पाककृती

स्वैपाकातले प्रयोग-दलिया बिर्याणी

Primary tabs

आज रविवार काहीतरी वेगळे करायचे होते पण घरात काहीच नव्हते आणि दुकाने पण बंद. फ्रिज मध्ये असाच एवरेस्ट शाही बिर्याणी मसाला सापडला पाकिटावरची कृती आणि उपलब्ध साहित्याचा मेळ बसत नव्हता

मग असेच दलिया ला हा मसाला वापरून बघण्याचे ठरवले आणि करून पहिले बऱ्यापैकी जमली

कसुरी मेथी चे मोठे पाकीट आणल्यामुळे आजकाल प्रत्येक पदार्थात घातली जाते थोडी कडवट चव येते पण ह्या रेसिपीला नाही आली कदाचित टोमॅटो सॉस घातल्यामुळे असेल

साहित्य

१. दोन वाट्या दलिया

२. एक कांदा चिरून

३. दोन चमचे दही (चवीनुसार )

४. एवरेस्ट शाही बिर्याणी मसाला किंवा कुठलाही बिर्याणी मसाला एक चमचा (टेबलस्पून )

५. टोमॅटो प्युरी /टोमॅटो सॉस/टोमॅटो ketchup ३ चमचे

६. मोहरी-जिरे -एक टीस्पून

७. हळद-तिखट -एक टीस्पून

८. मीठ चवीनुसार

९. चार चमचे तेल

१०. कसुरी मेथी एक चमचा (ऐच्छिक )

कृती -

१. दलिया दोनदा धुऊन बाजूला ठेवून द्यायचा ५-१० मिनिटे

२. कांदा चिरून घ्यायचा

३. तेल तापवून हिंग,जिरे ,हळद ,तिखट घालून फोडणी करायची

४. कांदा आणि टोमॅटो प्युरी/टोमॅटो सॉस घालून तेल सुटेपर्यंत परतायचे कसुरी मेथी हवी असेल तर घालायची

५. त्यात दही आणि बिर्याणी मसाला घालून ४-५मिनिटे परतायचे

६. त्यात दलिया घालायचा मीठ आणि पाणी घालून साधारण २०-२५ मिनिटे झाकणावर पाणी घालून शिजवायचे

७. हा दलिया कूकर मधून काढला नसल्यामुळे जास्त वेळ माध्यम/मंद आचेवर शिजवावा लागतो

daliya biryani

पारंपरिक बिर्याणीत भाज्या अजून बऱ्याच जास्त असतात तसेच शिजलेल्या बासमती भातावर वर परतलेले मिश्रण घालून हलवून मिसळून घ्यायचे आणि अजून बरेच काय काय असते वर बिर्याणी मसाला घातल्यामुळे दलिया बिर्याणी असे नामकरण करण्याचे धाडस केले आहे

किल्लेदार

"नाव काय तर राजे भोसले आणि चालवायची पिठाची गिरणी" असे झाले हे तर ...

बाकी गमतीचा भाग सोडला तर ही माझी आवडती डिश आहे.

Prajakta२१

लॉकडाऊन बिर्याणी म्हणता येईल

मस्तय आवडली पाककृती. येऊ द्या अजून.
आमच्याकडे पण आज पुलाव आहे, तोही प्रयोगच आहे.
नैच जमलं तर खिचडी म्हणून खायचं पक्क आहे.

-दिलीप बिरुटे

pulav

आवडली पाककृती. येऊ द्या अजून. आमच्याकडे पण आज पुलाव आहे, तोही प्रयोगच आहे. नैच जमलं तर खिचडी म्हणून खायचं पक्क आहे. लॉकडाऊनच्या काळात''भाज्यांच्या चवी'' या विषयावर धागा  पाहिजे.  मसाले कमी, भाज्या कमी आणि लॉकडाऊनचं ''निमित्त'' आणि आम्हा पुरुषांनी  बसल्या बसल्या सोडलेल्या  ऑर्डरी. म्हणजे मला किचनमधे मदत करायला आणि करुन खाऊ घालायला आवडतेच.  पण सध्याच्या लॉकडाऊनच्या  वातावरणात चवच लागेना.  काल चिकन आणलं पण त्याच्यातही काही राम जाणवला नाही.  पेक्षा भरलेली भेंडी चांगली लागली असती असे वाटले.

प्रचेतस

फायनल प्रॉडक्टची छायाचित्रे आणि कृती पण येऊ द्यात. भाज्या बहुतेक तुम्हीच चिरणार असाल. कांदा महिलांच्या डोळ्यांतून हमखास पाणी काढतो.

भाज्या बहुतेक तुम्हीच चिरणार असाल.
नाही. मी काहीही करणार नाही. ”न धरी शस्त्र करी मी गोष्टी, सांगेन युक्तीच्या चार” आपला फोकस यावरच आहे.

कांदा महिलांच्या डोळ्यांतून हमखास पाणी काढतो.
घेतला कांदा की लागले कराकरा कापायला त्यामुळे डोळ्यातून पाणी येतं. कांदा कापायचंही एक एक शास्त्र आहे, त्या पद्धतीने कांदे कापले
की मग नाही येत डोळ्यात पाणी.

आता ते शास्त्र कोणतं ते सांगायची पार्टी पडेल. ;)

-दिलीप बिरुटे

प्रशांत

कांदा कापायचंही एक एक शास्त्र आहे

विस्कटुन सांगा भो..

याला बिर्याणी का म्हणावी? ना चिकन ना मटण?

बाकी प्रचु म्हणतो त्याप्रमाणे

फायनल प्रॉडक्टची छायाचित्रे आणि कृती पण येऊ द्यात
प्रचेतस

कांदा कापायच्या आधी १० मिनिटेच फ्रीजमध्ये ठेवल्यास तो रडवत नाही, शिवाय कांद्याच्या मूळ चवीतही फरक पडत नै.

सरनौबत

दिलीप दादा, लॉकडाऊन मुळे दुचाकी आणि हेल्मेट धूळ खात पडून आहेत. कांदा चिरताना हेल्मेट वापरल्यास हेल्मेटचा देखील वापर होईल आणि डोळ्यातून पाणी सुद्धा येणार नाही :-)

हाही एक उपाय झकास आहेच. सध्या कोरोनापासून संरक्षणासाठी उपयोगी पडेलच.
आता गाडीचं हेल्मेट शोधणं आलं.

-दिलीप बिरुटे

Prajakta२१

पाककृती आवडल्याबद्दल धन्यवाद
कांदा फ्रीज मध्ये ठेवल्यास इतर गोष्टींना वास लागतो

प्रचेतस

सोललेला कांदा नाही हो, असोला आख्खा कांदा आणि तो देखील फक्त दहाच मिनिटे

Prajakta२१

कालचे variation-दह्याऐवजी पनीर चे तुकडे

आणि कांदा नव्हता म्हणून कांदा नाही घातला आणि कडीपत्ता घातला होता
बाकी सर्व तसेच आणि थोडा मसाला शेवटी अजून ऍड केला शिजताना
थोडी गोडसर झाली

Prajakta२१

काल बिर्याणीसारखी करायचा प्रयत्न केला
दलियाऐवजी तांदूळ ,कांदा ,टोमॅटो,पनीरचे तुकडे ,कडीपत्ता व बाकी सर्व वरचे घटक आणि तीच कृती
पण दलिया बिर्याणीच जास्त चांगली जमली होती (कदाचित तांदळाला मसाला जास्त लागत असेल)
नॉर्मल बिर्याणीला शिजलेला भात लागतो आणि अजून बरेच कार्य करावे लागते तेवढे न करता वरच्याच कृतीत दलियाऐवजी तांदूळ घातला