजिबात लक्ष नाहीय कारण त्यांच्या दृष्टीने काहीतरी अगम्य असे शिक्षक बोलत आहेत आणि ते जे काही सांगत आहेत ते त्यांनी कधीच पाहिलेलं वा अनुभवलेलं नाहीय. शेवटी कंटाळून ती मुल शाळेतून सुंबाल्या करण्याची सुरुवात करतात तेंव्हा डॉ. आमटे शिक्षकांना सांगतात की अरे त्या मुलांना त्यांच्या शब्दांत, त्यांना समजेल अशा भाषेत शिकव. या प्रसंगाला थिएटर मध्ये मोठा हशा (लाफ्टर) मिळतो व हा प्रसंग विनोदी प्रसंग म्हणून जमा होतो. उद्या हा प्रसंग एखाद्या पुरस्कारासाठी 'सर्वात चांगले विनोदी दृष्य' म्हणून नॉमिनेट झाले तरी मला अजिबात आश्चर्य वाटणार नाही कारण आपण आता या विनोदी प्रसंगाचे अविभाज्य भाग झालो आहोत. इंग्रजी वा इतर कोणतीही भाषा व्यक्तीनत्व विकासासाठी हातभार लावते यात कोणतीही शंका नाही. पण ती श्रेष्ठ आणि आपली भाषा मागासलेली हा विचार मात्र कोतेपणाचा आहे. इंग्रजी भाषेत महान ग्रंथसंपदा निर्माण झाली, निरनिराळे शोध लागले, औद्यागीक क्रांती झाली याचं श्रेय नि:संशय त्या भाषेचंच आहे. पण हे सर्व लेखक, कवी वा शास्त्रज्ञ यांची 'मातृभाषा' इंग्रजी किंवा त्या त्या देशाची मातृभाषा होती हे आपण लक्षात घेत नाही. परकीय भाषेत संपूर्ण शिक्षण घेऊन एखाद्याने एखादा मोठा शोध लावला व तत्वज्ञान मांडले असे माझ्या अद्याप वाचनात व ऐकण्यात आलेले नाही. त्याच्याही अगोदर आपल्या देशात शुन्याचा क्रांतिकारी शोध लागला, ग्रह-तारे यांच्याविषयी माहिती आपल्याला व अरबांना पाश्चात्यांच्या खूप पुर्वीपासून होती, आयुर्वेदासारखं शास्त्र आपल्या देशात फारच पुर्वी विकसीत झालेले होते. कालीदासाचे मेघदूत, रामायण, महाभारत ही महाकाव्ये ही जगभर मान्यता पावलेली होती आणि ही सर्व त्याकाळी प्रचलीत असलेल्या संस्कृत या समृद्ध 'देशी' भाषेतच आहेत. भाग्वाद्गीतेला नुकतीच ५१५१ वर्षे पूर्ण झाली व भगवद्गीता तत्वाज्ञानावरचा जगातला एक जुना व अत्यंत महत्वाचा ग्रंथ म्हणून मान्यता पावला आहे तो संस्कृत भाषेतच आहे. आपले सहीत्य, कलाकृती, शास्त्र इंग्रजी भाषेतल्यापेक्षा पुर्वीचे व काकणभर सरसच आहेत. इथे भाषांची तुलना करण्याचा प्रयत्न मी करत नाही तर प्रतयेक भाषा ही परिपूर्ण असतेच तर मला एवढेच म्हणायचे आहे कि ज्ञान्साधानेसाठी मातृभाषा हि इतर कोणत्याही भाषेसाठी अधिक योग्यच नव्हे तर एकमेव असते. आपल्या देशात प्रथम मोंगल व नंतर इंग्रजांच्या राजवटीत आपल्या देशातील भारतीय भाषांची पीछेहाट झपाट्याने होऊ लागली. इंग्रजांना तर त्यांचे साम्राज्य शाबूत ठेवण्यासाठी बंदूकीपेक्षा भाषेने आधार दिला. इंग्लीश शिक्षणतज्ञ मेकॅले याच्या सुपीक डोक्यातून जन्मलेली शिक्षण पद्धती इंग्रज सरकारने देशात लागु केली. ही शिक्षण पद्धती आपली म्हणजे स्थानिक लोकांची विचारशक्ती वाढु नये, किंबहूना त्यांनी विचारच करू नये अशा पद्धतीने आखलेली होती. इंग्रजांना त्यांच्या भाषेत, त्यांच्या मनाप्रमाणे काम करणारा 'रोबो' नोकरवर्ग हवा होता तो त्यांचा हेतू त्यांनी भाषेच्या माध्यमातून साध्य केला. इंग्रजी भाषेनुळे इंग्रजांना आपल्या देशावर राज्य करणं सोप्पं झालं असं म्हणताना इंग्रजी ही ‘त्यांची’ मातृभाषा होती हे आपण लक्षातच घेत नाही. इंग्रजांनी इथ इंग्रजी शिक्षण देण्यास सुरूवात केली ती त्यांची भाषा समजणारा नोकरवर्ग त्यांना उपलब्ध व्हावा म्हणून! कारण त्यांना त्यांच्या भाषेत कारभार करायचा होता. इंग्रज अर्ध्यापेक्षा अधिक जगावर राज्य करू शकले यात त्यांच्या दरा-यापेक्षा त्यांच्या भाषेचा वाटा मोठा होता. त्यांनी कोणत्याही देशावर राज्य करताना ‘त्यांच्या’ मातृभाषेचाच आधार घेतला हे विसरून चालणार नाही. जेत्यांनी जीतांवर आपली भाषा व संस्कृती लादण्याचा प्रघात पहिल्यापासूनच आहे मात्र जे जे देश परकीय सत्तेपासून स्वतंत्र झाले त्यांनी त्यांनी सर्वात पहिल्यांदा आपल्या भाषेची संस्कृतीची पुनर्स्थापना केली. सोव्हिएत रशियातील संघराज्य अनेक वर्ष एकसंघ राहून महाशक्ती बनू शकला यात दडपशाही एवढाच त्यांच्या देशभर लागु केलेल्या 'रशीयन भाषेचा' जुलमी आग्रहही कारणीभूत होता. भाषा हा समाजाला ताब्यात ठेवण्याचं वा एकसंघ ठेवण्याचं प्रभावी माध्यम आहे हे वारंवार सिद्ध झालेलं आहे स्वातंत्र्य मिळाल्यापासून ६७ वर्ष उलटून गेलियावरही आपण मेकॅलेच्या शिक्षण पद्धतीत फार बदल केलेला नाही. आजही आपण इंग्रजी माध्यमाच्या शाळांना प्रेत्साहन देऊन 'फाड फाड इंग्लीश' बोलणारा मात्र विचारशक्ती पुरेश्या प्रमाणात विकसीत न झालेला असा उच्चशिक्षीत नोकरवर्गच तयार करीत आहोत असं म्हणण्यास जागा आहे. इंग्रजी ही जागतीक संपर्काची भाषा आहे हे खरंच ! परंतू संपर्काची भाषा असणे व ज्ञान भाषा असणे यात जमिन-अस्मानाचा फरक आहे. केवळ उत्तम(?) इंग्रजी बोलता येणे यात अभ्यासापेक्षाही सवयीचा भाग जास्त आहे. माझे एक परिचित केवळ १० वी पास. तेही गावाकडच्या शाळेत शिकलेले. परंतू इंग्रजी संभाषण चांगल्यापैकी करायचे कारण एका इंग्लीश कंपनीच्या मुंबईतील कार्यालयात अनेक वर्ष शिपाई म्हणून काम केलेलं..! कोणतीही भाषा संपर्काचे माध्यम म्हणून वापरणे वा बोलता येणे हा शिक्षणापेक्षा त्या भाषेच्या सहवासात राहाणे याचा भाग आहे असे मला वाटते. मुंबई सारख्या शहरात अनेकजण गुजराती वा मारवाडी भाषा उत्तम रित्या बोलु शकतात वा वाचु शकतात यात विशेष असे काहीच नाही कारण ते त्या समाजाच्या सहवासात राहत असतात. परंतू अशी माणसे काही गंभीर विचार करताना वा सुख-दु:खाच्या भावना व्यक्त करताना मातृभाषेचाच विचार करतात हे खरं आहे. जगातील मुख्य विकसित देशांचे उदाहरण घेतले तरी हेच दिसून येते कि त्यांच्या देशात त्यांच्याच भाषेचा वापर मुख्यत्वे करून केला जातो. रशिया, फ्रान्स, जर्मनी, जपान, चीन किंवा एक महत्वाचा देश म्हणून उदयाला येत असलेला ब्राझील हे जगातील बलाढ्य व आर्थिक महासत्ता गणले जाणारे देश आहेत. यापैकी कोणत्याही देशात इंग्रजी किंवा अन्य कोणत्याही परकीय भाषेला मुख्य आणि महत्वाचे स्थान नाही. हे सर्व देश आणि त्याची अर्थव्यवस्था आज जगभरात मान्यता पावलेली आहे हे आपण विसरून चालणार नाही. या सर्व महत्वाच्या देशात शिक्षणाचे प्रमुख माध्यम त्या त्या देशांची भाषा आहे हे आपण नजरेआड करून चालणार नाही. या देशांमध्ये इंग्रजी व इतर परकीय भाषा शिकण्यास प्रोत्साहन दिले जाते ते केवळ संपर्काचे साधन असावे म्हणून, मात्र मुख्य शिक्षण त्या त्या देशांच्या मातृभाषेतूनच दिले जाते. नुकतेच ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत श्री. भालचंद्र नेमाडे यांनी इंग्रजी माध्यमाच्या शाळा बंद कराव्यात या अर्थाचे विधान केले. खरतर बंदी घालून काहीही साध्य होत नाही असा आपला अनुभव आहे. त्याउलट देशी भाषांच्या शाळांना प्रोत्साहन, देशी भाषांमध्ये उत्तमोत्तम साहित्य, कलाकृती कशा निर्माण होतील याचा विचार करणे गरजेचे आहे. शाळेत शिक्षणाचं मुख्य मध्यम मातृभाषाच असावी. ती सोप्पी, मुलांना आकर्षक वाटेल अशा पद्धतीने शिकवण्याची गरज आहे. मुलांना आपल्या भाषेची रुची उत्पन्न होईल अशी तिची मांडणी व्हायला हवी. ज्यावेळी व्यवहारात देशी भाषांचे महत्व वाढेल, देशी भाषांना प्राधान्य दिले जाईल तेंव्हाच इंग्रजी भाषेचं महत्व कमी होत जाईल. प्रशासनाची भाषा, न्यायदानाची भाषा देशीच असावी असा आग्रहच नव्हे तर हट्ट असावा. त्यासाठी आंदोलने देखील करण्याची तयारी ठेवावी लागेल तरच देशी भाषांचं महत्व वाढेल. मी कित्येकदा उच्च न्यायालयात कामानिमित्त जात असतो. तेथे कोर्टासमोर फर्ड्या इंग्रजीत वादविवाद चालू असतात. त्या उच्चशिक्षित वकिलांचा अशील जो माझ्यासारखा असतो किंवा ब-याचदा अर्धशिक्षित किंवा अशिक्षित असतो त्याचा एखादा खटला चाललेला असते. हे सर्व पहाताना एक गमतीचा विचार मनात येतो की ज्याच्या भवितव्यासाठी वा ज्याला न्याय मिळवून देण्यासाठी जे विद्वान वकील न्यायाधीशांसमोर वादविवाद करीत आहेत त्या अशिलाला त्यांचे काय चालले आहे हे काहीच कळत नसते. तो भांबावल्या सारखा एकदा या वकिलाकडे तर एकदा त्या वकिलाकडे पाहत असतो. माझीही बऱ्याचदा अशी परिस्थिती होते हा माझा अनुभव आहे. सरकारी मराठी भाषा तर एखाद्या मराठीचा बऱ्यापैकी जाणकार माणसाला देखील कळणे अवघड जाते तर एखादा ग्रामीण भागातील मनुष्य ती काय समजणार? त्यातील मराठी(?) शब्दप्रयोग तर अनेकदा अनाकलनीय असतात. त्या शब्दांना मराठी का म्हणावे असा प्रश्न पडतो. केवळ याच कारणांमुळे शासनाच्या अनेक चांगल्या योजना सामन्य लोकांपर्यंत पोहोचत नाहीत हा अनुभव आहे. सरकारी खात्यांचा पत्रानुभव तर हसावं की रडावं या प्रश्नाच्याही पलिकडचा आहे व असतो. मी बॅंकेत नोकरी करत असताना रिझर्व बॅंकेकडून आम्हाला कामकाजाच्या निमित्ताने पत्र यायची. पत्रं अगदी उच्चस्तरीय अस्खलित इंग्रजी भाषेत लिहीलेली असायची पण शेवटी मात्र जाड ठशांत छपाई केलेलं एक वाक्य असायचं ' हम हिन्दी मे पत्र व्यवहार का स्वागत करते है'. म्हणजे काय? मग तुम्ही का नाही हिन्दीत पत्र पाठवले? भाषेच्या या अशा माकडचेष्टा आपल्या देशांत सुरू आहेत आणि महाराष्ट्र त्यातही 'नं. १' वर आहे. मराठी ही आपल्या राज्याची राजभाषा असली तरी ती डोक्यावर राजमुकुट घालून फाटक्या कपड्यात मंत्रालायासमोरच्या फुटपाथवर उभी आहे असे काही वर्षांपूर्वी कुसुमाग्रजांनी सांगितले होते..आता इतक्या वर्षानंतर तिची अवस्था आणखीनच दयनीय झालेली दिसत आहे. मराठी माध्यमांच्या शाळा बंद व्हाव्यात या दृष्टीने सर्व बाजून पद्धतशीर प्रयत्न चालू आहेत. यातला सर्वात मोठा वाट आपल्या मराठी लोकांचाच आहे हे त्यात आणखी दुर्दैव आहे. सुशिक्षीत असोत वा अशिक्षित आई बाप मुलाला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालण्यात धन्यता मनात आहेत. त्यासाठी वाटेल ते करण्याची त्यांची तयारी आहे. मराठी माध्यमाच्या शाळेत मुलाला घालणे म्हणजे काहीतरी मोठा अपराध आहे अशी आपली मानसिक धारणा झालेली आहे. मुलगा वा मुलगी convent मध्ये शिकतो हे सांगणे ‘स्टेट्स सिम्बॉल’ झाले आहे. मराठी बोलणे आज मागासलेपणाचे लक्षण मानले जात आहे. मराठी आई-बाप आपल्या पाल्याने इंग्रजीच बोलावे असा दुराग्रह करत आहेत. यात त्या मुलाचे काय हाल होतात या कडे कोणीही लक्ष देण्याच्या मनस्थितीत नाही. समाजातील शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या खालच्या स्तरावरचे आई-बाप देखील माहागड्या फिया भरून आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालण्यासाठी काय वाटेल ते करत आहेत. अस का करता, हे बहुतेकांना विचारलं असता उत्तर एकच मिळतं, इंग्लीश छान बोलता येतं म्हणून. पुन्हा इंग्लीश छान बोलता येण्यानं काय होणार असं विचारता, चांगली नोकरी मिळते हे उत्तर मिळतं. म्हणजे आयुष्याचा पाया असलेली वय वर्ष पाच ते पंधरा अशी महत्वाची १० वर्ष केवळ इंग्रजी बोलता येण्यासाठी आणि तीही नोकरी मिळावी म्हणून खर्च करायची हे असं काहीतरी विचित्र चाललंय..!!मुल दिवसभर स्कूल मध्ये काढून घरी येतो तो मम्मी त्याला ‘स्नॅकस’ आणि ‘मिल्क’ देते. तीच मम्मी मिल्क ला दुध म्हणताना तो ऐकतो व दुध म्हणतो त्याला मम्मी हरकत घेते व म्हणते, ‘नो बेटा डोन्ट से दुध, से मिल्क..’. आता पोर गोंधळात, की मग ही का दुध म्हणते..मग ती सांगते कि दुधवाला अशिक्षित आहे आणि त्याला इंग्लिश कळत नाही म्हणून त्याला मराठीत सांगितले. यावर ते पोरग आपल्याशी समीकरण बांधते की मराठी ही अशिक्षित लोकांची भाषा आहे हळूहळू त्याच्या मनात आपली भाषा मागासलेली आहे असा समज पक्का व्हायला लागतो. ते पोरग ज्या समाजात वावरते तेथील शब्द संपदा व तो जे शिकतो त्या पुस्तकातील शब्दसंपदा यात त्याला काहीच साम्य दिसत नाही. वर उल्लेख केलेला ‘डॉक्टर प्रकाश बाबा आमटे’ या चित्रपटातील प्रसंग या पार्श्वभूमीवर आठवून पहावा. भाषा म्हणजे केवळ शब्द आणि त्यांची विशिष्ट पद्धतीने केलेली मांडणी नसते तर त्या त्या भाषेतून, त्या भाषेच्या शब्द संपत्तीतून त्या त्या समाजाचा सांस्कृतिक वारसा पुढच्या पिढीकडे आपोआप पोचवला जात असतो. मातृभाषेतील शिक्षणामुळे एखाद मुल सुसंस्कृत होण्यासाठी वेगळा प्रयत्न करावा लागत नाही. शिक्षणाची भाषा मातृभाषाच असावी हे जगभरातील तज्ञ ओरडून सांगत आहेत. मातृभाषेत शिक्षण व जोडीला किमान एकतरी अन्य भारतीय भाषा शिकण्याने ज्ञान कशा रुंदावतात. मनुष्य जेवढ्या भाषा शिकतो तेवढा तो जगाविषयी सजग होतो पण या सर्वांचा पाया मात्र नि: संशय मातृभाषा असावी. थोडेसे भाषेच्या शुद्धतेविषयी.. आज जगातील कोणतीही भाषा तिच्या मूळ स्वरुपात नाही हे सत्य आहे. ज्या भाषा जिवंत आहेत त्या भाषांमध्ये शब्दांची देव-घेव सतत चालू असते किंबहुना ती तशी चालू असेल तर आणि तरच ती भासह जिवंत आहे असे समजण्यास काहीच अह्रकत नाही. आज आपण जी शुद्ध (?) मराठी बोलतो वा वापरतो ती तिच्या मूळ स्वरूपापासून खूप वेगळी आहे तरी ती आपली वाटते यात दुमत नसावे. आजच्या आपल्या प्रमाण मराठी भाषेत फारसी, अरबी वा दक्षिण भारतीय भाषांतील अनेक शब्द बेमालून मिसळून गेले आहेत. आपल्या राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे ‘फडणवीस’ हे आडनाव चक्क फारसी ‘फर्द्नवीस’चा अपभ्रंश आहे हे वाचून आपल्यालाही आश्चर्य वाटेल एवढे ते आपले होऊन गेले आहे. मस्करी, मस्ती, महिरप, मातब्बर, शंकरपाळं ह्या शब्दांचं मुळ अरबी/फारसी आहे हे कोण सांगायला गेले तर आपण त्याला वेड्यात काढू पण ते खर आहे. पटाईत, निरोप, मुलगा या अस्सल मराठी वाटणाऱ्या शब्दांचं मूळ कानडी आहे. टेबल, स्टेशन, सीम-कार्ड, इंजिनीअर असे इंग्रजी शब्द आता ग्रामीण माणसालाही सहज समजतात व ते तसेच लिहिण्यास व बोलण्यास काहीच हरकत नाही. उलट त्यास मराठी/भारतीय भाषेतील मेज, स्थानक, अभियंता असे प्रतिशब्द दिल्याने त्याचा काहीच बोध होत नाही हि वस्तुस्थिती आहे. भाषा शुद्धीचा अतिरेकी आग्रह शेवटी त्या भाषेच्या विनाशाला कारणीभूत ठरू शकतो. इंग्रजी भाषेतील देखील काही शब्द अपभ्रंशीत होऊन समाविष्ट झाले आहेत. अवतार, जंगल, बंगला, गुरु, लुट, महाराज, मंत्र, रोटी असे कितीतरी भारतीय शब्द इंग्रजी भाषेत मोठ्या सन्मानाने विराजमान झालेले आहेत. प्रतिष्ठित इंग्लिश ऑक्सफोर्ड डिक्शनरीत ७०० हून अधिक भारतीय शब्द स्वीकारले गेले आहेत हे आपल्यापैकी अनेकांना माहित असेल-नसेल पण ही वस्तुस्थिती आहे. ज्या दोन किंवा अधिक भाषा कोणत्याही कारणाने एकमेकींच्या संपर्कात येतात तेंव्हा त्यात शब्दांची अदलाबदली होणे हे अगदी नैसर्गिक आहे. त्यामुळे भाषा अशुद्ध झाली किंवा बाटली म्हणण्याचे काहीच कारण नाही. उलट अशा आदान-प्रदानामुळे भाषा समृद्धच होत असतात. हे दोन नद्यांच्या संगमासारखे आहे. नद्यांच्या संगमाला तीर्थक्षेत्राचा मान देणारी आपली संस्कृती या भाषा रुपी नद्यांच्या संगमाला नक्कीच सन्मान देईल परंतु त्याची सुरुवात वा त्यतील मोठेपणा आपल्या जनतेला कोणीतरी समजावून देणे गरजेचे आहे. - गणेश साळुंखे ९३२१८ ११०९१

प्रतिक्रिया द्या
66334 वाचन

💬 प्रतिसाद (240)
म
माईसाहेब कुरसूंदीकर Mon, 05/04/2015 - 09:56 नवीन
धीरूभाई मातृभाषेत शिकले किंवा त्यांची मुलं इंग्रजी शिकली म्हणून ते अब्जाधीश झाले असे तुम्हाला वाटत असेल तर अभ्यास वाढवा.
पुन्हा ये रे माझ्या मागल्या! मातृभाषेत शिकून मुले काहीतरी मोठे भव्य दिव्य करून दाखवतील असा तुझा समज असेल तर तो समज चुकीचा आहे.इंग्रजी शाळेत जाऊन मराठी कादंबर्या वाचणारी,स्पष्ट मराठी व इंग्रजी बोलणारी मुले अनेक पाहिली आहेत. तेव्हा मुलांना एकदा इंग्रजी शाळेत घातले की 'सगळे काही संपले' असे नाही.
माझा मुलगा ज्या (पुर्ण) मराठी शाळेत जातो तिथली आठवी-नववीची मुले स्वतः इंग्रजीमधे नाटक लिहून स्वत: दिग्दर्शन करून सादर करतात.
उत्तम. पण असे प्रत्येक मराठी शाळेत होत असेल का?प्रत्येक शाळेचा दर्जा(मग मराठी असो वा इंग्रजी) वेगळा. समोर सारख्या दर्जाच्या शाळा असतील तर बहुतांशी पालक पाल्याला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Mon, 05/04/2015 - 12:18 नवीन
मराठी शाळांचा दर्जा सुमार असतो हे एकदाचे मान्य करूनच टाकावे. ठीक आहे. पण इंग्रजीचा दर्जा चमत्कार असतो याचा काय पुरावा? मोलकरणी, रिक्षावाले यांची मुले ज्या इंग्रजी शाळेत जातात त्यांचा दर्जा बॉम्बे स्कॉटीश इतका चांगला असतो काय? या इंग्रजी शाळांसाठी मेंढराच्या कळपासारखी गर्दी करणार्‍या पालकांना सुज्ञ म्हणावे काय? कुठल्याही शिक्षणपद्धतीच्या परिणामकतेचे निष्कर्ष काढायला किमान ३० वर्षे तरी अभ्यास लागतो. असे किती प्रयोग भारतात झालेत? इंग्रजीचे वेड भारतात सुरु व्हायला कॉल-सेंटर संस्कृती कारणीभूत आहे. फक्त बारावी झालेली, बाकी काहीही कौशल्य नसणारी पण फाड-फाड इंग्रजी बोलू शकणारी मुले २५-३० हजार कमावत आहेत हे पाहून भारतीय समाजात इंग्रजीचे लोण भयाण पद्धतीने पसरले. पदवीधर, कौशल्यवान मुलांपेक्षा जलद गतीने प्रगती करणारी ही मुले पाहून जनमानसावर परिणाम झालाच. 'आयफोनच सगळ्यात चांगला', 'अ‍ॅपल उत्पादने तीच श्रेष्ठ', 'पाश्चात्त्य म्हणतील तेच सत्य' याच पठडीत 'इंग्रजी माध्यम म्हणजेच यश' असे आहे. यात इंग्रजी शाळांचे पद्धतशीर मार्केटींग, खर्‍या बुद्धीमत्तेपेक्षा दिखावूपणाला महत्त्व देणारे बहुसंख्य लोक, व्यक्तीच्या यशामधे खरेच कशाचा वाटा असतो ते सोयिस्करपणे लपवून बाजारू शिक्षण देणारे शिक्षणसम्राट हे सगळे भर घालणारे आहेतच. शाळेतलंच शिक्षण देणारी खाजगी क्लासेसची अभद्र परंपरा उभी राहीली त्यामागे हेच सुज्ञ पालक होते. जास्त फी असणारा क्लास म्हणजे स्टेटस सिंबल, आम्ही आमच्या मुलांसाठी कीती खर्च करतो हे मिरवता यावे याकरता खा.क्ला. उभे राहिले. मला तर त्यांचे प्रयोजन कधीच कळले नाही. स्पर्धेच्या युगात आपली मुले मागे राहू नये म्हणून खा.क्ला.ना प्रोत्साहन मिळाले. पण याने खरंच 'क्लासेसवाल्यांचे खिसे भरणे आणि पालकांचे रिकामे होणे' याव्यतिरिक्त काय झाले? हीच मानसिकता आंधळेपणाने इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या मागे धावण्यात आहे. ज्या विशेष कारणांसाठी पालक इंग्रजी शाळेच्या मागे धावतायत ते वैशिष्ट्य गल्ली-बोळातल्या शाळांमधे नाही. यात मिळणारे परिणाम फक्त पोकळ सुख देणारे असतील. भरीव असे काही होणार नाही. मुलांसोबत प्रयोग करणे म्हणजे त्यांच्या व्यक्तिगत भविष्याशी खेळणे आहे. इथे मराठी किंवा मातृभाषेचा आग्रह धरणे याचा अस्मिता, देशाभिमान, परंपरा, संस्कृती वैगेरेंशी संबंध लावणे चूक आहे. पुर्ण लेख पुन्हा वाचावा, मदणबाण यांचा प्रतिसाद आणि दुवे वाचावे. मुद्दा समजून घ्या. याउप्पर अधिक काही बोलणे उचित नाहीच. उच्चवर्गियांच्या वर्तुळात काय चाललंय ते बघून माझे विचार तयार झाले आहेत. माझा मुलगा ज्या शाळेत जातो तिथे अतिश्रीमंतांची पण मुले आहेत. सगळ्या पालकांशी बोलतांना जाणवतं ते मराठीतच मुलांना शिकवायचे या विचारापर्यंत का आले आहेत. टेक्नॉलॉजी क्षेत्रातली उच्चवर्तुळातली मंडळी आपल्या मुलांना गॅजेट्स पासून दूर ठेवत आहेत. त्यांना चाकोरी बाहेरचं शिक्षण देतायत. त्याचे फायदे सामान्य लोकांना १५-२० वर्षांनी कळू लागतील तेव्हा ते फॅड येईल. ट्रेंड बदलतात. त्याचे फायदे उच्चचर्गिय, अतिश्रीमंत घेतात. सामान्य लोक फक्त स्वप्नांच्या मागे धावत राहतात. डॉक्टर-ईंजीनीअर्सचा ट्रेंड गेला, कॉल-सेंटरचा ट्रेंड गेला, आयटीचा गेला, एमबीएचा गेला, स्वयंउद्योजकांचा येतोय. काळ बदलत राहील. काळाची पावले ओळखून आधीच तयारी करणारे जिंकत आले आहेत, जिंकत राहतील. दुसर्‍याचे यश कॉपी करू पाहणारे कधीच जिंकत नाहीत. आताच्या इंग्रजीवेड्या पालकांसोबत तेच होणार, तेच होत आलंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
क
क्लिंटन Wed, 05/06/2015 - 17:41 नवीन
मोलकरणी, रिक्षावाले यांची मुले ज्या इंग्रजी शाळेत जातात त्यांचा दर्जा बॉम्बे स्कॉटीश इतका चांगला असतो काय?
हे वाक्य मला आक्षेपार्ह वाटते. मोलकरणी आणि रिक्षावाल्यांची मुले एखाद्या शाळेत आहेत यावरून त्या शाळेचा दर्जा कसा बदलेल? आणि मोलकरणी आणि रिक्षावाल्यांच्या मुलांना त्यांचे आई-बाप मोलकरणी/रिक्षावाले आहेत म्हणून त्यांना चांगल्या शाळेत शिकायची संधी नाकारावी असे आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Wed, 05/06/2015 - 18:40 नवीन
क्लिंटनसाहेब, संदर्भ सोडून वाक्य उचलाल तर सगळंच आक्षेपार्ह वाटेल. खालील वाक्याचा काही संदर्भ लागतो का बघा: ज्या विशेष कारणांसाठी पालक इंग्रजी शाळेच्या मागे धावतायत ते वैशिष्ट्य गल्ली-बोळातल्या शाळांमधे नाही. यात मिळणारे परिणाम फक्त पोकळ सुख देणारे असतील. सर्वात स्वस्त इंग्रजी शाळा आणि बॉम्बे स्कॉटीशचा दर्जा एकच असेल तर हे वाक्य मी मागे घ्यायला तयार आहे आणि कुणाचा खरंच अपमान झाला असेल तर माफी मागायला पण तयार आहे. तुटपुंज्या उत्पन्नगटातली मुले उत्तम शाळेत जातायत यावर कोण कशाला आक्षेप घेईल? पण कुठलीही इंग्रजी शाळा म्हणजे उत्तम शिक्षणाची हमी आहे असे आपणास म्हणायचे आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
क
क्लिंटन गुरुवार, 05/07/2015 - 10:47 नवीन
अहो डांगे साहेब, तुम्ही एवढे सरसकटीकरण का करत आहात?
ज्या विशेष कारणांसाठी पालक इंग्रजी शाळेच्या मागे धावतायत ते वैशिष्ट्य गल्ली-बोळातल्या शाळांमधे नाही. यात मिळणारे परिणाम फक्त पोकळ सुख देणारे असतील.
शाळेची गुणवत्ता ती शाळा कुठे आहे-- गल्लीबोळात की शहरातल्या मुख्य रस्त्यावर थोडीच अवलंबून असते?
सर्वात स्वस्त इंग्रजी शाळा आणि बॉम्बे स्कॉटीशचा दर्जा एकच असेल तर हे वाक्य मी मागे घ्यायला तयार आहे
परत एकदा---शाळेत फी किती घेतली जाते यावरून शाळेचा दर्जा ठरतो का? म्हणजे फी कमी याचा अर्थ शाळा वाईट किंवा फी जास्त याचा अर्थ शाळा चांगली असे थोडीच आहे? माझ्या शाळेत मी इयत्ता वजा २ रूपये दर महिना (म्हणजे ९ वीत दरमहा ७ रूपये, १० वीत दरमहा ८ रूपये इत्यादी) फी भरायचो. मी शाळेत असताना तरी माझी शाळा ठाण्यातील सर्वोत्तम शाळांमध्ये गणली जायची. तेव्हा गल्लीबोळातली शाळा, सर्वात स्वस्त शाळा याचा शाळेच्या दर्जाशी संबंध का जोडत आहात? वरचे मोलकरणी-रिक्षावाल्यांची मुले ज्या शाळेत जातात ती शाळा चांगली कशी असेल हे विधानही त्याचेच द्योतक.
पण कुठलीही इंग्रजी शाळा म्हणजे उत्तम शिक्षणाची हमी आहे असे आपणास म्हणायचे आहे का?
असे मी कधी आणि कुठे लिहिले आहे ते दाखवा. माझा मुद्दा हा की बदलत्या काळानुरूप इंग्रजी शाळेत जाणे श्रेयस्कर आहे आणि मराठीतून शिक्षण घ्या असे म्हणणे म्हणजे आपला मराठी बाणा सुखावायचा प्रयत्न आहे पण ते व्यवहार्य नाही. पुढच्या काळात इंग्रजी भाषेला (पक्षी इंग्रजी शाळेतील शिक्षणाला) पर्याय नाही ही जाणीव आपल्या समाजात मोठ्या प्रमाणावर होत आहे. आणि तुम्हालाही उलटा प्रश्न विचारला तर--कुठलीही मराठी शाळा म्हणजे उत्तम शिक्षणाची हमी आहे असे आपणास म्हणायचे आहे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे गुरुवार, 05/07/2015 - 12:29 नवीन
मराठीतून शिक्षण घ्या असे म्हणणे म्हणजे आपला मराठी बाणा सुखावायचा प्रयत्न आहे पण ते व्यवहार्य नाही
तुमचा पुर्वग्रहदूषित दृष्टीकोन स्पष्ट दिसत असल्याने आत्तापर्यंत झालेली संपुर्ण चर्चा निष्फळ आहे असे वाटत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
क
क्लिंटन गुरुवार, 05/07/2015 - 12:48 नवीन
तुमचा पुर्वग्रहदूषित दृष्टीकोन स्पष्ट दिसत असल्याने आत्तापर्यंत झालेली संपुर्ण चर्चा निष्फळ आहे असे वाटत आहे.
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
सोत्रि Mon, 05/04/2015 - 12:10 नवीन
मुद्दा फार सोपा आणि सरळ आहे. पण तो मत बनून तोच कसा समर्पक आहे असा सूर लगतो आहे. काळे - पांढरे करण्याइत्का सोपा मुद्दा नाहीयेय, ग्रे ही शेड इथे समजून घ्यावीच लागेल. १. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मातृभाषेतून झाले तर उत्तमच, पण म्हणून हे तसेच असले पाहिजे नाहीतर वाटोळे असे काही नसावे. २. मुलं इंग्रजी शाळेत गेली की हुशार झाली असा गोड समज करून पालक फक्त स्वप्नरंजन करत आहेत असं काही नसते. मुलांना कोणत्या शाळेत घालावे ही सर्वस्वी वैयक्तिक बाब आहे आणि ती तशीच राहू द्यावी. कोणाचेही 'मोराल पोलिसिंग' नकोच फुकाच्रे त्यावर. ३. भारतीयतेशी नाळ तोडणारे इंग्रजी शिक्षण देण्याचा घाट गल्लीबोळातल्या शाळांनी घातला आहे - हे मत जरा आततायी होते आहे. असे काही नसते. - (स्वप्नरंजन न करणारा) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Mon, 05/04/2015 - 12:41 नवीन
सोकाजीराव. माझे काही प्रश्न आहेत. १. ईंग्रजीतून शिकणार्‍या मुलांना इतिहासाचं सोडा पण समकालिन भारताची, राज्याची, जिल्ह्याची, आपल्या गावाची माहिती कोणत्या भाषेतून द्यावी? की देऊच नये? की कुठल्याही भाषेतून दिली तरी फरक पडत नाही? २. भारतीय इंग्रजी शाळांमधे भारतीय कंटेंट (मराठी?) किती असतो? ३. भारतीय इंग्रजी शाळा नेमकं वेगळं असं काय शिकवतात? ४. या शाळांतून बाहेर पडलेली मुले व इतर शाळांची मुले यांच्यात बॉर्नव्हीटाच्या जाहिरातींमधे दाखवतात तसा फरक असतो काय? ५. या शाळा जी काही स्वप्ने दाखवतात ती पुर्ण होतील याची खात्री असते काय? कुणीही, ज्याला जे योग्य त्या कोणत्याही माध्यमात मुलांना घालू दे. माझं काय पण बिघडत नाय. पण मग आम्हा मराठीत मुलांना घालणारांकडे इंग्रजीवाले असे का बघतात की जणू आम्ही मुलांना विहिरीत ढकलले आहे? आमची मुले ढ राहणार, किंवा आम्ही फार गरिब आहोत, किंवा आम्हाला काही महत्त्वाकांक्षाच नाहीत, किंवा आमची मुले मॉलच्या फरशाच पुसतील आयुष्यभर, अर्थात आम्ही वाटोळे करत आहोत त्यांच्या भविष्याचे? हा इंग्रजीवाल्यांचा अहंगंड नाही तर काय आहे? संस्कृती, परंपरा, ऐतिहासिक खुणा जपून ठेवण्याच्या प्रवृत्तीकडे तथाकथित पुरोगामी कुत्सित वृत्तीने बघतात, आमचा मातृभाषेचा आग्रहही असाच कुत्सित दृष्टीकोणातून बघितला जात आहे. असं का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि
प
पिलीयन रायडर Mon, 05/04/2015 - 09:50 नवीन
चर्चा वाचली नाही.. (कितीदा तेच तेच वाचणार माणुस..) पण मताची पिंक टाकल्याविना राहवत नाही म्हणुन... १. ज्ञान मिळवण्याचा.. आकलनाचा.. भाषेशी संबंध नाही. आपल्या मातृभाषेत न शिकताही उत्तम यश मिळवलेले अनेक विद्यार्थी आहेत. २. ज्ञान फक्त शाळेतच मिळत नाही. त्यामुळे शाळेचे माध्यम मराठी असले की झाले असे नसते. मला इंग्रजी ठिकठाक्च येते. त्यामानाने मराठी उत्तम येते. मग माझा मुलगा शाळेत इंग्रजी शिकु देत. मराठी मी घरी शिकवीन. शाळेत तो रेड, ग्रीन, यल्लो शिकतो.. घरी आला की मी त्याला "ग्रीन म्हणजे हिरवा" शिकवते. पोरं सगळं लक्षात ठेवतात. त्यांना प्रचंड अक्कल असते. ३. आयुष्यभर पुण्यातच रहायचे असेल तर मराठी शाळेत घातलेही असते. पण मला माझ्या मुलाला जग दाखवायचय. संधी मिळाली तर जगभर फिरेन. अशावेळी इंग्रजी माध्यमातुन शिकणे माझ्यासारख्या पालकांना सोयीचे आहे. आणि महत्वाचे.. माईसाहेबांना उगाच टारगेट करु नये ह्या मताशी सहमत.. आपल्याला तर त्यांचे बेअरींग आवडते बुवा..
  • Log in or register to post comments
क
क्लिंटन Mon, 05/04/2015 - 13:04 नवीन
सगळे शिक्षण मराठीत हवे असेल तर पुढील शब्दांना/संज्ञांना मराठी प्रतिशब्द हवे आहेत--- गणित १. डेरिव्हेटिव्ह २. इंटिग्रेशन ३. पार्शल डेरिव्हेटिव्ह (स्वसंपादन केले आहे. आधी चुकून पार्शल इंटिग्रेशन असे लिहिले होते) ४. कंटिन्युईटी ५. डेफिनेट इंटिग्रल ६. इन्डेफिनेट इंटिग्रल ७. कॉन्व्हर्जिंग सिरीज ८. डायव्हर्जिंग सिरीज ९. डिटरमिनन्ट १०. मॅट्रिक्स ११. सिंग्युलर मॅट्रिक्स १२. इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स १३. कॉम्प्लेक्स अ‍ॅनॅलिसिस १४. कॉन्फॉर्मल मॅपिंग १५. पीसवाईज कन्टिन्युअस फन्क्शन १६. डिफरिन्शिअल इक्वेशन १७. मेथड ऑफ व्हेरिएशन ऑफ पॅरॅमिटर्स संख्याशास्त्र १. कोरिलेशन २. रिग्रेशन ३. होमोस्केडॅस्टिसिटी ४. बायनॉमिअल डिस्ट्रीब्युशन ५. बूटस्ट्रॅपिंग ६. नॉर्मल डिस्ट्रीब्युशन ७. हायपोथिसिस टेस्टिंग ८. नल हायपोथिसिस ९. अल्टरनेट हायपोथिसिस १०. डिग्री ऑफ फ्रिडम ११. स्कॅटर प्लॉट १२. अ‍ॅनॅलिसिस ऑफ व्हेरिअन्स १३. मीन स्क्वेअर्ड एरर १४. लेव्हल ऑफ सिग्निफिकन्स १५. कॉन्फिडन्स लेव्हल १६. कॉन्फिडन्स इंटर्व्हल मेकॅनिकल इंजिनिअरींग (मी एक नंबरचा बत्थड मेक्यानिकल विंजिनेर असलो तरी हे सगळे शब्द कधीतरी कुठेतरी ऐकले आहेत) १. एन्ट्रॉपी २. एन्थाल्पी ३. बाऊंडरी लेअर ४. थर्मल कन्डक्टिव्हीटी ५. अ‍ॅनिलिंग ६. इंटर्नल कम्बश्चन इंजिन ७. लॅपिंग ८. होनिंग ९. फाईनाईट एलिमेन्ट १०. बाऊंडरी लेअर सेपरेशन ११. फेराईट १२. आयसोमेट्रिक व्ह्यू १३. आयसोमेट्रिक प्रोजेक्शन १४. बेअरींग १५. पिनिअन १६. जिग १७. फिक्श्चर इत्यादी इत्यादी आता कुठलेतरी मराठी शब्द हवेतच म्हणून कॉन्फिडन्स लेव्हलला 'आत्मविश्वासाची पातळी' वगैरे शब्द मारूनमुटकून आणता येतील.पण त्यातून नक्की काय साध्य होईल? आपण शास्त्रीय जगतात पाश्चिमात्यांपेक्षा किमान ७००-८०० वर्षे मागे आहोत.मराठीतच शिकायचे आणि शिकवायचे या अट्टाहासाखातर या ७००-८०० वर्षात शास्त्रीय जगतात निर्माण झालेल्या लक्षावधी संज्ञांचे मराठीत भाषांतर करण्यात वेळ घालवायचा आणि फुकाचे मराठी बाणे सुखावायचे की जे आहे ते लवकरात लवकर आत्मसात करून त्यात नवी भर टाकायचा प्रयत्न करायचा हा निर्णय ज्या त्या समाजाने घ्यायचा आहे. आज क्वांटम मेकॅनिक्स हे पूर्ण शास्त्र जर्मनांनी पुढे आणले. हे शास्त्र विकसित करणार्‍या लोकांमध्ये झाडून सगळे जर्मन दिसतील (हायसेनबर्ग, आईनस्टाईन, मॅक्स प्लॅन्क, पॉली इत्यादी). तीच गोष्ट जपान्यांची.त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्र जवळपास मुळापासून विकसित केले.त्या भाषांना मिळत असलेला मान कुठून आला? कुठले तरी क्षेत्र पूर्णपणे जवळपास मुळापासून त्यांनी विकसित केले.आपण असल्या महत्वाकांक्षा कधीच ठेवत नाही.आपल्याला सुखावायचा असतो आपला मराठी बाणा.नुसती भाषांतरे करत राहिलो तर तो मान मराठी भाषेला आयुष्यात मिळायचा नाही. आणि महाराष्ट्रात मराठी बाणा मग कर्नाटकात कन्नड बाणा असेलच.बंगालमध्ये बंगाली बाणा असेलच.मग सगळ्यांनी कामधंदे सोडून अशा शास्त्रीय संकल्पनांची भाषांतरे करत राहायची का? आणि मराठीच म्हणाल तर नक्की कुठली मराठी? पुण्याची मराठी की नागपूरची मराठी? बरं पुण्यामध्ये आणि कलकत्त्यामध्ये अनुक्रमे मराठी आणि बंगालीमध्ये एकाच क्षेत्रात शिकलेल्या दोन व्यक्तींनी आपापसात संवाद कसा साधावा? कोणत्या भाषेत? आज युरोपातली विद्यापीठेही अनेक अभ्यासक्रम केवळ इंग्रजीत शिकवतात-- अगदी जर्मनी आणि फ्रान्समधली सुध्दा.याचे कारण काय? तर सगळ्या जगाशी संवाद साधायला अडचण येऊ नये म्हणून.आणि इथे आपल्याला इंग्रजी भाषा अवगत असूनही केवळ आपला बाणा सुखावायचा म्हणून मराठी भाषेत सगळे शिक्षण करावे असे वाटत आहे. उत्तम. चालू द्या. (मराठी बाणे वगैरे बाण्यांना फाट्यावर मारणारा, भाषा हे केवळ संवादाचे माध्यम आहे आणि एखादी भाषा अधिक परिचयाची म्हणून आपली वाटली तरी भाषेला नसते अभिमान वगैरे चिकटवू नयेत असे वाटणारा, इंग्रजी भाषा येते म्हणून स्वतःला सुदैवी समजणारा आणि इंग्रजी भाषा ही परकी आहे असे मुळातच न वाटणारा काळा इंग्रज) क्लिंटन
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Mon, 05/04/2015 - 13:14 नवीन
मराठीचा आग्रह धरणार्‍यांकडे कसे चुकीच्या पद्धतीने पाहीले जाते याचा हा प्रतिसाद म्हणजे उत्तम नमुना. बाणा, अस्मिता, परंपरा याबद्दल अभिमान बाळगणार्‍यांकडे तुच्छतेने बघितले की काय सुखावतं नेमकं? तसाही मातृभाषेचा आग्रह फक्त मराठी लोक धरतायत असेही नाही. क्लिंटनभौ, संकल्पनांचे भाषांतर करा असे कुणी सांगितले? पण ह्या संकल्पना इंग्रजीतच शिकल्या तर समजतील असे काही नियम आहेत का? मला सांगा डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय? डेरिव्हेटिव्हचे स्पेलिंग इंग्रजीत पाठ झाले की त्याचा अर्थ कळतो आपोआप? की त्याचा अर्थ फक्त इंग्रजीतच सांगता येतो? इंग्रजीत डेरिव्हेटिव्ह म्हटले की संज्ञा चटकन समजते? मराठीत सांगितली की समजत नाही का? डेरिव्हेटिव्ह ही एक संकल्पना आहे. ती समजावून सांगावीच लागते. तुमचे इंग्रजी माध्यमातून शिक्षण झाले म्हणजे वरच्या सगळ्या संकल्पना तुम्हाला आपोआप कळतात असे काही आहे का? मराठीत सांगितल्या तर कळणार नाही? शाब्दिक भाषांतर करावे लागेल असे कसे काय वाटले बुवा? सुर्य सुर्य असतो, त्याला सन म्हटले काय नि आणि काय म्हटले काय. त्याचे गुणधर्म, वैशिष्ट्ये समजायला विशिष्ट भाषाच लागते? वर सांगितलेल्या सर्व संकल्पनांच्या ठराविक व्याख्या असतात, त्याची उदाहरणे, प्रयोग असतात. त्यातूनच ती संकल्पना नीट समजते. नुसते शब्द तोंडावर फेकले की समजले अर्थशास्त्र असे असते तर सारे काळे-गोरे इंग्रज अमर्त्य सेन झाले असते. नुसता विरोधाला विरोध नको. काही ठोस मुद्दे आणा चर्चेत. बालिश अन फुटकळ प्रतिवादांना काही अर्थ नाही. अशिक्षित नावाडी आणि उच्चविद्याविभूषित विद्वानाची कथा माहित असेलच आपणास.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
क
क्लिंटन Mon, 05/04/2015 - 13:32 नवीन
मला सांगा डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय? डेरिव्हेटिव्हचे स्पेलिंग इंग्रजीत पाठ झाले की त्याचा अर्थ कळतो आपोआप? की त्याचा अर्थ फक्त इंग्रजीतच सांगता येतो? इंग्रजीत डेरिव्हेटिव्ह म्हटले की संज्ञा चटकन समजते? मराठीत सांगितली की समजत नाही का?
डेरिव्हेटिव्ह म्हणजे त्या शब्दाचे नुसते स्पेलिंग असा अर्थ कुठून काढलात? डेरिव्हेटिव्ह ही संकल्पना शिकायची असेल तर फंक्शन, लिमिट या संकल्पना आधी माहित पाहिजेत. फंक्शन ही संकल्पना शिकायला व्हेरिएबल, डिपेन्डन्स इत्यादी संकल्पना आधी माहित पाहिजेत. असे इतरही अनेक संकल्पनांविषयी म्हणता येईल. आता या सगळ्या संकल्पना मराठीत समजावून सांगणार म्हणजे काय? डेरिव्हेटिव्ह ऑफ अ फंक्शन इज इट्स रेट ऑफ चेंज विथ रिस्पेक्ट टू अदर व्हेरिएअबल असे म्हणण्याऐवजी फंक्शनचे डेरिव्हिटिव्ह म्हणजे .... (जाऊ दे मला याचे मराठीकरण करताच येत नाही). म्हणजे एखादी संकल्पना मराठीत समजावणार म्हणजे क्रियापदे, उभयान्वयी अव्यये इत्यादी मराठीत आणि बाकी सगळे इंग्लिशमध्ये?
सुर्य सुर्य असतो, त्याला सन म्हटले काय नि आणि काय म्हटले काय. त्याचे गुणधर्म, वैशिष्ट्ये समजायला विशिष्ट भाषाच लागते?
तुम्ही हे प्राथमिक (फार तर माध्यमिक) शिक्षणाविषयी लिहित आहात.पण जसे उच्च शिक्षणाकडे जाऊ त्याप्रमाणे या सगळ्या संज्ञा अधिक क्लिष्ट होत जातील.आणि ते सूर्याला सन म्हणा की सूर्य म्हणा इतका साधा प्रकार तो राहणार नाही.
नुसता विरोधाला विरोध नको. काही ठोस मुद्दे आणा चर्चेत. बालिश अन फुटकळ प्रतिवादांना काही अर्थ नाही.
तेच म्हणतो मी.
अशिक्षित नावाडी आणि उच्चविद्याविभूषित विद्वानाची कथा माहित असेलच आपणास.
आणि त्या गोष्टीतला उच्चविद्याविभूषित विद्वान तर मराठीची जननी असलेल्या संस्कृत भाषेतला विद्वान होता हे पण माहित असेलच आपणास. :) एकेकाळी (म्हणजे शाळेत असताना) मी पण अगदी कट्टर मराठीवाला होतो. सल्फ्युरिक अ‍ॅसिडला एच २ एस ओ ४ ऐवजी मी "ह २ ग प्र ४" असे म्हणायचो. ह--हायड्रोजनचा, ग-- गंधकाचा (सल्फर) आणि प्र-- प्राणवायू (ऑक्सिजन). पण नंतर लक्षात आले की संज्ञाच शिकायच्या असतील तर त्या ज्या भाषेत आहेत आणि मुख्य म्हणजे पुढे ज्या भाषेत शिकाव्या लागतील त्याच भाषेत शिकलेल्या कधीही चांगल्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
प
पिलीयन रायडर Mon, 05/04/2015 - 14:12 नवीन
एरवी डांगे काका चांगले प्रतिसाद लिहीतात, पण ह्या बाबतीत जामच काही तरी चुकतय.. मला क्लिंटन ह्यांचे प्रतिसाद नेहमी प्रमाणे पटत आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
अ
असंका Mon, 05/04/2015 - 14:29 नवीन
एरवी डांगे काका चांगले प्रतिसाद लिहीतात, पण ह्या बाबतीत जामच काही तरी चुकतय..
एरवीचं माहित नाही. पण इथे मात्र डांगेसाहेब कमालीचे बरोबर आहेत. एक तरी चुकीचा प्रतिवाद दाखवा त्यांचा....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
आ
आनंदी गोपाळ Mon, 05/04/2015 - 19:41 नवीन
अर्धा बरोबरवाला दाखवलात तरी आनंद होईल ;) (आनंदी) गोपाळ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका
अ
असंका Tue, 05/05/2015 - 09:51 नवीन
त्यांचं सगळंच म्हणणं बरोबर आहे, असं माझं म्हणणं आहे. मातृभाषेतनं शिक्षणाला पर्याय असूच शकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ
अ
असंका Mon, 05/04/2015 - 14:26 नवीन
डेरिव्हेटिव्ह ऑफ अ फंक्शन इज इट्स रेट ऑफ चेंज विथ रिस्पेक्ट टू अदर व्हेरिएअबल असे म्हणण्याऐवजी फंक्शनचे डेरिव्हिटिव्ह म्हणजे .... (जाऊ दे मला याचे मराठीकरण करताच येत नाही). म्हणजे एखादी संकल्पना मराठीत समजावणार म्हणजे क्रियापदे, उभयान्वयी अव्यये इत्यादी मराठीत आणि बाकी सगळे इंग्लिशमध्ये?
तुम्हाला अमुक एका इंग्रजी वाक्याचं मराठीकरण (!)(- ज्याला सर्वसामान्य मराठी माणूस भाषांतर म्हणतो ते-) जमत नाही ह्याचं कारण मराठी ह्या भाषेमध्येच काही दोष आहे असं आपलं प्रामाणिक मत आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
म
मृत्युन्जय Mon, 05/04/2015 - 14:33 नवीन
तसे नाही. आपण नेहमे उदाहरण ऐकतो की सावरकरांनी बर्‍याच इंग्रजी शब्दांचे मराठी प्रतिशब्द सुचवले आणि ते सर्वमान्य झाले. आता सावरकर उरलेत कुठे? आणि सावरकर असले असते तरी किती शब्दांचे प्रतिशब्द सुचवणार आणि ते सर्वमान्य कधी होणार. तंत्रज्ञान इतके प्रगत होत चालले आहे की रोज नविन शोध लागत आहेत. त्याबरोबरच नविन संज्ञांचा उगम होतो आहे. या सगळ्या संज्ञा, सग्ळे शोध लागतात पल्याड. आपल्याकडे शोध लागले तरी त्याचे डॉक्युमेंटेशन होते इंग्रजीत. असे असताना त्या सर्वांचे मराठी प्रतिशब्द कुठुन शोधत बसणार? मिळाले तरी ते प्रचलित कधी होणार आणि सर्वमान्य कधी होणार? मग एवढा आटापिटा करुन उपयोग काय? मराठी टिकवायची आहे वाढवायची देखील आहे. मराठी संस्थळांवर पडीक असणार्‍या तुमच्य आमच्या सारख्या लोकांची ती मानसिक, भावनिक, बौद्धिक गरज देखील आहे पण त्यासाठी शेकडो आव्हानांना सामोरे जाणार्‍या नविन पिढीला शिक्षणासाठी आपण तांत्रिक प्रगतीमध्ये मागे पडत चाललेल्या भाषेचा आधार घ्यायला नाही सागु शकत. त्यांची शक्ती आधीच ज्ञानाची जी शेकडो कवाडे उघडली आहेत त्यातुन ज्ञानसंपादन करण्यात जात आहे. त्यात हा गोंधळ घालुन आपण त्यांचे सीमक्षेत्र बंदिस्त करुन टा़कु, मी स्वतः मराठी माध्यमात शिकलो पण माझ्या मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेत घालेन असे वाटत नाही. मराठीचे संवर्धन हा वेगळा विषय आहे आणि मराठी माध्यमातुन शिक्षण घेणे वेगळा विषय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका
अ
असंका Mon, 05/04/2015 - 15:37 नवीन
मग एवढा आटापिटा करुन उपयोग काय?
नाही हो दादा. आटापिटा कसला? आपल्या मातृभाषेत शिक्षण म्हणजे काय आटापिटा होइल का? उलट परक्या भाषेत शिक्षण ह्याला आटापिटा म्हणता येइल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
स
संदीप डांगे Mon, 05/04/2015 - 16:08 नवीन
तुम्ही हे प्राथमिक (फार तर माध्यमिक) शिक्षणाविषयी लिहित आहात.पण जसे उच्च शिक्षणाकडे जाऊ त्याप्रमाणे या सगळ्या संज्ञा अधिक क्लिष्ट होत जातील.आणि ते सूर्याला सन म्हणा की सूर्य म्हणा इतका साधा प्रकार तो राहणार नाही.
अगदी हेच म्हणायचे आहे बघा मला. मातृभाषेत शिक्षण हे प्राथमिक, माध्यमिक व उच्च-माध्यमिक पर्यंत आवश्यक आहे. डीग्री आणि त्यापुढील शिक्षण ज्या भाषेत उपलब्ध असेल त्या भाषेतच घ्यावे लागते. जर्मनीत जाऊन अभियांत्रिकीतले उच्च शिक्षण घ्यायचे असेल तर जर्मन शिकायला लागेल की आधी इंग्रजी शिकून नंतर त्यातून जर्मन शिकायला लागेल? असंख्य संज्ञा तर लॅटीन, ग्रीक, वैगेरे नॉन-इंग्लीश भाषांतून उचललेल्या आहेत. त्या इंग्रजी वाक्यांमधे चालतात. पण मराठी वाक्यात नको. असं का? एखाद्याचे इंग्रजी चांगले म्हणून त्याला अर्थशास्त्र चांगले जमते, गणित चांगले जमते, क्वांटम-मेकॅनिक्स चांगले समजते असे नाही ना? या सर्व विषयांवर भारतीय भाषांमधे काहीच लिहिले नाही? अचानक इंग्रजी आले तर हे सगळे ज्ञान फुटून बाहेर यायला लागले काय? कौटील्य, कणाद, आर्यभट्ट, रामानुजन, वराहमिहिर ह्यांनी सगळे लेखन इंग्रजीतच केले असेल, नाही? (आजकाल तर आपल्या पुर्वजांचे नाव घेणे सुद्धा पाप झालेय. त्यांचे दाखले देणे म्हणजे महापाप.) ज्ञानभाषा इंग्रजीच आहे, त्याशिवाय तरणोपाय नाही हा जो प्रचार चाललाय तो चुकीचा आहे. त्यातून जे इंग्रजीत असते तेच ज्ञान असा प्रचार होऊ घातलाय. डेरिवेटीवची संज्ञा सोप्या मराठीत समजावून सांगता येते. तुम्हाला ती जर इंग्रजीत समजत असेल तर ती मराठीतही सांगता आली पाहिजे. तुम्ही ते एखादं उदाहरण, प्रयोग देऊनसुद्धा सांगू शकता. ज्ञान कुठल्याही भाषेचं गुलाम नाही. तुम्हाला मराठीत सांगता येत नसेल तर तुमची मराठी भाषेची जाण कमी असू शकते. पण त्यामुळे मराठी भाषेत दोष आहे असा होत नाही. (माझे ईंग्रजी बर्‍यापैकी आहे पण भौतिकशास्त्रात प्रचंड रस असून सुद्धा हे क्वांटम-मेकॅनिक्स साफ डोक्यावरून जाते. ते इंग्रजीतच काय मराठीत सुद्धा समजत नाही. व्यवस्थित सांगणारा भेटला नाही अजून.) आणि हो, तो कथेतला विद्वान जगातल्या अनेक भाषेत आहे बरंका... ती काही मुळ मराठी कथा नाहीये. लोककथा आहे. एखादी संकल्पना समजून सांगायची तर तिचे सामान्यीकरण केले जाते याचे याचसारख्या कथा उदाहरणे आहेत. मराठीत सांगताना तो विद्वान संस्कृतचा पंडीत असेल तर चीनमधे चायनीजचा, रशियामधे रशियन भाषेचा. शिक्षणाबद्दलपण आम्ही हेच म्हणतो. ज्ञानाचे सामान्यीकरण हवे अन्यथा ज्ञानेश्वरांना, बुद्धांना अवतार घ्यावे लागतात ते ज्ञान जनतेसाठी खुले करायला. संस्कृतला कुठे प्रतिशब्द शोधणार म्हणून ज्ञानोबा अडून बसले न्हायीत. त्यांनी त्यांच्या भाषेत गीता मांडली. त्यांची भाषा जड जाते तर विनोबांनी अजून सोपी केली. हजारो आपआपल्या भाषेत गीता सांगत आहेत. म्हणजे ज्ञान दुसर्‍या भाषेत समर्थपणे जाऊ शकते. पण सांगणार्‍याची इच्छा पाहिजे. जे संस्कृत सोबत झाले तेच इंग्रजीबद्दलही होत आहे. जे काही ज्ञान आहे ते याच भाषेत मिळेल हा अट्टाहास. तेव्हा जातीपातीची बंधने घालून ज्ञानाचा प्रसार रोखला. आता इंग्रजीची भीती घालून ज्ञानाचा प्रसार रोखल्या जातोय. यात काही अतिशयोक्ती असेल तर असु देत. पण पोकळ प्रतिवाद आज्याबात पटत न्हाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
स
सोत्रि Mon, 05/04/2015 - 18:02 नवीन
मातृभाषेत शिक्षण हे प्राथमिक, माध्यमिक व उच्च-माध्यमिक पर्यंत आवश्यक आहे
हे तुमचे वैयक्तिक मत की नियम? जर वैयक्तिक मत असेल तर हरकत नाही पण जर जा नियम म्हणत असाल तर हरकत आहे. कारण हा मुद्दा वैयक्तिक आहे! एक मुद्दा दुर्लक्षित होतोय,Appolied Mechanics, Quantam Physics, Alopathy (MBBS), BAMS, Aeronuatics, Applied Mathematics, Statitics हे सगळे प्रत्त्येक भारतीयाच्या मातृभाषेत जर असेल तर तर ते शिक्षण घेण्यास काहीच अडचण नाही. पण तसे नाहीयेय हीच गोची आहे. आडातच नाहीयेय त्यामुळे पोहर्‍यात का नाही ह्यावर वाद करण्यात काय पॉइंट? - (अप्लाईड ज्ञानी) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
क
क्लिंटन Mon, 05/04/2015 - 18:17 नवीन
आणखी एक गोष्ट म्हणजे आज पुण्यात नोकरीला असलेले उद्या बंगलोरला जातात, हैद्राबादला जातात, परदेशातही जातात. अशा प्रसंगी त्यांच्या मुलांची शाळा मराठी माध्यमाची असेल तर ती अडचणच असेल.ज्या पालकांना असे कुठेच जायचे नसेल त्यांनी आपल्या मुलांना खुषाल मराठी माध्यमात टाकावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि
क
क्लिंटन Mon, 05/04/2015 - 18:21 नवीन
एखाद्याचे इंग्रजी चांगले म्हणून त्याला अर्थशास्त्र चांगले जमते, गणित चांगले जमते, क्वांटम-मेकॅनिक्स चांगले समजते असे नाही ना?
क्वांटम मेकॅनिक्सचे माहित नाही.पण अर्थशास्त्र किंवा कला शाखेतल्या विषयांमध्ये इंग्रजी चांगले म्हणून नक्कीच विषय अधिक चांगला समजायला मदत होईल---किंबहुना इंग्रजी चांगले येत नसताना असे काही विषय--विशेषत: मॅनेजमेन्टशी संबंधित कसे काय समजणार हेच कळत नाही.या विषयांवरील जवळपास सगळे लिटरेचर इंग्रजीमध्ये आहे.शास्त्रीय पेपरमध्ये वाचायला मिळेल त्यापेक्षा वेगळी भाषा या विषयांवरील पेपरमध्ये असते.वर्तमानपत्रातील अग्रलेखाची भाषा वेगळी आणि शेअरमार्केटशी संबंधित पानावरील भाषा वेगळी असते तसाच फरक अशा लेखांमध्ये असतो. अगदी शेक्सपिअरच्या काळात असायचे तसे क्लासिकल इंग्रजी नसले तरी डॅश, स्वल्पविराम आणि इतर विरामचिन्हे वापरून चार-चार ओळींची वाक्ये अनेकदा असतात. हे वाचताना इंग्रजी चांगले समजत नसेल तर त्या लेखात नक्की काय म्हणायचे आहे हे समजून घ्यायलाच त्रास होईल हे नक्कीच.आणि ज्ञानाला भाषेचे बंधन नाही म्हणून मी आपल्याच भाषेत शिकेन असे म्हटले तर ते शिक्षण घ्यायची वेळ आली आणि इंग्रजीत मार खाल्ला तर त्याचा काही उपयोग नाही. बाकी या लेखात म्हटले आहे त्याप्रमाणे इंग्रजी शाळेत शिकल्यामुळे असं का हा विचार करायचा प्रकार अभावानेच होतो हा प्रकार मात्र अजिबात पटला नाही. जसे तुम्हाला क्वांटम मेकॅनिक्स शिकविणारा चांगला गुरू भेटला नाही त्याप्रमाणे विचार कसा करावा हे शिकविणाराच भेटला नाही तर मराठी शाळेतले विद्यार्थीही असे का या प्रश्नापासून दूरच राहतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Mon, 05/04/2015 - 21:31 नवीन
या धाग्यावरून रजा घ्यायची वेळ आली आहे. सोकाजी आणि क्लिंटन यांच्या दोन्ही प्रतिसादाला उत्तर इथेच देतो. काही मुद्दे मांडतो. १. मातृभाषेतून शिक्षण हे खूळ नसून युनेस्कोतर्फे जागतिक पातळीवर याचा गांभिर्याने विचार सुरु आहे. २. यामागे मातृभाषेतून 'प्राथमिक, माध्यमिक, उच्च-माध्यमिक पातळीपर्यंतचे शिक्षण' देणे मुलांच्या मनोविकासासाठी फायदेशीर ठरू शकते असा एक विचार आहे. ३. कुठल्याही पदवी/पदव्युत्तरचे शिक्षण कुठल्याही भाषेतून घेण्याची स्नातकांस मुभा असली पाहिजे. इंग्रजी किंवा मातृभाषा अशी सक्ती नसावी. ४. लेखात मांडलेल्या बहुतांश मुद्द्यांशी मी सहमत आहे. (पण गीता या ग्रंथाला ५१५१ वर्षे झाली या सनातन-छाप प्रचाराशी सहमत नाही) ५. मुलांवर किमान वयाच्या १४व्या वर्षापर्यंत दुसर्‍या कुठल्या भाषेची सक्ती करू नये. विशेषतः इंग्रजीची दबावयुक्त सक्ती नसावी. मुलांना अभ्यासासाठी मातृभाषा व तीची प्रमाण भाषा पुर्णपणे आत्मसात करण्याची संधी असावी. या वयापर्यंत मुलांच्या शिक्षणात स्थानिक भुगोल, इतिहास, समाजशास्त्र, नागरिकशास्त्र, व्यवहारज्ञान, बँका/पोस्ट इ. उपयोगी असे विषय असावे. मुलांची हुशारी व बुद्धीमत्ता त्यांच्या इंग्रजीच्या ज्ञानापेक्षा व्यक्तिमत्व विकास, भवतालचे ज्ञान, व्यवहारज्ञान यावर ठरावे. ६. कुठलीही भाषा आत्मसात करायला किमान २ वर्षे पुरे असतात. ती इंग्रजी असो वा चायनिज. त्यांच्या अधि़कृत शिकवण्या असाव्यात. सोकाजींनी क्वांटम-मेकॅनिक्स, अप्लाईड एक्सवायझेड वैगेरे विषय मांडल्यावर मला मोहन-भार्गवी फील आला. फक्त इथे डॉयलॉग उलटा होईल. 'जब भी मुकाबले की बात आती है तो हम क्वांटम-मेकॅनिक्स, अप्लायड ये वो की फालतु बाते करके मुकाबले से बचना चाहते हैं|'. जे आडात नाही ते पोहर्‍यात कुठून येणार असा सोकाजी यांचा सवाल आहे. मला सोकाजींना सांगायचे आहे की जेव्हा इंग्रजीचा जन्मही झाला नव्हता तेव्हा सुसंस्कृत भारतीय लोक आजच्या क्वांटम-मेकॅनिक्सचा पाया रचत होते. त्यामुळे कुणाच्या आडात काय आहे याचा नीट अभ्यास असणे हिताचे आहे. दुसरी गोष्ट अशी की. इथे शालेय शिक्षण कुठल्या भाषेतून व्हावे असा मुद्दा आहे. अतिउच्च शिक्षण कुठल्या माध्यमातून व्हावे हा नाही. इथे जे विषय इंग्रजीतूनच शि़कणे कसे क्रमप्राप्त आहे असे सांगितले गेले आहेत. त्या विषयांमधे खरेच किती टक्के भारतीय शिकणार आहेत? बाकीच्या सामान्य बुद्धीच्या भारतीयांचे काय? १०% हुशार लोकांसाठी ९०% टक्के लोकांना वेठीस का धरावे, तेही अजाणत्या वयात? जे एवढे हुशार आहेत त्यांना २-३ वर्षात इंग्रजीवर प्रभुत्व मिळवणे शक्य नाही का? माझ्या मते असले विषय समोर मांडून चर्चेचा रोख बदलणे, अस्मिता, बाणा, न्यूनगंड, अहंगंड, ज्ञानभाषा, संपर्कभाषा अशा ट्रॅकवर नेत मूळ विषय बाजूला राहत आहे. वाहननिर्मितीक्षेत्रात जापनिज लोकांनी रीवर्स-इंजिनिअरींग करून ज्ञान मिळवले आणि बाजारपेठेवर आपला ठसा उमटवला. लँड-रोवर हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. जर्मनीने अभियांत्रिकीत आपले स्थान मिळवले. ह्या सगळ्या लोकांना इंग्रजीनेच मदत केली का? त्यांचा दुसर्‍या देशांचे गुलाम नसण्याचा आणि प्रगतीचा काय संबंध? आता सर्वात महत्त्वाचा अर्थशास्त्राचा भाग. मी लायनब्रिज या भाषा स्थानिकीकरण, भाषांतर या क्षेत्रात अग्रगण्य कंपनीत काही वर्षे होतो. सर्व आघाडीचे उत्पादक आपल्या उत्पादनांसोबत द्यावयाच्या युजर मॅन्युअलचे किमान ७२ भाषांमधे (प्रत्यक्षात १२० पेक्षा जास्त) लोकलायझेशनचे काम करायला इथेच द्यायचे. म्हणजे काय तर एचपी कंपनीचा एक प्रिंटर किंवा नोकिआचा एखादा फोन जो जगातल्या कुठल्याही देशात विकला जाऊ शकतो. त्यासोबत त्या त्या खंडविभागानुसार असलेल्या सर्व भाषांमधे त्याचे मॅन्युअल असायचे. यावर कंपन्या प्रचंड खर्च करतात. सॉफ्टवेअरसुद्धा निरनिराळ्या भाषांमधे वापरता यावी अशी बनवली जायची. अगदी अरब भाषांमधले सॉफ्टवेअर यु-आय उजवीकडून डावीकडे असायचे. भाषांतराचे काम अहोरात्र चालायचे. हे सर्व का करतात? कंपनी सांगू शकत नाही का इंग्रजीत देतो मॅन्युअल, समजत असेल तर वाचा नाही तर बसा बोंबलत. तर नाही. इथे व्यवहार, व्यापार आडवा येतो. आपले उत्पादन, त्याची वापरायची पद्धत वापरकर्त्याच्या भाषेत सोप्यात सोपी करून सांगितली जाते. जेणेकरून मार्केट पेनीट्रेशन वाढावे. तक्रारी कमी याव्यात. यासाठी हजारो इंस्ट्रक्शनल डीझायनर किचकट यांत्रिकी संकल्पना साध्या सोप्या इंग्रजीत लिहायचे. ते जगभरातले भाषांतरकार आपआपल्या भाषेत उतरवायचे. त्या त्या खंडानुसार सर्व काळजी घेऊन एक एक मॅन्युअल तयार होत असे. अजूनही होते. हे सर्व का होते? इतका पैसा का घालतात ह्या कंपन्या? कारण अशिक्षित किंवा इंग्रजी माहित नसलेल्या व्यक्तिलाही आपली उत्पादने वापरता यावी म्हणून ही खटपट. कारण व्यापार. म्हणून म्हणतो आडात नसेल तरी आडात आणता येते. कुठल्याही मातृभाषेला कमी समजू नये. हे मी नाही तर जागतिक दर्जाच्या कंपन्या कित्येक वर्षांपासून आपल्या वागणुकीतून दाखवून देतायत. जगभरातल्या आघाडीच्या कंपन्या जगातल्या सर्व मुख्य भाषांमधे आपली वेबसाईट बनवतात. जगात सर्वात मोठा ग्राहकवर्ग असून आपली कुठलीही भाषा या संकेतस्थळांवर नसते. कारण त्यांना माहिती आहे, यांना इंग्रजीत दिले तरी चालून जाईल. इतरांबाबत ते हा दृष्टीकोन का ठेवत नसावेत?
विचार कसा करावा हे शिकविणाराच भेटला नाही तर मराठी शाळेतले विद्यार्थीही असे का या प्रश्नापासून दूरच राहतात.
क्लिंटन, तुम्हाला असे म्हणायचे आहे का की इंग्रजी शाळेत विचार करायला शिकवला जातो? इंग्रजी शाळेतूनच विचारवंत मुले बाहेर पडतात? असे असेल तर इंग्रजीचा वृथा अहंगंड तो हाच. बाकी तुमच्या प्रतिसादात तुम्ही म्हटल्याप्रमाणे आपण इंस्टींक्टमधे मार खातो हे खरे आहे. भारतीयांच्या वेगात प्रगती न करण्याला आळशीपणा, बेफिकिरवृत्तीच कारणीभूत आहे हे सत्य नाकारून तात्पुरत्या मलमपट्टीच्या मागे लागतो. पाश्चात्त्यांचे गोडवे गाणे आणि त्यांची उत्पादने वापरणे यातच धन्यता मानतो. मागे एका मोठ्या हॉस्पीटलच्या डॉक्टर-मालकाशी याविषयावर बरेच बोलणे झाले. तो म्हणाला, 'एक जागतिक दर्जाचं सिरींज बनवणे भारतीय उत्पादकांना शक्य आहे. पण अजून पर्यंत मी अशा उत्पादकाच्या शोधात आहे.' सगळे इंग्रजी शिकलेले, इंग्रजीत भौतीकी, रसायन-फसायन, अप्लाईड-फफ्लाईड वैगेरे उच्च ज्ञान मिळवलेले तथाकथित उच्चशिक्षित महान भारतीय इंजिनीअर्स सगळे पॅरामीटर्स, रीक्वायरमेंट्स आधीच तयार असलेली एक साधी सिरिंज बनवू शकत नाहीत. तर काय चुलीत घालायची सगळी इंग्रजीतली भौतिकी? इथे खरी गरज मूळ प्रेरणेची आहे. ती कुठल्या भाषेतून मिळेल याचाच विचार करतोय. (स्थलांतर करणार्‍या लोकांच्या मुलांनी कुठल्या भाषेतून शिकावे हा एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात किती मोठा प्रश्न आहे याबद्दल माहिती नसल्याने काही टीप्पणी देऊ शकत नाही) समांतरः आपली संस्कृती, भाषा, इतिहास, परंपरा यांचा अभिमान बाळगणार्‍या पाश्चात्त्यांबद्दल गौरवोद्गार काढणारे भारतीयांनी तसेच करायचे म्हटले की नाक का मुरडतात? काय नेमके बोचते? धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
क
क्लिंटन Tue, 05/05/2015 - 15:56 नवीन
दुसरी गोष्ट अशी की. इथे शालेय शिक्षण कुठल्या भाषेतून व्हावे असा मुद्दा आहे. अतिउच्च शिक्षण कुठल्या माध्यमातून व्हावे हा नाही.
तुमच्या म्हणण्याचा रोख असा दिसत आहे की कॉलेजमधले शिक्षण इंग्रजीत घ्यायला हरकत नसावी पण शालेय शिक्षण मराठीतच (संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे मधला च) असले पाहिजे. ठिक आहे. पण...
बाकीच्या सामान्य बुद्धीच्या भारतीयांचे काय? १०% हुशार लोकांसाठी ९०% टक्के लोकांना वेठीस का धरावे, तेही अजाणत्या वयात? जे एवढे हुशार आहेत त्यांना २-३ वर्षात इंग्रजीवर प्रभुत्व मिळवणे शक्य नाही का?
हाच मुद्दा अगदी उलटाही चर्चेत आणता येऊ शकेल. म्हणजे कॉलेजात गेल्यावर एवीतेवी इंग्रजीतच शिकावे लागणार आहे हे नक्कीच.मिसळपाववर अनेकांचा (माझाही) असा अनुभव आहे की मराठी शा़ळेत असल्यामुळे कॉलेजात गेल्यावर कसलीच अडचण आली नाही. पण मिपासारख्या संकेतस्थळावरचे लोक हे त्या १०% मधले आहेत--म्हणजे सारासार विचार करून आपले मत बनविता येणे आणि मांडता येणे हे मिपावर चर्चेत भाग घेणार्‍यांना शक्य आहे यावरून असे सदस्य हे त्या १०% मधले आहेत असे म्हणता यायला हरकत नसावी.पण उरलेल्या ९०% चे काय? एक तर ११ वीत (निदान सायन्सला) अभ्यासक्रम १० वीत असतो त्यापेक्षा बराच जास्त असतो.म्हणजे एकीकडे अधिक क्लिष्ट संकल्पना शिकायच्या आणि त्याचवेळी इंग्रजी भाषेशीही झगडायचे या दोन्ही गोष्टी या ९०% मधले विद्यार्थी करू शकतील का? मग शाळेत असताना समाधानकारक कामगिरी करणारे विद्यार्थी कॉलेजात गेल्यावर मात्र मागे पडतात असे व्हायची शक्यता त्या ९०% विद्यार्थ्यांबरोबर होणारच (परत एकदा संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे मधला च) नाही असे कोणी छातीठोक म्हणेल का?मराठी शाळांमधले विद्यार्थी सगळीकडे चमकतात वगैरे बोलले जाते पण जे चमकतात तेच दिसतात (आणि ते १०% मधले असतात) आणि जे मावळतात ते अर्थातच दिसत नाहीत (आणि अर्थातच हे मावळणारे ९०% मधले असायची शक्यता बरीच जास्त). तेव्हा या ९०% वाल्यांना पुढे कॉलेजात गेल्यानंतर निदान पुस्तकात काय लिहिले आहे ती भाषा तरी व्यवस्थित समजता आली तर ते त्यांना अधिक सोपे जाणार नाही का? (१०% आणि ९०% हे तुमचे शब्द आहेत. ही टक्केवारी अर्थातच १०% च किंवा ९०% च असेल असे नक्कीच नाही.तेव्हा हे आकड्यापेक्षा १०% म्हणजे ज्यांना झेपते ते आणि ९०% म्हणजे ज्यांना झेपत नाही ते असे म्हटलेले अधिक योग्य ठरेल). पूर्वी एस.एस.सी चा निकाल ६०% च्या आसपास लागायचा आणि सी.बी.एस.सी/आय.सी.एस.सी चा निकालही ६०% च्या आसपासच लागायचा. एस.एस.सी पेक्षा सी.बी.एस.सी/आय.सी.एस.सी चा अभ्यासक्रम अधिक व्यापक असतो हे त्या क्षेत्रातला कोणीही सांगू शकेल.याचा अर्थ काय?की ज्या विद्यार्थ्यांची १० वी ची परिक्षा पास करायची क्षमता आहे ते ती पास करतीलच मग अभ्यासक्रम थोडा जास्त आव्हानात्मक असला तरी. त्यातील १०वी ची परिक्षा काठावर पास होणार्‍यांसाठी ११ वी मध्ये वाढलेल्या अभ्यासक्रमाबरोबरच भाषा हे आणखी आव्हान असते त्यामुळे त्यांच्यावर इंग्रजी भाषा समजणार्‍यांपेक्षा आणि १० वी काठावर पास झालेल्यांपेक्षा नक्कीच जास्त परिणाम होतो म्हणून निदान त्यांच्यासाठी तरी शाळा इंग्रजीच असली तर ते अधिक उपयोगी पडेल. (सध्या एस.एस.सी चे निकाल बरेच जास्त लागतात--अगदी ८०%-८५% सुध्दा.मी सध्या शिक्षणक्षेत्रातच नोकरी करत आहे.तिकडे जे काही बघितले आहे त्यावरून हे का होत असावे याचा मी एक तर्क लढविला आहे. सध्या बर्‍याच इंजिनिअरींग आणि मॅनेजमेन्ट कॉलेजांमध्ये जागा रिकाम्या राहतात.आणि अशी कॉलेजे अगदी कुत्र्याच्या छत्र्यांप्रमाणे वाढली आहेत हे पण समोर दिसतच आहे.तेव्हा १० वी चे निकाल जास्त लावा यासाठी या स्वयंघोषित शिक्षणसम्राटांकडून १० वी च्या बोर्डावर दडपण येत असेल का? म्हणजे जास्त विद्यार्थी १० वी आणि १२ वी पास झाले की कुठल्यातरी कॉलेजातून का होईना इंजिनिअरींग करावे असे या विद्यार्थ्यांना वाटून या शिक्षणसम्राटांचा पोटापाण्याचा प्रश्न सुटेल. अर्थात हा माझा तर्क आहे). मी स्वतः मराठी (किंबहुना सेमी-इंग्लिश) शाळेमधला. ८ वी ते १० वी गणित आणि विज्ञान आम्हाला इंग्रजीतून होते आणि इतर सगळे विषय मराठीतून होते. ८वी-९वीत असल्यापासून मला इंग्रजी बोललेले नक्कीच समजायचे पण इंग्रजी बोलता येण्यासाठी त्या भाषेवर अधिक पकड येण्यासाठी मला खूप प्रयत्न करावे लागले होते आणि त्यासाठी मला इंजिनिअरींगचे दुसरे वर्ष उजाडले.हे मी माझ्या हिंमतीवर करू शकलो का? नक्कीच.अभ्यासावर कुठलेही कष्ट घेण्यात मी कुणालाही हार जाणार नाही हे मी अगदी छातीठोकपणे सांगू शकतो.पण समजा मी इंग्रजी शाळेत असतो, शाळेत इंग्रजीतूनच बोलायची सक्ती असती, लेखन-वाचन इंग्रजीतूनच असते तर मला हा इंजिनिअरींगच्या दुसर्‍या वर्षापर्यंत वेळ घालवायला लागला तो जर्मन किंवा अन्य कुठची भाषा शिकायच्या सत्कारणी लावता आला नसता का?निदान या कारणासाठी तरी मी माझ्या मुलांना मराठी शाळेत टाकायचा विचारच करू शकत नाही--मला अगदी आयुष्यभर महाराष्ट्रातच राहायचे असले तरी.
क्लिंटन, तुम्हाला असे म्हणायचे आहे का की इंग्रजी शाळेत विचार करायला शिकवला जातो? इंग्रजी शाळेतूनच विचारवंत मुले बाहेर पडतात?
छे हो. असे कशावरून म्हणता? मूळ लेखात म्हटले आहे की इंग्रजी शाळांमध्ये 'असे का' हा प्रश्न विचारायची सवय लागत नाही त्याला उद्देशून मी म्हटले आहे की प्रत्येक गोष्टीला 'असे का' हा प्रश्न विचारायची सवय लावणारे शिक्षक भेटले नाहीत (किंवा घरी पालकांनी ती सवय लावली नाही) तर नक्कीच विचार करायची सवय लागणार नाही. हे कुठच्याही शाळेत होऊ शकते---मराठी किंवा इंग्रजी. त्यामुळे या गोष्टीचा संबंध इंग्रजी माध्यमाच्या शाळेशी लावणे म्हणजे वडाची साल पिंपळाला लावण्यासारखे आहे. मी ज्या शिक्षणसंस्थेत शिक्षण घेतले आहे त्या संस्थेत मराठी भाषिक तीसेक विद्यार्थी होते. त्यापैकी पूर्ण मराठी माध्यमात शिकलेला विद्यार्थी होता एक आणि सेमीइंग्रजी शाळेत शिकलेला मी आणि अन्य एक. बाकी ९०% विद्यार्थी इंग्रजी शाळेतच शिकलेले होते.आणि त्यांना विचार करता येत नव्हता असे कोणीच म्हणू शकणार नाही.
समांतरः आपली संस्कृती, भाषा, इतिहास, परंपरा यांचा अभिमान बाळगणार्‍या पाश्चात्त्यांबद्दल गौरवोद्गार काढणारे भारतीयांनी तसेच करायचे म्हटले की नाक का मुरडतात? काय नेमके बोचते?
याविषयी पूर्णपणे पास.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
क
क्लिंटन Tue, 05/05/2015 - 16:53 नवीन
जगभरातल्या आघाडीच्या कंपन्या जगातल्या सर्व मुख्य भाषांमधे आपली वेबसाईट बनवतात. जगात सर्वात मोठा ग्राहकवर्ग असून आपली कुठलीही भाषा या संकेतस्थळांवर नसते. कारण त्यांना माहिती आहे, यांना इंग्रजीत दिले तरी चालून जाईल. इतरांबाबत ते हा दृष्टीकोन का ठेवत नसावेत?
इतरांबाबत ते हा दृष्टीकोन ठेवत नसावेत याचे कारण ती भाषा बोलणार्‍यांकडे नुसते बाणे नाहीत तर त्यांनी फार मोठे भव्यदिव्य काहीतरी करून दाखविले आहे. जर्मनांनी आणि जपान्यांनी नक्की काय केले हे एका प्रतिसादात लिहिलेच आहे.नोबेल पारितोषिक मिळविणार्‍यांमध्ये जर्मन भाषिकांची संख्या बघितली की जर्मन लोकांनी नक्की काय केले आहे हे समजून येईलच. फ्रेंच लोकांचे योगदान जर्मनांइतके नसले आणि बर्‍याच अंशी फ्रेंच समाज सुखासीन असला तरी त्यांच्याकडे आफ्रिकेतले लुटून आणलेले का होईना पैसे आहेत. त्यामुळे फ्रान्स ही एक मोठी बाजारपेठ आहे. अरबांचे तर काही विचारूच नका.अगदी बत्थडातले बत्थड लोक असतील ते.पण त्यांच्याकडे तेल आहे.त्यामुळे पुढील पन्नासेक वर्षे तरी त्यांना मान मिळत राहणार (आणि नंतर कुत्रही विचारणार नाही). आपल्याकडे यापैकी नक्की काय आहे?ना पैसा ना मोठी बाजारपेठ ना सगळ्या जगाने आपल्या भाषांना मान झक मारत दिला पाहिजे असे कर्तुत्व.जर्मनीत जितके आय.फोन विकले जातील तितके महाराष्ट्रात विकले जाणार याची खात्री आणि शक्यता असेल तर अगदी अ‍ॅपलवाल्यांनाही मराठीतून त्यांची पत्रके छापायला हरकत असेल असे वाटत नाही. इतर गोष्टींची--उदाहरणार्थ वॉशिंग मशीन वगैरे भारत ही मोठी बाजारपेठ असली तरी विविध राज्ये आणि विविध बोलल्या जाणार्‍या भाषा यामुळे कुठल्याही भाषेत अशी पत्रके छापावीत असे वाटायला तो आकडा परत लहानच. भारतीय भाषांचे म्हणाल तर कन्नडमध्ये छापले आणि मराठीत छापले नाही तर आपल्या पोटात दुखणार आणि आपल्याला वाटणार की मराठीला डावलले जात आहे. हिंदीत छापले तर दाक्षिणात्य रूसून बसणार की आमची भाषा का नाही म्हणून. म्हणजे आम्ही आमचेच बाणे चोंबाळत बसणार आणि सगळ्या जगाने आमची पर्वा करावी ही अपेक्षा असेल तर ती कशी पूर्ण होणार आणि सगळ्या जगाने आपल्या बाण्यांना धूप घालावी अशी अपेक्षातरी का असावी? रच्याकाने मुंबईतील अमेरिकन काऊंसिलेटमध्ये गुजराती भाषिकांसाठी स्वतंत्र खिडक्या असतात आणि त्यांची मुलाखतही गुजरातीतून व्हावी अशी सोय असते.कारण काय तर अमेरिकेत जाऊ इच्छिणार्‍या गुजरात्यांची प्रचंड संख्या. टोरोंटो विमानतळावर पंजाबीतून पाट्या असतात असे ऐकिवात आहे.खरेखोटे माहित नाही.पण इंग्लंडमध्ये काही ठिकाणी नगरपालिकांची पत्रके इंग्रजीबरोबरच गुजराती आणि पंजाबीमध्ये निघतात असेही वाचल्याचे आठवते. मे २०१५ मध्ये होणार्‍या इंग्लंडमधील निवडणुकांसाठी पंतप्रधान डेव्हिड कॅमेरन यांच्या कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाने 'निला है आसमान' म्हणून भारतीय वंशाच्या मतदारांना आकर्षित करायला सी.डी आणली आहे अशी परवाच बातमी आली होती आणि त्या सी.डीचा काही भाग मराठी न्यूज चॅनेलवर दाखविलाही होता.त्यात पंतप्रधान कॅमेरन यांची भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबरची छायाचित्रे परत परत दाखवली जात होती आणि सौ.कॅमेरन साडी ही भारतीय वेषभूषा परिधान करूनही त्यात आहेत. आपल्या अमूलचे बटर आखाती देशांमध्ये जाते त्या बटरवरील वेष्टनांवर अरबी भाषेत लिहिलेले असते. मायक्रोसॉफ्ट विंडोजची अरबीमधील जाहिरात मी स्वतः बाहरीनमध्ये बघितलेली आहे. तेव्हा सांगायचा मुद्दा आपण निदान कुठल्यातरी बाबतीत-- संख्या, पैसा, योगदान, मोठी बाजारपेठ इत्यादी आपल्याकडे काहीतरी आहे हे दाखवून दिले तरच (परत एकदा संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे मधला च) सगळ्या कंपन्या अगदी नाक घासत आपल्या भाषेत पत्रके छापतील आणि भारतीय ग्राहकाला आकर्षित करायला वाटेल ते करतील. पण असे काही करावे असे आपल्याला कधीच वाटत नाही.आपण या कंपन्यांना नाक घासत आपल्यापुढे यावे लागेल यासाठी काहीच करणार नाही.आणि सगळ्या जगाने आमचे बाणे सांभाळावेत अशी अपेक्षा मात्र करणार---हाती नाही आणा बाजीराव म्हणा!! असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Tue, 05/05/2015 - 21:40 नवीन
तुमचे बरेच मुद्दे बरोबर आहे. फक्त थोडा खुलासा राहिलाय तो करतो. लायनब्रिजमधेच भारतीय भाषांवर सुद्धा काम होते. कंपन्या आपल्या उत्पादनांचे मन्युअल्स भारतीय ग्राहकांसाठी ह्या भाषांमधे सुद्धा छापायच्या. वेबसाईटवर भाषा नसण्याचं कारण हे की जे भारतीय इंटरनेटवर आहेत, संभाव्य ग्राहक आहेत त्यांना इंग्रजी समजते. म्हणून कंपन्या कष्ट घेत नाहीत. इतर राष्ट्रांच्या भाषांमधे लाखो वेबसाईट्स आहेत. त्यांचे वापरकर्ते हीरीरीने आपल्याच भाषेतून व्यवहाराचा आग्रह धरतात. (आम्ही असा आग्रह धरायला गेलो की बाणा वैग्रे म्हणून फाट्यावर मारतात लोक) कंपन्या विशिष्ट भाषेचा इंटरनेटवर होणारा वापर बघून त्याचे वापरकर्ते, त्यांची संख्या बघून त्या भाषेत जाहिराती, मार्केटींग ठरवतात. आपली उत्पादने, त्यांची माहिती लोकांपर्यंत त्यांच्या भाषेत पोचणे आवश्यक असते. उदा. फ्रेंच लोक जर फक्त फ्रेंच भाषेच्या वेबसाईट्स वापरत असतील तर फ्रेंचापर्यंत पोचायला अ‍ॅपलला फ्रेंच भाषेत जाहिरात बनवावी लागेल. इंग्रजीत बनवून उपयोग नाही. फ्रेंच लोकांत आयफोन प्रचंड खपतो म्हणून फ्रेंचमधे पत्रक छापुया हा उफराटा व्यवहार झाला. मी स्वतःच एका ब्रिटीश एअरलाइन्स कंपनीसाठी वेगवेगळ्या भाषांमधल्या इंटरनेट जाहिराती बनवल्या आहेत. आपली बाजारपेठ मोठी नाही हे तुमचे विधान जरा चमत्कारिक वाटले. फक्त फ्लिपकार्टचा वार्षिक ताळेबंद बघितला तरी अंदाज लागतोच की. आपली बाजारपेठ बर्‍यापैकी आहे हो. फक्त आपल्या लोकांना इंग्रजीची भुरळ असल्याने जरा गंडलय. आपण लोकच आपली किंमत नाही करत तर जगाने तरी का खस्ता खाव्यात. क्लिंटनबाबु, 'अंग्रेजी' के बाहर बहुत बडी दुनिया है. कभी बाहर निकलकर देखो. असो. पण आश्चर्य आहे की एवढी सगळी चर्चा झाली, ना-इंग्रजी देशांचे इंग्रजीशिवाय घोडे का अडत नाही याचा अजूनपर्यंत कुणी खुलासा केला नाही. असे का? उत्तेके लियैच रुक्का ता इद्दर... भेंडी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 05/07/2015 - 18:31 नवीन
+१ बहरेनच्या विमानतळावर हिंदी आणि मल्याळममध्ये अनाउंसमेटस होतात. घोषणा करून अथवा भीक मागून या जगात फक्त अवहेलना आणि कुत्सित हास्य मिळते. जर "तुमच्यामुळे फायदा होईल अथवा तुमच्यावाचून काम अडेल अशी बौधिक, आर्थिक, राजकिय अथवा सामरीक पात्रता तुमच्याकडे असेल" तर मात्र स्वतःहून जग तुम्हाला खूष ठेवण्यासाठी धडपडेल (अर्थात, तुमच्यामुळे होणार्‍या फायद्याकडे अथवा तुमच्याविना होणार्‍या तोट्याकडे लक्ष ठेउनच !). आपली भाषा, संस्कृती, राज्य, राष्ट्र, इत्यादींना महत्व प्राप्त व्हावे असे वाटण्यात कोणाचेच दुमत नसावे. पण आपले ते स्वप्न प्रत्यक्षात कसे येईल याचा विचार/आराखडा करताना वरच्या तत्वाला सर्वोच्च महत्व आहे, हे विसरून चालणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
र
राही गुरुवार, 05/07/2015 - 19:58 नवीन
अगदी सहमत. बाणेबिणे गेले खड्ड्यात. नाणे आणि त्याचा छनछनाट महत्त्वाचा. जगातला सगळ्यात मंजुळ आणि कर्णसुखद ध्वनी तोच असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
स
संदीप डांगे गुरुवार, 05/07/2015 - 20:27 नवीन
मातृभाषेतून शिक्षण यात बाण्याचा मुद्दा कुठे येतो ते जरा सांगाल का राहीताई? किंबहूना माझ्या या धाग्यावरच्या सगळ्या मेगाबायटी प्रतिसादांमधे एकतरी असे वाक्य दाखवा ज्यात असा काही अर्थ ध्वनित झालाय. बाणा वैगेरेचा मुळात कुठेच नसलेला मुद्दा काढून चर्चेला भलतीच वळणे देणे वैगेरे बघून मला मिपावरच वाचलेला कुणाचा तरी धागा आठवला. ज्यात मिपावर कसे वादविवाद केले जातात याचे मिश्किल पण प्रत्ययकारी वर्णन होते. उगाच नसलेल्या गोष्टी उकरून काढून कुणाला हेटाळणे सुज्ञपणाचे लक्षण नाही हे नमूद करू इच्छितो. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
स
संदीप डांगे Tue, 05/05/2015 - 20:58 नवीन
शायद ये प्रतिसाद उस प्रतिसाद का कुंभ के मेले में बिछडा हुआ जुडवा भाई है. प्र.का.टा.आ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
स
सोत्रि Tue, 05/05/2015 - 02:30 नवीन
मागे एका मोठ्या हॉस्पीटलच्या डॉक्टर-मालकाशी याविषयावर बरेच बोलणे झाले. तो म्हणाला, 'एक जागतिक दर्जाचं सिरींज बनवणे भारतीय उत्पादकांना शक्य आहे. पण अजून पर्यंत मी अशा उत्पादकाच्या शोधात आहे.' सगळे इंग्रजी शिकलेले, इंग्रजीत भौतीकी, रसायन-फसायन, अप्लाईड-फफ्लाईड वैगेरे उच्च ज्ञान मिळवलेले तथाकथित उच्चशिक्षित महान भारतीय इंजिनीअर्स सगळे पॅरामीटर्स, रीक्वायरमेंट्स आधीच तयार असलेली एक साधी सिरिंज बनवू शकत नाहीत. तर काय चुलीत घालायची सगळी इंग्रजीतली भौतिकी?
बिंगो! हे इंग्रजी शाळांचे स्तोम अलीकडच्या काळात वाढले आहे ना, म्हणजे आत्ताची पीढी? मग मागच्या पिढीत मराठी माध्यामात भौतिकी शिकलेले कुठे गेले? का नाही त्यांनी अशी सिरींज बनवली? शिक्षणाच्या माध्यमाचा आणि आंत्रेप्रॉनॉर होण्याचा काहीही संबंध नसतो. तुमच्या मुद्द्यांचा रोख हलूच माध्यम सोडून शिक्षण पद्धातीकडे झुकतोय. तेव्हा, आता खरच रजा घ्यायची वेळ झाली, राम राम! -(प्रेरणा भाषातीत असते असे मानणारा) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Tue, 05/05/2015 - 03:43 नवीन
मग मागच्या पिढीत मराठी माध्यामात भौतिकी शिकलेले कुठे गेले?
अच्छा, म्हणजे तुमच्या मते मराठीत भौतिकी होती तर. मागे कोण म्हणाले ते की हे सगळं इंग्रजीतच असतं म्हणून? मराठीत नाहिच्चै तर शिकणार कसे म्हणून? मला वाटलं ब्वॉ आता सगळ्या पिढ्यांचे सगळे इंजिनीअर इंग्रजीतूनच शिकलेत, हुशार झालेत तर कुठं गेली हुशारी...? तुम्ही विसरलात म्हणून सांगतो, मागच्याच पिढीच्या इंजीनिअर्सनी जगातले सर्वात स्लिम घड्याळ बनवले. पण काय या इक्का दुक्का लोकांपासून सालं आपलं पब्लिक इन्स्पायरबी होत नाय. करने का क्या?
शिक्षणाच्या माध्यमाचा आणि आंत्रेप्रॉनॉर होण्याचा काहीही संबंध नसतो.
तसे म्हटले तर कशाचाच कशाशी कसलाच संबंध नाहीयेहो. आमचा रोख नेहमी मीडीयम, कंटेंट आणि सिस्टीम यांच्या एकत्रित परिणामांवर असतो. एकाशिवाय दुसर्‍यास अर्थ नाही. दोहोंशिवाय तिसर्‍यास अर्थ नाही. बाकी आम्हाला काय चकाट्या पिटायला काहीतरी कारणं लागतात.. बास. येतो. राम राम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Tue, 05/05/2015 - 02:50 नवीन
१०० टक्के सहमत. संदिपभाउ तुमच्या प्रतिसादाशी १००% असहमत. नंतर वेळ मिळाला की सविस्तर टंकतो. एकचं करा फक्त एखादं ट्रिपल इंटिग्रेशनचं गणित मराठीमधे कसं असेल ह्याचा एक विचार करा. किंवा नाही सुचलं तर सांगा मी देतो एखादं अ‍ॅप्लिकेशन ओरिएंटेड ट्रिपल इंटिग्रेशन. त्याची सुत्र सुद्धा देतो. शुद्ध मराठीतुन सोडवुन दाखवा, डोक्याचा भुगा नाही झाला तर कट्ट्याला भेटाल तेव्हा म्हणाल तिथे पार्टी तुम्हाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
H
hitesh Mon, 05/04/2015 - 14:23 नवीन
सर - गण्या , सांग बरं ... ड्रायव्हर आणि कंडक्टरमध्ये काय फरक आहे ? गण्या - कंडक्टर झोपला तर कुणाचंच तिकीट निघणार नाही . पण ड्रायव्हरला जर झोप लागली तर सगळ्यांचंच वरचं तिकीट निघेल
  • Log in or register to post comments
म
मृत्युन्जय Mon, 05/04/2015 - 14:25 नवीन
इथे काय संबंध?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: hitesh
H
hitesh Mon, 05/04/2015 - 14:27 नवीन
इंग्रजी ही ड्रायव्हर आहे. मराठी म्हणजे कंडक्टर. दोघानी आपापली कामे गुमानपणे करावीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: hitesh
म
मृत्युन्जय Mon, 05/04/2015 - 14:24 नवीन
आजकाल कुठल्याही धाग्याचे काश्मीर होते. चांगले धागे जणू मिपावर बंदच झाले आहेत आणि नळावरची भांडणे करण्यासाठी विकृत डु आयडींनी धुमाकुळ घालायची जागा असे मिपाचे स्वरुप झाले आहे. असो. चालू द्यात.
  • Log in or register to post comments
H
hitesh Mon, 05/04/2015 - 19:49 नवीन
चालायचेच. नवा मोदी नवं राज्य !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
म
मृत्युन्जय Tue, 05/05/2015 - 08:51 नवीन
इथले मोदीही जुनेच आहेत आणि राज्यही जुनेच आहे. नविन खेळाडूंनी घाण केली आहे. काय करणार कालाय तस्मै नमः.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: hitesh
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Tue, 05/05/2015 - 02:43 नवीन
भेंडी शिक्षणाची भाषा बदलुन काही शष्प फरक पडत नाही. आल्या तर अडचणीचं येतात हे स्वानुभवानी सांगतो. आख्खः शालेय शिक्षण मराठी माध्यमामधुन झालयं. नंतर डिप्लोमाला अ‍ॅडमिशन घेतल्यावर साधा न्युमरेटर-डिनॉमिनेटरमधला गोंधळ दुर व्हायला किती दिवस लागलेले ते माझं मला माहित आहे. मातृभाषा उत्तम प्रकारे लिहिता-वाचता-बोलता आली पाहिजे ह्यात शंका नाही. पण व्यावसायिक रित्या आपलं करिअर नीट करायचं असेल तर इंग्रजीला पर्याय नाही. तिथे अमुक भाषा-तमुक भाषा असा संकुचित दृष्टीकोन ठेवला तर तुमच्या करिअरचे तीनतेरा वाजायला वेळ लागणार नाही. द.भारतामधे काही राज्यांमधे मातृभाषेमधुन अभियांत्रिकी शि़क्षण द्यायला सुरु केलयं आणि तिथल्या तिथे त्या मुलांना रोजगार मिळेल अशी सोयही केलेली आहे. पण एक गोष्ट अगदी नक्की सांगतो त्यापैकी ज्यांना हेचं ज्ञान इंग्रजी सारख्या सर्वात जास्तं वापरल्या जाणार्‍या व्यापार भाषेमधे आहे तेचं फक्त त्या त्या राज्याच्या बाहेर टीकु शकतील. बाकीच्या सगळ्यांनी फक्त त्यांच्या राज्यापुरतं मर्यादित रहायचं का? उदा. एक गाडीचा कारखाना सौथ इंडिया मधे आहे त्याचीच दुसरी शाखा पंजाब मधे आहे. बदली झाली तर हा सौथ इंडियन तिकडे जाउन काय दिवे लावणारे? तिकडे जाउन यंडु-गुंडु-गुड-गुड केलं तर लोकं पहिल्या दिवशी फाट्यावर मारतील. (शिवाय हे तिकडं जाउन अण्णा कंपु रिक्रुटमेंट अँड प्रमोशन सिस्टीम चालु करणार). तो वेगळ्या धाग्याचा विषय आहे. जगात टिकायचं असेल तर वाघिणीच्या दुधाला पर्याय नाही. ज्याला पचेल त्याची प्रगती आहे बाकीच्यांनी पचनक्षमता आणि अभ्यास वाढवा एवढचं म्हणेन.
  • Log in or register to post comments
र
राही Tue, 05/05/2015 - 08:21 नवीन
श्री डांगे यांचा प्रश्न असा, की १०%हुशार लोकांसाठी ९०% लोकांना वेठीस का धरावे? तर हे लोक वेठीस धरले जात नाहीयेत. निदान शालेय स्तरावर तरी आज लोकांचा कल इंग्रजी (माध्यमातल्या) शिक्षणासाठीच आहे. उपलब्धता असेल तर नक्कीच लोक मराठीला बाजूला सारून इंग्रजी माध्यमाकडे वळतील. जिथे मुळात शाळाच नाहीत तिथे अर्थात वेगळे नियम लागू होतील. अशा अतिदुर्गम भागातही प्रमाणित मराठीमध्ये शिकणे त्या मुलांना कठिणच जाते. काही वर्षांपूर्वी पहिलीपासून इंग्रजीचा प्रयोग राबवण्यात आला त्याला अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला.अतिरिक्त वेळेची पर्वा न बाळगता मुले आणि शिक्षक यांनी ज्यादाच्या तासांना उपस्थिती लावली. लोकांना इंग्रजी शिकायचे आहे, माध्यम म्हणूनही त्यांना ते हवे आहे. या सर्वसाधारण लोकांना महाराष्ट्राचा इतिहास-भूगोल ह्या विषयांमध्ये रुची नसते. कामधंदा कोणत्या गावात मिळतो, एव्हढा भूगोल माहित असलेला त्यांना पुरतो. त्यांना हातकष्टाच्या मजूरकामापेक्षा (जे काम ते आतापर्यंत करीत आले आहेत,)थोडे वरच्या दर्जाचे असे आत्मसन्मान वाढवणारे काम हवे आहे. सफाईदार बोलणे-वागणे त्यांना शिकायचे आहे आणि इंग्रजीतून शिकल्याने हे शक्य होईल अशी त्यांची धारणा आहे.त्यांच्या ग्रामीण ढंगाच्या मराठीची टिंगलटवाळी होते आणि मोडक्यातोडक्या इंग्रजीमुळे सन्मान मिळतो हे ते रोज पाहातात. त्यांना त्यांच्या निवडीपासून वंचित ठेवू नये. शेवटी हा निवडीचा प्रश्न आहे. सक्तीचा नाही.एकदोन पिढ्या इंग्रजी माध्यमातून बाहेर निघाल्या की पुढचे पुन्हा जुन्या स्मरणरंजनात रमतात आणि होताहोईतो जुने जपण्याचा प्रयत्न करतात. पण आधी त्यांना या भाषा-संस्कृतीच्या घट्त गळफासातून बाहेर पडायचे आहे. मग नंतर यथावकाश त्यांचे तेच ठरवतील की तो खरेच गळफास होता की गळसरी. होऊ दे बदल, नव्याचे असतेच नवल. आणि दहा टक्के लोक जे खरे बुद्धिमान असतात, त्यांना या सगळ्याने काहीच फरक पडत नाही.
  • Log in or register to post comments
अ
असंका Tue, 05/05/2015 - 09:41 नवीन
या सर्वसाधारण लोकांना महाराष्ट्राचा इतिहास-भूगोल ह्या विषयांमध्ये रुची नसते. कामधंदा कोणत्या गावात मिळतो, एव्हढा भूगोल माहित असलेला त्यांना पुरतो.
इथे नक्की कुठल्या विषयावर चर्चा चालू आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
र
राही Tue, 05/05/2015 - 20:29 नवीन
श्री. डांगे यांचा एक प्रतिसाद :'. ईंग्रजीतून शिकणार्‍या मुलांना इतिहासाचं सोडा पण समकालिन भारताची, राज्याची, जिल्ह्याची, आपल्या गावाची माहिती कोणत्या भाषेतून द्यावी? की देऊच नये? की कुठल्याही भाषेतून दिली तरी फरक पडत नाही?' खरोखर कुठल्याही भाषेतून दिली तरी ९०% मुलांना काही फरक पडत नाही. त्यांना याच्याशी खरेच काही देणेघेणे नसते.'सा विद्या, या विमुक्तये'च्या धर्तीवर सध्या 'ते शिक्षण जे गरिबीपासून मुक्ति देते' असे म्हणता येईल. प्रत्येक कालखंडाची एक मागणी अथवा गरज असते. १९९० च्या आसपास आंध्रप्रदेशात खाजगी इंजीनीरिन्ग कॉलेजे उघडण्यास परवानगी मिळाली आणि अनेक रेड्डी,राव असे इंजीनीअर भराभर तयार झाले. नेमके त्याच सुमारास वाय टूके चे घबाड निघाले ते यांच्या पदरात अलगद पडले. सध्या कॉल सेंटर्सची चलती आहे तर लुटू द्या की तिचा फायदा आपल्या मुलांना. प्रत्येक काळाची एक सद्दी असते, सुगी असते. तेव्हाच भराभर गवत कापून घ्यायचे असते. इंग्रजीची मागणी घटली तर इंग्रजी माध्यमाच्या शाळा आपोआप ओस पडतील. मग काळजी कशाची? संधीपासून वंचित करणारे तत्त्वज्ञान व्यवहारामध्ये टिकणे कठिण. रोजीरोटी देऊ शकणारे ज्ञान अधिकांश लोकांना नाकारण्यामधून इतिहासातल्या घोडचुकांची पुनरावृत्तीच आपण करीत आहोत इतके उमगले तरी पुरे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका
अ
असंका गुरुवार, 05/07/2015 - 11:12 नवीन
सध्या कॉल सेंटर्सची चलती आहे तर लुटू द्या की तिचा फायदा आपल्या मुलांना.
ही अशी महत्त्वाकांक्षा असायला हवी का, "आपल्या" माणसांची ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
क
क्लिंटन गुरुवार, 05/07/2015 - 11:35 नवीन
ही अशी महत्त्वाकांक्षा असायला हवी का, "आपल्या" माणसांची ?
कुठल्याही प्रामाणिक मार्गाने पैसे कमावावेत असे वाटण्यात वाईट काय? सर्वांकडे भरपूर शिक्षण घ्यायला लागणारा अ‍ॅप्टिट्यूड आणि मुख्य म्हणजे चिकाटी नसते.ज्यांना शिक्षणात फार गती नाही, अंगात संगीत, नाट्य, चित्रकला इत्यादी कुठलीच कला नाही, स्वतःचा व्यवसाय करायला लागणारे गुण नाहीत, खेळांमध्ये गती नाही अशांना कॉल सेंटर मधून चांगले पैसे कमावता आले तर त्यात काय वाईट आहे? प्रश्न कधी येईल?शास्त्रज्ञ होऊन चांगले संशोधन करायची योग्यता असलेला माणूस कॉल सेंटरमध्ये जाऊन फोनवर उत्तरे द्यायला लागला तर. पण अशी योग्यता असलेला माणूस कॉल सेंटरमध्ये नोकरी करायची महत्वाकांक्षा ठेवेल असे वाटत नाही.काही कारणाने शेवटी तिथे नोकरी करणे भाग पडले तर ती गोष्ट वेगळी पण कॉल सेंटरमध्ये नोकरी करायची तशी महत्वाकांक्षा असा माणूस ठेवत असेल असे वाटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका
अ
असंका गुरुवार, 05/07/2015 - 12:26 नवीन
इतका वेळ आपण असं म्हणत होतात की इंग्रजीत शिकल्याने डेरीवेटीव आदी संकल्पना चांगल्या पद्धतीने कळतात. मराठीत तेच शिकणं फार अवघड आहे. म्हणून इंग्रजी हवं. आता आपण असं म्हणत आहात का, की नाही कळलं डेरीवेटीव तर नाही, आपण त्याला कॉल सेंटर ला पाठवू? "पांचो उंगलीया घी मे" असं हे इंग्रजी शिक्षण दिस्तंय नाही? वाजली त वाजली नाय तं मोडून खाल्ली? भलताच लवचिक दृष्टीकोन झाला हा शिक्षणाबद्दल... महत्त्वाकांक्षा आणि कुठल्याही प्रामाणिक मार्गाने पैसे मिळवणे यातला फरक मी सांगावा का आपल्याला? कसंतरी करून (प्रामाणिकपणे) चार पैसे मिळवायला शिकणे अशी वृत्ती असलेल्या माणसाला महत्त्वाकांक्षी माणूस म्हणणार का? मी विचारतोय की महत्त्वाकांक्षा अशी अशी असावी का, यावर तुम्ही म्हणता की पैसे मिळवण्यात वाईट काय ? महत्त्वाकांक्षेचा आणि पैसे मिळवण्याचा संबंध इतका डायरेक्ट नाही. ज्यांची महत्त्वाकांक्षा भरपूर पैसे मिळवणे ही आहे त्यांच्याबद्दल आपले म्हणणे खरे असेल, पण 'महत्त्वाकांक्षा असणे = पैसे मिळवणे' इतकं साधं सोपं आणि सरळ नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
क
क्लिंटन गुरुवार, 05/07/2015 - 12:44 नवीन
वाजली त वाजली नाय तं मोडून खाल्ली? भलताच लवचिक दृष्टीकोन झाला हा शिक्षणाबद्दल...
मग त्यात चुकीचे काय आहे?
कसंतरी करून (प्रामाणिकपणे) चार पैसे मिळवायला शिकणे अशी वृत्ती असलेल्या माणसाला महत्त्वाकांक्षी माणूस म्हणणार का?
पण माझा मुळातला प्रश्न आहे की किती लोक खरोखरचे महत्वाकांक्षी असतात? किती लोक आपल्या महत्वाकांक्षेच्या पूर्ततेसाठी वाटेल तितके कष्ट करायची तयारी दाखवितात? किती लोक लागणारे कष्ट सातत्याने करत राहतात... ही यादी अजूनही वाढवता येईल. असे सगळे गुण असलेल्या लोकांना कॉल सेंटरमध्ये नोकरी करून समाधान मिळणार नाहीच हे उघडच आहे. तेव्हा कॉल सेंटर मधील नोकरी ही खरोखरच्या महत्वाकांक्षी लोकांकरता नाहीच हे काही मी सांगायला नको. पण ज्यांना कशातच गती नाही अशांना कॉल सेंटरमध्ये नोकरी करून का होईना उदरनिर्वाहाचे साधन मिळाले तर त्यात चुकीचे काय? वर कॉल सेंटरचा उल्लेख आल्यावर 'अशी महत्वाकांक्षा आपल्या लोकांनी ठेवावी का' अशा स्वरूपाचा थोडासा हेटाळणीचा सूर असलेला प्रतिसाद तुम्ही दिला होतात त्यावर इतर गोष्टी लिहिल्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका
क
काळा पहाड गुरुवार, 05/07/2015 - 12:52 नवीन
साधी गोष्ट आहे. मी मराठी माध्यमात शिकलो आहे. सध्या इक्विटी स्वाप बद्दल आणि त्याच्या फायद्यांबद्दल वाचतो आहे. कुठली भाषा मला जास्त सोप्या रितीने समजावू शकते? अर्थातच इंग्रजी कारण त्यात वेगवेगळ्या तर्‍हेचं साहित्य उपलब्ध आहे. मराठी साहित्य उपलब्ध तरी नाही कींवा जे असेल ते तितकंसं सखोल नाही. बर जर मी मराठीत वाचलं तर मला नोकरीत "आवश्यकता पृथक्करण" करताना इंग्रजीच वापरायची आहे. मग मी दोन्ही मराठी आणि इंग्रजी शिकायची का? बाय द वे इक्विटी स्वाप ला मराठीत काय म्हणतात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा