जनातलं, मनातलं

गदर संस्थापकाची १२४ वी जयंती

Primary tabs

आज गदर संघटनेचे संस्थापक डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे याम्ची १२४ वी जयंती - हे वर्ष या महान देशभक्ताचे शतकोत्तर जयंतीवर्ष!

डॉ. खानखोजे यांचा जन्म वर्धा येथे ७ नोव्हेंबर १८८४ रोजी झाला. बालपण व शालेय शिक्षण वर्ध्यात पूर्ण केल्यावर महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते नागपुरात आले. विद्यर्थी दशेत त्यांच्यावर लोकमान्य टिळकांचा विलक्षण प्रभाव पडला व त्यांची देशभावना जागृत झाली. आपले शिक्षण संपवून उच्च शिक्षणासाठी डॉ. खानखोजे अमेरिकेस गेले. अमेरिकेतील ओरेगन येथील पोर्टलॅंड येथे दाखल होणाऱ्या पहिल्या तीन भारतियांपैकी ते एक, व प्रथम मराठी.

परदेशात राहुनही देशाला स्वातंत्र्य कसे मिळविता येइल असा ध्यास घेतलेल्या डॉ. खानखोजे यांनी युरोपातही भ्रमण केले व अनेक क्रांतिकारी विचाराच्या भारतियांशी संधान बांधले. १९०८ मध्ये डॉ. खानखोजे यांनी अमेरिकेत असताना विद्यार्थी दशेत स्वातंत्र्य संग्रामासाठी ’भारतिय स्वातंत्र्य संघाची’ स्थापना केली. १९१३ साली डॉ. खानखोजे व लाला हरदयाळ यांच्या पुढाकाराने ’सशस्त्र लढ्यासाठी’गदर’ संघटना स्थापन केली. गदरचे पहिले अध्यक्ष होते सरदार सोहनसिंग भकना. सॅन फ्रान्सिस्को येथुन १९१३ साली ’दी गदर’ या गदर पक्षाच्या पहिल्या मुखपत्राची सुरुवात झाली. पुढे ’गदर’मोठे व्यापक स्वरुप धारण केले. गदर उत्थान हे १८५७ नंतरचे सर्वात पहिले मोठे समर म्हटले तर वावगे ठरु नये.

पहिल्या महायुद्धाच्या धामधुमीचा फायदा पुरेपुर उठवत गदर कार्यकर्त्यांनी स्वातंत्र्यसंग्रामाची योजना आखली. या काळात अनेकदा नाव व वेष बदलुन डॉ. खानखोजे युरोप मधिल अनेक देशात प्रवास केला. याच काळात अनेक तरुण विद्यार्थी-क्रांतिकारक जर्मनीत दाखल झाले. जर्मन परराष्ट्र खाते या चळवळ्या लोकांना अनुकुल होते. डॉ. खानखोजे हेसुद्धा जर्मनीत दाखल झाले. जर्मनीतील भारतिय विद्यार्थ्यांनी बर्लिन समिती स्थापन केली. यांत विरेंद्रनाथ चट्टोपाध्याय, चंपकरमण पिल्ले व अबिनाश भट्टाचार्य याचा समावेश होता. पुढे तिचे रुपांतर ’भारतिय स्वातंत्र्य समितीत’ झाले. जर्मनांच्या सहाय्याने थेट हिंदुस्थानची सीमा गाठयची व एका रेषेत पूर्वेला सिंगापूर पर्यंत इंग्रजांविरुद्ध लढा उभारायचा व यात जर्मन सरकारने आर्थिक तसेच लष्करी सहाय्या करायचे अशी योजना घाटत होती. या सर्व योजनेला ’हिंदु-जर्मन कट’ या नावाने ओळखले जाते. या गदरचा उल्लेख इंग्रजांनी जरी ’राजकिय दहशतवादी’ असा केल तरी हिंदुस्थानी नागरिकांसाठी ते क्रांतिकारकच होते.

गदर संघटनेला हिंदुस्थानातु पंजाबातुन अनेक सदस्य लाभले. युद्ध संपले व राजकिय समीकरणे बदलली तेव्हा अनेक गदर कार्यकर्त्यांना अमेरिकेत निघुन जावे लागले. डॉ. खानखोजे यांच्यावर ईंग्रजांचे बारीक लक्ष होते. त्यांच्यावर हिंदुस्थानात येण्याविरुद्ध मनाई हुकुम बजावला गेला. मात्र युद्धकाळात गदर उत्थान हे अत्यंत मह्त्वाचे पर्व मानावे लागेल. या संघटनेचे क्रांतिरत्न हुतामा विष्णु गणेश पिंगळे, हुतामा कर्तारसिंग सराबा, सोहनसिंग भकना, सरदार पृथ्विसिंग असे अनेक धाडसी कार्यकर्ते युद्धकाळात हिंदुस्थानात कार्यरत होते जे पुढे पकडले गेले व हुतात्मा झाले.

पुढील काळात डॉ. खानखोजे परत अमेरिकेस निघुन गेले. तिथे त्यांचे प्रयत्न चालुच होते. पुढे डॉ. खानखोजे यांनी जीन अलेक्ज़ांड्रियन सिंडिक या बेल्जियन महिलेशी १९३६ साली विवाह केला. बदलत्या राजकिय परिस्थितीनुसार ते मेक्सिकोमध्ये स्थलांतरीत झाले. तेथे शेतकी शिक्षण घेतलेल्या डॉ. खानखोजे यांनीए मेक्सिको येथे संकरीत मक्यावर शेतकी प्रयोग केले. ते मेक्सिकोच्या शेतकी विभागाचे संचालक होते. १९४७ साली भारत स्वतंत्र झाल्यावर त्यांना आपल्या मातृभूमिची ओढ लागली. मात्र सरकारने त्यांना प्रवेशबंदी असल्यमुळे विसा नाकरला! पुढे आपला मूर्खपणा लक्षात येताच त्यांना देशात प्रवेश देण्यात आला तेव्हा १९५६ साल उजाडले.

मात्र इथे अल्यावर त्यांना जी उपेक्षा सहन करावी लागली त्यामुळे त्यांनी उद्विग्न होऊन ’गोरे गेले काळे आले’ असे उदगार काढले. हा महान देशभक्त २८ जानेवारी १९६७ रोजी निवर्तला. आज त्यांच्या १२४ व्या जयंतीदिनी त्यांना विनम्र अभिवादन.

प्राजु

हा इतिहास खरंच माहिती नव्हता मला. छान माहिती मिळाली.
या महात्म्याला आदरांजली.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

वाटाड्या...

माझीही..

अश्याच क्रांतीकारकांची माहीती अजुन येउ देत. मी ही काही काळ ऑरेगॉन मधे होतो तेन्व्हाच मला हे कळलेले. हे पान पहा....

धन्यवाद

आपला..

मुकुल..

विसोबा खेचर

हा महान देशभक्त २८ जानेवारी १९६७ रोजी निवर्तला. आज त्यांच्या १२४ व्या जयंतीदिनी त्यांना विनम्र अभिवादन.

माझेही अभिवादन..

साक्षीदेवा, येऊ देत असेच अनवट/अपरिचित परंतु अत्यंत माहितीपूर्ण लेख...

तात्या.

झकासराव

माझेहि अभिवादन ह्या महान देशभक्तास.
साक्षीजी हा इतिहास खरच माहित नव्हता.
................
"बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय."
ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :)
http://picasaweb.google.co.in/zakasrao

वेताळ

कारण ह्याना भारतात सता हवी होती व त्यात अडसर येणारया सर्वाना त्यानी आपल्या मार्गातुन व्यवस्थित बाजुला केले.आज ह्या लेखाव्दारे एक नव्या देशभक्ताची ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद.
वेताळ

यशोधरा

हा इतिहास ठाऊक नव्हता :( साक्षीजी, खूप धन्यवाद.

सुनील

नवी माहिती मिळाली. धन्यवाद.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

अनामिका

भारताला स्वातंत्र्य फक्त नेहरु गांधी या द्वयी मुळे मिळाल्याचा गोबेल्स प्रचार गेली ६० वर्षॅ होतो आहे.
डॉ. खानखोजे व त्यांच्या सारख्या कित्येक क्रांतीकारकांनी या देशाला पारतंत्र्याच्या जोखडातुन मुक्त करण्यासाठी परिश्रम घेतलेत यांची साधी दखल देखिल शासन घेत नाही.
या सगळ्या विभुतींचे विस्मरण करुन आपणच कपाळकरंटे ठरत आहोत
सर्वसाक्षी तुम्ही हा लेख मटा आणि तत्सम सगळ्या वृत्तपत्रांना पाठवा.जेणे करुन खरा इतिहास लोकांच्या समोर येईल.
डॉ खानखोजे आणि त्यांच्यासारख्या सर्व महान विभुतींना मनापासुन दंडवत.
अनाम वीरा, जिथे जाहला तुझा जीवनान्त
स्तंभ तिथे ना कुणी बांधला, पेटली ना वात !

धगधगत्या समराच्या ज्वाला या देशाकाशी
जळावयास्तव संसारातुन उठोनिया जाशी !

मूकपणाने तमी लोपती संध्येच्या रेषा
मरणामध्ये विलीन होसी, ना भय ना आशा !

जनभक्तीचे तुझ्यावरी नच उधाणले भाव
रियासतीवर नसे नोंदले कुणी तुझे नाव !

जरी न गातिल भाट डफावर तुझे यशोगान !
सफल जाहले तुझेच हे रे, तुझे बलिदान !

काळोखातुनि विजयाचा ये पहाटचा तारा
प्रणाम माझा पहिला तुजला मृत्युंजय वीरा !

गीत- कुसुमाग्रज
कुसुमाग्रजांचे हे गीत किती चपखल आहे याची प्रचिती या लेखाच्या निमित्ताने आली.
या अनामवीरांची माहिती उबलब्ध करुन दिल्याबद्दल सर्वसाक्षी तुमची व मिसळपावची मी शतशः ऋणी आहे .............................

"अनामिका"
अनुदिनी-
http://maharashtradharma.mywebdunia.com/
http://manalig.blogspot.com/

डॉ. खानखोजे.

डॉ. खानखोज्यांचं नाव काही वेळा ऐकलं होतं. नक्की संदर्भ आठवत नाहीत. पण त्यांची सविस्तर माहिती आजच कळली. स्वातंत्र्यानंतर पण त्यांना भारतात यायला मिळालं नाही हा तर खरंच कहर आहे.

एका कर्तृत्ववान देशभक्ताला माझा सलाम.

अवांतरः डॉ. खानखोजे हे नाव, रा. स्व. संघाच्या स्थापनेच्या संदर्भात ऐकले आहे असे वाटते. नक्की आठवत नाही.

बिपिन कार्यकर्ते

गणा मास्तर

'नाही चिरा नाही पणती' नावाचे खानखोजेंचे चरित्र वाचलेले आठवते. मात्र लेखिकेचे नाव आठवत नाही.
या पुस्तकात त्यांच्या क्रांतीकार्याबरोबरच शेतीक्षेत्रातल्या कामाचीही माहिती आहे.
- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)

ऋषिकेश

वा! सुंदर शैलीत मांडलेली नवीन माहिती...
डॉ. खानखोजे यांना माझेही प्रणाम आणि आदरांजली

-('मिसळ'लेला) ऋषिकेश