जनातलं, मनातलं

गांधीवाद्याची थप्पड

Primary tabs

आमच्या महाविद्यालयात अभियांत्रिकीव्यतिरिक्त अनेक सामजिक कर्यावर सुद्धा उहापोह होत असे. वृक्षारोपण, रक्तदान शिबिरे अशा उपक्रमांना सुद्धा खेळाच्या स्पर्धांप्रमाणेच भरगोस प्रतिसाद मिळे. शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, गांधीजी, डॉ सर्वपल्ली राधकृष्णन यांच्या जयंत्या आम्ही वादविवादासारख्या स्पर्धा भरवून साजर्‍या करत असू. या सगळ्या कार्यक्रमांमध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण वल्ली होता जीवन जोशी, आमचा एक वर्गमित्र. गांधींविषयीची त्याची भक्ती सुपरिचित होती. कट्टयांवरच्या गप्पा असोत की चर्चासत्रे, तो मोठ्या चिकाटीने आणि विश्वासाने गांधीवादी विचारांचे मुद्दे मांडत असे. साधी राहणी व उच्च विचार यामुळे खरेच हा गांधींचा एकमेव पाईक आहे असे आम्हाला वाटे. गांधीवादी विचार मांडणारे, लिहिणारे खूप बोलबच्चन बघितले होते पण त्यांच्या प्रत्यक्ष कृतीत व दैनंदिन जीवनात ते यापासून कोसो दूर होते. त्याकाळात लोकमतमध्ये कधीकधी गांधीवादावर गप्पा ठोकून देणारे माझ्या परिचयातले एक पत्रकारही त्यातलेच. येता जाता स्वतःच्या पोराला धोपटणारे हे महाशय त्यावेळी गांधींची अहिंसावादी तत्वे बासनात गुंडाळून टाकीत. अशा लोकांबद्दल बोलताना आमचा जीवन जोशी म्हणे की अशा लोकांनी गांधीवादाला/वाद्यांना बदनाम केले आहे.

एक दिवस त्याची सुद्धा परिक्षा घेऊन आला.

आम्ही वर्गमित्र ग्रंथालयासमोरच्या कट्टयावर गप्पा मारत होतो. कशावरुन तरी विषय गांधीवादावर/अहिंसेवर येवून ठेपला. चाणक्यनिती, शिवरायांच्या मुत्सद्दीपणाची उदाहरणे, सावरकरांचे विचार या नेहमीच्या विषयांवर कीस पाडत त्यावेळच्या ज्वलंत बाबरी प्रकरणापर्यंत गाडी आली. हजार वर्षे गुलामीत राहिलेल्या हिंदूंना एकत्र आणून एक तरी प्रतिकात्मक मंदिर उभे केल्याने हिंदूंचा एकंदर आत्मविश्वास वाढेल, त्याला हिंदू म्हणून घ्यायची लाज वाटणार नाही वगैरे आमचे मुद्दे. पण त्याच्या मते जर राम मंदिराचा विषय येवढा महत्वाचा असता तर नेमाने रामायण पठण व उपदेश करणार्‍या गांधीजींनीच नसता का ऐरणीवर घेतला?

प्रश्नोत्तरांची सरबत्ती दोन्ही बाजूंनी चालू होती. बघ्यांची गर्दीही वाढली होती. तसा आम्हा दोघांचा अवाजही वैयक्तीक गप्पांच्या थरातून व्यासपिठी उंचीवर पोचला होता. मी ठोश्यास ठोसा या मुद्द्यावर ठाम होतो तर हा एका गालावर मारले तर दुसरा गाल पुढे करण्याच्या तत्वावर. एक उदाहरण म्हणून मी काल तात्यांनी विचारलेले प्रश्न त्याला विचारले. त्याचे म्हणनेही असेच की "कोणाच्या अश्लील बोलण्याने बहिनीचा अपमान होत नाही", "त्याला मारण्या येवढी ताकत कमवावी म्हणजे तो त्या भितीने असला गुन्हाच करणार नाही", "त्याचे मतपरिवर्तन करायला हवे" वगैरे. त्या उत्तरांनी मी ही जरा रागात आल्याचा आव आणला व म्हटले, "भडव्या, स्वतःच्या बहिनीला अपमानित करणार्‍याला तिथल्या तिथे न चोपणारे षंढ असतात अहिंसक नव्हे" व असे जोराने ओरडत जाऊन शक्य तेवढ्या त्वेशाने त्याच्या श्रीमुखात भडकवली.

एक क्षणभर सगळेच शांत झाले. दोन संयंमी मित्रांच्या मध्ये हे काय झाले हे कोणाला समजायच्या आत... एका क्षणात तोही तेवढ्याच त्वेशाने पुढे आला व त्यानेही माझ्या गालात अशी काही थप्पड लावली की पार डोक्यातून मुंग्या आल्या. बस्स.

मी शांत झालो. म्हणालो "जोश्या, अहिंसा फक्त पुस्तकात असते. जिवनात शक्य नसते... अगदी तुम्हा गांधी वाद्यांच्या सुद्धा... हे सिद्ध करुन दिल्याबद्दल आभार! अन त्यासाठी तुझ्यावर हात उगारावा लागल्याबद्दल माफ कर मित्रा."

मात्र त्यानंतर त्याच्या डोळ्यात आलेले पराभवाचे अश्रू पाहून मनाला चुटपुट लागून राहिली. सुदैवाने आमच्या मैत्रीत खंड पडला नाही. पुढे मुंबईत आम्ही खोलीमित्र म्हणून राहिलो व कालांतराने कंपनीत सहकारी म्हणून सुद्धा. नंतर लग्न, संसार यानंतर आमच्या गाठीभेटी कमी झाल्या पण आजही आमची मैत्री मात्र कायम आहे.

पण हो, त्यानंतर आमच्या जोश्याने गांधीवादावर बोललेले कोणी पाहिले नाही बरं. :)

विसोबा खेचर

"भडव्या, स्वतःच्या बहिनीला अपमानित करणार्‍याला तिथल्या तिथे चोपणारे षंढ असतात अहिंसक नव्हे"

षंढ असतात?? हे वाक्य कळले नाही!

"तिथल्या तिथे चोपणारे षंढ असतात.." असे वाक्य असावे का? टंकनदोष?

मी शांत झालो. म्हणालो "जोश्या, अहिंसा फक्त पुस्तकात असते. जिवनात शक्य नसते... अगदी तुम्हा गांधी वाद्यांच्या सुद्धा... हे सिद्ध करुन दिल्याबद्दल आभार! अन त्यासाठी तुझ्यावर हात उगारावा लागल्याबद्दल माफ कर मित्रा."

सह्हीच करून टाकली गांधीवादी जोश्याची! :)

तात्या.

षंढ ऐवजी भ्याड म्हणायला हवे होते. "भ्याड" असे अपेक्षित होते.

आपला,
(निर्भय) भास्कर
आम्ही येथे वसतो.

अरेच्चा!
"न" राहिला होता तर! टंकनदोष दाखवून दिल्याबद्दल तात्या व प्राजूताईंचे आभार!

विसोबा खेचर

"न" राहिला होता तर!

धत तेरीकी! भास्कर तूदेखील अंमळ वेंधळाच दिसतोस! असो.. :)

अंमळ वेंधळाच दिसतोस!
-- काय करणार ओरोसला राहून सोलकढी जरा जास्त प्यालो ना... (केवळ सोलकढीच बरं ;) )

आपला,
(अशंतः कोकणी) भास्कर

धम्मकलाडू

"भडव्या, स्वतःच्या बहिनीला अपमानित करणार्‍याला तिथल्या तिथे चोपणारे षंढ असतात अहिंसक नव्हे"
षंढ असतात?? हे वाक्य कळले नाही!

फ्रॉइडीयन स्लिप तर नसावी? हलकेच घ्या हं.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

प्राजु

"तिथल्या तिथे न चोपणारे षंढ असतात.." असे वाक्य असावे का? टंकनदोष?

हे वाक्य जरा संपादन कराल का भास्करराव.?
बाकी, गांधीवाद हा पुस्तकातच असतो आणि तिथेच तो साजर्‍या गोजर्‍या शब्दांत खुलून दिसतो. व्यवहारी जीवनात केवळ अशक्य आहे.
भास्करराव, हा प्रसंग चांगला रंगवून लिहिला आहे तुम्ही.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

विसोबा खेचर

बाकी काय हो भास्करराव, तुमच्या मित्रात जोश्याचा पुळका येऊन नवीन धागे उघडून (शाद्बिक चर्चेचे हो!) त्याचे समर्थन करणारी इतर काही मित्रमंडळी होती की नाही? :)

आपला,
धनंजय अभ्यंकर. :)

होती की. पण हा किस्सा घडला चौथ्या वर्षात. पूर्वीच्या तीन्-साडेतीन वर्षात बहुतेकांचे मिंदेपणाचे विचार झटकवून टाकायला लावले होते. तरी काही शेलके धेंड होते. ते शांत राहण्यात धन्यता मानत. कारण आमच्या मोहोळाला त्यांची अहिंसा समजत नसे व त्यांना आमचे मार्ग परवडत नसत. ;)

धनंजय अभ्यंकर
हे मात्र खासच!! =)) =))

टारझन

हे राम !!

अरे मुलांनो मला जरा शांत जगू द्या रे !! किती कांगावा कराल त्या गांधीवादाचा ? आता तर तो आतंकवाद परवडला पण गांधीवाद नको

-(वाद प्रेमी) टारोबा खेचर

इनोबा म्हणे

येता जाता स्वतःच्या पोराला धोपटणारे हे महाशय त्यावेळी गांधींची अहिंसावादी तत्वे बासनात गुंडाळून टाकीत.
हा हा हा!!! लय भारी गांधीवाद आहे हा.

-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

आनंद घारे

महात्मा गांधीची या ना त्या प्रकाराने टर उडवणे हा मिसळपाव खाणार्‍या बहुतेक लोकांचा आवडता उद्योग आहे असे दिसते. गांधीजींची यावर वाद घातला नाही. किंवा आपला 'वाद' निर्माण केला नाही. त्यांनी हिंदू धर्मग्रंथात वाचलेल्या अहिसा आणि सत्य या तत्वांचा आग्रह धरला. पण त्यातून जगातले सारे प्रश्न सुटतील असे त्यांनी कुठेही म्हंटलेले नाही. त्यांच्या स्वतःच्या जीवनात देखील अनेक वेळा त्यात ते यशस्वी झाले नव्हते हे त्यांनी आपल्या 'सत्याचे प्रयोग' या पुस्तकात अनेक ठिकाणी नमूद केले आहे. त्यांना सुद्धा कधी कोणी थोबाडीत मारली होती की नव्हती आणि त्यावर त्यांची काय प्रतिक्रिया झाली याचा उल्लेख कोठे वाचला नाही. माझ्या माहितीप्रमाणे "एका गालावर थोबाडात मारली तर दुसरा गाल पुढे करावा" ही शिकवण आंधीजींची स्वतःची नाही. त्यांच्याआधीच कोणा महात्म्याने ती देऊन ठेवली आहे. त्यांनी सांगितलेल्या अनेक गोष्टींशी मी स्वतःसुद्धा सहमत नाही, पण मला त्यांच्याबद्दल आदर वाटतो.

आनंद घारे मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://360.yahoo.com/abghare
http://anandghan.blogspot.com/

अहो आनंदराव जरा धिरानं घ्या.

महात्मा गांधीची या ना त्या प्रकाराने टर उडवणे हा मिसळपाव खाणार्‍या बहुतेक लोकांचा आवडता उद्योग आहे असे दिसते.
मी गांधीजींची टर उडवली नाहीये. मला महात्मा गांधी हे आदर्श वाटतात. त्यामुळेच त्यांच्या जयंतीला आम्ही विविध विधायक कार्यक्रम हाती घेत असतो. वरील लेखातही तसा संदर्भ आहेच. मी समाचार घेतला आहे तो गांधीवादाच्या नावावर भ्याडपणाचा उदो उदो करणार्‍यांचा. या तथाकथित गांधीवाद्यांनीच "एका गालात मारली तर दुसरा पुढे करावा" असे बावळट विचार प्रसिद्धी पोचवले आहेत.

पण त्यातून जगातले सारे प्रश्न सुटतील असे त्यांनी कुठेही म्हंटलेले नाही.
कमाल आहे बॉ तुमची! दहशतवाद ही जगासमोरील भयंकर मोठी समस्या आहे. तिला या क्षणी तरी तथाकथित गांधीवादाने सोडवता येईल असे वाटत नाही. भूकबळी, जगात ठिकठिकाणी चाललेले मृत्यूचे तांडव यावरही गांधीवाद या क्षणाला कामाचा नाही. मात्र सध्या ज्या गांधीवाद्यांचा येथे उदो-उदे चालू आहे त्यांनी मात्र यावर एकमेव इलाज म्हणजे गांधीवाद सुचवला आहे. प्रत्यक्ष पाकड्या दहशतवाद्यांच्या दाड्या कुरवळयाचे सल्लेही दिले गेलेत. वाचा जरा.
या क्षणी जगासमोर वा आपल्या देशा समोर असणारे कोणते प्रश्न सुटणार आहेत त्या तथाकथित गांधीवादाने?

मला त्यांच्याबद्दल आदर वाटतो.
आम्हालाही वाततो तर. नाही कुठे म्हटले आहे. पण अततायी पणा नको बा.

आपला,
(रोखठोक) भास्कर

कोलबेर

मी समाचार घेतला आहे तो गांधीवादाच्या नावावर भ्याडपणाचा उदो उदो करणार्‍यांचा.

कशच्याही नावाखाली भ्याडपणाचा उदो उदो करणार्‍यांचा समाचार घेतलाच पाहिजे!

कमाल आहे बॉ तुमची! दहशतवाद ही जगासमोरील भयंकर मोठी समस्या आहे. तिला या क्षणी तरी तथाकथित गांधीवादाने सोडवता येईल असे वाटत नाही.

मग तुम्हाला अपेक्षीत असणारा गांधीवाद कोणता? आणि त्याने तरी ही समस्या सुटू शकते का? महात्मा गांधींना आदर्श मानता म्हणून विचारतो.

एक गाढव पाठीवर मीठाचे ओझे घेऊन जात असतो. रस्त्यात नदी पार करताना ते खाली पडते व त्याचे ओझे मीठ विरघळल्याने कमी होते. गाढव हा धडा लक्षात ठेवतो. पुन्हा असाच नदी पार करत असताना तो मुद्दाम खाली बसतो. पण यावेळी त्याच्या पाठीवर कापसाचे ओझे असते....

गांधींच्या पूर्वी किती टक्के भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होते? एखाद्या टक्क्याच्या आसपास. जर स्वातंत्र्य लढ्यात यशस्वी होऊन यशस्वी लोकशाही देश उभारायचा असेल तर सर्व जनता सक्रीय झाली पाहिजे हे त्यांनी हेरले होते. राजकारणापासून दूर असणार्‍या नि:शस्त्र जनतेला सक्रीय आंदोलनात आणायला त्यांनी आवलंबलेले उपाय एकदम अफलातून होते. नाहीतर किती लोक अभिनव भारत वा अझाद हिंद मध्ये सहभागी होऊ शकले असते? त्यामुळे गांधींनी त्या काळात केले ते योग्यच. आजही तेच करायचे म्हणजे त्या गाढवासारखी आपली स्थिती होईल. आज समाज जागरुक आहे, आपण स्वतंत्र देश आहोत, आपल्या कडे सशस्त्र फौजा आहेत, नवनवीन तंत्रज्ञान आपल्या दिमतीला आहे, प्रसारमाध्यमे वेगळी आहेत. तेव्हा आज जर गांधी उदयाला आले असते तर त्यांनी कदाचित नवीन पर्यायांचा विचार केला असता असे वाटते.

>>आज समाज जागरुक आहे, आपण स्वतंत्र देश आहोत, आपल्या कडे सशस्त्र फौजा आहेत, नवनवीन तंत्रज्ञान आपल्या दिमतीला आहे, प्रसारमाध्यमे वेगळी आहेत. तेव्हा >>आज जर गांधी उदयाला आले असते तर त्यांनी कदाचित नवीन पर्यायांचा विचार केला असता असे वाटते.
पटले.
पुण्याचे पेशवे

कोलबेर

प्रकाटाआ

आनंद घारे

मी गांधीजींची टर उडवली नाहीये.
मान्य आहे. आपला लेख संतुलित आणि वाचनीय आहे.

या क्षणी जगासमोर वा आपल्या देशा समोर असणारे कोणते प्रश्न सुटणार आहेत त्या तथाकथित गांधीवादाने?'गांधीवाद' हा प्रश्नावर इलाज नाही. कदाचित प्रश्न निर्माण होऊ नयेत यासाठी केलेला एक प्रयत्न आहे.

पण अततायी पणा नको बा.
हीच महात्मा गांधींची शिकवण होती. तिचासुद्धा अतिरेक करणे योग्य नाहीच.
आनंद घारे

मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://360.yahoo.com/abghare
http://anandghan.blogspot.com/

केदार

एका गालावर थोबाडात मारली तर दुसरा गाल पुढे करावा" ही शिकवण आंधीजींची स्वतःची नाही. त्यांच्याआधीच कोणा महात्म्याने ती देऊन ठेवली आहे. त्यांनी सांगितलेल्या अनेक गोष्टींशी मी स्वतःसुद्धा सहमत नाही, पण मला त्यांच्याबद्दल आदर वाटतो. >>

बरोबर आहे. ही शिकवन येशू ख्रिस्ताची आहे.

एकदा गांधीं सोबत एक ख्रिश्चन तज्ञ वाद घालू लागला की हिंदू कसे वाईट आणी ख्रिश्चन कसे चांगले आणी गांधीनी सच्चा माणूस असला तर ख्रिश्च्अन धर्म स्विकारावा. त्यावर उत्तर म्हणून गांधी बोलले की ' तूमच्या धर्मात तर एक गालावर मारले तर दुसरा गाल पुढे करा असे सांगीतले आहे, तरी देखील तूम्ही सर्व जगावर अत्याचार करत आहात. अश्या धर्माचा मी कधीही स्विकार करनार नाही, शिवाय मी हिंदू म्हणून जन्मलो पण मला अजुन खरा हिंदू काय असतो हेच माहीत नाहीत. मी ते आधी शिकनार." एवढे बोलून त्यांनी त्या तज्ञाला निरुत्तर केले.

पण पुढे गांधीचे हे वाक्य पुर्ण संदर्भाने न घेता लोकांनी अर्धवट घेतल्यामूळे हा घोळ झाला आहे.

गांधीचा डोळस विरोध करता यायला पाहीजे. टर सगळेच जण उडवू शकतात.

आदर भास्करला सुद्धा आहे. मला सुद्धा आहे. बहुतेकांना आहे.
फिजिक्स चा नियम इक्वल अँड अपोझिट रिऍक्शनचा. बा़की काहीही नाही.

अनिता

कुठेतरी वाचलेले आठवते..
गा॑धी'ना कुणीतरी विचारले की जमीनदारा॑च्या (बहुतेक उत्तर प्रदेश/ बिहार/आसाम भागातील) जाचापासुन लोका॑ची सुटका करताना हि॑सेचा वापर कराल का?
गा॑धी'चे उत्तर होते की सा॑गून एकले नाही तर जरूर हि॑सेचा वापर करू.

विजुभाऊ

एका गालावर थोबाडात मारली तर दुसरा गाल पुढे करावा" ही शिकवण देवाचा पुत्र प्रभू येशुची आहे.

आपण एखादा विचार ;एखादी गोष्ट करतो किंवा करायचे टाळतो ते आनन्द मिळवणे किंवा वेदना टाळणे या दोन्ही साठीच

देवाचा पुत्र प्रभू येशुची आहे.
हे देवा... आत हे आनखी काय नवीन उपटलय? आम्ही तर बॉ सगळेच देवाचे पुत्र-पौत्री असे शिकत लहानाचे मोठे झालो. मग हे केवळ त्या येशूलाच देवाचा पुत्र का बरे म्हणतात? असो. हे सुद्धा गांधीवादाप्रमाणे आपल्याला न झेपणारं प्रकरण दिसतय.

आपला,
(देवाचा पुत्र) भास्कर
आम्ही येथे वसतो.

लिखाळ

चांगलं आहे :)
कोणतेही तत्व आगीकारायला निर्धार आणि जररुकता लागते. आपल्या मित्राच्या ठायी त्या वेळी याचा अभाव असावा.
-- लिखाळ.