काही बोलायचे आहे ( विरसग्रहण)
Primary tabs
काही बोलायाचे आहे, पण बोलणार नाही
देवळाच्या दारामध्ये, भक्ती तोलणार नाही
हाय का डेरिंग बोलायचं? डेरिंगच नाय तर कसा बोलशील. अन डेरिंग करुन बोललाच तर फुकाट जोड खाशीन याच भ्याव हाये ना. आन नको तोलु देवळाच्या दारात भक्ती. भक्तीत खोट निघाली तर चारचौघात खोटा पडशीन!
माझ्या अंतरात गंध कल्प कुसुमांचा दाटे
पण पाकळी तयाची, कधी फुलणार नाही
आरं ते प्लास्टिकच फूल हाये फुलाचा शेंट मारलेला डिट्टो फुलावानी दिसतय. मधमाशाबी फशीत्यात. आता कलाकारीच हाये म्हन्ल्यावर कशी पाकळी फुलनं?
नक्षत्रांच्या गावातले मला गवसले गूज
परि अक्षरांचा संग त्याला मिळणार नाही
त्ये नक्षत्र का काय हाये त्येंच्या गावात बंटा मारलेले ल्वॉक र्हात्यात. काही बी बरळत्यात. त्येंच्या बरळन्यात कोन्ला काय घावनं काय सांगता येत नाही. त्येन्ला शब्दात पकडायला गेल की तेल लावलेल्या पैलवानावानी निसटत्यात.
मेघ जांभळा एकला राहे नभाच्या कडेला
त्याचे रहस्य कोणाला कधी कळणार नाही
आबाळामधी पाखर असत्यात चान्न्या असत्यात तसे ढग बी असत्यात. काही ढवळे असत्यात काही काळे असत्यात. काही काळे ढग जांभळावानी दिसत्यात. ढग हाये म्हनून त पाउस पडतुया. र्हातोय यखांदा ढग कोपर्या मदी पडून. वार्या वावधनाचा त्योबी वाहून जातोय. समद्याच ढगातून काय पानी येत नसतयं. काही रहस्य बिहस्य नसतयं.
दूर बंदरात उभे एक गलबत रूपेरी
त्याचा कोष किनाऱ्यास कधी लाभणार नाही
आता गलबत म्हनल्यावर लांबच हुब र्हानार ना! ती काय व्हडी हायका फळकुटाची किनार्याव यायला. किनारा उथळ असतुय. किनार्याकं यायच म्हनल तर तटून बसन. रुतून बी बसन वाळूत. समद्या दर्यावर्द्यांना माहीत अस्तय हे. व्हडीतुन गलबतापोतुर जात्यात ल्वॉक.
तुझ्या कृपाकटाक्षाने झालो वणव्याचा धनी
त्याच्या निखाऱ्यात कधी तुला जाळणार नाही
कह्याचा आलाय कृपाकटाक्ष? डोळ्यातून आग वकत होती. निस्ते आगीचे फव्हारे. मग वन्वा लागनार नाय तर काय व्हनार? अन आगीलाच निखार्याोवं कसा जाळनार तू? याड लागलय का?
बाकीच्या आठ रसांचेही ग्रहण लावा या गाण्याला
पैजारबुवा,
समद्या रसांचा विरस करता येतुय कि! यौंद्या कंच्या बी रसात. :)
सद्य परिस्थितीवर भाष्य दिसतं. बाय द वे, एकदा की कोणाला देव मानले की मग देवाविरुद्ध बोलता येत नसते
अशा आशयाची एक स्वाक्षरी फ़ेमस होती मिपावर. आठवत नाही, गेले ते दिवस उरल्या आठवणी.
गाणं आणि रसग्रहण मस्त आहे, म्हणजे लै भिडलं वगैरे असे नै वाटलं.
बाकी लिहिते राहा. बरेच वर्ष झाले भेटून, भेटलो की... ’रसग्रहण’ करु या..! ;)
-दिलीप बिरुटे
मी तर म्हणतो देवाला उदबत्ती लावल्याने देव प्रसन्न होतो की आपल्याला प्रसन्न वाटते हे देखील जे लोक शोधत नाहीत ते भक्ती करु तरी क्शी शकतात ?
बाकी कुसुमाग्रज हयात असते तर त्यांना हे विरसग्रहण वाचुन काय वाटले असते हा विचार बाजूला ठेउन लिवलय
>>> बाकी कुसुमाग्रज हयात असते तर त्यांना हे विरसग्रहण वाचुन काय वाटले असते.
एक तर पहिल्याछुट त्यांनी तुम्हाला माफ़ केले असते आणि म्हणाले असते. कुसुमाग्रजांची क्षमा मागून लिहितो.
पुरे झाले विरसग्रहण, पु-या झाल्या कविता
पुरे झाले पुणे-बिणे, पुरे झाला मिसळपाव.
मोरासारखा छाती काढून पुढे ये.
जाळासारखा नजरेत नजर बांधून पाहा
सांग तुझ्या प्याक मधे स्वर्ग आहे सारा.
(ह.घ्या)
-दिलीप बिरुटे
छान आहे. मात्र विरसग्रहण वाचून विरस झाला नाही एवढे नक्कीच नमूद करु इच्छितो.
फर्मास रसग्रहण !
😂
अफलातून!
सुबद्ध सूरावटींच्या लयीत हरवले जाताना सर्वच काव्यातील शब्दांकडे नीटसे लक्ष जात नाही.
यात निराशेच्या वणव्याने ग्रासलेले असतानाही, प्रेमाचे दूर जाणे मोठ्यामनाने स्विकारणारा, केलेल्या त्यागाचा वीररस आहे, रुपेरी गलबत जबरदस्तीने उचलून आणण्याचा वीररस दाखवू इच्छिणार्यांना, प्रेमा खातर केलेल्या त्यागाचा वीररस कळण्याची शक्यता कमीच.
पूर्ण व्यक्त होण्यासाठी अक्षरे उपलब्ध करता येणार नाहीत, पाकळीचे उमलत्या प्रेमाचे पूर्ण फुलात रुपांतर होऊ शकणार नाही ह्या निराशेच्या वणव्याची/ निखार्याची बाधा दूर जाणार्या प्रेयसीस हकनाक होऊ देणार नाही. 'माझ्या अंतरात गंध कल्प कुसुमांचा दाटे' हे स्वतःच्या प्रेमाकडे बघण्याचे सकारात्मकतेचे शिखर कविने गाठले आहे त्यामुळे त्याला विरह सहनशीलतेने झेलण्याची शक्ती प्राप्त झाली आहे. 'माझ्या अंतरात गंध कल्प कुसुमांचा दाटे' हे स्वतःच्या प्रेमाकडे बघण्याची सकारात्मकता आणि श्रद्धा आहे म्हणूनच निराशेचा वणवा झेलताना निखाराही बाहेर पडू देणार नाही ह्या पेक्षा कोणतीमोठी श्रद्धा ?
नक्षत्रांच्या गावातले मला गवसले गूज
'माझ्या अंतरात गंध कल्प कुसुमांचा दाटे'
या ओळीत आस्तीक्याचे शिखर आहे. ह्या कवितेत कुणि महानुभाव नास्तीक्य शोधूपहात असतील तर बिच्चारे महानुभाव ! :)
ह्या ओळीत प्रितीच्या भावनेची सर्वोच्चता जी भक्तीचे रूप घेते, पण प्रितीमंदिराचे दर्शन न घेताच परतावे लागते, परिस्थितीवश प्रेयसी दूर जाताना माझे प्रेम मोठे तू प्रेमाचा घात केला अशा कोणत्या भावनेचा स्पर्श सुद्धा न होऊ देता कवि जेवढी प्रिती जडली त्याची भक्ती तोलणार नाही असे म्हणतोय
मानतून तर तूला दूर जाण्यापासून थांबण्याची इच्छा आहे पण तिची जी काही परिस्थिती किंवा निर्णय आहे तो कवि स्विकारायचा आहे कारण प्रेयसीला दुख्खाचा किंवा निराशेच्या निखार्याचा स्पर्षही होऊ नये. आणि आपली भावना व्यक्त करताना दूर दूर पर्यंत शंका येऊ नये प्रेमाचे भांडे फुटून प्रेयसीला इजा होण्याची शक्यता राहू नये म्हणून कवि धार्मिक रूपक वापरत असण्याची दाट शक्यता वाटते.
मला कुसुमाग्रजांच्या व्यक्तिगत जिवनाची आजिबात कल्पना नाही आणि वर प्रमाणे मी काढलेला अर्थ पाहून कुसुमाग्रज काय म्हणाले असते माहित नाही पण इन एनी केस
नात्यातील श्रद्धा एवढी की निखार्याने इजा होऊ नये म्हणून सगळे झेलण्यासाठी स्वतःहून स्विकारलेला अबोला याचा हिंदूधर्मात देवावर टिका राग करण्यास वाव नसल्याचा लादलेल्या सेन्सॉरशीप रिलेटेड कुणि अर्थ काढतोय पाहून कुसुमाग्रज काय म्हणाले असते कोण जाणे ?
देवावर टिका न करु देणारे काही असतात नाही असे नाही पण मोठ्या मनाने मोठ्या प्रमाणातील राग आणि टिका झेलणारा आमचे हिंदू देव (यादी मागील धाग्यातून देऊन झालेली आहे) नास्तिकांना का दिसेनासे होत असतील. कितीतरी संतसाहित्य ते भक्तीरुपात देवा प्रती राग आणि टिकारसही दिसून येतो याची माहिती परधर्मीयांना नसणे समजण्यासारखे आहे हिंदू धर्मीयांना का नसावी?
असो एकुण कुसुमाग्रजांची कविता विरसाकडून खर्याखुर्या प्रेमाच्या सकारात्मक श्रद्धेच्या वीररसाकडे जाते. याचा एक नवा अर्थबोध होण्याचा योग धागालेखातील विरसग्रहणामुळे आला यासाठी धागा लेखकाचे अनेक आभार.
* मानतून तर तूला दूर जाण्यापासून थांबण्याची इच्छा आहे एवजी
** मनातून तर तूला दूर जाण्यापासून थांबवण्याची इच्छा आहे.