कोकण, तळ-कोकण आणि गोवा रोड ट्रिप - ३
Primary tabs
आधीचे भाग :
कोकण, तळ-कोकण आणि गोवा रोड ट्रिप - १
कोकण, तळ-कोकण आणि गोवा रोड ट्रिप - २
सकाळी दहा-सव्वा दहाच्या सुमारास जाग आली ती गाईंच्या हंबरण्याने.
रात्री मेन गेट कडी लावून बंद करायचे राहून गेल्याने बंगल्याच्या आवारात काही गाई आणि वासरे शिरली होती.
मामाने मोठ्या हौशीने कंपाउंडच्या आतल्या बाजूने वाफे बनवून काही झाडांची रोपे लावली होती त्यांची वाट लागू नये म्हणुन लगबगीने बाहेर येऊन त्या गुरा-ढोरांना पिटाळून लावले.
भावाने ह्या कामासाठी बाहेर पडायला टंगळ-मंगळ केली असली तरी गुरांना हुसकावतानाचा माझा फोटो मात्र तत्परतेने टिपला 😀
उठायला चांगलाच उशीर झाला होता आणि दोघांच्याही अंगात प्रचंड आळस भरला असल्याने आज कुडाळला जाण्याचा बेत रद्द करण्यात आला. मग घरातच मिल्क पावडर वापरून बनवलेल्या चहा सोबत बाकरवडी-चिवडा अशी हलकीशी पोटपूजा उरकून घेतली.
ठाण्याला रहाणाऱ्या मामाने गावी आपले हक्काचे घर असावे अशा उद्देशाने बांधलेल्या ह्या बंगल्यात कायम स्वरूपी कोणी राहत नसले तरी घर आवश्यक त्या सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण आहे.
जाता येतानाच्या प्रवासात पाचेक दिवस इथेच मुक्काम करायचा विचार असल्याने येताना भरणे नाक्यावरून आम्ही फ्रोझन पराठ्यांची पाकीटे आणलेली होती, फक्त भाजी घरी बनवावी किंवा हॉटेलमधून पार्सल आणावी लागणार होती.
एकच्या सुमारास भावाने कोळंबे फाट्यावर जाऊन शेव भाजी पार्सल आणल्यावर तव्यावर पराठे भाजून जेवण झाल्यावर तीन वाजेपर्यंत थोडी झोप काढली.
सकाळी अंघोळीला फाटा दिला होता त्यामुळे समुद्रावर जाऊन डुंबण्याच्या विचाराने साडेतीन वाजता तिथून पंधरा-सोळा की. मी. वर असलेल्या 'पूर्णगड' किल्ल्या जवळच्या गावखडी बीच वर जायला निघालो.
पूर्णगड गाव आणि गावखडी गावाला जोडणारा मुचकुंदी खाडिवरील पूल ओलांडला की लगेच उजव्या बाजूला सुरूच्या बनांमागे लपलेला हा बीच फारच छान आहे.
ह्या भागात पर्यटकांची वर्दळ नगण्य असल्याने इथे अजिबात गर्दी नसते, त्यामुळे हा समुद्रकिनारा पण एकदम स्वच्छ आहे.
गावखडी बिचचा 360 अंशांतला छोटासा व्हिडीओ.
पाच-सव्वा पाच पर्यंत येथेच्छ समुद्रस्नान झाल्यावर तिथून निघालो आणि हाताशी वेळ होता म्हणुन परतीच्या रस्त्यावर पावस बुद्ध विहाराच्या फाट्यावर उजवीकडे वळून मावळंगे गावात राहणाऱ्या आईच्या मावस भावाकडे एक धावती भेट द्यायला निघालो.
पावस, कोळंबे ह्या ठिकाणी आधीही येणे झाले असले तरी मी अद्याप मावळंग्याला ह्या मामाकडे कधीच आलो नव्हतो, पण बरोबर असलेल्या भावाचे इथे बऱ्याचदा येणे झाले असल्याने मुख्य रस्त्यावरच्या गोगटे स्टॉपवर बाईक उभी करून अधे मधे चिऱ्याच्या पायऱ्या असलेल्या उताराच्या रस्त्याने दोन अडीचशे मिटर चालत खाली येऊन मामाच्या घरी पोचण्यास काही अडचण आली नाही.
तिथे पोचल्यावर मात्र इतक्या वर्षांत इथे का नाही आलो ह्याचा पश्चाताप झाला.
मस्त मोठठे कौलारू घर, घराच्या मागे नारळ, सुपारी, आंबे, फणसांची बाग आणि बागेच्या मागे खाडी. दिलखुष नजारा एकदम!
चहा पाणी झाल्यावर मागे बागेत फेरफटका मारायला निघालो तेव्हा नुकताच सूर्यास्त झाला होता. खाडी किनाऱ्यावरची काही नारळाची झाडे मामाने एका 'माडी' विक्रेत्याला कराराने दिली आहेत त्याचा मनुष्य संध्याकाळची माडी झाडावरून उतरवायला आला होता.
त्याच्या कडून नुकत्याच उतरवलेल्या मडक्यातून एक तांब्याभर माडी घेऊन प्यायल्यावर अस्सल माडीची चव कशी असते ते समजले आणि आत्तापर्यंत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात चार पाच वेळा माडी विक्री केंद्रावर पांढऱ्या रंगाचा, गोडसर चवीचा जो पाणचट द्रवपदार्थ प्यायला होता ती खरी माडी नव्हतीच हा साक्षात्कारही झाला
मग थोडावेळ झोपाळ्यावर बसून गप्पा टप्पा झाल्यावर (कधी नाही ते) साडे आठ वाजताच कोकणस्थी पद्धतीचे साधेच पण रुचकर जेवण करून आम्ही मुक्कामी जायला निघालो.
साडे नऊ वाजता मुक्कामी परतल्यावर खाऱ्या पाण्यात डुंबणे झाले असल्याने शॉवर घेऊन कालच्या प्रमाणेच गच्चीत जाऊन बसलो आणि उद्याचा कार्यक्रम ठरवायला घेतला.
आज बाहेर पडायलाच उशीर झाल्याने पूर्णगड किल्ला पाहता आला नव्हता त्यामुळे उद्या किल्ला आणि पावसच्या मंदिरात जायचे ठरवले आणि थोडावेळ गच्चीत टाईमपास करून मग साडे अकराच्या सुमारास झोपायला खाली आलो.
सकाळी साडे नऊच्या आसपास आम्ही उठलो आणि चहा-पाणी झाल्यावर कोळंबे फाट्यावरच्या एका स्नॅक्स कॉर्नर मध्ये जाऊन ग्रील्ड सँडविच आणि कॉफी असा नाश्ता करून तिथूनच दुपारच्या जेवणात पराठ्यांबरोबर खायला एक मिसळ आणि एक्सट्रा उसळ घेऊन घरी परतलो.
आरामात अंघोळी-पांघोळी आणि जेवण झाल्यावर दुपारी दोनच्या सुमारास पूर्णगड किल्ल्यावर जायला निघालो.
पूर्णगडावर जाण्यासाठीचा रस्ता थोडा फसवा आहे. किल्ला रस्त्याच्या उजव्या बाजूच्या टेकडीवर असला तरी पावस - अडीवरे रस्त्यावर गावखडी पुलाच्या अलीकडे मुख्य रस्त्यावरून डावीकडे खाली उतरणाऱ्या उताराच्या रस्त्यावरून गेल्यावर पुलाच्या खालून उजवीकडे जाणाऱ्या खाडी किनाऱ्यावरच्या रस्त्याने आपण पूर्णगड गावात पोचतो.
टेकडीच्या उतारांवर पूर्णगड गाव वसलेले आहे आणि गावातल्या बाईक जाऊ शकेल अशा अरुंद चढणीच्या रस्त्यावरची देवळे, घरे मागे टाकत काही मिनिटांत आपण किल्ल्याच्या प्रवेशद्वारासमोर येऊन उभे ठाकतो.
गडाच्या वाटेवरची देवळे.
किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या शेजारी एक छोटेसे मारुती मंदीरही आहे पण ते बंद होते.
सरकारने सुमारे पाच कोटी रुपये खर्चून किल्ल्याची डागडुजी करून तो पर्यटकांना भेटी साठी खुला केल्यावर लगेचच आम्ही तिथे पोचलो होतो.
महाराष्ट्रातल्या अनेक जलदुर्गांपैकी एक असलेल्या आणि अतिशय प्रेक्षणीय अशा ह्या पूर्णगड किल्ल्याचा दुर्दैवाने लिखित इतिहास उपलब्ध नाही त्यामुळे त्याचे निर्माण आणि नावा बद्दल ठोस माहिती मिळत नाही.
सर्वसामान्यपणे हा किल्ला शिलाहरांच्या काळात प्रथम बांधला गेला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ल्याची पुनरबांधणी केली. पुढे सरखेल कान्होजी आंग्रे ह्यांनी त्याचा विस्तार केला आणि पुढच्या काळात तो पेशव्यांकडून इंग्रजांकडे गेला असे मानले जाते. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी जेवढे किल्ले बांधले त्यातला हा शेवटचा किल्ला, त्यामुळे महाराजांचे किल्लेबांधणीचे काम हा किल्ला बांधून पूर्ण झाले म्हणुन ह्याचे नाव पूर्णगड.
खरे खोटे देव जाणे!
पूर्णगडाचे भौगोलिक स्थान वैशिष्ट्यपूर्ण आहे.
एका बाजूला रस्ता, एका बाजूला विशाळगडापाशी उगम पाऊन पूर्णगडाच्या पायथ्याशी सागरात विलीन होणारी मुचकुंदी नदी (अशाप्रकारे दोन गडांना जोडणारी ही एकमेव नदी असावी बहुतेक), एका बाजूला अथांग समुद्र तर मागे गर्द झाडी.
ह्या किल्ल्याचे आणखीन एक (विचित्र) वैशिष्ट्य म्हणजे आत विहीर किंवा पाण्याचा अन्य कुठलाही स्रोत नाही.
पण काहीही असले तरी चिऱ्याच्या दगडांनी बांधलेला हा किल्ला आहे मात्र प्रेक्षणीय! आणि नुकतेच केलेले डागडुजीचे कामही त्याच्या सौन्दर्याला बाधा न आणता सफाईदारपणे केले आहे.
पूर्णगड किल्ल्याचे काही फोटोज
किल्ल्याचा कानाकोपरा नीट बघत त्यावरून दिसणारी विलोभनीय दृष्ये डोळ्यात साठवून घेत बराच वेळ तिथे व्यतीत करून आम्ही साडेचारच्या सुमारास खाली उतरलो आणि तिथून अगदी जवळ असलेल्या गावखडी बीचवर आलो. कालच्या प्रमाणे आज पाण्यात न डुंबता थोडावेळ इथे वाळूवर बसून टाईमपास केल्यावर परतीच्या मार्गावरील पावस इथल्या स्वामी स्वरूपानंद मंदिराकडे जायला निघालो.
मंदिरात पोचलो तेव्हा सहा वाजत आले होते. कोविड परिस्थितीमुळे विश्वस्त मंडळातर्फे समाधी मंदिर आणि आसपासच्या वास्तू बंद ठेवण्यात आल्या होत्या पण विठ्ठल रखुमाई मंदिरात बाहेरून दर्शन घेता येत होते ते ही सहा वाजता बंद होणार होते त्यामुळे आधी तिथे जाऊन जाळीच्या बंद दारातून दर्शन घेतले.
ह्या मंदिरात आधीही येणे झाले होते आणि आम्ही दोघेही सश्रद्ध असलो तरी अध्यात्मिक वृत्तीचे नसल्याने बाकीची ठिकाणे बंद असली तरी काही गमावल्यासारखे वगैरे वाटले नाही.
मंदिर परिसरात असलेल्या बाकड्यांवर थोडावेळ बसलो. ह्या मंदिराचा परिसर खूप मोठा आणि निसर्गरम्य असून तिथे विलक्षण शांतता मात्र नक्कीच अनुभवता येते, प्रसन्न वाटतं एकदम.
सात वाजता तिथून निघून कोळंबे फाट्यावरचे एक बार अँड रेस्टोरंट गाठले. दोन दोन पेग झाल्यावर तिथेच जेवण करून साडे नऊला मुक्कामी परत आलो.
थोडावेळ गच्चीत बसून घरच्यांशी फोना फोनी झाल्यावर साडे दहा अकराच्या सुमारास झोपून गेलो.
क्रमश:
जितका सुंदर हा सगळा परिसर तितकेच तुमचं प्रवासवर्णन सुरेख..
व्वा..! हा भागही सुंदर.
गावखडीचा किनारा अतीव सुंदर दिसतोय, पुळण अगदी मऊशार आहे.
ह्याला खास 'पाखाडी' असा सुरेख शब्द आहे. कोकणातल्या ह्या पाखाड्या लैच भारी असतात.
पूर्णगडाची डागडुजी उत्तम केलेली दिसते आणि किल्ला चांगला राखलेलाही दिसत आहे.
बाकी पावसजवळच गणेशगुळ्याचा अप्रतिम किनारा आहे. कोकणातल्या मी पाहिलेल्या किनार्यापैकी सर्वात सुंदर एक असा. तुम्ही पाहिलात की नाही तो?
प्रचेतस बुआ
एकंदरीतच आज ठाण्यातील "पाच पाखाडी" मधील पाखाडीची उत्पत्ती कळली मला. त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार.
+१
मला पण 😀
@ अक्षय देपोलकर & प्रचेतस
प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏
@ प्रचेतस,
हे नव्हतं माहित! पण हा प्रकार भारीच आहे!
हो, पूर्णगडाची डागडुजी उत्तम केलेली आहे. उगाच ठिगळे जोडण्यासारखे काम न करता मूळ बांधकामाशी समरुपता राखण्याचा केलेला प्रयत्न प्रशंसनीय आहे. सध्या चिरे नवीन असल्याने त्यांचा रंग लाल दिसतोय पण ऊन आणि खारी हवा खात चार पाच पावसाळे काढले की काळवंडतील 😀
गणेशगुळ्याचा किनारा आधीच्या भेटीत पाहिला असल्याने हयावेळी तिथे नव्हतो गेलो. फार सुंदर आहे तो किनारा सुद्धा!
नुकताच धांग्रधा चा नवा भाग वाचला आणि त्या नंतर लगेच हा लेख, त्यामुळे कदाचित पण ही भटकंती पण गुढ वाटायला लागली होती, फोटो ही त्याच नजरेने पाहिले.
एकंदर मस्त चालला आहे प्रवास.
या भागात जाताना तुमच्या कडून टिप्स घेतल्या पाहिजेत...
पैजारबुवा,
पूर्ण फोटो.
त्या स्वामी स्वरूपानंद मठाजवळच एक जुने दगडी मंदीर आहे ते मला फारच आवडले होते.
पावसच्या पुढे कशेळीला पेट्रोग्लिफ आहेत ते या
https://youtu.be/knZD_t7EPVU
विडिओत 32:00 ला आहेत.
ठिकाण नकाशा
कुणी ड्रोन नेल्यास ते पेट्रोग्लिफस पाहता येतात.
@ पैजारबुवा & कंजूस
प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏
कंजूस काका,
व्हिडीओतले कशेळीचे पेट्रोग्लिफस मस्तच वाटतं आहेत. पुढच्या कोकण दौऱ्यात तिथे आवर्जून भेट देणार!
छान वर्णन आणि फोटो.
तारकर्ली जवळ अगदी १५ मिनिटांच्या अंतरावर देखील असाच एक 'वायरी भूतनाथ' नावाचा फारसा परिचित नसलेला पण सुंदर समुद्र किनारा आहे.. तिकडेही खूप कमी पर्यटक येतात. कधी जाणे झाले तर अवश्य भेट द्या.
@ ॲबसेंट माइंडेड & नागनिका
प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏
नागनिका,
२०१२ च्या मे महिन्यात तारकर्ली येथे एका मित्राचा लग्नासाठी गेलो होतो त्यावेवळी फक्त तारकर्ली आणि देवबाग मध्ये चार दिवस फिरणे झाले होते. आजूबाजूचा बराच परिसर त्यावेळी बघितला होता त्यात अशा अप्रसिद्ध समुद्रकिनाऱ्यांचाही समावेश होता.
नावाने आठवत नाही पण तुम्ही म्हणताय तो 'वायरी भूतनाथ' किनाराही बहुतेक त्यावेळी पहिला असावा.
अवांतर :

'भूतनाथ' चा विषय निघालाच आहे तर त्यावेळी मित्राच्या हळदी समारंभात काढलेला एक 'भूतीया' फोटो शेअर करण्याचा मोह आवरत नाहीये 😀
फोटो बारकाईने किंवा झूम करून बघितल्यास मध्ये नाचणाऱ्या दोघांचे चेहरे, डोळे आणि दात काहीतरी वेगळेच दिसतील. ही भुतेच आहेत असा माझा दावा नाही, पण हा काहीतरी वेगळा प्रकार असल्याचे मात्र नक्की जाणवते!
(हा फोनने काढलेला सामान्य फोटो आहे त्यावर कुठलेही फोटोशॉप संस्कार केलेले नाहीत)
बापरे. रात्रीस खेळ चाले मालिका आठवली.
भुते एन्जॉय करत आहेत हळदी कार्यक्रम
अशा प्रसंगी 'त्यांची' उपस्थिती कोकणात गृहीत धरतात असे ऐकून आहे. पण काही त्रास देत नाहीत म्हणे 😀
वारंवार जाता येत नाही तेव्हा कोकणाची प्रवासवर्णने वाचून तरी बरं वाटलं ।
"सश्रद्ध असलो तरी अध्यात्मिक वृत्तीचे नसल्याने बाकीची ठिकाणे बंद असली तरी काही गमावल्यासारखे वगैरे वाटले नाही."
-------
म्हणून तर तुमचे आणि आमचे पटते ...
@ उज्वलभविष्य & मुक्त विहारि
प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏
हा भागही मस्त रंगला आहे . फोटोही छान .
तुमच्या मामांचे कोकणातील घर (दुसरे मामा) तिथे जाणाऱ्या उताराच्या पायऱ्यांचा मार्ग, माडावर चढलेला माणूस, माडीचा लोटा सगळे एकदम "चित्रदर्शी" म्हणावे तसे आवडले.
अर्थातच, आता तुमच्याशी बोलताना "मासे" हा विषय कट झाला असला तरीही एकंदरीत त्यामुळे तुम्ही गोव्यात खाद्ययात्रा काय केली असेल त्यासंबंधी उत्सुकता शिगेला पोचली आहे. कारण गोवा बोले तो मासळी ही आमची धारणा अन आवड असते.
पूर्णगड विशेष आवडला, समुद्रकिनारी इतकं सुंदर रचनाशिल्प पाहणे एक पर्वणी असते, पूर्णगड किंवा त्याच्या शेजारून जाणारी मुचुकुंदी नदीची ईस्ट्यूअरी (मराठीत काय म्हणावं ?) पाहून एकदम पेंटेड लँडस्केप असावा असे वाटले एखाद.
ह्या भागात खादाडी अंमळ कमी वाटली जरा, भरपूर खात चला अन ते लिहितही चला.
ऑल द बेस्ट
पुढील भागाच्या प्रतिक्षेत
@ सिरुसेरि & जेम्स वांड
प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏
वांड भाऊ,
त्याला नदी मुख असा मराठी शब्द आहे पण बोली भाषेत सर्रास खाडी म्हंटले जाते.
मस्तच भाग. पूर्णगडचे नूतनीकरण सुंदरच झालेले दिसतंय.
तुमची वर्णने नेहमीच आवडत आली आहेत. 'सविस्तर तरीही कुठेही कंटाळवाणे न होणारे वर्णन' या बद्दल तुमचे कौतुक करावे तेवढे थोडेच. उत्कृष्ट प्रकाशचित्रांनी लेखाची मजा वाढते. पुढील भागाच्या प्रतीक्षेत.
@ सौंदाळा & Nitin पालकर
प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏
पूर्णगड >>रोचक नाव
वर्णन आणि फोटो सुंदरच...
ताडी माडी मजबूत बॉडी :=)
भारीच चालू आहे ट्रिप. पुभाप्र
@ कुमार१ & रंगीला रतन
प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏
फोटो वर्णन मस्त....!
-दिलीप बिरुटे
मस्त सुंदर फोटो आणि वर्णन.
@ प्रा.डॉ.दिलीप बिरुटे & सुरसंगम
प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏
पूर्णगड विशेष आवडला.
प्रतिसादात प्रचेतस यांनी सांगितलेला 'पाखाडी' शब्दही नवीनच कळला .
-थोडक्यात शाब्दिक पाखाडी -
रस्त्याच्या ( मोठा , वाहनं जाणारा) कडेने घरं असतात. फाटक उघडून आत गेल्यावर छोटेसे अंगण (पंधरा वीस फुटी )त्यात कडेनी काही फुलझाडे मध्ये वाळवणाची जागा आणि तुळशी वृंदावन. डाविकडे आणि उजविकडेही पंधरा वीस फुटी जागा . कडेला कवठी चाफा,सोनचाफा,जायफळ,कोकम असतात मग शेजाऱ्यांची घरे.
मग घर आणि घरामागे माडा पोफळीची वाडी (बाग) आणि एक विहिर. ही वाडी साधारणपणे २१ ते ३५ गंठे असते. या वाडीलाच मागच्या घराची वाडी, घर,अंगण आणि तिकडचा वाहनांचा रस्ता अशी रचना असते.
या दोन वाड्या मागे मिळतात तिथे एक 'वई' ( म्हणजे मोगरा ,कुंद, जास्वंद लावून केलेले कुंपण). तर अशा वईंच्या मधून एक कच्ची मातीचीच वाट जाण्यायेण्यासाठी सोडलेली असते त्यास 'पाखाडी' म्हणतात. येथे दोन्हींकडची फणस,आंबा,कोकम,उंडीण, पुनई, तेल्या माड, बकुळ वगैरे झाडे ( वृक्ष) वाकून छान गारवा राहातो. ऊन खाली येत नाही. पक्षी निवांत बसून किलबिलाट करत असतात.
((चौल,रेवदंडा किंवा श्रीवर्धन परिसर येथे दिसेल.))
कंकाका चांगली माहिती दिलीत 👍
धन्यवाद.
@कंजूस जी,
छान वर्णन .... हेच खरे कोकणी सौंदर्य.. समुद्रकिनार्यापेक्षा या सौंदर्याचे जास्त आकर्षण वाटते.
मस्त चालू आहे safar..
व्वा..! हा भागही सुंदर !
क्या बात वर्णन, क्या बात फोटो !
@ MipaPremiYogesh & चौथा कोनाडा
प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏
प्रवास वर्णन आणि चित्रेही आवडलीत..
कोकणातल्या निसर्गसौंदर्याचा खरा आनंद घ्यायचा तर निवांत वेळ हवाच आणि अनवट जागा शोधत रहायला हवं. लोकप्रिय आणि 'हॅपनिंग' बीचेसपेक्षा अस्सल कोकणचा शोध घेता आला पाहिजे. माझा कोकणाशी तसा संबंध नाही (म्हणजे कुणी नातेवाईक, एखादे घर, जवळचे मित्र असे कुणी नाही) पण कोकण मला भुलवते.. कोकणातील गावांचे मूळ सुंदर रुप वर्षानुवर्षे असेच अबाधित राहो ही इच्छा..
एक प्रश्न आहे. पुर्णगडचा उल्लेख तुम्ही जलदुर्ग असा केलाय, पण जलदुर्ग म्हणजे समुद्राच्या आत एखाद्या खडकावर वा छोट्या बेटावर असलेला किल्ला असा होतो ना ?(जसे सिंगुदुर्ग, जंजिरा ई)
बाकी तुमचे प्रवास वर्णन वाचून मी दोन महिन्यापुर्वी केलेल्या बाईक ट्रिपचे वर्णन लिहाण्याची प्रेरणा मिळालीये... उत्साह टिकला तर लवकरच पुर्ण करेनही :)
मलाही आधी तसेच वाटायचे पण आरमाराच्या वापरासाठी समुद्र/खाडी किनारी बांधलेल्या किल्यांनाही 'जलदुर्ग' म्हणतात असे मागे वाचनात आले होते.
तुमच्या बाईक ट्रिपचे वर्णन नक्की लिहा वाचायला आवडेल 👍
खर्या अर्थाने कोकण 'अनुभवणे' चाललंय. गावखडीचा किनारा खूप स्वच्छ आणि सुंदर दिसतोय. नेहमीच्या किनार्यांवर पर्यटकांच्या सोबत येणारी अपरिहार्य अस्वच्छता नसल्याने वेगळाच वाटतोय. किल्लासुद्धा. सुरेख, स्वच्छ, आखीव-रेखीव.
@ तर्कवादी & तुषार काळभोर
प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏
स्वतः गेल्या सारखे वाटले.
किल्ला भलताच सुंदर दिसतो आहे. गावखडी समुद्रकिनाराही कचराविरहीत आणि त्यामुळे हवाहवासा वाटतो आहे. एक प्रश्नः खाजगी कंपनीत कामाला असूनही तुम्हाला ही एवढी भलीमोठ्ठी सुट्टी मिळाली तरी कशी? आमची मोठ्यात मोठी सुट्टी म्हणजे ५ दिवस...
मस्त मजा येतेय. अगदी डोळ्या समोर उभे करताय सगळे
कर्नलतपस्वी, एक_वात्रट & विजुभाऊ
प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏
@ एक_वात्रट
ती खाजगी कंपनी अस्मादिकांच्याच मालकीची असल्याने निदान भटकंतीसाठी तरी सुट्टी मिळवण्यात काही अडचण येत नाही 🙂
हे तर लैच भारी
एक एक करुन भाग वाचलेच होते , पण आता तिन्ही भाग एकदम वाचुन काढले. लॉकडाउन आणि वर्क फ्रॉम होम मुळे घरात बसणे हीच एक शिक्षा झाली आहे. त्यात हे असे भटकंतीचे धागे वाचुन वाळवंटात ओअॅसिस दिसल्याप्रमाणे फील येतो. सर्व प्रचि मस्तच. विशेष करुन समुद्रकिनारे,आणि सुर्यास्त/चंद्रोदय वगैरे. येउंद्या अजुन.