Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

भिमा कोरेगाव- स्वतःकडे बघा

अ
अंतरा आनंद
Sat, 01/06/2018 - 06:53
🗣 327 प्रतिसाद
"या जय भीमवाल्यांचं काहितरी आहे", "उगाच दंगे करतात, काम करा म्हणावं त्यापेक्षा", " काहि नाही, फडणविसाची खुर्ची यांच्या डोळ्यात खुपतेय" अश्याच सुरातल्या पण संभावित प्रतिक्रिया इथे बघायला मिळत आहेत. आपल्याला कोणत्याही प्रश्नाचा विचार फक्त आपल्या जागेवरूनच करायचा आहे हे खास आहे. (१) भिमा कोरेगाव हा अभिमानाचा विषयच नाही. : मुळात चारपाच वर्षांपूर्वी हे स्मारक आणि त्याबद्द्ल कोणालाही जास्त महित नव्हते परंतू महार रेजिमेंट याला आपल्या अभिमानाचा विषय मानत होती. कोणत्याही समूहाला मग तो रेजिमेंट सारखा ऑफिशियल लढवय्या समूह असो वा जात, सार्वजनिक अभिमानाचा विषय शोधणं हे आपल्या सु-संस्कृतीचा भाग आहे, नाही का? तसंही भावनिक कढ काढण्याखेरीज काही करावं हे आपल्या सुसंस्कृत मनांना नको वाटतं. गेल्या काही वर्षात प्रत्येक समूहाने आपलं असं सार्वजनिक अभिमानस्थळ शोधून त्याचा उदो उदो करणं हे सुरू केलेलं आहे. आधुनिक विचारसरणीशी तुलना करायला गेल्यास प्रत्येक अभिमान स्थळावर प्रश्नचिन्ह उठवता येतील, पण तसं कोणी करत नाही कारण प्रत्येकामागे आंधळी झुंड असते. त्यामुळे प्रत्येक समूह, जातीगट आपल्या अभिमानस्थळाला जास्तीत जास्त ’टीआरपी" मिळ्वण्याच्या प्रयत्नात असतो, त्यातूनच मग त्या त्या गटाचं नेतृत्व उदयाला येतं. आपण एकंदरीतच समाज म्हणून विवेकी असण्यापेक्षा भावनेच्या लाटेवर हेलकावे खाणं स्वाकारतो. (१ अ) मुळात भिमा कोरेगावचं युद्ध इंग्रजांनी जिंकलंच नव्हतं: नसेलही. पण महारांना ते आपल्या पूर्वजांच्या लढवय्येपणाचचं प्रतिक वाटतंय तर वाटू द्या नं. तिथे ते शांतपणे इतके वर्षं जातायत तर काय बिघडलं? या संदर्भात तिथे जमलेल्या लोकांना विरोध म्हणून दुकानं बंद केली गेली, त्यांच्यावर दगडफेक झाली अश्या प्रकारच्या बातम्या आहेत, त्याचं काय? जमलेले लोकं काही आता जाऊन इंग्रजांना आवताण देणार नव्हते. मग अश्या प्रकारे त्यांच्या विरूद्ध जनमत तयार करणं कोणत्या संस्कृतीत बसतं? ब्राम्हण-मराठा सारख्या प्रस्थापित आणि गावपातळीवर मान असणार्‍या जातींना आपापली प्रतिकं लख्ख कराविशी वाटतात, तिथे झुंडीनं जावं वाटतं तर अजूनही मागास असलेल्या गावकुसाबाहेरच्या लोकांनी एवढा विचार करावा ही सक्ती का? (२) राजकिय अपरिहार्यता: प्रत्येक गोष्टीत राजकारण्यांना दोष देणं ही फॅशन बनली आहे. कारण ते सोप्पय. आपणही आपल्या व्यक्तीगत पातळीवर हे राजकारण पुरेपूर खेळत असतो. अश्या जाती विभागणीला, उतरंडीला समाजात मान्यता असते, प्रत्येक व्यक्तीच्या मनात ती उतरंड जागी असते म्हणूनच त्याचा फायदा राजकारणी उठवू शकतात. प्रत्येकाने व्यक्ती म्हणून आपण ही उतरंड पाळतो की नाही (मानतो की नाही असं मी म्हटलेलं नाही. कारण ’मी मानत नाही पण नाती तोडून चालत नाहीत, सवय ’, वैगेरे सुटकेचे मार्ग असतात ) हे मनाला विचारावं. खालच्याला वर येण्यासाठी व्यक्तीगत पातळीवर आपण किती आधार दिलाय हे शोधून पहावं. तसं होत नाही. मागासांच्या वागण्यातल्या विसंगती शोधून, त्यांची आधुनिकता किती बेगडी आहे ह्याकडे बोट दाखवणारे आणि त्यांना वेगळे पाडणारेच मोठ्या संख्येने असतात. (इथे या विषयावर ज्या हिरीरीने लिहीलं गेलंय त्यावरून सिद्धच होत.) "जातीने महापुरुष वाटून घेतले आहेत", असं तोंडाने म्हणायचं आणि फक्त आपल्याच जातीतल्या महापुरुषाचा उदो उदो करायचा ही दांभिकता बहुसंख्यांमध्ये असते, म्हणून तर असे अभिमानी गट तयार होतात आणि राजकारण्यांना आयतं खाद्य मिळतं. जातींनी महापुरुष वाटून घेतलेत म्हणणार्‍यांपैकी किती जणं आंबेडकर जयंती साजरी करतात? नाहीपेक्षा ती आपल्या सोसायटीत साजरी व्हावी असं किती जणांना वाटतं? उलटपक्षी कोणी करत असेल तर "ते जय भीम वाले" म्हणत आपण त्यातले नाही हे प्रकर्षाने दाखवलं जातं. मग वरील तक्रार करताना आपण दांभिकपणे वागत नाही का? किती जणांनी मुलांना राम-कृष्णासोबत बुद्धाच्या गोष्टी सांगीतल्या? किमान स्वत:तरी जाणून घेतल्या? "ही कसली मिरवणूक आहे?" असं विचारणार्‍या पहिलीतल्या मुलाला आंबेडकर- जयंतीच्या मिरवणुकीबद्द्ल "ज्यांच्यामुळे मला प्रमोशन मिळत नाहीय ना त्यांची मिरवणूक आहे" असं उत्तर माझ्या एका कलीगनं दिलं होतं. अर्धवट माहिती देऊन पुढील पिढीच्या मनात अशी विषाची पेरणी केली जाते. (३) पेशवाईत महारांना कमरेला झाडू आणि गळ्यात मडकं बांधून वावरावं लागत होतं हे खरं नाही तसा कागदोपत्री पुरावा नाही:- पलीकडल्या संस्थळावरच्या विद्वान (हे उपहासाने म्हटलेलं नाही, आदर खरा आहे) इतिहाससंशोधकांनी तिथे "याला कागदोपत्री पुरावा कुठेय?" असं विचारलं आणि अर्धवट शहाणे पैलवान इथेही ते विचारत सुटलेत. महार इतके महत्वाचे होते का की त्यासाठी एक कागदी फर्मान सुटेल? कोतवालाला तोंडी आदेश दिले असणं ही शक्य आहे ना? हे ही शक्य आहे की सैन्यात मानाच्या ठिकाणी असलेल्यांना यातून सूट असेल पण सर्वसामान्य महारांना हे लागू असेल. मग ते फक्त सामान्य महारांना लागू होतं म्हणत त्याचं समर्थन करता का? झाडू-गाडगं नसेलही पण "बाजू हो शिवशील, सावली पडली तर विटाळ होईल" हे उद्गार तरी महारांसाठी निघत होतेच ना? मग त्याचं समर्थन करताय का? किती वर्षं हे ऐकावं लागत होतं? अजूनही कुठेतरी लागत असेल. कोपर्‍यातल्या कपात वरून पडलेला चा पिणारी म्हारीण तर आता आतापर्यंत साहित्याचा भाग होतीच ना. ती काय सर्वस्वी काल्पनिक होती? बरं धरून चालू की हे झाडू-गाडगं प्रकरण खोटं होतं. पण महारांना किती गावात मानाचं स्थान होतं? इथे आपण किती गावच्या मातीतले आहोत हे दाखवण्याची होड लागलेली असते, त्यांना हे गावाचं वास्तव माहित नाही का? आताही त्यांना दिला जाणारा मान किती मनापासून येतो? वेळ येताच "गेले आपल्या जातीवर", "हे असंच अन्कल्चर्ड वागणार", "माजलेत" अशी मुक्ताफळं उधळली जात नाहीत का? आणि "माजलेत, पायरी सोडताय" म्हणत हत्याही घडवल्या जातातच ना? (४) आरक्षण म्हणजे फुकटचंबूपणा : आरक्षण लागू केल्यावर द्णादण सगळ्या महारांनी आरक्षणाचा लाभ घ्यावा एवढं शिक्षण त्यांच्याकडे होतं का? आरक्षण घेतलेली पहिली पिढी आता कुठे रिटायर होतेय. पिढ्यापिढ्या शिक्षण, मानाचं जगणं नाकारलं गेलेली, स्वत:ची जमीन नसलेली अशी जमात आता कुठे प्रवाहात येऊ लागलीय तर फुकटचंबूपणा दिसतो. मग ब्राम्हणांनाही आरक्षण हवं म्हणत ब्राम्हण मेळावे का भरवता? आमचे पूर्वज कसे वेदशास्त्रसंपन्न होते म्हणत अभिमान मिरवता त्याच पूर्वजांचा (त्यावेळची जनरीत म्हणून का होईना) काहीजणांना जन्मावर आधारीत उपेक्षेची वागणूक देण्यात सहभाग होताच म्हणून लाजही वाटून घ्यावी का वाटत नाही? यालाच दांभिकपणा म्हणतात. (५) दलितांच्या आंदोलनात नासधूस जाळपोळ होतेच:- इतर आंदोलनात होत नाही का?. स्वघोषित सैनिक काय पुष्पवृष्टी करत आंदोलनं करतात का? जाळपोळीचं समर्थन नाही पण ठराविक समाजाला दोष का देता? रिकामटेकडे आणि समाजकंटक ही नासधूस करतात आणि प्रत्येक आंदोलनात थोडफार होतंच. ते होऊ नये तर ठाम कायद्याचं राज्य हवं (मग त्या राज्यात झुंडीने प्रार्थनास्थळ पाडता येईल का हो? ती सूट द्यायला हवी नाही का? किमान गोमाताचोरांना देहदंड देण्याची गोमातेच्या सुपुत्रांची गुंडगिरी क्षम्य मानायला हवी नाही का? ) (६) प्रकाश आंबेडकरांनी याचा राजकीय लाभ उठवला / त्यांनी चिघळवलं: इथे एवढ्या लिंका फेकल्या गेल्या आहेत. त्यात ही एक ही वाचून पहावी. प्रकाश आंबेडकरांचा ३१ डिसेंबरला प्रकाशित झालेला लेख आहे. त्यात त्यांनी ह्या विजयस्तंभाबद्द्लची मांडणी भावनिक आहे असं म्हटलय. त्यांची मांडणी पोलोटिकली करेक्ट असण्यापेक्शा लॉजिकली करेक्ट असते म्हणूनच निवडणुकीच्या राजकारणात त्यांना स्थान निर्माण करता येत नाही. प्रकाश आंबेडकरांची राजकीय ताकद ती काय आणि अशी आंदोलनं ते करतातच कशी काय? असा एक सुज्ञ प्रश्न आहे. म्हणजे? जे निवडून येऊ शकतात त्यांना अशी हिंसक आंदोलनं करण्याचा फुकट परवाना मिळतो? जे निवडून येत नाहीत त्यांची अशी काही बाजू नसतेच? आंबेडकरांनी हिंसक आंदोलन करा असं म्हटलं होतं का? कोणाला जमवलेल्या जमावावर नियंत्रण ठेवता येतं? (ठेवता आलं असतं तर बाबरी मशीद पाडली गेली नसती. का ती नियंत्रणाखाली जाणून बुजून घडवलेली घटना होती?) (७) दरवर्षी एवढे लोक येत नाहीत यावेळेला मुदाम जमवून दंगल माजवली : एवढी माणसं काय एकदम आकाशातून अवतरली का? ही माणसं एवढ्या मोठ्या संख्येनं येणार याची गृहखात्याला खबर लागत नाही का? [२०० वर्षापूर्वीच्या लढाई बद्द्ल : (१) पेशवे हरले नाहीत त्यांनी गनिमी कावा वापरला (२) इंग्रज हरले पण त्यांनी स्तंभ उभारला (३) इंग्रज जिंकले पण त्यांचं खूप नुकसान झालं इतके किमान पर्याय संभवतात तेवढ्याच जुन्या झाडू गाडगं प्रथेबद्द्ल (१) ती होती (२) नव्ह्ती इतके किमान पर्याय संभवतात मात्र राम होताच आणि तो अयोध्येत विवक्षित ठिकाणीच जन्मला हे ठामपणे सांगीतलं जातं, जणू रामजन्मानंतर घुगर्‍या वाटायचं काम कौसल्यामातेनं यांच्याकडेच सोपवलेलं होतं. ] एखादं उभ असलेलं स्ट्र्क्चर झुंडशाहीने पाडून आर्थिक विकासाकडे वाटचाल करणार्‍या भारतीय समाजाला थेट पुराणकाळात नेऊन दोन दंगलखोर बनविणार्‍या, "खतरेमें" ची हूल देत हिंदू समाजाला गेल्या दशकांपर्यंत आणि अजूनही वेठीला धरणार्‍यांबद्द्ल प्रेम असणार्‍यांनी दोन दिवसातल्या आर्थिक नुकसानीबद्द्ल गळे काढावे हा शुद्ध दांभिकपणा नाही का? हे सर्व या संस्थळावर आलेल्या प्रतिक्रियांबद्द्ल आहे. त्या प्रतिक्रिया बघताना एक लक्षात आलं की मुळात एखाद्या ठिकाणी जमाव मोठ्या संख्येनं येतो त्यावर दगडफेक होते, दुकानं बंद ठेवली जातात, त्यांच्याविरोधात वातावरण तयार केलं जातं, या मूळ मुद्द्यावर कोणीही बोलत नाहीय. जणू काही ते चुकीचं स्मारक पुजताहेत म्हणोन त्यांनी दगड खायलाच हवेत. खरंतर "याच लोकांनी दगड आणून आजूबाजूच्या घरातून साठवून ठेवले असतील आम्हाला मारा म्ह्णून", एवढंच सरळसोट म्हणायचं बाकी राहिलं आहे. हे असतं आपल्याला हवं तेच बघण्याचं आणि सांगण्याचं टेक्निक. पिढ्यानपिढ्याच्या सुसंस्कृतपणाचा अभिमान आणि नव्या युगाचं शिक्षण हे यासाठी छानपैकी वापरता येतं. ’बाबासाहेबांना आम्ही मानतो पण हे आहेत का कोणी तसे?" असं सर्रास म्हणणार्‍या किती जणांमध्ये त्यांच्या त्यांच्या जातीच्या महापुरुषाचे गुण १०% तरी आहेत? अरे ही गावकुसाबाहेर ठेवलेली माणसं आता प्रवाहात येतायत. आता जगणं शिकलेली ही नवीन पिढी ही आधीच्या पिढीचा अशिक्षित वा अर्धशिक्षितपणा, एकंदरीत जगण्यात वाढलेली स्पर्धा, स्त्री-पुरूष समानता, गावाकड्ची आपली माणसं आणि नवीन सुशिक्षित समाजात वावरताना आजूबाजूला गोळा केलेली माणसं यांच्यात वावरण्याचा तोल सावरणे, आपल्या पूर्वज-काळात फारसं अभिमानास्पद काही नाही किंवा जे आहे असं आपण मानतो त्याला समाज मान देत नाही अश्या अनेक पातळ्यांवर लढत असते. संपन्नतेची सुखं उपभोगतानाही स्वप्निल सोनावणे, नितीन आगे सारखी प्रकरण त्यांना आपण आजूनही गावकुसाबाहेरच आहोत याचं वेदनादायक भान आणून देतात, सैरभैर करून सोडतात. व्यक्तिगत पातळीवर छोटे मोठे संभावित अपमान आणि "तुम्ही ते काय!" च्या नजरा असतातच. मास्लोच्या पहिल्या पायरीवरून आताच वर चढलेल्या या लोकांनी थेट चौथ्यापातळीवरचा विचार करावा अशी अपेक्षा बाळगत समाज यांच्याकडे (१) आरक्षणाच्या कुबड्या घेतलेले हे लोक (२) संस्कार आहेत का यांच्याकडे (३) मी म्हटलं बाकी कोणीही आण नवरा/नवरी म्हणून पण जय भीमवाला/वाली नको बाई (४) अच्छा तू *** आहेस? वाटत नाही हे असे अनेक खडे येता जाता फेकत असतो आणि त्यांचेच दगड होऊन अश्या आंदोलनातून समाजाकडे भिरकावले जातात. तेव्हा हे असे खडे आपल्याकडून भिरकावले जाणार नाही याची प्रत्येकाने वैयक्तिकरित्या दक्षता घेतली तरी हे असे भडके उडण्याला थोडाबहुत आळा बसेल. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापटांनी या स्मारकाला भेट देऊन तिथल्या व्यवस्थेसाठी बैठक घेतली एवढंच फेबुवर पोस्ट केलं. त्या पोस्टवर एवढ्या विखारी प्रतिक्रिया आल्यात की हेच का ते सामान्य मध्यमवर्गीय आणि हाच काय तो ब्राम्हणी सुसंकृतपणा, अशी शंका येते. ( कुंभमेळ्यासाठी दुष्काळातही गोदावरीत पाणी ओतलं तेव्हा ते नाही खटकलं या लोकांना.) हाच मानभावी सुसंस्कृतपणा या मागासवर्गीय शहरी लोकांना पदोपदी भेटत असतो (गावच्यांचे प्रश्न आजून वेगळे.) आणि त्या घाणीत पाय बरबटू न देता त्यांना स्वतःचं जगणं अजून चांगलं करायचं असतं. इथे दणादण प्रतिक्रिया देण्याएवढं सोपे नसतं ते एवढ भान तरी ठेवावं. आपल्याला समाजात मान आहे, आपलया प्रतिकांना ही अखील समाजाची प्रतिकं म्हणून मान मिळतो पर्यायाने आपल्याला मान मिळतो तरिही लहानपणी आपल्याला "बामण भट कढी आंबट" म्हणून चिडवत होते हे शल्य जाणवतं तर आपल्याला मानच नाही आपले आई वडील केवळ जन्माने वरच्या जातीतला म्हणून छोट्या वयाच्या व्यक्तीलाही मान देतात, हात जोडतात (हे आता आता पर्यंत उत्तर, मध्यप्रदेशात होतं की नाही? अजूनही असेल) हे बघताना त्या जातीच्या मुलांना वेदना होत नसतील का? जिथे तिथे आपली लायकी काढली जाते आपल्याला कमी लेखलं जातं हे स्वीकारून आत्मसन्मान कसा जपत असतील ते? पूर्वंजांच्या चार कथा उचलून निरूपणं करत बसण्याएवढं साधं नाही ते. सफाईकामात अजूनही ठराविक जातीला अघोषित आरक्षण आहे, जाता का हिरीरीने तिथे आरक्षण नको म्हणत? सवर्णांना चांगलं बोलण, वाचणं बाळकडू घरात मिळालेलं असतं. ५० च्या दशकातल्या बहुसंख्य आरक्षितांना ते मिळालं होतं का? पण उच्चारावरून लिहीण्यावरून , वागण्या बोलण्यातल्या रांगडेपणावरून त्यांना खुसूखुसू हसताना ते हे कुठून शिकतील हे भान असतं का? कुणी उच्च्पदस्थ वा परदेशस्थ नातेवाईक, उच्चविद्याविभुषित परिचितांचं मार्ग दर्शन, आईवडिलांनी साठवलेला पैसा, मिळवलेलं ज्ञान या कुठल्याच कुबड्या आपण नाही वापरल्या का? मग ज्यांच्या अगदी एखादया पिढीपलीकडल्या पूर्वजांनी भिका मागत पोटं भरली (ज्याला जोदार असं गोंडस नाव दिलं गेलं होतं.) त्यांनी एखादी कुबडी वापरली तर त्यांना चोर म्हणावं वाटतं? त्या कुबड्याच आहेत हे वैयक्तिक पातळीवर प्रत्येकाला माहित असतं पण "ते जय-भीमवाले " असं म्हणत त्यांना आपण "घेट्टोत" ढकलतो. त्या कुबड्या पुढच्या पिढीला वापराव्याश्या वाटू नयेत असं समाज म्हणून आपण काय करतो? आरक्षणाविरूद्ध इथे गळे काढले जातात मग मेडिकलच्या सीटस जातीची खोटी प्रमाणपत्र देऊन मिळवल्याचं प्रकरण उघडकीला आलं होतं त्याचा निषेध किती जणांनी केला या संस्थळावर? मनोमन तरी किती जणांना वाटलं हे चुकीचं झालं म्हणून? एखादा मागासवर्गीय जनरल जागेसाठी अर्ज करू लागला की "आले हे. स्वत:च्या राखीव जागेतूनच करायचा ना अर्ज, इथेपण यांना हवं" अशी बरोबर उलटी भुमिका घेतली जात नाही का? अश्यावेळी तो माणूस स्वत:ला आजमावण्याचं धाडस कसं करेल याचा विचार अश्या पिंका टाकताना केला जातो का? समाज म्हणून ते नाही तर सवर्ण किती मागासलेले आहेत हेच यातून दिसतंय. आता खरंतर भिमा-कोरेगाव प्रकरणीत ग्रामस्थांनी परस्पर सहकार्याची भुमिका घेतल्याच्या बातम्या आहेत. चूक कोणाचीही असो असं पुन्हा होणार नाही अशी भाषा दोन्ही बाजूकडून झाली आणि ते ही कोणत्याही प्रस्थापित राजकारण्यांच्या नाक खुपसण्याला वाव न देता. ही खूप आशेची गोष्ट आहे. कदाचित इथल्या मंडळीसारखी जानवं या खांद्यावरून त्या खांद्यावर करत सव्यापसव्याला कसरत म्हणण्याची कला त्यांना अवगत नसावी. दोन गटात फूट पडणे हे आपल्या जगणं कठीण होण्याशी थेट निगडीत आहे, याचं गावकर्‍यांना लवकर भान आलं असावं. पण ते झालं हे खरच चांगलं, समुद्रमंथनातून विषाबरोबर अमृतही निघतं हा दिलासा देणारं आहे. या संस्थळावर मात्र शहाण्यांनी विषाचा प्यालाच दाखवत जो काही एकांगी हैदोस घातलाय तो बघता या समाजातलं असल्याची लाज वाटावी. सार्वजनिक ठिकाणी तुम्ही एवढे विष ओकू शकता तर खाजगीत किती विषमय असाल? असो, अश्या बाबतीत यापुढे तरी विवेकाने विचार मांडावा (जमल्यास करावा) एवढीच अपेक्षा. राजकारणी, ब्रिटीश, संघटना या कोणालाही नावं ठेवण्याआधी प्रत्येकाने माझ्याकडून जे मांडलं जातय त्यात तथ्य किती आणि कांगावा किती याचा डोकं स्थिर ठेवून विचार केला तरी अश्या घटना टळायला मदतच होईल. शेवटी समाज म्हणून सगळ्यांनाच पुढे जायचय.

प्रतिक्रिया द्या
122881 वाचन

💬 प्रतिसाद (327)
इ
इरसाल Mon, 01/08/2018 - 18:25 नवीन
२८ जानेवारी पुन्हा १ जानेवारी नाही झाली म्हणजे मिळवली.
  • Log in or register to post comments
प
पगला गजोधर Tue, 01/09/2018 - 07:26 नवीन
प्लॉउजिबल डिनायेबिलिटी Plausible deniability is the ability of people (typically senior officials in a formal or informal chain of command) to deny knowledge of or responsibility for any damnable actions committed by others in an organizational hierarchy because of a lack of evidence that can confirm their participation, even if they were personally involved in or at least willfully ignorant of the actions. In the case that illegal or otherwise disreputable and unpopular activities become public, high-ranking officials may deny any awareness of such acts to insulate themselves and shift blame onto the agents who carried out the acts, as they are confident that their doubters will be unable to prove otherwise. The lack of evidence to the contrary ostensibly makes the denial plausible, that is, credible, although sometimes it merely makes it unactionable. The term typically implies forethought, such as intentionally setting up the conditions to plausibly avoid responsibility for one's (future) actions or knowledge. In some organizations, legal doctrines such as command responsibility exist to hold major parties responsible for the actions of subordinates involved in heinous acts and nullify any legal protection that their denial of involvement would carry. तर लोकहो "प्लॉउजिबल डिनायेबिलिटी " यामधे एका संघटनेचा हातखंडा आहे. उदा. १ महात्मा गांधी हत्या ... हत्यारा आमची संघटना सोडून गेलेला, त्याचा आमचा संबंध नाही. . . . लेटेस्ट उदा.. राजस्थानात एका व्यक्तीने मुस्लिम मजुरांची हत्या करून जाळलं , स्वतः रेक्कॉर्ड केलं .. धमक्या दिल्या रेकॉर्डिंग मध्ये ...... तो माथेफिरू आहे त्याचा आमचा संबंध नाही. . त्याच प्रमाणे कोरेगाव भीमा प्रकरणातले एक पुज्यनीय व्यक्तिमत्व, ज्यांच्या आदेशाने पंप्र त्यांना भेटायला याय्चे.... त्या व्यक्ती संधर्भात कदाचित असे ऐकू येईल "आमची संघटना सोडून गेले, त्यांचा आमचा संबंध नाही"
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ Tue, 01/09/2018 - 08:07 नवीन
त्याच प्रमाणे कोरेगाव भीमा प्रकरणातले एक पुज्यनीय व्यक्तिमत्व, ज्यांच्या आदेशाने पंप्र त्यांना भेटायला याय्चे.... त्या व्यक्ती संधर्भात कदाचित असे ऐकू येईल "आमची संघटना सोडून गेले, त्यांचा आमचा संबंध नाही" << कोरेगाव भीमा दंगलप्रकरणी संभाजी भिडे गुरुजींवर तुम्ही हे जे बेधडक आरोप करताय , त्याचे पुरावे असतीलच तुमच्याकडे ?
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Tue, 01/09/2018 - 08:24 नवीन
ते म्हणतायत एव्हढा पुरावा पुरेसा नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२
प
पगला गजोधर Tue, 01/09/2018 - 10:03 नवीन
वरील प्रतिसाद plausible deniability वर आहे... जमल्यास खालील लेख वाचा "भीमा-कोरेगावचे खरे गुन्हेगार" -निखिल वागले http://www.aksharnama.com/client/article_detail/1669
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
श
शलभ Tue, 01/09/2018 - 11:16 नवीन
निखिल वागले
:D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
प
प्रसाद_१९८२ Tue, 01/09/2018 - 11:41 नवीन
"भीमा-कोरेगावचे खरे गुन्हेगार" -निखिल वागले == == वागळ्याचे ब्राह्मण प्रेम तर सर्वशृत आहे. त्याने तर तुमच्या पुढे जाऊन संभाजी भिडे गुरुजींना दहशतवादी म्हटलेय लेखात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
व
विशुमित Tue, 01/09/2018 - 11:47 नवीन
पुरावे मागण्यापेक्षा हडपसर, फुरसुंगी, मांजरी बुद्रुक, वाघोली, सनसवाडी, लोणी या भागातील कथीत हिंदू रक्षक यांच लोण कोणी आणि कसे पसरवले आहे याची माहिती मिळवू शकत असाल पहा. त्यांच्या कामाचा देखील आढावा घ्या. रच्याक मनोहर भिडे (साॅरी ऋषीतुल्य संभाजी? भिडे गुरुजी) यांच्या मोहिमेत कधी सहभागी झाले आहात का? 99% सांगतो तुमचे उत्तर नाही असणार जे तुम्ही कधी कबूल करणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२
प
पगला गजोधर Tue, 01/09/2018 - 12:10 नवीन
मनोहर भिडे (सबनीस), यांचे 'संभाजी' नामांतर कसे झाले बुवा ? कोणास काही आयडिया ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
M
mayu4u Tue, 01/09/2018 - 12:37 नवीन
... मी सहभागी झालेलो नाही, त्यामुळे तिथं नक्की काय चालतं ठाऊक नाही. विशुमित, तुम्ही याविषयी लिहाच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Tue, 01/09/2018 - 12:53 नवीन
तुम्हाला सगळे रेडीमेडच पाहिजे असतं असं माझं निरिक्षण आहे. पुढची मोहीम कधी आहे याची माहिती करून घ्या. आज शक्य नाही पण उद्या लिहण्याचा प्रयत्न करतो. पण लगेच मागे लागू नका उद्या मला इतर ही कामे असतात. (कृपया हा घ्या)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mayu4u
M
mayu4u Wed, 01/10/2018 - 05:37 नवीन
तुमचं निरीक्षण बरोबर आहे, पण त्यातून तुम्ही काढलेला निष्कर्ष चुकीचा आहे. मला तुमचा अनुभव वाचायचा होता/आहे. मोहिमेत स्वतः सहभागी होणं शक्य नाहीये. कामं मलाही असतात ना. तुमच्या मागे लागत नाहीये, पण तुम्हाला बरीच कामं असल्याने ते पुरावे देणं पण बाकी राहिलंय ना, तस हे पण राहून जाऊ नये असं वाटतं. भिड्यांविषयी आणि त्यांच्या मोहिमे विषयी तरी तुमच्याकडे काही माहिती असेल असं वाटतंय, जमलं तर शेअर करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
अ
अनुप ढेरे Tue, 01/09/2018 - 16:46 नवीन
बाकी भिडे गुरुजींनी संभाजी नाव घेतलेलं पाहून अनेकांना अपचन झालेलं दिस्तय :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Tue, 01/09/2018 - 12:45 नवीन
भिमा कोरेगाव प्रकरणात मिपावरचे आघाडीचे (युती म्हणा हवे तर) संपूर्ण ऊर्जा मनोहर भिडे या ऋषीतुल्य सद्गृहस्थचा(?) बचाव करण्यासाठी खर्च करत आहेत. या मागे कारण कोणते आहे हे फक्त समजत नाही. असो. पण यापैकी कोणीही स्वतः किंवा आपली अपत्य त्यांच्या मोहिमेत कधीही सहभागी झाले नसणार हे 99% खात्री ने सांगतो.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ Tue, 01/09/2018 - 13:25 नवीन
श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेतर्फे आयोजीत 'धारातीर्थ यात्रा' या मोहिमेत मी दोन वेळा भाग घेतलाय. व मीच काय असे कित्येक लोक आहेत ज्यांनी गुरुजींच्या मोहिमेत भाग घेतला आहे व आज त्यांचा बचाव करत आहेत अगदी सातरच्या तथाकथित महाराजांपर्यंत. == आता तुमच्या मते ह्या मोहिमेत नक्की काय देश विघातक पढवले/शिकवले जाते ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
अ
अमर विश्वास Tue, 01/09/2018 - 13:03 नवीन
विशुमित संभाजी भिडे गुरुजींना मी भेटलो आहे .. त्यांचे विचार ऐकले आहेत बोला काय म्हणणं आहे तुमचं ?
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Tue, 01/09/2018 - 14:10 नवीन
लोकहो,
तर लोकहो "प्लॉउजिबल डिनायेबिलिटी " यामधे एका संघटनेचा हातखंडा आहे.
हिंदूंचं देऊळ अपवित्र करणारा जर एका विशिष्ट समुदायाचा असेल तर लगेच तो मंदबुद्धी ठरवला जातो, याची आठवण झाली. तर लोकहो "प्लॉउजिबल डिनायेबिलिटी " यामधे एका समुदायाचा हातखंडा आहे. आठवण जागवल्याबद्दल पगला गजोधर यांना धन्यवाद. अरे हां, यावरून तो दाढी आणि पगडी घालणारा आसामवासी पंतप्रधान पण आठवला. कोळसा, खाणी वगैरेंचा लक्षकोट्यावधी रुपयांचा घोटाळा ह्याच्या नाकाखाली झाला आणि याला म्हणे चाहूल लागलीच नाही. आजूनही स्वच्छ म्हणून मिरवतो. तर लोकहो "प्लॉउजिबल डिनायेबिलिटी " यामधे काँग्रेस नामे एका राजकीय पक्षाचा हातखंडा आहे. आठवण जागवल्याबद्दल पगला गजोधर यांना धन्यवाद. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
र
राही Tue, 01/09/2018 - 18:34 नवीन
अंतरा आनंद, लेखातला समजूतदारपणा आवडला. इथले त्याच त्याच ठराविक आय्डींचे आक्रमक, एकारलेले प्रचारात्मक प्रतिसाद तुम्हाला परिचयाचे आणि अपेक्षित असणारच. तरीही तुम्ही लेख इथे प्रकाशित केला आहे. आवडले.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Tue, 01/09/2018 - 21:58 नवीन
राही, २०० वर्षांपूर्वीचा तथाकथित अन्यायास आज वाचा फोडली गेलेली समर्थनीय असते. मग त्याच धर्तीवर गेले १३००+ वर्षं हिंदूंवर हिंदूद्वेष्ट्यांकडून अत्याचार होताहेत त्यांच्याविरुद्ध आम्ही जरासुद्धा ब्र उच्चारायचा नाही म्हणता? आम्हांस देखील समजून घ्या ना. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
स
सुखीमाणूस Wed, 01/10/2018 - 03:12 नवीन
की हा लेख सुन्दर लिहिला असला तरी पुर्ण पणे फक्तं ब्राम्हन्णाना दोषी ठरवण्याचा अजेंडा राबविणारा आहे. पददलित लोकांवर जे अन्याय झाले ते फक्त ब्राम्हणानी केले असे चित्र गेली कित्येक वर्षे उभे केले जाते आहे. प्रत्यक्षात सर्व जाती व्यवस्थित जातीयता पाळतात. फक्त जानवे घालणारे जो तथाकथित अन्याय करतात त्यावर बोलणे झाले आहे पण त्याशिवाय ज्या असंख्य दलितेतर जाती आहेत त्याना मात्र लेखिकेने सुट दिली आहे. जात पंचायत हा प्रकार जातीव्यवस्थेला खतपाणी घालतो. आपापल्या जातींची नावे गाड्यान्वर लिहून जात मिरवली जाते. पण त्यावर काहीच भाष्य होताना दिसत नाहीय. उलट या लेखामुळे असे प्रतित होत आहे की फक्त ब्राम्हण जातीयवादी आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
प
पगला गजोधर Wed, 01/10/2018 - 03:47 नवीन
अत्यंत विनम्रपणे आपणास कथन करू इच्छितो... जेव्हा जेव्हा जातीव्यवस्था वर्णद्वेष याबाबत "मनुस्मृती समर्थक" विचारसरणी वर टीका केली जाते किंवा सध्याच्या भारतातील मनुस्मृतीच्या अजेंडा उघड/छुपा राबविणाऱ्या संघटनेविरुद्ध काहीही लिहिले जाते, तेव्हा मनुवादी लोकं अलगदपणे तो रोख/ती टीका, ही जणू ब्रह्मणांवरच केली आहे, असा त्याला स्पिन देतात. जातीची उतरंड मानणारे कोणीही, हे मनुवादीच.... त्यांच्या विरुद्ध हा लेख आहे....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुखीमाणूस
प
पगला गजोधर Wed, 01/10/2018 - 04:03 नवीन
याचे माझ्याबाबतीतील उदाहरण म्हणजे... १.डी एस कुलकर्णी यांच्या कथित फसवणुकीच्या लेखात, जेव्हा रोख त्यांच्या जातिकडे वळला, तेव्हा मी तिथे "धर्म जात गुन्हेगाराला नसते, त्यामुळे जातीवाचक आरोप होऊ नये " असे आवाहन केलेले.. २.बाजीराव मस्तानी संदर्भातील एका लेखात, बाजीराव हा शूर लिबरल व पुरोगामीच होता अश्या अर्थाचे (च भु दे घे) कथन केलेलं, ( सौन्दर्य व रणातील शौर्य पाहून प्रेम केले, जात पाहून नव्हे, पुढे लग्न ही केले, पुढील उदरनिर्वाहाची तजवीज केली, हे सर्व अत्यंत कठोर मनुवादी विरोध झेलून...) पण कंसाय मिपा वरील काही मनुवादी चाणक्य (इथे 'चाणक्य' धूर्त या अर्थी, जातीवाचक नव्हे) मी खडे मारतो, एका विशिष्ठ जाती विरोधात लिहितो, असा अप प्रचार सर्रासपणे करताना आढळेल, त्यांच्या प्रतिक्रियेवर मला मग प्रतिक्रिया द्यावी लागते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
प
पगला गजोधर Wed, 01/10/2018 - 04:48 नवीन
आणि माझ्या मिपावरील प्रतिक्रिया जर आपण काळजीपूर्वक पाहिल्या तर् बहुतांशी मी पंडित नेहरूंना (ते काश्मीरी ब्राह्मण असूनही) त्यांच्या आधुनिक पुरोगामी दृष्टीची, प्रशंसा केलीय...ती ते ब्राम्हण असल्यामुळे नाही. प्रशंसा इतकी की एका लेखावर त्यांना १०० पैकी १०० गुण दिलेत... तर दुसऱ्या एका पंप्र ची भरपूर टीका केलीये (ते ब्राम्हण नसूनही, कारण त्यांची विचारसरणी मला मनुवादी वाटते म्हणून) त्यांना तर मी -२० गुण दिलेत, त्यामुळे त्यांचे भक्त प्रशंसक, नेहमीच माझ्यावर ब्राम्हण विरोधी ठपका ठेवायची संधी सोडत असावेत...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
अ
अनुप ढेरे Wed, 01/10/2018 - 05:44 नवीन
हा लेख छान आहे. http://mdramteke.blogspot.in/2018/01/blog-post_5.html
आर.एस.एस. हा संविधान विरोधी आहे म्हणून प्रचार करणारे आंबेडकर ज्यांच्या सोबतीने जात आहेत ते कमुनिस्ट तर देश ही संकल्पनाच मान्य करीत नाहीत. त्यांच्या मते तर जागतीक कामगार हाच देश असतो. मग त्या निकषावर भारत देश जागतीक कामगार असा बनताना सर्वात आधी संविधान पेटविले जाईल त्याचं काय? दुसरा मुद्दा कमुनिस्टांना देशात कामगारांची हुकूमशाही हवी आहे... लाल सलाम म्हणतांना कामगारांची हुकूमशाही हा कायमच त्यांचा अजेंडा राहिला आहे. मग ही कामगारांची हुकूमशाही प्रकाश आंबेडकरांना चालणार आहे का? नसेल तर मग कमुनिस्टांना आंबेडकरी चळवळीत घुसू देण्याचे कारण काय? किंवा स्वत:च्या वैयक्तीक स्वार्थापोटी कमुनिस्टांशी संधान बांधणारे प्रकाश आंबेडकर खरे संविधानद्रोही ठरत नाही का? संघाला संविधान द्रोही दाखवून लोकांमध्ये भिती निर्माण करत ख-या संविधानद्रोही लाल-सलामशी मैत्री करणारे प्रकाश आंबेडकर देशाच्या विनाशाची पायाभरणी करीत नाहीत का?
मेन प्राब्लेम हे कन्हैय्या, मेवानी, खालिद टाईप 'लाल सलाम वाले' आहेत. हे लोक दलित चळवळ हायजॅक करतायत हा आहे.
  • Log in or register to post comments
र
राही Wed, 01/10/2018 - 13:33 नवीन
जाऊ दे की प्रकाश आंबेडकरांना भारतीय कम्यूनिस्टांबरोबर. कम्यूनिस्ट पक्ष हा अधिकृत राजकीय पक्ष आहे; निवडणुका लढवण्यास, इलेक्शन कमिशनमान्य अशा आपल्या अजेंड्याचा प्रचार करण्यास कायद्याने पात्र आहे. मग काय हरकत आहे? आणि इतर पक्षांच्या अकल्पनीय अश्या युत्या आतापर्यंत झाल्या नाहीत का? भूतकाळात बाळासाहेब ठाकरे आणि मुस्लिम लीगचे बनातवाला यांनी काही उद्दिष्टांसाठी हस्तमिलाप करून एक संयुक्त मिरवणूकही काढली होती. महाराष्ट्र राज्यनिर्मितीच्या लढ्यात सं. म. समितीत समाजवाद्यांबरोबर कम्यूनिस्ट्स हिरिरीने उतरले होते. तमीळ्नाड्मध्ये अलगतावादी द्रमुकच्या अनेक शकलांशी अनेकांनी युती/समझोता केलेला आहे. उजव्यांच्या आघाड्या उजव्यांबरोबर आणि डाव्यांच्या डाव्यांबरोबर नेहमीच होत असतात. इतकेच नव्हे तर प्रसंगोपात्त डावे-उजवेसुद्धा एकत्र येऊ शकतात. साधनशुचिता सत्तरच्या दशकातच मागे पडली. डॉक्ट्रीनशी बांधिलकी वगैरेही खूपच मागे पडले आहे. कोणतेही तत्त्वज्ञान नसलेल्या किंवा स्वतःचे वेगळेच तत्त्वज्ञान अथवा स्वारस्य असलेल्यांबरोबर समझोता होऊ शकतो. आणि देशाच्या विनाशाची पायाभरणी वगैरे तर फारच ताणलेले वाटतेय. देश असा एव्हढ्यातेव्हढ्याने काही विनाश पावत नाहीय. आणि दलितांमुळे तर नाहीच नाही. आपल्यासारख्याकडून हे वाक्य आलेले पाहून आश्चर्य वाटले. आपण देशभक्तीचा अथवा राष्ट्रवादाचा उन्मादी पुरस्कार करणारे नाहीत हे मला माहीत आहे. (सॅम्युएल जॉन्सनला कोट करण्याचा मोह टाळलाय.) जर दलितहिताच्या कार्याला बळ मिळत असेल तर आंबेडकरांनी जरूर कम्यूनिस्टांचा पाठिंबा घ्यावा. एक अवांतर उदाहरण द्यावेसे वाटतेय. गावकुसाबहेरच्या लोकांकडे कोणी धुंकूनही पाहात नव्हते तेव्हा मिशनरीज् त्यांच्याकडे गेले. त्यांचे लोकांनी दोन्ही हात पसरून स्वागत केले. आपल्याच समाजाच्या एका हिश्श्याला आपण द्वेषाने आणि उपेक्षेने मारू नये. आरक्षण फेकले म्हणजे सर्व काही झाले, मोठी मेहरबानी केली असे मानू नये. त्यांचे ईथॉस आपण सगळ्यांनी समजून घ्यावेत असे वाटते. त्यांना लेवल प्लेइन्ग फील्ड निव्वळ आरक्षणाने नव्हे तर समाजाच्या (बिनशर्त ) स्वीकृतीने मिळेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
प
पगला गजोधर Wed, 01/10/2018 - 13:49 नवीन
मनुवाद्यांचा में प्रॉब्लेम हा आहे की खुद्द पंतप्रधान , उप्र मुख्यमंत्री , पक्षाध्यक्ष वैगरे लोकांनी पूर्ण ताकतीने प्रचार करून जिग्नेश गुजरातसारख्या प्रयोगशाळा राज्यातून निवडून येतो कसा ? सॅम्युअल जॉन्सन भलेही कोट नका करू ... पण दुखरी नस त्यांची तीच आहे. लोक चळवळीतून पुढे येऊन, भारतीय निवडणूक लढवूनही जर, जिग्नेश देशविघातक मग त्याला मत देणारे काय देशद्रोही का ? उमर खालिदवर/कन्हैयावर भरपूर राजद्रोहाचे खटले भरले, न्यायालयात त्याचं पुढं काय झालं ? न्यायालयानं जर त्याला देशद्रोही ठरवलं नाही , मग हे मनुवादी स्वतःला काय न्यायालयापेक्षाही मोठे मानतात का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
अ
अनुप ढेरे Wed, 01/10/2018 - 17:22 नवीन
ब्रिगेडी लोक दुसर्‍यांना मनुवादी मनुवादी चिडवतात हे पाहून मौज वाटते :) बाकी मेवानीसाठी काँग्रेसने इंकंबंट आमदाराला खाली बसवलं होतं. तरी फार मतांनी निवडून आलेला नाही मेवानी. (१९०००). ही माहिती तुम्हाला नाही, इतरांना आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
ट
ट्रेड मार्क Wed, 01/10/2018 - 18:05 नवीन
मनुवादी म्हणजे नक्की कोण? मला वाटत होतं की जे अजूनही काही जाती उच्च मानतात (म्हणजे फक्त ब्राम्हण) ते मनुवादी. तुमच्या काही प्रतिसादात तुम्ही म्हणलंय की मनुस्मृती समर्थक लोकांमुळे दलित समाज इतरांपासून दूर गेला. दुसऱ्या एका प्रतिसादात म्हणताय "जातीची उतरंड मानणारे कोणीही, हे मनुवादीच...". याच प्रतिसादात हे सुद्धा म्हणलंय "सध्याच्या भारतातील मनुस्मृतीच्या अजेंडा उघड/छुपा राबविणाऱ्या संघटनेविरुद्ध काहीही लिहिले जाते, तेव्हा मनुवादी लोकं अलगदपणे तो रोख/ती टीका, ही जणू ब्रह्मणांवरच केली आहे, असा त्याला स्पिन देतात.". अशी कोणती मनुवादी संघटना आहे बरे? इथे सुद्धा कोणी ते ब्राह्मणांवर ओढून घेतलंय ? उलट तुमच्या बहुतेक प्रतिसादांचा सूर फक्त ब्राह्मणविरोधी आहे. कोरेगाव भिमाची लढाई फक्त महार आणि ब्राम्हण यांच्यात होती हे कोण म्हणतंय? इथे तुम्ही असं म्हणलंय "बहुतांशी मी पंडित नेहरूंना (ते काश्मीरी ब्राह्मण असूनही) त्यांच्या आधुनिक पुरोगामी दृष्टीची, प्रशंसा केलीय...ती ते ब्राम्हण असल्यामुळे नाही.". इथे आधुनिक पुरोगामी म्हणजे काय? त्यांनी सुद्धा मुस्लिमांचं लांगुलचालन केलंच. मी त्यांच्यावर टीका करतो कारण ते परधार्जिणे होते. असो, विषय भरकटायला नको. याच प्रतिसादात तुम्ही म्हणताय "तर दुसऱ्या एका पंप्र ची भरपूर टीका केलीये (ते ब्राम्हण नसूनही, कारण त्यांची विचारसरणी मला मनुवादी वाटते म्हणून)". मनुवादी विचारसरणी सिद्ध करणारं कोणतं काम त्यांनी केलंय? ब्राम्हण नसूनही त्यांचं म्हणणं आहे की आरक्षण द्यायचं तर ते आर्थिक निकषांवर द्यावं. परत आरक्षणाचा मुद्दा नको. तर विषय आहे हिंदूंमधील तथाकथित उच्च आणि खालच्या जातींचा. तर या दुसऱ्या एका पंप्रने हिंदू समाजातील जातीजातींमध्ये तेढ वाढवण्यासाठी काय केलं ते उदाहरणासहित द्या. लोक चळवळीतून पुढे येऊन, भारतीय निवडणूक लढवूनही जर, जिग्नेश देशविघातक मग त्याला मत देणारे काय देशद्रोही का ? कसा का होईना निवडून आलाय याचा आनंद आहे. समस्त दलित नेते दलित एकतेसाठी आवाहन करत असताना खालच्या जातीतीलच पंतप्रधानांवर नको ती शेरेबाजी करून दुही कशाला माजवतोय? वेळ आणि वाफ कशाला वाया घालवतोय? दलितांनी रस्त्यावर उतरून लढा दिला पाहिजे अशी भाषणे कशाला करतोय? आता संधी मिळाली आहे तर त्याचा वापर विधायक कार्यासाठी करावा, ज्या लोकांनी त्याला निवडून आणलाय त्यांचा उद्धार करावा. अशी भाषणं देण्यापलीकडे आणि पंतप्रधानांवर टीका करण्यापालिकडे त्याने कुठली विधायक कामं केली आहेत ते सांगा. उमर खालिदवर/कन्हैयावर भरपूर राजद्रोहाचे खटले भरले, न्यायालयात त्याचं पुढं काय झालं ? न्यायालयानं जर त्याला देशद्रोही ठरवलं नाही माझ्या माहितीप्रमाणे दोघेही जामिनावर बाहेर आहेत. त्यांना न्यायालयाने निर्दोष सोडलं का? अजून एक मुद्दा म्हणजे तुम्ही स्वतः खरी मनुस्मृती वाचली आहे का? दुसऱ्या कोणीतरी तिसऱ्याने लिहिलेलं काहीतरी वाचून स्वतःच्या आकलनाप्रमाणे लिहिलेलं नव्हे. ती ओरिजिनल मनुस्मृती वाचली असेल तर त्याची पानं स्कॅन करून ज्यात आक्षेपार्ह मजकूर आहे असे उतारे इथे दाखवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
अ
अनुप ढेरे Wed, 01/10/2018 - 17:15 नवीन
इथे कम्युनिस्ट पक्ष बेकायदेशीर आहेत अस मी म्ह्टलेलं नाही. ( झाले ते बेकायदेशीर तर आनंदच होईल पण ) आणि अभद्र म्हणाव्यात अशा अनेक युत्या झालेल्या आहे हेही मान्य आहे. उदा: भाजपा-द्रमुक, भाजपा-पीडीपी अशा पण म्हणून द्रमुक किंवा पीडीपी सारख्यांच्या फुटीरतावाद्यांबद्दल मत चांगलं होत नाही. देश दलितांमुळे विनाशाकडे जाईल असं अजिबात म्हटलेले/इम्प्लाय केलेले नसून कम्युनिस्टांमुळे जाईल असा मुद्दा आहे. ज्यात मला भरपूर तथ्य वाटतं. मी जरी उन्मादक राष्ट्रावादाचा पुरस्कर्ता नसलो तरी देश ही संकल्पना मानणारा आहे. कम्युनिस्टांनी दंतेवाडा इथे सत्तर सैनिकांची हत्या केलेली त्यानंतर जे एन यु मध्ये कम्युनिस्ट विद्यार्थी संघटनांनी उत्सव साजरा केलेला हे विसरता येत नाही. आदिवासांच्या अधिकारांसाठी तथाकथीत लढा देणारी पण आदिवास्यांसहीतच हजारो लोकांचं हत्याकांड घडवणारी नक्षल चळवळ ही देखील कम्युनिस्ट चळवळच आहे. कम्युनिस्ट देशांमध्ये सुबत्ता नांदत नाही आणि लोकांवर अनन्वीत अत्याचार होतात हे इतिहासात दिसलेलं आहे. सो कम्युनिस्ट पार्टी असो वा विद्यार्थी संघटना असो मला ते हानिकारकच वाटतात आणि म्हणूनच वरील लेखात कम्युनिस्ट लोकांबद्दल दिलेली वार्निंग अगदी पटते. जाता जाता: आंबेडकरांनी देखील हिंदू धर्म त्यागताना कयुनिस्टांचा निधर्मी मार्ग स्वीकारला नाही तर बौद्ध धर्म स्वीकारला ही गोष्ट रोचक आणि सूचक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
र
राही Wed, 01/10/2018 - 18:56 नवीन
आंबेडकरांनी-पर्यायाने दलितांनी कम्यूनिस्टांशी युती केली तर बिघडले कोठे? या युतीमुळे देश विनाशाकडे अजिबात जाणार नाही. कम्यूनिस्ट हा भारतीय कायद्याने मान्य केलेला पक्ष आहे. या पक्षाशी अनेकांनी आजवर युती केल्या आहेत. तेव्हा देश विनाशाप्रत गेला नाही मग दलितांनी युती केल्यावर कसा जाईल? द्रवीडी पक्ष तर देश फोडण्याचे कार्यक्रम उघडपणे राबवत होते. शिखांच्या एका पक्षाचेही तसेच. देश फोडण्याचे आदेश देणार्‍या या पक्षांबरोबर युती करूनही देश फुटला नाही. मग दलितांनी एखाद्या भारतीय पक्षाशी युती केल्यावर त्याचा कसा विनाश होईल? इतर भारतीय पक्षांना टक्कर देण्याइतकी ही युती बलिष्ठ होईल? दलितांना त्यांच्या तुलनात्मक अल्प लोकसंख्येमुळे सदैव माय्नॉरिटीमध्येच राहावे लागणार आहे.. तेव्हा कोणाशी ना कोणाशी युती करणे ही त्यांची अपरिहार्यता आहे. आतापर्यंत केलेल्या युत्यांमुळे जर सन्मान मिळाला नसेल तर दुसरा जोडीदार ते शोधणारच. मिपावर किंबहुना आंतरजालावर व्यक्त होणारे सगळे तुम्हीआम्ही लोक देशप्रेमीच असतो. इन्डिअन एक्स्प्रेसने त्या काळी दिलेल्या दिवसवार यादीमध्ये सुवर्णमंदिरात सैन्यप्रवेशाआधी खालिस्तान चळवळीत मारल्या गेलेल्या हिंदु-शिखांची संख्या सव्वादोन हजारांहून अधिक होती. शिवाय चळवळीकडे खूप मोठी शस्त्रसज्जता होती. तरीही सामान्य जनतेच्या आणि तिने निवडून दिलेल्या प्रतिनिधींच्या देशप्रेमामुळे देश अखंड राहिला. आपला देश असा लेचापेचा नाहीय. जो इतक्या मोठ्या तुफानाला तोंड देऊन उरला तो या छोट्याशा वावटळीने उडून जाणार? बाबासाहेबांना हिंदू धर्म त्यागून दुसरा कोणतातरी धर्म स्वीकारायचा होता. अनुयायांना धर्मरहित ठेवायचे नव्हते. क्रिस्टिअन मिशनरी आणि मुस्लिम नेते आपापला धर्म स्वीकारण्यासाठी बाबासाहेबांचा अनुनय करीत होते. पण त्यांना बाजूला सारून, फार मोठ्या दूरदृष्टीने आणि विचाराने त्यांनी जो भारतीय मूळ असलेला बौद्धधर्म स्वीकारला, तो देश विनाशाप्रत नेण्यासाठी नव्हे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
अ
अंतरा आनंद गुरुवार, 01/11/2018 - 01:49 नवीन
राही, सगळेच मुद्दे +१ कम्युनिस्ट म्हणजे देशाला मोठाच धोका आहे असा भ्रम निर्माण करण्यात हिंदुत्ववाद्यांनी यश मिळवलं आहे. आणि एखाद्या गटाने पिढ्यान-पिढ्या आपलं मल-मूत्र साफ करावं ही आपली 'हिंदू व्यवस्था' आहे याबद्द्ल कोणतीही लाज न वाटणार्‍या हिंदू समाजाला ते पटकन पचलं. समानता ही आपल्या रक्तातच नाही त्यामुळे त्याचा पुरस्कार करणारा आपल्याला लगेच चुकीचा वाटतो . अनुयायांना धर्मरहित ठेवायचे नव्हते. >> निरीश्वरवाद पेलवणं तसं अवघड असतं. त्यातून दैववाद, कर्मवाद अश्या गोष्टींचा भरणा असलेल्या हिंदू विचारसरणीपासून त्यांना दूर ठेवायचं तर दुसरी सशक्त विचारसरणी त्यांना देणं हे जरूरी होतं. आणि ते बाबासाहेबांनी योग्य प्रकारे केलं. मुस्लिम, इसाई तर जाऊच द्या, शीख धर्मासारखा जाती न मानणारा पण प्रत्यक्षात पाळणारा धर्मही त्यांनी निवडला नाही. खरं तर हिंदू समाजावर हे त्यांचे उपकारच आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
आ
आनन्दा गुरुवार, 01/11/2018 - 03:26 नवीन
या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.. आता माझ्या तुमच्याबद्दल असलेल्या कल्पना अधिक स्पष्ट झाल्या.. लेखात तर अनेक त्रुटी होत्याच, पण बौद्ध धर्म स्वीकारताना जातीचा लावलेला निकष वाचून डोळे पाणावले.. बौद्ध असलेल्या चीन आणि जपानमध्ये सगळे अगदी समान आहेत नाही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अंतरा आनंद
इ
इरसाल गुरुवार, 01/11/2018 - 07:28 नवीन
शीख धर्मासारखा जाती न मानणारा पण प्रत्यक्षात पाळणारा धर्मही त्यांनी निवडला नाही. ह्या बद्दल तुम्हाला खात्री आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अंतरा आनंद
अ
अनन्त अवधुत Fri, 01/12/2018 - 00:21 नवीन
कम्युनिस्ट म्हणजे देशाला मोठाच धोका आहे असा भ्रम निर्माण करण्यात हिंदुत्ववाद्यांनी यश मिळवलं आहे.
हे हिंदुत्ववाद्यांनी केले नाही, तर कम्युनिस्टांनी स्वतःच्या वागण्याने केले. त्यांचा नक्षल्यांना पाठिंबा. हे नक्षली शेतकरी/ आदिवासी/ सरकारी कर्मचारी/ पोलीस/ राजकीय नेते यांची हत्या करतात. राजकीय नेत्यांच्या हत्येचे कारण म्हणजे तेथील जनतेने लोकशाही प्रक्रियेत भाग घेऊ नये म्हणून. असे हे लोकशाही विरोधी/ आपल्या देशावर युद्ध लादणारे नक्षली आणि कम्युनिस्ट. 'भारत तेरे तुकडे होंगे' च्या घोषणेला यांचा पाठिंबा. कम्युनिस्ट म्हणजे देशाला मोठाच धोका आहे हा भ्रम नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अंतरा आनंद
अ
अंतरा आनंद Fri, 01/12/2018 - 14:40 नवीन
कोणत्या कम्युनिस्ट पक्षाने नक्षल्यांना उघड पाठिंबा दिला आहे? आणि बाबरी पाडल्यावर कित्येक वर्षे देश धुमसत राहिला ते कृत्य करणारे लोकशाही विरोधी नव्हते का? त्या नंतरच्या दंगलीत फक्त मुस्लिमांचेच बळी गेले का? राजकीय लाभासाठी आपण जे कृत्य करतोय ते कोणत्या थराला न्यावं याचं भान नसणारे नक्षल्यांपेक्षा वेगळे नाहीत. युद्ध फक्त बाहेरून होत नसतं. दंगे धोपे हे ही अंतर्गत युद्धच असतं आणि त्याच्या जखमा जास्त खोल असतात. . 'भारत तेरे तुकडे होंगे' च्या घोषणेला यांचा पाठिंबा. >> कुणी दिला पाठिंबा? थेट पाठिंबा न देता मुस्लिम वेगळे, दलित वेगळे, हे वेगळे , ते वेगळे हे चालतं वाटतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनन्त अवधुत
अ
अनुप ढेरे Fri, 01/12/2018 - 16:53 नवीन
कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओवादी) असं नक्षली संघटनेचं नाव आहे एका मोठ्या. जनयुमध्ये दंतेवाडा झाल्यावर उत्सव साजरा झालेला. जनयु हे कम्युनिस्टांचं बॅशन आहे. असो... ही बेसिक माहिती आहे. हे सोडून नक्षली सिंपथायझर भरपूर आहेत. आणि जाताजात इतरांसाठी एक ट्रिविआ जनयुमध्ये SFI ही भारतीय कम्युनिस्ट पक्षाची विद्यार्थी संघटना आणि AISA ही CPMI-ML या पक्षाची संघटना अशा दोन कम्युनिस्ट संघटना आहेत. तरीही बाप्सा नावाची एक दलित विद्यार्थी संघटना आहे ज्यांनी कम्युनिस्टांहून वेगळी चूल मांडली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अंतरा आनंद
अ
अंतरा आनंद Fri, 01/12/2018 - 17:13 नवीन
नावं काहिही घेतली तरी आघाडी संसदीय प्रणालीतल्या पक्षाशीच होते. तसं जोडप्यांना मारहाण करणार्^या पक्षाचं नाव होतंच की हिंदू वरून म्हणून काय तो हिंदूंचा पक्ष होतो काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
अ
अनन्त अवधुत Sat, 01/13/2018 - 00:11 नवीन
'कोणत्या कम्युनिस्ट पक्षाने नक्षल्यांना उघड पाठिंबा दिला आहे?
कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओवादी) या पक्षातील एका गटाने सशस्त्र चळवळ नक्षलबारी गावातून सुरु केली. नक्षलबारी नावावरून त्या चळवळीचे नाव नक्षलवादी असे पडले. त्यानंतर कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओवादी) विभाजित झाला - भारतीय कम्युनिझम १०१ :)
'भारत तेरे तुकडे होंगे' च्या घोषणेला यांचा पाठिंबा. >> कुणी दिला पाठिंबा?
जनेयु मध्ये घोषणा देणारे तेच होते (कन्हैय्या कुमार , उमर खालिद, आणि मंडळी) रच्याकने त्या घोषणा दिल्या तो प्रसंग म्हणजे भारतीय संसदेवर हल्ला करणाऱ्या अफजल गुरुच्या स्मरणाचा कार्यक्रम होता. खाली अनुप ढेरेंनी पण प्रतिसाद दिलाच आहे कि ते कसे देशद्रोही आहेत. मी पुनरुक्ती टाळतो. अवांतर: वयाच्या ३०व्या वर्षी घरची गरिबी म्हणून जनेयु मध्ये स्कॉलरशिप वर शिकणारे हे विद्यार्थी, पुणे-मुंबई प्रवास मात्र विमानात फर्स्ट क्लासने करतात. त्यांच्याकडे आयफोन वगैरे महागडे गॅझेट्स कसे आले हे विचारायचे नाही. भांडवलशाहीचे सगळे फायदे घ्यायचे , बाता देश बरबाद करण्याच्या करायच्या आणि आव मात्र असा आणायचा कि जगाच्या कल्याणा अवतार घेतलाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अंतरा आनंद
न
नितिन थत्ते Sat, 01/13/2018 - 02:24 नवीन
>>भांडवलशाहीचे सगळे फायदे घ्यायचे आधुनिकतेचे सगळे फायदे घेऊन आपण नाही का प्राचीन भारतीय संस्कृतीचे आणि वेदातल्या विमानांचे गोडवे गातो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनन्त अवधुत
अ
अर्धवटराव Sat, 01/13/2018 - 06:58 नवीन
भारतीय संस्कृती, वेदांमधली विमानं आहेच मुळी कौतुक करण्यासारखे. आता "भारते तेरे तुकडे होंगे" वगैरे सुद्धा कौतुक करण्याच्या लायकीचे आहेत असं म्हणुन आम्हाला कृतकृत्य करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
अ
अनुप ढेरे गुरुवार, 01/11/2018 - 04:11 नवीन
काय बिघडतं हे कम्युनिस्टांचा इतिहास पाहिल्यास समजतं. कम्युनिस्ट आयडिऑलोजीने ऑलरेडी भारतात हजारो लोकांच्या हत्या घडवलेल्या आहेत ज्यात भरपूर दलित/आदिवासी देखील आहेत. नक्षली हे कम्युनिस्टच आहेत. सो कम्युनिस्ट आयडीऑलॉजीने काय बिघडतं हा प्रश्न फार भाबडा वाटला.
देश फोडण्याचे आदेश देणार्‍या या पक्षांबरोबर युती करूनही देश फुटला नाही....आपला देश असा लेचापेचा नाहीय. जो इतक्या मोठ्या तुफानाला तोंड देऊन उरला तो या छोट्याशा वावटळीने उडून जाणार?
देश ऑलरेडी एकदा फूटुन झालेला आहे. ४७ ला. पण तो वादग्रस्त मुद्दा बाजुला ठेऊ. देश लेचापेचा नाही तरी वगैरे वगैरे म्हणून हे व्हायलंट लोक दुर्लक्षित कसे ठेवता येतील. हे म्हणजे समाज एवढा लेचापेचा नाही की चार गौ रक्षकांनी तुटेल म्हणण्यासारखं आहे.
दलितांना त्यांच्या तुलनात्मक अल्प लोकसंख्येमुळे सदैव माय्नॉरिटीमध्येच राहावे लागणार आहे.. तेव्हा कोणाशी ना कोणाशी युती करणे ही त्यांची अपरिहार्यता आहे. आतापर्यंत केलेल्या युत्यांमुळे जर सन्मान मिळाला नसेल तर दुसरा जोडीदार ते शोधणारच.
दलित हे अल्पसंख्य नाहीत. भारतात २३-२४% दलित/आदिवासी आहेत. एक चतुर्थांश लोकसंख्या असलेले अल्पसंख्यांक नाहीत. दलित हा एक गॄप आहे असं गृहितक आहे तुमच्या प्रतिसादाचं. जे बरोबर आहे असं वाटत नाही मला. त्यात भरपूर उतरंडी आणि मतभिन्नता आहे. जात विरहीत = वर्ग विरहीत हा प्रचार बरोबर नाही. गंडवागंडवीचा आहे. इथेही काही दलित नेते कम्युनिस्टांबरोबर चूल मांडत आहेत त्यावर टीका आहे. द्रविड पक्ष / खलिस्तानी तरी देश तोडण्याचा प्रयत्न करणारे होते. कम्युनिस्ट लोक देश पोखरणारे वाटतात आणि म्हणून त्यांचा प्रभाव कमीत कमी रहावा असं वाटतं.
फार मोठ्या दूरदृष्टीने आणि विचाराने त्यांनी जो भारतीय मूळ असलेला बौद्धधर्म स्वीकारला, तो देश विनाशाप्रत नेण्यासाठी नव्हे.
विनाशाप्रत नेणारे सरसकट दलित किंवा बौद्ध आहेत हे मी अजिबात म्हटलेलं नाही. इथे दलित कम्युनिस्ट अशी युती नसून प्रकाश आंबेडकर कम्युनिस्ट अशी चूल आहे. जी घातक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
प
पगला गजोधर Wed, 01/17/2018 - 12:39 नवीन
प्रवीण तोगाडिया यांना बहुतेक कम्युनिस्ट /नक्षलवाद्यांकडून जीवाची भीती असावी ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
M
mayu4u गुरुवार, 01/18/2018 - 04:35 नवीन
प्रवीण तोगाडिया यांना बहुतेक स्वतःचं महत्व कमी झाल्याची भीती असावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
प
पगला गजोधर Fri, 02/02/2018 - 13:22 नवीन
,
मेन प्राब्लेम हे कन्हैय्या, मेवानी, खालिद टाईप 'लाल सलाम वाले' आहेत. हे लोक दलित चळवळ हायजॅक करतायत हा आहे.
हा लढा काही दशके किंबहुना शतके मागचा आहे. "चोळीच्या हक्कासाठीचा लढा (मारू मरक्कल समरम)" https://www.misalpav.com/node/29040
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
ग
गामा पैलवान Wed, 01/10/2018 - 09:08 नवीन
जेव्हा जेव्हा जातीव्यवस्था वर्णद्वेष याबाबत "मनुस्मृती समर्थक" विचारसरणी वर टीका केली जाते किंवा सध्याच्या भारतातील मनुस्मृतीच्या अजेंडा उघड/छुपा राबविणाऱ्या संघटनेविरुद्ध काहीही लिहिले जाते, तेव्हा मनुवादी लोकं अलगदपणे तो रोख/ती टीका, ही जणू ब्रह्मणांवरच केली आहे, असा त्याला स्पिन देतात.
अय्या हो? मग लेखात ही दोन विधानं नक्की कशाला टाकली आहेत? १.
कदाचित इथल्या मंडळीसारखी जानवं या खांद्यावरून त्या खांद्यावर करत सव्यापसव्याला कसरत म्हणण्याची कला त्यांना अवगत नसावी.
२
पूर्वंजांच्या चार कथा उचलून निरूपणं करत बसण्याएवढं साधं नाही ते.
आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
प
पगला गजोधर Wed, 01/10/2018 - 09:39 नवीन
गामाजी, तुम्हाला, वरील दोन हायलाईट केलेली वाक्ये , माझ्या कुठल्या लेखात/प्रतिक्रियेत आढळली ?? ते जरा सांगा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान Wed, 01/10/2018 - 14:10 नवीन
प.ग., अहो, तुम्ही नाही हो. मूळ लेखातली वाक्यं आहेत ही. त्यामुळे लेखिकेस ब्राह्मणांचा उल्लेख नक्की कशासाठी करायचाय असा प्रश्न पडतो. असंच भाष्य मी अगोदरही केलं आहे. कृपया इथला मुद्दा क्रमांक २३ व २४ पहाणे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
ग
गामा पैलवान Wed, 01/10/2018 - 09:19 नवीन
अॅमी, तुमचा इथला संदेश वाचला. १.
म्हणजे घटनापूर्व काळात इंग्रजांनी/काही राजांनी आपापल्या राज्यात शिक्षण, नोकरीत आरक्षण दिलं होतं, मग १९४७ ते १९८२ शून्य आरक्षण होतं आणि १९८२ ला परत ते आरक्षण चालू झालं असं का?
इंग्रजांनी दलितांना नोकरी व शिक्षणात कसलंही आरक्षण दिलेलं नव्हतं. शाहू महाराजांनी नोकरी (वा उपजीविका) व शिक्षणांत आरक्षण दिलं होतं, पण तो अखिल भारतीय प्रयोग नव्हे. शिवाय हे आरक्षण सरसकट अब्राह्मणांसाठी होतं (संदर्भ : विकी). इंग्रजांनी जे आरक्षण दिलं ते केवळ राजकीय स्वरूपाचं आहे. हेच धोरण स्वातंत्र्योत्तर काळात चालू राहिलं. नोकरी आणि शिक्षणांत आरक्षण १९८२ सालीच सुरू झालं. मात्र असं आरक्षण देण्यास शासनास कोणीही प्रतिबंध घालू शकंत नाही अशी तरतूद घटनेत बऱ्याच अगोदरपासून (बहुधा १९५० पासून) अस्तित्वात होती. २.
तुम्हाला ही माहिती कुठून मिळाली?
शोधा म्हणजे सापडेल. विकिवर एण्ट्री आहे : https://en.wikipedia.org/wiki/Reservation_in_India ३.
तुम्ही मअंजावर बरेच जुने आहात, आरक्षणावरच्या बऱ्याच चर्चा वाचल्या असणार, सहभाग घेतला असणार तरी असे काहीतरी बोलताय याचं आश्चर्य वाटतंय....
मी कसाही असलो तरी वस्तुस्थिती बदलंत नाही. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
प
पगला गजोधर Wed, 01/10/2018 - 09:42 नवीन
बाकी अँमीजी, कोरगाव भीमा या विषयाला मनुवाद्यांनी, आरक्षणाचा धागा बनवून टाकलाय हे तुमच्या लक्षात आले असेलंच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान Wed, 01/10/2018 - 17:30 नवीन
प.ग., कोरेगाव-भीमा या विषयात धागाकर्तीने जानवं, निरुपण आणि राममंदिर कसं ओढून ताणून आणलं. तसंच मनुवाद्यांनी आरक्षण खेचडत आणलं. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा