जनातलं, मनातलं

रामदुलारीला राग का आला?

Primary tabs

रामदुलारीची आणि माझ्या धाकट्या भावाची ओळख योगायोगानेच झाली.माझ्या भावानेच मला ही गोष्ट सांगितली.
त्याचं असं झालं,एकदा माझा भाऊ वरसोवा-फौन्टन बसमधे चढायला धाकेकॉलनी बस स्टॉपवर उभा होता.त्याच्या बरोबर दोन चार लोक त्या बसमधे चढले.मागच्या सीटवर जागा भरपूर होती.म्हणून हा ही मागच्या सीटवर बसला.त्याच्या शेजारी एक माणूस बसला होता,तो सारखा चुळबूळ करीत होता.का कुणास ठाऊक त्याला शेजारच्या माणसाचं अंग त्याच्या अंगाला जरा लागलं की तो थोडा अपसेट झाल्या सारखा होऊन आपलं बसणं नीट करायला पाहायचा.

भाऊ पुढे म्हणाला,
"बसमधे बरीच गर्दी होत राहिली.कंडक्टर जरा वयाने मोठाच असावा.कारण त्याची तिकीटं देण्याची रफ्तार जरा मंदच होती.
जवळ जवळ अंधेरी स्टेशन जवळचा स्टॉप येई पर्यंत तो तिकीट विचारायला मागे आलाच नाही."
माझ्या भावाला सांताक्रुझला आशा पारेख हॉस्पिटलच्या बस स्टॉपवर उतरून काही कामाला जायचं होतं.माझा भाऊ मानसशास्त्राचा कंसल्टंट आहे. आणि बरेच वेळा तो मराठामंदीरमधे लेक्चर्स द्दायला जातो.

"कंडक्टर घाई घाईत पार्लं सोडल्यावर तिकीट विचारायला मागच्या सीट जवळ आला.मी हात पुढे करून एकदाचं तिकीट काढून घेतलं.हा शेजारी चुळबूळ करणारा माणूस इकडे तिकडे बाहेर बघण्यात दंग झाला होता.वयाने तसा पंचवीस तीशीतला दिसला.बाकी सर्वानी तिकटं काढून झाल्यावर कंडक्टरने नेहमीच्या संवयीत त्याला विचारलं,
"तुमको किधर जाना है रे?जलदी बोलो."
त्याला जो राग आला तो त्याला सहन झाला नाही.तो उठून कंडक्टरच्या अंगावर धाऊन गेला. आणि संतापून कंडक्टरला म्हणाला,
"क्या तमीझ है क्या? आपको किधर जाना है ऐसा पुछना चाहिये."

पुढे माझा भाऊ सांगायला लागला,
"एकतर बस मधे गर्दी तोबा होती.आणि तशात मे महिन्याची गरमी.त्या जाड कपड्यात घामाघुम होऊन कंडक्टर वैतागलेला होता आणि हा हिंदी कसं बोलायचं तो शिकवतो हे पाहून संतापलेल्या कंडक्टरने जोरात घंटी मारून बस मधेच थांबवली आणि त्या माणसाला सरळ खाली उतरायला सांगितलं. तोपर्यंत मला हवा तोच बसस्टॉप आला होता.त्या माणसाबरोबर मी ही असे आम्ही दोघे बसमधून उतरलो.मी त्याच्याशी हंसलो आणि तो काहीसं बोलायला जवळ आला पाहून मी त्याला जवळच्या रामभरोसे हॉटेलमधे चहा घेऊं या म्हणून सुचवलं.आम्ही दोघानी चहाच्या कपावर बसमधे झालेल्या घटनेचा थोडा उहापोह केला.त्यावरून मला कळलं ह्या माणसाचं नाव रामदुलारी असून, हा जॉब शोधण्यासाठी एक दोन दिवसापूर्वी मुंबईत आला आहे.ह्याने वारणासीच्या कॉलेज मधून हिंदीत एम.ए केलंय.त्याला त्या कंडक्टरने "एकेरीत" संबोधलेलं आवडलं नाही.मुंबईच्या रीती-रिवाजाला आणि कलोक्युअल भाषेला तो अपरिचीत होता.म्हणून त्याने रागाने त्या कंडक्टरशी असा बनाव केला.मी त्याची समजूत घातली.आम्ही एकमेकाचे पत्ते दिले-घेतले आणि परत भेटू असं म्हणून आपआपल्या मार्गावर गेलो.

बर्‍याच दिवसानी मी एकदा जुहु चौपाटीवर संध्याकाळचा फिरायला गेलो होतो.मला सूर्यास्त बघायला खूप आवडतं.अचानक ह्या रामदुलारीला समोरून येताना पाहिलं.त्यानेच मला पहिलं ओळखलं.थोडे चाललो.आणि मग गप्पा मारण्यासाठी,वाळूवर सुक्या जागेवर बसलो.आता त्याला कुठेतरी जॉब मिळाला होता.आणि तो खूष होता.

रामदुलारी मला म्हणाला,
"आता मी त्यावेळसारखा कुणाशीही बोलीचालीवर रागवत नाही.मला बरेचसे इकडचे रीती-रिवाज समजले आहेत."
त्याने रागावण्याच्या विषयाला हात घातला आणि माझ्याही मानसशास्त्राच्या अभ्यासाचा जरा मला पुळका येऊन मनात आलं ह्याला काही तरी राग,क्रोधावर थोडं लेक्चर द्दावं. नाहीतरी सूर्यास्ताला थोडा वेळ होता.

मी त्याला म्हणालो,
"हे बघ रामदुलारी,क्रोध जीवनवृतीचा विनाश करतं.क्रोध नातीसंबंध तोडतो.तुला वाटेल की क्रोध केल्याने मनावरचा ताण कमी होतो किंवा तू किती भावूक आहेस हे दाखवतं असं.पण राग केल्याने सर्वदा तुझा फायदा होण्याऐवजी तू नुकसानीतच येतोस.
तुझे सहकारी, तुझे जवळचे प्रियजन,आणि मुलं तुझ्या क्रोधापूढे काहीवेळ नतमस्तक होतील पण काही काळ गेल्यावर तुला हवं ते करणार नाहीत.आणि हे अगदी नैसर्गिक आहे की जर कोण कुणाला रागाने भयभयीत करीत असेल तर ते विफल करायला दुसरा मागे पूढे पहाणार नाही.
क्रोधी व्यक्ति आपलाच विनाश करून घेते.रागामुळे संघर्ष किंवा सुटका करून घेण्याची मानसिकतेची प्रतिक्रिया तयार होते.त्यामुळे शरिरावर परिणाम होतो. तू जर रागवायचं सोडून दिलस तर आयुष्यात तुझी प्रभावशाली सुधारणा होईल.

मी पण एकेकाळी रागिष्ट होतो.मी सांगतो त्या ह्या गोष्टीचा मला आणि माझ्या सारख्या इतर रागीष्टाना उपयोग झाला.
मनापासून कबूल करा की रागीष्ट असल्याने फायद्या पेक्षा तोटेच जास्त आहेत.
बर्फा सारखं थंड रहा.राग हा जर का पर्याय ठरवलात तर तुम्ही तुम्हाला बरेच वेळा रागवण्याच्या मनस्थितीत ठेवाल.आणि हा बहूदा बरेच वेळा तुमचा भ्रम ठरेल.
राग काबूत ठेवायला सुरवातीला जरा कठीण जाईल,पण हळू हळू सुधारणा होईल.मी जवळ जवळ रोजच रागीष्ट राहत असे.
नंतर एखाद्दा महिन्याला राग येत असे.नंतर कदाचीत वर्षातून एकदोनदा अंगावर येऊन ओरडण्याचा प्रसंग आला असेल.
डोक्यात रागाची तीडीक येईपर्यंत थांबण्याचा प्रयत्न करीत राहिलात तर कदाचीत नंतर स्वतःला थांबवू शकणार नाही.
त्यामुळे राग येण्याची थोडीशी सुद्धा जाणीव होण्यापूर्वी सतर्क राहिलं पाहिजे,जरी चेहर्‍यावर रागाच्या लालीची छटा आली तरी किंवा शरिरात बेचैनी येण्यापूर्वीही, किंवा कसही.प्रत्येक वेळी राग येण्याची थोडीजरी भावना झाली तर एक दीर्घ उसासा घ्यावा. स्वतःलाच विचारावं राग करण्याची आवश्यक्यता आहे का?
कुणालाही रागीष्ट व्यक्ती आवडत नाही.असे लोक सरफीरे,किंवा भांडखोर म्हणून ओळखले जातात. कायमचे रागिष्ट असतात अशा व्यक्ति विषयी तुम्हाला काय वाटत असेल.?तुमच्याकडे त्या दृष्टीने पाहिलेलं आवडेल काय?असाही आपल्या मनाकडे प्रश्न करावा.
क्षणभर सुद्धा तुमच्या मनात आणू नका की तुमची मनोभावना प्रदर्शीत करण्यासाठी तुम्हाला क्रोध दाखवायची जरूरी आहे.सर्वात सफलता असलेले आणि प्रभावोत्पादक लोक क्वचितच क्रोधी असतात.
मोठ्या हुद्दावरचे लोक,सि.ई.ओ,सिनीयर कंसल्टंट,असलेले लोक चर्चा करीत असताना, त्यातले बरेचसे शांत आणि ध्यान केंद्रित करणारे असतात.
ध्यान केंद्रित करणं नक्कीच होय! - क्रोधी होणं नक्कीच नाय!
लोकांकडून आपण आपल्याला जास्तीत जास्त स्विकारलं जावं असं वागावं.कोणही मुद्दाम म्हणून फाल्तूपणा करीत नाही किंवा उदासिनता दाखवीत नाही.बरेचजण त्यांना जमेल तितकं चांगलं करण्याच्या प्रयत्नात असतात.तुझ्या माझ्यात आहे तशी त्यांच्यातही उणीव असू शकते.तेव्हा "काय हा फाल्तू माणूस आहे" असं म्हणण्या ऐवजी " तो पण माणूस आहे "असं म्हणावं.

समजा एखादी आपल्याकडून चूक झाली तर स्वतःवर राग काढण्यापेक्षा ती चूक स्विकारावी किंवा सुधारण्याचा प्रयत्न करावा. कारण राग करून आपल्याला कसलीच मदत होत नाही.
काही गोष्टी आपल्या हाताच्या बाहेर आहेत ह्याचा स्विकार करावा."हे काही बरोबर नाही" असं म्हणण्या ऐवजी "असं होऊ शकतं" असं म्हणावं.
क्रोध करण्या ऐवजी कृतज्ञता असावी.नक्कीच तुझा बॉस उदासीन असेल,नक्कीच तुझा जॉब,तुझी पत्नी,तुझी मुलं आणखी चांगली होऊ शकतील.पण "ग्लास अर्ध भरलंय" अशी वृत्ती ठेवल्याने निश्चीतच आपण आपल्याला दुःखी करून घेतो.
एखादी समस्या निर्माण झाली तर त्यावर शोक करीत बसू नये.सुधारायचा प्रयत्न व्हावा.एक लहान पाऊल टाकलं तरी मदत होऊ शकते.
मनातला क्रोध काढून टाकल्याने तू नक्कीच सुखी आणि यशस्वी होशिल.माझ्यावर विश्वास ठेव.

हे माझं सगळं लेक्चर ऐकून घेत रामदुलारी शांत बसला होता.
"खरंच,तुमची ओळख झाल्याने मला काही तरी तुमच्याकडून शिकायला मिळालं"
असं मनापासून बोलून गेला.
सूर्यास्त होऊन काळोख बराच झाला होता.आम्ही जायला निघालो."

हे माझ्या भावाचं सर्व भाषण ऐकून मी त्याला म्हणालो,
"एका होऊं घातलेल्या सर्फर्‍याला तू माणसात आणलंस.हे एक चांगलं पुण्यकर्म केलंस."
माझा भाऊ हंसत हंसत मला म्हणाला,
"आणि हो तुला सुद्धा तुझ्या ब्लॉगवर किंवा मिपावर ही कथा लिहून वाचक मिळतील आणि त्यांच्या प्रतिक्रिया पण."
हे ऐकून मी त्याला म्हणालो,
"मानसशास्त्र इतकं पुढे गेलंय हे मला आताच कळलं. वाचनं आणि त्यावरील प्रतिक्रिया ह्याचही मानसशास्त्र आहे हे मला आताच तुझ्याकडून कळलं."
नंतर आम्ही दोघे खो खो हंसलो.

श्रीकृष्ण सामंत

विदेश

मानसशास्त्राच्या अभ्यासाचा जरा मला पुळका

"जरा" असलेल्या मानसशास्त्राच्या पुळक्याचे "भरपूर" छान वर्णन!

श्रीकृष्ण सामंत

विदेश,
आपल्याला वाचून छान वाटलं हे वाचून बरं वाटलं
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com