Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

माधव रिसबूड : एक कठोर फलज्योतिष चिकित्सक

प
प्रकाश घाटपांडे
गुरुवार, 09/10/2020 - 05:54
💬 352 प्रतिसाद
प्रस्तावना - काही दिवसांपुर्वी अंनिस वार्तापत्राच्या वेबसाईटचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला अन माधव रिसबूडांची तीव्रतेने आठवण झाली. माधव रिसबूड 2003 मधे निवर्तले. त्यांच्यावर कै. माधव रिसबूड: एक कठोर फलज्योतिष चिकित्सक असा लेख अंनिस वार्तापत्र दिवाळी अंकासाठी त्यावेळी लिहिला होता. अंनिस वार्तापत्रात रिसबूडांनी फलज्योतिषचिकित्सेवर अनेक लेख लिहिले होते. अंनिसची अनेक ठिकाणी वकीली केली होती. त्यावेळी गाजलेल्या नाडीग्रंथ प्रकरणात तर ते अगदी हिरिरीने लेख लिहित. अशा अंनिसच्या हितचिंतक असलेल्या या कठोर फलज्योतिष चिकित्सकावर लिहिलेला लेख अंनिस वार्तापत्राच्या त्यावेळच्या संपादक मंडळाने नाकारला. असे समजले की त्यात व्यक्तिमहात्म्य प्रतिबिंबित होत होते म्हणून नाकारला गेला. नंतर मी तो लेख मनोगत या जालीय दिवाळी अंकात प्रसिद्ध केला. तसेच तो माझ्या ब्लॉगवर ही आहे. शिवाय तो अन्य संकेतस्थळांवर पण टाकला आहे. मिपावर मात्र टाकायचा राहिला असे लक्षात आल्याने तो आत्ता टाकतो आहे. अनेकांनी तो लेख आवडल्याचे आवर्जून कळवले होते. अंनिस वार्तापत्रात नंतर व्यक्तिमहात्म्य प्रतिबिंबित होणारे असंख्य लेख येउन गेले. असो. कदाचित त्यामुळेच त्यानंतर रिसबूडांविषयी असलेला आदर अनेक ठिकाणी व्यक्त करण्याची संधी मी सोडली नाही. 2005 मधे मला वार्तापत्र लेखक पुरस्कार मिळाला. तो घ्यायला आयुष्यात एकदाच सांगलीला गेलो होतो. तेव्हा एक त्यांची आठवण झाली कारण त्या पुरस्काराचे खर्‍या अर्थाने असलेले मानकरी हे माधव रिसबुड हेच आहेत. त्यांची आठवण येत नाही असा दिवस जात नाही. माधव रिसबूड : एक कठोर फलज्योतिष चिकित्सक माझ्या महंमद रफिक शेख मेहबूब पटेल अशा लांबलचक नावाच्या बिनतारी मित्राला पुण्यातल्या अप्पा बळवंत चौकात फिरताना एक छोटं पुस्तक रसिक साहित्य या दुकानातल्या शोकेसवर लावलेले दिसले. त्यानं ते पुस्तक घेतलं आणि मला मुंबईला बिनतारी यंत्रणेवर कळवले की," अरे पका, ज्योतिषावर एक तुझ्या विचारांच एक पुस्तक मला मिळाले आहे. त्याच नांव आहे 'फलज्योतिष विद्येवर शोधकिरण'. किंमत तीन रुपये. पुण्यात आल्यावर मी ते पुस्तक विकत घेतलं. झपाटल्यासारखं वाचून काढलं. परदेशात एखादा जवळचा मित्र अचानक भेटावा तसा आनंद मला झाला. पुस्तकावर लेखकाचा पत्ता नव्हता. मग मी मुद्रकाच्या पत्त्यावर गेलो. त्यांना रिसबुडांचा पत्ता विचारला. त्यांनाही तो माहीत नव्हता. पण त्यांनी मला ज्यांनी छापायला दिलं त्यांचा अपुरा पत्ता दिला. त्या लोकमान्य नगर मधल्या अपुऱ्या पत्त्यावर काही उत्साही रहिवाशांच्या मदतीने पोहोचलो. तेथून मला रिसबूडांचा पत्ता मिळाला. लगेचच मी रिसबुडांचा घरी दाखल झालो. बेल वाजवली, एका निवृत्त गृहस्थाने स्वागत केले," मीच माधव रिसबूड." त्या नंतर जे ऋणानुबंध निर्माण झाले त्यातून मला एक ज्योतिष प्रवासात जोडीदार मिळाला. डिव्हिजनल फॉरेस्ट ऑफिसर म्हणून निवृत्त होऊन नुकतेच पुण्यात ते स्थायिक झाले होते. मी नुकताच नोकरीला लागून मुंबईला बदलून गेलो होतो आणि ते पुण्यात आले होते. श्रावणी ते चंपाषष्ठी असे पंचगव्य खाऊन, जानवं बदलत सोवळ्याची अर्धी चड्डी घालून कर्मकांड करीत गेलेले माझे खेड्यातील बालपण आणि त्यांचं त्याच प्रकारचं शहरातील बालपण हे समकालीन वाटावं इतकं साधर्म्य त्यात होते. निवृत्त झाल्यावर त्यांनी फलज्योतिष हा विषय आपल्या पोतडीतून बाहेर काढला. आमची या विषयावर देवाण घेवाण होत राहिली. व्यक्तिगत आयुष्यात नोकरीच्या निमित्ताने अनेक ठिकाणी फिरत, अनेक कौटुंबिक दुःखाचे आघात सहन करीत खचून न जाता विवेकाच्या आधारे त्यावर मात करीत त्यांचा आयुष्याचा प्रवास झाला. आपल्या आयुष्यातील दुःखद घटनांचा उपयोग सुद्धा त्यांनी फलज्योतिषचिकित्सेसाठी केला.त्यांचे आयुष्य विलक्षण घटनांनी भरलेले होते. मी नकळत त्यांचा कुटुंबातील एक सदस्य बनलो.ज्योतिषाबरोबरच इतरही विषयावरील त्यांच्या गप्पा मला स्वातंत्र्यपूर्व काळात घेऊन जात. इतक्या की मी त्यांच्या मंतरलेल्या दिवसांचा,बालपणीच्या घटनांचा, गोड गुपितांचा न कळत साक्षीदार बनत असे. एक दिवस त्यांनी पुण्यात अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या स्थापनेविषयी माहिती दिली आणि तेथे जाण्यास सुचविले होते. त्यानंतर माझी बदली पुण्यात झाल्यावर मी अंनिसच्या मीटिंगला दाखल झालो.मी पुण्यात आल्यावर रिसबुडांचा उत्साह वृद्धिंगत झाला. लोकांना फलज्योतिष हा विषय आपण समजावून दिला तर त्या विषयाचा भ्रामकपणा लोकांच्या लक्षात येईल या कल्पनेने त्यांनी 'सहज समजेल फलज्योतिष काय आहे व काय नाही?" हे पुस्तक लिहायला घेतले. "राष्ट्रपती स्वतःचे शपथग्रहण योग्य मुहूर्तावर होईल याची काळजी घेतात. इस्त्रोच्या अग्निबाण प्रक्षेपणात अनेक वेळा अपयश येण्याचे कारण म्हणजे त्यांनी अशुभवेळी प्रक्षेपण केले असे बंगलोरच्या ज्योतिषाने दावा केला होता. डॉ. बी. एन. पुरंदरे यांनी "शस्त्रक्रियेचे वेळी रुग्णाची कुंडली पाहिली पाहिजे," असे म्हटले होते. १९४७ साली युनियन जॅक खाली उतरवला व तिरंगा वर चढवला ती वेळ अशुभ होती त्या चुकीचे फळ आज आपण भोगतो आहोत. हेच जर शुभ मुहूर्तावर झाले असते तर आज आपण जपान जर्मनीच्याही पुढे गेलो असतो," अशा रंगतदार चर्चा ज्योतिष वर्तुळात होत. उच्च माध्यमिक शिक्षणात फलज्योतिष विषयाचा समावेश अवश्य करावा, ही बाब राज्य शिक्षण मंडळाच्या एका आयोगाने उचलून धरली होती. त्यातच 'गोकेलीन'च्या संशोधनामुळे फलज्योतिषाला वैज्ञानिक आधार आहे, असा समज फोफावू लागला होता. अशा या सर्व पार्श्वभूमीवर लोकांना फलज्योतिष या विषयाचे अंतरंग समजावून सांगितले पाहिजे, असे त्यांना वाटे. या विषयावरील वेगवेगळ्या संकल्पनांचा समाचार घेताना तसेच ज्योतिष समर्थकांच्या पत्रद्वंद्वात ते प्रहसन व कठोर शब्द वापरत, तसेच शालजोडीतून फटकवण्याची कला त्यांना अवगत होती. इतकी की कॉलेजकट्ट्यावरील तरुणाला लाजवेल इतक्या सूचकतेने ते शब्द वापरीत. ग्रह कारक नसून सूचक आहेत, ते फक्त संकेत देण्याचे काम करतात ही संकल्पना ज्योतिषात मांडली जाते. त्या विषयी ते म्हणतात," कोणी एक श्रीमान रूपगर्विता पुरंध्री आपल्यावर अनुरक्त झाली आहे, असा भ्रम झालेल्या भणंग खरबुजाने तिच्या प्रत्येक कटाक्षातून आणि कृतीतून आपल्याला हवा तसा अर्थ काढत बसावे, तसाच प्रकार नियतीचे संकेत हुडकणाऱ्यांच्या बाबतीत आहे." फलज्योतिषातील गृहीतके वादापुरती का होईना मान्य करून मगच त्याचा प्रतिवाद करण्यावर त्यांचा भर होता. चिकित्सेसाठी बुद्धिवादी लोकांनी फलज्योतिषाचा अभ्यास करावा असे ते म्हणत. अंनिस वार्तापत्रात व इतर नियतकालिकांत त्यांनी वेळोवेळी फलज्योतिषावर टीका करणारे लेख लिहिले.'थोतांड आहे म्हणता, पण का, ते एकदा सांगाल का? ' अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र च्या सप्टेंबर १९९३ च्या अंकातील लेखात त्यांनी उथळ टीका करणाऱ्यांमुळे ज्योतिषाचे कसे फावते हे देखील सांगितले आहे. बुद्धिवादाचा तरी एक कर्मठ पंथ होऊ नये असे ते सांगत. माणसाचा स्वभाव असा आहे की एकदा एखाद्या पंथात सामील झाला की त्याच्या नकळत त्याची बुद्धी त्या पंथाच्या अधिकृत विचारसरणीला झापडबंद पद्धतीने बांधली जाते. मग तो दुसऱ्या तऱ्हेच्या प्रतिपादनाचा अलिप्तपणे विचार करु शकत नाही.'विश्वाचा गाडा आपोआप चालला आहे, त्याच्या मागे कसलीही जाणीवयुक्त प्रेरणा नाही' आणि 'स्मृतीचे अधिष्ठान फक्त मेंदूतच आहे, अन्यत्र स्मृती असू शकत नाही,' ही बुद्धिवाद्यांची विधाने त्यांना संपूर्णपणे पटत नसत. त्या साठी ते तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या 'जडवाद'चा आधार घेत. 'सहज समजेल फलज्योतिष काय आहे व काय नाही?' या त्यांच्या १९९१ सालच्या पुस्तकात त्यांनी वरील प्रकारचे विचार मांडले आहेत. पुढील काळात डॉली मेंढी च्या क्लोनिंगने विज्ञानजगतात खळबळ माजून दिली. स्मृती आणि जाणीव याचे नवे अर्थ वैज्ञानिकांना क्लोनिंग आणि डीएनए च्या संशोधनातून मिळू लागले. फलज्योतिषाच्या विरोधात त्यांनी अनेक इंग्रजी व मराठी नियतकालिकात लेखन केले. त्यातूनच अनेक ज्योतिषांशी त्यांचे पत्रव्यवहारातून वादविवाद झाले. खंडनमंडनाचा तो एक उत्कृष्ट नमुना होता. त्यांचे घर हे आमचे अभ्यासकेंद्रच बनले होते आलेल्या प्रत्येक पत्रावर आमची चर्चा होत असे. चर्चा झाल्यावर त्यातील महत्वाचे मुद्दे ते नंतर लिहून काढीत असत. पत्रव्यवहारातील सातत्य व गतिमानता हे त्यांचे वैशिष्ट्य होते. आमचे पत्रव्यवहार कधी संयुक्त तर कधी स्वतंत्र्यरीत्या होत असत. त्यामुळे ज्योतिष समर्थकांचा कधी कधी गोंधळ उडत असे. त्यावर उपाय म्हणून ते प्रति माधव रिसबूड / प्रकाश घाटपांडे अशी पत्रे पाठवीत. पुढे संगणक लोकप्रिय होऊ लागल्यावर मी त्यांना संगणक घेण्याचा आग्रह केला. त्यांनी तो मान्य केला. संगणक त्यांनी झटकन आत्मसात केला. त्यांना मी देवनागरी फाँट लोड करुन दिले. की बोर्ड तर त्यांचा इतक्या झटकन पाठ झाला की स्टिकर वा की बोर्ड आराखड्याची त्यांना गरजच नसे. पुढील लेखन संगणकामुळे त्यांच्या व माझ्या सोयी साठी खूपच सुलभ झाले. नंतर इंटरनेटद्वारे तर माहितीचे मायाजालच हाताशी आले. परदेशी फलज्योतिषचिकित्सकांशी संपर्क त्यामुळे सुलभ झाला. प्रो.इव्हाव केली हे अमेरिकेतील "कमिटी फॉर द सायंटिफिक इन्हेस्टिगेशन ऑफ क्लेम्स ऑफ पॅरानॉर्मल"च्या फलज्योतिष उपसमितीचे चेअरमन आहेत. अनेक टीकात्मक पुस्तकांचे लेखन त्यांनी केले आहे. विशेषतः चंद्राचा मनावरील परिणाम या विषयावर त्यांचा अभ्यास आहे. ते कॅनडातील सस्काटून येथील सस्कॉचिऑन विद्यापीठात शैक्षणिक मानसशास्र विषयाचे प्राध्यापक आहेत. त्यांनी "कन्सेप्ट ऑफ मॉडर्न ऍस्ट्रॉलजी- ए क्रिटीक" हा "सायकलॉजिकल रिपोर्टस १९९७" मध्ये प्रकाशित केलेला शोध निबंध महत्त्वाचा ठरला आहे त्यांचेशी ई-मेल वरुन लेख व माहितीची देवाणघेवाण होत असे. भारतीय ज्योतिषाच्या संकल्पना व त्याचा समर्थपणे केलेला प्रतिवाद हा केली यांना आवडला. रुडॉल्फ एच. स्मिट "प्रा. एच. जे. आयसेंक फलज्योतिष संशोधन कमिटी"चे सचिव आहेत. "ऍस्ट्रॉलजी अंडर स्क्रुटिनी'चे संपादक, १९९२ ते १९९९ या काळातील "कोरिलेशन' या फलज्योतिषावरील संशोधन करणाऱ्या पत्रिकेचे संपादक होते. नेदरलँडमधील प्रमुख वैज्ञानिक संशोधन केंद्रात संपादक व भाषांतरकार म्हणून त्यांनी काम केले. त्यांना लिहिलेल्या पत्रात रिसबूड म्हणतात, की संख्याशास्रीय चाचण्यांनी फार तर फलज्योतिष हे विश्वासार्ह नाही, हे सिद्ध होईल. पण त्यामुळे ते खोटे शास्त्र आहे हे सिद्ध होत नाही. त्यासाठी मुळावर हल्ला करणे व त्यातील विसंगती दाखवणे गरजेचे आहे. जेफ्री डीन हे पश्चिम ऑस्ट्रेलियातील पर्थ या ठिकाणी मुक्त तांत्रिक लेखक व सल्लागार तसेच संपादक आहेत. ते माजी ज्योतिषी व चिकित्सक ज्योतिष संशोधक आहेत. त्यांचेशी मात्र रिसबुडांचे फारसे जमले नाही. 'सहज समजेल फलज्योतिष काय आहे व काय नाही?' पुस्तक हे लोकांना सहज समजत नाही असे लक्षात आल्यावर त्यांना कधी कधी नैराश्य येत असे.पण ते फार काळ टिकत नसे. तसेच शास्त्रज्ञांनी सुद्धा उथळ टीका केल्यामुळे त्याचा परिणाम नेमका उलटा होई त्यामुळे ते व्यथित होत असत. अनेक बड्या बड्या लोकांनी घेतलेले आक्षेपांचे खंडन ज्योतिषी लोक मोठ्या चतुराईने करत. फलज्योतिषात काहीतरी तथ्य असले पाहिजे, या समजुतीमुळे मुलामुलींची लग्ने जुळवताना पत्रिका पहाण्याचा आग्रह धरला जातो. कित्येक वेळा चांगली अनुरुप स्थळे केवळ पत्रिका जुळत नाही या कारणासाठी नाकारली जातात. मुलीला मंगळ आहे म्हटल्यावर तर तिचे हाल बघायलाच नको. अशा मुलींना आणि त्यांच्या पालकांना जो मनस्ताप केवळ एका निरर्थक श्रद्धेच्या पायी लोक सोसत आहेत, हे पाहून त्यांचे मन अस्वस्थ होई. दुसरी गोष्ट म्हणजे ग्रहपीडा निवारण्यासाठी दैवी उपाय केले जातात, त्यापायी हजारो रुपयांचा चुराडा होतो. भृगुसंहिता, नाडीभविष्य यासारख्या तद्दन बनवाबनवीच्या प्रकारावर आंधळा विश्वास ठेवून आपल्या पैशाची व वेळेची नासाडी करतात. त्यामुळे ज्योतिषी लोकांचे खिसे मात्र गरम होतात. हा सगळा वेडेपणा आहे हे लोकांना कसे आणि कुणी सांगायचे? हा प्रश्न त्यांना वारंवार पडे. यासाठी मूलभूत थिअरीवर असा आक्षेप घेतला पाहिजे की ज्याचे खंडन ज्योतिषांना करता येणे अवघड ठरेल. त्यातूनच पुढे 'फलज्योतिष शास्त्र म्हणजे केवळ स्वैर ठोकताळ्याचे भारुड' असे पुस्तक जुलै १९९७ मध्ये लिहिले. नाडी भविष्य आणि रिसबूड त्या काळात नाडी भविष्याचा ढोंगाचा प्रचार कर्नाटकातले एक प्राचार्य आणि वायुदलातील एक अधिकारी मोठ्या हिरिरीने आणि धूमधडाक्याने करीत होते. चेन्नईच्या आसपास कूटलिपीच्या बुरख्याखाली नाडीभविष्याचा धंदा जोरात चालत असतो. आतातर तो पुण्यातही पसरला आहे.परिहार विधीच्या नावाखाली हजारो रुपये भोळ्याभाबड्या लोकांच्याकडून उकळण्यात येतात. या धंद्याचा पर्दाफाश अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केला होता. अंनिसच्या बाजूने रिसबुडांनी नाडी ज्योतिषाचा भंडाफोड केला होता. या नाडी पट्ट्या हजारो वर्षांपूर्वी तयार झाल्या की फक्त दोन चारशे वर्षांपूर्वी तयार झाल्या हा मुद्दा आमच्या मते गौण आहे. त्यात लिहिलेले भूत-भविष्य अचूक ठरते किंवा नाही हा प्रश्नही प्रस्तुत चर्चेत गौण आहे. ही नाडी भाकिते अंतर्ज्ञानी महर्षींनी लिहून ठेवली आहेत म्हणून त्यांना आगळेवेगळे महत्त्व आहे असे म्हणणाऱ्यालोकांना आम्ही एक साधा प्रश्न विचारतो.' ज्या महर्षींना सर्व भविष्यकाल जाणता येत होता त्यांना भाकिते वर्तवण्यासाठी कुंडलीच्या कुबड्यांची गरजच काय होती? गंमत म्हणजे, त्या कुंडल्या बनवण्यासाठी आवश्यक असा सर्व तपशील त्यांना अंतर्ज्ञानाच्या साहाय्याने जाणावा लागत होता! प्रत्येक व्यक्तीची जन्मवेळ, जन्मठिकाणाचे अक्षांश रेखांश, आणि जन्मवेळेला असलेली ग्रहस्थिती इतकी सर्व माहिती अंतर्ज्ञानाने मिळवायची आणि कुंडली बनवायची ती कशा करता तर भाकिते वर्तवण्याकरिता! हे म्हणजे मॅरथॉनमध्ये धावणाऱ्याने बगलेत कुबडी घेऊन धावण्यासारखे आहे. त्या अंतर्ज्ञानी महर्षींनी असा वेडेपणा केला असेल का याचे उत्तर वाचकांनी द्यावे. ते उत्तर दिल्यास नाडीवाले स्वामी स्वतःच कुंडल्या बनवतात हे त्यांच्या ध्यानात येईल तमिळ कूटलिपीचा अडसर नसता तर हे सहज सिद्ध करता आले असते, पण ते शक्य नाही म्हणून तर आम्हाला तर्कबुद्धीचा आधार घ्यावा लागतो आहे. केवळ तर्कबुद्धीच्या आधारे नाडी भविष्य खोडून काढता येते. अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या एप्रिल १९९९ च्या अंकातील ' विंग कमांडराचा बहुरंगी बहुढंगी वग' या माझ्या लेखाचे शिल्पकार तेच आहेत. आमच्या होणाऱ्या चर्चांचे शब्दांकन नोंद करण्याची त्यांच्या सवयी मुळेच नाडी ग्रंथाचे एवढे संकलन होऊ शकले. माझ्या बोलण्याचा व त्यांचा लिहिण्याचा झपाटा या संयुक्त कृतीतून परस्परांचा उत्साह वृद्धिंगत होत असे. फलज्योतिषाची लोकप्रियता कशामुळे? फलज्योतिषाबाबत परंपराभिमानी सुशिक्षित वर्गात विशेष आदर दिसून येतो. या शास्त्रात काहीतरी गूढ तथ्य असलेच पाहिजे, त्यामुळेच भाकिते खरी ठरतात अशी त्यांची श्रद्धा असते. त्यांना एक वेडी आशा वाटत असते की कुणी तरी खोल संशोधन करून ते तथ्य कधी ना कधी तरी शोधून काढतीलच. त्यांच्या पूर्वजांच्या दैवी ज्ञानापुढे आजचे विज्ञान क्षुद्र आहे अशी त्यांची समजूत असते, म्हणून या शास्त्रावर टीका करणारे लोक पाश्चात्यांच्या नादाने त्यांच्या थोर पूर्वजांची टवाळी करतात असे म्हटल्यावर मग टीकाकारांच्या टीकेला वेगळे उत्तर देण्याची गरज वाटत नाही. त्यांना स्वतःला जरी या शास्त्रातले कळत नसले तरी त्याचा गौरव करण्यात मात्र ते पुढे असतात. सामान्य लोकांनाही तेच आवडते. आपल्या पूर्वजांत काही लुच्चे किंवा पोटार्थी ज्योतिर्विदही होऊन गेले असण्याची कल्पना त्यांना सहन होत नाही. दुसरे एक चमत्कारिक कारण म्हणजे, अनेक शास्त्रज्ञांची या विषयावरील गुळमुळीत भूमिका. ते असे म्हणतात की फलज्योतिषाचा खरेखोटेपणा फक्त सांख्यिकी संशोधनाच्या मार्गानेच ठरला तर ठरेल, फर्मान काढून तो ठरणार नाही. १९७५ साली १८६ नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञांनी या शास्त्राचा खोल अभ्यास न करता एक ज्योतिष विरोधी पत्रक प्रसिद्ध करून आपले हसे करून घेतले होते. म्हणूनच आता ते स्पष्ट बोलायला बिचकतात. वास्तविक पाहता फलज्योतिषाचा विज्ञानाशी काही एक संबंध नाही, ते थोतांड आहे, असे त्यांना वाटत असले तरी आपले मत ठामपणे ते कधी मांडणार नाहीत.फलज्योतिषावर सांख्यिकी संशोधन करून वादरहित निष्कर्ष कधीकाळी निघतील, ही त्यांची आशा व्यर्थ आहे. इतकेच सांगतो की संगणक युग येऊन पाव शतक उलटल्यावरही अद्याप निर्णायक निष्कर्ष काढता आलेले नाहीत. शास्त्रज्ञांच्या या गुळमुळीत भूमिकेमुळे फलज्योतिष विरोधाची धार बोथट होते. या शास्त्रावर बालिश आणि गैर लागू आक्षेप घेऊन कित्येक बुद्धिवादी लोक आपले अज्ञान प्रकट करून ज्योतिषांचीच बाजू बळकट करतात! सुशिक्षितांच्या बौद्धिक आळशीपणामुळे आणि उदासीनपणामुळे ज्योतिष-विरोधी प्रचाराला म्हणावा तसा वेग येत नाही. फलज्योतिष एक श्रद्धा चर्चेच्या सोयीसाठी आपण फलज्योतिष या श्रद्धेची दोन अंगे किंवा दोन भाग पाडू. पहिला भाग असा आहे: ' ईश्वराने किंवा निसर्गाने म्हणा, ज्याप्रमाणे प्रत्येक वस्तुमात्राला काही ना काही गुणधर्म दिलेले आहेत,त्याच प्रमाणे ग्रहांना गुणधर्म दिलेले आहेत. त्या गुणधर्मापैकी काही गुणधर्म भौतिक स्वरूपाचे आहेत तर काही गुणधर्म गूढ, दैवी म्हणजे ज्योतिषीय स्वरूपाचे आहेत. या गुणधर्माचे प्रभाव गूढ लहरीच्या स्वरूपात मनुष्यावर पडतात व त्याचे नशीब घडवतात.' फलज्योतिषाचे प्रवक्ते या श्रद्धेचे समर्थन अगदी उघडपणे करतात. सर्वसामान्य सुशिक्षित लोकांना सुद्धा असे वाटते या श्रद्धेत अवैज्ञानिक असे काय आहे? आज जरी शास्त्रज्ञांना हे या गूढ प्रभावलहरींचे स्वरूप ठाऊक नसले तरी उद्या ते समजणार नाही कशावरून? आजच्या विज्ञानाला तरी विश्वातील सगळी कोडी कुठे उलगडली आहेत? जर फलज्योतिष या एवढ्याच श्रद्धेवर आधारलेले असेल तर त्याला थोतांड म्हणण्याचे काही कारण दिसत नाही.ज्योतिष प्रवक्तेही लोकांना असे भासवतात की एवढ्याच एका श्रद्धेवर आधारावर त्यांचे सर्व शास्त्र उभे आहे. पण वस्तुस्थिती तशी नाही. बुद्धिवादी लोकांना ही श्रद्धा जरी भ्रामक वाटत असली तरी तिचा भ्रामकपणा सर्वसामान्य लोकांना पटवून देणे कठीण आहे कारण त्यांना गूढ तत्त्वावर श्रद्धा ठेवणे मनापासून आवडते. ज्योतिष प्रवक्तेही लोकांना सांगतात की आज ना उद्या या श्रद्धेला वैज्ञानिक प्रतिष्ठा मिळेल यात संशय नाही. पाश्चात्य देशात या विषयावर मोठ्या प्रमाणात संशोधन चालू आहे आणि फलज्योतिषाला पुष्टी देणारे पुरावे त्यातून बाहेर येतील याची त्यांना खात्री वाटते. अशा युक्तिवादांवर काय बोलायचे? श्रद्धेचा दुसरा भाग श्रद्धेचा जो दुसरा भाग आहे तो असा आहे: - ग्रहांना माणसासारखी बुद्धी व जाणीव असते,त्यांना अनेक डोळे व अनेक दृष्ट्या असतात,त्यांना दूर अंतरावर त्यांच्या इच्छेप्रमाणे परिणाम घडवून आणण्याचे सामर्थ्य असते, म्हणजे रिमोट कंट्रोल असतो? इतकेच नव्हे तर त्यांना फलज्योतिषाचे नियम सुद्धा माहीत असतात! श्रद्धेचा हा भाग सामान्य लोकांना फारसा परिचित नसतो ही अजब श्रद्धा खरी तर अंधश्रद्धाच कुठल्याही संशोधनातून सिद्ध होणे अशक्य आहे ही गोष्ट ज्योतिषप्रवक्ते जाणून असतात. त्यांना हे ही ठाऊक असते की ही श्रद्धा गृहीत धरल्या वाचून त्यांच्या शास्त्राचे सिद्धांत उभेच राहू शकत नाहीत. मात्र सर्वसामान्य लोकांना हे गुपित माहीत नसते. ज्योतिषप्रवक्त्यांची बनवाबनवी जी असते ती ही की, आपले बिंग उघडे पडू नये म्हणून त्यांच्या शास्त्रातल्या सिद्धान्तांची चर्चा ते जाहीरपणे कधीच करीत नाहीत, उलट तशी चर्चा करण्याचे ते टाळतात. पण बतावणी मात्र अशी करतात की टीकाकारांना या शास्त्रातले काही कळत नसल्यामुळे त्यांच्याशी चर्चा करण्याची ज्योतिष बुजुर्गांची इच्छा नाही! टीकाकारांच्या साधार टीकेमुळे या शास्त्राच्या प्रतिष्ठेची लक्तरे लोंबू लागली तरी या बुजुर्गाचा पोकळ डौल काही कमी व्हायचा नाही! श्रद्धेचा हा दुसरा भाग म्हणजे ठार अंधश्रद्धा आहे आणि तिच्यावरच तर या शास्त्रातल्या सिद्धान्तांची सगळी भिस्त आहे हे सत्य आजवर कोणी चव्हाट्यावर आणलेच नव्हते त्यामुळे या शास्त्राचा बडेजाव चालू राहिला. पाश्चात्य संशोधनाविषयी रिसबुडांची भूमिका अनेक पाश्चात्य स्केप्टिक लोकांचा दृष्टिकोन आपल्यापेक्षा वेगळा आहे. ते म्हणतात की फलज्योतिष खोटे असेलही पण त्याची प्रत्यंतरे येतात हे सत्य आहे. त्याची नॉन-ऍस्ट्रॉलॉजिकल कारणे देता आली पाहिजेत असा त्यांचा आग्रह आहे. तसेच ज्योतिषी सांगतात तेवढ्या प्रमाणात प्रत्यंतरे येत नाही. फार थोड्या प्रमाणात येतात, एवढेच त्यांना त्यांच्या संशोधनातून सिद्ध करायचे आहे. डेनिस एल्वेल या ब्रिटिश ज्योतिषाचे म्हणणे असे की त्यांचे संशोधनाच चुकीच्या पद्धतीचे आहे. त्या संशोधनामुळे फार तर ज्योतिषाची परीक्षा होते, शास्त्राची परीक्षा होत नाही आपले ज्योतिषी तेच म्हणतात. फलज्योतिष खोटे आहे हे सांगण्याची निकड स्केप्टिक लोकांना वाटत नाही. किंवा तसे सांगण्याचा धीटपणा त्यांच्याकडे नाही. नारळीकरांचे तेच होते. माझ्या लेखात जर काही तांत्रिक उणीवा दिसत असतील तर मला सांगा असे मी डीन व केली या दोघांनाही ई मेलवर विचारले पण ते उत्तरच देत नाहीत. नारळीकरही या बाबत माझ्याशी बोलत नाहीत. माझ्या शॉर्ट कट पद्धतीने हे शास्त्र खोटे ठरवता येते हेच त्यांना आवडत नसावे! आता आपण तरी स्पष्टपणे सांगू या की फलज्योतिष हे पूर्णपणे काल्पनिक किंवा खोटे शास्त्र आहे आणि हितसंबंधी लोकांनी त्याचे थोतांड माजवले आहे. असे रिसबूड रोखठोक. शेवटचा लेख फलज्योतिषाच्या विरोधात एक कॅम्पेनच उभारली पाहिजे. पण पुरोगामी चळवळीतील लोक म्हणावी तशी साथ देत नाहीत, असे त्यांना वाटे. प्रत्येक वेळी लेख लिहून झाला की म्हणत 'हा मात्र आता शेवटचा लेख, आता लिहिणे बसा. कुणासाठी लिहायचं?' त्या लेखाला लास्ट, फायनल अशी नावे देत. मग त्याचे पुनर्लेखन होत असे. काही नवीन सुचलं की हा आपला शेवटचा लेख असे ठरवले होते हे ते विसरून जात व पुनश्च नवीन लेखन होत असे. मला आता त्याची सवय झाली होती. एक दिवस मला त्यांनी शेवटचा लेख लिहिला आहे व तो मेलवर पाठवला आहे असे फोनवर सांगितले, फाइलचे नाव असेच शेवटचा लेख. मी नेहमीच्या सवयीने मनातल्या मनात हसलो. नंतर नेहमीप्रमाणे त्यांचेकडे दोन दिवसांनी चक्कर टाकली. आत पाऊल टाकताच शंकेची पाल चुकचुकली. रिसबुडांच्या मुलीने ज्योत्स्नाने सांगितले, "दादा रात्रीच गेले." आणि मी बधिर झालो. ( पुर्वप्रकाशित मनोगत दिवाळी २००७)

प्रतिक्रिया द्या
121025 वाचन

💬 प्रतिसाद (352)
क
कंजूस गुरुवार, 09/10/2020 - 09:25 नवीन
चांगला वाटला लेख. म्हणजे रिसबुड ज्योतिष हे शास्त्र नाही अशा विचारांचे वरवर वाटले तरी आतून कुणी वर्तवलेल्या फलादेशांना घाबरून असावेत. आपण ही शास्त्र, अंधश्रद्धा विज्ञानविरोधी वगैरे चर्चा बाजूला ठेवू. काही गोष्टी सामान्य माणसच्या ( राजाही काही वेळा सामान्य माणूसच ठरतो ) आयुष्यातले प्रसंग अडचणी धोके चढउतार सांगण्यात विज्ञान कामाचे नसते आणि ते ज्योतिषाचा सल्ला घेतात. त्याच्या नशिबाने काही वेळा दिशादर्शक उत्तर देणारे भेटतातही. त्याप्रसंगी एकच आक्रोश असतो की मला कुठूनही उत्तर हवंय.
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे गुरुवार, 09/10/2020 - 09:47 नवीन
म्हणजे रिसबुड ज्योतिष हे शास्त्र नाही अशा विचारांचे वरवर वाटले तरी आतून कुणी वर्तवलेल्या फलादेशांना घाबरून असावेत.
काही टोटल लागली नाही. बाकी प्रतिक्रिया ठिक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
श
शशिकांत ओक गुरुवार, 09/17/2020 - 16:48 नवीन
धागा तुमच्या हातून सटकून कुठल्या कुठे गेला. मोबाईलवर स्क्रीनच्या बाहेर लेखन गेले आहे... ट्रेन प्रवासात रिझर्वेशनवाल्यांची बळकावून हमरीतुमरीवर येणाऱ्या अगांतूक प्रवाशांच्या आवेशात लेखन करताना पहायला मजा येते आहे. गारुड्याचे खेळ पहायला आलेल्यांना जंभूरा आवडतो... पण त्याला पडद्यात लपवले जाते. तसे आपले वरिष्ठ मित्र वर्य रिसबुडांना बिनबुडाचे करून टाकले आहे कि काय असे वाटले!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
क
कंजूस गुरुवार, 09/10/2020 - 09:52 नवीन
'शेवटचा लेख' यावरून वाटलं.
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे गुरुवार, 09/10/2020 - 10:02 नवीन
आपण शेवटचा पॅरा नीट वाचलात का? लिखाण आता बास झाले अशा अर्थाने ते शेवटचा लेख असे आहे. संगणकात फाईलला मोठी नावे घेत नसत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
क
कंजूस गुरुवार, 09/10/2020 - 10:28 नवीन
वाचला. 'शेवटचा' मध्ये उगाचच शंका आली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
क
कंजूस गुरुवार, 09/10/2020 - 09:59 नवीन
सत्ता, संपत्ती आणि संसार यातल्या खाचाखोचा, बेरीज-वजाबाकी ज्योतिषी लोकांना समजतात ( पण ते आगावू सांगण्याचं टाळतात. ) हे कोणतेच विज्ञान वर्तवू शकत नाही म्हणूनच ज्योतिष {आसन नाही} पण आपली पायरी पकडून आहे.
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर गुरुवार, 09/10/2020 - 13:47 नवीन
मुळात सर्व जोतिष (आणि त्याची प्रत्येक शाखा ) वेळ या एकमेव आधारावर अवलंबून आहे. वास्तविकात वेळ असं काहीही अस्तित्वात नाही. तो भास आहे आणि मानवानं प्रक्रिया मापनासाठी निर्मिलेली ती एक सोयीची कल्पना आहे. वेळ या उपयोगी पण भासमान कल्पनेचा समग्र उहापोह मी काल या लेखात केला आहे. वेळ हाच भ्रम आहे म्हटल्यावर सगळं जोतिष निरर्थक आणि निराधार ठरतं !
  • Log in or register to post comments
श
शा वि कु गुरुवार, 09/10/2020 - 14:56 नवीन
जर उद्या शामला फाशी होणार आहे. आणि मी वक्तव्य केलं की उद्या शाम मरून जाईल. तर ह्याला तुम्ही काय म्हणाल, भविष्य सांगणे न म्हणता ? "उद्या" अस्तित्वात नसेल तर तुम्ही ही गोष्ट कशी सांगाल ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
श
शा वि कु गुरुवार, 09/10/2020 - 15:37 नवीन
नीट नाही मांडले. पुन्हा: जर तुम्हाला कळाले की रिलायन्स चे समभाग काही महिन्यांनी चढ्या दरात (cmp पेक्षा) बायबॅक केले जाणार आहेत. (टीप मिळाली.) तर तुमचा रिस्पॉन्स काय असेल ? १) काळ हा भ्रम आहे. महिना ही गोष्ट अस्तित्वातच नसल्याने मला काहीही करण्याची गरज नाही. २) अरेवा. घेऊन टाकतो. (शेअर मार्केट पसंत नसल्यास mutatis mutandis वेगळे उदाहरण घ्यावे.) मुद्दा काय तर फलज्योतिष हे अगदी अश्याच अगदी व्यवहारिक फायद्यासाठी वापरले जाते. काळ हा भ्रम आहे म्हणून यात काय फरक पडणार ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शा वि कु
स
संजय क्षीरसागर गुरुवार, 09/10/2020 - 15:55 नवीन
तारीख, महिना, वर्ष या सर्व मानवी कल्पना आहेत. त्यांच्या उपयोगितेबद्दल वाद नाही. ३० नोव्हेंबर (किंवा ऑक्टोबर) ही रिटर्न्स फायलींगची लास्ट डेट आहे. ते टार्गेट पूर्ण करण्यासाठी काम केलं जातंय. पण वस्तुस्थिती इतकीच आहे की आता ते काम चालू आहे > १० सप्टेंबर किंवा ३० ऑक्टोबर या केवळ (उपयोगी) कल्पना आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शा वि कु
श
शा वि कु गुरुवार, 09/10/2020 - 16:06 नवीन
अमान्य नाहीच.
मुद्दा काय तर फलज्योतिष हे अगदी अश्याच अगदी व्यवहारिक फायद्यासाठी वापरले जाते. काळ हा भ्रम आहे म्हणून यात काय फरक पडणार ?
काळ हा भ्रम आहे असं आपण बिल ड्यू झाल्यावर सांगू शकतो का ? जरी भ्रम असला तरी ? मानवी कल्पना तिथे आपल्याला समीकरणात घ्यावे लागतेच ना ? बस. इतकेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर गुरुवार, 09/10/2020 - 16:13 नवीन
सूर्य कायम प्रकाशमान आहे त्यामुळे दिवस आणि रात्र हा भास आहे > त्यामुळे काल-आज-उद्या असं काहीही अस्तित्वात नाही. बिल देणं आहे ही वस्तुस्थिती आहे. चेक लिहिणं ही क्रिया आहे > ते लेट झालं म्हणणं हा पारस्पारिक व्यावहार आहे > पण त्यामुळे कालनिर्मिती होत नाही. .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शा वि कु
स
संगणकनंद गुरुवार, 09/10/2020 - 16:25 नवीन
@ शा वि कु : तुमच्या लक्षात येत नाही !
त्यांना ते मध्यंतरीच्या काळात घडणार्‍या बर्‍याच गोष्टींबद्दल सांगा ना, म्हणजे त्यांच्या पटकन लक्षात येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
श
शा वि कु गुरुवार, 09/10/2020 - 16:26 नवीन
मी काही तरी वेगळंच म्हणतोय. शेवटचा प्रयत्न: काळ आणि साठी दोन्ही भ्रम आहेत (पेक्षा, मानवी संकल्पना आहेत.) मान्य. पण या संकल्पना डोक्यात ठेऊन माणसाला बचत करावी लागते की नाही ? म्हणहेच या स्वतः तयार केलेल्या संकल्पना माणूस वापरतो ना ! केवळ मानवी संकल्पना आहे म्हणून ती कल्पना भ्रम आणि रद्दबातल होत नाही. काळ ही वस्तू अस्तित्वात नाही हे जरी खरं असलं तरी आपण आपल्या सुविधेसाठी एक विशिष्ठ मोजमापाची पद्धत तयार केली आहे. आणि हे मोजमाप नक्कीच समाजाच्या वावरामध्ये अस्तित्वात आहे. प्रत्येक ठिकाणी तिला भ्रम म्हणणे स्वतःच आपण बनवलेले नियम तोडण्या योग्य आहे. बस. शाविक् आउट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर गुरुवार, 09/10/2020 - 17:19 नवीन
१.
केवळ मानवी संकल्पना आहे म्हणून ती कल्पना भ्रम आणि रद्दबातल होत नाही. काळ ही वस्तू अस्तित्वात नाही हे जरी खरं असलं तरी आपण आपल्या सुविधेसाठी एक विशिष्ठ मोजमापाची पद्धत तयार केली आहे. आणि हे मोजमाप नक्कीच समाजाच्या वावरामध्ये अस्तित्वात आहे.
अर्थात ! पण मोजमापामुळे सोय झाली तरी काल कदापिही निर्माण होणार नाही.
२. प्रत्येक ठिकाणी तिला भ्रम म्हणणे स्वतःच आपण बनवलेले नियम तोडण्या योग्य आहे.
ते नियम तोडणं नाही. कालाचा धसका संपवणं आहे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शा वि कु
स
संजय क्षीरसागर गुरुवार, 09/10/2020 - 15:44 नवीन
तुमच्या सर्व धारणांच्या निराकारणार्थ प्रतिसादात दिलेला लेख वाचा. शब्दयोजना आणि प्लानींग या दृष्टीनं काल ही उपयोगी संकल्पना आहे पण तो पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यानं निर्माण होणारा भास आहे. शाम फाशी जाईल त्याची वेळ निश्चित केली गेली आहे > त्यामुळे तसं विधान ही करता येईल > शाम नेमक्या वेळी फाशी पण जाईल > तरीही `इतके वाजले' ही फक्त मानवी कल्पना असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शा वि कु
श
शा वि कु गुरुवार, 09/10/2020 - 15:50 नवीन
मानवी कल्पना आहे हे मान्य तरी कित्येक मानवी कल्पनांना भ्रम न म्हणता त्यांना समीकरणात घ्यावे लागते. ज्योतिष सुद्धा तसेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर गुरुवार, 09/10/2020 - 16:01 नवीन
समजा ती १० सप्टेंबर १९९०, संध्याकाळी ७.३० अशी आहे. तुमची कुंडली आणि सर्व भवितव्य त्या पॉइंट ऑफ टाईमवर आधारित आहे. पण अस्तित्वात अशी वेळ आणि तारीख कधीच उगवत नाही > ती केवळ मानवी कल्पना आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शा वि कु
स
संगणकनंद गुरुवार, 09/10/2020 - 16:08 नवीन
पण अस्तित्वात अशी वेळ आणि तारीख कधीच उगवत नाही > ती केवळ मानवी कल्पना आहे. पण तुम्हीच मागे एकदा लिहील्याप्रमाणे मध्यंतरीचा काळ असतो आणि त्यात बर्‍याच गोष्टी घडतात ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
क
कोहंसोहं१० गुरुवार, 09/10/2020 - 16:57 नवीन
मानवी कल्पना आहे हे मान्य तरी कित्येक मानवी कल्पनांना भ्रम न म्हणता त्यांना समीकरणात घ्यावे लागते. ज्योतिष सुद्धा तसेच. >>>>शा वि कु बरोबर बोललात. म्हणूनच ब्रह्म सत्यम जगत मिथ्या असे म्हणणाऱ्या कठोर अद्वैतवादी शंकराचार्यांनीसुद्धा प्रतिभासिक सत्य, व्यावहारिक सत्य आणि पारमार्थिक सत्य या संकल्पना मांडल्या. पारमार्थिक सत्य हे जरी पूर्ण सत्य (Ultimate Truth) असले तरी जोपर्यंत या जगात वावर आहे तोपर्यंत तारतम्यासाठी व्यावहारिक सत्य मान्य करावेच लागते. व्यवहारातील आपल्याला असोईस्कर आणि न पटणाऱ्या गोष्टींना संकल्पना भ्रम म्हणत बसणे मूर्खपणा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शा वि कु
स
संगणकनंद गुरुवार, 09/10/2020 - 15:29 नवीन
वेळ या उपयोगी पण भासमान कल्पनेचा समग्र उहापोह मी काल या लेखात केला आहे. वेळ हाच भ्रम आहे म्हटल्यावर सगळं जोतिष निरर्थक आणि निराधार ठरतं !
मग ते मध्यंतरीच्या काळात बर्‍याच गोष्टी घडल्या त्याचं काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
ब
बाजीगर गुरुवार, 09/10/2020 - 15:08 नवीन
सुंदर व तार्कीक विश्लेषक गुरुशिष्य जोडी आणि सातत्याने या विषयावर लिखाण करण्यासाठी कष्ट करण्याची क्षमता हा दूर्मिळ गुण या जोडी कडे होता. आता प्रतिक्रिया पाहू, कंजूससाहेब आणि क्षीरसागरसाहेब यांचा जोतीषावर विश्वास आहेच त्यामुळे रिसबूड-घाटपांडे सरांची तर्कशुद्धता व्यर्थ गेली. (यामागे भिती आहे, कशाला विषाची परिक्षा पहा हा विचार आहे, एकंदरीत लहानपणापासून पिंड कसा जोपासला गेला ते आहे) मी मात्र खुल्ला म्हणतो जोतिष भंकस (थोतांड) आहे.पोट भरायचा धंदा आहे.रिसबूड सर-घाटपांडे सर.
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर गुरुवार, 09/10/2020 - 15:14 नवीन
कंजूससाहेब आणि क्षीरसागरसाहेब यांचा जोतीषावर विश्वास आहेच ?
हे कुठून काढलं ? भविष्य (किंवा कोणताही) काळच नाही त्यामुळे जोतिष व्यर्थ आहे असा माझ्या प्रतिसादाचा अर्थ आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाजीगर
क
कंजूस गुरुवार, 09/10/2020 - 16:39 नवीन
बाजीगर, मला असं म्हणायचं आहे की ज्यांना या आडाख्यांचा, सल्ल्यांचा उपयोग आहे असं वाटतं ते करून घेत आलेले आहेत आणि करत आहेत. कोणती क्षेत्रं ते दिलेलं आहे. बाकी विरोधी आणि बाजूने मतं मांडणं हे इतर लोकांसाठी आहे. जो तो आपल्या श्रद्धे प्रमाणे शास्त्राला टाळतो अथवा जवळ करतो.
  • Log in or register to post comments
क
कोहंसोहं१० गुरुवार, 09/10/2020 - 16:45 नवीन
new in scopeचिकित्सेसाठी बुद्धिवादी लोकांनी फलज्योतिषाचा अभ्यास करावा असे ते म्हणत >>>>>>>> हे पटले. पण आपल्याकडे याच्या बरोबर उलटे आहे. जुने समज नाकारले की पुरोगामी बुद्धिवादी म्हणून घ्यायला मोकळे. ज्याचा काहीच अनुभव नाही, अभ्यास नाही त्याला खोटे म्हणून उडवून लावणारे बरेच आहेत. तसेच गरजेपोटी आंधळा विश्वास ठेवणारे आणि त्याचा फायदा घेऊन लुटालूट करणारे (हे मात्र सगळ्याच क्षेत्रात आहेत) देखील बरेच. पण चिकित्सेपोटी अभ्यास करून मत बनवणारे अत्यंत कमी. याबाबत मला पाशात्य लोक आपल्यापेक्षा जास्त पुढारलेले वाटतात. त्यांच्यात आपल्यापेक्षा चिकित्सक आणि प्रयोगवृत्ती बरीच जास्त आहे. पण ज्यांना ते करायची इच्छा नाही ते उगाच सगळे नाकारून स्वतः पुरोगामी बुद्धिवादीचा डंका पिटत बसत नाहीत.
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे गुरुवार, 09/10/2020 - 17:11 नवीन
मला फलज्योतिष हा भूतकाळातील होऊन गेलेल्या घटनांवर आधारीत काही निष्कर्ष काढून त्यावरुन भविष्यात घडणार्‍या आडाखे बांधणे असा प्रकार वाटतो. फलज्योतिष्याच्या ज्या काही संहिता आहे त्यांच्या लेखकांनी असा गोष्टींचा अभ्यास करुन मग त्यांचे ठोकताळे फलज्योतिष संहिता स्वरुपात लिहीले असावेत. म्हणजे एखाद्या व्यक्तीची कुंडली ही त्या व्यक्तीच्या जन्माच्या वेळी आकाशातील ग्रहांची स्थिती कशी होती याची कोष्टक किंवा "स्थानांच्या" स्वरुपात मांडणी करायची. नंतर त्या व्यक्तीच्या आयुष्यात घडणार्‍या ठळक सुखद आणि दु:खद घटनांची नोंद करायची. अशा अनेक कुंडल्यांचा अभ्यास करुन त्यांच्यातील ग्रहाच्या स्थानांची आणि व्यक्तीच्या आयुष्यातील घटनांची सांगड घालायची. पुढे भविष्यात एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीतील ग्रहांच्या स्थितीचे आधीच्या अभ्यास केलेल्या कुंडलीशी साम्य आढळयास त्या पूर्वीच्या व्यक्तीच्या आयुष्यात घडलेल्या घटनांशी साम्य असणार्‍या घटना या व्यक्तीच्या आयुष्यातही होऊ शकतात. जर विवाह प्रचलीत वयापेक्षा उशिरा झालेल्या व्यक्तींच्या कुंडल्यांमध्ये "रवी सप्तम स्थानात होता" ही गोष्ट सामायिक असेल तर एखाद्या कुंडलीत सप्तम स्थानात रवी असेल तर त्या व्यक्तीचा विवाह उशिरा होईल असा आडाखा फलज्योतिषवाले बांधू शकतात. अर्थात हे ज्यांनी फलज्योतिषाच्या संहिता लिहील्या त्यांनी केले असावे. आताचे फलज्योतिषी फक्त जातकाची कुंडली जुन्या डेटाबेसशी (संहिता किंवा पुस्तके) जूळवून त्यानुसार भाकीत वर्तवत असावेत. हे असं मला वाटतं. :)
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर गुरुवार, 09/10/2020 - 17:23 नवीन
मला फलज्योतिष हा भूतकाळातील होऊन गेलेल्या घटनांवर आधारीत काही निष्कर्ष काढून त्यावरुन भविष्यात घडणार्‍या आडाखे बांधणे असा प्रकार वाटतो.
त्यामुळे ते फक्त अट्ट्या लावणं आहे. त्याला काहीही आधार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
क
कंजूस गुरुवार, 09/10/2020 - 17:20 नवीन
@सगा , जर विवाह प्रचलीत वयापेक्षा उशिरा झालेल्या व्यक्तींच्या कुंडल्यांमध्ये "रवी सप्तम स्थानात होता" ही गोष्ट सामायिक असेल रैट. शिवाय अशीच इतर गृहितकं वापरली जातात. दुर्दैवाने लग्न, सुख यांची गृहितकं खरी ठरतात म्हणून ती सांगून निराश केले जात नाही. भले या ज्योतिष्याला काही कळत नाही म्हटले लोकांनी तरी.
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर गुरुवार, 09/10/2020 - 17:28 नवीन
दुर्दैवाने लग्न, सुख यांची गृहितकं खरी ठरतात म्हणून ती सांगून निराश केले जात नाही. भले या ज्योतिष्याला काही कळत नाही म्हटले लोकांनी तरी.
जातकाला भविष्यातलं गाजर दाखवू शकला नाही तर जोतिषी स्वतःच भिकेला लागेल > राजकारण आणि जोतिष यांचा एकच फंडा आहे > अच्छे दिन आनेवाले है !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
क
कंजूस गुरुवार, 09/10/2020 - 18:13 नवीन
ज्यांचं भलं चाललं आहे त्यांच्यासाठी ज्योतिष उपयोगाचं नसतं.
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री गुरुवार, 09/10/2020 - 18:34 नवीन
ज्यांचं भलं चाललंय अशातले अनेक लोक्स अधिक भलं चालावं म्हणून हातबघ्यांकडे किंवा पत्रिकाबघ्यांकडे चकरा मारताना दिसतात की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
उ
उपयोजक गुरुवार, 09/10/2020 - 20:39 नवीन
१) ग्रहांचे भ्रमण,ग्रहांचे स्वरुप आणि नक्षत्रे यांचा मानवावर बर्‍यापैकी परिणाम होतो.परिणाम जाणवतात.पण हे सगळं होतं कसं किंवा त्या ग्रहांकडून किंवा नक्षत्रांकडून कसं अॉपरेट केलं जातं ते माहित नाही. २) किरकोळ समस्या वगळता ज्यांचं आयुष्य बरं/चांगलं/उत्तम चाललंय आणि त्यात जे समाधानी आहेत असे लोक फलज्योतिषाकडे जात नाहीत. याउलट जे हवं त्यासाठी अनेकदा प्रयत्न करुनही मनासारखे यश मिळत नसल्याने हताश झालेले किंवा बर्‍यातून चांगल्या आणि चांगल्याकडून अधिक सुखकर जीवनाची अपेक्षा असलेले काही लोक फलज्योतिषाचा आधार घेतात.अशावेळी ते अंनिस/विज्ञान फलज्योतिषाबद्दल काय म्हणतं त्याकडे लक्ष देत बसत नाहीत. ३) जगात जोपर्यंत अस्थिरता आहे तोपर्यंत फलज्योतिष जिवंत राहणारच.नोकरीच्या तुलनेत व्यवसायात अस्थिरता तीव्र असते, स्पर्धा तीव्र असते त्यामुळे नोकरदारांच्या तुलनेत व्यावसायिकांमधे फलज्योतिषाचा आधार घेण्याचं प्रमाण बरंच जास्त असतं. ४) अस्थिरता,किचकट समस्या,आजार यातून बाहेर पडण्यासाठी मानसोपचारांची मदत नक्की होऊ शकते.पण मानसोपचारतज्ज्ञांची फी परवडणारी नसेल किंवा समजा परवडणारी असेल पण त्या उपचारांनी गुण येण्यास समस्याग्रस्त व्यक्तीच्या अपेक्षांच्या तुलनेत जास्त वेळ लागणार असेल तर ती व्यक्ती फलज्योतिषाकडे जाते.मानसोपचारतज्ज्ञांची फी/उपचारांचा खर्च सर्वसामान्य लोकांच्या आवाक्यात आल्यास ते फलज्योतिषाकडे जाणे कमी होईल. ५) भारताची लोकसंख्या अफाट आहे, लोकांच्या अपेक्षा काळाप्रमाणे बदलत असतात.त्यामुळे इथे सर्वांनाच कमी-अधिक प्रमाणात दररोज पळावेच लागते.संघर्ष अटळ आहे. शहरात/महानगरात ही धावपळ,दगदग जास्त असते.अनिंससारख्या संस्थांनी ही धावपळ,दगदग कमी कशी करावी याबद्दल प्रबोधन करावे, उपाय सुचवावेत.अशाप्रकारे मुळावरच घाव घालावा म्हणजे लोक फलज्योतिषाकडे जाण्याचे प्रमाण बरेच कमी होईल.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Fri, 09/11/2020 - 03:36 नवीन
रिसबुडांनी आणि (त्या विचारांचे लोक) ज्योतिष का नको, किती टक्केवारीनेच बरोबर येते, किती चुकते हे भाविक लोकांना सांगण्यात वेळ व्यर्थ घालवतात. उपयोजक ,मुद्दे क्र २.३ सहमत. क्र ४ सांगून उपयोग नाही. झालेली गोष्ट दुरुस्त करण्यासाठीचे उपाय करण्याबद्दल विरोध नाहीच. याच मुद्द्यावर अनिसवाले भांडत असतील तर योग्यच आहे. पण ज्योतिष असे सांगत नाही की तुम्ही उपचार करू नका, अमुक एक ग्रहांचे कुंडलीतले योग टळले दोन वर्षांनी की आपोआपच बरे होणार. एखाद्यास आजारपणाचा त्रास अमुक काळात आहे हे भविष्य असते आणि त्यास विज्ञानाकडे उत्तर नसते. विज्ञानाच्या नावाने ओरडणाऱ्यांनी उगाच नसलेल्या शत्रुवर आग पाखड करणे व्यर्थ आहे. राजकारणी - राजे आणि लोकशाहीतील राज्यकर्ते हे नेहमीच ज्योतिषाचा सल्ला घेतात. पक्षांतर, मंत्रीपद, नवीन खेळी यावर मत घेतातच. ते मत मागतात आणि पैसे देतात यात दुसऱ्या कुणाचे पोट दुखण्याचे कारण काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपयोजक
प
प्रकाश घाटपांडे Fri, 09/11/2020 - 05:47 नवीन
आपल म्हणण खर आहे. मिपा चालू झाल होत त्या सुरवातीच्या काळात या ज्योतिषाच काय करायचं? या संपादकीयात मी ते लिहिले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपयोजक
उ
उपयोजक Fri, 09/11/2020 - 20:36 नवीन
तिकडे विकास यांनी विचारलेलाच प्रश्न पुन्हा विचारतो. "फलज्योतिषाच्या बाजूने आहात की फलज्योतिषाच्या विरोधात?" ; )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
प
प्रकाश घाटपांडे Sat, 09/12/2020 - 06:44 नवीन
उपयोजक, हो कि नाही? अशा द्वैत प्रश्न मला खर तर अपुरे ( अगदी खर तर अप्रगल्भ) वाटतात. बरेच लोक कृष्ण धवल द्वैतात अडकतात. राम किंवा रावण, विरोधक किंवा समर्थक, पाप किंवा पुण्य, चांगले किंवा वाईट. if you are not with us, you are with them असे काहीसे गणित असते मी बहुरंगी दृष्टीने पहातो. किमान तसा प्रयत्न असतो. तुम्ही ज्योतिष समर्थक कि विरोधक असा प्रश्न मला तसाच काहीसा वाटतो. इथे मी माझी भूमिका मांडली आहे. http://mr.upakram.org/node/777#comment-12763
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपयोजक
स
संजय क्षीरसागर Mon, 09/14/2020 - 08:59 नवीन
तुम्ही अनेक वर्ष आहत आणि नाडीग्रंथावर प्रतिसाद देतांना तुम्ही म्हटलंय की `हताशा आली आहे. पुढची पिढी आता काय करते ते बघू'. तुम्हाला सपोर्ट करायला मी इथे उतरलो. काही अज्ञानी हा धागा मी हॅक केला म्हणतायंत ते त्यांच्या अज्ञानाला सुरुंग लागल्यामुळे आहे. आयुष्य खंबीरपणे जगण्यासाठी तुमच्यात कमालीची वैचारिक क्लॅरिटी आणि त्याबरोबर तितकाच ओपननेस हवा, मग हताश होण्याऐवजी जीवन बहरत जातं. १.
अशा द्वैत प्रश्न मला खर तर अपुरे ( अगदी खर तर अप्रगल्भ) वाटतात. बरेच लोक कृष्ण धवल द्वैतात अडकतात. राम किंवा रावण, विरोधक किंवा समर्थक, पाप किंवा पुण्य, चांगले किंवा वाईट. if you are not with us, you are with them असे काहीसे गणित असते
क्लॅरिटी आणि ओपननेस एकावेळी असेल तर असा प्रकार (जो अंतीमतः द्विधा अवस्था आणतो) होत नाही. पण सध्याच्या भंपक राजकीय धोरणामुळे if you are not with us, you are with them असा निर्बुद्ध युक्तीवाद देशात निर्माण झाला आहे. तरीही त्याचा अर्थ आपण लोंबकाळत रहावं असा नाही. आपण आपल्या मुद्द्यावर कायम ठाम हवं आणि तितकंच ओपन हवं. अंधश्रद्धेला नेमकं हेच जमत नाही त्यामुळे असे लोक निव्वळ बायकी युक्तीवाद करुन बाजी मारायचा प्रयत्न करतात. त्यांना भीक घालायची काहीएक गरज नाही. २.
मी बहुरंगी दृष्टीने पहातो. किमान तसा प्रयत्न असतो. तुम्ही ज्योतिष समर्थक कि विरोधक असा प्रश्न मला तसाच काहीसा वाटतो
हा विचार वरकरणी उदारमतवादी दिसला तरी तो ठामपणाचा आभाव दर्शवतो आणि त्यामुळे हताशा येते. मी स्वतः विज्ञानवाद आणि वस्तुनिष्ठता मानतो आणि तसा जगतो, त्यामुळे तुमच्याशी दृष्टीकोन शेअर केला, बघा विचार करुन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
उ
उपयोजक गुरुवार, 09/10/2020 - 20:56 नवीन
Image removed. उलगडून सांगा. हे दोघे पदरचे ३-४ तास खर्च करुन तिरुपतीच्या बालाजीला का गेले असावेत? बालाजीच्या मंदिराच्या कामासंबंधी काही कंत्राट हवे असेल तर यांचे मॅनेजर वगैरे हाताखालचे लोक जाऊ शकतात. मानसिक समाधानासाठी म्हणावं तर तांब्या,पितळेच्या किंवा सोन्याच्या मुर्तीपेक्षा मानसोपचारतज्ज्ञ जास्त लवकर रिलीफ देतील हे समजण्याइतके हे दोघे नक्कीच सुज्ञ आहेत. मग का आले असावेत बालाजीला? : )
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Fri, 09/11/2020 - 07:13 नवीन
आणि तो आपलं भलं करेल या गैरसमजामुळे ते तिथे गेलेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपयोजक
उ
उपयोजक Fri, 09/11/2020 - 19:51 नवीन
हजारो कोटींचे उद्योग चालवण्याइतपत चातुर्य असणार्‍या , जगातल्या कोणत्याही नामवंत मानसोपचारतज्ज्ञाची अपाॅईंटमेंट मिळवू शकणार्‍या , देशातल्या टॉपच्या विद्यापीठांमधून शिक्षण घेतलेल्या या उद्योजकांना समजत नसावं का? तरीही ते तसं का करत असावेत? या अब्जाधीश उद्योजकांच्या मनातली अस्थिरता जर अंनिस किंवा कोणताही मानसोपचारतज्ज्ञ जर पूर्णपणे उपटून काढू शकत नसेल तर या दोघांच्या तुलनेत कैकपट कमी आर्थिक यश किंवा सुख मिळालेल्या लोकांनी फलज्योतिष किंवा निर्जीव मुर्तीदर्शनाचा आपलं भल होईल या आशेने आधार घेतला तर त्यांना दोष कसा देणार? सामान्य व्यक्तीला कोणत्या तोंडाने सांगणार की फलज्योतिषाचा आधार घेऊ नका म्हणून? फलज्योतिषाकडे असमाधानी लोकच जातात. जे मिळालंय त्यात समाधानी असणार्‍या व्यक्ती फलज्योतिष किंवा कर्मकांड यांचा आधार घेणार नाही. पण प्रश्न हा आहे की जगात अशा आतून समाधानी व्यक्ती संख्येने खूप कमी असाव्यात.बहुतांश व्यक्ती या असमाधान ,अस्थिरता यांना महत्व देणार्‍याच असतात. त्यांचे विचार बदलणे , त्यांना समाधानी रहायला शिकवणे हे अंनिस किंवा अन्य विज्ञानवादी संघटना करणार का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Fri, 09/11/2020 - 20:16 नवीन
स्वरुपाचा उलगडा न झाल्यामुळे होतं. त्यात कोण काय पोस्टला आहे, त्याचं शिक्षण किती, त्याचा सामाजिक वट काय यानं काहीएक फरक पडत नाही. स्वरुपाचा उलगडा न होण्याचं मुख्य कारण चुकीच्या धारणा हे आहे. अशीच एक चुकीची धारणा म्हणजे ज्योतिष किंवा कर्मकांडातून दिलासा मिळेल ही आहे आणि त्यामुळे तुमच्या फोटोतले लोक बालाजीला गेलेत. तो टेंपररी रिलीफ आहे. पुन्हा परत आल्यावर ते अस्थिरता आणि अशांतीनं घेरले जातील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपयोजक
स
सुबोध खरे Tue, 09/15/2020 - 16:25 नवीन
परत आल्यावर ते अस्थिरता आणि अशांतीनं घेरले जातील. अस्थिरता आणि अशांती हा मानवी जीवनाचा स्थायीभाव आहे. यातून मुक्त फक्त दोनच लोक आहेत १) संत आणि २) मतिमंद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Tue, 09/15/2020 - 16:40 नवीन
हे कुठून काढलं ? आनंद हा जीवनाचा स्थायी भाव आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Tue, 09/15/2020 - 20:32 नवीन
ते तुम्हीच काढलंय वरच्या प्रतिसादात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Wed, 09/16/2020 - 11:05 नवीन
त्यामुळे तुम्हाला मुद्दा कळत नाही, त्यात पुन्हा प्रतिसाद देण्याची घाई आणि वरती स्वतःची चुकीची विधानं ठळक अक्षरात टाईप करुन माझ्या नांवावर खपवतायं ! आता तरी नीट वाचा : अस्थिरता आणि अशांती हे स्वरुपाचा उलगडा न झाल्यामुळे होतं. त्यात कोण काय पोस्टला आहे, त्याचं शिक्षण किती, त्याचा सामाजिक वट काय यानं काहीएक फरक पडत नाही. स्वरुपाचा उलगडा न होण्याचं मुख्य कारण चुकीच्या धारणा हे आहे. अशीच एक चुकीची धारणा म्हणजे ज्योतिष किंवा कर्मकांडातून दिलासा मिळेल ही आहे आणि त्यामुळे तुमच्या फोटोतले लोक बालाजीला गेलेत. तो टेंपररी रिलीफ आहे. पुन्हा परत आल्यावर ते अस्थिरता आणि अशांतीनं घेरले जातील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे गुरुवार, 09/17/2020 - 05:58 नवीन
एक आश्चर्य आहे ( किंवा नाही ) तुमचा मुद्दा मिसळपाव वर कुणालाच समजत नाही कारण एक तर लोक नीट वाचत नाहीत किंवा त्याची समजच कमी असते. ( असं त्यांचं मत आहे.) ते कोण ते विचारायचं नाही. अशीच एक चुकीची धारणा म्हणजे ज्योतिष किंवा कर्मकांडातून दिलासा मिळेल ही आहे आणि त्यामुळे तुमच्या फोटोतले लोक बालाजीला गेलेत. माणूस केवळ कृतज्ञतेच्या पोटी अमूर्त शक्तीचे मूर्त स्वरूप म्हणून मंदिरात जात नाही का? त्यासाठी कर्मकांड किंवा ज्योतिषच हवे का? ज्योतिष किंवा कर्मकांडातून दिलासा मिळेल ही आहे आणि त्यामुळे तुमच्या फोटोतले लोक बालाजीला गेलेत. हि तुमची चुकीची धारणा आहे. (अरे बापरे मी पण सर्वज्ञा सारखे बोलायला लागलो कि काय?). कशावरून ते कर्मकांडासाठी तेथे गेले आहेत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर गुरुवार, 09/17/2020 - 10:26 नवीन
कशावरून ते कर्मकांडासाठी तेथे गेले आहेत ?
तुम्ही बालाजीला (किंवा इतर देवाला), त्याची तब्येत तपासायला जाता का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे गुरुवार, 09/17/2020 - 10:45 नवीन
हो पुरी येथे भगवान श्री जगन्नाथ आजारी पडतो आणि त्याबद्दल तपासणीही केली जाते https://www.google.com/amp/s/m.timesofindia.com/astrology/religious-places/the-god-at-this-temple-is-sick-cant-meet-devotees/amp_articleshow/68206724.cms बाकी *कृतज्ञता व्यक्त करणे* हा वाक्प्रचार आपण ऐकलेला दिसत नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
च
चौकस२१२ Tue, 09/15/2020 - 13:52 नवीन
या दोघांच्या तुलनेत कैकपट कमी आर्थिक यश किंवा सुख मिळालेल्या लोकांनी फलज्योतिष किंवा निर्जीव मुर्तीदर्शनाचा आपलं भल होईल या आशेने आधार घेतला तर त्यांना दोष कसा देणार? सर्वसामान्य रंजल्या गांजलेल्याचा दोष नाही त्यांना "जोतिषी उपाय" दाखवतो आणि बघ तुझं कसं भलं होईल अश्या गोष्टी सांगणारी लोकांना दिला जातोय... साधा प्रश्न आहे हो... समाजात जर घर बांधणारा स्थापत्य विशारद कीव रुग्णओपचार करणारा वैद्य त्याने दिलेला सल्ला फसला तर त्याच्याविरुद्ध कारवाई करण्याची सोय आहे तशी का नाही हो या ज्योतीश्वयवसायाबद्दल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपयोजक
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा