Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

फॅसिझमची व्यवच्छेदक लक्षणं

र
राजेश घासकडवी
Wed, 02/24/2016 - 04:55
🗣 174 प्रतिसाद
लॉरेन्स ब्रिट यांनी २००३ साली फॅसिझमविषयी एक लेख लिहिला होता. http://www.informationclearinghouse.info/article4113.htm त्यात त्यांनी ६ वेगवेगळ्या (मुसोलिनी, हिटलर, सालाझार, पापाडोपौलोस, पिनोशे आणि सुहार्तो) फॅसिस्ट राजवटींचा अभ्यास करून त्यांमध्ये समान दिसणारी फॅसिझमची १४ लक्षणं सांगितली होती. त्यांचा काहीसा स्वैर अनुवाद सादर करतो आहे. १. राष्ट्रवादाचा जोरदार आणि सतत पुरस्कार - राष्ट्राचा झेंडा, राष्ट्राची इतर चिन्हं यांबद्दल अतिरेकी जागरुकता. देशभक्तीचा जोरदार पुरस्कार. देशभक्त नसलेल्यांचा तिरस्कार. परकीय शक्तींबद्दल संशय. परकीयांबद्दल घृणा. २. मानवी अधिकारांबद्दल तुच्छता आणि संकोच - फॅसिस्ट राज्यकर्त्यांनी आपल्याला जे हवं आहे त्यात मानवी अधिकार, लोकांच्या जिवांची किंमत ही अडचण मानली. प्रचाराची साधनं वापरून होणारे अत्याचार क्षुल्लक आहेत इतकंच नव्हे तर ज्यांच्यावर अत्याचार होत आहेत तेच कसे नालायक लोक आहेत हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा अत्याचार भयंकर होत होते तेव्हा गुप्तता, इन्कार आणि अफवा/गैरसमज पसरवण्यात फॅसिस्ट राजवटी वाकगबार होत्या. ३. शत्रूसमुदायाकडे बोट दाखवून एकाच वेळी त्यांना बळीचा बकरा बनवणं आणि त्यांच्याविरुद्ध संघटित होण्यास कारण बनवणं - सर्व फॅसिस्ट राजवटींमध्ये सगळ्यात महत्त्वाचं सूत्र म्हणजे लोकांना मुख्य प्रश्नांपासून लक्षवेध करण्यासाठी बळीच्या बकऱ्यांचा वापर. यामुळे अपयशांचं खापर फोडण्यासाठी आणि जनतेचं फ्रस्ट्रेशन नियंत्रित दिशेला वळवण्यात या राजवटींना यश आलं. सतत प्रचार आणि खोटी माहिती पसरवून अनेक वेगवेगळ्या समूहांकडे बोट दाखवण्यात आलं. सर्वसाधारणपणे कम्युनिस्ट, समाजवादी, सेक्युलर, लिबरल, ज्यू, अल्पसंख्यांक, शत्रुराष्ट्रं, परधर्मीय, समलिंगी आणि सर्वसमावेशक आतंकवादी. राजवटींना विरोध करणाऱ्यांना टेररिस्ट/देशद्रोही अशी विशेषणं लावून त्यांचा नायनाट केला जायचा. ४. सैन्याचं, सुरक्षा रक्षण व्यवस्थेचं वर्चस्व - राज्यकर्त्यांनी कायमच मिलिटरीला उच्च स्थान दिलं आणि मिलिटरी-इंडस्ट्रियल कॉंप्लेक्सला पाठिंबा दिला. इतर तीव्र गरजा असूनही राष्ट्राच्या बजेटपैकी मोठा हिस्सा मिलिटरीसाठी दिला गेला. मिलिटरीकडे प्रखर राष्ट्रवादाचं प्रतीक म्हणून पाहिलं गेलं. ५. तीव्र लिंगभेद - राज्यकर्ते हे मुख्यत्वे पुरुष असल्यामुळे स्त्रियांकडे दुय्यम नागरिक म्हणून पाहाण्यात आलं. त्यांची भूमिका घर सांभाळणं, आणि मुलांना जन्म देऊन त्यांचं पालनपोषण करणं इतकीच राहावी असं ठासून सांगण्यात आलं. ६. मीडियावर प्रचंड प्रमाणावर नियंत्रण - काही राजवटींनी मीडियावर मालकी हक्क स्थापन केले तर काहींनी अप्रत्यक्षपणे नियंत्रण ठेवलं. यात लायसन्सेस देणं, आर्थिक आणि राजकीय दबाव टाकणं, राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रवादाचं आवाहन करणं, सूचक धमक्या देणं वगैरे गोष्टी येतात. ७. राष्ट्रीय सुरक्षेबद्दलचा गंड - राज्यकर्ते जे काही करतात त्याला राष्ट्रीय सुरक्षेचा रंग चढवण्याचं काम या राजवटींनी केलं. विरोधकांना देशविरोधी आणि देशद्रोही ठरवण्याचा या राजवटींचा प्रयत्न राहिला. ८. धर्म आणि राज्यकर्त्यांचं साटंलोटं - कम्युनिस्टांनी धर्म नाकारला तर फॅसिस्टांनी तो कवटाळला. बहुसंख्येचा धर्माधार स्वीकारून त्या धर्माचे आक्रमक रक्षक असल्याची भूमिका त्यांनी घेतली. राज्यकर्त्यांची प्रत्यक्ष वागणूक ही धर्माच्या व्यापक मानवतावादी तत्त्वांविरोधी असली तरी त्याकडे निर्लज्जपणे काणाडोळा केला गेला. विरोधक हे धर्मद्वेष्टे आहेत आणि राज्यकर्त्यांना विरोध म्हणजे धर्माला विरोध असं चित्र निर्माण केलं गेलं. ९. मोठ्या कंपन्यांचे हात बळकट करणं - सामान्य माणसाचं आयुष्य नियंत्रित केलं जात असतानाच मोठ्या कंपन्यांना हवं ते करण्याचं अमर्याद स्वातंत्र्य दिलं गेलं. यात मिलिटरीसाठी आवश्यक उत्पादनं निर्माण करण्याची क्षमता म्हणून कंपन्यांकडे/कॉर्पोरेशन्सकडे पाहिलं गेलं. इतकंच नाही तर समाजावर नियंत्रण ठेवण्याची यंत्रणा म्हणूनही त्यांना महत्त्व दिलं गेलं. विशेषतः नाहीरे वर्गावर वचक ठेवण्यासाठी. १०. कामगार आणि शेतकरी यांची शक्ती खच्ची करणं - डाव्या शक्ती, एकत्रित झालेला कामगार वर्ग - कारखान्यातला वा शेतातला - ही आपल्या राजकीय नियंत्रणाला आव्हान समजून फॅसिस्ट राजवटींनी त्यांना पद्धतशीरपणे खच्ची केलं. गरीबांकडे तुच्छतेने पाहिलं गेलं. ११. विचारवंत व कलावंत यांच्याबद्दल तुच्छता आणि त्यांचं खच्चीकरण - विचारवंत आणि त्यांना अपेक्षित असलेलं विचारस्वातंत्र्या आणि अभिव्यक्तीस्वातंत्र्य हे या राजवटींना त्याज्य होते. त्यांना राष्ट्रीय सुरक्षा आणि देशभक्तीच्या आदर्शांच्या विरोधक मानलं गेलं. युनिव्हर्सिटींवर कडक नियंत्रण ठेवलं गेलं, राजकीय विरोधक असलेल्या प्राध्यापकांना त्रास दिला गेला किंवा काढून टाकलं गेलं. वेगळे विचार दाबून टाकण्यासाठी त्यांवर हल्ला केला गेला, त्यांची तोंडं दाबली किंवा बंद केली गेली. या राजवटींसाठी कला आणि साहित्य हे केवळ देशाच्या उन्नतीसाठी असायला परवानगी होती. देशाच्या त्रुटी दाखवणाऱ्या कलाकृतींवर व कलाकारांवर हल्ला केला गेला. १२. गुन्हे आणि त्यांना शिक्षा देण्याबद्दल अतिरेकी तीव्र आचार - बहुतांश राजवटींनी अत्यंत क्रूर न्यायव्यवस्थेचा पाठपुरावा केला आणि मोठ्या प्रमाणावर लोकांना तुरुंगात टाकलं. पोलिस व्यवस्थेला मोठ्या प्रमाणात सामर्थ्य दिलं गेलं. साधे आणि राजकीय गुन्हे वाढवून-चढवून इतर मोठ्या गुन्ह्यांत गुंफले गेले होते आणि ते आरोप राजकीय विरोधकांवर वापरले गेले. भीती, दहशत आणि देशद्रोह्यांबद्दलची घृणा वापरून पोलिस अधिकारांची व्याप्ती वाढवण्यात आली होती. १३. भ्रष्टाचार आणि बगलबच्चेगिरी - उच्च पदांवर असलेल्यांच्या जवळचे आणि आर्थिकदृष्ट्या वरचे, म्हणजे उद्योगपती वगैरे यांचं उखळ पांढरं झालं. सत्ता आणि उद्योग यांचं साटंलोटं साधून प्रचंड प्रमाणावर भ्रष्टाचार साधला गेला. याबाबतीत जनता कायमच अंधारात राहिली. १४. भ्रष्ट किंवा खोट्या निवडणुका - बहुतांश राजवटींमध्ये निवडणुका हा फार्स होता. निवडणुका मॅनेज करण्यासाठी विरोधकांना तुरुंगात टाकणं, निवडणुक यंत्रणेवर नियंत्रण ठेवणं, विरोधी मतदारांना धमकावणं किंवा दहशत दाखवणं, खरी मतं नष्ट करणं असे अनेक उपाय वापरले गेले. या व इतर लक्षणांविषय़ी इथे चर्चा अपेक्षित आहे.
वर्गीकरण
राजकीय

प्रतिक्रिया द्या
29118 वाचन

💬 प्रतिसाद (174)
ब
बोका-ए-आझम Wed, 02/24/2016 - 19:08 नवीन
एक सर्वसामान्य वाचक, नागरिक म्हणून जे कानावर येतं, पेपरात आणि इंटरनेटवर वाचायला मिळतं त्यातून तयार झालेली ही मतं आहेत. त्यामुळे त्यांना तितकंच वजन आहे
हे पटत नाही. कोणताही माणूस स्वतःची मतं अशी बनवत नाही. तो आधी मत बनवतो आणि मग त्याच्यासमोर आलेल्या माहितीनुसार process आणि interpret करतो. आणि हे फक्त लेखकाबद्दलच नाही तर जगातल्या प्रत्येक माणसाबद्दल खरं आहे. इतका objective विचार करणं अशक्य आहे. त्यामुळे कृपया इतका साळसूदपणा करु नये असं म्हणावंसं वाटतं. आपण एखाद्या गोष्टीबद्दल मत बनवताना सर्वात आधी आपल्या मनात ती गोष्ट visualize करतो आणि मग सर्व आजूबाजूची माहिती त्या मताप्रमाणे process आणि interpret करतो. हा लेख तुम्हाला निवडावासा वाटणं, त्याचा अनुवाद करावासा वाटणं आणि तो इथे या संस्थळावर टाकावा असं वाटणं या सगळ्यामागे तुम्ही आधीच बनवलेलं मत आहे आणि with that prejudice, तुम्ही तुम्हाला जाणवलेली निरीक्षणं इथे दिलेली आहेत. आणि त्यात काही चुकीचं आहे असं अजिबात नाही. पण फक्त ती वाचन आणि श्रवण यातून तयार झालेली आहेत असं म्हणू नका कारण ते खोटं आहे. तुमची मतं आधीच बनली आणि मग तुम्ही त्या दृष्टीने तुमची निरीक्षणं केली त्यामुळे
जर कोणी अभ्यासू व्यक्तीने असा लेख लिहिला तर तो वाचून मी माझी मतं बदलायला तयार आहे.
हे शक्यच नाही. मुळात ती व्यक्ती अभ्यासू आहे की नाही हे तुमच्या मतावर ठरणार असल्यामुळे तुम्ही तुम्हाला वाटलं तरच तुमचं मत बदलाल.
  • Log in or register to post comments
म
मोदक Wed, 02/24/2016 - 20:22 नवीन
सर्व प्रतिसादाशी सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
त
तर्राट जोकर Wed, 02/24/2016 - 20:38 नवीन
शब्दाशब्दाशी सहमत. म्हणजे इथे व्यक्त होणारा प्रत्येक सदस्य आपले मत आधीच बनवतो त्यानंतर त्याला पोषक, सहाय्यभूत ठरतील अशीच माहिती मिळवतो, त्याला आवडेल तसेच इंटर्प्रेट करतो असे मानायला हरकत नाही. म्हणजे भाजप, संघ ह्यांच्या बाजूने बोलणार्‍या सदस्यांनाही हे तुमचं विवेचन लागु होत असेल ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
ब
बोका-ए-आझम गुरुवार, 02/25/2016 - 01:48 नवीन
असा शब्दप्रयोग केलाय माझ्या प्रतिसादात. त्यामुळे अर्थातच हो. त्यामुळे भाजपच्या किंवा काँग्रेसच्या - दोघांच्याही पाठीराख्यांना ते लागू पडतं आणि त्यात काहीही चुकीचं नाही. उलट आपली विचारपद्धती यापेक्षा वेगळ्या प्रकारे चालते असं मानणं हा खोटेपणा अाहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर गुरुवार, 02/25/2016 - 02:18 नवीन
म्हणजे ह्यापेक्षा तिसरा प्रकार असूच शकत नाही असे काही असते का? उदा. मला काँग्रेसचं दहा वर्षांतलं वर्तन आवडलं नाही. लोकसभा निवडणुकीत मी काँग्रेसविरूद्ध विकासाच्या, प्रगतीच्या मुद्द्यावर मोदींचा-भाजपचा प्रचार केला, मोदी निवडून आले, मला खुप आनंद झाला. आनंदातिरेकात मी भाजपची मेंबरशीप घेऊन टाकली. पण दोन वर्षात मला प्रॉमिस केले गेलेले रिजल्ट दिसत नाहीत. त्या ऐवजी भलतंच पुढे येतंय. दोन्ही बाजूंनी बातम्या असतात. पण मी आता भाजपने आपल्याला फसवलं असं मानतो. आता मी भाजप सरकारविरूद्ध बोलतो. एक जनता म्हणून मी काय आहे? मी कोणाचाच पाठिराखा नाही की कोणाचा विरोधकही नाही. मग मी असे विचार का बदलत असेल? 'चेंजिग गोल्पोस्ट' ह्या अवस्थेचे विश्लेषण काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
ब
बोका-ए-आझम गुरुवार, 02/25/2016 - 09:45 नवीन
मी म्हणालोय - तुमचं मत तुम्ही स्वतःच बदलू शकता. दुसरं कोणीही नाही. ते फार फार तर उत्प्रेरक (Catalyst) म्हणून काम करु शकतात पण असं कोणीही कोणाचंही मत बदलू शकत नाही. प्रत्येकजण स्वतःचं मत स्वतःच बदलतो आणि मग प्रसंगानुरूप स्पष्टीकरण देतो की याने बदललं किंवा त्याने बदललं.They are at the most only catalysts, nothing else.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर गुरुवार, 02/25/2016 - 10:22 नवीन
ठिक आहे. विचार करतो, बाकीची चर्चा खफवर करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
ब
बोका-ए-आझम गुरुवार, 02/25/2016 - 11:38 नवीन
मी म्हणालोय - तुमचं मत तुम्ही स्वतःच बदलू शकता. दुसरं कोणीही नाही. ते फार फार तर उत्प्रेरक (Catalyst) म्हणून काम करु शकतात पण असं कोणीही कोणाचंही मत बदलू शकत नाही. प्रत्येकजण स्वतःचं मत स्वतःच बदलतो आणि मग प्रसंगानुरूप स्पष्टीकरण देतो की याने बदललं किंवा त्याने बदललं.They are at the most only catalysts, nothing else.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
ब
बोका-ए-आझम गुरुवार, 02/25/2016 - 01:48 नवीन
असा शब्दप्रयोग केलाय माझ्या प्रतिसादात. त्यामुळे अर्थातच हो. त्यामुळे भाजपच्या किंवा काँग्रेसच्या - दोघांच्याही पाठीराख्यांना ते लागू पडतं आणि त्यात काहीही चुकीचं नाही. उलट आपली विचारपद्धती यापेक्षा वेगळ्या प्रकारे चालते असं मानणं हा खोटेपणा अाहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
न
निनाद मुक्काम … गुरुवार, 02/25/2016 - 03:14 नवीन
तुमचा अर्णव आमचा रविश हा सध्याच्या प्रसार माध्यमांच्या परिस्थिती व वर्तनावर वर उत्कृष्ट लेख मी मराठी वर ‘तुमचा रविशकुमार, तर आमचा अर्णब’ जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील देशद्रोही कारवाया आणि त्याप्रकरणी कन्हैय्याकुमारला राजद्रोहाच्या गुन्ह्याखाली केलेली अटक यांच्यामुळे पत्रकारितेचे विश्वही अंतःर्बाह्य ढवळून निघाले आहे. आतापर्यंत व्यक्तिगत आणि व्यावसायिक स्पर्धा करणारया वृत्तवाहिन्या वैचारिक मुद्द्यांवरून परस्परांसमोर उभी ठाकल्याचा समरप्रसंग उभा राहिला आहे. राजदीप सरदेसाई, बरखा दत्त, रविशकुमार, सागरिका घोष यांच्याविरुद्ध अर्णब गोस्वामी, सुधीर चौधरी, दीपक चौरासिया... हिंदू- मुस्लिम यांच्यासारख्याच ध्रुवीकरणाची लागण पत्रकारितेला झाली आहे. एवढी विखारी वैचारिक तेढ पत्रकारितेत कधी अनुभवाला आलेली नाही...... ....................................... नॅशनल ब्राॅडकाॅस्टिंग असोसिएशन (एनबीए) ही वृत्तवाहिन्यांची मुख्य संघटना आहे. या संघटनेची कर्तीधर्ती पत्रकार मंडळी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांना निवेदन द्यायला गेली होती. दिल्लीतील पतियाळा हाऊस कोर्टामध्ये वकिलांनी पत्रकारांना केलेल्या मारहाणप्रकरणी वकिलांवर आणि बघ्याची भूमिका घेणारया पोलिसांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी ही ज्येष्ठ, प्रसिद्ध पत्रकार मंडळी ‘एनबीए’च्या छत्राखाली एकत्र आली होती. पण ते नावापुरतेच आणि दिखाव्यापुरतेच एकत्र होते. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) देशविरोधी घोषणा, त्यानंतर विद्यार्थी मंडळाचा अध्यक्ष कन्हैय्याकुमारला वादग्रस्त राजद्रोहाच्या आरोपाखाली झालेली अटक आणि त्याचे आक्रमक वार्तांकन करताना सर्वच चॅनेल्सनी घेतलेल्या परस्परविरोधी टोकांच्या धारदार भूमिकांनी त्यांच्यामध्ये जवळपास उभी फूटच पडली आहे. त्याचे पडसाद राजनाथसिंहांच्यासमोरच उमटले. दोन बड्या चॅनेल्सच्या दोन बड्या महिला पत्रकारांची (दोघीही आपापल्या चॅनेल्समध्ये क्रमांक दोनवर आहेत) राजनाथांच्यासमोरच बाचाबाची सुरू झाली. त्या दोघीही एकमेकांच्या चॅनेल्सच्या भडक, आक्रमक आणि एकांगी वार्तांकनास दूषणे देत होत्या. त्यांच्यातील तू तू मैं मैंने सार्वजनिक सभ्यतेच्या मर्यादा ओलांडल्या होत्या. अखेरीस दोघींना शांत करण्यासाठी राजनाथांना मध्यस्थी करावी लागली. पत्रकारांतील भांडणे ही काही नवी नाहीत किंवा त्यांना बातमी मूल्यही नसते. पत्रकारांतील भांडणांचे, गटबाजींचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. एकाच कार्यालयात असूनही परस्परांचे तोंडही न पाहणारी अनेक मंडळी आहेत. पण ही भांडणे प्रामुख्याने व्यक्तिगत आणि व्यावसायिक स्पर्धेवरून झाली आहेत. पण सध्या देशाच्या राजधानीतील कथित राष्ट्रीय माध्यमांमध्ये वैचारिक मुद्द्यांवरून थेट दुफळी पडली आहे, उभी फूट पडली आहे. असे कदाचित प्रथमच घडत असावे. टीव्ही स्टुडिओत, रात्रीच्या ‘प्राइम टाइम’वरील चर्चेत आणि एकूणच वार्तांकनात या दुफळीचे प्रतिबिंब स्पष्ट पडले आहे. वातावरण एवढे गढूळ झाले आहे, की पत्रकारांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ काढलेल्या मोर्च्यामध्ये तर काही पत्रकारांच्या, विशेषतः ‘टाइम्स नाऊ’चे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्या नावाने जाहीरपणे खडे फोडले गेले आणि ते फोडण्यात एकेकाळची त्यांची सहकारी आणि आताची स्पर्धक (अर्थात ‘टाइम्स नाऊ’चा टीआरपी ‘एनडीटीव्ही’च्या कितीतरी पट आहे) बरखा दत्त अग्रेसर होती. त्याचे कारण म्हणजे गोस्वामी मोर्च्यात सहभागी झाले नव्हते. आतापर्यंत पत्रकारांना झालेल्या मारहाणीचा मुद्दा गोस्वामी आक्रमकपणे मांडत; पण यावेळी त्यांनी पतियाळा हाऊसमधील पत्रकारांच्या मारहाणीला फारसे महत्व दिले नाही आणि नंतर मोर्च्यातही सहभागी झाले नाहीत. त्यामुळे ते लक्ष्य बनले. शेवटी गोस्वामींचे सहकारी असलेल्या एका पत्रकाराला ट्विट करून खुलासा करावा लागला, की वडिलांवर अचानक हृदयशस्त्रक्रिया करावी लागल्याने ते सहभागी होऊ शकले नाहीत. तरीदेखील गोस्वामींच्याविरोधात पत्रकारांच्या एका गटाचा राग कमी झाला नाही. मुक्त स्वातंत्र्याच्या संरक्षणासाठी काढलेल्या त्या मोर्च्यातील काही मंडळी गोस्वामी यांच्यावर बहिष्कार टाकण्याच्या गोष्टी करीत होती! पत्रकारांच्या या गटामध्ये गोस्वामींच्याव्यतिरिक्त, सुधीर चौधरी (झी न्यूज), राहुल शिवशंकर (न्यूज एक्स), दीपक चौरासिया (इंडिया न्यूज), रजत शर्मा (इंडिया टीव्ही) यांच्याविरुद्धही आग धुमसती आहे. ‘जेएनयू’चे खरे वातावरण पेटले ते ‘झी न्यूज’वरील क्लिप्सनी. नंतर हाच मुद्दा गोस्वामींनी आक्रमकपणे उचलला. मग त्यानंतर राहुल शिवशंकर, रजत शर्मा, दीपक चौरासिया आदींच्या आक्रमक वार्तांकनांनी आग भडकत गेली. तोपर्यंत एनडीटीव्ही, एबीपी न्यूज, सीएनएन आयबीएन आदी चॅनेल्स गप्प होती. पण कन्हैय्याकुमारविरूद्ध राजद्रोहाचा गुन्हा लावल्यानंतर या तीन चॅनेल्सनी दुसरे टोक गाठले. राजद्रोहाचा गुन्हा लावण्याचा निर्णय चुकीचा असल्याचे सिद्ध करण्यासाठी या तीन चॅनेल्सनेही आक्रमक वार्तांकन चालू केले. त्यातच पतियाळा कोर्टातील घटनेने या चॅनेल्सने आयतेच कोलित दिले. कन्हैय्या देशविरोधी असल्यावर चॅनेल्सच्या पहिल्या गटाने (झी न्यूज, टाइम्स नाऊ, न्यूज एक्स, इंडिया न्यूज) शिक्कामोर्तब केलेच होते. तसेच फरार उमर खलीद हा 9 फेब्रुवारीच्या वादग्रस्त घटनेचा मुख्य मास्टरमाइंड असल्याचे घोषित केले होते. तर चॅनेल्सचा दुसरा गट कन्हैय्या हा देशद्रोही नसल्याचे सिद्ध करण्याच्या मागे लागला होता. उमर खलिदला मास्टरमाइंड मानण्यास तो तयार नाही. या सगळ्या प्रक्रियेत एका गटाने प्रतिष्ठित जेएनयूला कायमचे बदनाम केले आणि दुसरयांनी जेएनयू कॅम्पसवरील काही घातक घटकांचे उदात्तीकरण केले! त्यातच ‘इंडिया न्यूज’च्या दीपक चौरासियांनी दाखविलेली कन्हैय्याची क्लिप बनावट असल्याचे ‘आजतक’/ ‘इंडिया टुडे’नी भर स्टुडिओत ‘सिद्ध’ केले आणि संबंधित पत्रकारांना अटक करण्याची मागणीही केली. त्यावरूनही बरेच पाणी वाहून गेले. कोर्ट प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच चॅनेल्सचे दोन्ही गट अंतिम निकाल सुनावत आहेत. ‘मीडिया ट्रायल्स’ यापूर्वीही झाल्या आहेत; पण एवढ्या विखारीपद्धतीने खचितच झाल्या असतील! आपापल्या स्टुडिओंमधून, आपापल्या वार्तांकनामधून अन्य चॅनेल्सना दूषणे देण्याचा, त्यातील पत्रकारांवर व्यक्तिगत हल्ले करण्याचा प्रकार देश प्रथमच अनुभवत असेल. चॅनेल्स एवढ्या खालच्या पातळीवर उतरतील, असे कोणालाही वाटले नसेल. राजकीय नेत्यांना सदा ना कदा सार्वजनिक सभ्यतेच्या मर्यादांचे धडे शिकविणारी ही मंडळी त्याच लक्ष्मणरेषा धडधडीतपणे पायदळी तुडवित होती. वृत्तवाहिन्यांतील वैचारिक संघर्षाचे हे लोण मुद्रित माध्यमे आणि न्यूज पोर्टलपर्यंतही पोचले. कोलकात्याच्या ‘टेलिग्राफ’ने तर उघड उघड नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध संघर्षाचा पुकारा केला आहे. त्याची अनेक कारणे येथील राजकीय वर्तुळात सांगितली जातात. ‘इंडियन एक्स्प्रेस’ नेहमीच ‘अँटी इस्टाब्लिशमेंट’ असते; पण यावेळी त्यास अतिकडव्या वैचारिक विरोधाचा वास अधिक येतो आहे. ‘हिंदू’ हे वृत्तपत्र नेहमीच उजव्यांविरुद्ध राहिलेले आहे. अन्य वर्तमानपत्रे तुलनेने कोणाच्याही बाजूने उघडउघड झुकलेली दिसत नाहीत. त्यांचा साधारणतः कल मवाळ आणि दोन्ही गटांना सामावून घेण्याकडे दिसतो आहे. ‘फर्स्ट पोस्ट’, ‘द क्विंट’, ‘द वायर’, ‘द प्रिंट’ ही न्यूज पोर्टल्स सरकारविरोधात तर ‘स्वराज’सारखा अपवाद उजव्या बाजू प्रामुख्याने मांडताना दिसत आहे. सोशल मीडियावर तर ही वैचारिक उभी फूट अधिक ओंगळवाण्या, बीभत्स पद्धतीने पुढे येत आहे. बरखा दत्त, राजदीप सरदेसाई, सागरिका घोष, रविशकुमार, अभिसार शर्मा, सिद्धार्थ वरदराजन, संकर्षण ठाकूर, सैकत दत्ता, रोहिणी सिंह, स्वाती चतुर्वेदी, भूपेंद्र चौबे आदींचे ट्विट्स पाहिले तर त्यांच्यातील अस्वस्थतेची, रागाची आणि द्वेषाचीही कल्पना येऊ शकते. ही सारी मंडळी मोदींविरुद्ध, केंद्राविरुद्ध आणि एकूणच संघ परिवाराविरुद्ध सातत्याने लिहित असतात. अनेकवेळा त्यात फक्त विरोधासाठी विऱोध असतो. राजदीप सरदेसाई लिहितात, “मी अभिमानी हिंदू आणि देशविरोधी आहे!” सिद्धार्थ वरदराजन थेट हल्ला चढवितात, पत्रकारांचा एक गट भ्रष्ट आणि कुजलेला आहे. सागरिका घोष या पत्रकारितेच्या धडे शिकवितात, तर बरखा दत्त थेट पंतप्रधानांना पत्र लिहून आपली कळकळ (विरोधी कंपूच्या मते, मळमळ) व्यक्त करतात. या चौघांमध्ये एक धागा आहे : गुजरातची 2002ची दंगल. मोदींविरुद्ध वातावरणात पेटविण्यात हे चौघे सर्वांत आघाडीवर होते, याकडे भाजपचे नेते लक्ष वेधतात. त्यामुळे या सर्वांविरुद्ध तितक्याच त्वेषाने “भक्त” मंडळी तुटून पडतात. अनेकवेळेला अतिशय अश्लील, हिणकस शेरेबाजी (‘प्रेस्टिट्यूट’, ‘बाजारू’, ‘अँटी नॅशनल’) त्यांच्याविरुद्ध केली जाते. ‘एनडीटीव्ही’ हे ‘भक्तां’च्या रागाचे नेहमीच शिकार होते. ‘शटअप एनडीटीव्ही’ हा हॅशटॅग नेहमीच ट्विटरवर येत असतो. हवालाप्रकरणी ‘एनडीटीव्ही’ची चौकशी चालू आहेच. त्याचे पुढे काय होते, याचे अनेकांना कुतुहल आहे. याउलट उजवी बाजू मांडणारया मंडळींची संख्या तशी अगदीच बोटावर मोजता येणारी आहे. सुप्रीम कोर्टावर काढलेला मोर्चा हा पत्रकारांमधील वैचारिक दुफळीचा उत्तम निदर्शक होता. त्यात सहभागी झालेली बहुतेक मंडळी कडव्या डाव्या विचारांची किंवा स्वतःला उदारमतवादी म्हणविणारी होती. उजव्या विचारसरणीचा शिक्का बसलेली मंडळी जवळपास नव्हतीच. भाजपला विरोध केल्यास पुरोगामीपणाचे, उदारमतवादीपणाचे प्रमाणपत्र सहज मिळते, अशी अवस्था पूर्वीपासून आहेत. आता तर ती अधिक धारदार झाली आहे. राजधानीतील पत्रकारितेवर डाव्या, उदारमतवादी विचारसरणीचा दाट प्रभाव आहे. सामावून घेण्याच्या काँग्रेस संस्कृतीमध्ये या मंडळींचे वैचारिक पालनपोषण झालेले आहे. त्यांच्या वर्चस्वाला, प्रभावाला संख्येने वाढत चाललेल्या आणि उघडपणे समोर येत असलेल्या उजव्या विचारसरणीच्या पत्रकारांकडून धक्के बसू लागले आहेत. त्यातून वैचारिक तेढ वाढू लागली आहे. आतापर्यंत विशिष्ट्य नेत्यांभोवती कंपू असत. उदाहरणार्थ, अरूण जेटलींचा स्वतःचा एक कळप आहे. आता असल्या कंपूंचेही अतिवेगाने वैचारिक ध्रुवीकरण होत आहे. ‘भाजपविरोधी’ आणि ‘संघी’ असे थेट आणि उघडउघड शिक्के मारले जाऊ लागले आहेत. शिवाय स्वतः मोदी यांच्या मनात विशिष्ट पत्रकारांविरुद्ध टोकाची घृणा आहे. ती ते अजिबात लपवित नाहीत. पत्रकारांपासून चार हात लांबच राहण्याची मंत्र्यांना सक्त ताकीद आहे. सरकारी पातळीवरील मिळणारे प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष लाभ, ‘डायरेक्ट अॅक्सेस’मुळे मिळणारी रसद आता जवळपास बंदच झाली आहे. पत्रकारांच्या परकीय दौरयांवर काटच मारलेली आहे. असल्या प्रतिकूल राजवटीची अनेकांना सवय नाही. या सर्व अंतःप्रवाहांचे राजधानीतील माध्यम व्यवहारांमध्ये स्पष्ट आणि टोकदार प्रतिबिंब पडत आहे. कोणत्या कळपातील पत्रकाराशी तुम्ही बोलत आहात, त्यानुसार, “दिल्ली काय म्हणते?”, या प्रश्नाचे उत्तर मिळेल! हिंदू – मुस्लिमांसारख्या टोकाच्या ध्रुवीकरणाची लागण पत्रकारितेलाही झाली आहे. Opinions are free; but Facts are Sacred हे पत्रकारितेचे मूलभूत तत्व आहे. म्हणजे मतेमतांतरे असू शकतात; पण वस्तुस्थिती मांडणे हे पत्रकारितेचे परमकर्तव्य असते. त्याचबरोबर निःष्पक्षपातीपणा आणि निर्भिडपणा ही पत्रकारितेची व्यवच्छेदक लक्षणे आहेत. या तीन मुख्य तत्वांना तडे जाण्याची प्रक्रिया फार पूर्वीपासूनच सुरू झालेली आहे. ‘जेएनयू’च्या निमित्ताने तर त्यावर प्रहार होऊ लागले आहेत. वस्तुस्थिती मांडण्याऐवजी पूर्वग्रहांवर आधारलेल्या मतांना ठळक महत्व दिले जाऊ लागले आहे. कोर्टाने निकाल देण्याआधीच एखाद्याला ‘देशद्रोही’ किंवा ‘देशप्रेमी’ ठरविण्याची स्पर्धा लागली आहे. या सगळ्या घटनांनी पत्रकारितेचे अवकाशच धूसर झाले आहे. अशा संक्रमण काळात ज्यांनी मार्ग दाखवायचा असतो, तीच राष्ट्रीय माध्यमे एकमेकांची उणीधुणी काढीत आहेत. या सगळ्या वैचारिक द्वंद्वांतून पत्रकारितेला काही चांगले अमृत मिळू शकेल काय? अपेक्षाभंग होण्याचीच दाट शक्यता आहे रशिया व चीन बद्दल बोलायलाच नको +पण खुद अमेरिकेत दहशतवादी उच्चटन करण्यासाठी जो राष्ट्रभक्त कायदा आहे तोच मुळी इतका कडक आहे व त्यातही राष्ट्रीय सुरक्षा महत्वाची की व्यक्तीचे नागरी अधिकार ह्यावर लेख उत्तम आला आहे भारताला उपदेश करणाऱ्या जगातील सर्वात प्रबळ राष्ट्रात निदान लोक तरी ह्या कायद्याविर्रूढ रस्त्यावर आले नाही आता ह्या कायद्यात अनेक निरपराध म्हणजे मुस्लिम उगाच अडकले अशी आवई इत्ते त्यात काही प्रमाणत तथ्य आहे कुर्बान शिनेमा आठवा तरीही व्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करण्यात अग्रेसर अमेरिकन नागरिक अजून तरी ह्या कायद्याविरुद्ध रस्त्यावर आला नाही म्हणूनच तेथे दुसरा हल्ला झाला नाही आपले पंचतारांकीत नगरीत स्वागत आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
म
मृत्युन्जय गुरुवार, 02/25/2016 - 08:48 नवीन
उत्कृष्ट प्रतिसाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी
स
सुबोध खरे गुरुवार, 02/25/2016 - 14:29 नवीन
बहुसंख्य तथाकथित विचारवंत पत्रकार कोणत्या मातीचे बनलेले आहेत ते मी (नौदलात असताना) फार पूर्वी जवळून पाहिलेले आहेत. स्कॉच पाजली तर भारतीय नौदल अमेरिकन किंवा रशियन नौदलापेक्षा दसपट सरस आहे असे बेदिक्कत पणे लिहितील अशी यांची स्थिती होती. दारू प्यायल्यावर आपसातील लाथाळ्या मी कितीतरी वेळेस पाहिलेल्या आहेत. यात मोठ्या मोठ्या वृत्त समूहाचे बडे पत्रकार होते. आणि एखाद्याला अशी "दारू" पाजली नाही तर भारतीय नौदल पाकिस्तानच काय पण फिजी च्या नौदलापेक्षा भिकार आहे असे लिहिण्यापर्यंत त्यांची मजल जाऊ शकते हेही पाहिले होते.( यात पक्षीय राजकारणाचा संबंध नाही हे लक्षात घ्या). त्यामुळे "पत्रकार" या जमातीबद्दल माझे मत अजिबात चांगले नाही. (तसे हि माझ्या मताला "कुत्र" सुद्धा विचारत नाही हे अलाहिदा). यामुळेच मोदी साहेबांनी यांचा "रमणा" बंद केल्या मुळे हे पिसाळले आहेत यात शंका नाही. परंतु कोणत्यातरी राजकारण्याने यांना कुंपणाबाहेरच ठेवून त्यांची लायकी दाखवून द्यायला हवी होती हि माझी फार वर्षापासूनची इच्छा मोदी साहेब आल्यावर पूर्ण झाली याचे मला समाधान आहे. त्यावर मोदी साहेबानी "तुमच्या" वाचून माझे काहीही अडत नाही हे दाखवून दिल्यामुळे त्यांची फारच पंचाईत झाली आहे. असो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी
अ
अभ्या.. Fri, 02/26/2016 - 19:07 नवीन
सध्या त्यांंच्यासाठी "ताटली बाटली" हा शब्दप्रयोग वापरतात. टीपः हा शब्दप्रयोग जुना/ऐकला असल्यास मी गावठी/मागासलेला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
प
प्रसाद१९७१ गुरुवार, 02/25/2016 - 05:44 नवीन
संघ आणि मोदी द्वेषाचा अजेंडा घेउन पाडलेला लेख. दुर्लक्ष करणे हाच एकमेव उपाय.
  • Log in or register to post comments
म
मोदक गुरुवार, 02/25/2016 - 08:39 नवीन
किती दुर्लक्ष करणार? विशिष्ट चष्मा घातलेल्या प्रवृत्ती दोन्हीकडून बोलतात आणि ठासून खोटे बोलतात. दुर्लक्ष केले तर "पहा यांच्याकडे युक्तीवाद नाही" आणि प्रतिवाद केला तर मुद्दे नसल्याने "मुस्कटदाबी होते, असहिष्णुता, धर्माचे ठेकेदार" वगैरे मुद्दे निघतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
न
नाना स्कॉच गुरुवार, 02/25/2016 - 09:00 नवीन
मुळात लेखकाने भारतीय घटना एकदा सवड़ काढून वाचावी असे सुचवतो! उत्तम पुस्तक आहे ते कोणीही सहजच उठून जय फासीजम म्हणू शकणार नाही भारतात. बाई ने तर बेचाळीस नंबर घटना दुरुस्ती म्हणजे पार मिनीकॉन्स्टिट्यूशन आणले होतेच पण जय जनता जनार्दन अन जय संविधान लगेच चौरेचाळीस नंबर दुरुस्ती आली अन कोर्स करेक्शन झाले!
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन गुरुवार, 02/25/2016 - 09:47 नवीन
असा सगळा प्रकार झाला तर, फार वाईट झाले
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी गुरुवार, 02/25/2016 - 10:06 नवीन
घासुगुर्जींना कॉर्नर करून जुने स्कोर सेटल करण्यात येत आहेत असे निरिक्षण नोंदवतो
  • Log in or register to post comments
न
नाना स्कॉच गुरुवार, 02/25/2016 - 10:30 नवीन
मिपा वर कंपुशाही काय नवी नाही, आम्ही गरीब आयडी वाचनमात्र होतो तेव्हापासुन पाहतोय हे सगळे! असो. ह्याच निमित्ताने विचार मांडायची भीती वाटते इकडे. आमचे आम्ही स्वतःच आहोत न पक्ष घ्यायला कोणी न तळी उचलायला कोणी, शिवाय काही काही आयडी आहेत जे विचारप्रवर्तक चर्चा अन वादविवाद हे मुद्द्यावर ठेवण्यापेक्षा जो व्यक्ति विरोधी मते मांडतो तोच कसा बेअक्कल राष्ट्रद्रोही फुरोगामी सिक्युलर (अन असलीच शेलकी विशेषणे) वगैरे आहेत हे तारस्वरात कोकलत असतात. वाली नसलेल्या आमच्या सारख्या आयडी ने गप हात पाय गुंडाळून बसणेच उत्तम मिपावर. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
ब
बोका-ए-आझम गुरुवार, 02/25/2016 - 13:02 नवीन
तर असू दे पण गंभीरपणे लिहिलं असेल तर एकच सांगू इच्छितो - जो कुणी तुमच्या वाटेला जाईल त्याच्याकडे दुर्लक्ष करा. त्याचा त्यांना जास्त राग येतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच
न
नाना स्कॉच गुरुवार, 02/25/2016 - 13:17 नवीन
____/\_____ हा सल्ला लक्षात ठेवेन , आम्ही तसेही वझ्याचे बैल आहोत साहेब , परप्रकाशीत का काय म्हणतात तसे ज्ञानकण वेचण्यापुरते येतो इकडे , स्वतः आम्ही अकरा ते पाचवाली कारकुंडी काय लिहिणार ! न वाचन न व्यासंग, साहित्य रसिक म्हणजे रोजचा पेपर चोथा करुन वाचणे अन रद्दी भक्तिभावे गोळा करणे हेच आमचे काम :( तोच पेपर वाचुन काही मते तयार होतात , ती मांडायची गुस्ताखी करावी का नाही इतकाच प्रश्न असतो :) पण तुमच्यासरखी माणसे विचारती होतात काही सल्ले आस्थेने देतात म्हणून वाचनमात्रचा मेंबरशिप घेता झालो पुनश्च आभार :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
न
नाव आडनाव गुरुवार, 02/25/2016 - 10:33 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
म
मोदक गुरुवार, 02/25/2016 - 11:07 नवीन
असहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
म
मृत्युन्जय गुरुवार, 02/25/2016 - 12:13 नवीन
माफ करा पण इथे असहमती दर्शवतो. विरोधी प्रतिसाद म्हटल्यावर तो लगेच स्कोर सेटलिंग होतो का? हीच का तुमची सहिष्णुता? असो. विरोधी प्रतिसाद देणार्‍यात मी पण एक आहे म्हणुन सांगतओ. घासुगुर्जीं बरोबर स्कोर सेटलिंग करण्याचा प्रश्नच येत नाही. माझे त्यांच्याबरोबर काहिच भांडण नाही. आजवर एकदाही आमची वादावादी झालेली नाही. आम्ही दोघांनाही एकमेकांचे जे लेख आवडले तिथे पसंतीचे अभिप्राय दिलेले आहेत. गुर्जींच्या विश्वाचे आर्त वर तर मी त्यांना व्यानित जाउन जाउन शंका विचारल्या (आणी धाग्यावर विचारायचे मुद्दाम टाळतो आहे हे देखील सांगितले). मला त्या लेखमालेतल्या कुठल्या गोष्टी पटतात आणि कुठल्या नाहे ते देखील स्पष्टपणे सांगितले/. अर्थात न पटण्यामागे माझे अज्ञान देखील असु शकते हे देखील कबूल केले. त्यांच्या ज्ञानाचा मला आदर आहे. पण त्यामुळे त्यांच्या मताशी मी नेहमीच सहमत होइल असे नाही. हा प्रतिसाद देण्यामागचे कारण म्हणजे एखाद दुसरा प्रतिसादक स्कोर सेटलिंग करत असेलही. पण बहुसंख्य लोकांचे गुर्जींशी काही वाकडे नाही / नसावे. त्यामुळे माझ्यासारखे इतरही बरेच जेन्युइन विरोधक आहेत / असावेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
न
निनाद मुक्काम … गुरुवार, 02/25/2016 - 16:44 नवीन
हो गुर्जी ह्यांची विश्वाचे आर्त आपण वाचतो बुआ प्रतिसाद देत नाही कारण विषय नवा उगाच आपल्याला काहीतरी कळले आहे म्हणून उगाच खरडणे जमत नाय पण नवीन विषय त्यात त्यांना उत्कृष्ट गती आहे त्याचा सविनय आदर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
ग
गवि गुरुवार, 02/25/2016 - 15:56 नवीन
सुदैवाने मी राघांना कितीही वाईट प्रतिसाद दिला तरी त्यामागे वाईट प्रतिसादाच्या पलीकडले काही किल्मिष नाही हे त्यांना सांगावं लागत नाही यातच मजा आहे. काही खवचटपणा केला त्यांच्याशी तरी पुन्हा पुढच्यावेळी पुस्तक चॉकलेटे वगैरे आणतातच.. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
र
राही गुरुवार, 02/25/2016 - 19:06 नवीन
जितका वाईट प्रतिसाद तितकी अधिक चॉकलेटे अशी काही मांडवली असते का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
न
निनाद मुक्काम … गुरुवार, 02/25/2016 - 13:01 नवीन
जुने स्कोर सेटल ...... हे पहा जगात काय चालले आहे त्याकडे दुर्लक्ष करून भारतात फक्त काय चालले ह्यावर बोंबा मारायच्या त्यासाठी असे नथीतून तीर मारायचे प्रकार आजकाल ग्लोबल काळात तेथी सोशल मिडीयाच्या काळात खपवून घेतले जात नाही भारतात रोहित चे दलित असणे उमर व कनैह्या चे विद्यार्थी असणे ह्यावर जेव्हा भर देऊन ही प्रकरण मोदींच्या विरोधक राजकीय शस्त्र म्हणून वापरायला जातात तेव्हा त्यांची फटफजिती होते. सर्व मुस्लिमांना अमेरिकेतून चालते व्हा असे म्हणणाऱ्या ट्रम ला आज अमेरिकेत पाठिंबा मिळत आहे दहशतवादाला उत्तेजन देणाऱ्या इमान ला तत्काळ इटली मधून हाकलले जाते. कांगारूंच्या देशात एका विद्यार्थिनीला राहत्या घरातून दहशतवादाच्या गुन्ह्या अंतर्गत पकडले जात तेव्हा तिचे वय विद्यार्थी असणे ह्यावरून विरोधक सरकारची गचांडी पकडायला जात नाही ,दहशतवादाच्या ह्या युद्धात सर्व राजकीय पक्ष समान भूमिका घेतात , डाव्यांच्या फाशीला विरोध आणि चीन मध्ये दरवर्षी रेकोर्ड ब्रेक दिल्या जाण्या फाशीच्या शिक्षा हा मोठा विरोधाभास आहे. आपल्याकडे दळभद्री विचारवंत जगात काय चालले आहे ह्याची खबरबात इतरांना जशी सोशल मिडिया ची क्रांती होई पर्यंत माहिती नव्हती तेव्हा आपली वैचारिक जळजळ समाजात ओकत होते आता ते अशक्यप्राय झाले आहे. खुद युरोपात युके ला इयु मधून बाहेर पडायचे आहे त्यामागील प्रमुख कारण इंग्लंड चा राष्ट्रवाद स्वताचे अस्तित्व व जर्मन लोकांचे आधिपत्य नाकारणे ही आहेत. फ्रीडम ऑफ स्पीच वर मर्यादा हवी का ह्यावर जगभरात चर्चा झाडतात एवढेच कशाला जगातील सर्वात जुन्या लोकशाहीत अनेक विख्यात विद्यापीठात ह्या भाषा स्वातंत्र्यावर बंधने आली आहेत. अनेक विख्यात विद्यापीठात ह्या भाषा स्वातंत्र्यावर बंधने आली आहेत. आपल्याकडील काही विचार्जंत हे भारतात फक्त मोदी सरकारच्या येण्याने झाले आहे व होणार आहे अशी बालिश बडबड करतात. जगभरात एखादा ट्रेंड येतो व तो जगभर प्रस्थापित होतो तेव्हा असे का होत आहेह्याकडे लक्ष दिले पाहिजे आता ह्या लेखानुसार इंग्लड सुध्दा फेसी स्ट समजायचा का जेव्हा शशी थरूर सारखा विचारवंत भाषा स्वातंत्र्यावर बंधने ह्यावर थोबाड पुस्तकात गळे काढतो तेव्हा माझ्या सारखा सामान्य वाचक त्याला त्याच्या चार्ली हेब्रो च्या वेळी फ्री स्पीच विथ ,..... अश्या टीवटीव ची आठवण करून देऊन त्याच्या सोयीनुसार विचार बदल्याच्या वृत्तीची जाणीव करून देतो अश्या विसंगती शोधून त्यांच्यातील विरोधाभास फोटो शोप करून सोशल मीडियात येतात तेव्हा अनेक थोर विचारवंत बिथरतात त्याला इलाज नाही. विद्यार्थ्यांच्या फ्रीडम ऑफ स्पीच वर भाष्य करणारा हा लेख पहा
  • Log in or register to post comments
ह
होबासराव गुरुवार, 02/25/2016 - 13:08 नवीन
.
  • Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी गुरुवार, 02/25/2016 - 14:09 नवीन
पुढची चर्चाही वाचली. यात मूळ विषयाशी संबंध नसलेला 'प्रत्येक माणसाचं मत ठरलेलं असतं. ते बदलत वगैरे नाही.' असा विचार आलेला दिसला. मला तो पूर्णपणे पटत नाही. हे टोकाला नेलं तर प्रत्येक माणूस आपले विचार घेऊनच जन्माला येतो असा अर्थ निघेल. अर्थातच इतका टोकाचा युक्तिवाद त्यातून अपेक्षित नसावा. मला त्याचा लागलेला अर्थ असा की वय पुरेसं वाढल्यानंतर मतं घट्ट होतात, आणि ती सहज बदलत नाहीत. हे बऱ्याच प्रमाणात खरं आहे. मात्र ते त्रिकालाबाधित सत्य नाही. अनेक लोकांचं मतपरिवर्तन - म्हणजे एकशेऐशी डिग्रीमध्ये बदल या अर्थाने नाही - तर दिशेमध्ये, विचार करण्याच्या पद्धतीत बदल झालेला पाहिला आहे. मूळ लेखकाच्या क्वालिफिकेशन्सवर शंका घेणं, घासकडवींच्या हेतूवर शंका घेणं, नंतर या लेखावर टीका करणारांच्या हेतूवर शंका घेणं - हे सगळंच अॅड होमिनिम आणि म्हणून त्याज्य आहे. नंतर 'माहिती नसलेल्या विषयावर कुठल्यातरी उपटसुंभाचा लेख भाषांतरित करणं आवडलं नाही' हेही एक मत म्हणून बाळगायला हरकत नाही, पण प्रत्येकच लेखकाने आपला ज्यात १०० टक्के अभ्यास आहे अशाच विषयावर लेख लिहिणं शक्य नाही. वेगवेगळ्या विषयांबाबतीत आपला अधिकार वेगवेगळा असतो. त्यामुळे खात्रीलायक किंवा कमी खात्रीची विधानं करता येतात. उदाहरणार्थ 'उंचावरून चेंडू खाली सोडला तर तो एका सेकंदात ४.९ मीटर खाली जाईल' या विधानाबद्दल मला प्रचंड खात्री आहे. ते तसं का, आणि काही वेळा ३ मीटर काहीवेळा ६ मीटर का जात नाही याबद्दल मी वेगवेगळ्या पॅरामीटर्सच्या आधारे चर्चा ठामपणे करू शकेन. पण 'फॅसिझमची ही ही लक्षणं आहेत' यासारख्या समाजशास्त्रीय सत्यांबद्दल मी केवळ मांडणी करून चर्चा करायचं आवाहन करू शकतो. यातून मला इतरांकडून काही शिकायला मिळेल आणि चर्चेतून सर्वांनाच काही शिकायला मिळेल अशी आशा असते. ती आशाही गैरच कारण कोणी काही विचार बदलत नाहीच, आणि केवळ हमरीतुमरी करण्याची खुमखुमी जिरावी म्हणून चर्चा करतात आणि वाचतात हे मला मान्य नाही. असो. या सर्व चर्चेला अवांतर मुद्द्यांबाबतची माझी ही मतं आहेत. त्यामुळे या सर्व अवांतर/अॅड होमिनिम विषयांवर आणखीन काही लिहू इच्छित नाही.
  • Log in or register to post comments
म
मोदक गुरुवार, 02/25/2016 - 14:41 नवीन
लेखाखालच्या पहिल्या प्रतिसादातला तुमचा आवेश किंवा वाक्यरचना चुकली आहे असे तुम्हाला वाटत आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
ब
बाळ सप्रे Fri, 02/26/2016 - 06:33 नवीन
खरतर फॅसिझम, लोकशाही, साम्यवाद या पातळीवर लेखन असेल तर त्यात चूक बरोबर असं ठरवता येणं कठीण असतं असतो तो प्रत्येकाचा दृष्टीकोन. आणि तसही कुठलिही राजवट पूर्णपणे फॅसिस्ट अथवा लोकशाही असू शकत नाही. there is nothing black or white. It's always shade of grey.. म्हणून मला व्यक्तिशः सरकारवर टीका अथवा सरकारचे कौतुक करण्यासाठी कुठलेही मुद्दे गोळा करण्याऐवजी मुद्द्यावर टीका अथवा भलामण करणे योग्य वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक Fri, 02/26/2016 - 10:39 नवीन
खरतर फॅसिझम, लोकशाही, साम्यवाद या पातळीवर लेखन असेल तर त्यात चूक बरोबर असं ठरवता येणं कठीण असतं मुळात जर तरच्या गोष्टी कशासाठी करायच्या? आणि फॅसीझम, लोकशाही, साम्यवादासंदर्भात लेखन करायचे असेल तर थोडे तरी विश्वासू संदर्भ असावेत. येथे लेख लिहिला आहे, आवेशपूर्ण प्रतिसाद दिला आहे आणि मतप्रदर्शन केले आहे. मग जर तर असे कशला? आहे ते आहे. असतो तो प्रत्येकाचा दृष्टीकोन. हेही मान्य. दृष्टीकोन असेल तर त्याच्याशी प्रामाणिक रहावे. "राहुल गांधी यांच्या असामान्य बुद्धीची झेप मला थक्क करते आणि मला संघवाला मोदी आवडत नाही, म्हणून मोदी सरकारही आवडत नाही" असे स्पष्ट आणि स्वच्छ बोलावे. या धाग्यावर अनेक ठिकाणी उल्लेख झाल्याप्रमाणे ताकाला जावून भांडे लपवणे वगैरे प्रकार कशाला? (तसेच या दृष्टीकोनावर कोणी योग्य मुद्द्यांसह बुद्धीवादी(?) प्रतिवाद केला तर असहिष्णुतेची कोल्हेकुई करायला कारणही मिळेल.) आणि तसही कुठलिही राजवट पूर्णपणे फॅसिस्ट अथवा लोकशाही असू शकत नाही. there is nothing black or white. It's always shade of grey.. सहमत. म्हणून मला व्यक्तिशः सरकारवर टीका अथवा सरकारचे कौतुक करण्यासाठी कुठलेही मुद्दे गोळा करण्याऐवजी मुद्द्यावर टीका अथवा भलामण करणे योग्य वाटते. सहमत. मात्र हा सर्व प्रकार करताना निदान स्वत:शी आणि स्वत:च्या उद्देशाशी प्रामाणिक असणे आणि निघालेले निष्कर्ष मान्य करण्याची तयारी असणे आवश्यक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे
प
प्रसाद१९७१ Fri, 02/26/2016 - 11:01 नवीन
मोदक राव - झोपेचे सोंग घेतलेल्यांना जागे करता येते का हो? आणि झोपेचे सोंग घेण्याच्या बदल्यात काही मिळत असेल तर कोण जागे होइल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
ग
गॅरी ट्रुमन Fri, 02/26/2016 - 12:35 नवीन
दृष्टीकोन असेल तर त्याच्याशी प्रामाणिक रहावे. "राहुल गांधी यांच्या असामान्य बुद्धीची झेप मला थक्क करते आणि मला संघवाला मोदी आवडत नाही, म्हणून मोदी सरकारही आवडत नाही" असे स्पष्ट आणि स्वच्छ बोलावे. या धाग्यावर अनेक ठिकाणी उल्लेख झाल्याप्रमाणे ताकाला जावून भांडे लपवणे वगैरे प्रकार कशाला? (तसेच या दृष्टीकोनावर कोणी योग्य मुद्द्यांसह बुद्धीवादी(?) प्रतिवाद केला तर असहिष्णुतेची कोल्हेकुई करायला कारणही मिळेल.)
जबरदस्त. खतरनाक. जबराट. पूर्ण पटले विशेषतः ताकाला जावून भांडे लपवणे हा प्रकार. मोदकराव पूर्ण फॉर्ममध्ये आहेत सध्या :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
प
प्रसाद१९७१ Fri, 02/26/2016 - 13:53 नवीन
अहो त्यांना ताकाला जाऊन भांडे लपवावे लागतेच. कारण हे लोक कधी पल्टी मारतील सांगता येत नाही. आणि कधी पल्टी मारुन मोदी भक्त होयची वेळ आली ( जी येइल च ५ वर्षात )तर आत्ता स्पष्ट आरोप करुन कसे चालेल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
म
मूकवाचक Fri, 02/26/2016 - 13:17 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
ब
बाळ सप्रे Mon, 02/29/2016 - 10:26 नवीन
मला संघवाला मोदी आवडत नाही, म्हणून मोदी सरकारही आवडत नाही" असे स्पष्ट आणि स्वच्छ बोलावे
मोदींवर अथवा सरकारवर एखाद्या अथवा अनेक मुद्द्यांवर टीका झाली म्हणजे त्याला मोदी आवडत नाहीत असे सरसकट दृष्टीकोन ठेवायची गरज नाही. टीका करणार्‍या सर्वांनाच सरकार पाडायचेच आहे अशी भिती बाळगून अति डिफेन्सिव होण्याचीही गरज नाही. चुका सर्वांकडून होतात. छोट्यामोठ्या चुका स्वीकार करून पुढे जाणे एवढे केले तरी पुरेसे आहे. भाजप अन मोदींना इतका मोठा विजय मिळवून देउनही विरोधी पक्षांवर टीका करणे आणि त्यांच्या गेल्या ६०-७० वर्षांच्या कारकीर्दीतली मढी उकरत रहाणे यातच धन्यता मानत रहाणे हे कुठेतरी खटकतं. एका ठीकणी फेसबुकवर वाचलेली एक ओळ खूप मार्मिक आहे.. रागा आणी सोनिया यांची काँग्रेसला जेवढी गरज नाही त्यापेक्षा भाजपला जास्त गरज भासतेय. They are low hanging fruits. इतक्या टीकेनंतरही मी असेच म्हणेन की सध्यातरी मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप हाच सर्वात सक्षम राजकीय पर्याय आहे. पण खंत ही आहे की सत्तेच्या उन्मादात टीका पॉझिटिव्हली घेण्याची कोणाची मानसिकता नाही. आणि उदोउदो करण्याची प्रचंड चढाओढ लागलीय लोकांतही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
त
तर्राट जोकर Mon, 02/29/2016 - 10:33 नवीन
प्रतिसाद आवडला. आपले मत पटले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे
म
मोदक Mon, 02/29/2016 - 12:37 नवीन
मी इतकेच म्हणत आहे की "तुमचा जो काही दृष्टीकोन आहे त्याच्याशी प्रामाणिक रहावे" आपण मारे एखादे तज्ञ असल्याचा आव आणून एखादे मत व्यक्त करायचे आणि कोणत्या आधारावर मत मांडले हे विचारले की माझा अभ्यास नाही, त्यातले कळत नाही वगैरे लिहायचे. हे कशाला? मत व्यक्त करण्याचे कळते तर ते सिद्ध करण्याचे कळत नाही का? मोदी सरकारच्या नावाने खडेच फोडायचे आहेत तर थोडा निष्पक्ष अभ्यास करावा, प्रमाणित माहिती मिळवावी आणि योग्य व सत्य पुराव्यांसह लेख लिहून जी काय आहे ती बाजू मांडावी. (तितके अभिव्यक्ती स्वातंत्र्य नक्कीच आहे, आणि हवे ते लिहिलेले प्रसिद्ध करण्याचीही सहिष्णुताही आहेच आहे!) निष्पक्षपातीपणाचा खोटा आव कशासाठी..? ("ताकाला जावून भांडे लपवणे" वगैरे वगैरे) वरचे तुम्ही लिहिलेले वाक्य हे मी फक्त उदाहरणादाखल दिले होते. त्यामुळे त्या वाक्यावर तुम्ही मांडलेले मुद्दे खरे असतीलही पण ते माझ्या प्रतिसादाला अनुसरून आहेत असे मला वाटत नाही. त्यामुळे त्यावर पास. पण खंत ही आहे की सत्तेच्या उन्मादात टीका पॉझिटिव्हली घेण्याची कोणाची मानसिकता नाही. आणि उदोउदो करण्याची प्रचंड चढाओढ लागलीय लोकांतही. टीका पॉझीटिव्हली घेण्याबाबत कसे असते.. हिंदू धर्म, भारत देश यांच्यावर टिका करण्यासाठी फारशी पात्रता लागत नाही आणि तसेही हिंदू लोक्स संघटित उपद्रवमूल्य बाळगून नाहीत. त्यामुळे इतके दिवस "मी म्हणते तोच मौत का सौदागर" आणि "मी म्हणतो तोच हिंदू कम्युनल" अशी परिस्थिती होती. आता अशा अन्याय्यपणे होणार्‍या टिकेला थोडेफार प्रत्युत्तर* मिळाले की असहिष्णुता, विचारांची गळचेपी, हुकुमशाही वगैरे कोल्हेकुई सुरू होते. ..आणि उदो उदोचा प्रश्न सगळीकडेच अनेक दशकांपासून अस्तित्वात आहे त्यामध्ये काहीही नवीन नाही. सध्या परिस्थिती अशी आहे की.. ऐतवडे बुद्रुकमध्ये एखादा माजी उपसरपंच काही बोलला की ते विधान भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारणीकडून आल्यासारखे न्यूज चॅनल दिवसरात्र दाखवत बसतात आणि त्यावर विश्वास ठेवून तथाकथीत विद्वान विचारवंत संस्थळांवरती मतप्रदर्शन करतात. *प्रत्युत्तर न्याय्य आहे की नाही ते त्या त्या घटनेवर अवलंबून आहे. "मोदींवर टीका करणार्‍यांनी पाकिस्तानात जावा", "राम मानत नाही म्हणजे हराम" हे कोणत्याही परिस्थितीमध्ये निषेधार्हच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे
ब
बाळ सप्रे Mon, 02/29/2016 - 14:26 नवीन
तुमचा जो काही दृष्टीकोन आहे
तो कायमच "मला मोदी आवडत नाही" असा नसतो. तर तो "या या गोष्टी चुकतायत" असा असू शकतो असा विचार करून बघा.. मग "मारे तज्ञ असल्याचा आव आणतोय" असं न वाटता काय चुकतय याकडे लक्ष जाण्याची शक्यता जास्त आहे. सगळं चुकतच असेल असं नाही, पण सगळं बरोबरच चालू आहे हा पवित्रा थोडा नक्की बदलेल.. आणि जे चुकतय ते मान्य करण्याची थोडीशी शक्यता निर्माण होइल. सांगणार्‍याचा पुरेसा अभ्यास नसला तरी त्याचा मुद्दा खोडून काढता येइल. सांगणार्‍यालाच निकालात काढण्याने मुद्द्यावरून वैयक्तिक भांडणाचे रूप जास्त येते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक Mon, 02/29/2016 - 14:30 नवीन
अहो पण मुळात खोडून काढायला मुद्दे असायला नकोत का? आणि जे मुद्दे दिले आहेत ते इतके हास्यास्पद आहेत की त्यावर येथे आणि सर्वच ठिकाणी भरपूर चर्चा झाली आहे. ..असो आपल्यात गैरसमज होण्या आधी थांबतो. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे
त
तर्राट जोकर गुरुवार, 02/25/2016 - 14:13 नवीन
मोदीस्तुती करणारे लेख लिहा. कोणीच किस पाडणार नाही.
  • Log in or register to post comments
S
sagarpdy गुरुवार, 02/25/2016 - 15:43 नवीन
१००० च्या वर प्रतिसाद आलेले आहेत. कदाचित मोदी पंतप्रधान आहेत तोवर चालूच रहाणारे बहुधा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर गुरुवार, 02/25/2016 - 16:00 नवीन
तिकडे मोदीभक्त गिरे तो बी टांग उपर आवेशात असतात. डोन्ट टेल्मी. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarpdy
ग
गामा पैलवान गुरुवार, 02/25/2016 - 17:42 नवीन
राजेश घासकडवी, लेखाच्या शीर्षकात व्यवच्छेदक लक्षणांचा उल्लेख आला आहे. माझ्या माहितीप्रमाणे त्यास इंग्रजीत distinguishing characteristics म्हणतात. व्यवच्छेदक म्हणजे इतरांपासून वेगळेपण दर्शवणारी. तुम्ही दुवा दिलेला मूळ लेख बघितल्यास लॉरेन्स ब्रिटला हा अर्थ अभिप्रेत नसावासं दिसतंय. तुम्हाला हा अर्थ अभिप्रेत आहे का? उत्तर हो असेल तर इतर राज्यव्यवस्थांची चर्चा देखील व्हायला हवी. जेणेकरून फ्यासिझम कसा वेगळा आहे ते ठळकपणे उठून दिसेल. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी गुरुवार, 02/25/2016 - 18:02 नवीन
बरोबर. कदाचित व्यवच्छेदक लक्षणांऐवजी नुसतीच लक्षणं म्हणणं अधिक योग्य ठरलं असतं. किंवा प्रत्येक लक्षणाच्या शेवटी 'आदर्श लोकशाहीत हे होताना दिसत नाही किंवा कमी प्रमाणात होताना दिसतं.' असं अध्याहृत वाक्य वाचलं तरी ठीक होईल. मला वाटतं मूळ लेखात एक त्रुटी आहे ती म्हणजे उजव्या एकाधिकारशाहीलाच फॅसिस्ट म्हटलं आहे, डाव्या एकाधिकारशाहीचा उल्लेख नाही, आणि लोकशाही अध्याहृत आहे. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे या सहा राजवटींत जे दिसतं ते इतर एकाधिकारशाही किंवा लोकशाही राजवटींत कसं दिसत नाही हे सांगण्यासाठी त्यांनी काही ओळी खर्च करायला हव्या होत्या. आणि त्यामुळेच वरच्या चर्चेत अनेकांनी स्टालिन, चीन वगैरे उदाहरणं देऊन तिथेही हेच कसं होतं हे दाखवलेलं आहे. हे सुयोग्य आहे. माझ्या मनात डावी आणि उजवी एकाधिकारशाही यातले फरक महत्त्वाचे नाहीत. कारण पोथी कुठची आहे हे ठरलं की वागणूक बहुधा सारखीच असते - उडदामाजी थोडंसं काळंगोरं करण्याइतपतच फरक. म्हणून मी लोकशाही आणि फॅसिस्ट प्रवृत्ती अशा दोन टोकांमध्ये तुलना करण्याचा प्रयत्न करतो. लोकशाहींमध्येही सरकारं यातले बरेच मार्ग वापरतात. मात्र किती जास्त प्रमाणात किती जास्त मार्ग वापरले जातात यावरून लोकशाही की फॅसिझम हे ठरत असावं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान गुरुवार, 02/25/2016 - 18:31 नवीन
राजेश घासकडवी, हे विधान महत्त्वाचं वाटलं : >> मात्र किती जास्त प्रमाणात किती जास्त मार्ग वापरले जातात यावरून लोकशाही की फॅसिझम हे ठरत असावं. जी दोन प्रमुख फ्यासिस्ट उदाहरणं आहेत त्यांत दोन्ही राज्यकर्ते (हिटलर आणि मुसोलिनी) लोकशाही मार्गाने सत्तेवर आलेले होते. त्यामुळे राज्यकर्त्याच्या वर्तनावरून लोकशाही कुठे संपली आणि फ्यासिझम कुठे सुरू झाला हे नेमकं ठरवणं अवघड आहे. किंबहुना लोकशाही हे फ्यासिस्ट हुकूमशहाचे केवळ सत्ताप्राप्तीचे साधन आहे. तुम्ही जी दोन टोकं म्हणता आहात त्यातलं दुसरं टोक लोकशाही नसून अराजक (वा निर्नायकी) आहे. असं आपलं माझं मत. निदान जर्मनी अन इटलीमध्ये तरी फ्यासिस्ट हुकूमशहा अराजकातूनच उत्पन्न झालेले आहेत. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
ब
बोका-ए-आझम गुरुवार, 02/25/2016 - 19:35 नवीन
पण मुसोलिनी नाही. फॅसिस्ट पक्षाच्या ३०,००० स्वयंसेवकांनी रोमवर मोर्चा नेला आणि राजा व्हिक्टर इमॅन्युअल यांनी मार्शल लाॅ लागू करायला नकार दिला. त्याचा निषेध म्हणून पंतप्रधान लुइगी फॅक्टा यांनी राजीनामा दिला आणि तेव्हा राजाने या स्वयंसेवकांचा नेता बेनिटो मुसोलिनीला सरकार स्थापनेसाठी पाचारण केलं आणि असा तो पंतप्रधान बनला आणि नंतर २ वर्षांनी त्याने फॅसिस्ट पक्षाची हुकूमशाही चालू केली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान गुरुवार, 02/25/2016 - 22:22 नवीन
बोका-ए-आझम, अगदी सुयोग्य निरीक्षण. माझं थोडं चुकलंच. मुसोलिनी हा लोकशाही मार्गाने नसला तरी राजाची रीतसर परवानगी घेऊन सत्तेवर आलेला होता. अर्थात, राजाला वाटलं की तो सावळागोंधळ दूर करेल. मात्र प्रत्यक्षात साहेबांनी एकेकाला गुंडाळायला सुरुवात केली. या घडामोडींची पार्श्वभूमी निर्नायकीची आहे. वायमर जर्मनीतही असाच गोंधळ माजला होता जो हिटलरने दूर केला. सांगायचा मुद्दा होता की जर्मनी व इटली इथल्या फ्यासिस्ट राजवटी दृढ होण्यास अगोदरच्या निर्नायकीचा बराच वाटा आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा