Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मूलभूत नीतितत्त्वे

य
यनावाला
Sat, 03/03/2018 - 12:22
🗣 128 प्रतिसाद
मूलभूत नीतितत्त्वे : यनावाला [ईश्वरवादी--निरीश्वरवादी या दोघांतील प्रश्नोत्तररूपी संवाद . प्रश्न आस्तिकाचे, उत्तरे नास्तिकाची.] प्रश्न :- तुम्ही म्हणता की, "आजच्या प्रगत युगात समाजाला देवा-धर्माची आवश्यकता नाही. पुरातनकाळीं अज्ञानयुगातील माणसाला सुचलेल्या आणि रुचलेल्या या संकल्पनांचे आता काही प्रयोजन उरलेले नाही. सर्वांनी त्या डोक्यातून काढून टाकल्या पहिजेत" असे करणे योग्य होईल का ? उत्तर :- हो निश्चितच. इथे "धर्म" या शब्दात जगातील सर्व प्रचलित धर्म (उपासना पद्धती) समाविष्ट आहेत. तसेच देव हा शब्द जगातील सर्व देव-देवतांविषयीं आहे. इथे उपासनेचा देव (पर्सनल गॉड) --म्हणजे पूजा, प्रार्थना यांनी संतुष्ट होऊन भक्तांवर कृपा करणारा, संकटात धाऊन येणारा, परम दयाळू देव हा अर्थ घ्यायचा. धर्म म्हणजे जे कांही रूढी परंपरांनी धर्माचरण चालू आहे , कर्मकांडे होत आहेत, ते सर्व. या देव-धर्मांमुळे जगभरातील अनेकांवर अन्याय-अत्याचार झाले आहेत. धर्मावरून भीषण युद्धे झाली आहेत. रक्ताचे पाट वाहिले आहेत. सर्व समाजांची अतोनात हानी झाली आहे. आणि होत आहे. धर्मगुरू, पुरोहित अशा कांही हितसंबंधी लबाडांना मात्र मोठा लाभ झाला आहे आणि होत आहे हे खरे. म्हणून समाजाच्या हितासाठी या देव-धर्माच्या संकल्पनांचे उच्चाटन होणे योग्य आहे. सुधारककार आगरकर लिहितात, "मानवी समाजाला यापुढे धर्माची आवश्यकता नाही. कारण धर्माचा मूळारंभ अज्ञान आणि भीती यांतून झालेला आहे. धर्मविषयक कल्पना या वस्तुस्थितीच्या अज्ञानातून आणि अज्ञात संकटाच्या भीतीतून आलेल्या आहेत." प्रश्न :- धर्मग्रंथातून माणसाला नीतितत्त्वांची शिकवण मिळते. आपल्या हातून काही दुष्कृत्य, कुकर्म घडल्यास पाप लागेल, देव शिक्षा करील, अशी माणसाला भीती असते. तसेच सद्धर्माने वागल्यास पुढच्या जन्मी सुख मिळेल अशी आशाही त्याला वाटते. देव-धर्माचे उच्चाटन झाल्यास माणसाला नीतिबोध कसा होईल? देवाची भीती नसेल तर माणूस अनिर्बंध, अनैतिक वागणार नाही काय ? त्यामुळे समाजात गुन्हेगारी वाढणार नाही काय ? उत्तर :- म्हणजे देव-धर्म मानणारी, धार्मिक परंपरा पाळणारी माणसे नीतीने वागतात, तर नास्तिक लोक नीतिभ्रष्ट असतात, असे तुम्हाला म्हणायचे आहे. प्रश्न :- होय. असे वाटते खरे. त्यात काय चूक आहे ? उत्तर :- ठीक आहे. आपण वास्तवाचा, म्हणजे आजच्या सत्य परिस्थितीचा विचार करू. आपल्या देशात ८५% हून अधिक लोक आस्तिक आहेत. आपला देश ऋषी-मुनींचा, संन्यासी-योग्यांचा, बुवा-बाबांचा, आहे. इथे असंख्य मंदिरे आहेत. अगणित देव-देवता आहेत. उत्सव-सोहळे, भजने-कीर्तने, वार्‍या-तीर्थयात्रा, पर्वण्या-कुंभमेळे असतात. देवाचा उद् घोष, धर्माचा उदो उदो, अखंड चालतो. तुम्ही म्हणतां त्या अनैतिक नास्तिकांची संख्या इथे नगण्य आहे. या सत्य परिस्थितीचा विचार करता आपल्या देशाचा नैतिक स्तर अति उच्च असला पाहिजे ना ? पण वास्तव काय आहे? भ्रष्टाचार, भूखंड घोटाळे, आर्थिक लुबाडणूक, बॅंकांतील थकित कर्जे, अशा अनेक अवैध गोष्टीत हा देश आकंठ बुडालेला आहे. स्रियांवरील बलात्कार, बालिकांवरील अत्याचार, अनेक विकृत गुन्हे, यांत आपला देश जगात अग्रेसर आहे. अनैतिकतेत भारताचा क्रमांक पहिल्या दहात आहे. या वास्तवावरून काय समजते ? यावरून तर्कसंगत निष्कर्ष निघतो की देव- धर्म- धर्मग्रंथ यांचा नीतीशी काही संबंध नाही. पूजा-प्रार्थना-भजने -आरत्या,कथा-कीर्तने यांनी नीती वाढत नाही. व्रत-वैकल्ये,अभिषेक-अनुष्ठाने, होम-हवने करून नीती उन्नत होत नाही. वा‍र्‍या, पालख्या, छबिने, प्रकटदिनसोहळे यांनी नीतिमत्ता उद्भवत नाही. तसेच तुम्ही समजता की देवा-धर्माचे उच्चाटन झाले तर गुन्हेगारी वाढेल ! त्याविषयी वस्तुस्थितीचा विचार करू. आज देशात बाराही महिने देवा-धर्माचा एवढा दुमदुमाट असताना भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी प्रचंड आहे. देवाधर्माच्या उच्चाटनाने आणखी किती वाढणार ? युरोपीय देशांतील सर्वेक्षणांवरून असे दिसते की जिथे आस्तिकांची संख्या थोडी आहे त्या देशांत गुन्हेगारीचे प्रमाण अत्यल्प आहे. यावरून दिसते की बहुसंख्य नास्तिक लोक हे स्वयंप्रेरणेने नीतितत्त्वे पाळतात. प्रश्न :- नास्तिक माणसे धर्मग्रंथ वाचत नाहीत. मग त्यांना नीतितत्त्वे कशी कळतात ? कोण शिकवते ? उत्तर :- मूलभूत नीतितत्त्वे पाच आहेत. ती अशी : १) हेतुत:(म्हणजे जाणून-बुजून ) खोटे बोलू नये. २) चोरी करू नये. ३) कुणाची फसवणूक करू नये. ४) कुणावर बळजबरी, अत्याचार करू नये. ५) कुणा माणसाची हिंसा करू नये. या नीतितत्त्वांचा देवा-धर्माशी काही संबंध नाही. ही साधी तत्त्वे जर जगातील प्रत्येक माणसाने पाळली तर सर्वजण सुखी होतील. विश्वशांती नांदेल. प्रत्येक माणसात ही तत्त्वे स्वाभाविक (नैसर्गिक) म्हणजे उपजतच असतात. ती कुणी शिकवावी लागत नाहीत. कुठल्या ग्रंथातून वाचावी लागत नाहीत. इथे सद्गुरू, स्वामी, बुवा, बापू, अशा कुणाचीही आवश्यकता नाही. सत्संग, आध्यात्मिक प्रवचने, भजने, कीर्तने अशा गोष्टी इथे निरुपयोगी ठरतात. प्रत्येक सुजाण माणसाच्या बुद्धीत ही तत्त्वे असतातच. प्रश्न :- तुमचे विधान धार्ष्ट्याचे आहे. ही मूलभूत तत्त्वे स्वाभाविक म्हणजे नैसर्गिक असतील असे वाटत नाही. काहींही करून जीव वाचवणे, अन्न मिळवणे, आणि जनुक सातत्य टिकण्यासाठी पुनरुत्पत्ती करणे या प्रत्येक सजीव प्राण्याच्या नैसर्गिक प्रेरणा ( नॅचरल इन्स्टिंक्ट) आहेत असे वाचले आहे. ते पटते. म्हणजे माणसासाठी सुद्धा या नैसर्गिक ऊर्मी आहेतच. त्याला जिवंत राहण्यासाठी अन्न लागते. ते वैध मार्गांनी मिळणे अशक्य झाले तर प्रसंगी जीव वाचविण्यासाठी माणूस चोरी करील. जीव वाचविणे ही नैसर्गिक प्रेरणा आणि चोरी करू नये हे मूलभूत नीतितत्त्व यांची सांगड कशी घालता येईल ? उत्तर :- हा प्रश्न महत्त्वाचा आहे. नीतितत्त्वे सज्ञान माणसासाठीच आहेत, अन्य सजीवांसाठी नाहीत हे उघड आहे. उत्क्रांत होता होता माणसाच्या डोक्याच्या कवटीत नव्या मेंदूचा (निओकॉर्टेक्स चा ) उद्भव झाला. हा नवा मेंदू अधिक विकसित झाला. या नवमेंदूमुळे माणूस सुसंस्कृत झाला. अन्य माणसांचा, समाजाचा, विचार करूं लागला. तेव्हा त्याच्या मेंदूत ही मूलभूत नीतितत्त्वे उद्भवली. पुढे विकसित झाली. आता जनुकीय प्रेरणांवर माणूस आपल्या बुद्धीने नियंत्रण ठेऊं शकतो. माणूस हे जनुकीय यंत्र असले तरी बर्‍याच प्रमाणात माणूस स्वतंत्र आहे. जिवंत राहाण्यासाठी चोरी करणे भाग आहे अशी परिस्थिती निर्माण झाली तर माणूस म्हणेल ," प्राण गेला तरी चालेल पण मी चोरी करणार नाही." हे जनुकीय प्रेरणेच्या विरुद्ध आहे. पण तत्त्वनिष्ठ माणूस ती प्रेरणा झिडकारून असा निश्चय करू शकतो. तसे वागू शकतो. तो स्वतंत्र आहे. प्रश्न :- ठीक आहे. हे समजले. पण प्रसंगी जगण्याविरुद्ध असलेले हे नीतितत्त्व त्याच्या नव्या मेंदूत मुळात उद्भवलेच कसे ? उत्तर : - योग्य प्रश्न विचारला. माणूस हा जाणीवेची जाणीव असलेला (होमो सेपियन्स् सेपियन्स्) प्राणी आहे. आपल्याला जाणीव असते याची त्याला जाणीव आहे. त्यामुळे दुसर्‍या माणसालासुद्धा जाणीव असणार , मला भावना आहेत तशा त्यालाही भावना असणार हे माणसाला समजते. तसेच माणूस हा मूलत: तर्कनिष्ठ प्राणी म्हणून विकसित झाला आहे.(त्या तर्कनिष्ठतेमुळे तो एवढी आश्चर्यकार प्रगती करू शकला.) या दोन गोष्टींमुळे माणसाला पुढील युक्तिवाद कळतो आणि पटतो. किंबहुना त्याला स्वत:लाच तो सुचू शकतो. :- " * कोणी मला काही खोटे सांगितले तर ते मला आवडणार नाही. माझ्याशीं कोणी खोटे बोलू नये असे मला वाटते. म्हणून मी सुद्धा कुणाशी खोटे बोलता नये. नाहीतर -मला कोणी कांही खोटे सांगू नये--अशी अपेक्षा मी करणे योग्य होणार नही." "* जी वस्तू माझी आहे., जिच्यावर माझा अधिकार आहे ती कोणी पळवली तर ते मला आवडणार नाही. मला दु:ख होईल. म्हणून मीसुद्धा कोणाची वस्तू चोरता नये. चोरणार नाही." अशा तर्‍हेने ही पाच मूलभूत तत्त्वे माणसाच्या बुद्धीत उद्भवली. प्रश्न :- हे सगळे तत्त्वत: ठीक आहे. पटण्यासारखे आहे. पण प्रत्यक्ष व्यवहारात काय अनुभव येतो ? * खोटे बोलणारी माणसे पदोपदी भेटतात. * चोरी, घरफोडी, दरोडा यांविषयींच्या बातम्या वृत्तपत्रांत सतत येत असतात. * फसवणुकीची प्रकरणे इतकी असतात की जो तो दुसर्‍याला फसवायला टपला आहे असे वाटावे. * बळजबरी, अत्याचार यांविषयी तर बोलायलाच नको. बलात्काराच्या बातमीविना एक दिवस जात नाही. असे असता ही नीतितत्त्वे मानवी बुद्धीत उपजतच असतात असे म्हणण्यात काय अर्थ आहे ? उत्तर :- हा प्रश्न अपेक्षित होताच. तुम्ही म्हणता ते खरे आहे. हेतुत: खोटे बोलणारी, दुसर्‍याला फसवणारी, अन्याय अत्याचार करणारी, हिंसक असणारी माणसे समाजात आहेतच. त्यांची संख्याही लक्षणीय आहे. यात शंका नाही. पण मला असे म्हणायचे आहे की, जो अनेकदा हेतुत: असत्य कथन करतो, त्यालासुद्धा "खोटे बोलणे वाईट असते. खोटे बोलू नये. " हे समजते. पटलेले असते. समजा तो एक कथा वाचतो आहे. त्या कथेत शेवटी असत्याचा विजय होतो असे दाखवले आहे. तर त्या खोटारड्या माणसालासुद्धा तो शेवट आवडणार नाही. कारण अंतिम विजय सत्याचा व्हावा असेच त्याला वाटत असते. मग तो खोटे का बोलतो ? त्याची कांही कारणे असतात. आपल्या असत्य बोलण्याचे तो समर्थन करतो. तो म्हणतो ," खोटे बोलू नयेच. पण माझा निरुपाय असतो. मला खोटे बोलावे लागते. असत्य बोलण्याने लागलेले पाप मी पुण्य कृत्य करून धुऊन काढीन." धर्मात असे पापक्षालनाचे उपाय ठायीं ठायीं आहेत. प्रश्न :- असे कोणते उपाय आहेत ? उत्तर :- तुम्ही धार्मिक ग्रंथात वाचले नाही काय ? अशा प्रत्येक ग्रंथाच्या फलश्रुतीत ते सापडतील. सत्यनारायणकथेच्या दुसर्‍या अध्यायात आहे, "एवं नारायणस्येदं व्रतं कृत्वा द्विजोत्तम: । सर्वपापविनिर्मुक्तो दुर्लभं मोक्षमाप्‍नुयात् । --हे सत्यनारायणाचे व्रत करून सर्व पापांतून मुक्त झालेला तो श्रेष्ठ ब्राह्मण अंतीं दुर्लभ अशा मोक्षपदाला गेला."-- समजा एक गुंड.... प्रश्न :- यात पापक्षालनाचा कोणता मार्ग सांगितला आहे ? उत्तर :- अहो असे काय विचारता ? सत्यनारायणाची पूजा घातली की माणूस सर्व पापांतून मुक्त होतो असे स्पष्ट म्हटले आहे ना ? प्रश्न :- हो हो. आले लक्षात. तुम्ही एका गुंडाविषयीं काय सांगत होता ? उत्तर :- समजा एक गुंड चित्रपट बघायला गेला. खलनायक आणि त्याची टोळी यांची नायक पिटाई करतो असे दृश्य आहे. त्यावेळी हा गुंड प्रेक्षक टाळ्या वाजवतो. शिट्ट्या मारतो. गुंडांची पिटाई होते हे त्याला मनापासून आवडते. त्याचा धंदा धमक्या देऊन खंडणी वसूल करणे हा असतो. हे वाईट आहे. दुष्कृत्य आहे. हे त्याला ठाऊक असते. पण त्याला ते निरुपायाने करावे लागते. असे तो आपल्या दुष्कृत्याचे स्वत:शीच समर्थन करतो. खंडणीतील काही रक्कम मी सत्कृत्यासाठी खर्च करीन, पुण्य मिळवीन मग माझे पाप धुऊन जाईल असे तो आपले समाधान करून घेतो. मग शिरडीला किंवा बालाजीला जाऊन तिथल्या पेटीत मोठे दान टाकतो. गणपतीला चांदीचा उंदीर अर्पण करतो. अष्टविनायक यात्रा करतो. कुंभमेळ्यात स्नान करतो. पापक्षालनासाठी असे कितीतरी उपाय आहेत. माझे पाप धुऊन गेले या समजुतीने त्याच्या मनाला समाधान वाटते. पाप केल्याची जी टोचणी मनाला लागलेली असते ती संपते. त्याला पापक्षालनाचा मार्ग सापडलेला असतो. मग तो निर्ढावतो. उत्साहाने नवी दुष्कृत्ये करायला लागतो. गीतेत भगवानुवाच आहे :- ".....मामेकं शरणं व्रज । अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच :। "[ ( कृत दुष्कृत्यांची) चिंता करू नकोस. मला शरण ये. मी तुला सर्व पापांतून मुक्त करीन.] प्रश्न :- नास्तिक माणसे अनैतिक काम करतात का ? केल्यास त्यांच्या मनाला टोचणी लागते का ? उत्तर :- सगळेच नास्तिक नीतिमान असतात असे नाही. तसेच सगळे नास्तिक अनैतिक असतात असेही नाही. कांही निरीश्वरवाद्यांच्या हातून अनैतिक गोष्टी घडत असतील. दुष्कृत्य केल्यावर मनाला सदसद्विवेक बुद्धीची टोचणी लागणे, मनात खुपत-सलत राहणे ही सर्व माणसांच्या बाबतीत स्वाभाविक गोष्ट आहे. ही खुपणी संपविण्यासाठी, मानसिक समाधानासाठी पापक्षालनाचे मार्ग धर्मग्रंथांत आहेत हे आपण पाहिले. समजा चित्रपटाला गेलेला खंडणीगुंड नास्तिक आहे, तरी केलेल्या दुष्कृत्याची टोचणी त्याच्या मनाला लागणारच. कारण मूलभूत नीतितत्त्वे स्वाभाविक आहेत. त्यांचा आस्तिक-नास्तिकतेशी संबंध नाही. पण मनाच्या समाधानासाठी, मनाची टोचणी घालवण्यासाठी नास्तिकाला कोणताच मार्ग उपलब्ध नाही. नास्तिक असल्यामुळे तो बालाजीला, साईबाबाला, कुंभमेळ्याला जाणार नाही. असल्या गोष्टींवर त्याची श्रद्धाच नाही. दुष्कत्य केल्याची खंत त्याच्या मनात सतत सलत राहील. त्यामुळे आणखी पापे करायला तो प्रवृत्त होणार नाही. परिणामत: तो गुंडगिरीतून मुक्त होईल. सन्मार्गाला लागेल. अशी शक्यता अधिक आहे. म्हणून गुन्हेगारांमध्ये निरीश्वरवाद्यांचे प्रमाण अत्यल्प असते. हे अनेक सर्वेक्षणांतून दिसून आले आहे. प्रश्न :- तुम्ही सांगता त्यावर थोडा विचार केला तर काही पटण्यासारखे आहे. तरीपण मला प्रश्न पडतो की माणसासाठी ही नीतितत्त्वे जर उपजत असतील , तर माणूस अनैतिक गोष्टी करतोच कसा ? "त्याचा निरुपाय असतो " असे सांगून उत्तर पूर्ण होते काय ? उत्तर :- तुमची अडचण लक्षात आली. माणूस जर जन्मत:च नीतिमान आहे तर तो अनैतिक कृत्ये करण्यास कसा प्रवृत्त होतो? असा तुमचा प्रश्न आहे. असे पाहा मानवी मेंदू हे जगातील सर्वांत आश्चर्यकारक, अत्यंत गुंतागुंतीचे , व्यामिश्र असे इलेक्ट्रो-केमिकल (विद्युत्-रासायनिक) यंत्र आहे. माणसाची बुद्धी आणि मन या अमूर्त गोष्टी आहेत. त्या मेंदूत उद्भवतात. मेंदू वस्तुरूप आहे. आनंद, नैराश्य, राग, लोभ, मोह, दंभ, मत्सर, प्रेम, श्रद्धा इत्यदि भावना आहेत. अशा सर्व भावनांच्या समुच्चयाला मन म्हणायचे. निरीक्षणशक्ती, कल्पनाशक्ती, स्मरणशक्ती, तर्कशक्ती, इ. नऊ घटकांचा समुच्चय म्हणजे मानवी बुद्धी. एखाद्या गोष्टीविषयी निर्णय घेताना बुद्धी आणि मन यांच्यात द्वंद्व निर्माण होऊ शकते. (प्रत्येक वेळी होतेच असे नाही.) बुद्धीने घेतलेला निर्णय मनाला (म्हणजे भावनेला) नको असतो. तर मनाचा निर्णय बुद्धीला मान्य नसतो. खरे तर अंतिम निर्णय बुद्धीने घ्यायला हवा. मनावर बुद्धीचे नियंत्रण हवे. मनसस्तु परा बुद्धि:।[मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे.] असे गीतेत म्हटले आहे. ते योग्य वाटते. मनाने जर बुद्धीवर कुरघोडी केली तर माणूस अनैतिक कृत्य करतो. (मूलभूत नीतितत्त्वे बुद्धीत असतात. मनात नसतात.) उदाहरणार्थ चोरी करू नये हा बुद्धीचा निर्णय असतो. पण मनातील लोभ, अभिलाषा, या भावना जर वरचढ झाल्या तर बुद्धीचा निर्णय झुगारून देऊन माणूस चोरी करतो. तसेच हिंसा करू नये हा बुद्धीचा नियम असतो. पण क्रोध, मद, मत्सर, या मनोभावना प्रबळ झाल्या तर माणूस हिंसक बनतो. याप्रमाणे बुद्धीतील नीतितत्त्वांपेक्षा एखादी मनोभावना प्रबळ झाली तर त्या भावनेच्या प्रभावाखाली माणूस अनैतिक कृत्य करतो. प्रसिद्ध तत्त्वज्ञानी इमॅन्युएल कांट यांनी म्हटले आहे, "अगणित तारकांनी भरलेली ही आकाशाची अथांग पोकळी आणि मूलभूत नीतितत्त्वे मानणारी मानवी बुद्धी या दोन गोष्टींवर मी जों जों विचार करतो तों तों माझे मन आश्चर्याने भरून येते." जनुकीय प्रेरणांच्या विरुद्ध असलेली मूलभूत नीतीची संकल्पना मानवी बुद्धीत कशी उद्भवते ? कोठून येते ? अनैतिक आचरण केल्यावर मनाला टोचणी का लागते ? या प्रश्नांची उत्तरे कांही अंशीं देण्याचा इथे प्रयत्‍न केला आहे. या प्रश्नांची परिपूर्ण उत्तरे मी देऊ शकत नाही. याची मला जाणीव आहे. ***************************************************************
वर्गीकरण
चर्चा (काथ्याकूट)

प्रतिक्रिया द्या
64968 वाचन

💬 प्रतिसाद (128)
A
arunjoshi123 Sat, 03/10/2018 - 07:56 नवीन
https://www.loksatta.com/sampadkiya-news/nature-exactly-a-pure-nonsense-225995/ सानेंचा हा लेख अवश्य वाचा. ईश्वर असोच, तो तर नाहीच, पण ब्रह्मांडात काहीही अर्थपूर्ण नाही अशा विचारांचा हा माणूस आहे. ================== बाय द वे, तुम्हाला सांगीतलेले ते शब्द एक नास्तिकांचा प्रकार आहेत. इहवादी म्हणजे दिसतंय तेवढं आहे आणि वाटतंय तेवढं करा. आत्मविद्यावादी माझ्यामते मी काय आहे. यात अजिबात काही अस्तिकता त्यांना अभिप्रेत नव्हती. =============================== https://www.loksatta.com/sampadkiya-news/what-is-important-either-existence-or-appearance-of-god-135371/ इथे त्यांचे या विषयावर थेट मत आहे.
दुसरे असे की, धर्मचच्रेत उतरायचेच नाही, या हटवादापायी आपण ‘परिवर्तनवादी पण धार्मिक’ असे मित्र गमावत राहिलो, तर सनातन्यांच्या कचाटय़ातून लोक सुटणार तरी कसे? हाही विचार नास्तिक प्रागतिकांनी करायला हवा. माझ्या या मतामुळे माझे नास्तिक मित्र माझ्यावर रागावतात. ‘‘एकदा का तुम्ही ‘त्याला’ थोडी जरी फट सोडलीत की धर्माधतेचे सगळे नष्टचर्य मागे लागलेच म्हणून समजा.’’ असा इशारा ते मला देतात. ही चिंता मी समजू शकतो, कारण ‘धर्माधतेचे नष्टचर्य’मध्ये काय काय येते याची जाणीव मलाही आहेच.
साने धार्मिक लोकांत राहून, देव रीटायर होत नाही तोपर्यंत तो सांगतोय ते चांगलंच असतं असं धार्मिकांना मित्रत्वानं सांगून सुधारणा कराव्यात कारण अस्तिक मेजॉरिटी आहे असं म्हणतात. ============================ कोणाला तरी मारझोड करून मला काय मिळणार आहे? उगाच फालतूचे हेत्वारोप करायचे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा
A
arunjoshi123 Fri, 03/09/2018 - 11:39 नवीन
बडबडण्याच्या ओघात
आकलनक्षमता अशी जाहीर करायची नसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा
A
arunjoshi123 Fri, 03/09/2018 - 05:59 नवीन
समजा एका घरात वास्तुशांतीवर एकूण खर्च १०० रुपये झाला. तर त्यातले किती रुपये ब्राह्मणाला मिळतात? ========================= वास्तुशांतीला सगळे पावणे आपल्या खर्चाने येतात. आपल्या खर्चाने एकमेकांना भेटवस्तू देतात. आपल्या खर्च्चाने कपडे इ घेतात. आपल्या खर्चाने जेवतात. एकूण जेवणारांपैकी किती पुरोहित ब्राह्मण असतात? हा झाडून सगळा खर्च म्हणजे १०० रु. नि त्याचे टक्के म्हणून दक्षिणा मोजली पाहिजे. ========================== नास्तिक जगात अन्यत्र नव्या घरात जाताना समारंभ करत नाहीत का? त्यात वायफळ खर्च होत नाही का? ======================== ब्राह्मणांनी भारतीय भाषा, व्याकरण, संगीत, नृत्य, नाट्य, अन्य कला, तत्त्वज्ञान, अध्यात्म, योगा, राज्यशास्त्र, इ इ अनंत शाखांची जोपासना केली. परकीय आक्रमणे झाली तेव्हा त्यांचे पहिले टार्गेट ब्राह्मणच होते. अगदी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात प्रत्येक जातीच्या टक्केवारीत ब्राह्मणांची टक्केवारी (जिवंत असलेल्यांपैकी किती टक्के) सर्वाधिक होती. हे सगळं त्यांनी उपाशीपोटी करणं अपेक्षित आहे का? ================= वास्तुशांतीतले मंत्र सामर्थ्याच्या दृष्टीनं भंकस असतील. पण त्यांचा अर्थ गोड गोड च असतो. मग तर ' भारत माझा देश' आणि 'जन गण मन' आणि ' २६ जानेवारीची परेड' सामर्थ्याच्या दृष्टीनं वास्तुशांतीच्या मंत्रांइतकीच भंकस आहे. पण भावना तशी नसते ना. तुम्ही म्हणाल ते भंकस आणि तुम्ही म्हणाल ते अर्थपूर्ण असं थोडीच असतं? आपल्या राष्ट्रगीतात सिंध असं लिहिलं आहे. आणि ईशान्येतलं मात्र एकही राज्य नाही. अगदी महाकाय आसाम आणि अरुणाचल नाहीत. काय संबंध आहे? मंत्रांतही अशा चूका असणार. पण एका आनंदोत्सवाला एक लूट म्हणून पाहणे विकृती नव्हे काय? यना प्राध्यापक आहेत. पदवीदान समारंभ काळे डगले आणि विचित्र टोप्या हवेत फेकून मुले साजरी करतात. ते ड्रेस फक्त त्याच एका दिवशी वापरात असतात. ही विद्यार्थ्यांची लूट असते का? प्रचंड मूर्खासारखे एक निरुपयुक्त प्रकारचे कपडे सुसिक्षित लोक पैसे देऊन वापरतात - एका दिवसासाठी - यात लूट पाहता, कि आनंद पाहता कि समारंभ पाहता? नास्तिक विद्यार्थी नि प्राध्यापक देखील हे करतातच नं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ब
बिटाकाका Fri, 03/09/2018 - 06:07 नवीन
परिपूर्ण प्रतिसाद, आवडला! ------------------------------- कर्मकांडांवरील टीकेतून नास्तिकता दिसण्यापेक्षा "लूट" वगैरे शब्द वापरल्याने खरेतर असे मुद्दे मांडणाऱ्या लोकांचे जातीयवादाचेच पितळ उघडे पडते असे मला वाटते. कर्मकांडांवरील टीकांचा रोख साधारणपणे विशिष्ट जात पैसे लुटते वगैरे का असतो हे अनाकलनीय आहे. देवाचे अस्तित्व नाकारण्याइतपत ज्ञान/पात्रता लाभलेले लोक इतक्या बेसिक गोष्टी कशा काय सोडू शकत नसतील?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
म
माहितगार Fri, 03/09/2018 - 08:17 नवीन
यना प्राध्यापक आहेत. पदवीदान समारंभ काळे डगले आणि विचित्र टोप्या हवेत फेकून मुले साजरी करतात. ते ड्रेस फक्त त्याच एका दिवशी वापरात असतात. ही विद्यार्थ्यांची लूट असते का? प्रचंड मूर्खासारखे एक निरुपयुक्त प्रकारचे कपडे सुसिक्षित लोक पैसे देऊन वापरतात - एका दिवसासाठी - यात लूट पाहता, कि आनंद पाहता कि समारंभ पाहता? नास्तिक विद्यार्थी नि प्राध्यापक देखील हे करतातच नं?
लै भारी
आपल्या राष्ट्रगीतात सिंध असं लिहिलं आहे. आणि ईशान्येतलं मात्र एकही राज्य नाही.
टागोरांना काव्यरचनेत प्रत्येक नाव बसवता आलेच असेल असे नाही , म्हणून भारतातील कोणत्याही भागाचा गौरव कमी होत नाही. या बद्दल सहमत. जन गण मन ची रचना हिमाचल प्रदेश राज्याच्या निर्मितीच्या बरीच आधीची म्हणजे १९११ च्या आसपासची आहे, तर पुर्वाश्रमीच्या एकत्रीत पंजाबातील हिमालयीन टेकड्या वेगळ्या करून त्यांना हिमाचल प्रदेश हे नामकरण १९४८ म्हणजे बर्‍याच वर्षांनतर झालेले . म्हणून राष्ट्रगीतातील हिमाचल हा उल्लेख केवळ हिमाचल प्रदेशाबद्दलचा सिमीत नाही सबंध हिमालया बद्दलचा आहे त्यामुळे इशान्य ते काश्मिर ते सरहद सर्वच पर्वतीय प्रदेशांचा उल्लेख / गौरवीकरण त्यात सामावले जात असावे. चुभूदेघे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
A
arunjoshi123 Fri, 03/09/2018 - 11:48 नवीन
त्यामुळे इशान्य ते काश्मिर ते सरहद सर्वच पर्वतीय प्रदेशांचा उल्लेख / गौरवीकरण त्यात सामावले जात असावे.
मेक्स सेन्स. असंच असावं. ================= यात आसाम नि दक्षिणेची राज्ये येतील का? तिथे हिमालय दक्षिणेकडे वळला आहे खरा, पण अत्यंत खुजा आहे नि स्थानिकांत 'हिमालयवासी' अशी काहीच भावना नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार Fri, 03/09/2018 - 12:54 नवीन
यात आसाम नि दक्षिणेची राज्ये येतील का? तिथे हिमालय दक्षिणेकडे वळला आहे खरा, पण अत्यंत खुजा आहे नि स्थानिकांत 'हिमालयवासी' अशी काहीच भावना नाही.
टागोरांनी अख्खी दक्षिण 'द्राविड' या एका शब्दात घेतली आहे. पण तुम्ही म्हणता तसे बिहार आसाम ह्या राज्यांचे उल्लेख राहून जातात. पण काही गोष्टी लक्षात घ्यावयास हव्यात. *पहिले काँग्रेस आणि नंतर भारत देश ' जन गण मन ' हेच गीत मुख्य राष्ट्रगीत म्हणून स्विकारेल ह्याची रविंद्र नाथ टागोरांनाही कल्पना असेल असे नाही. ( ब्रिटीश सम्राटाच्या सन्मानार्थ लिहिले होते का हा वाद टागोरांच्या हयातीतच झाला तो वेगळा विषय) . * दुसरे केवळ शब्द नव्हे काव्याचा ओघही कविला सांभाळावा लागतो, आणि देशातील प्रत्येक गाव शहरांची प्रांतांची प्रत्येक नदीची नावे त्यात समावेष प्रॅक्टीकल होईल असे नव्हे . ( वंदे मातरम बद्दल टाळण्या जोगे वाद झाले नाहीतर, वंदे मातरमची लोकप्रीयता स्वातंत्र्य सेनानीत अधिक असावी . वंदे मातरमच्या रचनेत प्रत्येक गाव - शहराचे नाव देण्याची आवश्यकता नाही, ) * किमान ब्रिटीशांनी बिहार आणि आसाम बंगाल पासून वेगळे करे पर्यंत ते बंगालचे अल्पकाळतरी भाग राहीले असावेत , (आसाम प्रांत बंगाल पासून १८७४ मध्ये ब्रिटीशांनी वेगळा केला तर बिहार आणि ओरीसा प्रांत तर जन गण मनच्या च्या लेखना नंतर वर्षाभराने म्हणजे १९१२ मध्ये बंगाल पासून वेगळे प्रांत म्हणून ब्रिटीशांनी मान्यता दिली) त्यामुळे मानसिक स्तरावर बंग या शब्दात आसाम आणि बिहार हा भाग टागोरांनी गृहीत धरला असू शकेल ? * अजून एक म्हणजे आपण आताच्या आसामचा उल्लेख करतो पण आताची उर्वरीत इशान्य भारतिय राज्ये पुर्वी आसामचाच भाग समजली जात होती त्यामुळेही कदाचित हिमाचल या शब्दात आसामचा भाग गृहीत धरला गेला असावा अशी शक्यता ही राहते. असो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
A
arunjoshi123 Sat, 03/10/2018 - 07:29 नवीन
आपण दिलेल्या स्पष्टीकरणाच्या संदर्भाने जेव्हा लिहिलं तेव्हा ते गीत अत्यंत चपलख बसे नि त्याची व्याप्ति हवी तितकी होती असं सिद्ध होतं. =================== माझा रोख सध्या गात असलेल्या गीताकडे आहे. ते गीत आता योग्य नसलं तरी आपण तशास तसे गातो असं काहीसं मला अभिप्रेत होतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार Sat, 03/10/2018 - 12:16 नवीन
...माझा रोख सध्या गात असलेल्या गीताकडे आहे. ते गीत आता योग्य नसलं तरी आपण तशास तसे गातो असं काहीसं मला अभिप्रेत होतं.
हो प्रांतांचे विशीष्स्ट नावा निशी उल्लेख असल्या नंतर काळाच्या ओघात अशी समस्या येणे स्वाभाविकच आहे. स्वातंत्र्योत्तर काळात हरीयाणा , छत्तिसगढ, झारखंड, गोवा, दिल्ली इत्यादीना राज्यांचा दर्जा मिळाला . शिवाय आंदमान निकोबार, लक्षद्वीप अशा बेटांचा उल्लेखही सध्याच्या गीतातून सुटतो. (समजा हो ना हो आकाश गंगेची वाटणी होऊन काही ग्रह भारताच्या सार्वभौमत्वात आले तर त्यांचे नाव सुटण्या चाही धोका आहे ; ह. घ्या.) जन गण मन च्या शब्दांमध्ये सुधारणेच्या गरजेची अथवा तशा मागणीची तसेच वस्तुतः वंदेमातरमची लोकप्रीयता राष्ट्र्गीत म्हणून अधिक असल्याची जाणीव नेहरुंनाही असावी. आसामच्या लोकांनी सिन्ध हा शब्दाच्या जागी आसामाचे जुने नाव काम रूप घ्यावे अशी मागणी झाली होती, प.बंगालची स्वतःची मागणी वंदेमातरम हेच राष्ट्रगीत असावे अशी होती, पण उघडपणे केवळ तत्कालीन मध्यप्रांताने जन गण मन साठी कल कळवणे टाळले बाकी (राजकीय) पब्लिक नेहरूंच्या अप्रत्यक्ष दिशादर्शनाच्या बाजूने झुकल. नेहरुंनी राष्ट्रगीताची ट्यून म्हणून जनगण मनची ट्यून अधिक शोभते असे काहीसे कारण तेव्हा दिले देऊन धकवले असे दिसते. ( संदर्भ :Statement by Prime Minister Jawaharlal Nehru in the Constituent Assembly, August 25, 1948
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
A
arunjoshi123 Sun, 03/11/2018 - 09:47 नवीन
(समजा हो ना हो आकाश गंगेची वाटणी होऊन काही ग्रह भारताच्या सार्वभौमत्वात आले तर त्यांचे नाव सुटण्या चाही धोका आहे ; ह. घ्या.)
हा हा हा. ---------- दक्षिण गंगोत्रीची आठवण झाली.
नेहरुंनी राष्ट्रगीताची ट्यून म्हणून जनगण मनची ट्यून अधिक शोभते असे काहीसे कारण तेव्हा दिले देऊन धकवले असे दिसते
राहुलचंच रक्त ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
M
manguu@mail.com Mon, 03/12/2018 - 02:58 नवीन
कारणे काही का असेनात राष्ट्रगीत अन तिरंगा ह्यांचा सन्मान हा राखायलाच हवा . ( नैतर उत्तर ध्रुवावर जाउन दुसरा झेंडा लावून दुसरे गीत गात बसावे . )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
A
arunjoshi123 Mon, 03/12/2018 - 05:50 नवीन
वैज्ञानिक दॄष्ट्या तरी राष्ट्रगीत नि राष्ट्रध्वज या निरर्थक संकल्पना आहेत. उगाच लोक मानतात म्हणून एक गाणं नि एक ३-४ रंगांचा कपडा अन्य गाण्यांपेक्षा आणि अन्य कपड्यांपेक्षा अधिक सन्मानास पात्र आहेत असं मानणं मूर्खपणा आहे. मग तर लोक मानतात म्हणून देवही मानावा. =================== बहुतेक तुमच्यासारखे पुरोगामी हे नवग्रंथप्रामाण्यवादी आहेत. हा नवा ग्रंथ म्हणजे संविधान. अगदी तशास तसा तर्क लावताना तुम्हा लोकांत अजिबात समबुद्धी नाही. ========================= तुमच्या म्हणण्याला समर्थ करायला तुमच्याकडे कायदा आहे, पोलिस आहे आणि व्यवस्था आहे म्हणून तुमचं म्हणणं बरोबर आहे हे तर ऑप्रेशन झालं. ==========================
( नैतर उत्तर ध्रुवावर जाउन दुसरा झेंडा लावून दुसरे गीत गात बसावे . )
बरोबर आहे. काही लोकांनी उत्तर ध्रुवावर जावं. उरलेल्यांनी इथिओपियामधे जावं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
म
माहितगार Mon, 03/12/2018 - 07:43 नवीन
...उरलेल्यांनी इथिओपियामधे जावं.
बाकी ठिक पण इथियोपीया देश मध्येच सुचण्याचे काही विशीष्ट कारण वगैरे . १९७४ मध्ये कम्यूनीस्ट क्रांती होउन रशियाचा अप्रत्यक्ष प्रभाव पडणे आणि नाईल सारखी नदी असूनही उपासमारी येण्यासारख्या घटनांनी बदनाम असलेला हा देश आजूबाजूचे आफ्रीकन मध्यपूर्व ते युरोपीयन कोणत्याही रास्।ट्राच्या पारतंत्र्यात गेला नसावा. पारतंत्र्यात न गेलेल्या मोजक्या देशांपैकी एक असे याचे एक वेगळे पण . अर्थात काही उत्क्रांतवाद्याम्च्या मते माणूस आफ्रीकेतून बाहेर पडला (इति इंग्रजी विकिपीडिया) ते इथियोपीयातनच त्यामुळे जगातल्या कोणत्याही माण्सांना वापस इथोयोपीसास जाण्यास सांगण्यास हरकत नसावी हे खरे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
A
arunjoshi123 Tue, 03/13/2018 - 12:08 नवीन
अर्थात काही उत्क्रांतवाद्याम्च्या मते माणूस आफ्रीकेतून बाहेर पडला (इति इंग्रजी विकिपीडिया) ते इथियोपीयातनच त्यामुळे जगातल्या कोणत्याही माण्सांना वापस इथोयोपीसास जाण्यास सांगण्यास हरकत नसावी हे खरे. ;)
अहो, उरलेल्यांनी ल्यूसीबाईंच्या गावात जावं इतकं स्पेसिफिक म्हणेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार Fri, 03/09/2018 - 08:36 नवीन
ब्राह्मणांनी भारतीय भाषा, व्याकरण, संगीत, नृत्य, नाट्य, अन्य कला, तत्त्वज्ञान, अध्यात्म, योगा, राज्यशास्त्र, इ इ अनंत शाखांची जोपासना केली. परकीय आक्रमणे झाली तेव्हा त्यांचे पहिले टार्गेट ब्राह्मणच होते. अगदी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात प्रत्येक जातीच्या टक्केवारीत ब्राह्मणांची टक्केवारी (जिवंत असलेल्यांपैकी किती टक्के) सर्वाधिक होती. हे सगळं त्यांनी उपाशीपोटी करणं अपेक्षित आहे का?
सर्वसाधारणपणे मतितार्थ आणि भावना पोहोचल्या. इतर ज्ञानशाखांची जोपासना असो अथवा पौरोहीत्य , उदरनिर्वाहासाठी पैसा लागतो याच्याशी सहमत. सर्व पुरोहीत इतर कोणत्यातरी ज्ञानशाखेस सांभाळतच होते हा निष्कर्षही सरसकटीकरणाचा होईल. दुसरे मुख्य म्हणजे साक्षरता आणि इतर ज्ञानशाखा अभ्यास यात सर्वांना समान संधी न देता, संधींना जन्माधारीत मर्यादीत करणे ही ह्या व्यवस्थेतील मर्यादा होती. विसाव्या शतकाच्या पुर्वार्धापर्यंत अंधश्रद्धांवर अवलंबित्व असलेल्या कर्मकांडांचे प्रमाण आताच्या पिढ्यांना लक्षात येणार नाही एवढ्या प्रमाणात बोकाळलेले होते . सर्व व्यवसायात नाडणारे असतात तसे पौरोहीत्याच्या व्यवसायातही असतात . जनश्रद्धेचा गैरफायदा घेण्याचा कुठेतरी निषेध / विरोध होणार हे आपसूकच येते, यात लोकांचे जे काही नुकसान झाले असेल त्या पेक्षा कैक पटीने हिंदू संस्कृतीचेच नुकसान झाले असावे. माझ्या मते, सण समारंभ सुश्रद्धा हवेतच पण कर्मकांडांचा अतिरेक आणि ती प्रिऑरीटींना डावलून होऊ लागला की कुठेतरी डोक्यात जावयास लागतो हेही तितकेच खरे. अजोंच्याच एका धाग्यात त्यांनी पैसे वाचवण्याच्यादृष्टीने कर्मकांडांना फाटा देण्याचा प्रयत्न केला असता दुसर्‍या ठिकाणी जाऊन कर्मकांडात सहभागी व्हावे लागले, पैसे वाचवण्याच्या प्रयत्नावर पाणि पडल्याबद्दलचा उल्लेख वाचल्याचे आठवते. एकुण दृष्टीकोणांच्या समतोलाची गरज असावी टोके असू नयेत असे वाटते. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
A
arunjoshi123 Sat, 03/10/2018 - 07:25 नवीन
सर्व व्यवसायात नाडणारे असतात तसे पौरोहीत्याच्या व्यवसायातही असतात . जनश्रद्धेचा गैरफायदा घेण्याचा कुठेतरी निषेध / विरोध होणार हे आपसूकच येते, यात लोकांचे जे काही नुकसान झाले असेल त्या पेक्षा कैक पटीने हिंदू संस्कृतीचेच नुकसान झाले असावे.
संतुलित समबुद्धीनं लिहिलेला प्रतिसाद. धन्यवाद. पुरोगामी असून अशा प्रतिसादाशी अंशतः सहमती दाखवायला करेज नि समबुद्धी लागते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 03/09/2018 - 14:29 नवीन
वालावलकरसेठ, लेखन आवडले. आणि देवाळू लोकांचे प्रतिसादही वाचून हहपुवा झाली. =)) देव- बीव काय नसतं, तो एक मस्त टाईमपास असतो, बाकी चालू द्या. =)) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 Sat, 03/10/2018 - 06:45 नवीन
नास्तिक हे अक्कलनामशून्य असतात नि वर त्यांना अकलेचा भयंकर माज असतो याचा पुर्नप्रत्यय देणारी लेखने आणि प्रतिसाद यांचं मनोरंजनमूल्य आम्हाला देखील मज्जा येते म्हणूनच आम्ही यनांचा टी आर पी वाढवत असतो. =============== नास्तिक असण्यासाठी अक्कल शून्य असणे ही नेसेसरी आणि सफिशियंट कंडीशन आहे हे २१ व्या शतकाच्या नास्तिकवादाचं व्यवच्छेदक लक्षण आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
A
arunjoshi123 Sat, 03/10/2018 - 06:50 नवीन
देव- बीव काय नसतं
ओक्के. नास्तिकालयात दुनिया स्वयंभू अशा दिलिप बिरुटेंनी बनवली असं शिकवायला चालू करू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
A
arunjoshi123 Sat, 03/10/2018 - 06:59 नवीन
वरील दोन्ही प्रतिसादांत कोणताही ऑफेन्स अभिप्रेत नाही. हहपुवा ज्या ज्या भावनांनी उत्पन्न झाली त्याच भावना विनम्रपणे परत केल्या आहेत. उगाच टिपिकल नास्तिकी भडकपणा दाखवत भाषा सांभाळा वैगेरे म्हणू नये. ============================= नास्तिक अक्कलशून्य आणि बुद्धीचा माज करणारे सायमल्टेनियसली असतात म्हणून त्यांचं विनोदमूल्य भयंकर असतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
S
sagarpdy Sat, 03/10/2018 - 10:14 नवीन
एकूणच आस्तिकता हा विषय यनांनी अभ्यासलंय तेवढा नास्तिकता हा अभ्यासला नाहीये असे वाटते. मारवा, मार्कस ऑरेलियस यांनी मांडलेल्या मुद्द्यांवर काहीच भाष्य नाही (जे लेखातील नास्तिक बाजूवर चर्चा करतात). सर्व धाग्यांखाली "देव नाही, देव नाही" एवढाच जप चालू असतो. जर हेच सुरु ठेवायचे असेल तर जुने धागे वर काढून काम होणारे - नवे लेख पडायची गरज वाटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
र
राही Fri, 03/09/2018 - 16:15 नवीन
यनांचे धागे शतक गाठतातच. आणि हे शतकी कार्य सिद्धीस नेण्यास प्रतिसादश्री अजो हे समर्थ असतातच. पुढील शतकी धाग्यास आगाऊ शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 Sat, 03/10/2018 - 07:01 नवीन
शुभेच्छा हे अस्तिकी लक्षण आहे आणि नास्तिकी मूर्खपणा आहे. ते ख्रिश्चनांच्या प्रार्थनेच्या शक्तीचंच एक हलकं व्हर्जन आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
य
यनावाला Fri, 03/09/2018 - 16:29 नवीन
उचलले बोट आणि लावले कळपटाला ! माझ्या लेखनातील प्रत्येक शब्दाला प्रचलित अर्थ असतो. बहुसंख्य वाचकांना तो ठाऊक असतो. "परीस" म्हणजे, "ज्याच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होते असा मणी (रत्‍न)". हा प्रचलित अर्थ आहे. त्याच अर्थाने तो इथे वापरला आहे. तसेच लोखंडाचे सोने बनविण्याचे कसलेही उपकरण जगात कोणीही निर्माण केलेले नाही. उगीच आपले उचलले बोट आणि लावले कळपटाला (की बोर्डाला) !
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 Sat, 03/10/2018 - 06:39 नवीन
प्रचलित अर्थानेच परीस हा एक रेडिओअ‍ॅक्टीव पदार्थ असू शकतो ना यनावाला? व्हाट इज द बिग डिल? प्रचलित अर्थात परीस हा किरणोत्सारी नसलाच पाहिजे असं काहीही अभिप्रेत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यनावाला
A
arunjoshi123 Sat, 03/10/2018 - 07:13 नवीन
तसेच लोखंडाचे सोने बनविण्याचे कसलेही उपकरण जगात कोणीही निर्माण केलेले नाही.
https://en.wikipedia.org/wiki/Glenn_T._Seaborg#Return_to_California हा बहुतेक मनुष्यच असावा.
Following his service as Chairman of the Atomic Energy Commission, Seaborg returned to UC Berkeley where he was awarded the position of University Professor. At the time, there had been fewer University Professors at UC Berkeley than Nobel Prize winners. He also served as Chairman of the Lawrence Hall of Science where he became the principal investigator for Great Explorations in Math and Science (GEMS)[41] working with director Jacqueline Barber. Seaborg served as chancellor at the University of California, Berkeley, from 1958 to 1961, and served as President of the American Association for the Advancement of Science in 1972 and as President of the American Chemical Society in 1976.[42] In 1980, he transmuted several thousand atoms of bismuth into gold at the Lawrence Berkeley Laboratory. His experimental technique, using nuclear physics, was able to remove protons and neutrons from the bismuth atoms. Seaborg's technique would have been far too expensive to enable routine manufacturing of gold, but his work was close to the mythical Philosopher's Stone.[43][44]
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यनावाला
A
arunjoshi123 Sat, 03/10/2018 - 07:21 नवीन
https://www.scientificamerican.com/article/fact-or-fiction-lead-can-be-turned-into-gold/ ==================== मग लोखंडानंच काय घोडं मारलं आहे? त्याचं देखील सोनं होणं शक्य आहे. फायनली तेच सबअ‍ॅटॉमिक पार्तीकल्स आहेत. त्यामुळं कुणी परीस असू शकतो म्हणाला तर त्याला 'नाही नाही नाही'असंच म्हणणं एक श्रद्धाच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
A
arunjoshi123 Sat, 03/10/2018 - 08:10 नवीन
यना, राजीव साने तुमच्या करोडपट तरी नास्तिक आहेत. ते ईश्वरीय अस्तित्वाच्या चर्चेशीच मला काही देणं घेणं म्हणतात, नि चर्चकांचे तीन प्रकार सांगता नि नास्तिकांनी देव मानणार्‍या सुधारकांशी खोटी दोस्ती करुन एक सदुद्देशप्रेरित फ्रॉड करावा म्हणतात; तेव्हा ते कळतं. उर्वरित लेखात सान्यांनी अस्तिकांना कसे कसे मूर्ख बनवून नीट वागवून घ्यावे हे लिहिले आहे. ते इथं महत्त्वाचं नाही. https://www.loksatta.com/sampadkiya-news/what-is-important-either-existence-or-appearance-of-god-135371/ पण मी कोट केलेल्या उतार्‍यात का मूर्ख बनवावे हे लिहिले आहे. हे सगळं स्ट्रॅटेजी लेवलवर आहे. कदाचित याचा आपणांस नि अन्य भाविक नास्तिकांस उपयोग असू शकतो.
मी धर्म हा शब्द रिलिजन/मजहब या अर्थानेच वापरत आहे. कर्तव्याला ‘कर्तव्य’ हा नि:संदिग्ध शब्द असताना उगीच ‘धर्म’ हा संदिग्ध शब्द वापरून गोंधळ वाढवणे मला मान्य नाही. मानवी कल्याणाचा मार्ग अचल (अपरिवर्तनशील)- धर्मनिष्ठा, धर्मउच्छेद वा धर्मपरिवर्तन यांपकी कशातून जातो यावर कडाक्याचे मतभेद आहेत. या तीन पक्षांना अनुक्रमे सनातनी, नास्तिक आणि धर्मसुधारक असे शब्द ढोबळमानाने वापरले जातात. पकी अचल-धर्मनिष्ठेला स्पष्ट नकार देण्याच्या पक्षात मी पक्का आहे. धर्मउच्छेदवादी व धर्मपरिवर्तनवादी यांच्यात कित्येकदा माणसाने कसे असायला हवे (अहिंसक, न्यायी, कर्तव्यनिष्ठच नव्हे तर उदारही इ.) हा जो खरा महत्त्वाचा प्रश्न आहे, त्यावर बऱ्यापकी एकमत असते. असे असूनही उच्छेदवादी (निष्ठावाद्यांबरोबर) परिवर्तनवाद्यांनादेखील दूर लोटतात. पण स्वत:च लोकांतून बाजूला पडतात असा इतिहास आहे व तो अजूनही चालूच आहे. उच्छेदवादी, ईश्वराच्या स्वरूपाची चिकित्सा करण्याऐवजी त्याच्या अस्तित्वावर वाद घालून मोठीच गल्लत करतात. ‘‘पुराव्याचे नसणे हा नसण्याचा पुरावा नव्हे,’’ या बिनतोड मुद्दय़ावर ते हमखास अडचणीत येतात. श्रद्धा हा ज्ञान-दावा नसतोच. त्याचे प्रमाण काय मागणार? श्रद्धाविधान हे श्रद्धावानाच्या अंतरंगाविषयीचे असते. वास्तवाविषयीचे नसतेच. इहवादापुढील प्रश्न श्रद्धा नाकारण्याचा नसून श्रद्धेची सक्ती नाकारण्याचा आहे. दुसरे असे की, धर्मचच्रेत उतरायचेच नाही, या हटवादापायी आपण ‘परिवर्तनवादी पण धार्मिक’ असे मित्र गमावत राहिलो, तर सनातन्यांच्या कचाटय़ातून लोक सुटणार तरी कसे? हाही विचार नास्तिक प्रागतिकांनी करायला हवा. माझ्या या मतामुळे माझे नास्तिक मित्र माझ्यावर रागावतात. ‘‘एकदा का तुम्ही ‘त्याला’ थोडी जरी फट सोडलीत की धर्माधतेचे सगळे नष्टचर्य मागे लागलेच म्हणून समजा.’’ असा इशारा ते मला देतात. ही चिंता मी समजू शकतो, कारण ‘धर्माधतेचे नष्टचर्य’मध्ये काय काय येते याची जाणीव मलाही आहेच. ते काहीही असो. उपासक हे तर वास्तवातच व दणदणीत बहुमतात आहेत आणि त्यांना बरोबर घेऊनच परिवर्तन करायचे आहे. ‘तो’ रिटायर तर होत नाहीये. मग निदान त्याची जॉब-एनरिचमेंट तरी करूया! म्हणूनच आता उपासक आणि त्याच्या अंतरंगातील उपास्य यांत काय प्रकारची नाती असू शकतात व उपासकाची उपासनादृष्टी त्याला माणूस म्हणून ‘कशा प्रकारचा’ घडविते हे पाहिले पाहिजे. ही चिकित्सा करताना आपण ईश्वराच्या ईश्वरत्वालाच ढळ पोहोचत नाही ना? हा धार्मिकांच्या चौकटीतलाच निकष वापरणार आहोत.
======================= उद्धृतात ते श्रद्धेविषयी काही तांत्रिक विधाने करताहेत. ‘‘पुराव्याचे नसणे हा नसण्याचा पुरावा नव्हे,’’ या बिनतोड मुद्दय़ावर ते हमखास अडचणीत येतात. श्रद्धा हा ज्ञान-दावा नसतोच. त्याचे प्रमाण काय मागणार? हि ती विधाने. ही तुमच्या मतांच्या विपरित आहेत. आपण (वा कोणीही नास्तिक) यावर चार शब्द बोलतात तरं बरं होइल.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा