तंत्रजगत

बाल्कनीत ओला कचरा कुजवणे

Primary tabs

घरातला ओला कचरा हा कुजल्यावर झाडांसाठी उत्तम खत आहे. झाडं लावताना आपण कुजलेले खत बुंध्याशी देतो किंवा कुंडीत माती भरताना त्यात मिसळतो. बाल्कनीत झाडे ठेवताना कुंडीत झाडाभोवती कुजलेली तयार झालेली खत- माती टाकली की फुलझाडे, वेलभाज्या चांगल्या वाढतात. पण कचऱ्यातून ते कुजलेले खत होण्यासाठी कुठेतरी तयार करावे लागते आणि कमीतकमी तीन महिन्यांचा काळ. मोठा प्लाट अथवा गच्चीवरील जागा असेल तर हे करणे सहज शक्य आहे. एक खड्डा करायचा किंवा मोठ्या तोंडाचा फुटका ड्रम ठेवायचा आणि त्यात रोजचा घरातला ओला कचरा ( स्वयंपाक घरातले निवडून टाकलेल्या भाज्या, फळांच्या साली, आणि जेवणाच्या ताटातले उरलेले अन्न ) टाकत राहायचे. झाकण लावायचे नाही कारण वरून हवा मिळाली पाहिजे. किंवा बारीक जाळीदार झाकण हवे. त्यातून माश्या आत जाणार नाहीत असे. आतला कचरा पूर्ण कुजून काळी माती होण्यासाठी शेवटचा कचरा टाकल्यानंतर तीन महिने लागतात. मग वास येत नाही. दुसरा ड्रम/ खड्डा चालू करायचा. तोही भरल्यावर तिसरा. तोपर्यंत पहिल्या जागेतले खत तयार होईल. उगाच ढवळाढवळ करायची नाही. वास येईल. खरंच तपासायचे असेल तर एक सळी खुपसून बाहेर काढायची. त्यास चिकटलेल्या मातीस वास आला तर कचरा कुजला नाही.

शहरातल्या उंच इमारतीत राहणाऱ्यांच्याकडे ब्लॉकमध्ये एवढी जागा नसते. आता करोनाच्या बिकट परिस्थिती मध्ये जेवढा म्हणून ओला कचरा नष्ट करता येईल तेवढा गरजेचा आहे. खत करण्यापेक्षाही यास प्राधान्य निर्माण झाले आहे.

कचरा कुजायची वाट पाहण्यापेक्षा तो थेट कुंडीत झाडास अगोदरच देता आला तर? खटाटोप वाचेल.
यासाठी प्लास्टिक ट्रे घेतले. ९x ७ x२ इंच. ते किंवा जरा मोठे ११ x८x २ चे सहज मिळतात. खाली तळाला एक इंच माती थर देता येईल. जुन्या एक्सरे फिल्म वळवूनही ट्रे केले. प्लास्टिकच्या एक किलो सामान राहणाऱ्या वाणी सामानाच्या पिशव्या बऱ्याच जमा होतात. त्यांना तळाला बारीक भोके पाडली ( सायकलचा स्पोक/ छत्रीची काडी जाईल एवढी मोठी. ) पिशव्या ट्रेमध्ये ठेवल्या. यात रोजचा ओला कचरा जमा केला. दीड दोन किलो बसतो. भोकांमुळे पाणी राहात नाही. पिशवी भरली की वर थोडा मातीचा थर देऊन उलटी करून ठेवली व तोंड मातीने झाकले. ट्रेमध्ये अजून एक पिशवी राहाते यात मात्र माती भरून झाड लावले. या पिशवीला तळाला मोठी भोके ठेवली. एका ट्रेमध्ये एक झाड असलेली पिशवी आणि एक कचरा भरलेली उलटी पिशवी ठेवली. या पिशवीला पाणी द्यायचे नाही. झाडाच्या पिशवीत टाकलेले आणि वाहिलेले पाणी ट्रेमधल्या तळाच्या मातीतच राहाते. कचरा कुजत जाईल तशी झाडाची मुळे तिकडे वाढतात. कचरा न हलवल्याने वास येत नाही.

दुधाच्या पिशव्याही वापरू शकतो. सुबक मोठ्या कुंड्यांत झाड लावायचे असल्यास ते नेहमीप्रमाणे कुंडीतल्या मातीत मधोमध न लावता कडेला लावायचे. मधल्या मातीवर कचरा भरलेली पिशवी उलटी ठेवायची. प्लास्टिक पिशवीत वेल लावण्याअगोदर तळातून नायलोन दोऱ्या अगोदर बांधून त्या कडेने वर घ्यायच्या. दोरी कडेलाच घेवडा/ कारल्याचे एकेक बी टाकायचे. वेल उगवून दोरीवर चढू लागले की एक छोटी कचरा पिशवी मध्यभागी उलटी ठेवायची. वेलाचे बी उगवून दोन फुट वेल वाढल्यावरच कचरा द्यायचा आहे. बी टाकल्यावर लगेच नाही.

नर्सरीवाल्यांकडे काळ्या जाड प्लास्टिकच्या पिशव्या मिळतात. त्यांना भोके पाडलेली नसतात. ते बरेच आहे. त्यास बारीक भोके पाडून वापर केल्यास कचरा दिसणार नाही. कचऱ्याच्या पिशवीवर पाणी टाकून कचऱ्याला उगाचच भिजवायचे नाही. पंधरा दिवसांनी थोडेसे पाणी शिंपडायला हरकत नाही.

या प्रकारचा कचरा कुजवणे प्रयोग वेलवर्गीय भाज्या, गोकर्ण यासाठी उत्तम. पालेभाज्या आणि गुलाबासाठी नको.

फोटो पाहा.

फोटो १
भात आणि कचरा पिशवी.

फोटो २
कर्दळ रोपे आणि कचरा ट्रेमध्ये

फोटो ३
" width="80%"/>

फोटो ४
एक्सरे फिल्मचा ट्रे आणि वेलाची पिशवी.

फोटो ५
मनीप्लांटसाठी पाचफुटी आधार केरसुण्यांची प्लास्टिक हँडल्स जोडून केला आहे.

छान माहिती.
ट्रे मध्ये कचऱ्याची पिशवी किती दिवस ठेवायची?

वेलाचे बी उगवून दोन फुट वेल वाढल्यावरच कचरा द्यायचा आहे. बी टाकल्यावर लगेच नाही.
उशिरा का टाकायचा कचरा?

कंजूस

प्रथम बारीक भोके तळाला पाडलेली पिशवी त्या ट्रेत ठेवून दिवसभराचा कचरा टाकायचा. एक/दोन दिवसात पिशवी भरली की वर थोडी माती टाकून दाबून तिथेच उलटी करायची. गाडुळे टाकणार असाल तीही टाका पण कचरा फार न दाबता उलटी करा. प्रथम आठ दिवसांनी कचरा काळा पडतो. यानंतर तीन महिने कचरा कुजत जातो. शेवटी पिशवी पोकळ वाटू लागते. ही खूण आहे. बाजूच्या झाडाची मुळे तिथे घुसलेली असतात किंवा तिकडे खूप वाढलेली असतात. आता पिशवी काढून पाहिल्यास वास येत नाही व थोडी काळी माती किंवा न कुजणारे दोरे उरतात. आता पिशवी पुन्हा भरता येईल.

बियाणे रुजत असताना तिथे कुजके पदार्थ असल्यास कोवळे मूळ कुजते. पण रोप थोडे मोठे झाल्यावर खाली खूप पांढरी मुळे असतात ती सक्षम असतात. झाड मरत नाही.

प्रचेतस

उत्तम लेख.
मात्र फायरफॉक्स मध्ये माझा गणेशा झालाय. क्रोममध्ये मात्र फोटो दिसतात.

कंजूस

फायरफॉक्स मध्ये फोटो दिसत नाहीत.

अरर. फेसबुकतले टाकले आणि ओफिस साईटला ते ब्यान आहे विसरलो. करतो रिपेर.

कंजूस

फायरफॉक्स नव्हे, फेसबुक ब्लॉक असेल. त्यातले होते.
आता गूगल फोटोचे बदलले.

प्रचेतस

आता दिसताहेत.

बाकी फेसबुक ब्लॉक नाही ऑफिसात आणि शिवाय तिकडे हे ब्लॉक करणे, अनब्लॉक करणे हे माझ्याच हातात आहे :)

कंजूस

अय्योय्यो. तुमी तिकडचे काकाच की!

जेडी

नक्की करुन पाहते , हा प्रयोग.

डॉ श्रीहास

हे खत तयार करतांना त्यात अधेमधे थोडंस दह्याचं पाणी घातलंत तर खत तयार होण्याची क्रिया जलद होते... आयडीया युट्यूबवरची असली तरी स्वानुभव देखील हेच सांगतो :))

कंजूस

दह्याचं पाणी घालणे.

हे माहीत नाही. माझ्या या छोट्या पिशव्यांत पाणी घालणे टाळले आहे. अगोदरच्याच ओलेपणावर कुजू दिले. भिजवले की थपथपीत होऊन वास येतो. एकदा पिशवी उलटी केली की तिकडे पाहायचेच नाही.

कंजूस

१) वास न येणे ( कचरा न हलवल्याने),
२) खटाटोप कमी, खत तयार झाल्यावर ते मोठ्या ड्रममधून काढणे आणि कुंड्यात घालणे वगैरे.
३) टाकून देण्याच्या वसतूंचा वापर.
याकडे लक्ष दिले.

चौकटराजा

मी माझ्या बाल्कनीत हे करायला तयार आहे पण मी असे म्हणतो की कडक ओला कचरा घ्यायचा नाही. उदा. शेंगाची टरफले ! यावर तुमचे म्हणणे काय आहे ? दुसरे असे की फुलझाडाना खत लागतेच लागते पण मनीप्लान्ट सारख्या झाडाना ते फारसे लागत नाही हे खरे आहे का ? तिसरा प्रश्न नर्सरीवाला म्हणाला दोन तास तरी फुलझाड हे उन्हात हवेच त्या बद्दल तुमचे काय निरिक्शण आहे. चौथा प्रश्न काही झाडाना फुले ठराविक मोसमातच येतात काहीना बाराही महिने असे आहे ना ?

कंजूस

@चौकटराजा,

>>मी माझ्या बाल्कनीत हे करायला तयार आहे पण मी असे म्हणतो की कडक ओला कचरा घ्यायचा नाही. उदा. शेंगाची टरफले ! यावर तुमचे म्हणणे काय आहे ?>>
~ घेवडा, मटार, यांची साले कुजतात आणि थोडे दोरे राहतात. शेंगाची टरफले लाकूड/सेल्युलोज असते ते कुजत नाही पण माती मोकळी ठेवेल. म्हणजे ती कुंडीच्या तळाशी घालण्यास उपयोगी.
--------
>> दुसरे असे की फुलझाडांना खत लागतेच लागते पण मनीप्लान्ट सारख्या झाडांना ते फारसे लागत नाही हे खरे आहे का ?>>

मनीप्लान्टला चांगले चाळलेले आणि अगोदर पूर्ण कुजलेले खत घातले तर पाने रसरशीत टवटवीत होतात. पण माती भूसभुशीत मोकळी लागते, गारवा लागतो. पाणी राहिलेली थपथपीत नको. बांबूची टोपली वापरा.
फुलझाडांना ती कोणती आहेत यावर अवलंबून आहे. खतामुळे अधिक फुले अधिक काळ येतात. खत घालणार नसाल तर बुंध्यापासून दोन फुट माती उकरून ठेवगयची, झाडांमध्ये अंतर ठेवायचे. मुळे आडवी पसरली पाहिजेत. हे बाल्कनीत करण्यासाठी पसरट कुंडी लागेल. खोल नको.

थंडीत येणारी इंग्लिश फुले - कुजलेले चाळलेले खत अगोदरच मिसळून.
चमेली, जाई, जुई, - फक्त आणि फक्त नवी कोरी उन खाल्लेली डोंगरातील माती मुळाशी टाकणे. जानेवारीत.

मोगरा, मदनबाण - चांगले शेणखत जानेवारीत.

कुंद - १५ ओगस्टनंतर माती देणे.

>> तिसरा प्रश्न नर्सरीवाला म्हणाला दोन तास तरी फुलझाड हे उन्हात हवेच त्या बद्दल तुमचे काय निरिक्शण आहे.>>>
- होय हवेच.
गुलाब ,ओफिस टाइम, चाइनिज गुलाब - दहा तास ऊन हवे.
सदाफुली, अबोली - चार तास ऊन अधिक चांगला उजेड.

>> चौथा प्रश्न काही झाडाना फुले ठराविक मोसमातच येतात काहीना बाराही महिने असे आहे ना ? >>>

हो. विशेषत: शेवंती,जाई,जुई, चमेली, मोगरा, कुंद. जेव्हा फुले नसतात तेव्हा झाड मुळे पसरवते, पाने वाढवते, अन्न साठवते.

बाल्कनीत झाडाच्या कुंड्या ट्रेमध्येच ठेवल्या पाहिजेत. पाणी वाहता कामा नये. खत घातलेले पाणीही वाहून वाया जाते.

चौकटराजा

गुरुदेव धन्यवाद ! मात्र बाराही महिने उत्तम उन्ह म्हणजे बाल्कनी उपयोगाची नाही त्यासाठी गच्ची हवी म्हणजे बंगला हवा त्यासाठी पुढचा जन्म हवा,अन आपला तर पुनर्जन्मावर विश्वास नाही. शेवटची ट्रे ची सूचना पटली पण पाणी रोजच्या रोज तेच पाणी वर रोपाला घालायला हवे ना ? नाहीतर डास ,,,,,,

कंजूस

नाही तसं नाही. फक्त सकाळी किंवा दुपारनंतर ऊन मिळाले तरी झाडे उत्तम वाढतात.

ट्रेमध्ये खाली माती चा एक इंच थर द्यायचा आहे तो जास्तीचे पाणी धरून ठेवतो पण डास होऊ शकत नाहीत. उघडे पाणी नसते. खाली जमलेले पाणी झाड दोन तासांत काढून घेते.
पाणी घालतांना ट्रेमध्येच टाकत जायचे ते लगेच वर चढते, खालीण राहिले की थांबवायचे. काम सोप्पे आहे.

मनी प्लान्ट कशाला लावलाय घरात ?

मनी प्लांट विषारी असतो , र्थात तो कोणाकडुन खल्ला जाण्याची शक्यता शुन्य पण तरीही कशाला उगाच रिस्क घ्या !

The leaves of money plant contains raphides of calcium oxalate which causes oral irritation, vomiting and difficulty in swallowing if it is consumed.

कंजूस

मनी प्लान्टला चांगला पर्याय आहे. विड्याची पानवेल. ( नागवेल). थोड्या उजेडावर वाढते. सहसा रोग पडत नाही. खत लागत नाही.

पिंगू

मी पिशवीएवजी बाटली कापून ती कुंडीमध्ये मातीत रोवली आणि कचरा त्यात टाकला आहे.

रातराणी

मस्त माहिती! प्रयोग करुन पाहण्यात येइल.