काटेकोरांटीची फुलं.
Primary tabs
जावई कधीही यायचे. त्यांना आधी कळवायची अट नव्हती. सणासाठी यायचे असले तर त्यांच्या वडीलांचे पत्र यायचे.घरात एकच धांदल असायची. आजी तेव्हा जावयांच्या गावातच स्थायीक होती. जावई गब्बर माणूस. त्यांच्या जीपमधून आज्जी पण यायची.आईचा जीव खालीवर व्हायचा. घरात सहा पोरं. पाहुणे येणार म्हणजे महीन्याचं बजेट डळमळायला सुरुवात व्हायची. आमचा वाणी घाडगे.उधार द्यायचा पण वडीलांना उधारी खपायची नाही.पाहुणे म्हणजे जीवाला घोर.तोंड दाबून बुक्क्यांचा मार.
आम्ही पोरं मात्र खूष असायचो. का खूष असायचो हे आजतगायत कळलं नाही.आत्या येणार म्हणजे सकाळी लवकरच येणार. आत्याचा नवरा मोठ्ठा वकील. घरची मालगुजारी. वर्हाडात सावकाराला मालगुजार म्हणायचे.गिरीपेठेतल्या घरातून रस्त्यावर उभं राहीलं की चौबळांच्या घरापर्यंतचा रस्ता दिसायचा.पोरं आळीपाळीनी रस्त्यावर उभी रहायची. जीपडं येताना दिसलं की आनंदानी नाचायला सुरुवात.
पाहुणे येणार म्हटल्यावर बहीणी मात्र मुक्या व्हायच्या. चार दिवसात कामानी पिट्ट्या पडायचा.
बहीणी सगळ्या आमच्यापेक्षा मोठ्या.आईच्या मदतीला सैपाकघरात.दप्तरं गुंडाळून ठेवायची.शाळेला नाही गेलं तरी चालायचं.
जीपड्यातून आजी पायउतार झाली की तिची पिशवी , गाठोडं घ्यायला आम्ही पुढे. संत्र्याची टोपली एकाच्या हातात , दुसर्याच्या हातात आत्याची पिशवी. मग आत्याचा नवरा. सगळ्यात शेवटी आत्या उतरायची.वडील आत्याच्या नवर्याचं स्वागत करायचे. बाहेरच्या खोलीत सतरंजीवर मोठी माणसं ऐसपैस पसरायची.
आजी आणि आत्या मधल्या खोलीत .आम्ही पोरं आजीचं गाठोडं सोडवण्याच्या मागे. कापसाची बोंड, तुरीच्या शेंगा , गाजरं, मटाराच्या शेंगा, आंबट बोरं असा ऍसॉर्टेड माल बाहेर पडायचा.संत्र्याच्या टोपलीला हात लावायची डेरींग नसायची. मग आजीच मेहेरबान होऊन एकेक संत्रं आमच्या हातावर ठेवायची.थंडीनी ओठ उलून गेलेले असायचे. आंबट रसानी ओठ चुरचुरायचे.पण फोडी मोजण्यात आणि सालांचा रस एकमेकांच्या डोळ्यात उडवण्यात जास्त मजा यायची.
चहाचं ताट बाहेरच्या खोलीत गेलं की आंघोळीची हाकाटी सुरु व्हायची. आत्या सैपाकघराच्या बाहेरच्या उंबरठ्यावर बसायची. हातात काळं मंजन घेऊन दात घासत बसायची. आई दादासाहेबांसाठी घंगाळात गरम पाणी काढायची.आंघोळीसाठी मोरी.बाथरूम असा काही प्रकार नसायचाच.दादासाहेब आंघोळीला बसले की बायका तात्पुरत्या बाहेर व्हायच्या.
आत्या बहीणींच्या हातात धोतर देऊन म्हणायची निर्या काढा गं पोरींनो.असली कामं करायला मुली नाराज असायच्या.पण सांगणार कुणाला?
मोरीत साबण एकच. लाईफबॉय.आत्या फणफणायची.
काय बाई खरजेचा साबण देता पाहुण्याला असं म्हणायची.आपली पेटी उघडून मोती साबण काढायची. आंघोळ झाल्यावर साबण परत पेटीत जायचा
साबणासाठी पेटी उघडली की सुगंध दरवळायचा. मुली उत्सुकतेनी पुढं व्हायच्या पण आत्या पटकन पेटी बंद करायची.
आता त्या वेळी टॉयलेटरीज आणि कॉस्मेटीक्स मध्ये आमच्या घरात असणार काय .दरबार गंधाची बाटली, रेमी ची पावडर आणि फूल,जाईचं काजळ.संपलं या पलीकडे काही नसणार .कुठल्याच घरात नसायचं.मुलींना उत्सुकता त्यातच असायची.
पावलोपावली माहेरच्या गरीबीचा उद्धार व्हायचा.रात्री झोपायची प्रचंड गैरसोय व्हायची.बाहेरच्या खोलीत पुरुष मंडळी.दादा शहाण्यासारखा मित्राकडे निघून जायचा.मधल्या खोलीत आजी, आई आणि आत्या.स्वच्छ चादरी बाहेर वापरायचे.बाकी सगळ्या चादरी वारंवार शिवलेल्या तरी असायच्या नाहीतर मुताचा वास तरी यायचा.आत्या आजी आणि आईच्या रात्री गप्पा रंगायच्या.मुलींना जाम उत्सुकता असायची गप्पा ऐकण्याची.आत्या कसली ऐकतेय.
" ए मुलींनो तुम्ही दूर झोपा बाई."
" का ग आत्या "माझी धाकटी बहीण विचारायची.
"बाई बाई केव्हढ्या उवा तुझ्या डोक्यात .उडून माझ्या डोक्यात येतील गं बाई . नको . तुम्ही दूरच बर्या."
आई मधे पडायची. "नाही उवा वन्सं.गेल्या रविवारीच रॉकेल घालून डोकी धुतलीत पोरींची."आणि हा वाद रोज व्हायचा .
मुली कंटाळून सैपाक घरात झोपायच्या.
माझी धाकटी बहीण त्यातल्या त्यात तिखट. एकदा फणकार्यानं म्हणाली "एव्हढेसे तर केस तुझे आत्या आणि गंगावनात कशा गं उवा होतील."
या डायलॉग नंतर इतकी शांतता पसरली की नखाखाली ऊ चेचली असती तरी टाळीसारखा आवाज वाटला असता.
पाहुणे आले ,शाळा नाही.धाकटं भावंड आजारी पडलं शाळा नाही.पैसे कमी पडतातयंत कॉलेज बंद.कपातीची पहीली झळ मुलींना. शिस्तीची सगळी धार मुलींवर चालायची.ताईची पुस्तकं माई वापरायची.माईचे जुने युनीफॉर्मचे स्कर्ट आक्का वापरायची.निळ्या स्कर्टच्या प्लेटी उसवून दुसर्या टर्म पर्यंत वेळ काढायची. फिका पडलेला निळा स्कर्ट आणि डार्क निळ्या रंगाची किनार त्याला जाडीभरडी हातशिलाईची टिप. उंची वाढणं पण शापच.
मुली मोठ्या झाल्या. (बसायला लागल्या)ते दिवस व्हिस्पर किंवा तयार सॅनीटरी नॅपकीनचे नव्हते.जुन्या कपड्यांच्या घड्या धुवून वापरायच्या.अंगणातल्या ओट्यावर जेवण. त्या चार दिवसात शिवाशिव पाळावी लागायची.अंगणात एका पत्र्याच्या शॅडमध्ये एक वेगळी बाथरूम.
घराचा कोंडवाडा झाला.त्यांचं दुकानात जाणं बंद. गणेशोत्सवाचे कार्यक्रम बंद.गॅदरींगमध्ये स्टेजवर नाचायला जाणं बंद.भुलाबाई बंद.मैत्रीणीकडे जायचं ते भावाला बरोबर घेऊन.
याच वेळीनेमकी एखादी बहीण शाळेतून सुटली की समोरच्या दरवाजानं न येता अंगणाला वळसा घालून मागच्या ओट्यावर बसायची. आईनी बघीतलं की आई डोक्याला हात लावायची.
"आताच तुला पण गोंधळ घालायाचा होता का "असं म्हणत आंघोळीचं पाणी काढायची.
आत्याच्या कपाळाला आठ्या पडायच्या.
"असू द्या हो वन्सं . पोराबाळांचं घर आमचं."आईचं पालुपद सारखं चालू असायचं
आत्या आंघोळीला जाताना पेटी उघडून पैसे मोजायची. रात्री झोपताना मोजायची. खर्च तर काही करायची नाही पण मोजताना मी आसपास दिसलो की डोळे मोठ्ठे करून विचारायची
ए, गोम्या,(घरात मी एकटाच काळा म्हणून मला किलावरचा गोम्या म्हणायची) तू चोट्टा नाहीयेस ना . ?
मनात जाम राग आलेला असायचा पण काढायचा कुठे? पण पाहुण्याला खिंडीत गाठायची रग होतीच.(म्हणून रगेल दोडका हे दुसरं नाव पण होतं)
असेच एकदा दिवाळीला जावई आले होते.जावई आले की त्यांना भेटायला बरीच माणसं यायची.त्यांच्या चहापाण्याला दूध पुरायचं नाही.घरी ब्रिज खेळायला चिमोटे सावकार , गंगशेट्टीवार, इंगोलीकर , मुंगळे वगैरे सावकार मंडळी यायची.
मग चार दिवस मुलांना दूध नाही.चहा प्यावा लागायचा.
मुली मोठ्या म्हणून त्यांना चहा पण नाही.
मी तसा सहासात वर्षाचा होतो. सकाळी दूध नाहीय्ये, संपलंय म्हटल्यावर जरा नाराजच होतो.आत्या मात्र दूध पित होती.
"तिच्या पोटात बाळ आहे ना म्हणून ...."
आमच्या ताईनी माझी समजूत काढली.जरासा फुगून मी घरासमोर मंगळूरकरांचा टालावर (जळाऊ लाकडाची वखार)गेलो. त्यांच्याकडे एक गाय पाळली होती.मंगळूरकर काकी गायीचा शेणगोठा साफ करत होत्या.
"काकी, तुमच्याकडे दूध असेल ना?" मी विचारलं.
"नाही रे बाळा. गाय गाभण आहे ना . पोटात बाळ आहे तिच्या."
"आमच्याकडे पण दूध नाहीय्ये. आत्यानी पिऊन टाकलं .ती पण गाभण आहे ना....."
काकी ठो ठो हसायला लागल्या.
शब्दांचा सूक्ष्म अर्थ कळायचे दिवस नव्हते ते. पण दुपारपर्यंत हा विनोद घरापर्यंत पोहचला होता.
साडेचार वाजता घरी आलो तेव्हा आत्या फुरंगटून बसली होती.
वडील माझी येण्याची वाट बघत असावेत. हातात तूरकाठी होती.(तुरकाठी मुलांना मारायचं स्टँडर्ड इक्युपमेंट होतं).
त्या दिवशी मरेस्तो मार खाल्ला. का मारतायंत हे कळेना . रात्रीचं जेवण बंद.
बहीणी मुक्या मुक्या बघत होत्या. मग मोठीनी गळा काढला. मग धाकटीनी....
मार खाउन जो झोपलो तो अपरात्री जागा झालो परत भुकेनीच.
मार आठवला . अंगावरचे वळ भुकेनी आणखीनच जळायला लागले, परत मुसमुसायला सुरुवात.
ताई जागी झाली .
"काय झालं रे "म्हणाली .
माझं रडणं काही थांबेना..तिला कळलं मला भूक लागलीय पण जेवायला वाढायचं धैर्य तिच्यात पण नव्हतं.
थोड्या वेळानं मोरीवर जायच्या निमीत्तानी उठली.परत आली.
माझ्या अंगावर पांघरूण घातलं आणि हातात गुंडाळी केलेली पोळी दिली.एक संपली मग दुसरी दिली.पोळीला काय लावलं होतं ते आठवत नाही पण मिठाची काही कमी नव्हती.
आज चाळीसएक वर्षं झाली या गोष्टीला पण दूध प्यायची इच्छा मेली ती मेलीच.आता दारु प्यालो तरी दुसर्या पेगनंतर दूधाची आठवण येते आणि दारूची नशा उतरते.दारू पोटात फिरायला लागते.
लहान होतो तेव्हा दूध नाही, मोठेपणी दारु झेपत नाही.माणसानी दु:खाचे कोरडे घास गळ्याखाली ढकलावे तरी कसे?
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
उपेक्षा ,कुचंबणा, गैरसोय, अपमान,आवडती नावडती,हाल अपेष्टा, हेळसांड या सगळ्यांना तोंड देत या मुली शिकल्या. मुली जितक्या शिकल्या तेव्हढच मुलं पण शिकली.पण मुलांचं कौतुक जितकं झालं तितकं मुलींचं काही नाही.
मला नक्की कुठलं वर्षं ते आठवत नाही पण मी तेव्हा बराच लहान असणार. घरी वडलांचे मुंबईचे काका आणि त्यांचा मुलगा आला होता.हौशी माणसं .ते आग्रह कर करून आई आणि बाबांना आरजू नावाच्या सिनेमाला घेऊन गेले. ताई -दादा कॉलेजात. मला आणि धाकट्या भावाला सांभाळायला दोन्ही बहीणी घरी थांबल्या होत्या.
त्यांना घरी राहण्यासाठी बाबांनी दोघींच्या हातावर पाच पाच पैसे ठेवले होते.
हातात पैसे असणं हा तसा दुर्मीळ प्रसंग. दुपारी मी झोपल्यावर दोघींनी एक धाडस केलं .दोघीजणी पानाच्या ठेल्यावर गेल्या. पाच पैशात तेव्हा मिठा पान यायचं .दोघीजणी पान खाऊन घरी आल्या. आता खाल्लं तर खाल्लं निदान फ्रॉकवर सांडायचं तर नाही .
बरं सांडलं तर सांडलं.धुवून पुरावा तरी नष्ट करायचा.
बराच वेळ आरशासमोर उभ्या राहून दोघी जीभा किती लाल झाल्या ते बघत बसल्या.
चार वाजता सिनेमाला गेलेली मंडळी घरी आली.
आल्या आल्या आईनी विचारलं "अगं बायांनो फ्रॉकवर काय सांडलयत.?"
खोटं बोलायला मुलगा व्हायला लागतं.या शेळीच्या शेपट्या.खोट्याची झाकपाक करायला एकदम नालायक.
आईला जीभ काढून दाखवली. आईनी डोक्याला हात लावला आणि बाबांनी कानाखाली.
दोन मिनीटात जीभेपेक्षा गाल जास्त रंगले.पण यांच्या डोळ्यात पाणी नाही.
बिचार्या इतक्या निष्पाप की नंतर सात दिवस झाले तरी त्यांना कळेना की नक्की काय चुकलं.
या मुली भराभर मोठ्या होतं गेल्या. शिकल्या .आपल्या पायावर उभ्या राहील्या. आईबाबांनी सांगीतलेल्या मुलांशी लग्न करून संसार थाटले.
धाकट्या बहीणीच्या डोहाळजेवणाच्या वेळची गोष्ट. दुपारची जेवणं झाल्यावर बाबा खूषीत होते.पानपट्ट्या बाहेरून मागवल्या होत्या.
बाबांनी एक पान जावयाच्या हातात दिलं .जावई रसीक .त्यानी सगळ्यांच्या समोर अर्धं पान बहीणीला भरवलं.
बाबांना आणि बहीणीला एकाच वेळी जोरात ठसका लागला . पंधरा वर्षापूर्वीचे साठवून ठेवलेले आसू डोळ्यात उभे राहीले.
बाबांना रडताना मी सुद्धा पहील्यांदाच पाहीलं.
वर्षामागे वर्षं गेली आणि आईपेक्षा बाबा जास्त हळवे होत गेले.मुलींच्या आठवणीनी बेचैन व्हायला लागले. मुलींच्या फोनची वाट बघायचे. फोन आला नाहीतर आईच्या मागे लागून फोन करायला लावायचे.
वय माणसाच्या मनाशी काय खेळ करेल काही सांगता येत नाही.
माझ्या मुलीच्या पहील्या वाढदिवसाला ताई आली होती.मला म्हणाली "काय रे दोडक्या, तुझा रगेल पणा जरा कमी झालेला दिसतोय. सारखं घरात काय आहे रे तुझं.?"
"हळवं व्हायला काय वय झालं का रे तुझं?"मी काहीच बोललो नाही.
म्हातारपण कुणी पाह्यलंय. हळवं व्हायला वय व्हायला पाहीजे असंच काही नाही. या मुली आमच्या घराच्या काटेरी शिस्तीत कोरांटीच्या नाजूक फुलासारख्या वाढल्या. मुलं केवड्यासारखी वाढली. आमच्या अंगणातली ही कोरांटीची फुलं दुसर्याच्या घरात सोनचाफ्यासारखी फुलली. काटे विसरून गेली. पोरं मात्र केवड्याच्या उग्र दिमाखात काट्यासकट मोठी झाली. आता घरात मुलगी आलेय तर केवड्याला काटे झटकायला काय हरकत आहे?
सुरेख...
किति सुरेख लिहिल आहे त्॑तोत्॑त चित्र उभ राह्यल
मी मागे जे म्हण्टले तेच परत म्हणतो. रामदास हे मिपाचं एक फार मोठ्ठं फाईंड आहे. त्यांचे लिखाण , त्यातील व्यक्तिरेखा , चार शब्दांच्या वाक्यावाक्यातून एक कालखंड उभा करण्याची क्षमता , "बीटवीन द लाईन्स" असणारी अर्थसंपृक्तता... हे सगळे मला फार वरच्या दर्जाचे वाटते. त्यांच्या लिखाणातून पानवलकर, मोकाशी (आणि लहान मुलाच्या पस्पेक्टीवने लिहिण्याच्या बाबतीत जी ए ) यांच्यासारख्या दिग्गज कथा लेखकांची याद येते.
त्यांचे प्रस्तुत लिखाण हे त्यांच्या खास शैलीतले. एका गरीब , जुनाट विचारसरणीच्या कुटुंबातील स्त्रीवर्गाचे शोषण, त्यांच्या दडपल्या गेलेल्या भावना , कोवळेपणाची झालेली राखरांगोळी हे सारे अस्सलपणे उभे केले आहे. गरीबी आणि जुनाट विचारसरणी यांच्या दुहेरी कात्रीमधे माणसाची माणूस म्हणून जगण्याची डीग्निटी कशी समूळ नाश पावते याचे छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्याला दर्शन घडते. वयात आलेल्या मुलींची कुचंबणा, न केलेल्या गुन्ह्यांची शिक्षा , कसलेही कोवळेपण नि खासगीपण नसणे याचे एक संवेदनशील असे चित्र इथे लेखक रंगवतो.
+१
वेगळा प्रतिसाद देत नाही. म्हणजे देऊच शकणार नाही. मुक्तसुनीतनी जे काही लिहिले आहे त्याच्याशी १०१% सहमत. कसं लिहावं याचा आदर्श वस्तुपाठ आहे.
काही काही वाक्यं आतून हलवून गेली.
बिपिन कार्यकर्ते
>काही काही वाक्यं आतून हलवून गेली.
अगदी...
मुक्तसुनीत व बिपिनदांशी सहमत; अंतर्मुख करणारा लेख.
Haven't I said Bip after meeting Ramdas uncle that he is different, मनस्वी व्यक्तीमत्व
रामदास काका , you have a knack to touch the heart !!
Kudos to your writting !
~ वाहीदा
शब्दशः सहमत!!
चतुरंग
सहमत!!!!
+१
आता घरात मुलगी आलेय तर केवड्याला काटे झटकायला काय हरकत आहे?
निशःद्ब झाले वाचून.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
फारच प्रभावी झालीये कथा.
रेवती
काय लिहू ? ते कळत नाही, जुना काळ कथेतून सशक्तपणे उभा केला आहेत. कदाचित आई,आजीच्या काळातले हे प्रातिनिधिक चित्र असावे.
कथा भावली एवढेच म्हणते.
स्वाती
भन्नाट लिहिलंय रामदासकाका.
:D
सुंदर.
मस्त.
अप्रतिम लिहिले आहे.
:)
आजही आंबा खावासा वाट्त नाही. शेटाणी असलेल्या आत्याने सुटीत आणलेले १ पेटी आंबे नागासारखे डसतात अजुनही. खायला बसलेले असताना "खा, हो बरोबर पोट भरुन, नाहीतरी दादाला थोडेच परवडणार आहे हे"
तेच आतेभावाच्या जुन्या कपड्या बाबतीत.
रामदासजी मस्त लिहिलंय!
खरे सांगायचे तर रामदास आणि मस्त लिहीणं हे एकमेकांना पर्यायी शब्द आहेत!
काका, तुमची स्वाक्षरी घ्यायची आहे. पुस्तक प्रसिद्ध झाल्यावर भेटाल... न भेटाल... ;)
त्याच छोट्या वाक्यांचे तीर, तसेच भावनांचे संधान, तेच कथेचं उलगडत जाणं, तीच पात्रांची फेर धरुन नाचायची पद्धत, तोच काळ उभा करण्याची क्षमता, तीच अंगावर लोंढ्यासारखी येणारी कथा आणि तेच कथेच्या शेवटी वाचकाला नि:शब्द करुन टाकणं!
नुसतंच अर्थगर्भ नाही तर आपल्या सर्वसामान्यांच्या जीवनाला आडवा-उभा छेद देऊन जाणारं असं लिहिणं म्हणजे देवाचंच देणं!
रामदास हा मिपाच्या खाणीत निघालेला हिरा आहे! इतका संपन्न कथालेखक मिपाला लाभला हे आमचं भाग्य!! :)
(काटेकोरांटीची फुलं सुंदर असतात हे माहीत होतं, पण आता आयुष्यात कधीही पुन्हा ती फुलं बघेन तेव्हा त्या फुलांच्या जागी मला ही कथा दिसेल!)
(नतमस्तक)
चतुरंग
रामदास - अप्रतिम लिहिले आहे तुम्ही...खरच अंगावर काटा आला आणि डोळ्यात पाणी. लिहित रहा......आम्हाला मेजवानी आहे!
- मनिष
(खुद के साथ बातां - पुढच्या ठाणे भेटीत रामदासजींना भेटलेच पाहिजे!!!)
अप्रतिम कथा!
खरंतर कथेतील वातावरण मी अनुभवलेलं नाही.. किंवा तो काळ- तेव्हाचे विचार यापासूनहि दुर आहे.. तरीही कथा वाचून एक अनामिक हुरहुर लागली.. डोळे कधी पाणावले कळलंच नाहि.. का कोण जाणे अचानक अक्षरं धुसर दिसायला लागली :(
केवळ अप्रतिम!
-(धुसर) ऋषिकेश
अप्रतिम कथा. चतुरंग आणि मुक्तसुनीत यांच्या प्रतिक्रियांशी सहमत.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
खुप आवडल. वेगळि प्रतिक्रिया काय लिहिणार चतुरंग आणि मुक्तसुनित यांच्याशि १००% सहमत.
वरच्या सर्व प्रतिसादांशी सहमत! किती सुंदर आणि सहज लिहीलंय!! मिपाचं रत्न आहात तुम्ही!
रामदास काका...
जबरदस्त लिहिलय....अगदी आमच्या लहानपणीची आठवण झाली...चतुरंग म्हणतात तसं
(काटेकोरांटीची फुलं सुंदर असतात हे माहीत होतं, पण आता आयुष्यात कधीही पुन्हा ती फुलं बघेन तेव्हा त्या फुलांच्या जागी मला ही कथा दिसेल!)
अंतर्मुख केलत तुम्ही....
धन्यवाद...
मुकुल
सुरेख...!
मुक्तरव आणि रंगाशी सहमत...
रामदासजी, आपण चांगलं लिहिता, नेहमी असंच लिहीत र्हावा..
तात्या.
निशब्द झालोय...
"कोणत्याही दिवाळी अंकात अगदी सहज शोभावेत असले लेख मिपावर नेहमीच येत असतात, सबब मिपाला दिवाळी अंकाचे विशेष कवतिक नाही!" असे आम्ही नेहमीच म्हणत असतो हे यासारख्या लेखावरून सिद्ध होते..! :)
तात्या.
अप्रतिम.
अभिज्ञ.
केवळ अप्रतीम...
वाचता वाचता केव्हा शब्द धुसर दिसायला लागले कळलच नाही.
बर्याच दिवसांनी खुप छान वाचण्यालायक मिळाल.
-गणपा.
>>आमच्या अंगणातली ही कोरांटीची फुलं दुसर्याच्या घरात सोनचाफ्यासारखी फुलली. काटे विसरून गेली.
किती छान लिहिलं आहे तुम्ही. मुक्तसुनित यांच्याशी सहमत.
असच जबरदस्त लिहीत रहा! काही वाक्य पुन्हा पुन्हा वाचावीत इतकी सुदंर आहेत!
चकली
http://chakali.blogspot.com
अप्रतिम...........शब्दच सुचत नाहिएत काहि लिहायला...
लेख आवडला. आठवणींच्या लडी उलगडाव्यात तसा सहज आणि तलम झाला आहे.
प्रत्ययकारी लेखन.
- मिसळ
भावपूर्ण लेखन. खूप आवडले.
काटेकोरांटीची फुले या नावावरून आधी काही कळले नाही, पण शीर्षक समर्पक.
उत्तम! दुसरे शब्द नाहीत. खरोखर सुरेख लिहीले आहे.
रामदास ब्रँडचा जवाब नाही.
मुक्तसुनीत, नंदन, मेघनातै यांना विनंती. वरील लेखाच्या तोडीचे किंवा वरचढ लेखन कुठे पाहीले असेल तर तो लेख /दिवाळी अंक कृपया सांगा. अन्यथा इतर जालीय दिवाळी अंकाबद्दल काही इंटरेस्ट नाही. ;-)
शब्द नाहीत व्यक्त करायला....
वाचता-वाचता अक्षर कधी धुसर झाली समजलच नाही....
(काळा गोम्या)
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
वातावरण, हळवेपणा समर्थपणे रेखाटला आहे.
लघुकथा म्हणून कथानकाचा आराखडा नीट समजला नाही मला, पण त्याचे सोडा - कदाचित लघुकथा म्हणून वाचायचा प्रयत्न मी करूच नये.
पुन्हा येऊन वाचण्यासारखे लेखन आहे. वाचनखूण साठवली आहे.
तूप जास्त झालं की बेसनाचे लाडू जागीच बसतात.तसं थोडसं झालं आहे.
धन्यवाद.
अतिशय ताकदवान लेखन. मुक्तसुनितयांच्या प्रतिसादाशी पूर्ण सहमत.
कवितेचा प्रवास, शिंपिणीचे घरटे आणि हा लेख. एकापेक्षा एक सरस ललित लेखन.
>तूप जास्त झालं की बेसनाचे लाडू जागीच बसतात.तसं थोडसं झालं आहे.<
कमालच आहे. नमस्कार !
-- लिखाळ.
काय लिहु. @)
रामदास काकांच लिखाण म्हणजे क्लासच काय बोलु अजुन. :)
चतुरंग आणि मुक्तसुनीत यानी वर लिहिलेल्या प्रतिसादाशी सहमत.
हे रामदास काकांसाठी..................
................
"बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय."
ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :)
http://picasaweb.google.co.in/zakasrao
साठोत्तरी च्या दशकात ग्रामीण साहित्याने ज्या काही कथा फुलवल्या त्याची आठवण झाली.
अतिशय सुंदर कथा !!!
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
रामदासांच्या कथा नेहमीच एक अपेक्षा ठेवून वाचल्या जातात. ती अपेक्षा पूर्ण करणारे लेखन. असेच आणखी वाचायला आवडेल.
>>> आता घरात मुलगी आलेय तर केवड्याला काटे झटकायला काय हरकत आहे?
वा !
एकदम मस्त लेखन !
मनाला भिडणारं !
जिओ ! रामदास बाबू !
जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आपले संकेतस्थळ
बस् वाचता वाचता कधी कालकुपीत गेलो ते समजलच नाही. बाहेर आलो आन कळफलक बडवला.
प्रकाश घाटपांडे
बस् वाचता वाचता कधी कालकुपीत गेलो ते समजलच नाही. बाहेर आलो आन कळफलक बडवला.
प्रकाश घाटपांडे
अप्रतिम.................................................................................................
मदनबाण.....
हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर.
बॅ.वि.दा.सावरकर
अप्रतिम.................................................................................................
मदनबाण.....
हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर.
बॅ.वि.दा.सावरकर
जातीवंत लेखक जसे लिहितो तसे लेखन.
शब्द-न्-शब्द आवडला. अत्यंत स्वाभाविक तरीही काळजाला भिडणारा लेख.
आत्याचाही काही माहेरचा इतिहास असेल.
"परक्याचं धन...","मुलीच्या जातीनं...","मुलगी शेफारली आहे हो, सांभाळा. उद्या सासरचे म्हणतील...", "असले लाड नवर्याकडून करून घे", "पोरीने नशीब काढलंन,चांगल्या घरात पडली हो पोरगी"ही वाक्यं आजकाल जरा कमी ऐकू येतात.
कथानायकाच्या मुलीचे भविष्य आहेच.
केवड्याचा चाफा झाला तर किती उत्तम!
अप्रतिम शब्दचित्र.
जरी हे शब्दचित्र एका सहा-सात वर्षाच्या मुलाच्या दृष्टीतून आले असले तरी गाव-खेड्यात उमेदीची वर्षे घालवलेल्या आणि पासष्टी-सत्तरीच्या पुढे असलेल्या पिढीला यातले बरेचसे संदर्भ खूप जवळचे वाटतील असे वाटते.
हे सगळं इतक्या प्रातिनिधिकपणे आम्हाला सांगितल्याबद्दल रामदास यांचे मनापासुन धन्यवाद.
"प्रातिनिधिक" यासाठी की कदाचित या शब्दचित्रातला काळ एकत्र कुटुंबाचे एक वास्तववादी दर्शन घडवतो.
अवांतर -
>>घरात सहा पोरं ...
>> ... या मुली शिकल्या ..
>>..मुलांचं कौतुक जितकं झालं तितकं मुलींचं काही ना...
साठ-सत्तरच्या दशकाच्या आधी अशी परिस्थिती प्रातिनिधिक असावी: सहा-सात मुलं, मोठा कुटुंबाचा गोतावळा, (कदाचित त्यामुळे असलेली) हालाखीची आर्थिक स्थिती आणि त्यातून निर्माण होणारे कौटुंबिक संघर्ष ...
शेतीतून कमी झालेलं उत्पन्न आणि परिणामी होणारी ओढाताण यामुळे जसं जमेल तसं शिक्षण करुन शिक्षक/नर्स वगैरे होणं हेच आयुष्यात स्थिरस्थावर होण्याचे मार्ग असावेत. शेतीकडून नोकरी आणि त्यासाठी गाव सोडण्याची गरज यातूनच आपल्याकडे पुढे विभक्त कुटंबव्यवस्था आली. वाढते शहरीकरण, नोकरीतून निर्माण झालेल्या नव्या संधी (ज्या त्याकाळच्या शेतीच्या उत्पनांपेक्षा अधिक आकर्षक होत्या.) आणि त्यामुळे एकूणच एकत्र कुटुंबव्यवस्थेबद्दल निर्माण झालेला भ्रमनिरास या गोष्टी यास कारणीभूत असाव्यात.
(यावर मिपावरच्या अधिकारी लोकांनी भाष्य केल्यास कदाचित ४०-५० वर्षापूर्वीच्या परिस्थितीचे अधिक चांगले आकलन होइल असे वाटते.)
- अभिजीत
रामदास काका,
अतिशय अप्रतिम कथा आहे.
तुमच्या प्रभावी लेखनाने वाचताना डोळ्यासमोर चित्र उभे रहाते..
अजूनही अशाच कथा येऊदेत..
शुभेच्छा!
--शाल्मली.
रामदास काका,
अतिशय अप्रतिम कथा आहे.
तुमच्या प्रभावी लेखनाने वाचताना डोळ्यासमोर चित्र उभे रहाते..
अजूनही अशाच कथा येऊदेत..
शुभेच्छा!
--शाल्मली.
भिडली म्हणून परत वाचली. माझ्या मते पोटात खड्डा पाडणारी, डोळे डबड्बवणारी कथा असुच शकत नाही. मी म्हणतो ते बरोबर आहे ना? समर्थांकडून खुलाशाची अपेक्षा.
भरल्या घरात चादारांना येणारा मुताचा वास आणि त्याची शेटाणी कडून होणारी हेटाळ्णी कधीच विसरु शकत नाही.
मुक्तसुनितशी एकदम सहमत. फक्त एवढंच म्हणीन की, आमच्या लहानपणीसुध्दा आम्ही थोड्याफार फरकाने असेच अनुभव घेतले आहेत. कदाचित त्यामुळेच कथा एकदम मनाला भिडली.
जियो. तुम्ही लिहीत रहा आम्ही वाचत रहातो.
कथा आवडली. मनाला भिडणारी .
साती
जबरदस्तच!
मुक्तसुनीत, चतुरंग आणि अभिजित यांच्या प्रतिसादाशी सहमत.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
किती छान लिहिता हो.. वाचताना कुणा फार मोठया लेखकाच लेखन वाचतेय अस वाटत होत.. वाचता वाचता कधी डोळे भरून आले कळलच नाही. असच लिहीत राहा. खूप प्रतिभा आहे तुमच्याकडे. नक्की पुस्तक लिहा..
निव्वळ अप्रतिम.
अचानकपणे वाचनात आली आणि कळे पर्यंत वाचून झाली. आजूबाजूचा विसर पडावा असं लेखन.
याला प्रतिक्रिया द्यायला सुद्धा मुक्तराव किंवा नंदन सारखी प्रतिभा हवी...
खुप लिहा तुम्ही रामदास काका...
मुक्तसंगः अनहंवादि
कथा आणि लेखन.
लिहिते रहा!
रामदासमहाशय.
अतिशय सुंदर लेखन.
मध्यमवर्गीय कुटूंबाची काय व्यथा असते ती ही कथा जाणवून देते. आताच्या नवीन पिढीला काही संदर्भ कळणार नाही.
खुपच छान कथा.
-( सणकी )पाषाणभेद
कथा लिखान फारच उच्च दर्जाचे आहे
प्रतिभावान लेखणीतून उतरावी अशी कथा.
पू.ले.शु
अतिशय भावपुर्ण आणी सुंदर लेखन. मनापसुन आवडलेल्या काहि लिखाणांपैकी एक :)
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य
खूप छान...केवळ अप्रतिम!!
काय वर्णन आहे! लहानपणापासून उराशी बाळगलेलं एखादं रहस्य उकलत जावं जणू; हा लेख म्हणजे एका कालखंडाची प्रतिमा उभी करणारं अतिशय प्रभावी सत्यकथन आहे. कितीतरी जणाना पुनःप्रत्ययाचा आनंद - खरेतर दु:ख - झाले असेल. लेखाचा शेवट 'केवड्याला काटे झटकायला काय हरकत आहे?' या वाक्यातून हेही दाखवतो, की आपण जे सोसले, भोगले, अनुभवले, ते आपल्या पुढच्या पिढीला दिसूही नये! निव्वळ भावपूर्ण!
फारच मस्त, जिवन्त चित्रन उभे राह्ते समोर,!!
आपल्या पुर्वजांनी म्हणजे(आई,आजी,पणजी,काकी,मामी,आत्या ई. नी) कसे दिवस काढले असतील त्याची जाणीव झाली
धन्यवाद.सुरेख लेख.
रामदास.... आत्ता थोड्या वेळापूर्वीच तुम्हाला व्यनि पाठवल्याप्रमाणे तुमचं लेखन वाचणं म्हणजे आनंद + ज्ञानार्जन असतं !
>> हळवं व्हायला वय व्हायला पाहीजे असंच काही नाही.
काय मनातलं बोललात !!
कित्येक वर्षांत इतकी सुंदर कथा वाचली नव्हती.
धन्यवाद.
रामदासजी,अप्रतिम लेखन !कित्येक वाक्ये त्या काळात घेऊन गेली.कांही वाक्यांनी अंतर्मुख व्हायला भाग पाडले.
वाह्...वाह.... वाह........
मी जितका काळ मिपावर वावरतेय....८-१० महिने.... रामदास यांचे लेख क्वचितच पाहिले.... बहुतेक सगळ्या प्रतिक्रियाच!!!
हा लेख..... चतुरंग यांनी दुवा दिल्याने वाचला..... आता वेळ काढून.. रामदास यांचे सगळे लेखन वाचलेच पाहिजे!!!!
नेहमीप्रमाणे अप्रतिम..
कथा प्रचंड आवडली...खूपच छान लिहिलंय...डोळ्यासमोर चित्र उभं राहिलं.
अप्रतिम लेखन.
लिहीलाय काका. अशी परिस्थिती जवळुन पाहिलेली आहे.
त्यामूळे अंतर्मुख होउन वाचला.
खुप खुप खुप खुप खुप आवडला आपला लेख.
सही !!
:(
अप्रतिम लेखन.
खुप आवडले...... हे वाचायचे कसे राहुन गेले तेच कळत नाही.
हृदयस्पर्शी!
पुन्हा वाचली. पुनःप्रत्ययाचा आनंद मिळाला!
हृदयस्पर्शी!डोळ्यासमोर चित्र उभं राहिलं.
रडवलं तुम्ही... नातेवाईक हा प्रकार किती तापदायक असतो, ह्याचा चांगलाच अनुभव आहे. तुमच्या प्रत्येक ओळीतून मी माझ्या बालपणातून फिरुन आलो... फक्त पैसा आहे म्हणून माज करणारा काका, मोठेपणा दाखवणारी आत्या वगैरे अनुभव भरपुर आहेत, आणि ह्यांच्याकडे साला वारा पाहुन तोंड फिरवण्याची, कामापुरता मामा करण्याची तसेच खाल्ल्या ताटात थुंकण्याची कॅपॅसिटीही जबरदस्त असते...
अतिशय ताकदवान कथा.. मनःपुर्वक धन्यवाद... आणि खरंच, काटे झाडायला हरकत नाही, कारण ते आपल्यालाच टोचतात नाहीतर..
मध्यमवर्गीय कुटूंबाची काय व्यथा असते ती ही कथा जाणवून देते. आताच्या नवीन पिढीला काही संदर्भ कळणार नाही.
पाभेकाका, पहील्या वाक्याशी शतशः सहमत. दुसर्याशी मात्र नाही.. ही गोष्ट सापेक्ष आहे. प्रत्येक पिढीत, प्रत्येक स्तरावर असले अनुभव येत असतात. टोचणी आणि परीणाम वेगळे असतील फार तर..
वरील सर्व प्रतिसाद +१
शिंपिणीचे घरटे व काटेकोरांटीची फुलं हे मिपावरील मास्टरपीस लेखांपैकी आहेत
माझ्या मते शिंपिणीचे घरटे ही मिपावरील आजपर्यंतची सर्वोत्तम कथा