काथ्याकूट

बुद्धिबळातील चालींचा राजकारणात उपयोग

Primary tabs

पेशव्यांच्या दरबारात एका सरदाराने (सखाराम बापू बोकील असू शकतील) बुद्धिबळातील चाली वापरून काही सल्ला (निझामाविरुद्ध) दिला होता असे लहानपणी वाचल्याचे आठवते. कोणाला याबद्दल काही अधिक माहिती असेल तर ती कृपया द्यावी हि विनंती.

सुनील

शालेय पाठ्यपुस्तकात, या संदर्भात एक धडा होता. तो आता अंधुकसा आठवतोय.

कुठल्याश्या मोहिमेसाठी पेशव्यांनी नागपुरकर भोसल्यांना सामील होण्यास सांगितले होते. भोसले तसे निघालेही. त्याच वेळेस पुण्यातील एका बुद्धिबळ खेळात, सखाराम बापुंनी भोसल्यांच्या पुण्यातील प्रतिनिधीस, "राजा दोन घरे मागे घ्या", असा सल्ला दिला आणि मोहिमेत सामील होण्यासाठी निघालेले भोसले माघारी परतले.

असे काहीसे होते असे आठवतेय.

हो बहुधा हाच धडा असावा. पण माझी समजूत होती कि बापूनी दिलेल्या सल्ल्यात बुद्धिबळाच्या दोन चालींचा उपयोग होता. असो. धन्यवाद. सिरुसेरी आणि मनो यांनी दर्शविलेल्या शक्यतेबद्दल त्यांचेही आभार.

सिरुसेरि

या बाबत एक शक्यता / अंदाज -- माधवराव पेशवे आणी राघोबा यांच्यामधे वाद होते . सखारामबापु यांचा कल राघोबांकडे होता . सखारामबापु यांच्या विरोधी हालचाली पाहुन माधवराव यांनी बापुंना नजरकैदेत ठेवले . त्यामुळे माधवरावांची कोंडी करण्यासाठी किंवा त्यांना आवश्यक ती कुमक मिळु नये म्हणुन पुण्यातील एका बुद्धिबळ खेळात, सखाराम बापुंनी पुण्यातील प्रतिनिधीस, "राजा दोन घरे मागे घ्या", असा सल्ला दिला .

मनो

दुसरा एक किस्सा - ना स इनामदार यांनी सांगितलेला.

अखेरच्या पेशव्यांच्या मर्जीतले असें सरदार नगरकर. त्यांच्या घराण्यात चालत आलेली एक कथा. नगरकरांचे आजोबा पुष्कळ वृद्ध असावेत. एक दिवशी नातवाला खेळवताना त्यांनी सांगितलेली गोष्ट, नातवाकडून आज इनामदार यांच्या कानी पडत होती.

पेशवाई अस्ताला जाण्याच्या सुमारास इंग्रजांशी बिघाड करण्याचा पेशव्यांचा मनोदय पक्का झाला होता. त्यावेळी इंग्रजांच्याकडून फितुरीचे प्रयत्न चालूच होते. दोन्ही बाजूंचे हेर सगळीकडे होतेच. गोष्टी निकराला आल्या त्या वेळी दोन्हीकडून निरोपावर निरोप येत होते.

अशा एका वेळी उत्तररात्री गढीच्या दारावर एक सांडणीस्वार आला. त्याच्या हातात एक पिशवी होती आणि तत्कालीन सरदार नगरकर यांच्यासाठी फक्त एक तोंडी निरोप होता. सरदार भेटल्यावर स्वार फक्त एवढेच म्हणाला -"वजीर गेला तरी चालेल, पण राजा राखा." राजा राखा हे शेवटचे शब्द तीनदा उच्चारून सांडणीस्वार रात्रीच्या अंधारात नाहीसा झाला. सरदारांनी हातातली रेशमी पिशवी उघडली, त्यात निरोपाची आठवण राहावी म्हणून होता तो फक्त बुद्धिबळातला राजा!

गॉडजिला

मंत्रावेगळा मधील प्रसंग आहे ना ?