क्रिडा जगत
क्रिकेट - २
Primary tabs
मिपाच्या नवीन आरेखनात क्रिकेटचा पहिला धागा अदृश्य झाला आहे. तो धागा शोधून त्यात प्रतिसाद लिहिला तरी मुख्य पानावर किंवा नंतरच्या पानांवर तो धागा दिसतच नाही. त्यामुळे हा नवीन धागा सुरू करीत आहे.
मिपाच्या नवीन आरेखनात क्रिकेटचा पहिला धागा अदृश्य झाला आहे. तो धागा शोधून त्यात प्रतिसाद लिहिला तरी मुख्य पानावर किंवा नंतरच्या पानांवर तो धागा दिसतच नाही. त्यामुळे हा नवीन धागा सुरू करीत आहे.
सध्या पुरूष संघाच्या तुलनेत भारतीय महिलांचा संघ चांगलाच भरात आहे. महिलांच्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला संघाने इंग्लंड, वेस्ट इंडीज व पाकिस्तानच्या महिला संघाला हरविले आहे. आज श्रीलंकेबरोबर सामना आहे.
कुंबळे विना वेस्ट इंडिज जातोयस तर सर्व जवाबदारी तुझी असे सांगणाऱ्यांची कोहलीने तोंडे बंद केली आहेत.
कोहली आणि टीम ने वेस्ट इंडिजला संपूर्ण व्हाईट वॉशच दिला असता पण थोडक्यात हुकला. त्या तिसऱ्या सामन्याचे श्रेय वेस्ट इंडिजला दिले नाही तर त्यांच्या वर अन्याय होईल.
http://www.loksatta.com/krida-news/india-tour-of-west-indies-5th-odi-fi…
विंडीजचा संघ भारताच्या तुलनेत अत्यंत दुर्बल आहे. त्यामुळे या विजयामुळे हुरळून जाण्यासारखे काहीही नाही. या मालिकेसाठी भारताने दुय्यम संघ पाठवायला पाहिजे होता.
विंडीज दुर्बल असला तरी आपला संघ कुंबळे विना गेलेला होता आणि त्याने निर्विवाद मालिका विजय मिळवला. मला फक्त एवढंच नमूद करायचं होता.
दुय्यम संघ का पाठवायला पाहिजे होता हे नाही समजलं.
कुंबळे तर लांबच राहिला, दस्तुरखुद्द कोहली, धोनी इ. नसते तरी भारत जिंकलाच असता.
इतक्या दुय्यम संघाबरोबर तगडा संघ पाठविणे योग्य नव्हते. भारत आता २०१९ च्या विश्वचषक स्पर्धेच्या दृष्टीने तयारी करीत आहे. सध्याच्या भारतीय संघात युवराज व धोनी हे दोन ३६ वर्षीय खेळाडू निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. केदार जाधव सुद्धा ३२ वर्षांचा आहे. त्यामुळे २०१९ व पुढील काळासाठी या दौर्यावर कोहली, युवराज, धवन, धोनी इ. वरीष्ठ खेळाडूंना विश्रांती देऊन त्यांच्या ऐवजी नवोदित राहुल त्रिपाठी, जलदगती गोलंदाज थंपी, श्रेयस अय्यर, करूण नायर इ. ना संधी द्यायला हवी होती. रुषभ पंत संघात असूनसुद्धा त्याला एकही सामना खेळविला नाही. निदान १-२ सामन्यात तरी धोनीला विश्रांती देऊन त्याला खेळवायला हवे होते. नवोदितांना एकदम तगड्या संघासमोर आणण्याऐवजी तुलनेने दुर्बल संघाविरूद्ध समोर आणले तर ते यशस्वी होण्याची जास्त शक्यता असते.
सहमत..!!
सध्या झिंबाब्वेचा संघ श्रीलंकेच्या दौर्यावर आहे. ५ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत झिंबाब्वेने अनपेक्षितपणे २ सामने जिंकून मालिका २-२ अशी बरोबरीत आणली आहे. अजून १ सामना शिल्लक आहे.
इंग्लंडमध्ये सुरू असलेला द. आफ्रिका वि. इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना रंगतदार अवस्थेत आहे. इंग्लंडच्या पहिल्या डावातील ४५८ धावांना आफ्रिकेने ३६१ धावा करून बर्यापैकी उत्तर दिले. आफ्रिकन गोलंदाजांच्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे आज ४ थ्या दिवशी इंग्लंडच्या दुसरा डाव २३३ धावांत संपला. आता विजयासाठी आफ्रिकेला जवळपास ९ तासात ३३१ धावा करायच्या आहेत.
दाफ्रिकेचा अवघ्या ३७ षटकांत ११९ धावांत खुर्दा! मोईन अलीचे डावांत ६ व सामन्यात १० बळी.
-गा.पै.
झिंबाब्वे श्रीलंकेत ऐतिहासिक विजयाच्या मार्गावर आहे. ५ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत २-२ अशी बरोबरी असताना आजच्या ५ व्या सामन्यात लंकेला ५० षटकांत फक्त २०३ धावांत रोखल्यानंतर झिंबाब्वेने आतापर्यंत १५ षटकांत १ बाद ९८ धावा केल्या आहेत.
भारताने नुकतेच श्रीलंकेला त्यांच्यात भूमीवर ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेत ३-० अशी धूळ चारली. भारताने प्रथमच परदेशात ३ सामन्यांच्या मालिकेतील तीनही सामने जिंकले. परदेशातील मालिकेत ३ सामने जिंकण्याची ही फक्त दुसरी वेळ. यापूर्वी १९६८ मध्ये भारताने न्यूझीलंडमध्ये न्यूझीलंडला ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेत ३-१ असे हरविले होते.
श्रीलंकेचा संघ सध्या लिंबूटिंबू अवस्थेत आहे. २०१५ पासून जयवर्धने, संगकारा व दिलशान हे ३ सुपरस्टार निवृत्त झाल्यानंतर लंकेला त्यांच्या जवळपास जाणारेसुद्धा खेळाडू मिळालेले नाहीत. अष्टपैलू मॅथ्यूज दुखापतीमुळे फक्त फलंदाजी करतो. थिसारा परेरा व कुलसेकरा जवळपास संपलेले आहेत. रंगना हेराथ निवृत्तीच्या मार्गावर आहे. त्यांच्याजागी आलेले नवीन खेळाडू साधारण आहेत. त्यामुळे श्रीलंका संघाची दारूण अवस्था आहे. उद्यापासून भारत श्रीलंकेविरूद्ध ५ एकदिवसीय सामने व १ त-२० सामना खेळणार आहे. भारत हे सर्व ६ सामने जिंकेल असा अंदाज आहे. २-३ महिन्यांपूर्वी झिंबाब्वेने श्रीलंकेला त्यांच्याच भूमीत एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत ३-२ अशी मात दिली होती. सध्या वेस्ट इंडीज व श्रीलंकेचे संघ अत्यंत वाईट अवस्थेत आहेत. २०१९ मधील विश्वचषक स्पर्धेसाठी त्यांना थेट प्रवेश न मिळता पात्रता फेरीतून प्रवेश मिळवावा लागेल असं दिसतंय.
इंग्लंड-विंडीज टेस्ट मॅच मधे तिसर्या दिवशी वेस्ट इंडिज पहिल्या डावात ४४/१ वरून पुढे दोनदा ऑल आउट होउन मॅच हरली. म्हणजे त्यांचे ९ लोक एकाच दिवसांत दोन आउट झाले असे होउ शकले असते - पण पहिल्या आणि दुसर्या डावात नाबाद राहिलेले बॅट्समेन वेगळे आहेत. म्हणजे एकूण ८ खेळाडू या एकाच दिवसांत दोनदा आउट झाले.
मी हे सुद्धा चेक करत होतो की कोणी असा नग आहे का की जो त्याच बोलर कडून परत आउट झाला - पण तसा एकही दिसला नाही Happy
एकेकाळी इंग्लंड सिरीज म्हणजे राखीव कुरण होते विंडिज वाल्यांचे - लॉइड-रिचर्ड्सच्या कप्तानपदाच्या काळात.
विंडीजचा कसोटी संघ भारतातील एखाद्या क्लब लेव्हलचा संघ झाला आहे. १९८४-८५ मध्ये विंडीजने इंग्लंडविरुद्ध ५ कसोटींच्या लागोपाठ ३ मालिकेतील १५ पैकी १४ सामने जिंकले होते. तोच देश आता अत्यंत दयनीय अवस्थेत आहे.
भारताविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेने १३ षटकांय ७३/० अशी चांगली सुरुवात केलीये.
पहिला एकदिवसीय सामना भारताने अगदी सहज जिंकला. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना चांगली सुरूवात केली होती. सुरवातीला २४.२ षटकात १ बाद १३९ इतक्या चांगल्या अवस्थेत ते होते. परंतु नंतर डाव कोसळून सर्वबाद २१६ इतक्या कमी धावसंख्येवर त्यांना समाधान मानावे लागले. भारताने आपले लक्ष्य केवळ १ गडी गमावून जेमतेम २८.५ षटकात पूर्ण केले. भारताने इतक्या दुर्बल संघाबरोबर खेळताना प्रमुख खेळाडूंना विश्रांती देऊन दुय्यम संघ खेळवायला हवा होता. ऋषभ पंत, राहुल त्रिपाठी, बेसिल थंपी अशा खेळाडूंना संधी द्यायला हवी होती.
लिंबूटिंबू श्रीलंकेविरूद्धचा कालचा सामना अचानक रंगतदार झाला. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकात फक्त २३६ धावा केल्या त्यावेळी भारत हा सामना पहिल्या सामन्याप्रमाणे अगदी सहज जिंकेल असा अंदाज होता. श्रीलंकेविरूद्ध भारताचे सामने एकतर्फी होतात. त्यामुळे श्रीलंकेची फलंदाजी पाहिलीच नाही. मध्यंतराच्या काळात पावसाने थोडासा वेळ वाया गेल्याने भारताचे लक्ष्य ४७ षटकात २३१ असे करण्यात आले.
भारताने फलंदाजी सुरू केल्यानंतर धवन व रोहीतने सलामीसाठी शतकी भागीदारी केली. नाबाद १०९ धावा असताना दनंजयाचा एक चेंडू धवनने स्वीप करायचा प्रयत्न केला. चेंडू जमिनीलगत न राहता हवेत उंच उडाला. फाईनलेगवर क्षेत्ररक्षण करीत असलेल्या अँजेलो मॅथ्यूजने चेंडूच्या दिशेने धाव घेतली व शेवटी हवेत सरळ सूर मारून एक अशक्यप्राय अप्रतिम झेल पकडला. दुखापतींनी ग्रस्त असलेल्या मॅथ्यूजने असा झेल पकडणे हे केवळ अविश्वसनीय होते. मी भारताचा डावही सुरवातीला पहात नव्हतो. मी जेव्हा बघायला लागलो तेव्हा केदार जाधव दनंजयाच्या गोलंदाजीवर त्रिफळा बाद होऊन परतत होता. तो त्याच्या षटकाचा पहिलाच चेंडू होता. रिप्ले पाहताना असे दिसले की केदार जाधव चेंडूला दिलेल्या फसव्या उंचीमुळे पूर्ण फसला व उंचीचा अजिबात अंदाज न येऊन त्रिफळा बाद झाला. नंतर आलेल्या कोहलीने पहिल्याच चेंडूवर मिडविकेटमधून चौकार मारून चांगली सुरूवात केली. पुढच्याच चेंडूवर केदार जाधवप्रमाणे कोहलीला देखील चेंडूच्या उंचीचा अंदाज आला नाही व त्याची मधली यष्टी उध्वस्त झाली. चौथ्या चेंडूवर नवीन आलेल्या पंड्याने एक धाव घेतली. पाचव्या चेंडूवर पुन्हा एकदा जाधव व कोहलीप्रमाणे राहुल देखील फसला व त्रिफळा बाद झाला. फक्त ५ चेंडूत ३ बळी आणि तिघेही त्रिफळाबाद! भारतीय फलंदाजी अचानक केविलवाणी वाटायला लागली.
आता ५ बाद झाले होते. आता धोनी आला होता व दुसरीकडे पंड्या होता. दनंजयाच्या पुढच्याच षटकात पुन्हा एकदा त्याने ऑफस्टंपच्या बाहेर चांगली उंची दिलेला चेंडू टाकला. पंड्या चेंडूवर षटकार मारण्यासाठी पुढे सरसावला. परंतु चेंडू व बॅटचा संपर्क झालाच नाही. यष्टीरक्षक डिकवेलाने कोणतीही चूक न करता पंड्याला यष्टिचित केले. नंतर आलेला अक्षर पटेल थोडावेळ टिकला. परंतु तोसुद्धा दनंजयाच्या गोलंदाजीवर पायचित झाला. भारत ७ बाद १३१ व त्यात दनंजयाचे ६ बळी. २००८ मध्ये आशिय चषक स्पर्धेत श्रीलंकेच्या अजंता मेंडिसने आपल्या कॅरम बॉलने भारतीय फलंदाजांना फसवून तब्बल ६ बळी घेऊन सामना जिंकला होता. त्याचीच पुनरावृत्ती काल होताना दिसत होती.
दुसरीकडे धोनी गंभीर चेहर्याने पडझड पाहत होता. त्याच्या जोडीला आता भुवनेश्वर कुमार आला. भारताला जिंकण्यासाठी अजून १०० धावा हव्या होता, परंतु ७ गडी बाद झाले होते. अजून २५ षटके हातात होती. त्यामुळ धावगतीची कोणतीही चिंता नव्हती. भुवनेश्वर व धोनीने कोणतेही दडपण न घेता अतिशय शांतपणे फलंदाजी करायला सुरूवात केली. अतिशय जपून खेळत शांतपणे १-२ धावा घेत लंकेच्या गोलंदाजांना निष्प्रभ करायला सुरूवात केली. जशा धावा वाढायला लागल्या तसे लंकेचे खेळाडू निराश व्हायला सुरूवात केली. शेवटी या दोघांनी नाबात १०० धावांची भागीदारी करून सामना जिंकला. धोनी ४५ धावांवर नाबाद राहिला. त्यात त्याने फक्त १ चौकार मारला. भुवनेश्वरने १ षटकार व ३ चौकार मारताना नाबाद ५३ धावा केल्या.
अचानक रंगतदार झालेला सामना बघताना मजा आली.
इतका दीर्घकाळ चालूनही शेवट पर्यंत “कधीही काहीही होऊ शकतं” असं वाटत राहिलं ह्याकरीता फक्त “दनंजय” ह्याला श्रेय ! त्यासाठीच तर तो सामन्याचा मानकरी ठरला !
विंडीजचा इंग्लंडविरुद्ध कसोटीत ऐतिहासिक विजय झाला. प्रदीर्घ कालखंडानंतर विंडीजने देशाबाहेर सामना जिंकला. विंडीजच्या ब्रेथवेटने पहिल्या डावात शतक व दुसऱ्या डावात ९५ धावा केल्या, तर शे होपने दोन्ही डावात शतक केले.
या सामन्यात इंग्लंडची गोलंदाजी अत्यंत सुमार होती, असं त्यांचा कर्णधार जो रूटने कबूल केलं. या प्रामाणिक व परखडपणाबद्दल त्याला पूर्ण गुण. या अगोदरच्या सामन्यात इंग्लंडने वेस्टिंडिजचे १९ गडी एकाच दिवशी बाद करून डावाने विजय मिळवला होता. या पार्श्वभूमीवर ही कसोटी दिमाखाने जिंकण्याबद्दल वेस्टिंडिजचं खरंच कौतुक आहे.
-गा.पै.
ब्रेथवेट व होप ने दाखविलेल्या निश्चायाबद्दल त्यांचं अभिनंदन. चला ; विंडीज आता कसोटीतही रुळू लागेल आणि आपल्याला ७० च्या दशकातली टीम लवकरच बघायला मिळेल अशी आशा !
आज दोन कसोटी सामन्यांच्या शेवटचा दिवस होता. आफ्रिकेच्या दौर्यावर असलेल्या बांगलाच्या संघाकडून फार आशा नव्हत्याच. चौथ्या डावात विजयासाठी ४२४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलाचा दुसरा डाव फक्त ९० धावात संपला.
सध्या श्रीलंका वि. पाकिस्तान कसोटी मालिका अबूधाबी येथे सुरू आहे. २००९ मध्ये पाकिस्तानमध्ये श्रीलंका संघावर झालेल्या हल्ल्यानंतर इतर देश पाकिस्तानमध्ये जात नाहीत. त्यामुळे सध्या अबूधाबी, शारजा, दुबई हेच पाकिस्तानी संघाचे घर बनले आहे. आखातातील खेळपट्ट्या भारतीय उपखंडातील बहुसंख्य खेळपट्ट्यांप्रमाणेच संथ व फिरकीला साथ देणार्या आहेत. त्यामुळे आजतगायत पाकिस्तानी संघ इथे कोणत्याही संघाकडून कसोटी सामना हरलेला नाही.
या सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना ४१९ धावा केल्या. त्यात चंडिमलच्या नाबाद १५५ धावा होत्या. पाकिस्ताननेही चांगली फलंदाजी करून ४२२ धावा करून ३ धावांची आघाडी घेतली. पाकिस्तानकडून ४ अर्धशतके झाली. परंतु कोणालाही शतक करता आले नाही. श्रीलंकेकडून रंगना हेराथने ५ बळी घेतले. चौथ्या दिवशी पाकिस्तानचा पहिला डाव संपल्यानंतर श्रीलंकेचा दुसरा डाव सुरू झाला. परंतु दुसर्या डावात श्रीलंकेची खूप पडझड झाली. चौथा दिवस संपताना श्रीलंकेचे ४ फलंदाज बाद झाले होते व धावसंख्या फक्त ६९ होती. आजच्या पाचव्या दिवशी श्रीलंकेचा उर्वरीत डाव फक्त १३८ धावांवर संपला. पाकिस्तानकडून पहिल्या डावात ३ बळी घेणार्या यासिर शाहने दुसर्या डावात ५ बळी घेतले. पाकिस्तानला विजयासाठी १३६ धावा हव्या होत्या. परंतु रंगना हेराथच्या गोलंदाजीसमोर पाकिस्तानची अवस्था ५ बाद ३६ अशी दारूण झाली. ६ वा गडी ७८ वर बाद झाल्यानंतर एकवेळ पाकिस्तान ६ बाद ९८ अशा बर्या अवस्थेत होते. विजयासाठी फक्त ३८ धावा हव्या होत्या. परंतु उर्वरीत ४ खेळाडूंना फक्त १६ धावांची भर घालता आली व पाकिस्तानचा डाव ११४ धावात संपून लंकेने २१ धावांनी विजय मिळविला. या डावात सुद्धा हेराथने ६ बळी मिळवून सामन्यात एकूण ११ बळी घेऊन आपल्या बळींची संख्या ४०० वर नेली. पाकिस्तान आखातात प्रथमच कसोटी सामना हरले.
२०१५ मध्ये भारतीय संघ श्रीलंकेच्या दौर्यावर ३ कसोटी सामन्यांसाठी गेला होता. श्रीलंकेचा पहिला डाव २०० च्या आत संपल्यावर भारताने चांगली फलंदाजी करून जवळपास २०० धावांची आघाडी घेतली. श्रीलंकेचा दुसरा डावही कोसळला होता. परंतु चंडिमलने दिडशतक झळकावून संघाला पावणेचारशे पर्यंत नेऊन विजयासाठी भारताला १७७ धावांचे लक्ष्य दिले होते. दुर्दैवाने हेराथच्या गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाजांचे काहीही चालले नाही व भारताचा डाव १४० वरच संपून श्रीलंकेने सामना जिंकला. त्या डावात हेराथने ७ बळी घेतले होते. आजच्या सामन्यातही हेराथ (सामन्यात ११ बळी) व चंडिमल पहिल्या (डावात नाबाद १५५ धावा) यांनी विजयात मोलाचा हातभार लावला.
मागील महिन्यात भारतीय संघ श्रीलंकेच्या दौर्यावर होता. त्या दौर्यात भारताने सर्व ३ कसोटी सामने, सर्व ५ एकदिवसीय सामने व एकमेव ट-२० सामना जिंकून निर्विवाद यश मिळविले होते. त्या पार्श्वभूमीवर लंकेने देशाबाहेर आखातात पाकिस्तानला धूळ चारली ही कामगिरी कौतुकास्पद आहे.
बर्याच दिवसांनंतर क्रिकेटवर लिहित आहे. जुलैपासून भारत प्रामुख्याने श्रीलंकेबरोबरच सामने खेळत आहे. मागील ५ महिन्यात श्रीलंका-भारत यांच्यात ६ कसोटी सामने, ८ एकदिवसीय सामने व २ ट-२० सामने खेळले गेले. अजून २ ट-२० सामने शिल्लक आहेत. एकाच देशाबरोबर वारंवार खेळल्याने सामने बघायचा कंटाळा येतो. त्यातून सध्याचा श्रीलंका संघ भारताच्या तुलनेत अत्यंत दुर्बल असल्याने सामने बघण्यास मजा येत नाही. भारताने या ६ पैकी ४ कसोटी सामने, ८ पैकी ७ एकदिवसीय सामने व आतापर्यंत झालेले दोन्ही ट-२० सामने जिंकले. २ कसोटी सामने अनिर्णित राहिले. श्रीलंकेला केवळ १ एकदिवसीय सामना जिंकता आले. अत्यंत एकतर्फी सामने होत असल्याने क्रिकेटमधील रस तात्पुरता कमी झाला आहे.
परंतु ही स्थिती आता बदलणार आहे. जानेवारीत भारत द. आफ्रिकेच्या दौर्यावर जाणार असून नंतर जुलैमध्ये भारत इंग्लंडच्या दौर्यावर जाणार असून वर्षाच्या शेवटी भारत ऑस्ट्रेलियात जाणार आहे. पुढील वर्षभर भारताचे सामने परदेशात असून तुल्यबळ संघांबरोबर भारत खेळणार आहे.
रणजी करंडक स्पर्धेत आज विदर्भाने बलाढ्य कर्नाटकचा केवळ ५ धावांनी पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. विदर्भाने प्रथम फलंदाजी करताना फक्त १८५ धावा केल्या होत्या. परंतु कर्नाटकला पहिल्या डावात फक्त ३०१ धावांवरच रोखण्यात विदर्भाला यश आले होते. दुसर्या डावात बर्यापैकी फलंदाजी करून विदर्भाने ३१३ धावा करून कर्नाटकला विजयासाठी १९८ धावांचे लक्ष्य ठेवले. कर्नाटकची सुरवातीला दुसर्या डावात पडझड झाली व ४० धावात ३ गडी बाद झाले. परंतु एकवेळ ३ बाद ८१ अशी बरी स्थिती असताना विदर्भाच्या गुरबानीने एकापाठोपाठ धक्के देऊन कर्नाटकची अवस्था ७ बाद १०४ अशी केली. परंतु कर्नाटकच्या तळाच्या फलंदाजांनी बर्यापैकी फलंदाजी करून संघाला विजयाच्या जवळ नेऊन ठेवले होते. ८ बाद १८९ अशी धावसंख्या असताना कर्नाटकचा विजय नक्की वाटत होता. परंतु पुन्हा एकदा गुरबानीने उत्कृष्ट गोलंदाजी करून उर्वरीत दोन फलंदाजांना बाद करून कर्नाटकचा डाव १९२ धावात संपवून जेमतेम ५ धावांनी सामना जिंकून दिला. गुरबानीने दुसर्या डावात एकूण ७ बळी घेतले.
कर्नाटकचा रणजी संघ अत्यंत बलवान आहे. २०१४ व २०१५ मध्ये विनयकुमारच्या नेतृत्वाखाली कर्नाटकने रणजी करंडक जिंकला होता. २०१६ मध्ये मुंबई व २०१७ मध्ये गुजरातने रणजी करंडकावर नाव कोरले. परंतु कर्नाटक संघाची ताकद अजिबात कमी झालेली नव्हती. कर्नाटककडे मयंक अगरवाल, करूण नायर, विनयकुमार, अभिमन्यू मिथुन, स्टुअर्ट बिन्नी, श्रीनाथ अरविंद असे तगडे खेळाडू आहे. त्या तुलनेत विदर्भ संघात फारसे परिचित खेळाडू नाहीत. थकलेला वासीम जाफर आणि वेगवान गोलंदाज उमेश यादव हेच त्यातल्या त्यात परिचित चेहरे. परंतु सांघिक खेळाच्या जोरावर जबरदस्त कामगिरी करून विदर्भाने रणजी करंडक स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच अंतिम फेरीत प्रवेश मिळविला आहे.
अंतिम फेरीत विदर्भ दिल्लीविरूद्ध खेळेल. दिल्लीकडे गौतम गंभीर, इशांत शर्मा यासारखे अनुभवी कसोटीवीर आहेत. परंतु विदर्भाच्या जिगरी खेळामुळे विदर्भ दिल्लीला चांगली झुंज देईल हे नक्की.
विदर्भाने चौथ्या दिवशी दिल्लीवर निर्णायक विजय मिळवून प्रथमच रणजी करंडक जिंकला.
अभिनंदन. आता असं म्हणू नका की देवेंद्र फडणवीसांमुळे हे झालं!!
-गा.पै.
कोणी त्या रजनीश गुर्बानी च्या हॅटट्रिक ची क्लिप टाकली नाही का अजून?
https://www.youtube.com/watch?v=IjwduIo7niA
जबरदस्त विकेट्स आहेत! तीन्ही बोल्ड. पहिला स्विंग झालाय आणि पुढे कदाचित कट सुद्धा. दुसरा पूर्ण कट वाटतो, तर तिसरा बहुधा सरळ होता पण खूप खाली राहिला. नवीन चेंडू वर फलंदाज सहसा बॉल इतका आत येइल अशी अपेक्षा करत नाहीत. (खरे म्हणजे भारतात तो सरळ लाइन सोडून इतर कोठेही जाइल याची अपेक्षा करत नाहीत :) ). कारण नवीन बॉल वर उजव्या हाताने बोलिंग करणार्याचा नॅचरल स्विंग व बोलिंग प्लॅन सुद्धा आउटस्विंगर साठी असतो. इतक्या स्लिप्स वगैरे सुरूवातीला त्याकरताच असतात. त्यात इथे आश्चर्य म्हणजे हा स्टंप च्या अगदी जवळून बोलिंग करतोय. तुम्ही इम्रान, कपिल वगैरेंचे आत येणारे बॉल्स पाहिलेत तर ते सहसा वाइड क्रीज वरून टाकत. मी काही एक्स्पर्ट नाही पण बहुधा बॉल ला स्विंग व्हायला जागा देण्याकरता थोडे बाहेरून टाकत असावेत. इथे हा आउटस्विंगर टाकणार असल्यासारखा स्टंपच्या शेजारून टाकतोय. त्यामुळेही फलंदाज गंडले असावेत.
एकूण मस्त वाटले ही बोलिंग पाहताना. रिप्ले फारसे नाहीत यात, असायला हवे होते.
+ १
गुरबानीच्या रूपात भारताला नवीन वेगवान गोलंदाज मिळायला हवा. त्याने बाद फेरीच्या तीनही सामन्यात भरपूर बळी घेऊन संघाच्या विजयात मोलाचा हातभार लावला होता.
आजपासून भारत वि. द. आफ्रिका मालिका सुरू होत आहे. भारत या दौर्यात ३ कसोटी सामने, ६ एकदिवसीय सामने व १ ट-२० सामना खेळणार आहे.
आजपासून केपटाऊन येथे पहिला कसोटी सामना सुरू झाला. आफ्रिकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. भुवनेश्वरकुमारला पहिल्या षटकापासून अचूक टप्पा सापडला आहे. प्रभावी आऊटस्विंग गोलंदाजी करीत त्याने पहिल्या ३ षटकात एकेक बळी मिळवून केवळ ५ व्या षटकात आफ्रिकेची ३ बाद १२ अशी वाईट अवस्था करून टाकली. सलामीचे एल्गर व मार्करॅम आणि नंतर आमला असे तिघेही भुवनेश्वरच्या गोलंदाजीवर बाद झाले. या वेगवान खेळपट्टीवर नाणेफेक जिंकूनही आफ्रिकेने फलंदाजीचा काहीसा आश्चर्यकारक निर्णय घेतला.
आफ्रिकेने संघात मॉर्नी मॉर्केल, रबाडा, फिलँडर आणि डेल स्टेन असे ४ वेगवान गोलंदाज घेतले आहेत. आफ्रिकेच्या मागील दौर्यात रहाणेने एका कसोटीत दोन्ही डावात शतक केले होते. रहाणे बहुतेकवेळा परदेशात चांगला खेळतो. परंतु या सामन्यात त्याचा समावेश केलेला नाही. नुकत्याच संपलेल्या श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेत रहाणे संपूर्ण अपयशी ठरला होता. परंतु त्याची परदेशातील कामगिरी चांगली आहे. रहाणेप्रमाणे इशांत शर्मा सुद्धा भारतापेक्षा परदेशात बर्यापैकी कामगिरी करतो. परंतु त्याचासुद्धा संघात समावेश नाही.
पहिल्याच सामन्याची सुरूवात सुखद झालेली आहे.
पहिल्या दिवसअखेर -
आफ्रिका सर्वबाद २८६, भारत २८/३
कोहलीची विकेट अजून पाहिली नाही पण पहिल्य दोघांनी काही गरज नसताना आपल्या विकेट्स बहाल केल्या. चिक्कार वेळ आहे या सामन्यात आणि पहिल्या काही ओव्हर्स नंतर खेळपट्टी कदाचित जास्त सोपी होईल, आफ्रिकेला झाली तशी. पण विजय व धवन दोघांनी उगाचच देउन टाकल्या विकेट्स आणि कोहलीलाही प्रेशर मधे आणले. विजय ला तीन स्लिप्स आणि गली लावली होती, बॉल आउटस्विंग होत होता. त्यात असे काही नव्हते की १२ बॉल्स मधे १२ करायचेच आहेत. तीन चार ओव्हर्स खेळून काढल्या असत्या तरी काही फरक पडला नसता. चांगला फूट भर बाहेर असलेल्या बॉल ला हात लावायला गेला.
धवन तर आयपीएल खेळत होता बहुधा. त्याला कोणीतरी सांगायला हवे की वीरू सुद्धा इतक्या लौकर पुल मारायला जात नसे.
कोहलीनेही फुकट विकेट फेकली. मॉर्नी मॉर्केलचा ऑफस्टंपच्या बराच बाहेर पडलेला आणि जवळपास बरगड्यांपर्यंत उडालेला चेंडू कोहलीने विनाकारण खेळण्याचा प्रयत्न केला व त्या प्रयत्नात यष्टीरक्षकाकडे झेल दिला.
धवन तर आयपीएल खेळत होता बहुधा. त्याला कोणीतरी सांगायला हवे की वीरू सुद्धा इतक्या लौकर पुल मारायला जात नसे.
दादाप्रमाणे वीरू सुद्धा ऑफचाच खेळाडू. हे दोघेही पुल, हूक क्वचितच मारायचे. एकदा वीरूला पुल मारताना पाहिले होते. हा त्याचा नेहमीचा फटका नसल्याने चेंडू स्क्वेअरलेगला उंच उडून झेल गेला होता. दादा तर पुल मारताना एका पायावर गोल फिरायचा.
दुस-या दिवसाखेर -
आफ्रिका २८६ व ६५/२, भारत २०९
सामन्याचा तिसरा दिवस पावसामुळे वाया गेला. सामना वाचविण्याच्या भारताच्या आशा वाढल्या आहेत.
सध्या सुरू असलेल्या सिड्नी टेस्ट मधे ऑस्ट्रेलियाच्या मार्श बंधूंनी शतकी भागीदारी व स्वतःची शतके केली. वॉ बंधूंनंतर अनेक वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाकरता अशी दोन भावांची भागीदारी झाली. मिशेल आणि शॉन मार्श - हे जेफ मार्श ची मुले. ८० च्या दशकात क्रिकेट पाहणार्यांना मार्श व बून ही जोडी लक्षात असेल, त्यातला मार्श.
मध्यंतरी एकदा न्यू झीलंड कडून एक जोडी (बहुधा जुळे होते) आणि विंडीज कडून एक असे खेळत होते. विंडीज वाले अजूनही खेळतात बहुधा. आपल्याकडे एकदा युसूफ व इरफान पठाण यांची वन डे मधे भागीदारी झाली होती हे लक्षात आहे.
>>> आपल्याकडे एकदा युसूफ व इरफान पठाण यांची वन डे मधे भागीदारी झाली होती हे लक्षात आहे.
लंकेविरूद्ध एका ट-२० सामन्यात त्यांची भागीदारी झाली होती.
बरोबर. मला असेच अंधुक लक्षात होते.
फारएन्ड,
एक निरीक्षण म्हणजे या मालिकेत इंग्लंडची गोलंदाजी भयंकर सुमार दर्जाची होती. वॉर्नर वा स्मिथने तुडवलं तर समजण्यासारखं आहे. पण मार्श बंधू व ख्वाजा यांनी शतकं ठोकून घेतली यावरून गोलंदाजी किती केविलवाणी आहे ते दिसतं.
आ.न.,
-गा.पै.
जाताजाता : फारएण्डचा फारएन्ड झालेला दिसतोय. काही खास कारण?
फारएण्ड असा माबोवर आहे. इथे पहिल्यापासून असाच आहे :). तिकडे तो बदलता आला. इथे येतो का कल्पना नाही.
मस्त सामना चाललाय. आफ्रिका १००/७. आफ्रिकेकडे आता १७७ धावांची आघाडी आहे.
आफ्रिका सर्वबाद १३०. जिंकायला २०८ हव्यात.
वृद्धिमान साहाने सामन्यात एकूण १० झेल घेतले. डेल स्टेन बहुतेक गोलंदाजी करू शकणार नाही. तरीसुद्धा २०८ धावांचं आव्हान सोपं नाही.
७१/४. काय म्हणावं आता!
-गा.पै.
वाट लागलेली आहे. भारत ८२/७.
बक्की कसोटी ऐवजी एकदिवसीय सामना खेळत असल्याचं वाटंत होतं.
-गा.पै.
या पराभवला, दारुण पराभव असे म्हणता येईल का ?
दारूण नाही म्हणता येणार कारण जलदगती गोलंदाजांना अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर आफ्रिकेच्या फलंदाजांचीही दाणादाण उडाली होती. आफ्रिकेचे गोलंदाज आपल्यापेक्षा भारी होते किंवा आफ्रिकेच्या फलंदाजीपेक्षा आपली फलंदाजी दुर्बल होती एवढेच म्हणता येईल. गोलंदाजांनी कमावून दिले होते परंतु फलंदाजांनी घालविले.
भारताची संघनिवडही फारशी बरोबर नव्हती. रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्या हे रैना व युवराज प्रमाणेच कसोटीसाठी योग्य नाहीत असे माझे मत आहे. पुढील कसोटीसाठी या दोघांना वगळून अजिंक्य रहाणे आणि लोकेश राहुल किंवा पार्थिव पटेलला आत आणावे. धवन वगळता भारताचे सर्व फलंदाज उजव्या हाताने फलंदाजी करतात. आफ्रिकेचे सर्व गोलंदाज उजव्या हाताने गोलंदाजी करीत असल्याने डावरा फलंदाज म्हणून पार्थिव पटेलचा उपयोग होईल. रहाणे देशात अपयशी ठरला असला तरी त्याची कामगिरी परदेशात उंचावते. त्यामुळे त्यालाही संधी मिळावी. अर्थात पंड्याला बाहेर काढून एक गोलंदाज कमी होतो. त्याला पर्याय म्हणून अष्टपैलू डावखोरा जडेजा आत येऊ शकेल. परंतु जडेजाची फलंदाजी कसोटीत यथातथाच आहे. त्यामुळे पंड्याला वगळून फलंदाजाला खेळविण्याची जोखीम घ्यायलाच लागणार.
केप टाऊनच्या खेळपट्टीवर पोटापर्यंत किंवा छातीपर्यंत उसळेलेले चेंडू खेळताना सर्व फलंदाजांना अवघड जात होते. पुढील दोन सामन्यात अगदी अशीच खेळपट्टी असेल याची खात्री नाही. १३ तारखेला दुसरा कसोटी सामना सेंच्युरियन मध्ये सुरू होईल व तिसरा कसोटी सामना जोहान्सबर्गमध्ये २४ तारखेला सुरू होईल.
आजपासून (भा.प्र. वेळेप्रमाणे दुपारी १:३० पासून) दुसरा कसोटी सामना सुरू होतोय. पहिल्या कसोटीत भारतीय फलंदाज पूर्ण अपयशी ठरले होते. या पार्श्वभूमीवर दुसर्या कसोटीसाठी भारत संघात काही बदल करेल का याची उत्सुकता आहे. रोहीत शर्मा आणि पंड्या हे कसोटीसाठी उपयुक्त नाहीत असे माझे मत आहे. परंतु पहिल्या कसोटीत पंड्याने अष्टपैलू कामगिरी केल्याने त्याला वगळणे अवघड वाटते. सर्वच फलंदाज अपयशी ठरल्याने कोणाला वगळायचे हे ठरविणे अवघड आहे. आफ्रिकेचे सर्व गोलंदाज उजव्या हाताने गोलंदाजी करीत असल्याने भारतीय संघात २-३ चांगले डावरे फलंदाज असल्यास फायदा होईल. डावखुरा धवन पहिल्या कसोटीत अपयशी ठरला होता. त्याच्याव्यतिरिक्त पार्थिव पटेल व जडेजा हे अजून दोन डावे फलंदाज भारतीय चमूत आहेत. जडेजाच्या डावखुर्या फिरकी गोलंदाजीचाही फायदा होऊ शकतो. माझ्या मते रोहित शर्मा, अश्विन व पंड्याला वगळून त्यांच्याऐवजी रहाणे, पार्थिव व जडेजाला संघात घेतल्यास फायदा होऊ शकेल.
न्यूझीलँडच्या दौर्यावर असलेल्या पाकिस्तानचा तिसर्या एकदिवसीय सामन्यात दारूण पराभव झाला. प्रथम फलंदाजी करताना यजमानांनी ५० षटकांत सर्वबाद २५७ धावा केल्या. पाकिस्तानचा डाव फक्त ७४ धावात संपला. एकवेळ पाकिस्तानची अवस्था ८ बाद ३२ इतकी वाईट झाली होती. ट्रेंट बोल्टने ५ बळी घेऊन पाकिस्तानी फलंदाजांचे कंबरडे मोडले.
पहिल्या दिवसाखेर आफ्रिकेने ६ बाद २६९ धावा केल्या. एकवेळ आफ्रिका २५०/३ इतक्या मजबूत अवस्थेत होते. आफ्रिकेच्या प्रत्येक बळीसाठी गोलंदाजांना घाम गाळावा लागत होता. आमला ८२ वर पोहोचला होता. त्यावेळी पंड्याने आमलाला अफलातून फेकीने धावबाद केले व नंतर लगेचच डी कॉक अश्विनच्या चेंडूवर शून्यावर बाद झाला. पुढच्याच षटकात फिलँडरही अशक्य धाव घेताना शून्यावर धावबाद झाला. त्यामुळे सामना एकदम संतुलित अवस्थेत आला.
ही खेळपट्टी खूप बाऊन्स देईल असे सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात खेळपट्टीत तितकासा बाऊन्स नाही. खेळपट्टी बरीचशी निर्जीव किंबहुना पाटा म्हणावा अशी आहे. अशा खेळपट्टीवर ५०० धावा अगदी सहज शक्य आहेत.
भारताने आज ३ बदल केले. धवन ऐवजी के एल राहुल, साहा ऐवजी पार्थिव पटेल आणि सगळ्यात धक्कादायक बदल म्हणजे भुवनेश्वर ऐवजी ईशांत शर्मा. भुवनेश्वरने पहिल्या कसोटीत पहिल्याच दिवशी ५ व्या षटकात आफ्रिकेची ३ बाद १२ अशी दाणादाण उडविली होती. पहिल्या डावात ४ व दुसर्या डावात २ बळी आणि पहिल्या डावात फलंदाजी करताना पंड्याबरोबर ९९ धावांची भागीदारी अशी अष्टपैलू कामगिरी करून सुद्धा त्याला बाहेर ठेवणे धक्खेकादायक होते. ईशांत शर्माने जरी एक बळी मिळविला तरी त्याची गोलंदाजी निष्प्रभ होती. अत्यंत सामान्य कामगिरी करूनसुद्धा ईशांत शर्मा वारंवार संघात कसा असतो हे समजत नाही. रहाणेला पुन्हा एकदा संधी मिळालेली नाही.
पार्थिव पटेल बर्याच काळानंतर संघात आला आहे. या संघातील ११ खेळाडूंमध्ये पार्थिव सगळ्यात वरीष्ठ आहे. त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरूवात २००२ मध्ये झाली होती. त्यानंतर दुसर्या क्रमांकावरचा वरीष्ठ खेळाडू म्हणजे २००७ मध्ये पदार्पण केलेला ईशांत व नंतर २००९ मध्ये पदार्पण केलेला कोहली.
दुस-या दिवसाखेर आफ्रिका सर्वबाद ३३५ व भारत १८३/५. कोहली ८५ वर नाबाद आहे. त्याच्या व्यतिरिक्त मुरली विजयच्या ४६ धावा वगळता इतर सर्व जण अपयशी ठरले.
आज ऑस्ट्रेलियाला दुहेरी धक्का बसला. १९ वर्षांखालील संघांच्या विश्वचषक स्पर्धेत आज भारताने ऑसीजना १०० धावांनी हरविले. भारत ३२८ (५० षटकात), ऑस्ट्रेलिया सर्वबाद २२८.
इंग्लंडविरूद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑसीजचा पराभव झाला. ऑस्ट्रेलिया ३०४/५, इंग्लंड ३०८/५. इंग्लंडच्या जेसन रॉयने १५१ चेंडूत १८० धावांनी जबरदस्त खेळी केली.
दुसर्या कसोटीतील पराभवाचे अजिबात आश्चर्य वाटले नाही. चौथ्या किंवा पाचव्या दिवशी पाय रोवून फलंदाजी करू शकणारे फलंदाज या संघात एकदोनच होते. त्यातला पुजारा दुसर्याही डावात निष्काळजीपणे धावबाद झाला. कोहली व मुरली विजय आदल्या दिवशीच बाद झाले होते. उर्वरीत बहुतेक सर्व फलंदाज आयपीएलच्या पात्रतेचे आहेत. त्यामुळे पराभव अटळ होता.
संघनिवड तशीही परीपूर्ण नव्हती. भुवनेश्वरला वगळण्याचा निर्णय धक्कादायक होता. रहाणे भारतात अयशस्वी ठरला होता तरी त्याचे तंत्र चांगले आहे व तो परदेशात बर्यापैकी खेळू शकतो हे सिद्ध झाले आहे. तो अधिकृतरित्या उपकर्णधार असूनसुद्धा त्याला बाहेर ठेवणे अनाकलनीय होते. रोहित शर्मा व पंड्या ऐवजी भुवनेश्वर व रहाणे असते तर फरक पडू शकला असता.
भारतीय गोलंदाजांचे मात्र कौतुक केले पाहिजे. दोन्ही कसोटी सामन्यात द. आफ्रिकेचे सर्व २० फलंदाज बाद करण्यात भारतीय गोलंदाजांना यश आले आणि तेसुद्धा मर्यादित धावा देऊन. पहिल्या दोन कसोटीतील ४ डावात आफ्रिकेची सर्वाधिक धावसंख्या आहे ३३५. म्हणजे गोलंदाजांनी आपले काम चोख बजावले. फलंदाजांनी मात्र पूर्ण निराशा केली. मुरली विजय ४ पैकी ३ डावात, धवन २ पैकी २ डावात, राहुल २ पैकी २ डावात, पुजारा सर्व ४ डावात, कोहली ४ पैकी ३ डावात, रोहित शर्मा ४ पैकी ३ डावात, पटेल २ पैकी २ डावात, साहा २ पैकी २ डावात व पंड्या ४ पैकी ३ डावात अपयशी ठरले. त्यातल्या त्यात अश्विननेच दोनवेळा ३५ चा टप्पा ओलांडला.
भारताला दोन्ही कसोटीत चौथ्या व पाचव्या दिवशी फलंदाजी करावी लागली ही गोष्ट सुद्धा लक्षात घ्यायला हवी. भारताऐवजी आफ्रिकेने शेवटी फलंदाजी केली असती तर त्यांचेही असेच हाल झाले असते.
असो. तिसरा कसोटी सामना २४ जानेवारीला सुरू होणार आहे. निदान तिसर्या कसोटी साठी तरी रोहित शर्मा, पंड्या व बुमराह ऐवजी रहाणे, भुवनेश्वर व उमेश यादवला आत आणावे. राहुलऐवजी पुन्हा एकदा धवन हा पर्याय चालू शकेल.
ऑस्ट्रेलियाने पाहुण्या इंग्लंड संघाला ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत ४-० असा चोप दिला. परंतु एकदिवसीय सामन्यांमध्ये इंग्लंडने जोरदार पुनरागमन केले आहे.
पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाचे ३०४ धावांचे आव्हान इंग्लंडने सहज पार करून विजय मिळविला. या विजयात इंग्लंडच्या जेसन रॉयच्या १५१ चेंडूतील १८० धावांच्या खेळीचा सिंहाचा वाटा होता.
दुसर्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाचे २७० धावांचे आव्हान इंग्लंडने पुन्हा एकदा सहज पार करून मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे.
न्यूझीलँडने पाहुण्या पाकिस्तानचा ५ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत ५-० असा पराभव करून निर्विवाद विजय मिळविला.
बांगलाने श्रीलंकेला पहिल्या एकदिवसीय सामन्यात पराभूत केले.
१९ वर्षांखालील खेळाडूंच्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेत भारताच्या संघाने आपले प्राथमिक फेरीतील तीनही सामने जिंकून पुढील फेरीत प्रवेश केला आहे.