काथ्याकूट

आणीबाणीची चाहूल- भाग ०

Primary tabs

नमस्कार मंडळी,

बोका-ए-आझम हे मिपावरील एक चतुरस्त्र व्यक्तिमत्व होते हे आपल्या सगळ्यांना माहितच आहे. त्याला मी अगदी दोन-तीन वेळेला भेटलो असेन आणि फोनवर फार तर सात-आठ वेळा बोलणे झाले असेल. तरीही आमच्या दोघांच्याही आवडीनिवडीचे विषय बर्‍यापैकी सारखे असल्याने त्याच्याशी माझी चांगली मैत्री झाली होती. २०१७ च्या सुमारास एकदा मिपावर कोणत्यातरी प्रतिसादात मी लिहिले होते की एकदा मला मिपावर स्वातंत्र्योत्तर भारताचा राजकीय इतिहास ही प्रदीर्घ लेखमाला लिहायची आहे. त्यानंतर त्याचा मला फोन आला होता आणि त्या लेखमालेसाठी त्यालाही लिहायला आवडेल असे त्याने मला सांगितले. त्याबद्दल आणखी दोन-तीनदा फोनवर बोलणे झाले तरी मी मुलखाचा आळशी असल्याने मीच चालढकल करत राहिलो. त्यातून पुढे या लेखमालेचे काहीच झाले नाही. नोव्हेंबर २०१८ मध्ये काळाने बोक्याला आपल्यापासून हिरावून नेले. मी पण मिपापासून २०१८ ते २०२१ या काळात दूर होतो.

फेब्रुवारी २०२१ मध्ये मी मिपावर परत आल्यापासून बोक्याशी या विषयावर बोलणे झाले होते त्याविषयी आपण काहीच केले नाही याची टोचणी लागली होती. स्वातंत्र्योत्तर भारताच्या राजकीय इतिहासावर लेखमाला लिहिणे म्हणजे सोपी गोष्ट नाही. तेव्हा सगळ्या इतिहासावर नाही तरी स्वातंत्र्योत्तर भारताच्या इतिहासातील एक महत्वाचे पर्व- आणीबाणी याविषयी तरी काहीतरी लिहावे असे मी ठरविले. त्यातही १२ जून १९७५ रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाने इंदिरा गांधींची लोकसभेवर झालेली निवड रद्द ठरविणारा ऐतिहासिक निकाल दिला त्याविषयी काहीतरी लिहावे असे ठरविले. त्यातून या लेखमालेची कल्पना सुचली. गेल्या काही दिवसात मी पुढील दोन पुस्तके वाचली. ही लेखमाला त्या दोन पुस्तकांवर आणि थोडेफार इंटरनेटवर केलेल्या इतर शोधावर आधारीत असेलः

१. प्रशांत भूषण यांचे The Case That Shook India: The Verdict That Led To The Emergency
२. कुलदीप नय्यर यांचे Judgment: Inside Story of the Emergency in India .

खरं सांगायचं तर प्रशांत भूषण आणि कुलदीप नय्यर हे दोघेही मला आवडत नाहीत- म्हणजे त्यांचे राजकीय विचार मला आवडत नाहीत/ पटत नाहीत. तरीही या दोन पुस्तकांमध्ये 'फॅक्ट्स' म्हणजे घटना जशा घडल्या त्याचाच परामर्श आहे. त्यामुळे या दोन पुस्तकांना आधार घेण्यात मला तरी काही गैर वाटत नाही. तसेच १९७० ते १९७६-७७ पर्यंत इंदिरा गांधींच्या काँग्रेसकडून Socialist India नावाचे एक साप्ताहिक प्रसिध्द केले जायचे. इंदरकुमार गुजराल, नंदिनी सत्पथी वगैरे काँग्रेसचे नेते या साप्ताहिकाशी निगडीत होते. त्याचे अंक गुगल बुक्सवर बघायला मिळाले. त्याचाही संदर्भ घेतला आहे.

आताचा बेत असा आहे की १ जूनपासून लेखमालेचे भाग इथे टाकायला सुरवात करेन. १२ जूनला अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निकालाला ४६ वर्षे पूर्ण होतील. त्या दिवशी तो निकाल आला हा भाग येईल. तो लेखमालेतील नववा भाग असेल. हे सगळे भाग लिहून तयार आहेत. १२ ते २५ जून १९७५ पर्यंत म्हणजे आणीबाणीची घोषणा होईपर्यंत नक्की काय घडामोडी घडल्या याविषयीही वेळ मिळाल्यास लिहिणार आहे. मात्र आणीबाणी लादली हा भाग बरोबर २५ जूनला येईलच याची खात्री आता देऊ शकत नाही कारण पुढचे भाग लिहून व्हायचे आहेत. कुलदीप नय्यर यांनी आणीबाणीवर इतरही काही पुस्तके लिहिली आहेत. ती वाचून त्या पुस्तकांचाही संदर्भ जमल्यास घेईन. पहिले १० भाग त्या खटल्याशी आणि निकालाशी संबंधित असल्याने त्यात कायदेशीर गोष्टी येतील. कायदा या विषयात मी कोणतेही शिक्षण घेतले नसले तरी त्या विषयात भरपूर रस मला आहे. हे भाग रटाळ आणि कंटाळवाणे होणार नाहीत याची शक्य तितकी काळजी घेऊन पहिले ९ भाग लिहून तयार आहेत. तसेच तेव्हाच्या घटनांमधील पात्रांचा आताच्या काळातील कोणाशी संबंध आढळला तर त्याविषयीही लिहिणार आहे.

तेव्हा बोका-ए-आझमच्या स्मृतीस अभिवादन करून या लेखमालेची सुरवात करत आहे. पहिल्या भागात भेटू १ जूनला.

गुल्लू दादा

सविस्तर येऊ द्या सर. विस्तारभय मनी बाळगून हात आखडते घेऊ नको. आम्ही सर्व वाचनास उत्सुक आहोत. शुभेच्छा.:)

Bhakti

उत्तम सुरूवात! उत्सुकता!

कंजूस

बरेच मिपाकर १९८५ नंतर जन्म झालेले असतील त्यांच्यासाठी हे वाचनीय ठरेल.
लेखमाला येण्यास दोन दिवस अवकाश आहे. तोपर्यंत वाचकांनी आणिबाणीवर कोणती पुस्तके वाचली आहेत हे द्यावे.

श्रीगुरुजी

अरे वा! मस्त होईल लेखमाला!

त्या काळातील बऱ्याच घटना लक्षात आहेत. आठवणीनुसार प्रतिसादात लिहीन.

सुखी

अरे वा वा...
जबरदस्त सुरवात...

बोका ए आझम ना सुरेख श्रद्धांजली ठरेल की लेखमाला

__/\__

भीडस्त

सगळीकडे तुम्हाला मिस करत होतो
सकाळीच फेसबूकवर फोटो दिसला.
इथे हा टीझर....

W A- वरही आता संवादाला काही निमित्त होईलच.

तुमच्या लिखाणाचा चाहता आहेच,तेव्हा होऊन जाऊ द्या

बोका-ए-आझम हे मिपावरील एक चतुरस्त्र व्यक्तिमत्व होते या वाक्याला अनुमोदन ! तुमचे लेख / प्रतिसाद नेहमीच वाचनीय असतात. रंगतदार मालिकेच्या प्रतिक्षेत आहे.

तुमचे लेख म्हणजे मेजवानीच.
येऊ द्या सविस्तरपणे. आम्ही उत्सुक आहोत वाचायला.
शुभेच्छा

सुखीमाणूस

आणीबाणी वर तुमचे लेख म्हणजे जणु मेजवानी आमच्यासाठी
धन्यवाद

स्वलिखित

"आणीबाणीच्या काळात मुस्कटदाबी ती हीच "
एवढंच काय तो संदर्भ आणि संबंध ,

वामन देशमुख

चंसुकु,

तुमच्या लिखाणाची मेजवानी चाखायला मिळेल ही खरंच आनंदाची बाब आहे.

मदनबाण

बोका-ए-आझमच्या शी माझ्या पुष्कळ गप्पा झाल्या तो आमच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर देखील होता... तो जाणे फार दु:खद आहे आणि त्याला आम्ही कधी विसरु शकणार नाही, तो ग्रुप मध्ये नाही हेच आम्हाला सहन होत नव्हते म्हणुन ग्रुपवर आम्ही वेगळ्याच विषयांवर दुसर्‍या दिवशी बोलु लागलो... पण खरं सांगु तो अजुनही मनातुन गेला नाहीये... त्याची आठवण अधुन मधुन येतेच.
तुमच्या लेखमालेस शुभेच्छा...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- "Life is what happens when you're busy making other plans." :- John Lennon

गॉडजिला

छान लिहली आहे. भेटु १ जुनला.

गणेशा

लेखमालेला खुप साऱ्या शुभेच्छा...
वाट पाहत आहे...
या लेखमाले नंतर पुर्ण स्वातंत्र्या नंतरची सर्व लेखमाला पण तुम्ही लिहावी असे वाटते आहे..

ॲबसेंट माइंडेड…

कायदा या विषयात मी कोणतेही शिक्षण घेतले नसले तरी त्या विषयात भरपूर रस मला आहे.
माझेही असेच आहे. मालिका विषय माझ्या जन्मापूर्वीचा असला तरी वाचायला आवडेल. पुढच्या भागाची वाट बघतोय.

यश राज

आणीबाणी हा उत्सुकतेचा विषय आहे त्याबद्दल जाणून घेण्यास खूप आवडेल.

खेडूत

बोकाशेठ यांना या मालिकेतून आदरांजली देण्याची कल्पना अप्रतिम!!

बाकी आणीबाणीच्या सरकारी छळाचा त्रास वयाच्या सातव्या वर्षी थेट झालेला एक मुलगा असल्याने इंदिरा आणि त्यांच्या पिढ्यांबद्दल कमालीची नकारात्मक भावना आहे. आणीबाणीच्या काळातला एकेक दिवस आजही आठवतो.

आपल्या लेखनाची वाट पहात आहे.

मोहन

आपल्या लेखमालेस शुभेच्छा. प्रतीक्षेत आहे.

आग्या१९९०

बाकी आणीबाणीच्या सरकारी छळाचा त्रास वयाच्या सातव्या वर्षी थेट झालेला एक मुलगा
ह्यावयात नेमका काय त्रास झाला हे वाचायला आवडेल.आणीबाणी ही काँगेसची चूक होती हे मान्य आहे.

चौकस२१२

१२ ते २५ जून १९७५ पर्यंत म्हणजे आणीबाणीची घोषणा होईपर्यंत नक्की काय घडामोडी घडल्या
यात जास्त उत्सुकता आहे

"अनुशासन पर्व" (संदर्भः शाळा, मिलिंद बोकील) विषयी वाचायला आवडेल.
त्या त्या लेखावर त्या त्या भागाविषयी प्रश्नोत्तरे व प्रतिसाद असतीलच.
मला वाटते, जेनेरिक कॉमन प्रश्न इथे विचारता येतील.

आणीबाणीने समाजाच्या विविध अंगांवर कसा चांगला-वाईट परिणाम झाला, ते माहिती नाही.
टोकाची माहिती (खरंतर मतं) दोन्ही बाजूची ऐकू येतात.
उदा. आणीबाणीने सरकारी नोकरवर्गाला चांगली शिस्त लावली, 'आम जनतेला' त्रास झाला नाही पासून ते लोकशाहीची हत्या झाली, माध्यमांची गळचेपी झाली, हुकुमशाही अवतरली पर्यंत विविध मते ऐकू येतात. तर त्यावेळी ऑन फील्ड कशी परिस्थिती होती, याविषयी अभिनिवेशरहित मते / अनुभव / माहिती वाचायला आवडतील.

शा वि कु

याचसोबत मिनर्व्हा मिल्स आणि केशवानंद पण कव्हर करून टाका!

सर टोबी

आणीबाणीवरील लेख हा आपल्या मनाच्या सच्चेपणाचा कस पाहणारे आव्हान असेल. केवळ सत्ता टिकविण्यासाठी देशाला आणीबाणीच्या खाईत इंदिराजींनी लोटले असे फक्त व्हॅट्सऍप विद्यापीठाचे स्नातकच म्हणू शकतात. या संस्थळावर पूर्वी या विषयावर साक्षेपी लिखाण झालेले आहे. औद्योगिक क्षेत्रातील कामगारांचा असंतोष, जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी आणि काळाबाजार, प्रशासनातील दिरंगाई या सारख्या अगदी दैनंदिन जीवनाला स्पर्श करणाऱ्या गोष्टींवर आणीबाणीच्या सुरवातीच्या काळात नजरेत भरेल असा बदल घडून आला. साध्या गुजरातमधील वैद्यकीय कॉलेजच्या कँटिनमधील जेवणाच्या दरातील वाढीविरुध्धचे आंदोलनाचे लोन देशभर पसरायला लागले होते यावरून त्यावेळेसच्या राजकीय बेदिली माजविण्याच्या प्रश्नांची तीव्रता लक्षात यावी. आपला हा प्रयत्न एकमेव नाहीय आणि त्यासाठीची फुटपट्टीदेखील याच संस्थळावर उपलब्ध आहे. मला जुन्या लेखांचा शोध मिपावर कसा घ्यावा हे माहित नाही. कोणी अशी मदत करू शकल्यास उत्तम.

प्रदीप

साध्या गुजरातमधील वैद्यकीय कॉलेजच्या कँटिनमधील जेवणाच्या दरातील वाढीविरुध्धचे आंदोलनाचे लोन देशभर पसरायला लागले होते

नवनिर्माण आंदोलन १९७४ साली झाले. ते उत्स्फुर्त होते व त्यांत कुठलीही बाहेरील चेतावणी होती असे कुणी सप्रमाण दर्शवून दिलेले नाही. ह्या आंदोलनाचे सुरूवातीचे नेते मनिषी जानी इत्यादी अगदी साधी पोरे होती. काही वर्षांनंतर - म्हणजे १९७७- ८ च्या सुमारास त्यांची टोळी वाडिया हॉस्पिटलच्या बाहेरील महेता गार्डन रेस्टोरंट्मधे बसून गप्पा छाटीत असे, ते बरेच जवळून पाहिले आहे.

ह्या आंदोलनापासून स्फूर्ति घेऊन, देशांत कुठेकुठे आंदोलने झाली, व केव्हा, ह्याविषयी काही सांगता येईल काय?

प्रदीप

ह्या (बहुधा डाव्या) संस्थळावर ह्याविषयी काही टिपण्णी आहे. २०१९ मधे, जेव्हा CAA विरोधातील 'देशव्यापी वगैरे आंदोलने' जोरांत सुरू होती, तेव्हा हे लिहीले गेले आहे. त्यांत "The police met both movements with brute force.... The governments of the day tried to use the police to quell dissent..". वगैरे अनाकलीय क्लेम्स आहेत. (चिमण पटेलच्या सरकारने तेव्हा काय केले ते अनाकलीय नव्हे तर मोदी सरकारने CAAचे आंदोलन पोलिसांच्या पाशवी बळाच्या आधारे चिरडून टाकले / टाकत आहे, असली हास्यास्पद विधाने त्यांत आहेत). लेखाचे सबहेडिंग A blow to the Hindutva agenda of the BJP and the RSS? वगैरे स्वप्नरंजक आहे.

आता, हे अगदी अलिकडचेच असल्याने बहुतांश जनतेला CAA आंदोलनाविषयी बर्‍यापैकी माहिती आहे तेव्हा ह्या लिखाणाची विश्वासार्हता काय हे दिसतेच आहे.

कॉमी

त्याच्याने काय फरक पडावा ? आंदोलन देशभर पसरते तर ते थांबवायचा काय संबंध ? राजकिय बेदिली शेतकरी आंदोलनामुळे माजते आहे असे म्हणुन सद्य सरकारने आणीबाणी लावली तर चालणार कुठे आहे ?

श्रीगुरुजी

आणीबाणीवरील लेख हा आपल्या मनाच्या सच्चेपणाचा कस पाहणारे आव्हान असेल.

म्हणजे आणिबाणी हा खूप चांगला निर्णय होता, ते अनुशासन पर्व होते, त्या काळात देशाची प्रचंड प्रगती झाली, आणिबाणीचे सर्व जनतेने उस्फूर्त स्वागत केले होते, त्या काळात जनता अत्यंत आनंदी होती, पोलिस अत्यंत सौजन्यशील होते, त्या काळात समाजहिताचे असंख्य निर्णय घेतले होते . . . असे लिहिले नाही तर ते लेखन खोटारडेपणा समजला जाईल.

आग्या१९९०

आणीबाणीचा उद्देशच सत्ता टिकविणे हा होता. अंमलबजावणीत सुप्त इच्छा पूर्ण करायचा प्रयत्न केला गेला.

प्रदीप

आपला, म्हणजे पक्क्या मडक्याचा, आम्हा पामर कच्च्या पडक्यांना आशिर्वाद आम्ही येथे गृहितच धरला आहे, हो! म्हणूनच आम्ही क.म. एकमेकांत चर्चा करत राहतो, वाद- प्रतिवाद करीत राहतो.

व्यक्तीगत न होता, चर्चा, वाद-प्रतिवाद, संवाद करणे ही चांगलीच गोष्ट आहे. आपणही एखादी दमदार मालिका लिहावी. आपणास वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा. ;)

-दिलीप बिरुटे

कासव

आम्ही काही ही आणीबाणी पहिली नाही. ऐकले मात्र भरपूर. ज्यांनी सांगितले ते आमचेच कसे बरोबर हे सांगत बसतात आणि आपापल्या राजकीय दैवताला फुले वाहत बसतात.

प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात तसेच आणीबाणी चे काही फायदे पण झाले असतील ते ही वाचायला आवडेल. दोन्ही बाजू वाचायला आवडेल. तसेच नेत्याला अपेक्षित आणीबाणी चे चांगले परिणाम काही नालायक लोकांमुळे मिळाले नाहीत का ते ही जाणून घ्यायला आवडेल.

स्वातंत्र्योत्तर भारताच्या इतिहासातील या महत्त्वाच्या प्रकरणाबाबत मी आजवर फारच थोडे वाचले आहे (वर्तमानपत्रांतले लेख वगैरे). माझ्यासाठी ही लेखमालिका अत्यंत माहितीपूर्ण ठरेल. या लेखनप्रपंचासाठी धन्यवाद व हे कार्य यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.

“इंदिरा गांधींविरोधात न्यायालयानं दिलेला ‘तो’ निर्णय प्रचंड हिंमतीचा”, सरन्यायाधीशांनी दिला दाखला!

भारताच्या माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांच्यासंदर्भात अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या एका ऐतिहासिक निकालाचा संदर्भ यावेळी न्यायमूर्ती एन. व्ही. रामन यांनी दिला. “१९७५ साली अलाहाबाद उच्च न्यायालयात न्यायमूर्ती जगमोहन लाल सिन्हा यांच्यासमोर इंदिरा गांधी यांच्या पंतप्रधान पदासंदर्भातला खटला सुरू होता. न्यायमूर्ती सिन्हा यांनी इंदिरा गांधी यांना पंतप्रधानपदी राहण्यासाठी अपात्र ठरवलं आणि त्या एका निर्णयामळे आख्खा देश हादरला. हा एक प्रचंड हिंमतीचा निकाल होता. आपल्याला असं म्हणता येईल, की या निकालाचाच परिणाम अंतिमत: देशात आणीबाणी जाहीर होण्यात झाला”, असं न्यायमूर्ती रामन यावेळी म्हणाले.

Rajesh188

हा निर्णय पण खूप धाडसी आहे.आणि ते पण काही काळ च आणि परत आणीबाणी उठवून परत निवडणूक जाहीर करणे हा निर्णय तर अती उच्च धाडस असलेला इंदिराजी सारखी च व्यक्ती घेवू शकेल असा निर्णय.
न्यायधिष निर्णय देवून मोकळे झाले त्यांचे काही धाडस नाही.त्या पुढे कायमची लोकशाही रद्द करून हुकूम शाही राजवट आली असती तर न्यायाधीश परदेशात गेले असते.पण
देशात आणीबाणी जाहीर करून त्या पुढे हुकूम शाही आरामात इंदिराजी राबवू शकल्या असत्या .
लोकप्रियतेचा फायदा आरामात त्यांनी घेतला असता.देशाची एक हाती
सत्ता सहज इंदिराजी नी ताब्यात घेतली असती.
चार टाळकी विरोध करूंन नंतर शांत झाली असती.
खऱ्या great तर इंदिराजी आहेत त्यांनी काही महिन्यात आणीबाणी रद्द करून निवडणुका घेतल्या .
राज्य घटने प्रमाणे वागणे किंवा न वागणे हे त्यांच्या पूर्ण हातात होते.

सुक्या

राज्य घटने प्रमाणे वागणे किंवा न वागणे हे त्यांच्या पूर्ण हातात होते.

लोकशाही आणी हुकुमशाही यातला फरक माहीत आहे काय?

सुबोध खरे

देशात आणीबाणी जाहीर करून त्या पुढे हुकूम शाही आरामात इंदिराजी राबवू शकल्या असत्या .

अख्ख रामायण ऐकल्यावर सीता कोण हे विचारल्यासारखं करताय?

मग ते पुढचे २१ माहिने काय राम राज्य चालू होतं ( जून १९७५ ते मार्च १९७७)