Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मूलभूत नीतितत्त्वे

य
यनावाला
Sat, 03/03/2018 - 12:22
🗣 128 प्रतिसाद
मूलभूत नीतितत्त्वे : यनावाला [ईश्वरवादी--निरीश्वरवादी या दोघांतील प्रश्नोत्तररूपी संवाद . प्रश्न आस्तिकाचे, उत्तरे नास्तिकाची.] प्रश्न :- तुम्ही म्हणता की, "आजच्या प्रगत युगात समाजाला देवा-धर्माची आवश्यकता नाही. पुरातनकाळीं अज्ञानयुगातील माणसाला सुचलेल्या आणि रुचलेल्या या संकल्पनांचे आता काही प्रयोजन उरलेले नाही. सर्वांनी त्या डोक्यातून काढून टाकल्या पहिजेत" असे करणे योग्य होईल का ? उत्तर :- हो निश्चितच. इथे "धर्म" या शब्दात जगातील सर्व प्रचलित धर्म (उपासना पद्धती) समाविष्ट आहेत. तसेच देव हा शब्द जगातील सर्व देव-देवतांविषयीं आहे. इथे उपासनेचा देव (पर्सनल गॉड) --म्हणजे पूजा, प्रार्थना यांनी संतुष्ट होऊन भक्तांवर कृपा करणारा, संकटात धाऊन येणारा, परम दयाळू देव हा अर्थ घ्यायचा. धर्म म्हणजे जे कांही रूढी परंपरांनी धर्माचरण चालू आहे , कर्मकांडे होत आहेत, ते सर्व. या देव-धर्मांमुळे जगभरातील अनेकांवर अन्याय-अत्याचार झाले आहेत. धर्मावरून भीषण युद्धे झाली आहेत. रक्ताचे पाट वाहिले आहेत. सर्व समाजांची अतोनात हानी झाली आहे. आणि होत आहे. धर्मगुरू, पुरोहित अशा कांही हितसंबंधी लबाडांना मात्र मोठा लाभ झाला आहे आणि होत आहे हे खरे. म्हणून समाजाच्या हितासाठी या देव-धर्माच्या संकल्पनांचे उच्चाटन होणे योग्य आहे. सुधारककार आगरकर लिहितात, "मानवी समाजाला यापुढे धर्माची आवश्यकता नाही. कारण धर्माचा मूळारंभ अज्ञान आणि भीती यांतून झालेला आहे. धर्मविषयक कल्पना या वस्तुस्थितीच्या अज्ञानातून आणि अज्ञात संकटाच्या भीतीतून आलेल्या आहेत." प्रश्न :- धर्मग्रंथातून माणसाला नीतितत्त्वांची शिकवण मिळते. आपल्या हातून काही दुष्कृत्य, कुकर्म घडल्यास पाप लागेल, देव शिक्षा करील, अशी माणसाला भीती असते. तसेच सद्धर्माने वागल्यास पुढच्या जन्मी सुख मिळेल अशी आशाही त्याला वाटते. देव-धर्माचे उच्चाटन झाल्यास माणसाला नीतिबोध कसा होईल? देवाची भीती नसेल तर माणूस अनिर्बंध, अनैतिक वागणार नाही काय ? त्यामुळे समाजात गुन्हेगारी वाढणार नाही काय ? उत्तर :- म्हणजे देव-धर्म मानणारी, धार्मिक परंपरा पाळणारी माणसे नीतीने वागतात, तर नास्तिक लोक नीतिभ्रष्ट असतात, असे तुम्हाला म्हणायचे आहे. प्रश्न :- होय. असे वाटते खरे. त्यात काय चूक आहे ? उत्तर :- ठीक आहे. आपण वास्तवाचा, म्हणजे आजच्या सत्य परिस्थितीचा विचार करू. आपल्या देशात ८५% हून अधिक लोक आस्तिक आहेत. आपला देश ऋषी-मुनींचा, संन्यासी-योग्यांचा, बुवा-बाबांचा, आहे. इथे असंख्य मंदिरे आहेत. अगणित देव-देवता आहेत. उत्सव-सोहळे, भजने-कीर्तने, वार्‍या-तीर्थयात्रा, पर्वण्या-कुंभमेळे असतात. देवाचा उद् घोष, धर्माचा उदो उदो, अखंड चालतो. तुम्ही म्हणतां त्या अनैतिक नास्तिकांची संख्या इथे नगण्य आहे. या सत्य परिस्थितीचा विचार करता आपल्या देशाचा नैतिक स्तर अति उच्च असला पाहिजे ना ? पण वास्तव काय आहे? भ्रष्टाचार, भूखंड घोटाळे, आर्थिक लुबाडणूक, बॅंकांतील थकित कर्जे, अशा अनेक अवैध गोष्टीत हा देश आकंठ बुडालेला आहे. स्रियांवरील बलात्कार, बालिकांवरील अत्याचार, अनेक विकृत गुन्हे, यांत आपला देश जगात अग्रेसर आहे. अनैतिकतेत भारताचा क्रमांक पहिल्या दहात आहे. या वास्तवावरून काय समजते ? यावरून तर्कसंगत निष्कर्ष निघतो की देव- धर्म- धर्मग्रंथ यांचा नीतीशी काही संबंध नाही. पूजा-प्रार्थना-भजने -आरत्या,कथा-कीर्तने यांनी नीती वाढत नाही. व्रत-वैकल्ये,अभिषेक-अनुष्ठाने, होम-हवने करून नीती उन्नत होत नाही. वा‍र्‍या, पालख्या, छबिने, प्रकटदिनसोहळे यांनी नीतिमत्ता उद्भवत नाही. तसेच तुम्ही समजता की देवा-धर्माचे उच्चाटन झाले तर गुन्हेगारी वाढेल ! त्याविषयी वस्तुस्थितीचा विचार करू. आज देशात बाराही महिने देवा-धर्माचा एवढा दुमदुमाट असताना भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी प्रचंड आहे. देवाधर्माच्या उच्चाटनाने आणखी किती वाढणार ? युरोपीय देशांतील सर्वेक्षणांवरून असे दिसते की जिथे आस्तिकांची संख्या थोडी आहे त्या देशांत गुन्हेगारीचे प्रमाण अत्यल्प आहे. यावरून दिसते की बहुसंख्य नास्तिक लोक हे स्वयंप्रेरणेने नीतितत्त्वे पाळतात. प्रश्न :- नास्तिक माणसे धर्मग्रंथ वाचत नाहीत. मग त्यांना नीतितत्त्वे कशी कळतात ? कोण शिकवते ? उत्तर :- मूलभूत नीतितत्त्वे पाच आहेत. ती अशी : १) हेतुत:(म्हणजे जाणून-बुजून ) खोटे बोलू नये. २) चोरी करू नये. ३) कुणाची फसवणूक करू नये. ४) कुणावर बळजबरी, अत्याचार करू नये. ५) कुणा माणसाची हिंसा करू नये. या नीतितत्त्वांचा देवा-धर्माशी काही संबंध नाही. ही साधी तत्त्वे जर जगातील प्रत्येक माणसाने पाळली तर सर्वजण सुखी होतील. विश्वशांती नांदेल. प्रत्येक माणसात ही तत्त्वे स्वाभाविक (नैसर्गिक) म्हणजे उपजतच असतात. ती कुणी शिकवावी लागत नाहीत. कुठल्या ग्रंथातून वाचावी लागत नाहीत. इथे सद्गुरू, स्वामी, बुवा, बापू, अशा कुणाचीही आवश्यकता नाही. सत्संग, आध्यात्मिक प्रवचने, भजने, कीर्तने अशा गोष्टी इथे निरुपयोगी ठरतात. प्रत्येक सुजाण माणसाच्या बुद्धीत ही तत्त्वे असतातच. प्रश्न :- तुमचे विधान धार्ष्ट्याचे आहे. ही मूलभूत तत्त्वे स्वाभाविक म्हणजे नैसर्गिक असतील असे वाटत नाही. काहींही करून जीव वाचवणे, अन्न मिळवणे, आणि जनुक सातत्य टिकण्यासाठी पुनरुत्पत्ती करणे या प्रत्येक सजीव प्राण्याच्या नैसर्गिक प्रेरणा ( नॅचरल इन्स्टिंक्ट) आहेत असे वाचले आहे. ते पटते. म्हणजे माणसासाठी सुद्धा या नैसर्गिक ऊर्मी आहेतच. त्याला जिवंत राहण्यासाठी अन्न लागते. ते वैध मार्गांनी मिळणे अशक्य झाले तर प्रसंगी जीव वाचविण्यासाठी माणूस चोरी करील. जीव वाचविणे ही नैसर्गिक प्रेरणा आणि चोरी करू नये हे मूलभूत नीतितत्त्व यांची सांगड कशी घालता येईल ? उत्तर :- हा प्रश्न महत्त्वाचा आहे. नीतितत्त्वे सज्ञान माणसासाठीच आहेत, अन्य सजीवांसाठी नाहीत हे उघड आहे. उत्क्रांत होता होता माणसाच्या डोक्याच्या कवटीत नव्या मेंदूचा (निओकॉर्टेक्स चा ) उद्भव झाला. हा नवा मेंदू अधिक विकसित झाला. या नवमेंदूमुळे माणूस सुसंस्कृत झाला. अन्य माणसांचा, समाजाचा, विचार करूं लागला. तेव्हा त्याच्या मेंदूत ही मूलभूत नीतितत्त्वे उद्भवली. पुढे विकसित झाली. आता जनुकीय प्रेरणांवर माणूस आपल्या बुद्धीने नियंत्रण ठेऊं शकतो. माणूस हे जनुकीय यंत्र असले तरी बर्‍याच प्रमाणात माणूस स्वतंत्र आहे. जिवंत राहाण्यासाठी चोरी करणे भाग आहे अशी परिस्थिती निर्माण झाली तर माणूस म्हणेल ," प्राण गेला तरी चालेल पण मी चोरी करणार नाही." हे जनुकीय प्रेरणेच्या विरुद्ध आहे. पण तत्त्वनिष्ठ माणूस ती प्रेरणा झिडकारून असा निश्चय करू शकतो. तसे वागू शकतो. तो स्वतंत्र आहे. प्रश्न :- ठीक आहे. हे समजले. पण प्रसंगी जगण्याविरुद्ध असलेले हे नीतितत्त्व त्याच्या नव्या मेंदूत मुळात उद्भवलेच कसे ? उत्तर : - योग्य प्रश्न विचारला. माणूस हा जाणीवेची जाणीव असलेला (होमो सेपियन्स् सेपियन्स्) प्राणी आहे. आपल्याला जाणीव असते याची त्याला जाणीव आहे. त्यामुळे दुसर्‍या माणसालासुद्धा जाणीव असणार , मला भावना आहेत तशा त्यालाही भावना असणार हे माणसाला समजते. तसेच माणूस हा मूलत: तर्कनिष्ठ प्राणी म्हणून विकसित झाला आहे.(त्या तर्कनिष्ठतेमुळे तो एवढी आश्चर्यकार प्रगती करू शकला.) या दोन गोष्टींमुळे माणसाला पुढील युक्तिवाद कळतो आणि पटतो. किंबहुना त्याला स्वत:लाच तो सुचू शकतो. :- " * कोणी मला काही खोटे सांगितले तर ते मला आवडणार नाही. माझ्याशीं कोणी खोटे बोलू नये असे मला वाटते. म्हणून मी सुद्धा कुणाशी खोटे बोलता नये. नाहीतर -मला कोणी कांही खोटे सांगू नये--अशी अपेक्षा मी करणे योग्य होणार नही." "* जी वस्तू माझी आहे., जिच्यावर माझा अधिकार आहे ती कोणी पळवली तर ते मला आवडणार नाही. मला दु:ख होईल. म्हणून मीसुद्धा कोणाची वस्तू चोरता नये. चोरणार नाही." अशा तर्‍हेने ही पाच मूलभूत तत्त्वे माणसाच्या बुद्धीत उद्भवली. प्रश्न :- हे सगळे तत्त्वत: ठीक आहे. पटण्यासारखे आहे. पण प्रत्यक्ष व्यवहारात काय अनुभव येतो ? * खोटे बोलणारी माणसे पदोपदी भेटतात. * चोरी, घरफोडी, दरोडा यांविषयींच्या बातम्या वृत्तपत्रांत सतत येत असतात. * फसवणुकीची प्रकरणे इतकी असतात की जो तो दुसर्‍याला फसवायला टपला आहे असे वाटावे. * बळजबरी, अत्याचार यांविषयी तर बोलायलाच नको. बलात्काराच्या बातमीविना एक दिवस जात नाही. असे असता ही नीतितत्त्वे मानवी बुद्धीत उपजतच असतात असे म्हणण्यात काय अर्थ आहे ? उत्तर :- हा प्रश्न अपेक्षित होताच. तुम्ही म्हणता ते खरे आहे. हेतुत: खोटे बोलणारी, दुसर्‍याला फसवणारी, अन्याय अत्याचार करणारी, हिंसक असणारी माणसे समाजात आहेतच. त्यांची संख्याही लक्षणीय आहे. यात शंका नाही. पण मला असे म्हणायचे आहे की, जो अनेकदा हेतुत: असत्य कथन करतो, त्यालासुद्धा "खोटे बोलणे वाईट असते. खोटे बोलू नये. " हे समजते. पटलेले असते. समजा तो एक कथा वाचतो आहे. त्या कथेत शेवटी असत्याचा विजय होतो असे दाखवले आहे. तर त्या खोटारड्या माणसालासुद्धा तो शेवट आवडणार नाही. कारण अंतिम विजय सत्याचा व्हावा असेच त्याला वाटत असते. मग तो खोटे का बोलतो ? त्याची कांही कारणे असतात. आपल्या असत्य बोलण्याचे तो समर्थन करतो. तो म्हणतो ," खोटे बोलू नयेच. पण माझा निरुपाय असतो. मला खोटे बोलावे लागते. असत्य बोलण्याने लागलेले पाप मी पुण्य कृत्य करून धुऊन काढीन." धर्मात असे पापक्षालनाचे उपाय ठायीं ठायीं आहेत. प्रश्न :- असे कोणते उपाय आहेत ? उत्तर :- तुम्ही धार्मिक ग्रंथात वाचले नाही काय ? अशा प्रत्येक ग्रंथाच्या फलश्रुतीत ते सापडतील. सत्यनारायणकथेच्या दुसर्‍या अध्यायात आहे, "एवं नारायणस्येदं व्रतं कृत्वा द्विजोत्तम: । सर्वपापविनिर्मुक्तो दुर्लभं मोक्षमाप्‍नुयात् । --हे सत्यनारायणाचे व्रत करून सर्व पापांतून मुक्त झालेला तो श्रेष्ठ ब्राह्मण अंतीं दुर्लभ अशा मोक्षपदाला गेला."-- समजा एक गुंड.... प्रश्न :- यात पापक्षालनाचा कोणता मार्ग सांगितला आहे ? उत्तर :- अहो असे काय विचारता ? सत्यनारायणाची पूजा घातली की माणूस सर्व पापांतून मुक्त होतो असे स्पष्ट म्हटले आहे ना ? प्रश्न :- हो हो. आले लक्षात. तुम्ही एका गुंडाविषयीं काय सांगत होता ? उत्तर :- समजा एक गुंड चित्रपट बघायला गेला. खलनायक आणि त्याची टोळी यांची नायक पिटाई करतो असे दृश्य आहे. त्यावेळी हा गुंड प्रेक्षक टाळ्या वाजवतो. शिट्ट्या मारतो. गुंडांची पिटाई होते हे त्याला मनापासून आवडते. त्याचा धंदा धमक्या देऊन खंडणी वसूल करणे हा असतो. हे वाईट आहे. दुष्कृत्य आहे. हे त्याला ठाऊक असते. पण त्याला ते निरुपायाने करावे लागते. असे तो आपल्या दुष्कृत्याचे स्वत:शीच समर्थन करतो. खंडणीतील काही रक्कम मी सत्कृत्यासाठी खर्च करीन, पुण्य मिळवीन मग माझे पाप धुऊन जाईल असे तो आपले समाधान करून घेतो. मग शिरडीला किंवा बालाजीला जाऊन तिथल्या पेटीत मोठे दान टाकतो. गणपतीला चांदीचा उंदीर अर्पण करतो. अष्टविनायक यात्रा करतो. कुंभमेळ्यात स्नान करतो. पापक्षालनासाठी असे कितीतरी उपाय आहेत. माझे पाप धुऊन गेले या समजुतीने त्याच्या मनाला समाधान वाटते. पाप केल्याची जी टोचणी मनाला लागलेली असते ती संपते. त्याला पापक्षालनाचा मार्ग सापडलेला असतो. मग तो निर्ढावतो. उत्साहाने नवी दुष्कृत्ये करायला लागतो. गीतेत भगवानुवाच आहे :- ".....मामेकं शरणं व्रज । अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच :। "[ ( कृत दुष्कृत्यांची) चिंता करू नकोस. मला शरण ये. मी तुला सर्व पापांतून मुक्त करीन.] प्रश्न :- नास्तिक माणसे अनैतिक काम करतात का ? केल्यास त्यांच्या मनाला टोचणी लागते का ? उत्तर :- सगळेच नास्तिक नीतिमान असतात असे नाही. तसेच सगळे नास्तिक अनैतिक असतात असेही नाही. कांही निरीश्वरवाद्यांच्या हातून अनैतिक गोष्टी घडत असतील. दुष्कृत्य केल्यावर मनाला सदसद्विवेक बुद्धीची टोचणी लागणे, मनात खुपत-सलत राहणे ही सर्व माणसांच्या बाबतीत स्वाभाविक गोष्ट आहे. ही खुपणी संपविण्यासाठी, मानसिक समाधानासाठी पापक्षालनाचे मार्ग धर्मग्रंथांत आहेत हे आपण पाहिले. समजा चित्रपटाला गेलेला खंडणीगुंड नास्तिक आहे, तरी केलेल्या दुष्कृत्याची टोचणी त्याच्या मनाला लागणारच. कारण मूलभूत नीतितत्त्वे स्वाभाविक आहेत. त्यांचा आस्तिक-नास्तिकतेशी संबंध नाही. पण मनाच्या समाधानासाठी, मनाची टोचणी घालवण्यासाठी नास्तिकाला कोणताच मार्ग उपलब्ध नाही. नास्तिक असल्यामुळे तो बालाजीला, साईबाबाला, कुंभमेळ्याला जाणार नाही. असल्या गोष्टींवर त्याची श्रद्धाच नाही. दुष्कत्य केल्याची खंत त्याच्या मनात सतत सलत राहील. त्यामुळे आणखी पापे करायला तो प्रवृत्त होणार नाही. परिणामत: तो गुंडगिरीतून मुक्त होईल. सन्मार्गाला लागेल. अशी शक्यता अधिक आहे. म्हणून गुन्हेगारांमध्ये निरीश्वरवाद्यांचे प्रमाण अत्यल्प असते. हे अनेक सर्वेक्षणांतून दिसून आले आहे. प्रश्न :- तुम्ही सांगता त्यावर थोडा विचार केला तर काही पटण्यासारखे आहे. तरीपण मला प्रश्न पडतो की माणसासाठी ही नीतितत्त्वे जर उपजत असतील , तर माणूस अनैतिक गोष्टी करतोच कसा ? "त्याचा निरुपाय असतो " असे सांगून उत्तर पूर्ण होते काय ? उत्तर :- तुमची अडचण लक्षात आली. माणूस जर जन्मत:च नीतिमान आहे तर तो अनैतिक कृत्ये करण्यास कसा प्रवृत्त होतो? असा तुमचा प्रश्न आहे. असे पाहा मानवी मेंदू हे जगातील सर्वांत आश्चर्यकारक, अत्यंत गुंतागुंतीचे , व्यामिश्र असे इलेक्ट्रो-केमिकल (विद्युत्-रासायनिक) यंत्र आहे. माणसाची बुद्धी आणि मन या अमूर्त गोष्टी आहेत. त्या मेंदूत उद्भवतात. मेंदू वस्तुरूप आहे. आनंद, नैराश्य, राग, लोभ, मोह, दंभ, मत्सर, प्रेम, श्रद्धा इत्यदि भावना आहेत. अशा सर्व भावनांच्या समुच्चयाला मन म्हणायचे. निरीक्षणशक्ती, कल्पनाशक्ती, स्मरणशक्ती, तर्कशक्ती, इ. नऊ घटकांचा समुच्चय म्हणजे मानवी बुद्धी. एखाद्या गोष्टीविषयी निर्णय घेताना बुद्धी आणि मन यांच्यात द्वंद्व निर्माण होऊ शकते. (प्रत्येक वेळी होतेच असे नाही.) बुद्धीने घेतलेला निर्णय मनाला (म्हणजे भावनेला) नको असतो. तर मनाचा निर्णय बुद्धीला मान्य नसतो. खरे तर अंतिम निर्णय बुद्धीने घ्यायला हवा. मनावर बुद्धीचे नियंत्रण हवे. मनसस्तु परा बुद्धि:।[मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे.] असे गीतेत म्हटले आहे. ते योग्य वाटते. मनाने जर बुद्धीवर कुरघोडी केली तर माणूस अनैतिक कृत्य करतो. (मूलभूत नीतितत्त्वे बुद्धीत असतात. मनात नसतात.) उदाहरणार्थ चोरी करू नये हा बुद्धीचा निर्णय असतो. पण मनातील लोभ, अभिलाषा, या भावना जर वरचढ झाल्या तर बुद्धीचा निर्णय झुगारून देऊन माणूस चोरी करतो. तसेच हिंसा करू नये हा बुद्धीचा नियम असतो. पण क्रोध, मद, मत्सर, या मनोभावना प्रबळ झाल्या तर माणूस हिंसक बनतो. याप्रमाणे बुद्धीतील नीतितत्त्वांपेक्षा एखादी मनोभावना प्रबळ झाली तर त्या भावनेच्या प्रभावाखाली माणूस अनैतिक कृत्य करतो. प्रसिद्ध तत्त्वज्ञानी इमॅन्युएल कांट यांनी म्हटले आहे, "अगणित तारकांनी भरलेली ही आकाशाची अथांग पोकळी आणि मूलभूत नीतितत्त्वे मानणारी मानवी बुद्धी या दोन गोष्टींवर मी जों जों विचार करतो तों तों माझे मन आश्चर्याने भरून येते." जनुकीय प्रेरणांच्या विरुद्ध असलेली मूलभूत नीतीची संकल्पना मानवी बुद्धीत कशी उद्भवते ? कोठून येते ? अनैतिक आचरण केल्यावर मनाला टोचणी का लागते ? या प्रश्नांची उत्तरे कांही अंशीं देण्याचा इथे प्रयत्‍न केला आहे. या प्रश्नांची परिपूर्ण उत्तरे मी देऊ शकत नाही. याची मला जाणीव आहे. ***************************************************************
वर्गीकरण
चर्चा (काथ्याकूट)

प्रतिक्रिया द्या
64968 वाचन

💬 प्रतिसाद (128)
ए
एस Sat, 03/03/2018 - 13:46 नवीन
नीतिमत्ता आणि धार्मिक असण्याचा किंवा आस्तिक वा नास्तिक असण्याचा काहीही संबंध नाही. नीतिमान असण्यासाठी धार्मिक असणे वा देव वगैरे संकल्पनांवर श्रद्धा असणे हे आवश्यक असलेच पाहिजे असे नाही. तद्वतच, व्यत्यासही तितकाच खरा आहे. कोणी धार्मिक असेल किंवा आस्तिक असेल तर तो नीतिमान असेलच असे नाही.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 03/09/2018 - 14:54 नवीन
यनासर, देवावर आणि त्यांच्या भजनी लागलेल्या भक्तांवर लेखन येऊ द्या. बाकी लेखन वाचतो आहे. लेखन टाकून मोकळे होत चला. देवाळु लोकांना उत्तरं देत बसू नये असे सुचवावे वाटते. बाकी, लिहित राहा. :) शुभेच्छा...!!! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
ब
बिटाकाका Sat, 03/10/2018 - 10:11 नवीन
लेखन टाकून मोकळे होत चला.
हाहा, हे त्यांना वेगळं सांगायची गरजच नाही. ते मनोभावे हेच करत असतात.
देवाळु लोकांना उत्तरं देत बसू नये असे सुचवावे वाटते.
हो, उत्तरे देण्यासाठी सौजन्य आणि अभ्यास लागतो. या दोन्हीपैकी कमीतकमी एकतरी गोष्ट अ-देवाळुंकडे उणे असते असं माझा अनुभव सांगतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रचेतस Sat, 03/10/2018 - 10:23 नवीन
मी अ-देवाळू आहे, माझ्याकडे काय उणे आहे असे तुम्हास वाटते? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
इ
इरसाल Sat, 03/10/2018 - 11:48 नवीन
वल्ली तुमच्याकडे "देवावर विश्वास" याची कमी आहे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 03/10/2018 - 13:42 नवीन
इरसाल उत्तर ! ;) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल
प
प्रसाद गोडबोले Sat, 03/10/2018 - 17:38 नवीन
मी अ-देवाळू आहे, माझ्याकडे काय उणे आहे असे तुम्हास वाटते? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
ब
बिटाकाका Sat, 03/10/2018 - 18:41 नवीन
अ-देवाळू लोकांचे वैयक्तिक अनुभव याबद्दल बोलत आहे मी, तुमच्याशी फार ओळख नाही आणि तुमचे याबतीतील पुरेसे लेखन वाचले नसल्याने नक्की सांगू शकत नाही. प्रस्तुत लेखकांमध्ये वरीलपैकी काय कमी आहे याची सविस्तर चर्चा इतर अनेक सदस्यांनी केली आहेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
म
मार्मिक गोडसे Sat, 03/03/2018 - 15:19 नवीन
आस्तिकांवर ब्रह्मास्त्र .
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 Mon, 03/05/2018 - 10:29 नवीन
आमच्याकडे न फुटणार्‍या फटाक्याला एक शब्द वापरायचे. विसरलो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
स
सस्नेह Mon, 03/05/2018 - 10:45 नवीन
फुसका बार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
ज
जानु Sat, 03/03/2018 - 17:33 नवीन
देव आणि धर्म एक कसे? धर्म आणि युध्दे यात देवाचा आणि आस्तिक असण्याचा काय संबंध? आस्तिक माणुस धर्मासाठी युध्द करेनच असे नाही. नास्तिक एखाद्या घटनेत बाल की खाल काढतात मग युध्दे फक्त देव आणि धर्माच्या नावावरच झाली हे उथळ सत्य कसे मान्य करतात. त्यात इतर बाबी अधिक महत्वाच्या होत्या असे नाही का? तत्कालिन नेत्यांनी वैयक्तिक फायद्यासाठी त्याला देव आणि धर्माचे आवरण चढवले गेले हे नास्तिक फायद्यासाठी सोयीस्करपणे विसरतात. नास्तिक असणार्‍या कमुनिस्टांनी आजवर केलेल्या हत्या नक्कीच कमी नाहीत. (विदा मागु नये) मुळात प्रतिसाद देण्याची ईच्छाच नसते कारण प्रतिसाद मिळत नाही. दिवसेंदिवस लेखांची प्रतवारी खालावत चालली आहे.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Sat, 03/03/2018 - 17:40 नवीन
यनावाला,
दुष्कत्य केल्याची खंत त्याच्या मनात सतत सलत राहील. त्यामुळे आणखी पापे करायला तो प्रवृत्त होणार नाही. परिणामत: तो गुंडगिरीतून मुक्त होईल. सन्मार्गाला लागेल. अशी शक्यता अधिक आहे.
तुमची गांधीगिरी बघून ऊर भरून आला. आणि त्या भरल्या उराने केकाटावंसं वाटलं की नास्तिक गांधीगिरीपेक्षा मी आस्तिक असलेलाच बरा आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 03/03/2018 - 18:24 नवीन
यनावाला काही आस्तिकांना सुखाने जगू देणार नाहीत असेच दिसते. बा आस्तिकांनो, सांभाळा तुम्हीच तुमचा किल्ला ! :) ;) यनावालांची स्वतार्किक* विधाने वाचायचा आता वट्ट कंटाळा आहे, तेव्हा हा लेख न वाचताच आमचा पास ! :) * स्वतार्किक विधाने : इतरांसाठी निखळ अतार्किक असणारी, पण सांगणार्‍याचा ती पक्की तार्किकच्च आहेत असा ग्रह असलेली विधाने... "प्रायव्हेट लॉजिक" हा इंग्लिश शब्द याच्या जवळपास येणारा आहे. या नवीन मराठी शब्दावर मी माझा प्रताधिकार जाहीर करत आहे. हा शब्द यनावालांचे लिखाण वाच-वाचून मला सुचला, तरीही यनावालांना त्याच्या प्रताधिकारातील हिस्सा देणे मला मान्य होणार नाही, हे जाहीर असावे ! =)) =)) =))
  • Log in or register to post comments
प
पुंबा Mon, 03/05/2018 - 09:36 नवीन
बाकी ठीकच..
हा शब्द यनावालांचे लिखाण वाच-वाचून मला सुचला, तरीही यनावालांना त्याच्या प्रताधिकारातील हिस्सा देणे मला मान्य होणार नाही, हे जाहीर असावे !
हे निरर्थक आहे. कुणामुळे काय सुचले यावर प्रताधिकार अवलंबून नसतो ना? की माझी समजूत चुकीची आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 03/05/2018 - 10:10 नवीन
यनावालांची अतार्किक विचारशैली पाहता, ते कोणताही अतार्किक दावा करू शकतात. तेव्हा हा केवळ धोकाप्रतिबंधक उपाय आहे. :) त्या प्रतिसादात "=)) =)) =))" ने दर्शविलेला इनोद समजून घ्या हो, भाऊसायेब ! =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा
स
सांरा Sat, 03/03/2018 - 18:57 नवीन
लोक चांगली कामे करतात. वाईट लोक वाईट कामे करतात. चांगल्या लोकांनाही वाईट कामे करायला लावणारी गोष्ट म्हणजे धर्म.
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 Mon, 03/05/2018 - 10:32 नवीन
लिहाच बाई तुम्ही तर्कशास्त्र.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सांरा
स
सांरा Wed, 03/07/2018 - 04:38 नवीन
मुद्दा १ मी पुरुष आहे हो. मुद्दा २ मी चुकीचे के बोललो? जर एखादा धर्मपरायन, कुटुंब वत्सल, सज्जन प्राणी, "death to infidels" म्हणत हत्याकांड करत असेल, तर चूक कोणाची?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
ह
हरवलेला Sat, 03/03/2018 - 19:08 नवीन
#मीच लै शाना, #अज्ञानी लोक्स, #देणार नाही प्रतिसाद (आम्ही नाही जा !!!) वगैरे वगैरे ...
  • Log in or register to post comments
न
नाखु Sat, 03/03/2018 - 19:19 नवीन
म्हणजे काय? धार्मिक म्हणजे काय? कर्मकांड करणारा सश्रद्ध म्हणजे काय? सामान्यतः​ श्रद्धाळू आणि सश्रद्ध एकच​ का वेगवेगळे आहेत.? परंपरा आणि धार्मिक चालीरीती यांची बेमालूम सरमिसळ म्हणजे काय?का दोन्ही भिन्न भिन्न आहेत हेच मान्य करायचं नाहीये? अखिल मिपा आतातरी जागे व्हा आणि हस्तीदंती मनोर्यातला मोरपिसारा आवरा रे संघाचा किरकोळ सदस्य नाखु
  • Log in or register to post comments
स
सतिश म्हेत्रे Sat, 03/03/2018 - 21:05 नवीन
+१
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Sat, 03/03/2018 - 21:13 नवीन
यना साठी मुलभुत नीतीतत्वे अरे यना, तुझी सर्व मते एकतर ऐकीव माहीतवर आधारित आहेत किंव्वा वैदिक धर्माच्या अब्राहमिक इन्टर्प्रिटेशन्स वरुन काढलेली आहेत . थोडासा तरी अभ्यास केला असतास तर अशी अवस्था झाली नसती रे तुझी . आता वय हातातुन निघुन गेलय , तुला अभ्यासकरुन स्वतःचे मत बदलता अवघड झालंय ... तरीही अजरामरवतोप्रज्ञो विद्यामर्थंच साधयेत असे असल्याने चार समजुतीच्या गोष्टी सांगतोय , नीत ऐक बाळा कारण बालादपि सुभाषितं ग्राह्यम !!
"मानवी समाजाला यापुढे धर्माची आवश्यकता नाही. कारण धर्माचा मूळारंभ अज्ञान आणि भीती यांतून झालेला आहे. धर्मविषयक कल्पना या वस्तुस्थितीच्या अज्ञानातून आणि अज्ञात संकटाच्या भीतीतून आलेल्या आहेत."
धर्म ह्या शब्दाचा अर्थ भारतीय संस्कृतीत - नियत कर्म , नेमुन दिलेले कर्म अशा अर्थाने आहे . त्याचा उगम अज्ञान आणि संकटभयात नसुन मनःशांतीच्या शोधात आहे , भौतिक सुखाच्या शोधात आहे ! ऊध्र्व बाहुर्विरोम्येश न च कश्चिच्छण्योति मे। धर्मादर्थश्च कामश्च स धर्म किं न सेव्यते। (महाभारत, स्वर्गारोहणपक, 5/62)
धर्मग्रंथातून माणसाला नीतितत्त्वांची शिकवण मिळते. आपल्या हातून काही दुष्कृत्य, कुकर्म घडल्यास पाप लागेल, देव शिक्षा करील, अशी माणसाला भीती असते.
परत ऐकीव माहीती वरुन काढलेला निष्कर्ष ! मी आधीच म्हणलेलं तु गीता वाचली तरी आहेस का ह्या वर शंका आहे . आता तर स्पष्टच होते आहे की तु काहीच न वाचता उगाचच जिलब्या पाडत आहेस . हे पहा : सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ । ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि ॥ ३८ ॥ आपणयां उचिता । स्वधर्में राहाटतां । जें पावे तें निवांता । साहोनि जावें ॥ २२८ ॥ ऐसियां मनें होआवें । तरी दोषु न घडे स्वभावें । म्हणौनि आतां झुंजावें । निभ्रांत तुवां ॥ २२९ ॥ सुख दुख सम मानुन जो नियत कर्म करेल त्याला पाप पुण्याची भीती नाही असे स्पष्ट लिहिले आहे गीतेत ! धर्म तुम्हाला पाप पुण्याची भीती दाखवत नाही तर जी भीती तुम्हाला वाटत आहे तिच्या पलीकडे जायचा मार्ग दाखवतो.
१) हेतुत:(म्हणजे जाणून-बुजून ) खोटे बोलू नये. २) चोरी करू नये. ३) कुणाची फसवणूक करू नये. ४) कुणावर बळजबरी, अत्याचार करू नये. ५) कुणा माणसाची हिंसा करू नये.
उगी उगी ! # जप्_हो_श्याम १) संकटामध्ये जीव वाचवण्यास खोटे बोलावे. त्यात काहीपाप नाही. #नरोवाकुंजरोवा. काफीरांशी तर कायम खोटे बोलायला हरकत नाही #तकीया २) बावळट लोकांची फसवणुक करायला हरकत नाही . जग आहे हे असे आहे. जो स्वतःचा मेन्दु वापरुन फसवणुक टाळु शकेल तो तगेल, बाकीचे न तगलेलेच उत्तम #सरव्हायवलऑफदफिटेस्ट ३) कुणा अहिंसक माणसाची हिंसा करू नये. जो मुळातच हिंसक आहे त्याच्या हिंसेला प्रतिकार करणे म्हणजे हिंसा नव्हे. कोणी तुम्हाला एक काना खाली मारली तर एक क्षण आपले काही चुकले का आणि चुकले असेल तर आपल्याला शिक्षा करायचा ह्याला नैतिक अधिकार आहे का ह्यावर विचार करावा , दोन्ही उत्तरे होकारार्थी असेल तरच दुसरा गाल पुढे करावा , एकजरी उत्तर नकारार्थी असल्यास त्याचा हात तोडुन त्याच्या हातात द्यावा.
".....मामेकं शरणं व्रज । अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच :।
अर्धवट ज्ञानातुन आलेले अर्धवट ज्ञान ! लेका जरा पुर्ण श्लोक तरी वाच उगाच काही बाही अर्थ काढण्या आधी . नसेल कळत तर माऊली काय म्हणतात ते तरी पहा : सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज । अहं त्वां सर्वपापेभ्यो मोक्ष्ययिष्यामि मा शुचः ॥ ६६ ॥ तैसें स्वर्गनरकसूचक । अज्ञान व्यालें धर्मादिक । तें सांडूनि घालीं अशेख । ज्ञानें येणें ॥ १३९१ ॥ तैसें धर्माधर्माचें टवाळ । दावी अज्ञान जें कां मूळ । तें त्यजूनि त्यजीं सकळ । धर्मजात ॥ १३९५ ॥ म्हणौनि तयाचें कांहीं । चिंतीं न आपुल्या ठायीं । तुझें पापपुण्य पाहीं । मीचि होईन ॥ १४१२ ॥ अर्जुना, तु स्वर्ग नरक पाप पुण्य ह्यांचा विचार करु नकोस, धर्म काय अधर्म काय ह्याचाही विचार करु नकोस .... माझ्या ठायी चित्त लीन कर , जसा मी योगात स्थिर राहुन , सुख दु:ख , यश अपयश , स्वर्ग नर्क , पाप पुण्य असला सर्व द्वैत भाव टाकुन कर्मे करतो तशीच तुही कर , एकदा तुला ते जमले , की मग मी आणि तु असा काही फरक उरलाच नाही ना ! तूं योगयुक्त होऊनी । फळाचा संगु टाकुनी । मग अर्जुना चित्त देउनी । करीं कर्में ॥ २६७ ॥ असो, तुला सांगुन खास काही फायदा होईल तुझा असे नाही . तुला कळत नाही ते सारे खोटेच असा जो गोंडस समज घेवुन तु बसला आहेस त्याची खिल्ली उडवायला मजा येते म्हणुन हा येवढा प्रतिसाद ! उगी उगी ! # जप्_हो_श्याम
  • Log in or register to post comments
न
नेत्रेश Sun, 03/04/2018 - 07:51 नवीन
यनावाला यांचे लेख जेवढे जास्त वाचत आहे तेवढ्या जास्त तार्कीक विसंगती दीसत आहेत. आता तर त्यांचे लेख तर्काला सोडुन लिहीलेले, तद्दन प्रचारकी पठडीतले वाटु लागले आहेत. एवढे की एखादा बाबा/बुवाचा परमभक्त भेटला की तो काय बोलणार हे माहीत असते, तेवढे यनावाला यांचे लेख predictable झाले आहेत. एकाच दिशेने लीहीलेले व एकाच विषयावर सतत दुगण्या झाडणारे. सत्याचा विपर्यास करणारे. संदर्भ सोडुन फक्त एखादे वाक्य उचलुन ते आप ल्या मुद्द्याच्या समर्थनासाठी वापरणारे, म्हणुन विश्वासार्हता पुर्ण गमावलेले. ".....मामेकं शरणं व्रज । अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच :। " चे उदाहरण देणार होतो पण वरच्या प्रतिसादात मार्कस ऑरेलियस यांनी अतिशय उत्तमरीत्या ते दीलेले आहे, तेव्हा द्वीरुक्तीची गरज नाही. बोलायला खरच वाईट वाटते पण हल्ली यनावाला कडुन खुपच अपेक्शाभंग होत आहे.
  • Log in or register to post comments
म
मारवा Sun, 03/04/2018 - 12:36 नवीन
प्रश्न :- नास्तिक माणसे धर्मग्रंथ वाचत नाहीत. मग त्यांना नीतितत्त्वे कशी कळतात ? कोण शिकवते ? उत्तर :- मूलभूत नीतितत्त्वे पाच आहेत. ती अशी : १) हेतुत:(म्हणजे जाणून-बुजून ) खोटे बोलू नये. २) चोरी करू नये. ३) कुणाची फसवणूक करू नये. ४) कुणावर बळजबरी, अत्याचार करू नये. ५) कुणा माणसाची हिंसा करू नये. एक अत्यंत विनम्र विनंती अशी आहे की तुम्ही फिलॉसॉफी ऑफ एथिक्स चा किमान प्राथमिक अभ्यास एकदा तरी करुन बघा. किमान अत्यंत प्राथमिक पातळीवर जरी अगदी बेसीक जरी तुम्ही फिलॉसॉफी ऑफ एथिक्स चा अभ्यास केला तर तुम्हाला वरील विधानाच्या मर्यादा सहज लक्षात येतील. अतीव विनम्रतेने हे सुचवीत आहेत याची कृपया नोंद घ्यावी. The following examples of questions that might be considered in each field illustrate the differences between the fields: Descriptive ethics: What do people think is right? Normative ethics (prescriptive): How should people act? Applied ethics: How do we take moral knowledge and put it into practice? Meta-ethics: What does "right" even mean? वरीलपैकी दोन मुलभुत किमान Normative आणि Meta-ethics या दोनच शाखा जरी बघितल्या सुरुवातीला तरी प्रत्येक शाखेच्या अगदी मुलभुत विश्लेषणासाठी ही दोन अगदी बेसीक पुस्तके जरी तुम्ही अभ्यासलीत तर तुम्हाला एथिक्स चा आवाका किती विशाल आणि व्यामिश्र आहे याची नक्की कल्पना येइल. ही माझ्या अल्प अनुभवाप्रमाणे अत्यंत उत्तम बेसीक व बेस्ट फॉर बिगीनर्स अशी पुस्तके आहेत व साधारणतः २०० पानाच्या आसपास प्रत्येकी आहे. याने तुम्ही ज्या मर्यादेत निती या विषयाकडे बघत आहात तो दृष्टीकोण कदाचित व्यापक व्हावयास मदत होइल असे मनापासुन वाटते. १- Ethics: The Fundamentals - Julia Driver या पुस्तकात प्रामुख्याने Normative ethics च्या अंतर्गत येणार्‍या विविध थेअरीजचे अप्रतिम असे मुलभुत विवेचन आहे उदा. Consequentialism, Kantian ethics. इत्यादी. लेखिका Normative ethics च्या विख्यात एक्सपर्ट आहेत. २ Metaethics: An Introduction- Andrew Fisher हे देखील एक अप्रतिम असे मुलभुत बेसीक टेक्स्टबुक आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक प्रकरणावर स्वतंत्र अशी ग्संदर्भ रंथसुची लेखकाने फार परीश्रमाने काळजीपुर्वक जोडलेली आहे. जी तुम्हाला विशीष्ट विषयाच्या अधिक खोलात जाऊन धांडोळा घेण्यास उपयुक्त आहे. अत्यंत सोप्या भाषेत अतीशय वाचनीय असा हा ग्रंथ आहे. एकवार अवश्य वाचुन बघावा. या साठी पुरेसा वेळ नसल्यास किमान खालील दुवे उपयुक्त ठरतील. १- https://www.philosophybasics.com/branch_ethics.html#Introduction २- https://www.iep.utm.edu/ethics/ यालाही वेळ नसेल तर किमान Alastair Norcross चा हा एक अप्रतिम पेपर PUPPIES, PIGS, AND PEOPLE: EATING MEAT AND MARGINAL CASES हा तरी मुद्दाम वाचुन पहावा. हे अशासाठी म्हणतोय की निती तत्वाची वा निती प्रश्नांची किमान व्यामिश्रता याने लक्षात यावयास मदत होइल. याचा दुवा इथे. http://spot.colorado.edu/~heathwoo/readings/norcross.pdf
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Sun, 03/04/2018 - 16:01 नवीन
यना जर ही अशी अभ्यासपुर्ण चर्चा करत असते तर काय मजा आली असती. मलाही निरेश्वर वादी तत्वज्ञानाविषयी प्रचंड आदर आहे , मुळातच ९ भारतीय दर्शनांपैके ६ वैदिक आस्तिक दर्शने आणि त्यातील ५ निरीश्वरवादी म्हणाजे टोटल ९ पैकी ८ निरीश्वरवादी असे चित्र आहे ! ( आणि जे एक ईश्वरवादी दर्शन आहे ते ही तो इश्वर तुच आहेस असे ठाम पणे प्रतिपादन करणारे अद्वैत दर्शन!) जर कोणत्याही हुच्च अलौकिक शक्तीची भीती नसेल तर माणुस कसा वागेल, कसा वागला पाहिजे हा अतिषय खोल आणि चिंतनीय विषय आहे ! भगवद्गीतीत क्रुष्णाने अप्रतिम उत्तर दिले आहे , " कशाला बे पापपुण्याचा विचार करतो, जे होईल ते होईल. तु तुझं काम कर बेस्टपैकी. बाकीचे मी बघतो " ह्याच परीस्थितीत , जेथे युध्द हे न्य्याय्य आहे, सत वि. असत , " गुड वि. बॅड ह्युमन क्वालिटीज"क्वालिटीज, असे आहे , अशा परिस्थीत, बुध्दाने काय म्हणले असते , महावीरांनी काय म्हणले असते , चार्वाकाने काय म्हणाले असते हा खुप इन्टरेस्टिंग विचार आहे. असो पण यनाकडुन असली व्यॅल्यु अ‍ॅड्ड चर्चा अपेक्शित नाही, यना आता काहीही नवीन विचार करण्याच्या समजुन घेण्याच्या पार गेलाय. आता आतातायी पणे स्वतःच्या मताचे घोडे दामट्टत रहाणे हेच त्यांच्या हातात आहे पण आपण तसे नाही, आपण नवीन वाचु शकतो , नवीन शिकु शकतो, चुकीचे असेल एखादे मत तर बदलुही शकतो . उध्दरेत आत्मना आत्मानम !! बाकी वरील लिंन्कस च्या निमित्ताने जस्टीस अ‍ॅट हार्वर्ड ची आठवण झाली , तुम्ही कदाचित पाहिले असेलच ते ! पण तरीही त्याची लिन्क शेयर करत आहे : - मार्कस ऑरेलियस अ‍ॅन्टोनियस ऑगस्टस
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
म
माहितगार Tue, 03/06/2018 - 05:41 नवीन
यनांचा लेख टाकण्याचा वेग चांगला आहे त्या वेगाने वाचन आणि प्रतिसाद देणे जमत नाहीए. पण एक नक्की निती मुल्ल्य, संकेत, नियम आणि कायद्यांच्या सामाजिकीकरण या विषयांचा व्याप हा फार मोठा आहे. निती मुल्ल्य, संकेत, नियम आणि कायद्यांच्या सामाजिकीकरणात श्रद्धेचे प्रयोजन आणि उपयोजन हा स्वतंत्र धागा चर्चेचा विषय आहे. श्रद्धेचे प्रयोजन आणि उपयोजन हा स्वतंत्र धागा चर्चा लेख लिहिण्याचे मनात आहे पण सवड होत नाही आहे. मारवा आणि आपले प्रतिसाद माहितीपूर्ण आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
म
मारवा Tue, 03/06/2018 - 19:03 नवीन
तुम्हाला गीते त रस दिसतो म्हणुन एक व्हिडीयो श्री राजीव साने यांचे विश्लेषण असलेला सुचवावासा वाटतो. कदाचित आपल्याला आवडेल. अगोदर बघितलेला नसल्यास एकवेळ अवश्य बघावा असे आवर्जुन सुचवतो. दुवा इथे आहे https://www.youtube.com/watch?v=drwrrWyLoGg तसेच खालील साने यांनीच एथिक्स च्या च विषयावरील सॅम हॅरीस च्या द मोराल लॅन्डस्केप च्या अनुषगांने केलेले विवेचन अत्यंत विलक्षण मुलगामी असे आहे. हा व्हिडीयो ही अतिशय श्रवणीय व चिंतनीय असा आहे. व जर सॅम हॅरीस च्या मांडणीचा पुर्वपरीचय नसेल तर सॅम हॅरीस च्या मांडणी ला जाणुन घेण्याची तहान हे ऐकल्यावर निर्माण होइल असे मला आपले वाटते. . सॅम हॅरीस चा प्रकल्प वैज्ञानिक वैचारीक क्षेत्रातील महत्वाकांक्षेची गरुडझेप दाखवतो. व एथिक्स चा विचार किती सायंटीफिक वे ने करता येतो याचा प्रत्यय देतो. एकुण अतिशय श्रवणीय अशा या व्याख्यानाचा दुवा इथे. https://www.youtube.com/watch?v=BYdxdotf1kg
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
म
मारवा Tue, 03/06/2018 - 19:14 नवीन
राजीव साने यांनी स्वतः त्यांच्या ब्लॉगवर गीतेवरील त्यांचे मराठी पुस्तक 'नवपार्थह्रद्गत' उपलब्ध करुन दिलेले आहे. ते इथे पिडीएफ मध्ये उतरवुन घेता येते. http://rajeevsane.blogspot.in व्याख्यानातील सॅम हॅरीस च्या संबंधित पुस्तकावरील माहीती इथे. https://en.wikipedia.org/wiki/The_Moral_Landscape
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 03/06/2018 - 19:40 नवीन
महाभारत व रामायण यांच्या लेखनाची काही वैशिष्ट्ये एकमेकाविरुद्ध आहेत. प्रक्षिप्त भाग सोडले तर महाभारत हे एकंदर इतिहासलेखनासारखे आहे. त्यात कोणत्याच पात्राचे, अगदी कृष्णाचेही, उदात्तीकरण नाही (जे उदात्तीकरण झाले ते नंतरच्या काळात झाले). जसे झाले आहे तसे लिहावे असे लिहिल्यासारखे आहे. त्यामुळे, प्रत्येक पात्रामध्ये असलेल्या गुणाबरोबर त्याचे दोषही येतात. प्रसंगपरत्वे त्यांनी केलेल्या कृती कधी सोज्वळ, कधी चलाख, कधी मानसिक गोंधळांनी भरलेल्या, कधी अनितीमान, कधी सरळ सरळ भिती-लोभ-स्वार्थावर आधारलेल्या, कधी अतर्क्य, कधी अनाकलनिय, इत्यादी आहेत. सर्व पात्रांच्या कृती मानवी भावना व स्खलनशील स्वभावात बसतील अश्याच आहेत. त्यामुळे, श्री राजीव साने महाभारतातील अनेक पात्रांच्या कृती तार्किक नाहीत असा प्रश्न उभा करतात तेव्हा आश्चर्य वाटते. सर्वसामान्य मानवी व्यवहारात 'प्रामाणिक, परखड व न्यायिक तर्क' हा नेहमीच 'तात्कालीक वैयक्तिक भिती व लोभ' या भावनांकडून सतत मात खात आला आहे... आणि असे सगळे हितसंबंध सांभाळूनही अंतिम यश पदरात पडण्याची खात्री नसतेच, नाही का ? याविरुद्ध, रामायण हे देवत्व/अवतारीपण सिद्ध झालेल्या किंवा सिद्ध करायचे असलेल्या मानवाचे काव्यमय चरित्रलेखन असल्यासारखे आहे. त्यात राम आदर्श मानव आहे. तो कधीच चूक नसतो. चूक वाटण्यासारखी कृती तो करत असल्यास, त्याचे समर्थन करणारी उपकथा आहे. त्याचे देवत्व सिद्ध करण्यासाठी त्याच्या हाताने/पायाने घडवलेले चमत्कार आहेत, इ इ. यामुळेच बहुतेक, महाभारतावर अनेक टीका / विश्लेषणे लिहिली गेली. रामायणाच्या बाबतीत तसे न होता, केवळ रामस्तुतीचे ग्रंथ अथवा काव्ये लिहिली गेली. इरावती कर्वे यांनी "युगान्त" नावाची महाभारतावरची अत्यंत सुंदर टीका मराठी व ईंग्लिशमध्ये लिहिली आहे. सर्व पात्रांना केवळ मानवच समजून, त्यांचे वर्तन त्या काळात आणि परिस्थितीत, का व कसे झाले असावे याचा सुंदर आढावा या पुस्तकात आहे. अत्यंत अभ्यासू लेखन असले तरीही, हे पुस्तक एकदा हातात घेतल्यावर पुरे होईपर्यंत खाली ठेवणे कठीण होते, इतकी त्याची शैली सहजसुंदर व रोचक आहे. खूप मान्यवर असलेल्या आणि अगोदर अनेक टीका उपलब्ध असलेल्या एखाद्या ग्रंथावर तटस्थ आणि अभ्यासू विश्लेषण कसे लिहावे याचा हे पुस्तक वस्तूपाठ आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 03/06/2018 - 19:58 नवीन
अजून एक... महाभारतातला कृष्ण हुशार, चलाख, राजकारणी मानव वाटतो. मात्र, नंतर त्याला देवत्वाला पोहोचवल्यावर लिहिले गेलेले साहित्य रामायणाच्या पठडीत मोडते. गंमत म्हणजे कृष्णाच्या जीवनात त्याला विरोध करणार्‍या अहिर मंडळींनीच त्याच्या मृत्युनंतर त्याला देवत्व देण्याची सुरुवात केली असे म्हणतात !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
स
स्वधर्म Wed, 03/14/2018 - 07:05 नवीन
मारवाजी, खूप धन्यवाद. राजीव साने यांचा दुवा पाहिला. गीतेबाबत साने म्हणतात ते पटण्यासारखं अाहे. पण गोची अशी अाहे, की, ज्यांना खुल्या मनाने गीतेबाबत अभिमान, परंपरा यांचा दबाव न घेता, खुलेपणानर गीतेकडं पहायचं अाहे त्यांनाच ते पटू शकतं. ज्यांनी अाधीच ‘बाजू’ घेतलेली अाहे, त्यांना काहीही पटणं अवघड अाहे. एकदोन गीता अभ्यासक/ अनुयायी मित्रांशी झालेल्या संवादावरून असे वाटते, की साने यांच्यासारख्यांचे म्हणणे ऐकाताना त्यांची निष्ठा मध्ये येते, व शेवटी ‘त्यांना’ गीता समजलेलीच नाही, अशा प्रकारे चर्चेचा शेवट होतो. सॅम हॅरीसचे व्याख्यानही बघतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
A
arunjoshi123 Mon, 03/05/2018 - 12:08 नवीन
https://www.philosophybasics.com/branch_ethics.html#Introduction
हे पान वाचनीय आहे. त्यातला मोराल निहिलिझम यनावालांसाठीच लिहिला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
आ
आनन्दा Mon, 03/05/2018 - 14:13 नवीन
आपल्याला बुवा तुकोबांच्या एक वाक्यात सगळयांचे सार आहे असे वाटते. पुण्य पर उपकार पाप जे परपीडा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
प
प्रकाश घाटपांडे Tue, 03/06/2018 - 06:33 नवीन
होय तिथे काहि अस्तिक नास्तिक भानगड नाही. अष्टादष पुराणेषु व्यासस्य वचनद्वयम| परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनम ||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
य
यश राज Sun, 03/04/2018 - 14:56 नवीन
काय तत्वज्ञान ते यना......! स्वतःचे प्रश्न आणि स्वतःच उत्तर आवरा........
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 Mon, 03/05/2018 - 06:45 नवीन
Image removed.
धर्मावरून भीषण युद्धे झाली आहेत.
यनांना देव, धर्म, श्रद्धा, परंपरा, इ इ म्हटलं कि त्यापुढं काय शब्द लावायचे याचा त्यांना विचारदेखील करावा लागत नाही. ----------------------------------------- आम्ही ऐकलेली भयानक युद्धे अशी: १. राम आणि रावणाचे युद्ध २. कौरव पांडवांचे युद्ध ३. पहिले महायुद्ध ४. दुसरे महायुद्ध ५. पानीपतचे तिसरे युद्ध ६. १९४७, १९६२, १९६५, १९७१, २००२ कारगील.... ७. ...दहशतवाद ८. स्पेनमधला रिकाँक्वेस्ता ९. (ब्रिटीशपूर्व प्राचीन अखंड भारत - ब्रिटीश अखंड भारत) या भागासाठीच्या लढाया १०. मध्ययुगातल्या लढाया ११. भारतीय रांजांमधल्या लढाया १२. .... १३ .... अजूनही आहेत, पण असो. ७, ८ सोडून यातलं कोणतं युद्ध धार्मिक होतं? पहिली दोन तर काल्पनिक आहेत. नसली तरी वैदिक-अवैदिक अशी नाहीत. दोन्ही महायुद्ध तर चर्चची सत्ता गेली म्हणून झाली. कोणी पुरोगामी माजला तर चर्च त्याच्या पार्श्वभागावर लाथ घाले नि युरोप खंड त्या मानाने शांत राही. चर्च अस्तंगत झालं म्हणून दोन वैश्विक महायुद्धे झाली. नै का? स्वतंत्र भारताचं कोणतं युद्ध धार्मिक झालं? अलेक्झांडरनं आपल्या वैदिक क्षत्रिय पुरुला हरवलं पण अलेक्झांडर कोणत्या धर्माचा प्रसार करायला आला होता? मोंगोल वंशानं इस्लाम स्विकारला तेव्हा त्यांचा रानटीपणा कमी झाला. अगदी इजराईलचं युद्ध भूयुद्ध आहे.. जर असं असेल, तर धार्मिक युद्ध नक्की कोणतं?????????????????????????? ================================ सेक्यूलर राजांनी केलेली धार्मिक युद्धे आता उरले शिवाजी, राणा प्रताप, आणि पृथ्वीराज चौहान. आणि समोर सगळे मुसलमान आक्रमक. अहो पण तुमीच पुरोगामी आम्हाला उगाळून उगाळून सांगत असता हिंदूंचे सेनापती, सैनिक, हेर कसे मुस्लिम होते आणि त्या सुलतानाचे कसे हिंदू होते. वर पुढे म्हणता, इतकेच काय त्यांचे धार्मिक गुरु देखील दोन्ही धर्माचे होते. कधी कधी काही प्लाझमा स्टेट (ही द्रव्याची चौथी अवस्था) पुरोगामी तर असं म्हणतात की मुस्लिमांनीच नव्हे तर मराठ्यांनी पण देवळं पाडली. काही तरी एक नीट ठरवा ना राव. एकतर म्हणा शिवाजी हिंदूत्ववादी राजे होते आणि असल्या राजांनी धार्मिक युद्धे करून केंद्रात शांतीप्रिय परधर्मी राजांच्या सुखाचा बट्ट्याबोळ केला. किंवा असं म्हणा कि शिवाजी सेक्यूलर होते आणि त्यांच्यासारख्यांकडून जगात धार्मिक युद्धे झालेली नाहीत. पण तुम्ही फार सोयीचं बोलता. मोघम बोलताना म्हणता धर्मांत महाभयंकर युद्धे झाली नि भूतो न भविष्यति इतके रक्त सांडले. तेच हिंदू आणि मुसलमान राजांच्या नावांची लिस्ट बनवली कि प्रत्येकापुढे सेक्यूलर म्हणून टिक करता. त्याच राजांत झालेली युद्धे धार्मिक आणि राजे सेक्यूलर????????????????? सगळेच राजे सेक्यूलर तर धार्मिक युद्धे झाली कुठून? बाबर नि राममंदिर पाडणारा त्याचा सरदार हे देखील एक सेक्यूलर, शूर, राज्याकांक्षी, सर्वधर्मसमभाववादी असेच लोक होते ना? जिर्णोद्धार व्हावा म्हणूनच त्यांनी तिथले मंदिर (पाडले असल्यास) पाडले असेल. देशात एकापेक्षा एक मुस्लिम सेक्यूलर राजे राज्य करत असताना, आणि काफिरांच्या मंदिरांचा उद्धार करत असताना, जे लोक त्यांचा विरोध करत होते ते धार्मिक हिंदू कसे? ते तर दांभिक हिंदू. आणि जे दांभिक नव्हते त्यांच्या इतक्या काय त्या अतिरेकी यवन अस्पृश्यातेच्या कल्पना कि त्यांना जिर्णोद्धारही करू देऊ नये? मग त्यांनी सहिष्णू, परधर्मपरोपकारी मुस्लिमांशी केलेले युद्ध धार्मिक युद्ध कसे? ते तर अतिरेकी/ दांभिक हिंदू वि. सेक्यूलर मुस्लिम असे युद्ध झाले. ( प्रश्न विचारताना मी सेक्यूलर पद्धत वापरली आहे. नियमाप्रमाणे सर्व धर्म सारखेच चांगले वाईट असे उदाहरण दिले आहे. प्रत्यक्षात काही का आसेना.) हे उदाहरण असो. सोप्पं सांगा- शिवाजीच्या लढाया ह्या धार्मिक का अधार्मिक? का? ==================================================== तरी हे धर्म ३०००-५००० वर्षांपासून आहेत. पुरोगामी लोक फक्त गेल्या १००-२०० वर्षांपासून आहेत. पुरोगामी लोकांनी जेवढ्या हत्या केल्या त्यात ते एकामागे एक स्वतःचेच रेकॉर्ड मोडत असतात. धार्मिक लोक फारच खुजे आहेत रक्तपातांत पुरोगाम्यांपेक्षा. पुरोगाम्यांचा एक प्रकार - डाव्या निरिश्वरवादी कम्यूनिस्ट लोकांनी जगात विविध ठिकाणी एकूण किती हत्या केल्या आहेत त्याचा एकूण आकडा वाचा यनावाला. तो कळण्यासाठी तुम्हाला अजून थोडं गणित शिकावं लागलं तर शिका. https:/en.wikipedia.org/wiki/Mass_killings_under_Communist_regimes ८ ते १० कोटी थेट हत्या????????????????? बाकी अन्याय माफ. याच्यामधे "मानवजातीच्या प्रगतीसाठी, कल्याणासाठी, शुद्धतेसाठी" कापून काढलेले उ अमेरिका, द. अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया सारखे खंड जोडा. मानवहत्येचं प्रचंड पातक असलेले प्रगतीशील, आधुनिक, पुरोगामी लोक तिथे राहतात, राहू इच्छितात. वर मग डार्विनची कृपादृष्टी झाली ते जोडा. उदा. निर्पिग्मिकरण मग हिटलरचे आर्य नावाचा वैज्ञानिक उच्च वंश जोडा. अँटी-सेमिटिझम चिल्लर जाऊ द्या, ते ही खूप असेल म्हणा. आधुनिक शोषणाची तर आपल्याला सवय आहे म्हणून ते फुकट. युद्धे ही राजकीय असतात ना? एक जनाची नाहीतर मनाची म्हणून प्रकार असतो. पुरोगाम्यांच्या उदयानंतर १०-२० वर्षांतच त्यांनी धर्माचे क्रूरपणाचे १० हजार वर्षांचे रेकॉर्ड तोडून काढले. फ्रेंच, रशियन वा कोणतीही पाश्चात्य राज्यक्रांती पाहा. धार्मिक हत्या देखील झाल्यात, पण छुटपुट. पण ते कुणी म्हणावं? पुरोगाम्यांनी? त्यांना नैतिक अधिकार आहे का? उपदेशात्मकपणे घेतलं तर - चला, हजारो हत्या करणे थांबवून आपण आता कोट्यावधी हत्या करू यात, असं हे विधान निघतं. ============================================== शेवटी हा संघाचा केरळावरचा एक व्हिडिओ. संघावाले जे काय खोटं बोलताहेत ते खोटं म्हणा. पण केरळच्या लोकांना कधी बोलला, भेटलात? राजकारणावर चर्चा केलीत? कोण्या कम्य्युनिस्टाशी संवाद केलाय? कारण नसताना खरं खोटं म्हणू नका, जी काय विधानं असत्य आहेत ति लागलीच चेक करू शकता. ===================================================== पुरोगाम्यांचे आतापर्यंत दोन अणुबाँब लोकांवर फुटलेत, (तसे चाचण्यांसाठी हजारो फुटलेत), पण उरलेले आता पर्यंत फुटलेले नाहीत म्हणजे पुढे शक्यता शून्य आहे असं नाही. पुढे शक्यता शून्य आहे असं आपण मूर्खासारखं मानतो. राजकिय सत्तांची सर्व पुरोगामी विकृती बाहेर काढायला एक मानवी वा नैसर्गिक झटका खूप आहे. अर्थातच पुरोगाम्यांनी केलेल्या हत्यांच्या सांख्यिकीमधे तो आकडा, जगाची लोकसंख्या, जोडायला मी नसेन.
  • Log in or register to post comments
म
मामाजी Tue, 03/06/2018 - 05:33 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Tue, 03/06/2018 - 09:26 नवीन
हिटलर लालझेंडावाल्यांचा आजोबा होता की भगवा झेंडावाल्यांचा मानलेला पणजोबा होता ? सगळी उदाहरणे चीन अन जपान अन जर्मनी. मग इथल्या म्युझियममध्ये भाले , तलवारी , बर्ची , ध. बा . वगैरे असतात , त्याने नेमके काय केले जात होते ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मामाजी
A
arunjoshi123 Tue, 03/06/2018 - 12:15 नवीन
मग इथल्या म्युझियममध्ये भाले , तलवारी , बर्ची , ध. बा . वगैरे असतात , त्याने नेमके काय केले जात होते ?
बैलाच्या सांगाड्यात शिंगे सापडली म्हणजे बैल अखंड आयुष्य प्रत्येकच गोष्ट शिंगावर घेत होता असं नसतं. ===================== तिथल्या तलवारी पाहून ते हमेशा भांडत होते हे तुम्हाला पटलं असेल तर आदिवास्यांना धातुशास्त्र देखील माहित होतं म्हणा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
स
सुबोध खरे Tue, 03/06/2018 - 14:27 नवीन
मोगा खान जगभरात १४,९०० अण्वस्त्रे आहेत. म्हणजे जगात अणुयुद्धे चालूच असतील नाही? भारताकडे १२० आणि पाकिस्तानकडे १३० अण्वस्त्रे आहेत पण आपण काही अणुयुद्ध केल्याचे आठवत नाही. आपले तर्कशास्त्र म्हणजे अजब आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
M
manguu@mail.com Tue, 03/06/2018 - 18:28 नवीन
ते घोडा चतुर बाजूला ठेवा. अणुबाँब बाळगणारयाने तो वापरण्याची probability आणि तलवार , भाला यांचा वापर होण्याची probability सारखी नसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Wed, 03/07/2018 - 07:20 नवीन
काय सांगताय? भारतात २६ लाख लायसन्स असलेल्या बंदुका आहेत. ( बिना लायसन्स याच्या दुप्पट असतील) म्हणजे साधारण ८० लाख तरी. पण २०१४ मध्ये एकंदर गोळी लागल्याने मृत्यू झालेल्यांची संख्या ३६५५ इतकी आहे (यात दहशतवादी आणि लष्करी आणि निमलष्करी दलांचे सैनिकही येतात.) https://www.washingtonpost.com/world/asia_pacific/india-had-the-one-of-the-strictest-gun-laws-in-the-world-it-just-got-tighter/2016/08/01/affd9422-51da-11e6-b652-315ae5d4d4dd_story.html?utm_term=.dfa61e19bf55 गृहखात्याच्या अहवाल -सैनिक आणि दहशतवादी यांचा आकडा http://mha.nic.in/sites/upload_files/mha/files/AR(E)1516.pdf ८० लाख बंदुका असताना फक्त ३६५५ लोक मेले. चाकू, सुरे, तलवार, गुप्ती यांचा आकडा अजूनच जास्त असेल. याबद्दल आपल्याला काय म्हणायचे आहे. का परत थुंकी इकडनं तिकडे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
M
manguu@mail.com Wed, 03/07/2018 - 09:49 नवीन
कुणीतरी अणुबाँब वापरला नाही म्हणून कुणीतरी तलवारही वापरलीच नसणार. म्हणजे श्रीमंत आप्पाजीराव झागिरदार यानी गेली वीस वर्षे घरात असुनही तलवार वापरली नाही . म्हणून जनाब मोगाखान ह्यान्नीही दाढीचे ब्लेड गेले वीस वर्षे वापरलेच नसणार !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Wed, 03/07/2018 - 14:13 नवीन
मोगाखान ना दाढी कुरवाळायची सवय आहे तर ते ब्लेड कसे वापरणार? जाता जाता -- थुंकी आता कोणत्या बोटावर आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
M
manguu@mail.com Tue, 03/06/2018 - 12:54 नवीन
अठरा अक्षौहिणी म्हणजे किती थेंब ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मामाजी
स
सुबोध खरे Tue, 03/06/2018 - 14:32 नवीन
एक तो घोडा बोलो या चतुर बोलो एकदा म्हणता रामायण आणि महाभारत "काल्पनिक" ( बाबरी मशिदीच्या वेळेस रामायण काल्पनिक म्हणायचं) नंतर म्हणता ते "सत्य" आहे. थुंकी या बोटावरून त्या बोटावर केली तरी ती आपल्याच बोटावर राहते हे त्रिकाल अबाधित सत्य अजून आपल्याला उमगलेले नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
A
arunjoshi123 Tue, 03/06/2018 - 17:52 नवीन
याला कोंच्याच मोगाकडे उत्तर नाही. सोयीचं बोलणे म्हणजे नास्तिकता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
R
Ram ram Tue, 03/06/2018 - 10:41 नवीन
माझा एक पर्रश्न इज्राइली जर मुस्लिम असते तर लढाई चालली असती काय? फार भ्रमात राहू नका. यनावाला मला तुमचे विचार पूर्णपणे पटतात.
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 Tue, 03/06/2018 - 12:11 नवीन
यनावाला मला तुमचे विचार पूर्णपणे पटतात.
आपण आपलीही मते यनावालां इतकी विस्तृत रुपात मांडावीत अशी विनम्र विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Ram ram
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा