डिंक म्हणजे DINK (double income no kids)
Primary tabs
डिंक
डिंक म्हणजे DINK (double income no kids) दुहेरी उत्पन्न आणि मूल नसणे.
हा एक चर्चेचा विषय आहे आणि याबद्दल मिपावर धागा काढण्याबद्दल चर्चा झाली होती. ते वाचूनच मी हि सुरुवात करतो आहे.
सध्या बऱ्याच स्त्रिया नोकरी व्यवसाय करू लागल्या आहेत त्यामुळे आर्थिक उत्पन्नाचा आणि स्त्रियांच्या स्वावलंबित्वाचा स्तर वाढत आहे हि एक सकारात्मक बाब आहे. यामुळे काही जोडप्यांची आपल्याला मूल नको अशी मनोवृत्ती होती / होत आहे किंवा झाली आहे.
पूर्वी फारशा स्त्रिया नोकरी व्यवसाय करत नव्हत्या. त्याबद्दल समाजाची मनोवृत्ती सुद्धा तयार झालेली नव्हती. चूल आणि मूल हे स्त्रीचे कार्यक्षेत्र अशी समाजाची मानसिकता होती यामुळेच आपल्याला मूल नकोच अशी धारणा किंवा धाडस करणाऱ्या स्त्रिया नगण्य होत्या.
आता उत्पन्नाची साधने सुद्धा उपलब्ध झाली असल्यामुळे आपल्या करियरला वाव मिळू शकतो आणि आपणही वेगवेगळ्या क्षेत्रात चमकू शकतो याची जाणीव स्त्रियांना झाल्यामुळे मूल नको हा चॉईस (निवडण्याचा हक्क) आपल्याला उपलब्ध आहे हि जाणीव सुद्धा स्त्रियांना होते आहे हि एक सकारात्मक बाब आहे.
या सर्व गोष्टी मी लिहिण्याचे कारण मूल हवे हि नैसर्गिक उर्मी स्त्रियां मध्ये जास्त असते आणि समाज सुद्धा मुलांना जन्म देणे आणि त्यांचे संगोपन करणे हि स्त्रीजन्माची इतिकर्तव्यता आहे आणि मातृत्व हा एक उच्च दर्जाचा त्याग ( आणि स्त्री हि त्यागमूर्ती) असे समजतो. या धारणेचा जबरदस्त पगडा अनेक स्त्रियांच्या डोक्यावर असतो आणि मूल नको असे म्हणणे हा स्त्रीत्वाचा अपमान होईल अशी भीती त्यांना वाटत असते.
कायदा सुद्धा जाणीवपूर्वक आईला मुलांचा नैसर्गिक पालक समजतो.
अशा अनेक गोष्टींमुळे आपल्याला मूल नको हे जाणीवपूर्वक ठरवणाऱ्या जोडप्यांमध्ये स्त्रियांवर मानसिक ताण सुद्धा कुटुंबाकडून आणि समाजाकडून जास्त दिला जातो. यात समाजातील आणि कुटुंबातीलच स्त्रियांचा वाटा जास्त असतो.
ज्यांना मूल होत नसतं अशी जोडपी सुरुवातीला आम्ही प्लॅनिंग करतो आहोत असे सांगतात. काही काळाने आम्हाला मूल होत नाही असे सांगण्यापेक्षा आम्हाला सध्या मूल नको असे सांगणे ते पसंत करतात. त्यात आम्हाला मूलच नको असे सांगणे सुद्धा काही जणांना फॅशनेबल वाटते.
येथे चर्चा मूल नको हे जाणीवपूर्वक ठरवतात त्याबद्दल आहे. मूल होत नाही म्हणून आम्हाला मूलच नको सांगणारे असतात परंतु त्यांच्या सांगण्याच्या मागे एक नैराश्याची किंवा दुःखाची किनार असते. आणि हि मनोवृत्ती आपल्या दुःखावर झाकण टाकून ते दडवण्याची आहे आणि त्यात काही चूक आहे असेही मी मानत नाही.
परंतु आम्हाला मूल होत नाही आणि दत्तक घेण्याची प्रक्रिया दुर्दैवाने अत्यंत किचकट असल्याने सुरुवातील दत्तक घेण्यास तयार झालेली जोडपी प्रत्यक्ष दत्तक घेण्याच्या वेळपर्यंत या प्रकाराला विटलेली मी अनेकदा पहिली आहेत.
(अनेक वर्षे वंध्यत्व शास्त्रात काम केल्यावर आलेल्या असंख्य अनुभवावर मी असे लिहित आहे अर्थात माझेच अनुभव बरोबर किंवा सर्वोत्तम असा माझा कोणताही दावा नाही)
लग्न झाले कि एक दोन वर्षात आता "एखादं मूल होऊन जाऊ द्या" असा धोशा मुलीच्या आई/ सासूकडून लावला जातो. अशा वेळेस आम्हाला कधीच मूल नको आहे असे ठामपणे सांगण्याची हिम्मत करणारी जोडपी फारच विरळ आहेत.
बरीचशी जोडपी सध्या तरी मूल नको असे सांगताना आढळतात. हि अर्थात पळवाट असतेच असे नाही पण उगाच आताच वाद कशाला हा विचार असतो.
बऱ्याच जोडप्यांची वृत्ती अजून ठाम आणि स्थिर झालेली नसते. त्यांना काही वेळ जाऊ दे मग परत विचार करू असेहि वाटत असते.
परंतु काही जोडपी आता लग्नाच्या वेळेसच आपल्याला मूल कधीच नको अशी भूमिका घेताना दिसतात हि एक सकारात्मक गोष्ट आहे.
कारण अगोदर असे स्पष्टपणे सांगण्याची हिम्मत नसणे हे स्त्रियांच्या बाबतीत जास्त करून दिसते. माझ्या बरोबरच एम डी करणारी एक हुशार मुलगी असे करू शकली नाही आणी लग्न झाल्यावर तिने नवऱ्याला सांगितले. यामुळे त्यांचा घटस्फोट झाला परंतु हि प्रक्रिया दोघांना मानसिक दृष्ट्या फारच कष्टाची गेली. नवऱ्याला आपण कायम फसवले गेल्याची भावना होत होती आणि तिला आपण नवऱ्याला फसवल्याची खंत वाटत होती.
परंतु घटस्फोटानंतर मात्र तिने आपल्या करियर कडे लक्ष केंद्रित केले आणि ती एका मोठ्या वैद्यकीय संस्थेत विभागप्रमुख म्हणून यशस्वीरीत्या काम करते आहे.
आपल्याला मूल नको याची कारणे अशा काही जोडप्याना विचारली असता खालील कारणे त्यांनी मला सांगितली
१) काही जोडप्यानी दोघांचे करियरचा आलेख चढता आहे त्यात आम्ही मुलाला वेळ देऊ शकणार नाही. मग मुलावर अन्याय करण्यापेक्षा आम्ही मूल नको असा निर्णय घेतला. यात काही जोडप्यानी सुरवातीला करियर साठी मूल लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आणि नंतर सुरळीत चाललेले करियर आणि संसार यात अडचणी आणण्यापेक्षा "आहे ते चांगले आहे" असा विचारपूर्वक निर्णय घेतला.
२) एक जोडप्याने असेही सांगितले कि लोकसंख्या प्रचंड वाढलीआहे, त्यामुळे भुईला भार जास्त झाला आहे. अशात आम्ही अधिक भर घालणे आम्हाला पटत नाही
३) काही जोडप्यांमध्ये नवऱ्याला मुलांची फारशी आवड नव्हती आणि बायकोला मुलासाठी एवढे कष्ट काढणे किंवा वेळ देणे परवडणारे नव्हते.
४) काही जोडप्यांची त्यांना अध्याहृत असणाऱ्या सुखसोयी आपण मुलाला देऊ शकत नाही त्यामुळे मुलावर अन्याय करण्यापेक्षा त्याला जन्मच न देणे बरोबर वाटत होते.
५) काही लोकांना सुरुवातीला मूल हवे होते पण ते होत नव्हते. पण कालांतराने त्यांना दोघेच राहायची सवय झाली आणि आता यातून वेगळा विचार करण्यापेक्षा आहे ते चांगले आहे असेच वाटते आहे.
६) एका स्त्रीला लहान सात (रांगेने पाच बहिणी आणि नंतर दोन भाऊ) भावंडे होती आणि कळायला लागल्यापासून केवळ अपत्य( भावंड) संगोपनात आयुष्य गेल्यावर तिला आता परत त्या गोष्टीची शिसारी आली होती.
हि सर्व उदाहरणे नवरा बायको दोन्ही जण नोकरी किंवा व्यवसाय करुन अर्थार्जन करत असलेल्या जोडप्यांची आहेत. आणि यातील बहुसंख्य जोडप्यांची हा निर्णय विचारपूर्वक घेतला आहे असे जाणवले.
त्यांना उद्या म्हातारपणी तुम्हाला कोण सांभाळेल याची भीती वाटत नाही का?
असे विचारल्यावर बहुसंख्य जोडप्यांची हेच सांगितले कि आजूबाजूला ज्यांची मुले परदेशात आहेत किंवा दूर गावी राहत आहेत ते काय करतात? मुले असली तरी वृद्धपणी एकटेच राहाणारे असंख्य वरिष्ठ नागरिक आपण आजूबाजूला पाहतोच कि हेही सांगितले.
तुम्हाला आपले स्वतःचे रक्ताचे कुणीतरी असावे असे वाटत नाही का? असे विचारल्यावर बहुतांशी लोकांनी कधीतरी वाटते पण तेवढ्यासाठी आपले स्वतःचे मूल जन्माला घालून पुढची १८-२० वर्षे त्यासाठी द्यायची तयारी नसल्याचे सांगितले.
एक सकारात्मक गोष्ट म्हणजे बहुसंख्य जोडप्याचा निर्णय हा विचारपूर्वक आणि दोन्ही कडचा विचार करून घेतलेला होता आणि त्याबद्दल त्यांना वाईट वाटणे खंत वाटणे( guilty) असे वाटत नव्हते.
परंतु बहुसंख्य जोडप्यांच्या आईवडिलांना हा निर्णय पसंत नसल्याचेही त्यांनी सांगितले आणि यामुळे आईवडिलांशी काही काळ विसंवाद झाल्याचे सांगितले. यात बहुसंख्य स्त्रियांच्या आई किंवा सासूने त्यांच्या निर्णयाला विरोध केल्याचे सांगितले.
काही जोडप्यांची मात्र आपल्या एका पालकांनी आपल्याला सपोर्ट केल्याचे आवर्जून सांगितले.
हि यादी संपूर्ण नाही किंवा परिपूर्ण आणि बिनचूक नाही.
तसा माझा दावा हि नाही. पण हे मला आलेले अनुभव प्रातिनिधिक समजता येतिल
सर्वप्रथम हा धागा काढल्याबद्दल आपले अभिनंदन आणि आभार 🙏
आत्ता रुमाल टाकून ठेवतोय, वेळोवेळी चर्चेत सहभागी होईनच!
छान धागा.
सध्याच्या काळात एका मध्यम - उच्च मध्यमवर्गीय मुलाचा / मुलीचा खर्च जन्मापासून ते आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होईपर्यंत (२०-२१ वर्षांपर्यंत) हा २५-४० लाख असेल. ईतक्या पैशात जग फिरु, नविन अनुभव घेऊ, हा पैसा शिल्लक ठेऊन लवकर निवृत्ती घेऊन छंद जोपासू अशी पण मते ऐकली आहेत. अशीच काहीशी मते लग्न न करणार्या मित्रांची पण आहेत.
जर्मनी सारख्या देशात जन्मदर कमी झाला होता (सध्या माहित नाही) त्यात फिअर ऑफ ओल्ड एज पोवर्टी हे एक कारण वाचले होते.
एका कुटुंबापुरता विचार केला तर ठिक आहे पण राष्ट्र, मोठा भौगोलिक भाग (उदा. मोठ्या शहरातील बहुतांशी पांढरपेशे लोक) असा विचार करायला लागले तर भविष्यात परिस्थिती बिकट होईल.
>>> +११
मुल नको हा निर्णय जाणीवपूर्वक घेणारे सध्या तरी संख्येने अल्प दिसतायत. आपल्याकडील (भारतातील) परिस्थिती बघता या निर्णयाने बिकट परिस्थिती निर्माण व्हायला बराच काळ जाऊ शकेल. परंतु धाग्याच्या मुळ उद्देशापासून थोडसं भरकटण्याचा धोका पत्करून लिहावसं वाटतं की आज ज्या वेगाने मुस्लीम पिलावळ वाढतेय ते बघता हिंदू जोडप्यांनी मुल नको हा निर्णय घेणे राष्ट्र म्हणून धोक्याचं ठरू शकेल.
पतीपत्नीच्या सामायिक इच्छेने मुल जन्माला घालण्यास सक्षम असताना मुल नको हा निर्णय घेणे हे त्यांचे वैयक्तिक स्वातंत्र्य आहे. वेगाने बदलती जीवनशैली, वैयक्तिक कारकिर्दीचे भान, स्त्रियांना आज असणारे निर्णय स्वातंत्र्य या अनेक घटकांमुळे मुल नको हा निर्णय जोडपी घेताना दिसतात.
रघुनाथ धोंडो कर्वे यांनी सुमारे एक शतकापूर्वी हा निर्णय घेतल्याचे ठाऊक असेल.
कृपया इथे हिंदू मुस्लिम करु नका.
चर्चा भरकटवायची नाहीच. पण एकच उदाहरण देतो. माझ्या आई-वडिलांना (स्थायिक - पिंपरी चिंचवड) दोनच अपत्य आहेत तर माझ्या पत्नीला पाच भावंडे म्हणजे माझ्या सासरे बुवांना (तेव्हा स्थायिक - गोंदिया जिल्हा) एकूण सहा अपत्ये त्यामुळे किती अपत्य हे फक्त धर्मावर अवलंबून नसते. तरी अधिक चर्चा करायचीच असेल तर कृपया वेगळा धागा काढावा ही विनंती.
तरी अधिक चर्चा करायचीच असेल तर कृपया वेगळा धागा काढावा ही विनंती.
सहमत
धागा काढल्याबद्दल डॉ.खरेसाहेबांना धन्यवाद.
चांगली चर्चा होईल अशी अपेक्षा आहे.
डींक ह्या निर्णयाचा दुसरा पैलु अथवा साईड ईफेक्ट म्हणजे मूल न होऊ देणे हे ठरवल्यानंतर अचानकच काही काळानंतर मुल असायला हवे होते असे वाटु शकते अथवा अगदी उशीरा तिशीतच पूर्ण करण्याजोग्या काही जबाबदार्या न राहिल्यामुळे मिडलाईफ क्रायसिस ने ग्रासले जाते. काही काळापूर्वी एका सुविद्य आणि सधन दांपत्याने करण्यासारखे काहीच न राहिल्यामुळे अगदी तिशीतच आत्महत्या केली होती. हे प्रकरण मिडियामध्ये बरेच हायलाईट केले होते. बर्याच वेळेला जगण्यासाठी सोयींपेक्षा समस्यांचीच जास्त गरज असते असे वाटुन जाते. मूले झाली कि जो पर्यंत ती स्वतःच्या पायावर उभी राहत नाहीत तो पर्यंत तरी पालकांना जबाबदारीतुन मुक्त झाल्यासारखे वाटत नाही.
माझ्या पिढीत ( सध्या चाळिशीच्या उंबरठ्यावर ) अशी उदाहरणे जवळून पाहिली आहेत.
परदेशी राहणाऱ्या मित्रांनी असे निर्णय घेऊन अंमलात आणले आहेत. काही जणांनी मूल नकोच असे निर्णय घेऊन चाळिशीत निर्णय फिरवलेले पाहिलं आहे. त्याचे उदाहरण म्हणजे नवरा बायको दोघेही आपापल्या करियर मध्ये उत्तम प्रगती करत असून मूल झाले तर ब्रेक घ्यावा लागेल , वेळ देता येणार नाही याचं कारणाने मूल नको म्हणत होते
पण चाळिशीत आता करियर मध्ये म्हणावी तितकी मज्जा येत नाही किंवा प्रगती झाली नाही , आयुष्यात तोचतोचपणा आलाय म्हणून मग मुलासाठी प्रयत्न केला .
डॉ खरे साहेब सर्वप्रथम आपले आभार
दुसर्या एका धाग्यावर मी याबाबत माझा मानस बोलून दाखवला होता. पण पुढे नित्याचा आळशीपणा आड आला. आणि इकडे आपला धागा आला देखील.
त्यामुळे हा महत्वाचा विषय चर्चेला आणल्याबद्दल धन्यवाद.
धाग्यात तुम्ही अनेक महत्वपुर्ण मुद्दे मांडले आहेतच. या जीवनशैलीला पुर्वी DINK असेच फक्त म्हंटले जायचे पण नंतर यात संज्ञेत दुहेरी उत्पन्नाच्या मुद्द्याला अधिक महत्व दिल्यासारखे वाटते. पण दुहेरी उत्पन्न हा तितकासा महत्वाचा मुद्दा नसून अपत्य संगोपनाची आवड नसल्याने वा इच्छा नसल्याने विनापत्य जीवनशैली अवलंबणार्या काही लोकांनी (स्वेच्छेने) विनापत्य जीवनशैली - किंवा चाईल्डफ्री लाईफस्टाईल ही संज्ञा प्रचलित केली. मलाही हीच संज्ञा जास्त आवडते.
वैयक्तिक माहिती
या विषयावरचे प्रत्येकाचे अनुभव व विचार अगदी भिन्न असल्याने मला व्यक्तिगत माहिती आधी संक्षिप्तपणे सांगावीशी वाटते
मी इंजिनियर असून सॉफ्टवेअर क्षेत्रात नोकरी करतो. आता मी वयाची चाळिशी ओलांडलेली आहे.
मी याबद्दलचा निर्णय साधारणपणे वयाच्या पंचविशीच्या आधीच घेतला. त्यावेळी माझा विवाह झालेला/ ठरलेला नव्हता. माझा निर्णय मी आई-वडीलांना सांगितला तेव्हा त्यांनी अर्थातच विरोध केला. हा निर्णय अतिशय अयोग्य आहे पासून ते असा निर्णय घेतल्यावर कोण मुलगी माझ्याशी लग्नाला तयार होईल इथवर बरेच मुद्दे वारंवार चर्चेत राहिलेत. बाकी प्रेमाबिमाचं कधीच न जमल्याने अॅरेंज्ड मॅरेजचा पर्याय अवलंबला होता. त्यातही पारंपारिक पध्दतीने मध्यस्थांमार्फत आलेली स्थळे व इंटरनेटवरील वधूवरसूचक साईट्स (मॅट्रिमोनियल) अशा दोन्ही प्रकारे प्रयत्न सुरु होते. या निर्णयामुळे लग्न जुळण्यास काहीसा विलंब झाला हे खरे, पण इतरही काही कारणे होती. माझी पत्नीशी माझा संपर्क एका मॅट्रिमोनियल संस्थळाच्या माध्यमातून झाला. आधी काही वेळा फोनवर बोलणे झाल्यावर आम्ही भेटलो. एक दोन भेटीनंतर आणि एकमेकांची पहिल्या पायरीवरची पसंती झाल्यावर मी तिला माझ्या या निर्णयाबद्दल सांगितले. तिचे विचार असे अजिबात नव्हते उलट तिला मुलांची खूप आवड होती. पण माझा स्वभाव, व्यक्तीमत्व तिला आवडले असल्याने तिने पुढे जाण्याचा निर्णय घेतला. तसेच पुढे जावून माझे विचार कदाचित बदलतील अशी तिला आशा होती. आमचे लग्न झाले तेव्हा आम्ही तिशी ओलांडली होती आणि आता लग्नाला अकरा वर्षे होवून गेलेत पण माझे विचार काही बदलले नाहीत. आणि सुरुवातीच्या काहीशा नाराजी नंतर पत्नीनेही माझे विचार व माझा निर्णय समजून स्वीकारला. माझी आई पुर्वी म्हणायची की "लोक विचारतात , नातू कधी वगैरे" पण नंतर माझ्या आईलाही वाटू लागले की "दोघे आनंदी आहेत तर मग काय फरक पडतो". त्यामुळे मला ह्या निर्णयावर ठाम राहण्यास फारशा अडचणी आल्या नाहीत.
निर्णयाचे फायदे
निर्णयाचे तोटे
तोटे तसे नाहीत. फक्त काही वेळा एखादे कुटूंब सोबत वेळ घालविण्याकरिता आमच्यापेक्षा ज्यांना मुले आहेत अशा दुसर्या जोडप्याला अधिक प्राधान्य देते. ते साहजिकच आहे कारण त्यामुळे त्या कुटूंबातील मुलाला/ मुलीला समवयस्क मित्र/मैत्रीण मिळणार असते.
इतरांच्या प्रतिक्रिया
जेव्हा मला नव्याने भेटणार्या परिचित जेव्हा थोडीफार मैत्रीबद्दल अपत्याबद्दल विचारतात तेव्हा मी त्यांना माझ्या निर्णयाबद्दल स्पष्टपणेच सांगून मोकळा होतो. सुरुवातीचा आश्चर्याचा धक्का ओसरल्यानंतर त्यांना याबद्दल फार काही वाटत नाही. किंवा मुलांमुळे ताणलेल्या वेळापत्रकाच्या व्यथा अनुभवणार्या काहीजणांना तर चक्क माझ्या या निर्णयाचा हेवा वाटतो.
परिचयातली इतर विनापत्य जोडपी
माझ्या प्रत्यक्ष परिचयात दोन जोडपी विनापत्य होती. पण त्यापैकी एका जोडप्यातील स्त्रीला (जी माझी मैत्रीण आहे) नेहमीच मूल हवेसे वाटत होते तर तिच्या पतीला नको होते. पुढे काही वर्षांनी त्यांना मूल झाले - माझ्या मैत्रिणीच्या सांगण्याप्रमाणे ती चुकून झालेली गर्भधारणा होती. पण तिचा नवरा आनंदी नाही आणि माझे तिच्याशी शेवटचे बोलणे झाले त्याप्रमाणे तिचा नवरा तिला घटस्फोट देण्याच्या विचारात होता. आतापर्यंत घटस्फोट झाला किंवा कसे हे मला माहिती नाही.
याव्यतिरिक्त फेसबूकवरुन ओळख झालेल्या एका मुलीशी माझी भेट झाली जिचा निर्णय विनापत्य राहण्याचा आहे आणि त्याकरिता तिने आपल्या प्रियकराचे मन वळवले आहे. पण अद्याप त्यांचे लग्न झालेले नाही.
समाजमाध्यमांवरील गट
फेसबूकवर विनापत्य व्यक्तींचे विविध गट आहेत. यापैकी "चाईल्डफ्री इंडियन्स ओरिजिनल" या गटाचा मी सदस्य आहेत. या गटात आता २५० सदस्य आहेत.
पण या गटातील पोस्ट्स अनेकदा टोकाच्या व एकांगी वाटतात.. म्हणजे विनापत्य असणे हे "कूल असणे" तर अपत्यांना जन्म देणे म्हणजे "फूल असणे" वगैरे आशयाच्या. पण मलातरी असा आशय पटत नाही.
माझा दृष्टीकोन
एक वा अधिक अपत्यांना जन्म देणे (त्यातही खासकरुन ते जोडपे अपत्यांना चांगले जीवन देवू शकणार असतील तर) किंवा विनापत्य राहण्याचा निर्णय घेणे ह्या दोन्ही व्यक्तिगत निवडी आहे. कुणाला चूक वा कुणाला बरोबर ठरवणे हे योग्य नाही. दोन्ही गटांनी एकमेकांच्या निर्णयाचा आदरही केला पाहिजे व त्या निर्णयाबद्दल एकमेकांचे आभारही मानायला हरकत नाही. विनापत्य जोडप्यांमुळे इतर जोडप्यांच्या अपत्यांच्या जीवनात येणारी प्रचंड स्पर्धा काही प्रमाणात तरी कमी होणार आहे, नैसर्गिक स्त्रोंतावर येणारा ताण , निर्माण होणार कचरा या सगळ्यात काही प्रमाणात तरी घट होईल त्यामुळे सापत्य (शब्दप्रयोग बरोबर आहे का ?) जोडप्यांनी विनापत्य जोडप्याचे आभार मानायला हरकत नाही. तर विनापत्य लोकही जगत आहेत.. त्यांना जगण्याकरिता विविध सेवा व उत्पादने रोजच हवी आहेत. ती पुरवण्याकरिता - त्यासाठी काम करण्याकरिता नवीन पिढी असणे गरजेचे आहेच. मग जी जोडपी कष्ट करुन, यातना सोसून अपत्यांना जन्म देत आहेत त्यांना विनापत्य लोकांनी हसण्याचे कारण नाही उलट त्यांचे आभार मानायला हवेत.
मला स्वतःला परिचयातल्या इतर पालकांच्या बालसंगोपनाच्या जबाबदारीत जमेल तशी जमेल तेव्हा मदत करुन त्यांचा भार काहीसा हलका करणे हे सामाजिकदृष्ट्या परिपक्वतेचे वाटते.
भारतातील प्रसिद्ध विनापत्य जोडपी
१)रघुनाथ धोंडो कर्वे आणि मालती कर्वे - या दोघांनाही "मूल हवे" अशी कोणतीही नैसर्गिक उर्मी नव्हती. मालतीजींना स्वतःच्या या भावनेबद्दल आश्चर्य वाटत होते पण रघुनाथ यांनी त्यांना समजावले की प्रत्येक स्त्री मध्ये अशी उर्मी असतेच असे नाही. अशी उर्मी नसणे हे देखील नैसर्गिकच असू शकते. (संदर्भः चित्रपट - ध्यासपर्व)
२) अभिनेते अतुल कुलकर्णी - गीतांजली कुलकर्णी
आणखी कुणी जोडपी माहित असल्यास जाणकारांनी भर घालावी
भारतीय चित्रपटात हाताळलेला हा विषय
१) ध्यासपर्व - रघुनाथ धोंडो कर्वे यांच्यावरील मराठी चरित्रपट (दिग्दर्शक : अमोल पालेकर)
२) पाँडिचेरी - सचिन कुंडलकर दिग्दर्शित मराठी चित्रपट
याशिवाय काही हिंदी चित्रपट असावेत पण आता आठवत नाहीये.
विनापत्य जीवनशैली आणि निरिश्वरवाद
माझ्या मते विनापत्य जीवनशैली अगदी स्वेच्छेने स्वीकारणारे किंवा त्याकडे ओढा असणारे लोक बहुधा निरिश्वरवादी आहेत, किंवा धार्मिक व सामाजिक पातळीवर डाव्या विचारांकडे झुकणारे आहेत. अर्थात असे माझे केवळ निरीक्षण आहे. याबाबत काही सांख्यिकी सर्वेक्षण वा संशोधन झाले आहे किंवा कसे याबद्दल मला माहिती नाही.
असो. मंडळी , सध्या पुरते इतकेच. चर्चा पुढे सरकेल तशी अधिक भर घालेनच.
अवांतर : डॉक्टर खरे साहेब,
अध्याहृत हा शब्द बरेच दिवसांनी वाचायला मिळाला. छान वाटले. मी हा शब्द बोलतानाही कधी वापरतो , पण असे अवघड शब्द वापरलेत की पत्नी वैतागते :)
डिंक मध्ये जर स्त्री गृहिणी असेल तर तिला अपत्य नको याचे स्वतःलाच किंवा समाजाला समर्थन करणे फार कठीण जाते.
कारण दिवसभर काय करतेस तू घरीच तर असतेस मग मूल नको कशाला? इतका आळशीपणा?
अशासारखे असंख्य टोमणे ऐकायला लागतात. यामुळेच या गटात अर्थार्जन न करणाऱ्या स्त्रिया फार कमी आढळतात.
आपण काही तरी भरीव करत असलो पाहिजे हि माणसाची नैसर्गिक उर्मी आहे त्यात अर्थार्जन येतेच असे नाही. पण समाजसेवा हा पिंड असावा लागतो.
त्यामुळे प्रत्येकास समाजसेवा करता येतेच असे नाही मग काही तरी काम करायचे तर ते फुकट का करायचे? या विचारातून मग नोकरी किंवा व्यवसाय केला जातो यामुळे आपोआप दुसरे उत्पन्न होत जाते.
दुसऱ्या उत्पन्नाला महत्व देणे हा विचार नाही पण व्याख्येप्रमाणे DOUBLE INCOME आहे म्हणून लिहिले आहे.
३) एक निर्णय स्वतःचा स्वतःसाठी - या चित्रपटात डॉक्टर खरे साहेबांनी धाग्यात सांगितलेल्या उदाहरणाप्रमाणेच एक डॉक्टर स्त्री दाखवली आहे जिला मूल नको व ते ही लग्नानंतर आपल्या पतीला (तो ही डॉक्टर) सांगते. पुढे घटस्फोट होतो. नायक दुसरे लग्न करतो. पण इकडे या पहिल्या नायिकेचे आई-वडील अपघातात दगावतात. त्यामुळे एकाकी झालेल्या तिला अचानक आपले मूल ते ही घटस्फोटित पतीपासूनच हवेसे वाटते.
पु. ल. देशपांडे - सुनिता देशपांडे.
पु. ल. देशपांडे - सुनिता देशपांडे .. आणि अपत्य ("आहे मनोहर तरी")
श्री सुनिता देशपांडे यांच्याबद्दलचा आदर कमी झाला.
केवळ एवढ्यामुळे आदर कमी झाला? आहे मनोहर तरी यात मानवी स्वभावांचे चित्रण आहे. कुणीही सदा आदर्श वा सदा आदरणीय नसतो.
सहमत.
पुस्तक वाचून पानापानाला सुनीताबाईंबद्दल मत बदलत जाते. कधी चीड, कधी कौतुक, कधी हेवा आणि सर्व वाचून संपल्यावर एक मोठ्या उंचीची व्यक्ती म्हणून अत्यंत आदर हा रिझल्ट येतो. खरं बोलणे याबाबत तर हात जोडावेत (गृहीतक: रंजकतेसाठी काही वाढीव घातले नसावे. गरजही नसावी त्यांना.)
अरे वा.. तुम्ही पुस्तक वाचले आहे तर. मग वरचा किस्सा (गर्भधारणे संदर्भातला) खरंच आहे का त्या पुस्तकात ? ते वाचून खरंच खूप विचित्र वाटत आहे. इतक्याशा कारणाने कुणी इतकं टोकाचं कसं वागू शकतो ?
विचित्र तर बरंच काही वाटतं. किंबहुना सर्वच. कितीतरी प्रसंग.
तपशील वाचून जास्त वाईट मत बनायचंच असेल तर उलट या दोन्हीतल्या पहिल्या प्रसंगाने बनेल. त्यात केवळ आकर्षण नाहीये. उलट समोरुन तसा प्रतिसाद न मिळाल्याने चवताळून उठणे, आतली मादी दुखावली जाणे, आणि उलट स्वत:वर येऊ नये म्हणून त्या सज्जन पुरुषावरच उलट हल्लाबोल की मी विश्वासाने आलेली असताना असा गैरफायदा घ्यायला तुम्हाला लाज वाटली पाहिजे वगैरे. हे सर्व त्यांनी तिथे तटस्थपणे लिहिलेय. आधी मत वाईट होते. एकेक प्रसंग वेगळे पैलू समोर आणतो. खूप प्रसंग आहेत. सर्वांतून एक संपूर्ण मनुष्यत्व पुढे येतं. असे धाडस आपल्यात येणे कठीण.
बाकी गर्भधारणेबाबतच्या प्रसंगात भाई मोठ्ठं डाळिंब घेऊन आला. मग सर्वांनी ते संपवून टाकलं. आणि नवीन जन्माला येणार्या जिवाविषयी आधीच इतकी बेपर्वाई/ अनास्था असेल तर नकोच ते असं आम्ही ठरवलं असा स्थूलमानाने उल्लेख आहे. हा अतिरेक वाटू शकेल लॉजिकली. पण बाई अत्यंत मनस्वी होत्या. डाळिंब हे तात्कालिक निमित्त असेल,त्या उंटावरली शेवटची काडी असेल. आसपास खूप काही न सांगितलेलं असेल.
टू बी फेअर विथ सुनीताबाई, अँड टू बी फेअर विथ एव्हरी लेडी इन द वर्ल्ड.. गर्भ ठेवणे, न ठेवणे हा १००% तिचा एकटीचा निर्णय हक्क आहे असे मी मानतो. मला त्यात नैतिक निवाडा देण्याची लायकी किंवा हक्क नाही. नन ऑफ़ एनिवन एल्सेस बिझनेस. नो कंडिशन्स अप्लाय. नो जजमेंट्स पॉसिबल.
हे वैयक्तिक मत अर्थात. __/\__
अगदी सहमत
मूल दोघांच असत. केवळ निसर्गाने स्त्रीला मूल जन्म देण्याची यंत्रणा शरिरात ठेवली आहे म्हणून केवळ तिचाच १०० टक्के हक्क हे लॉजिक पतिपत्नी संबंधांना लावणे पटत नाही. जर तसा त्यांचा अंतर्गत करार असेल तर गोष्ट वेगळी.
+१
असे नाही. अगदी टोकाचे स्त्रीमुक्तावादी असे मत व्यक्त करु शकतात.
जर ती स्त्री जर एकटी , विनालग्नाची , परित्यक्ता किंवा तत्सम असेल तर ठिक आहे, इतर बाबतीच हे योग्य नाही.
जन्माला घालण्यातील (जन्माला येईपर्यंतचा भाग, पालन पोषण नव्हे) स्त्री आणि पुरुष यांच्यातील contribution आणि risk या दोन्हीची वाटणी अत्यंत टोकाची असामान आहे. म्हणून तसे वाटते. शिवाय इतर घटकांचा तिच्यावर असलेला दबाव.
स्त्रीला केवळ कोण्या स्त्रीवादातून जनरल मोठेपणा देणे असा उद्देश मुळीच नाही.
अयोग्य समर्थन.
जरी स्त्री मुल जन्माला घालत असली तरी सर्वसामान्य घरात आजी, आजोबा, भाऊ, दिर, भावजय व इतर नातेवाईक आपल्या आपल्या परीने मदत करत असतात. त्यामुळे स्त्रीला १००% हक्क असणे चुकीचे नव्हे, ओरबाडुन खाण्याच्या प्रवृत्तीचे द्योतक आहे.
सहमत.
१) गर्भधारणेपुर्वी "मूल हवे" हा निर्णय हे जोडीदार स्त्री-पुरुष (सध्या फक्त पती-पत्नी म्हणूयात) यापैकी दोघांचा होकार असेल तरच होवू शकतो. कुणा एकट्याला हवे म्हणून मूल जन्माला घातले जावू नये.
२) गर्भधारणेनंतर "मूल नको" किंवा गर्भपात करायचा असेल तर ते ठरविण्याचा अधिकार सर्वस्वी स्त्रीचा असेल
यात दोन शक्यता संभवतात -
२ अ) गर्भधारणे नंतर पतीला मूल नकोय व पत्नीला हवेय म्हणून पती पत्नीला गर्भपाताबद्दल आग्रह कर असेल. अंतिम निर्णय पत्नीचा असावा. पण बालसंगोपनात पतीची साथ मिळणार नाही, कदाचित घटस्फोटही होवू शकतो या शक्यतांचा विचार करुन , त्यांना सामोरे जाण्याची तयारी ठेवून तिने अंतिम निर्णय घ्यायला हवा.
२ ब) गर्भधारणे नंतर पत्नीला मूल नकोय व पतीला हवेय म्हणून पत्नी गर्भपाताचा विचार करतेय. इथेही अंतिम निर्णय पत्नीचा असावा. पण पतीने मूल असण्याबद्दल आग्रही राहताना पत्नीला ते का नकोय हे नेमके समजून घेणे गरजेचे आहे. जर तिच्या प्रकृतीला धोका संभवत असेल किंवा तिची मानसिकता "मूल नको , बालसंगोपन नको " अशी असेल तर त्या गोष्टींचा विचार करुन आपला आग्रह पुढे किती रेटायचा हे ठरवायला हवे. जर पतीच्या आग्रहामुळे पत्नी मूल जन्माला घालायला तयार झाली पण मूलाच्या जन्मानंतरची सुरुवातीची नैसर्गिक गरज (मातेचे दूध) वगळता ती बालसंगोपनात सहभागी होणार नसेल तर त्या सर्व गोष्टीचा विचार पतीला करायला लागेल.
पण अर्थातच या सर्व बाबतीत मतभेद असल्यास पती-पत्नी दोघांनी चर्चा करुन, एकमेकांना समजून घेत प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करावा. पण तरी सहमती नाहीच झाली आणि दोघे आपापल्या मतावर ठाम असलेच तर घटस्फोटाचा निर्णय घेता येवू शकतो.
पुल-सुनीताबाईंपुरतं म्हणायचं झाल्यास त्या दोघांनी पुढेही संसार केला, ते वेगळे झाले नाहीत. पुल दुखावले गेले असते तर त्यांना वेगळे होणे अशक्य (मानसिक दृष्ट्या वा सामाजिक दृष्ट्या ही) नक्कीच नव्हते .. ते काही जुनाट धार्मिक विचारांनी लग्नसंस्स्थेला बांधलेलेही नव्हते. आणि वेगळे होवून त्यांना दुसरी जोडीदारही मिळाली असती,
पण असे असून ते दोघे एकत्रच होते याचा अर्थ त्यांची सहमती झाली असणार .. तेव्हा आपल्याला तो किस्सा वाचायला कितीही विचित्र वाटला तरी मिया बिबी राजी ...
पहील्या प्रसंग त्यांच्या लग्नाआधी घडल्याने आणि रात्रीच्या वेळी माणसाची मति योग्य प्रकारे काम नाही, त्यामुळे फारसे काही वाटत नाही.
--
दुसरा प्रसंग निव्वळ बालिशपणा, खुनशीपणा आणि निसर्गदत्त अधिकार एकत्र आल्याने एक होऊ शकते याचा उत्तम नमुना आहे.
पुस्तक मीही वाचलं आहे.
असं काही एक झालं नाही.
डाळींब संपवून टाकलं याबद्दलचा राग त्यांनी व्यक्त केला हि वस्तुस्थिती आहे पण त्यांनी गर्भ पाडून टाकला हे सत्य नाही तर त्यांचा दुर्दैवाने गर्भपात झाला आणि नंतर परत गर्भ राहिलाच नाही. हे त्यानी एकदा मॅजेस्टिक गप्पांमध्ये सांगितले होते.
पुस्तकात शब्दशः काय लिहिलेले आहे ते मला आता नक्की आठवत नाही. पण काही बाबी ज्या केवळ आणि केवळ नवरा बायकोमध्ये असायला हव्या त्यासुद्धा त्यांनी पुस्तकात लिहिल्या आहेत.
हे मला खटकले तसे प्रत्येकाला खटकेलच असे नाही. आणि तसे त्यांनी लिहावे कि नाही हे सांगण्याचा मला कोणताही अधिकार नाही.
त्यांचा स्वभाव थोडा पुरुषी म्हणतो तसा होता. सडेतोड पणा बाणेदारपणा हाही नको तेवढा होता.
श्री पु ल हे नको तितके मनमिळाऊ होते आणि व्यवहाराला चोख नव्हते. याचा लोक भरपूर गैरफायदा घेत असत. यामुळे त्या( सुनीता बाई) अशा गैरफायदा घेणाऱ्या लोकांशी जेवढ्यास तेवढे वागत असत. यामुळे त्यांच्याबद्दल गैरसमज सुद्धा तितकेच पसरलेले होते.
एक किस्सा असाही आहे. कि पुलंचे एक पुस्तक याची मुद्रणपूर्व कॉपी सुनीताबाईंनी वाचली.
त्यात शुद्ध लेखनाच्या इतक्या चुका होत्या कि त्यांनी प्रकाशकाला फोनकरून विचारले कि इतक्या भयंकर चुका कशा काय झाल्या?
त्यावर प्रकाशकाच्या माणसाने सांगितले कि प्रूफ रिडींग साहेबांनी स्वतः केलंय?
यावर सुनीता बाईंचा विश्वास बसेना म्हणून त्या मुद्रणालयात स्वतः गेल्या.
तेथे प्रूफ रिडींग केलेलं पुस्तक हातात घेतले तर त्यात पहिल्याच पानात इतक्या भयंकर चुका होत्या कि पुलं यांनी वैतागून मुद्रकाचे नाव वाघ होते ते खोडून डुक्कर असे लिहिले होते आणि ती कॉपी तेथेच ठेवून ते परतले होते.
एक वस्तुस्थिती हि पण आहे कि त्या पुलंची पत्नी म्हणूनच प्रसिद्ध होत्या आणि म्हणून लोकांनी त्यांचे पुस्तक वाचले किंवा त्यांना प्रसिद्धी मिळाली हेही तितकेच सत्य आहे.
तसंही असेल. मजेस्टीक गप्पा संदर्भ मला माहीत नव्हता. पण पुस्तकात बियॉन्ड एनी डाउट त्यानी लिहिलंय की असं असेल तर नकोच ते, आम्ही दोघांनी नीट विचार करुन/ ठरवून हा निर्णय घेतला.. असा नीट उल्लेख त्याच क्रमात आला आहे.
प्रत्यक्ष खाजगी आयुष्य खूपच तपशिलात जाऊन मांडलेय हे खरं आहे. शेवटी त्यांची मर्जी. पण केवळ बारीक घटनेने राग धरुन तातडीने भावनेच्या भरात गर्भपात केला अशी जी प्रतिमा होतेय ती दूर करण्याचा तो प्रयत्न होता.
मिसळपाव धोरणाप्रमाणे आपण इथे पानाचे/ उताऱ्यांचे फोटोज् देऊ शकत नाही गवि, वैयक्तिक एनेकडॉट्स हे सहमतीला सहाय्यक टूल कधीच नसेल, त्यामुळे माझा आपणांस एक अनाहुत सल्ला असेल, just burry the issue.
फुकट आहे take it or leave it, पण एकंदरीत तुमचे प्रतिसाद अन् विचार पाहून द्यावा वाटला.
अगदी मातृत्वाबद्दल माझे विचार जरासे वेगळे असूनही ! (वेगळे म्हणजे स्त्रीला पोरे देण्याची मशीन समजणे नाही, तुम्हाला स्पष्टीकरण द्यायची गरज नाही तरी सांगून ठेवतोय आपलं).
हे पुस्तक मी ही पंचवीस किंवा त्याही पेक्षा अधिक वर्षांपूर्वी वाचले आहे.
'बहुदा त्यांनी गर्भ पाडून टाकला आणि पुन्हा कधीही गर्भधारणा होवू दिली नाही असा समज तो प्रसंग वाचल्यावर होतो'.
असा माझा तरी समज झाला नव्हता. किंबहुना त्यांनी जाणीवपूर्वक गर्भपात करवून घेतल्याचे वाचल्यासारखे वाटत नाही.
घरचे प्रश्न चौकात सुटत नसतात.
आणखी काय सांगू.
हा प्रश्न नाहीच.
जाणीवपूर्वक मूल नको हे म्हणणाऱ्या जनांच्या विचारसरणीचि चर्चा आहे.
तसे पाहिले तर राजकारणाचीच काय इतर कोणत्याही गोष्टीची चर्चा इथे करून कोणाला काय फायदा होणार आहे.
साहित्य वाचून किंवा चित्र काढून काय फायदा होतो? असे म्हणण्यासारखे आहे
+१००० हेच लिहायला आलो होतो.
हा कोणाच्या घरातला प्रश्न किंवा समस्या नाहीच. मूल नको हे म्हणणाऱ्या जनांच्या विचारसरणीची, अनुभवांची, फायद्या - तोट्यांची (तोटे नाहीतच हा भाग वेगळा) आयुर्वेदिक* चर्चा अपेक्षित आहे.
* ह्या चर्चेचा कोणाला फायदा होवो न होवो निदान नुकसान तरी होणार नाही 😀
दुसरं काय. ती जोडपी या विचारांच्या पलिकडे गेलेली असतात. मग आपण चर्चा करून काय उपयोग?
पण १) आम्हा दोघांना मूल नको आहे पण दोघाचे आईवडील मागे लागले आहेत तर काय?
२)एका पालकास मूल हवंय पण दुसऱ्याला नकोय तर काय?
३)दोघांनी मूल नको होतं पण आता हवंय पण होत नाही तर काय?
असे निरनिराळे सामाजिक, वैयक्तिक, शारिरिक, मानसिक प्रश्न आहे असू शकतात. तर ते सोडवणे जोडप्यांच्याच हातात. आपण काय करणार?
गंमत म्हणजे बऱ्याच प्रसिद्धीच्या झोतातल्या स्त्रिया सध्या मूल होणे,मुलं होणे,लवकर होणे, करिअर को मारो गोली अमलात आणत आहेत. फोटोबिटो इन्स्टाग्रामवर टाकून दणकून मिरवत आहेत. काही तर अशा स्थित्यंतरासाठी व्यायाम,कपडे,पर्यटन भलामणी याच्या सुपाऱ्या घेत आहेत. तर त्यांचे अनुकरण करून विचार बदलणाऱ्या येऊ शकतात. कारण आमच्याकडे कसल्याही गोष्टी कालमान्य किंवा कालबाह्य होऊ शकतात.
उदाहरण मोठ्या छत्रीचं घेता येईल. फोल्डींगची छोटी छत्री बाळगणे कमी प्रतिष्ठेचे ठरले आहे. मोठी छत्री बाळगणे आणि मिरवणे सध्या फ्याशनेत आहे.
मूल होऊ न देण्याची फ्याशन मागे पडली आहे. मूल वेळच्या वेळी होऊ देणे म्हणजे आर्थिक स्थिरता आणि भक्कमपणा दाखवते. पैसे मिळवण्याच्या ध्येयापायी/ गरजेपायी मूल लांबवणे हे गरीबी दाखवते .
वैयक्तिक आवडी निवडिंच्या जोडीला कौटुंबिक पार्श्वभूमी आणि जीवनशैली अशा गोष्टीही विचारात घेउनच परस्पर सामंजस्याने असे निर्णय घेतले जातात रादर घेतले गेले पाहिजेत म्हणजे तुम्ही सांगितलेले खालील तीन मुद्दे उपस्थित होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
१) आम्हा दोघांना मूल नको आहे पण दोघाचे आईवडील मागे लागले आहेत तर काय?
२)एका पालकास मूल हवंय पण दुसऱ्याला नकोय तर काय?
३)दोघांनी मूल नको होतं पण आता हवंय पण होत नाही तर काय?
DINK किंवा चाईल्डफ्री लाईफस्टाईल ही फॅशन म्हणून नाही तर अत्यंत विचरपूर्वक स्वीकारली गेली असली पाहिजे. त्यावर ठाम राहणे शक्य नसेल तर असे निर्णय घेऊच नयेत. वेळप्रसंगी अगदी गर्भपात करण्याची परिस्थिती उद्भवली तरी कटू का असेना पण तो निर्णय घेण्याची मानसिक तयारी ठेवणेही गरजेचे असते.
वर तर्कवादी साहेबांनी त्यांच्या अनुभवावर आधारित सविस्तर प्रतिसाद दिलाच आहे त्यात त्यांनी म्हटल्याप्रमाणे,
या जीवनशैलीला पुर्वी DINK असेच फक्त म्हंटले जायचे पण नंतर यात संज्ञेत दुहेरी उत्पन्नाच्या मुद्द्याला अधिक महत्व दिल्यासारखे वाटते. पण दुहेरी उत्पन्न हा तितकासा महत्वाचा मुद्दा नसून अपत्य संगोपनाची आवड नसल्याने वा इच्छा नसल्याने विनापत्य जीवनशैली अवलंबणार्या काही लोकांनी (स्वेच्छेने) विनापत्य जीवनशैली - किंवा चाईल्डफ्री लाईफस्टाईल ही संज्ञा प्रचलित केली. मलाही हीच संज्ञा जास्त आवडते.
ह्या विचाराकडे/जीवनशैलीकडे आर्थिक दृष्टिकोनातून बघणे मुळातच चुकीचे आहे, ह्यात दुहेरी उत्पन्न किंवा पैसा हा मुद्दा गौण आहे. सुरुवातीच्या काळात जेव्हा समाजात चाईल्डफ्री जीवनशैली अंगिकरलेल्या लोकांची हेटाळणी केली जायची तेव्हा बोलणाऱ्यांची तोंडे बंद करण्यासाठी बेधडक आम्ही dink आहोत असे सांगितले जायचे, हे उत्तर थोडे उद्धटपणाचे वाटले तरी त्यातून समोरच्याला न्यूनगंड येऊन विषय बंद व्हायचा. पण डिंक पेक्षा चाईल्डफ्री जीवनशैली हीच संज्ञा योग्य आहे.
असो... आम्हीही एकमताने चाईल्डफ्री जीवनशैली अंगिकारली असल्याने स्वानुभवावरून लिहिण्यासारखे बरेच काही आहे, टप्प्या टप्प्याने प्रतिसादातून लिहितो.
अंनिसतील एका मित्राचा प्रेम विवाह झाला. शिवाय तो विचारपूर्वक केलेला विवाह होता. आदर्श विवाह म्हणून मिळून सार्या जणीमधे लेख ही आला होता. मूल नको ही भूमिका होतीच. १५ वर्षांनंतर त्यांचा घटस्फोट झाला. नक्की कारण माहित नाही. नंतर त्याने तिच्याच एका बहिणीशी लग्न केले. तिला अगोदरच एक मुलगा होता. नंतर त्याने उशीरा का होईना स्वत;चे असे एक मूल होउ दिले. त्याला खरं तर मुलांची आवड होती. बुद्धीप्रामाण्य विचारश्रेणीत ती हरवली असावी.
मुद्दा असा की विचारात नंतर बदल होउ शकतो.
विचारांत बदल होऊ शकतो पण विचारपूर्वक घेतलेल्या निर्णयात बदल होऊ नये असे वाटते. 'DINK' किंवा 'चाईल्ड फ्री जीवनशैली प्रत्यक्षात अंगीकारणे' हा एकतर्फी विचार नसून उभयतांनी विचारपूर्वक आणि एकमताने घेतलेला 'निर्णय' असतो!
उगाच नाही,
"Think Thousand times before taking a decision But - After taking decison never turn back even if you get Thousand difficulties"
Adolf Hitler
असे विसाव्या शतकात एक थोर (निदान माझ्यालेखी तरी 'थोरच') पुरुष म्हणुन गेलेत. (पुढे हे Quote शब्दांची फेरफार करून मोहम्मद अली जीनांनी स्वतःच्या नावावरही खपवले तो भाग वेगळा)
थोडं अवांतर :
मुसोलिनी, हिटलर आणि स्टॅलिन ह्यांची क्रूरकर्मा अशी ओळख असली आणि आजही ती केवळ तशीच करून देण्यात येत असली तरी त्यांनी केलेले किंवा त्यांच्या संमतीने केले गेलेले अत्याचार, नरसंहार/वंशविच्छेदाचे प्रयत्न ह्या त्यांच्या कारकिर्दीतील काळ्याकुट्ट बाजू बाजूला ठेऊन, भुकेकंगाल/विपन्नावस्थेतील आपली राष्ट्रे अल्पवाधित प्रगतीपथावर आणण्याचे त्यांचे कर्तृत्व बघितले तर हे लोकं खलनायक न वाटता राष्ट्र नायक वाटतात असे माझे वैयक्तिक मत! पण ते असो...
तर सांगायचा मुद्दा हा की असे महत्वाचे निर्णय घेताना ते अतिशय विचारपूर्वक घेतले गेले नसतील किंवा त्यावर ठाम राहणे शक्य नसेल तर असे निर्णय घेऊच नयेत ह्या माझ्या ठळक अक्षरातील विधानाचा मी पुनरूच्चार करतो.
अंनिस/मानवाधिकार कार्यकर्ते अशा लोकांबद्दल बद्दल माझे मत अजिबात चांगले नाही हे आधीच स्पष्ट करतो, त्यांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे असतात असा स्वानुभव. अर्थात त्याला आपल्यासारखे काही एक ध्येय वा विचार घेऊन त्यात सहभागी झालेले सन्माननीय अपवाद आहेत हे देखील मान्यच!
तर ह्या 'तथाकथित' विचारपूर्वक केलेल्या विवाहामागचा हेतू इको सिस्टीमचा वापर करून थोडीफार प्रसिद्धी मिळवण्याचा आणि 'मूल नको ही भूमिका' पुढे रेटण्याचा असू शकतो असा संशय 'आदर्श विवाह म्हणून मिळून साऱ्या जणी*मधे लेख ही आला होता' हे वाक्य वाचल्यावर आला.
* 'मिळून साऱ्या जणी' मासिकाच्या संस्थापक संपादक कोण होत्या हे लक्षात घेतले की इको सिस्टीम समजायला अजिबात कठीण नाही 😀
अर्थात प्रसिद्धी मिळवण्याचा उद्देश (असल्यास) तो कितपत सफल झाला असेल ह्याविषयी साशंक आहे कारण 'सामना' हे शिवसेनेचे मुखपत्र, 'सनातन प्रभात' प्रमाणेच 'मिळून साऱ्या जणी' ह्या मासिकाचा वाचकवर्ग हा त्या त्या संघटना, समिती/चळवळीशी संबंधित, कार्यकर्ते आणि सहानुभूतीदार मंडळींपुरता मर्यादित आहे. पण ते पण असोच...
घटस्फोटाचे कारण पुढच्या नंतर त्याने तिच्याच एका बहिणीशी लग्न केले ह्या वाक्यातच आले आहे की 😀
एकतर हा मनुष्य त्याच्या बायकोशी कधीच एकनिष्ठ नसावा किंवा चंचल विचारांचा/भ्रमरवृत्तीचा असावा आणि मेहुणीशी सूत जमल्यावर बायकोला घटसफोट दिला असावा किंवा तिला ह्या 'लफड्या' बद्दल समजल्यावर तीने ह्याला दिला असावा असा एक अंदाज.
एकतर त्याच्या विचारांत/आपल्याआवडी-निवडिंविषयी क्लॅरिटी नसावी किंवा ज्या तथाकथित 'बुद्धीप्रामाण्य विचारश्रेणी' च्या आहारी तो गेला होता त्यातला फोलपणा लक्षात आल्यावर त्याला उपरती झाली असावी.
असो, हे झाले माझे त्या व्यक्ती आणि घटनां विषयीचे प्राथमिक अंदाज, प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी असू शकते, मानवी मनाचा आणि मनोव्यापाराचा अचूक थांग लागणे महाकाठीण!
विचारांत बदल होऊ शकतो पण विचारपूर्वक घेतलेल्या निर्णयात बदल होऊ नये असे वाटते. 'DINK' किंवा 'चाईल्ड फ्री जीवनशैली प्रत्यक्षात अंगीकारणे' हा एकतर्फी विचार नसून उभयतांनी विचारपूर्वक आणि एकमताने घेतलेला 'निर्णय' असतो!
After taking decison never turn back even if you get Thousand difficulties" सगळ्यांनीच असे असावे असे नाही.
आपल्या निर्णयात बदल करावासा वाटलं तर त्यात काय चूक आहे?
उगाच समाजाला काय वाटेल म्हणून स्वतःच्या इच्छांना मुरड घालायची काय गरज आहे.
अगदी निर्णय संपूर्ण विचारांती असला म्हणजे भोवतालची परिस्थिती बदलली तरी आपला निर्णय बदलायचाच नाही हे चूक वाटते.
तुम्ही विशीत कम्युनिस्ट असलात म्हणजे आयुष्यभर कम्युनिस्ट च राहिले पाहिजे असे आहे का?
पंचविशीत आपल्याला असे वाटत असेल कि लग्न करायची काय गरज आहे? म्हणून पन्नाशीत आपण हा निर्णय बदलूच नये असे का?
नंतर जर असे वाटले कि आपण तेंव्हा गाढव होतो म्हणून आयुष्यभर स्वतःला गाढव समजत जगात राहणे आवश्यक नाही. उलट आपण तेंव्हा गाढव होतो असे प्रांजळ पणे कबुल करून चूक सुधारून पुढे जाणे शहाणपणाचे आहे.
सहमत. माणसाच्या भावना, विचार , बदलू शकतात.
"एक बार मैने कमिट कर लिया .." अशी भूमिका घेण्याची गरज नाही.
असा काही नियम, कायदा किंवा सक्ती नाही. त्याकडे पुढे उद्भवणाऱ्या समस्या टाळण्यासाठीची पूर्वतयारी किंवा एक मार्गदर्शक तत्व म्हणुन पाहता येईल फारतर!
कुठल्याही परीक्षेला जाताना त्यात उत्तीर्ण होण्यासाठी पूर्वतयारी म्हणुन अभ्यास करून जाणे अपेक्षित असते किंवा तशी प्रथा आहे. पण तसा काही नियम, कायदा किंवा सक्ती नाही. ज्याला यश मिळवायचे असते ते बिचारे करतात अभ्यास पण एखाद्याने अर्धवट किंवा अजिबात नाही अभ्यास केला तरी फार काही बिघडत नाही. जास्तीत जास्त काय होईल? परीक्षार्थी नापास होईल अजून काय!
अभ्यास करायचा की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न. पण यश मिळवायचे असल्यास तो करणे भाग आहे.
चूक काहीच नाही, तो गुन्हा किंवा अपराधही नाही ! म्हणुन तर प्रतिसादातील पहिल्याच वाक्यात लिहिलंय "विचारांत बदल होऊ शकतो पण विचारपूर्वक घेतलेल्या निर्णयात बदल होऊ नये असे वाटते."
इथे 'होऊ नये असे वाटते' हे महत्वाचे! जर तसा काही नियम किंवा कायदा असता तर तिथे वेगळे शब्दप्रयोग/वाक्यरचना केली असती 😀
कशाला घालायची? समाजाला काय वाटेल किंवा लोक काय म्हणतील ह्याची पर्वा करायची काय गरज? काय समाजाची परवानगी घेऊन, समाजात चर्चा करून घेतला होता का हा निर्णय? उगाच काही च्या काही!
पुन्हा तेच सांगतो तसा काही नियम, कायदा किंवा सक्ती नाही
पण
त्यामुळे जर दोन्ही पार्टी त्यासाठी तयार असतील तर ती आदर्श परिस्थिती असेल, पण जर नवरा किंवा बायको पैकी एकाचा विचार बदलला आणि दुसऱ्याची त्यासाठी तयारी नसेल तर त्या परिस्थितीत काय काय समस्या उद्भवतील ह्याचा अंदाज लावता येईल का? बरं भोवतालची परिस्थिती बदलली म्हणजे नक्की काय बदल झाले असतील? अगणित शक्यता आहेत, एखादी नमुन्यादाखल दिलीत तर बरं पडेल त्या अनुषंगाने मत मांडायला!
छे छे... जर माझी राजकीय/सामाजिक विचारसरणी बदलल्याने संसारिक आयुष्यात उलथापालथ होऊन आमची 'चाईल्ड फ्री जीवनशैली' बदलावी लागणार नसेल तर कम्युनिस्टच काय मी नाझी, फॅसिस्ट असा काहीही झालो तरी काहीच फरक पडणार नाही 😀
बदलावा की, जरूर बदलावा. लग्न करण्याची कमाल वयोमर्यादा अशी काही निश्चित नाही. पन्नाशीत अगदी १८ वर्षाची वधू मिळत असेल तरी बेधडक लग्न करावे! कोणी अडवलंय?
पंचविशीत आपण तेंव्हा गाढव होतो म्हणून आयुष्यभर स्वतःला गाढव समजत जगत राहणे आवश्यक नाही. उलट आता पन्नाशीत आपण घोडा झालोय असे प्रांजळ पणे कबुल करून चूक सुधारून लग्न करणे नक्कीच शहाणपणाचे आहे.
आता हाच प्रश्न मी त्यात धागाविषयक फेरफार करून तुम्हाला विचारतो,
डिंक वर एक आक्षेप असतो तो म्हणजे तुम्हाला नुसती मज्जा करायला पाहिजे. मुलाची जबाबदारी नको.
हो, हा तर अगदी 'टॉप थ्री' मधला एक आक्षेप असतो आणि डॉक्टर कुमार१ ह्यांच्या 'थॅलसिमीया' वरील लेखावर दिलेल्या एका प्रतिसादात मी ह्याचा ओझरता उल्लेख केला होता. सदर लेखाच्या सुरुवातीला खरे साहेबांनी मिपावरील ज्या चर्चेचा उल्लेख केला आहे ती ह्याच 'थॅलसिमीया' विषयक धाग्यावर झाली होती 😀.
पण "तुम्हाला नुसती मज्जा करायला पाहिजे. मुलाची जबाबदारी नको" असा आक्षेप घरची आणि अगदी जवळची मित्र मंडळी सहसा कधी घेत नाहीत. कारण आपण कसे आहोत; काय आहोत; आपले आचार, विचार, सवयी, आवडी निवडी, एकंदरीत आपल्या जीवनशैलीची इत्यंभूत माहिती त्यांना असते.
हा आक्षेप काही नातेवाईक, शेजार-पाजारी आणि हितचिंतक म्हणवले जाणारे परिचित असे लोकं घेतात. अर्थात 'लोक काय म्हणतील' ह्याची पर्वा करणाऱ्यांना अशा गोष्टी विचलित करू शकतात आमच्या सारख्या कुमारवयातच हा दबाव झुगारून दिलेल्यांना नाही!
"तुम्हाला नुसती मज्जा करायला पाहिजे" म्हणणाऱ्यांना, हो आम्ही आहोत 'चंगळवादी' आम्हाला फक्त मौज मजाच करायला आवडते असे तोंडावर बोलले की काम होते! त्यावरही कोणी 'पण हे चांगलं नाही' वगैरे म्हणुन बौद्धिक घ्यायच्या मूड मध्ये आलाच तर "कोणी गांधीवादी असतात, कोणी समाजवादी असतात, कोणी पर्यावरणवादी असतात तर कोणी मानवतावादी असतात त्यात जर काही गैर नाही तर आमच्या 'चंगळवादी' असण्यात काय गैर आहे?" असा प्रश्न त्यांना विचारला की काहीजण गप्प होतात तर काही नाराज होऊन 'तुम्हाला काही चांगलं सांगण्यात अर्थ नाही', 'तुम्हाला जास्तच शिंग फुटली आहेत' किंवा तत्सम काहीतरी बडबडून विषय संपवतात. अशा तत्वज्ञानी लोकांच्या नाराजीने आपल्या आयुष्यात काडीमात्र फरक पडणार नसल्याने त्यांच्याकडे लक्ष देण्याची अजिबात गरज नसते 😀
मुलांची जबाबदारी नको हे खरंच आहे .. त्यामुळे मी तरी हा आक्षेप अमान्य करणार नाही... बाकी मज्जा म्हणजे काय याची काही ठोस व्याख्या नाही. "मज्जा न करता" अपत्य जन्माला घालताही येणार नाहीत :)
मज्जा नव्हे, "नुसती मज्जा"
डिंक वर एक आक्षेप असतो तो म्हणजे तुम्हाला नुसती मज्जा करायला पाहिजे
असे लोक म्हणजे एक मनोवृत्ती आहे. हि केवळ उथळ विचारसरणी आहे.
सगळेच डॉक्टर/ वकील /सी ए / सरकारी नोकर चोरच असतात असे समजणारी माणसे यांच्याहून वेगळी नाहीत.
इतरांच्या खाजगी गोष्टींमध्ये असे विनाकारण नाक खुपसायला जाणे हे सर्वसाधारणपणे भारतीय समाजाचे आणि त्यातही विशेषतः 'इतरांचे भले व्हावे या कळकळीने बोलणार्या' मोठ्या माणसांचे व्यवच्छेदक की काय म्हणतात ते लक्षण आहे. दुसरा माणूस नोकरी कुठे करणार, त्याला पगार किती असणार, लग्न कधी करणार, लग्न झाल्यावर मुले कधी होणार, मुले झाल्यावर त्याने मुलांची काळजी कशी घेतली पाहिजे, काय करायला हवे, काय करायला नको असल्या अनंत भानगडींमध्ये आपण नाक खुपसायलाच हवे असे या मोठ्या माणसांना वाटत असते. असल्या लोकांना अजिबात मुलाहिजा न बाळगता फाट्यावर मारावे.
ही काही फॅशनची गोष्ट नसते. वैयक्तिक निवड असते. प्रत्येक व्यक्ती आयुष्याबद्दल काय विचार करतो, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे यात भिन्नता असते. भिन्न विचार, भिन्न व्यक्तिमत्व यामुळे निर्णयात भिन्नता येते.
गरीब मूल लांबवतात असे काही निरीक्षण नाही.
Basic instinct फार उबळ मारते कधीकधी.
तुमचा मुद्दा नेमका समजला नाही. पण तरीही इतकं खात्रीने म्हणेन की "मला मूल नको.. किंवा मला पालक व्हायचं नाही" ही देखील अगदी Basic instinct असते काही जणांच्या बाबतीत. जसे सहज शक्य असूनही लग्नच न करणारे लोक असतात त्यांच्या बाबतीत "लग्न नको - वा कुणी जोडीदार नको आहे" ही भावना अगदी नैसर्गिकच असते तसंच काहीसं हे. निसर्गाचे काही नियम असतात हे मान्य पण निसर्गातच विचलन (व्हेरिएशन) सुद्धा बघायला मिळते ते सुद्धा तितकेच नैसर्गिक असते
मूल वेळच्या वेळी होऊ देणे म्हणजे आर्थिक स्थिरता आणि भक्कमपणा दाखवते.
खायला अन्न नाही राहायला घर नाही झोपडीत राहत आहेत. ज्याला धड बाथरूम संडास सुद्धा नाही पण २१/२२ व्या वर्षी दोन मुले आहेत अशा अनेक स्त्रिया माझ्याकडे (रुग्ण) येतात. त्यांच्याकडे कसली आहे आर्थिक स्थिरता आणि भक्कमपणा.
पैसे मिळवण्याच्या ध्येयापायी/ गरजेपायी मूल लांबवणे हे गरीबी दाखवते.
उगाच काहींच्या काही?
पूर्वी (सत्तरच्या दशकाच्या अगोदर) मध्यमवर्गातील माणूस कष्ट करत वर येत असे. बापाला पाच सहा मुले एकाच्या उत्पन्नात काहीही भागत नसे. मग मुलगा जेमतेम पदवीधर झाला कि मिळेल त्या नोकरीत चिकटत असे. नोकरी सुरु झाली कि वर्ष दोन वर्षात लग्न आणि लगेच मुलं.
गिरगावातील अन गिरणगावातील अशा असंख्य चाळी अशा खुरटलेल्या कनिष्ठ आणि मध्य मध्यमवर्गीय मराठी माणसांनी भरलेल्या असत. दीड खोलीच्या चाळीच्या घरात आई बाप आणि त्यांचे दोन मुलगे आणि दोन सुना आणि दोन तीन पोरं असत. नवरा बायको ला एकांत (privacy) सोडून द्या. सेक्स सुद्धा कशीतरी घाईघाईने आटपून घ्यायची गोष्ट असे. पंचविशीचा मुलगा आणि पन्नाशीचा बाप दोघांची सेक्स बद्दल कुचंबणा चालूच असे.
अशा परिस्थितीतून ज्यांनी आपली स्थिती थोडी सुधारली त्यांनी पार्ले गोरेगाव बोरिवली मुलुंड ठाणे येथे एक बेडरूमचे फ्लॅट घेतले. ज्यांची तेवढीही परिस्थिती नव्हती त्यांनी कल्याण डोंबिवली बदलापूर कडे फ्लॅट घेतले.
ज्यांना तेही परवडत नव्हते ती एका खोलीत दोन तीन जोडपी अजूनही लालबाग परळ मध्ये तशीच कुचंबणा सहन करत राहत आहेत
या सर्वाना पंचविशी तिशीतच मुले झाली.
यांची श्रीमंती कुठे वाया चालली आहे?
आहेच. ज्या गोष्टींचा अधुनमधून स्वतःला किंवा अगदी जवळच्यांना विचार पडतो ते सर्व प्रश्नच असतात.
र धों कर्वे हे विसाव्या शतकाच्या सुरुवातीस जगाच्या निदान १०० वर्षे पुढे होते. त्यांनी स्त्रियांना स्वतःला कामसुखाचा अधिकार आहे ह्या बद्दल तेंव्हा काम केलेले आहे. त्याकाळात स्त्री हि क्षणाची पत्नी आणि अनंत कालची माता आहे या विचारसरणी च्या पगड्याखाली समाज होता ( हे खरं तर आचार्या अत्रे यांच्या नाटकातील वाक्य आहे).
त्यांनी लोकसंख्या नियंत्रण आणि संतती नियमनाचे महत्व "तेंव्हा" सांगायला सुरुवात केली होती जेंव्हा मुलं हि देवाघरची वरदान समजले जात होते. ज्या काळात स्त्रियांना अर्थार्जनाचे कोणतेही साधन उपलब्ध नव्हते तेंव्हा स्त्रीच्या कामसुखाच्या अधिकारांची मागणी करणे हे अब्रम्हण्यम होते.
असो.
अशी विनापत्य जोडपी अनेक आहेत परंतु त्यांनी जाणीव पूर्वक मूल नको असा निर्णय घेतला होता का हे माहिती नाही.
उदा. श्री पु ल देशपांडे हे विनापत्य होते. परंतु त्यांच्या पत्नीला एक गर्भपात झाला आणि नंतर मूल झाले नाही असे सुनीताबाई यांच्या आत्म चरित्रात आहे. अशी माहिती पुढे येणे सर्वांच्या बाबतीत कठीण आहे.
मी सुरुवातीलाच लिहिले आहे कि मूल होत नसेल तर मला मूल नकोच असे म्हणणे सोयीस्कर असते. त्यात मानसशास्त्रीय दृष्ट्या चूक आहे असेही नाही.
पण येथे चर्चा जाणीवपूर्वक मूल नको याची आहे
वैयक्तिक मत - हे डिंन्क वगैरे मला वैयक्तिकदृष्ट्या अजिबात पटत नाही.
पोरं पाहिजेत राव . पोरं जितक्या निष्पापपणे निरपेक्षपणे प्रेम करतात तितके प्रेम तर मला आई वडीलांनीही केले नाही असे वाटते. आज्जी आजोबांनीही अगदी जीवापाड प्रेम केले पण तरीही पोरं जे प्रेम करतात त्याची सर नाही .
पोरं म्हणजे अॅब्सोल्युट ब्लिस चा सोर्स असतात. आणि आमच्या सुदैवाने (किंव्वा तरुणवयातील योग्य चॉईसमुळे म्हणा ), सौं.चे ह्यावर एकमत आहे त्यामुळे त्यांनी करीयर फाट्यावर मारुन पुर्णवेळ मुलांची जबाबदारी स्विकारली आहे . अगदी स्वेछेने अन आनंदाने !!
त्यामुळे आमच्या कडे SIDK सिंगल इन्कम डबल किड्स असा पॅटर्न आहे :)
मला अजुनही वाटते की अजुन दोन मुले असायला हवीत , पण त्याला मात्र कडाडुन विरोध आहे . मी म्हणलं टेंशन घेऊ नका , मी "आऊटसोर्स" करतो , तर "तू करुन दाखवच " असे चॅलेंज कम धमकी मिळाली आहे, त्यामुळे तुर्तास तरी दहशतीखाली जगत आहे. =))))
पण ठीक आहे नंतर बघु , पुरुषांना एक्स्पायरी डेट नसते ;)
बाकी डिंक विषयी माझ्यामनात अढी नाही. ज्याच्या त्याचा वैयक्तिक चॉईस आहे.
तुला(/तुम्हाला) बाळंतपणाचा त्रास होउ नये म्हणुन मी असे केले असे तुम्ही कारण द्यायला हवे होते. तुम्ही आधीच सगळे पत्ते दाखवल्यावर आता काय होणार!!
'कावळ्याच्या घरट्यात कोकिळेची अंडी' हा निसर्गनियम आहे, फक्त मनुष्यप्राण्यांनी असे केल्यास त्याची वाच्यता करायची नसते, नाहीतर अनर्थ ओढवतो 😀
कावळे (की कावळीण) बिचारे आपलीच समजून उबवतात... चालायचंच 😜
बाकीच्या प्रतिसादातले तुमचे मत 'वैयक्तिक मत' असल्याने 'नो कॉमेंट्स' 🤫
मला अजुनही वाटते की अजुन दोन मुले असायला हवीत ,
अगदी!पण हा प्रकार नका सुचवू ओ (हे हे)
मला तर डिंक म्हणजे केवळ प्रेमाच्या डिंकाने चिकटलेल्या या जोडप्यांचे कौतुकच वाटतयं :)दोन मुलं असताना घटस्फोट घेणार्या लोकांना यांचा आदर्श दाखवावा.
धन्यवाद भक्ती जी
खरंतर मुल नसल्याने नवरा बायकोत (तसेच सासू-सासरे -मुलगा -सुन यांच्यातही ) मतभेदाचे अनेक मुद्देही वजा होतात. मुल वाढवताना घरात अनेक मुद्द्यांवर अनेकदा कलह होतो.
मूल असताना पती-पत्नी मुलांची काळजी घेताना जोडीदाराकडे काहीवेळा दुर्लक्षही करतात. घरात जेवण बनते ते जास्तकरुन मुलांच्या आवडीचे. त्याउलट मूल नसले की पती-पत्नी एकमेकांची जास्त काळजी घेतात, एकमेकांच्या आवडी-निवडीकडे लक्ष देतात.
मला अजुनही वाटते की अजुन दोन मुले असायला हवीत ,
अगदी!पण हा प्रकार नका सुचवू ओ (हे हे)
मला तर डिंक म्हणजे केवळ प्रेमाच्या डिंकाने चिकटलेल्या या जोडप्यांचे कौतुकच वाटतयं :)दोन मुलं असताना घटस्फोट घेणार्या लोकांना यांचा आदर्श दाखवावा.
वाचनीय धागा आणि चर्चा.
मला आठवतंय "अपत्य नको" अशी संस्था आहे आणि पुण्यात त्याची शाखा आहे. वेब साईट पण आहे. (नाव आठवत नाहीय) ठराविक काळाने एकत्र भेटून एकमेकांना सपोर्ट करतात, "मुल नको" मोहिमेचा चा प्रचार करतात.
🤦♂️
ह्या साठी संस्था? पुणे तिथे काय उणे 😀
इंटरेस्टिंग! नक्की कसला (डोंबलाचा) सपोर्ट करतात हे जाणून घ्यायची उत्सुकता निर्माण झाली आहे 😀
भयंकर प्रकार आहे मग हा! हे म्हणजे 'आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना' सारखा प्रकार झाला. मूल नको हा अत्यंत खाजगी/वैयक्तिक निर्णय असतो, त्याची मोहीम राबवतात हे लोकं? आणि असला प्रचार ही समाज विघातक कृती म्हणता येऊ शकेल.
वरती तर्कवादिंनी कुठल्या तरी फेसबुक ग्रुपचा उल्लेख करून ते त्याचे सभासद असल्याचे म्हंटले आहे ते वाचून मला थोडं विचित्र वाटलं होतं, पण असल्या संस्थेबद्दल वाचल्यावर तर फारच विचित्र वाटलं!
टर्मीनेटरजी
सहमत !! अशा कोणत्याही विचारांचा प्रचार करणे योग्य नाही. पण प्रचार म्हणजे "आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना" असा अर्थ नसेलही कदाचित.
आता आपण या विषयावर व्यक्त होत आहोत. पण हे व्यक्त होणे म्हणजे प्रचार किंवा "या आमच्या कंपुत" अशी जाहिरातबाजी नाहीये तर लोकांना कळावे की हा ही विचार असतो हे ,ही पण एक जीवनशैली असू शकते .ह्याची जाणीव (अवेअरनेस) इतकाच उद्देश आहे. लोकांना हे कळणे तरी का महत्वाचे आहे ह्याबद्दल मी याच प्रतिसादात नंतर लिहितो.
हो .. सपोर्ट काही वेळा गरजेचा असतो. तुम्हाला , मला कदाचित हा निर्णय घेवून तो अंमलात आणणे , त्यावर ठाम राहणे फारसे कठीण गेले नसेल पण इतरांना ते तितकेच सोपे असेल असे नाही. कुटूंबाचा , समाजाचा दबाव सतत विचारले जाणारे प्रश्न यांना तोंद द्यावे लागत असल्यास समविचारी लोकांचा मानसिक / भावनिक आधार मदतीचा ठरतो..
मनात एखादा विचार असणे (या ठिकाणी 'मूल नको' हा विचार) आणि त्या विचाराचे निर्णयात रुपांतर होणे हा एक प्रवास आहे. सगळ्यांसाठीच तो सारखाच सोपा नसतो. त्यामुळे काहीजण विचार एक ,निर्णय दूसरा, कृती तिसरीच असं काहीतरी आयुष्य जगतात काही जण विचार करतात पण ते फर्स्ट मूव्हर प्रकारातले नसतात. कुणीतरी तो मार्ग चोखाळलाय असे दिसले की त्याचे अनुकरण करणे करण्याची हिंमत येते. आजही अनेकांना असा काही निर्णय मुद्दामपणे घेतला जावू शकतो हेच माहित नसेल त्यामुळे मनात विचार आला तरी तो कृतीत उतरविण्याची हिंमत होत नाही. त्यामुळे अतुल कुलकर्णींसारख्या प्रसिद्ध व्यक्तिंनी केलेला प्रचार , फेसबूक वरचे ग्रुप, इतर संस्था, मिसळपाववरचा धागा यांमुळे आलेला अवेअरनेस निर्णय घेण्यास साहायक ठरेल. तसेच समजा हा धागा वाचणार्या कुणीही व्यक्ती (आपल्या दोघांशिवाय) असा निर्णय घेणार नाहीत ..बहुतेकांना आधीच अपत्ये असतीलही. मग त्यांनी हा धागा वाचून काय उपयोग ? आणि आपल्या दोघांना या धाग्याची काय गरज असा प्रश्न पडू शकतो. तर त्याचे उत्तर मी असे देईन की इथल्या अनेक मिपाकर वाचकांना मुले असतील. उद्द्या कदाचित त्यांच्यापैकी कुणाच्या मुलांनी वा इतर जवळचे नातेवाईकांनी असा निर्णय घेतला तर त्यांना धक्का बसणार नाही. आपल्या मुलांना ते अधिक चांगल्या प्रकारे समजून घेवू शकतील. यासाठी हा अवेअरनेस मला महत्वाचा वाटतो. म्हणून मला कुणीही मुलांबद्दल प्रश्न विचारला तर मी थेट आणि स्पष्ट उत्तर देतो. समोरचा व्यक्ती माझ्याबद्दल काय विचार करेल मला स्वार्थी वगैरे असण्याचे लेबल लावेल काय असा विचार करत नाही ( अर्थात अशा समजण्याने मला फरकही पडत नाही म्हणा !!)
करिअर मध्ये अडथळा येऊ नये यासाठी अपत्यच नको हा एक विचार झाला. माझ्या एका ओळखीच्या मुलीने लग्नानंतर काही वर्षांनंतर अपत्य झाल्यास करिअरमध्ये अडथळा येऊ शकतो या विचाराने लग्नानंतर लगेच अपत्य होऊ देण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतर १० व्या महिन्यातच तिला अपत्य झाले. नंतर दुसरी संधी न घेता तिने व्यावसायिक जीवनावर लक्ष केंद्रित केले. अनेक वर्षांपासून ती आपल्या कुटुंबासहीत अमेरिकेत स्थायिक झाली असून खूप मोठ्या पोस्टवर आहे. एकंदरीत तिचा निर्णय योग्य ठरला.
मला वाटते करिअर मध्ये अडथळा हे एखादे कारण असू शकते. पण ते तितकेच कारण नसते. किंवा तेच कारण आहे असे नसते. हे इतरांना वाटणारे थोडेसे एकांगी मत आहे.
आणि "करिअर मध्ये अडथळा" जरी म्हंटले तरी ती मानसिकता बहूधा फक्त स्त्रीची (करिअर करणार्या) असायला हवी, पण पुरुषांची अशी मानसिकता का असू शकते ? हे सगळं फार वेगळं आहे. जरी इतरांना दुरुन तसं वाटत असेल तरी फक्त करिअर, दुहेरी उत्पन्न यापुरतं हे सीमित नाहीये.
माझ्याबद्दल म्हणेन की मी करिअर मध्ये खूप काही तरी भव्य दिव्य केलंय असं नाही. एखादा छंद खूप मेहनतीने जोपासलाय असंही नाही, ना मी "पार्टी अॅनिमल" आहे, ना खूप जास्त भटकंती करतो.. खरं तर काहीच खूप करत नाही. पण उद्द्या माझ्या खात्यात शंभर कोटी रुपये येवून पडलेत तरी माझा याबाबतचा निर्णय बदलणार नाही. मला वीस-पंचवीस वर्षे त्या एका बंधनात स्वतःला बांधून घ्यायचं नाहीये.
माझे एक काका आयुष्याच्या एका टप्प्यावर अचानकपणे संसाराच्या सर्व जबाबदार्या त्यागून ,घर सोडून गेलेत.मध्यम/कनिष्ठ मध्यमवर्गात मोडणार्या त्या कुटुंबात त्यांची अर्धशिक्षित पत्नी व तीन मुले होती. सर्वात मोठी मुलगी -म्हणजे माझी चुलत बहीण त्यावेळी फक्त चौदा वर्षाची होती.
काकांनी असा निर्णय का घेतला ते मला माहित नाही. पण बहुतेक त्या टप्प्यावर त्यांना नात्यांचे बंध नकोसे वाटले असावेत. जर संसाराच्या बंधनात कायम बांधलेले राहू शकतो याची स्वतःबद्दल खात्री देता येत नसेल तर अशी नवनवीन बंधने निर्माण न करणेच ईष्ट.
संसारातील भवतापाने आपल्यात नंतर विरक्ती निर्माण होईल हे भाकित अगोदर कसे सांगता येईल? रामदासस्वामींची गोष्ट वेगळी होती.त्यांना बळ बळ बोहल्यावर चढवले होते. अध्यात्मिक प्रेरणे ने तुमच्या काकांनी संसारत्याग केला की अन्य कारणाने केला हे जाणून घेणे महत्वाचे ठरते.आयुष्याच्या उत्तरार्धात स्वतःच्या नव्याने शोध घेण्यासाठी देखील घटस्फोट कमी संख्येने का होईना पण होतात असे जेष्ठांचे लिव्ह इन या लोकसत्तेच्या सदरात वाचले आहे.
खरंय नाही करता येणार बहूधा ..पण तरीही "मला प्रदीर्घकाळ अडकवणारी बंधने नकोयत" याचा थोडा जरी अंदाज आला तर त्या वाटेने न जाणेच ईष्ट नाही का ?
आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर घटस्फोट होतात हे मान्यच पण प्रोढ -परिपक्व जोडीदार स्वतःची व्यवस्था लावण्यास समर्थ असू शकतो, कायद्यानेही काही तरतूदी आहेतच (पोटगी वगैरे) पण मुलांचे काय ? मुले अर्थिक व इतरही दृष्टीने आपल्या पालकांवर अवलंबून असतात.
अध्यात्मिक प्रेरणा तर नव्हती पण कोण प्रेरणा वा कूठली प्रेरणा होती ते माहित नाही :) पण अर्थात कारण काही असो पुढे तीन मुलांची काय परवड झाली असेल याची कल्पना केली जावू शकते.
विमा कंपन्यांनी अशा विरक्तीचा विमा पण उतरवायला हवा निदान कुटुंबावी परवड होणार नाही !!
अतुल कुलकर्णी यांनी जाणीवपुर्वक मूल होउ दिल नाही. ज्या जगात मी त्याला सोडणार आहे ते जग जगण्याच्या लायकीच नसेल तर मग मी कशाला त्याला जन्माला घालू? हा विचार त्यांनी एका पर्यावरणाच्या पुस्तक प्रकाशनात बोलून दाखवला.
नमस्कार काका, कसे आहात?
---------
बाकी हे जग जगण्याचे लायकीचे कधी होते ?
ओह.. असे आहे तर..
असो, जास्त बोलत नाही नाहीतर धाग्याचा चद्दा, आपलं काशमीर होईल..
इंटरेस्टिंग! हे जग त्याला जगायच्या लायकीचे नाही, हे ह्यांनीच ठरवले!
ज्या जगात मी त्याला सोडणार आहे ते जग जगण्याच्या लायकीच नसेल तर मग मी कशाला त्याला जन्माला घालू?
हा थोडा अतिरेकी विचार वाटतो. अतुल कुळकर्णी एक प्रथितयश कलाकार आहेत. मी स्वता त्यांचा पंखा आहे.
त्यांना या जगाने एवढे प्रेम,यश,धन,दौलत दिली त्या जगाला ते असे कसे काय म्हणू शकतात. या जगात मानाने जगता येण्यासाठी त्यांच्या आईवडिलांनी, गुरुजनांनी किती कष्ट घेतले असतील. आज ते या जगात नसते.जर त्यांच्या आईवडिलांनी असाच काहीसा विचार केला असता तर?
जग जसे आहे तसेच राहणार. आपल्याला आपले जग सुंदर बनवायचे आहे.
मुल नको हा वैयक्तिक विचार आहे,त्यावर ठाम रहाणे फार कठीण.
मुल असणे म्हणजे जबाबदारी अगदी असेच काही नाही,मुल नसेल तर मी करियर,करू शकते शकतो,छंद जोपासू शकतो हे ऐकावयास खुप चांगले वाटते पण खरेच तसे असेलही पण किती जणांसाठी.
सौ बात की एक बात कही हैं आपने कर्नल साहब 👍
+१
अतुल कुलकर्णी आणि प्रकाश राज हे उत्तम अभिनेते आहेत तर अनुराग कश्यप हा दर्जेदार 'वास्तववादी' सिनेमे आणि वेब सिरीज पेश करणारा उत्तम दिग्दर्शक आहे असे माझे मत आहे आणि त्यांच्या ह्या कलागुणांचा मी पण पंखा आहे!
पण हीच मंडळी आपले बलस्थान असलेले कलाक्षेत्र सोडून इतरत्र लुडबुड/वादग्रस्त वक्तव्ये करताना पाहिली की त्यांची खरोखर कीव येते.
त्यामागे त्यांचा प्रसिद्धीच्या झोतात किंवा चर्चेत रहण्याचा उद्देश असुदे की समाजाप्रती आपली पोकळ बांधिलकी दाखवण्याचा उद्देश असुदे किंवा कुठला राजकीय अजेंडा राबवण्याचा वा नॅरेटिव्ह सेट करण्याचा हेतू असुदे त्याचे त्यांच्याच करिअरवर होणारे दुष्परिणाम समोर येऊ लागलेत.
मोदींवर टीका केल्यामुळे मला हिंदी सिनेमांत कामे मिळणे बंद झाल्याचे रडगाणे प्रकाश राजने मागे गाऊन झाले आहे.
नुकताच 'बॉयकॉट' ट्रेंड मुळे डब्यात गेलेल्या वादग्रस्त 'लाल सिंग चढ्ढा' ह्या चित्रपटाचे लेखक ह्या नात्याने जाणते-अजाणतेपणी अतुल कुळकर्णीही टिकेचे धनी होताना दिसत आहेत. (मी हा चित्रपट पाहिलेला नसूनही मला ह्यात त्यांचा काही दोष असेल असे आत्तापर्यंत वाटत नव्हते पण वर प्रकाश घाटपांडे साहेबांनी दिलेल्या व्हिडीओचे' ग्रेटाची हाक' हे शिर्षक वाचल्यावर मात्र काही डॉट्स जोडले जाऊन मनात शंकेची पाल चुकचूकली आहे)
आणि परवाच (१९ ऑगस्ट२०२२) प्रदर्शित झालेल्या 'दोबारा' ह्या अनुराग कश्यप दिग्दर्शीत आणि तापसी पन्नूची मुख्य भूमिका असलेल्या चित्रपटाचे पहिल्याच दिवशी २०० पेक्षा अधिक चित्रपटगृहात पहिल्याच खेळा नंतर पुढचे खेळ रद्द होण्याची नामुष्की ओढवल्याची बातमी काल वाचनात आली, तर आत्ताच थोड्यावेळापूर्वी आता 'गँग्स ऑफ वासेपूर ३' काढावा की नाही अशा विचारात पडल्याची प्रतिक्रिया अनुराग कश्यपने काल एका मुलाखतीत दिल्याची बातमी वाचली.
वर चर्चेत २ - ३ ठिकाणी लेखनविषयाशी संबंधित मुद्द्यावर अतुल कुलकरणींचे नाव आल्याने त्या मुद्द्यावर बोलणारच होतो पण तिकडेवळण्यापूर्वी ह्या प्रतिसादात बरेच विषयांतर झाले आहे (त्यात धागा भरकटवण्याचा बिलकुल उद्देश नव्हता) त्याबद्दल आधी मी धागाकर्ते खरे साहेबांची क्षमा मागतो.
तर मूळ सांगायचा मुद्दा हा होता की अतुल कुलकर्णी हे एक सेलिब्रेटी आहेत. त्यांचे आयुष्य आपल्या सर्वसामान्यांपेक्षा खूप वेगळे आहे. त्यांनी पुढे केलेल्या पर्यावरण वगैरेच्या मुद्द्यावरून/कारणामुळे विनापत्य राहणे हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे आणि असल्या भंपक मुद्द्याला किंवा 'ज्या जगात मी त्याला सोडणार आहे ते जग जगण्याच्या लायकीच नसेल तर मग मी कशाला त्याला जन्माला घालू?' अशा तुमच्यालेखी (मलाही तसेच वाटते) थोडा अतिरेकी वाटणाऱ्या विचाराने भारावून जाऊन किंवा प्रभावित होऊन जर कोणी त्यांचे अंधानुकरण करणार असेल तर देव त्याचे रक्षण करो.
मुळात 'मुल जन्माला न घालणं' हा अन्य कोणाचेही अनुकरण / अंधानुकरण करून वा कुठल्याही प्रकारच्या प्रचाराला बळी पडून घ्यायचा निर्णय किंवा फॅशन खचितच नाही. हा नवरा-बायकोचा अत्यंत खाजगी आणि फारतर आपल्या आप्तेष्टांशी चर्चा/विनिमय करून, आवश्यकता भासल्यास त्यांचे मन वळवून घ्यायचा निर्णय आहे आणि त्यात फक्त आणि फक्त त्या कुटुंबातील मर्यादित सदस्य वगळता अन्य कोणाला हस्तक्षेप/ढवळढवळ करण्याचा अधिकार नाही किंबहुना असा अधिकार अन्य कोणाला देऊही नये.
असो...
शेवटी तुम्ही म्हणाल्या प्रमाणे,
हमारे और आपके रास्ते भलेही अलग अलग क्यू न हो, मंझिल तो एक ही हैं!
किमान अतुल कुलकर्णी यांचा मूल नको हा विचार जाणीवपुर्वक आहे हे तर मान्य कराल. जग पर्यावरणीय विनाशाकडे चालले आहे असे अधोरेखित करणार्या ग्रेटाची हाक या अतुल देउळगांवकर यांच्या पुस्तकाच्या प्रकाशना निमित्त त्यांनी तशा आशयाचे विचार व्यक्त केले.अन्यही काही कारणॅ असतील. जसे की देशाची एवढी लोकसंख्या अलरेडी आहे त्यात अजून भर कशाला? वगैरे.
कलाकाराचे बलस्थान कला असले तरी देशाचा संवेदनशील नागरिक आहे. मतदार आहे म्हणून त्याला आपल्या क्षेत्राव्यतिरिक्त राजकारण,समाजकारण,अर्थकारण, साहित्य ... ई. यावर मत व्यक्त करण्याचे अभिव्यक्ति स्वातंत्र्य आहेच. त्यामुळे त्यांची काही लाभ/ हानी होत असतेच. इतरांचीही होत असते.
कुटुंबातील मर्यादित सदस्य वगळता अन्य कोणाला हस्तक्षेप/ढवळढवळ करण्याचा अधिकार नाही किंबहुना असा अधिकार अन्य कोणाला देऊही नये.
+१००१,सहमत
आमची अवस्था तुकारामांच्या अभंग सारखी
"बरे झाले देवा निघाले दिवाळे । बरी या दुष्काळे पीडा केली ।।"
लवकर मेला बाप
म्हणून दृष्टी झाली साफ
कोण सुखाचे कोण फुकाचे
कळले सारे अर्थ नात्याचे
ना लोटा ना थाली
सारेच कमंडल खाली
नाही कुणाची साथ
आपणच आपला जगन्नाथ
त्यामुळेच मनातल्या जगाला वास्तवात आणण्याचा प्रयत्न केला.
आम्हाला दोन मुली,तीसरा चान्स घ्या मुलगा होऊ द्या पण एक मताने ठाम नकार होता.
स्त्रीरोगतज्ज्ञ जवळचा मित्र, तीनदा विचारले. निर्णय बदलला नाही. घरचे नाराज झाले पण आज मुलींची प्रगती पाहून जेलस.
सेलिब्रेटीनी नकारात्मक संदेश देऊ नये असे माझे मत आहे. आणी त्यांचे मत ब्रह्मवाक्य आहे असेही मानत नाही.
बाकी आपल्या व सौंच्या निर्णयाचा आदर व्यक्त करतो.
अतुल कुलकर्णींचे विचार अतिरेकी वाटणे वा त्याबद्दल आश्चर्य वाटणे साहजिक आहे. पण अतुल कुलकर्णीं वा तत्सम लोकांचे वाचन , त्यातून विकसित झालेल्या जाणिवा, विचारांचा विस्तारलेला परीघ यामुळे त्यांचा दृष्टीकोन वेगळा असू शकतो.
हे वाचा :
संपुर्ण लेख
@तर्कवादी
अतुल कुलकर्णीं वा तत्सम लोकांचे वाचन , त्यातून विकसित झालेल्या जाणिवा, विचारांचा विस्तारलेला परीघ यामुळे त्यांचा दृष्टीकोन वेगळा असू शकतो.
असेलही,म्हणूनच त्याच्यावर जास्त जबाबदारी. जग जगण्या लायक नाही म्हणण्या पेक्षा जग जगण्या लायक बनवू या म्हणले असते तर जास्त आवडले असते.
मुळात मुल हवे नको हा वैयक्तिक विचार आहे. अतुल कुळकर्णी वा इतर मान्यवरांनी इतरांना आपले मत सांगू नये आणी सांगीतले तरी फारसा फरक पडेल असे वाटत नाही.
त्यांचा मुद्दा पर्यावरणीय जगाशी होता. मी त्यांच्या मतांचा आशय मांडला आहे. संपूर्ण भाषणाची लिंक दिली आहेच
कर्नलतपस्वीजी,
बरोबर आहे. पण त्यांच्या मते आणि इतर अनेक पर्यावरण तज्ञांच्या मतेही खूप जास्त वाढलेल्या लोकसंख्ये मुळे जग जगण्या लायक नाही. मग ते लायक बनवण्याकरिता लोकसंख्या कमी करणे हाच मार्ग आहे... तोच त्यांनी सुचवला.
मुल हवे की नको हा वैयक्तिक विचार व निर्णय आहे हे मान्य आणि कुणीच कुणाला याबाबत आग्रह जबरदस्ती करु शकणार नाही. पण हा निर्णय घेताना आजूबाजूच्या परिस्थितीचे ज्ञान / आकलन झाले तर अधिकच बरे. अतुल कुलकर्णींसारखे लोक तोच प्रयत्न करत आहेत. अर्थात त्यांचे विचार बरेच टोकाचे आहेत. लोकसंख्या कमी होणे गरजेचे आहे पण ती वेगाने कमी होणेही घातक ठरेल. त्याचे वेगळे दुष्परिणाम असतील. म्हणून लोकसंख्या हळूहळू कमी व्हावी लागेल.
पण अतुल कुलकर्णीं म्हणालेत म्हणून लगेच काही अनेक लोक त्यांचं ऐकणार आहेत असं नाहीये. पण ज्यांच्या मनात "मूल नको" असा विचार आधीपासूनच होता, किंवा "आपल्याला मूल हवेच" अशी ज्यांना ओढ नाहीये तेच कदाचित "मूल नको" असा निर्णय घेवू शकतील.
मनात एखादा विचार असणे आणि त्या विचाराचे निर्णयात रुपांतर होणे हा एक प्रवास आहे. सगळ्यांसाठीच तो सारखाच सोपा नसतो. त्यामुळे काहीजण विचार एक ,निर्णय दूसरा, कृती तिसरीच असं काहीतरी आयुष्य जगतात. प्रसिद्ध / मान्यवर लोकांच्या प्रकटनामुळे काही वेळा मनोबल वाढण्यास मदत होते आणि आपल्या विचारांनुसार निर्णय घेणे, त्यावर ठाम रहाणे हे काहीसे सोपे होते. तशीच मदत इतर समूह, आधारगट (फेसबूक वरील ग्रुप) यांपासूनही होवू शकते.
मूल हवे की नको हा जसा वैयक्तिक निर्णय तसाच "किती मूल हवेत ?" हा पण वैयक्तिक म्हणता येईल.. पण तसे नाहीये तो सार्वजनिक हित लक्षात घेवून घ्यावा लागतो. त्यामुळेच अनेक लोकांनी सरकारच्या "एक किंवा दोन बस" या आवाहनाला प्रतिसाद दिला. पण जर ६०-७० वर्षापुर्वीच "चार किंवा पाच बस" असे आवाहन जर सरकारने केले असते तर आज परिस्थिती अधिक सुखकारक असती .
जास्त वाढलेल्या लोकसंख्ये मुळे जग जगण्या लायक नाही. मग ते लायक बनवण्याकरिता लोकसंख्या कमी करणे हाच मार्ग आहे
याच व्यत्यास सुद्धा तितकाच सत्य आहे.
म्हणजे जग जगण्या लायक असलं (समृद्ध) तर लोकसंख्या आपोआप कमी होईल.
affluence is best contraception
संपन्नता हे सर्वात चांगले संतती नियमनाचे साधन आहे अशी म्हण आहे.
हे जीवशास्त्रीय सत्य आहे. जेंव्हा प्रथिनांची कमतरता निर्माण होते तेंव्हा जीवांची कामेच्छा जास्त होते. ज्या प्राण्यात अपत्यांच्या जीवित राहण्याची शक्यता कमी असते तिथे संतती मोठ्या प्रमाणावर जन्माला घातली जाते. खालच्या वर्गातील प्राणी जास्तीत जास्त पिल्लाना जन्म देतात.
हीच स्थिती मानवी इतिहासात आहे. सर्वात गरीब देशांची लोकसंख्या सर्वात जास्त असते आणि जेथे संतती ची जगण्याची शक्यता जास्त आणि उत्तम पालन पोषणाची सो रस्ते तेथे संतती कमी प्रमाणात निर्माण होते.
तेंव्हा आर्थिक सुबत्ता हा लोकसंख्या कमी करण्याचा खात्रीचा उपाय आहे.
विषय गंभीर आणि चर्चा संतुलित. दुर्लभ योग :-)
अपत्य / लग्न हवे - नको असणे हे फार पर्सनल निर्णय असतात. पण त्यामागच्या प्रेरणा काय असतात हे समजायला वरील चर्चेमुळे मदत झाली.
+११
दोन्हीकडून मांडलेले मुद्दे तर्कशुद्ध आणी ठोस आहेत. चाईल्ड फ्री हा विचार मर्यादित व ठाम असावा. अर्थात काल,समयच ठरवेल याचे भवितव्य. लिव्हिंग इन सुद्धा परस्परांच्या समंतीने घेतलेला निर्णय असतो.
केवळ मूल झाल्याने मुलासाठी जगू या साठी नवरा बायकोंनी परस्परांशी तडजोड करुन आख्ख आयुष्य व्यतित केल्याने अनेक घटस्फोट टळले असतील. याच्या नोंदी होउ शकत नाहीत. मूल होउन देखील अनेक घटस्फोट होतात ही गोष्ट वेगळी. त्याच्या नोंदी होतात.
मुलं आई वडील याच्यां मधील काॅमन धागा असल्यामुळेच कितीक घटस्फोट वाचले याची उदाहरणे जवळपास आढळतात.
चांगला मुद्दा.
मस्त चाललीय चर्चा !
१. पहिल्यांदाच आई / बाप बनल्यावर, अपत्याला पहिल्यांदाच हातावर उचलून घेताना होणारा आनंद, डोळ्यातून घळाघळ वाहणारे अश्रु .
२. बाळ पहिल्यांदाच उभे राहते, पहिले पाऊल टाकते, पहिला शब्द उच्चारते, दिवसभर कितीही थकून येवो, घरात शिरल्यावर बाळाकडे पाहिल्यावर थकवा कुठल्याकुठे पळून जातो.
३. मुल शाळेत जाते तो पहिला दिवस घर खायला उठते तो अनुभव. मुल शाळेतून घरी आल्यावर त्याच्या डोळ्यात वेगळे जग पाहिल्याचा आनंद !
४. मुलांची लग्ने झाल्यावर मुलेचे/ सुनेचे दोष आणि जावयाचे / मुलीचे गुणगाण यासारखे रम्य वेळ घालविण्याचे साधन हाती लागते.
५. आयुष्यात जेवढे जास्त दु:ख तेव्हढे परमेश्वर स्मरणाकडे जास्त लक्ष. द्रौपदीने कृष्णाकडे मागीतलेला वर आठवा.
या अणि अशाच काही अनुभवांचा अभाव !
१. स्वत:चे अपत्य नसल्यामुळे तेच प्रेम भाचे, पुतणे आणि इतरांवर करता येते.
२.बायकोचे बाळंतपण नीट निभावून नेले जाईल ना ? बाळ आणि बाळंतीण सुखरुप राहिल ना ही काळजी करण्यापासून पुरुषांची मुक्तता तर बाळांतपणानंतर शरीराचा सुडौलपणा गमावण्यापासून मुक्तता .
३. बाळ आजारी पडल्यावर तुम्ही अगदी स्वत: डॉक्टर असा पण बाळाचे रडणे, त्याचे दु:ख पाहून जीव कळवळणे, अनामिक काळजी वाटणे यापासून सुटका.
४. मुलांच्या जन्माचा खर्च वाचतो. (कमीतकमी २५ हजार ते जास्तीत जास्त कितीही)......
५. मुलांचे संगोपन (शाळेचा खर्च, कॉलेजचा खर्च) - बचत सध्याच्या हिशोबाने कमीतकमी ५ लाख ते जास्तीत जास्त कितीही....
६. मुलांचे शाळेच्या वेळापत्रकाप्रमाणे आपले वेळापत्रक बनविणे.
७. मुले कॉलेजला गेल्यावर वाईट संगतीला लागतील काय ? आजकाल काय काय बातम्या ऐकायला येतात. काळजीपासून मुक्तता.
८. मुलांचे लग्न झाल्यावर ते आईबापांना वार्यावर सोडून फक्त त्यांच्याच संसारात रमतात आईबाबांची हेळसांड करतात त्यापासून मुक्तता.
९. आयुष्यभर मोठ्या पदांवर काम केले, बाहेर आदर मिळविला पण म्हातारपणी सुनेच्या वचनात राहून घरात नोकर / मोलकरीण / आया बनण्यापासून सुटका.
१०. मुले परदेशी गेली तर मेल्यावर अग्नी द्यायला तरी येतील की नाही याची मारामार.
११. एकापेक्षा जास्त मुले असतील तर संपत्तीवरुन कलह यापासून सुटका.
एकंदरीत फायदा तोट्याचा विचार केला तर विनापत्य अपत्य राहण्याचे फायदे भरपूर दिसतात. ना रहेगा बास ना बजेगी बासुरी !!
खरे आहे. जीवनात दु:ख नसेल तर परमेश्वराची आठवण काढण्याचे प्रयोजन फार कमी उरते.
प्रतिसाद आवडला परंतु तुम्ही सांगितलेले तोटे हे ही जीवनशैली जगणार्यांसाठी तोटे नाहीतच. कारण त्यांना अशा अनुभवांची
आस नसतेच मुळी. या व्यक्तींना मुलांशिवाय आपले जीवन अपुर्ण वाटत नाहीच.
तुमचे म्हणणे काहीसे खरे आहे. संकटे आल्यावर लोक परमेश्वराचा धावा करतात
पण निरीश्वरवादी हा कायमच निरीश्वरवादी असतो - त्याचा सुख-दु:खाशी संबंध नसतो. मी गेले कित्येक वर्षांपासून खात्रीने निरीश्वरवादी आहे. जरी अपत्य नसलीच तरी दु:खाचे प्रसंग /संकटे आलीच नाहीत असे नाही.
अगदी खरंय.. फायदेच फायदे आहेत.
अलबत 👍
तुम्ही सांगितलेल्या तोटयांपैकी पाहिल्या चारच्या बाबतीत वर तर्कवादींनी दिलेल्या,
"तुम्ही सांगितलेले तोटे हे ही जीवनशैली जगणार्यांसाठी तोटे नाहीतच. कारण त्यांना अशा अनुभवांची आस नसतेच मुळी. या व्यक्तींना मुलांशिवाय आपले जीवन अपुर्ण वाटत नाहीच."
ह्या प्रतिसादाशी सहमत!
खालील पाचवा हा माझ्यामते तोटा नसून एक मुद्दा आहे,
"आयुष्यात जेवढे जास्त दु:ख तेव्हढे परमेश्वर स्मरणाकडे जास्त लक्ष."
आणि तुम्ही Quote केलेला तर्कवादींचा खालील मुद्दा/अंदाज
"विनापत्य जीवनशैली अगदी स्वेच्छेने स्वीकारणारे किंवा त्याकडे ओढा असणारे लोक बहुधा निरिश्वरवादी आहेत, किंवा धार्मिक व सामाजिक पातळीवर डाव्या विचारांकडे झुकणारे आहेत."
वरील दोन्ही मुद्द्यांच्या बाबतीत तुम्हा दोघांशी खालील कारणासाठी असहमत!
कर्मकांडांचा विरोधक असलो आणि अध्यात्माकडे ओढा नसला तरी मी ईश्वरावर पूर्ण विश्वास असलेला एक 'अस्तिक' मनुष्य आहे. आणि शाळकरी वयापासूनच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्ववादी विचारांचा मनावर पडलेला प्रभाव (आताच्या शिवसेनेशी दुरान्वयेही संबंध नसूनही) आजही कायम असल्याने डाव्या विचारांकडे झुकण्याची कधी वेळच आली नाही.
तसेच दुःखाच्या वेळी परमेश्वराचे स्मरण तर सगळेच अस्तिक लोक करतात (निरीश्वरवादी लोक काय करतात ह्याची मला कल्पना नाही) पण दुःख नसतानाही परमेश्वराचे स्मरण करण्याची संधी आणि वेळ जर आम्हाला मिळत आहे तर कमी काय नी जास्ती काय, दुःखाचे डोहाळे हवेतच कशाला 😀
बाकी तुम्ही दिलेल्या फायद्यांची यादी अजून बरीच वाढवता येईल पण तूर्तास त्यातले आमच्यासाठी महत्वाचे असलेले फायदे अधोरेखित करतो,
1. "स्वत:चे अपत्य नसल्यामुळे तेच प्रेम भाचे, पुतणे आणि इतरांवर करता येते."
+१ 'आपला तो बाळ्या आणि दुसऱ्याचे ते कार्ट' असा दुजाभाव नं ठेवता सर्वच लहान मुलांवर सारखे प्रेम करता येते.
6. "मुलांचे शाळेच्या वेळापत्रकाप्रमाणे आपले वेळापत्रक बनविणे."
बायकोच्या कार्यालयीन जवाबदाऱ्यांमुळे तर माझ्या व्यावसायिक कामांसाठी असो किंवा लास्ट मिनिट ठरणाऱ्या भटकंतीच्या कार्यक्रमासाठी असो, उद्या नक्की कुठल्या ठिकाणी असू ह्याची खात्री आज देता येत नाही अशी परिस्थिती असल्याने हा फायदा आमच्यासाठी सर्वात महत्वाचा आहे.
7. "मुले कॉलेजला गेल्यावर वाईट संगतीला लागतील काय ? आजकाल काय काय बातम्या ऐकायला येतात. काळजीपासून मुक्तता."
हा फायदा म्हणुन नाही पण एक विचार म्हणुन आवडलेला मुद्दा आहे!
जर आम्ही मूल जन्माला घातले असते आणि कर्मधर्म संयोगाने ते आईवर नं जाता बापावर म्हणजे माझ्यावर गेले असते तर मात्र ही काळजी प्रचंड सतावत राहिली असती. वाईट संगत वगैरे लागली नसूनही आई-बाबांच्या जीवाला प्रचंड घोर लावणारे बरेच प्रताप अस्मादिकांनी लहानपणापासूनच करून झाले आहेत 😀
माझ्या प्रतिसादातील "विनापत्य जीवनशैली आणि निरिश्वरवाद" या मुद्द्यावरील तुमच्या प्रतिक्रियेची वाट बघत होतो.
म्हणजे माझा समज चुकीचा ठरला तर :)
हो खरंतर तिथेच प्रतिसाद देणार होतो, पण तेवढा भाग मुटके साहेबांनी त्यांच्या प्रतिसादात Qoute केला होता म्हणुन सामायिक प्रतिसाद दिला 😀
Yup 😔
विनापत्य जीवनशैली चे फायदे
यातील बरेचसे फायदे हे आंबट द्राक्षे सारखे भासतात.
१. स्वत:चे अपत्य नसल्यामुळे तेच प्रेम भाचे, पुतणे आणि इतरांवर करता येते.
स्वतःच्या अपत्यावरील प्रेम हे दुसऱ्याच्या अपत्यावर कधीही करता येत नाही हे जीवशास्त्रीय सत्य आहे. आपल्या मुलाने त्याचे खेळणे मोडले तर येतो त्याच्या तिप्पट राग आपल्या भाच्या पुतण्याने मोडले तर येतो.
२.बायकोचे बाळंतपण नीट निभावून नेले जाईल ना ? बाळ आणि बाळंतीण सुखरुप राहिल ना ही काळजी करण्यापासून पुरुषांची मुक्तता तर बाळांतपणानंतर शरीराचा सुडौलपणा गमावण्यापासून मुक्तता .
बाळंतपण नीट निभावले जाणार नाहि ही शक्यता फार कमी आहे.
हे म्म्हणजे सायकल चालवताना पडायला होते म्हणून सायकल शिकायलाच नको म्हणण्यासारखे आहे.
आणि सुडौलपणा बद्दल म्हणालात तर मुलं न झालेल्या किती बायका चाळीशीत सुडौल असतात? बाळंतपणाचा आणि सुडौलपणाचा संबंध नाही तर गरोदर होण्याच्या अगोदर, गरोदरपणात आणि बाळंतपणात आपण किती खातो आहोत त्यावर आहे.
कालच माझ्याकडे गरोदर होण्यापूर्वी ९५ किलो आणि आता तीन महिने झाल्यावर ९८ किलो वजन झालेली स्त्री अली होती आणि बाळाचे वजन सध्या ६०० ग्राम आहे
३. बाळ आजारी पडल्यावर तुम्ही अगदी स्वत: डॉक्टर असा पण बाळाचे रडणे, त्याचे दु:ख पाहून जीव कळवळणे, अनामिक काळजी वाटणे यापासून सुटका.
असं काही होत नाही. मी स्वतः डॉक्टराचे आणि बाळाच्या आजारपणाची अनामिक चिंता काही वाटत नाही. अर्थात माझ्या मुलांना गंभीर असा कोणताही आजार झाला नाही हे हि तितकेच खरे. पण गंभीर आजार काही बाळालाच व्हायला हवा असे नाही. तो तुम्हाला नि तुमच्या पत्नीला सुद्धा होऊ शकतो.
४. मुलांच्या जन्माचा खर्च वाचतो. (कमीतकमी २५ हजार ते जास्तीत जास्त कितीही)......
लग्न केले नाही तर हाही खर्च वाचतो. कामवासनेच्या शमनासाठी गणिकालये कमी नाहीत.
स्वतःचे कोणी माणूस हवे, भावनिक भुकेसाठी माणूस (/ स्त्री) लग्न करतो. तसेच मुले होऊ देतात.
५. मुलांचे संगोपन (शाळेचा खर्च, कॉलेजचा खर्च) - बचत सध्याच्या हिशोबाने कमीतकमी ५ लाख ते जास्तीत जास्त कितीही....
६. मुलांचे शाळेच्या वेळापत्रकाप्रमाणे आपले वेळापत्रक बनविणे.
वरीलप्रमाणेच
७. मुले कॉलेजला गेल्यावर वाईट संगतीला लागतील काय ? आजकाल काय काय बातम्या ऐकायला येतात. काळजीपासून मुक्तता.
उद्या आपली बायको / नवरा लफडं करणार नाही का? लग्नच केलं नाही तर या काळजीतूनही मुक्तता होईलच.
८. मुलांचे लग्न झाल्यावर ते आईबापांना वार्यावर सोडून फक्त त्यांच्याच संसारात रमतात आईबाबांची हेळसांड करतात त्यापासून मुक्तता.
मुलं तुमच्या संसारात रमतील हे मूलभूत गृहितकच चूक आहे.
आईबापांची हेळसांड करतील यासाठी आईबापांनी त्यांना मॅच्युअर होणारी मुदत ठेव समजणे सोडून दिले पाहिजे .
ज्यांना मुलंच नाहीत त्यांची काळजी कोण घेईल हा विचार येथे येत नाही का ?
९. आयुष्यभर मोठ्या पदांवर काम केले, बाहेर आदर मिळविला पण म्हातारपणी सुनेच्या वचनात राहून घरात नोकर / मोलकरीण / आया बनण्यापासून सुटका.
मोठ्या पदांवर राहिले आणि आर्थिक नियोजन केले नाही तरी ही सुनेच्या वचनात राहायलाच लागेल हि अतिशयोक्ती आहे. उलट अतिशय प्रेम करणारी सून मिळाली तर आयुष्य अधिक सुंदर होईल असा विचार का करत नाही?
१०. मुले परदेशी गेली तर मेल्यावर अग्नी द्यायला तरी येतील की नाही याची मारामार. मुलं नसली च तर अग्नी कोण देणार? हा विचार नाहीच केलेला
११. एकापेक्षा जास्त मुले असतील तर संपत्तीवरुन कलह यापासून सुटका.
संपत्तीचा आपल्या हयातीत सुविनयोग केल्यास असले विचार येणारच नाहीत. उलट आपल्यामागे आपल्यी सम्पत्ती आपल्या रक्तामांसाचा सोडून तिसऱ्याच माणसाच्या कामी येणार हा विचार अपत्यहीन माणसांना डाचत असेल का असा विचहर करून पहा
बाकी आपल्या मनाचे असे खोटे समाधान करून घेण्यापेक्षा मला मुले नकोत या मागे माझा ठाम विचार आहे त्याचे फायदे तोटे जगाला सांगण्याची गरजच काय? असा साधा सरळ विचार का करत नाही?
आय आय टी मध्ये जास्त मुले वैफल्यग्रस्त होतात किंवा अमली पदार्थांच्या आहारी जातात म्हणून मी आय आय टी मध्ये गेलो नाही यासारखी विचारसरणी नको.
डॉ.खरेंशी सहमत. प्रेमासोबत हक्क ही सुध्दा एक भावना आहे. हक्क बजावणे व तो बजावुन घेता येणे ह्या दोन्ही गोष्टी स्वतःच्या अपत्याच्या बाबतीत जितक्या सहजपणे करता येतो तितका पुतण्या/भाच्यांशी करता येत नाही. स्वतःच्या मुलावर चिडणे प्रसंगी हात ही उगारणे ह्या गोष्टी इतरांच्या मुलांबाबतीत करणे फार अवघड आहे.
आपली व सुबोध साहेबांची मुळ वाक्याचा अर्थ समजून घेण्यात गल्लत झाली आहे असे वाटते. स्वतःच्या अपत्यावरील प्रेम हे दुसऱ्याच्या अपत्यावर कधीही करता येत नाही हे जीवशास्त्रीय सत्य आहे हे बरोबर आहे पण आपण अपत्यलेस जीवनशैलीचा विचार करतोय ना ?
दिव्यांग किंवा मेंटली चेलेंज मूल झाले तर ?
या भीतीने मूल नको असे विचार असलेली जोडपी आहेत .
काहीजणांच्या ओळखीत किंवा घरात असे कोणी असेल तर ही भिती प्रबळ असते
आमच्या कॉलेजच्या जुन्या ग्रुपमधली एक तामिळ भाषिक मैत्रीण आहे. ती स्वतःला जितके समजायची तितकी दिसायला कुरूप आम्हाला तरी कधी वाटली नव्हती नी अजूनही वाटत नाही.
सामान्य रूपामुळे लग्न जमायला बराच उशीर झाला आणि नवराही अगदीच रूपाने बेताचा आहे. त्या दोघांनी आपल्यापोटी 'कुरूप' मूल जन्माला येऊ नये ह्या एकमेव कारणासाठी विनापत्य राहण्याचा निर्णय घेतला आहे.
हे कारण आम्हाला (ग्रुप मेम्बर्सना) पटलेले नसले आणि त्यावर तिच्याकडेही कुठले स्पष्टीकरण मागितले नसले तरी लहानपणापासून त्या दोघांवर रंग आणि रूपावरून इतरांकडून झालेल्या शेरेबाजी/टोमण्यांतून दोघांच्या मनात निर्माण झालेला न्यूनगंड आणि कदाचित असे लज्जा/अपमानास्पद जीवन आपल्या अपत्याच्या वाट्याला येऊ नये ह्या भावानेतून त्यांनी हा निर्णय घेतला असावा असा आमचा अंदाज आहे.
कृष्णवर्गीय (रंगाने काळी / सावळी) होती का? भारतामध्ये गोर्या रंगाच्या लोकांना खुप प्राधान्य दिले जाते.
हो.
कॉलेजमध्ये 'कलर गया तो पैसा वापीस' अशी शेरेबाजी तिच्यावर होत असे! अर्थात ती दुसऱ्या वर्षी आमच्या ग्रुपला जॉईन होई पर्यंतच, नंतर कोणाची बिषाद होती तिला काही बोलायची 👊 😀
भारत आणि रंगभेद
धन्यवाद. तुमच्यामुळे तीला होणारा काही त्रास वाचला असेल अशी मी अपेक्षा करतो. रंगभेदी आणि रंगभेदाला प्रत्यक्ष- आणि अप्रत्यक्षमार्गे प्रोत्साहन देणार्या लोकांविरोधात राहायची गरज आहे.
माझ्या भारतातील अनुभवावरुन भारतात अजुन रंगभेदाविषयी जाणीवा अजुन प्रगल्भ नाहीत असे मला वाटते. लग्नाच्या जाहिरातीमध्ये सरसकट गोरा वर्ण, गोरी बायको हवी अशी वर्णने असतात. सहज बोलतानाही गोरे म्हणजे सुंदर आणि काळे म्हणजे कुरुप असे समीकरण असते.
दुर्देवाने ह्यामुळे रंगाने गडद पणे गुणाने चांगल्या लोकांमध्ये भयंकर असा न्युनगंड निर्माण होतो, त्यातुन कितीतरी होतकरु तरुण / तरुणी मागे पडत असतील.
तुमच्या त्या बुक्कीच्या चिन्हाने आणि हसर्या चेहर्याने गडबड केली, काही केल्या पुर्ण प्रतिसादच जात नव्हता. :)
😀
तुमच्या त्या बुक्कीच्या... मिपावर थेट स्मायली टाकता येत नाहीत.
तुम्हाला ह्या लेखाचा त्यासाठी उपयोग होईल!
(जाहिरात 😉)
सहमत.. विनापत्य जीवनशैलीचा निर्णय घेण्यामागे न्यूनगंड के कारण असू शकते. याचे स्पष्टीकरण असेही देता येईल - कोणत्याही जीवाला खरे तर अमरत्वाची इच्छा असते पण ते शक्य नसते म्हणून स्वतःच्या गुणसूत्रांपासून बनलेली अपत्य जन्माला घालावेसे वाटते अशी एक थिअरी आहे. म्हणजेच कोणत्याही जीवाला स्वतः श्रेष्ठ असल्याची, कुणीतरी विशेष असल्याची किंवा गुणवंत असल्याची एक भावना असते व म्हणून स्वतःसारखी अपत्ये जन्माला घालाविशी वाटते. जर ही भावनाच लोप पावलेली असेल.. आपणही "कुणीतरी आहोत" ही भावनाच हरवली असेल तर अपत्य जन्माला घालण्याची उर्मी पण नाहीशी होईल.
लेख आणि प्रतिसाद, दोन्ही मस्तच
चांगला लेख चांगली चर्चा.
श्री दादा कोंडके यांची स्वतःला मुल नसल्यामुळे त्यांच्या पुतण्याने (श्री विजय कोंडके) यांनी कसा गैरफायदा घेतला, शेवटी वय निघुन गेल्यानंतर त्यांना कशा पश्चात्ताप झाला याचे चांगले वर्णन 'एकचा जीव' या पुस्तकामध्ये मध्ये आहे.
बरे प्रतिसाद हे शहरी पार्श्वभुमीतुन लिहीले आहेत, ग्रामिण भागात ते लागु होत नाहीत.
अवांतर वाटेल पण मुल नको या विचारातून पुढे लग्न तरी कशाला ? असा विचार पुढे येऊन लग्नसंस्था मोडकळीस येईल काय असे वाटते. (ती तशी मोडकळीस आली किंवा न आली मला फरक पडत नाही. जगाची चिंता वाहण्याचा भार माझ्या माथी नाही).
कलियुगाच्या अंती सगळ्या जगाचा विनाश होतो असे जगातील सगळ्या धर्मग्रंथात वर्णन आहे असे म्हणतात. प्रत्यक्षात पृथ्वीची कोणत्या ग्रहाशी टक्कर होईल, सुर्याच्या उष्णतेमुळे धरतीवरील जीवन नष्ट होईल किंवा जलप्रलय होऊन पृथ्वी गिळंकृत होईल आणि मानवजात नष्ट होईल असे म्हणण्यापेक्षा मुले जन्माला घालणे बंद झाले तर एक दिवस आपोआपच मानवजात नष्ट होईल काय ? विचार जास्तच अतिरंजित वाटतात काय ?
लग्नसंस्था मोडकळीस येण्याचे इतरही अनेक कारण असू शकतात.
"मूल नको" हा विचार खरे तर "मूल हवे" या आंतरिक ओढीच्या अभावामुळे आलेले आहे (क्वचित काही अपवाद असतीलही) . अशी ओढ नसणे हे निसर्गातले हे एक विचलन (व्हेरिएशन) आहे. हे विचलनच नियम बनेल का ? जर नाही तर अशी परिस्थिती ओढवणार नाही.
काही कारणे कायदेशीर आहेत, काही मानसिक आहेत, काही शारिरीक आहेत, काही सामाजिक आहेत.
मुले जन्माला घालणे बंद झाले तर एक दिवस आपोआपच मानवजात नष्ट होईल काय ?
चर्चा प्रतिसाद आवडले
अपत्य जन्माला घालणे आणि वाढवणे हि एकीकडे अतिशय नाजूक आणि वयक्तिक बाब असूनही कधी कधी ती सामाजिक म्हनण्यापेक्षा देश/ राज्या शकट चालवणे इथपर्यंत पोचते ....
देश/ समाजाप्रमाणे हि बाब "सरकारी" होऊ शकते
चीन = फक्त १
भारत = २ पुरे
वरील दोन = मुलं = राष्ट्रीय संपत्ती आटोक्यात आणा !
खालील दोन = मुलं = राष्ट्रीय संपत्ती वाढवा !
सिंगापोरे: सरकारकी खर्चाने डेटिंग क्रूझ वर चला ( म्हणजे एक तर लग्न कराल बहुतेक आणि मग मूल होईल )
ऑस्ट्रेलिया = मूलं जन्माला आले कि ५ हजार डॉलर ( १ डॉलर = ५५ रु ) खास बोनस ,
मुले ही भानगड एकुणातच नको.
मुले झाली की अनेक बम्धने येतात. आपण आपले बरेचसे व्यवसायातले/ करीयरमधले निर्णय केवळ मुले आहेत म्हणून घेऊ शकत नाही. किंवा नावडते निर्णय घ्यावे लागतात.
मुलांना सांभाळणे हा ताप वाटत नाही. मात्र ती टीन एजर झाली की त्यांचे पालकांना टाकून बोलणे त्यांचे नको ते राग लोभ सांभाळणे हे करत बसावे लागते.
त्यापेक्षा मुले नसलेली बरी.
म्हातापणची काठी म्हणावे तर ;मुले तरुण झाली की आपण उगाच त्यांच्यावर भार तरी होतो किंवा मुलेच पालकांचे साठवलेले धन नष्ट करतात.
पालकही उगाच मुलांसाठी याम्व त्याग केला , अशा बढाया मारून मुलांना हीन भावना देतात या पेक्षा जे काही होईल ते आपलया स्वतःमुळे होतेय या भावनेत राहिलेले बरे.
लग्नदेखील शक्यतो न केलेले बरे. ( वपुंच्या भाषेत बोलायचे तर " एकट्या वेणीसाठी आख्खी बाई जन्मभर पत्करावी लागते " )
जन्मभर तडजोडी करत आयुष्य मारूनमुटकून जगायचे तरी कशाला
लग्न टिकेल की नाही याचीच शाश्वती वाटत नाही म्हणून मूल नको हे ही एक कारण असते. मूल असेल तर घटस्फोट घेणे अवघड जाते. मुलाचे संगोपन व जबाबदारी हा एक महत्वाचा व अतिरिक्त मुद्दा विचारात घ्यावा लागतो. तसेही मूल म्हणजे म्हातारपणाची काठी ही अंधश्रद्धा आहे हे लोकांना आता पटू लागले आहे. जन्म देताना आम्हाला विचारल होत का? असा प्रश्न आता मुलं विचारु लागली आहेत. तसेच विवाहापेक्षा लिव्ह इन हा पर्याय जरा आकर्षक वाटू लागला आहे. गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ली हा पर्याय जरा बरा वाटू लागला आहे.
आता काळ खूप झपाट्याने बदलतोय.. कौटुंबिक, सामाजिक परिस्थिती खूप वेगाने बदलली/बदलते आहे.
जनरेशन गॅप ही झपाट्याने वाढली आहे. म्हणजे माझे पणजोबा व माझे आजोबा यांच्यातही जनरेशन गॅप असेलच पण त्यापेक्षा माझे आजोबा व माझे वडील यांच्यात असलेली जनरेशन गॅप जास्त असेल व माझे वडील व माझ्यात असलेली जनरेशन गॅप अजूनच जास्त.
लोक स्वतःशीच विवाह करु लागलेत आता तर.लिव इन ही जुने झाले कि काय असे वाटु लागलेय. म्हणजे मुले नको म्हणुन लग्न नको.पण आता काही जबाबदारीच नको म्हणुन स्वत:शीच विवाह करा.
विवाहापेक्षा लिव्ह इन हा पर्याय
पुरुषासाठी आकर्षक आहे पण स्त्रियांसाठी अजिबात नाही.
कारण मैत्रीणीचे वय वाढू लागले कि तिला सोडून देऊन नवी मैत्रीण करणे पुरुषाला सोपे जाते पण वय वाढणाऱ्या स्त्रीला कोणती सुरक्षितता मिळते?
पुरुष स्त्रीचे रूप पाहतो तर स्त्री हि पुरुषात सुरक्षितता पाहते.
मूल झाले तर त्यात स्त्रीची भावनिक गुंतवणूक पुरुषापेक्षा कितीतरी जास्त असते. त्यामुळे मुलाला टाकून जाणारी आई दुर्मिळ असते तर बायको मुलांना सोडून देणारें पुरुष कितीतरी असतात.
यामुळे लिव्ह इन हा पर्याय सर्व सामान्य स्त्रियांसाठी सर्वथा गैरसोयीचा आहे.
९० वर्षांपूर्वी श्री र धों कर्वे यांनी लिहून ठेवले आहे कि बहुतांश स्त्रिया "चरितार्था"साठी लग्न करतात.
१०० वर्षांपूर्वीच कशाला आजमितीला सुद्धा स्त्रियांना चरितार्थाचे मार्ग पुरुषांपेक्षा नक्कीच कमी उपलब्ध आहेत.
तत्वतः असहमत. समजा पंचविशीतले स्त्री व पुरुष लिव्ह इन मध्ये एकत्र राहू लागले आणि चाळिशीमध्ये पुरुषाला ती स्त्री जोडीदार अनाकर्षक वाटू लागली तर नव्या मैत्रिणीसाठी दोन पर्याय असतील
१) चाळिशीतील दुसरी स्त्री - एकतर चाळिशीतील एक स्त्री सोडून चाळिशीतीलच दुसर्या स्त्रीशी सख्य करण्यात काय प्रेरणा असणार ? पण तरी समजा त्याने अशी जोडी जमवलीच तर त्याचा अर्था त्या दुसर्या स्त्रीचेही आधीच्या एका चाळिशीतल्या पुरुषाशी नाते तुटले आहे (तिने त्याला सोडले की त्याने तिला सोडले हा भाग वेगळा) म्हणजेच आता नात्यात नसलेली चाळिशीतली पहिली स्त्री आणि दुसरा पुरुष आहेत. कदाचित ते एकत्र येवू शकतील किंवा येणारही नाहीत.
पण एकूणात नात्यात असलेल्या चाळिशीतल्या पुरूषांची संख्या = नात्यात असलेल्या चाळिशीतल्या स्त्रियांची संख्या असेल आणि
नात्यात नसलेल्या चाळिशीतल्या पुरूषांची संख्या = नात्यात नसलेल्या चाळिशीतल्या स्त्रियांची संख्या असेल
२) पंचविशीतील दुसरी स्त्री - पंचविशीतील स्त्री चाळिशीतील पुरुषाला लाभेल ही शक्यता कमीच आणि तसे झाले तरी त्यामुळे पंचविशीतील एका पुरुषाला जोडीदार मिळणार नाही. एकतर त्याला मग चाळिशीतील स्त्रीशी जोडीदार नसलेल्या स्त्रीशी जोडी जमवावी लागेल किंवा एकटे रहावे लागेल.
सहमत.
अर्थार्जन करणार्या स्त्रियांसाठी ठीक आहे पण कौटुंबिक व सामाजिक आघाड्यांवरचा विरोध विचारात घ्यावा लागेल. अर्थार्जन न करणार्या स्त्रियांकरिता बहुतांशी अयोग्य पर्याय आहे. अपत्य हवी असल्यासही बहुतांशी अयोग्य (भारतीय समाजाचा विचार करुन)
मूलभूत फरक लक्षात घ्या
पंचविशीतील तरुण केवळ पंचविशीतीलच नव्हे तर १८ पासून वरच्या वयोगटातील स्त्रीबरोबर लिव्ह इन मध्ये राहतो.
जगभरात पुरुष वयाने जास्त आणि स्त्री वयाने कमी अशी बहुतांश लग्ने होतात. तेंव्हा चाळीशीच्या माणसाला चाळीशीचीच मैत्रीण असेल/असावी हा मुद्दा गैरलागू आहे.
चाळीशीचा माणूस आर्थिक स्थैर्य असेल तर विशी पंचविशीच्या स्त्री बरोबर लिव्ह इन राहील?
परंतु तिशीचा माणूस उगाच चाळीशी पंचेचाळिशीच्या स्त्रीबरोबर लिव्ह इन कशाला राहील?
याशिवाय व्यवहारात स्त्री पुरुष १:१ हे प्रमाणच चूक आहे
अन्यथा एकाच माणसाच्या चार बायका आणि बरेच पुरुष लग्नावाचून राहणे असे दिसले नसते.
पुरुष एक बायको आणि अनेक अंगवस्त्रासहित सहज नांदू शकतो. उदा थायलंडचा राजा बायका आणि अंगवस्त्रांसह कोव्हीड मध्ये जर्मनीत जाऊन विलगीकरणात राहिलेला आहे. King Maha Vajiralongkorn of Thailand goes into isolation with his harem of 20 concubines in Germany, books an entire luxury hotel https://www.opindia.com/2020/03/thailand-king-isolation-20-concubine-ha…
पण किती बायका एकाहून अधिक नवरे आणि अधिक "ठेवलेले" पुरुष तुम्हाला दिसतात
काळ झपाट्याने बदलतोय हे नक्की.
😂 😂 😂
ज्यांना मुले नको आहेत किंवा तत्सम विचार आहे त्यांनी येथे आपले मत नोंदवायला हरकत नाही.
United Nations: Save the Earth – Global Birth Stop!
https://www.change.org/p/united-nations-introduce-obligatory-world-wide…
अधिक जनसंख्या - दुनिया भर में जन्म नियंत्रण को तत्काल आवश्यक करे
https://www.change.org/p/united-nations-overpopulation-%E0%A4%85%E0%A4%…
हा लेख वाचून आपल्या ओळखीतल्या आणि नातेवाईकांच्या परिवारांकडे पाहिले. एक गोष्ट जाणवली गेल्या प्रत्येक पिढीत राहणीमान पूर्वीपेक्षा जास्त वाढत गेले त्याच बरोबर मुले जन्म घालण्याची इच्छा कमी होत गेली. उदाहरण आमचे आजोबांची पिढी 1925 च्या आधी जन्मलेले घरात 4 ते 8 मुले सामान्य बाब. 1925 ते 50 च्या आमच्या वडिलांची पिढी घरात 2 ते 5 मुले. 1950-75 ते आमची पिढी घरात 1 ते 2. 1975... नंतर जन्मलेली 0 ते 1. अनेकांच्या घरात मूल नाही पण पाळीव कुत्रे आहेत, हे ही विशेष
मुले कमी होण्याचं कारण राहणीमान वाढत गेले पेक्षा संतती नियमनाची साधने जितक्या सुलभ पणे उपलब्ध झाली तितके मुले कमी होण्याचे प्रमाण वाढले.
मुले एक किंवा दोन असली कि तुम्हाला पालकत्वाचे सुख आणि अनुषंगिक फायदे मिळतात आणि त्यापेक्षा जास्त झाली कि हे फायदे त्या पटीत न मिळत उगाच भारं भार मुलांचा खर्च बोडक्यावर बसतो.
लेकुरे उदंड जाहली
तो ते लक्ष्मी सोडून गेली
हे समर्थ रामदास स्वामींचे वाचन ३५० वर्षापूर्वोचे आहे
संतती नियमनाच्या साधनापैक्षा मुले जगण्याची शक्यता वाढली आणि अकाली मृत्युचे प्रमाण घटले ही कारणे जास्त कारणीभुत आहेत.
हेच म्हणणार होतो.
वस्तुस्थिती या उलट आहे.
मुले जगण्याची शक्यता वाढली आणि अकाली मृत्युचे प्रमाण घटले यामुळे आपली लोकसंख्या काहींच्या काही वाढली. मुलांचे प्रमाण अजिबात कमी झाले नाही
The main reasons for the large growth in population in India are: (i) decline in the death rates and (ii) a persistently high birth rate.
The decline in the death rate has come about due to an increase in life expectancy
https://www.yourarticlelibrary.com/population/reasons-for-population-gr…
श्री खरे, तुमचा मुद्दा काय आहे , होणार्या मुलांची संख्या कि लोकसंख्या?
मुलांचे प्रमाण अजिबात कमी झाले नाही
डॉ. खरे साहेब
ही एक शक्यता तर आहेच. पण या विरुद्ध शक्यताही अस्तित्वात असू शकते. म्हणजे "आम्हाला मूल नकोय " असे समोरच्याला सांगितले तर त्यांच्या मनात आपल्याबद्दल काय प्रतिमा निर्माण होईल ? ते आपल्याला अगदीच स्वार्थी / चंगळवादी समजतील की काय या भितीपोटी "मूल होत नाहीये / झाले नाही" असे सांगितले जाण्याची पण शक्यता आहे. अर्थात हे खोटे फक्त ज्यांच्याशी फारसा निकटचा संबंध नाही त्यांच्यापुरते.. जवळच्या लोकांना सत्य ठावूक असतेच.
ते आपल्याला अगदीच स्वार्थी / चंगळवादी समजतील की काय या भितीपोटी "मूल होत नाहीये / झाले नाही" असे सांगितले जाण्याची पण शक्यता आहे.
ज्या जोडप्यांमध्ये बेबनाव असतो ते सुद्धा आपल्या आईवडिलांना न सांगता मूल होण्याचा निर्णय लांबणीवर टाकतात आणि आईवडिलांच्या समाधानासाठी "मूल होत नाही" असे सांगताना पाहिले आहे.
सासूच्या आग्रहावरून वंध्यत्वाच्या उपचारांसाठी आलेल्या मुली मी पाहिल्या आहेत.
कारण स्त्रीबीज तयार होण्याच्या वेळेस "संबंध" ठेवा म्हणून सांगितले असताना मुली आम्हाला सध्या मूल नको आहे असे खाजगी मध्ये सांगतात.
नवरा बायको मध्ये शरीर संबंधच नसेल तर मूल कसे होणार ?
जगात सर्व तर्हेचे लोक पाहायला मिळतात.
डॉक्टर साहेब, "हिन्दी भाषेत एक म्हण आहे "99 का फेर " . एकदा राहणीमान वाढू लागले की अधिकची इच्छा होतेच. भरपूर कष्ट करून सर्व संकटांपासून मुलांना दूर ठेवणार्या आमच्या पिढीने संतती नियमनाची साधने वापरली. एक किंवा दोन पेक्षा जास्त मुलांना जन्म दिला नाही. अनेकांनी मुलांना उत्तम शिक्षा देण्यासाठी बंकांकडून शिक्षणासाठी कर्ज घेतले. आजची पिढीला मूल म्हणजे प्रतिष्ठेनुसार भरपूर खर्च आणि मौज मस्तीत कमी. परिणाम एक ते शून्य.
आजची पिढीला मूल म्हणजे प्रतिष्ठेनुसार भरपूर खर्च आणि मौज मस्तीत कमी.
हे फारच सरसकटीकरण आहे
तर्कवादी आणि धर्मराजमुटके यांचे प्रतिसाद आवडले.
उत्तम चर्चा सुरु आहे. रोचक मते आणि त्याला उत्तम प्रतिवाद केला जात आहे !
✔️
दॅट्स मिपा !
धन्यवाद चौथा कोनाडा जी..
संपली आता बहुतांशी ..:) नवीन काही मुद्दे आलेत तर होईल पुन्हा सुरू