Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

काश्मीर - वल्गना आणि वास्तव.

स
संदीप ताम्हनकर
गुरुवार, 07/21/2016 - 10:10
🗣 271 प्रतिसाद
काश्मीर मध्ये पुन्हा आझाद कश्मीरच्या घोषणा निनादू लागल्यापासून उथळ राष्ट्रवाद्यांना चेव चढला आहे. मोदी सरकारची ही कसोटीची वेळ आहेच पण त्याहूनही अधिक मोदी समर्थकांची जणू इज्जत पणाला लागली असल्याचे चित्र समाजमाध्यमातून उमटते आहे. ह्या अतिराष्ट्रवाद्यांना असे वाटत होते की एवढी वर्ष मुस्लिम तुष्टीकरण करणारे काँग्रेसचे सरकार कडक भूमिका घेत नव्हते त्यामुळे काश्मिरातील मुसलमान शेफ़ारलेत आणि पाकिस्तानच्या पाठिंब्यावर स्वतंत्र काश्मीर मागतायत. काँग्रेसने जी कडक भूमिका घेतली नाही ती आता अतिराष्ट्रवादीमेरुमणीमोदी लगेच घेतील आणि माजलेल्या काश्मिरींना तात्काळ वठणीवर आणतील. यामध्ये एकंदर सूर असा आहे की एकदा सैन्याला मोकळे सोडले की सैन्य सगळे प्रश्न एक झटक्यात सोडवेल आणि एकदम इस्त्री मारलेल्या कापडासारखा काश्मीर प्रश्न सुरळीत होऊन जाईल. ही भावना व्यक्त करणारे स्क्रिप्ट लिहून शूटिंग केलेले व्हिडीओ, ज्यामध्ये एक ताव भरलेल्या मिशांचा, फौजी असल्याचा आव आणणारा नाटकातला खोटाखोटा सैनिक गुरगुरत आणि अभिनिवेशाने हातवारे करत धमक्या देताना दिसतो की आमचे बांधलेले हात सोडा आणि बघा जेएनयू पासून काश्मीर पर्यंतचे तमाम देशद्रोही कसे सुतासारखे सरळ करतो ते. याउप्पर इंडियन जेम्स बॉन्ड श्री. अजित डोवाल आहेतच आणि ते कसे ७२ तासात शांतता प्रस्थापित करतील अश्या वल्गना करणाऱ्या पोस्टही फिरत आहेत. हे सगळे अपरिपकव वर्तणूक या सदरात मोडते आणि म्हणूनच हास्यास्पदही आहे. स्वतः मोदींचे निवडणूकपूर्व भाषण आणि आवेश असाच होता जो आता भक्तांमधून झिरपतोय. जुन्या काळाच्या पद्धतीप्रमाणे एखाद्या प्रांतात बंडाळी झाली तर राजांनी दरबारातील एखाद्या सरदाराची नेमणूक करावी किंवा एखाद्याने विडा उचलावा आणि स्वारीवर जाऊन त्याने मोठ्या शौर्याने गनिमांचा बिमोड करून शांतता आणि विजयश्री दरबारात पेश करावी असे आत्ताही होईल असा अनेक भक्तांचा भाबडा समज होता. पण काश्मीरमधील परीस्थितीचे आकलन जसे-जसे प्रत्येकाच्या वकुबाप्रमाणे होत गेले तसतसा उन्माद कमी होऊ लागला. आता नेहरूंनीच कसा काश्मीर प्रश्नाचा मुळातच विचका करून ठेवला आणि कसे गांधीजी त्यावेळी गप्प राहिले हे दळण दळणाऱ्या पोस्ट समाजमाध्यमातून फिरू लागतील हे नक्की. ज्या राज्यांमध्ये गेली अनेक वर्षे 'सैन्यदले (विशेष अधिकार) कायदा १८५९ - AFSPA 1958' लागू आहे आणि जेथे मूलभूत अधिकार खुंटीला टांगून ठेवलेले आहेत आणि कधीही, कोणालाही, कुठूनही अटक करून कितीही दिवस तुरुंगात डांबण्याचा सैन्याला हक्क आहे अश्या ठिकाणच्या नागरिकांनी हे सगळे देशहिताच्या दृष्टीने गपचूप सहन करावे अशी उर्वरित नागरिकांची अपेक्षा असेल तर ती नक्कीच चुकीची आहे. अशी वेळ माझ्यावर आली तर माझी काय प्रतिक्रिया असेल हे प्रत्येकाने स्वतःला विचारून बघावे. अशी कल्पना करणे सोपे जावे म्हणून केवळ पुण्यात घडलेला पुढील प्रसंग आठवावा. पुण्यात संभाजी उर्फ लकडी पुलावरून सकाळी ७ ते रात्री ९ या वेळात दुचाकी वाहनांना जायला बंदी आहे. दिनांक ३१ जानेवारी २०१२ रोजी रात्री ८ च्या सुमारास सैनिकी अभियांत्रिकी महाविद्यालय (CME) दापोडीचे दोन सैनिक विद्यार्थ्यांना नो एंट्री मधून आल्याबद्दल अलकाटॉकीजच्या चौकात वाहतूक पोलिसांनी अडवले. सैनिकांनी पोलिसांशी वाद घातला आणि दंड भरण्या ऐवजी फोन करून आपल्या साथीदारांना बोलावले. अर्ध्याच तासात सैन्यदलाच्या तीन गाड्या भरून सैनिक तेथे आले. पोलिसांना न जुमानता हुल्लडबाजी करत, नागरिकांना धमकावत, गाड्यांच्या काचा फोडत, पत्रकारांचे कॅमेरे हिसकावून घेत जणू संपूर्ण चौक ताब्यात घेऊन ओलीस ठेवला. सुमारे पाऊण तास सैनिकांचा हा धिंगाणा चालू होता. नंतर सैन्यातील आणि पोलिसातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना येणे भाग पडून त्यांच्या मध्यस्तीने सगळं गोंधळ थांबला. पुणेकरांनी सैनिकांची ताकद आणि त्यातून येणारी दहशत काय असते याची छोटीशी चुणूक तासाभरासाठी अनुभवली आणि कशी सार्वत्रिक भयभीतावस्था आणि असहाय्यतेची भावना निर्माण होते हे ही अनुभवले. १ फेब्रुवारी २०१२ चे सगळे पेपर काढून पाहिले तर हा सगळा अनुभव आजही पुन्हा घेता येईल. आता मुद्दा असा आहे की शांत अशा पुण्यासारख्या सुशिक्षित शहरात काही मोजके निःशस्त्र सैनिक छात्र कायद्याच्या विरुद्ध जाऊन सगळी यंत्रणा वेठीला धरून दहशत निर्माण करू शकतात तर काश्मीर सारख्या अशांत (Hostile) प्रदेशात कायद्याचे पाठबळ असलेले, प्रचंड संख्येने उपस्थित असलेले सशस्त्र सैन्य काय धुमाकूळ घालत असेल? आणि एक नागरिक म्हणून जर रोजच तुम्हाला हे सहन करावे लागत असेल तर तुमची प्रतिक्रिया काय होईल? प्रत्येक सुजाण नागरिकाने स्वतःची लोकशाहीची व्याख्या अधिक प्रगल्भ करण्यासाठी स्वतःला हे विचारून बघावे ही विनंती.
वर्गीकरण
काश्मीर

प्रतिक्रिया द्या
64887 वाचन

💬 प्रतिसाद (271)
प
पैसा Tue, 07/26/2016 - 14:52 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 07/23/2016 - 15:09 नवीन
@आता मुद्दा असा आहे की शांत अशा पुण्यासारख्या सुशिक्षित शहरात काही मोजके निःशस्त्र सैनिक छात्र कायद्याच्या विरुद्ध जाऊन सगळी यंत्रणा वेठीला धरून दहशत निर्माण करू शकतात तर काश्मीर सारख्या अशांत (Hostile) प्रदेशात कायद्याचे पाठबळ असलेले, प्रचंड संख्येने उपस्थित असलेले सशस्त्र सैन्य काय धुमाकूळ घालत असेल? ››› लेखक महोदय, आपणास अकाली दीर्घजीवी मती-मंदत्व प्राप्त झालेले आहे... असा निर्वाळा देऊन , मी माझे वाक्य संपवितो.
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Sat, 07/23/2016 - 18:42 नवीन
काश्मिरात पाक पुरस्कृत अशांतता आणि दहशतवाद आहे यात कोणाचेच दुमत नाही. प्रश्न कसे हाताळावे हा मुद्दा आहे. अरे मग ६० वर्ष काय करत होते, सरकार आणी लोक ? जम्मु आणी कश्मिर सरकारच्या जोरावर ३ लाख काश्मिरी पंडीतांना काश्मिर मधुन रातोरात हाकलले गेले , कित्येक पंडित त्यांच्या बायकांना आपला जीव हकनाक गमवावा लागला, कित्येक बायकांना शिकार केले गेले त्यावेळेला केंद्र सरकारने हा प्रश्न कसा काय हाताळला ? त्यावेळेला सैन्य नव्हत ? का हिंदु पंडीत मरताहेत मग मरु दे, म्हणुन काँग्रेस सरकारला काहीच करावस वाटल नाही ?
  • Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु Sat, 07/23/2016 - 18:51 नवीन
प्रश्न कश्मीर भारतात ठेवणे/राहणे हा आहे की, काश्मिरी पंडित?? काश्मिरी पंडित ह्या मुद्द्यावर आमचे मत आमचे अत्यंत लाडके नेतृत्व अन इलिनॉइस राज्यातले धडाडीचे लोकाभिमुख नेते, स्प्रिंगफिल्ड खुर्दचे अब्राहमदादा लिंकन म्हणत असत तसे आहे "सगळे गुलाम मुक्त करून, सगळे गुलाम गुलाम ठेऊन, गुलामगिरी नष्ट करून, अबाधित ठेऊन, काय वाटेल ते करून, देश अभंग राहायला(च) हवा" ह्यात गुलाम शब्द काढून पंडित, सुन्नी, मुसलमान, दलित, ब्राह्मण, शीख, तामिळ काय वाटेल ते भरा! For, the union must persist :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७
त
तुषार काळभोर Sun, 07/24/2016 - 05:41 नवीन
बाप्पूसाहेब! या प्रतिसादाची प्रिन्टऔट काढून रोज नजरेपुढे राहावी अशी व्यवस्था करावी म्हणतो. बाकी, तुमच्या संतुलित प्रतिसादासाठी तुम्हाला एक काहवा, एक पटियाला लस्सी, एक बैदा पाऊच, एक प्लेट फरसाण, एक प्लेट सोँदेश,एक म्हैसूर डोसा, एक बिसिबेल्ली भात अन एक चेट्टीनाड चिकन!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
क
कैलासवासी सोन्याबापु Sun, 07/24/2016 - 06:47 नवीन
पुरणपोळी पण द्या!! :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर
प
पुंबा Tue, 07/26/2016 - 10:52 नवीन
बापू, तुमचे सारे प्रतिसाद संतुलीत आणि अत्यंत प्रगल्भ आहेत. त्यांच्यामुळे अनेक प्रश्नांचा सांगोपांग विचार करता आला. धन्यवाद. प्रस्तुत धागालेखकाने सांगितलेली पुण्याची घटना ठाऊक नाही परंतू अशाच प्रकारची घटना नाशीकला घडली होती. तिथे अ‍ॅकॅडमीत शिकणार्या आर्मी कॅडेटसच्या १००-१५० जनांच्या टोळक्याने सबंध पोलीस स्टेशनमध्ये तोडफोड केली होती त्यात बरेच पोलीस जखमीदेखील झाले होते आणि त्यंच्यावर कसलीही कारवाई झाल्याचे नंतर वाचले नाही(झालेली असू शकते, ठऊक नाही.). मला असे विचारायचे आहे की अश्या घटना घडल्यानंतर या विद्यार्थ्यांवर काही कारवाई होऊ शकते का? किंवा पोलीसांवर हात उचलला असे चार्जेस लावून खटला चालवला जातो का? सैन्यात जाण्याच्या आधीच विद्यार्थी ईतक्या मुजोरपणे कायद्याला न जुमानता मनमानी करु शकतात हे सैन्याचे(किंवा एकूनच आपल्या समाजाचे आणि कायद्यांचे) अपयश वाटते मला. इथे काश्मीरबद्दल आजीबातच भाष्य करायचे नाही तिथे अफस्पा सारख्या कायद्यांची गरज आहेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
क
कैलासवासी सोन्याबापु Sat, 07/23/2016 - 18:52 नवीन
प्रश्न कश्मीर भारतात ठेवणे/राहणे हा आहे की, काश्मिरी पंडित?? काश्मिरी पंडित ह्या मुद्द्यावर आमचे मत आमचे अत्यंत लाडके नेतृत्व अन इलिनॉइस राज्यातले धडाडीचे लोकाभिमुख नेते, स्प्रिंगफिल्ड खुर्दचे अब्राहमदादा लिंकन म्हणत असत तसे आहे "सगळे गुलाम मुक्त करून, सगळे गुलाम गुलाम ठेऊन, गुलामगिरी नष्ट करून, अबाधित ठेऊन, काय वाटेल ते करून, देश अभंग राहायला(च) हवा" ह्यात गुलाम शब्द काढून पंडित, सुन्नी, मुसलमान, दलित, ब्राह्मण, शीख, तामिळ काय वाटेल ते भरा! For, the union must persist :)
  • Log in or register to post comments
उ
उडन खटोला Sat, 07/23/2016 - 18:56 नवीन
आम्हाला 'फकस्त' युनियन दिसते. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
व
विटेकर Mon, 07/25/2016 - 09:12 नवीन
टाळ्या आणि वंदन सुद्धा ! परवा श्री अजित डोवल पुण्यात बोलाताना नेमेके हेच म्हणाले. राष्ट्र हे पिढ्या- पिढ्यांचे असते , सरकार येते आणि जाते देखील !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
स
सुधीर काळे Sat, 07/23/2016 - 19:38 नवीन
असले लेख लिहायला आपल्याला आपल्या भारतदेशात मुभा आहे हीच आपल्या राष्ट्राच्या राज्यघटनेची थोरवी आहे असे मी समजतो. आपल्या सरकारबद्दल, सैन्याबद्दल जर कांहीं चांगले लिहिता येत नसेल वा लिहायचे नसेल तर गप्प बसावे, विरोधात लिहून आणखी आग भडकवू नये! आपल्याला भाषण व लेखनस्वातंत्र्य आपल्या राज्यघटनेने दिले आहे ते वापरावे. फलिहिलेलीमी नुकतीच लिहिलेली माझी पोस्ट वाचावी हीच नम्र विनंती. तो लेख बराच लांब आहे व इंग्रजीमध्ये आहे म्हणून इथे पूर्ण देत नाहीं. पण तो वाचावा अशी मी ताम्हनकर-जींना विनंती करतो.
  • Log in or register to post comments
स
सुधीर काळे Sat, 07/23/2016 - 19:44 नवीन
असले लेख लिहायला आपल्याला आपल्या भारतदेशात मुभा आहे हीच आपल्या राष्ट्राच्या राज्यघटनेची थोरवी आहे असे मी समजतो. आपल्या सरकारबद्दल, सैन्याबद्दल जर कांहीं चांगले लिहिता येत नसेल वा लिहायचे नसेल तर गप्प बसावे, विरोधात लिहून आणखी आग भडकवू नये व आपल्या सेनादलाच्या मनोधैर्यावर घाव घालू नयेत! आपल्याला भाषणस्वातंत्र्य व लेखनस्वातंत्र्य आपल्या राज्यघटनेने दिले आहे ते जरूर वापरावे पण गैरवापर करू नये. फेसबुकवर मी नुकतीच लिहिलेली माझी पोस्ट वाचावी हीच नम्र विनंती. ही पोस्ट बरीच लांब आहे व इंग्रजीमध्ये आहे म्हणून इथे पूर्ण देत नाहीं. पण ती वाचावी अशी मी ताम्हनकर-जींना विनंती करतो.
  • Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु Sun, 07/24/2016 - 03:40 नवीन
ती घटना, हिंदुराष्ट्र म्हणून नाही तर

सोवरीन सोसिअलिस्ट सेक्युलर डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ इंडिया

म्हणून लिहिली गेली आहे, आता ह्या वर उल्लेखलेल्या भारताच्या अधिकारीक नावातील बहुतेक शब्द आपणाला खटकत असतील तर तो आपला प्रश्न आहे, त्याला उत्तर म्हणून प्राचीन शिल्पकलेचे अविष्कार असणारी मंदिरे आपण पेढे अन ऑइल पेंट फासून विकृत करतो तसे घटनेवर अमुक एक रंग मारून विकृत करणे मी वैयक्तिकरित्या निषेधार्ह मानतो :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे
स
सुधीर काळे Sat, 07/23/2016 - 19:47 नवीन
माझी "Sun, 24/07/2016 - 00:38" ही पोस्ट काधून टाकावी कारण त्याची सुधारित आवृत्ती मी स्वतः त्या खालीच दिलेली आहे. (Sun, 24/07/2016 - 00:44) धन्यवाद
  • Log in or register to post comments
प
पिनाक Sat, 07/23/2016 - 21:40 नवीन
ताम्हनकर, 1. सैन्याला विशेषाधिकार दिल्यानं ते त्याचा अतिरेक करत असतील तरी सुद्धा आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. 2. काश्मीर ची जमीन आमचं सरकार कधीही सोडणार नाही. त्यासाठी कितीही काश्मिरी मुसलमानांना ठार मरावं लागलं तरी ते केलं जाईल. 3. सैन्य विरुद्ध बोलणाऱ्या इथल्या अस्तनीच्या निखाऱयांना एक तर एन्काउंटर करून संपवलं जाईल किंवा अगदीच शक्य नसेल तर "आत" घातलं जाईल. 4. सशस्त्र सैन्य काय धुमाकूळ घालत असेल त्याची अर्थातच आम्हाला काही पर्वा नाहीये. 5. "अपरिपकव", "हास्यास्पद" वगैरे काहीही बोललं तरी जमिनीवरची परिस्थिती बदलत नाही. सरकार, सैन्य आणि भारताची जनता अचानक केलेल्या या कटानं गोंधळून गेली होती. पण आता सरकार सावरलं आहे, सैन्यानं पुन्हा परिस्थिती चा ताबा घेतला आहे आणि भारताची जनता भक्कम पणे सरकारच्या पाठीशी उभी आहे. आता काश्मिरी मुसलमानांचा बदला घेतला जाईल आणि जाईलच. आता दहशत वादयांच्या नावे बांग दे किंवा सैन्याच्या नावानं शिमगा कर पण त्या पेलेट्स मध्ये जे जखमी झालेत त्यांना सैन्य शोधेल आणि मग ठोकेल.
  • Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु Sun, 07/24/2016 - 03:46 नवीन
ओ साहेब, उगाच कट्टरपणा इज द न्यू कुल सिद्ध करायला काय वाटेल ते बोलू नका हो, आपण आर्मी सारख्या एका इंस्टिट्यूशन वर शिंतोडे उडवत आहात ह्याचे भान असू द्या, अन काय मुसलमानांचा बदला वगैरे लावले आहे मालक? आपली विकृती सैन्याच्या आडून आडून नका प्रदर्शित करू, उगाच काहीही लिहू नका ही विनंती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिनाक
ड
डॉ सुहास म्हात्रे Sun, 07/24/2016 - 04:39 नवीन
ताम्हनकर साहेब, आपला प्रतिसाद "भारतिय सैन्याला पाठिंबा देणे किंवा त्याच्या उत्तम कामाची भलावण करणे" हे तर करत नाहीच पण; सैन्याने काय करावे याबाबत लेखकाचा अतिरेकी अजेंडा सैन्याच्या नावावर खपवून "शिस्तबद्ध आणि संयमित भारतिय सैन्याच्या किर्तीला डाग लावण्याचा विनोदी प्रयत्न" करणारा आहे. हे जर तुमचे खरोखरचे मत असेल तर... आपण या विषयावरचा आपला अभ्यास वाढवणे खूsssप जरूरीचे आहे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिनाक
श
शाम भागवत Sun, 07/24/2016 - 11:09 नवीन
नेहरूंनी शेख अब्दुलांना गजाआड ठेवले होते तोपर्यंतच काश्मिरमधे शांतता नांदत होती. इंदिरा गांधीनी त्यांना मुक्त केले नसते तर आजही तिथे शांतता नांदत राहिली असती. काश्मिर पंडीतांची समस्या उभीच राहीली नसती. जिथे खूप सावध राहायला पाहिजे तिथेच नेमका विश्वास ठेऊन गाफील रहावयाची (पृथ्विराज चौहानापासून लागलेली) भारतीयांची खोड कधी जाणार आहे कोणास ठाऊक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिनाक
स
सुधीर काळे Sun, 07/24/2016 - 00:18 नवीन
माझा काश्मीरवरील लेख https://www.facebook.com/kbkale/posts/10210459950562979?notif_t=like&notif_id=1469131802305964
  • Log in or register to post comments
स
साती Sun, 07/24/2016 - 07:43 नवीन
तुम्हाला अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत्येय. दोन्ही बाजूंच्या अतिशयोक्त दावे आणि विधानांचा आपण अत्यंत संयमाने समाचार घेत आहात. हे पाहून तुमच्याविषयी असलेला आदर दुणावला आहे. तुमचे अनेकानेक आभार!
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Sun, 07/24/2016 - 07:50 नवीन
+१०००००००
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साती
क
कैलासवासी सोन्याबापु Sun, 07/24/2016 - 07:51 नवीन
_________/\_________
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साती
र
राही Sun, 07/24/2016 - 10:30 नवीन
खरोखर. सोन्याबापू नेहमीच अतिरेक टाळून वस्तुस्थितीनिदर्शक विधानं करीत असतात. आणि वस्तुस्थिती त्यांच्यापेक्षा अधिक चांगल्या तर्‍हेने इथे दुसरं कोण जाणणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साती
प
पुंबा Tue, 07/26/2016 - 10:54 नवीन
+११११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साती
व
विनायक प्रभू Sun, 07/24/2016 - 07:45 नवीन
जय संता आता बंता येउ द्या.
  • Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे Sun, 07/24/2016 - 08:22 नवीन
लवकरच बंदी येणारे अशा जोकवर. सुप्रीम कोडताने म्हटलय तसं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
व
विनायक प्रभू Sun, 07/24/2016 - 09:43 नवीन
हा जोक नाहीये
  • Log in or register to post comments
त
तिमा Sun, 07/24/2016 - 11:10 नवीन
खरे वास्तव हे आहे की, जनमतचाचणी घेतली तर काश्मीर दुसर्‍या दिवशी स्वतंत्र होईल आणि तिसरा दिवस उगवायच्या आंत, कायमचे पाकिस्तानच्या ताब्यात जाईल. शिवाय दहशतवाद थांबणार नाहीच तो अन्य भारताच्या आणखी जवळ येईल.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sun, 07/24/2016 - 12:12 नवीन
हे खरे नाही. जम्मू-काश्मिरने भारतातच रहायचे का पाकिस्तानात जायचे का स्वतंत्र देश म्हणून रहायचे या तीनपैकी एकाही पर्यायाला स्थानिक जनतेचा पुरेसा निर्णायक पाठिंबा नाही असे २०१३ साली चॅथम हाऊस या इंग्लंडमधील प्रसिद्ध संस्थेने केलेल्या एका जनमत चाचणीत दिसून आले आहे. या सर्व तीन पर्यायांना ५०% पेक्षा कमी जनतेने पाठिंबा दिलेला आहे. यापैकी कोणत्याच पर्यायाला ५०% किंवा अधिक मते मिळू शकलेली नाहीत. तसेच यावरील जनमत वेगवेगळ्या विभागानुसार वेगळे होते हेही दिसून आले आहे. काश्मिरमध्ये जनमत घेऊन निर्णय घेणे हे जवळपास अशक्य आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या १९४८ च्या ठरावानुसार भारतीय काश्मिर व पाकव्याप्त काश्मिर अशा दोन्ही भागातून दोन्ही देशांनी सैन्य काढून घेणे ही सार्वमताची पूर्वअट आहे. दोन्ही देश ही अट पाळणे अशक्य आहे. त्यामुळे सार्वमत घेता येणार नाही. हा ठराव १९४८ चा होता. त्यानंतर ६८ वर्षे उलटून गेली आहेत. त्यावेळची परिस्थिती आता पूर्ण बदलली आहे. त्यामुळे १९४८ चा ठराव आता जसाच्या तसा अंमलात आणणे अशक्य आहे. यासाठीच काही वर्षांपूर्वीच संयुक्त राष्ट्रसंघाने हा ठराव बॅकबर्नरवर टाकलेला आहे. काश्मिर मध्ये श्रीनगर खोरे, जम्मू व लडाख हे तीन वेगवेगळे भाग आहेत. श्रीनगरमध्ये मुस्लिमांची संख्या सर्वाधिक आहे. जम्मूमध्ये हिंदू मोठ्या प्रमाणात आहेत व लडाखमध्ये बौद्ध मोठ्या प्रमाणात आहेत. फुटिरतावादाला पाठिंबा मुख्यत्वेकरून श्रीनगरच्या खोर्‍यातून मिळतो. जम्मू व लडाखमध्ये फुटिरतावादाला कमी पाठिंबा आहे. जनमत घेतल्यास जम्मू व लडाख भारतात राहण्याच्या बाजूने कौल देतील तर श्रीनगरमधील जनमत तीन पर्यार्यांमध्ये विभागलेले असेल. संपूर्ण काश्मिरचा एकत्रित विचार करता येणार नाही. त्यामुळे जनमत घेऊनही फायदा नाही. भारत कधीही काश्मिरचा ताबा सोडणार नाही. काश्मिरमध्ये अनेक महत्त्वाची शिखरे आहेत. त्यांच्यावर पाकिस्तानला ताबा मिळाला तर पाकिस्तानी सैन्याला अ‍ॅडव्हांटेज मिळून उर्वरीत भारताची सुरक्षा धोक्यात येईल. त्यामुळे भारत कधीही काश्मिर हातचे जाऊन देणार नाही. काश्मिरला स्वतंत्र देश होऊन देण्यास पाकिस्तानचा जोरदार विरोध असेल. पाकिस्तानला काश्मिर स्वतःच्या देशात हवे आहे. पाकिस्तान काश्मिरला स्वतंत्र राहू देणार नाही. समजा काश्मिर एक स्वतंत्र देश झाला तर पाकिस्तान व चीन एकत्र येऊन ते काश्मिर ताब्यात घेतील कारण दोन्ही देशांच्या सैन्याच्या दृष्टीने तो अत्यंत महत्त्वाचा प्रदेश आहे. समजा काश्मिर प्रश्न पाकिस्तानला हवा तसा सुटला तरीसुद्धा पाकिस्तान गप्प राहणार नाही. त्यानंतर पाकिस्तान पंजाब सारख्या इतर राज्यांकडे वळेल व तिथे अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू होईल. पाकिस्तानला काश्मिरींविषयी काहीही देणेघेणे नाही. त्यांना फक्त भारताला त्रास द्यायचा आहे. सध्या त्यासाठी काश्मिर हे एक निमित्त आहे. हे निमित्त संपले तर ते दुसरे निमित्त शोधतील. वरील चाचणीतील काही परिच्छेद - The first-ever survey on both sides of Kashmir by Robert W Bradnock, a senior fellow at Chatham House, UK's most influential think-tank, has shown that only two percent of people in Jammu and Kashmir want to join Pakistan while 43 percent prefer independence. The survey 'Kashmir: Paths to Peace' has been sponsored by Libyan president Muammar Gaddafi's son, Dr Saiful Islam. It found preference for independence was fairly uniform across districts in PaK but it was uneven in J&K. In Kashmir valley division it was between 75 to 95 percent; none in Poonch, Rajauri, Udhampur and Kathua of Jammu division and in Jammu itself it was just one percent. In Ladakh division, it was 30 percent in Leh and 20 percent in Kargil”. “This poll, in common with two preceding polls in J&K shows that setting aside all other political obstacles, it is difficult to see how plebiscite proposed in UN resolutions of 1948/49 could play any part today in the resolution of the dispute. There is no clear majority in the prospect for independence either. In J&K there is a majority in favour of outright independence for entire Kashmir in only four districts, all in Kashmir valley division and in five other districts the support for independence is one percent or less”, reports the survey. http://www.milligazette.com/news/7376-survey-shows-preferences-across-kashmir
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा
क
कैलासवासी सोन्याबापु Sun, 07/24/2016 - 12:19 नवीन
पुनश्च एकदा गुर्जींबर सहमती, आज गुर्जी पेटले आहेत! संदर्भ म्हणून चक्क 'मिल्लीगॅझेट'ची लिंक उचलून आणलीन!! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
अ
अभ्या.. Sun, 07/24/2016 - 15:35 नवीन
श्रीगुरुजींच्या सर्व मुद्याना सहमती. देशाच्या सुरक्षिततेच्या बाबतीत आपली सेना जे कर्तव्य बजावत आहे ते अतुलनीय आहे. काही छुटपूत घटनांचा उल्लेख करून बुद्धदीभेद करण्याचा मार्ग अश्लाघ्य असाच आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
श
श्रीगुरुजी Sun, 07/24/2016 - 11:33 नवीन
आता मूळ लेखाबद्दल -
काश्मीर मध्ये पुन्हा आझाद कश्मीरच्या घोषणा निनादू लागल्यापासून उथळ राष्ट्रवाद्यांना चेव चढला आहे. मोदी सरकारची ही कसोटीची वेळ आहेच पण त्याहूनही अधिक मोदी समर्थकांची जणू इज्जत पणाला लागली असल्याचे चित्र समाजमाध्यमातून उमटते आहे. ह्या अतिराष्ट्रवाद्यांना असे वाटत होते की एवढी वर्ष मुस्लिम तुष्टीकरण करणारे काँग्रेसचे सरकार कडक भूमिका घेत नव्हते त्यामुळे काश्मिरातील मुसलमान शेफ़ारलेत आणि पाकिस्तानच्या पाठिंब्यावर स्वतंत्र काश्मीर मागतायत. काँग्रेसने जी कडक भूमिका घेतली नाही ती आता अतिराष्ट्रवादीमेरुमणीमोदी लगेच घेतील आणि माजलेल्या काश्मिरींना तात्काळ वठणीवर आणतील. यामध्ये एकंदर सूर असा आहे की एकदा सैन्याला मोकळे सोडले की सैन्य सगळे प्रश्न एक झटक्यात सोडवेल आणि एकदम इस्त्री मारलेल्या कापडासारखा काश्मीर प्रश्न सुरळीत होऊन जाईल. ही भावना व्यक्त करणारे स्क्रिप्ट लिहून शूटिंग केलेले व्हिडीओ, ज्यामध्ये एक ताव भरलेल्या मिशांचा, फौजी असल्याचा आव आणणारा नाटकातला खोटाखोटा सैनिक गुरगुरत आणि अभिनिवेशाने हातवारे करत धमक्या देताना दिसतो की आमचे बांधलेले हात सोडा आणि बघा जेएनयू पासून काश्मीर पर्यंतचे तमाम देशद्रोही कसे सुतासारखे सरळ करतो ते.
अत्यंत मूर्खासारखे विचार! कोण आहेत हे उथळ राष्ट्रवादी आणि त्यांना चेव चढला आहे म्हणजे नकी काय होतंय? काश्मिरमधल्या फुटिरतावाद्यांना पाकिस्तानचा उघड पाठिंबा आहे ही वस्तुस्थिती आहे आणि पाकिस्तानने अनेकवेळा याची जाहीर कबुली दिली आहे. हे काही या तथाकथित अतिराष्ट्रवाद्यांचे स्वत:चे मत नाही. ही वस्तुस्थिती आहे. तिथे असलेले सैन्य काश्मिरच्या रक्षणासाठी व पर्यायाने उर्वरीत भारताच्या रक्षणासाठी आहे हे कळतंय का? काश्मिरसाठी पाकिस्तानने ४ वेळा युद्ध केले व अजूनही काश्मिर बळकावण्याचे प्रयत्न सुरू आहेतच. त्यामुळे तिथे सैन्य असणारच. आणि जेएनयू सारख्या संस्थातील देशद्रोह्यांना सरळ करण्यासाठी सैन्याची अजिबात गरज नाही व नव्हती. या देशातील न्यायालये त्यासाठी पुरेशी सक्षम आहेत. कन्हैयाकुमार २० दिवस तुरूंगार राहून आल्यावर लगेच टोन बदलून अफझल गुरूची आरती ओवाळण्याऐवजी दलित, मोदी इ. विषयांवर बरळायला लागला हे लक्षात आलं असेलच.
हे सगळे अपरिपकव वर्तणूक या सदरात मोडते आणि म्हणूनच हास्यास्पदही आहे. स्वतः मोदींचे निवडणूकपूर्व भाषण आणि आवेश असाच होता जो आता भक्तांमधून झिरपतोय. जुन्या काळाच्या पद्धतीप्रमाणे एखाद्या प्रांतात बंडाळी झाली तर राजांनी दरबारातील एखाद्या सरदाराची नेमणूक करावी किंवा एखाद्याने विडा उचलावा आणि स्वारीवर जाऊन त्याने मोठ्या शौर्याने गनिमांचा बिमोड करून शांतता आणि विजयश्री दरबारात पेश करावी असे आत्ताही होईल असा अनेक भक्तांचा भाबडा समज होता.
म्हणजे खरा राग मोदी समर्थकांवर दिसतोय. मोदी लोकशाही मार्गाने निवडून येऊन बहुमत मिळवून पंतप्रधान झाले हे अजूनही अनेकांना मान्य होत नाहीय्ये.
पण काश्मीरमधील परीस्थितीचे आकलन जसे-जसे प्रत्येकाच्या वकुबाप्रमाणे होत गेले तसतसा उन्माद कमी होऊ लागला. आता नेहरूंनीच कसा काश्मीर प्रश्नाचा मुळातच विचका करून ठेवला आणि कसे गांधीजी त्यावेळी गप्प राहिले हे दळण दळणाऱ्या पोस्ट समाजमाध्यमातून फिरू लागतील हे नक्की.
नेहरूंनी काश्मिरप्रश्नाचा कायमस्वरूपी विचका केला हे १९४८ पासून लिहिले जात आहे. ती वस्तुस्थिती आहे. त्यात काहीही असत्य नाही. हे आताच लिहिले गेलेले नवीन लेखन नाही.
ज्या राज्यांमध्ये गेली अनेक वर्षे 'सैन्यदले (विशेष अधिकार) कायदा १८५९ - AFSPA 1958' लागू आहे आणि जेथे मूलभूत अधिकार खुंटीला टांगून ठेवलेले आहेत आणि कधीही, कोणालाही, कुठूनही अटक करून कितीही दिवस तुरुंगात डांबण्याचा सैन्याला हक्क आहे अश्या ठिकाणच्या नागरिकांनी हे सगळे देशहिताच्या दृष्टीने गपचूप सहन करावे अशी उर्वरित नागरिकांची अपेक्षा असेल तर ती नक्कीच चुकीची आहे. अशी वेळ माझ्यावर आली तर माझी काय प्रतिक्रिया असेल हे प्रत्येकाने स्वतःला विचारून बघावे. अशी कल्पना करणे सोपे जावे म्हणून केवळ पुण्यात घडलेला पुढील प्रसंग आठवावा.
सैन्याला हा अधिकार फक्त काश्मिर, मणीपूर इ. मोजक्याच ठिकाणी का दिला गेला याची कल्पना आहे का? जेव्हा अतिरेकी निष्पापांची हत्या करायला लागतात, सर्वसामान्यांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण होतो तेव्हा सर्वसामान्यांच्या रक्षणासाठी सैन्याला पाचारण करावेच लागते. मुळात मी काही चुकीचे करीत नसेन, अतिरेक्यांना मदत करीत नसेन तर कशाला सैनिक मला अटक करतील? मी जर काही संशयास्पद कृत्ये करीत असेन, अतिरेक्यांना मदत करीत असेन हे दिसून आले तरच माझ्यामागे सैनिकांचा ससेमिरा लागेल.
पुण्यात संभाजी उर्फ लकडी पुलावरून सकाळी ७ ते रात्री ९ या वेळात दुचाकी वाहनांना जायला बंदी आहे. दिनांक ३१ जानेवारी २०१२ रोजी रात्री ८ च्या सुमारास सैनिकी अभियांत्रिकी महाविद्यालय (CME) दापोडीचे दोन सैनिक विद्यार्थ्यांना नो एंट्री मधून आल्याबद्दल अलकाटॉकीजच्या चौकात वाहतूक पोलिसांनी अडवले. सैनिकांनी पोलिसांशी वाद घातला आणि दंड भरण्या ऐवजी फोन करून आपल्या साथीदारांना बोलावले. अर्ध्याच तासात सैन्यदलाच्या तीन गाड्या भरून सैनिक तेथे आले. पोलिसांना न जुमानता हुल्लडबाजी करत, नागरिकांना धमकावत, गाड्यांच्या काचा फोडत, पत्रकारांचे कॅमेरे हिसकावून घेत जणू संपूर्ण चौक ताब्यात घेऊन ओलीस ठेवला. सुमारे पाऊण तास सैनिकांचा हा धिंगाणा चालू होता. नंतर सैन्यातील आणि पोलिसातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना येणे भाग पडून त्यांच्या मध्यस्तीने सगळं गोंधळ थांबला. पुणेकरांनी सैनिकांची ताकद आणि त्यातून येणारी दहशत काय असते याची छोटीशी चुणूक तासाभरासाठी अनुभवली आणि कशी सार्वत्रिक भयभीतावस्था आणि असहाय्यतेची भावना निर्माण होते हे ही अनुभवले. १ फेब्रुवारी २०१२ चे सगळे पेपर काढून पाहिले तर हा सगळा अनुभव आजही पुन्हा घेता येईल.
३१ जानेवारी २०१२ पूर्वी व त्यानंतर असे किती प्रकार झाले? जरा माहिती देता का? इतक्या वर्षात हा एकच अपवादात्मक प्रकार काही मोजक्या सैनिकांना केला असेल तर या एका प्रकारावरून संपूर्ण सैन्याला कायमस्वरूपी दोषी ठरवायचे?
आता मुद्दा असा आहे की शांत अशा पुण्यासारख्या सुशिक्षित शहरात काही मोजके निःशस्त्र सैनिक छात्र कायद्याच्या विरुद्ध जाऊन सगळी यंत्रणा वेठीला धरून दहशत निर्माण करू शकतात तर काश्मीर सारख्या अशांत (Hostile) प्रदेशात कायद्याचे पाठबळ असलेले, प्रचंड संख्येने उपस्थित असलेले सशस्त्र सैन्य काय धुमाकूळ घालत असेल? आणि एक नागरिक म्हणून जर रोजच तुम्हाला हे सहन करावे लागत असेल तर तुमची प्रतिक्रिया काय होईल? प्रत्येक सुजाण नागरिकाने स्वतःची लोकशाहीची व्याख्या अधिक प्रगल्भ करण्यासाठी स्वतःला हे विचारून बघावे ही विनंती.
सैन्य धुमाकूळ घालत असेल? असे लिहायला जनाची नसली तरी निदान मनाची तरी लाज वाटायला हवी. सैन्याच्या जीवावरच आज आपण सर्वजण सुरक्षित आहोत. सैन्य नसते तर एका बाजूने चीनने व दुसर्‍या बाजूने पाकिस्तानने देशाचे लचके तोडले असते. कॅप्टन सौरभ कालिया व त्यांच्या ५ सहकार्‍यांना पाकड्यांनी किती हालहाल करून मारले हे माहिती आहे का? ३ वर्षांपूर्वी २ भारतीय सैनिकांना पकडून त्यांची मुंडकी कापलेली आठवतात का? रोज होणार्‍या गोळीबारात अनेक सैनिक प्राणांचे मोल देतात याची जाणीव आहे का? का उचलली जीभ आणि लावली टाळ्याला?
  • Log in or register to post comments
स
सामान्य वाचक Sun, 07/24/2016 - 15:47 नवीन
हा देश या देशाला आपले मानणाऱ्या सगळ्यांचा आहे जात धर्म वय पंथ doesnt matter
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
झ
झेन Sun, 07/24/2016 - 15:27 नवीन
- कलम ३७० असताना, पलिकडे पाकिस्तान असताना काश्मीरी लोक सर्वार्थाने भारताला आपला देश मानतिल का? - पाकव्याप्त काश्मीरमधे आपल्या ३७० सारखे काही स्वतंत्र अधिकार देणारे काही आहे का ? जर तिथे काही नसेल तर इथे हे लाड का आणि कधिपर्यंत ? - जर भारत सरकारच्याअधिक्रूत भूमिकेनुसार सार्वमत हा मुद्दा जर टाईमबार/आऊटडेटेड झाला असेल तर अजून कलम ३७० हा मुद्दा अजून जिवंत का ? - जोपर्यंत संपूर्ण भारतीयांना समान न्याय/ अधिकार नसेल तोपर्यंत टीआरपी ची आवश्यकता असणारा मिडीया आणि "विद्वान" हे भारतीय लोकशाहीने दिलेल्या स्वातंत्र्याचा दूरूपयोग करणारच.
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Sun, 07/24/2016 - 15:48 नवीन
Mi kaay mhanato, udavatayat na bhangar lekh. Ase lekh shuddh deshdroh aahe. Sanghavarach sandhan sadhayche tar armyla kale kaun dakhavane nalayakpana aahe. Asha nalayak lekhanchi ithech Kay bharatat kuthehi garaj nahi. Please remove this thread. Sanghavarach raag kadhaycha asel tar special lekh lihana Tamhankar...
  • Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु Sun, 07/24/2016 - 16:11 नवीन
बाडीस , ताकाला जाऊन भांडी लपवू नयेत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
ग
गॅरी ट्रुमन Sun, 07/24/2016 - 19:58 नवीन
संदीपराव, एक विनंती करतो. हे असे मिंग्लिशमध्ये लिहिणे शक्य झाले तर टाळा. मिपा हे मराठी संकेतस्थळ असल्यामुळे बरेचसे मराठीत देवनागरी लिपीमध्ये लिहिणे ओघाने आलेच.बहुतांश सदस्य तसे करतातही. पण हे मिंग्लिश म्हणजे जेवताना घासाघासाला खडा आल्याप्रमाणे वाटते. गेल्या काही दिवसात बऱ्याच प्रतिसादांमध्ये असे मिंग्लिश तुम्ही वापरले आहे म्हणून हे लिहित आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
अ
अमितदादा Sun, 07/24/2016 - 21:07 नवीन
लेख जरा एकांगी वाटला. लेखकाशी अंशतः सहमत. काश्मीर भारतामध्ये राखण्यास तसेच तेथील दहशदवाद मोडून काढण्यात भारतीय आर्मी चा मोलाचा वाटा आहे यात शंकाच नाही. भारतीय जवानांच्या बलिदानामुळे काश्मीर अजून भारतात आहे याचे कायम भान राहील, मात्र भारतीय जवानांच्या कडून या 3 दशकात नक्कीच काही चुका घडल्या आहेत याचे भान राखाय हवे. काश्मीर हा प्रश्न हा फक्त मिलिटरी सोडवू शकणार नाही तर बरोबर पोलिटिकल अँप्रोच सुद्धा जरुरी आहे. जर भारत सरकार नागा बंडखोर, उल्फा बंडखोर यांचाबर संवाद साधत असेल तर काश्मीर फुटीरवाद्याबर बोलण्यात कसला आलाय कमीपणा हे कळत नाही. जर काश्मीर प्रश्न लवकर सुटला नाही तर खालील भीती वाटते 1. आतापर्यंत भारतीय मुस्लिम हे भारतीय सरकार च्या भूमिकेबद्दल कायम बरोबरीनं राहिलेत.भारतीय मुस्लिम प्रश्न आणि काश्मीर मुस्लिम प्रश्न नेहमी वेगळे राहिले आहेत.जर दोनी ठिकाणच्या radical लोकांची युती जाली तर दाहशवाद हा वानव्यासारखा भारतभर पसरेल. 2. पोलिटिकल इंडिसिव्हनेस ला कंटाळून जर PDP ने राजीनामा दिला तर भारताची काश्मीर वरील moral grip कमी होईल. आता सध्या कश्मीर मध्ये फक्त political पार्टी आणि पोलीस भारतीय सरकार चा भूमिकेशी प्रामाणिक आहेत, बाकी सर्वसामान्य जनता विरोधी आहे. टीप : google translate वापर्यामुळे भाषेत काही चुका राहतील. हि माझी भूमिका आहे एक्स्पर्ट ओपिनियन नव्हे.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Mon, 07/25/2016 - 08:26 नवीन
माझ्यामते फुटीरतावाद्यांशी बोलायला भारताने नकार दिला असे नसावे. पण चर्चेत पाकिस्तानला सहभागी करून घेण्यास मात्र भारताचा कायमच नकार आहे, आणि तो योग्य देखील आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमितदादा
अ
अमितदादा Mon, 07/25/2016 - 11:13 नवीन
माझ्यामते फुटीरवादी च काय पण पाकिस्तान शी सुधा चर्चा केली पाहिजे. एकवेळ फुटीरवादी राहूदे पण पाकिस्तान ची चर्चा केलीच पाहिजे, कारण आपला तोटा झाला तरी चालेल पण भारतच पण नुकसान झाल पाहिजे हि पाकिस्तान ची भूमिका आहे, तशी भूमिका भारत ठेवू शकत नाही कारण आपला मार्ग वेगळा आहे. म्हणून मला वाटते कि पाकिस्तान शी पण वेळ येयील त्यावेळी चर्चा करा, वेळ येयील त्यवेळी चार फटके द्या, पण ताठर आणि एगोइस्तिक भूमिका घेवू नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
श
श्रीगुरुजी Mon, 07/25/2016 - 13:03 नवीन
या चर्चेतून काय निष्पन्न होणार आहे? फुटिरतावाद्यांच्या व काश्मिरातील इतर काही जणांच्या मागण्या बघू या. १) काही जणांना संपूर्ण काश्मिर पाकिस्तानात विलीन करायचे आहे. भारत ही मागणी कधीही मान्य करणार नाही. तसेच जम्मू व लडाखमधील बहुतेकांना हे मान्य नाही. याबाबतीत भारताची भूमिका अगदी स्पष्ट आहे. त्यामुळे या मुद्द्यावर चर्चा करण्यासारखे काहीही नाही. २) काही जणांना काश्मिर हा स्वतंत्र देश म्हणून हवा आहे. भारत ही मागणी कधीही मान्य करणार नाही. तसेच जम्मू व लडाखमधील बहुतेकांना हे मान्य नाही. याबाबतीत भारताची भूमिका अगदी स्पष्ट आहे. काश्मिर स्वतंत्र देश होणे पाकिस्तानलाही मान्य नाही. त्यामुळे या मुद्द्यावर चर्चा करण्यासारखे काहीही नाही. ३) काश्मिरला १९५३ पूर्वी जितकी स्वायत्तता होती तितकीच स्वायत्तता आता मिळावी अशी काही जणांची मागणी आहे. त्यामध्ये संरक्षण, परराष्ट्र व्यवहार, रेल्वे इ. ३-४ गोष्टी वगळता उर्वरीत सर्व अधिकार राज्याकडे असावेत अशी मागणी आहे. मुळात काश्मिरला आता जितके अधिकार आहेत तेच धोकादायक आहेत. त्यात अजून भर टाकली तर परिस्थिती आहे त्यापेक्षा जास्त बिघडेल. त्यामुळे उर्वरीत भारताला अजून धोका निर्माण होईल. १९९९-२००४ या काळात नॅकॉ रालोआचा भाग होता. सन २००० मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांनी काश्मिरला १९५३ पूर्वीची स्वायत्तता मिळावी असा ठराव विधानसभेत बहुमताने मंजूर करून केंद्र सरकारकडे पाठविल्यावर वाजपेयींनी त्यातील धोके ओळखून तो लगेच फेटाळून लावला. नंतरच्या संपुआ सरकारने सुद्धा या मागणीकडे दुर्लक्ष केले. केंद्रात कोणतेही सरकार असले तरी ही मागणी मान्य होणार नाही. त्यामुळे या मुद्द्यावर चर्चा करण्यासारखे काहीही नाही. ४) काश्मिरमध्ये सार्वमत घ्यावे अशी काही जणांची मागणी आहे. याबाबतीत सुद्धा भारताची भूमिका स्पष्ट आहे. त्यामुळे या मुद्द्यावर चर्चा करण्यासारखे काहीही नाही. ५) काश्मिरमधील बेरोजगारी कमी व्हावी, उद्योगधंदे वाढावेत, गुंतवणूक वाढावी अशी बर्‍याच जणांची मागणी आहे. काश्मिरला लागू केलेले ३७० वे कलम हाच यातील मुख्य अडथळा आहे. या कलमामुळे काश्मिरमधील कोणालाही तिथे जमीन, घर विकत घेता येत नाही, तिथे स्थायिक होता येत नाही. त्यामुळे कोणताही उद्योगपती तिथे जाऊन उद्योग, कारखाने सुरु करू शकत नाही. तिथला मुख्य उद्योग पर्यटन हाच आहे. परंतु अशांत वातावरणामुळे पर्यटनावर परीणाम झालेला आहे. तिथली बेरोजगारी कमी करणे हे काश्मिरीच्याच हातात आहे. अतिरेक्यांना पाठिंबा देणे थांबविले, स्वतंत्रे देशाची किंवा पाकिस्तानमध्ये विलीन होण्याची किंवा स्वायत्ततेची मागणी थांबविली, स्वत: शांततेने राहून इतरांना शांततेने राहून दिले आणि ३७० वे कलम रद्द केले तर तिथे समृद्धी नक्कीच येईल. ६) काश्मिरमधून सैन्य हटवावे व अ‍ॅफ्प्सा हटवावा अशी बर्‍याच जणांची मागणी आहे. काश्मिर पाकिस्तानला लागून असल्याने तिथून सैन्य हटविणे शक्य नाही. तिथे अतिरेकी धुमाकूळ घालत असल्याने व त्यांनी काही स्थानिक पाठिंबा देत असल्याने सैन्याला विशेषाधिकार देणे आवश्यक आहे. याबाबतीत केंद्र सरकारची भूमिका स्पष्ट असल्याने या मुद्द्यावर चर्चा होऊ शकत नाही. म्हणजे जर काश्मिरींशी चर्चा करायची तर जवळपास सर्व मुद्द्यांवर ठाम भूमिका असल्याने चर्चेला अर्थ नाही. काश्मिरची समस्या सोडविणे हे भारताच्या हातात नसून काश्मिरी व पाकिस्तानच्याच हातात आहे. पाकिस्तानने काश्मिरींना भडकाविणे थांबविले व काश्मिरींनी वरील मुद्दा क्रं. (५) मधील काही गोष्टी केल्या तर हा प्रश्न सुटु शकेल. भारत व केंद्र सरकार याबाबतीत फार काही करू शकणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमितदादा
अ
अमितदादा Mon, 07/25/2016 - 15:12 नवीन
सविस्तर प्रतिसादाबद्दल धन्यवाद. परंतु तुमचा 5 नंबर चा मुद्दा मान्य नाही. आता सध्याचा वातावरणात राज्य सरकारच्या कर्मचारांची मुले सुद्धा दगडफेक करतायत. स्वतः बुर्हाण वाणी चे वडील हि सरकारी कर्मचारी आहेत. आजच The Hindu वर बातमी वाचली कि जमू आणि काश्मीर मधील 1 % लोकांवर केंद्र सरकार 10 % खर्च करते म्हणजे जोपर्यंत तुमी ह्या लोकांना पोलिटिकल सोल्युशन देणार नाही तोपर्यंत ते असंतुष्ट राहणार जरी तुमी तिथं सोन्याचे रस्ते करून दिले तरी. जर विकास हेच सोल्युशन असत तर स्कॉटलंड ने uk पासून कधीच स्वतंत्र मागितलं नसत। आणि त्या लोकांच्या मागण्या जरी अनाठायी असल्या तरी हि कॉमन टेक्निक आहे अगोदर अवास्तव मागण्या ठेवायचं आणि चर्चा जशी होईल तसे climb down करायचं. नागा बंडखोरांनी ग्रेटर नागालॅंड आणि स्वतंत्र ध्वज ह्या मागण्या लावून धरल्या आहे आणि भारत सरकार ते मान्य न करता चर्चा करतायच ना , तसेच तिथं शांतता आहेच ना. भारतीय राज्यघटनेच्या आधीन राहून आपण त्यांना मोकळीक देऊ शकतो ना, शेवटी india is not a state but union of states. त्यामुळं ठराविक राज्यांचे नियम वेगळे असले मानून काय फरक पडत नाही जशी प्रगती होईल तसे हे नियम आपोआप गळून पडतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
अ
अमितदादा Mon, 07/25/2016 - 15:16 नवीन
आणि जम्मू आणि लडाख हे भाग पूर्ण पणे indianized झालेत। त्यामुळे त्यांचा काही issue नाहीये। त्यामुळं आपले प्रतिसाद काश्मीर पर्यंत सीमित ठेवले तर बरे होतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमितदादा
स
सुबोध खरे Mon, 07/25/2016 - 18:29 नवीन
अमित दादा साहेब काश्मीर च काय जम्मू आणि लदाख मध्ये पण कलम ३७० मुळे आपण "काश्मिरी" नसाल तर आपल्याला जमीन विकत घेता येत नाही किंवा घर घेता येत नाही . यामुळे कोणतेच उद्योग तेथे आपले कारखाने काढू शकत नाहीत अशा परिस्थितीत कोण उद्योगपती तेथे दुसऱ्याच्या नावाने उद्योग सुरु करेल? आणि उद्योग धंदे नसल्यामुळे काश्मिरी लोकांना नोकऱ्या नाहीत. रिकामे डोके हे सैतानाचे घर असते त्यामुळे अशा तरुणांचे डोके भडकवण्याचे काम करणारे दहशतवादी आणि निधर्मांध काही कमी नाहीत. यामुळेच हा प्रश्न सहज सुटणार नाही. गरिबी ही क्रांती आणि गुन्हेगारी यांची माता आहे असे म्हटले जाते. येथे तर फुटीरवाद्यांचे समर्थन करून आरामखुर्चीत विचारवंतांनी त्यातील फरकच धूसर केला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमितदादा
अ
अमितदादा Mon, 07/25/2016 - 18:52 नवीन
खरे साहेब, तुमच्या प्रतिसादाशी अशांत: सहमत, पण फक्त रिकामी डोकी आणि बेरोजगारी हे अशांतते मगच कारण आहे का, मला नाही अस वाटत. तुमि जालावर नक्कीच काश्मीर मधील बातम्या वाचल्या असतील. कितीतरी आतंकवादी हे रोजगाराची संधी उपलब्द असताना हिंसक मार्गाकडे वाळलेत, 2 ते 4 पोलीस कॉन्स्टेबल फोर्स सोडून हिजबुल मुजाहिद्दीन ला जॉईन झालेत. काश्मीर चे सगळे politician दिल्ली मध्ये एक भाषा आणि काश्मीर मध्ये soft separatizm ची भाषा वापरतात. हे काय होतंय, त्यामुळं मला प्रश्न पडतो की आपण काही चुकत नाही आहोत का ? मी हि काही वर्षां पूर्वी काश्मीर मध्ये आर्मी ला फुल्ल पॉवर देऊन असंतोषी लोकांना चिरडा अशा मताचा होतो, पण हळूहळू त्यातील फोलपणा माजा लक्षात आला. मला प्रश्न पडतो की how will u defeat people who have already defeated their fear ? त्यामुळं मज आस मत बनलंय कि deploy military and political approach at same time, talk to everyone who are interested. लष्कर चा अनुभव तुमाला जास्त त्यामुळं तुमचा मताचा आदरच आहे, परंतु अनुभव नसल्याची मते आरामखुर्चीत विचारवंत मानून हेटाळून नाही चालणार. मग शेतकऱ्यांचा विषयवार शेतकरी, स्त्री यांचा विषयावर स्त्री ने आणि डॉक्टर च्या विषयावर डॉक्टर नेच बोलय हवे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Mon, 07/25/2016 - 19:11 नवीन
काश्मीरचा प्रश्न लष्करी बळावर सुटणार नाहीच याबद्दल दुमत नाहीच. पण काश्मीर आज लष्करामुळेच आपल्या ताब्यात आहे हीही वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही. तेंव्हा लष्कराचे मानसिक खच्ची कारण थांबवा एवढीच माझी विचारवंतांना विनंती आहे. त्यावर राजकीय तोडगा काढणे हाच उपाय आहे हेही माझे मत आहे पण तो तोडगा काय असेल हे मला सांगता येणार नाही कारण तेवढी माझ्या बुद्धीची झेप नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमितदादा
स
संदीप ताम्हनकर Mon, 07/25/2016 - 08:40 नवीन
दखलपात्र प्रतिक्रियांसंबंधी भाग २: - कलम ३७० रद्द करा ही सुद्धा अतिराष्ट्रवाद्यांची आवडती पण अव्यवहार्य मागणी आहे. सध्याच्या भाजपा सरकारने तसे नुसते सूतोवाच करून पाहावे, मग काश्मीर मध्ये जो काही आगडोंब उसळेल त्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. विरोधी पक्षात राहून अशी मागणी करणे वेगळे, शाखेतल्या बौद्धिकात (?) बरळणे वेगळे आणि प्रत्यक्षात सत्तेत असताना यासंबंधी कृती सोडा नुसते बोलणे वेगळे, हे आतातरी समजून घ्या. गामा पैलवान या आयडीने आफ्स्पा कायदा पाहावा ही विनंती, या अंतर्गत सैन्यबलांना मिळालेले अधिकार पाहावे. कलंत्री यांची प्रतिक्रिया संतुलित आणि विचारपूर्ण आहे, जबाबदार व्यक्तिमत्वाची द्योतक आहे. अजित डोवाल (संघ प्रणित) विवेकानंद आंतरराष्ट्रीय केंद्राचे फाउंडर डायरेक्टर आहेत. https://en.wikipedia.org/wiki/Ajit_Doval After retirement (2005–2014)[edit] Doval retired in January 2005[4] as Director, Intelligence Bureau. In December 2009, he was the founder Director of the Vivekananda International Foundation, a think tank set up by the Vivekananda Kendra, a Spiritually Oriented Organisation.[8][9] सोन्या बापू या आयडीने स्वतः खूप हुशार असल्याचे गृहीत धरले असल्यामुळे साहजिकच बाकी सर्व जण त्यांच्या दृष्टीने निर्बुद्ध आहेत. ते खूपच 'मी मी' करतात. त्यामुळे खरेतर दखलपात्र नाहीच पण त्यांनी माझी पूर्ण पोस्ट रिपीट केल्याबद्दल एवढेतरी लिहिले पहिजे. सैनिक उच्च शिक्षित असतात हे त्यांचे मत करमणूक करणारे आहे. मूळ लेखातील मुद्दे समजून न घेता तिसऱ्याच गोष्टी लिहून भलतेच उलट आरोप करायचे ही वितंडवाद्यांची जुनी खोड आहे, ती सहजी जाणार नाही. पॅलेट गन कमरेच्या वर मारून शेकडो तरुण आंधळे झाले आणि ५० जण गोळीबारात मेले. त्याबद्दल डझनभर जवान आणि अधिकारी निलंबित होऊन चौकशीला सामोरे जातायत हे लक्षात घ्या. गृहमंत्र्यांनी सैन्याला सबुरीचा सल्ला दिला, पॅलेट गन वापरावर बंदी आणली याकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष करायचे ही खोड आहे. माझ्या विचार आणि (अल्प) बुद्धीनुसार सैन्यबळानी अतिरेक करू नये, सैन्याने स्वतःच्या डोक्याने वागू नये, धोरण ठरवणा-यानी दिलेल्या आदेशाची संयमित अंमलबजावणी करावी, अतिराष्ट्रयवाद्यांनी पाठवलेल्या देशप्रेमाने लडबडलेल्या पोस्ट सैनिकांच्या हातातील फोनवर सुद्धा जातात हे लक्षात ठेवावे, चेव येऊन कोणतीही कृती करू नये, इतिहासाचे दाखले हेत्वारोप करण्यासाठी न देता, चुका सुधारण्यासाठी द्यावे, हा भारतासाठी नुसता भूभागाचा (रिअल इस्टेटचा) प्रश्न नसून तेथील जनतेसकट त्यांच्या अशा आकांक्षांसकट भूभागाचा प्रश्न आहे हे कुठेतरी मान्य केले पाहिजे. अदखलपात्र प्रतिक्रियांसंबंधी: - मूळ लेखावरील अनेक प्रतिक्रिया वैयक्तिक झाल्यामुळे मला नाईलाजाने वैयक्तिक व्हावे लागत आहे त्याबद्दल दिलगीर आहे. येथील बहुतेक खोट्या नावांच्या शिखंडी आयडी असून लपून बाण मारायला बघतात. मागितलेले नसताना फुकटचे सल्ले द्यायची घाणेरडी रोगट साथ बहुतेक प्रतिक्रिया देणा-यांच्यांत पसरलेली आहे. सोन्याबापू नावाचे आयडी जगप्रसिद्ध सर्वद्न्य असल्याच्या थाटात व्यक्त होतायत. त्यांची गणना कशात करायची हेपण स्वतःच सांगतायत हे एक बरे. मूळ लेख अतिराष्ट्रवाद्यांच्या भ्रामक कल्पना यांच्याविषयीच आहे यामुळे समाजमाध्यमांवर फिरणारे बाष्कळ फॉर्वर्डस यांचा उल्लेख करूनच लेख लिहिलंय. डोवाल विषयक मजकूरसुद्धा याच प्रकारचा आहे. येथील काही लोकांना आपण पर्यटक म्हणून काश्मीरला जाऊन आलो आणि वेटर, ड्रायव्हर, लॉजवाले इत्यादींशी काही बोललो म्हणजे लगेच काश्मीर प्रश्नावर मत व्यक्त करायला क्वालिफाय झालो असेही वाटते आहे. काश्मिरात मी फिरलो ते सैन्याच्या भरोशावर नाही. एका सैनिकाने स्थानिकांशी बोलतांना माझ्या छातीला स्टेन गन लावली होती. तेव्हा ती बाजूला करून त्यातील गोळ्या, गणवेश, बूट हे सगळे माझ्यासारख्या माणसांनी दिलेल्या टॅक्सेस मधून येते हे विसरू नको असे नाईलाजाने सांगावे लागले होते. काश्मिरात फिरताना हुर्रियत तसेच स्थानिक संस्थांची बरीच मदत झाली हे मात्र नक्की. सैन्याच्या उपस्थितीमुळे फिरतांना मदत झालीच. वैचारिक विरोधकाला राष्ट्रद्रोही म्हणून घोषित करायचे आणि आम्ही म्हणतो तीच खर्रीखुर्री राष्ट्रवादाची व्याख्या आहे असे म्हणायचे ही अतिराष्ट्रवाद्यांची जुनीच पद्धत आहे. त्याच धर्तीवर येथे एकमेकांच्यात 'अहो रूपं! अहो ध्वनी!' चालू आहे. श्रीगुरुजी या आयडीने त्यांच्या एका पोस्ट मध्ये या पोस्ट वर दखलपात्र मूल्यवर्धन (Value Addition) केले आहे. तरीही समाजमाध्यमात फिरणारी JNU वर धमक्या देणाऱ्या नाटकातील सैनिकांची क्लिप त्यांनी आवर्जून पाहावी ही विनंती. पटेल आंदोलन, जाट आंदोलन हाताळताना वापरलेले बळ आणि काश्मिरात वापरलेले उपाय याची तुलना करून पहा. ही सगळीच भारताची अविभाज्य राज्ये आहेत पण ट्रीटमेंट वेगळी दिली जाते. सैन्य धुमाकूळ घालत आहे असे मी न लिहिलेले वाक्य माझ्या तोंडी टाकू नका. सैन्य नक्की काय करते हे खऱ्या अर्थाने आपल्या पर्यंत कधीच येत नाही. स्थानिक लोकांचा उद्रेक झाला तरच थोडी वस्तुस्थिती समजते. काश्मिर खोऱ्यात प्रत्येक शंभर मीटरवर सैनिक एवढे सैन्य असताना सारखा स्थानीकांचा उद्रेक का होतो याचे उत्तर शोधावे ही विनंती. PDP पहिल्यापासून फुटीरतावादी आहेच. आता BJP त्यांच्यासोबत सत्तेत आहेत. त्यामुळे अशी आता ५६ इंची छाती वाल्यांकडून अशी काय Break Through Strategy वापरली जाते हे पाहण्यासाठी देशातील जनता उत्सुक असताना जे चाललंय ते खेदजनक आहे आणि विशेष आशादायक नाही हे सत्य वारंवार समोर येतंय. नॅशनल कॉन्फरन्स बजेट आणि निधी साठी भारताबरोबर, भावनिक ऍडव्हान्टेज करिता काश्मिरीयत बरोबर आणि आंतरराष्ट्रीयकरण करण्याकरिता पाकिस्तान बरोबर अशी सोयीस्कररित्या भूमिका घेते.
  • Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे Mon, 07/25/2016 - 08:54 नवीन
पटेल आंदोलन, जाट आंदोलन हाताळताना वापरलेले बळ आणि काश्मिरात वापरलेले उपाय याची तुलना करून पहा.
कैच्याकै! जाट आंदोलन आणि पटेल आंदोलनात आंदोलक ग्रेनेड फेकत होते का? त्यांच्या मागे एके४७वाले उभे असायचे का?
हा भारतासाठी नुसता भूभागाचा (रिअल इस्टेटचा) प्रश्न नसून तेथील जनतेसकट त्यांच्या अशा आकांक्षांसकट भूभागाचा प्रश्न आहे हे कुठेतरी मान्य केले पाहिजे.
याच्याशी समहत. देश = जमीन एवढंच नसून देश = लोकं हे देखील आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप ताम्हनकर
ध
धनावडे Mon, 07/25/2016 - 11:13 नवीन
जतीन देसाई मित्र आहेत वाटत तुमचे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप ताम्हनकर
श
शिद Mon, 07/25/2016 - 11:43 नवीन
सोन्या बापू या आयडीने स्वतः खूप हुशार असल्याचे गृहीत धरले असल्यामुळे साहजिकच बाकी सर्व जण त्यांच्या दृष्टीने निर्बुद्ध आहेत. ते खूपच 'मी मी' करतात. त्यामुळे खरेतर दखलपात्र नाहीच पण त्यांनी माझी पूर्ण पोस्ट रिपीट केल्याबद्दल एवढेतरी लिहिले पहिजे. सैनिक उच्च शिक्षित असतात हे त्यांचे मत करमणूक करणारे आहे.
ओ साहेब, सोन्याबापूंच मत पटलं किंवा नाही पटलं तर त्यावर बोला ना की उचलला कळफलक आणि लागले बडवायला. किमान त्यांच्या सैनिकी पेशाचा तरी जरा आदर ठेवा. अरे, विसरलोच...तुम्हाला तर सगळ्या सैनिंकाबद्दल अ‍ॅलर्जी आहे ते, म्हणजे लेख वाचून तरी तसेच वाटतंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप ताम्हनकर
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा