पारगाव भातोडी- १
Primary tabs
पारगाव भातोडी
गुगल करता करता , मराठा युद्ध जेथे झाले त्याची रोचक माहिती वाचली.प्रवास मोठा नव्हता ,तेव्हा जवळच्याच पण ऐतिहासिक पानाला कधी भेट देईन याचा मागोवा घेत होते.घरीच बनवलेल्या मिसळ पावचा भरपेट न्याहरी करून निघाले.
रस्त्याने नव्याने चाललेल्या उड्डाणपुलाच्या कामाची प्रचंड लगबग होती.हळूहळू ती लगबग मागे टाकत टाकत मिलिटरी एरिया त्याच्या ऐसपैस भव्य इमारती आणि काही रणगाडे नजरेस पडत होत्या.पुढे तो भाग संपताच दुतर्फा हिरवीगार कांद्याची शेत नांदताना दिसली.आणि मोकळी हवा केसांशी खेळू लागली.मास्क अलगदच पर्समधे शिरला.आता रस्तावरची वर्दळही नाहीशी झाली.लवकरच पारगाव भातोडी वेस आली.टिपिकल गावची घर पण कमी लोकसंख्या वाटत होती.तेव्हा डाव्या बाजूस नृसिंह मंदिर आणि उजव्या बाजूस शरीफ राजे समाधी स्थान होते.मंदिर जुने आहे असे समजले ,तेव्हा नक्कीच पाहायचे म्हणत डाव्या बाजूला वळालो.
दुरूनच तीन उंच कळस,सुंदर दगडी पायऱ्या ,घाट पाहून अचंबित आणि उत्साहित झाले.मंदिर खाली उतरून जायचे होते.जीव हळू हळू थंड होऊ लागला.अत्यंत भव्य आणि विशिष्ट रचना असलेले हे सुंदर मंदिर आहे ,जे १४४० ला पेशवा कान्होजी नरसोजी यांनी बांधले आहे. आत गाभारा वेगळाच आहे.दक्षिणमुखी प्रवेशद्वार आहे पण मूर्तीचे मुख समोर नसून पूर्वेला एका खिडकीच्या समोर आहे जिथून ध्रुव तार्याचे दर्शन होते असा उल्लेख आहे.स्वयंभू मूर्तीची रचनाही अनोखी आहे.
सुंदर प्रवेशद्वार
स्वयंभू नृसिंह
तांडव गणपती
गरुड देव
मंदिर मात्र ११११ सालचे आहे.एका ठिकाणची खिडकी इतकी अप्रूप आहे,नजरेला सुखावणारी जळकीर्ती ...काळ्या पाषाणात कोरलेली महिरप..सहज ठाण मांडता अशी जागा..:)
प्रदक्षिणा घालण्यासाठी वरती बांधलेल्या देखण्या दोन बुरुजावर आपण जाऊन शांत ,निरामय वाहत्या नदीचे दर्शन घेऊ शकतो.दोन्ही बाजूंनी नदीच्या प्रवाहात उतरण्यासाठी भव्य पायऱ्याची रचना आहे.मंदिरालगतच घाट पाहून वाईच्या मंदिराची आठवण झाली .तलावात पाय सोडून निवांतपणा घेतांना निसर्गसखे खेकडा,मासोळ्या आपपल्या विश्वात रमताना पाहून मजा येत होती.
या घाटाची देखभाल केली तर एका पुरातन काळाचा गंध मन भरून अनुभवता येईल असे वाटून गेले.
मनोहरी जळ...
घाटाचा हाही उपयोग ..
उन्ह चढू लागली तेव्हा लवकरच ऐतिहासिक स्थळ पाहण्यसाठी उजव्या बाजूस वळालो.समाधीस्थानाकडे जाण्यासाठी कोणतीच पाटी नसल्याने जरा गैरसोय झाली.पण चिंचवडच्या गडकिल्ले सेवा समिती, गडवाट या संस्थने २०१५ ला याचा जीर्णोदधार करून इतिहास संवर्धनाचा एक उत्तम पायंडा दिला आहे.
शरीफराजे समाधीस्थळ
१६२४ ला भातवशेची लढाई झाली. अहमदनगर शहरापासून दहा मैल अंतरावर भातवडी तलावाजवळ शहाजी व शरीफजी राजांनी घडवलेला जगप्रसिद्ध रणसंग्राम होता. निजामशाहाकडून लढताना, सलाबतखान (निजामशहाचा इंजिनीयर) ने बांधलेला तलाव फोडून आदिलशाही आणि मोगलांचे सैन्य,शहाजी व शरीफजी राजांनी गनिमी काव्याचा वापर करून परास्त केले होते, मराठ्यांनी जिंकलेले हे पहिले युद्ध
होय. शरीफजी राजांना वीर मरण आले आणि शहाजीराजांनी त्यांच्या तेराव्याला भातवडीचे जेवण ठेवले तेव्हा या गावाचे भातोडी असे नाव पडले.
इतरत्र फिरताना “हे चिंचेचे झाड “गान आठवत राहिले कारण असंख्य चिंचेची झाडे आजूबाजूला होती.पटापट चिंचा तोडल्या तर चक्क गाभुळलेल्या लाल चिंचा होत्या “आंधळा मागतो एक डोळा,देव देतो दोन”
मस्त लाल चिंच
पुढे वाघेश्वरी देवीचे दर्शन घेतले.
पाथर्डी रस्त्यानेच वीरभाद्राचे जुने मंदिर आहे.वीरभद्र शंकराचा मुलगा आहे आणि जो लिंगायत समाजाचा कुलदैवत आहे असे समजले.मूर्ती अत्यंत विलोभनीय आहे.
वीरभद्र
-भक्ती
फोटो चांगले आले आहेत
एका वेगळ्याच ठिकाणाची केलेली सफर आवडली. नदी अत्यंत स्वच्छ दिसतेय.
धन्यवाद!
होय प्रवाह स्वच्छ आहे.आजूबाजूच्या गावाला यातून पाणी पुरवठा व्हायचा.
घाटाचा हाच एक उपयोग बघितलाय :D
:D
पाराचा हाही उपयोग
पिंपळाच्या पाराखाली दोन तीन शुभ्र कपड्यातले ज्येष्ठ निवांत वामकुक्षी घेत होते ;)
आणि चटपटीत लेख.
तरी जवळपास कलावंतीण महल, इंग्रजांनी बांधलेला तलाव, हत्ती बारव,नगरकर वाडा, विश्वेश्वर मंदिर राहिले, पुढच्या वेळी.
आपली ही नजीकची प्रवासवर्णनं छान असतात . लिहीत राहा .
छोट्या छोट्या नोंदी घ्यायची सवय मिपामुळे लागली.
माहिती व फोटो दोन्हीही आवडले
लेख आणि प्रकाश चित्रे दोन्ही छान.
आटोपशीर प्रवासवृत्तांत आवडला.
हा उल्लेख वाचून जरा विचारात पडलो आहे १४४० साली पेशवे ? कृपया खुलासा करावा.
हे पुण्यातील वर्णन आहे किंवा कसे ? तसा काही उल्लेख नसल्याने समजले नाही. हल्ली गूगल मॅपची सोय उपलब्ध असल्याने प्रवासाचा मार्ग, अंतरे वगैरेचा नकाशा/पटलछवि (screenshot) दिले तर तिथे जाऊ इच्छिणारांसाठी उपयुक्त ठरेल.
पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
हा उल्लेख वाचून जरा विचारात पडलो आहे १४४० साली पेशवे ? कृपया खुलासा करावा.मी एका ठिकाणी वाचले, तसेच लिहिले.शहानिशा करावी लागेल.
हे पुण्यातील वर्णन आहे किंवा कसे ? तसा काही उल्लेख नसल्याने समजले नाही.नाही हे अहमदनगर-जामखेड रोडचे वर्णन आहे.गंमत अशी की मी ९ वर्षे , म्हणजे साधारण ३३०० वेळा या महामार्गाचा office साठी वापर केला आहे.पण कधीच ८-९ किमी.चे हे सुंदर मंदिर पाहिले नाही.I was damn workoholic :)
हा उल्लेख वाचून जरा विचारात पडलो आहे १४४० साली पेशवे ? कृपया खुलासा करावा.मी एका ठिकाणी वाचले, तसेच लिहिले.शहानिशा करावी लागेल.
हे पुण्यातील वर्णन आहे किंवा कसे ? तसा काही उल्लेख नसल्याने समजले नाही.नाही हे अहमदनगर-जामखेड रोडचे वर्णन आहे.गंमत अशी की मी ९ वर्षे , म्हणजे साधारण ३३०० वेळा या महामार्गाचा office साठी वापर केला आहे.पण कधीच ८-९ किमी.चे हे सुंदर मंदिर पाहिले नाही.I was damn workoholic :)
आज फार दिवसांनी मिपावर आले आणि भातोडी नाव वाचल्यावर मन पटकन भूतकाळात गेलं. हे माझं आजोळ, आजी-आजोबांच्या, पानमळ्याच्या, शेताच्या जवळून दुपारच्या दशम्या सगळ्यांनी मिळून खाण्याच्या, शेताला विहीरीवरून पाणी दिलं की त्याच्या मागे पळत जाण्याच्या, कैऱ्या-चिंचा झाडावरून लगेच तोडून त्याचा स्वाद घेण्याच्या फार सुरेख आठवणी आहेत. नरसिंहच्या देवळात आलो त्यादिवशी व परत निघणार त्यादिवशी दर्शन घेणं असयायचं पण एरवीही ब-याच वेळा जाणं व्हायचे. नगर जिल्हा म्हणजे कायम पाण्याचा दुष्काळ, माझी मावशी कितीतरी लांबवरून रोज पाणी आणायची, आम्हीपण छोट्या कळश्या घेऊन जायचो - ऊन्हाळ्याच्या दिवसात आमच्यासारखे बाहेरचे लोकं आले की अजून पाणी लागायचं.
अनेक धन्यवाद लेखाबद्दल!
मस्तच आठवणी!
नगर जिल्हा म्हणजे कायम पाण्याचा दुष्काळ, माझी मावशी कितीतरी लांबवरून रोज पाणी आणायचीआमची उन्हाळी सुट्टी हापश्यावरच जायची..आता सुधारणा होतेय.
नितीनजी,गोरगावलेकर ताई धन्यवाद!
चांगली सुरुवात!

मी तर जन्मापासून जामखेड रस्त्यानेच आजोळी जातोय, पण पाऊल कधी उजव्या हाताला ८-९ किमी आत गेले नाही. ना नगरमध्ये कुणाकडून या मंदिरा बद्दल ऐकलं गेलं. मागच्याच आठवड्यात नगरच्या एका माजी जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्याचा योग आला होता. त्यांनी नगरच्या अशा दुर्लक्षित प्राचीन ठिकाणां बद्दल बरीच माहिती दिली. त्यात भातोडी पारगावच्या मंदिराचा आवर्जून उल्लेख होता. काल बऱ्याच दिवसांनी मिपा वर आलो आणि इथे पुन्हा ते मंदिर. नृसिंहच बोलावतोय म्हणायचं! लवकरच चक्कर टाकतो मी पण.
लेख आवडला. आणखी लिहित राहा.
शुभेच्छा.
अ आ आणि अनुस्वार जी धन्यवाद!
छान लिहिताय 👍
पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
भिंगारला राहून पारगाव (भातोडी) कडे कधी एव्हडे लक्षच दिले गेले नाही