काथ्याकूट

शुद्धलेखन नियम,काय बदल केले पाहिजेत ?

Primary tabs

मराठी शुद्धलेखनाची नवी नियमावली तयार करण्याचा निर्णय अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने घेतला आहे. त्यासाठी त्यांनी एक कृती आराखडा तयारही केल्याची बातमी वाचनात आली. १९६१ ला महामंडळाने शुद्धलेखनाची नियमावली तयार केली. सर्व नियम संस्कृत भाषेला आधार मानूनच करण्यात आले होते. आता आधुनिक काळात मराठी भाषेचा शुद्धपणा आणि मराठी भाषेच्या प्रगतीसाठी नवीन शुद्धलेखनाची नियमावलीची गरज वाटत असावी.संस्कृत भाषेतून आलेल्या शब्दांचा फेरविचार, इंग्रजी आणि हिंदी शब्दांचा अभ्यास आदी प्रमुख सूत्रे डोळ्यासमोर ठेवून नियमावली तयार करण्याचा विचार महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी बोलून दाखविला आहे. त्यांच्या आराखड्याप्रमाणे राज्याच्या विविध भागातील भाषातज्ञांची एक बैठकही झाली आहे. आता दुस-या टप्प्यात अभ्यासक, वाचक, तज्ञ, मुद्रितशोधक, यांच्याकडून सूचना मागविण्यात येत आहेत. -हस्व,दीर्घ, शब्दांसाठी कोणते नियम असावेत.लेखन उच्चारानुसार असावे का ? दंतमूलीय व्यंजनांसाठी एकच चिन्हे वापरावे का ? कोणत्या उच्चारासाठी कोणती चिन्ह असावीत; तसेच देवनागरी लिपीत काही बदल करावे का, याबद्दल सूचना अपेक्षित आहेत. त्यावर महामंडळाच्या बैठकांमध्ये सविस्तर चर्चा होईल. शिवाय मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद येथे मराठी शिक्षकांसाठी कार्यशाळा होणार आहेत. त्यानंतर नियमावली अंतिम करुन शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. तेव्हा शुद्धलेखनाबद्दल काही उत्तम चर्चा झाली तर सदरील चर्चेची प्रिन्ट काढून अध्यक्षापर्यंत पोहचविण्याचा आमचा मानस आहे.

सध्याचे शुद्धलेखनाचे नियम इथे पाहावेत.

सूचना:- वरील लेखनातील शुद्धलेखनाच्या चुका काढल्यास हरकत नाही, चुका व्य.नि. ने किंवा खरडीत लिहावे, म्हणजे आपल्या सूचनेनुसार त्यात बदल केले जातील.

शुद्धलेखन नियम क्र १३)
लेखनात पात्राच्या किंवा वक्त्याच्या तोंडी बोलण्याची भाषा घालावी लागते.त्या वेळी तिचे स्वरूप बोलण्यातील उच्चाराप्रमाणे अनुस्वारयुक्त असावे. उदाहरणार्थ: 'असं केलं , मी म्हटलं;त्यांनी सांगितलं अन्य प्रसंगी ही रूपे ए-कारान्त लिहावीत. उदाहरणार्थ : असे केले;मी म्हटले;त्यांनी सांगितले

अन्यप्रसंगी ही रुपे ए-कारान्त लिहावीत हा नियम मात्र नसावा असे वाटते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धनंजय

(मी स्वतः संवाद लिहिताना असेच लिहितो. त्यामुळे माझा या कल्पनेला विरोध नाही हे आलेच. "पण" :)

संवादातले सर्वच, संदर्भाच्या अनुरूप, लेखकाच्या अपेक्षित वाचकाच्या सोयीने, श्रवणप्रत्ययी असावे. काहीकाही लेखने पूर्णच्या पूर्णच स्वगते असतात. तिथे लेखक जणू वाचकाशी "तोंडी" संवाद साधत असतो. तिथेही पूर्ण लेख श्रवणप्रत्ययी असू शकतो. त्यामुळे माझ्या मते हा प्रतिभेचा आविष्कार आहे, शुद्धलेखनाचा भाग नाही.

शुद्धलेखन हे "लेखी" शैली, तांत्रिक लेखन, वर्तमानपत्रातले लिहिणे, शासकीय पत्रव्यवहार, ललित लेखनातही जिथे "तोंडी बोलल्याचा आभास निर्माण करायचा नाही" अशा उपयोगांसाठी सोयीचे असते. अशा सर्व ठिकाणी काहीतरी एक ठराविक रूप ग्राह्य मानावे.

पण ते कुठले रूप असावे (कुठलं रूप असावं) याबाबत माझे ठाम मत नाही. मागच्या पिढीच्या लेखनाशी दुवा ठेवण्यासाठी "असे केले, म्हटले, सांगितले" हे ठीक आहे. पण व्याकरणाच्या दृष्टीने "असं केलं, म्हटलं, सांगितलं" असा वापर ग्राह्य करणे योग्य वाटते.

कारण मराठीत जुन्या=हल्लीच्या लेखी "-ए"चे दोन प्रकार आहेत.
"सगळे ढग काळे-करडे होते" याला "*चूक* सगळं ढग काळं-करडं होतं *चूक*" हा उच्चार चालत नाही.
"सगळे नभ काळे-करडे होते"= (उच्चार)= "सगळं नभ काळं-करडं होतं"

उच्चारबदल = अर्थबदल हे उपजत व्याकरण लक्षात यावे, लिंग-वचन, वगैरे, शालेय व्याकरणाचा या बाबतीत विचार आवश्यक नाही.

त्यामुळे "ए=अं(उच्चार)" हा एका विशिष्ट प्रकारचा मराठी वर्ण आहे. "ए=ए(उच्चार)" हा वेगळा. त्यांचे वेगळे लेखन केले तर व्याकरणा-लेखनात एका प्रकारची सुसूत्रता येईल. बोलण्याशी सुसूत्रता येईल हा तर मुलांना लिहायला शिकवण्यासाठी आणखी एक फायदा.

माझे मत - उच्चार जिथे जिथे योग्य, तिथे तिथे "केलं, गेलं" अशी रूपे लेखी असावीत, असा शुद्धलेखनाचा नियम व्हावा.

डॉ. धनंजय,
वरील विचारांशी सहमत !!!
इंग्रजी शब्द मराठीत जशाच तसे वापरावे असेही त्यांचे चालले आहे. जसे एकापेक्षा अधिक 'बस'साठी इंग्रजी बसेस ऐवजी त्यांचा कल 'बसी' लिहावे का असे ते म्हणत आहेत. एकापेक्षा अधिक बसस्टॉप असेल तर 'बसस्टॉपे' असा विचार चालू आहे, म्हणतात. यामुळे मराठी सोपी होईल की कठीण कोणास ठाऊक. या बाबतीत 'बसथांबा' 'बसथांबे' हेच बरे वाटते. असे अनेक इंग्रजी शब्द स्वीकारणे चालू आहे, त्याबद्दलही लिहावे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धनंजय

शुद्धलेखनाचे नियम कृत्रिम आहेत, आणि सोयीसाठी आपण तज्ज्ञमंडळ जे सांगेल ते मान्य करू.

पण "बस" (वाहन) याचा अनेकार्थी शब्द "बसी" आहे (की "बशी") की "बसेस" हा प्रश्न शुद्धलेखनाचा नाही. व्याकरणाचा आहे. व्याकरणाचे प्रश्न तज्ज्ञमंडळ आपापसात सोडवू शकत नाही. ती भाषा बोलणार्‍या सुशिक्षितांचे आपसूख (सहजपणे) बोलणे टिपून, त्यातला बहुसंख्य वापर काय, ते शोधून व्याकरणाचा निर्णय होऊ शकेल.

इतिहासात जे इंग्रजी शब्द मराठीने घेतले आणि रुळवले, तिथे अनेकवचन मराठीसारखे होते.
"अरे, ती टेबलं जरा खेटून लाव!" (टेबल्स नाही)
"चहाचे दोन कप/ग्लास मागवा." (कप्स, ग्लासेस, नाही)

त्यामुळे बहुतेक "रुळलेल्या" शब्दांना मराठीतलेच अनेकवचन भविष्यातही वापरले जाईल असे मी भाकीत करतो.
तरी मी "डॉक्टर्स, नर्सेस" वगैरे शब्द प्रयोग पुष्कळदा ऐकले आहेत, त्यामुळे माझे भाकीत चूक ठरण्याची थोडी शक्यता आहे.

शुद्धलेखनतज्ज्ञांनी एवढा नियम करावा (जसा आज आहे) की लिहायचेच असले तर "नर्सेस्" असे पाय तोडून न लिहिता "नर्सेस" असे लिहावे. पण अनेकवचन "नर्स" आहे की "नर्सेस" याविषयी कोणी नियम करायला गेले, तर तो नियम लोक यथेच्छ तोडतील आणि तज्ज्ञांचेच हसू होईल.

वाचक्नवी

नर्स चे अनेकवचन नर्स करा किंवा नर्सेस(पाय न मोडलेला स), पण नर्शी करू नका असा संकेत आहेच. तो पाळावा. सगळ्या नर्सेस पायमोडक्या असतील तर रुग्णालय कसे 'चालेल'? 'अन्‌' हा एकच शब्द अंत्य व्य़ंजनाचा पाय मोडून लिहायचा असा नियम अस्तित्वात आहे. त्यामुळे कुर्यात सदा मंगलम, वंदे मातरम, एम.ए., एल्‌एल.बी. ही अधिकृत शुद्ध लिखाणे.
शब्दकोशात उच्च्चार देताना गरज असल्यास अंत्य व्यंजनाचा पाय मोडायची मुभा आहे. तसेच च, ज झ, फ ला उच्चारस्प्ष्टीकरणार्थ नुक्ता अवश्य द्यावा. (हाही संकेत आहे.)--वाचक्‍नवी

विसोबा खेचर

कुणी निर्माण केले हे संकेत? आम्ही नाय मानत जा...

सगळ्या फोकलिच्या व्याकरण आणि शुद्धलेखनवाल्यांना आम्ही फाट्यावर मारतो..

तात्या.

देवदत्त

चांगला उपक्रम वाटतोय. हळू हळू कळेल त्याचा किती उपयोग होतो ते.

सध्या एकच वाटतेय, आजकाल लोक वापरतात म्हणून त्यात इंग्रजी शब्द किंवा इंगराठी भाषेला(मटा प्रमाणे) पाठिंबा वाढायला नको.
आणि मराठीत उगाच व्याकरणाचा किचकटपणा वाढला असे म्हणून मग उरलेली मराठी भाषा ही निघून जायला नको. :(

मराठीत उगाच व्याकरणाचा किचकटपणा वाढला असे म्हणून मग उरलेली मराठी भाषा ही निघून जायला नको. :(

जागतिकिकरण, आंतरजाल, आणि इतर कारणाने जरा मराठी तोकडी पडण्यापेक्षा मराठीच्या नव्या स्वरुपाने भाषा ओघवती व्हावी आणि जीवनव्यवहारात तिच्या सहभागाचा वेग वाढत असेल तर अशा बदलांचे आपण स्वागत करावे असे वाटते. :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धोंडोपंत

जागतिकिकरण, आंतरजाल, आणि इतर कारणाने जरा मराठी तोकडी पडण्यापेक्षा मराठीच्या नव्या स्वरुपाने भाषा ओघवती व्हावी आणि जीवनव्यवहारात तिच्या सहभागाचा वेग वाढत असेल तर अशा बदलांचे आपण स्वागत करावे असे वाटते. :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

एकदम मान्य. बदलांचे स्वागत करावेच. पण आज ज्या पद्धतीने वृत्तपत्रांमधून मराठी शब्द अस्तित्वात असूनही इंग्रजी शब्दांचा वापर वाढतो आहे, त्याची आम्हाला चिंता नव्हे चीड येते.

मटा हे एक उदाहरण झालं. पवारांच्या सकाळमध्ये अनेक सदरांची शीर्षके इंग्रजीत असतात. सकाळचे संपादक मंडळ या बाबत काही करतांना दिसत नाही.

३१ डिसेंबरला दूरदर्शनच्या एका वाहिनीवर अशोक खरे, आशालता वाबंगावकर आणि सौ. मृणाल कुलकर्णी यांच्या गप्पा दाखवल्या. गो. नि. दांडेकरांच्या नातीच्या तोंडून येणारे इंग्रजीयुक्त मराठी ऐकून आम्ही धन्य झालो.

आपला,
(त्रस्त) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

विसोबा खेचर

शुद्धलेखनाचे जे काही ढोबळ नियम अस्तित्वात आहेत ते नियम मिसळपावही मानते, नाही असे नाही!

परंतु मिसळपाववर शुद्धलेखन, व्याकरण वगैरे विषयांवरील चर्चेला पूर्ण बंदी आहे. परंतु खुद्द आमचे मित्र प्रा डॉ दिलीप बिरुटे यांनीच ही चर्चा सुरू केल्यामुळे ती येथून उडवून लावण्याकरता आमचे मन धजावत नाही! :)

असो, चर्चा चालू द्या!

आपला,
(शुद्धलेखन, व्याकरण या शब्दांची मनस्वी चीड असणारा!) तात्या.

धनंजय

तुमचे वरील लिखाण शुद्धलेखनाच्या नियमांना धरून आहे. तुम्ही स्वतः बेसुरे गायला, आवडीने ऐकायला, लागाल तेव्हा रागदारी नियमांची चीड खरी मानू :-)
तोपर्यंत तुमची "चीड" म्हणजे काय कोणास ठाऊक. आणि "मनस्वी" म्हणजे काय कोणास ठाऊक!

(रागदारीच्या बाहेर आहे तेही उत्तम संगीत, तरी रागदारी संगीत म्हणजे जुलूम नाही असे मानणारा) धनंजय

विसोबा खेचर

तुम्ही स्वतः बेसुरे गायला, आवडीने ऐकायला, लागाल तेव्हा रागदारी नियमांची चीड खरी मानू :-)

रागदारीतले नियम आम्हालाही अर्थातच मान्य आहेत. परंतु जर बालगंधर्वांसारख्या कुणी बिहागात कोमल निषाद लावला तर आम्ही त्याला दादच देतो! तिथे आम्ही बिहागाचं व्याकरण तपासून पाहायचा शहाणपणा करत नाही. आम्ही तो नारायणरावांचा अधिकार मानतो!

शंकरात शुद्धकल्याणची जागा करीम्नखासाहेबच घेऊ जाणे! त्यांना आम्ही शंकराच्या व्याकरणाचे नियम दाखवण्याचा 'वाळिंबेपणा!' करणार नाही!!

(रागदारीच्या बाहेर आहे तेही उत्तम संगीत, तरी रागदारी संगीत म्हणजे जुलूम नाही असे मानणारा)

रागदारी संगीत म्हणजे जुलूम तर नाहीच, उलट त्यात स्वर्गीय आनंद भरून राहिला आहे!

आपला,
(रागदारी संगीताचा अभ्यासक!) तात्या.

--
अब्दुल करीम खासाहेब जेव्हा कामगत करत करत तार षड्जाला स्पर्श करतात तेव्हा त्या स्थानाला तीर्थस्थान नाही म्हणायचं तर दुसरं काय म्हणायचं?! - भाईकाका.

धनंजय

> त्यांना आम्ही शंकराच्या व्याकरणाचे नियम दाखवण्याचा 'वाळिंबेपणा!' करणार नाही!!
तुम्ही जो विवेक संगीतज्ञानात दाखवता, त्याच विवेकाला भाषेच्या अभ्यासात व्याकरण म्हणतात. यापेक्षा संशोधक वृत्ती असेल तर खाँसाहेबांचा तीव्रमध्यम कुठल्या परिस्थितीत लागतो, ते ज्ञान शंकराच्या व्याकरणाचा भाग होतो. ते कळले म्हणूनच भीमसेनांनी तो येथे लावला आहे. बालगंधर्वांचा अमुक परिस्थितीतला कोमल निषाद बिहागात का सौंदर्य आणतो ते जाणून बिहागाच्या व्याकरणात त्याची नोंद केली जावी.

अधिकारी व्यक्तीला (म्हणजे मराठी स्वभाषा म्हणून बोलणार्‍या करोडो लोकांना) कसे बोलायचे कळण्यासाठी व्याकरणाचे नियम लागत नाहीत. पण अधिकारी व्यक्ती जे बोलते आणि जे बोलत नाही त्या विवेकाला व्याकरणाचे नियम म्हणतात.

शुद्धलेखन मात्र केवळ व्यवहारातल्या सोयीसाठी असते. तुम्ही शेअरबाजारात काम करता. समभागांच्या बाबतीत काही त्रोटक भाषा आहे. उदा : ACC चा Scrip Code : 500410 असा आहे. वेगळा असता तरी चालले असते. वाटल्यास तुम्ही एकटे म्हणू शकता, मी बाजारातला खाँसाहेब आहे, मी उद्यापासून ५००४११ असा कोड वापरीन. आणि खरेच एक आकडा असला आणि दुसरा आकडा असला तर मूलभूत काहीच फरक पडत नाही. पण सर्वांनी एकच वापर ठरवण्यात सोय आहे. सेन्सेक्समधील कंपन्यांची यादी कालांतराने बदलते. पण एका तज्ज्ञसमितीच्या विचारानुसार आपण सर्वच जी काही ठरलेली यादी आहे तीच वापरतो. त्यात सोय आहे. तुम्हाला वाटल्यास वेगळ्याच कुठल्या ३० कंपन्यांचा तुम्ही निर्देशांक बनवा. पण त्यात गैरसोय आहे.

शुद्धलेखन बाहेरून लादलेले असते पण सोयिस्कर असते. कुण्या गुणी तात्याला "मी म्हणतो म्हणून माझे वेगळे" असे म्हणण्यात तोटा असतो. पण ते लादणार्‍यांनी वापरणार्‍यांची सोय बघितलीच पाहिजे. प्राडॉ. यांनी याच कारणासाठी ही चर्चा उघडली आहे.

व्याकरण तुमच्या आत असते, आणि तुम्हाला वाटले नाही तरी आतूनच काटेकोर असते. कुण्याही गुणी गडकर्‍याला/कारकुनाला नवीन प्रयोग घडवून आणता येतो(, ऐकणार्‍यांना नवीन प्रयोग पटला म्हणजे झाले). व्याकरणासाठी कोणी तज्ज्ञमंडळ बसवणे हास्यास्पद होईल. कोणीही त्यांचे म्हणणे ऐकणार नाही.

तुमच्या संगीताच्या + शेअरबाजाराच्या अभ्यासामुळे तुम्हाला हा प्रकार समांतर आहे हे सहज दिसावे.

विसोबा खेचर

यापेक्षा संशोधक वृत्ती असेल तर खाँसाहेबांचा तीव्रमध्यम कुठल्या परिस्थितीत लागतो, ते ज्ञान शंकराच्या व्याकरणाचा भाग होतो.

अहो पण मुळात शंकराच्या व्याकरणात तीव्र मध्यम नाहीये! तरीही खासाहेबांनी तो फार उतम लावला आहे आणि खासाहेब अधिकारी व्यक्ति आहेत! त्यांनी लोकांना स्वर्गीय सुखाचा आनंद दिला आहे!

बालगंधर्वांचा अमुक परिस्थितीतला कोमल निषाद बिहागात का सौंदर्य आणतो ते जाणून बिहागाच्या व्याकरणात त्याची नोंद केली जावी.

नुसती व्याकरणात नोंद करून काही फायदा नाही साहेब! त्याकरता गाणारा मनुष्य हा 'बालगंधर्व' पाहिजे! :)

पण अधिकारी व्यक्ती जे बोलते आणि जे बोलत नाही त्या विवेकाला व्याकरणाचे नियम म्हणतात.

अहो पण अधिकारी व्यक्ति कोण हे कसे ठरवायचे? ह्या वाळिंब्याला कुणी दिले हे अधिकार?

तुमच्या संगीताच्या + शेअरबाजाराच्या अभ्यासामुळे तुम्हाला हा प्रकार समांतर आहे हे सहज दिसावे.

हम्म्म! ठीक ठीक! :)

तात्या वाळिंबे.

इनोबा म्हणे

षुद्धलेखनातिल नवीन नीयमांचे नक्किच स्वागत करू.परंतु इंग्रजिचा अतीरीक्त वापर 'अनपरवडेबल'.

वाचक्नवी

फक्त नपुंसकलिंगी शब्दांचा बोली भाषेत 'अं'कारान्त उच्चार होतो. काळं करडं ढग, जिरं-मिरं असे उच्चार होत नाहीत. कारण ढग, जिरे, मिरे हे शब्द नपुंसकलिंगी नाहीत. जो ग्रांथिक मराठी मनातल्यामनात र्‍हस्वदीर्घ सांभाळून वाचतो, त्याला बिनचूक लेखन करताना व्याकरणाच्या आणि शुद्धलेखनाच्या नियमांची गरज सहसा पडत नाही. तो जे लिहील ते व्याकरणशुद्धच लिहील. लिखाणात काही लेखनदोष झाले असतीलच तर, र्‍ह्स्वदीर्घाचे स्पष्ट उच्चार करून लिखाण परत वाचून पाहिल्यानंतर अनवधानाने झालेल्या सर्व चुका सहज ध्यानात येतात. फक्त परत वाचायची तयारी पाहिजे.
बोलीभाषा फक्त संवादापुरती हवी. लिहिलेला/छापलेला प्रत्येक शब्द शब्दकोशात किंवा त्याचे रूप व्याकरणाच्या पुस्तकात सापडलेच पाहिजे. अनुस्वार म्हणजे नाकातला उच्चार. 'केलं, गेलं 'मध्ये नाकात उच्चार होत नाही. म्हणून असले शब्द वैचारिक लिखाणात नको. मुळात केलें-गेलें हे उच्चार अनुस्वारयुक्तच होते. कोकणात(की कोंकणात?)अजूनही आहेत. तसे नसते तर, इंग्रजांनी शींवचे Sion, गांवचे Gaon आणि कोंकणचे Konkan अशी स्पेलिंग्ज केलीच नसती. देशावरच्या लोकांनी हे कोंकणस्थ ब्राह्मणी उच्चार म्हणून हट्टाने काढून टाकले. आणि त्याला साहजिकच कष्ट वाचतात म्हणून, लेखक-मुद्रक-मुद्रितशोधक-संपादक-प्रकाशकांचा आणि राजकारण्यांचा पाठिंबा मिळाला. आता नाकातले उच्चार गेलेच आहेत तर ते परत आणायची गरज नाही, पण ज्या कारणास्तव लेमुसंप्रंनी अनुस्वार काढायला लावले तो हेतू असल्या 'अं'कारान्त लिखाणाने उधळला गेला.
हिंदीतले मैं, नहीं सारख्या शब्दांवरचे अनुस्वार आणि अर्धअनुस्वार पूर्वी होते तसेच अजूनही आहेत. फक्त एकार-ओकार इत्यादींवर हल्ली चन्द्रबिन्दू न देता नुसता अनुस्वार देतात.
एवंच, बोलीभाषेत वैचारिक लिखाण करायला माझा सक्त विरोध आहे. कॉक्‍नी किंवा स्लॅंग बोलीत तत्त्वज्ञानाचा ग्रंथ मला वाचवणार नाही(की वांचवणार नाही?)--वाचक्‍नवी

धनंजय

मराठी भाषेत आदमासे ५७ ध्वनी आहेत (अशोक केळकर यांची "श्रवणप्रत्ययी लेखन" यादी).
लिपीत स्वतंत्र खुणा मात्र स्वरांची तेराखडी, वरचे टिंब, :, व्यंजनावली ३४, सगळे मिळून ४९. त्यामुळे काही चिह्नांना संदर्भानुसार वेगवेगळे उच्चार ध्वनित करावे लागतात.

उच्चारशास्त्रात "अनुस्वार" म्हणजे एका विशिष्ट प्रकारचे आनुनासिक, हे खरे. पण आधुनिक मराठीत शब्दाच्या अंती तो उच्चार कधीच येत नाही. (खरे म्हणजे तो ध्वनी मराठीत फारच कमी ठिकाणी येतो, म्हणून संदर्भानुसार आपण लिपीतल्या टिंबाला ङ्, ञ्, ण्, न्, यं्, वं् हे उच्चार करायचे सोयीस्कर काम देतो.) त्यामुळे 'शब्दाचा शेवट' या संदर्भात वरच्या टिंबाला वेगळे काम देण्यास काही हरकत नाही.

या संदर्भानुसार (अंत्य 'अ' वर असले तर) वरचे टिंब हे दीर्घ 'अ' साठी चिह्न आहे. या चिह्नाचा हा उपयोग अत्र्यांनी सांगितला असे मी कुठेतरी ऐकले होते. या ध्वनीसाठी कुठल्यातरी चिह्नाची मराठीत नितांत गरज असावी, कारण ते लवकरच लोकप्रिय झाले. शुद्धलेखन तज्ज्ञ समितीने या ध्वनीसाठी आयत्या लोकप्रिय झालेल्या या चिह्नाचा उपयोग चालू ठेवावा, असे मला वाटते.

"बहुतेकांनी शाळेत शिकलेली म्हणून लेखनास योग्य" अशी भाषेची एक ठेवणीतली बोली असते. माझेही असे मत आहे, की "बहुतेकां"पर्यंत पोचायचे असेल तर त्या बोलीतच वैचारिक लेखन करावे. ("बोलीत विचारिक लिहू नये" असे तुम्ही म्हणता त्याचा हाच अर्थ असावा.) पण हा शिक्षकाने विद्यार्थ्यास द्यावयाचा सुज्ञ सल्ला आहे. शुद्धलेखनाचा मुद्दा नाही. संबंध लावायचाच तर हा. त्या खास बोलीतल्या लिखाणाला लागू असे पर्याप्त नियम करणे असे या तज्ज्ञांचे किमान कार्यक्षेत्र आहे. वाटल्यास मराठीच्या सर्व बोली लिहिताना सोय कशी होईल ते बघणे हे त्या तज्ज्ञांचे कमाल कार्यक्षेत्र आहे - पण या कामाचा अवाका अतिरेकी असल्यामुळे तज्ज्ञांनी आपले किमान कार्य केले तरीही त्यांचे आपण आभार मानू.

ऋषिकेश

शुद्धलेखनाचे नियम बनवताना केवळ शुद्ध"लेखना"चे नियम बनवावे. व्याकरण जसे काळ, वचने, लिंग, रुपे आदिंचे नाहित. एखादा शब्द, वाक्य, ध्वनी जर लिखित स्वरुपात हवा असेल तर कोणते नियम पाळावेत इथपर्यंतच हे नियम असावेत. काय लिहायचं हा निर्णय सर्वस्वी लेखकाच्या बोली भाषेवर आणि त्याला शिकवण्यात आलेल्या व्याकरणावर सोडावे. हे नियम केवळ कसे लिहावे इतकचं सांगतिल काय लिहावे हे नाही!
एखाद्याला "त्या हास्पीटलात नर्सा होत्या" असं म्हणायचं असेल तर हास्पिटल चा स्पि र्‍हस्व हवा की दिर्घ हे लेखनाचे नियम सांगु शकतील. पण उच्चार करणारा 'हास्पिटल' असा उच्चारकरत असेल तर "हॉ" बरोबर आहे हे शुद्धनेखनाच्या नियमांकडून अपेक्षित नाहि. एखाद्याचा उच्चार बदलला की लेखन बदलेलच.
मला हे असं लिहायचं आहे ते शुद्ध लिपित कसे लिहु? (कसं लिहुं?) हीच मर्यादा असावी.

वाचक्नवी

नियम फक्त लेखनासाठीच आहेत आणि असावेत. बोली भाषेत कुणी कसे बोलावे याचे नियम ज्याचे त्याने ठरवावे, किंवा न ठरवता हवे तसे बोलावे. पण आपले बोलणे जर प्रत्येक मराठी भाषकाला समजावे असे वाटत असेल तर छापील मराठीत नव्हे तर, मराठीच्या प्रमाण उच्चारानुसार आणि व्याकरणानुसार बोलावे. थोडक्यात बोलताना 'असे केले' असे बोलू नये तर 'असं, केलं' असे बोलावे. पण लिहिताना संवादाखेरीज अन्यत्र असले बोली लिखाण करू नये.
श्री. धनंजयांशीही सहमत. अनुस्वाराचे एकापेक्षा अधिक उपयोग असू शकतात हे मान्य. पण मग अनुच्चारित अनुस्वार काढून टाकल्याचा दावा करू नये.--वाचक्नवी

बोली भाषेत जसे वाट्टेल तसे बोलता येते. तसेच लिहिण्याची सोय असली तरी त्यास हरकत नसावी.
मराठीचे हेच प्रमाण उच्चार आहेत आणि तसेच बोलावे आणि तसेच लिहावे यास मात्र आमचा आक्षेप आहे.
प्रत्येकाने आपापल्या बोलीत लिहिल्यास मराठी अधिक समृद्ध होईल आणि भाषेत अधिक सहजपणा येईल असे वाटते.
म्हणुन असे केलं, भलं झालं , लिहितांना वापरावे या मताचा मी आहे.त्यात भाषेचाच फायदा आहे, असे वाटते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वाचक्नवी

भाषेच्या जन्मकाळी, जसे उच्चार तसे लिहिणे अशीच स्थिती होती. पण त्यानंतर, लिहिलेला मजकूर इतरांपैकी प्रत्येकाला समजावा याकरिता ग्रंथनिर्मिती झाली. व त्यासाठी समाजातल्या काही विद्वान माणसांनी एकत्र बसून त्या काळच्या बहुतेकांना मान्य होईल अशी प्रमाण भाषा निर्माण केली आणि त्याच भाषेत लिखाण करणे फायदेशीर असल्याने ती प्रथा चालू ठेवली. प्रमाण भाषा हळूहळू बदलते, पण ते बदल लिखाणात येऊन स्थिरस्थावर व्हायला वेळ लागतो. बोली भाषा मात्र सतत आणि जागोजाग बदलत असते आणि त्यामुळे रूढ होऊ शकत नाही. बोली भाषेत लिखाण केले तर ते फार थोड्या लोकांना समजेल आणि अल्पजीवी ठरेल.

आणि एक..उच्चारानुसार लिखाण करायची जबाबदारी ही मराठी भाषकांनीच आपल्या डोंबलावर का घ्यावी ? जगात इंग्रजी, हिंदी यांसारख्या अनेक भाषा आहेत. त्यांचे लिखाण उच्चारानुसारी का करू नये? मराठी लोकांनी याकरिता जागतिक चळवळ उभारण्याची नितांत गरज आहे!!--वाचक्‍नवी

चाल, गति, वेग, प्रवेग, वि. उष्णता वि. गुरुत्त्व, जल प्रतिमूल्य इ. च्या व्याख्यांत तसेच कायद्याच्या भाषेत संदिग्द्धता येता नये. अन्यथा भाषेमुळे एखाद्या हुशार विद्यार्थ्याला कमी गुण मिळतील. तसेच एखाद्या निरपराध्याला शिक्षा व्हायची. सुस्पष्टता आणि नेमकेपणा हवा. न्यायखाते तर चोर सोडून संन्याशाला फाशी देण्यात 'प्रवीण' आहे. नाहींतर खालच्या कोर्टात शिक्षा झालेला आरोपी बहुधा सुटतो. निदान तांत्रिक कारणासाठी तरी. तरी खालच्या न्यायाधीशांचा पगार आपण भरलेल्या करांतून दिला जातच असतो. ललित लिखाणात मात्र 'आमचं गण्या म्हणालं' चालेल.

डॉक्टरसाहेब,

आताच नियमांवर धावती नजर टाकली. पाच म्हणजे हिरवा हिरा. पांच म्हणजे ५ हा अंक. नाव म्हणजे होडी. नांव म्हणजे व्यक्तीचे अथवा पदार्थाचे विशेषनाम. हे फरक कसे ओळखावेत? सखोल परीक्षणांती आणखी ब-याच त्रुटि आढळतील. मी तर सामान्य वाचक आहे. विशेषद्न आणखी अनेक त्रुटि काढू शकतील.

पुष्कर

एका शब्दाचेच अनेक अर्थ असू शकतात. त्यासाठी तो शब्द वेगवेगळ्या प्रकाराने लिहिण्याची काय गरज? तो शब्द कुठे वापरला आहे ह्यावरूनच अर्थ ओळखावा.

पाच म्हणजे हिरवा हिरा
तुम्हाला कदाचित "पाचू" म्हणायचं आहे असं वाटतय.

नाव म्हणजे होडी. नांव म्हणजे व्यक्तीचे अथवा पदार्थाचे विशेषनाम
सध्याच्या नियमांप्रमाणे दोन्ही शब्द "नाव" असेच लिहितात. होडी या अर्थी नाव स्त्रीलिंगी आहे तर नाम याअर्थी ते नपुंसकलिंगी आहे.

सखोल परीक्षणांती आणखी ब-याच त्रुटि आढळतील
कदाचित त्यासाठीच ही चर्चा आहे. त्या त्रुटी बाहेर येऊ द्या.

कांदळकर साहेब,
सध्याचे शुद्धलेखनाचे नियम योग्य आहेत अस मानणा-यांच्यानुसार आपल्याला ज्या तुटी वाटतात त्या त्रुटी नसाव्यात असे वाटते. कारण आपल्या प्रश्नाचे उत्तरे ही....व्याकरणाच्या नामे,सामान्यनामे,विशेषनामे, यात दडलेली आहेत.
अर्थात आपणास माहिती पाहिजे असल्यास नाम म्हणजे काय, सामान्यनामे म्हणजे काय , विशेषनामे कशास म्हणतात, इथे टंकावे लागेल...........!
(मीही आपल्यासारखाच सामान्यवाचक आहे, नामांचे प्रकार व कार्य आम्हालाही पाठ नाही. पुस्तक उचकावे लागेल :) )

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वाचक्नवी

शुद्धलेखनाचे नवीन नियम का करणार ?
१) पूर्वीचे १९६१ चे नियम करताना चुका झाल्या? (२) जुने नियम अपुरे पडतात? (३) लोकांना नियम समजत नाहीत. ते चुकीचा अर्थ काढून अशुद्ध लिहितात? (४) शुद्धलेखनाच्या नियमांमुळे वाचक-मुद्रक-लेखक-प्रकाशक-श्रोत्यांच्या स्वातंत्र्यावर गदा येते ? (५) परीक्षेत मुलांना कमी गुण मिळतात ? (६) शुद्धलेखनाच्या नियमांमुळे मराठीच्या विद्यार्थ्यांना मराठी शिकणे अवघड जाते ? (७) शब्दकोश, व्याकरणाची पुस्तके, संगणक आदींच्या उपयोगांवर मर्यादा येतात ? (८) हस्व-दीर्घ लिहिण्यासाठीचे मराठी आणि उरलेल्या इतर तमाम भारतीय भाषांचे नियम एकमेकांच्या विरुद्ध असल्याने त्या भाषा शिकायला अडचण येते ? (९) चालू नियमांमुळे शाब्दिक कोट्या करणे, अलंकारयुक्त काव्यरचना करणे दुरापास्त झाले आहे ? काव्ये नीरस झाली आहेत ? (१०)मराठीचे इतर भाषांत आणि त्यांचे आपल्या भाषेत रूपांतरण करता येत नाही ?
की आणखी काही ? सुचवा.--वाचक्नवी

धनंजय

तुमचे प्रश्न मुद्द्याचे आहेत. या बाबतीत "गरजांचे सर्वेक्षण आणि चाचणी" (नीड्स असेस्मेंट) नीट करणे महत्त्वाचे आहे. ही तज्ज्ञ समिती बसवायच्या आधी हा विचार झाला असला पाहिजे, तसा अहवाल उपलब्ध असला पाहिजे. किंवा तज्ज्ञ समितीचे हे प्रथम कार्य आहे.

१) पूर्वीचे १९६१ चे नियम करताना चुका झाल्या?
ही एक शक्यता. दुसरी शक्यता ही की गेल्या ४५ वर्षांत प्रमाण बोलीत बदल झाला आहे. झालेला बदल इतपत आहे की लेखी शैली ही प्रमाणबोलीच्या श्रवणप्रत्ययी लेखनापासून खूप दूर गेलेली आहे. ही फारकत अती झाली तर लेखन चालू भाषेतले सामान्य संदेशन करण्यास कुचकामी ठरू लागेल. कालांतराने नियमांचा आढावा पुन्हा घ्यावा.

(२) जुने नियम अपुरे पडतात?
याचे उत्तर (१) शी मिळतेजुळते आहे

(३) लोकांना नियम समजत नाहीत. ते चुकीचा अर्थ काढून अशुद्ध लिहितात?
ही शक्यता आहे. पण "नीट समजत नाहीत" असे असले तर नियम समजतील अशा वाक्यांत लिहिले म्हणजे पुरे झाले. यासाठी तज्ज्ञसमितीकडून नवीन नियम नकोत.

(४) शुद्धलेखनाच्या नियमांमुळे वाचक-मुद्रक-लेखक-प्रकाशक-श्रोत्यांच्या स्वातंत्र्यावर गदा येते ?
भाषा ही "स्वयंभू" असते, लोकप्रमाण असते. त्यामुळे जर अमुक एक भाषाप्रयोग लोकांत अर्थवाही असेल, पण लिहिता येत नसेल, तर ती लेखनाची त्रुटी आहे. त्याच्या लेखनाची सोय व्हावी. "स्वातंत्र्यावर गदा" या भावुक शब्दांचा हा कार्यशील अर्थ आहे. आणि असे सर्वेक्षण कालांतराने जरूर व्हावे.

(५) परीक्षेत मुलांना कमी गुण मिळतात ?
हे चरम उद्दिष्ट नव्हे. पण एखादी लेखनप्रणाली सोयीस्कर नसेल तर सरासरी विद्यार्थ्याला ज्ञान असूनही कमी गुण मिळत असतील, ही शक्यता आहे. असे असल्यास विद्यार्थ्यांना कमी गुण मिळणे हे बोजड आणि अकार्यक्षम नियमावलीचा संकेत असू शकेल. पण नियमावली वेगळी असती तर गुण किती मिळाले असते, हे व्यवहारात कसे कळणार? कदाचित संशोधन करावे लागेल... तरी, हा संशोधनाचा आणि सर्वेक्षणाचा मुद्दा आहे, उद्दिष्ट नाही.

(६) शुद्धलेखनाच्या नियमांमुळे मराठीच्या विद्यार्थ्यांना मराठी शिकणे अवघड जाते ?
हा योग्य मुद्दा आहे. कारण नियम हे सोयीसाठी आहेत. "अवघड"च्या जागी "तुलनेने अवघड" शब्द वापरावा.
"मराठी शिकणे" = "मराठी लेखांचे अर्थग्रहण करणे, आणि अर्थवाही लेखन करणे" असे वाचावे.
जर विद्यार्थ्यांना एखादा अर्थ बोलून ऐकलेला कळतो, स्वतः बोलून दाखवता येतो; पण तुलनेने तोच अर्थ वाचून ग्रहण करणे/लिहून प्रकट करणे अवघड जाते; असे सर्वेक्षणात दिसले तर ती काळजीची बाब आहे. अवघड जाते ते हल्लीच्या नियमांमुळे, वेगळे नियम असते तर अवघड गेले नसते, असे लक्षात आल्यास नियम बदलणे हेच योग्य.

(७) शब्दकोश, व्याकरणाची पुस्तके, संगणक आदींच्या उपयोगांवर मर्यादा येतात ?
हा मुद्दा बहुतेक योग्य नाही.

(८) हस्व-दीर्घ लिहिण्यासाठीचे मराठी आणि उरलेल्या इतर तमाम भारतीय भाषांचे नियम एकमेकांच्या विरुद्ध असल्याने त्या भाषा शिकायला अडचण येते ?
हा मुद्दा ठीक नाही.

(९) चालू नियमांमुळे शाब्दिक कोट्या करणे, अलंकारयुक्त काव्यरचना करणे दुरापास्त झाले आहे ? काव्ये नीरस झाली आहेत ?
हा मुद्दा ठीक नाही. वाटल्यास मुद्दा (६) "बोलण्यात अर्थवाही पण ते लिहिता येते/येत नाही" विचार समर्पक आहे.

(१०)मराठीचे इतर भाषांत आणि त्यांचे आपल्या भाषेत रूपांतरण करता येत नाही ?
याचा शुद्धलेखनाशी बहुतेक संबंध नाही.

वाचक्नवी

>>भाषा ही "स्वयंभू" असते, लोकप्रमाण असते. त्यामुळे जर अमुक एक भाषाप्रयोग लोकांत अर्थवाही असेल, पण लिहिता येत नसेल, तर ती लेखनाची त्रुटी आहे. त्याच्या लेखनाची सोय व्हावी. "स्वातंत्र्यावर गदा" या भावुक शब्दांचा हा कार्यशील अर्थ आहे. आणि असे सर्वेक्षण कालांतराने जरूर व्हावे.<<
भाषा लोकप्रंमाण असते हे मान्य, परंतु ती 'स्वयंभू' (एका व्यक्तीने) स्वतः निर्माण केलेली असते हे अस्वीकार्ह. मराठीतला जवळजवळ प्रत्येक भाषाप्रयोग आपल्या लिपीत लिहिता येतोच. परकीय भाषेतले शब्द लिहिता येत नाहीत हेही सत्य आहे. पण लिपी त्या त्या भाषेकरता असते, त्यामुळे प्रत्येक लिपीत सर्व भाषा अचूक लिहिता आल्या पाहिजेत हा आग्रह धरता येणार नाही.
'स्वातंत्र्यावर गदा' याचा मला अभिप्रेत असलेला अर्थ-"मी कसेही बोलीन, लिहीन. माझ्यावर शुद्धलेखनाच्या नियमांचे बंधन नको. मी लिहिलेले तुम्ही वाचावे आणि अर्थ समजावून घ्यावा." अशी वृत्ती असणे.

>>(७) शब्दकोश, व्याकरणाची पुस्तके, संगणक आदींच्या उपयोगांवर मर्यादा येतात ?
हा मुद्दा बहुतेक योग्य नाही.<<
शुद्धलेखनाचे नियम वारंवार लोकांच्या सोईनुसार बदलल्याने शब्दकोश आणि व्याकरणाच्या पुस्तकांच्या निर्मितीला अवरोध होतो. शब्द लिहिण्याचे जुने-नवे सर्व प्रकार परिपूर्णतेसाठी शब्दकोशात आलेच पाहिजेत. तसेच व्याकरणाच्या पुस्तकातही सर्व बदल दिसायला पाहिजेत. त्यामुळे ग्रंथांची जाडी निष्कारण वाढते. संगणकावर शोध घेताना वेगळ्या पद्धतीने लिहिलेला शब्द इच्छित माहिती शोधू शकणार नाही.
>>८) हस्व-दीर्घ लिहिण्यासाठीचे मराठी आणि उरलेल्या इतर तमाम भारतीय भाषांचे नियम एकमेकांच्या विरुद्ध असल्याने त्या भाषा शिकायला अडचण येते ?
हा मुद्दा ठीक नाही<<
मराठी सोडून सर्व भारतीय भाषात संस्कृतमधून आलेले तत्सम शब्द मुळाबरहुकूम लिहितात. या भाषांचे मराठी अभ्यासक मातृभाषेच्या प्रभावामुळे हमखास चुकीचे लिखाण करतात.
<<(९) चालू नियमांमुळे शाब्दिक कोट्या करणे, अलंकारयुक्त काव्यरचना करणे दुरापास्त झाले आहे ? काव्ये नीरस झाली आहेत ?
हा मुद्दा ठीक नाही. >>
या विषयावर सत्त्वशीला सामंतबाईंचे लेख मिळाल्यास जरूर वाचावेत. अनेक उदाहरणांनी त्यांनी हा मुद्दा स्पष्ट केला आहे.
>>(१०)मराठीचे इतर भाषांत आणि त्यांचे आपल्या भाषेत रूपांतरण करता येत नाही ?
याचा शुद्धलेखनाशी बहुतेक संबंध नाही.<<
माझे विधान भाषांतर/रूपांतरासाठी लागण्याया सॉफ्टवेअरच्या संदर्भात होते. संगणक इंग्रजीचे फ्रेन्च रूपांतर बर्‍यापैकी करू शकतो, पण मराठीचे हिंदी करण्यात वेगळे शुद्धलेखन ही अडचण होते. --वाचक्‍नवी

(२) जुने नियम अपुरे पडतात? आणि शुद्धलेखनाचे नियम वारंवार लोकांच्या सोईनुसार बदलल्याने शब्दकोश आणि व्याकरणाच्या पुस्तकांच्या निर्मितीला अवरोध होतो.

या बाबतीत आमचे मत असे की, पुर्वीच्या पुस्तकातून छापलेल्या मजकूरात खूपच अनुस्वार देण्याची पद्धत होती. त्यात सध्याच्या लेखनाच्या नियमामुळेच बदल झाला हे मान्य की नाही. म्हणुनच काही दशकानंतर नियम बदलले पाहिजेत. भाषेत शुद्धलेखनविषयक ठरविलेले नियम कायमचे राहूच शकत नाही. काळानुसार भाषेत विविध बदल होत असतात, भाषा ही प्रवाही असते. आणि त्यामुळेच हिंदी,इंग्रजी,आंतरजाल, व्यवहार,जीवन, यातून येणा-या अनेक नवीन शब्दांमुळे लेखनाच्या पद्धतीत आणि नियमात बदल करणे आवश्यक असतात. आणि हे बदल होतांना मराठी लिहिणे, वाचणे, बोलणे अधिक सहज,सुलभ व्हावे हा उद्देश महत्त्वाचाच असला पाहिजे असे वाटते !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वाचक्नवी

मराठी शुद्धलेखनाची तुलना इंग्रजी स्पेलिंगशी अगदी तंतोतंत होते. इंग्रजी शब्दांचे स्पेलिंग काही दशकांनी बदलते? अमेरिकनांनी प्रयत्‍न केला तरी कितपत यश मिळाले ? ते स्पेलिंग अमेरिकेच्या बाहेर वापरतात? हिंदी लिखाणात र्‍हस्व-दीर्घ बदलले ? मग मराठीनेच का बदलावे ? बदल केल्यामुळे भाषा अधिकाधिक अवघड होत जाते, कारण शिकणार्‍याला जुने आणि नवे दोन्ही शिकावे लागते.
>>या बाबतीत आमचे मत असे की, पुर्वीच्या पुस्तकातून छापलेल्या मजकूरात खूपच अनुस्वार देण्याची पद्धत होती >>
ती १९६१ नंतर बंद झाली. त्यामुळे कायकाय तोटे झाले ते एकदा लिहीन, पण फायदे अनेक झाले. आता नवीन सुधारणा म्हणजे ते काढलेले अनुस्वार परत आणणार ? की अनुस्वाराप्रमाणेच कानामात्रावेलांट्या काढून टाकणार ?--वाचक्‍नवी

विसुनाना

अस्तित्वात असलेले शुद्धलेखनाचे नियम 'आता' कालबाह्य झाले आहेत - तेंव्हा ते बदलले पाहिजेत अशी भूमिका कोणत्याही विचारसमूहाने घेतलेली दिसत नाही. तशी चर्चाही कोणी सुरू केल्याचे ऐकिवात नाही. मग महामंडळ स्वतःहून या निष्कर्षाप्रत पोचले कसे?
इतका धाडसी आणि पुरोगामी निर्णय एका झटक्यात घेणार्‍या कौतिकरावांचे कौतुक वाटते.

हे कौतिकराव ठाले पाटील 'घटं भिंद्यात पटं छिंद्यात' आपण काहीतरी करत आहोत हे दाखवण्याच्या मागे दिसतात. आजकाल त्यांचे नाव बातम्यांत दिसत आहे. (मीना प्रभूंना ५०,००० रु. दंड झाल्याच्या म.टा. मधील बातमीतही कौतिकराव झळकले आहेत.)
एक पांचट कोटी : आपले नाव 'कौतिक' हेच शुद्धलेखन आहे आणि कौतुक हा शब्द अशुद्ध आहे असा नियम करण्याचे ठाले पाटलांनी ठरवलेले (ठानलेले) दिसते. :)

मस्त लिंक दिली ! सर्वांनीच मराठीचे (चपखल) प्रमाणीकरण हा लेख वाचलाच पाहिजे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वाचक्नवी

या शुभानन गांगलांचा काही भयानक गैरसमज झालेला दिसतो आहे. जे जे, ते, मराठीबद्दल लिहितात ते ते, संस्कृत आणि भारतातल्या प्रत्येक भाषेबद्दल लागू होते. संत वाङ्‌मय काही फक्त महाराष्ट्रात निर्माण झाले नाही. भारतात ते प्रत्येक प्रांतात झाले आहे आणि होत आहे. दक्षिणी भारतातले संत वाङ्‌मय महाराष्ट्रापेक्षा कितीतरी जुने आहे. जगातल्या सर्व लिपींकरिता युनिकोड फॉन्ट्‌स अस्तित्वात आहेत. गांगलांच्या फॉन्ट्‌स संगणकावर उतरवून पाहिल्या, त्या अजिबात सुबक नाहीत. यांवर मनोगतावर बरीच चर्चा झाली आहे. त्यांचे गझल- कवितांचे यांत्रिकीकरण कवींच्या प्रतिभेला मारक आहे. त्यांचे संशोधन भाषेबद्दल आहे की लिपीबद्दल हेही स्पष्ट होत नाही.
जिज्ञासूंनी त्यांचा शोधनिबंध वाचून आपले मत द्यावे.--वाचक्‍नवी

इनोबा म्हणे

शुभानन यांचा उद्देश अगदी स्वच्छ आहे.ते मराठी असल्याकारणारने मराठीबद्दल प्रेम असणे हे आलेच,यामुळेच त्यांनी मराठी भाषेबद्दल आणी संतववाङ्‌मय याबद्दल (जरा) जास्तच कौतुकाने लिहीले आहे.त्यांच्या मराठीप्रेमाचे मला कौतुक वाटते आणी आदरही वाटतो.नुकताच त्यांचा कार्यगौरव करणारा एक लेख सकाळ मध्ये प्रसिद्ध झाला होता.तो वाचल्यास याची प्रचिती येईल.

गांगलांच्या फॉन्ट्‌स संगणकावर उतरवून पाहिल्या, त्या अजिबात सुबक नाहीत. यांवर मनोगतावर बरीच चर्चा झाली आहे. त्यांचे गझल- कवितांचे यांत्रिकीकरण कवींच्या प्रतिभेला मारक आहे. त्यांचे संशोधन भाषेबद्दल आहे की लिपीबद्दल हेही स्पष्ट होत नाही.
या मताशी मात्र मी सहमत आहे.

वाचक्नवी

लेख वाचला म्हणूनच वाटते की त्यांच्या डोक्यात बिघाड असावा. --वाचक्‍नवी

पुष्कर

"केशवसुतपूर्वकालीन पद्य व विष्णुशास्त्री चिपळूणकरपूर्वकालीन गद्य यांतील उतारे छापताना ते मुळानुसार छापावेत तदनंतरचे (केशवसुत व चिपळूणकर यांच्या लेखनासह) लेखन 'मराठी साहित्य महामंडळाच्या प्रस्तुत लेखन नियमांस अनुसरून छापावे.

केशवसुतांचा काव्यरचना काल १८८५ -१९०५
चिपळूणकरांचा लेखनकाल १८७४-१८८२"

असा एक नियम केला आहे म्हणे (केला आहे का करण्याच्या विचारात आहेत माहीत नाही. जिज्ञासूंनी नियमावली शोधून तो पहावा).

हे म्हणजे मूर्खपणा आहे. 'मराठी साहित्य महामंडळाच्या प्रस्तुत लेखन नियमांसाठी' आतापर्यंत निर्माण झालेल्या साहित्यात बदल करावेत की काय! का म्हणून?

वाचक्नवी

>>हे म्हणजे मूर्खपणा आहे. 'मराठी साहित्य महामंडळाच्या प्रस्तुत लेखन नियमांसाठी' आतापर्यंत निर्माण झालेल्या साहित्यात बदल करावेत की काय! का म्हणून?<< या मताशी अंशत: सहमत. जर नवीन नियम १९६२ पासून अंमलात आले तर त्यापूर्वी छापलेली पुस्तके दुरुस्त(?) करून का छापायची? --वाचक्‍नवी

विसोबा खेचर

काय मग मंडळी, इतक्या साधक बाधक चर्चेनंतर अखेरीस काय ठरले तुमचे शुद्धलेखनाचे नवे नियम?

आम्हाला तरी कळू द्यात! :)

आपला,
(मधल्या आळीतला!) तात्या बर्वा!

छ्या! शुद्धलेखनाबद्दल पानपान भरून कसल्या भसाभसा चर्चा करत असतात लेकाचे कुणास ठाऊक! (स्वगत!)

:)

तात्या,
आहे ते नियम बदलू नये असा एक मत प्रवाह आहे आणि उच्चारानुसार लेखन करण्यास हरकत नसावी असा दुसरा मत प्रवाह आहे. या पलिकडे अजून इतर नियमांवर फार चर्चा झालेली नाही. तसेच इतर भाषेतील शब्द जशाच तसे स्वीकारावेत का ! याबद्दलही अजूनही अपेक्षीत गतीने चर्चा पुढे गेलेली नाही असे वाटते !! असा या आत्तापर्यंतचा चर्चेचा सूर आहे !!!

आता या चर्चेच्या निमित्ताने आमच्यापुढे एक पर्याय असा आहे की , काही नामवंत साहित्यिकांची या बद्दल मतांची चाचपणी करावी आणि इथे टंकावी असा आहे, वेळ मिळाल्यास तसा प्रयत्न करेन म्हणतो, नाहीतर आमची चर्चा सुरुच आहे. म्हणजेच चर्चा अभी बाकी है ! :)

करिता माहितीस्तव सादर !!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विसोबा खेचर

वेळ मिळाल्यास तसा प्रयत्न करेन म्हणतो, नाहीतर आमची चर्चा सुरुच आहे. म्हणजेच चर्चा अभी बाकी है ! :)

ओक्के सर! चालू द्यात...:)

सवड मिळाल्यास आम्हीही या चर्चेत हिरिरीने भाग घेऊ!

--
(बिरुटेसरांचा विद्यार्थी) तात्या.

छ्या! या दिलीप बिरुटेसारखा सज्जन आणि भला माणूस या शुद्धलेखनाच्या लफड्यात कसा काय अडकला कुणास ठाऊक?! (स्वगत!)

इनोबा म्हणे

च्यायला,
हे शुद्धलेखन वगैरे म्हणजे आंबा खा पण हात घाण करु नको म्हणतात त्यातला प्रकार आहे,पण काय करणार भाषेचं सौंदर्य टिकवायचं तर करायला पाहिजे.

बाकी तुम्हा लोकांची ही बौद्धीक हाणामारी आमच्या मेंदूला ताण देऊन गेली भौ!या असल्या चर्चा करुन तुम्ही काय साध्य करता तुम्हालाच माहित.नियम करणारे करणार आणी तुम्ही तो विषय चघळून त्याचं चिंगम करणार.

या चर्चासत्राचा निकाल लागला की कोणीतरी आम्हाला तो पोष्टाने कळवायची तसदी घ्यावी,म्हणजे सरपंचांना कळवून आम्ही तुमच्यावर 'मानसिक छळाचा' गुन्हा दाखल करायला मोकळे.

तुम्ही चालू ठेवा!
आपला (नसलेला) -इनोबा

विसोबा खेचर

बाकी तुम्हा लोकांची ही बौद्धीक हाणामारी आमच्या मेंदूला ताण देऊन गेली भौ!

हेच म्हणतो!

या असल्या चर्चा करुन तुम्ही काय साध्य करता तुम्हालाच माहित.
नियम करणारे करणार आणी तुम्ही तो विषय चघळून त्याचं चिंगम करणार.

अगदी खरं!

आम्ही आम्हाला हवं तसं लिहू. लोकांना गरज असेल तर ते आमचं लेखन वाचतील. नायतर राहिलं!

आम्ही शुद्धलेखनाचे नियम व ते नियम सांगणार्‍यांना फाट्यावर मारतो.

तात्या.

वाचक्नवी

>>हे म्हणजे मूर्खपणा आहे. 'मराठी साहित्य महामंडळाच्या प्रस्तुत लेखन नियमांसाठी आतापर्यंत निर्माण झालेल्या साहित्यात बदल करावेत की काय! का म्हणून?हे म्हणजे मूर्खपणा आहे. --इति पुष्कर..सहमत. जर नवीन नियम १९६२ पासून अंमलात आले तर जुनी पुस्तके नवे नियम वापरून का दुरुस्त(?) करायची? पण आता काही इलाज नाही. हा विरोध १९६१ मध्ये नियम तयार होत असताना करायला हवा होता.
>>आम्ही आम्हाला हवं तसं लिहू. लोकांना गरज असेल तर ते आमचं लेखन वाचतील. नायतर राहिलं!<<--तात्या.
या विचारांशी आम्ही सहमत. इंग्रजीच्या एकाच शब्दाची वेगळीवेगळी स्पेलिंग्ज करायची आमची कुवत असताना शब्दकोशात दिलेली प्रमाण स्पेलिंग्ज आम्ही का करावीत? --वाचक्‍नवी

देवदत्त

या चर्चासत्राचा निकाल लागला की कोणीतरी आम्हाला तो पोष्टाने कळवायची तसदी घ्यावी,म्हणजे सरपंचांना कळवून आम्ही तुमच्यावर 'मानसिक छळाचा' गुन्हा दाखल करायला मोकळे.
मस्त एकदम :)

विसोबा खेचर

बिरुटेशेठ, आता आमच्या काही प्रश्नांची उत्तरे द्या!

मराठी शुद्धलेखनाची नवी नियमावली तयार करण्याचा निर्णय अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने घेतला आहे.

हा अधिकार अभामसाम ला कुणी दिला??

इंग्रजी आणि हिंदी शब्दांचा अभ्यास आदी प्रमुख सूत्रे डोळ्यासमोर ठेवून नियमावली तयार करण्याचा विचार महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी बोलून दाखविला आहे.

कोण हा कौतिकराव ठाले पाटील?? मराठी साहित्यात याचं योगदान काय??

तेव्हा शुद्धलेखनाबद्दल काही उत्तम चर्चा झाली तर सदरील चर्चेची प्रिन्ट काढून अध्यक्षापर्यंत पोहचविण्याचा आमचा मानस आहे.

तात्या म्हणतो की,

१) "कोण हा कौतिकराव ठाले पाटील आणि मराठी साहित्यात याचं योगदान काय?
२) नियमावली वगैरे बनवण्याचे अधिकार महामंडळाला कुणी दिले??

आमच्या वरील तिरक्या प्रतिसादाचीही प्रिन्ट काढून तुमच्या अध्यक्षांना पाठवा! मग बघतो तिच्यायला एकेकाला! :))

तात्या.

हा अधिकार अभामसाम ला कुणी दिला??
अभासाम हे घटक संस्थांच्या निवडक सदस्यांचे प्रतिनिधीचे मंडळ बनलेले असते. जसे आमचे मराठवाडा साहित्य परिषद, औरंगाबाद. तुमचे साहित्य सेवा मुंबई, विदर्भ, गोवा,कर्नाटक, आंध्र प्रदेश,मध्यप्रदेश, बडोदा, संमेलनाध्यक्ष, असे यांचे घटक संस्थाचे प्रतिनिधी या अभासामं त असतात. त्यांच्या प्रतिनिधी मधून अध्यक्षांची निवड होत असते आणि त्यातुन श्री ठालेपाटील हे अध्यक्ष म्हणुन निवडून आलेले आहेत. आता त्यांचे साहित्यातले योगदान किती हा प्रश्न केवळ त्यांच्याबद्दलच नव्हेतर त्यात असलेल्या सर्व प्रतिनिधिंना लागू होतो. त्यांच्याबद्दल आम्हाला इतकेच माहिती आहे, की साहित्यप्रवासातील विविध होतकरु साहित्यिकांना त्यांनी व्यासपीठ दिले आहे, नव-नवसाहित्यिकांच्या अनेक चळवळीत त्यांनी काम केली आहेत. साहित्याशी संबंधीत ते सतत काही ना काही करत असतात. आम्हाला त्यांचे सर्वच कर्तुत्व आत्ता नाही सांगता येणार पण, शेतक-यांचे असूड चे संपादन केल्याचे आठवते त्यांच्या सौ. अनुराधा पाटील या मोठ्या कवयत्रि आहेत, अर्थात दोघांचीही स्वतंत्र ओळख आहे. श्री ठाले पाटलांच्या आणखी काही पुस्तकांची माहिती मिळाली तर इथे टाकेनच !!!

२) नियमावली वगैरे बनवण्याचे अधिकार महामंडळाला कुणी दिले??
महामंडळ एक तज्न लोकांचे प्रतिनिधी मंडळ असते. ( असावे ) आणि मराठीचा वापर अधिक सहजपणे करता यावा यासाठी हे मंडळ प्रयत्न करत असतात ( असावेत ) अभासाम नियमावली बदलतील यावर आमचा तितका विश्वास नाही. अगदी थोडेफार बदल होतील असे वाटते. आणि तेही महाराष्ट्र शासनाने मान्य केले तर बदल होतील. नाहीतर आहेच मागचे नियम आणि ते शुद्धलेखन !!! :)

अवांतर :- तात्या, आज आम्ही या चर्चेचा अध्यक्षीय समारोप करणार होतो. पण, आपल्या प्रश्नाने आमचा अध्यक्षीय समारोप आणि आभाराचा कार्यक्रम लांबवला आहे याची नोंद घ्यावी ! :))

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विसोबा खेचर

महामंडळ एक तज्न लोकांचे प्रतिनिधी मंडळ असते.

तज्ञांचे निकष काय?? आम्ही त्यांना तज्ञ मानत नाही!!

तात्या, आज आम्ही या चर्चेचा अध्यक्षीय समारोप करणार होतो. पण, आपल्या प्रश्नाने आमचा अध्यक्षीय समारोप आणि आभाराचा कार्यक्रम लांबवला आहे याची नोंद घ्यावी ! :))

बिरुटेसाहेब, माफ करा, परंतु, मुळात मिसळपावसारख्या प्रसन्न, जिन्दादिल आणि दिलखुलास वातावरण असलेल्या संस्थळावर इतका नीरस आणि फालतू चर्चा विषय तुम्ही मांडलात हीच तुमची घोडचूक झाली असं आमचं नम्र, परंतु स्पष्ट मत आहे!!

आपला,
(संतप्त) तात्या.

शुद्धलेखनाचा चर्चा प्रस्ताव या संस्थळावर चघळू दिला त्याबद्दल सर्वप्रथम तात्यांचे आभार मानतो. या काथ्याकुटाच्या निमित्ताने जी साधक- बाधक चर्चा झाली त्याने आम्ही समाधानी आहोत. ज्यांनी प्रत्यक्ष या चर्चेत सहभाग नोंदवला त्यांचे आणि वाचकांचेही आभार मानतो. आणि सदरील चर्चा इथेच संपली असे जाहिर करतो.

बिरुटेसाहेब, माफ करा, परंतु, मुळात मिसळपावसारख्या प्रसन्न, जिन्दादिल आणि दिलखुलास वातावरण असलेल्या संस्थळावर इतका नीरस आणि फालतू चर्चा विषय तुम्ही मांडलात हीच तुमची घोडचूक झाली असं आमचं नम्र, परंतु स्पष्ट मत आहे!!

आमची घोडचूक झाली हे आम्हास मान्य आहे, धन्यवाद !!!

विसोबा खेचर

आमची घोडचूक झाली हे आम्हास मान्य आहे, धन्यवाद !!!

धन्यवाद बिरुटेशेठ!

प्रथम तुमची क्षमा मागतो, परंतु तुमच्यासारखा जिंदादिल माणूस या शुद्धलेखनाच्या आणि व्याकरणाच्या सोकॉल्ड डुढ्ढाचार्यांना आणि त्यांच्या शाणपट्टीला बळी पडून फुकट जाऊ नये, स्वत:ची रसिकता हरवून जाऊ नये म्हणूनच आम्हाला अंमळ कडक शब्द वापरावे लागले आणि मिपावर व्याकरंण-शुद्धलेखनावरील लेखनाला बंदी आणावी लागली..

बिरुटेशेठ, तसा माझा तुमच्यावर डायरेक्ट राग नाही, तुम्ही फक्त निमित्त ठरलात!

परंतु या व्याकरण-शुद्धलेखनवाल्यांना वेळीच जागच्या जागी ठेचले नाहीत तर पुढे पुढे ही मंडळी फारच शेफारतात असा अनुभव आहे. शुद्धलेखन-व्याकरणाकरता मनोगतावर, उपक्रमावर, किंवा आणखी कुठल्या संस्थळावर अगदी भरपूर जागा आहे तिकडे जा म्हणावं फोकलिच्यांनो आणि शुद्धलेखनाच्या नावाने काय घालायचा तो नंगानाच, धिंगाणा घाला म्हणावं आणि हव्वी तितकी शाणपट्टी करा! :)

मिसळपावचा त्याकरता गैरवापर होऊ नये असं वाटतं!! :))

पुन्हा एकदा क्षमस्व!

आपला,
(बिरुटेसरांचा विद्यार्थी!) तात्या.

पहिलं ते र्‍हस्व दिर्घ, ण आणि न, ष आणि श यांतला फरक काढून टाका ना राव माजं लय जमलिंग व्हतंय.

माहितगार

र्‍हस्व-दीर्घासंबंधीचे नियम (नियम ५ ते ८). यांत एक बदल सुचवावासा वाटतो. - यास्मिन शेख :

तत्सम इ-कारान्त व उ-कारान्त शब्द दीर्घ लिहावेत, विभक्तिप्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लागल्यास ते दीर्घच राहतात; फक्त सामासिक शब्दांत हे शब्द पूर्वपदी आल्यास, ते संस्कृताप्रमाणे र्‍हस्व लिहावेत, असा नियम आहे. ते शब्द सामासिक शब्दांत पूर्वपदीही दीर्घ लिहिल्यास या नियमाचे सुलभीकरण होऊ शकेल. संस्कृतची पार्श्वभूमी नसलेल्या व्यक्तीला, हा बदल केल्यामुळे, सामासिक शब्दलेखन करणे अधिक सोयीस्कर होईल. हाच नियम तत्सम इन्-प्रत्ययान्त (विद्यार्थिन्, पक्षिन्) शब्दाच्या बाबतीतही स्वीकारता येईल. जसे : विद्यार्थी - विद्यार्थीगृह, पक्षी - पक्षीमित्र. संदर्भ