१ मार्च - डाऊन द मेमरी लेन (ह्रिष्यामि च पुनः पुनः)
Primary tabs
१३ वर्षांपूर्वी, १ मार्च ला रात्री/पहाटे १ वाजता उठलो, सगळ्या रूममेट्स ना उठवलं. सगळे कुंभकर्ण कसे पटापट उठून आले, कॉफी पिऊन, अर्ध्या मैलावर असलेल्या एका 'लिट्ल ईंडिया' मधे पोहोचलो. (हे टोपण नाव तिथे रहाणार्या संख्येने आणी वागण्याने सुद्धा कमाल असलेल्या देसी स्टुडंट्स मुळे पडलं होतं).
दुसर्या मजल्यावर एक केबल कनेक्शन घेऊन, मधे स्प्लिटर टाकून ४ अपार्ट्मेंट्स मधे पोहोचवलं होतं. त्या १५० स्क्वेअर फूटाच्या खोलीत पन्नासएक जण जीव मुठीत घेऊन बसावा, तसं पाय पोटाशी घेऊन बसले होते. मांडी घालण्याची चैन परवडणारी नव्हती आणी जागा सोडणं हे ईंजिनीअरींग ची किंवा मेडिकल ची मिळालेली फ्री सीट सोडण्याईतकं कल्पनातीत होतं.
टॉस जिंकुन पाकिस्तान ने बॅटींग घेतली आणी काळजी वाटायला लागली. आत्तापर्यंत दर वेळी भारताने पहिली बॅटींग केली होती. पण ठीक आहे, बघू कसं होतं असा एकमेकांना धीर देत टीव्ही कडे पहात होतो. पाकिस्तान कडे असे काही खेळाडू आहेत ज्यांना बहुदा फक्त भारताच्या विरुद्ध मॅच असली की च खेळायला काढतात. त्या यादीतलं एक नाव म्हणजे सईद अन्वर. पट्ठ्या लौकीकाला जागत खेळला आणी बघता बघता पाकिस्तान चे २७३ झाले. बॉलिंग ला अक्रम, वकार आणी तेव्हाचा भेदक शोएब होते. सगळ्यांचे चेहेरे कॉफीमेकर मधल्या कॉफीपेक्षा जास्त काळे ठिक्कर पडले.
एका ईंटरनॅशनल स्टुडंट सेंटर मधे ओळख झालेल्या अमेरिकन डॉक्टर ला हे क्रिकेट असतं तरी काय असा पडलेला प्रश्न सोडवण्यासाठी 'ये परवा सकाळी १ वाजता असं आमंत्रण दिलं होतं. तो पहाटे ४ वाजता डोनट्स आणी ऑरेंज ज्यूस घेऊन आला. त्याचं फर्स्ट ईंप्रेशन बहुदा क्रिकेट बघताना बुद्धीबळाच्या गांभीर्यानं बघतात असं झालं असावं.
लंच ब्रेक मधे, आय सी यू च्या बाहेर उभे असणार्या नातेवाईकांचं धैर्य तोंडावर ठेऊन, 'बघू, काय होतं. अजुन आपली बॅटींग आहे' वगैरे गोष्टी स्वतःला सुद्धा पटेल, न पटेल अशा बेतानं बोलत होते. बहुदा सचिन एका बाजुने उभा राहील आणी दुसर्या बाजुने आपण अॅटॅक करू (कारण मागच्या तीन्ही मॅचेस मधे असच केलं होतं, पण तेव्हा पहिली बॅटींग होती) किंवा सचिन स्वतःच हल्ला करेल अशा चर्चा दबक्या आवाजात चालू होत्या.
अर्ध्या तासाने आपली बॅटींग सुरू झाली. त्या वर्ल्डकप मधे पहील्यांदाच सचिन ने स्ट्राईक घेतला आणी काहीतरी वेगळं घडणार ह्याची चाहूल लागली. अक्रम, वकार, शोएब, रझाक ह्या चौकडी ला तोंड देण्यासाठी प्रत्यक्ष क्रिकेटच्या देवालाच तांडव करावं लागणार होतं. पहीलाच बॉल अक्रम ने शॉर्ट ऑफ गूड लेंग्थ, ऑफ स्टंप लाईन वर टाकला. डावखुर्या अक्रम चा तो बॉल सचिन सोडुन देईल असं वाटण्याच्या आतच, सचिन च्या एका डिफेन्सीव्ह पुश वाटावा अशा फटक्याने कव्हर बाऊंड्री च्या बाहेर गेला. आमच्या जीवात जीव आला. पण अजुन शोएब च्या ओव्हर ची धास्ती होतीच. २ वाइड आणी ३ सरळसाध्या बॉल्स नंतर पुढच्या तीन चेंडुत शिडात वारं भरावं तसं आमच्या सगळ्यांच्या फुप्फुसात हवा भरली गेली आणी ईतका वेळ शांतपणे सामना बघत बसलेला तो डॉक्टर बसल्या जागी कोसळला. आधीच्या बुद्धीबळाच्या सामन्याची जागा आता कुस्तीच्या आखाड्यानं घेतली होतॆ. सचिन सुटला होता. तो मैदानात पाकिस्तान बोलिंग चं जे करता होता, ते आम्ही टीव्ही समोर शब्दांनी करत होतो. पुढचा दीड तास, सचिन ने आम्हाला 'हा क्षण बघायला आपण जिवंत आहोत' ह्याबद्दल धन्यता वाटायला लावली. सचिन आऊट होईपर्यंत पाकिस्तानी बोलर्स च्या मनोधैर्याची त्यानं शकलं केली होतॆ. उरलेल्या १०० धावांत ती शकलं नीट उचलुन, व्यवस्थित गिफ़्ट पॅक करून त्यांच्या हातात ठेवायचं पुण्यकर्म द्रविड-युवराज जोडीनं केलं. ईतक्या शांतपणे आणी 'क्लिनीकली' त्यांनी उरलेलं काम पूर्ण केलं की पाकिस्तान ला आपण कधी हारलो हे कळलं देखील नसावं.
मॅन ऑफ मॅच सेरेमनी च्या सुरुवातीला रॉबर्ट जॅकमन नं आमच्या सारख्या असंख्य प्रेक्षकांची धन्यता चार शब्दात मांडली. 'थँक यु सचिन तेंडुलकर'.
हा लेख त्या मॅचचा वृत्तांत नाही तर केवळ एका क्रिकेटवेड्याने केलेलं एक संकीर्तन!!
चांगली आठवण
पण त्या मेचाबद्दल आणि त्यातल्या सचिनच्या इंनिगस बद्दल बराच लिहिण्यासारखं आहे.
खासकरून शोएब ला कानफ़टात मारलेला थर्डमेन वरचा सिक्स.
अगदी सहमत आहे. त्यावर खूप लिहीता येईल. पुढच्या वेळी.
सचिनने क्रिकेट खेळणे सोडले आणि आम्ही क्रिकेट बघणे.
क्रिकेट प्रेम हा अस्सध्य, जुना रोग असल्यामुळे त्याचं समूळ उच्चाटन ह्या जन्मी तरी शक्या होईल असं वाटत नाही. पण सचिन गेल्यापासून, 'वह बात अब नही रही' हे मात्र तितकच खरं. कुठल्याही बॉलर चा वरचश्मा सुरू झाला की, 'एकदा सचिन च्या तडाख्यात सापडू दे, मग बघू' हा जो विश्वास वाटायचा, तो आता अजुन तरी कुणाविषयी वाटत नाही.
क्रिकेट प्रेम हा अस्सध्य, जुना रोग असल्यामुळे त्याचं समूळ उच्चाटन ह्या जन्मी तरी शक्या होईल असं वाटत नाही. पण सचिन गेल्यापासून, 'वह बात अब नही रही' हे मात्र तितकच खरं. कुठल्याही बॉलर चा वरचश्मा सुरू झाला की, 'एकदा सचिन च्या तडाख्यात सापडू दे, मग बघू' हा जो विश्वास वाटायचा, तो आता अजुन तरी कुणाविषयी वाटत नाही.
या दोन मॅचेस मला जिवंतपणी लाइव्ह पाहता आल्या याबद्दल त्या आकाशातल्या बाप्पाचे आभार..
(अवांतरः अशाच आणखी काही: २००१ ची कोलकाता, २००३ ची नॅटवेस्ट फायनल, सचिनचे हैदराबादमधले १७५ )
२४ फेब्रुवारी विसरू नका. वन-डे मधलं पहीलं द्विशतक!
भाऊ, काय तर आठवण काढलीत ! काल निघालीच होती आठवण तशी . "तो" मॅच म्हणजे खरंच कोणताही क्रिकेटप्रेमी कधीच विसरू शकणार नाही. "तो" अॉफसाईडला सिक्स, सेहवाग- अख्तर संवाद, सचिनचं ९८ वर आऊट होणं . सगळं सगळं छापल्या गेलंय मेंदूत . हम्ममम! गेले ते दिवस ... आता नाही येत राव "तशी" मजा. अजून ३५-४०-५० वर्षानंतर जेव्हा कोणत्यातरी हॉस्पिटलमध्ये शेवटचा श्वास घेत असेल तेव्हा पण कदाचित "तो" मॅचच आठवत असेल...
"अजून ३५-४०-५० वर्षानंतर जेव्हा कोणत्यातरी हॉस्पिटलमध्ये शेवटचा श्वास घेत असेल तेव्हा पण कदाचित "तो" मॅचच आठवत असेल" - क्या बात है! असे असंख्य क्षण आपल्यासारख्या क्रिकेटप्रेमी माणसांच्या आयुष्यात आणून देणार्या क्रिकेट च्या 'देवा'ला दंडवत!
बेदरकारपणा रुजवायची सुरुवात सचीनने केली हे निर्वीवाद.
विशेषतः १९८५-८६ मधल्या मिनी वर्ड-कप (ऑस्ट्रेलिया) पासून.
पण श्रीकांत तितकाच बेभरवशी होता, (सहवाग सारखाच), असे माझे मत.
श्रीकांत ओपनिंगला आल्यापासून भारताचा वन-डे कडे बघायचा दृष्टीकोन सकारात्मक झाला.
श्रीकांत,सहवाग आणि सचिन एकत्र खेळले असते तर.....
???????????????????????
सचिन ला ह्या तुलनेतून बाजुला ठेवलय.
श्रीकांत धडाकेबाज होता, पण अत्यंत बेभरवशी. सेहवाग च्या बेदरकारपणामुळे त्याचा वन-डे मधला प्रभाव जरी मोठा वाटला, आणी तसा तो होता देखील, पण मला त्याचा टेस्ट मधे सेहवाग जास्त प्रभावी वाटला. जवळ जवळ पूर्ण करीअर ५० च्या घरातला अॅव्हरेज आणी मॅच वरचा त्याचा ईंपॅक्ट खूप काही सांगून जातात.
येस्स...
पण श्रीकांत येईपर्यंत आपण वन-डेत पहिल्या षटकापासूनच धावा कुटायच्या असतात (धावा कुटणे आणि धावा काढणे, ह्या २ वेगळ्या-वेगळ्या गोष्टी आहेत.) हे लक्षांत घेतले न्हवते.
श्रीकांत आला आणि भारतीय खेळाडू, वन-डेला स्वीकारायला लागले.
कारण तोपर्यंत आपले टेस्टचे आणि वन-डेचे खेळाडू बदलत नसत.
किर्ती आझाद,अतुल बेदाडे हे अपवाद.
श्रीकांत ने वन-डे च्या आपल्या मानसिकतेत बदल घडवला, हे तर नक्कआझादते श्रेय नक्कीच त्याला जातं.
सुनील गावस्कर, कपिलदेव, इम्रान आणि जावेद मियांदाद हे सगळे एकत्र खेळले असते. वासिम अक्रमने भारताची bowling open केली असती. सचिन आणि सईद अन्वर यांनी जगभरातल्या सर्व बोलर्सना रडवलं असतं, विश्वनाथ आणि झहीर अब्बास यांनी एकाच संघातून बॅटची नजाकत दाखवली असती, शेन वाॅर्नला आपण मैदानभर पिटले जात आहोत अशी दुःस्वप्नं आयुष्यभर पडली असती. आणि - विश्वचषक भारताबाहेर फार कमी वेळा गेला असता.
हा विचार राहून राहून मनात येतो.
+१११११
त्यांच्याकडे ग्रेट बॉलर झाले आणि आपले ग्रेट बॅट्समन.
इन्झमाम, मियाँदाद वगैरे कितीही चांगले खेळले असले तरी सचिन, गावसकरशी तुलनाच शक्य नाही.
कपिल देव, कुंबळे कितीही ग्रेट असले तरी इम्रान खान, वसीम अक्रम यांचा क्लास वेगळाच.
जसा सच्चू सर्वश्रेष्ठ फलंदाज तसा वसिम अक्रम तर सर्वश्रेष्ठ वेगवान गोलंदाज
काहीसा असहमत! वसिम अक्रम चांगला बॉलर होता याबद्दल दूमत नाहीये . पण सचिनशी तुलना खटकली. हं एक वेळ मुरलीधरन, शेन वॉर्न वगैरेशी तुलना केली तर चालेल . पण अक्रम नाही. आकडे पहा तुलना करा.
बोका
तुमचा विचार खरच चांगलाय
पण ह्या दोन जाती जितक्या एकामेंका विरोधात त्वेषाने खेळतात तितकेच एकामेकांसोबत प्रामानिकपणे खेळले असते असं वाटत नाही.
http://www.misalpav.com/node/30362
सचिन च्या ह्या खेळी सारखीच अजुन एक संस्मरणीय खेळी होती
शारजा १९९६
भारत-ऑस्ट्रेलिया (qualifier)
ते वाळुचे वादळ आणि त्यानंतर चा सचिनचा झंझावत
अक्षरश: पिसाटल्यासारखा खेळला होता तेव्हा तो