जनातलं, मनातलं

पहिल्या मराठी विश्व साहित्य संमेलनाध्यक्षांची 'मिसळपावसाठी' एक धावती मुलाखत

Primary tabs

डॊ.गंगाधर पानतावणे          डॊ.गंगाधर पानतावणे आणि प्राचार्य ठाले पाटील
डॉ.गंगाधर पानतावणे    सोबत प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील

अमेरिकेत होणार्‍या पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रख्यात साहित्यिक, विचारवंत व समीक्षक डॉ. गंगाधर पानतावणे यांची आम्ही दि. २३/०८/०८ ला भेट घेतली. अभिनंदनाच्या गराड्यात आणि नेहमीच्या व्यस्त कार्यक्रमात मिसळपाव मराठी संस्थळासाठी त्यांची एक धावती मुलाखत.

परिचय : डॉ. गंगाधर विठोबाजी पानतावणे, (जन्म: २८ जून १९३७ )
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबादला मराठी विभाग प्रमुख म्हणुन ९७ ला सेवानिवृत्त झाले. आंबेडकरी विचार लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी १९६८ साली 'अस्मितादर्श' त्रैमासिक सुरु केले जे आजही चालु आहे. वैचारिक, सामाजिक अधिष्ठान, असलेले ' अस्मितादर्श' महाराष्ट्र आणि देशभरातील लेखक, कवी, समीक्षक,संशोधक, यांचे विचारमंच ठरले.

मूल्यवेध, विद्रोहाचे पाणी पेटले आहे, दलितांचे प्रबोधन, मूकनायक, वादळाचे वंशज, प्रबोधनाच्या दिशा, पत्रकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, हलगी, चैत्य, लेणी, इत्यादी ग्रंथसंपदा डॉ. पानतावणे यांच्या नावावर आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने पहिल्या अखिल विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणुन आपली एकमताने निवड झाली. त्याबद्दल प्रथम अभिनंदन !!! सर, काय भावना आहेत या प्रसंगी.

'खूपच आनंद झाला. गेल्या अनेक वर्षापासून जी साहित्यसेवा चालू आहे, त्याचा हा गौरव आहे. मराठी साहित्य, संशोधन, दलित साहित्य, दलित चळवळ यांचा गौरव आहे. तसेच एकमताने झालेल्या निवडीचा मनस्वी आनंद होत आहे. त्याचबरोबर साहित्य आणि साहित्य व्यवहाराबरोबर, साहित्यातील दिग्गज मंडळी, दलित साहित्य चळवळ, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जोपासले आणि ते सर्वांसमोर मांडले आ़ज त्यांची आठवण होत आहे.

अस्मितादर्श आणि नवोदितांना दिलेली संधी..... जेष्ठ साहित्यिक, विचारवंत म्हणुन आपली निवड आहे, काय वाटते. ?

'अस्मितादर्शचा' प्रवास गेली ३४ वर्ष अव्याहतपणे चालु आहे, त्यातुन अनेक नवे साहित्यिक घडु शकले. या पाठीमागे प्रेरणा आणि उर्जा आहे ती, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची. त्यांच्या विचारांविषयी मी कृतज्ञता व्यक्त करतो. माझी निवड ही सर्व लेखन प्रकारातील मराठी साहित्यिकांचा सन्मान समजतो. मराठी साहित्य जगातील इतर साहित्याचे तोडीचेच आहे, म्हणुन त्याची ही पावती आहे.

जागतिकीकरण, ...उदारीकरण...खाजगीकरण, माहितीतंत्रज्ञान याचा परिणाम मराठी साहित्यावर होत आहे का ?

जागतिक प्रभावरेट्यांमुळे जे जे बदल होत जातात त्याचा परिणाम साहित्यावर होतो. मात्र साहित्यातील चिरंतनमुल्य बदलत नसतात. विविध क्षेत्रातील ताण्-तणाव नव्या स्वरुपात येतील. संगणक आलं, संगणकाचा परिणाम जीवनावर होतो. आणि जीवनाचं दर्शन तर साहित्य घडवतं. मग त्याचे जे काय परिणाम असतील ते तर समोर येणारच आहेत. कुसुमाग्रजांनी जवळजवळ ४०-४५ च्या काळामधे एक कादंबरी लिहिली होती. त्याच्यामधे माणसं ही पृथ्वीला प्रदक्षीणा घालताहेत अशी कल्पना त्यांनी केली होती. हे प्रत्यक्षात आलं वीस-पंचवीस वर्षांनी. तेव्हा असं होतं..... लेखक जो काही लिहित असतो, तो जी काही कल्पना करतो. ते कधी-कधी वास्तवात सुद्धा येतं.

तेव्हा त्याचा संबंध हा अपरिहार्यपणे येणारच, तंत्रज्ञानक्षेत्रातील मंडळी असो, त्यांचे अनुभव असो, जागतिकीकरण असो... ज्याचे-ज्याचे परिणाम मानवी जीवनावर होतात, ते ते सर्व साहित्यामधून आलं पाहिजे. साहित्य हे मानवी जीवनाचं दर्शन घडवतं, तेव्हा स्वाभाविकपणे त्याचे प्रतिबिंब साहित्यात उमटेल.

विश्वसाहित्य संमेलनात आपण कोणती भुमिका मांडणार आहात ?

गेली चाळीस-पन्नास वर्षात जी परिवर्तने झालीत. विवक्षीत वर्तुळातून साहित्य बाहेर आले. मूक अनुभव व्यक्त होऊ लागले. त्याबरोबर कसदार साहित्याची चर्चा आणि देवाण-घेवाण या निमित्ताने करता येईल.

सर, मिसळपाव आणि तत्सम संकेतस्थळांवर लेखन करणारी जी लेखक मंडळी आहेत, उच्च दर्जाचे लेखन करुनही त्यांच्या लेखनाची नोंद साहित्यिक, समीक्षक दखल घेतांना दिसत नाही, असं मला वाटतं !

'विज्ञान कथा जेव्हा आल्या, तेव्हा प्रारंभी विज्ञान कथांकडे दुर्लक्षच झाले. मग ते लक्ष्मण लोंढे असतील, जयंत नारळीकर असतील, या लोकांनी विज्ञान कथा लिहिल्या. पण कालांतराने आपल्या लक्षात येते की त्यांच्या कथांचा विज्ञान कथा म्हणुन समावेश साहित्यामधे झाला आणि त्याची दखल घेतली गेली. इंटरनेटवरील लेखनाचा साहित्यविषयक लेखनाचा काळ फार थोडासा आहे, त्याची दखल साहित्याला घ्यावी लागेल.

सर, भावुकतेने अंत:करणात जपून ठेवलेले काही क्षण ?

१९४६ साली मी पहिल्यांदा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना पाहिले आणि त्यांचे मराठीतले ओजस्वी भाषण ऐकले त्यानंतर अनेकदा त्यांची भाषणे ऐकण्याची संधी मिळाली. १९५४ साली माउंट हॉटेलमधे बाबासाहेबांच्या जयजयकाराने विद्यार्थ्यांनी परिसर दणाणून टाकला. त्यावेळी ते आमच्याशी बोलले मी समोर होतो. ते मला म्हणाले ' तू काय करतोस ? मी म्हणालो, 'मी विद्यार्थी आहे, दहावीला आहे मग ते आम्हा सर्वांना उद्देशून म्हणाले, तुम्ही विद्यार्थी आहात. अभ्यासाकडे लक्ष द्या. 'less diet, study hard' असे बाबासाहेब म्हणत त्याचा पुनः एकदा प्रत्यय आला. आणि एकदा त्यांना वंदन करता आले. असे अनेक क्षण अतिशय भावुकतेने अंत:करणात जपून ठेवले आहेत.

नवीन लेखन करणा-यांसाठी काही संदेश ?

'संदेश काही नाही. प्रामाणिकपणे लिहिले पाहिजे. सच्चे अनुभव हे कधीही साहित्यापासून दूर राहात नसतात. दूर राहू नये. तेव्हा जे लिहायचे असेल त्यात आंतरिक उमाळा असावा. खोटेपणाने तुम्ही साहित्यनिर्मिती करु लागला तर त्याचा खोटेपणा उघड होतो. पितळ हे तुम्ही कितीही सोनं म्हटलं तर ते सोनं होत नाही. तसं साहित्याचे सुद्धा आहे.

धन्यवाद सर....!!!

( अजून खूप विचारायचे होते, गप्पा मारायच्या होत्या, पण अभिनंदनासाठी ताटकळलेली मंडळी पाहता गप्पा आवरत्या घेतल्या. मुलाखत भ्रमनध्वनीत रेकॉर्ड करुन नंतर लिहिलेले आहे,त्यामुळे चुभुदेघे. )
पुस्तके     सन्मान

सरांचे, स्वतःचे भव्य ग्रंथालय आहे. संशोधन कार्यासाठी अनेक प्राध्यापकांना, विद्यार्थ्यांना ती एक मेजवानी असते. विविध सन्मानचिन्ह, मानपत्रांनी सरांचे घर भरुन गेले आहे.

प्रियाली

लहानशी मुलाखत आवडली. मिसळपाव स्पेशल झाली की.

इंटरनेटवरील लेखनाचा साहित्यविषयक लेखनाचा काळ फार थोडासा आहे, त्याची दखल साहित्याला घ्यावी लागेल.

वाह! योग्य बोलले.

सहज

छोटेखानी मुलाखत आवडली सर.

धन्यवाद!

मराठी साहित्य जगातील इतर साहित्याचे तोडीचेच आहे, म्हणुन त्याची ही पावती आहे.
मराठी साहीत्य महान म्हणुन डॉ. पानतावणे यांची मराठी संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली?? समजले नायं

चतुरंग

पानतावण्यांशी झालेला छोटासा संवाद आवडला. छायाचित्रांसह दिलात त्यामुळे जास्त आपुलकीचा वाटला! धन्यवाद!

इंटरनेटवरील लेखनाचा साहित्यविषयक लेखनाचा काळ फार थोडासा आहे, त्याची दखल साहित्याला घ्यावी लागेल.

हे ते लाख बोलले, कर्मण्येवाधिकारस्ते!

चतुरंग

इंटरनेटवरील लेखनाचा साहित्यविषयक लेखनाचा काळ फार थोडासा आहे, त्याची दखल साहित्याला घ्यावी लागेल.
अगदी पटले.
पानतावण्यांशी झालेला छोटासा संवाद आवडला.
स्वाती

ऋषिकेश

हेच म्हणतो
छोटेखानी मुलाखत आवडली

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

लिखाळ

छान मुलाखत !
आपल्याला अशी संधी मिळाली आणि लगेच आपण तीचा योग्य सुंदर वापर केलात. आपले अभिनंदन. संकेतस्थळांवरील साहित्याबद्दल प्रश्न विचारल्याबद्दल आभार.

अवांतर : विश्व मराठी साहित्यसंमेलनासाठी त्यांची निवड झाली आहे ना ! त्यांच्या या वाक्याचा काही अर्थ लागला नाही .. ''माझी निवड ही सर्व लेखन प्रकारातील मराठी साहित्यिकांचा सन्मान समजतो. मराठी साहित्य जगातील इतर साहित्याचे तोडीचेच आहे, म्हणुन त्याची ही पावती आहे. ''

--लिखाळ.

मराठी साहित्य हे जागतिक साहित्याचे तोडीचे आहे, म्हणजे मराठी साहित्य, साहित्यिक हा सुद्धा वैश्विक जाणिवेचे आहे, तो लिहु शकतो. म्हणुन डॉ. पानतावणे यांची निवड ही वयक्तिक असली तरी ती निवड सर्व मराठी साहित्यिकांची आहे, ती वैश्विक आहे. म्हणुन त्या सर्वांचा तो सन्मान म्हणुन माझी निवड असे म्हणायचे असावे, असे वाटते.

लिखाळ

डॉ. साहेब,
स्पष्टीकरणासाठी आभार.
--लिखाळ.

विकास

धन्यवाद सर!

माहीतीपूर्ण. छोटेखानी असल्यामुळे एकदम छान वाटली!

वैद्य (verified= न पडताळणी केलेला)

मुलाखतीबद्दल धन्यवाद !

पुढच्या वेळी भेटाल, तेव्हा त्यांना स्वतःचा ब्लॉग तयार करण्याचा आग्रह करा माझ्या वतीने.

-- वैद्य

कोलबेर

मुलाखतीबद्दल धन्यवाद !

पुढच्या वेळी भेटाल, तेव्हा त्यांना स्वतःचा ब्लॉग तयार करण्याचा आग्रह करा माझ्या वतीने.

नाहीतर तुम्ही भेटालच की बे-एरियात त्यावेळेला (पुढे पुढे न करता) सांगुन बघा ;)
ह.घ्या

वैद्य (verified= न पडताळणी केलेला)

संमेलना आधी पानतावणे गुरुजींचा ब्लॉग सुरू झाला, तर केवढा पी आर स्कूप मिळेल !

-- वैद्य

धनंजय

बिरुटेसर, धन्यवाद.

तुम्हाला संधी मिळाली आणि तुम्ही आठवणीने आम्हालाही सहभागी करून घेतले.

विसोबा खेचर

बिरुटे सर,

खास मिपाकरता म्हणून संमेलनाध्यक्षांची धावती मुलाखत घेतलीत याचा आनद वाटतो...! विश्वसाहित्य संमेलनाला अध्यक्ष म्हणून एक अत्यंत व्यासंगी व लायक व्यक्ति लाभली ही चांगलीच बाब आहे.

परंतु,

आम्हा महाराष्ट्रातल्या गोरगरीब जनतेचे कष्टाचे, कररुपाने भरलेले २५ लाख रुपये परदेशी साजर्‍या होणार्‍या संमेलनाकरता वापरले जाणार याचा महाराष्ट्रातील जनतेला काहीच उपयोग होणार नाही. महाराष्ट्रातील अनेकानेक रसिकजनांना इतक्या दूर जाणे शक्य होणार नसल्याने या संमेलनाला मुकावे लागणार याचा खेद वाटतो...!

बिरुटेसर, या संबंधात आपण पानतवणे सरांना काही प्रश्न विचारला असतात तर अधिक बरे झाले असते असे वाटते!

ज्या पैशांवर महाराष्ट्रातील जनतेचाच सर्वस्वी हक्क आहे त्या पैशांची मुक्त उधळण करीत काही मोजकीच मंडळी संमेलनाच्या नावाखाली चकटफू अमेरिकावारी करू पाहात आहेत याची कीव वाटते! अरे अमेरिकेला जायचे तर खुशाल जा की भडव्यांनो! पण स्वत:च्या पैशांनी, स्वत:च्या हिंमतीवर जा आणि भरवा ना तिकडे हवी तेवढी संमेलने! साला, नाही कोण म्हणतंय? ठालेपाटील तर अमेरिकेला जायला केव्हाचे गुडघ्याला बाशिंग बांधून तैय्यार आहेत!

असो, वरील कारणाकरता मी व्यक्तिश: एक मराठी साहित्यप्रेमी महाराष्ट्रीयन या नात्याने या संमेलनाचा तीव्र निषेध करतो..

या पार्श्वभूमीवर रत्नांगिरीकरांनी विश्व साहित्य संमेलनाच्या नाकावर टिच्चून रत्नागिरीतच एक समांतर साहित्य संमेलन भरवून ते दणक्यात साजरे केले पाहिजे असे वाटते!

तात्या.

वैद्य (verified= न पडताळणी केलेला)

या पार्श्वभूमीवर रत्नांगिरीकरांनी विश्व साहित्य संमेलनाच्या नाकावर टिच्चून रत्नागिरीतच एक समांतर साहित्य संमेलन भरवून ते दणक्यात साजरे केले पाहिजे असे वाटते!

अरे तात्या, बातम्या वाचतोस की नाही हल्ली ?

रत्नांग्रीकर गोगटे महाविद्यालयाच्या मैदानात भरवणारच आहेत डिसेंबरात समांतर संमेलन.

जाणार आहेस ना ?

-- वैद्य

विसोबा खेचर

जाणार आहेस ना ?

जायची इच्छा आहे आणि ते रत्नांग्रीत असल्यामुळे जाणं शक्यही आहे! परंतु घरी वृद्ध आई असल्यामुळे ऐनवेळेस जाऊ शकेन याची खात्री देता येत नाही. ती हल्ली काही वेळा अंमळ आजारी असते त्यामुळे तिच्या प्रकृतीवर ते ठरेल...

असो,

बातम्या वाचायला हल्ली वेळ मिळत नाही परंतु रत्नांग्रीत सम्मेलन होणार ही अत्यंत आनंदाची बातमी.. माझा व्यक्तिश: याच संमेलनाला भरभरून पाठिंबा आणि मन:पूर्वक शुभेच्छा! :)

तात्या.

चित्रा

डॉ. पानतावणे यांची मुलाखत आठवणीने घेतलीत आणि इथे प्रसिद्ध केलीत याबद्दल धन्यवाद!

बिरुटे मास्तर, आवर्जून मुलाखत घेतल्याबद्दल धन्यवाद...
फोटोही छान..
.
अवांतर : तात्या, जाउद्यात ना आता...पुन्हा नको तेच तेच...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

विसोबा खेचर

अवांतर : तात्या, जाउद्यात ना आता...पुन्हा नको तेच तेच...

का नको? अहो २५ लाखांचा प्रश्न आहे आणि ते पैसे महाराष्ट्राचे आहेत! मग त्याचा जास्तीत जास्त उपयोग येथे महाराष्ट्रात राहणार्‍या आणि कर भरणार्‍या लोकांकरता का होऊ नये?

मी म्हणतो की अगदी एकवेळ महाराष्ट्रात नको, भारतात कुठेही घ्या. कारण भारतात कुठेही जाणे एकवेळ शक्य आहे, अमेरिकेच्या मानाने परवडण्याजोगंही आहे. पण भारताबाहेर जायचं म्हणजे अगदी व्हिसा, पासपोर्ट, परदेशी राहण्याचा खर्च इथपासून तयारी लागते! इथल्या प्रत्येक सर्वसामान्य साहित्यप्रेमीची आहे का तशी तयारी?? त्या ठाले पाटलाच्या बापाचं काय जाणार आहे? त्याचा खर्च त्या २५ लाखांतून आपसूक होणार आहे! परंतु हाच ठाले पाटील जर साहित्य महामंडळाच्या कोणत्याही पदावर नसतांना एक सर्वसामान्य मराठी साहित्यप्रेमी या नात्याने स्वत:च्या खर्चाने गेला असता का अमेरिकेला ते सांगा पाहू!

पण मी म्हणतो की काहितरी विवेक जागेवर असलेल्या पानतवण्यांनीदेखील अध्यक्षपद स्विकारण्यापूर्वी हा विचार करायला नको का? प्रश्न संमेलन अमेरिकेत भरवण्याचा नाहीये, प्रश्न आहे तो महाराष्ट्रातील जनतेच्या २५ लाखांचा!

बिरुटेसाहेबांच्या जागी मी असतो तर हा परखड प्रश्न पानतवण्यांना अगदी बेधडक विचारला असता!

परंतु मानाच्या जागा मिळाल्यावर माणसाचा विवेक सुटतो तेच बहुधा गंगाधररावांच्या बाबतीत झालं असावं!

तात्या.

मराठी_माणूस

बिरुटेसाहेबांच्या जागी मी असतो तर हा परखड प्रश्न पानतवण्यांना अगदी बेधडक विचारला असता!

अगदि बरोबर. कमीत कमी त्यांचे ह्या बाबतितले मत तर कळले असते.

अवांतर : तात्या, जाउद्यात ना आता...पुन्हा नको तेच तेच...

आम्हाला वाटतं साहित्य संमेलन कुठे घ्यावे, महाराष्ट्रीय माणूस आणि साहित्य रसिक म्हणुन काय वाटते, यावर चर्चा मिपावर झालेली आहे. या मुलाखतीच्या निमित्ताने काही प्रतिसाद अप्रस्तुत वाटत असले तरी, मिपावर प्रतिसादाचे स्वातंत्र्य असल्याने अवांतर वाटण्यार्‍या प्रतिसादांवर आम्ही तरी काही मत प्रदर्शीत करु इच्छित नाही. धन्यवाद !!!

विसोबा खेचर

या मुलाखतीच्या निमित्ताने काही प्रतिसाद अप्रस्तुत वाटत असले तरी,

अप्रस्तूत कसे काय? ज्या विषयावर फक्त मिपावरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा झाली त्याबाबत संमेलनाध्यक्षांचं वैयक्तिक मत काय आहे हे कळलं असतं तर बरं झालं असतं! कदाचित बिरुटेसाहेबांच्या सहृदय स्वभावामुळे - महाराष्ट्रातील स्थानिक जनतेची बाजू मांडणारा परंतु पानतवण्यांना अडचणीत आणणारा प्रश्न बिरुटेसाहेबांनी त्यांना विचारला नसेल असे वाटते!

अवांतर वाटण्यार्‍या प्रतिसादांवर आम्ही तरी काही मत प्रदर्शीत करु इच्छित नाही. धन्यवाद !!!

अवांतर कसे काय? सदर मुलाखत ही संमेलनाध्यक्षांची होती तेव्हा त्यांना अभामसासंचे विसासं असे सोयिस्कररित्या नाव बदलून सदर संमेलन केवळ काही लोकांच्या हट्टापायी, महाराष्ट्रीय जनतेच्या पैशांवर परदेशात भरवण्याबद्दल आपले वैयक्तिक तसेच संमेलनाध्यक्ष या नात्याने मत काय? हे आपल्याला योग्य वाटते की अयोग्य? हे प्रश्न विचारणे हे अवांतर आहे असं मला वाटत नाही..

तात्या.

कदाचित बिरुटेसाहेबांच्या सहृदय स्वभावामुळे - महाराष्ट्रातील स्थानिक जनतेची बाजू मांडणारा परंतु पानतवण्यांना अडचणीत आणणारा प्रश्न बिरुटेसाहेबांनी त्यांना विचारला नसेल असे वाटते!

तात्या, आपण म्हणता तसे कदाचित असेलही. आम्ही सरांसमोर जरा दडपणानेच बोलत असतो, वावरत असतो. त्यामुळे आमच्यासंबधी आपण केलेला ( सहृदय स्वभावाचा ) विचार अगदी योग्य आहे. :)

संमेलन केवळ काही लोकांच्या हट्टापायी, महाराष्ट्रीय जनतेच्या पैशांवर परदेशात भरवण्याबद्दल आपले वैयक्तिक तसेच संमेलनाध्यक्ष या नात्याने मत काय? हे आपल्याला योग्य वाटते की अयोग्य?

तात्या,
आपला प्रश्न अगदी योग्य आहे, त्याबद्दल शंका नाही. मुलाखत घेण्यासाठी आम्ही काही नियोजन करुन गेलो नव्हतो. तसे केले असते तर कागदावर अनेक प्रश्न लिहुन कदाचित वरील प्रश्न विचारता आला असता ! दुसरी गोष्ट, आम्ही काही सराईत मुलाखतकार नाही, त्यामुळे हौशी वाचकाकडून पहिली-वाहिली मुलाखत घेतांना काही उणिवा राहु शकतात.

विसोबा खेचर

मुलाखत घेण्यासाठी आम्ही काही नियोजन करुन गेलो नव्हतो. तसे केले असते तर कागदावर अनेक प्रश्न लिहुन कदाचित वरील प्रश्न विचारता आला असता ! दुसरी गोष्ट, आम्ही काही सराईत मुलाखतकार नाही, त्यामुळे हौशी वाचकाकडून पहिली-वाहिली मुलाखत घेतांना काही उणिवा राहु शकतात.

हे मात्र पटले.

इन फॅक्ट, खास मिपाकरता आपण मुलाखत घेतलीत हे मात्र नक्कीच प्रशंसनीय आहे हे आम्ही आधीच म्हटले आहे आणि आताही म्हणतो...! :)

असो, काही कडवट शब्दांकरता आम्ही बिरुटेसरांची क्षमा मागतो. परंतु प्रश्न महाराष्ट्रीय जनतेच्या २५ लाखांचा आहे म्हणून अंमळ जीव जळतो इतकंच....

आपला,
(मवाळ बिरुटेसरांचा अंमळ जहाल विद्यार्थी) तात्या. :)

असो, काही कडवट शब्दांकरता आम्ही बिरुटेसरांची क्षमा मागतो.

बस का आता !!! आपल्या एका चाहत्याची क्षमा वगैरे, आम्हाला असे लाजवू नका. आमचंच चुकत असेल तर आमच्याच चुका पदरात घेत चला. असो, आपल्या स्पष्ट आणि कडवटपणाबरोबर एक ललित लेखक म्हणुन याबाबतीत तर आम्ही आपले सर्वात जुने फॅन आहोत.

-दिलीप बिरुटे
(आपला)

जनोबा रेगे

तात्या॑शी सहमत. फुकट गावले तर वायट कित्याक? अमेरिकेला, तेही फुकटात जायला अन राह्यला मिळत
असेल तर भल्या भल्या॑चे 'सामाजिक भान आणि सामाजिक जाणीवा' उलट्या पालट्या होतात :) हे सगळे वर्गात शिकवायला चा॑गले असते! महाराष्ट्र अतिशय श्रीम॑त राज्य आहे हे आपण विसरता कामा नये, हा॑ आता (विदर्भातल्याच!) काही पाच-पन्नास मूर्ख शेतकर्‍या॑नी केल्या असतील आत्महत्त्या, त्यात काय एव्हढे? त्यातर सैनिक पण करतात आजकाल! म्हणा- जय जवान, जय किसान!
आणि वाढती महागाई, बेकारी वगैरे सामान्य (तथाकथीत मध्यमवर्गीय) लोका॑ना हादरवणार्‍या प्रॉब्लेम्सचा आणि साहित्यिका॑चा काही स॑ब॑ध असण्याची गरजही नाही. श्रीम॑त मराठी लेखक- वाचका॑च्या तो॑डी असल॑ काही शोभत नाही हो! शाईनि॑ग मराठी !! (आणि बर्नि॑ग मराठी माणूस) जाऊ दे!

ऋषिकेश

खास मिपासाठी मुलाखत!
वा वाचूनच बरं वाटलं! प्रा डॉ. , अनेक आभार

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

दोस्त हो, आपणास मुलाखत आवडली, आपण केलेलं कौतुक आणि दिलेलं प्रोत्साहान नव-नवीन लेखनप्रकारास बळ देते.
आपले सर्वांचे मनःपुर्वक आभार !!!

इतनी मुहब्बत मिलती है आपसे, ये मेरा हक नही मेरी तकदीर है
इस मुहब्बत के बदले हम क्या नजर दे, हम तो कुछ भी नही !!!

-दिलीप बिरुटे

धम्मकलाडू

साहित्य संमेलनापासून इतके दिवस वेगळी चूल मांडणाऱ्या अस्मितादर्श चळवळीचे अध्वर्यू आता विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होत आहेत.... थोडक्यात दलित चळवळीचा, साहित्याचा गौरव होतो आहे.... मंडळाने चांगलाच गेम खेळलांय....

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

ईश्वरी

छान मुलाखत !
आपल्याला छान संधी मिळाली आपले अभिनंदन.

ईश्वरी

सुनील

मुलाखत आणि तिही खास मिपासाठी, हे तर खासच!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

आनंदयात्री

मिपासाठी मुलाखती घ्यायचा पायंडा पाडल्याबद्दल सरांचे अभिनंदन.