काथ्याकूट

कोकण रेल्वे - महाराष्ट्रासाठी!

Primary tabs

कोकण रेल्वे खरोखरच महाराष्ट्रातील कोकणासाठी आहे का?
ही रेल्वे म्हणजे रोहा ते मंगळूरू भाग. रोह्याअगोदर आणि मंगळुरूपुढे रेल्वे होतीच. मग घाट टाळून सह्याद्रीच्या पोटातून बोगदे खणून रेल्वे सुरू झाली. ताशी १५०किमी वेगानेही गाडी जाऊ शकणारे एकेरी मार्ग झाले. याचे श्रेय मधू दंडवते,श्रीधरन आणि प्रभूंना दिले गेले. जपानी तंत्रज्ञान विकत घेतल्याने श्रेयाची भानगड नाही.
पण आता २०२२ जानेवारी नंतर काय झाले ते पाहा.

महाराष्ट्रात फक्त कोकणात जाणाऱ्या गाड्या तीनच.
१)पहिली जनता गाडी 10105 हिला 'दिवा-सावंतवाडी passenger' मधून 'सिंधुदूर्ग express' केली. पेण स्टेशन गाळले! पण सावंतवाडी पोहोचण्याच्या वेळापत्रकात काहीही बदल नाही. सोळापैकी पूर्वी दोन डबे आरक्षित होते ते सर्व आरक्षित केले. तिकिटे दुप्पट झाली.

२)दादर -रत्नागिरी passenger ही passengerच ठेवली पण दादरऐवजी दिवा येथून सोडली. म्हणजे या दोन्ही गाड्यांसाठी दक्षिण आणि पश्चिम मुंबई उपनगरांतील प्रवाशांना लोकल ट्रेनने दिव्याला आले पाहिजे.

३)दादर - सावंतवाडी तुतारी एक्सप्रेस 11003. यात काही बदल नाही.

४) सकाळी सहाच्या दरम्यान सुटणाऱ्या
जनशताब्दी एक्सप्रेस 12051
तेजस एक्सप्रेस 22119
डबलडेकर कुर्ला मडगाव 11085 या गोव्याच्या गाड्या आहेत.

५)इतर सर्व गाड्या कोकणातून पुढे कर्नाटक, केरळ जाणाऱ्या आहेत. फक्त कोकणच्या नाहीत. कोकण हा शब्द फक्त महाराष्ट्रात बोलतात- गोवा,कर्नाटक, केरळात नाही.
६) इथे जसे घाट नाहीत तसे गुजरातकडेही नाहीत. मग तिथे किती passenger गाड्या धावतात पाहा.
मग असा प्रश्न येतो की रेल्वे मंडळात कुणी मराठी अधिकारी उरला नाही / कुणी नेता आता लक्ष घालत नाही?

हेमंतकुमार

व्यथा समजली
संबंधित प्रवासी संघांनी हा मुद्दा उचलून धरावा

प्रसाद_१९८२

आजच काय कधीही कोकणासाठी नव्हती.
सणासुदीला व मे महिन्याच्या सुट्टीत, दिवा-सावंतवाडी पॅसेंजरला होणारी चिक्कार गर्दी टाळण्यासाठी या पॅंसेजर आधी चिपळून व रत्नागिरीसाठी गाड्या सोडाव्यात ही मागणी कधीपासून सुरु आहे मात्र दरवेळी ही मागणी रेल्वेकडून दुर्लक्षित केली जातेय. अर्थात कोकणातील एकही खासदार यासाठी लोकसभेत व राज्यसभेत आवाज उठवत नाही.

कंजूस

एक्सप्रेस करण्याऐवजी चार अनारक्षित - आठ आरक्षित-चार अनारक्षित अशी सोळा डब्यांची गाडी करून passenger status ठेवता आले असते. कारण त्याच सहाच्या वेळांत आणखी तीन एक्सप्रेस गोव्यापर्यंत जातातच.
पाच वर्षांपूर्वी बांद्रा टर्मिनस -वसई - भिवंडी -पनवेल मार्गे कोकणात गणपती स्पेशल गाडी सोडत होतेच. तीच कायम करता आली असती. गाड्या वाढवण्याऐवजी कमी करण्याची योजना सुरू झाली आहे का?

पराग१२२६३

<<गाड्या वाढवण्याऐवजी कमी करण्याची योजना सुरू झाली आहे का?>>
गाड्या कमी करण्यात येत आहेत. त्यातून इतर गाड्यांसाठी मार्ग मोकळा मिळेल आणि गाड्यांचा वेग वाढवल्याचा दावा करता येईल यासाठी. गाड्या बंद करण्यासाठी - त्या तोट्यात असल्याचे कारण दिले जात आहे. प्रगती, सह्याद्री, सिकंदराबाद शताब्दी, पुणे-सोलापूर इंटरसिटी इत्यादी गाड्या या कारणाच्या बळी ठरलेल्या आहेत. लांब पल्ल्याच्या पॅसेंजरलाही एक्सप्रेस केल्यामुळे एकीकडे मार्ग मोकळा मिळण्यास मदत होते आणि दुसरीकडे उत्पन्नही वाढते.

चलत मुसाफिर

सावंतवाडी टर्मिनसचे भिजत घोंगडे कधीपासूनचे पडले आहे.

सावंतवाडी ते गोंदिया (रत्नागिरी, पनवेल, नाशिक, वर्धा, नागपूर मार्गे) अशी थेट गाडी सुरू करण्याची लेखी विनंती मी रेल्वे बोर्डाकडे अनेक वेळा केली आहे पण व्यर्थ.

कोल्हापूर वैभववाडी रेल्वे मार्गाचे काम आर्थिक तरतुदीविना अडकून आहे.

दुपारी मुंबईतून निघणाऱ्या नेत्रावती व मत्स्यगंधा गाड्यांना कोकणात अधिक थांबे असणे गरजेचे आहे. पण या गाड्या 'एक्सप्रेस' असल्याची सबब सांगून रेल्वे अधिकारी याला नकार देतात

चौथा कोनाडा

मा. नारायण राणे, जे सद्या केंद्रीयमंत्री आहेत ते या मागणीला पाठिंबा देऊन हे करून घेऊ शकतात !

गामा पैलवान

यावर एक जालीम उपाय आहे. कोणता ते मी सांगंत बसंत नाही.
-गा.पै.

कोकण रेल्वेसंबंधी कंजूसकाकांनी मांडलेले मुद्दे महत्वाचे आहेतच. पण प्रश्न असा आहे की मुंबईकर सोडुन कोकण रेल्वे कोण वापरते? पुणे/नाशिक/घाटावरुन कुठेही कोकणात जायला रस्त्याशिवाय पर्याय नाही. कल्याणहुन नगरला जायला माळशेज घाटाशिवाय पर्याय नाही(रेल्वेचा) तसेच पुणे-नाशिक रेल्वेमार्गाचे सुद्धा घोंगडे भिजत पडले आहे.

रेल्वे हे प्रवासाचे सर्वात स्वस्त आणि मस्त साधन आहे, पण मुंबई सोडुन रेल्वे विषयी ईतर विभागांना तितकी आस्था/माहिती/उपयोग आहे का असा मला प्रश्न पडतो.

कंजूस

कोकण रेल्वेचा जो बाजा वाजवला गेला ( अगदी छानसं गाणंसुद्धा आलं ... आली आली कोकण गाडी आली..) महाराष्ट्रात एकमेकांस श्रेय देऊन झालं ते फक्त महाराष्ट्रातच घुमत असावं.
स्वत: रेल्वेमंडळ या मार्गाकडे दक्षिणेकडे मालगाड्या नेणे याच हेतूने पाहात होते असं दिसतंय. तेच मांडायचं आहे.

सुबोध खरे

एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या

रेल्वे हि फक्त ज्या राज्यातून जाते त्यांच्याच फायद्यासाठी असती तर आतापर्यंत मध्यप्रदेश छत्तीसगड हि राज्ये मागासलेली राहिली नसती. मुंबई कलकत्ता दिल्ली आणि चेन्नई या महानाग्राना जोडणाऱ्या मार्गांवर असून सुद्धा रेल्वेचा त्यांना फायदा झालेला दिसत नाही.

रेल्वेची प्रवासी वाहतूक हा आतबट्ट्याचा कारभार आहे आणि त्यासाठी लागणार निधी हा व्यापारी नफ्यातून पुरवलं जातो त्यामुळे व्यापारी वाहतूक जास्त असलेल्या ठिकाणांना प्राधान्य दिले जाणे हे साहजिक आहे.

कोकणातून व्यापार किती होतो आणि त्याउलट किनारी कर्नाटक केरळ आणि तामिळनाडूतून किती होतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

जे एन पि टी , मुंबई , ठाणे जिल्हा हे पण कोकणातच येतात. पण येथून चालणार व्यापार इतका प्रचंड आहे कि सर्वात पहिल्यांदा ब्रिटिशांनी येथे रेल्वे चालू केली.

कोकणात नाणार किंवा जैतापूर प्रकल्प चालू झाले असते तर येथे रेल्वेला प्राधान्य कधीच मिळाले असते. असा कोणताही मोठा प्रकल्प कोकणात नाही.

गोव्यातील लोह खनिजाची झुआरी खत आणि शेतीरासायने यांची वाहतूक करण्यासाठी ब्रिगांझा घाटातून सुद्धा रेल्वे काढलेली आहे ( लोंडा - वास्को द गामा).

कंजूस

प्रवाशांसाठी होत्या त्यातही काटछाट करण्याची काहीही गरज नव्हती. सकाळची सावंतवाडी गाडी पूर्ण एक्सप्रेस करण्याची काहीच गरज नव्हती.

कंजूस

चालू करणे हा लालूप्रसादांचा मास्टर स्ट्रोक होता. निम्म्या भाड्यात तीन टिअर एसी गाडी देणे हे कोणत्याही रेल्वे अधिकाऱ्यांनी आणले नसते. राजधानीच्याच जवळपास वेळात मुंबई बान्द्रा -निझामुद्दीन गरीब रथ जाते.

साहना

देशांतील बहुतेक रेलवे मार्ग प्रवाश्यांच्या दृष्टिकोनातून नुकसानीत चालतात त्यामुळे प्रवासी सेवा वाढविण्यात रेल्वेला रस नसतो. तसेच प्रवासी सुद्धा अत्यंत फुकटे असतात. एकदा सेवा सुरु केली मग भाडे ५ रुपये वाढवली तरी शंख करतात त्यामुळे नवीन सेवा न सुरु करण्यात शहाणपणा आहे. देबरॉय रिपोर्ट च्या वेळी वाचलेल्या माहिती प्रमाणे एकूण देशांतील १४ हजार प्रवाशी ट्रेन्स पैकी सर्व ट्रेन्स नुकसानीत चालतात.

रेल्वे मार्गांचा काही फायदा मालवाहतुकीला होतो. कोंकण रेल्वेमुळे निःसंशय पणे संपूर्ण कोंकण भागाला महाप्रचंड फायदा झाला आहे. गोव्यांत जवळ जवळ सर्व माल सध्या कोंकण रेल्वेने येतो. बाहेरून कामगार कोंकण रेल्वेने येतात आणि गोव्यांतून मुंबईत लोक रेल्वेनेच जातात. खनिज माल, कोळसा, पेट्रोलियम, नारळ, सुपारी, सिमेंट, आंबे, काजू, खाते, धोकादायक रसायने इत्यादी अनेक गोष्टीची वाहतूक प्रामुख्याने कोंकण रेल्वेवरून होते.

माल रेल्वेने गेल्याने रस्ता वाहतुकीवरील ताण कमी होतो आणि रस्ते जास्त सुरक्षित बनतात. कोंकण रेलवेच्या रो रो सर्व्हिस मुळे साधारण २५ लाख ट्रक्स रेल्वे मार्गाने जातात. रो रो सेवा अतिशय लोकप्रिय ठरली होती.

कोंकण प्रांतातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी दोन्ही जिल्हे विशेष प्रगत नाहीत, जास्त इंडस्ट्री नाही त्यामुळे लोकांची वाहतूक करण्यावर सुद्धा रेल्वेचा जास्त भर नाही. नंगा नाहेयेगा क्या निचोडेंगा क्या ! पण ह्या दोन जिल्ह्याना अप्रत्यक्ष रित्या खूप फायदा होतो.

सुबोध खरे

कोव्हीड चा फायदा घेऊन रेल्वेने अनेक तोट्यात चालणाऱ्या पॅसेंजर सेवा बंद केल्या आहेत. उदा. सह्याद्री एक्स्प्रेस, प्रगती एक्स्प्रेस.

त्यातच दिवा सावंतवाडी पॅसेंजर चे एक्स्प्रेस मध्ये रूपांतर करणे ज्यामुळे त्याचे भाडे आपोआप वाढले आहे.

भारतीय रेल्वे हि जगातील सर्वात स्वस्त रेल्वे आहे. आणि जगात कुठेही ऐकू येणार नाही असा केवळ ३६ पैसे किमीचा दर आहे.

पेट्रोलच्या दरवाढीमुळे अगोदरच कावकाव होत आहे त्यामुळे रेल्वे च्या प्रवासी वाहतुकीचा दर वाढवणे शक्य नाही.

त्यातून इलेक्ट्रिफिकेशन आणि रुळांचे दुहेरीकरण या पायाभूत सुविधांसाठी रेल्वेने फार मोठा भांडवली खर्च केला आहे

त्यामुळे सरकारने असा मार्ग स्वीकारला आहे.

कंजूस

कोव्हीड चा फायदा घेऊन रेल्वेने अनेक तोट्यात चालणाऱ्या पॅसेंजर सेवा बंद केल्या आहेत
ओके.
सिनिअर सिटिझन कन्सेसशनही काढले आहे.
पर्यटन व्यवसाय लवकर पुर्ववत होवो.

कंजूस

दिवा ते रोहा गाडी आहेच 08:45 ( दिवा) तीच पुढे नेत आहेत चिपळूणपर्यंत.
सध्या गणपती उत्सव खास आहे.
पुढे बघू काय होते.
विडिओ https://youtu.be/GCDUkknuXYg