काथ्याकूट

दिल्लीमधे दोन दहशदवाद्यांना कंठस्नान

Primary tabs

आजच्या म.टा. मध्ये ही बातमी वाचली. ह्या एनकाऊंटर बद्दल दिल्ली पोलिसांचे कौतूक केले पाहिजे वगैरे ठीक आहे, परंतु इंस्पेक्टर मोहनचंद्र शर्माला शहीद मानने कितपत ठिक आहे? ह्याने बुलेट्प्रुफ जॅकेट घातले नव्हते! जर दहशदवाद्यांशी लढायला जाताना पुरेसा संरक्षक पेहेराव केला नसला तर दोष कुणाचा? दहशदवाद्यांचा नक्कीच नाही! बातमीत म्हटल्याप्रमाणे अतिरेक्यांकडून ८ गोळ्या झाडण्यात आल्या त्यातल्या तीन गोळ्या इं. शर्मांना लागल्या.
दुसरी बाब म्हणजे, जो अतिरेकी पोलिसांच्या हातात जिवंत सापडला, तो योगायोगाने आजमगड जिल्ह्यातील समाजवादी पार्टीच्या उपाध्यक्षाचा मुलगा आहे! बाकीचे दोन मारले गेले आणी दोन पळुन गेले!

अशा बातम्या ऐकल्या की उगाचच त्यांच्या खरेपणाबद्दल शंका वाटायला लागते

- चंबा

ह्याने बुलेट्प्रुफ जॅकेट घातले नव्हते! जर दहशदवाद्यांशी लढायला जाताना पुरेसा संरक्षक पेहेराव केला नसला तर दोष कुणाचा?
बातम्या ऐकताना माझ्याही मनात हाच मुद्दा उपस्थित झाला होता. बुलेटप्रुफ जॅकेट घातले नव्हते असे मलाही वाटते. कारण एक गोळी कमरेवर, एक खांद्यावर आणि एक छातीत लागल्याचे सांगत होते. मलाही आश्चर्य वाटले. इतके एन्कॉउंटर केलेला सिनियर इन्स्पेक्टर इतका हलगर्जी कसा?

असो पण 'शहिद' शब्दाला माझा आक्षेप नाही. काहीही झाले तरी दहशतवाद्यांशी मुकाबला करताना मृत्यू आला आहे. दारू पिऊन गाडी चालवताना अपघात होऊन किंवा हार्टऍटॅकने आलेला नाही.

जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)

काहीही झाले तरी दहशतवाद्यांशी मुकाबला करताना मृत्यू आला आहे. दारू पिऊन गाडी चालवताना अपघात होऊन किंवा हार्टऍटॅकने आलेला नाही.

मनातील बोललातं पेठेकर साहेब !

त्यांना कल्पना नव्हती की त्या रुम मध्ये आतंकवादी आहेत... एक रुटीन चेकअप करत असताना त्यांच्या कडे बातमी आली होती की काही संशयास्पद तरुण जामिया परिसरात वावरत आहेत तेव्हा ते फक्त चेकअप करावयास गेले होते असे कळाले पण हल्ला होईल ह्याची सुतराम शक्यता त्यांना वाटली नसावी !

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग

विकास

ह्याने बुलेट्प्रुफ जॅकेट घातले नव्हते!

यात आश्चर्य काय?

संसदेवरील अतिरेकी हल्ल्याला परतवून लावणार्‍या पोलीसांकडे पण चिलखते नहती. त्यांच्या बंदूका पण साध्याच होत्या. फक्त त्यांची निष्ठा साधी नव्हती.

६२ सालच्या चिनच्या आक्रमणाच्या वेळेस बर्फात कॅनव्हास सारखे थंडीत न टिकणारे बूट घालून सैनीक लढले, शर्थ केली. कदाचीत त्यांना तेंव्हा यश आले नसेल पण त्यांची निष्ठ तोकडी नव्हती.

ऑपरेशन ब्लू स्टारच्या वेळेस सुवर्ण मंदीर परीसरात जाऊन स्वतःच्या हातातील शस्त्रे सैनिकांनी खाली ठेवून नमस्कार करून अतिरेक्यांना विनंती केली की तुम्ही अतिरेक सोडा. उत्तरात काय मिळाले समोरून आणि जमिनीखालून भूयारातून गोळ्यांचा वर्षाव... परीणामी पहीली फळी अशिच्या अशी शहीदच झाली. असली अव्यवहार्य सूचना करणारे राजकारणी आणि बाबू लोकं चूक असतील, नव्हे होतेच... पण त्या सैनिकांची / पोलीसांची निष्ठा चूकीची नव्हती.

सियाचेनसारख्या जगातील सर्वोच्च हिमनगावर संरक्षण करताना लागणारे अधुनिक स्नो मोबील आपले दिल्लीतले बाबू त्यांना देत नव्हते. जॉर्ज फर्नांडीसने त्यांना तेथे राहायला जाण्याची (फक्त ८ दिवस) सुचना केली. ताबडतोब बजेट मान्य झाले! पण ते नसताना देखील आपले सैनिक जीवापाड झगडत देशाच्या सीमा राखतच होते.

मोहनचंद्र शर्मा पण कदाचीत त्याच तालमितले असतील... सरकारने दिले नाही म्हणून काय झाले आपण आपले काम फत्ते
करायचेच. म्हणूनच त्यांना ७ का ८ वेळेस राष्ट्रपतींकडून शौर्यपदक मिळाले होते...

असो... म्हणूनच म्हणावेसे वाटते की त्यांनी बुलेटप्रूफ जॅकेट घातले नाही, हे अयोग्य नक्कीच असेल/आहे/होते. पण म्हणून ते निष्ठेने लढले नाहीत असे मात्र म्हणवत नाही.

लक्षात ठेवा की वर दिलेल्या काहीच उदाहरणांमधील व्यक्ती आणि त्यांच्या सारख्या अनेक प्रसंगातील व्यक्तींच्या जीवावर आपले संरक्षण चालू आहे. देश टिकला आहे. दुर्दैवाने आपल्या देशात मानवी जीवनाचे मोल नाही. सामान्य माणसाचे तर अजिबात नाही.. एक राजकारणी, चित्रसृष्टीतले नट/नट्या सोडले तर इतर सर्व सामान्यच त्यात पोलीस आणिसैनिकही येतात... विचार करा, आजपर्यंत या कारणांवरून, अशा अनाठायी हौतात्म्यावरून कोणी तरी सरकारला टोकले आहे का?

>> त्यांच्या बंदूका पण साध्याच होत्या. फक्त त्यांची निष्ठा साधी नव्हती.

त्यांची निष्ठा साधी नव्हती याच्याशी १००% सहमत.

आणि मोहनचंद्र शर्मा यांनी एकवेळ हलगर्जीपणा केला असेल पण त्यासाठी त्यांनी स्वतःच्या जीवानिशी किंमत चुकवली, भ्रष्ट राजकारण्यांप्रमाणे हाताखालच्या लोकांना नाही त्याची शिक्षा झाली.

लक्षात ठेवा की वर दिलेल्या काहीच उदाहरणांमधील व्यक्ती आणि त्यांच्या सारख्या अनेक प्रसंगातील व्यक्तींच्या जीवावर आपले संरक्षण चालू आहे. देश टिकला आहे. दुर्दैवाने आपल्या देशात मानवी जीवनाचे मोल नाही. सामान्य माणसाचे तर अजिबात नाही.. एक राजकारणी, चित्रसृष्टीतले नट/नट्या सोडले तर इतर सर्व सामान्यच त्यात पोलीस आणिसैनिकही येतात... विचार करा, आजपर्यंत या कारणांवरून, अशा अनाठायी हौतात्म्यावरून कोणी तरी सरकारला टोकले आहे का?
अगदी मनातलं बोललात.

यशोधरा

विकास, उत्तम प्रतिसाद. आवडला, पूर्ण सहमत आहे.

धनंजय

बुलेटप्रूफ जाकीट घातले न घातले तरी कर्तव्यनिष्ठा तशीच राहाते.

सुक्या

इंस्पेक्टर मोहनचंद्र शर्मा शहीदच आहे. कुणीही कुणासाठी आपला जिव देत नाही. शहीद शर्मा यांच्यासाठी वापरलेला एकेरी उल्लेख ही मनाला खटकला. घरात बसून आपण आरामात चहा घेऊ शकतो कारण शर्मा सारखे अनेक सैनिक जिवाची परवा न करता अतिरेक्यांशी दोन हात करत आहेत. त्यांच्या बलिदानावर शंका घेणे म्हणजे करनटेपनाचे लक्षण.

दुर्दैवाने आपल्या देशात मानवी जीवनाचे मोल नाही. सामान्य माणसाचे तर अजिबात नाही..

-- याला आपनच जबाबदार आहोत. देशात कीती लोक बॉंबस्फोटात मरन पावले? कीती बॉंबस्फोटाच्या ठीकानी दरवर्षी जाउन श्रधानजलि देतो? आपलिच किमत आपल्याला नसेल तर इतराना ति का असावी?

हेरंब

ही घटना घडण्याच्या दोनच दिवस आधी मुंबईमधे उलेमा, तथाकथित विचारवंत यांनी पत्रकारपरिषद घेऊन तारे तोडले होते. मुस्लिम कधीच रमजानच्या महिन्यात अशी कामे करणार नाहीत अशी ग्वाही दिली होती, आणि वर हे हिंदुत्ववादी संघटनांचेच कारस्थान असल्याचा शोध लावला होता. यावर कोणीही आवाज उठवलेला मी ऐकला नाही. यावर राजकीय नेते, मानवी अधिकारांचा पुळका येणारे का मुग गिळून गप्प आहेत ? ‍

ऋषिकेश

विकासयांच्याशी सहमत

ह्या एनकाऊंटर बद्दल दिल्ली पोलिसांचे कौतूक केले पाहिजे वगैरे ठीक आहे, परंतु इंस्पेक्टर मोहनचंद्र शर्माला शहीद मानने कितपत ठिक आहे? ह्याने बुलेट्प्रुफ जॅकेट घातले नव्हते! जर दहशदवाद्यांशी लढायला जाताना पुरेसा संरक्षक पेहेराव केला नसला तर दोष कुणाचा?

हे असले अतिशय संतापजनक लिखाण (मलातरी) वाटले.
समोर अतिरेकी असताअना प्राणांची पर्वा न करता हा शुरवीर लढला ते सोडून दोष अतिरेक्यांचा नाहि हे जनतेने म्हणावं ही घोर शोकांतिका आहे :(

-(दु:खी) ऋषिकेश

समोर अतिरेकी असताअना प्राणांची पर्वा न करता हा शुरवीर लढला ते सोडून दोष अतिरेक्यांचा नाहि हे जनतेने म्हणावं ही घोर शोकांतिका आहे

मोहनचंद्र शर्मा ह्यांनी अनेक एन्काउंटर केलेली होती. म्हणजेच ते पुरेसे 'अनुभवी' होते. त्यांच्या अशा चुकीमुळे एका शूर आणि सक्षम अधिकार्‍याचा, ज्याने भविष्यात अनेक अतिरेक्यांना कंठस्नान घातले असते, अंत झाला. श्री. शर्मांच्या कुटुंबाचे वैयक्तिक नुकसान तर झालेच झाले, पोलिस दलाचेही झाले. आजच्या भ्रष्ट आणि कामचुकार पोलिस दलात शर्मांसारख्या कर्तव्यदक्ष अधिकार्‍याचे काय मोल आहे हे मी सांगायला नको.

तेंव्हा, जरा शांत हो....

दुसरे, प्रथम बातमी पुरविण्याच्या हव्यासात वाहिन्यांनी बातम्याही उलट-सुलट दिल्या. आधी तीन गोळ्या सांगितल्या एक कमरेवर, एक खांद्यावर आणि एक छातीत.
छातीत गोळी शिरली असे ऐकल्यावर साहाजिकच 'बुलेटप्रुफ जॅकेट' घातले नव्हते असा सर्वसामान्यांचा समज झाला.
नंतरच्या बातम्यांमध्ये पोटात दोन गोळ्या लागल्या आणि अतिरक्तस्त्रावाने अंत झाला असे म्हंटले आहे. जर फक्त पोटात गोळ्या लागल्या असतील तर 'बुलेटप्रुफ जॅकेट' घातलेलेही असेल. कारण 'बुलेटप्रुफ जॅकेट' छातीला कव्हर करते पोटाला नाही असा माझा अंदाज आहे. त्या मुळे श्री. शर्मा ह्यांनी 'बुलेटप्रुफ जॅकेट' घातलेलेही असू शकते. पण वाहिन्यांनी आपली दिशाभूल केली असे म्हणावे लागेल.