काथ्याकूट

भारतात विमान उत्पादन का होत नाही?

Primary tabs

दोन-तीन वर्षांपूर्वी मला माझ्या काकांच्या मित्राने सहज बोलताना प्रश्न विचारला की भारतात विमान उत्पादन का होत नाही. तेव्हा माझ्याकडे त्याचे उत्तर नव्हते.
आज दोन-तीन वर्षांनी काही मुद्दे मला एकेक करून मिळाले ते असे.

१) विसाव्या शतकाच्या सुरुवातीला राईट बंधूंचे पहिले उड्डाण झाले. १९४० साली वालचंद हिराचंद यांनी हिंदुस्थान एरोनॉटिक्सची स्थापना करून विमान उत्पादनास भारतात सुरुवात केली. मात्र लगेचच १९४२ मध्ये तत्कालीन शासनाने महायुद्धाचे कारण देऊन ती आपल्या ताब्यात घेतली. पुढे स्वातंत्र्योत्तर काळातही त्यावर भारत सरकारची मालकी राहिली. सध्या तिथे रशियाकडून परवाने घेऊन विमाने उत्पादित करायचे काम चालते आणि मुख्यत्वे करून भारतीय लष्कराला विमाने पुरवण्यावर त्यांचा भर आहे

२) स्वातंत्र्योत्तर काळात अवलंबलेल्या नियंत्रणवादी धोरणात (Industries Act १९५१) प्रत्येक गोष्टीकरता उद्योजकांना शासकीय परवानगीची गरज लागत असे. आणि ती परवानगी प्रत्येक अर्जाची स्वातंत्र्यपणे छाननी करून मिळे. अशा काळात जिथे शासन टाटांना हवाईवाहतूकीचा व्यवसाय चालवू देईना तिथे विमान उत्पादन करण्यास कुणी अर्ज केला असता तर तशी परवानगी मिळेल निव्वळ अशक्य.

३) जगातील काही विमान उत्पादन करणाऱ्या कंपन्या आणि त्यांची स्थापना वर्षे
बोईंग - १९१६, दासो - १९२९, एअरबस - १९७० मात्र एअरबस स्थापन करणाऱ्या युरोपातील कंपन्या आधी पासून अस्तित्वात होत्या.
मान उत्पादन करण्याचा याना किमान ५० वर्षांचा अनुभव आहे. आता कुणी भारतातील कंपनीने जरी नव्याने सुरुवात करायची म्हटले तरी या ५० वर्षांच्या अनुभवाशी स्पर्धा कशी होईल?

४) विमानाचे जेट इंजिन हा अतिशय महत्वाचा भाग विमान उत्पादन करणाऱ्या कंपन्या जनरल इलेक्ट्रिक, रोल्स रॉईस, सॅफ्रान, प्रॅट अँड व्हिटनी अशा अन्य कंपनीकडून खरेदी करतात. त्यामुळे त्याच्याशी संबंधित उद्योग आणि संशोधन अस्तित्वात असले पाहिजे.

५) दुसऱ्या महायुद्धाच्या काळात मित्सुबिशी कंपनी जपानी लष्करी विमाने उत्पादित करत असे. आणि अजूनही ते विमानांचे उत्पादन करतातच. १८६० नंतर मेजी पुनरुज्जीवन नावाच्या घटनेमुळे जपानने आधुनिकीकरणाची कास धरली आणि त्यामुळेच मित्सुबिशी सारख्या उद्योगांची तिथे सुरुवात झाली.

६) रशियानेही स्वतःची अशी लष्करी आणि प्रवासी वाहतुकीची विमाने उत्पादित केली आहेत. आपल्या लष्करात आज रशियातील विमाने मोठ्या संख्येने आहेत. रशियातही करशॉफ (किरचॉफ लॉ मधला), मेंडेलिव्ह (आवर्तसारणी तयार करणारा) इ सारखे संशोधक राजेशाहीच्या काळात अस्तित्वात होते.
म्हणजे विसाव्या शतकाच्या सुरुवातीलाच रशिया आणि जपान भारतापेक्षा कितीतरी आधुनिक अवस्थेत होते. भारताला मेजी पुनरुज्जीवनासारखे प्रयत्न करणे ब्रिटिशांच्या राज्यात शक्य होणार नव्हते. तरीही भारतीय सुधारकानी वेळोवेळी आधुनिक मूल्यांचा अंगीकार आपण करावा यासाठी प्रयत्न केलेच आहेत.

७) गेल्या दशकात चीननेही प्रवासी विमान बाजारात आणले आहे. त्यांचे मुख्य ग्राहक सध्या चीनमध्येच आहेत. चीननेही डंग शाओफंग यांच्या नेतृत्वाखाली स्वतःच्या आर्थिक धोरणात मूलभूत बदल घडवून आणले आणि विमानच नाही तर अनेक क्षेत्रात सर्वांना चकित करून टाकणारी प्रगती साधली आहे.
चीननेही इंजिन परदेशी कंपनीचे लावलेले आहे. त्यांना ते मिळू नये याकारताही अमेरिकेत काही प्रयत्न झाले. GE China deal

८) ब्राझील मधील एम्बरेअर ही मुळात शासकीय कंपनी म्हणून १९६९ मध्ये सुरु झाली. आता तिचे खाजगीकरण झाल्याचे दिसते. पण तेही विविध प्रकारच्या विमानाची उत्पादन आणि विक्री करतात असे दिसते. त्यांचा रेव्हेन्यू हिंदुस्थान एअरोनॉटिक्सच्या रेवेन्यूच्या पाचपट तरी आहे.

९) इराणवर असलेल्या आर्थिक निर्बंधांमुळे तिथले विमाने फारच जुनी होऊ लागली आहेत. तसेच देशी उत्पादक नसल्याने त्यांची अडचण झाली आहे.
Iran Boeing deal
आपल्या देशावर कधी अशी येईल असे वाटत नाही.

१०) भारतीय बनावटीचे तेजस, ज्याचा निर्णय १९८३ मध्ये झाला आणि, आपण आत्ताच काही विमाने सेवेत घेतली आहेत. त्याचे इंजिन खरेतर देशी बनावटीचे असणार होते पण ते पूर्ण न झाल्याने सध्या जनरल इलेक्ट्रिकचे इंजिन वापरले आहे. Kaveri Engine

११) भारतातील उद्योजकांनी आता विमान उत्पादन करण्याची इच्छा दाखवली तरी अजून एक विमान उत्पादकास विमाने विकण्यास बाजारपेठ उपलब्ध आहे का तेही बघायला पाहिजे. महिंद्रा एअरोस्पेसच्या रूपात थोडी सुरुवात झालेली आहे.

आपल्याला याबद्दल काय वाटते?

गवि

चर्चा वाचायला आवडेल. महत्वाचा विषय आहे.

केवळ स्पर्धा हे कारण असू शकत नाही. आपण खुद्दच एक मोठे ग्राहक आहोत. शिवाय किंमत हा पैलू अनुभवाच्या वर्षांच्या आकड्यापेक्षा जास्त चमकतो.

स्पेस सायन्समधे उपग्रह प्रक्षेपण या विशिष्ट विषयात आपण इतके यशस्वी झाले आहोत (यशस्वी = किफायतशीर आणि क्वालिटी असे कोम्बिनेशन) की मग विमाननिर्मिती या विषयात मात्र का मागे राहतोय ते कळत नाही. जास्त भांडवलाची आवश्यकता?

.. किंबहुना अतिशय उच्च तंत्र अंतर्भूत असलेल्या अनेक वस्तूंबाबत हे खरं आहे. सेवा देण्यात फार पुढे, पण संशोधन आणि उत्पादनात मागे. इकडचे लोक अन्य देशांत संशोधन करतात. बाकी आमच्याकडे पूर्वी विमाने होती असा दावाही केला जातो. पण ते सर्व पुराणकाळात आणि आता गायब. तूर्त मोठा पल्ला बाकी आहे.

सतत बदलत असणारे तंत्रज्ञान

विमान बांधणीचा आणि जहाज बांधणीचा खर्च अफाट असतो ...

जेम्स वांड

विमाननिर्मिती या विषयात मात्र का मागे राहतोय ते कळत नाही. जास्त भांडवलाची आवश्यकता?

गवि दादा, एअरपोर्ट आणि एअरलाईन्स मध्ये तुम्ही एक्सपर्ट, पण सहज सुचलेले चारआणे मांडतोय.

१. विमाननिर्मिती ह्या अभियांत्रिकी तंत्रज्ञानाचा देशभक्तीशी संलग्न विचारच दरवेळी करावा लागेल असे नाही (वैयक्तिक मत). भांडवली इनपुट विरुद्ध नफा हे गणित मांडायला हवंच .

२. जवळपास पूर्ण प्रवासी विमानान व्यवसाय हा बाय पेक्षा बाय अँड लीज बॅक व्यवसायावर सुरू आहे, अगदी राकेश झुनझुनवालाच्या कंपनीने पण विमानाच्या "ऑर्डर" दिल्या म्हणजे लीज ऍग्रीमेंट फायनल केल्या म्हणायला वाव आहे (डील डिटेल्स मला माहिती नाहीत).

३. युद्धविमान उत्पादन हे संरक्षणाच्या दृष्टिकोनातून एतद्देशीय असावे असे म्हणायला हरकत नाही. पण हल्लीच जे डिफेन्स सेक्टरमधील परदेशी गुंतवणुकीला वाव देण्याचे निर्णय घेण्यात आलेत त्यानुसार सरकारी कंपन्यांची मक्तेदारी किमान चॅलेंज जरी झाली तरी प्रोडक्शन पूर्ण जेव्ही नुसारच चालणार, बोइंग सिकोर्सकी आणि टाटा ऍडव्हान्स सिक्युरिटी सिस्टम्सचे असेच एक जेव्ही सध्या अस्तित्वात असून हेलिकॉप्टर आणि बोइंग निर्मित लढाऊ जहाजांचे सुटे पार्ट्स ते नागपूरमध्ये निर्माण करतात ऐसे ऐकले/ वाचले होते.

४. मुद्दा क्रमांक ३ हा सुरुवातीची पायाभरणी झाली, ह्यातून पुढे चालून पूर्ण विमाननिर्मिती भारतीय भूमीवर होणे हे साध्य करावे लागेल, ते केल्यास सुद्धा एकंदरीत ते जॉइन्टली बनवलेले विमान विकायला अमेरिकन/ कंट्री ऑफ ओरिजिन रेग्युलेटरी नॉर्म, भारतीय व्हाईट लिस्ट ब्लॅक लिस्ट, प्रेफर्ड कस्टमर्स इत्यादी सगळे कुटाणे पाहता कठीणच वाटते एकंदरीत, कारण पूर्ण लढाऊ/ प्रवासी विमान बनवणे एकदम झटक्यात साध्य होणार वाटत नाही, झाले तरी संभावित ग्राहक, मालकी लीज इत्यादी वाणिज्यिक विषय, हे सगळे गुणोत्तर पाहूनच करावे असे वाटते.

भारतीय कंपनीने जेव्ही केले तरी ते करण्यालायक कंपनीज मोजक्या
१. बोइंग
२. लॉकहीड मार्टिन
३. सुखोई डिझाईन ब्युरो
४. मिखाईल गुरेविच कॉर्पोरेशन (मिग)

ह्यातही भयानक स्पर्धात्मक मर्जर अँड एकविजिशन्स होत असतात, इतकी का कोण कोणाला टेकोव्हर करून बसलाय ते कळायला मार्ग नसतो मी दिलेल्या कंपन्यांपैकीच कोणी कोणाला ओव्हरटेक केले असेल तरीही मला कल्पना नाही बघा !

असं सगळं हे मला वाटतं.

गवि

चांगला तार्किक प्रतिसाद. धन्यवाद.

जेम्स वांड

भारताने उगाच मानाचा मुद्दा करून विमान निर्मितीच करू असा चंग न बांधलेला बरा. उदार अर्थव्यवस्था आणि भांडवली बाजारात राजा हा ग्राहकच असतो, जे चांगले डील देतील त्यांच्याशी हार्ड निगोशिएट करून उत्तम विमान/ तंत्रज्ञान पदरी पाडून घेणे, हेच शहाणपण होय.

व्हॅल्यू ऍडीशन

हा एक महत्वाचा मुद्दा असू शकतो, उदाहरणार्थ आपण एमब्रायर ह्या ब्राझीलीयन कंपनीचे मध्यम लहान आकाराचे विमान (जे मुळात प्रवासी आराखड्यात बांधले गेले होते ते) घेऊन त्यावर व्यवस्थित रिसर्च करून ग्लोबली स्पर्धात्मक असलेले एअरबोर्न अर्ली वॉर्निंग सिस्टम्स (एवॅक्स) बसवले आहेत. असे प्रॅक्टिकल डिझाईन अधिक मार्केटिंग एलमेंट्स प्लस फायनान्स लक्षात घेऊनच निर्णय व्हावेत असे वाटते.

चौकस२१२

पहिले म्हणजे याचे शीर्षक " लढाऊ आणि संरक्षणास लागणारी विमाने " असे असावे असे वाटते कारण प्रवासी वाहतूक किंवा माल वाहतूक करणारी विमाने यांचे उत्पादन आणि संरक्षणास लागणारी यान्चायत खूप वेगवेगळे मुद्दे लक्षात घावे लागतात, दोन्हीचे "डिझाईन ब्रिफ" खुपु वेगळे असणार हे सह्जईक आहे
प्रवासी = बहूउत्पादन ( मास प्रोडक्शन )
सरक्षण = कमी संख्या + जास्त उच्च दर्जाची क्षमता ( फेल सेफ)

असो तर
दोन्ही मध्ये शुण्यापासून सुरवात करेन अतिशय अवघड आहे ,,, या ज्या बेहुदेशीय कंपनीय उल्लेखलेली आहेत त्यांनी आणि त्यांच्या सरकारने/ विद्यपीठातून "मूलभूत संशोधन " अनेक दशके केले आहे ... या शिववाय इंजिन निर्मिती हा प्रश्न आहेच

भारत दोन्हीचा मध्य मार्ग गाठून निदान संरक्षण क्षेत्रात स्वतःचा मोठा ग्राहक असल्यामुळे प्रगती करू शकेल पण त्यात कोणतरी २ऱ्या देशावर अवलंबून राहणे आलेच ... किंवा पुढील २-३० वॉरसेह मूलभूत संशोधांवर प्रचंड खर्च करेल तर
उपग्रह उत्पादन आणि लढाऊ विमान यात काही उत्पादन तंत्रन्यान यात साम्य आणि इतर साम्य असले तरी दोन्ही प्रोजेक्त ची तुलना करणे अवघड आहे

प्रवासी विमाने बनवणे सोडून द्या

"या शिवाय इंजिन निर्मिती हा प्रश्न आहेच"
खरे आहे. बोईंग ७४७ ची छान माहिती यु-ट्युबवर आहे. सर्वात मोठे प्रवासी विमान बनवण्याचे त्यांचे स्वप्न होते. 'जो सटर' ह्या अभियंत्याच्या नेत्रुत्वाखाली ७४७ चे काम चालु झाले-१९६६ साली आणि १९६९ मध्ये प्राथमिक चाचणी घेण्यात आली. 'प्रॅट-व्हिटेनी'/रोल्स-रॉईस/जनरल ईलेक्ट्रिक' अशा कंपन्यांची इंजिन्स असायची/असतात. जी काही इको-सिस्टिम लागते ती अमेरिकेत होती जी दुसर्या महायुद्धानंतर बनवण्यात आली होती.. मिलिटरी इंड्स्ट्रियल कॉम्प्लेक्स.
सरकारचे सोडा, आपल्याकडे स्व्तःच्या ताकदीवर अशा इंजिन बनवणार्या किती कंपन्या आहेत? फक्त पैसा कमी हे कारण पटत नाही.

रावसाहेब चिंगभूतकर

खूप काही लिहिता येईल. पण अनेक मुद्दे इथे एकाच ठिकाणी अंतर्भूत केलेले आहेत. आपण नक्की कुठल्या विमानंबद्दल बोलतोय? प्रवासी विमाने आणि लढाऊ विमाने हे दोन्ही वेगळे विषय आहेत.

प्रवासी विमाने: माझ्या मते प्रवासी विमानांमध्ये भारताने न शिरलेले बरे. अतिशय मोठी गुंतवणूक आणि सुरवातीची बरीच वर्षे तोट्याची काढावी लागतात. शिवाय हा काही राष्ट्रीय सुरक्षितता आणि सेलर्स मार्केट चा विषय नाही. पूर्णपणे फायद्या तोट्याचा विषय आहे. चीन आणि रशिया ने यात पैसे अक्षरशः ओतून पाहिले. पण काही छोटे देश सोडले तर त्यांना फारसे ग्राहक मिळालेले नाहीत. तेवढे पैसे ओतायची जर एखाद्या उद्योगाची तयारी असेल तर ते पैसे ओततीलच. भारत सरकारने असल्या फंदात पडू नये. त्याचा कोणताही फारसा tangible benefit मिळणार नाही. शिवाय त्यात इतकी गळेकापू स्पर्धा आहे की बोइंग आणि एअरबस आपली दमछाक करतील.

लढाऊ विमाने: भारताकडे असलेले राफेल हे 4.5 च्या जनरेशन चे विमान आहे. आपण तयार केलेले तेजस हे ही त्याच जनरेशन चे. इथे आपल्याला फक्त गुंतवणूक च करायला हवी असे नाही तर ती अधिक वेगाने करायला हवी. यात सगळ्यात मोठा प्रॉब्लेम कावेरी इंजिनाचा.

कावेरी इंजिन: हे इंजिन खरं तर वाईट नाही, पण त्याचा निर्माण होणारा thrust हा जितका हवा तितका नाही. साधारणपणे 88kN thrust अपेक्षित आहे.
Kaveri

भारताने जी कंपनी राफेल ला इंजिन पुरवते (सफ्रां) तिच्याबरोबर करार केला आहे आणि कदाचित हा प्रोजेक्ट पुनर्जीवित होऊन उत्तर सापडेल.

मात्र सध्या सुद्धा हे इंजिन घातक नावाच्या unmanned combat vehicle ला वापरण्याजोगे बनू शकेल. 2032 पर्यंत ही आपल्याला (घातक मध्ये बसवून) मिळतील. UAV ला कमी thrust लागतो.

UAV

केदार भिडे

लष्करी आणि प्रवासी असा फरक करायला हवा होता सुरुवातीलाच.
दोन्हींच्या गरजा आणि बाजारपेठ निराळ्या आहेत. उत्पादन करणाऱ्या कंपन्याही निराळ्या आहेत.

माईसाहेब कुरसूंदीकर यांनी म्हटल्याप्रमाणे इको-सिस्टिम एकतर आपल्याकडे पारतंत्र्यात असताना उभी राहिली नाही आणि नंतर ती उभी राहायलाच मज्जाव होता.
बोईंगला पुरवठा करणाऱ्या कंपन्या ८००० आहेत.
https://www.nytimes.com/2019/12/22/business/boeing-dennis-muilenburg-73…

जपान आणि ब्राझील यांचे उदाहरण त्याकरता दिले आहे.
मेजी पुनरुज्जीवनानंतर औद्योगिकीकरण झाल्यामुळे जपानला जमले.
सध्या मित्सुबिशीची लष्करी किंवा प्रवासी विमाने किती चालतात माहित नाही.
ब्राझीलची एम्बरेअर पण चांगली विक्री करत आहे आणि तिचीं स्थापना १९५० नंतरची आहे.

जेम्स वांड

सध्या मित्सुबिशीची लष्करी किंवा प्रवासी विमाने किती चालतात माहित नाही

मला नाही वाटत असतील, असता जपान एअर लाईन्स (जे ए एल) ने अतिशय आग्रहाने त्यांचा वापर अन व्यापाराला हातभार लावलाच असता.

कंजूस

यात खूप मागे आहोत. कारण अमुक काम तमुक लोकांनीच करायचे हा समाजातला समज. त्यामुळे त्यात प्रगती झाली नाही. मग पुढे तपासणी यंत्रे आपल्यालाच बनवायला हवीत. कोणती बनवलेली वस्तू किती वजन, आघात,तापमानास टिकेल वगैरे. मग काच ,रबर,इलेक्ट्रॉनिक्स यातही प्रगती लागेल.

--------------
यावरून एक जुना जोक माहिती असेलच. बजाजने विमान बनवलं. ते स्टार्ट करताना थोडे तिरके कलंडून मग किक मारल्याशिवाय एंजिन सुरू होत नव्हते.

कंजूस

केरळमध्ये बोटी बनवून देण्याचा व्यवसाय होता.

जेम्स वांड

आजही केरळातील एक स्पेशल समाज बिना खिळे आणि रिव्हेट्स फक्त इंटरलॉकिंगने लाकडे जोडून शोभिवंत जहाजे बनवतात म्हणे.

दुबई अन मध्यपूर्वेतील कैक गर्भश्रीमंत शेखांच्या छानछोकीच्या बोटी उर्फ याट्स (का याचेस) ह्या केरळात बनवल्या जातात अन त्या पूर्णतः लाकडी असतात असेही ऐकले होते मी.

साहना

ह्याला दोन बाजू आहेत.

पहिली गोष्ट म्हणजे FAA हि अमेरिकन सरकारी संस्था विविध विमान वाहतूक संबंधी स्टँडर्ड्स निर्माण करते. अमेरिकन सरकारने अतिशय व्यवस्थित पद्धतीने विमान वाहतुकीत युरोप आणि अमेरिकन सोडून इतरांना येण्यात बरेच अडथळे निर्माण केले आहेत. कॅनडाच्या बोम्बार्डियर ला अमेरिकन सरकारच्या कारस्थानांनीच बंद पाडले असे म्हटले जाते.

भारतीयाचे औद्यीगिक धोरण आधीपासून अतिशय गलथान आणि सरकारी निर्बंध ह्यांनी त्रस्त असल्याने ह्या क्षेत्रांत कुणीही गुंतवणूक केली नाही. समजा अंबानी किंवा अडाणीने मोठा धंदा उभा केला असता तर आमच्या लोकांनी त्यांना शिव्या घातल्या असत्या. पुण्यात परी रोबोटिक्स नावाची कंपनी आहे. HAL ला जेंव्हा एक विशिष्ट एव्हिएशन सिस्टम हवी होते तेंव्हा HAL ने टेंडर काढले. टेंडर मध्ये भारतीय कंपन्यांना बॅन केले होते. परी ने खूप विनवण्या केल्या तरी सरकारी बाबू चा विश्वास नव्हता कि एक भारतीय कंपनी हे यंत्र निर्माण करू शकेल (हे यंत्र म्हणजे उच्च हवेचा दाब निर्माण करून प्लेन च्या स्ट्रक्चर ला टेस्ट करणारा विंड टनेल होता). तुम्ही विनाकारण आमचा वेळ वाया घालवाल असे बाबू मंडळींनी परी ला सांगितले. शेवटी एक क्लिष्ट गणिती कोडे सोडवून आणले तर तुम्हाला आम्ही टेंडर मध्ये भाग घ्यायला देऊ असे सांगितले. परी ने ते कोडे सोडवले आणि १/१० किमतीत उत्कृष्ट दर्जाचे यंत्र सुद्धा निर्माण करून दिले. तेजस फ्रेम ह्याच यंत्रावर आधी टेस्ट केली गेली होती. हि कथा मी परीचे संस्थापक ह्यांच्या तोंडून ऐकली होती.

त्याशिवाय विमान निर्मिती हे अत्यंत उच्च दर्जाचे अभियांत्रिकी उद्योग आहे. (रॉकेट्स पेक्षा जास्त). ह्यांत मटेरियल सायन्स पासून इलेक्ट्रिकल पर्यंत आणि केमिकल पासून गणित पर्यंत शेकडो विषयांत उच्च दर्जाचे लोक पाहिजेत. त्याला लागणारे अँसिलरी व्यवसाय पाहिजेत. ते नसल्याने देशाला विमान निर्मिती करण्यात बरेच कष्ट पडतील. जेट इंजिन अतिशय खटपट करून सुद्धा देश बनवू शकला नाही ह्यांत हे सर्व काही आले. GE चे हाय बायपास टर्बो इंजिन हे फक्त इंजिन आहे. ते कसे चालते ते इथे पहा. https://youtu.be/L24Wf0VlTE0

हे एक महा क्लिष्ट यंत्र तर आहेच पण त्याला लागणारे धातू सुद्धा अतिशय विशेष आहेत. विविध तापमानतात आणि उंचीवर ते कसे चालतील ह्याचा अभ्यास करणारी सॉफ्टवेर आणि टेस्टिंग सिस्टम्स सुद्धा महा क्लिष्ट आहेत.

पण येत्या २५ वर्षांत भारतातील काही खाजगी कंपनी ह्या क्षेत्रांत घुसतील असे वाटते.

अवांतर टीप : नागपूर विमानतळावर एक मोठे बोईन्ग धूळ खात विनावापर पडले आहे. ह्याचा इतिहास शोधा .

केदार भिडे

अमेरिकेचे थोडे वर्चस्ववादी धोरण, आपल्याच शासनाचे स्वातंत्र्यानंतर आर्थिक धोरण, आणि शिक्षण,उद्योग, संशोधन यात आधुनिकतेचा अभाव असे तीन ठळक मुद्दे दिसतात.

कंजूस

भरपुर खायची आणि मग दुसऱ्यांना खाऊ नको सागायचे. आपण कोळसा वापरायचा आणि मग इतरांना कुठल्यातरी करारात अडकवायचे. यांची जहाजे इलेक्ट्रिक ब्याटरी/ सोलरवर चालतात काय?

जेम्स वांड

लॉकहीड मार्टिन बद्दल

ह्या बातमीनुसार फिनलँड सारख्या देशाने त्यांच्या वायुसेनेला आधुनिक करण्याच्या कार्यक्रमाच्या अंतर्गत $११ अब्ज इतक्या किमतीचे डील लॉकहीड मार्टिनच्या पदरात घातले आहे, ह्या डीलनुसार हा सौदा एफ-३५ स्टेल्थ विमानांचा होणार आहे.

मला वाटते ह्यावरून विमानन व्यवसायात बांधणी पेक्षा उत्तम मार्केटिंग आणि विक्री खरेदी भाडेतत्त्वावर देणे इत्यादी कौशल्ये महत्वाची आहेत असे वाटते.