एलियनायटीसेलिया - भाग १० (अंतिम)
Primary tabs
एलियनायटीसेलिया - भाग ९, भाग ८, भाग ७, भाग ६, भाग ५, भाग ४, भाग ३, भाग २, भाग १
आमचं आश्चर्य प्रत्येक वाक्याला वाढतच होतं. "आता असलेले सगळे कार्बन-आधारीत आहात म्हणजे, ते सिलिकन-आधारीत लोक किंवा सजीव कुठे गेले?", डानडाननी इंग्लिशमधून क्वेडला विचारलेला प्रश्न आम्हालाही ऐकायला आला.
आणि त्या तिघांचे चेहेरे खर्रकन उतरले. तिघं एकमेकांकडे बघायला लागले. शेवटी लीला म्हणाली, "सगळी चूक आमचीच आहे, आमची म्हणजे आमच्या पूर्वजांची! तेव्हा आमच्याकडे फारशी प्रगती झाली नव्हती. आमच्याकडे नुकताच कोळसा जाळला की आग तयार होते, त्यावर पाणी तापवून वाफेची शक्ती वापरून अनेक कामं करता येतात याचा शोध लागला. मग सगळीच कामं करण्यासाठी मशीन्स बनवली गेली. आमच्याकडेही तुमच्यासारखंच खनिज तेल होतं आणि त्याचाही भरमसाट वापर वाढला. यंत्र वापरण्याचातर एवढा अतिरेक झाला की जेवण झाल्यावर भांडीतर सोडाच पण हातही धुवायला मशीन, दिवाणावर चादर घालून खोचायला मशीन, गाडीत बसलं की सीट सारखी करायचीसुद्धा गरज नाही, तेपण काम आपोआप व्हायचं. आणि कळायला खूप उशीर झाला की यासगळ्यामुळे व्यक्तिगत आरोग्याची हानी होतेच आणि त्याबरोबर आमच्या ग्रहाचं तापमानही खूप वाढलं. हे सगळे सिलिकन आधारित जीव बर्यापैकी श्रीमंत होते, त्यांच्यात शिक्षणही जास्त होतं,आणि त्यामुळे ते लोकं सगळ्याच प्रकारच्या संशोधन करण्यात आणि त्याचा आळसासाठी उपयोग करुन घेण्यात आघाडीवर होते. जेव्हा तापमान वाढायला लागलं तेव्हा त्या लोकांना त्याचा जास्त त्रास व्हायला लागला. दोनशे वर्ष संशोधन केल्यावर लक्षात आलं की एकतर त्या लोकांना कष्टाची सवय नव्हती, त्यामुळे कुठल्याही बदलाची सवय त्यांना सगळ्यात उशीरा व्हायची. म्हणजे इथे आम्ही आलो, तर हे खूप थंड आहे माझ्यासाठी, पण मला दोन दिवसांत सवय झाली. म्हणे, या सिलिकोनीयन्सना दोन महिने दिले असते तरी सवय झाली नसती. पण त्याचं कारण फक्त शारिरीक श्रम हे एवढंच नव्हतं. कार्बनऐवजी सिलिकन असल्यामुळे ते जीव बदलांना खूपच लवकर बळी पडायचे. त्यामुळे की काय त्या लोकांना सगळ्या गोष्टी शरीराला झेपतील अशा बनवण्यात खूप गती होती. पण हे सगळं समजेपर्यंत आमच्याकडचं खनिज तेल, नैसर्गिक वायू, कोळसा सगळंच संपल्यातच जमा होतं. त्यामुळे कारण समजलं होतं पण इलाज करेपर्यंत ते लोक अनेक वेगवेगळ्या आजारांना बळी पडायला लागले. मग आमच्या ग्रहावरचं संशोधन खूप मागे पडायला लागलं, अर्थव्यवस्था कोलमडायला लागली. मग आमच्या, कार्बन-आधारित लोकांच्या पूर्वजांनीही नुसत्या आज्ञा पाळण्याची नोकर्या शोधण्याऐवजी भरीव काम अंगावर घ्यायला सुरुवात केली. अर्थात आमचे प्रयत्न खूपच कमी पडले आणि एकेक करुन सिलिकोनीयन्स मरायला लागले, कसली तरी भयंकर साथ आल्यासारखे! जे जिवंत होते त्यांच्या पुरुषांमधली पुनरुत्पादन क्षमता एवढी कमी झाली होती की अखेरचा प्रयत्न म्हणून सिलिकोनियन्स मुली, स्त्रिया ठरवून आमच्या पूर्वजांबरोबर राहून मुलं जन्माला घालू लागल्या. पण त्या स्त्रियांचीही तब्येत फार चांगली नव्हती. त्यामुळे साधारण पाचशे वर्षांनी एकही संपूर्ण सिलिकोनीयन राहिलाच नाही. आणि हे जे संकरीत लोक होते ते ही फार काळ जगले नाहीत, काही पुनरुत्पादन करण्यास असमर्थ होते, काही अगदीच विचित्र विकृतींसकट जन्माला आले. त्यामुळे या जमिनीतल्या खजिन्याचा शोध लागल्यापासून साधारण हजार वर्षांत सगळेच सिलिकोनियन्स नष्ट झाले. आता आमच्याकडे फक्त त्यांच्या जतन केलेल्या ममीज आहेत, आणि इतर अनेक कागदपत्र, फोटो, व्हीडीओज आहेत. पण त्या लोकांचे चेहेरे आमच्यापेक्षा तुम्हा लोकांशी जवळचे दिसतात." क्वेडने पुराव्यादाखल लगेच काही फोटो दाखवले. आणि गंमत म्हणजे खरंच ते चेहेरे "आपल्यातलेच" वाटावेत एवढे आपल्यासारखे होते. आणि ते फोटो दाखवण्याचं उपकरण आपल्याकडे जसा डिजीटल फोटो अल्बम मिळतो तसाच होता.
लीला पुढे बोलायला लागली, "आम्हाला अजूनही शाळेमधे हे सगळं शिकवतात. हे फोटो अल्बम बघितलात ना तो ही सिलिकनपासून बनवलेला आहे. यातले अणू-रेणू एकेकाळी एका जीवाच्या शरीराचा भाग होते, आणि आता फक्त फोटोपुरतंच उरलंय सगळं! पण तेव्हा आमच्या पूर्वजांनी ठरवलं, की जे झालं ते झालं. पण आता यापुढे ग्रहाचं तापमान कमी करायचं. मग संशोधन सुरु झालं की त्यासाठी काय करायला लागेल. यंत्रांचा वापर कमी झाला. बरीचशी कामं पुन्हा एकदा स्वतःची स्वतः करायला सुरुवात झाली. मग हळूहळू दोन महत्त्वाचे शोध लागले, एक म्हणजे आम्ही आमची यंत्र तार्याकडून येणार्या प्रकाशावर, किंवा वार्यावर चालवायला लागलो. दुसर्या टप्प्यात सगळी यंत्र खूप एफिशियन्ट बनवली गेली, कमीतकमी ऊर्जा वापरून जास्तीतजास्त काम मिळवण्याची धडपड. आणि दुसरा शोध म्हणजे आम्ही प्राण्यांच्या शरीरात क्लोरोफिल बनवण्याइतपत प्राण्यांची गुणसूत्र बदलणे. त्यामुळे कल्पनेपेक्षा जास्त चांगला परिणाम दिसायला लागला. एकतर सगळ्या प्राण्यांना स्वतःचं अन्न स्वतः बनवता आल्यावर प्राणीसुद्धा हवेतले ग्रीन-हाऊस वायू कमी करायला लागले आणि शेती करण्याची गरजच नाही राहिली. तसं आम्ही थोडं फार खाऊ शकतो, पण ते फक्त मौज म्हणूनच खातो. म्हणजे क्वचित कधीतरी बाहेर रेस्तराँ, पबमधे जाऊन तुम्ही खाता साधारण तेवच्याच वेळा आम्ही मजा म्हणून खातो. त्यामुळे पूर्वी जेवढी जमीन शेतीसाठी वापरली होती, त्यातल्या ९९% जमीनीवर आता पुन्हा जंगलं आहेत. आमच्याकडे शाळा, कॉलेजेसमधे माळीकाम हा एक विषय असतोच. शारीरिक श्रमही होतात आणि झाडं लावणं, जगवणं यांचंही प्रात्यक्षिक मिळतं. खाण्याचा वेळ वाचतो तो आम्ही असा घालवतो."
"हं", काही साक्षात्कार होत असल्यासारखे आमचे चेहेरे होते. "तुम्ही म्हणता ते फारच अद्भुत आहे आमच्यासाठी! पण मग तुम्ही पाणी पिता का? आणि आत्ता इथे कसे आलाय एवढी वर्ष प्रवास करून? प्रवासातल्या बर्याचशा वेळात आजूबाजूला कुठे जवळ तारा नसणार मग तुम्हाला प्रवासात ऊर्जा कशी मिळाली?", पुन्हा आमच्याकडून एक अविश्वासदर्शक प्रश्न आलाच. "मला अपेक्षा होतीच या प्रश्नाची! मुद्दामच आम्ही इथे टेलिस्कोपच्या जवळ उतरायचं ठरवलं, कोणीतरी ज्याला आम्ही काय सांगतोय ते कळेल असं भेटावं म्हणून!" मिहीर म्हणाला. तेवढ्यात माझ्या डोक्यात विचार आला,बरं झालं त्या आनंद राजवीर सिंगला हे लोक नाही भेटले. हे लोक फ्रेंच बोलत नाहीत म्हणून त्याने असहकार आंदोलन पुकारलं असतं तर?" पण लगेचच डोक्यातले 'अवांतर' विचार काढून मी मिहीरकडे लक्ष दिलं. "त्यासाठीही अनेक दशकं संशोधन सुरू होतं. शेवटी आम्ही एक छोटा पार्टीकल ऍक्सिलरेटर बनवला. त्यात सगळ्या तार्यांकडून येणारे न्यूट्रीनोजपकडले जातात आणि त्यांची ऊर्जा आम्हाला फोटॉन्सच्या स्वरुपात मिळू शकते. आणि अगदी अलिकडेच लागलेला शोध म्हणजे दुसरं छोटं यंत्र, त्यात इतर सगळ्या तरंगलांबीचे किरण पकडून यंत्रातच अन्न तयार करायचं आणि आम्ही ते खातो. पण मग रोज खाण्याची आम्ही सवय केली. आमच्याकडे फक्त मजा म्हणूनच खाण्याची सवय असल्यामुळे इथे येण्यासाठी लायक लोकांमधे तेच लोकं होते जे रोज खाऊन ते पचवू शकतात. अर्थात अनेक वर्षांची, काय पिढ्यांची खायची सवय नसल्यामुळे तुमच्यासारखं चवीढवीनी आम्ही खात नाही, फक्त ऊर्जा मिळावी म्हणूनच खातो. म्हणूनच आम्हाला तुमच्या स्वयंपाकघरात डोकावता आलंतर बघायचं होतं. आणि पाणि प्यायला लागतं आम्हाला. त्याचीही सोय यानातच केलेली आहे. जेवढं पाणी पिणार त्यातलं बरंचसं बाहेर टाकलं जातं. ते सगळं, म्हणजे यानातली आर्द्रताही कायम ठेवली जाते. बाकी पाण्याचा स्रोत म्हणून बर्फ ठेवलेला आहेच यानात. आणि यासाठी लागणारी सगळी ऊर्जा पुन्हा न्यूर्ट्रीनोज किंवा विद्युत-चुंबकीय लहरींमधून मिळवली जाते. ती ग्लायडर्स तुम्ही पाहिलीत ना, त्यासाठी ऊर्जा म्हणून पाण्याचं विघटन करून हायड्रोजन जाळला जातो आणि पुन्हा पाणी तयार होतं. पाण्याच्या विघटनासाठी पुन्हा तसंच न्यूट्रीनो किंवा फोटॉन्सची ऊर्जा वापरतो. पण आता काय आमचा तारा तुम्हाला आधी सांगितलं तसा म्हातारा होतोय. आम्ही हळूहळू तुमच्या पलीकडे एक ग्रह-तार्यांची मालिका बघून तिथे मुक्काम हलवतो आहोतच. आमच्यातले काही लोकं तिथे आधीच गेले आहेत. इथून तिकडे जायला फारतर एक वर्ष लागेल, त्यामुळे तुम्ही लोकं नाही एवढे येऊ शकलात तर आम्ही येऊ. पण आम्हाला इथे फार काळ रहात येणार नाही. आमचं तसंच ठरलेलं आहे."
'"म्हणजे तुम्ही लोकं एवढा वेळ खर्च करुन फक्त स्वतःची ओळख करून द्यायला आला होतात? आणि तुम्हा लोकांना कळलं कसं की इथे कोणी प्रगत सजीव रहातात?", मी विचारलं. "प्रगत?", लीलाच्या चेहेर्यावर प्रचंड आश्चर्ययुक्त हास्य पसरलं होतं. "तुमच्याबद्दल काहीही अनादर नाही, पण गेल्या दहाएक वर्षांत तुमच्याबद्दल आम्हाला बरंच काही कळलंय. पहिल्यांदा सांगते तुमच्याबद्दल कळलं कसं ते! आम्हाला एका सजीव नसणार्या ग्रहाची, जिथे सजीवसृष्टी नसेल पण जगेल अशा ग्रहमालिका-पालक तारा यांची गरज होती. त्यामुळे आमच्याकडचे खगोलनिरीक्षक खूप काम करत होते. जवळजवळ पन्नास वर्ष हे काम खूप जोरदार सुरु होतं. खूप मोठ्या दृष्य दुर्बिणी बांधल्या गेल्या. त्यामुळे इतर संशोधन थोडं मागेच पडलं होतं. या खालोखाल पैसे मिळायचे ते दोन तार्यांमधल्या प्रवासासाठी तयारी करण्याच्या संशोधनाला. असो. खूप प्रमाणात खगोल निरिक्षणाचा प्रसार झाला आणि युद्धपातळीवर संशोधक हे काम करत होते. तेव्हाच आम्हाला तुमचा शोध लागला. साधारण चाळीसएक वर्ष झाली त्याला! म्हणून आम्ही तुमच्याशी संपर्क करायचा प्रयत्नही केला पण तुमच्या दुर्बीणी नेहमी भलत्याच दिशेला बघत असणात, आणि एवढ्या जवळ असूनही तुम्हा लोकांना आमचे सिग्नल्स मिळालेच नाहीत. साधारण दहा वर्षांपूर्वीच आम्ही तो नवा तारा+ग्रह नवं घर असेल असं ठरवलं आणि सगळी तयारी, सगळा पैसा स्थलांतरामधेच ओतला गेला होता त्याचं फळ आता मिळायला सुरुवात झाली आहे. तो ग्रहपण छान आहे. तुमची पृथ्वीही खूप छान आहे, इथेही वेगवेगळी झाडं आहेत, आम्ही शक्य असेल तर इथूनच बरीचशी झाडं, रोपं घेऊन जाऊ आणि तिकडे नेऊन वाढवू. तर झालं असं की एकदा नवं घर, नवा ग्रह सापडल्यावर एवढ्या संख्येनी बांधलेल्या मोठ्या दुर्बिणींनी काय करायचं हा प्रश्न होताच, तर आम्ही तुमचंच निरीक्षण सुरू केलं. मग एक रेडीओ दुर्बिण बांधली, फक्त तुमच्याकडे 'लक्ष' द्यायला! आम्ही तुमचे रेडीओ, टी.व्ही.चे खूप सिग्नल्स बघायला लागलो. मी आणि क्वेड त्यातल्याच एका विभागात काम करत होतो," लीलाच्या म्हणण्यावर विश्वास ठेवावा एवढं तार्किक बोलत होती ती!
"हो," लीलानी पुढे सांगायला सुरूवात केली. "आम्ही तुमचे टी.व्ही. सिग्नल्स बघायचो, मी हिंदी आणि क्वेड मँडरीन. म्हणूनच आम्ही तुमची भाषा संदर्भावरुन शिकत गेलो. तुमच्याबद्दल समजण्यासाठी टी.व्ही. सिग्नल्स हा सगळ्यात सोपा उपाय आहे असं आम्ही ठरवलं. मग आम्हाला तुमच्या टी.व्ही.मधे फारच रस निर्माण झाला. आम्ही त्याचं डबिंग करुन आमच्याकडेही काही कार्यक्रम दाखवायला सुरुवात केली." माझ्या डोक्यातलं 'अवांतर चक्र' पुन्हा सुरू झालं. "हे निरूपमला सांगितलंच पाहिजे. अर्थात बाकी सगळं तर सांगायचं होतंच, पण आम्हाला दोघांना टी.व्ही. बघायला आवडत नाही.. आणि हे लोकं एवढ्या दूरवरून ... ऐकावं ते नवलंच! असो. व्यक्ती तितक्या प्रकृति" लीला पुढे बोलत होती, "आमच्याकडे तुमची एक हिंदी मालिका फारच लोकप्रिय होत होती. तसंच आम्ही तुमच्याकडच्या, म्हणजे भारतातल्या बातम्याही ऐकायचो. पण ती मालिका, म्हणजे त्यात जे दाखवायचे ते आणि बातम्या यांच्यात काहीही साधर्म्य नव्हतं. त्यामुळे आमचा समज होता की ती विनोदी मालिका आहे. आम्हाला खूप हसायलाही यायचं ती मालिका बघताना! काहीतरीच वेडगळपणा होता त्यात! पण एक दिवस त्यात एक माणूस मेलेला दाखवला. मरण ही गोष्ट विनोदी असूच शकत नाही. आणि दुसर्या दिवशी बातम्यांमधेही त्याबद्दल ऐकायला यायला लागलं. मग आम्हाला समजलं की ती विनोदी मालिका नव्हती. आमच्याकडे हे सगळं पाहून खूप मोठा आरडाओरडा झाला. आणि ते सगळं पाहिलंय मी "तुम्ही लोकं प्रगत आहात" या वाक्यावर हसले. तुमच्याबद्दल आम्हाला आदर आहे. आम्हीही, म्हणजे आमच्या ग्रहावरही अशीच स्थित्यंतरं होत गेली. पण आता आमच्याकडे अनेक गोष्टींत खूप जास्त स्वातंत्र्य आहे, लोकांच्या व्यक्तिगत आयुष्यामधे सरकार ढवळाढवळ करत नाही. खरंतर आमच्याकडे लोकप्रतिनिधी होण्यासाठी फार लोकं तयार नसतात कारण करायला काही फारसं नाहीच आहे. त्या त्या विषयातले तज्ञ निर्णय घेतात आणि सरकार ते मान्य करतं. अंमलबजावणी करण्याचा प्रश्न असतो पण लोकं बहुतांशी कायदे पाळतात. एकाला एक कायदा आणि दुसर्याला दुसरा असं आमच्याकडे गेल्या हजार वर्षांतरी झालं नसेल. कोणाचा विरोध असेल तर तो सूचक असतो, हिंसक विरोध आमच्याकडे दोन हजार वर्षांपूर्वीच संपला. आणि विरोधाकडे जाणीवपूर्वक डोळेझाक होत नाही. पण आमच्याकडे लोकं कलाक्षेत्रात तुमच्यापेक्षा मागास आहेत. तुमच्याकडे किती वेगवेगळ्या प्रकारचं संगीत आहे; आमच्याकडे 'मेटॅलिका'सारख्या हेवी मेटल संगिताचे प्रेमी आहेत तसेच लॅटीनो संगिताचेही आहेत आणि तेवढंच भारतातल्या शांत संगीताचे चाहते आहेत. एक तीच बाब असेल, "कला" ज्यात आम्ही मागे पडलो. अनेक वर्ष आम्ही फक्त संशोधनच केलं, पण त्यातही एक वेगळिच मजा असते. अर्थात तुम्हां लोकांना हे वेगळं सांगायची गरज नाही. असो."
"पण तुम्हा लोकांची नावं आमच्याकडच्या नावांसारखी कशी हो?", जेनीनी बर्याच वेळानी तोंडाची उघडझाप केली. "खरंतर आमची नावं वेगळी आहेत, पण तुम्हाला कळावं म्हणून तुमच्यासारखी घेतली. तुमच्या टी.व्ही.चीच कृपा! 'टोटल रीकॉल' नावाचा एक देमार-विनोदपट आहे ना, त्यावरुन आला 'क्वेड'; 'फ्यूचुरामा' नावाची एक झकास साय-फाय मालिका आली त्यातून आलं 'लीला' हे नाव, आम्हाला नंतर कळलं, हे नाव हिंदी बोलणार लोकही ठेवतात. आणि माझं नाव .... " मिहीरला मधेच तोडून लीला पुन्हा बोलायला लागली.
"तर मुद्दा असा की आम्ही इथे रस्ता थोडा वाकडा करुन आलो ते एकतर आमची ओळख करून द्यायला. तुम्हा खगोलअभ्यासकांना आमच्याबद्दल सांगितलं की तुमचा एक छोटा टेलिस्कोप तुम्ही आमच्यासाठी ठेवाल, आपल्याला संवाद वाढवता येईल. अर्थात एकदा सिग्नल पाठवला की पोहोचायला पाच वर्ष लागतील, आम्ही नव्या ग्रहावर गेलो की एक वर्ष लागेल, पण आपल्याला आपण एकटेच नाही याची जाणीव राहील; कसं? आणि दुसरं कारण होतं 'निषेध नोंदवणं'. तुमच्या त्या मालिकेत तुम्ही तो माणूस मेलेला दाखवलात ते तुमच्याकडच्या बर्याच लोकांना आवडलं नाही तसंच आमच्याकडेही ते आवडलं नाही, म्हणून आम्ही कमीतकमी वेळात, अगदी थोडक्या तयारीनिशी निघालो." लीला म्हणाली. "कोणती मालिका?", मी विचारलं. आता भारताचाच नंबर आहे असं का कोण जाणे मला वाटत होतं. "तुझ्याच देशातली," माझा अंदाज अंमळ योग्यच होता; लीला बोलत होती, "आणि या मिहीरचं नाव तिथनंच आलेलं आहे. त्या मालिकेतलं मेलेलं पात्र, जे परत नंतर म्हणे जिवंत झालं, पण आम्ही तेव्हा निघालो होतो, म्हणून आम्ही आलो इथे. मिहीर विरानी, 'क्यूं की सांस भी कभी बहू थी' मालिका ती!". मला पुन्हा एकदा बर्याच दिवसांनी हसण्याचा अटॅक आला. एवढी हसले की डोळ्यातून पाणी येत होतं, आणि शेवटी दमूम तिथेच लाकडाच्या ओंडक्यावर बसले, मुंडी खाली घालून हसू आवरायचा प्रयत्न करत होते. थोड्या वेळानी असं वाटायला लागलं आजूबाजूला सगळा अंधार आहे, मी माझ्या दिवाणावर झोपले आहे आणि खिडकीवर काहीतरी आपटत आहे. ...
समाप्त
{डिस्क्लेमर}एलियन्स कोण ते तर आपल्याला सगळ्यांनाच माहित असतं. एलिनायटीस म्हणजे हृतिक रोशनला जो रोग झाला होता ना "कोई मिल गया"मधे, तो! आणि तो चित्रपट आणि टी.व्हीवरच्या तद्दन टुकार मालिका पाहून मला झाला तो रोगः "एलिनायटीसेलिया"! अर्थात या रोगावरचं एकमेव 'औषध' मला सापडलं, ही गोष्ट लिहून तुम्हां लोकांना त्रास द्यायचं. ;-) {डिस्क्लेमर संपलं}
छान !
हा भाग सर्वात उत्तम भाग आहे !
जवळ जवळ आपली पृथ्वी वाचवा नाय तर मरा हाच एक संदेश मला तरी व्यवस्थीत दिसला !
अभिनंदन !
जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आपले संकेतस्थळ
अदिती शेवटचा भाग पण सॉलिड होता .
खरच निसर्गाच संरक्षण करायची आपली जबाबदारी आहे.
--@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@--
आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी
दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी
पण खुप काही देउन जातात हे
आयुष्यात पुढे जाण्यासाठी
सॉलिड. =)) =)) =))
सास-बहू इतक्या लोकप्रिय झाल्या आहेत हे माहित नव्हतं. जबरी आयडिया.
बिपिन कार्यकर्ते
सास-बहूच्या मालिका अखिल विश्वात लोकप्रिय आहेत म्हणजे. बाकी इतके वर्षे जगणारी 'बा' ही सुद्धा एलियन असेल काय? :)
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
बा नक्कीच एलियन असेल अन तुळशीला ते लोक नक्की व्हिलनेस्स समजत असतील !!
या भागात पर्यावरणवाला संदेश आवड्ला.
प्रगत ? असे म्हणुन हसणार्या लीलाला पाहुन वास्तव मधला इंजिनिअरला हसणारा संजय दत्त आठवला.
मी आजपासनं आहारात पाणीच जास्त घ्यायला सुरुवात करणार आहे.
-
[प्रगत]
आनंद राजविर सिंग
[प्रगत]
आनंद राजविर सिंग
आयला, म्हणजे तो आनंद राजविर सिंग तूच की काय? =)) =)) =))
बिपिन कार्यकर्ते
नाहीतर काय हो. आमचे आंतरजालिय दुश्मन आमचा अपमान करण्यासाठी आख्खी विज्ञानकादंबरी लिहतात !!
बाकी टंच एलियनी काही आल्याच नाहीत शेवटपर्यंत !!
-
[भुकेल्यांना उपाशी न ठेवणारा]
आंद्या गटणे
बाकी टंच एलियनी काही आल्याच नाहीत शेवटपर्यंत !!
हो ना राव!!! मी पण हेच म्हणतो.
-
[भुकेल्यांना उपाशी न ठेवणारा]
आंद्या गटणे
=)) =)) =))
बिपिन कार्यकर्ते
नाहीतर काय हो. आमचे आंतरजालिय दुश्मन आमचा अपमान करण्यासाठी आख्खी विज्ञानकादंबरी लिहतात !!
आणि काही स्नेही इच्छेचा मान राखून एक गोष्ट लिहितात, त्यात आपल्याला प्रसिद्धी देतात.
[भुकेल्यांना उपाशी न ठेवणारा]
म्हणजे काय पाणी पाजणार काय रे तू?
अदिती
हा भाग सर्वात जास्त आवडला ...
एकंदरीत आख्खी मालिका वाचायला मजा येतच होती पण काहीतरी "घेण्यासारखे" असल्याने हा भाग विषेश भावला ...
"पॄथ्वीवासियांनो पृथ्वीला वाचवा" हे पटले ..
बाकी ते "सास - बहु" इफेक्ट वाचुन अंमळ करमणुक झाली ...
=)) =))
बाकी थोडा अपेक्षाभंग झाला, आम्हाला वाटलं की "ईलियन" मस्त हाणामार्या करेल, जादु दाखवेल, डास्न करुन गाणी म्हणेल .... वगैरे वगैरे
असो. उत्तम लेखमालिका !!!
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
शेवटचा भाग एकदम मस्त झालाय अदिती,


पर्यावरणाचा संदेशही छान दिलाएस.
>त्या मालिकेतलं मेलेलं पात्र, जे परत नंतर म्हणे जिवंत झालं, पण आम्ही तेव्हा निघालो होतो, म्हणून आम्ही आलो इथे.
वेगळ्या विषयावरची कथा आणि सगळे भाग रोचक आणि यशस्वीपणे पूर्ण झाल्याबद्दल
हल्लीच वाचनात आल्याप्रमाणे 'क्यूं की...' या मालिकेचे प्रक्षेपण थांबवलेले आहे आणि ही मालिका मेल्यातच जमा आहे. मेलेल्याला काय मारायचं, पण या मालिकेचा शेवट आधीच ठरवला होता त्याप्रमाणे केला आहे. (पुराव्यादाखल त्या एलियनचं नाव आहेच!)
बाकी नंदन, ती बा शेवटपर्यंत होती का जिवंत? मी सुरुवातीचे काही भाग कधीमधी दुसर्यांकडे बघितले होते, त्यापुढची माझी माहिती (उदा: मिहीर मेला, नंतर जिवंत झाला वगैरे) मुंबईच्या लोकल ट्रेन्समधे (इलाज नसल्यामुळे) गोळा केलेली होती.
>> बाकी थोडा अपेक्षाभंग झाला, आम्हाला वाटलं की "ईलियन" मस्त हाणामार्या करेल, जादु दाखवेल, डास्न करुन गाणी म्हणेल .... वगैरे वगैरे
डानराव, पिच्चर आणि नेहेमीच्या कादंबर्यात ते एलियन्स जे करतात तेच इथे केलं तर माझ्या 'विक्षिप्तपणाला' बट्टा नाही का लागणार? म्हणून हे असं काहीतरी! आपल्या अपेक्षाभंगाबद्दल दिलगिरी.
(अजूनही विक्षिप्त असलेली) अदिती
छ्या !!! त्यात कसली दिलगिरी ?
मी ते मजेने लिहले होते ... हे असेच भारी आहे.
अवांतर : ह्या कथेचा शेवट वाचुन आम्हाला जयंत नारळीकरांच्या "प्रेषित कादंबरीमधली शेवटचा पर्याय (बहुतेक हेच नाव आहे ) " ही कथा आठवली.
कथा अशीच आहे फक्त शेवट मस्त आहे जरासा, पॄथ्वीवर आलेले "इलियन्स कम २०० वर्ष जुने मानव" शेवटचा पर्याय म्हणुन त्या काळातल्या मानवी जीवनाचे प्राण असलेली उर्जाकेंद्रे बंद करुन माणसाचे पुर्ण यांत्रिकीकरण व पर्यायाने नाश होण्यापासुन वाचवतात ...
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
डॉनराव, माझ्यामते प्रेषित ही आख्खी सलग कादंबरी आहे.. आलोक हिरो असलेली..
तुम्ही म्हणताय ते हे पुस्तक नसावं असं वाटतंय..
अदिती, मस्त झालाय हा ही भाग.. पर्यावरणवादी संदेश छान.. क्यु की त्यांना माहीती आहे म्हणजे टु मच आहे !! :)))
http://bhagyashreee.blogspot.com/
पुस्तकाचे नाव टाकताना चुक झाली ...
हे पुस्तक कदाचित "यक्षाची देणगी" असावे, अजुन सुद्धा नक्की सांगता येत नाहीये मला, कथा आठवते आहे (शेवटचा /अखेरचा पर्याय ) पण पुस्तकाचे नाव सध्या विसरलो आहे. पण हे "यक्षाची देगणीच" असावे ...
विसाव्या शतकातल्या काही निवडक हुशार माणसांना २०० वर्षे गोठवलेल्या स्थेतीत अंतराळात पाठवण्यात येते, ते २०० वर्षांनी पुन्हा जागॄत अवस्थेत येऊन त्या काळच्या मानवांना मदत करणार असतात. पण त्यांना नवे जीवन पुर्णपणे "यंत्रांवर अवलंबुन" असल्याचे आढळते व यातुनच मनुष्यजातीचा विनाश अटळ आहे हे जाणवते. म्हणुन मग ते पॄथ्वीला शक्ती देणारी प्रमुख "शक्तीकेंद्रे" बंद पाडतात व नव्या मानवांवर पुन्हा कष्टाने जगण्याचा, पुर्णपणे यंत्रावर अवलंबुन न राहण्याचा व पर्यायाने विनाश टाळण्याचा उपाय जबदस्तीने आमलात आणतात ...
हाच तो "शेवटचा /अखेरचा पर्याय" ...
असो, कुणाला पुस्तकाचे नाव असल्यास कॄपया द्यावे.
माझ्या मते "यक्षाची देणगी" ...
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
पण डान्या (आणि इतर लोक्स), आइच्यान सांगते मी एकही मराठी विज्ञानकथा, कादंबरी वाचलेली नाही आहे.
छ्या, कोण करतो असा आरोप ? काय संबंध ह्याचा ?
तु पण प्लीजच आहेस बाई ...
आम्ही फक्त विषय निघाला म्हणु पुस्तकाची चर्चा करत होतो.
काहीच मनाला लाऊन नको घेऊ बाई, आम्ही काय वेडे आहोत का असा आरोप करायला / संशय घ्यायला ?
तु जे १० भाग मनापासुन लिहलेस त्याची कदर आहेच ना आम्हाला.
सो, तुझी कथा मस्तच अस्ती, टेन्शन / मनात काही वेगळे घेऊ नकोच.
आजकाल म्हणतात तसे "थंड घे" ....
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
ह्म्म कथासूत्र ओळखीचे वाटतेय. बहुधा यक्षांची देणगीच असेल..
http://bhagyashreee.blogspot.com/
पुन्हा तेच .... प्रकाटाआ
शेवट रोचक झाला आहे. आणि जाता जाता "आनंद परत डोकावून गेल्यामुळे अंमळ बरे वाटले!
शेवटच्या भागात कलाटणी मात्र छान आहे.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
शेवट्च्या भागात क लाट्णी आहे.
चांगला संदेश दिला आहे या भागातुन. त्यामुळे मालिकेतील सर्वात चांगला भाग असे म्हणायला हरकत नाही.
पुढील लेखनासाठी शुभेच्छा.
असेच काही चांगले वाचायला मिळावे अशी अपेक्षा.
नाना
असेच म्हणतो.
शेवटही चांगला केला आहेस अदिती, गोष्ट आवडली.
अजून विज्ञानकथा लिहायला हरकत नाही तुला..
स्वाती
आदिती,
मस्त लिहिले आहेस.
:)
सलग १० भाग वाचले !!
आणी खरच अजिबात कंटाळा नाय आला ,हेच लेखिकेचे यश आहे ...
विक्षिप्तदेवी कडून अजुनही कथा वाचायला मिळतील अशी अपेक्षा ठेवायला हरकत नाही....
(धुमकेतू)
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
पर्यावरणाच्या संरक्षणाचा मौलिक सल्ला मिळाला.:)
सगळे भाग आवडले.
भाग संपवताना मात्र ते सांस बहू की काय ते जरा ....
म्हणजे ते आपल्या लेखमालेच्या मूडला जरा....
रेवती
भाग संपवताना मात्र ते सांस बहू की काय ते जरा .... म्हणजे ते आपल्या लेखमालेच्या मूडला जरा....
तो माझा मूड होता! ;-)
मला आंद्या म्हणत होता म्हणून मी हे लिहायला सुरुवात केली. आता लिहितच आहे गोष्ट, आणि आहेच स्वातंत्र्य तर मी माझी टवाळी करण्याची हौस भागवून घेतली; बाकी काही नाही.
आणि माझी अपेक्षा होती की ते वाचून मला फटके पडतील आणि पुन्हा कोणी "गोष्ट लिही" असं सांगणार नाही. पण काय सांगू रेवतीताई, माझा प्लॅन उधळून लावला गेला. :-(
(टवाळखोर) अदिती
भहन्नाहाट!!!!
हा भाग मस्तच.. शेवट तर ठ्ठोऽऽऽ होता :)
संपूर्ण गोष्ट आवडली.. शैली तर मस्तच आहे.. अजून विज्ञानकथा लिहि या स्वातीताईच्या सुचवणीशी १००००% सहमत
-(पृथ्वीवासी) ऋषिकेश
मिपावरची एक 'वन ऑफ द बेस्ट' म्हणता येईल अशी लेखमाला.
छान मालिका. आधी वाचली नव्हती.
@ इंटरनेटस्नेही
चांगली मालिका वर काढल्याबद्दल धन्यवाद.