राजकारण

महाराष्ट्र विधानसभा निवडणुका - २०१९

Primary tabs

नमस्कार मंडळी,

खर तर आपले क्लिंटन भाऊ राजकीय धाग्याचे काम नेहमी करायचे पण हल्ली ते अज्ञातवासात गेल्यामुळे म्हंटल आपण बघावा काढून असा एखादा धागा.

तर परवा निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांची तारीख जाहीर केली, त्याप्रमाणे दिनांक २१ ऑक्टोबर रोजी निवडणुका आणि दिनांक २४ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होतील.

सध्या भाजपची सगळीकडे घौडदौड चालू आहे त्यामुळे भाजपच्या विजयाच्या अपेक्षेपेक्षा तो किती मोठ्ठा विजय मिळवतो हे पाहणे रंजक ठरेल.

अगदी कालपर्यंत राज्यात भाजप-शिवसेना युती होणार का ? हे विचारले जात होते. स्वतः अमित शहा आणि पप्र. मोदी यांना युती खरतर नकोच होती पण काल बातमी येऊन धडकली कि अखेर युतीचे घोडे गंगेत न्हाले एकदाचे. 

या सगळ्यात सुमडीत राहून उद्धवरावांनी युती तर राखलीच शिवाय १२४ च्या आसपास जागा राखून भाजपची एकहाती सत्ता येणार नाही याची खबरदारी घेतलीये.

आता चमत्कार झाला तरच भाजप ९०% /१००% स्ट्राईक राखून जिंकेल जे अशक्य वाटत आहे. १६४-(वजा)२० मित्रपक्ष = १४४ जागा भाजप बहुदा लढवेल. त्यामुळे सत्तास्थापनेसाठी शिवसेनेची मदत लागणार हे नक्की.

माझा असा अंदाज आहे कि फडणवीसांची युतीची हि खेळी त्यांचे स्थान भक्कम करण्यासोबतच पक्षांतर्गत विरोधकांवर सुद्धा अंकुश ठेवणारी वाटत आहे, कारण भाजपची एकहाती सत्ता येऊ शकते हे माहित असूनही फडणवीस साहेब युतीसाठी इतका का आटापिटा करत होते ? कारण एकहाती सत्ता आली तर मुख्यमंत्री पदासाठी बरेच दावेदार उभे राहतील आणि मग कदाचित आपल्या हातून हे पद निसटू शकते अशी भीती फडणवीस साहेबांना वाटली असावी.

पण आता युती झाल्यावर सत्ता आली आणि शिवसेनेवर अंकुश ठेवायचा झाला तर फ़क़्त फडणवीसच सध्यातरी ठेऊ शकतात त्यामुळे हा युतीचा हुकुमी डाव फडणवीस खेळले असावे.

दुसरी गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांच्यातील मैत्री, विश्वास ज्यामुळे दोघे एकमेकांना गेली ५ वर्ष सांभाळून घेत आहे.त्यामुळे या सर्व गोष्टी विचारात घेऊन फडणविसांनी सध्यातरी युतीला प्राधान्य दिलेले वाटत आहे.

कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी बद्दल नंतर प्रतिसादात लिहील कारण त्यांचे सगळे लांबून तरी विस्कळीत दिसत आहे.

असो हे सगळे अंदाज प्रार्थमिक स्वरूपातील आहे दिवस जातील त्याप्रमाणे यात कदाचित आदल होतील, बाकी तुमची मते सुद्धा जाणून घ्यायला नक्कीच आवडतील मंडळी.
----------------------------------------

आकडेवारीचा प्रचंड कंटाळा आहे त्यामुळे कोणी आकडेवारी टाकली तर लयी बर होईल.

ढब्ब्या

कारण भाजपची एकहाती सत्ता येऊ शकते हे माहित असूनही फडणवीस साहेब युतीसाठी इतका का आटापिटा करत होते ? =>
भाजपा मधे झालेले मोठे ईनकमिंग आणी मराठा आरक्शण ह्यामुळे बराच मोठा ब्राम्हण वर्ग नाराज आहे, जरी हा वर्ग भाजपा सोडून ईतर कोणाला मतदान करणे अवघड आसले तरी रिस्क मिटिगेशन साठी युती केली असावी असा अंदाज आहे.

बाकी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी बद्दल न लिहीलेलेच बरे :) कॄष्ण्कुंज वरचे काका आणी कॉंग्रेस, राष्ट्रवादी हे लुटूपुटीची लढाई खेळतील. वंचित कदचीत विरोधी पक्शनेता बनवेल.

खर तर आपले क्लिंटन भाऊ राजकीय धाग्याचे काम नेहमी करायचे पण हल्ली ते अज्ञातवासात गेल्यामुळे म्हंटल आपण बघावा काढून असा एखादा धागा.

खरं तर मी अनेकदा त्यांना म्हटलं या मिपावर लिहिते राहा. पण ऑफिसकामामुळे सध्या ते व्यस्त आहेत असं कळतं. लवकरच येतील अशी अपेक्षा करतो.

-दिलीप बिरुटे

जॉनविक्क

आणी त्याचे शब्दांकन तुम्ही करा, हाय काय आन नाय काय.

कंजूस

१) राजकीय विश्लेषण करणारे,समजणारे खूप आहेत. पण थोडेच लिहितात, त्यातूनही थोडे मिपावर.
२)मतदार उमेदवाराच्या कामावर मतं देतात ते नगरपालिका निवडणुकीत. इतर मोठ्या विधान/लोकसभेसाठी पक्षाला.
३) क्र दोन लक्षात ठेवून गेल्या महिन्यात पक्षांतर झाले. बारा जणांस तिकीटही मिळाले पहिल्या यादीत.
४)मुंबई महापालिका ताब्यात ठेवण्यासाठी युती आहे. ती दोघांनी समजूनच केली आहे.
५) कान्ग्रेसला कटवणे हा राष्ट्रवादीचा, भाजपाला उडवणे हा सेनेचा अंत:स्थ हेतू आहे.
६) राष्ट्रवादीला कसंही सत्तेत यायचं आहे आणि सेनेला मुख्यमंत्री हवाय. हे दोन्ही करण्यासाठी आणि क्र पाच साध्य करण्यासाठी हे दोन पक्ष निकालानंतर बैठका घेऊन सत्ता घेण्याची संधी सोडणार नाहीत. यासाठी नीतीमुल्ये किंवा आपण काय बोललो या अगोदर हे विसरून जातील.
६)खुर्चीसाठी काय वाट्टेल ते हेच या निवडणुकीचं तत्व राहील.

गणेशा

सविस्तर लिहिण्याचा वेळ मिळाल्यावर प्रयत्न करतो.
फक्त आता येव्हडेच सांगतो
५. कान्ग्रेसला कटवणे हा राष्ट्रवादीचा, भाजपाला उडवणे हा सेनेचा अंत:स्थ हेतू आहे.
यातील भाजपाला उडवणे ही सेनेचा हेतु नसुन, सेने ला अवास्तव महत्व न देता, त्यांचे अस्तित्व संपवण्याचा भाजपाचा हेतु आहे असे मला नेहमी वाटते.

त्यात सत्ता आल्यावर पहिले आणि शेवटचे ६ महिने सोडल्यास सेना ही विरोधी पक्षा सारखेच भासवते त्यामुळे या खेळीने कॉन्ग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या पेक्षा सत्ताधारी भाजप आणि खिशात राजेनामे ठेवणारी शिवसेना यांच्या भोवती राजकारण फिरत राहते .

६. राष्ट्रवादीला कसे ही करुन सत्तेत यायचे आहे, हे मला तरी आता खरे वाटत नाही. या ऐवजी आपण असे म्हणु शकतो, राष्ट्रवादीला कसे ही करुन आपले अस्तित्व टिकवायचे आहे, जेने करुन सत्ता नाही मिळाअली तरी, पंचायत समिती, ग्रामपंचायत, कारखाने, महानगरपालिका यामध्ये त्यांना स्थान मिळु शकेल.
सत्तेत यायची चिन्ह असते तर येव्हडी पक्षांतरे झाली नसती.

असो वेगळॅ बोलेनच

कंजूस

मागच्या निकालातील जागांमुळे लोकसभा नाही पण वाधानसभेला जागा मिळतील हा राष्ट्रवादीला विश्वास वाटणे गैर नाही. लोकसभेला पाच म्हणजे आता पाचपट पंचवीस जागा निश्चित आहेत. या वाढून चाळीस झाल्यास त्यांचा सत्तेत सहभाग शक्य आहे. शिवाय राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता कायम ठेवता आली आहे.

माहितगार

गेल्या पाच वर्षात ज्यांच्या गूगलशोध कारकीर्दीची चढती कमान महाराष्ट्रीय गूगलांनी प्रथमच स्विकारली त्यात चढत्या क्रमाने ओवैसी, प्रकाश आंबेडकर आणि देवेंद्र फडणविसांचा महत्वाचा क्रमांक लागतो अर्थात देवेंद्र फदणवीस (मोदी वगळता) मोठ्या मार्जीनने इतर सर्वांच्या गेल्या महिन्याभरात बरेच पुढे गेले आहेत ( राष्ट्रीय बातम्या एवढे माझे लक्ष महाराष्ट्रीय बातम्यांवर नसते पण त्यांच्या जनादेश यात्रेचा परिणाम असण्याची शक्यता असू शकेल का असे वाटले) तसे पहाता मोदींनंतर केवळ महाराष्ट्रातच नव्हे भारत आणि विदेशातील तौलनीक शोधात महाराष्ट्रीय नेत्यात राज ठाकरे गेली दहा एक वर्षे बढत ठेऊन आहेत. राज ठाकरेंना काय किंवा इतर कुणाला काय त्यांच्या महाराष्ट्रीयातील लोकप्रीयतेचा फायदा उचलणे शक्य होत नाही कारण मोदींची सर्वव्यापी गूगलशोधप्रीयता इतरांच्या कैकपटीने पुढे आहे. (गूगल ट्रेंडानुसारच सांगतोय व्यक्तिगत मत नव्हे)

राज ठाकरेची गूगल प्रीयता जुन्या नेत्यात शरद पवारांच्या ही पुढे होती पण गेल्या महिन्याभरात शरद पवार पुन्हा एकदा राज ठाकरेंना जराशा मार्जीनने मागे टाकत आहेत या परत येऊ पहाणार्‍या पवारांबद्दल जराशा गूगलशोध वाढण्याचे कारण त्यांच्या मागे असलेल्या इडी पेक्षा लांगूल चालना असण्याची शक्यता वाटते आहे कारण शोध त्यांच्या भाषणाबद्दल येत आहेत. (अर्थात पवारांना डोळे झाकुन भाजपा विरोधकांनी पाठींबा दिला तर गोष्ट वेगळी - तसे होण्याची संधी कमी- एरवी गूगल शोधातील फडणविसांना बरीच आघाडी आहेच आणि मोदींच्या टॉपच्या आघाडीचा आशिर्वाद त्यांच्या पाठीशी आहे.

वंचित नेतृत्वात त्यांच्यातल्या त्यांच्यात ओवैसी आठवले मायावती यांना गूगल शोधात मोठी मात देत प्रकाश आंबेडकर बरेच पुढे आहेत बेसिकली ओवैसींवर अवलंबित्वाची आता गरज कमी होत असण्याचा त्यांचा आडाखा विधान सभा नव्हे पण स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकात त्यांना लाभान्वित होउ शकेल का हे येणारा काळ सांगेल अर्थात मी वर लिहिल्या प्रमाणे तौलनीक गूगलीय शोध प्रीयतेत इतर अनेक नेत्यांप्रमाणे प्रकाश आंबेडकरही राज ठाकरेंच्या अनेकपटींनी मागे आहेत.

मी राहुल गांधी वगळता इतर महाराष्ट्रीय्य कोंग्रेसींची नावे शोधली नाही कारण मला फार थोडी माहिती आहेत आणि मागच्या वेळी शोधली तर इनको गूगलपे कॉई पुछता नही अशी स्थिती होती. कुणाला एखाद्या महाराष्ट्रीय काँग्रेसचे गूगल ट्रेंड तुलनेसाठी नाव सुचवायचे असल्यास उपप्रतिसादातून कळवा मी तुलना करून माहिती देईन. राहुल गांधीच्या नावाचा शोध शरद पवारांच्या मागच्या क्रमांकावर कुठेतरी असतो.

गूगलीय शोधात उद्धव ठाकरे तसे अत्यंत मागे असतात पण शिवसेनेचे ब्रँड नेम त्यांच्या मदतीला बरेच धावून जाते. अर्थात मोदींच्या गूगलीय शोधाचा आलेख पहाता शिवसेनेसोबत युतीची टेक्निकली गरज न पडता भाजपास बहुमत मिळावयास हवे पण तसे न होता युती करावी लागतीए याचे एक कारण मतांचे विभाजन टाळणे आहेच पण मागच्या पाच वर्षात मोदी राष्ट्रीय राजकारणात येऊन भाजपाला अचानक फायदा झाला. भाजपाकडेही स्थानिक नेतृत्व उपलब्ध असले तरी शिवसेनेकडे तरुणांना भावणारे स्थानिक नेते (जरासे जहाल भाषिक) ज्या प्रमाणात उपलब्ध आहेत तेवढे भाजपाकडे अख्या महाराष्ट्रासाठी उपलब्ध करणे शक्य नसावे. त्यामुळे राजकीय माणूसबळाच्या गरजेसाठी भाजपा शिवसेनेवर जराशी अवलंबून आहे का? - तसे काँग्रेस आणि राष्त्रवादीचीही अडचण तरुण पिढीतील पुरेशा नॉनपेड-खर्‍या स्वयंसेवी कार्यकर्त्यांची कमतरता असावी. राज ठाकरे लोकप्रीय आहेत पण दुसर्‍या फळीसाठी जनतेस स्विकार्य नेतृत्व उपलब्ध करण्यात राज ठाकरेंना यश येत नसावे असे काही होत असेल का ?

गूगल ट्रेंडची माहिती सोडून माझ्या व्यक्तीगत मतातील माझे तर्क पुर्ण चुकिचे असू शकतात कारण राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय वृत्तांच्या मानाने महाराष्ट्रीय वृत्तांवर माझे सहसा लक्ष कमी असते.

आंबट चिंच

यांचं काहीतरी वेगळंच असतं नेहमी.
अरे धागा काय आणि मी कुठे काय शोधलं याचा काहीतरी संबंध आहे काय?

हस्तर

हिहिहिह्
अहो माहितगार आणि त्यान्चे सर्व धागे आन्तर जाला वरच असतात , बाहेरच्य जगाशी संबन्ध कमी

कंजूस

तर्क चुकीचे नसतात, ते एक मत असतं. दुसरं म्हणजे गुगलशोध वाढला म्हणजे लोकप्रियता वाढली हे कसं मानायचं? महाराष्ट्रातले लोक 'मायावती', नितीश असा शोध करतील आणि आकडा फुगेल. पण मतदार नाहीत. तसंच इकडच्या नेत्यांचे रहस्य कोणी शोधत असतील.

उपेक्षित

कंजूस काकांशी सहमत कारण गूगलशोध ग्राह्य धरला तर मग राज ठाकरे कमीत कमी २ वेळा मुख्यमंत्री झाले असते.

खरतर या माणसाने (राज ठाकरे) स्वतः ला अक्षरशः वाया घालवले आहे, किती पोटेन्शियल होत याच्यात पण केवळ बोलघेवडे पणा मुळे सगळ वाया गेल. तिकडे आंध्रात जगनमोहन ने दुसर्या प्रयत्नात सत्ता सुद्धा मिळवली एकहाती आणि हे इकडे नुसतेच वाचाळपणा करत प्रत्येक निवडणुकीत भूमिका बदलत बसले आहे.

साला याच्यापेक्षा उद्धव ठाकरे बरे निदान स्वतः ची कुवत ओळखून शिवसेना टिकवली आणि पडती बाजू घेऊन ४ पावले मागे येऊन युती पदरात पडून घेतली.

माहितगार

भारतीय निवडणूकांच्या दृष्टीने युत्यांची गणिते आणि स्थानिक नेत्याबद्दलचा कल गूगल ट्रेंडच्या कक्षेत मोजणे कठीण जाईल हे खरे आहे. लोक एखादी गोष्ट नकारात्मक बातमीमुळेही शोधू शकतात नाही असे नाही पण न आवडलेली नकारात्मक गोष्ट शोधण्यावर भर पक्षी वेळ देण्याकडे लोकांचा कल कमी असतो. आवडलेली गोष्ट लोक सहसा अधिक शोधतात. त्यामुळे अधिक आवडलेली व्यक्ती कोण आहे हे लक्षात येण्यास बरीच मदत होते -

एकुण आंतरजालिय चर्चेत आवडलेल्या व्यक्तीची बाजू घेणार्‍यांचे अधिक्य होते. आवडलेली व्यक्ती शोध प्रमाणात इतरांपेक्षा बरीच पुढे असेल तर निकाल तिकडे वळण्याची शक्यता वाढते. प्रसार माध्यमेही समाज माध्यमाच्या ट्रेंड चा उपयोग टि आर पी मिळवण्यासाठी करू लागली आहेत म्हणजे ज्याचा ट्रेंड वाढतो त्याची बातमी देण्याचे प्रमाण असे चक्र . पक्षांचे सोशल मिडिया सेलही गूगल ट्रेंड मध्ये लोक काय शोधताहेत हे लक्षात घेऊन प्रचार अ‍ॅडजस्ट करतात एकत्रित परिणाम पहाण्यास मिळू शकतो.

सोशल मिडियात रशियन गुप्तचर संस्थांनी आमेरीकेतील निकालावर प्रभाव पडेल असे वातावरण निर्मिती केली अशा प्रकारचे मुद्देही लक्षात घ्यावे लागू शकतात.

खास करून परस्पर विरोधी ओपीनियन पोल आल्यास कोणत्या ओपीनियन पोलला अधिक ग्राह्य धरता येईल याचा बराच अंदाज गूगल ट्रेंड मुळे येतो असा माझा व्यक्तिगत विश्वास होऊ लागला आहे.

केवळ माझेच विचार देणे प्रशस्त होणार नाही इथे दोन लेख दुवे

https://www.thequint.com/state-elections-2017/google-trends-data-may-be…

https://www.news18.com/news/opinion/opinion-why-netas-should-use-data-a…

कंजूस

गुगल शोध म्हणजे एखादे नाव अचानक चर्चेत आले की त्याविषयी माहिती नसणारे शोध घेतात. हा कोण आणि आता काय?

सोशल मिडियावर व्यक्त केलेल्या मतांवरून लेखकाचा कल कोणत्या गोष्टीकडे आहे, त्याला कशाची भीती वाटते, काय मिळाल्यास आनंद होईल वगैरे जाणण्याचा पर्यत्न करणे वेगळे. काही सूचक प्रश्न विचारून,अप्रत्यक्ष कल जाणून घेणे याचं उदाहरण वेगळे.

माझी भाकरी मलाच कमवायला लागणार. ...

पण मतदान नक्कीच करणार. ...पाच वर्षांतून एकदा मिळणारा चान्स कशाला सोडायचा. ....

उपेक्षित

(कोथरूड मधील स्थिती बर्यापैकी माहित असल्यामुळे) हे नेते ९९% बापट असतील १% राजकारणातील अनिश्चिततेसाठी :)
जितकी माहिती कळली त्यानुसार शिवसेनेच्या मोकाटे यांनी फुल प्रुफ प्लानिंग केले होते आणि त्यांना पक्ष्श्रेष्टींची सुद्धा फूस होती पण पाटलांनी खेळी अशी काही उलटवली कि माघार घ्यावी लागली.

तसेच चर्चा अशीसुद्धा आहे कि फडणविसांनी पाटलांचा गेम करण्यासाठी कोथरूड मधून त्यांना उमेदवारी घ्यायला भाग पाडले. (खात्रीलायक बातमी नाहीये )

ढब्ब्या

खडसे, तावडे आणी आता पाटील गेले की खुर्ची अजुनच घट्ट :)
अर्थात पाटील जिंकतील आरामात असं वाटतय. फार तर फार नोटा ची मते थोडी वाढ्तील.

कंजूस

पक्षात असते तरी फार तर मंत्रीच राहिले असते.

शाम भागवत

पाटलांबाबत फडणविसांचे मत खूप चांगले आहे असे ऐकून आहे. त्यांना बाजूला ठेऊन फारसे निर्णय घेतले जात नसावेत असे वाटते.

खडसे हे स्वच्छ चारित्र्याचे कधीच समजले जात नव्हते. तर तावडे यांची कुवत पाटलांएवढी आहे असे वाटत नाही. त्यामुळे खडसे तावडे व पाटील यांना एकाच मापाने मोजता येईल असे वाटत नाही.

यापुढे पुण्यातील कामकाजावर पाटलांचा वरचष्मा असेल. फडणविसांना पुण्यातून कोणीतरी भरंवशाचा माणूस पाहिजे होता. बापटांनी ती संधी घालवलीय. पुण्याच्या बाबतीत पाटील व फडणवीस दोघेही जोडीने निर्णय घेतील. अजून एक दोन वर्षांनी खरे काय ते समजेल.

एक मात्र नक्की. फडणवीस खूपच ताकदवान झाले आहेत. तरीही पाय जमिनीवर आहेत व जिभेवर ताबा राखून आहेत. मुख्य म्हणजे विरोधकांचे डावपेच ओळखणे व प्रतिडाव टाकणे यात माहीर झाले आहेत. या पाच वर्षात ते नक्कीच महाराष्ट्राचे पर्रिकर म्हणून ओळखले जातील असे वाटते.

शाम भागवत

मागच्या वेळेस भाजपला लढायला २८८ जागा होत्या. त्या आता निम्यावर आल्याने बऱ्याच इच्छूकांना तिकीटे मिळणार नव्हतीच. त्यामुळे कोणाची तरी तिकीटे कापायलाच लागणार होती.

माझ्या मते बापटांचे मंत्रीपद कापायचे होते म्हणून त्यांना बढती दिल्यासारखे दाखवून खासदारकी दिली. पण त्यांची काम करण्याची पध्दत पहाता, मोदी त्यांना मंत्रीपद देतील अशी शक्यता कमी वाटते.

त्यानंतर मेधाताईंबद्दल मत फारसे चांगले नव्हते. म्हणजे सुरवातीला त्यांच्याबद्दल मत चांगले होते. पण नंतर मात्र त्यांनी त्यांच्या कामाची पध्दत बापटांकडून उचलल्यासारखी वाटली. त्यांचाही पत्ता कापायचा होता. तसेच चंद्रकांत पाटलांनाही सुरक्षीत मतदारसंघ द्यायचा होता.

तसेच मेधाताईंना अजिबात विरोध करता येणार नाही. बंडखोरी राहूद्या, मुकाट्याने पक्षाचा निर्णय मान्य करायला लागेल असेच त्यातून पाहिले गेले आहे. जर दुसरा कोणी सामान्य माणूस दिला असता तर मात्र मेधाताईंची समजूत काढणे कठीण गेलं असते.

कोथरूड मतदारसंघ भाजपाला खूपच लॉयल आहे. त्यामुळे तो भाजपाला खूपच सुरक्षीत आहे. केसकरांचे इथे खूप नाव होते.खरे तर मेधाताईंच्या ऐवजी त्यांनाच आमदारकी मिळाली असती. पण एकदा बंडखोरी करायचा प्रयत्न केला नी ते कायमचेच मागे पडले. इथे बंडखोरीची मात्रा फारशी चालत नाही. पाटील साहेब आरामात निवडून येतील. मोकाटेसाहेब उभे राहोत अथवा न राहो. त्याने काही फरक पडणार नाही.

उपेक्षित

हा विचार पण पटतोय काका,
बाकी आपल्या प्रतिसादाच्या प्रतीक्षेत होतो कारण आपले मुद्दे नेहमीच निष्पक्ष आणि अभिनिवेशविरहित असतात.

अवांतर:- शाम काका तुम्ही शिक्षकी पेशात होतात का हो ? तुमची समजावून सांगायची हातोटी अगदी मस्त आहे.

शाम भागवत

नाही हो.

मी फक्त मला जे पटलंय तेवढेच मांडतो.
मी कोणाला काही पटावे म्हणून प्रयत्नच करत नाही.
ती अपेक्षाच नसल्याने अपेक्षाभंग वगैरे काही होत नाही. भाषाही कधी घसरत नाही. चिडण्याचाही प्रश्न येत नाही.
:)

मदनबाण

मतदान जसे जवळ येते तसे सर्व उमेदवारांना जनतेची कामे करण्याची, त्यांच्या समस्या नष्ट करण्याची अचानक जाणीव निर्माण होते ! अचानक नवनिर्मीती, नवनिर्माण आणि विकासाच्या उचक्या यांना लागायला लागतात !
वरील सर्व लक्षणे दाखवणारे बर्‍याचदा कोट्याधिश असतात... तरी त्यांना जनतेत जाउन काम करण्याची उर्मी निर्माण झालेली असते ! निस्वार्थ सेवा, जनकल्याण, माता भगिनी यांच्या नावाने जप माळ ओढणे सुरु होते ! हे सर्व कर्मवीर, दयेचे सागर असणारे, गरिबांचे कैवारी मतदानाच्या वेळीच कॅमेरा समोर प्रकट होउन आपल्यालाच कसे सगळ्यांचे समर्थन आहे असे सांगत फिरतात...

वरील सर्व मंडळीना माझ्या सारख्या हिंदुस्थानी महाराष्ट्रीय मराठी मतदाराकडुन कळकळीची विनंती आहे, अजुन विकास नको आम्हाला ! इतका विकास झालाय कि खड्यांच्या पलिकडचे जग असते याची जाणिवच तुम्ही आमच्यासाठी नष्ट करुन टाकलीय, अन् त्यावर तो चंद्र वरुन पाहत आमच्या लाचार जगण्यावर फिदीफिदी हसतोय !

असो... तुमचे आमचे अच्छे दिन कधी येणार ते त्या परमेश्वरास ठावूक, परंतु राज्यात वाळु माफिया, टँकर माफिया आणि रस्ते बिघडवणारे कंत्रादार यांचे मात्र अच्छे दिन सुरु आहेत हे सांगु इच्छितो !

जाता जाता :- किळस वाटायला लागली आहे निवणुकीची ! मत दिल तरी खड्ड्यात अन् नाही दिल तरी खड्ड्यातच !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- उसने बोला केम छे... :- Jis Desh Mein Ganga Rehta Hain

कंजूस

या वेळेस सोयीचं राजकारण अधिक आहे.

शाम भागवत

मोदी व फडणवीस जातीपातींच्या पलिकडे जाऊन काम करतात असं मला वाटतं.

निदान २०१४ व त्यानंतरच्या निवडणुकांचे निकाल पाहिल्यावर माझं तरी तसं मत झालंय.

विरोधक अजूनही जुन्याच चाली रचत बसले आहेत. त्यामुळे त्यांचे कष्ट खूप होताहेत पण यश मिळत नाहीये.

मी तुमच्या कोथरूडच्या मुद्यांबद्दल अगोदरच लिहिले असल्याने परत लिहित नाही.

ब्राह्मण असणं ही अभिमानाची गोष्ट होऊ शकत नाही. तर त्या परमेश्वराला आवडेल असं वागण्याची भली मोठी जबाबदारी शिरावर घेऊन जीवन व्यतीत करण्याची बाब आहे असं माझं वैयक्तिक मत आहे.
आणि
तसं जेव्हा आपण जगू लागतो तेव्हा जाती धर्माचे अडथळे गळून पडतात असा अनुभवही आहे.
:)
असो.

जेम्स वांड

प्रश्न हा असा नाहीये, तुम्ही सांगताय ती तात्विक बैठक झाली. पण राजकारण बेरजेवर चालतं. तरीही ठीकच आहे, तुम्ही म्हणताय ती तात्विक बैठक मान्य करण्यात मला काहीच त्रास नाहीये.

ढब्ब्या

ब्राह्मण असणं ही अभिमानाची गोष्ट होऊ शकत नाही. तर त्या परमेश्वराला आवडेल असं वागण्याची भली मोठी जबाबदारी शिरावर घेऊन जीवन व्यतीत करण्याची बाब आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. => प्रतीसाद ऊत्तमच आहे, आणी थेरोटीकली बरोबर पण आहे, मात्र ब्राम्हण (किंवा कोणीही अनारक्शीत व्यक्ती) जेव्हा आरक्शणामुळे मागे पडते किंवा डावलली जाते, नकळत समाजात तेढ निर्माण होत असते.

मोदी व फडणवीस जातीपातींच्या पलिकडे जाऊन काम करतात असं मला वाटतं. => असे असते तर कोर्टात टिकणारे मराठा आरक्शण अमलात आणण्या ऐवजी ईबीसी आरक्शणावर जोर दिला असता. आणी फक्त शिक्षण क्षेत्रात आरक्षण अमलात आणायचा प्रयत्न केला असता.

जेम्स वांड

मला वाटतं परमेश्वराला आवडेल असं जगत निष्ठेने कुसंगती, कुविचार, कुविद्या, कुधन इत्यादींपासून दूर राहायचा सतत प्रयत्न करणारा माणूस ब्राह्मण म्हणवायच्या लायकीचा आहेच,मग त्याचा जन्म कुठल्या का जातीत झालेला असेना, हे विशाल रूप जर हिंदुधर्म स्वीकारणार नसला तर मात्र पुढे कठीण आहे.

शाम भागवत

आपण कसं वागायचं ते ठरवणं फक्त आपल्या हातात असते. त्यानुसार फक्त आपल्याकडे लक्ष ठेवले की भगवतांचे नाम आपोआप मुखात येते.

मात्र इतरांकडे बघून, त्यांनी कसे वागायला पाहिजे ह्यातच जास्त लक्ष घातले तर तोंडात शिव्या येण्याची शक्यताच जास्त असते.
असो.
राजकारणाच्या धाग्यावर अध्यात्मिक चर्चा म्हणजे जरा जास्तच होतंय.
:)

विटेकर

तुमच्या या प्रतिसदाला उभे राहून दश सहस्त्र टाळ्या !! ब्राह्मण जातीत जन्माला आलेले कितीतरी नर राक्शस मला महिती आहेत

विटेकर

तुमच्या या प्रतिसादाला उभे राहून दशसहस्त्र टाळ्या !! ब्राह्मण जातीत जन्माला आलेले कितीतरी नरराक्षस मला महिती आहेत

Rajesh188

शिवसेना आणि bjp ची मतांची टक्केवारी ह्या वेळी घटेल .
बहुमत मिळेल पण लोकप्रिय ते मध्ये घट जाणवेल .
ह्या निवडणुकीत,धर्म,पाकिस्तान,काश्मीर कामाला येणार नाही .
आर्थिक बाबतीत झालेली पडझड त्याला जबाबदार असेल.
वंचित आघाडी बरीच यशस्वी होवू शकते.
पक्षांतर करून bjp मध्ये आलेली bjp २ युतीला नक्की संकटात टाकेल

शाम भागवत

३७० कलम हटवण्याचा फायदा भाजपाला मिळेल असे वाटते. जात, पात, भाषा व पक्ष विसरून लोकांनी आनंद व्यक्त केलाय. भारतापुढचा एक जटील प्रश्न, जो कधीच सुटू शकणार नाही असे सर्वांना वाटत होते.

अगदी भाजपाच्या लोकांनाही.
:)

हां, आता काही जणांना खुले आम आनंद व्यक्त करणे हे पोलिटिकली करेक्ट वाटले नसल्याने त्यांची पंचाईत झालेली असू शकते. पण तरीही ते देशप्रेमी असल्याची मला खात्री वाटत असल्याने, आतल्या आत त्यांना आनंद झालेला असण्याचीच शक्यता आहे.

त्यानंतरची ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे मलाही टक्केवारीचाच अंदाज घेण्यात रस आहे.

पक्षांतर करून bjp मध्ये आलेली bjp २ युतीला नक्की संकटात टाकेल>>>>>>>> हाच मुद्दा अनेकांच्या मनात घोळतो आहे

पक्षांतर करून bjp मध्ये आलेली bjp २ युतीला नक्की संकटात टाकेल

तेव्हा ते नया हैं वाह म्हणून हात वर करून मोकळे होतील

Rajesh188

शिवसेना मराठी लोकांचे हित जपण्यासाठी कुचकामी झाली आहे आणि bjp धनाढ्य लोकांपासून हिंदू चे रक्षण करण्यात nakam झाली आहे .
ह्याची जाणीव जनतेला होत आहे .
आणि हे दोन्ही पक्ष बेसावध आहेत झटका बसला की डोळे उघडतील.

सुबोध खरे

युतीला बहुमत मिळेल याचे कारण रा कॉ आणि कॉ गलितगात्र झालेले आहेत आणि निश्चलनीकरणामुळे त्यांचा खजिना रिकामा असल्यामुळे पूर्वीसारखे नोटा वाटणे झेपणारे नाही.
बाकी शिवसेना भाजपचे सरकार स्थापन झाले तरी आपसात लाथाळ्या कमी होतील अशी शक्यता कमीच आहे. त्यातून भरपूर गाढवं अगोदर होतीच आणि आता आयातही झालेली आहेत त्यामुळे "गाढवांचा गोंधळ आणि लाथांचा सुकाळ" अशी स्थिती होणार आहे.
यामुळे माझ्या सारखया अनेक लोकांना या निवडणुकीत फारसा रस राहिलेला नाही.

खरे साहेब, आपण अगदी योग्य लिहिले आहे. यावेळेस मी मतदान तर करणार पण नोटा ला मत देणार.

उपेक्षित

वयक्तिक मला भाजप ने राष्ट्रवादीतून + कोन्ग्रेस मधून उमेदवार आयात केलेले अजिबात पटले नाही (साला आमच्या मताला कोण हिंग लावून इचार्तोय ;) )
खुद्द भाजप मध्ये आणि संघात असलेले निष्ठावान असताना भाजप ला या डागाळलेल्या बाहुबलींची गरज का पडली असावी ? हे न सुटणार कोड आहे.

माझे स्पष्ट मत असे होते कि शिवसेनेसोबत (कायमची आणि सगळीकडची) युती तोडून + पक्षातल्या निष्ठावान कार्यकर्त्यांना संधी देऊन सर्व जागा भाजपने लढवल्या असत्या तर नक्कीच फरक पडला असता.

सुबोध खरे

बाडीस
पण यात निवडून येण्याची क्षमता हा पण एक निकष असतो.
शिवाय भाजपचे अनेक कार्यकर्ते आता तितका धुतल्या तांदुळासारखे राहिलेले नाहीत हि एक आतली खबर आहे त्यामुळे अशा नेत्यांना पक्षाच्या पैशावर निवडून आणायचं आणि नंतर त्यांनी घाण करायची यापेक्षा बाहेरच्या नेत्यांना तिकिटं देऊन त्यांच्या स्वतःच्या पैशावर निवडून येऊ द्या आणि त्यांनी फंद फितुरी केली तर त्यांची अंडी पिल्ली बाहेर काढायची असा (विचित्र) विचार चालू असल्याचे ऐकिवात आलंय.
यातून एक होतंय कि असे आयात नेते सहजासहजी "बाहेर" जाणार नाहीत आणि विरोधकात असलेली थोडी फार धुगधुगी सुद्धा पूर्ण थंड होते आहे.
फारसे ना पटणारे डावपेच आहेत. परंतु अशाने भाजपचे काँग्रेसीकरण होणार आहे

उपेक्षित

फारसे ना पटणारे डावपेच आहेत. परंतु अशाने भाजपचे काँग्रेसीकरण होणार आहे >>>>>>>>>>>
येस पण तरीही हे आयातीकरण पटत नाही, कारण जे नेते नको म्हणून रा कॉं व कॉं ला लोकांनी नाकारलं त्याच नेत्यांना भाजप + शिवसेनेने आपली दारे सताड उघडी ठेवली आहे.
कहर म्हणजे त्या नारोबाचा इतका पुळका का आलाय भाजपला हेच कळत नाहीये. त्याने आणि त्याच्या पिल्ल्यांनी बाबासाहेब पुरंदरेंबद्दल जी काही मुक्ताफळे उधळली होती (वयक्तिक मला पुरंदरेंच लिखाण खूप नाही आवडत पण तरीही त्यांनी केलेल्या कार्याबद्दल त्यांना सलाम) त्यावरून सामान्य माणसाने आता काय विचार करावा असे वाटत आहे.

कंजूस

निष्ठावान कार्यकर्त्यांना संधी.
नेतेगिरी गुण त्यांच्यात नाही हे भाजपला माहीत आहे.