पाकिस्तानवरचा सर्जिकल स्ट्राईक आत्ताच का केला गेला ?
पाकिस्तानवरचा सर्जिकल स्ट्राईक्स हा केवळ लोकक्षोभामुळे, राजकिय प्रतिस्पर्ध्यांवर ब्राऊनी पॉईंट्स मिळविण्यासाठी किंवा केवळ मतपेटीकडे पाहून केले गेले, असे अनेक प्रवाद सद्या ऐकू येत आहेत.
याबद्दलचे माझे विचार खालीलप्रमाणे आहेत.
जनक्षोभ :
लोकशाहीत कोणत्याही लोकाभिमुख नेत्याला "जनतेची तगमग" दुर्लक्षून जमत नाही. त्याला राजकारणात शिल्लक राहण्यासाठी लोकमताची कदर करावीच लागते. परंतू, अंतिमतः त्याबाबत काय कारवाई केली जाईल व ती कोणत्या स्वरूपात केली जाईल हे अनेक घटकांवर अवलंबून असते.
राजकिय इच्छाशक्ती व ती वापरण्याची धमक :
सर्जिकल स्ट्राईक सारखी (ज्याचा परिणाम (इस्कॅलेशन) सर्वंकष युद्धामध्ये होऊ शकतो) कोणतीही आक्रमक कृती डोके गरम करून किंवा केवळ स्वतःचा पुरुषार्थ दाखवण्यासाठी केल्यास बाजू आपल्यावर उलटून देशाचे, आपल्या पक्षाचे आणि नेत्याच्या स्वतःच्या राजकिय जीवनाचे न भरून येणारे नुकसान होऊ शकते.यासाठी "राजकिय इच्छाशक्ती व ती वापरण्याची धमक" असावी लागते. जी भारतातर्फे आजपर्यंत १९६५, १९७१, कारगिल ही युद्धे आणि आताचा सर्जिकल स्ट्राईकचा अपवाद सोडता दिसलेली नाही.
आंतरराष्टिय संघर्ष आणि मित्रराष्ट्रे :
जागतिक स्तरावर राजकिय इच्छाशक्ती व ती वापरण्याची धमक असणे इतकेच पुरेसे नसते. कारण, कोणत्याही मोठे युद्धाचे स्वरूप केवळ दोन देशांतले युद्ध असे राहत नाही तर ते दोन विचारसरणींमधे विभागलेल्या देशांचा प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष सहभाग असलेले युद्ध असे बनते. म्हणजे ज्या देशाच्या गटाचे वजन जास्त तो अंतिमतः जिंकतो. उदा. भारत-पाक युद्धात पाकच्या पारड्यात चीनचे वजन (पक्षी : राजकिय-सामरिक पाठींबा) धरावेच लागेल आणि त्याला तोलून शिवाय जास्त होईल अश्या एक किंवा अनेक देशांचे वजन आपल्या पारड्यात असणे जरूर असते.
त्यामुळे, परदेशाबरोबरच्या आक्रमक कृतीअगोदर जागतिक स्तरावर आपले सबळ पाठीराखे मित्र देश (आक्रमक कृती केल्यावरही आपल्या मागे उभे राहणारे) असणे जरूर असते. हे जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेलाही दर युद्धाअगोदर हे करावेच लागते. हेच १९७१ च्या युद्धाअगोदर इंदिरा गांधींनी वर्ष-दीड वर्ष जगभर भेटी देऊन केले होते.
जगातली पत आणि ती वापरण्याची धमक :
यासाठी, किमान "आमच्या बाजूला असा किंवा असून नका, तुमची मर्जी. आम्ही आमच्या हितसंबंधांसाठी जरूर ती कृती करणारच. पण आमची न्याय्य बाजू न घेतल्यास, जगाच्या पुढे अंतिमतः तुमचेच नैतिक नुकसान आहे." इतके तरी पटवून देण्याची गरज असते. हे यशस्वीपणे करायला आपल्याकडे एक चांगली नीति असणे आणि तिच्यावर आपला ठाम विश्वास असण्याची गरज असते. असे १९७१ च्या युद्धात केले गेले होते. सद्याच्या सर्जिकल स्ट्राईक्सनंतर, भारताच्या बाजूने अनेक मित्रराष्ट्रे असल्याने आणि पाकिस्तान जागतिक स्तरावर एकटा पडून त्याने "स्ट्राईक्स झालेच नाहीत" असा कातडीबचाऊ पवित्रा घेतल्याने भारताला इतक्या पुढच्या पायरीवर जाणे जरूर पडलेले नाही.
जगामध्ये आपली समंजस प्रतिमा स्थापन करून मित्र मिळवणे व शत्रूंना वेगळे पाडणे :
मोदींनी सत्तेवर आल्यापासून पाकिस्तानसोबत मित्रत्वाचे संबंध स्थापन करण्यास अगदी टोकाचे प्रयत्न केले आहेत हे जगाला दिसले आहे. हे त्यांच्या मूळच्या आक्रमक प्रतिमेला छेद देणारे असल्याने त्यांचे पाठीराखे व विरोधक यांना बरेच गोंधळाचे व आश्चर्यकारक वाटले. किंबहुना त्यासाठी त्याना देशांतर्गत टीकेचे व चेष्टेचे धनी व्हावे लागले आहे. मात्र, देशांतर्गत आणि जागतिक वारे पाहिले असता, जर सत्तेवर आल्या आल्या त्यांनी पाकिस्तानबरोबर कडक वागणे सुरू केले असते तर जागतिक स्तरावर त्यांची आतताई नेता अशी छबी निर्माण झाली असती. शिवाय, त्यांना अगदी हिटलरपर्यंत नावे ठेवणार्या देशांतर्गत विरोधकांच्या हाती कोलीत दिल्यासारखे झाले असते. मग तर त्यांच्या कोणत्याही आक्रमक कृतीला देशाबाहेरून व देशातून मोठा विरोध होऊन ते एकटे पडले असते.
सॉफ्ट पॉवर :
(अ) जागतिक स्तरावरची मैत्री मुख्य दोन प्रश्नांच्या सकारात्मक उत्तरांवर अवलंबून असते :
१. या देशाशी मैत्री केल्याने माझ्या देशाचा फायदा होईल का ?
२. या देशाशी मैत्री न केल्याने माझ्या देशाचा तोटा होईल का ?
(आ) आर्थिक हितसंबंध : पाकिस्तानबरोबरच्या मैत्रीच्या प्रयत्नाबरोबरच त्यांनी जगातील इतर महत्वाच्या राष्ट्रांबरोबर मैत्रीपूर्ण व आर्थिक संबंध प्रस्थापित करून आपण व आपला देश युद्धखोर नाही, तर आपला मुख्य उद्येश देशाचा आणि एकंदरीत सर्व जगाचा विकास करणे हाच आहे हे सिद्ध केले. त्या प्रयत्नांच्या परिणामाने अनेक महत्वाच्या देशांबरोबर भारताचे दीर्घकालीन सहकार्याचे व्यापारी, राजकिय, सामरिक आणि पर्यावरणसंबंधी करार झाले आहेत. असे समान हितसंबधावर आधारलेले करार दोन देशांना दीर्घकालासाठी घट्टपणे बांधायला मदत करतात. या बाबतीत बहुतेक सर्व विकसित देश पूर्वीपेक्षा भारताच्या जास्त जवळ आहेत यात संशय नाही.
(इ) परदेशांतले भारतिय वंशाचे लोक (इंडियन डायास्पोरा) : अनेक विकसित देशांत लक्षणीय प्रमाणांत भारतिय वंशांचे लोक आहेत. पूर्वी त्यांच्याकडे परकिय चलनाचा स्त्रोत असलेले NRI किंवा PIO यापलिकडे पाहिले गेले नाही. जागतिक राजकारणाचा हा एक महत्वाचा दबावगट मोदींनी हेरला आणि आपल्या प्रत्येक परदेश भेटीत त्याला संबोधित करून आपलेसे केले. या गटाला आपली अगोदर माहित नसलेली ताकद उमगली आहे. हे अमेरिका आणि ब्रिटन मधल्या राजकारणी वार्यांत स्पष्ट दिसते आहे. आज आणि पूर्वी संख्येने तेवढेच असलेल्या पण पूर्वी स्थानिक राजकारनात फारसे न दिसणारा हा गट आता दृष्य स्वरूपात आला आहे. या गटाच्या धृवीकरणाने त्यांचे स्थानिक राजकारणातले महत्व वाढले आहे. अर्थातच, त्यांना महत्व देतांना त्यांच्या मूळ देशाकडे दुर्लक्ष करणे स्थानिक राजकारण्यांना शक्य नाही. अमेरिका आणि ब्रिटनमधल्या निवडणूकांकडे वरवर लक्ष असलेल्यांनाही मला काय म्हणायचे आहे ते कलले असेलच. अश्या भारताच्या बाजूने बनलेल्या दबावाचा परिणाम त्या देशाचे भारताशी असलेले द्विपक्षिय संबंध अधिक घट्ट होण्यात होतोच, पण आंतरराष्ट्रिय स्तरावर असे दोन देश एकाच गटात येण्याची शक्यता अजून वाढते.
(ई) इतर मित्र देश : अनेक छोट्या देशांबरोबरही करार करून भारताने त्यांना मदत केली यावर अनेकदा टीका केली जाते. उदा : माक्रोनेशियातले नकाशातल्या केवळ ठिपक्यासारखे असलेले देश, दक्षिण आशियातले देश, इत्यादी. याचे खूप फायदे असतात. याचे फायदे पाहण्यासाथी दोन मुद्दे पुरेसे आहेत :
(१) संयुक्त राष्ट्रांच्या मतदानात भारताला, अमेरिकेला आणि नकाशावरच्या ठिपक्याच्या आकाराच्या देशाला, दोघानांही प्रत्येकी एकच मत असते.
(२) नुकताच भारताने पाकिस्तानातील सार्कच्या सभेवर टाकलेल्या बहिष्काराच्या नंतर एक एक करत पाकिस्तान सोडून इतर सर्व देशांनी बहिष्कार टाकला. या घटनेचे परिणाम दक्षिण आशियापुरते सीमीत राहिलेले नाही, त्याची नोंद आपल्या परिसराच्या बाहेर असलेल्या जगातील सर्व देशांनी घेतली असणारच आणि तिचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रभाव त्यांच्या आजच्या व उद्याच्या कृतींवर पडणार आहे.
पाकिस्तानच्या स्ट्रॅटेजिक चुका :
हे सर्व चालू असतानाच, पाकिस्तानाने त्याच्या मूळ स्वभावाला अनुसरून आपल्या अतिरेकी कारवाया चालूच ठेवल्या. सुरुवातीच्या दिवसांत, मोदी चिडून काही आक्रमक करतील आणि त्यांना जागतिक स्तरावर अलग पाडून आपल्याला वरचढ होता येईल असे पाकिस्तानला वाटले. मात्र या खेळीला न बधता, त्यांच्या मोदींनी पाकिस्तानच्या दिशेने केवळ शांतीपूर्णच नाही तर "शरीफना वाढदिवसाची भेट" या सारख्या "ऑउट ऑफ द वे" कृती चालू ठेवल्या. यामुळे, पाकिस्तानने मोदी 'केवळ मोठ्या घोषणा देणारा पण पूर्वीच्या नेत्यांसारखा कोणतीही आक्रमक कारवाई करण्याला घाबरणारा नेता आहे' असा स्वतःचा गैरसमज करून घेतला व आपल्या अतिरेकी कारवाया चालू ठेवल्या. याचा परिणाम पाकिस्तान नकळत जगाच्या मनातून उतरत जाण्यात झाला.
भारताच्याबद्दलच्या या (गैर)समजामुळे पाकिस्तान इतका गाफिल होता की पूर्वानुभावरून भारतातर्फे काही कारवाई होणार नाही याची त्याची खात्री झाली होती. त्यामुळे, उरी हल्ल्यांसारखे अनेक हल्ले करण्यासाठी त्याने लाईन ऑफ कंट्रोल्जवळच्या अनेक लाँचपॅड्सवर मोठ्या प्रमाणात अतिरेकी जमा केले होते. सर्जिकल स्ट्राईकच्या योग्य संधिची वाट पाहणार्या भारतिय सैन्याच्या हे पथ्यावरच पडले.
जागतिक स्तरावरचा पाठींबा :
पाकिस्तानच्या भारतविरोधी कारवाया जगाला अगोदर माहित नव्हत्या इतके पाश्चिमात्य देश अज्ञानी आहेत असे अजिबात नाही. पण जो देश स्वतःसाठी काहीच करायची हिंमत दाखवत नाही त्याची बाजू घेणे म्हणजे हात दाखवून अवलक्षण करून घेणे इतके सर्वसामान्य माणूसही जाणतो, तर हुशार राजकारणी कसे जाणणार नाहीत. समजा, तुमचा एक शेजारी दुसर्याला नेहमी मार देत आहे आणि तरीही दुसरा नेहमी शांततेची माळ ओढत मार खाणे पसंत करत आहे व वर त्याचे नीतिमत्तेच्या नावाखाली समर्थन करत आहे. अश्या भित्र्या व भित्रेपणाचे गोडवे गाणार्या माणसाची बाजू घेतल्यास, तो केव्हा कच खाऊन त्याला मदत करणार्याची अवस्था कठीण करेल याचा नेम नसतो. अर्थात, अश्या माणसाची बाजू सत्याची असली तरी त्याला पाठींबा देणे मूर्खपणाचे ठरते. जागतिक राजकारणातही हेच मूलभूत सत्य कोणी कोणाची बाजू घ्यावी याकरिता वापरले जाते.
सामरिक ताकद आणि तिचा वापर :
सामरिक साधनसंपत्तीच्या अनेक कमींशी सामना देत असले भारतिय सैन्य जगातील सर्वोत्तम सैन्यदलांपैकी एक आहे. त्यातही भारतिय कमांडोच्या पात्रतेबद्दल कोणालाही संशय नसावा. कमी होती त्यांना आदेश मिळण्याची. भारतात लोकशाही आहे आणि खर्या लोकशाहीत सैन्य मुलकी सरकारच्या अधिकारामध्ये असते. त्यामुळे सरकार कणखर नसले व आदेश द्यायला कचरणारे असले तर उत्तमातले उत्तम सैन्यही हात बांधलेल्या अवस्थेत राहते. यावेळेस भारतिय सैन्याला "योग्य वाटेल त्या वेळेस, योग्य वाटेल त्या प्रकारे" हल्ला करण्याचा आदेश मिळाला आणि अश्या आदेशाची वाट पहात असलेल्या सैन्याने त्या संधीचे सोने केले.
हल्ल्यानंतरची अप्रतिम मुत्सद्दी खेळी :
हल्ल्यानंतरचे भारतिय DGMO चे केवळ एकुलते एक वक्तव्य जर नीट पाहिले तर त्यातला प्रत्येक शब्द काळजीपूर्वक लिहिला व उच्चारला गेला आहे असे ध्यानात येईल. खालील काही गोष्टी तर जाणीवपूर्वक मांडलेल्या दिसतील...
१. हल्ला केवळ पाकव्याप्त काश्मीरमध्ये केला हे स्पष्टपणे प्रतिपादन केले गेले : याचा अर्थ असा की कारवाई (आता पाकिस्तानच्या ताब्यात असली तरी) भारताच्याच भूमीवर केलेली आहे. थोडक्यात, हे एका देशाचे दुसर्या देशावर आक्रमण (बूट्स ऑन द ग्राऊंड) नाही (जे एखाद्या राष्ट्राच्या सार्वभौमत्वावर आक्रमण आणि म्हणून गंभीर आंतरराष्ट्रिय समस्या समजली जाते). त्यामुळे, जरी पाकिस्तानने सर्जिकल स्ट्राईक झाल्याचे कबूल केले असते तरी त्याच्या भारताच्या युद्धखोरीबद्दल कांगावा करण्यावर बंधने आली.
२. हल्ला केवळ अतिरेक्यांवर केला होता. पण, त्यात अतिरेक्यांना संरक्षण देत असलेले काहीजण (तसे स्पष्ट्पणे म्हटले नाही तरी त्याचा रोख पाकिस्तानी सैनिकांवर होता हे स्पष्ट होते) मारले गेले हे स्पष्टपणे प्रतिपादन केले गेले : हल्ला अतिरेक्यांवर असल्याने पाकिस्तानला त्याविरुद्ध बोलणे जरा जडच जाणार हे नक्की. कारण तसे केल्यास (अ) आमच्या भूमीवर अतिरेकी आहेत आणि (आ) आम्ही त्यांना संरक्षण देतो, या दोन गोष्टी कबूल केल्यासारखे झाले असते. पण तरीही, दोन पाकिस्तानी सैनिक मेल्याचे खुद्द पाकिस्तानने मान्य करून, DGMO च्या म्हणण्याला अप्रत्यक्ष दुजोरा दिला !
३. हल्ल्याच्या जागा, मृतांचा अंदाजे आकडा (जो खर्या आकड्यापेक्षा खूप कमी आहे असे संकेत आहेत) याचा स्पष्ट उल्लेख केला गेला : यामुळे पाकिस्तानला "हल्ला झाला नाही" असे म्हणणे जितके कठीण होईत तितके कठीण केले गेले. याउप्परही पाकिस्तानने अंतर्गत नामुष्की टाळण्यासाठी "हल्ला झाला नाही" असे म्हटलेच. एका बाजूला "सतत खोटे बोलणारे पाकिस्तानी सैन्य व त्याच्या हातचे कठपुतळी सरकारचे बोलणे" तर दुसर्या बाजूला "पात्रता, शिस्त आणि प्रामाणिकपणासाठी प्रसिद्ध असलेल्या भारतिय सैन्याच्या DGMO सारख्या पदावरील वरिष्ठ अधिकार्याचे (ज्याच्यावर त्या हल्ल्याची जबाबदारी होती) आम्ही हल्ला केला असे स्पष्ट निवेदन". अर्थातच पाकिस्तानी माध्यमे आणि काही चुकार भारतिय राजकारणी (दोन्हीही त्यांच्या हितसंबंधी वक्तव्यांसाठी कुप्रसिद्ध आहेत) काहीही म्हणाले तरी जगभरच्या महत्वाच्या राजकारण्यांना आणि युद्धतज्ञांना खरे अर्थ शोधायला कठीण पडले नाही.
४. DGMO-DGMO संभाषणाची माहिती : भारतिय सैन्याच्या DGMOने आपल्या वार्ताहर परिषदेत "आम्ही ही कारवाई केली आहे आणि दुसर्या दिवशी सकाळी पाकिस्तानी DGMO शी फोनवर बोलून त्याला ही माहिती मी सांगितली आहे" असे ठणकाऊन सांगितले. याचा सोप्या मराठीत अर्थ असा : "ऑपरेशनच्या यशासाठी हे ऑपरेशन गुप्त (कोव्हर्ट) होते. पण, ते आम्ही लपवू इच्छित नाही. आम्ही सर्व परिणामांची तयारी केली आहे. आता तुम्हाला काय करायचे ते करा." या वाक्यानंतर जगभरातल्या महत्वाच्या व्यक्तींना भारताच्या "राजकिय इच्छाशक्तीबद्दल आणि ती वापरण्याच्या धमकेबद्दल" संशय राहिला नाही. "आता आवरायचेच असेल तर केवळ नस्त्या कुरापती काढणार्या पाकिस्तानलाच आवरावे लागेल" असा सर्व महत्वाच्या देशांचा ग्रह झाला यात आश्चर्य नाही... आणि ते त्या देशांच्या संदेशांवरून स्पष्ट होतेच आहे. त्यातला एकही संदेश (भूतकालाप्रमाणे) भारताला सबूरीचा सल्ला देताना दिसत नाही.
यापेक्षा जास्त मुद्दे सांगता येतील. पण, खालील साधार निष्कर्ष काढण्यासाठी सद्या इतके पुरे व्हावेत.
शपथ समारंभापासून आजपर्यंत केलेल्या कृतीतून मोदींची राजकिय प्रगलभता दिसली आहे. त्यांनी भारताच्या जागतिक व स्थानिक स्तरावरच्या आर्थिक-राजकिय सबलीकरणासाठी जाणिवपूर्वक एक स्ट्रॅटेजी ठरवून त्या दिशेने मार्गक्रमण केले आहे. वास्तवात असे मार्ग फार थोड्या कालात फळे देत नाहीत. देशाच्या सामर्थ्याची वाढ करणे ही लांबवरची कृती आहे. मात्र, वाढत असलेल्या जागतिक शक्तीचा उपयोग अचानक आलेल्या संधीचा उपयोग करून तरीही "नि-जर्क पद्धतीने" नव्हे तर "योग्य वेळेस, योग्य ठिकाणी, हवा तो परिणाम साधणारा हल्ला करण्याचे" स्वातंत्र्य देणारे आदेश सैन्याला दिले गेले आणि अर्थातच, आपल्या सैन्याने त्या संधिचे सोने करून इतिहास घडवला आहे.
कोणता एक झेंडा डोळे मिटून सतत हातात घेण्याइतका मी माझ्या बुद्धीचा अपमान करू शकत नाही. त्यामुळे ज्याला जे श्रेय देणे योग्य आहे त्याला ते देण्याचा प्रामाणिकपणा पाळताना मला कधीच अडचण आलेली नाही.
एक देशप्रेमी नागरिक म्हणून मला वरच्या गेल्या दोन-अडीच वर्षांच्या सर्व घटनाक्रमांचा साधार अभिमान आणि आनंद आहे. किंबहुना, हा घटनाक्रम तसाच पुढे चालू रहावा आणि भारताचे पाऊल सतत पुढे पडत रहावे हीच माझी इच्छा आहे.
**********************************************************
हा विषय खूप मोठा आहे आणि या एका लेखात पूर्णपणे मांडणे शक्य नाही. पण सहज सुचले ते लिहिले आहे.
**********************************************************
भारत यावेळेस युध्द न करताच तह जिंकणार आहे.आपके मुहमे घी-शक्कर ! हेच दोन्ही देशांच्या सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचे आहे. मात्र, हा तह सांमजस्याने ("बघ हं पाकिस्ताना, परत अतिरेकी पाठवू नकोस बरं का. नाहीतर मी तुझा परत निषेध करेन." या स्टाईलने) होणार नाही हे नक्की. त्यासाठी पाकिस्तानला, आणि मुख्यतः पाकिस्तानी सैन्यातल्या जनरल्सना आणि त्यांच्या पाकिस्तानातील व भारतातील पाठीराख्यांना, त्यांच्या कारवायांची जबर राजकिय, आर्थिक, सामाजिक व कायदेशीर किंमत भरायला लावणे हा सर्वात उत्तम उपाय आहे.अवांतर : खरी गंमत म्हणजे या मालाची वाहतूक करणार्या वाहतूक कंपन्या पाकिस्त्तानी जनरल्सच्या मालकीच्या आहेत ! त्यामुळे अफगाणीस्तानमधली बंडाळी चालू ठेवणे हा जेवढी राजकिय खेळी आहे तेवढीच ती व्यापारी खेळीही आहे ! हाच व्यवसाय नव्हे तर पाकिस्तान व इजिप्त या दोन देशातले सैन्य उघडपणे अनेक अ-सामरिक (टिश्श्यू पेपर, वॉशींग मशीन, इत्यादी बनवणारे) कारखाने व व्यवसाय चालवतात. सैन्याच्या नोकरीत असलेले (निवृत्त नव्हे) जनरल्स त्यांचे अधिकृतरित्या सिईओ आहेत. याशिवाय, बहुतेक सर्व लहान-मोठे सैन्य अधिकारी अनेक दश-शत एकर जमीन बाळगून असलेले जमीनदार आहेत. अशी अधिकाधिक जमीन त्यांना त्याच्या नोकरीतल्या प्रत्येक बढतीबरोबर बक्षीस म्हणून मिळत जाते. त्यांनी 'देशाशी व देशाच्या सरकारशी नव्हे' तर 'सैन्याच्या वरिष्ठ अधिकार्यांशी' निष्ठावंत रहावे यासाठी ही पद्धत वापरली जाते.२. We have stood by India in its 'darkest hours', says top Russian defence official नजिकच्या काळात पाकिस्तानबरोबर युद्धाचा सराव केलेल्या रशियाच्या महत्वाच्या अधिकार्याकडून असे विधान महत्वाचे आहे. हा अधिकारी, सेर्गेई चेमेझोव, रशियाच्या ७०० सामरिक साहित्य निर्माण करणार्या कंपन्या ताब्यात असलेल्या पालक-कंपनीचा, रोस्तेक स्टेट कॉर्पोरेशनचा, मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आहे. यामागे भारताकडून मिळालेल्या $१२ बिलियनच्या युद्धसाहित्याची पार्श्वभूमी आहेच. शिवाय, येथेच भारताच्या सामरिक साहित्याच्या निकडीची यादी संपत नाही, अजून अनेक दश-बिलियनची खरेदी बाकी आहे आणि रशिया विक्री करणार्या देशांच्या रांगेत बराच पुढे आहेच. असे खरेदी-विक्री करार दशकांच्या कालावधीवर चालू राहतात, त्या कालावधीवर पैशाचा ओघ चालू राहतो आणि आर्थिक फायद्यावर अवलंबून असलेले संबंध चालू ठेवणे दोन्ही देशांना सोयीचे असते. शिवाय, आर्थिक-सामरिक फायद्यावर अवलंबून असलेले आंतरराष्ट्रिय संबंध जास्त घट्ट असतात हे तर सार्वकालिक सत्य आहे. याशिवाय महत्वाचे आहे की रशियाने आतापर्यंत दुसर्या कोणत्याही देशाला न विकलेल्या (अमेरिकेच्या अनेक वर्षे पुढे असलेल्या) सामरिक प्रणाल्या अगोदर केलेल्या व या बारा बिलियनच्या करारामध्ये आहेत. यापूर्वीच्या रशिया-भारताच्या सहकार्याने बनलेले ब्राम्होस क्षेपणास्त्राची चीनला काळजी वाटत आहे. त्या करारप्रमाणे भारत हे क्षेपणास्त्र व्हिएतनामसारख्या मित्र व चीनचा प्रतिस्पर्धी असलेल्या देशाला विकण्यास मोकळा आहे. हे कोणत्याच अमेरिकन युद्धसाहित्याच्या कराराबद्दल शक्य नसते याच पार्श्वभूमीमुळे मी पूर्वी लिहिले होते की, "पाकिस्तानबरोबर युद्धाचा सराव" भारत-अमेरिकेच्या सलगीविरुद्ध केलेल्या रशियाच्या एक दबावतंत्राचा (पोश्चरिंग) भाग होता. किंबहुना, प्रथम तो सराव पाकव्याप्त काश्मीरमध्ये होणार होता आणि माझ्या मते ती जागा बदलून इतरत्र पाकिस्तानध्ये हलविण्यासाठी "भारताचा नाराजीचा संदेश" येण्याचीच वाट रशिया पहात होता. तो आल्यावर लगेच, सरावाच्या दोनेतीन दिवस अगोदर सरावाची जागा बदलली गेली. पूर्वतयारी केलेल्या जागेवरून सामरिक अभ्यासांची जागा दुसरीकडे हलविणे हे एखाद्या "काँन्फरन्सचे हॉटेल बदलण्याइतके सोपे नसते" हे नक्की :) रशियाच्या या वागण्याचा अजून एक भारताच्या फायद्याचा अर्थ असू शकतो. पण त्याबद्दल अजून काही संकेत जरूर आहेत. शिवाय, तो अंदाज आत्ता किंवा अजून काही काळ उघड न करणेच जास्त योग्य होईल.पण पाकिस्तानला रशियाचा विश्वास कसा वाटला हे ही एक गुढच आहे.राजकारण साधे सरळ कधीच नसते... जागतिक राजकारण तर अधिकच गुंतागुंतीचे ! सद्यस्थितीतले तीन महत्वाचे मुद्दे : १. जसा, "शत्रूचा शत्रू हा मित्र असतो" तसाच, "दुरावत जाणार्या मित्राचा (पक्षी : भविष्यात शत्रू बनू शकणार्या मित्राचा) शत्रू हा पण मित्र असतो" ! :) २. लोखंड गरम झाल्यावर त्यावर घाव घातला तरच हवा तो परिणाम मिळतो. तोपर्यंत, "अडला नारायण... " ही म्हण (मनातल्या मनात) घोकत राहणे जास्त चांगले. इंग्लिशमध्ये "टायमिंग इज एव्हरीथिंग" असे म्हणतात ते उगाच नाही. ;) ३. आंतरराष्ट्रिय राजकारणातल्या आपल्या अपेक्षा, परिस्थितीचे अंदाज व त्यासाठीचे आपले उपाय "भविष्यात (५-१०-१५-२०-२५--- वर्षे) डोकाऊन ठरवावे" लागतात... आणि त्यांना दर प्रचलित स्थितीत घडत असलेल्या अपेक्षित-अनपेक्षित घटनांचा तडका देऊन मगच "आजचे पाऊल टाकावे" लागते. राहता राहिली पाकिस्तानची वागणूक... पाकिस्तानचा इतिहास पाहिला तर "निर्लज्जपणे निव्वळ तात्कालिक हितसंबंधांवर आधारलेले दलबदल करणे" उर्फ "ज्याच्याकडून पैसा मिळेल त्याची (मैत्रीच्या गोंडस नावाआड) चाकरी करणे" उर्फ "भाडोत्री (मर्सिनरी) सैन्य चालवणे" हे पाकिस्तानी सैन्याच्या परदेशनीतिचे एकच एक तंत्र आहे. यामुळे, ज्या दिवशी ज्याची बोली जास्त त्या दिवशी पाकिस्तान त्याचा (मित्र ?!) असतो ;) गेला काही काळ प्रतिस्पर्धी झालेले रशिया आणि चीन, गेल्या शतकातल्या मधल्या काही दशकांप्रमाणे, अमेरिका या समान शत्रूविरुद्ध, जवळ येत आहेत, ... मात्र या दोन मैत्रींत एक मोठा फरक आहे, भूतकालातल्या मैत्रीत युएसएसआर चीनपेक्षा वरचढ होता, पण आजच्या घडीला चीन रशियापेक्षा जास्त प्रबळ आहे. पाकिस्तान चीनचा 'पाळलेला' मित्र आहे. समर्थाशी संबंध ठेवताना त्याच्या श्वानाला चुचकारणे बरेच फायद्याचे असते ! ;)मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- अजुन किती ?अजुन किती ?कदाचित, काही वर्षे सुद्धा ! कदाचित, एखादा मोक्याचा क्षण मिळाला आणि त्याचा फायदा घेता आला तर एखाद्या वर्षांतही ! मूळातच अतिरेकी तत्वांवर पोसलेले आणि ६०-७० वर्षांच्या भारताच्या (एखादा तात्कालिक अपवाद सोडता) सततच्या पडत्या धोरणाने शिरजोर झालेले पाकिस्तानी सैन्य एकाद-दुसर्या हल्ल्याने ताळ्यावर येईल अशी कल्पना करणे वास्तवाला धरून होणार नाही. अश्या अनेक दशकांच्या अनुभवाने बनलेल्या सवयी पटकन सुटत नाहीत. "भारतासाठी हा संघर्ष संपवणे शांती प्रस्थापित करण्यासाठी आहे" तर "भारत व अफगाणीस्तानशी संघर्ष चालू ठेवणे, हे पाकिस्तानी सैन्यासाठी त्यांची जगातली आवश्यकता कायम ठेवण्यासाठी अत्यावश्यक गोष्ट आहे." अर्थात, अश्या जीवन-मरणाच्या परिस्थितीत, जखमी झालेले व मरण समोर उभे असलेले हिंस्त्र जनावर (पक्षी : पाकिस्तानी सैन्य) अधिक हिंस्त्र बनून जीवाच्या आकांताने प्रतिहला करत राहणारच. आपल्या दर हल्ल्यासाठी हे गृहीतक न ठेवणे वस्तूस्थितीला सोडून व आत्मघातकी असेल. सद्यस्थितीत, (अ) अमेरिकेचा पाय पाकिस्तानी दगडाखाली आहे (अफगाणिस्तानमधिल अमेरिकन सैन्यासाठी सर्व सामरिक व मुलकी मदत, कराची बंदरापासून अफगाणीस्तानापर्यंत पाक भूमीवरून ट्रकमधून जाते व त्याला दुसरा योग्य पर्याय अमेरिकेकडे नाही. या ट्रकिंग कंपन्या पाकिस्तानी जनरल्सच्या प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष मालकिच्या आहेत.); (आ) चीन या पाकिस्तानच्या सर्वमोसमी मित्राला अजूनही पाकिस्तानला मदत करणे गैरफायद्याचे होईल अशी कठीण आंतरराष्ट्रिय परिस्थिती नाही; (इ) अमेरिकेचा शत्रू असलेला रशिया, भारताची अमेरिकेबरोबर वाढणारी जवळीक पाहून, पाकिस्तानला प्रतिकात्मक जवळीक (पोश्चरींग) दाखवू लागला आहे. या तिहेरी वस्तूस्थितीचा पाकिस्तान पुरेपूर फायदा उठवून त्याची भारताची कुरापत काढण्याची नीति शक्य तितकी लांबवणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. अश्या परिस्थितीचा वारंवार फायदा घेत तर पाकिस्तानची गेल्या ७० वर्षांची वाटचाल चालली आहे... आतापर्यंत याबाबतीत पाकिस्तानला पीएचडीच्या स्तराचे ज्ञान मिळालेले आहे. "दर चुकारपणाला किंमत असेल, तिची किंमत वाढत दर दर चुकारपणामागे वाढत राहील आणि ती चुकवायलाच लागेल" हा धडा निब्बर पाकिस्तानी जनरल्सना महाग पडेपर्यंत किंवा त्यांचा विमोड होईपर्यंत सतत त्यांच्या पदरात घालावा लागेल. यापेक्षा वेगळा पर्याय आतातरी भारतासमोर नाही. त्यामुळे, हा दीर्घकालीन संघर्ष चालू ठेवणे, त्यातून होणारे नुकसान सोसणे आणि पाकिस्तानचे त्यापेक्षा अधिक नुकसान करणे हे चालूच राहील. यात भारताची एक पडती बाजू आहे : पाकिसानने केलेल आपले नुकसान नुकसान लोकशाही असलेला भारत लपवू शकणार नाही व त्यातून होणारा जनक्षोभ भारत सरकारला सोसणे भाग पडणार आहे (जसा, "अजुन किती ?" या शब्दांत आहे). मात्र, भारताच्या कारवाईने होणारे पाकिस्तानी सैन्याचे नुकसान तेथिल सैन्याच्या त्याब्यातल्या काश्मीर मध्ये असेल व पाकिस्तानी सैन्य नेहमी प्रमाणे ते पाकिस्तानी जनतेपासून लपवेल आणि आंतरराष्ट्रिय स्तरावर नाकारत राहील (जसे सर्जिकल स्ट्राईकच्या बाबतीत केले गेले). थोडक्यात, भारताकडे पाकिस्तानी सैन्याचे नुकसान असह्य होईपर्यंत सतत वाढते ठेवणे, पण तरीही संघर्ष सर्वंकष युद्धापर्यंत न वाढवणे अशी तारेवरची कसरत करणे हाच एक उपाय सद्या आहे. या झाल्या बाधक (cons) गोष्टी. पण, त्याचबरोबर अनेक साधक (pros) गोष्टीही घडत आहेत... अमेरिका : १. यावेळेस अमेरिकन सार्वत्रिक निवडणूकीत भारतियांचे जेवढे उघड उघड महत्व दिसत आहे तेवढे पूर्वी कधीच दिसले नव्हते. हे अमेरिकन भारतियांच्या अमेरिकेतल्या राजकारणातल्या वाढत्या महत्वाचे लक्षण आहे. या दबावाचा उपयोग अमेरिकच्या आंतरराष्ट्रिय निर्णयांना भारताच्या बाजूने झुकण्यास/झुकविण्यास निश्चितच मदत होईल. २. भारत-अमेरिकेचे व भारत-रशिया यांच्यातिल व्यापारी व सामरिक सहकार्याचे करार. याअंतर्गत 'मेक इन इंडिया' मध्ये केली जाणारी अमेरिकन गुंतवणूक फार महत्वाची आहे. यामुळे हे संबंध केवळ अर्थकारणापलिकडे जाऊन दीर्घकालीन समान हितसंबंधाची राखण करणारे ठरतात. ३. Obama Celebrates Last Diwali As President By Lighting Ritual Lamp : It's the first time a president has lit the diya in the Oval Office. या वर्षी व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकन राष्ट्रपतींच्या हस्ते द्वीपप्रज्वलन करून दिवाळी साजरी केली गेली.मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Pakistan ‘breaks rule’; makes public names of 8 Indian diplomats, calls them spiesआपल्या हिंदुस्थानी लोकांची त्यांच्या प्रगतीसाठी राबणारी लोकसंख्या सुद्धा मोठी आहे ज्याची अर्थातच त्यांना जाणीव आहे.असहमत. विकसित देशांत स्थायिक झालेल्या व स्थानिक प्रगतीसाठी राबणारी भारतिय लोकांची संख्या मोठी आहे, हे आजचे नाही तर अनेक दशके सत्य आहे. हे मीही लिहिले आहेच. पण मुद्दा असा की आज तिथल्या भारतिय वंशाच्या लोकांना त्या ताकदीची जाणीव झाली आहे आणि म्हणून तेथिल स्थानिक राजकारण्यांना त्यांची दखल घ्यावी लागत आहे (जे पूर्वी होत नव्हते)... कारण भारतियांना त्यांच्या ताकदीची कल्पना कोणीतरी करून दिली आहे, यापूर्वी ती सांख्यिक, आर्थिक व सामजिक वजनाची ताकद अजमावी हा विचार त्यांच्या मनाला शिवत नव्हता, हे मी प्रत्यक्ष जागेवरच्या अनुभवाने सांगू शकतो. राजकारण्यांना "तुमच्या ताकदीची" भिती वाटत नाही, पण "ती ताकद वापरण्याच्या तुमच्या कुवतीची" मात्र प्रचंड भिती वाटते !परंतु आपण त्यांची कंबर मोडु शकतो ही क्षमता ठेवुन आहोत असे जर असेल तर ती क्षमता आपण दाखवुन ध्यावी इतके मात्र नक्कीच वाटते.शत्रूची कंबर मोडणे किंवा सर्वंकष युद्ध जिंकणे म्हणजे केवळ बाँब टाकून त्याची राजधानी आणि काही भूभाग उद्धवस्त करणे असे होत नाही. तर, त्या देशाच्या भूभागावर शासकीय नियंत्रण मिळविणे आवश्यक असते. त्या कारणामुळेच दुसर्या महायुद्धानंतरच्या परिस्थितीत; (अ) फार छोटे क्षेत्रफळ व फार कमी लोकसंख्या असलेला देश आणि (आ) पूर्णपणे किंवा बहुतांश आपल्या बाजूला असलेली लोकसंख्या असलेला देश; असल्याशिवाय कोणत्याही देशाबरोबरचे संर्वंकष युद्ध जिंकणे आजच्या सामरीक महाशक्तींनाही शक्य नाही. १. या वस्तूस्थितीचा धडा अमेरिकेला व्हिएतनाम युद्धात मिळाला होता. पण कुवेत युद्धात मिळालेल्या सहज विजयाच्या धुंदीत तो धडा इराक युद्धात उडी घेताना अमेरिका विसरली. कुवेत आणि इराकमधल्या वर सांगितलेल्या क्षेत्रफळ आणि आपल्या बाजूला असलेली लोकसंख्या या दोन्ही बाबतीतल्या तफावती अमेरिकेने नजरेआड केलया. त्या युद्धाचे परिणाम आज केवळ अमेरिका आणि इराक नव्हे तर सर्व जग भोगत आहे. युद्ध जिंकणे आणि त्याचे फायदे उपभोगणे दूर पण तेथे अडकलेला पाय कसा सोडवावा हीच आज अमेरिकेसमोरची सर्वात मोठी समस्या आहे. २. भारताला बांगला देशात विजय मिळाला त्याचे मुख्य कारण "आपल्या बाजूला असलेली लोकसंख्या" हेच होते. ते युद्ध "भारतिय सैन्य + बांगला देशी जनता" विरुद्ध "स्थानिक जनतेचा विरोध असलेले पाकिस्तानी सैन्य + त्यांचे थोडेसे स्थानिक हस्तक" असा होता. (असे असूनही बांगला देश एक वर्षापूर्वीपर्यंत भारताचा मित्र तर नव्हताच पण भारताच्या दृष्टीने सुरक्षित शेजारीही नव्हता, हा इतिहास आहे.) बांगला देश युद्धात भारताला अनुकूल असलेले मुद्दे भारत-पाकिस्तान युद्धात आस्तित्वात असणार नाहीत. हा फरक न जाणल्यास अजून एक "इराक युद्धापेक्षा भयानक परिणामांचे युद्ध" भारत आपल्यावर ओढवून घेईल. "जास्त भयानक" कारण, अमेरिका इराकपासून अनेक हजार किमी दूर आहे, पण तरीही पूर्णपणे सुरक्षित नाही हे सांगायला नकोच. भारत-पाकिस्तान युद्धानंतरचा "इराकसदृष्य परिस्थिती असलेला पाकिस्तान" तर भारताचा निकट शेजारी असणार आहे ! ३. ४ कोटीच्या लोकसंखेच्या व ४.४० लाख चौ किमी क्षेत्रफळाच्या इराकमध्ये, आधुनिक सामरिक-नागरी यंत्रसामुग्री दिमतीला असलेल्या आणि जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेला व त्याच्या दोस्त राष्ट्रांना इराकवर "शासकीय नियंत्रण" मिळविणे शक्य झाले नाही. त्यामुळे निर्माण झालेल्या अराजकतून सुखरूप बाहेर कसे पडावे या विवंचनेत आज अमेरिका आहे. वरच्या पार्श्वभूमीवर, चीनचा उघड पाठींबा असलेल्या, २० लाख लोकसंखेच्या, ८.८० लाख चौ किमी क्षेत्रफळाच्या व अतिरेक्यांचे नंदनवन असलेल्या पण तरीही भारताकडून पराभूत झालेल्या पाकिस्तानवर भारतिय सेना "शासकीय नियंत्रण" मिळविण्याचा प्रयत्न करत आहे अशी कल्पना केल्यास मला काय म्हणायचे आहे हे स्पष्ट होईल. आजच्या घडीला अमेरिकासुद्धा अश्या परिस्थितीत सापडण्याचे स्वप्न पहायचे धाडस करणार नाही. ४. दुसरा उपाय म्हणजे पाकिस्तानवर बाँबवर्षाव करून त्याचे "कमांड अँड कंट्रोल स्ट्रक्चर" नष्ट करणे व उरलेला पाकिस्तान आपला मित्र होईल अशी इच्छा मनात धरणे. "सर्वंकष युद्ध जिंकणे म्हणजे केवळ बाँब टाकून शत्रूची राजधानी आणि काही भूभाग उद्धवस्त करणे असे नाही." हा मूलभूत सामरीक धडा विसरून अमेरिकेने अफगाणिस्तान आणि इराक या दोन युद्धांत "कारपेट बाँबिंग करून सद्य राजवटीला उध्वस्त करा आणि घरी जा" हे तत्व वापरले व "भूभागावर शासकीय नियंत्रण मिळविणे आवश्यक समजले नाही". या कृतीने निर्माण झालेल्या राजकिय व शासकिय पोकळीत तालिबान, अल कायदा, इसिस, इत्यादी सकट इतर अनेक अतिरेकी संघटना फोफावल्या (जसे शेतकर्याच्या योग्य कृतीच्या अभावात तण माजते, अगदी तसेच) आणि त्यामुळे मध्यपूर्वेपासून दूर असलेल्या अमेरिका-युरोपसकट सर्वच जग अधिक असुरक्षित बनले आहे, हा इतिहास आहे. तेव्हा बाँब टाका आणि पाकिस्तानी शासन नष्ट करा, हा उपाय तर अधिकच धोकादायक ठरेल. ५. प्रत्यक्ष-गुप्त शत्रू : दुसर्या महायुद्धपर्यंतच्या युद्धांत आणि त्यानंतरच्या युद्धांत एक फार मोठा फरक आहे. दुसर्या महायुद्धपर्यंत शत्रूपक्ष आणि मित्रपक्ष असे उघड दोन तट असत. आजकालची युद्धे प्रत्यक्ष समरांगणावर कमी आणि गुप्त कारवायांनी जास्त अशी लढली जातात... (अ) चीन पाकिस्तानच्या बाजूने सैन्य न उतरवता पाकिस्तानला मदत करतो. (आ) अमेरिका पाकिस्तानला सैनिकी मदत देत असतानाच त्याच्या अतिरेकी कारवायांच्या विरुद्ध आहे असे म्हणतो. (इ) रशिया भारताचा "खास मित्र" असे म्हणत असतानाच; पाकिस्तानबरोबर सैनिकी अभ्यास करतो; आणि त्याच बरोबर सद्याच्या सिक्युरिटी काऊंसेलचा चेअरमन असलेला रशियाचा युएनमधिल राजदूत "I don't want to go there, don't want to go there. No no please, I don't want to go there," असे म्हणून युएन मधिल पत्रकार परिषदेत सर्जिकल स्ट्राईक्स व काश्मीर चर्चा टाळून पाकिस्तानला टोला लगावतो; आणि दोनचार दिवसात रशिया-भारतामध्ये अत्याधुनिक सामरिक साधनांचा $१२ बिलियनचे करार होतात. (ई) सद्या सिरियात चाललेल्या अंदाधुंदीत आज कोण कोणाबरोबर आहे आणि उद्या कोण कोणाबरोबर असेल हे खात्रीलायकरित्या सांगेल त्याला "सामरिक विश्लेषणाचे नोबेल पारितोषिक" नक्की द्यावे लागेल ! ;) (उ) पाकिस्तान हा देश त्याच्या भौगोलिक स्थानामुळे चीनला आणि रशियाला भारतीय महासागरात तडक प्रवेश देउ शकतो... हा एक फार मोठा रणनीतिचा मुद्दा आहे. "अधिक बोली लावेल त्याची चाकरी" हे तत्व बाळगून वागणारा पाकिस्तान या फार मोठ्या मुद्द्याचा पुरेपूर फायदा उठवत आहे आणि उठवत राहील (किंबहुना देशाचा आणि / किंवा शासकांचा वैयक्तीक स्वार्थ त्याला तसे करण्यास भाग पाडेल). अश्या परिस्थितीत, प्रत्यक्ष युद्ध सुरू झाल्यावर कोण कोणाच्या बाजूने किंवा विरुद्ध; आणि ते किती प्रमाणात प्रत्यक्ष व किती प्रमाणात गुप्तपणे करेल; हे प्रत्येक राष्ट्राच्या त्या युद्धाच्या परिणामातून मिळू शकणार्या तात्कालीक व दीर्घकालीन फायद्याच्या अंदाजांवर अवलंबून असणार आहे. (In politics, there are are no permanent friends or enemies; only permanent interests.) ६. कोणत्याही सर्वंकष युद्धात हरलेल्या बाजूचे नुकसान होतेच पण जिंकणार्या बाजूचे अपरिमित नुकसान होते, हा इतिहास आहे. इतर अनेक लहान-मोठे, सरळ-किचकट, स्पष्ट-अस्पष्ट मुद्दे आहेत, पण सद्य विषय विशद करण्यास वरचे सुस्पष्ट मुद्दे पुरेसे आहेत. वरच्या पार्श्वभूमीवर "आपण त्यांची कंबर मोडु शकतो ही क्षमता ठेवुन आहोत" हे खरे असले तरी आपल्या स्वतःच्याही कंबरेचे आरोग्य ठीक ठेवण्यासाठी शत्रूबरोबर सर्वंकष युद्ध न करता त्याला इतर (राजकिय, आर्थिक, मुत्सद्दी, इ) साधने वापरून एकाकी व हतबल करून आपल्याला सकारात्मक होतील असे राजकीय, शासकीय व सामरीक बदल शत्रूमध्ये करून/करवून घेऊन आपला मूळ उद्द्येश साधणे, हेच जास्त शहाणपणाचे आहे. हा दुसरा उपाय करताना दीर्घकालासाठी चिकाटीने प्रयत्न करावे लागतात. पण, सद्यस्थितीत त्याला जास्त फायदेशीर पर्याय नाही. (कर्मधर्मसंयोगाने भारताचे नशीब खुष होऊन त्याने एखादी "अननोन अननोन (unknown unknown)" संधी दिली तर वेगळी गोष्ट ! )मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Pakistan army personnel replacing Rangers as border heat escalatesपाकिसानने केलेल आपले नुकसान नुकसान लोकशाही असलेला भारत लपवू शकणार नाही व त्यातून होणारा जनक्षोभ भारत सरकारला सोसणे भाग पडणार आहे (जसा, "अजुन किती ?" या शब्दांत आहे). मात्र, भारताच्या कारवाईने होणारे पाकिस्तानी सैन्याचे नुकसान तेथिल सैन्याच्या त्याब्यातल्या काश्मीर मध्ये असेल व पाकिस्तानी सैन्य नेहमी प्रमाणे ते पाकिस्तानी जनतेपासून व इतर जगापासून लपवेल आणि आंतरराष्ट्रिय स्तरावर नाकारत राहील (जसे सर्जिकल स्ट्राईकच्या बाबतीत केले गेले).पाकिस्तानी सैन्याचा त्या देशातील दबदबा हा ते सैन्य अजेय असण्याची प्रतिमा कायम राखण्यावर अवलंबून आहे. हे खालील वस्तूस्थितीवर पाहणे जरूर आहे... (अ) सरळ युद्ध झाले तर पाकिस्तान जिंकणार नाही हे त्याला भूतकाळातल्या तीन पराभवांच्या अनुभवांवरून माहीत झाले आहे. त्यामुळेच तर, गेल्या दोन-तीन दशकांत, त्यांनी अतिरेक्यांना हाताशी धरून "ब्लिडिंग इंडिया बाय थाऊजंड कट्स" हे "अघोषित युद्ध व लो इंटेन्सिटी कॉन्फ्लिक्ट"चे धोरण स्विकारले आहे. (आ) तसेच, भारताच्या सीमेलगतच्या कारवाईमुळे नुकसान झाले तरी ते "झालेच नाही" असे खोटे दावे करून आपली प्रतिमा राखण्याची त्या सैन्याची धडपड राहील. मात्र, भूतकाळात आणि सद्यकाळातला फरक असा की पूर्वी असे नुकसान अनेक पाकिस्तानी हल्ल्यांनंतर कधीमधी नाईलाज झाला तरच होत असे व तो पाकिस्तानसाठी फायद्याचा व्यवहार होता. सद्या, प्रत्येक पाकिस्तानी कुरापतीला त्या कुरापतीपेक्षा जास्त शिक्षा करण्याचे उघड आदेश बीएसएफ व सैन्याला आहेत. या शिक्षांनी होणारे नुकसान उर्फ पाकिस्तानला कुरापतींची चुकवावी लागणारी किंमत असह्य होण्यासाठी थोडा वेळ जावा लागेल. अनुभवी निवृत्त सैन्य अधिकार्यांबद्दल अतीव आदर ठेवूनही आजची परिस्थिती सर्वंकष युद्ध जाहीर करण्याला योग्य नाही असे मला वाटते. (शिवाय, अश्या युद्धामध्ये जेत्या राष्ट्राच्या होणार्या नुकसानीचा उल्लेख अगोदर आला आहेच.) किंबहुना, सद्याच्या पाकिस्तानी कुरापती "भारताने प्रथम युद्ध पुकारावे" यासाठीच चालू आहेत. तसे झाल्यास, चीनच्या मदतीने पाकिस्तान, "भारत आक्रमक राष्ट्र आहे" अशी दवंडी पिटून जगाची सहानभूती मिळवायला मोकळा होईल. आताही "आम्हीच जगात सर्वात जास्त अतिरेक्यांचे बळी आहोत" हे वाक्य तो सतत घोकत असतो. अश्या गोष्टी म्हणजे कांगावाखोरपणा असला तरीही, चीनसारख्या युएनच्या सुरक्षा समितीत कायम सदस्य असलेल्या देशाचा पाठिंबा असल्यावर, जगाच्या गळी उतरवता येतात, हे कटू सत्य आहे... लष्कर ए तयबा ही अतिरेकी संघटना आहे असे युएनने जाहीर केले आहे, तरीही त्या संघटनेचा संस्थापक व म्होरका असलेल्या हाफीज सैदला अतिरेकी असल्याचे युएनने जाहीर करण्यास चीन सतत विरोध करत आहे, यावरून काय सिद्ध होते ? जवळच्या भूतकाळातल्या अनेक युद्धांच्या अनुभवामुळे कोणत्याही महत्वाच्या देशाला जगात कुठेही चालू झालेले युद्ध नको आहे, कारण "ग्लोबल व्हिलेज" असलेल्या या जगातल्या कोणत्याही युद्धाचा सर्व जगावर दुष्प्रभाव पडतोच. त्यामुळे, सद्याच्या काळात भारताने फार मोठ्या कारणाशिवाय स्वतः युद्ध सुरू करणे "आक्रमक राष्ट्र" बनणे म्हणजे महत्वाच्या पाश्चिमात्य राष्ट्रांचा पाठिंबाही गमावणे होईल. तसे युद्ध सुरू करण्याअगोदर पाकिस्तानने "युद्धाशिवाय इतर कोणताही पर्याय बाकी ठेवला नाही" असे सिद्ध करावे लागेल. भारताने सुरु केलेल्या एकमेव बांगला देश युद्धात इंदिरा गांधीनी जवळ जवळ दीड वर्षे जगभरच्या सर्व महत्वाच्या देशांच्या नेत्यांना भेटून हेच सिद्ध करून युद्ध सुरु करण्याची पार्श्वभूमी तयार केली होती. मानसशास्त्रिय भूमिकेतून पाहिले तर, अगोदरच्या सर्वच रंगाच्या पाकिस्तानसंबंधी नरमाईच्या धोरणांच्या सवयीमुळे जनतेने काही मोठ्या अपेक्षा करणे सोडून दिले होते. सद्य सरकार कधी नव्हे ते पाकिस्तान विरुद्ध ताठर भूमिका घेत आहे हे पाहून त्याच्याकडून तडक व निर्णायक कृतीची अपेक्षा प्रमाणाबाहेर वाढली आहे. (जसे आपण वेगवेगळ्या वेळेच्या भारतिय क्रिकेट टीम्सच्या बाबतीत करत आले आहोत.) मात्र, देशाच्या सरकारला सगळे निर्णय आणि विशेषतः परदेशाशी युद्ध करण्याचे निर्णय, तात्कालीक भावना दूर ठेवून व दूरगामी विचारांती घ्यावे लागतात. सद्याच्या सरकारची पहिली दोन वर्षे "भारत शांतीचा चाहता देश आहे, तो आक्रमक कारवाया करू इच्छित नाही आणि केवळ आपल्या देशातील नागरिकांचा विकास करण्याची धडपड करत आहे." हे जगाला पटवून देण्यात गेली आहेत. त्यामुळेच, गेल्या काही महिन्यांत भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राईक्स व इतर प्रतिहल्ल्ल्यांसारख्या कारवाया गुप्त ठेवण्याची गरज हळू हळू कमी होत आहे. पण तरीही, सद्याच्या पाकिस्तानी कारवाया "भारत आक्रमक देश न ठरता युद्ध सुरू करण्याच्या" स्तरावर पोचलेल्या नाहीत. त्या तेवढ्या स्तरावर पोचल्यानंतरच युद्ध सुरू केल्यास जगातले महत्वाचे देश भारताच्या बाजूला असतील, किंवा कमीत कमी भारताच्या विरुद्ध तरी नसतील. मात्र, तो स्तर गाठण्याअगोदर, तात्कालीक सैनिकी कारवायांच्या (सर्वंकष युद्ध नव्हे) बळावर व त्याबरोबरच जागतीक मुत्सदेगीरीच्या बळावर पाकिस्तानमध्ये भारताला अनुकुल राजकीय व सामरीक बदल घडवून आणणे ही रणनीति सर्वात जास्त योग्य होईल. पाकिस्तानला धडा शिकविला पाहिजे याबद्दल आपले दुमत नाही. मात्र, ते करताना "फायदा-खर्च गुणोत्तर (बेनेफिट-कॉस्ट रेशो)" भारताच्या फायद्याचे असावे असेही मला वाटते. याच करिता, रागाच्या भरात कारवाई न करता, आपल्या बाजूच्या व आपल्या विरुद्ध असलेल्या सर्व गोष्टी जमेस धरून मगच कृती ठरवावी व ती डोळे उघडे ठेवून अमलात आणावी असे माझे मत आहे. असो. हा विषयच अनेक मतमतांतरे असावीत इतका जुनाट व किचकट आहे. तेव्हा सद्यापुरते "अॅग्री टू डिसॅग्री" या तत्वावर थांबूया. जसजसे नवीन मुद्दे/घटना/पुरावे/धागेदोरे हाती येतील तसतशी त्यावर चर्चा चालू राहीलच. ये जंग फायदेमंद तरीकेसे जितने के लिये लंबे रेसका घोडा होना जरूरी है । :)सतत रट्टे खाऊनही पाकिस्तान परतपरत आगळीक करायला धजावतो कसा? पाकिस्तानला कायमचं गप्प करायला काय करावं लागेल?वर लिहिल्याप्रमाणे..."भारतासाठी हा संघर्ष संपवणे शांती प्रस्थापित करण्यासाठी आहे" तर "भारत व अफगाणीस्तानशी संघर्ष चालू ठेवणे, हे पाकिस्तानी सैन्यासाठी त्यांची जगातली आवश्यकता कायम ठेवण्यासाठी अत्यावश्यक गोष्ट आहे." अर्थात, अश्या जीवन-मरणाच्या परिस्थितीत, जखमी झालेले व मरण समोर उभे असलेले हिंस्त्र जनावर (पक्षी : पाकिस्तानी सैन्य) अधिक हिंस्त्र बनून जीवाच्या आकांताने प्रतिहला करत राहणारच. आपल्या दर हल्ल्यासाठी हे गृहीतक न ठेवणे वस्तूस्थितीला सोडून व आत्मघातकी असेल.***************पाकिस्तानला कायमचं गप्प करायला काय करावं लागेल?यासंबंधिचे माझे विचार येथे आहेत.मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- China-Pakistan axis threatens India’s geopolitical landscapeमदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- China-Pakistan axis threatens India’s geopolitical landscape