हा बाजार बंद करा
Primary tabs
आज संध्याकाळपासून सातत्याने अनेक वाहिन्या लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेलेल्या एका महिलेला तिथल्या 'कार्यकर्त्या'ने अक्षरश: ढकलुन, अवमानित करून हाकलले त्याचे प्रक्षेपण करीत आहेत. संपर्क साधला असता उत्सवाचे प्रमुख उपलब्ध नाहीत वा कॅमेर्यासमोर येत नाहीत असे काही वाहिन्या सांगत आहेत तर एका वाहिनीवर लालबाग राजा चे श्री. सुनिल जोशी यांनी 'ती महिला चपला घालुन व विशेष महत्वाच्या व्यक्तिंकरीता असलेल्या रांगेत जात होती व तिने सांगुन न ऐकल्यामुळे नाइलाजाने कार्यकर्त्यांना असे वागावे लागले' अशी मल्लिनाथी केली. हे कुणाला पटलेले दिसत नव्हते. अनेक भक्तांनी वाहिन्यांच्या प्रतिनिधींशी बोलताना इथले कार्यकर्ते फार अरेरावीने वागत असल्याची व काहींनी तर मारहाण देखिल करत असल्याची माहिती दिली. मात्र याच देवाच्या दर्शनाला आलेले मुख्यमंत्री, कलाकार वगैरेंची मात्र उत्तम बडदास्त ठेवली जात असल्याचे दाखविले. काय खरे काय खोटे ते बाप्पाच जाणे.
मात्र या प्रकाराने एकुणच देवा धर्माच्या बाजारीकरणचा उबग आला. तिरुपती बालाजी, शिर्डीचे श्री साईबाबा, दादरचा श्री सिद्धिविनायक... एक देव यातुन सुटला नाही. सर्वसामान्य भक्त रांगेत तिष्ठत तासनतास उभे असताना केवळ पैसा, प्रसिद्धी वा अधिकाराच्या जोरावर अग्रक्रमाने दर्शन घेणे व ते घेतले जाऊ देणे हे खरोखरच किळसवाणे आहे. अशा देव-धर्म दलालांमुळे लोकांचा व एकंदरीतच समाजाचा देवावरील विश्वास उडाला तर त्यात नवल ते काय? पैसे घऊन कागद पटकन हलविणारा अंमलदार आणि पैसे देऊन वा अधिकार/ नाव-लौकिक वापरुन देवाचे दर्शन यात सर्वसामान्य माणसाला साधर्म्य भासल्यास गैर ते काय? माझ्या अंगी तासनतास रांगेत उभे राहुन दर्शन घेण्याईतका भक्तिभाव नसला तरी भक्त रांगेत उभे असताना पुढे जाऊन वेगळ्या मार्गाने दर्शन घेण्याईतका मुर्दाडपणाही नाही.
एकिकडे लोकशाहीच्या गप्पा माराच्या आणि दुसरीकडे राजेशाही वा सरंजामशाही भोग भोगायचे! लोकशाहीत राष्ट्राला आणि देवळातल्या देवाला सगळे समान! मग असा भेदभाव का? लाखो वारकरी शेकडो मैल तंगडतोड करून पांडुरंगाच्या दर्शनाला आसुसलेले असताना मंत्री संत्री राजरोस त्यांना बाजुला सारून हक्काने मनसोक्त पूजा करणार! हा कुठला न्याय?
जर हा बाजार बंद करायचा असेल तर या देवस्थानांना रांगा लावणे बंद करा आणि आपला देव आपल्या मनात पूजा.
मला लहानपणी वाचलेली 'खुलभर दुधाची' कहाणी आठवली. देवाचा गाभारा दुधाने भरून वाहील असा संकल्प राजाने केला व सक्तिने सर्व नागरिकांना स्वतःला थेंबही न घेता सगळे दूध देवळात आणुन घालायचा हुकुम सोडला. सार्या गावाने सगळे दूध ओतले तरी गाभारा भरेना. अखेर एक म्हातारी आली. तिने राजाचा हुकुम बाजुला सारून आपल्या घरच्या वासराना, लेकराना दूध पिऊ दिले आणि उरलेले खुलभर दूध ती देवळात घेऊन आली. तिने आपला गडु देवावर ओतताच गाभारा ओसंडुन वाहु लागला.
पहिल्यांदा सगळी देवळे बंद करा. देवाला एकदा रस्त्यावर आणले की तो राहण्यासाठी आपोआप सर्वांच्या मनात घरे शोधू लागेल असे वाटते. थंडीपावसाच्या दिवसात देवालाही उघड्यावर राहणे जमणार नाही. ;)
आपला,
(अज्ञेयवादी) आजानुकर्ण
देवळे म्हणजे चर्चेस, मशीदी आणि मंदिरे.
पुण्यात एका समाजाच्या प्रार्थनास्थळाला लाल देवळ असे म्हणतात म्हणून देवळे हा शब्द वापरला.
आपला,
(भक्त) आजानुकर्ण देऊळगावकर
पहिल्यांदा सगळी देवळे बंद करा. देवाला एकदा रस्त्यावर आणले की तो राहण्यासाठी आपोआप सर्वांच्या मनात घरे शोधू लागेल असे वाटते.
:? :|
देवळे म्हणजे चर्चेस, मशीदी आणि मंदिरे.
हं मग ठीक आहे :-)
१००% सहमत आहे आपल्या विचारांशी.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
सर्वसाक्षी, छान लिहिले आहेत.
एकिकडे लोकशाहीच्या गप्पा माराच्या आणि दुसरीकडे राजेशाही वा सरंजामशाही भोग भोगायचे! लोकशाहीत राष्ट्राला आणि देवळातल्या देवाला सगळे समान! मग असा भेदभाव का?
खरं आहे!
गावाच्या वेशीवर
मारुती बसवलेला
दर शनिवारी नारळ देऊन
बिचार्याला फसवलेला
देवळात जाऊन माणसं
दुकानात गेल्यासारखी वागतात
चार-आठ आणे टाकून
काहि ना काहि मागतात
-चंद्रशेखर गोखले यांच्या मी मराठी या चारोळी संग्रहातून
साक्षीदेवा, तुझ्या म्हणण्यातले प्वाईंट पटण्याजोगे आहेत...
पण आता लोकच तासन् तास रांगा लावतात यात आमच्या लालबागच्या राजाचा काय दोष?
माझे व्यक्तिगत मत विचारशील तर गणेशोत्सव हा माझा अत्यंत आवडता उत्सव आहे. आणि आमचा लालबागचा राजा हा तर मुंबईचा मानबिंदू आहे! हां, आता त्याच्या दर्शनाबाबत सेलिब्रिटी मंडळींनी रांगेत घुसण्याबाबत तू मांडलेले मुद्दे निश्चित पटण्याजोगे आहेत!
असो,
लालबागच्या राजाच्या मंडळाने केलेली सार्वजनिक कामे इथे वाचता येतील! ही कामे वाचल्यास आमचा लालबागचा राजा म्हणजे केवळ बाजार आहे आणि म्हणून तो बंद करावा असे म्हणणे योग्य होणार नाही!
प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉ तात्याराव लहाने यांच्या सहकार्याने/मार्गदर्शनाखाली जे जे रुग्णालयात आत्तापर्यंत अनेकांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया झाली आहे या घटनेचा मी साक्षिदार आहे. अजूनही बर्याच मंडळींना याचा लाभ मिळणार आहे!
हां, आता उत्सव म्हटला की त्यात काही कमीअधिक हे आलंच, काही तृटीही अवश्य असतील. त्या मी नाकारत नाही. परंतु रोज अक्षरश: लाखाच्या घरात लोकांच्या दर्शनाची रांग लागते. मंडळाचे कार्यकर्ते गेले ८-९ दिवस अक्षरश: उभे आहेत, राबताहेत हे मी पाहतो आहे! बरं कोण आहेत ही सगळी कार्यकर्ते मंडळी? तर तुमच्याआमच्यासारखे सामान्य मध्यमवर्गीय जन!
आज कुणाही परप्रांतियांनी ऊठसूठ मुंबईला, मराठी माणसाला काहीही बोलावं, तुच्छ लेखावं, वाट्टेल ते तोंडसूख घ्यावं, अश्या काळात मुंबईच्या गिरणगावामध्ये अक्षरश: एखाद्या राजासारख्या दिमाखानं साजर्या होणार्या, सार्या जगाचं लक्ष वेधणार्या मराठमोळ्या लालबागच्या राजाचा दणक्यात साजरा होणारा उत्सव ही काळाची, अन् पर्यायाने मुंबईकर मराठी माणसाच्या अस्मितेची गरज आहे, नव्हे, मुंबईकर मराठी माणसाची ती अस्मिताच आहे!
वर म्हटल्याप्रमाणे काही कमी निश्चितच असतील, काही चुका नक्कीच असतील, परंतु मडळातर्फे त्या निश्चित सुधारल्या जातील याची मला खात्री आहे!
अरे लालबागच्या राजाचा विजय असो...!
आपला,
(गणेशोत्सवाचा प्रेमी अन् लालबागच्या राजाचा कट्टर भक्त!) तात्या.
तात्यांचे उत्तर पटले.
साक्षी साहेबांनी दोन विषय एकत्र गुंफल्यासारखे वाटते. केवळ लालबागच्या राज्याबद्दल बोलाल तर तात्यांची मते तंतोतंत पटतात.
बाकी भाक्तीचा बाजार झाला आहे हे मान्य आहे. त्यावर तोडगा निघणे आवघड जरी असले तरी आपण आपल्या परिने प्रयत्न केल्यास स्थिती सुधारू शकते. जसे की देवळात जायला सन-वार पाहून जायची काय गरज? एरव्ही सुद्धा देव असतोच की तिथे. देवस्थांनांत एकाच दिवशी गर्दी केली नाही तर प्रशासनासमोरील किती तरी प्रश्न सुटतील.
आपला,
(सामान्य मध्यमवर्गीय जन) भास्कर
आम्ही येथे वसतो.
तात्याचे म्हणणे पटले.सध्याच्या मिडीयाला काय म्हणावे सुचत नाही. मिडीयाकडे दुर्लक्ष करणे ठीक.
ज्या बाईला धक्काबुक्की झाली अशी एकच बाई दिवसभर दाखवत होते. प्रतिक्रियांमधे मराठी भाषिकांच्या प्रतिक्रिया संयत होत्या. जे हिंदीत बोलत होते(ते मूळचे हिंदी भाषिक आहेत का नाही ते माहीत नाही) त्यांच्या प्रतिक्रिया तिखट होत्या.
बाकी राहीला प्रश्न ही मंदीरे बंद करण्याचा. ज्याना सोसत नाही त्यानी जाउ नये. कुठलीही आदर्श गोष्ट निर्माण करणे अवघड असते त्यामानाने बंद करा म्हणून बोंबलणे सोपे. कारण एकूणच आपल्या मधील बेशिस्त बघता एखाद्या कार्यकर्त्याने असे बेफाम होणे शक्य आहे. भ्रष्ट परीस्थितीच भ्रष्ट माणसे घडवत असते.
(तिखट)
पुण्याचे पेशवे
शिकलेल्यांना शहाणे आनि शहण्यांना सुसंस्कृत करणे ही आपल्या राष्ट्राची मुलभूत गरज आहे.....
हिंदू धर्मात, वेद्-उपनिषदे-पुराणे यातुन प्रत्येक देवाच्या भक्ती साठी काळ ठरवून दिला आहे. त्यातल्या त्यात चातुर्मासात [श्रावणात शंकर, भाद्रपदात गणपती, अश्विनात दुर्गा, कार्तिकात लक्ष्मी] जास्तीत जास्त व्रत्-वैकल्य आहेत. [कारण या काळात आयुर्वेद तब्येतीची जास्तीत जास्त काळजी घेण्याचे सूचवतो]
एरव्ही सुद्धा देव असतोच की तिथे. देवस्थांनांत एकाच दिवशी गर्दी केली नाही तर प्रशासनासमोरील किती तरी प्रश्न सुटतील.
म्हणून हे शक्य नाही...
राहता राहीला प्रशासनाचा प्रश्न, तर माकडाच्या हाती मशाल असेच म्हणावेसे वाटते..
मला मोठेपणी ऐकलेली 'खुलभर पाण्याची' कहाणी आठवली. देवाचा गाभारा दुधाने भरून वाहील असा संकल्प लोकशाही राजाने केला व अनासक्तिने सर्व नागरिकांना स्वतःला थेंबही न घेता सगळे दूध देवळात आणुन घालायचे आवाहन केले.
कोणी विचार करु लागला कि इतर लोक दुध टाकणार आहेत च आपली एखादा तांब्या पाण्याने काय होणार आहे? चला आपण पाणीच टाकू
कोणी विचार करु लागला कि इतर लोक साले चोर आहेत पाणी टाकतील मग आपण दुध टाकले तरी त्याचा काय उपयोग? चला आपण पाणीच टाकू.
अशा रितिने सर्व गाभारा पाण्याने ओसंडून वाहू लागला.
प्रकाश घाटपांडे
मी 'राजा'चे दर्शन घ्यायला जात नाही. 'प्रजा' रुपी अनेक गणपती आहेत जे मला सर्वसमान वाटातात. देवांचे हे राजा आणि प्रजा वर्गीकरण मला अयोग्य वाटते.
'ईश्वर सर्वव्यापी आहे' असे आपण म्हणतो. पण नुसते म्हणतो... मानत नाही. 'राजा'चे दर्शन घ्यायला लाखोंच्या रांगा लावतो.
महाराष्ट्रात १२-१२ ताज वीज भारनियमन चाललेले असताना वाढत्या सार्वजनिक गणेशोत्सवांवरील वाढती रोषणाई नजरेआड करतो. उपासमारीने फक्त हाडे आणि कातडी राहिलेल्या लहानग्या बालकांबद्दल आपण नुसती हळहळ व्यक्त करतो आणि देवाच्या डोक्यावर दुधाचा अभिषेक करून ते दुध गटारात वाहून जाऊ देतो. देवासमोर पेढे, मोदक, लाडू असे महागातले प्रसाद ठेवून दहा दिवस आपणही गोडधोड खातो. सार्वजनिक गणेशोत्सवातील कार्यकर्त्यांची वर्गणी गोळा करण्या पासून भक्तांना धक्काबुक्की करेपर्यंतची अरेरावी, दंडेली - आपल्याला काय करायचयं, आपण चांगल्या भावनेने दर्शन घ्यावे, त्यांचे पाप त्यांच्यापाशी- अशा विचारांनी दुर्लक्ष्य करतो. सार्वजनिक उत्सवांवर बहिष्कार नाही घालत. कानठळ्या बसविणार्या 'स्पिकर्स वॉल' उभारणार्या, रहदारी अडवून रस्त्यात मांडव घालणार्या, दारु पिऊन ढोल-ताशे बडविणार्या सार्वजनिक गणेशोत्सवालाही आपण आवर्जून हजेरी लावतो. कारण आपल्या मनात शुद्ध भक्तिभाव असल्यामुळे इतरांच्या गैरवर्तनाकडे लक्ष न देण्याइतके आपले मन मोठे केले पाहिजे असा आपला 'शुद्ध' हेतू असतो.
म्हणून आपण सार्वजनिक गणेशोत्सवात सहभागी होतो. मी दरवर्षी दगडूशेठला जातो, मी लालबागचा राजा कधीच चुकवत नाही, मी कमीतकमी २१ गणपतींचे दर्शन घेतो वगैरे वगैरे दावे नेहमीच ऐकायला येतात. वाढत्या लोकसंख्येबरोबर सार्वजनिक उत्सवांतील गर्दीही वाढत जाते आहे. त्यामुळे मंडाळांचे 'फावते' आहे. देवांना 'सोन्याच्या मखरात' बसविण्याची स्पर्धा वाढते आहे. ज्यांनी हाती कटोरा घेऊन फकीराचे जीवन स्विकारले त्या साईबाबांनाही सोन्याचे सिंहासन कोणी भक्त दान करतो आहे. पर्यायाने आपल्या भक्तीचे प्रदर्शन मांडतो आहे. सिद्धिविनायकाच्या मंदीराचा कळस सोन्याच्या पत्र्याने मढविला जातो. त्यातही भ्रष्टाचार होतो. मोठमोठ्या मंदिरांची मिळकत इतकी मोठी आहे की त्या - त्या मंदिरांच्या समितीवर येण्यासाठी मारामार्या होतात. शिर्डी संस्थान तर कोर्ट रिसिव्हरकडे आहे असे ऐकतो.
ह्या सर्व अनुभवातून मला मुर्तीपुजेतच विश्वास राहिला नाही. मी मुर्ती पुजा जरूर करतो पण जिथे व्यावसायिकीकरण दिसत नाही तिथे भक्तीभावाने नमस्कार करतो. गरीबांना आर्थिक, कपड्यांची, अन्नाची मदत करणे मला जास्त गरजेचे वाटते, ते मी करतो. त्यातही हट्टेकट्टे धडधाकट भिकारी मी टाळतो तसेच काही काम करू शकणारी मुलेही टाळतो. त्यांना पैसे द्यावेसे वाटलेच तर काही काम सांगतो आणि ते केले तर पैसे देतो. पण माझा अनुभव असा आहे की त्यांना काम नको असते त्यांना नुसते पैसे हवे असतात. असो.
ही सर्व माझी वैयक्तिक मते आहेत. कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देश नाही.
पेठकर काकांशी सहमत.
मी ही सहमत...
श्रद्धेपायी आपण किती मॅन अवर्स वाया घालवतो हे कुणीच लक्षात घेत नाही...भक्ति, श्रद्धा यांच्यावर मला काहिही कॉमेंट करायची नाही...व्यक्त केलेले मत वैयक्तिक आहे.
तरी बरं, आजकाल बर्याच वाहिन्या सिद्धिविनायक, साइबाबांची आरती वगैरे रोज सकाळी दाखवतात...
पेठकर काकांशी १०००% सहमत!!!!
१००% सहमत.
विचार पटले !
राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग
त्यामुळे मंडाळांचे 'फावते' आहे.
पेठकरसाहेब, आपल्या प्रतिसादाचे शीर्षक 'लालबागचा राजा' असे आहे म्हणून इतकेच विचारू इच्छितो की आपले उपरोल्लेखित वाक्य हे "लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ" याला लागू आहे काय? असल्यास आमच्या मंडळाचे नेमके काय फावते आहे हे कळेल काय?
गरीबांना आर्थिक, कपड्यांची, अन्नाची मदत करणे मला जास्त गरजेचे वाटते, ते मी करतो.
आमच्या मंडळालाही हे गरजेचे वाटते आणि मंडळ ते करतही आहे इतकेच सांगू इच्छितो...
लालबागच्या राजाचा विजय असो....
तात्या.
तात्या,
इतक्या प्रकारच्या प्रतिसादांना नेहमी 'शीर्षक काय द्यावे' हा मला नेहमीच पडणारा प्रश्न आहे.
'लालबागचा राजा' ह्या प्रतिसादात मी 'राजा' आणि 'प्रजा' गणपती ही वर्गवारी पहिल्याच वाक्यात अधोरेखित केली आहे. त्यावर आपला मागे एकदा वादही झाला आहे.
प्रतिसादाचे पुढील अंग हे एकूण सार्वजनिक उत्सव आणि त्यात घडणारे अपप्रकार ह्या विषयाकडे झुकणारे आहे.
वाढत्या लोकसंख्येबरोबर सार्वजनिक उत्सवांतील गर्दीही वाढत जाते आहे. त्यामुळे मंडाळांचे 'फावते' आहे.
हे वाक्य असे अपप्रकार करणार्या सर्वच उत्सवांना आणि त्यांच्या मंडळांना लागू आहे.
'लालबागच्या राजाच्या' मंडळाकडून असे अपप्रकार होतात असे मी कुठेही म्हंटलेले नाही. तसेच, होतच नसतील असेही मला वाटत नाही. मी 'लालबागच्या राजा'च्या दरबारात हजेरी लावीत नाही, त्या मंडळा बद्दल मला काहीही माहिती नाही म्हणून मी त्यांना उद्देशून कुठलेही विधान केलेले नाही.
आमच्या मंडळालाही हे गरजेचे वाटते आणि मंडळ ते करतही आहे इतकेच सांगू इच्छितो...
पुन्हा, मी फक्त 'लालबागच्या राजा' संबंधी बोलत नसून, अपप्रकार करणार्या कित्येक सार्वजनिक गणेशोत्सवांबद्दल बोलत आहे. अशी मंडळे जरूर समाज सेवा करतात. सर्वच्या सर्व पैसा खात नाहीत पण खरा जमाखर्च लिहीला जात नाही. धर्मादाय आयुक्तांच्या कचेरीत सादर होत नाही, असे ऐकले आहे. हे सर्व पाप नाही का? हा 'बिझिनेस' नाही का? ह्यात कार्यकर्त्यांचा 'स्वार्थ' नसतो का?
कित्येक नगरसेवक आपल्या पाठीराख्यांना आर्थिक फायदा व्हावा, त्या कारणाने का होईना ते कायम आपल्या पाठी राहावे ह्या उद्देशाने देवांच्या, उत्सवांच्या नांवाने 'कमाई' करण्यास संधी उपलब्ध करून देतात हे आता एक 'उघड' गुपीत आहे. त्या मंडळांनाही ताकीद असते, 'गरीब विद्यार्थ्यांना (जास्त करून ओळखितल्याच) गणवेष, वह्या पुस्तकांचे वाटप करा. मंडळाचे 'समाजकार्य' आहे असे दाखवा.'
सरकारने नियम केला की कुठलाही उत्सव प्रायोजकाविना, एकाही पैशाच्या व्यवहाराशिवाय चालवावा आणि भक्तांनी ही नुसता नमस्कार करावा. पेटीत पैसे टाकू नयेत. तर ९०टक्के सार्वजनिक उत्सव बंद पडतील. पण हे होणार नाही.
मोठमोठे देखावे, गणपतीच्या उचच्याउंच मुर्ती ही उत्सवांमधील मंडळांची स्पर्धा आहे. हे कशासाठी? भक्तीभाव हा मुर्तीच्या आकारावर आणि देखाव्यांच्या सौंदर्यावर, भव्यतेवर अवलंबून नसतो. पण लक्षात कोण घेतो? असो.
प्रत्येकाला आपापल्या (अंध)श्रद्धा जोपासण्यास हक्क आहे असे म्हणून माझ्यासारख्यांचे तोंड बंद करता येते पण त्याने परिस्थिती आणि सत्य बदलत नसते.
धन्यवाद.
हे वाक्य असे अपप्रकार करणार्या सर्वच उत्सवांना आणि त्यांच्या मंडळांना लागू आहे.
'लालबागच्या राजाच्या' मंडळाकडून असे अपप्रकार होतात असे मी कुठेही म्हंटलेले नाही.
खुलाश्याबद्दल धन्यवाद...
'लालबागच्या राजाच्या' मंडळाकडून असे अपप्रकार होतात असे मी कुठेही म्हंटलेले नाही. तसेच, होतच नसतील असेही मला वाटत नाही.
कुणाला काय वाटावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे...
शिवाय,
"'लालबागच्या राजाच्या' मंडळाकडून असे अपप्रकार होतात असे मी कुठेही म्हंटलेले नाही. तसेच, होतच नसतील असेही मला वाटत नाही"
आपण जर आत्तापर्यंत एकदाही लालबागच्या राजाच्या दरबारात हजेरी लावलेली नाही, त्या मंडळाबद्दलही आपल्याला काही माहीत नाही असे म्हटले आहे तर मग लालबागच्या राजाच्या संदर्भात आपल्या वरील वाक्यातील अधोरेखीत शब्दांमागचे प्रयोजन कळेल काय?
सर्वच्या सर्व पैसा खात नाहीत पण खरा जमाखर्च लिहीला जात नाही.
मग फक्त मंडळंच का? आज कुठला धंदेवाला खरा जमाखर्च लिहितो? कुठली कंपनी खरे हिशेब सादर करते?
सरकारने नियम केला की कुठलाही उत्सव प्रायोजकाविना, एकाही पैशाच्या व्यवहाराशिवाय चालवावा आणि भक्तांनी ही नुसता नमस्कार करावा. पेटीत पैसे टाकू नयेत. तर ९०टक्के सार्वजनिक उत्सव बंद पडतील. पण हे होणार नाही.
का नाही होणार? आपण त्या संदर्भात एखादी जनहित याचिका दाखल करून स्वत: कधी असा प्रयत्न करून पाहिला आहे काय असे विचारू इच्छितो...!
क्तीभाव हा मुर्तीच्या आकारावर आणि देखाव्यांच्या सौंदर्यावर, भव्यतेवर अवलंबून नसतो. पण लक्षात कोण घेतो? असो.
अवलंबून नक्कीच नसतो! परंतु मुळात मूर्ती हीच जिथे सगुणरुपी आहे तिथे तिला सुंदर देखावा केला, सजावट केली, एक उत्तम कलाकृती म्हणून भव्यदिव्य मूर्ती एखाद्या कलाकाराबे घडवली तर तिथे भक्तिभाव हा नसतोच असे आपल्याला म्हणावयाचे आहे किंवा कसे?
प्रत्येकाला आपापल्या (अंध)श्रद्धा जोपासण्यास हक्क आहे असे म्हणून माझ्यासारख्यांचे तोंड बंद करता येते पण त्याने परिस्थिती आणि सत्य बदलत नसते.
इथे तोंड बंद करण्याचा विषय कुठे आला हे कळले नाही. निदान व्यक्तिश: मी तरी आपल्याला दिलेल्या कोणत्याच उप-प्रतिसादात आपले तोंड बंद केले आहे किंवा आपली मुस्कटदाबी केली आहे असे मला वाटत नाही! असल्यास अवश्य दाखवून द्या, मी आपली क्षमा मागेन.
पण त्याने परिस्थिती आणि सत्य बदलत नसते.
हेच म्हणतो! :)
लालबागच्या राजाचा विजय असो....!
तात्या.
आपण जर आत्तापर्यंत एकदाही लालबागच्या राजाच्या दरबारात हजेरी लावलेली नाही, त्या मंडळाबद्दलही आपल्याला काही माहीत नाही असे म्हटले आहे तर मग लालबागच्या राजाच्या संदर्भात आपल्या वरील वाक्यातील अधोरेखीत शब्दांमागचे प्रयोजन कळेल काय?
जिथे जिथे पैसा आहे तिथे तिथे अपप्रकार आहेत. हे आजकाल वर्तमानपत्र उघडले की जाणवते. कारगीलच्या युद्धात शवपेटीकांचाही भ्रष्टाचार झाला असे वाचले होते. माणसं सगळीकडे सारखीच असतात. त्यामुळे त्या नियमानेच वरील वाक्य लिहीले आहे.
मग फक्त मंडळंच का? आज कुठला धंदेवाला खरा जमाखर्च लिहितो? कुठली कंपनी खरे हिशेब सादर करते?
म्हणजेच देवधर्मसुद्धा आता 'धंदा' झाला आहे. हा माझा मुद्दाच तुम्ही मान्य केला आहे.
का नाही होणार? आपण त्या संदर्भात एखादी जनहित याचिका दाखल करून स्वत: कधी असा प्रयत्न करून पाहिला आहे काय असे विचारू इच्छितो...!
तात्या, माझ्या ताकदीतल्या सर्व गोष्टी मी करतो. (घरच्यांचा विरोध पत्करून) पण देशातला सर्वच्या सर्व भ्रष्टाचार मी कसा रोखू? आणि रोखू शकत नसेन तर बोलू ही नको, असे तुम्हाला सुचवायचे आहे का?
एक उत्तम कलाकृती म्हणून भव्यदिव्य मूर्ती एखाद्या कलाकाराबे घडवली तर तिथे भक्तिभाव हा नसतोच असे आपल्याला म्हणावयाचे आहे किंवा कसे?
कलाकाराच्या मनांत कदाचित भक्तीभाव असेलही पण मंडळाच्या मनात असेलच असे नाही. मोठमोठ्या मुर्ती बनविण्याची स्पर्धा मात्र त्यातून सुरू होते. मोठ्या मुर्ती बनवायच्या, मोठमोठे देखावे बनवायचे त्या साठी मोठमोठी वर्गणी गोळा करायची. त्या साठी दहशतीचाही वापर करायचा. असे सर्व भव्य दिव्य करून जास्तीतजास्त भाविकांची(?) गर्दी 'खेचून' आणायची, पर्यायाने भरपूर कमाई करायची.
इथे तोंड बंद करण्याचा विषय कुठे आला हे कळले नाही. निदान व्यक्तिश: मी तरी आपल्याला दिलेल्या कोणत्याच उप-प्रतिसादात आपले तोंड बंद केले आहे किंवा आपली मुस्कटदाबी केली आहे असे मला वाटत नाही! असल्यास अवश्य दाखवून द्या, मी आपली क्षमा मागेन.
तात्या, माझा हा प्रतिसाद आपण व्यक्तिशः का घेताय? सर्वत्र होणार्या वरील चर्चांचा शेवट 'ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा प्रश्न आहे ' अशा वाक्यानेच होतो. त्यालाच मी माझ्यासारख्यांचे तोंड बंद करणे म्हणतो.
त्यामुळे त्या नियमानेच वरील वाक्य लिहीले आहे.
नियमाला अपवाद असतात!
म्हणजेच देवधर्मसुद्धा आता 'धंदा' झाला आहे. हा माझा मुद्दाच तुम्ही मान्य केला आहे.
गैरसमज होतो आहे. उद्योगधंदा हाच जर देवधर्म मानला तर त्यात तरी प्रामणिकपणा कुठाय असं मला विचारायचं होतं! त्यात सुद्धा अप्रामाणिकपणे हिशेब दाखवला किंवा कर चुकवला जातोच की! मग फक्त गणेशोत्सव मंडळच अप्रामाणिक आहेत हे म्हणण्याचा काय मतलब? की उद्योगधंद्यात देवधर्म नसतो?
पण देशातला सर्वच्या सर्व भ्रष्टाचार मी कसा रोखू? आणि रोखू शकत नसेन तर बोलू ही नको, असे तुम्हाला सुचवायचे आहे का?
असं मला मुळीच म्हणायचं नव्हतं! मला फक्त "क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे" एवढंच सांगायचं होतं!
कलाकाराच्या मनांत कदाचित भक्तीभाव असेलही पण मंडळाच्या मनात असेलच असे नाही.
हो पण नसेल असंही नाही!
त्या साठी दहशतीचाही वापर करायचा. असे सर्व भव्य दिव्य करून जास्तीतजास्त भाविकांची(?) गर्दी 'खेचून' आणायची, पर्यायाने भरपूर कमाई करायची.
इतर गणेशोत्सव मंडळांच्या बाबतीत मला माहिती नाही त्यामुळे त्यांबाबत मी कोणतीच विधाने करणार नाही, परंतु लालबागच्या राजाच्या संदर्भात काही स्पष्टीकरण (गरज नसतांनाही!) देऊ इच्छितो...
आपले मुद्दे - १) दहशत, २) भव्यदिव्यता, ३) गर्दी खेचणे, कमाई करणे.
१) दहशत
लालबागच्या राजाच्या बाबतीत वर्गणीच्या बाबतीत कुठेही दहशत केली जात नाही. आपण गिरणगावातील कोणत्याही घरात जाऊन अगदी अवश्य विचारू शकता! गिरणगावातली तिसरी पिढीही आपल्याला याबाबत स्वच्छ निर्वाळा देऊ शकेल/देईल! दहशतीच्या अंमलाखालील कोणतीही परंपरा माझ्या मते ७५ वर्ष टिकू शकत नाही!
२) भव्यदिव्यता
भव्य-दिव्यतेबद्दल म्हणाल तर सुप्रसिद्ध कला-दिग्दर्शक नितिन देसाई यांनी ७५ व्या वर्षानिमित्त स्वत:हून या वर्षी लालबागच्या राजाची सजावट करायची इच्छा व्यक्त केली होती आणि गेले दोन महिने त्याने त्यावर स्वत: विनामूल्य मेहनत घेतली होती. आणि म्हणूनच लालबागच्या राजाच्या निमित्ताने आज गेले ८-९ दिवस लोकांना गिरणगावात एक अप्रतीम कलाकृती पाहायची संधी मिळत आहे. डोळ्याचं पारणं फिटावं इतकी सुरेख कलाकृती आज या निमित्ताने उभी राहिली आहे!
आणि केवळ लालबागचा राजाच नव्हे, तर आज अगदी मुंबई, पुणे, नागपुरापर्यंत अनेक गणेशोत्सव मंडळांनी लोकांच्या नजरेला सुखावेल असे उत्तमोत्तम देखावे केले आहेत. माझ्या मते हे देखावे हे आपापल्या जागी उत्तम कलकृती आहेत आणि गणेशोत्सवाच्या निमित्ताने लोकांना या कलाकृती पाहण्याचा आनद मिळत आहे!
३) गर्दी खेचणे, कमाई करणे.
लालबागच्या राजाला गर्दी खेचण्याची काहीही आवश्यकता नाही. उलटपक्षी, गर्दी मॅनेज करता करता आमच्या मंडळाचे सर्व कार्यकर्ते गेले १० दिवस अक्षरश: अहोरात्र उभे आहेत, थकून गेले आहेत! कमाईबद्दल म्हणाल तर या उत्सवातून मंडळाला जितकी कमाई होईल तितकं चांगलंच आहे. त्यामुळेच भविष्यातही मंडळाला अनेक लोकोपयोगी उपक्रम हाती घेता येतील! सतत दुर्मुखलेली टीका करण्यापेक्षा अहोरात्र झटून सार्वजनिक उत्सव उभा करून त्या कार्यातून काही रक्कम गोळा करणे व त्यातून लोकोपयोगी कार्य करंणे हे माझ्या मते निश्चितच कौतुकास्पद आहे!
तात्या, माझा हा प्रतिसाद आपण व्यक्तिशः का घेताय? सर्वत्र होणार्या वरील चर्चांचा शेवट 'ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा प्रश्न आहे ' अशा वाक्यानेच होतो. त्यालाच मी माझ्यासारख्यांचे तोंड बंद करणे म्हणतो.
आपण तोंड बंद करण्याचा उल्लेख केला होता. निदान या चर्चेअंतर्गत तरी माझ्यासकट कुणीही आपले तोंड बंद करत नाहीये इतकंच मलाही म्हणायचं होतं!
असो... मी आता इथेच थांबणे पसंद करतो. सबब, हा माझा शेवटचा प्रतिसाद!
अलिकडच्या काळातील साजर्या होणार्या उत्सवांबदल आपले किंवा साक्षिचे मतप्रदर्शन सरसकट चुकीचे आहे किंवा अयोग्य आहे असे मला मुळीच म्हणायचे नाही. आपण म्हणता त्याप्रमाणे, भपका-भडकपणा, भ्रष्टाचार, दहशत इत्यादी गोष्टी काही गणेशोत्सव मंडळात असतीलही! माझं म्हणणं फक्त इतकंच की आमचा लालबागचा राजा या सगळ्याला अगदी निर्विवादपणे अपवाद आहे कारण त्या उत्सवाचं कामकाज, त्याची कार्यपद्धती, त्याचं स्वरूप मी गेली १८ वर्ष खूप जवळून पाहात आहे!
लालबागच्या राजाचा उत्सवाबाबत आपल्या काहीही तक्रारी असतील तर त्या मला अवश्य कळवाव्यात, मी त्या योग्य व्यक्तिंपर्यंत पोहोचवीन. राजाच्या संकेतस्थळावरही मंडळाच्या प्रमूख पदाधिकार्यांचे भ्रमणध्वनी दिले आहेत - तिथेही आपण उत्सवाबाबत, उत्सवाच्या स्वरुपाबाबत, पैशांच्या व्यवहाराबाबत, तक्रार करू शकता. मंडळाला मिळालेल्या देणग्या, सोनंनाणं, इत्यादींचे ऑडिट कसे होते, हिशेब कसे ठेवले जातात, त्याचा व्यय कसा होतो याबद्दलही एक जबाबदार नागरीक या नात्याने कायदेशीर चौकशी करंण्याचा आपला अधिकर अबधित आहेच!
अर्रे लालबागच्या राजाचा विजय असो...
अर्रे ही शान कुणाची? लालबागच्या राजाची!
तात्या.
मी लालबागच्या गणपती विषयी लिहीलेले नाही हे वारंवार सांगूनही आपण विषय 'लालबागच्या राजा' कडेच वळवू पाहात आहात. त्यामुळे सारखे सारखे 'मी लालबागच्या गणपती विषयी लिहीलेले नाही' असा कंठशोष मी करणार नाही. आपल्याला त्यातूनच आनंद शोधायचा असेल तर मी काय करणार? मर्जी आपली.
सहमत आहे पेठकरकाका.
तात्यांशी पुर्ण सहमत.
आणि माणूस म्हणलं की होतंच कमीजास्त....
अभिषेकाला आलेल्यांना बाप्पाच्या पायावर डोकं ठेवायला मिळ्णं ते ही रांग न लावता, रांगेवर पोलीसांचा लाठीहल्ला...ह्या गोष्टी अमाप गर्दी+येणारा पैसा+सत्ता+सर्वसामान्यांची हतबलता ह्या सगळ्या परिस्थितीजन्य घटकांमुळे उपरोक्त घटना घडतात..आणि ते स्वाभाविक आहेच, मनुष्यस्वभाव दुसरं काय?
वैयक्तिकरित्या बोलायचं झालं तर, कोण्याही एकादशीला/चतुर्थीला/रामनवमी/कृष्णाष्टमी वगैरे देवांच्या पेश्शल दिवशी मी मंदीराच्या कळसाकडे पाहुन एक नमस्कार ठोकतो आणि घरी येऊन देवघरातल्या देवांवर हळद-कुंकू वाहुन २ पेढ्यांचा नैवेध्य दाखवतो...बस्स....
कारण देवळात जायचं कशाला? देवासाठी, त्या समाधानासाठी बरोबर?
मग ह्या अशा दिवशी लोटलेल्या अलोट गर्दीमुळे मनात भावना एकच येते...
"आपण भिकारी आहोत आणि समोर कोणी श्रीमंत दान करतोय" मग ते समाधान मिळतच नाही...
जे काय देवाशी भेटायचं बोलायचं असेल ते मी एखाद्या दुर्लक्षित आडबाजुच्या देवळात जाऊन निवांत बसुन करतो :)
आता, मंडईपासला दगडुशेठ गणपती काय, किंवा शनवारातला फारसा भेट न दिला जाणारा गुपचुप गणपती काय, दोघं एकच ना? मग त्या गर्दीत पाय चेंगरत, धक्के मारत, शिव्याशाप खात फक्त २ सेकंद दगडुशेठ बाप्पाचं दर्शन घेण्यात काय वेगळं? बसा ना मस्त तासभर गप्पा ठोकत ह्या शनवारातल्या बाप्पाशी.
:)
+++++++++++१
गर्दीत,धक्काबुक्की करत किवा तासंतास रांगेत उभे राहून कोणत्याच देवाचे दर्शन घ्यायला मला आवडत नाही,आपला कळसालाच नमस्कार!
शांतपणे दोन क्षण उभं राहून दर्शन घेता येईल अशा देवळात मी जाते.(देवळातच मूळात क्वचित जाते.)मंगळवार,चतुर्थ्या,सोमवार,त्यातही श्रावणी सोमवार, महाशिवरात्र असे त्या त्या देवांचे वार आणि सण टाळून जर देवळात गेले तर गर्दीलाही टाळता येते असा अनुभव आहे.
स्वाती
देवस्थानांचा बाजार झाला आहे हे खरेच. पण कोणताही धंदा हा ग्राहकांशिवाय चालत नसतो! लोक हजारो-लाखोच्या संख्येने देवळांपुढे रांगा का लावतात, हा समाजशात्रीय संशोधनाचा विषय आहे.
मी स्वतः कधीही शिर्डी-तिरुपतीला गेलो नाही. कधी जाईन असे वाटतही नाही. परंतु, बहुसंख्य जनतेला देवळाची (दर्गे-मशिदी, चर्चेस, गुरुद्वारा इ. सहित) "गरज" आहे, हे वास्तव आहे. म्हणूनच,
जर हा बाजार बंद करायचा असेल तर या देवस्थानांना रांगा लावणे बंद करा आणि आपला देव आपल्या मनात पूजा.
हे कितपत आचरणात येईल याची शंकाच आहे!
तिरुपतीला तर रीतसर देणगीप्रमाणे रांगा लागतात असे ऐकून आहे. वरकरणी पाहता हे गैर वाटेल. देवासमोर सगळे समान, हे बोलायला तत्व म्हणून ठीक आहे. पण "टाईम इस मनी " हे ध्यानात घेतले, तर ज्याच्याकडे वेळ कमी आहे (आणि खिशात पैसे आहेत) त्याने लवकर दर्शन घेतले तर त्यात फार काही गैर आहे, असे मला वाटत नाही. सर्वांच्या वेळेची किंमत सारखी नसते!
खरी आवश्यकता आहे ती समाज प्रबोधनाची. जसे पेप्सी आणि लेझ ही आपल्या शरीराची गरज नाही तसेच देऊळ ही आपल्या मनाची गरज नाही, हे जनतेला पटवून देण्याची.
पण हे शिवधनुष्य पेलणार कोण?
(पडक्या आणि ओसाड देवळात रमणारा) सुनील
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
लोक हजारो-लाखोच्या संख्येने देवळांपुढे रांगा का लावतात, हा समाजशात्रीय संशोधनाचा विषय आहे.
असं म्हणतात की विज्ञानाच्या प्रसाराने अंधश्रद्धा मागे पडून समाजाला सत्यचा बोध होईल अशी आशा होती. परंतु, झाले नेमके उलटे. विज्ञानाच्या प्रसाराने उद्योगधंदे वाढले. 'ग्लोबल व्हिलेज' ही संकल्पना सत्यात उतरली. जग लहान झालं. पण स्पर्धा वाढली. व्यावसयिक चढाओढ सुरू झाली. मानवी जीवनाची गती चक्कर येण्या इतपत वाढली. स्पर्धेत आपण मागे पडू ही भीती वाढली. वैफल्य आणि असुरक्षितता वाढली. माणसाला असहाय्यता भेडसावू लागली आणि तो मनःशांतीसाठी देवधर्माकडे पुन्हा (आणि जास्तच ) वळला. आपला त्राता, वाली , तारणहार म्हणून तो देवाकडे पाहू लागला.
'ग्लोबलायझेशन' चे हे तोटे झाले तसाच सुशिक्षित अशा मोठ्या वर्गाचा फायदाही झाला. नवश्रीमंती दारी आली. आर्थिक भरभराट होऊन भौतिक सुखे हात जोडून दाराशी उभी राहू लागली. अचानक आलेल्या ह्या श्रीमंतीने तोही भांबाहून गेला. ही सुख-समृद्धी अचानक आपल्याला सोडून गेली तर काय? ह्या भीती पोटी हा समृद्ध समाजही देवाच्या चरणी शरण गेला. प्रार्थना करू लागला,' बाबारे! तुझ्या कृपेने आलेली ही समृद्धी अशीच वृद्धींगत होऊ दे कधी कमी होऊ देऊ नकोस. मी सत्यनारायण घालीन, तुझे उपास करेन, दर अमुक-अमुक दिवशी तुझ्या दर्शनाला येईन पण तुझी कृपादृष्टी अशीच माझ्यावर राहू दे.' अशा प्रकारे गरीब-श्रीमंत दोन्ही वर्ग, सगळा समाज देवाच्या चरणी लीन-दीन होत्साता देवधर्माला लागला.
काय प्रकार झाला तो मि पहिला नस ल्यामुळे त्याबद्दल बोलत नाहि पण एवढे मात्र खरे आहे कि त्याचे कार्यकर्ते गेले महिनाभर
दिवसरात्र मेहनत करतात झोप येवु नये म्हनुन गोळ्या घेतात, जेमतेम १ तास झोप घेतात इ. त्यामुळे एखद वेळेस असे कहि झाले असेल तर .... झाले ते चुक असेल पण म्हनून लगेच असे म्हणणे बरोबर नाहि आहे असे वाटते कारण त्यान्चे सामाजिक कार्य पण खुप चालते शेवटि गर्दिला आवर घालणे कहि वेळेस कठिण होते. माणुस म्हणला कि थोडे फार होणारच असे म्हणायचे आणि सोडुन द्यायचे काय !
आमच्या कंपनीने शेगावच्या गजानन महाराज संस्थानासाठी मोठमोठ्या कंपन्यांमधे लागणारी एस्.ए.पी. सिस्टीम (प्रचंड महाग) त्यांच्या वित्तीय कामासाठी रूजू केली तेव्हा एका पेपरामधे "भक्तांची सोय" म्हणून बातमी प्रसिद्ध झाली होती. त्याच पेपरातील गुलाबी पुरवणीमधे ही देवळं म्हणजे "नवा बिजनेस सेक्टर" उघडल्याचं पेपरात आलं होतं. :)
शेवटी हा दृष्टीकोनाचा प्रश्न आहे असे वाटते.
-(बिजनेसमन भक्त) ऋषिकेश
१. अनेक भक्त येतात म्हणून काही चतुर माणसे बाजार भरवतात. त्यांना प्रतिबंध केलाच पाहिजे.
२. अनेक लोक येतात म्हणून चतुर माणसे त्याचा बाजार करतात या साठी समजुतदार लोकांनी काही दिवस रांगांतील गर्दीत आपला सहभाग ठेउ नये हे आवाहन ठिक आहे. मला तो उपाय वाटत नाही.
काही पाहिजे आहे म्हणून लोक देवाला विनवणारच. असलेले टि़कूदे म्हणूनही ते देवाला विनवणारच.
देव चराचरात आहे असे म्हटले तरी तो मूर्तीमध्ये दिसतो. जाणवतो म्हणून मूर्ती असणारच. स्थानमहात्म्य असल्याने एखाद्या स्थळाला गर्दी होणारच.
याचा फायदा घेणार्या चतुर मंडळींना बाजार मांडण्यापासून रोखले पाहिजे यासाठी सहमत. देवापुढे सर्व सारखे.
-- (देवभक्त) लिखाळ.
आज संध्याकाळपासून सातत्याने अनेक वाहिन्या लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेलेल्या एका महिलेला तिथल्या 'कार्यकर्त्या'ने अक्षरश: ढकलुन, अवमानित करून हाकलले त्याचे प्रक्षेपण करीत आहेत. संपर्क साधला असता उत्सवाचे प्रमुख उपलब्ध नाहीत वा कॅमेर्यासमोर येत नाहीत असे काही वाहिन्या सांगत आहेत तर एका वाहिनीवर लालबाग राजा चे श्री. सुनिल जोशी यांनी 'ती महिला चपला घालुन व विशेष महत्वाच्या व्यक्तिंकरीता असलेल्या रांगेत जात होती व तिने सांगुन न ऐकल्यामुळे नाइलाजाने कार्यकर्त्यांना असे वागावे लागले' अशी मल्लिनाथी केली.
साक्षिदेवा, या संदर्भात मंडळाने त्यांच्या संकेतस्थळावर त्वरीत खुलासा करून सर्वांची जाहीर क्षमा मागितली आहे.
इथे वाचता येईल!
तात्या.
एक वेबसाईट म्हणून ही वेबसाईट आवडली. सोपी मांडणी, आवश्यक गोष्टी.
मस्त!
('मिसळ'लेला) ऋषिकेश
एक वेबसाईट म्हणून ही वेबसाईट आवडली. सोपी मांडणी, आवश्यक गोष्टी.
ऋषिकेशराव,
हे संकेतस्थळ उभारणारे श्री भरत भुजबळ यांना इथे ऐकता येईल.
धन्यवाद....
तात्या.
देवभक्ती .. त्याचे दर्शन का प्रदर्शन.. हा विषय सोडुन मिपा वरील अनुभवी मंडळी वेगळ्याच विषयाकडे जात आहेत असे वाटते. तात्या व पेठकर या दोन्ही अनुभवी मंडळी कडुन दोन वेगळे विषय वाचायला मिळाले, त्या साठी सर्वप्रथम आभार.
देवाची भक्ती व ती करण्यासाठी वापरलेला मार्ग हा खरेतर वैयक्तिक विचारधारेचा एक भाग आहे , पण एखादा मनुष्य जर आंधळेपणाने ते करत असेल तर त्याला प्रबोधन करणे हे आपले कर्तव्य आहे. प्रसिद्ध (स्वःत असलेल्या व श्रीमंत भक्तांनी केलेल्या) देवांसमोर होणारी भपकेबाज भक्ती प्रदर्शने टाळण्यास आपण निश्चितच प्रबोधन करुया पण त्याच बरोबर हि मंडळे राबवत असलेले स्तुत्य उपक्रम गरिब व गरजु जनतेपर्यंत कसे पोचवता येतिल ते पण आपण बघितले पाहीजे.( तात्यांनी दिलेली डोळ्यांच्या मोफत शस्त्रक्रियेची माहीती गरजु व्यक्तिंना देणे व शक्य झाल्यास त्यांना तिथे पर्यंते पोचवणे हा त्यातील एक भाग होउ शकतो).
पण त्याच बरोबर हि मंडळे राबवत असलेले स्तुत्य उपक्रम गरिब व गरजु जनतेपर्यंत कसे पोचवता येतिल ते पण आपण बघितले पाहीजे.( तात्यांनी दिलेली डोळ्यांच्या मोफत शस्त्रक्रियेची माहीती गरजु व्यक्तिंना देणे व शक्य झाल्यास त्यांना तिथे पर्यंते पोचवणे हा त्यातील एक भाग होउ शकतो).
सहमत आहे! मंडळाच्या उपक्रमांतर्गत डॉ लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली होणार्या डोळ्यांच्या शस्त्रक्रियेबद्दल अधिक माहिती कृपया इथे वाचा.
त्याचप्रमाणे मुंबईतील के ई एम, नायर, सायन, टाटा मेमोरियल, वाडिया, जे जे, आदी काही सरकारी व निमसरकारी रुग्णालयातून काही गरजूंना मोफत उपचार मिळतील याकरता मंडळाच्या वतीने सहाय्य केले जणार आहे! कृपया इथे वाचा!
धन्यवाद....
अरे लालबागच्या राजाचा विजय असो....! :)
तात्या.
सर्वसाक्षींचे उत्तम विवेचन!
लालबागचा राजाची आजमीतीस अनेक वर्षे प्रतिष्ठापना केली जात आहे. मुंबईकरांचा हा लाडका गणपती. मुंबईकरांनी त्याच्यावर प्रेम केले, त्याचे स्तोम माजवले नाही.
नागपाड्याला रहात असल्या पासून त्याचे दर्शन विसर्जन मिरवणूक पहाताना होत असे. ह्याच्यावर मुंबईकरांचे इतके अलोटप्रेम, की ह्याची विसर्जन मिरवणूक अनेक ठिकाणी पूजा स्विकारीत, सर्वात शेवटी गिरगांव चौपाटीवर पोहोचते.
नागपाडा पोलीस ठाण्यातर्फे त्याची यथोचीत पूजा विसर्जन मिरवणूक नागपाडा चौकात आल्यावर दरवर्षी होते.
परंतु मुद्दाम लालबागला जाऊन त्याचे दर्शन घ्यावेसे वाटले नाही.
महालक्ष्मी, मुंबादेवी, पिकेटरोडचा मारूती, सिद्धीविनायक, हाजी अल्ली, माहिमचा दर्गा, मतमाऊली (माऊंटमेरी) इ. मुंबईची पारंपरीक दैवते.
लोक या देवस्थानांना यथासमयी भेट देत (व आजही) देतात. परंतू, सिनेस्टार, उद्योगपती ई. नी ह्यातील काही स्थळांचे स्तोम माजवले.
अनवाणी चालत दर्शनाला येणे, मोठ्मोठाल्या देणग्या देणे, इ. प्रकारकेल्याने ह्यातील काही देवस्थाने सामान्यांना अप्राप्य झाली.
लालबागच्या राजाबाबतही हेच झाले.
लोकांनी आपल्या सवयी बदलणे आवश्यक आहे. इतक्या गर्दीच्या स्थळी तासनतास रांगेत ऊभे राहील्याने देव पावतो ह्या समजूतीतून बाहेर पडणे आवश्यक आहे.
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
नागपाड्याला रहात असल्या पासून त्याचे दर्शन विसर्जन मिरवणूक पहाताना होत असे. ह्याच्यावर मुंबईकरांचे इतके अलोटप्रेम, की ह्याची विसर्जन मिरवणूक अनेक ठिकाणी पूजा स्विकारीत, सर्वात शेवटी गिरगांव चौपाटीवर पोहोचते.
वा अभ्यंकरसाहेब! फार सुंदर असतो हा विसर्जन सोहळा! सर्वत्र अत्यंत उत्साहाचे वातावरण असते. ज्या वेळेस आदल्या दिवशीपासून राजासोबत विसर्जनाला जाणे शक्य होत नाही तेव्हा आम्ही दुसर्या दिवशी पहाटे गिरगाव चौपाटीवर पोहोचतो. अंदाजे साडेसात-आठच्या सुमारास सबंध गिरगाव चौपाटी परिसरात, "राजा आला! राजा आला!" अशी चर्चा पसरते आणि लांबूनच मोठ्या दिमाखात राजा येताना दिसतो!
समुद्रानजिक आल्यावर राजाची आरती होते. सबंध गिरगाव चौपाटीवर हजर असलेल्या अंदाजे वीस ते पंचवीस हजाराच्या वर असलेला जनसमुदाय या आरतीत सामिल होतो! खूप सुंदर अनुभव असतो तो! आणि त्यानंतर राजाचे थाटामाटात विसर्जन!
राजाचे विसर्जन सर्वात शेवटी हा अलिखित नियम आहे. राजाच्या विसर्जनानंतर मुंबईतला गणेशविसर्जन सोहळा आटपतो व मंडळी आपापल्या घरला परततात!
संजयराव, येता का रविवारी? साधारणपणे सकाळी अकरा-बाराच्या सुमारास राजा लालबागहून निघेल तो दुसर्या दिवशी सकाळी चौपाटीवर पोहोचेल. माझा सुरवातीपसूनच जायचा विचार आहे. येता काय माझ्या संगती? :)
तात्या.
मी गणेशभक्तही आहे आणि उत्सवप्रेमीही आहे.
किंबहुना आपले उत्सव हे रोजचे ताणतणाव, भेदाभेद, काळज्या हे सगळे विसरायला लावतात.
इथे माझा मुद्दा आहे तो देवा धर्माचा व्यापार करण्याला विरोधाचा.
मुळात या चर्चेत नाहक 'लालबागचा राजा' वेठीला धरला गेला - म्हणजे केंद्रबिंदु झाला. वास्तविक तो सर्व मुंबईकरांना आराध्य आहे, लालबाग मंडळही त्यांच्या सामाजिक जाणीवेसाठी ख्यातनाम आहे. जेव्हा एखादी संस्था वा व्यक्ती 'आदर्शपदाला' पोचते तेव्हा तिला विशेष जबाबदारीने वागावे लागते. या मंडळाचे कार्य उत्तम आहे, हा देव आराध्य आहे तर सर्वसामान्य आणि खासे असा भेदाभेद दर्शनाला का?
अतिमहत्वाच्या व्यक्ति म्हणजे राजकारणी, कलाकार, खेळाडु वगैरें बाबत एक प्रश्न. यांना देवाचे दर्शन घ्यायचे आहे की देवाला यांचे? जर यांना घ्यायचे असेल तर त्यांनी देवाच्या दारी एक भक्त म्हणुन चार चौघांसारखे दर्शन घ्यावे. जर कामाचा व्याप वा सुरक्षेचा प्रश्न या कारणास्तव त्यांना तसे दर्शन घेता येत नसेल तर त्यांनी आपले काम, आपले पद वा आपली कला यालाच देव मानावे व पुढे निवृत्तीनंतर जेव्हा वेळ असेल व सुरक्षा रक्षकांची गरज नसेल तेव्हा रांगेत यावे! थोरले माधवराव पेशवे जेव्हा दरबार खोळंबुन पूजा अर्चा करत रमले व कामकाज खोळंबले तेव्हा न्या. रामशास्त्रींनी त्यांची कान उघडणी केल्याचा प्रसंग स्वामी मध्ये आहे ते इथे जरा वेगळे पणे लागु आहे असे वाटते. मुळात ज्याचे त्याला समजायला हवे. मात्र आपले पद, अधिकार, नावलौकीक, बघायला जमणारी गर्दी हे डोक्यात गेलेले उन्मत्त आपल्याला विशेष वागणुक मिळावी असा हक्क समजतात. आणि संस्था वा संस्थाने तो मान्यही करतात! का? कशासाठी? जर राजकारण्यांचे फाजील लाड करायला नकार दिला तर ते बडगा उगारतील अशी भिती निदान लोकांचे आराध्य दैवत असलेल्या कुठल्याही देवस्थानाला का असावी? समजा या संस्था वा संस्थानांनी 'इथे दर्शनाला सर्वांना एकच समाईक रांग आहे असे ठणकावुन सांगितले आणि त्याचा डूख ठेवुन कुणी या संस्था वा संस्थानांना बंद करायचा घाट घातलाच तर त्यां संस्था वा संस्थानांना असे केवळ एक निवेदन बास आहे. आपल्या विघ्नहर्त्यावर विघ्न आणु पाहणार्यांना धडा शिकवायला जर जनता रस्त्यावर उतरली तर त्या मुजोराला पळता भुई थोडी होईल - मग तो मंत्री असो वा भाई असो. ठाण्याला गावदेवी मैदानातील भाजीबाजारच्या सत्यनारायणाच्या पूजेत दारू पिऊन अरेरावी करत देवाला धक्का लावायला निघालेल्या एका कुख्यात गुंडाला लोकांनी उस्फुर्तपणे धोपटुन ठार केले होते. १९८४ च्या दंगलीत शितलादेवी मंदीर फोडायला दुसर्या धर्माचे लोक येणार अशी नुसती अफवा उठली होती तर भयंकर परिस्थिती व जमावबंदी याची तमा न बा़ळगता हजारो लोकांनी थेट शिवाजी उद्यान ते माहिम अशी भींत उभी केली होती.
पैसे आहेत व वेळ नाही अशांना पैसे घेऊन दर्शन घेऊ देणे कसे काय योग्य ठरते? मग तिकिटाचा काळा बाजार कायद्याने गुन्हा का? ज्यांना वेळ नाही दर्शन घेऊ नये! आपला वेळ महत्वाचा की दर्शन हे ज्याचे त्याने ठरवावे. पैशाच्या जोरावर देव विकत घेण्याची ही गुर्मी कशाला? देव म्हणजे काय विकत घेता येणारी वस्तू आहे का? पैसे आहेत तर घराच्या आवारात स्वतंत्र मालकिचे देऊळ बांधुन घ्या की!जर दर्शनाला आलेली व्यक्ती खरी भाविक असेल तर लोक रांगेत उभी असताना तो त्यांना डावलुन दर्शनाला जाणार नाही. किंबहुना संतांच्या दंतकथांमध्ये आपल्या पट्टशिष्याला गर्व झाल्याचे व भक्तांना तो अरेरावीने वागवत असल्याचे वा आपल्या दर्शनाला प्रत्यवाय करीत असल्याचे जेव्हा संतांच्या निदर्शनास आले तेव्हा त्यांनी त्या शिष्यांना अद्दल घडविल्याचे वाचनात आहे.
जर पैसा आहे तर तो घ्या आणि दर्शन द्या हे ठरविणारे विश्वस्त कोण? आणि ते जर योग्य असेल तर आपल्या कायद्यात सुधारणा करावी लागेल. एखाद्या धनिकाने खून केला व त्याला ऐपत आहे पण तुरुंगवासाचे कष्ट व मानहानी नको असेल तर त्याला त्याच्या ऐवजी एखाद्या गरजूला तुरुंगात पाठवायची मुभा कायद्याने द्यावी लागेल. त्या मोबदल्यात तो सरकारला दंड व गरिबाला पैसे देईल.
उत्सवात गर्दी होते. स्वयंसेवकांवर ताण येतो. साहजिकच चिडचिड होते, संताप होतो. पण त्याचा वचपा सर्वसामान्यांवर निघतो; कुणा खाशावर नाही निघत!
आपला देव हा देवच असावा कुणा मर्त्य मानवाच्या हातातील व्यापाराचे साधन होऊ नये; लोकांना आपला देव व धर्म याचे अप्रिय वाटेल असे स्वरूप येऊ नये हीच तळमळ. देव हा भक्ताचाच असला पाहिजे. त्यावर सत्ता व धनाची मालकी नको.
व्वा साक्षी,
सुंदर विवेचन. आवडले.
मग तिकिटाचा काळा बाजार कायद्याने गुन्हा का?
काळाबाजाराचे सोडा पण थिएटराच्या पहिल्या आणि शेवटच्या रांगाच्या टिकिटाचे दर सारखे नसतात. सार्वजनिक वाहतूकीतही प्रवासाच्या (म्हणूनच प्रवाशांच्याही) वेगवेगळ्या श्रेणी असतात. मुंबईहून दिल्लीला जाण्यासाठी ३६ तासाचा रेल्वेच्या विनाआरक्षित डब्बा ते पावणे दोन तासाचा विमानाचा बिझनेस क्लास असे अनेक पर्याय उपलब्ध आहेतच शिवाय संध्याकाळी कचेरीतून स्टेशनवर उतरल्यावर घरी जाण्यासाठी बस किंवा रिक्शा असे पर्यायदेखिल उपलब्ध असतात.
पैसे देणार्यालाच जामिन मिळतो हे सर्वश्रुत आहेच पण न्यायालयाचे काही निकालही - अमुक रक्कम दंड आणि दंड न भरल्यास अमुक काळ कैद असे दिलेले आढळतात.
थोडक्यात, किंमत मोजण्याची तयारी असणार्यास वेळ आणि अधिक सुविधा देणे हे समाजमान्य तर आहेच पण सरकारमान्य आणि काही प्रमाणात न्यायालयमान्यदेखिल आहे.
तेव्हा लाखभर रुपये मोजून (हा केवळ अंदाज कारण मी काही तिरुपतीला गेलो नाही) दहा मिनिटात दर्शन घेणे गैर कसे? शेवटी त्याने मोजलेल्या रकमेतील काही भाग तरी इतरेजनांच्या सोयी-सुविधेसाठीच खर्च होणार असतो.
शेवटी अंतू बर्वा म्हणतो तेच खरे, "झाडाचे एक पानदेखिल नसते हो दुसर्यासारखे. समाजवादाच्या गप्पा आहेत नुसत्या गप्पा!"
सुनील व्यवहारे
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
<काळाबाजाराचे सोडा पण थिएटराच्या पहिल्या आणि शेवटच्या रांगाच्या टिकिटाचे दर सारखे नसतात. सार्वजनिक वाहतूकीतही प्रवासाच्या (म्हणूनच प्रवाशांच्याही) वेगवेगळ्या श्रेणी असतात. मुंबईहून दिल्लीला जाण्यासाठी ३६ तासाचा रेल्वेच्या विनाआरक्षित डब्बा ते पावणे दोन तासाचा विमानाचा बिझनेस क्लास असे अनेक पर्याय उपलब्ध आहेतच शिवाय संध्याकाळी कचेरीतून स्टेशनवर उतरल्यावर घरी जाण्यासाठी बस किंवा रिक्शा असे पर्यायदेखिल उपलब्ध असतात.>
चित्रपट गृहे, विमानवाहतुक वगैरे नफा कमावण्यासाठी स्वतःच्या हिमतीने/ पैशाने (यात समभागातुन उभारलेला निधीही आला)/ नियोजनाने चालु झालेल्या व्यापारी संस्था आहेत. गाडीत वेगवेगळे डबे वेगवेगळ्या दर्जाचे यात व्यवहार आहे, थोडा अधिक आराम, अधिक जागा यासाठी अधिक दर रास्त आहे. पुन्हा ही वाहतुक सरकारच्या स्वामित्वाखाली आहे.
ज्या देवाची बोली लागतोय तो देव ही विश्वस्तांची मालमत्ता नव्हे! परस्पर देवाचा लिलाव!
बाकी तिरुपती, श्री सिद्धिविनायक वगैरे देवस्थानांचे विश्वस्त होण्यासाठी इतकी अहमहिका का हो? बाकी कुठल्या सामान्य देवळात यांना रस का नसावा?
ज्या देवाची बोली लागतोय तो देव ही विश्वस्तांची मालमत्ता नव्हे! परस्पर देवाचा लिलाव!
कृपया कोर्टात जनहित याचिका दाखल करा!
साक्षिदेवा, एक लक्षात ठेव,
क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे!
तात्या.
तात्या,
जिथे दर्शन विकले जाते तिथले दर्शन घेणे मी कटाक्षाने टाळतो. जिथे मनाजोगे दर्शन सहज मिळते व जिथे कुणाची अरेरावी नसते अशा देवळात जायला मला आवडते, आपल्या ठाण्यात आहेत अशी देवळे. क्रिया झालीच आहे, थोडी वाचाळता असायला हरकत नाही, आपले विचार बरोबर की चूक ते समजायला नको? लोक सहमत असल्यास त्यांचे विचार काय ते पाहायला नको? जर आपले चुकते आहे असे समजले तर सुधारायला नको?
बाकी जनहित याचिका. अरे प्रत्येकाची सीमेवर जाऊन लढायची ताकद व तयारी नसते. पण निदान जे लढताहेत त्यांचे कौतुक व त्यांना करता येइल त्या मार्गाने मदत करायला काय हरकत आहे? जनहीत याचिका दाखल करणे ही एकमेव कृती नव्हे. पण ते शक्य नसेल म्हणुन काहीच करायचे नाही? निदान आपले मत मांडून जागृति करण्यास हरकत नसावी. सगळेच तुकोबा नसतात पण लाखो वारीला सामान्य वारकरी म्हणुन जातात की.
जनहीत याचिका दाखल करणे ही एकमेव कृती नव्हे. पण ते शक्य नसेल म्हणुन काहीच करायचे नाही? निदान आपले मत मांडून जागृति करण्यास हरकत नसावी.
हा मुद्दा पटण्याजोगा आहे...
तात्या.
(काही प्रमाणात सर्वसाक्षींच्या वरील प्रतिसादाशी सहमती दर्शवतो आहे. पण मथळ्याशी असहमती.)
ज्या बाजारात ग्राहक आणि विक्रेते दोघेही स्वखुशीने भाग घेतात, असा कुठलाही बाजार बंद करू नये, असे मला वाटते.
विक्रीस ठेवलेली वस्तू आपल्याला नको असेल, किंवा त्याहून अधिक दर्जेदार वस्तू आपल्यापाशी असेल (म्हणजे धनदांडगी नसलेली श्रद्धा) तर वेगळे मंडळ स्थापावे. समविचारी लोक तिथे जमतील. बाजार बंद न करताही जमतील.
त्याच विशिष्ट देवतेपाशी जर कोणाला जायचे असेल, तर विचार करावा - ते देवस्थान कोणाची वैयक्तिक मालमत्ता आहे का? (आमच्या घराण्यात असे एक दत्ताचे देऊळ होते.) तसे असल्यास त्या कुटुंबात जन्म घेण्यावेगळा तुम्हाला पर्याय नाही. मंडळ सरकारमान्य प्रतिष्ठान/ट्रस्ट असेल (पंढरपूर, वगैरे), तर ट्रस्ट कायद्याचे उल्लंघन होत असेल तर त्याविषयी तुम्ही काही करू शकता. कायद्याचे उल्लंघन होत नसेल तर असा विचार करावा : तुमची श्रद्धा-पद्धती खरी आणि ट्रस्ट बसवणार्यांची श्रद्धापद्धती खोटी याबद्दल तुम्हाला खात्री आहे का? तसे असल्यास ट्रस्टीमंडळींना बदला.
प्रयत्न करूनही तसे जमत नसेल, तर तुमची श्रद्धा-पद्धती ही लोकांना पटत नाही, असे सिद्ध होते. मग त्यांना न पटता त्यांची पद्धती (बाजार म्हणून) बंद करण्याचा आग्रह करणे म्हणजे मुजोरी होईल.
पुन्हा मग "तुमचा भाव तिथे तुमचा देव" - तुमच्या मते योग्य रीतीने चालणार्या देवस्थानाची स्थापना करा.
मस्त लिहिलेत सर्वसाक्षी तुम्ही! पूर्ण सहमत.
<ज्या बाजारात ग्राहक आणि विक्रेते दोघेही स्वखुशीने भाग घेतात, असा कुठलाही बाजार बंद करू नये, असे मला वाटते>
मग शिधावाटप केंद्रां ऐवजी खाजगी व्यापार्यांना धान्य विकणे हे कायदेशीर ठरावे का? आणि गुन्हा ठरू नये का?
वेश्याव्यवसायाला लावण्यासाठी मुली पळवुन आणणे व दलालाने त्या कुंटणखान्यात विकणे हे ही कायदेशीर ठरावे का? आणि गुन्हा ठरू नये का? दोन्ही उदाहरणात ग्राहक आणि विक्रेते मोठ्या खुशीने सौदा करीत आहेत.
<विक्रीस ठेवलेली वस्तू आपल्याला नको असेल, किंवा त्याहून अधिक दर्जेदार वस्तू आपल्यापाशी असेल (म्हणजे धनदांडगी नसलेली श्रद्धा) . >
तेच तर म्हणतोय. रांगा लावु नका, आपल्या मनीचा देव मनीच पूजा. बाकी देव ही विक्रीची वस्तू आहे का?
<तर वेगळे मंडळ स्थापावे. समविचारी लोक तिथे जमतील. बाजार बंद न करताही जमती> प्रबोधन करता येत नाही असे स्विकारून ही पळवाट का पकडावी? रस्त्यात दगड आहे, लोक ठेचकाळत आहेत. तो उचलायचा व दूर करायचा प्रयत्न करायचा, मदतीसाठी पांथस्थांना हाक द्यायची की 'मला काय करायचे आहे' असे म्हणुन वळसा घालुन निघुन जायचे?
<तुमची श्रद्धा-पद्धती खरी आणि ट्रस्ट बसवणार्यांची श्रद्धापद्धती खोटी याबद्दल तुम्हाला खात्री आहे का? तसे असल्यास ट्रस्टीमंडळींना बदला. प्रयत्न करूनही तसे जमत नसेल, तर तुमची श्रद्धा-पद्धती ही लोकांना पटत नाही, असे सिद्ध होते. मग त्यांना न पटता त्यांची पद्धती (बाजार म्हणून) बंद करण्याचा आग्रह करणे म्हणजे मुजोरी होईल.>
अरे वा! एकही मंत्री भ्रष्टाचारात सापडत नाही, तुरुंगात जात नाही म्हणजे भ्रष्टाचार नाहीच असे मान्य करायचे की सर्वत्र भ्रष्टाचार सर्वत्र होत आहे आणि आपल्याला पटत नाही तेव्हा तो बंद कराची मुजोरी न करता आपणही त्यात सहभागी व्हायचे?
असो. ज्याची त्याचे विचारसरणी.
समजले नाही. जरा स्पष्ट करून सांगावे.
मुळीच कळले नाही. खाजगी लोक किराणा कायदेशीरपणे विकताना खूपदा बघितले आहे. आता येथे जर शिधावाटपखात्याच्या मालकीचे धान्य खाजगी विक्रेता विकत असला तर गुन्हा आहे. पण गणपती मंडळ त्या विशिष्ट मूर्तीचे दर्शन विकते आहे. तुमच्या भावात भरलेला देव विकत नाहीत - तुमच्या मनातला देव विकत असते तर चोरी झाली असती, वगैरे.
मुलींना पळवून आणणे वगैरेबद्दल मी एक लेख मागे लिहिला होता - मुली आपखुशीने विकत नसतात हीच त्या बाजाराची माझ्या मते अनैतिकता आहे. पण मुली पळवल्याच्या उपमेसारखे या देवदर्शनाच्या बाजारात काय पळवत आहेत? त्या विशिष्ट मूर्तीचे दर्शन कोणाच्या मालकीचे आहे, आणि मंडळ ते पळवून विकते आहे - हे कळले नाही.
इथे बहुधा आपली सहमती दिसते आहे. मग एवढा जोरदार रागावलेला प्रतिसाद का दिलात ते समजले नाही. देव विकता येत नसेल, कारण देव ही अनंत कल्पना आहे. एखाद्या विशिष्ट मूर्तीचे दर्शन मात्र सीमित वस्तू आहे - दहा दिवसांत अमुक एक लाखच लोक दर्शन घेऊ शकतात. त्याची सोय करायला पैसे लागतात. हे दर्शन विकणे, म्हणजे देव विकणे, असे तुम्ही म्हणत आहात काय - म्हणून आदल्या सहमतीत असहमतीचा सूर आला काय? पण दर्शन विकत घेणार्या लोकांचे काय मत आहे? ते विशिष्ट मूर्तीचे दर्शन विकत घेत आहेत, की देव विकत घेत आहेत? त्यांचे मन याबाबतीत स्पष्ट असले तर पुरे. तुम्हाला मला दर्शन विकत घ्यायचे नसले, तर आपण त्या बाजारात जाऊ नये. ज्यांना दर्शन विकत घ्यायचे असेल ते लोक त्या बाजारात जातील.
येथे प्रबोधनाचा कुठला विषय आहे, आणि कुठून वळसा घालून निघायचे हे कळत नाही. ज्यांना लालबागच्या गणपतीलाच जायचे आहे, त्यांना "तिथे जाऊ नका - मनातल्या देवाला पूजा" असे प्रबोधन करायचे आहे का? जरूर करा. पण हे रस्त्यातल्या धोंड्यासारखे नाही. योग्य उपमा गजबजलेल्या रस्त्याची आहे - "अमुक रस्त्यावर ट्राफिक जॅम आहे, तिथून न जाता तमुक रस्त्याने सहज जाता येईल" हे प्रबोधन झाले. पण तो गजबजलेला, ट्राफिक जाम झालेला रस्ता बंद पाडा, असे म्हणणे योग्य वाटत नाही.
येथे भ्रष्टाचाराचा काय संबंध आहे हे कळले नाही. मंडळ हिशोब चोख ठेवत असेल तर ठीक आहे. "आपणही त्यात सहभागी व्हायचे" हा प्रश्न माझ्या "आपण वेगळे मंडळ काढावे" वाक्याच्या नेमके उलट जातो. हा प्रश्न तुम्ही का विचारलात, हे समजले नाही.
कायदेशीर गोष्टींबाबत मान्य. मुलींचे अपहरण करणे, चोरून अन्न विकणे आणि मंत्र्याने जनतेचे पैसे चोरणे, याबाबत सर्वच विचारसरणींमध्ये "असे व्हायला नको". कायदेशीर बाजार चालू देणे [माझे मत] = चोरी/अपहरण करणे [तुमच्या प्रतिसादावरून माझ्या मताच्या समान], असे तुम्ही कसे म्हणत आहात ते कळले नाही.
<मुळीच कळले नाही. खाजगी लोक किराणा कायदेशीरपणे विकताना खूपदा बघितले आहे. आता येथे जर शिधावाटपखात्याच्या मालकीचे धान्य खाजगी विक्रेता विकत असला तर गुन्हा आहे. पण गणपती मंडळ त्या विशिष्ट मूर्तीचे दर्शन विकते आहे. तुमच्या भावात भरलेला देव विकत नाहीत - तुमच्या मनातला देव विकत असते तर चोरी झाली असती, वगैरे.>
जनतेसाठी असलेले धान्य परस्पर विकणारे गुन्हेगार, मुलींना पळवुन विकणारे गुन्हेगार तर देवाचे दर्शन विकणारेही गुन्हेगारच. त्यांचा देवावर काय अधिकार? तो देव त्यांच्या जन्माआधिपासूनचा आहे. हे चोर मनातला देव विकायला तयार असतीलच पण काय करणार ते त्यांना शक्य नाही; असते तर नक्की केले असते.
रस्त्यातला धोंडा योग्य का नाही? तीन प्रवृत्तिंचे लोक असतात. एक दगडाकडे दुर्लक्ष करतात व वळसा घालुन जातात. दुसरे शिव्या घालतात आणि वळसा घालुन जातात. तिसरे तो दगड हटवायचा प्रयत्न करतात. एकाने तसे केले व ते त्याच्या ताकदीबाहेरचे असले तरी त्याला पाहुन अनेक लोक मदतीला येतात. सामाजिक चळवळ यातुनच उभी राहत असते. प्रबोधन म्हणजे भाषणबाजी नव्हे की फुकाचा उपदेश नव्हे तर पुढे होऊन कृति करणे व तिची महती सांगण्याचे कष्ट घेणे. अनेकदा कृती बरेचसे सांगुन जाते.
एक साधा प्रयोग करुन पाहा. रात्री सहसा वाहतुकीचा लाल दिवा डावलुन जाण्याची प्रवृत्ती असते. मात्र जर तुम्ही ठामपणे थांबुन राहीलात तर काही वाहने दिवा हिरवा होइ पर्यंत उभी राहतात. सगळीच नाही पण काही तर राहतात! आज काही, उद्या अनेक, परवा बहुतेक...
भ्रष्टाचार म्हणजे भ्रष्ट आचरण. जे आपले नाही ते विकणे, भक्तांच्या मानसिकतेचा गैरफायदा घेऊन पैसे जमविणे हा भ्रष्टाचारच आहे. बहुसंख्य जनतेला रखडत ठेऊन काही विशिष्ठ लोकांना अग्रक्रमाने मनसोक्त दर्शन देणे म्हणजे हजारो बालकांना भुकेले ठेवुन त्यांच्या वाटचे धान्य परस्पर विकुन चार अधिकार्यांनी मजा मारण्यासारखे आहे.
साक्षिदेवा,
बहुसंख्य जनतेला रखडत ठेऊन काही विशिष्ठ लोकांना अग्रक्रमाने मनसोक्त दर्शन देणे म्हणजे हजारो बालकांना भुकेले ठेवुन त्यांच्या वाटचे धान्य परस्पर विकुन चार अधिकार्यांनी मजा मारण्यासारखे आहे.
मग एखाद्या गणेशोत्सव मंडळापुढे जाऊन तू या बाबतीत जाहीर सत्याग्रह का करत नाहीस? रांगेत उभे असलेले अनेक सामान्य जन तुझ्या बाजूने उभे राहतील!
राईट?
तात्या.
साक्षिदेवा,
बहुसंख्य जनतेला रखडत ठेऊन काही विशिष्ठ लोकांना अग्रक्रमाने मनसोक्त दर्शन देणे म्हणजे हजारो बालकांना भुकेले ठेवुन त्यांच्या वाटचे धान्य परस्पर विकुन चार अधिकार्यांनी मजा मारण्यासारखे आहे.
मग एखाद्या गणेशोत्सव मंडळापुढे जाऊन तू या बाबतीत जाहीर सत्याग्रह का करत नाहीस? रांगेत उभे असलेले अनेक सामान्य जन तुझ्या बाजूने उभे राहतील!
मिपावर किंवा वर्तमानपत्रात लिहिणे ठीकच आहे परंतु अन्यायकारक गोष्टींचा ग्राऊंड लेव्हलवर उतरून विरोध केला पाहिजे! रांगेत उभ्या असलेल्या सामान्य जनांमध्ये जाऊन अन्यायकारक गोष्टींबद्दल बोललं पाहिजे, न्यायाचा आग्रह धरला पाहिजे!
उदा - शिल्पा शेट्टी जर केवळ एक सेलिब्रिटी म्हणून देवदर्शनाच्या रांगेत घुसणार असेल तर त्या रांगेत उभ्या असलेल्या सर्वांनी आवाज उठवून "आम्ही अश्या पार्शल मंडळाच्या गणेशोत्सवाचे दर्शन घेणार नाही, आम्ही हा अन्याय सहन करणार नाही!" असा पवित्रा घेऊन तेथून निघून आले पाहिजे!
हे होतं का?
सेलिब्रिटींची संख्या किती? ५-१०-१५-२०-२५? आणि सामान्य जनांची संख्या किती? तर अक्षरश: लाखांच्या घरात! तरीही ते सामान्य जन लाखोंच्या संख्येत दर्शन घेतच असतात! याला काय म्हणावे? दोष कुणाचा?
आमचे नरहर कुरुंदकर म्हणतात की गुंडांचा गुंडपणा हा सज्जनांच्या सज्जनपणावर अवलंबून असतो! ते खरंच आहे..
आणि कुणाला व्हीआयपी कोट्यातून प्रवेश द्यायचा, कुणाला नाही हे ठरवण्याचा अधिकार हा त्या त्या मंडळाचा आहे. तो ज्याला मान्य नसेल त्याने एक तर भररस्त्यावर जाहीर लोकांदोलन करावे किंवा मंडळाविरुद्ध कोर्टात जावे आणि न्याय मिळवावा!
राईट?
तात्या.
मुळात काय चोरले जात आहे ते मला कळलेले नाही. मी आताच दुसर्या खोलीत जाऊन गणपतीच्या मूर्तीकडे बघितले, गणपतीचे दर्शन विनाखर्च मिळाले. माझ्यापेक्षा अधिक भक्तिभाव असलेल्या मित्राशी आताच बोलणे झाले, त्याच्या बोलण्यातून त्याच्यापाशी पूर्वीसारखाच भक्तिभाव होता असे जाणवले. त्यामुळे माझ्याकडून आणि माझ्या मित्राकडून तरी काहीतरी चोरी गेले असेल तर कळले नाही.
सर्वसाक्षी यांच्यापाशी कुठलीतरी वस्तू होती, आता ती त्यांच्यापाशी नाही, याची त्यांनी नीट शहानिशा केली आहे, याबद्दल त्यांच्या कळकळीने सांगण्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. ती जी काय हरवलेली वस्तू त्यांनी अमुक मंडळाकडून विक्रीस ठेवलेली बघितली, याबद्दल माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. ज्या वस्तूची विक्री होते आहे, ती चोरी त्यांचीच हरवलेली वस्तू आहे, याबद्दल त्यांना संबंधित अधिकार्यांना पटवता यावे, ही मनोमन शुभेच्छा. त्यांच्याकडून चोरलेल्या वस्तूला कोणी तिर्हाइताने विकू नये, याबाबत पूर्णपणे सहमत.
अशी महत्त्वाची वस्तू (ती कुठली वस्तू आहे, हे मला अजून कळलेले नाही, पण कुठलीतरी महत्त्वाची वस्तू हरवून मग मंडळानी लंपास केली आहे, याबाबत सर्वसाक्षी यांची कळकळ पोचली, पटली)... अशी महत्त्वाची वस्तू इकडेतिकडे निष्काळजीपणे ठेवू नये, मग पुढच्या वेळी अशी बेमालूम चोरी होणार नाही, अशीही मनोमन शुभेच्छा.
वरील सर्वांच्या प्रतिसादातील लालबागच्या राजाच्या उत्सवाविषयीच्या ज्या काही तक्रारी, गार्हाणी आहेत ती संबंधितांच्या कानावर जरूर घातली जातील!
तसेच ज्यांना लालबागच्या राजाच्या दर्शनाला प्रत्यक्ष गेले असतांना काही अडचणी आल्या असतील, त्यांच्या काही तक्रारी असतील त्यांनाही राजाच्या संकेतस्थळावर जाऊन तक्रार नोंदवण्याची सोय आहे.
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ (वर्ष ७५ वे!) त्यातील इष्ट आणि व्यवहार्य बाबींची अवश्य नोंद घेईल याची खात्री आहे!
लालबागच्या राजाचा विजय असो....!
तात्या.
मला नाही वाटत केवळ लालबागच्या राजाबद्द्ल इथे कुणी बोलतंय.. एकंदरीत चर्चा चालूये.. आणि मला पटतं.. मागच्या वर्षी दगडूशेठ गणपतीला दर्शनाला गेले होते तेव्हा इतकं गर्दी मधे उभं राहून १मिनिटं शांत डोकं टेकवून उभं राहता येत नव्हतं.. देवाच्या दारात जाऊन केवळ शांतताच लाभली पाहीजे.. बाकीचे ते देखावा अन रोषणाई नंतरच्या गोष्टी झाल्या.. शिर्डीचीही हीच गोष्ट..
माहीत नाही हे सगळं कसं बदलेल.. पण बदललं पाहीजे..
पण एक आहे.. आपल्याला हे सगळं सहज उपलब्ध असेल तर अशा तक्रारी सुचु शकतात.. पण आजुबाजुला उभे असलेले लांब लांब खेडोपाड्यातून आलेल्या लोकांना केवळ दर्शन मिळणं,तो देखावा,रोषणाई, विविध ठीकाणच्या मंदीरांचे देखावे पाहणे म्हणजे एक सोहळा असतो .. त्यांच्या डोळ्यातला आनंद खूप वेगळा असतो.. दर वर्षी पुण्यात गणपती पाहायला लांबूनलांबून येणारी लोकं पाहीली की छान वाटतं! त्यांच्यासाठी ती चेंगराचेंगरी,गर्दी,कशालाही महत्व नसेल,जितकं ते देखावे,गणपतीच्या नुसत्या मिनिटभराच्या दर्शनाला असेल.. !
लालबागच्या राजाबद्दल आमच्याही मनात प्रेम आदर आहे.
पण त्या टोपीवाल्या कार्यकर्त्याने त्या महिलेशी जे वर्तन केले त्याचे समर्थन कुठेही आणि कुणीही करू शकत नाही. ती चपला घालून गेली किंवा व्ही आय पी च्या लायनीत शिरण्याचा तिने प्रयत्न केला....
हे सर्व भोंगळ युक्तीवाद जरी मान्य केले तरी एका महिलेवर हात टाकण्याचा जो प्रकार त्या निर्लज्ज कार्यकर्त्याने केला आहे त्याचे समर्थन गणपतीच्या प्रेमामुळे निदान आम्ही तरी करणार नाही.
मराठी संस्कृतीचे प्रतिक म्हणून लालबागच्या राजाकडे पाहणार्यांनी श्री शिवछत्रपतींनी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला दिलेली वागणूक आणि लालबागच्या राजासमोर एका स्त्रीची झालेली विटंबना या दोन गोष्टी कुठल्या निकषावर एका पातळीवर येऊ शकतात ते पहावे आणि मग मराठी संस्कृतीचे प्रतिक आहे की नाही ते ठरवावे.
आम्ही त्या कार्यकर्त्याच्या वागणुकीचा निषेध करतो आणि कार्यकर्त्यानी कसे वागावे, महिलांशी वर्तन कसे असावे ही बुद्धी त्या कार्यकर्त्यांना आणि त्याच्या संतापजनक आणि निंदनीय कृतीचे समर्थन करणार्या मंडळाच्या निर्लज्ज पदाधिकार्यांना द्यावी अशी "मागणी" (प्रार्थना नव्हे) त्या लालबागच्या राजाकडे करतो.
आम्ही यापुढे त्याचे दर्शन घेण्यास जाणार नाही, हे ठरवले आहेच. काल आमच्या सौभाग्यवती जाऊन आल्या पण आम्ही गेलो नाही. धनदांडग्यांच्या आणि सिनेनट्यांच्या देवाला भेटण्याची आमची इच्छाही नाही.
आपला,
(संतप्त) धोंडोपंत
आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
घोटवीन लाळ, ब्रह्मज्ञान्या हाती | मुक्ता आत्मस्थिती, सांडवीन ||
त्या कार्यकर्त्याचे समर्थन कधीच करता येणार नाही. मंडळाच्या पदाधिकार्यांनी त्या कार्यकर्त्याचे समर्थन केलेले नाही, उलटपक्षी लोकांची क्षमाच मागितली आहे. (फक्त संस्थळावरच नव्हे, तर उत्सवाच्या ठिकाणीसुद्धा!)
बाकी, तो कुणाचा देव आहे हे ठरवण्याचा आणि त्याचे ८-९ तास रांग लावून दर्शन घ्यायचे किंवा नाही हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे! त्याबबत आम्हाला काहीच बोलायचे नाही.
"माझं दर्शन घ्या हो..." असं राजाने ना कुणा धनदांडग्याला, ना कुणा सिनेनटाला आणि ना कुणा सामन्य गोरगरीब माणसाला सांगितलं आहे!
असो,
मिसळपाव डॉट कॉम हे संकेतस्थळ आज त्याच्याच कृपेने सुरू आहे इतकेच आम्ही ठामपणे सांगू इच्छितो...!
तात्या.
<<सेलिब्रिटींची संख्या किती? ५-१०-१५-२०-२५? आणि सामान्य जनांची संख्या किती? तर अक्षरश: लाखांच्या घरात! तरीही ते सामान्य जन लाखोंच्या संख्येत दर्शन घेतच असतात! याला काय म्हणावे? दोष कुणाचा?>>
अर्थातच रांगेत उभे रहणार्यांचा ! म्हणुनच आवाहन केले आहे -"जर हा बाजार बंद करायचा असेल तर या देवस्थानांना रांगा लावणे बंद करा आणि आपला देव आपल्या मनात पूजा."
<<मिपावर किंवा वर्तमानपत्रात लिहिणे ठीकच आहे परंतु अन्यायकारक गोष्टींचा ग्राऊंड लेव्हलवर उतरून विरोध केला पाहिजे! रांगेत उभ्या असलेल्या सामान्य जनांमध्ये जाऊन अन्यायकारक गोष्टींबद्दल बोललं पाहिजे, न्यायाचा आग्रह धरला पाहिजे!>> अतिरेक्यांनी केलेल्या स्फोटाचा निषेध सगळेच करतात, इथेही करतील; पैकी किती जण घरदार सोडुन अतिरेक्यांविरुद्ध लढायला जाणार आहेत? आणि जे जाणार नसतील त्यांना निषेधाचा अधिकार नाही का?
तात्या,
आजपर्यंत तू स्वतः ज्या ज्या गोष्टींचा निषेध केला आहेस वा धिक्कार केला आहेस त्या पैकी किती ठिकाणी प्रत्यक्ष आंदोलन उभे केले आहेस वा याचिका दाखल केल्या आहेस? पण म्हणुन एखादी वाईट गोष्ट दिसली वा खटकली तर तु निषेध न करता व्यक्त करता गप्प राहणार आहेस का?
आधी सांगितल्याप्रमाणे लालबागचा प्रसंग हे एक निमित्त आहे मात्र दोवाच्या श्रद्धेचा बाजार सर्वत्र मांडला जात आहे आणि ते योग्य नाही असे माझे प्रतिपादन आहे. मात्र लालबागच्या राजाचा एक भक्त म्हणुन तु हे फार व्यक्तिशः घेतलेले दिसत आहे. असो.
मात्र लालबागच्या राजाचा एक भक्त म्हणुन तु हे फार व्यक्तिशः घेतलेले दिसत आहे. असो.
हे विधान बरेचसे खरे आहे!:)
असो...
आपला,
(प्रांजळ) तात्या.
अर्रे लालबागच्या राजाचा विजय असो...!
तात्या,
तुझ्या प्रांजळपणाचा विजय असो! एकदम पु. लं. चा रावसाहेब.
पण तुझ्या सारख्या सरळसोट माणसाला माणसाने मांडलेला देवाचा बाजार कसा काय चालतो? (इथे लालबागचा संबंध नाही. आणि हो, एक मुंबईकर म्हणुन आणि गणेशभक्त म्हणुन मला लालबाग राजाविषयी सादर भक्तिभाव आहे हे सांगायलाच नको)
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
गणपती उत्सव म्हणजे राजकारणी आणि बॉलिवूडवाल्यांसाठी पर्वणीच असते... कुठल्याही गणपतीला त्यांना रांगेशिवाय प्रवेश मिळतो, ब-याचदा तर वलय निर्माण करण्यासाठी त्यांना मंडळांचं आग्रहाचं बोलावणंच असतं आणि तिथे मीडियाची मंडळी त्यांना शूट करायला, बाइट घ्यायला तयारच असतात... आयती मिळणारी ही प्रसिद्धी लक्षात घेऊन बॉलिवूडचे निर्माते-दिग्दर्शक आपल्या चित्रपटाचं प्रमोशन गणरायाच्या आशीर्वादाने करतात. लालबागच्या राजासमोर तर दहा दिवस अनेक सेलिब्रिटींची रांग असते. पण, अभिनेता अजय देवगण आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी त्याला अपवाद ठरले.
' गोलमाल रिटर्न ' चं प्रमोशन ' लालबागच्या राजा ' ला येऊन करावं, असं निमंत्रण त्यांना मंडळानं दिलं होतं. पण हा प्रस्ताव अजय आणि रोहितनं साफ धुडकावून लावला. अरे, देवाचा वापर कसला सिनेमाच्या प्रमोशनसाठी करताय ? देवाच्या चरणी तरी निरपेक्ष भावनेनं लीन व्हा ! हे उद्विग्न उद्गार आहेत, श्रद्धाळू अजयचे... तर, ' भगवान को क्यूं उल्लू बनाए ?', असा मिस्किल सवाल केलाय रोहित शेट्टीनं...
खरं तर अजय खूपच धार्मिक आहे. तो त्याच्या ऑफिसमध्येही गणपतीची प्राणप्रतिष्ठा करतो. त्याशिवाय तिरुपती, अजमेर शरीफ इथं अनेकदा अजय भाविक म्हणून जातो, देवाचं दर्शन घेतो. त्याचा हा श्रद्धाळूपणा माहीत असलेल्या लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या काही सदस्यांनी त्याच्यापुढे एक प्रस्ताव ठेवला. त्यांनी दिग्दर्शक रोहित शेट्टीला गाठलं आणि ' गोलमाल रिटर्न ' चं प्रमोशन करण्यासाठी ' राजा ' ला येण्याचं आमंत्रण दिलं. तो प्रस्ताव घेऊन रोहित अजयकडे आला, पण अजयनं ही ऑफर साफ धुडकावली. ' देवाचा असा वापर करणं मला पटत नाही ' , असं त्यानं ठणकावून सांगितलं. मनातून देवाची पूजा करा, प्रमोशनच्या वेळीही मनात श्रद्धा बाळगा, पण सार्वजनिक ठिकाणी इतरांचा खोळंबा करून प्रमोशनाचे कार्यक्रम करणं साफ चुकीचं आहे, असं मत अजयनं मांडलं.
त्यानंतर अजय आणि रोहितचं एकमत झालं आणि त्यांनी आपण येणार नसल्याचं कळवून टाकलं. पण अजय, अर्शद वारसी, तुषार कपूर आणि श्रेयस तळपदे ही चौकडी सारेगमपच्या सेटवर आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जाणार आहे. गोलमाल है - प्रमोट तो करना पडेगा ना ?, असं रोहित गमतीनं विचारतो.
अर्रे लालबागच्या राजाचा विजय असो.
आपला,
(सिन्सिनाटीचा राजा) आजानुकर्ण