बिहार विधानसभा निवडणुक-२०१५: भाजप आघाडी: संधी आणि धोके
मॅनेजमेन्टच्या क्षेत्रात "SWOT analysis" ही एक संकल्पना आहे. SWOT म्हणजे Strengths (सामर्थ्यक्षेत्रे), Weaknesses (कमकुवत क्षेत्रे), Opportunities (संधी) आणि Threats (धोके) यांचे विश्लेषण. यातील सामर्थ्यक्षेत्रे आणि कमकुवत क्षेत्रे या दोन गोष्टी अंतर्गत असतात तर संधी आणि धोके या दोन गोष्टी बाह्य असतात. पहिल्या लेखामध्ये नितीश कुमारांच्या आघाडीचा परामर्श घेतला त्यावेळी सर्व मुद्दे त्या आघाडीशी अंतर्गत होते.याचे कारण या आघाडीला बाह्य कोणते मुद्दे हे संधी असतील आणि कोणते मुद्दे धोकादायक ठरतील याचा विचार केला तर खरोखरच तसे मुद्दे मिळाले नाहीत. कदाचित माझ्याकडून काही मुद्दे निसटले असतील. पण भाजप आघाडीबाबत मात्र संधी आणि धोके हे बाह्य मुद्देही तितक्याच प्रमाणावर मला सापडले. म्हणून या लेखाचे शीर्षकही तसेच दिले आहे.तेव्हा सुरवात करू SWOT याच क्रमाने.
भाजप आघाडीची Strengths (सामर्थ्यक्षेत्रे)
१. ही आघाडी नितीश कुमारांच्या आघाडीच्या मानाने अधिक सुसंगत आहे.बिहारमधील निवडणुक म्हटली की जातीपातींचा विचार अनिच्छेने का होईना पण करावाच लागतो. त्यामुळे हा मुद्दा जातीच्या आधारेच स्पष्ट करतो.
या आघाडीचे मतदार नक्की कोणते गट आहेत? उच्चवर्णीय, बनिया आणि सुशीलकुमार मोदींच्या ओ.बी.सी मधील जातींचे मतदार हे भाजपचे पारंपारिक मतदार आहेत.त्यापैकी कोणीही भाजपला सोडून जायची शक्यता नाही. महादलितांमधील पासवान, मल्या (नावाडी) या समाजातले मतदार रामविलास पासवानांच्या लोकजनशक्तीचे पारंपारिक मतदार आहेत. गेल्या अनेक निवडणुकांमध्ये ही व्होटबॅंक पासवानांनी आपल्याबरोबर ठेवली आहे. ओ.बी.सींमधील कुशवाह समाज उपेन्द्र कुशवाहांबरोबर तर महादलितांपैकी मुसहार आणि इतर जातींचे मतदार जीतनराम मांझींबरोबर असतील असे म्हणायला हरकत नसावी. जीतनराम मांझींचे निवडणुकीतील सामर्थ्य अजून स्पष्ट झालेले नाही.यापूर्वी ते तितके महत्वाचे आणि मोठे नेते नव्हतेच.पण नितीशकुमारांनी त्यांना मुख्यमंत्रीपद खाली करायला सांगितल्यावर मात्र त्यांनी आपले पत्ते योग्य प्रकारे खेळले आणि त्यांना मुख्यमंत्रीपदावरून हटविणे म्हणजे महादलित समाजाचा अपमान असे चित्र उभे करण्यात ते यशस्वी झाले.तेव्हा त्या समाजातील मते त्यांच्यामागे जातील असे म्हणायला हरकत नसावी.
हे मतदार परस्परविरोधी नाहीत.म्हणजे नितीशकुमारांच्या आघाडीत यादव विरूध्द कुर्मी-कोयरी हे परस्परविरोधी मतदार आहेत. कुर्मी-कोयरींना लालूंच्या राज्यात डावलले जाते आणि सगळा फायदा यादवांनाच होतो या मुख्य कारणामुळे नितीशकुमार १९९४ मध्ये जनता दलातून बाहेर पडले होते.त्या कारणाने यादव आणि कुर्मी-कोयरी हे परस्परविरोधी मतदार झाले. तशा प्रकारे परस्परविरोध भाजप आघाडीत नाही.जीतनराम मांझींना बरोबर घेतल्यामुळे आणि नितीश-लालू युती असल्यामुळे लालूंच्या काळातील यादवीचा त्रास झालेले महादलित मतदार मोठ्या अक्कलहुशारीने भाजप आघाडीने आपल्याकडे वळवले आहेत. भाजप आघाडीचे सर्वात मोठे सामर्थ्यस्थान हेच आहे.
२. भाजप आघाडीमध्ये भाजप १६०, लोकजनशक्ती ४०, उपेन्द्र कुशवाहांचा पक्ष २३ तर जीतनराम मांझींचा पक्ष २० जागा लढवत आहे. त्यामुळे अर्थातच स्थैर्याच्या दृष्टीने ही आघाडी अधिक विश्वसनीय आहे.आघाडीचा विजय झाल्यास भाजप स्वबळावर बहुमताच्या बऱ्याच जास्त जवळ असेल आणि इतर पक्षांवर अवलंबून रहावे लागले तरी त्याप्रमाणात कमी असेल.मतदारांनी सरकारचे स्थैर्य हा मुद्दा लक्षात घेतल्यास नितीशकुमारांच्या आघाडीपेक्षा भाजप आघाडी ही मतदारांना अधिक आकर्षक असेल.
३. भाजप आघाडीचा प्रचार हा एकत्रितपणे चालला आहे असे अजूनपर्यंतचे तरी चित्र आहे. नरेन्द्र मोदींच्या दोन सभांना सर्व पक्षांचे नेते हजर होते.कदाचित भविष्यातल्या काही सभांनाही असतील. यातून मतदारांपुढे ऐक्याचा संदेश नक्कीच जात आहे.
भाजप आघाडीचा Weaknesses (कमकुवत क्षेत्रे)
१. भाजप आघाडीचा सर्वात मोठा वीकनेस म्हणजे मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराचा अभाव. नितीशकुमारांना तोड देईल असा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा भाजप आघाडीकडे नाही. आजही सर्व सर्वेक्षणांमध्ये नितीश कुमार हे भाजपच्या कोणाही संभाव्य उमेदवारापेक्षा अधिक लोकप्रिय आहेत.
भाजप आघाडीच्या Opportunities (संधी)
१. या निवडणुकांमध्ये एका बाजूला भाजप आघाडी आहे तर दुसऱ्या बाजूला नितीशकुमार-लालू आणि कॉंग्रेस आहेत. दुसऱ्या बाजूच्या पक्षांनी स्वातंत्र्यापासून बिहारमध्ये सरकार चालवले होते-- सर्वाधिक काळ कॉंग्रेसने, त्याखालोखाल लालूंनी १५ वर्षे आणि त्याखालोखाल नितीशकुमारांनी १० वर्षे!! त्यामुळे अन्य कोणाला एक संधी द्यायला हवी असे वाटणारे मतदारांना नितीशकुमारांच्या आघाडीपेक्षा भाजप आघाडी अधिक आकर्षक आहे हे नक्कीच. ही भाजप आघाडीसाठी मोठी संधी आहे.
२. २०१४ च्या निवडणुकांप्रमाणेच यावेळीही ३५ पेक्षा कमी वय असलेल्या मतदारांची संख्या मोठी आहे. या तरूण मतदारांनी २०१४ मध्ये नरेन्द्र मोदींच्या विकासाच्या मुद्द्यावर भाजपला मते दिली होती. लालू बरोबर नसते तर त्याच मुद्द्यावर यातील बहुसंख्य मते नितीश कुमारांकडे जायची शक्यता होती.पण नितीशकुमारांनी लालूंचे जोखड गळ्यात अडकवून घेतल्यामुळे ही मते परत एकदा आपल्याकडे आकर्षित करणे भाजपला सोपे जाईल.
भाजप आघाडीसाठीचे Threats (धोके)
१. अजूनही भाजप आघाडी नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेवर अधिक प्रमाणावर अवलंबून आहे. नरेंद्र मोदी बिहारमध्ये लोकप्रिय असतीलही पण ते राज्याचे मुख्यमंत्री बनणार नाहीत.तसेच नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेवर मतदारांनी २०१४ मध्ये मते दिली.आता परत त्याच नावावर मते मागण्यावर नक्कीच मर्यादा आहेत. शेवटी अर्थशास्त्रातला Law of diminishing marginal returns हा प्रकार सर्वत्र असतोच. एका कारणावरून मागच्या वेळी जितकी मते मोदी फिरवू शकले तितक्या प्रमाणावर यावेळी आणि त्यातही विधानसभा निवडणुकांमध्ये मोदी फिरवू शकतील का? एकाच मुद्द्यावर किती काळ अवलंबून राहायचे याचा विचार भाजपने करायलाच हवा.
२. बिहारमधील जातीपातींचे वर्चस्व असलेल्या परिस्थितीत एकाच आघाडीत रामविलास पासवान आणि जीतनराम मांझी हे दोन एकाच समाजातील नेते असणे हे धोकादायक ठरू शकते. शेवटी रामविलास पासवान हे बिहारमधील ज्येष्ठ नेते आहेत. ते सर्वप्रथम १९६९ मध्ये राज्य विधानसभेवर निवडून गेले होते.आणि १९७७ पासून १९८४ आणि २००९ चा अपवाद वगळता ते सर्व निवडणुकांमध्ये लोकसभेवर निवडून गेले आहेत. त्या तुलनेत जीतनराम मांझी हे बऱ्यापैकी उपऱ्यासारखे आले आणि आपल्याला मिळाल्या त्याच्या अर्ध्या जागा मिळवून गेले असे पासवानांना वाटणारच.त्यातून पासवानांचे आपल्याच समाजातील नेत्यांबरोबर कसे वाकडे असते याविषयी माझ्या मिसळपाववरील पूर्वजन्मात या प्रतिसादात लिहिले होते.
याला मिटिगेटींग फॅक्टर म्हणजे मायावतींचा जसा पासवानांना एकदा नाही तर दोनदा स्वत:ला फटका बसला तसे मांझी करू शकतील असे वाटत नाही.तसेच एकदा निवडणुका झाल्या की नंतर मांझींना फारसे कोणी विचारेल असे वाटतही नाही.मायावतींमुळे पासवानांच्या मतांवर जसे गंडांतर आले तसे मांझी करतील याची शक्यता कमी.आणि दुसरे म्हणजे मांझी हे पासवानांचे मतदार-- पासवान आणि मल्या या जातींचे मतदार पळवतील याची शक्यता त्या मानाने कमी. म्हणून बहुदा पासवान गप्प बसले असावेत. पण समजा भविष्यात या दोघांमध्ये मतभेद उफाळून आले तर मात्र तो भाजप आघाडीसाठी मोठा धोका असेल.
आता यापुढच्या लेखामध्ये या निवडणुकांसाठीच्या "x-factors" चा परामर्श घेईन.
संगीत सोम, साक्षी महाराज, साध्वी निरंजन ज्योती यासारखी मंडळी नरेंद्र मोदींशी सत्तासंघर्ष करायच्या परिस्थितीत नक्कीच नाहीत.बुद्धीबळात आणि राजकारणात दर वेळेस भारी मोहरे भरीला घातली जातील असे नाही... प्याद्यांकरवी केलेल्या चाली कमी खर्चात/धोक्यात जास्त फायदे/संदेश देऊन जातात.