Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

एक वर्षानंतर . . .

श
श्रीगुरुजी
Mon, 05/25/2015 - 09:01
🗣 1265 प्रतिसाद
१६ मे २०१४ या दिवशी भारतात इतिहासाचे एक नवे पान लिहिले गेले. स्वतंत्र भारताच्या ६७ वर्षांच्या इतिहासात प्रथमच एका तथाकथित उजव्या विचारांच्या, प्रतिगामी व जातीयवादी पक्षाने लोकसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळविले. त्यापूर्वीच्या ६७ वर्षांपैकी जवळपास ५४-५५ वर्षे काँग्रेसकडे सत्ता होती. उर्वरीत १२-१३ वर्षांपैकी सुमारे ६ वर्षे भाजप आघाडीचे सरकार होते व ५-६ वर्षे जनता पक्ष, जनता दल इ. वेगवेगळ्या तथाकथित मध्यममार्गी, डाव्या, निधर्मी आघाड्यांचे सरकार होते. परंतु १६ मे २०१४ रोजी प्रथमच भारतीय जनता पक्ष या उजव्या, राष्ट्रवादी, जातीयवादी इ. तथाकथित विशेषणांनी नटलेल्या पक्षाने संपूर्ण बहुमत मिळवून इतिहास घडविला. भाजपला बहुमत मिळण्यास मुख्य २ गोष्टी कारणीभूत होत्या. त्या म्हणजे, (१) २००४-२०१४ या कालखंडातील भ्रष्टाचारात नखशिखान्त बुडलेले व अत्यंत निष्क्रीय असलेले व सर्व आघाड्यांवर पूर्ण अपयशी ठरलेले काँग्रेसचे सरकार आणि (२) भाजपकडे असलेले नरेंद्र मोदींचे अत्यंत प्रभावी व आक्रमक नेतृत्व. अत्यंत झंझावाती प्रचार करून मोदींनी काँग्रेसवर घणाघाती टीका करून जनमत आपल्या बाजूला वळवून भाजपला इतिहासात प्रथमच स्पष्ट बहुमत मिळवून दिले व जेमतेम ४४ जागा मिळून काँग्रेसचा अक्षरशः पालापाचोळा झाला. मोदींनी २६ मे २०१४ या दिवशी पंतप्रधानपदाची शपथ घेताना सार्क समूहातील सर्व राष्ट्रप्रमुखांना सोहळ्यासाठी निमंत्रित करून एक अत्यंत वेगळा पायंडा पाडून आपले पररष्ट्र धोरण कसे वेगळे असणार आहे याची चुणू़क दाखविली. एक वर्षानंतर परिस्थितीत कोणते चांगलेवाईट बदल झाले, भारताला किती फायदातोटा झाला, देशाच्या आर्थिक/राजकीय/सामाजिक्/संरक्षण/परराष्ट्र धोरण इ. क्षेत्रात कोणते बरेवाईट बदल झाले याचा संक्षिप्त स्वरूपात आढावा या लेखाद्वारे घेत आहे.
आर्थिक
विमा क्षेत्रातील परकीय गुंतवणूक-मर्यादेत वाढ, संरक्षण क्षेत्रात परकीय कंपन्यांना गुंतवणुकीची संधी, खाण उत्खनन कायद्यात आमूलाग्र बदल, रेल्वेसारख्या महाप्रचंड खात्यात खाजगी गुंतवणुकीला मुभा, राज्य सरकारांना अधिक निधी, अमेरिकेबरोबर अणुऊर्जा करार, कोळसा खाण उत्खननाचे आणि दूरसंचार तरंगलहरींचे लिलाव, चलनवाढीला अटकाव आणि मुख्य म्हणजे भ्रष्टाचारावर नियंत्रण ही या सरकारची प्रमुख वैशिष्ट्ये सांगता येतील. २०१३-१४ हे आर्थिक वर्ष संपताना भारताकडे ३०४ अब्ज डॉलर्सचा परकीय चलनाचा साठा होता. २०१४-१५ हे आर्थिक वर्ष संपताना भारताकडे ३४१ डॉलर्सचा परकीय चलनाचा साठा होता. एका वर्षात परकीय चलनाची गंगाजळी १२% टक्क्यांनी वाढली. औद्योगिक उत्पादनात २०१३-१४ मध्ये ४.२% ची वाढ झाली होती. हीच वाढ २०१४-१५ या वर्षात ५% टक्के इतकी आहे. आयातीत २०१४-१५ मध्ये २०१३-१४ च्या तुलनेत ०.५ % टक्क्यांची घट झाली आहे, तर निर्यातीत २०१४-१५ मध्ये २०१३-१४ च्या तुलनेत २.० % टक्क्यांची घट झाली आहे भारताची अणु उर्जा क्षमता २०१३-१४ मध्ये ४,७८० मेगॅवॅट्स इतकी होती. २०१४-१५ मध्ये हीच क्षमता ५,७८० मेगॅवॅट्स इतकी झाली आहे. यात एकूण २१ % वाढ झालेली आहे. २०१४-१५ या वर्षात जीडीपी वाढीचा दर ७.४ % होता, शेती उत्पन्न वाढीचा दर १.१ % होता, कोळसा उत्पादन ८.२ % इतके वाढले. वीज उत्पादन - २०१३-१४ च्या तुलनेत २०१४-१५ मध्ये वीज उत्पादनात १०% वाढ झाली. थकीत कर्जे - सार्वजनिक बँकांच्या थकीत कर्जात २०१३-१४ च्या तुलनेत २०१४-१५ मध्ये वीज उत्पादनात १७% वाढ झाली. ब्रिक्स राष्ट्रप्रमुखांच्या भेटीत मोदींनी ब्रिक्स बँकेची अभिनव कल्पना मांडली. ब्रिक्स बॅंक सुरू होऊन बॅकेचे सुरवातीचे अध्यक्षपद भारताकडे आले आहे. मनमोहन सरकारने २-जी तरंगलहरी आणि कोळसा खाणी वाटप करताना देशाचे तब्बल ३ लाख कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान केले होते. या दोन्ही प्रकरणात प्रचंड भ्रष्टाचार झाला होता. न्यायालयाने २०४ कोळसा खाणींचे व २-जी तरंगलहरींचे वाटप रद्द करून लिलाव पद्धतीने त्यांचे वाटप करण्याचा आदेश दिला होता. गेल्या वर्षभरात ४० कोळसा खाणी व २-जी तरंगलहरी वाटपासाठी लिलाव केल्यामुळे देशाच्या तिजोरीत तब्बल २ लाख कोटींहून अधिक रक्कम जमा होणार आहे. उर्वरीत १६०+ खाणींच्या लिलावानंतर हीच रक्कम १५ लाख कोटींहून अधिक होण्याची शक्यता आहे. मुख्य म्हणजे या लिलावात सुरवातीपासूनच संपूर्ण पारदर्शकता आणलेली आहे. थेट परकीय गुंतवणूक २०१३-१४ या वर्षात २०.८ अब्ज डॉलर्स होती. २०१४-१५ या वर्षाच्या पहिल्या ११ महिन्यात हीच गुंतवणूक २८.८ अब्ज डॉलर्स आहे. जनधन या नवीन योजनेंतर्गत नवीन १५ कोटी बँक खाती उघडण्यात आली आहेत. अनेक नागरिकांनी आयुष्यात पहिल्यांदाच स्वतःच्या नावाचे बँक खाते उघडले आहे. प्रतिवर्ष फक्त १२ रूपये भरून २ लाखांचा अपघात विमा देण्याची केंद्र सरकारची नवीन योजना प्रचंड यशस्वी ठरली आहे. योजना सुरू केल्यापासून पहिल्या ९ दिवसातच ५.५७ कोटी नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. नागरिकांना मोफत गोष्टी देण्याचे पूर्वीच्या सरकारचे धोरण बदलून अल्प खर्चात नागरिकांच्या सहभागाने योजना सुरु करण्याची ही कल्पना अभिनव आहे. ५० वर्षाखालील नागरिकांना प्रतिवर्ष ३३० रूपये भरून जीवनविमा देण्याची अभिनव योजना देखील यशस्वी ठरली आहे. ही योजना सुरू झाल्यापासून पहिल्या १८ दिवसांतच १.७४ कोटी नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे दिल्या जाणार्‍या शेतकर्‍यांच्या नुकसानभरपाईच्या अटी शिथिल करण्यात आल्या आहेत. ५०% किंवा अधिक नुकसान असल्यासच भरपाई देण्याची पूर्वीची अट बदलून आता ३३% नुकसान असले तरी भरपाई देण्यात येईल. तसेच भरपाईची रक्कम दीडपट करण्यात आली आहे. मोदी सरकारच्या सुदैवाने आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे भाव कमी झाल्यामुळे भारतातही भाव कमी झाले. त्यामुळे महागाईचा दर कमी झाला आहे. त्यामुळे आयातीवरील खर्च देखील कमी झाला आहे. जीडीपी वाढ २०१३-१४ या वर्षात ६.९ % टक्के होती. २०१४-१५ मध्ये हाच आकडा ७.४% आहे. महागाई निर्देशांक २०१३-१४ या वर्षात ८ % हून अधिक होता. २०१४-१५ मध्ये हाच आकडा ५ % च्या खाली आला आहे. आर्थिक विषयात मोदी सरकारला १० पैकी ६ गुण.
संरक्षण व परराष्ट्र धोरण
आपल्या शपथविधीला मोदींनी सार्क समूहातील सर्व राष्ट्रप्रमुखांना बोलावून एक नवीन पायंडा पाडला. सार्क समूहातील भारत हा सर्वात मोठा देश. सार्क हे एक कुटुंब मानले तर भारताचे स्थान सर्वात मोठ्या भावाचे. एखाद्या देशमुखाच्या घरातील लग्नाला पंचक्रोशीतील सर्व गावाच्या पाटलांनी उपस्थित रहावे व देशमुखांचे स्थान मान्य करावे अशा स्वरूपाचा हा पायंडा होता. त्यानंतर लगेचच मोदींनी भूतानला व श्रीलंकेला भेट देऊन शेजारी राष्ट्रांशी संबंध वाढविण्यावर भर दिला. मोदींच्या प्रयत्नामुळे श्रीलंकेत फाशीची शिक्षा झालेल्या तामिळनाडूतील ५ कोळ्यांना श्रीलंकेने मुक्त करून भारतात परत पाठवून दिले. काही वर्षांपूर्वी मोदींनी चीनला भेट देऊन तस्करीच्या आरोपावरून तेथील तुरूंगात शिक्षा भोगत असलेल्या २१ पैकी ११ गुजराती व्यापार्‍यांना सोडवून आणण्याची यशस्वी शिष्टाई केली होती. मागील महिन्यात नेपाळमध्ये जबरदस्त भूकंप झाला. भारत सरकारने अत्यंत तातडीने नेपाळला मदत पाठवून दिलासा दिला. काही महिन्यांपूर्वी मालदीवमध्ये अचानक पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला असताना भारत सरकारने तातडीने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला. येमेन व इराकमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे अनेक भारतीय अडकून पडले होते. भारताने ही परिस्थिती युद्धजन्य पातळीवर हाताळून बहुसंख्य भारतीयांना सुखरूप परत आणले. एवढेच नव्हे तर येमेन मध्ये अडकलेल्या ४१ देशांच्या ९०० हून अधिक नागरिकांना भारताने सुखरूप बाहेर काढले. अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या फादर प्रेम यांना सरकारने सुखरूप भारतात परत येण्यास मदत केली. गतवर्षी सप्टेंबरमध्ये काश्मिरमध्ये भयानक पूर आलेला असताना केंद्र सरकारने तातडीने लष्कराच्या मदतीने नागरिकांना मदत केली होती. मोदी सरकारचे वैशिष्ट्य हे आहे की हे सरकार सर्वत्र व्हिजिबल आहे. पूर्वीच्या मनमोहन सिंग सरकारचे कोठेही अस्तित्व जाणवत नव्हते. मात्र या सरकारचे सर्व क्षेत्रात ठळक व सकारात्मक अस्तित्व दिसत आहे. गेल्या वर्षात अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगला इ. देशातील ४ हजारहून अधिक हिंदू नागरिकांना भारताचे नागरिकत्व देण्यात आले आहे. यापूर्वीच्या वर्षात हाच आकडा १ हजारहून कमी होता. या देशात हिंदूंवर मोठ्या प्रमाणात अन्याय होत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. भारत हा त्यांचा एकमेव आधार आहे. पूर्वीच्या सरकारने त्यांच्या बाबतीत आस्ते कदम धोरण ठेवले होते. या सरकारने मात्र त्यांना दिलासा दिला आहे. मोदी फ्रान्स दौर्‍यावर गेले असताना त्यांनी फ्रान्सबरोबर राफेल या आधुनिक लढाऊ विमानांच्या खरेदीचा करार केला. गेली अनेक वर्षे हा करार प्रलंबित होता. जुलै-ऑगस्ट २०१४ मध्ये सीमेवरील पाकिस्तानी सैन्याने नेहमीप्रमाणे अचानक गोळीबार सुरू केला. त्यात सीमाभागातील काही नागरिक मृत्युमुखी पडले. पाकिस्तान काही महिन्यांच्या अंतराने नियमितपणे असा गोळीबार करून नागरिकांचे प्राण घेत असते. या गोळीबाराविरूद्ध भारताची प्रतिक्रिया म्हणजे निषेधाचा खलिता पाठविणे. यावेळी प्रथमच भारतीय लष्कराला प्रतिगोळीबार करण्याची मुभा मिळाली. पाकिस्तानने गोळीबार सुरू केल्यावर प्रथमच भारतीय सैन्याने उलट गोळीबार करून जोरदार प्रत्त्युत्तर दिले ज्यात काही पाकिस्तानी सैनिक व नागरिक मरण पावले. भारताच्या जोरदार प्रतिकारामुळे आश्चर्यचकीत झालेल्या पाकिस्तानी लष्कराने गोळीबार थांबविला. त्यानंतर आजतगायत पाकिस्तानकडून विनाकारण गोळीबार होण्याचे प्रकार घडलेले नाहीत. ऑगस्टमध्ये भारत-पाकिस्तानची सचिव पातळीवर चर्चा होणार होती. परंतु चर्चेच्या काही दिवस आधी पाकिस्तानी राजदूताने हुरियतच्या फुटिरतावादी नेत्यांची भेट घेतल्याने भारताने तातडीने चर्चा रद्द करून एकाच वेळी भारताशी व फुटीरतावाद्यांशी चर्चा होऊ शकत नाही असा पाकिस्तानला जोरदार इशारा दिला. मोदींनी नुकतीच चीनला भेट दिली. ही भेट चीनच्या भूमीवरून चीनला स्पष्ट शब्दात इशारा दिल्यामुळे गाजली. इंडिया-टुडे या साप्ताहिकाने या इशार्‍याबद्दल असे म्हटले आहे. "In Modi, India has a PM who can look China in the eye". याच लेखात पुढील वाक्ये आहेत. Prime Minister Narendra Modi's recent visit to China will be remembered for will be his plain-speaking. And it is by no means a small achievement. For years, Indian political leaders have gone to China and said what the Chinese wanted to hear. Modi changed all that when he openly "stressed the need for China to reconsider its approach on some of the issues that hold us back from realising full potential of our partnership" and suggested that "China should take a strategic and long-term view of our relations". In his speech at the Tsinghua University too, Modi went beyond the rhetorical flourishes of Sino-Indian cooperation and pointed out the need to resolve the border dispute and in the interim, clarify the Line of Actual Control to "ensure that our relationships with other countries do not become a source of concern for each other". This is a significant shift in India's traditional defensiveness vis-a-vis China and should put the relationship on a firmer footing. चिनार यांचा ह्या सविस्तर प्रतिसादात भारताच्या परराष्ट्र धोरणांचे ठळक मुद्दे आलेले आहेत. २ वर्षांपूर्वी केदारनाथ येथील प्रलयात शेकडो भाविक मृत्युमुखी पडले होते. तत्कालीन राज्य सरकार ती परिस्थिती नीट हाताळू शकले नव्हते. त्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षात भारताने भारतात व विदेशात अशी परिस्थिती अत्यंत चांगल्या पद्धतीने हाताळली आहे. २००८ मध्ये अमेरिकेबरोबर अणुकरार झाल्यानंतर पुढे फारसे काही झाले नव्हते. मोदींनी आपल्या पहिल्या वर्षात ऑस्ट्रेलिया व कॅनडाला भेट देऊन युरेनियम पुरवठ्याबद्दल यशस्वी बोलणी केली. राष्ट्रीय सुरक्षा परिषदेवर अजित डोवाल या अत्यंत कार्यक्षम अधिकार्‍याला आणण्यात आले आहे. "संरक्षण व परराष्ट्र धोरण" या विषयात मोदी सरकारला १० पैकी ८ गुण.
भ्रष्टाचार निर्मूलन
गेल्या १ वर्षात एकही मोठा घोटाळा झालेला नाही हे या सरकारचे मोठे यश आहे. युपीएची १० वर्षांची कारकीर्द म्हणजे उच्चपदस्थांचा प्रचंड भ्रष्टाचार होता. युपीएतील अनेक मंत्री भ्रष्टाचारात गुंतलेले होते व त्यातून देशाचे प्रचंड नुकसान झाले. मनमोहन सिंग मूक राहून अप्रत्यक्षरित्या भ्रष्टाचाराला प्रोत्साहनच देत होते. मोदींच्या कारकीर्दीत याला लगाम बसलेला दिसत आहे. 'मी भ्रष्टाचार करणार नाही व कोणाला करून देणार नाही' हे त्यांचे वचन पहिल्या वर्षात तरी सत्य झालेले दिसत आहे. मात्र भ्रष्टाचार्‍यांवरील कायदेशीर कारवाई मात्र पुरेशा वेगाने सुरू नाही. वड्राला खिरापतीसारख्या वाटलेल्या हरयाना व राजस्थानमधील जमिनी काढून घेण्यात आल्या. हरयानाने नुकतीच या जमीन व्यवहारांची चौकशी सुरू केली आहे. परंतु हे आधीच व्हायला हवे होते. महाराष्ट्रात छगन व समीर भुजबळांची चौकशी सुरू झाली आहे. आता तटकरे व अजित पवारांना समन्स गेले आहे. परंतु ही कारवाई अधिक वेगाने होणे अपेक्षित आहे. कोळसा घोटाळ्यातील जिंदाल व इतर काही नेत्यांवर व अधिकार्‍यांवर खटला दाखल झालेला आहे. मनमोहन सिंगांना देखील समन्स पाठविण्यात आले. "आपण न्यायालयात जाऊन आपले निर्दोषत्व सिद्ध करू" असे माध्यमांसमोर सांगणार्‍या सिंगांनी प्रत्यक्षात सर्वोच्च न्यायालयात जाऊन समन्सला स्थगिती मिळवून चौकशी दूर पळण्याचाच प्रयत्न केला आहे. देशाबाहेरील काळा पैसा भारतात आणण्यासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. काळ्या पैशाला प्रतिबंध करण्यासाठी एक नवीन कायदा करण्यात आला आहे. "भ्रष्टाचार निर्मूलन" या विषयात मोदी सरकारला १० पैकी ७ गुण.
राजकीय
लोकसभा निवडणुकीनंतर भाजपची घोडदौड सुरूच राहिली. हरयाना व झारखंडमध्ये स्पष्ट बहुमत मिळवून भाजपने सत्ता स्थापन केली. महाराष्ट्रात शिवसेनेचे ओढणे उतरवून स्वबळावर बहुमताच्या जवळ पक्ष पोहोचला. जम्मू-काश्मिरमध्ये प्रथमच भाजपने तब्बल २५ जागा मिळवून दुसरा क्रमांक मिळविला. दिल्लीत मात्र पक्षाचा दारूण पराभव झाला. आता लवकरच बिहार विधानसभेची निवडणुक आहे. त्यापाठोपाठ मे २०१६ मध्ये तामिळनाडू, केरळ, पाँडीचेरी, प. बंगाल व आसामची निवडणुक आहे. या राज्यात भाजपची परिस्थिती पूर्वीच्या तुलनेत नक्कीच सुधारली असेल. महाराष्ट्रात भाजपने अत्यंत चातुर्याने शिवसेनेला आपली जागा दाखवून देऊन युतीतला मोठा भाऊ कोण हे दाखवून दिले. महाराष्ट्रात ब्राह्मण, हरयानात जाट नसलेला व झारखंड मध्ये आदिवासी नसलेला मुख्यमंत्री देऊन जातीवर राजकारण होणार्‍या या राज्यात एक वेगळा पायंडा पाडला. जम्मू-काश्मिरमध्ये पीडीपी या पूर्ण वेगळी विचारसरणी असलेल्या पक्षाबरोबर सरकार स्थापन करून भाजपने एक वेगळाच प्रयोग केलेला आहे. यात भाजपकडे उपमुख्यमंत्रीपद, काही मंत्रीपदे व सभापतीपद आले आहे. पूर्वीच्या नॅकॉ-काँग्रेस सरकारने फुटिरतवादी मसर्रत आलमची स्थानबद्धता न वाढवता त्याच्या सुटकेचा मार्ग मोकळा केला होता. त्यामुळे तो सुटला. सुटल्यावर लगेचच त्याने भारतविरोधी कारवाया सुरू केल्यावर त्याच्यावर लगेचच कारवाई करण्यास पीडीपीची तयारी नव्हती. परंतु केंद्राच्या दबावानंतर त्याला पुन्हा स्थानबद्द करण्यात आले. हा एक नवीन प्रयोग आहे. हा प्रयोग कितपत यशस्वी/अयशस्वी होईल ते काही काळानंतर कळेलच. परंतु पीडीपी सारख्या फुटिरतावादी पक्षावर केंद्राच्या व राज्यातील भाजप सरकारच्या माध्यमातून दबाव ठेवण्यास या प्रयोगाचा उपयोग होऊ शकेल असं आतातरी वाटतंय. दिल्लीत मात्र भाजपचा सुपडा साफ झाला. अत्यंत अवास्तव व अव्यावहारीक आश्वासने देऊन 'आआप'ने सत्ता मिळविली. प्रचंड बहुमत पाठीशी असूनसुद्धा केजरीवालांचा नाटकीपणा, पोरकटपणा, हेकेखोरपणा, हुकूमशाही वृत्ती अजिबात कमी झालेला नाही. त्यांचे विदूषकी चाळे अजूनही सुरुच आहेत. त्यांच्या नाटकापायी एका शेतकर्‍याचा फास लागून जीव गेला. केंद्राबरोबर ते कायम संघर्षाच्या पवित्र्यात आहेत. एकंदरीत त्यांच्या मर्कटलीलांमुळे दिल्लीची जनता भरडली जाईल हे निश्चित. सप्टेंबर-ऑक्टोबर २०१५ मध्ये बिहार विधानसभेची निवडणुक होणार आहे. सध्या जनता दलाच्या अनेक तुकड्यांच्या विलिनीकरणाची चर्चा आहे. मागील वर्षी बिहारमध्ये झालेल्या १० विधानसभा जागांच्या पोटनिवडणुकीसाठी राजद, संजद व काँग्रेस ने युती करून १० पैकी ६ जागा जिंकल्या होत्या. परंतु प्रत्यक्ष विधानसभा निवडणुकीसाठी अशी युती प्रत्यक्षात येणे अवघड आहे. राजद व संजद या दोन्ही पक्षांना मुख्यमंत्रीपद हवे असल्याने दोन्ही पक्ष २४३ पैकी जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घ्यायचा प्रयत्न करेल व त्या भांडणातून अशी युती प्रत्यक्षात येणार नाही. राजद व संजद वेगवेगळेच स्वतंत्र लढतील. या दोघांपै़की कोणाबरोबर शय्यासोबत करायची हा काँग्रेसपुढे यक्षप्रश्न असेल. लालू हा सोनिया गांधींचा नीलाक्षतनय असल्याने शेवटी काँग्रेस राजदचाच मळ्वट भांगात भरेल असा अंदाज आहे. भाजप चातुर्याने जीतनराम मांझीला आपल्या आघाडीत सामील करून घेईल. शेवटी राजद्+काँग्रेस, संजद, भाजप+लोकजनशक्ती+मांझी+उपेंद्र कुशवाह असे तीन गट वेगवेगळे लढतील. डावे पक्ष बहुतेक राजदबरोबर जातील. अशा स्वतंत्र लढतील भाजप आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल. नुकत्याच झालेल्या एबीपी-नेल्सन च्या सर्वेक्षणानुसार राजद्+काँग्रेस्+संजद युती झाल्यास या युतीला १२६ व भाजप आघाडीला ११२ जागा मिळतील. परंतु राजद, काँग्रेस, संजद व भाजप आघाडी स्वतंत्रपणे लढल्यास भाजप आघाडीला १२६, संजद ६४, राजद ४२ व काँग्रेस २ अशी स्थिती असेल. दिल्ली असो, उ.प्र. असो वा बिहार, काँग्रेसचे अस्तित्व संपलेले आहे. दिल्लीत भाजपला पराभूत करण्यासाठी गुपचुप आआपला मदत करणे, बिहार मध्ये राजद किंवा संजदची सेज सजविणे, उ.प्र. मध्ये मुलायम किंवा मायावतीच्या पदराखाली लपणे एवढेच काँग्रेस करू शकते. नुकत्याच झालेल्या एबीपी-नेल्सन सर्वेक्षणानुसार एक वर्षानंतर मोदींची जादू बरीचशी कायम आहे. आता निवडणुक झाल्यास एनडीए ३१७ (पूर्वी ३३६), युपीए ७३ (पूर्वी ६०) अशी परिस्थिती आहे. इतर काही वाहिन्यांनी (आयबीएन, आजतक इ.) देखील सर्वेक्षण केले. त्यांनी जागांचा अंदाज दिलेला नाही. परंतु मोदींच्या कामावर व सरकारवर बहुसंख्य जनता समाधानी असल्याचे दिसते. मे २०१६ मध्ये प.बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम व पाँडिचेरीच्या विधानसभा निवडणुका आहेत. बंगालमध्ये पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने ममता बॅनर्जी निवडून येण्याची शक्यता आहे. शारदा चिट फंड घोटाळ्याचा बंगाली जनतेवर काहीही परीणाम झालेला दिसत नाही. दुसर्‍या क्रमांकावर काँग्रेस असेल. तामिळनाडूत आता द्रमुकची पाळी आहे. केरळमध्ये डावे पक्ष निवडून येतील. आसाममध्ये अधांतरी विधानसभा असण्याची शक्यता आहे. या सर्व राज्यात पूर्वीच्या तुलनेत भाजपची कामगिरी सुधारलेली असेल. परंतु बहुमत मिळविण्यासाठी किंवा प्रमुख विरोधी पक्ष होण्यासाठी भाजपला अजून बराच काळ लागेल. एकंदरीत गेल्या वर्षभरात भाजपने राजकीय क्षेत्रात खूपच प्रगती केली आहे. राजकीय आघाडीवर भाजप सरकारला १० पैकी ८ गुण.
सामाजिक
गेल्या वर्षभरात एकही मोठी जातीय दंगल झाली नाही. यापूर्वी २०१३ मध्ये मुजफ्फरनगरमध्ये झालेल्या जातीय दंगलीत ६० हून अधिक नागरिक मरण पावले होते. काही ठिकाणी चर्चवर ह्ल्ले झाले. काही हल्ल्यांमागे जातीय नसून पूर्ण वेगळी कारणे होती. मोदी मंत्रीमंडळातील गिरीराज सिंह, साक्षी महाराज इ. गणंगांनी काही वादग्रस्त वक्तव्ये केली. वाहिन्यांनी टीआरपी वाढविण्यासाठी त्या वक्तव्यांना प्रचंड प्रसिद्धी देऊन आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न केला. परंतु नुकत्याच झालेल्या वेगवेगळ्या वाहिन्यांच्या सर्वेक्षणानुसार अशा वक्तव्यांकडे बहुसंख्य नागरिकांनी दुर्लक्ष केलेले आहे. मोदींनी मात्र या वाचाळ मंत्र्यांच्या वक्तव्यावर सार्वजनिकरित्या मौन पाळले आहे. त्यांनी तातडीने पावले उचलून अशा मंत्र्यांना घरी बसविले पाहिजे. एकंदरीत सामाजिक जीवनात शांतता आहे. "सामाजिक" क्षेत्रासाठी या सरकारला १० पैकी ६ गुण.
विरोधी पक्षांची कामगिरी
संपूर्ण वर्षात विरोधी पक्षांची कामगिरी निराशाजनक राहिली. वर्षाच्या शेवटी भूमी अधिग्रहण कायद्याच्या निमित्ताने काही विरोधी पक्ष एकत्र येताना दिसले. परंतु काही विरोधी पक्ष अजूनही काँग्रेसपासून अंतर ठेवून आहेत. काँग्रेस अजूनही गांधी घराण्याच्या पदराखालून बाहेर येण्यास तयार नाही. राहुल गांधी अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या काळात तब्बल २ महिने परदेशात वास्तव्य करून आले. आपल्या परदेश दौर्‍यासाठी जाब विचारला जाईल हे ओळखून परदेशातील सूटबूट सोडून झब्बापायजमा परीधान करून आल्याआल्या दुसर्‍या दिवसापासून घसा ताणून मोदींवर टीका करणे सुरू केले आहे. त्याच्याबरोबरीने शेतकर्‍यांच्या घरी जाऊन भेटण्याचे पूर्वीचे नाटकही सुरू केले आहे. ते परदेशात विपश्यना करत होते म्हणे. परदेशात जाऊन २ महिन्यात ते ३ नवीन शब्द शिकले - किसान, मजदूर, गरीब. आता त्यांच्या प्रत्येक दुसर्‍या वाक्यात हे ३ शब्द असतात. पूर्वी कोणत्याही प्रश्नाच्या उत्तरात ते महिला सबलीकरण, नरेगा असे शब्द उच्चारायचे. आता विषय कोणताही असला तरी किसान, मजदूर आणि गरीब हे ३ शब्द असल्याशिवाय त्यांचे वाक्य पूर्ण होत नाही. लोकसभेत संपूर्ण निष्प्रभ ठरल्यावर राज्यसभेतल्या बहुमताच्या जोरावर काँग्रेसने महत्त्वाची विधेयके अडवून धरली आहेत. परंतु काही महिन्यातच भाजप काँग्रेसला मॅनेज करून ही विधेयके पास करून घेईल हे निश्चित. महाराष्ट्रात विरोधी पक्षाची भूमिका शिवसेना पार पाडत आहे. मनसेचा अवतार समाप्त झाला आहे. काही वर्षांतच राष्ट्रवादी आणि शिवसेनाही संपुष्टात येण्याची शक्यता आहे. डाव्या पक्षांची सद्दी जवळपास संपुष्टात आली आहे. प्रकाश करातांच्या जागी येचुरी येऊनसुद्धा काहीही फरक पडणार नाही. जनता दलाचे छोटे छोटे तुकडे अस्तित्वहीन होण्याच्या मार्गावर असल्याने विलिनीकरण करून धुगधुगी टिकविण्याचा प्रयत्न करीत आहेत. आआपची नाटके व तमाशे सुरूच आहेत. एकंदरीत विरोधी पक्षांची अवस्था दयनीय आहे. विरोधी पक्षांच्या कामगिरीला १० पैकी २ गुण. _________________________________________________________________________________ मोदी सरकारची पावलें योग्य दिशेने पडतांना दिसत आहेत. पुरेसा वेग आलेला नाही कारण लोकांना शिस्तबद्ध रीत्या कामे भराभर उरकीत जाणे हेच ठाऊक नाही. तें अंगवळणी पडण्यास बराच वेळ लागेल. कृतीपेक्षा बडबड अधिक हे ही काही मंत्र्यांच्या/ खासदारांच्या बाबतीत आढळत आहे.त्याला वेसण घालणे आवश्यक आहे. मोदी सरकारची कामगिरी समाधानकारक, विकासाभिमुख आणि प्रामाणिक अशा शब्दात वर्णन करता येईल. गत सरकारच्या नाठाळ कामगिरीच्या पार्श्वभूमीवर या सरकारची कार्यक्षमता अधिकच खुलून दिसते. _________________________________________________________________________________ एक वर्षाच्या कामगिरीसाठी मोदी सरकारला ७/१० गुण. _________________________________________________________________________________
अच्छे दिन
माझी "अच्छे दिन" ची व्याख्या अशी आहे. भ्रष्टाचारमुक्त सरकार, कणखर सरकार, नवीन कल्पना घेऊन आलेले सरकार, इतरधर्मियांचे मतांसाठी लांगूलचालन न करणारे सरकार, पाकिस्तान व चीनसमोर नांगी न टाकता ताठ मानेने उभे राहिलेले सरकार, देशाला आर्थिक उन्नतीच्या मार्गावर न्यायला सुरूवात करणारे सरकार, नागरिकांच्या हिताची काळजी घेणारे सरकार ... असे सरकार सत्तेवर असेल तर अच्छे दिन येण्याची सुरूवात आहे असे मानता येईल. यापूर्वीचे सरकार हे कणाहीन व अकार्यक्षम सरकार होते. ते भ्रष्टाचारात नखशिखान्त बुडलेले होते. माझ्या मते मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून अच्छे दिन येण्याची सुरूवात झाली आहे हे नक्की! _________________________________________________________________________________
तळटीप
विश्वचषक स्पर्धा संपल्यानंतर जवळपास ८ आठवडे मी मिपापासून दूर होतो (राहुल गांधीही एवढाच काळ भारतापासून दूर होते!!!). परत आल्यानंतर हा लेख लिहिला आहे. अजून बरेच मुद्दे आहेत, परंतु विस्तारभयास्तव लेख आटोपता घेतो. वाचकांनी प्रतिसाद दिले तर त्यातील योग्य त्या मुद्द्यांवर प्रतिसाद देईन. जर प्रतिसाद विषयाला धरून असेल, जर प्रतिसाद सभ्य असेल, जर प्रतिसाद योग्य त्या आकडेवारी व वस्तुस्थितीवर आधारीत असेल, तरच उत्तर देईन. जर प्रतिसाद व्यक्तिगत स्वरूपाचा असेल, जर प्रतिसाद उपहासात्मक व कुत्सित टोमणे अशा प्रकारचा असेल, जर प्रतिसाद द्वेषमूलक व पक्षपाती स्वरूपाचा असेल अशा प्रतिसादांकडे दुर्लक्ष केले जाईल. Now shoot _________________________________________________________________________________

प्रतिक्रिया द्या
309978 वाचन

💬 प्रतिसाद (1265)
ज
जेपी Mon, 05/25/2015 - 09:15 नवीन
माझी जागा!!!माझी जागा!!!
त
तुषार काळभोर Mon, 05/25/2015 - 09:29 नवीन
इकडून अन् तिकडून... पुन्हा तेच...
च
चिनार Mon, 05/25/2015 - 09:31 नवीन
विचारपूर्वक आणि यथायोग्य विवेचन ! पण शेती आणि रोजगार या विषयांवर सरकारचे धोरण अजून तितकेशे स्पष्ट नाही असे वाटते. माझ्याकडून सरकारला १० पैकी ७ गुण. तुमच्या अछ्चे दिन च्या संज्ञेशी सहमत ! आता मिपावर तुमची "मोदी भक्त" म्हणून नोंदणी होणार हे निश्चित !! :-)
म
मुक्त विहारि Mon, 05/25/2015 - 09:34 नवीन
पण भारतासारख्या वैविध्यपुर्ण देशाचे नेत्रुत्व स्वीकारणे आणि ते राखणे, हे येरागबाळ्याचे काम नाही.
H
hitesh Mon, 05/25/2015 - 09:45 नवीन
.
स
संदीप डांगे Mon, 05/25/2015 - 10:09 नवीन
सहमत.
↩ प्रतिसाद: hitesh
H
hitesh Mon, 05/25/2015 - 10:30 नवीन
.
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
न
नाखु Mon, 05/25/2015 - 10:37 नवीन
विरोधकांना"आप"लेसे करा असा संदीप भौंचा खाक्या आहे तर !!!!!
चुकार वाचक नाखु
↩ प्रतिसाद: hitesh
स
संदीप डांगे Mon, 05/25/2015 - 11:21 नवीन
कोण विरोधक, कोण समर्थक? सत्ता कुणाचीही असो, सरतेशेवटी माझ्या पदरात काय पडतं हेच मी बघणार. तसेही तटस्थ - निष्पक्ष व्यक्तींच्या परिक्षणांना काही अर्थ असतो. समर्थक किंवा विरोधक यांच्या परिक्षणांना काय किंमत द्यायची हे एक मतदार-नागरिक म्हणून मी ठरवू शकतो. नाही का? असो.
फक्त १२ रूपये भरून २ लाखांचा अपघात विमा देण्याची केंद्र सरकारची नवीन योजना सुरू केल्यापासून पहिल्या ९ दिवसातच ५.५७ कोटी नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. ५० वर्षाखालील नागरिकांना प्रतिवर्ष ३३० रूपये भरून पहिल्या १८ दिवसांतच १.७४ कोटी नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे.
ह्या विमायोजनेची अंमलबजावणी कोणती विमाकंपनी करणार आहे? एलआयसी एजंटकडून आलेल्या एका निरोपानुसार दायची नावाची जापनीज कंपनी हे काम करणार आहे. हे खरे असेल तर भारतीय जीवन विमा निगम ने काय घोडे मारले? पहिल्या १८ दिवसात १.७४ गुणिले ३३० = ५७४.२ कोटी रुपये सरकारने नकळत नागरिकांकडून काढून घेतले आहेत. असेच पुढेही काढत राहणार. ज्याचा कुठलाही हिशोब देणे सरकारला गरजेचे नाही. यावर जाणकारांचे मत अपेक्षीत आहे. काँग्रेसने जसे घोटाळे केलेत तस्सेच घोटाळे भाजप सरकारमधे शोधण्याचा मूर्खपणा मी तरी करणार नाही. इतकी बोंबाबोंब झाल्यावर साधा चोरही आपली शैली बदलतो. कदाचित आता घोटाळे करण्याची नवीच क्लृप्ती असेल जी लक्षात येइस्तोवर खूप वेळ निघून गेला असेल. मूळ मुद्दा माझ्यामते तरी घोटाळे शोधण्यापेक्षा किंवा आकडेवारीचे खेळ खेळण्यापेक्षा सामान्य नागरिकाच्या एकूण राहणीमानात काय फरक पडला हे बघणे रोचक असेल. तेही आता एका वर्षात नाही तर पाच वर्ष झाल्यावरच. अन्यथा असे धागे फक्त प्रचारकी वाटत राहतील. आणि हो, प्रचार काय फक्त निवडणुकीत होत नसतो हे सुज्ञास सांगणे न लगे. त्यामुळे तुमचेच पेपर आणि तुमचेच मार्क ही हितेशची टिप्पणी बरोबर आहे.
↩ प्रतिसाद: नाखु
श
श्रीगुरुजी Mon, 05/25/2015 - 11:26 नवीन
>>> पहिल्या १८ दिवसात १.७४ गुणिले ३३० = ५७४.२ कोटी रुपये सरकारने नकळत नागरिकांकडून काढून घेतले आहेत. असेच पुढेही काढत राहणार. ज्याचा कुठलाही हिशोब देणे सरकारला गरजेचे नाही. यावर जाणकारांचे मत अपेक्षीत आहे. ही योजना सक्तीची नाही. ज्या नागरिकांनी या योजनेसाठी नोंदणी केली आहे त्यांनी स्वसंमतीने पैसे दिले आहेत. त्यामुळे नागरिकांच्या नकळत सरकारने पैसे काढून घेतले आहेत हा निष्कर्ष चुकीचा आहे.
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
क
कहर Mon, 05/25/2015 - 11:50 नवीन
मत मांडण्यापूर्वी एकदा सत्यता पडताळून पहा हि LIC ची अधिकृत संकेत स्थळ… जर दाइचि कंपनी हा विमा करणार असेल तर LIC त्याची जाहिरात स्वताच्या संकेतस्थळावर का करेल … तुमचा हा LIC agent आणि त्याची दाइचि कंपनी whatsapp वर सध्या फ़ेमस आहेत अधिकृत या नावाखाली
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Mon, 05/25/2015 - 12:16 नवीन
मत मांडण्यापूर्वी एकदा सत्यता पडताळून पहा
त्यासाठीच जाणकारांना आवाहन केले आहे, साहेब. मी म्हणतो तेच सत्य असा दावा मी कधीच करत नाही.
↩ प्रतिसाद: कहर
ख
खंडेराव Tue, 05/26/2015 - 11:16 नवीन
बर्याच कंपन्या आहेत, एलायसी बरोबर http://www.newsvoir.com/release/boi-signs-mou-with-the-new-india-assurance-company-ltd-to-offer-pmsby-and-with-star-union-dai-ichi-life-insurance-company-to-offer-pmjjby-4040.html
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
क
कहर Tue, 05/26/2015 - 12:12 नवीन
हो पण कोणत्या कंपनी सोबत करार करायचा हा निर्णय बँकांचा आहे. मोदी नाही ठरवणार. हा आता इतक्या वर्षांच्या व्यवहारानंतरही तुमचा तुमच्या बँकांवर विश्वास नसेल (आणि तुमची बँक दाइचि कि कोणत्या कंपनीसोबत करार करणार असेल) तर राहू दे… नका भाग घेऊ योजनेत …
↩ प्रतिसाद: खंडेराव
ख
खंडेराव Wed, 05/27/2015 - 09:17 नवीन
माझे म्हणने येवढ्यावरच मर्यादित होते कि फक्त LIC नाहिये, इतरही अनेक कंपन्या सहभागी आहेत.
↩ प्रतिसाद: कहर
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 05/27/2015 - 10:33 नवीन
"१२ रुपये प्रति वर्ष या दराने २ लाखाचा विमा" ही प्रस्तुती (ऑफर) विमाकंपनीसाठी बराच धोक्याचा व्यवहार आहे. जास्त धोकादायक प्रस्तूतीं असलेल्या विम्यासाठी विमाकंपन्या नेहमीच संघ (कंसॉर्टियम) स्थापन करतात... या पद्धतीत, धोका सहयोगी कंपन्यांत विभागल्या गेल्यामुळे, एखाद्या धोकादायक प्रस्तूतीमुळे, प्रस्तूती देणारी विमाकंपनी बुडीत जाण्याची शक्यता फार कमी/नगण्य होते. ही पद्धत जगभर फार पूर्वीपासून वापरली जात आहे. थोड्या काळापूर्वीपर्यंत भारतात विमा ही सरकारची मक्तेदारी आणि म्हणून अत्यंत अविकसित उद्योग असल्याने ही पद्धत भारतात नविन आहे व जनता याबाबतीत अनभिज्ञ आहे.
↩ प्रतिसाद: खंडेराव
प
प्रसाद१९७१ Wed, 05/27/2015 - 11:35 नवीन
१२ रुपया मधे प्रोसेसिंग कॉस्ट तरी कव्हर होइल का? एकतर सरकार मोठ्या प्रमाणावर सबसीडी देत असणार विमा कंपन्यांना,किंवा हे नुस्ते दिखावू आहे.
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 05/27/2015 - 20:10 नवीन
जेव्हा कस्टमर बेस प्रचंड मोठा असतो (जो काही दशकोटी होणे अपेक्षित आहे) तेव्हा "इकॉनॉमी ओफ स्केल" नावाच्या तत्वावर आधारीत एखादा वरवर तोट्यात वाटणारा व्यवसाय/प्रस्तूती प्रत्यक्षात फायद्यात आणू शकते. भारतातील (अ) वाढत असलेले आयुष्यमान, (आ) सुधारत असलेल्या आरोग्यसेवा, (इ) काही दशकोटींची ग्राहकसंख्या आणि (ई) विमाकंपन्यांचा संघ; या चार गोष्टी ही विम्याची प्रस्तूती यशस्वी ठरण्यास मदत करणार्‍या आहेत. याशिवाय, या कंपनीसंघात केवळ भारतिय आयुर्विमा ही सरकारी कंपनी नसून इतर खाजगी आंतरराष्ट्रिय कंपन्या असण्याने सबसिडीची शक्यता नाही. व्यवहारी, तार्कीक आणि सारासार विचाराकडे दुर्लक्ष करून केवळ राजकीय विरोधासाठी विरोध करायचा असला तर भारतिय लोकशाहीमध्ये तसा कांगावा करायची मुभा आहे... आणि तिचे अवास्तव प्रदर्शन ही काही आपल्याला नवी गोष्ट नाही... पण मला त्यात रस नाही... तेव्हा चालू द्या :)
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
व
विनोद१८ गुरुवार, 05/28/2015 - 09:45 नवीन
व्यवहारी, तार्कीक आणि सारासार विचाराकडे दुर्लक्ष करून केवळ राजकीय विरोधासाठी विरोध करायचा असला तर भारतिय लोकशाहीमध्ये तसा कांगावा करायची मुभा आहे... आणि तिचे अवास्तव प्रदर्शन ही काही आपल्याला नवी गोष्ट नाही... पण मला त्यात रस नाही... तेव्हा चालू द्या :)
मला वाटते आता तरी प्रकाश पडावा ???
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
क
कहर Wed, 05/27/2015 - 11:38 नवीन
मग मी तरी कोठे म्हणले फक्त LIC आहे. तुम्ही म्हनला -
ह्या विमायोजनेची अंमलबजावणी कोणती विमाकंपनी करणार आहे? एलआयसी एजंटकडून आलेल्या एका निरोपानुसार दायची नावाची जापनीज कंपनी हे काम करणार आहे. हे खरे असेल तर भारतीय जीवन विमा निगम ने काय घोडे मारले ?
म्हणून मी सांगितले कि LIC आहे. इतकेच ..
↩ प्रतिसाद: खंडेराव
प
प्रसाद१९७१ Mon, 05/25/2015 - 11:53 नवीन
फक्त १२ रूपये भरून २ लाखांचा अपघात विमा देण्याची केंद्र सरकारची नवीन योजना सुरू केल्यापासून पहिल्या ९ दिवसातच ५.५७ कोटी नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. ५० वर्षाखालील नागरिकांना प्रतिवर्ष ३३० रूपये भरून पहिल्या १८ दिवसांतच १.७४ कोटी नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे.
@श्रीगुरुजी - ह्या योजनेतुन जेंव्हा खरे क्लेम चे पैसे मिळतील तेंव्हा ह्या योजनेचा लाभ घेतला आहे असे म्हणता येइल.
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
क
काळा पहाड Mon, 05/25/2015 - 12:00 नवीन
कै च्या कै
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
श
श्रीगुरुजी Mon, 05/25/2015 - 14:12 नवीन
>>> @श्रीगुरुजी - ह्या योजनेतुन जेंव्हा खरे क्लेम चे पैसे मिळतील तेंव्हा ह्या योजनेचा लाभ घेतला आहे असे म्हणता येइल. बरोबर आहे. ह्या योजना सुरू होऊन अजून एक महिनासुद्धा झालेला नाही. अजून काही महिन्यांनंतर या योजनांच्या व्यवहार्यतेचा/अव्यवहार्यतेचा अंदाज येईल. तोपर्यंत जरा वाट पाहूया.
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 05/27/2015 - 10:39 नवीन
ह्या योजनेतुन जेंव्हा खरे क्लेम चे पैसे मिळतील तेंव्हा ह्या योजनेचा लाभ घेतला आहे असे म्हणता येइल. ही ही ही... विनोद बरा होता =))
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
G
gogglya Fri, 06/05/2015 - 15:50 नवीन
आता कोणी तरी मरण्याची वाट बघायाची का ?
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
म
मृत्युन्जय Tue, 05/26/2015 - 06:42 नवीन
पहिल्या १८ दिवसात १.७४ गुणिले ३३० = ५७४.२ कोटी रुपये सरकारने नकळत नागरिकांकडून काढून घेतले आहेत. असेच पुढेही काढत राहणार. ज्याचा कुठलाही हिशोब देणे सरकारला गरजेचे नाही. यावर जाणकारांचे मत अपेक्षीत आहे. हा जो काही विमा आहे तो विमा कंपनी फुकट देणार आहे का? की हे जमवलेले पैसे विमा कंपनीला जातील? जर हे विमा कंपनीला जाणार असतील (त्यांनाच जाणार आहेत हे तर नक्कीच) तर उगाच उचलली जीभ आणी लावली टाळ्याला असे कशाला? १२ रुपयात विमा कोण देते? जर सरकार देत असेल (देत असेल म्हणजे मिळवुन देत असेल) तर अश्या प्रत्येक उत्पन्नाचा सरकारने वेगळा हिशोब कशाला द्यायला हवा?
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
च
चिनार Tue, 05/26/2015 - 06:49 नवीन
सहमत ! यांना अब्जो -खरबो रुपयांचे हिशोब नको आहेत. पण सरकारने विमा देण्यासाठी जमा केलेल्या पैशांचा हिशोब हवाय..आणि तो सुद्धा निधी जमा झाल्यापासून एका महिन्यात ! आणि क्लेम चे पैसे मिळणार नाहीतच हे यांनी आधीच गृहीत धरलंय..
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
श
श्रीगुरुजी Tue, 05/26/2015 - 10:29 नवीन
>>> हा जो काही विमा आहे तो विमा कंपनी फुकट देणार आहे का? की हे जमवलेले पैसे विमा कंपनीला जातील? जर हे विमा कंपनीला जाणार असतील (त्यांनाच जाणार आहेत हे तर नक्कीच) तर उगाच उचलली जीभ आणी लावली टाळ्याला असे कशाला? एलआयसी, बजाज, एटना इ. पैकी कोणती विमा कंपनी फुकट विमा देते का? इतर विम्यांप्रमाणे हा विमासुद्धा फुकट नसून त्याला वार्षिक ३३० रूपये प्रिमियम आहे. प्रिमियमचे गोळा केलेले पैसे विमाकंपनीकडेच जातात. "उचलली जीभ आणि लावली टाळ्याला" म्हणजे नक्की काय म्हणायचे आहे ते जरा स्पष्ट करा. >>> १२ रुपयात विमा कोण देते? जर सरकार देत असेल (देत असेल म्हणजे मिळवुन देत असेल) तर अश्या प्रत्येक उत्पन्नाचा सरकारने वेगळा हिशोब कशाला द्यायला हवा? हे सरकार प्रतिवर्ष १२ रूपये प्रिमियमच्या बदल्यात २ लाखांचा अपघाती विमा देत आहे. अश्या प्रत्येक उत्पन्नाचा सरकारने वेगळा हिशेब द्यायचा म्हणजे नक्की काय करायचं ते जरा स्पष्ट करा.
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
म
मृत्युन्जय Tue, 05/26/2015 - 11:12 नवीन
गुर्जी तुम्ही माझ्या प्रतिसादाला प्रत्युत्तर का करत आहात? ते संदीप डांगे यांनी विम्याच्या मुद्द्याबद्दल जे लिहिले आहे त्याला प्रतिवाद आहे. तुम्ही माझेच मुद्दे वेगळ्या भाषेत मांडत आहात.
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Tue, 05/26/2015 - 11:16 नवीन
आज इथे इतके प्रतिसाद आलेत की हा प्रतिसाद लिहिताना जरा घोटाळा झाला. क्षमस्व.
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
च
चिनार Mon, 05/25/2015 - 10:36 नवीन
नव्हे..मार्क द्यायला साक्षात बृहस्पतीने ज्यांची ट्युशन लावावी अशा श्री श्री राहुल गांधी यांना बोलावले आहे. त्यांचं कॅंडी क्रश खेळून झाला की ते येतीलच !
↩ प्रतिसाद: hitesh
अ
अदि Mon, 05/25/2015 - 10:21 नवीन
सुरेख विश्लेषण..
प
प्रसाद१९७१ Mon, 05/25/2015 - 11:48 नवीन
@ श्रीगुरुजी - तुमचे भाजपप्रेम माहीती असुन सुद्धा, एक वर्षपूर्ती बद्दल, सरकारच्या कामगिरी ( ? ) बद्दल धागा काढणे म्हणजे तुम्ही फारच धाडसी आहात. प्रेम आंधळे असते असे म्हणतात त्याचा हा एक पुरावा होऊ शकतो.
क
काळा पहाड Mon, 05/25/2015 - 12:02 नवीन
हा धाडसी पणा कसा बुवा? सरकारनं काम तर केलेलंच आहे.
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
प
प्रसाद१९७१ Mon, 05/25/2015 - 12:10 नवीन
अहो तोंड लपवून फिरायची गरज असताना छाती पुढे काढुन असला घागा काढणे म्हणजे धाडसच नाही का?
↩ प्रतिसाद: काळा पहाड
क
काळा पहाड Mon, 05/25/2015 - 14:59 नवीन
तोंड लपवून फिरायची गरज असताना
कशाबद्दल बरं? सरकारनं सुरवात अतिशय चांगली केलेली आहे. सगळ्या गोष्टी एका वर्षात साध्य होतील असा तुमचा समज असेल तर तुम्ही फारच आशावादी लोकांपैकी आहात. भारत हा एक अतिप्रचंड देश आहे आणि त्याला 'पळवायला' वेळ लागतो. या वर्षी गियर बदलून दुसर्‍या गियर मध्ये जाण्याची गरज आहे आणि त्यासाठी फॉरिन इन्व्हेस्टमेंट्स खरोखरंच प्रत्यक्षात येण्याची गरज आहे. बाकी तुम्ही हे तोंड लपवून वगैरे एका मिपा सदस्याला बोलत नसाल अशी आशा आहे.
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
म
माईसाहेब कुरसूंदीकर Mon, 05/25/2015 - 12:03 नवीन
वाचतेय.लेख प्रचारकी थाटाचा आहे हे मान्य पण नरेंद्रने,सरकारने काहीच केले नाही हा आंधळा विरोध झाला.विमा,पायाभूत प्रकल्प्,अवजड औद्योगिक प्रकल्प नेटास न्यायचे तर बराच वेळ हवा.भ्रष्टाचार आपल्या रक्तात आहे, अगदी गरीबापासून ते श्रीमंतापर्यंत.तो जायला कालावधी लागेल पण पैसे खाताना बाबू लोकांनी,पुढार्यानी दहा वेळा विचार केला,त्यांना कोणाचीतरी दहशत बसली तर खूप झाले. चांगल्या दिशेने प्रयत्न चालू आहेत व अजून तरी भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेत येत नाही आहेत हे पाहता आमच्यातर्फे सरकारला १० पैकी ६ गुण.
अ
अद्द्या Mon, 05/25/2015 - 12:39 नवीन
लेख प्रचारकी थाटाचा आहे हे मान्य पण नरेंद्रने, सरकारने काहीच केले नाही हा आंधळा विरोध झाला काय फालतूपणा आहे . इतर लोकांना , इथल्या लोकांना आपण एकेरी हाक मारता . . लोक ते चालवून पण घेतात . .का आणि कसं ते नाही माहित पण कमीतकमी पंतप्रधान पदावर बसलेल्या माणसाला तरी आदरार्थी वापरा . . एवढी साधी गोष्ट कळत नाही का ?
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
व
विनोद१८ Mon, 05/25/2015 - 13:14 नवीन
भले लेख प्रचारकी थाटाचा असेल तुमच्या मते, पण त्यामधले मुद्दे जर तथ्यहीन असतील तर त्यांना मुद्देसुद प्रतिवाद करा / खोडुन काढा. नुसते 'लेख प्रचारकी थाटाचा आहे' असे म्हणुन कसे चालेल ??
↩ प्रतिसाद: अद्द्या
क
काळा पहाड Mon, 05/25/2015 - 14:51 नवीन
मराठेसाहेब, माई ब्रम्हदेवांना थोडंसं ज्युनियर आहेत. त्या देवांना पण इंद्र्या, नारद्या असं बोलू शकतात. :)
↩ प्रतिसाद: अद्द्या
अ
अद्द्या Mon, 05/25/2015 - 18:52 नवीन
त्यांना मग बाल संस्कार शिबिरात भारती करण्यात यावे :)
↩ प्रतिसाद: काळा पहाड
च
चिनार Tue, 05/26/2015 - 05:18 नवीन
ह्ह्पुवा !!!
↩ प्रतिसाद: काळा पहाड
य
यमगर्निकर Mon, 05/25/2015 - 12:10 नवीन
मोदिंचे काम बघुन पहिल्यांदा कोणीतरि देशासाठि काहितरि चांगले करत आहे असे वाटते, पण गेली ५० वर्षे ज्या सरकार ने देशाला मागास ठेवले लोकांना अज्ञानत ठेउन ५० वर्षे देशाला अक्षरशः लुटले आणि गेल्या १० वर्षात पुर्ण निष्प्रभ ठरले त्यावेळि त्या सरकार वर टिका करण्यासठि काहि लोकांच्या कंठतुन शब्द फुटत नव्हते तेच लोक गेल्या सरकार ने केलेल्या कामापेक्षा कितितरि पटिने चांगले काम मोदि सरकार ने गेल्या १ वर्षात करुन सुद्धा टिका करतात ह्याचे खुपच आश्चर्य वाटते आहे. मोदि सरकारला निदान ५ वर्षे व्यवस्थित काम करण्यासाठि दिलि पहिजे.
ख
खंडेराव Mon, 05/25/2015 - 14:11 नवीन
वेळ मिळेल तशी उत्तरे द्यायचा प्रयत्न करेलच आपल्या आकडेवारीवर. भरपुर लिहिले आहे आपण. अभिनंदन. सध्या फक्त पहिल्या मुद्द्याचे उत्तर देतो.
२०१३-१४ हे आर्थिक वर्ष संपताना भारताकडे ३०४ अब्ज डॉलर्सचा परकीय चलनाचा साठा होता. २०१४-१५ हे आर्थिक वर्ष संपताना भारताकडे ३४१ डॉलर्सचा परकीय चलनाचा साठा होता. एका वर्षात परकीय चलनाची गंगाजळी १२% टक्क्यांनी वाढली.
अर्थशास्त्राच्या कोणत्याही सिद्धांतानुसार हे रिसर्वस जर सर्व ठिक चालले असेल, तर दरवर्षी वाढलेच पाहिजेत. आता, आपण मागच्या तेरा वर्षांचा हिशोब करुयात. हे आकडे मी data.gov.in वरुन घेतले आहेत, अ॓नालिसिस मी स्वतः केलाय. 2002 29 2003 40 2004 49 2005 26 2006 7 2007 32 2008 55 2009 -20 2010 5 2011 7 2012 -6 2013 -1 2014 6 मागिल वर्षाच्या तुलतेत गंगाजळीमधे झालेली वाढ ( उदा, २०१४ मधे २०१३ पे़क्षा ६ टक्के वाढली, २००८ मधे ५५ % ). या सर्व वर्षांचा अ‍ॅवरेज १७% आहे. सगळ्यात जास्त वाढ ही ५५% तर कमी ही वजा २०% आहे. २००१ ते २०१४ मधे ७००% एकुन वाढ झाली आहे. त्यामुळे १२% ( तुम्ही म्हणताय ते ) हा काही इंडिकेटर धरता येणार नाही कामगिरिचा मोदी सरकारच्या, तसे पाहिले तर तो सरासरीपेक्षा कमीच आहे :-) आणि, आकडा चुकलाय तुमचा. तुम्ही ज्याला परकीय चलनाची गंगाजळी म्हणताय त्यात सोने आणि इतरही समाविष्ट आहे. मी ते पकडुनही हिशोब केला, सरासरी १८.५% येते २००१ ते २०१४ ची. कोणताही आकडा हा तुलनेत कमी किंवा जास्त असतो. १२% वाढली याला तुम्ही मागचा डाटा बघितला नसेल तर काही किंमत नसते.
श
श्रीगुरुजी Mon, 05/25/2015 - 14:56 नवीन
तुमच्या वरील आकडेवारीनुसार जर आपण २००९ ते २०१३ या ५ वर्षांची सरासरी काढली तर ती सरासरी -३ % इतकी कमी येते. जर २००४ ते २०१३ या १० वर्षांची सरासरी काढली तर ती सरासरी १५.४ % टक्के इतकी येते. त्यामुळे तुलना करताना आपण कोणती कक्षा वापरत आहोत यावर आपला निष्कर्ष अवलंबून असतो. गेल्या १ वर्षात परकीय चलनाच्या गंगाजळीत ३७ अब्ज डॉलर्सची वाढ झाली. ही वाढ गेल्या वर्षाच्या तुलनेत किती टक्क्यांनी वाढली, गेल्या २ वर्षांच्या तुलनेत किती टक्क्यांनी वाढली, गेल्या ५ वर्षांच्या तुलनेत किती टक्क्यांनी वाढली, गेल्या १० वर्षांच्या तुलनेत किती टक्क्यांनी वाढली, १९९१ पासून किती टक्क्यांनी वाढली इ. आकडेवारी तपासून वेगवेगळे तक्ते काढता येतील व त्यातून आपल्याला हवा तो निष्कर्ष काढता येईल.
↩ प्रतिसाद: खंडेराव
ख
खंडेराव Tue, 05/26/2015 - 07:01 नवीन
तुमच्या वरील आकडेवारीनुसार जर आपण २००९ ते २०१३ या ५ वर्षांची सरासरी काढली तर ती सरासरी -३ % इतकी कमी येते.
हो, म्ह्णुनच गेल्या १४ वर्षांची दिलिये माहिती.
त्यामुळे तुलना करताना आपण कोणती कक्षा वापरत आहोत यावर आपला निष्कर्ष अवलंबून असतो.
मान्य केल्याबद्दल धन्यवाद. तुमचा काढलेला निष्कर्ष सर्व कक्षांमधे चुकीचा आहे.
जर २००४ ते २०१३ या १० वर्षांची सरासरी काढली तर ती सरासरी १५.४ % टक्के इतकी येते.
हो, १२ पेक्षा जास्त. आणि त्यात मधे एक जागतिक मंदी ही येउन गेली.
गेल्या १ वर्षात परकीय चलनाच्या गंगाजळीत ३७ अब्ज डॉलर्सची वाढ झाली. ही वाढ गेल्या वर्षाच्या तुलनेत किती टक्क्यांनी वाढली, गेल्या २ वर्षांच्या तुलनेत किती टक्क्यांनी वाढली, गेल्या ५ वर्षांच्या तुलनेत किती टक्क्यांनी वाढली, गेल्या १० वर्षांच्या तुलनेत किती टक्क्यांनी वाढली, १९९१ पासून किती टक्क्यांनी वाढली इ. आकडेवारी तपासून वेगवेगळे तक्ते काढता येतील व त्यातून आपल्याला हवा तो निष्कर्ष काढता येईल.
इतके करायची गरज नाही हो. सफरचंदाची केळ्याशी तुलना करु नका म्हणजे बस्स्.
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Tue, 05/26/2015 - 11:00 नवीन
>>> मान्य केल्याबद्दल धन्यवाद. तुमचा काढलेला निष्कर्ष सर्व कक्षांमधे चुकीचा आहे. कोणत्या कक्षेमध्ये चुकीचा आहे? तुलना मागील वर्षाशी करायची का मागील ५ वर्षांशी करायची का मागील १० वर्षांशी करायची ते आधी ठरवा. पहिलीत ९९% गुण मिळविलेल्या मुलाला ११ वीत ७५% टक्के मिळाले व १२ वीत ८५% टक्के मिळाले तर त्याच्या कामगिरीची तुलना पहिलीच्या गुणांशी करणार का ११ वी च्या गुणांशी करणार का १ ली ते ११ वी च्या गुणांची सरासरी काढून त्याच्याशी तुलना करणार? >>> इतके करायची गरज नाही हो. सफरचंदाची केळ्याशी तुलना करु नका म्हणजे बस्स्. तुम्हाला कोणते आकडे सफरचंद वाटले आणि कोणते केळे ते एकदा स्पष्ट करा.
↩ प्रतिसाद: खंडेराव
ख
खंडेराव Tue, 05/26/2015 - 12:45 नवीन
तुम्ही एक अचिवमेंट म्हणुन एक आकडा देताय. १२ टक्के. त्याला माझे उत्तर असे, कि, मागिल वर्षाच्या तुलतेत गंगाजळीमधे झालेली वाढ ( उदा, २०१४ मधे २०१३ पे़क्षा ६ टक्के वाढली, २००८ मधे ५५ % ). या सर्व वर्षांचा अ‍ॅवरेज १७% आहे. सगळ्यात जास्त वाढ ही ५५% तर कमी ही वजा २०% आहे. २००१ ते २०१४ मधे ७००% एकुन वाढ झाली आहे. त्यामुळे १२% ( तुम्ही म्हणताय ते ) हा काही इंडिकेटर धरता येणार नाही कामगिरिचा मोदी सरकारच्या, तसे पाहिले तर तो सरासरीपेक्षा कमीच आहे :-)
तुम्हाला कोणते आकडे सफरचंद वाटले आणि कोणते केळे ते एकदा स्पष्ट करा.
हे खालचे
गेल्या १ वर्षात परकीय चलनाच्या गंगाजळीत ३७ अब्ज डॉलर्सची वाढ झाली. ही वाढ गेल्या वर्षाच्या तुलनेत किती टक्क्यांनी वाढली, गेल्या २ वर्षांच्या तुलनेत किती टक्क्यांनी वाढली, गेल्या ५ वर्षांच्या तुलनेत किती टक्क्यांनी वाढली, गेल्या १० वर्षांच्या तुलनेत किती टक्क्यांनी वाढली, १९९१ पासून किती टक्क्यांनी वाढली इ. आकडेवारी तपासून वेगवेगळे तक्ते काढता येतील व त्यातून आपल्याला हवा तो निष्कर्ष काढता येईल.
सफरचंद/केळे : Apple to apple comparision
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Tue, 05/26/2015 - 16:09 नवीन
>>> त्यामुळे १२% ( तुम्ही म्हणताय ते ) हा काही इंडिकेटर धरता येणार नाही कामगिरिचा मोदी सरकारच्या, तसे पाहिले तर तो सरासरीपेक्षा कमीच आहे :-) पण तो २००९ ते २०१३ या वर्षांच्या सरासरीपेक्षा जास्त आहे ना! आणि मागील वर्षीपेक्षा पण जास्त आहे ना!! आणि तो तुम्हाला इंडिकेटर धरायचा नसेल तर नका धरू. परंतु मागील वर्षात त्यापूर्वीच्या वर्षाच्या तुलनेत १२% इतकी वाढ झाली आहे ही वस्तुस्थिती लपत नाही.
↩ प्रतिसाद: खंडेराव
म
मृत्युन्जय Wed, 05/27/2015 - 07:15 नवीन
तुमच्या दोघांचेही प्रतिवाद उत्तम आहेत. खंडेरावांचा प्रतिवाद इथे थोडा तोकडा पडतो माझ्या दृष्टीने. ममो सरकारची पहिल्या ५ वर्षातली कामगिरी तशी नक्कीच बरी होती. मार जास्त दुसर्‍या टर्म मध्ये खाल्ला. तिथे इतकी घाण करु ठेवली की लोकांचा भारताबद्दल दृष्टीकोनच बदललला. आणि शेवटच्या २ वर्षात तर फारच घाण केली. ती अजुनही निस्तरायला लागत आहे. त्यामुळे तुलना तिथेच होउ शकते.
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा